मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सरप्राइज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ सरप्राइज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“अरे तू आधी मला बोलून दाखव तू स्टेजवर काय काय बोलणार आहेस,…तेवढीच तुझी प्रॅक्टिस होईल,..फार घाबरल्यासारखं होत बरं त्या स्टेजवर तो काही तुझा नेहमीचा भाषणं ठोकायचा स्टेज नाही ,,.. इथे प्रॅक्टिस करून घे आमच्यासमोर,.”

तो आरश्यात बघुन भांग पाडताना थांबला,..” आई ,अग त्याची काही गरज नाही,..मला काय बोलायचं आहे त्या वधुवर मेळाव्यात ते माझं फिक्स आहे,..सो डोन्ट वरी,.. लेट्स गो ते बोलणं तुझ्या वाढदिवसाचं खास बड्डे गिफ्ट असेल,… ” .. असं म्हणत कारची चावी घेऊन तो पळाला देखिल,.. 

नंदा आणि सुनिल एकमेकांना बघून हसले,..तिने निघताना त्या सुंदर काळ्याभोर कृष्ण मूर्तीसमोर दिवा लावला,..सकाळी घातलेला सुंदर मोगऱ्याचा हार अजून टवटवीत होता,..नेहमीप्रमाणेच समाधानाने डोळे मिटुन ती म्हणाली,..”कृष्णा तू ऋषीच्या रूपाने खरा बाळकृष्ण होऊन माझ्या अंगणी आलास,… आता फार महत्वाचा टप्पा आहे माझ्या ऋषीचा,..जोडीदार चांगला मिळाला म्हणजे झालं,..” 

तेवढयात बाहेरून जोरात हॉर्न आला,..सुनीलने नंदाचा हात पकडला “ चल लवकर,..उशीर होईल आपल्याला,.. “ 

दोघे गाडीत येऊन बसले,..नंदाच्या मनात ऋषीचं लग्न म्हणजे अगदी धाकधूक सुरू होती,..कारण ह्या वधू संशोधनात तिने बऱ्याच फोटोखाली दिलेल्या माहितीत,..’सासू सासरे नसल्यास उत्तम’ ,किंवा ‘ज्यांना आई वडील नाही त्यांनी सम्पर्क करा’,  असंही लिहिलेलं होतं.  मोठया पोराच्या बाबतीत ती ते अनुभवत देखील होती,…’आज मेळाव्यात तर काय काय ऐकायला मिळणार आहे कि,..’ ती मनात विचार करत होती.

छोट्याश्याच हॉल मध्ये सगळी तयारी दिसली,..शंभर एक खुर्ची,..छान बारिक सनई आणि छोटंसं फुलांनी सजवलेलं स्टेज,..खरंतर नंदा आणि सुनील यांना ह्या ग्रुपवर वधू शोधणं नकोच होतं,…त्याचा हट्ट इथे येण्याचा .. ..  इथं स्पष्ट बोलून विवाह ठरतात हे तो ऐकून होता,,..पन्नास एक वधू वर आलेले दिसत होते,…प्रत्येक जण येऊन अगदी आत्मविश्वासाने आपल्याला हव्या असणाऱ्या जोडीदाराच्या अपेक्षा सांगत होता,..नंदाला आश्र्चर्य वाटत होतं,…’ किती बदललं सगळं आपल्या वेळी काही बोलायची हिम्मत नव्हती आणि आता मुलं मुली किती सरसावून बोलत आहेत,…’ 

वधु वरांचे पगार,शिक्षण सगळंच किती एकाचढी एक,..स्त्री पुरुष समानता पाळणारा मुलगा हवा,..कमावणारी जोडीदार हवी,…घरकामात पन्नास टक्के मदत करणारा,एकुलता एक,एकटा राहणारा ,  आईवडील असतील तरी जवळ नको,..दोन्ही वेळेस गरम जेवण देणारी,..लाजता येणारी,….काय ह्या अपेक्षा प्रत्येकाच्या बोलण्यात ऐकू येत होत्या,…ऋषीचा नंबर जवळ आला तसं नंदालाच धडधडायला लागलं,…

ऋषीने नाव,शिक्षण सांगितलं,.. जातीच्या बंधनात न अडकणारं विवाह मंडळ होतं हे, त्यामुळे तो उल्लेख नव्हता,…ऋषीने घरची माहिती दिली आणि ‘मला माझ्या आईबाबांसह स्वीकारणारी सहचारिणी हवी आहे’ असं सांगितलं,..’ माझ्या शिक्षणामुळे मला कुठेही चांगला जॉब मिळेल पण तिथे मी माझे आई बाबा नेणार,..त्यामुळे ज्यांना माझा पैसा, शिक्षण ह्याच्याशी लग्न करायचं आहे त्यांना सॉरी पण ज्यांना आमच्या तिघांसोबत राहण्याची तयारी असेल असेच ठिकाणं वेलकम आहेत,..’ 

.. .. ‘ ह्याच एक आणखी कारण,’ तो पुढे म्हणाला .. ‘ पंचवीस वर्षांपूर्वी अनाथालयात रडणाऱ्या एका मुलाचा वाढदिवस आहे हे कळल्यावर तिथे संस्थेला भेट द्यायला आलेल्या दोघा नवरा बायकोने विचारलं..  “ मुला तुला काय सरप्राईज आवडेल तुझ्या वाढदिवसाला,..?” 

ते मुल म्हणालं,” तुम्ही द्याल का ते मी सांगितलं तर,..?” 

ते म्हणाले “हो नक्की,.”

… त्यावर ते मुल म्हणालं “ मला आई बाबा हवेत,..” 

.. .. त्याक्षणी ज्यांनी दत्तक घेऊन मला एवढं सुंदर जगणं दिलं त्या आई वडिलांना मी येणाऱ्या सहचरिणीसाठी सोडून देऊ शकत नाही.  त्यामुळे कृपया ह्या अटी लक्षात ठेवूनच सम्पर्क साधा,..’ 

.. तो स्टेजवरून खाली येऊन बसला,..

.. .. .. नंदा अखंड रडत होती,..आज तिचा वाढदिवस होता आणि तो म्हंटलाच होता ‘ माझं बोलणं हेच तुला सरप्राईज गिफ्ट आहे ‘ आणि खरंच होतं ते,  कारण सख्खा मुलगा सुनेच्या म्हणण्यावर दुसरीकडे राहात होता,..ह्याने मात्र सुरुवातच अशी केली होती,..पंचवीस वर्षांपूर्वीचं सरप्राईज आता वापस मिळालं होतं,..

.. .. सुनील आणि नंदा दोघेही भरून पावले होते,..ऋषीने आईला जवळ घेतलं,.. ‘मी आहे’  हा विश्वास नंदाला त्याच्या मिठीत होता,..तिने पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं.  तिला आता त्याच्या चेहऱ्याच्या जागी काळी कृष्णमुर्ती दिसत होती,….

.. आयुष्यातल्या काही निर्णयांना मोगऱ्याचा दरवळ असतो हेच खरं,.. असंच तिच्या मनात आलं,….

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भारी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “भारी…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळचे अकरा वाजून गेलेले, चौकातला सिग्नल बंद आणि पोलीससुद्धा नव्हते. जो तो आपली गाडी दामटण्याच्या प्रयत्नात. प्रत्येकाला पुढं जायची अतोनात घाई त्यामुळे सगळा गुंता झालेला. ट्राफिक जाम. आरडाओरडी त्यात हॉर्नच्या आवाजाची भर. गर्दीत अडकलेल्या अंब्यूलन्सचा सायरन अस्वस्थता वाढवत होता.

“ए भारी, इथं का बसलाय. ” वैतागलेल्या नथूशेठनं विचारलं.

“असंच, भारी ना”दुकानाच्या पायऱ्यावर बसलेल्या भारीनं उत्तर दिलं.

“शिट्टी कुठयं, ”नथूशेठ

“ही काय, ” 

“तुझं काम कर की.. समोर बघ. ”

“काम??? ”भारीच्या प्रश्नावर नथूशेठनं कपाळावर हात मारला. त्यांना स्वतःची चूक लक्षात आली.

“भारी, इथून उठ. चौकात जा. ट्राफिक मोकळं कर. काम झाल्यावर दोन वडापाव आणि चहा देईन. ”नथूशेठ बोलल्यावर खुष झालेला भारी जोरजोरात शिट्टी वाजवत काठी घेऊन चौकात गेला आणि एकेक गाड्या मागे ढकलायला लागला. भारीचा आवेश बघून काही गाडीवाले नरमले. आपसूक गाडया मागे घ्यायला लागले. कोंडी सुटायला लागली. भारी मात्र त्वेषानं काम करत होता. हातातली काठी तलवारीसारखी फिरवत होता. त्याचा तडाखा बसल्यानं दोनचार आरसे आणि इंडिकेटर्स फुटले. गाडीवाले ओरडायला लागले पण भारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकदोघं आडवे आले तेव्हा डोळे मोठे करून भारी बेंबीच्या देठापासून जोरात किंचाळला तेव्हा फारच भयानक वाटला. पुढे आलेले चुपचाप मागे सरकले. रणभूमीवरच्या योध्यासारखा भारीचा आविर्भाव होता. पंधरा-वीस मिनिटांत ट्राफिक सुरळीत झालं. पोलिस आले. गाडीचं नुकसान झालेल्यांनी तक्रार केल्यानं पोलिस भारीला चौकीत घेऊन गेले.

— 

जेमतेम पाच फुटाची ऊंची, दणकट शरीरयष्टी, गोल चेहरा, मोठाले डोळे, खुरटी दाढी-मिशी, तिशीतच पडलेलं टक्कल, अंगात मळकट कपडे, अंगात हाफ शर्ट, पॅन्ट कायम वितभर दुमडलेली अशा अवतारातल्या ‘भारी’चा मुक्काम दिवस-रात्र चौकात असायचा. कसलाही आगापिछा नाही की घरदार नाही. दहा-बारा वर्षापूर्वी वर्षापूर्वी चौकात आला आणि तिथलाच झाला. मंदबुद्धी भारीविषयी कोणालाच माहिती नव्हती आणि त्यालासुद्धा स्वतःविषयी काही सांगता येत नव्हते. बोलताना भारी, भारी’ सारखं म्हणायचा. म्हणून सगळे त्याला ‘भारी’ म्हणायला लागले. चौक म्हणजेच भारीच विश्व झालं. तिथले दुकानदार, रिक्षावाले खायची-प्यायची काळजी घ्यायचे. कपडे द्यायचे पण त्याला कपडे बदलायचा कंटाळा. मनात आलं तरच मनपाच्या शाळेत जाऊन आंघोळ करायचा. दिवसभर कसल्या ना कसल्या कामात असायाचा. काम नसेल तर कुठल्याही दुकानाच्या पायरीवर एकटाच बडबडत बसायचा. भारी म्हणजे सांगितलेलं काम बरोबर करणारा. शंभर टक्के सांगकाम्या. जेवढं सांगितलं गेलं तेवढंच काम करणार. पाण्याची बादली आणायला सांगितलं तर फक्त बादलीच घेऊन येणार वाहणारा नळ बंद करणार नाही अशी कामाची पद्धत. कामाच्या मोबदल्यात फक्त खाण्याची अपेक्षा. पैसे कशासाठी लागतात हेच त्याला माहिती नव्हतं. खायला मिळालं की काहीही काम करायला तयार. म्हणून तो सर्वांचा लाडका होता. अनेकजण त्याच्याशी बोलायचे. चेष्टा करायचे पण त्रास द्यायचे नाहीत उलट काळजी घ्यायचे. डोकं चालत नसलं तरी भारीकडे अफाट ताकद शक्ती होती. खरं सांगायचं तर आयुष्य असावं तर भारीसारखं. कसली काळजी नाही. जबाबदारी नाही की टेंशन नाही. काम करा आणि खात रहा. एकदम निवांत सुखी आयुष्य. असं सर्वांना मनोमन वाटत होतं.

भारीला चौकीत नेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हातातली कामं सोडून अनेकांनी तिकडं धाव घेतली. ‘भारी’साठी गर्दी जमलीय हे कळल्यावर इन्सपेक्टरांना आश्चर्य वाटलं.

“साहेब, चूक झाली. सोडून द्या. पुन्हा असं होणार नाही”नथूशेठनं हात जोडून विनंती केली.

“अहो, त्यांनं गाड्या फोडल्यात. तक्रार दाखल झालीये”

“मुद्दाम केलं नाही. ट्राफिक जाम सोडवायला गेला त्यावेळी जोशात.. ”

“बरं झालं काठी गाड्यांवर बसली. माणसांना मारलं असतं तर.. ”

“तो खुळा आहे. डोक्यानं जरा कमीयं. जे नुकसान झालंय ते आम्ही भरून देतो. त्याला सोडून द्या. ”नथूशेठच्या बोलण्याला सोबतच्या दुकानदारांनी दुजोरा दिला. इन्सपेक्टर विचारात पडले. नुकसान झालेल्या गाडीवाल्यांना नथूशेठनं भारीची वस्तुस्थिती आणि नुकसान भरपाई देण्याविषयी सांगितल्यावर तक्रार मागे घेतली गेली. त्याचवेळी भारी नथूशेठकडे “वडापाव” मागत होता. वडापाव मिळाल्यावरच तो शांत झाला.

“कोण आहे हा”इन्सपेक्टर 

“आमच्या चौकाचा दत्तक पुत्र”

“म्हणजे”

“एकटा जीव सदाशिव. मागंपुढं कोणी नाही. कायम चौकात असतो. दुकानांची काळजी घेतो. सांगेल तेवढीच कामं करतो. बदल्यात फक्त खायला द्यायचं. पैशे नाही. सगळे मिळून त्याची काळजी घेतो. ”नथूशेठ.

“चांगलंयं की, तुम्हां सर्वांचे फार कौतुक. ”

“साहेब, एक विनंती होती. आमच्या चौकात ट्राफिकचा प्रॉब्लेम नेहमीचा आहे. लोक कशाही गाड्या पार्क करतात. भारीच्या मदतीनं गाड्या नीट पार्क करण्यासाठी आग्रह करतो. हळूहळू फरक पडतोय. आता तुमची परवानगी असेल तर ट्राफिकसाठी भारीची मदत घेता येईल”

“विचार चांगलाय पण त्यानं गाड्या फोडल्या, लोकांना मारलं तर.. ”

“त्याची जबाबदारी आम्ही घेतो. भारीला फक्त एक शिट्टी देतो. लाल सिग्नलला गाड्या झेब्रा क्रॉसिंगच्या मागे राहतील आणि व्यवस्थित गाड्या पार्क केल्या जातील हे पहायचं एवढंच काम भारी करेल. काय करायचं नाही ते समजावून सांगू आणि लक्ष ठेवू. ”

“हरकत नाही. काही दिवस ट्रायल करून बघा पण हात उचलायचा नाही हे त्याला आवर्जून सांगा.”

“नक्कीच.. ”आभारी आहे.

गाड्या नीट कशा पार्क करायच्या तसंच ट्राफिक कंट्रोल कसं करायचं याविषयी भारीला दाखवलं गेलं. पुन्हा पुन्हा समजावलं. “भारी, आता काम सुरु कर. गाड्या व्यवस्थित लावायला सांगायचं. ओरडायचं नाही. भांडणं, माऱ्यामाऱ्या नाही. शिव्या द्यायच्या नाहीत कळलं. हे नीट केलंस तर दोनदा चहा-नाश्ता, सकाळ-संध्याकाळ जेवायला मिळेल”नथूशेठनं सांगितल्यावर भारीनं मान डोलावली. नवीन पॅन्ट शर्ट, शिट्टी आणि टोपी मिळाल्यावर भारी खुष झाला आणि अचानक ओरडत चौकाच्या दिशेनं पळाला “ए गाडी, मागं मागं घे”पांढऱ्या पट्ट्यावर उभ्या असलेल्या बाइकवाल्याला गाडी मागे घ्यायला लावली. “आता काही खरं नाही. भारी सोडत नाही” नथूशेठच्या बोलण्यावर सगळे हसले.

वर्ष झालं, भारीचं काम चालूयं. त्यानिमित्तानं सत्कार कार्यक्रम होता. चौकातलं ट्राफिक पूर्णपणे नाही तरी बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित झालंय. खासकरून पिक अवर्समध्ये भारीचा खूप उपयोग होतो. इतके दिवस झाले तरी भारीचा उत्साह अजूनही तसाच. गाडीवालेसुद्धा सहकार्य करतात. निदान चौकापुरते तरी नियम पाळतात. गाड्या व्यवस्थित पार्क करतात. याचं सगळं श्रेय भारीला. ”नथूशेठच्या बोलण्याला सर्वांनी कौतुकानं टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला तेव्हा सत्कारमूर्ती भारीच लक्ष समोसा आणि वेफर्सकडे होतं. नथूशेठनं शाबासकी दिल्यावर भारी समोर बोट दाखवत म्हणाला “समोसा, ”

“खा की मग”. शेठ.

भारीनं प्लेट उचलून खायला सुरवात केली.

“कसाय समोसा” शेठनं विचारलं हसत हसत भारीनं उत्तर दिलं.. “भारी, जाम भारी ”.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? जीवनरंग ?

☆ ऋण – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या ‘आशा दीप’ नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधून मधून पोस्टमन येउन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा, तेंव्हा हे ठरावीक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या अविर्भावात, बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेउन वाचत बसलेले असत. किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत.

त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली ‘देशमुख काका… तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेउन जा..’ तेंव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच.

‘आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?’ असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात ‘बार’ भरला होता. मानेनेच ‘जाउन या..बघा काय आलय..’ असे नानांनी आप्पांना सुचवले तसे आप्पा लगबग ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले.

पाकीट दिल्लीवरुन स्पिड पोस्टने पाठवलेले होते.

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहीले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01

आप्पा देशमुख ला दिल्लीवरुन कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते.

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येउ लागल्या..

‘काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढं दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..’ आबा क्षिरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.

‘अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला..तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या..’ बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले.

‘छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commision मधे घेताहेत की काय? अभिनंदन आप्पा..!!’ पांडूकाका पवार बोलले.

तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले..

‘अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच…ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..’

आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकीटाची एक कड कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुने बरोबर पटेनासे झाले तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येउन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येउन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही.

पाकीटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..

‘माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक दिना निमीत्त सप्रेम नमन.’

खाली फक्त नाव होते..आरती.

नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..’अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’

आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या. पण ‘ही’ त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते.

‘ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..’

आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतिच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहीले होते. आश्रमात ‘पत्र वाचन’ हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले.

बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..

‘प्रिय सर,

मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई.

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण ‘देसाई बाल अनाथ आश्रमा’त वाढलेल्या माझ्यासारख्या बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुले आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते.

सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरुकडून पैसे मागायची भिड नाही वाटायची तेंव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात.

तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही ‘देसाई मुले मुली’ मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोजीशन वर कार्यरत आहेत.

मला तुम्ही मी आठवीत असताना शिकवलेली ती कविता, जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते

‘The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep..’

या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थ खात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..’इथे’ आहात.

सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करु शकत नाही. या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..

असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे…

खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर………बाबा…?

तुमचीच,

– आरती देसाई

पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला…. त्यांनी आप्पांकडे पाहिले..

आप्पा ते पाकिट छातीशी धरुन रडत होते…

.. .. .. शेवटी एवढेच म्हणेन.. .. 

माणसाचे अश्रू सांगतात ..  तुम्हाला दुःख किती आहे.

संस्कार सांगतात .. कुटुंब कसं आहे.

गर्व सांगतो .. पैसा किती आहे.

भाषा सांगते .. माणूस कसा आहे.

ठोकर सांगते .. लक्ष किती आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे .. 

वेळ .. सांगते नातं कसं आहे.

💦🌨️

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आम्हाला समजून घ्या…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? जीवनरंग ?

☆ ‘आम्हाला समजून घ्या…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आलिशान गाडीत बसलेल्या, गीता वाचनात दंग असलेल्या, सुटाबुटातील राघवदास शेठच्या पुढे एकदम टाळी वाजली. ड्रायव्हर त्या व्यक्तीला हाकलत होता… “ए चल! हो बाजूला. एक तर ट्रॅफिक जाम झालंय. शेठना महत्वाची काम आहेत. आणि तुझं काय रे मधेच हे झेंगटं? काही काम धंदा करा. तुम्हाला दुसरा उद्योग काय आहे म्हणा प्रत्येकापुढे टाळी वाजवून हात पसरण्या शिवाय”… गोविंदा जुना वयस्कर ड्रायव्हर होता म्हणून शेठसमोर इतकं बोलू शकला होता..

शेठ गोविंदावरच चिडले, “ही काय बोलण्याची पद्धत झाली कां तुझी? “.

“अहो साहेब नेहमीचचं आहे यांचं हे! टाळ्या वाजवून आपलं लक्ष वेधून घेतात आणि पैसे दिल्याशिवाय हालतच नाहीत. पावडर फासायला ओठ रंगवायला पैसा हवा असतो त्यांना. हा आतां भेटला ना! तो रोज येतो या चौकात. नंतर जातो समोरच्या मंदिरात आणि तिथे बसतो टाळ कुटत. “.

तृतीयपंथाच्या अगदी जवळून भराराsss.. गाडी पुढे गेली. तो घाबरून मागे सरकला. हो! तृतीयपंथीच होता तो. जगाच्या शाळेतला, वाट्याला आलेल्या भोगाने, परिस्थितीने, ग्रासलेला त्याचा चेहरा राघवदासांच्या डोळ्यासमोरून हालतच नव्हता. कां कोण जाणे शेठजींच्या मनांत त्याच्याबद्दल दया, उत्सुकता निर्माण झाली आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशी त्याचं रस्त्यावर त्याचं चौकात तो दिसला.

… समोर महादेवाच्या मंदिराचा कळस कोवळ्या उन्हात चमकत होता. सोमवार असल्याने गोविंदाला गाडी मंदिरासमोरच थांबवायला सांगितली.

आरती संपली आणि प्रसाद पुढे आला. घोगरट आवाज कानावर पडला..

“शेठ हा घ्या प्रसाद. एक सांगु कां, तुमच्या ड्रायव्हरदादांचं बोलणं मी ऐकलं, त्यांची रागारागाने माझ्या अगदी जवळून नेलेली गाडी माझ्या जीवावरही बेतली असती. तुम्हीं दिलेली भीक आम्ही या वीतभर पोटासाठी आणि या भोले बाबाच्या प्रसादासाठी वापरतो हो.! “.. असं म्हणून त्याने शेठजींच्या हातावर प्रसाद ठेवला आणि तो मंदिराच्या ओसऱीवर जाऊन बसला.

इकडे शेठजींच्या मनांत आल, कसं असेल ह्यांचं आयुष्य? कशा असतील याच्या व्यथा? …

ह्या विचाराने राघवदास अस्वस्थ झाले. आपलेपणा आणि उत्सुकता त्यांच्या मनांत दाटून आली आणि नकळत त्यांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला.

… सांवरून आणि घाबरून तो बाजूला सरकला. त्याला प्रेमाने चुचकारत शेठनी विचारले,

“नांव काय रे बाळ तुझं? “.

खाली मान घालून तो म्हणाला, “भागू म्हणतात मला”

“अरे लाजतोस काय असा? तुला कुणी नात्याचं नाही कां? मला जवळचा मित्र समज आणि खुल्या दिल्याने मनातलं सांग. ”.

भरून आलेले डोळे पुसत तो म्हणाला, ” शेठ इतकी आपुलकी कुणीच दाखवली नाही हो मला, आमच्याकडे समाज कुचेष्टेने, तिरस्काराने बघतो नां! तेव्हां हृदय जळत हो आमचं! आम्हीही माणसं आहोत. आम्हाला मन, भावना आहेत. मला कुणीच नाही. पण मग मी या भोलेनाथाला माझी व्यथा आणि कथा सांगतो. कारण तोही अर्धनारी नटेश्वर होता ना”! ..

शेठजींनी भागूच्या पाठीवर शाबासकीची थाप दीली. “किती छान बोलतोस तु! शिकलास कां? किती शिक्षण झालंय तुझं? “.

 “होय शेठ. इथल्या शंकरबाबा साधुंनी मला वाढवलं. शिक्षण दिलं. समाज मला मागे रेटत होता. मला झिडकारत होता. पण बाबांनी मला पाठीशी घातलं. शंकर बाबा म्हणाले, “भूतकाळ विसर भविष्याची आशा धर आणि वर्तमानात बिनधास्त जगं. देवाला आणि दैवाला दोष देऊ नकोस जीवनाबद्दल तक्रार करू नकोस. आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून समाज सेवा कर. ”.

शेठजी त्याच्या जवळ सरकले, त्याच्या पाठीवर हात फिरवून तें म्हणाले, विचार किती सुंदर आहेत तुझे, शंकरबाबांनी तुझ्या मनाला आशा आणि आयुष्याला दिशा दाखवलीय”..

“हो शेठ माझे शंकर बाबा दुसरे भोले बाबाचे अवतारच आहेत या मंदिराची देखभाल साफसफाई माझ्यावर सोपवून तें केदारनाथला गेले आहेत. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मार्गी लावलंय समाजाने आम्हाला झिडकारले, वेगळ्या नजरेने बघितले नां की उरातली जखम भळभळते हो! पण आपण याच समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना मनांत ठेवण्याचा गुरुमंत्र आमच्या गुरूंनी, शंकर बाबांनी आम्हा तृतीयपंथांनां दिला आहे.”

शेठजींची उत्सुकता चाळवली गेली होती. भळभळती जखम उरात दडवून जीवन प्रवास करणारा महाभारतातला ‘अश्वथामा’ त्यांच्या समोर बसला होता. शेटजी पण दुःखी होते. कारण एका अपघातात त्यांच् विश्व उध्वस्त झालं होतं. मनातलं दुःख बाहेर पडून ते कुठेतरी व्यक्त होणं प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतं. आणि तो विश्वास भागुला त्यांनी दिला..

ते म्हणाले, “बाळा मला सांग, तुझे इतर बांधव भगिनी समाजासाठी काय काय करतात? सांगशील कां सगळं मला? खूप जण काही काही करतच असतात हो शेठ! अभिमानाने नुकताच घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो, अमित उर्फ आम्रपाली यांनी दारोदारी चौकाचौकातून फिरून पूरग्रस्तांसाठी जोगवा मागून, आठ दिवसात, चाळीस कट्टे तांदूळ, 350, ब्लॅंकेट्स, ५०० सॅनिटरी पॅड, 100 वह्या, चणाडाळ, तेलतुपाचे डबे, साखर, चहा, पीठ, मीठ मसाला गोळा करून कार्यकर्त्यांच्या मदतीने घरोघरी पोहोचवला.

असें अनेकजणांचे अनेक किस्से आहेत. शेठजी सांगायला गेलो नां! तर आमच्या कथेची गाथाच होईल. “

हे सारं ऐकून शेठजी अवाक् झाले. त्यांच्या मनांत आलं आपण आपलचं दुःख उगाळत बसलो होतो. घरदार आहे, मानमरातब आहे, धनसंपदा प्रसन्न आहे आपल्यावर. तिचा सदुपयोग व्हायला हवा. ह्या तृतीयपंथांचेही आपण देणं लागतो. ही पण समाजसेवा, देशसेवाचआहे..

– – – स्वातंत्र्यवीर सावरकर राघवदास शेठजींचे आदर्श होते. त्यांच्या पुस्तकांचं अनेक वेळा त्यांनी पारायण केलं होतं. सावरकरांचं एक वाक्य त्यांना आवलं, “देह आणि देव यांच्या मधला प्रवास देशसेवेसाठी असावा. ” राघवदासांनी ठरवलं भागुला मदत करून, आपली धनसंपत्ती ह्या लोकांसाठी खर्च करायची. कारण हे पण माझे देशबांधव आहेत. विश्वकर्मा नाही पण महादेवापुढचा नंदी होऊन आपण सत्कर्म साधायचं. असा संकल्प सोडून, भागुच्या पाठीवर हात फिरवून, पुन्हां भेटण्याचे आश्वासन देऊन शिवलिंगापुढे ‘ओंकार’ प्रार्थना त्यांनी केली. आणि शेठजी निश्चयाने शिवमंदिराच्या बाहेर पडले..

|| ॐ नमः शिवाय ||

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भरली वांगी – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ भरली वांगी – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

“हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मघापासून फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय. “

“अगं, नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. मधेच म्हणाली ‘मावशी, आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? ‘ ५० होतील म्हटल्यावर ‘अभिनंदन, अभिनंदन’ म्हणायला लागली. तर मी म्हटलं, त्यात कसलं अभिनंदन? आमच्या वेळी घटस्फोटाची पद्धत नव्हती ना, म्हणून झाली पन्नास वर्ष”!

” हाऽ हाऽ हा! काय ग बाई बोलणं तुझं सुमे! “

” गंमत केली जरा. पण पेपरातून डोकं वर उचलून यांनीही रोखून बघितलं माझ्याकडे चष्म्यातून. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी टोकाला न्यायच्या नसतात हे या नवीन मुलींच्या कानावर असलेलं बरं! तू का फोन करीत होतीस? “

“तुझ्याकडे भरल्या वांग्याचा गरम मसाला आहे ना, तो थोडा तुझ्या कुंदाबरोबर पाठवून दे ना! “

“पाठवते. पण चार दिवसांपूर्वी भेटली होतीस तेव्हा म्हणालीस की भरली वांगी करायला ताजा मसाला करून ठेवलाय म्हणून. “

” केलाय ग, पण तोच मेला सापडत नाहीये. फ्रीज उघडला तर छोले, सांबार, गावरान, मालवणी, चायनीज कसल्या कसल्या मसाल्यांच्या बाटल्या इकडून तिकडून हसताहेत मला. पण माझा भरल्या वांग्यांचा मसाला कुठे सापडत नाहीये. “

“सुमेधाने कुठे उचलून ठेवलाय का विचारलस का? “

“ती घरात कुठाय? राकेशला मराठीच्या क्लासला घेऊन गेलीय आणि तिथून… “

“काय? मराठीचा क्लास? रविवारचा? दुसरीतल्या मुलाला? “

“काय करणार? तुला माहितीये हा आमचा धाकटा नातू मोठ्या सुरेशसारखा शांत, समंजस नाहीये. अर्क आहे अगदी अर्क. एकसारखा इंग्लिशमधून बोलतो. म्हणून त्याला म्हटलं ‘अरे, घरात तरी मराठी बोलावं. आपली मातृभाषा आहे ती. तर म्हणाला, “ममा स्पिकस् इन इंग्लिश. सो व्हॉट इज माय मदरटंग? ” असली घोड्याच्या पुढे धावणारी अक्कल! वर्गात टिचरने ‘गाय’या विषयावर मराठीत दहा ओळी लिहायला सांगितल्या. तर याने काय लिहावं? “अमेरिकेत मुलांना ‘गाय’ असं हाक मारतात. भारतात गाय हा चार पायांचा प्राणी आहे. ती गवत खाते. ती दूध देते. पण आम्ही चितळे यांचे दूध पितो. “

” हाऽ हाऽ हा”

” ऐक पुढे… गाईच्या शीला शेण म्हणतात. त्याच्या ‘गौऱ्या’ बनवतात. गाईची पूजा करतात. वर्गात माझ्या शेजारी पूजा बसते. ती मला खूप आवडते.

” छान, छान! अगदी मनापासून आणि मनःपूर्वक निबंध लिहिलाय राकेशनं. “

“आणि अगदी चक्क ‘गौऱ्या’… ग ला काना आणि दोन मात्रा असं लिहिलं होतं. ‘ अरे, ‘गवऱ्या’असा लिहायचा तो शब्द!

” नो. टिचरने असाच सांगितलाय. “

‘ टिचरने सांगितलं आहे’या ब्रह्मवाक्यानंतर काहीही बोलण्यात अर्थच नसतो. ‘

‘त्याला म्हणावं, टिचरला पण घेऊन जा क्लासला”.

‘राहु दे, राहु दे. पुसेन मी नंतर’

“काय झालं? कुणाशी बोलत आहेस?

“मिस्टर कुरकुरे. “

” कोण? “

” ‘हे’च ग आमचे! आज सकाळी थोडा वेळ होता म्हणून टीव्ही जवळचा प्लास्टिक फुलांचा गुच्छ, फ्लॉवर पॉट सगळं छान धुतलं. टॉवेलवर वाळत घातलं. टीव्ही आणि त्याच्या आजूबाजूची धूळ पुसून सगळं

छान स्वच्छ केलं आणि ती धुतलेली फुलं फ्लॉवरपॉटमध्ये घालून जागेवर ठेवताना जराशी झटकली. त्या झटकलेल्या पाण्याचे चार थेंब जमिनीवर पडले तर झाली ह्यांची बडबड सुरू. ‘मी इथे घसरुन पडलो म्हणजे? पाणी किती पडलं आहे? ‘म्हणजे सगळं छान स्वच्छ झालं त्याचं कौतुक वगैरे नाहीच. उलट कुरकुर सुरु. “

“जाऊदे ग! सगळेच ‘मिस्टर’ असेच कुरकुरेच असतात”.

“तर मी काय सांगत होते, राकेशला क्लासला पोचवून सुमेधा जाणार आहे ब्युटी पार्लरला. तिथून राकेशला घेऊनच घरी येईल. जाताना माझ्या भरल्या वांग्याचं कौतुक करीत मला भरली वांगी करायचं गोड आवाजात फर्मावून गेलीय. दोन-तीन तास पार्लरमध्ये जाऊन काय स्वतःच्या जिवाचे चोचले करून घेतात कुणास ठाऊक! आम्ही आपली करतोय भरली वांगी. “

” आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या म्हणायच्या! परवा वसू तिच्या अमेरिकेहून आलेल्या सुनेबद्दल काय- काय सांगत होती! तीन आठवड्यांसाठी आलेल्या या पाहुण्या सुना त्यांच्या माहेरी आणि माहेरच्या गोतावळ्यात जास्त असतात. वसुकडे होती चार दिवस, तेव्हा वसू तिला म्हणाली, ‘अगं घरात असताना नीलला डायपर लावू नकोस. दीड वर्षाच्या मुलाच्या नाजूक स्कीनला त्रास होतो’. नाराजीने आणि मनाविरुद्ध सुनेनं नीलला डायपर लावला नाही आणि त्याचे कपडे खराब झाल्यावर हातातल्या मोबाइलवरची नजर सुद्धा न उचलता, त्याच्या रडण्याकडे ढिम्म पाहिलं नाही. शेवटी या शीतयुद्धात आजोबांनीच नातवाला स्वच्छ केलं”.

” धन्य ग बाई! मागच्या महिन्याच्या आपल्या ‘चम्मतग’ ग्रुपच्या मीटिंगला तू नव्हतीस ना! सुनेच्या बाळंतपणासाठी सहा महिने अमेरिकेला राहून आलेली शुभा काय काय मजा सांगत होती! तिच्या नातवाच्या महिन्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुनेच्या मैत्रिणी सहकुटुंब आल्या होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने पैठणीचा सुंदर ड्रेस घातला होता. तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला डायपर बांधलेला असूनही तिच्या ड्रेसच्या हातावर त्याच्या शीचा थोडासा ओघळ आलाच. तर काय करावं त्या मुलीने? सरळ त्या ड्रेसचा हात कापून टाकून दिला. आहे की नाही? “

” शालन आली होती का ग ‘चम्मतग’ला? “

” नव्हती आणि त्या आधीच्या ‘चम्मतग’ला तरी कुठे होती? मोबाइलवर फोन केला तर कध्धी उचलत नाही. ती एकीकडे आणि तिचा मोबाईल कुठे दुसरीकडे ठेवलेला. तिच्या लँडलाईनवर फोन करायचा म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा! “

” का बरं “?

“पुटुपुटु येऊन तिच्या सासूबाईच फोन घेतात आणि साऱ्या जगाच्या चौकशा करीत राहतात. नाहीतर तेच तेच पुन्हा नव्याने सांगत बसतात. “

” वय फार वाढलं की कठीण होत जातं जगणं. नव्वदीच्या पुढे असतील ना आता त्या? “

” हो तर! पण त्यांची गंमत माहितीये ना तुला? “

” कसली गंमत? “

” महिन्यापूर्वी त्या घरातच पडल्या थोड्याशा. शालनच्या मिस्टरांनी डॉक्टरांना बोलावून कुठे हाडबीड मोडलं नाही ना याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘ आता तुम्ही आजींना चालताना काठी वापरायला सांगा. तर नातवाने लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना छान चार पायांची काठी आणली. ती कशी वापरायची याचं आजीकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. आजींनी दोन-तीन दिवस ती काठी वापरली. मग लागल्या पुन्हा पहिल्यासारखं तुरुतुरु चालायला. ते बघून नातवानं विचारलं, ‘अगं आजी, काठी कुठाय तुझी? डॉक्टरांनी चालताना काठी वापरायला सांगितलेय ना? ‘ तर त्या म्हणाल्या, “नको अरे! काठी घेऊन चाललं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं. “

हाऽहाऽहा. ग्रेटच आहेत अगदी. दोन दिवसांपूर्वी मोहिनी भेटली होती. ती तिच्या नणंदेकडील वेगळीच गंमत सांगत होती. नणंदेच्या नवीन सुनेच्या माहेरचे लोक ‘हरे राम हरे कृष्ण ‘च्या पंथातले. ती सून सुद्धा कांदा-लसूण काही खात नाही. दर रविवारी सकाळपासून बाहेर. कधी मंदिरात भजन-कीर्तन तरी असतं नाहीतर कुणाकडे तरी साजुक तुपातल्या १०८ पदार्थांचा अन्नकोट! मूर्तीवर गुलाब पाकळ्यांचा अभिषेक करायचा आणि प्रसाद म्हणून सर्वांनी ते नाजूक-साजूक ड्रायफ्रूटचे पदार्थ, फळं खायची. कपाळभर गंधाचा मळवट आणि पांढऱ्या साड्या! नस्ती एकेक थेरं. साधं घरात शेंगदाणे भाजले तरी त्याचा ‘भोग’ दाखवायचा.

“मी म्हटलं ना तुला की, आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या. “

“पुढच्या महिन्यात आपल्याला चारूच्या मुलाच्या लग्नाला जायचंय ना, त्या आधी आपण एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन यायचं का? बघूया तरी तिथे काय काय प्रकार असतात ते!

काय होतं की, आपण घरी रंगवलेल्या केसांचा काही दिवसांनी तिरंगा झेंडा तयार होतो. केसांचा मूळ रंग, रंगवलेल्या केसांचा अर्धवट उडालेला रंग आणि मधे मधे डोकावणारे पांढरे केस. “

“चालेल- चालेल. आपली विद्या नेहमी फेशिअल करून घेते. तेही करून बघूया. “

“चल, ठेवते फोन. इतका वेळ मी फोन अडवून बसलेय म्हणून फोनकडे आणि माझ्याकडे रोखून बघत यांच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. आजची पत्त्यांची बैठक कुणाकडे ठरली ते विचारायला मोबाईलवरून फोन करून ते त्यांचा बॅलन्स कमी करणार नाहीत. मागच्या रविवारी आमच्याकडे होता तो पत्त्यांचा गोंधळ. अच्छा, पाठव लवकर मसाला. “

“पाठवते. पण आपल्या गप्पांची ‘भरली वांगी ‘अगदी मसालेदार झाली नाही? “

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीर्णोद्धार… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीर्णोद्धार…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात.” 

 “बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग?”)

इथून पुढे – – – 

त्यावर पांडुरंग खळखळून हसत म्हणाला, “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? अरे, तुम्ही लोक शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. पण आता दक्षिणेत खाजगी मंदिर स्थापन करण्याचा एक मोठा व्यवसाय झालाय. तो अडत्या पाच लाख देतोय तर घे. बॅंकेचे हप्ते फेडून, नवीन सिंचन कर्ज घे आणि पुढची पिकं लावून टाक. तो अडत्या आणखी पाच लाख रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार करेल. मलाही थोडा बदल हवा आहे. वर्षानुवर्षे त्याच वास्तुत आम्ही घुसमटतोय. त्याचं नूतनीकरण झाल्यावर नवनवीन भक्तगण येतील. माझ्या भेटीसाठी शहरापासून विठ्ठलवाडीपर्यंत टेम्पोंच्या चकरा वाढतील. बुधवारच्या अभिषेकासाठी भक्तांची रांग लागेल. तो अडत्या ह्यातून खूप पैसा कमावेल, हे मात्र नक्की. पण तू काळजी करू नकोस. दहा वर्षानंतर, तो मंदिर सोडून जाईल किंवा पुन्हा तुझ्यासमोर नवीन वाढीव रकमेचा प्रस्ताव ठेवेल. त्यावर योग्य तो निर्णय घ्यायचा अधिकार तुलाच असणार आहे. ” एवढं सांगून पांडुरंग अंतर्धान पावला.

खरंतर, शेतकी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आणि कुशाबाच्या मनात चाललेला खेळच स्वप्नात प्रकट झाला होता. काही का असेना, त्याला मनातल्या द्विधा मनस्थितीतून बाहेर तरी येता आलं. गावात मात्र कुजबुज सुरू झाली—“कुशाबानं देऊळ इकायला काडलंय म्हनतात, खरंय का? ” एक वयस्क म्हातारा खाकरत खाकरत म्हणाला, “देऊळ म्हंजे गावाचा आत्मा हाय. असं कसं इकंल कुशाबा? ” हे ऐकून कुशाबाच्या मनात अपराधाची सल चाळवायची, पण लगेच पांडुरंगाची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहायची. “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? ” असं विठ्ठलाचे शब्द त्याच्या कानात घुमायचे.

थोड्याच दिवसात त्याचं आणि अडत्याचं रीतसर रजिस्टर करारपत्र झाले. पाच लाखाचा चेक घेऊन कुशाबा कुसुमच्या सोबतीने बॅंकेत लगबगीने आला. आज त्याला दरसालाप्रमाणे कर्जमुक्तीचा आनंद अनुभवायचा होता. “हा घ्या चेक. कर्ज किती हाय त्येचा हिसाब बघा अन समदं एकदाचं बार करून टाका. ”

मॅनेजर हसत हसत म्हणाले, “कुशाबा, चेष्टा करताय होय? तुमचं कर्ज तुमच्या दोन्ही मुलांनी मिळून केव्हाच भरून टाकलेलं आहे, शिवाय तुमच्या बचत खात्यात पाच लाखाच्यावर रक्कम जमा आहे. ” कुशाबाला काय बोलावं, हे समजेनासं झालं. मॅनेजरनं पुढं सांगितलं, “हे पाच लाख आणि खात्यातले पाच लाख मिळून तुमच्या नावाने तसंच कुसुमताईंच्या नावाने मुदत ठेव करायला सांगितलं आहे. दर तीन महिन्याला तुमच्या खात्यात त्याचं व्याज जमा होईल. दोन मिनिटं थांबा” असं म्हणून मॅनेजर साहेब आत जाऊन आले, त्यांच्या हातात लाल रंगाचं पाकिट होतं. त्यातला डाग काढून त्यांच्या हातात देत म्हणाले, “हा घ्या तुमचा डाग. डाग मिळाला म्हणून इकडे सही करा. ” कुसुमच्या डोळ्यांत पाणी आलं. कुशाबानं ही धोतराच्या सोग्याने हळूच डोळे पुसले.

कुशाबा भावविभोर मनस्थितीत घरी आला. कुसुम मात्र शांत राहिली आणि तिने मुलाला मोबाईल लावून कुशाबाच्या हातात दिलं. “अनंता, लेकरा. तुझा भाऊ वसंता कुठाय? ” वसंता त्याच्याकडेच बसल्याचं अनंताने सांगितलं. “माझी अडचण न सांगताच, तुमी दोघांनी बॅंकेचं कर्ज फेडलंत, आईचं डाग सोडवलंत. मुदतठेवीत पैसे ठेवायला सांगिटल्याचं बॅंक मॅनेजरनं सांगिटलं. पन मुलांनो, माजी खूप मोठी चुकी झालीया. कर्जाचे हफ्ते फेडायचं हुते म्हनून मी तुमा दोघान्ला न सांगताच आपलं देऊळ दहा वर्सासाठी राजमल सेठना चालवायला द्यायचं म्हनून अ‍ॅग्रिमेंट केलं हाय. ” 

 “आबा, तुम्ही जे काही केलं आहे, ते आपल्या कुटुंबाचं हित बघूनच केलं असेल. आम्हा दोघांना एका गोष्टीचं वाईट वाटलं. एवढं मोठं संकट आलं असताना देखील तुम्ही आम्हा दोघांनाही सांगितलं नाही. आबा, तुमच्यावर संकट आलं तर ते आमच्यावरचं संकट असते हे विसरू नका. आम्ही का वेगळे आहोत? आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच आहे. यंदा दिवाळीला आम्ही सगळेच गावी येत आहोत, तेव्हा समक्ष बोलू” असं म्हणून त्याने फोन ठेवला.

बॅंकेचे संपूर्ण कर्ज फिटल्याने कुशाबाला नवीन सिंचन कर्ज सहज मंजूर झालं. परंतु जे काही झालं ते बॅंक मॅनेजरच्या नजरेतून सुटलं नाही. ते सहज म्हणाले, “कुशाबा, हे संपूर्ण कर्ज शेतीच्या उत्पन्नातून भरलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. असो. कुशाबा, राग मानू नका. अहो, शेतीपुढे हवामानातील बदलांचे मोठे आव्हान असते. बाजारभावात चढउतार होत असतात. अशा स्थितीत तुम्ही बहुपीक पद्धतीकडे वळायला हवं. कारण त्यातील काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर द्यायला हवं. प्रत्येक पिकाच्या जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळावा. काही फळझाडं लावावीत, गाई आणि म्हशींचे पालन करून दूध उत्पादन करावं. कुक्कुटपालन, शेळीपालन याकडेही लक्ष पुरवावं. त्यातून नियमित उत्पन्न मिळवता येते. ” कुशाबाला मॅनेजरचं म्हणणं पटलं. नव्या उत्साहाने बाहेर पडला.

थोड्याच दिवसात कुशाबाच्या वावरातल्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराचा विलक्षण कायापालट झाला. विठ्ठलवाडीत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. मंदिराच्या मागेच असलेलं कुशाबाचं शिवारही हिरवंकंच होऊन त्यात वेगवेगळी पिकं आणि फळझाडं जोमानं डोलत होती.

एका संध्याकाळी कुशाबा बांधावर उभं राहून झुळुझुळु वाहत असलेल्या पाण्याकडे पाहत होता, त्यात अस्ताला चाललेल्या सूर्याच्या किरणांचं प्रतिबिंब पडलं होतं. कुशाबाने नकळत हात जोडले आणि पुटपुटला—“अगा पांडुरंगा मायबापा! हे सगळं तुझ्यामुळेच घडून आलंय. मी खचलेलो असताना तूच मला उचलून घेतलंस. आता एकवार आम्हा दोघान्ला पंढरीला बोलवून घे, मला तुझ्या लोण्यासारख्या मऊशार पायाची लई ओढ लागून राह्यली हाय. ” आणि कुशाबा कृतार्थ मनाने घराकडची वाट चालू लागला.

समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीर्णोद्धार… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीर्णोद्धार…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“अवं धनी, इथं बसून कशापायी काळजी करत बसलायसा? यीळभर देवळात तरी जाऊन बसा. इट्टल रखमाईकडं बघत बसचाल तर मनाला शांत वाटंल बघा. आता आरती करून भटजी निघून जात असतील बघा. ” कारभारणीनं सांगितलं की हा गडी कधी न्हाई म्हणायचा नाही. ‘तिचा शबुद म्हंजी लक्ष्मीचा शबुद असतुय’ असं म्हणायचा. गुमान पायात वहाणा सरकवून कुशाबा देवळाकडं बिगी बिगी निघाला.

कुशाबाच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. “त्या भैताडानं इचारायची हिंमत तर कशी केली आसंल? अडत्या हाय, अडीअडचणीला मदत करतुय, शेतावरला समदा माल एकलाच उचलतोय. भाव बी घालून पाडून मागत न्हाय. हे समदं जरी खरं असलं तरी बी देऊळ दहा वर्स चालवाय देतोस का म्हनून इच्यारनं हे त्येला शोभतंय का? यंदा पिकं करपल्यात, थकबाकी झालीय. मंग काय पिढ्यानपिढ्या वावरात बांधलेलं देऊळ चालवायला द्यायाचं व्हय? दोन वर्सापूर्वी कारभारणीनं दिलेले डाग बँकेत ठेवून कर्ज काढलंया. अजूनपतुर डाग सोडवता आलं न्हाई. म्या आतल्या आत किती गटांगळ्या खातोय, हे माजं मलाच ठाव हाय. अता कर्ज झालं म्हनूनशान काय देऊळ चालवायला द्यायाचं? पाच लाख देतो म्हनला. सालीना साठ हजार रूपय बी देतो म्हनला. दहा वर्ष झाल्यावं देऊळ सोडून जातो, म्हनून लिवून द्यायाला तयार हाय. त्येचा काय डाव असंल ते त्येला आनि त्या इट्टल रखमाईलाच ठाव असंल. निस्तं माज्या डोस्क्याचं खोबरं करायला निघालाय. छ्या! म्या काय एवढा नीच हाय व्हय? पुन्यांदा कंदी त्या इट्टल रखमाईकडं डोळं वर करून बघाया तरी हुईल का? ” तोवर कुशाबा मंदिरात येऊन पोहोचला.

टाळ्यांच्या गजरात आरती सुरू झाली. पाचदहा म्हातारी कोतारी आणि चार पाच पोरं आरतीला उभी होती. आरती झाल्यावर, भटजी जाताना हातावर केळीचे काप हमखास ठेवायचे. द्यायला काहीच नसलं तेव्हा बचकभर खडीसाखर उदारमनाने हातावर नक्कीच ठेवायचे. जणू काही त्यासाठीच ते लोक जमत असावेत.

आज का कुणास ठाऊक इट्ट्ल रखमाईकडे बघताच कुशाबाच्या डोळ्यांत अचानक टचकन पाणी आलं. धोतराच्या सोग्यानं हलकंच पुसत, दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावत त्यानं माफी मागितली. आपसूकच त्यानं दोन्ही गालावर चापट्या मारून घेतल्या. विनम्र भावाने दोन्ही हात जोडले. ‘तूच मायबाप हाईस. माजी काय अडचण हाय, ते तुला समदं ठाव हाय. म्या काय येगळं सांगायाचं? ’ असं मनातल्या मनात पुटपुटला. निरंजनाच्या तबकात एका रूपयांचं नाणं टाकून नमस्कार केला. भटजीने दिलेली दोन केळी घेऊन बाहेर पडला.

कुशाबा घरी पोहोचल्याची चाहूल लागताच कारभारणी कुसुमनं आतूनच आवाज दिला. “धनी, हात पाय धुवून घ्या म्हंजे जेवून घेता यील. ” कुसुमच्या हुकुमावरून हात पाय तोंड धुवून कुशाबा पाटावर बसला. ताटात भाजी, वरणाची वाटी, एक केळं कुस्करून, तव्यावरची गरमा गरम भाकर टाकली. चार घास पोटात ढकलून कुशाबा बाहेर ओसरीवर येऊन बसला. अंगणातच पाच-दहा येरझारा टाकल्या.

आत येऊन भिंतीला पाठ टेकून घोंगडीवर बसला. ‘काय करावं? ‘ हा डोक्यात भिरभिरणारा भुंगा काही केल्या बाहेर पडायचं नावच घेत नव्हता. तितक्यात सगळं आवरून कुसुम येऊन शेजारी बसली. कुशाबाची उलघाल पाहून कुसुमच्या डोळ्यांतही पाणी दाटलं होतं. “धनी, कधी दुष्काळात पिकं करपून गेली तर कधी अति पावसानं पिकच न्हाई, तर जमीनबी वाहून गेलीया. तुमी कवाबी इतकं हवालदिल झाला न्हाईसा. तुमी किती जीवाचं रान केलंय आतापतुर, हे समदं मला ठाव हाय. या संकटात तुमी एकला न्हाई, म्या बी तुमच्या संगं हाय. समदं रान पिकू दे म्हनूनशान म्या रोज त्या पांडुरंगापुढे हात जोडते. मानसानं मनात काय आसंल ते घडाघडा बोलून टाकावं. मला सांगिटलं न्हाई तर आनि दुसऱ्या कुनाला सांगनार हायसा? पैसा वतून दोन्ही मुलग्यांना पुन्याला मोठं शिक्शान दिलं, लग्नं लावून दिली, पुण्यात फिलॅट घ्येयाला मदत केलीत. त्ये चांगल्या नोकरीत हाईत. तुमी एक शबुद टाका, सोन्यासारखी आपली दोनी पोरं धावून येत्याल. तुमी तुमच्या आईबापाला किती मायेनं जपत हुता ते त्येंनी लहानपनापास्नं बगिटलेलं हाय. पन त्येंची मदत घ्यायाला तुमचं मन धजत न्हाई. काय करायचं आता? ते आता त्या पांडुरंगालाच म्हाईत. “

पांडुरंगाचा विषय निघताच कुशाबानं अडत्या सेठ काय बोलला ते कुसुमला सांगितलं. त्यावर कुसुमनं अनवधानानं कानावर हात ठेवले. ‘अता म्या काय सांगू? त्ये प्रकरन, तुमा आनि तुमच्या इट्टल रखमाईच्या यांच्यातलं हाय. तुमीच काय ते बघूनशान घ्या’ असं म्हणत तिनं वाल्या कोळीच्या पत्नीचा पवित्रा घेतला. कुशाबाच्या डोक्यात अडत्याचाच विचार घोळत राहिला. कधी डोळा लागला ते कळलं नाही.

पहाट होत आली असावी. कुशाबाच्या स्वप्नांत साक्षात विठ्ठल उभा ठाकला. कधीतरी आषाढी एकादशीला पंढरपूरात पाहिलेला तोच विठ्ठल साक्षात समोर होता. काळाकुळीत ओबडधोबड, गुलाल बुक्क्यानं पुरता माखून गेलेला प्रसन्न चेहरा. एखाद्या निवडणुकीतल्या विजयी झालेल्या वीरासारखा! दिवसभराच्या मिरवणुकीनंतर थकून गेल्याचा भाव असला तरी त्या चेहऱ्यामागे दडलेला विजयाचा उन्माद आणि आनंद लपत नव्हता. विठ्ठलानं मिश्किलपणे हसत विचारलं, ‘काय रे, कुशाबा, काय झालंय तुला? असा चेहरा पाडल्यासारखा दिसतोस? ’ 

विठ्ठलाला पाहून कुशाबाच्या डोळ्यांत पाणी तरारलं, कृतकोपानं म्हणाला, “मला काय झालंय ते तुला म्हाईत न्हाई व्हय? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नगंस. कधी सूर्यदेवाला भाजून काडायला सांगतोस तवा वरूणदेवाला इकडं फिरकायला देत न्हाईस. पीकं करपत न्हाईत व्हय? कधी वरूणदेवाला सांगून झोडपून काढायला लावतूस. पिकं सगळी व्हावून जात्यात. पिकं चांगली येतात तवा कीड आणि रोगराई होवून पीकं फस्त होत्यात, हे समदं तुला दिसत न्हाईत व्हय? “

विठ्ठलाच्या डोळ्यांत आईची माया दिसत होती पण तो गालातल्या गालात हसत म्हणाला, “कुशाबा, संकटाशिवाय श्रद्धा फुलत न्हाई गड्या. मी तुला कवाबी सोडलेलं न्हाई. तू एकटा न्हाईस, मी तुझ्या पाठीशी आहे. आरं, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी हे समदं सृष्टीच्या चक्राप्रमाणे घडत असतं. त्यात मी काही करू शकत नाही. पृथ्वीचं तुम्ही जे काही शोषण सुरू केलंत ना, त्याचेच परिणाम भोगत आहात. आता मोठी शेती राहिलीच कुठे? वाटण्या होऊन तुकडे तुकडे होत जाऊन सगळेच अल्पभूधारक झाला आहात. एकट्याला ट्रॅक्टर कसं परवडेल सांग? इतके शेतमजूर कुठे मिळतील? सहकार-शेती तुम्हाला पटत नाही. पाणी सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे उत्पादनात घट येते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे मातीची गुणवत्ता वाढते आणि पिकांची वाढ सुधारते. हे तुम्हाला सांगून पटत नाही. मग शेती किफायतशीर कशी होईल? आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ही आणखी एक मोठी समस्या आहे. कधी कधी शेतमालाच्यापेक्षा वाहतुकीचा खर्च अधिक व्हायला होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही ही मोठी समस्या आहे, तेव्हा पिकवायचं तरी कसं?

दुसरं असं की सगळ्याच भूमीपुत्रांना शेती सोडून पंख्याखाली ऑफिसात बसून चाकरी करायची असेल त्याला मी तरी काय करणार सांग? महागाई भत्त्यावर डोळा ठेवून असलेल्या नोकरदारांना २००१ साली कोथिंबीरीची जुडी दहा रूपयाला मिळायची ती आजही त्यांना दहा रूपयालाच हवी असते. मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात. ” 

“बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग? ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संग्राह्य… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ संग्राह्य… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

सकाळची वेळ होती. काम उरकून जान्हवी जरा सोफ्यावर येऊन बसली. जयेश म्हणजे तिचा नवरा मघाशीच कामावर गेला होता. डायनिंग टेबलवर पालवीचा अभ्यास चालू होता त्यामुळे नुसता पसारा दिसत होता. यावर्षी ती चौथीत गेली होती. नुकतीच शाळा चालू झाली होती. तिथे जवळच आसावरी ताई त्यांच्या पोथी वाचनात दंग होत्या. उकाड्याने हैराण व्हायला झाले होते. जान्हवीने खिडकीजवळचा फॅन लावला. पाच दहा मिनिट जरा बसून तिला पालवीला शाळेसाठी तयार करायचे होते. जयेशच्या डब्याला पोळीभाजी देण्याच्या निमित्ताने तिचे पोळीभाजीचे काम अगोदरच आवरले होते. पण आता त्या तिघींसाठी तिला वरण भाताचा कुकर लावायचा होता व बिटाची कोशिंबीर पण करायची होती.

बघता बघता जान्हवीच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती. पालवीच आता नऊ वर्षांची होणार होती. जयेशचे वडील अनिल राव आणि आई आसावरी ताईंनी जान्हवी लग्न होऊन सासरी आल्यावर कधी तिला सुनेसारखी नाहीतर स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागणूक दिली होती. दोन वर्षांपूर्वी अनिल राव वारले होते. सरकारी नोकरीत उच्च पदावर राहून ते निवृत्त झालेले होते आसावरी ताई पण मराठी विषयाच्या काॅलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या सुध्दा निवृत्त झाल्यावर आपला वेळ देवाधर्मात, झाडांची देखभाल करण्यात व्यतीत करत होत्या. गाण्याची आवड असलेल्या, बागकामाचा छंद असलेल्या 

अशा चौफेर व्यक्तिमत्वाच्या होत्या. जान्हवीच्या आईने जेवढे संस्कार करुन उरले असतील तेवढे त्यांनी तिच्यावर केले होते. घरातील धार्मिक कार्यांतील रीतीभाती असोत, स्वयंपाकाची वेगळी पदधत असो आणि मराठी भाषा बोलण्यातील उच्चार असोत त्यांनी तिला चूक बरोबर समजावून सांगितले होते. त्यापाठी उपहासाची भावना नसून प्रेमच होते आणि हे सर्व जान्हवीने पण मोठ्या मनाने समजून घेतले होते.

आमटीला फोडणी देऊन जान्हवीने पालवीला आवाज दिला. ” पलू, चल लवकर. आवर आता शाळेत जायच आहे की नाही? उशिर झाला तर स्कूल बस निघून जाईल. तिथपर्यंत पालवीने पण अगोदरच दप्तर भरून शाळेचा युनिफाॅर्म घातला होता. आता जेवायचे तेवढे राहीले होते. ” हे काय ग मम्मा, मी तर तयार पण झाले. ” दे ना लवकर जेवायला. ” अस म्हणून पालवीने डायनिंग टेबलची खुर्ची बाहेर काढली व ती बसली. आज लेकीला तयार पाहून जान्हवीने जरा हुश्श्य केले. पुढच्या दहा मिनिटांत ती पालवीला गेटवर स्कूल बसमध्ये बसवून आली. आसावरी ताईंचे देवाचे वाचन आटोपल्यावर त्या दोघी जेवण आटोपून आपापल्या खोलीत आराम करायला गेल्या.

संध्याकाळी मात्र जान्हवीने हाॅलच्या गॅलरीत उभ राहूनच पालवीच्या बसची वाट पाहायचे ठरविले होते. थोड्याच वेळात बस गेटवर आली. बसमधून पालवीला उतरलेले पाहून जान्हवी दार उघडायला गेली. कारण तिला ठाऊक होते की पालवीला दार उघडेस्तोवर धीर नसतो. आज नाचत नाचत पालवी घरात शिरली. तिचे हे वागणे रोजचेच असायचे. घराबाहेर पडल्यापासून घरात शिरेपर्यंत तिच्याबरोबर काय काय झाले? तिला कोण काय बोलले? हे सगळे इत्थंभूत आजी व आईला सांगितल्याशिवाय तिचा दिवस जात नसे. आज पण ती दप्तर कसेबसे जागेवर ठेवून ” आजी, आजी ” करत आसावरी ताईंकडे गेली. त्या तिला थोड्या रागावून म्हणाल्या, ” पलू, किती वेळा तुला सांगायच बाहेरुन आल्यावर पहिल्यांदा हात-पाय धुवायचे. आम्ही दोघी कुठे पळून जाणार असतो का? मग सांग तुला काय सांगायचे आहे ते. ” पालवी पटकन बाथरूमचा दरवाजा ढकलून आत जाऊन पाय धुऊन आली. ” आजी, काय झाल सांगू तुला? ” आज मीराने डब्यात पुरणपोळी आणली होती, तिने मला पण दिली. मग मीसुध्दा माझ्या डब्यातले आप्पे तिला देऊ केले. जान्हवी तिथे बसून हे सर्व ऐकत होती. पालवी पुढे आजीला म्हणाली, ” आजी आणि बरं का? आमच्या मराठीच्या टीचर आहेत ना त्यांनी काहीतरी मोठ वाक्य म्हटल होत. मला ना त्याचा अर्थ सांग ना ग. काय बर होत ते? ” अस म्हणून ती आठवण्याचा प्रयत्न करु लागली. तिला तस विचार करताना पाहून जान्हवी व आसावरी ताई एकमेकींकडे पाहून हसल्या. पलू आनंदाने जोरात ओरडली. ” आठवल मला. पेरावे…? काय होते ते बर? ” नाही आठवत पालवी थोडी नाराज होऊन म्हणाली. आसावरी ताई तिला जास्त निराश न होऊ देता म्हणाल्या. ” अग बाळा, तुला असच म्हणायच आहे का की पेरावे तसे उगवते? ” पालवीने एक जोरात टाळी वाजवून म्हटले, ” हो ग आजी, अगदी बरोबर. तुला कस माहिती आमच्या टीचरनी अस म्हटलेल.? आणि याचा अर्थ ग काय असतो? पेरावे म्हणजे काय? ” आसावरी ताई हसून तिला म्हणाल्या, ” बस बाळा माझ्याजवळ. मी तुला सांगते त्याचा अर्थ काय आहे तो. ” पालवी येऊन त्यांच्याजवळ बसली. आसावरी ताईंनी आजीच्या वात्सल्याने पालवीच्या पाठीवरून हात फिरवला व त्या तिला म्हणाल्या, ” बर का पालवी, पेरावे तसे उगवते म्हणजे जस एखादा धान्य पेरणारा कोण? सांग बर ” पालवी झटकन म्हणाली ” शेतकरी. ” ” बरोबर. तो जमिनीची नांगरणी झाल्यावर जे धान्य पेरतो तेच धान्य धरणीमाता परत पिकांच्या रुपात आपल्याला देते. आता पुढे रोजच्या आयुष्यात आपण माणस जशी चांगली किंवा वाईट कृती करतो. तशी फळ आपल्याला मिळतात. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणून बाळा वडीलधारी माणस लहान मुलांना सांगत असतात, कधी कोणाला उलट बोलायच नाही, वाईट बोलायच नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. दुखवायचे नाही ते म्हणूनच. ” पालवी गंभीर होऊन आजी सांगत असलेला शब्द नी शब्द लक्ष देऊन ऐकत होती. पालवी ही मुळातच शांत स्वभावाची होती. तिची आजी काहीतरी चांगले सांगतेय हे तिच्या बाल मनाला कळत होते. टीचरने सांगितलेल्या त्या वाक्याचा अर्थ असा आहे हे कळल्यावर ती पुढची काही मिनिटे विचार करत राहिली. आपली आजी किती हुशार आहे तिला काहीही विचारा तिला सर्व माहीत असत असा विचार मनात येऊन ती नकळत आजीवरच्या अभिमानाने ताठ बसली. तिथे बसून ऐकत असलेल्या जान्हवीला पण सासूबाईंचा सार्थ अभिमान वाटला. जान्हवीच्या माहेरच्यांमध्ये त्यांना आदर होता. जान्हवी विचार करू लागली. ” मीसुध्दा पलूला एवढ्या साध्या, सोप्या भाषेत समजावू शकले नसते. आई खरच ग्रेट आहेत. लहानांशी कस बोलाव त्यांना सोप्या भाषेत कस समजवाव हे त्यांना अगदी छान कळत. ” रात्री झोपायला खोलीत जाताना तिने आसावरी ताईंना त्यांच्या त्या खुबीबद्दल मनापासून धन्यवाद दिले. त्यावर त्या म्हणाल्या, ” अग, अंगची शिक्षिका आहे ना मी, लहान मुलांना व्यवस्धित समजावून सांगण्यात मी माझे आयुष्य सत्कारणी लावले आहे. ” अस म्हणून त्या खोलीत जाऊ लागल्या. त्यांना पाहून जान्हवी विचार करू लागली. ” खरच किती सुंदर विचारांनी परिपूर्ण आहेत ह्या? मनाच्या हार्ड डिस्कवर हयांच्या ह्या विचारांना नक्की संग्राह्य करून ठेवायला हव. ” आणि ती स्वतःशीच हसली.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बासरी… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

🌸 जीवनरंग 🌸

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बासरी… !!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

*काय गं म्हातारे? आज काय त्रास….? मी गंमतीनं या आज्जीला विचारलं….! *

*मला काय नगो…. माज्या पोराला दे, न्हेमीची औशदं…. *

*ही आज्जी खुप थकलीय… माणसाला होणारे जवळपास सर्व आजार हिला आहेत… पण कधीही आजपर्यंत एकाही आजारावर स्वतःसाठी हिने औषध घेतलं नाही…! कधीही विचारलं तर म्हणायची, मला काय नगो, माज्या पोराला दे…. *

*हां… हिला दिसायचं कमी आलं होतं, तेव्हा मात्र माझ्या मागं लागुन, भांडुन डोळ्यांचं आॕपरेशन करवुन घेतलं होतं…. इतरांच्या आधी स्वतःचा नंबर आधी लावुन घेतला होता…. हट्टानं गोळ्या आणि ड्राप्स मागुन घेतले होते… *

*मी तीला म्हणायचो, इतर औषधं कधी मागत नाहीस, आता डोळ्याच्या आॕपरेशनसाठी का मागं लागलीस? ती यावर गप्प राहायची… *

*आज भिक्षेक-यांची गर्दी कमी म्हणुन तीची थट्टा करायची लहर आली…. *

*बोल की म्हातारे… काय औषध देवु…? मी मुद्दाम डिवचलं…. *

*नेहमीसारखंच बोलुन गेली… मला काय नगो माज्या पोरालाच काय आसंल तर दे…. *

*मी म्हटलं, तुज्या पोराला मी दरवेळी न तपासता, तु सांगते म्हणुन औषध देतो…. एखादवेळी काही झालं तर? पुढच्यावेळी त्याला इथं आणलंस तरच औषध देईन…. नाहीतर नाही…. *

*म्हातारी हबकली… म्हटली खरं म्हणतु का थट्टा करतु माजी? तीच्या डोळ्यातली भिती स्पष्ट जाणवली…! * 

*म्हटलं, खरंच म्हणतोय, थट्टा नाही. पुढच्यावेळी त्याला इथं आणायचं…! मी देणार नाही औषधं न तपासता… *

*आसं नगा करु सायेब…. नेहमी अरे तुरे करुन बोलणारी, आज साहेब म्हणायला लागली…. *

*मला गंमत वाटली…. *

*म्हटलं पोरगं मोठं आहे ना तुझं? मागच्यावेळी 40 वय सांगीतलं होतंस, त्याला इथं यायला पाय नाहीत का? आईला भिक मागायला लावुन घरात झोपतो… लाज वाटत नाही का त्याला….? कामधंदा कर की म्हणावं…. मी तावात बोलुन गेलो…. * 

*म्हातारी… जवळपास 75 वर्षाची… अंगावर मांस नाही… फक्त हाडं… सुरकुतलेल्या कातड्यानं झाकलेली…. कंबर आणि गुडघे कामातुन गेलेले…. डोळे खोल गेलेले…. नाही म्हणायला, मी दिलेला चष्मा त्या डोळ्यांवर….! * 

*माझ्या या वाक्यांनी ती दुखावली असावी…. इकडं तीकडं धरंत, कण्हत मी बसलो होतो तिथं कशीबशी आली, शेजारी बसली…. आणि हळुच आवाजात म्हणाली…. * *डाक्टर सायेब, त्याचं वय 40 आसंल…. खरं हाय, पन त्यो येवु शकत न्हाय.. कारण त्यो पायानं जनमल्यापसनं आपंग हाय…. मी भिक मागती, त्याची लाज त्याला वाटती का न्हाय मला म्हाईत न्हाय…. कारन जनमल्यापसनं त्यो येडसर हाय…. आन् कामधंदा पन न्हाय करु शकत…. कारन, येड्या मानसांना कुनी काम देत न्हाई…. *

*आता दचकायची पाळी माझी होती, मी शरमलो…. आपल्याला माहित नसतांना आपण काहीबाही बोलुन जातो…. पण समोरचा माणुस दुखावतो…. *

*मी शरमेनं तीला म्हटलं, आगं आज्जी, मी गंमत केली, मला तसं नव्हतं म्हणायचं…. मी काहीतरी सारवासारव केली…. *

*आजी मात्र दुखावली गेली… मलाच वाईट वाटलं…. पुन्हा म्हटलं… माफ कर आज्जी… मी सहज बोलुन गेलो….! *

*ती कसंनुसं हसली, म्हणाली…. काय माप करु सायेब…? तुमचा काय दोश? आवो फाटल्यालं शीवायला गेले आन् दोराच संपुन गेला आसं झालंय… दोश कुणाला द्यायचा? * 

*म्हटलं, हो ना,… होतंय असं…. कसं तुमच्याच पोराला असं झालं कुणास ठावुक…? *

*ती पुन्हा कण्हत कुंथत जागेवर जावुन बासली…. शांतपणे…. *

*नऊ महिने व्हायच्या आत जन्मला का तो? मी तीच्याजवळ जावुन विचारलं…. *

*मला काय म्हाईत? बेफिकीरीने ती बोलली…! *

*मी गोंधळलो…. म्हटलं… आं… आज्जी, तुला नाय म्हाईत म्हंजे? *

*तितक्याच शांततेत ती बोलली, माज्या पोटचं न्हाई ते…. सवतीचं हाय….! *

*मला कळलं नाही…. आणि मग नेहमीच्या सवयीने मी उकरत गेलो…. जखमांची खपली उकलत गेलो…. जुन्या जखमा पुन्हा छेडत गेलो…. *

*…. हिचं लग्न झालं…. पण हिला बरीच वर्ष पोर होईना… नव-यानं वाट पाहुन हिला घराबाहेर काढलं… दुसरा घरोबा केला… डोळ्यादेखत सवत आली…. सवत घरात… ही बाहेर… बाहेर कुणाचा आसरा नाही…. सवत म्हणायची, घरातली सगळी कामं कर, दोन वेळचं जेवण आन् रात्री झोपायला जागा देते…. हि घरातली सगळी कामं करायची… पडेल ते… सवत सांगेल ते….! *

*खरंतर ही लग्नाची, सवत बिनलग्नाची, पण बोलणार कोण? बोललं तर ऐकणार कोण? आणि बोलुन फायदा काय? दोन वेळचं जेवण आणि रात्रीला मिळालेला निवारा यांतच ती धन्यता मानायची…. *

*सवत आणि नवरा दोघंही खुप त्रास द्यायची पण…. पण….! *

*एके दिवशी पाळणा हलला, सवतीला मुलगा झाला…. सहा महिन्यांचं बाळ असतांना, नवरा अॕक्सिडेंट मध्ये गेला…. पुढच्या सहा महिन्यांत सवत कुठल्याशा आजाराने गेली…. *

*वाकड्या पायाचं हे बाळ घरात एकटं रडत रहायचं…. आईविना…. *

*दोन दिवस हिने ही रडु दिलं त्याला…. सवतीचं पोर…. माझा काय संबंध? मेलं तर मरु दे….. सवतीनं नवरा नेला…. मला घराबाहेर काढलं…. मी कशाला कुणाचं करु….? *

*दोन दिवसांनी, हिनं ते पोर उचललं…. आणि निघाली कुठंतरी टाकायला….. *

*जसं या वर्षभराच्या पोराला तीनं टाकुन देण्यासाठी उचललं, तसं ते पोर आई समजुन हिच्या छातीशी झोंबायला लागलं…. *

*आयुष्यात पहिल्यांदाच “आई” झाल्यासारखं तीला वाटायला लागलं…. पोर फेकायला गेलेली ही “बाई”, पोराला न फेकताच येताना दुध घेवुन आली, तीच्याही नकळत “आई” होवुन गेली….! *

*आज कित्ती वर्ष झाली…. त्याला ती सांभाळत्येय…. त्याचे आजार बरे करण्यासाठी राहतं घर विकलं…. एकुलतं एक छप्पर विकलं…. दागदागीने विकले…. पोर मात्र आहे तसंच राहीलं…. *

*दुर्दैव हे, की या मुलाला काहीच कळत नाही, आपल्यासाठी कुणी काय केलंय हे समजण्याची त्याची पात्रता नाही…. दरवेळी घरी गेलं की हा मुलगा, या आज्जीकडे अनोळखी नजरेनं पाहतो…. जशी ही माझी नव्हेच कुणी…. *

…. *आणि याच अनोळखी मुलाला जगवण्यासाठी ही सावत्र आई…. सख्खी होवुन जाते…. रस्त्यावर भिक मागते….. *…. *आज कित्येक वर्ष….! *

*त्याचं दुखलं खुपलं बघता यावं, केवळ याचसाठी तीनं हट्टानं डोळ्यांचं आॕपरेशन करवुन घेतलं होतं तर…..! *

*कुणीतरी कुणासाठी काहीतरी करत असतं…. त्यामागची भावना ही असते की, उद्या याची परतफेड होणारच आहे…. * *पण, इथं ही माऊली भिक मागुन या वेडसर मुलाला जगवते…. कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेवाचुन…. * *आणि या मुलाला माहीतच नाही की, आपल्या एक दिवसाच्या जगण्यासाठी, रोज कुणीतरी आपला आत्मसन्मान इथं विकतंय…. *

*आजीचा हात हातात घेवुन म्हटलं… आज्जी, हे पोरगं तुझं नाही तरी तु एव्हढं करतेस….? *

*तेव्हा डोळ्यात पाणी आणुन म्हणाली, माजंच हाय वो ते….! *

*माझ्याकडनं औषधं घेवुन, तु त्याला अजुनही बरं करण्याचा प्रयत्न करतेस? कसं शक्य आहे ते? *

*ती म्हणाली, चंद्रावर जायला पैशे पडत्यात डाक्टर, चंद्र पहायला पैशे न्हाई पडत…. आवो…. लोकं चंद्रावर गेली, आमाला जमिनीवरनं तरी चंद्र पाहु द्या…. पोरगं बरं झालंय असं रोज मला सपान पडतंय… आवो आमाला सपान तरी पाहु द्या….! *

*काय बोलु मी….? *

*पण आज्जी, किती दिवस हे करणार? *

*फुलाला काय म्हाईत आसतंय का? आपुन देव्हा-यात जाणार का मयतीला वाहणार? तरी फुल काय उमलायचं राहतंय का? तसंच आमचं बी….! उमलत राहायचं डाक्टर…. देव्हा-यात पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार आन् तिरडीवर पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार…. सुगंध हितं बी द्यायचा आन् सुगंध तीथं बी द्यायचा…. आपण आपलं इमान सोडायचं न्हाई…. *

*एका डाॕक्टर माणसाला, एक अशिक्षित बाई जगण्याचं गुपीत सांगत होती…. आजपर्यंत कुठल्याही डिग्रीच्या पुस्तकात नसलेलं मर्म ती उलगडत होती…. *

*आज्जी, पण या सगळ्यात तुला किती त्रास झाला? इथुन पुढंही होणारच आहे…. मग? *

*डाक्टर, पोकळ बांबुला टोचुन भोकं पाडली की मग तीची “बासरी” व्हती…. कुणी त्याला “पावा” म्हणतं…. आवो जलमाला येवुन पोकळ बांबु व्हायचं का आंगावर भोकं पाडुन घिवुन बासरी व्हायचं हे ज्याचं त्याला कळलं पायजेन…. पोकळ बांबु नुसताच “वाजतो” पण बासरीतनं ग्वाड आवाज येतु…. *

*मी शहारलो….! *

*म्हटलं, आज्जी, कुटं शीकलीस हे….? *

*विषण्ण हसत म्हणाली, शिकवाय लागतंय व्हय डाक्टर? आवो आपुनच कळतं सारं….! *

*खरंच हे शहाणपण आलं होतं, त्या भोगलेल्या अमर्याद वेदनांमुळे…. *

*काच, स्वप्नं आणि नाती तुटली की टोचतातच… या टोचण्यातुनच मग जन्म होतो जीवनातील तत्वज्ञानाचा….! *

*डाक्टर…. आज्जी च्या हाकेनं भानावर आलो…. *

*मला येकच काळजी हाय वो…. मी जर या पोराच्या आदी मेले तर… 8 दिवसात ते पोरगं बी तडफडुन मरंल…. आज इतकी वर्षं सांबाळला,… मी गेल्यावर कुणीच करनार न्हाई त्याचं….! *

*माजी येकच इच्चा हाय आता…. *

*ती शुन्यात बघायला लागली, आणि कानाजवळ येवुन बोलली…. कुनतीच आइ म्हननार न्हाय आसं पन…. पन…. *

*पण काय आज्जी? *

*पन…. माज्या आदी त्यानं मरावं…..! * 

*मी हादरलो…. *

*आज्जीनं कळवळलेला आपला चेहरा पदरानं झाकुन घेतला…. पदराआडुन दबकत येणारे ते तीचे हुंदके मलाच असह्य झाले…. *

*ब-याच वेळानं तीला शांत करुन मी निघालो…. जातांना पुन्हा वळुन मागं पाहिलं…. *

*किमान शंभर भोकं पडलेलं… ठिगळांनी शिवलेलं लुगडं घालुन… सावत्र पोरासाठी झिजलेलं शरीर आणखी झिजवत खुरडत चालुन, स्वतःचा आत्मसन्मान अनोळखी लेकरासाठी गहाण टाकुन भिक मागणा-या….. स्वतःच्या अंगावर भोकं पाडुन घेवुन, माणुसकीचं सुरेल गाणं गाणा-या या “बासरीला” मी मनोमन नमस्कार केला….!!! *

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आहेर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ आहेर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

तो नि त्याची बायको समारंभाच्या हॉलमधे शिरले की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळत.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू येई..

तो.. अजय.. गावातला एक दुकानदार..

तालुक्याच्या गावात त्याचं कपड्याचं दुकान होतं, त्याच्या वडिलांनी सुरू केलेलं.. फार मोठं नाही आणि फार लहानही नाही… मध्यम म्हणता येईल असं…

वडिलांचा अजय एकुलता एक मुलगा.. शिक्षणात फारसा रस नसलेला… बारावी जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झाला..

शिक्षणाला रामराम ठोकला नि दुकानात बसायला लागला… रक्तातून आलेली धंद्याची आवड नि लहानपणापासून वडिलांनी दुकानात बसायला लावल्यामुळे धंद्याची उत्तम जाण…. शिवाय जिभेवर साखर नि डोक्यावर बर्फ…. दुकानात बसू लागला तसा धंदा अजूनच वाढला..

देखण्या अजयवर गावातल्या वधुपित्यांचं लक्ष होतच्….

संस्कारी नि सुरेख असलेल्या माधुरीशी लग्न होऊन अजयचे दोनाचे चार हात झाले… पुढच्या चार वर्षांत चार चिमुकली पावलं घरात दुडदुडू लागली…

…. अजयच्या वडिलांनी दुकान अजयकडे सोपवलं नि अध्यात्माचा मार्ग धरला…

अजयने शेजारचं दुकानही विकत घेतलं.. दोन्ही दुकानं जोडली, सुरेखशी अंतर्गत सजावट केली..

लहानशा दुकानाची छानशी शोरूम झाली… येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेत भरू लागली..

कालांतरांनं छानसं टुमदार घरदेखील त्याने बांधलं… गावातील उच्चवर्तुळात त्याची उठबस वाढली..

नाही म्हटलं तरी त्याची प्रगती गावातील लोकांच्या नजरेत येऊ लागली..

” एवढा पैसा थोडाच सरळमार्गाने येतो… धंद्यात लबाडी करत असणार.. “.. गावात कुजबुज सुरू झाली..

खरंतर त्याची नि त्याच्या कुटुंबाची राहणी तशी साधी होती.. धंद्यासाठी दुकान मोठं केलेलं असलं तरी घर छोटसं नि साधसंच बांधलेलं…. दोन चाकीवरूनच तो फिरत असे…. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातेललं…. साऱ्यांचे कपडेही साधेसेच असत…

ना व्यसनं… ना मोठे शौक.. हॉटेलातही कधी ते कुटुंब जात नसे…

” एक नंबरचा चिकट आहे हा अज्या… ” दोस्त नि गावातले लोक त्याच्या माघारीच नाही तर तोंडावर बोलायचे..

या लोकांच्या बोलण्याला अजून एक कारण होतं… अजय कोणत्याही कार्यांत एखाद्या रुपयाचाही आहेर करीत नसे… त्याचं हे रिकाम्या हातांनी जाणं सा-यांनाच खटकणारं…

उच्चभ्रूंच्या कार्यात कुणाचे सोन्या-चांदीचे आहेर.. कुणी उंची वस्त्रे आहेर म्हणून आणलेली.. तर कुणाची गलेलठ्ठ रकमांची पाकिटे.. पण..

अजयकडून साध्या रिकाम्या पाकिटाचाही आहेर नसलेला..

अगदी नातेवाईकांच्या लग्नातही हीच गत..

” नव-यानं नाही म्हटलं तरी आपण आपल्या साठवलेल्या पैशातून आहेर करावा.. असं रिकाम्या हाताने कार्याला जाणं.. किती वाईट दिसतं.. एवढा कंजुषपणा करून काय मिळवतो गं तुझा नवरा.. मेल्यावर साठवलेलं डबोलं इथच सोडून जाणार नं.. की बरोबर नेणार आहे? अगं, लोक किती नावे ठेवतात.. “

…. माधुरीला तिच्या नातेवाईकांकडून, मैत्रिणींकडून, शेजारणींकडून हे ऐकावं लागायचं.. तिला खूप वाईट वाटायचं. डोळे भरून यायचे.. पण ती नव-याच्या शब्दाबाहेर जाणारी नव्हती. बिचारी निमूटपणे सहन करायची..

…. कार्याला जायचं पण तिथं जेवायचं मात्रं नाही… हे धोरण अजय नि पत्नीने पाळलेलं..

अनेक वर्षे हेच सुरू होतं…

तो अक्षय्य तृतीयेचा दिवस होता… त्या दिवशी गावातील पाच अनाथ वधु-वरांचा सामुहिक विवाह सोहळा गावातल्याच सामाजिक संस्थेने आयोजित केलेला.. मोठा मंडप घातलेला.. गावातील असा पहिलाच सोहळा असल्याने अख्खं गाव लोटलेलं.. आमदार, जिल्हाधिकारी अशा व्ही. आय. पीनीही उपस्थिती लावलेली.. गावातील श्रीमंतही हजर असलेले.. या उच्चभ्रूंनी अनाथ जोडप्यांना मदत म्हणून मोठमोठे आहेर आणलेले… सामान्यांनीही यथाशक्ती भेटवस्तू आणलेल्या.. स्टेजवर मान्यवर बसलेले.. त्यांची भाषणे, त्यानंतर लग्नसोहळा.. नंतर जेवण….. असा कार्यक्रम…

एवढ्यात अजय सहकुटुंब मांडवात शिरला.. नेहमीप्रमाणे आजही सा-यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या..

तो नि त्याचं कुटुंब रिकाम्या हातानेच आलेलं..

” अनाथांच्या लग्नाला तरी काहीतरी आहेर आणायचा होता.. किती निर्लज्ज, स्वार्थी नि कंजुष आहे हा माणूस.. ” लोकांत कुजबुज सुरू झाली..

” श्री. अजय नाईकसाहेबांनी व्यासपीठावर यावं.. “

अजय व्यासपीठावर गेला.. तसे साऱ्यांचेच डोळे विस्फारले.

अध्यक्षांचं भाषण सुरू झालं..

…. ” आजचा कार्यक्रम संपन्न होतोय तो केवळ अजय नाईकसाहेबांमुळे … त्यांनी या लग्नसोहळ्यासाठी पाच लाख रुपयांचा आहेर दिलेला आहे… वगैरे… वगैरे.. “

पुढचं भाषण बऱ्याच लोकांच्या डोक्यातच शिरलं नाही..

अजय भाषणासाठी उभा राहिला….

” मित्रांनो, तुम्हाला बसलेला धक्का मी समजू शकतो. कोणत्याही लग्नात रुपयाभरही आहेर न करणारा मी..

अन् आज मी या लग्नासाठी पाच लाखांचा आहेर दिला.. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटलं असेल..

पण हे खरं आहे..

…. दोस्तांनो, मी तेंव्हा पाचवी-सहावीत असेन. माझ्या मावशीकडे माझ्या मावसभावाचं लग्न होतं.

मावशीचं सासर खूप श्रीमंत, तालेवार.. त्यामुळे लग्न सोहळा जंगी.. मी नि माझी बहीण आई बरोबर समारंभाला गेलो होतो…. घरचं देवकार्य पार पडलं. नातेवाईक आहेर देऊ लागले.. कुणी सोन्याच्या अंगठ्या, कुणी सोनसाखळ्या नवरदेवाला भेट म्हणून दिल्या.. मावशीला भरजरी सांड्यांचे आहेर दिले जात होते…

…. आईची आहेराची पाळी आली.. आईनं तिच्या भाच्याला सोन्याचं लहानसं वळं दिलं… मावशीला साडी दिली.. मावशीच्या यजमानांना धोतरटोपी दिली.. तशा मावशीच्या सासुबाई गरजल्या,

” शांते, असले कपडे आमची नोकरमाणसंसुद्धा वापरत नाहीत.. आमचा अपमान करण्यासाठी असले कपडे आणलेस का? घेऊन जा ते कपडे परत… “

त्या बाईंनी ते कपडे आईकडे भिरकावले..

आई रडू लागली तसे मावशीचेही डोळे भरले.. पण कुणाचीच बोलायची हिम्मत झाली नाही..

आमची त्यावेळी बेताची परिस्थिती होती.. दुकानाचं कर्ज डोक्यावर होतं. आजोबांच्या

आजारपणाचा मोठा खर्च झालेला होता. रोजचाच खर्च कसाबसा भागत होता. आईने स्वत:चं कानातलं गहाण टाकलं. त्यातून लहानसं वळं केलं. उरलेल्या पैशातून मावशीसाठी साडी नि काकांसाठी धोतरजोडी घेतली.

… त्या बोलण्याने आई खूप दुखावली. पण तिने तोल ढळू दिला नाही.. लग्नापर्यंत आम्ही थांबलो..

नि लग्न झाल्याबरोबर जेवण न करता आमच्या गावी परत आलो..

.. दिवस सरले. आमचं कर्ज फिटलं. दुकानातून भरपूर पैसे मिळू लागले. तिकडे मावसभावाने व्यसनापायी सगळं वैभव गमावलं…. पण माझ्या मनावर उमटलेला तो अपमानाचा ओरखडा मात्रं बुजला नाही.

मी ठरवलं की कोणाला कधीच आहेर द्यायचा नाही…!! म्हणून मी कोणत्याही समारंभात रिकाम्या हाताने यायचो.. तुम्ही मला हसायचात, चेष्टा करायचात, माझा अपमानही करायचात.. पण मी त्याकडे काणाडोळा करायचो.. कारण पदरमोड करूनही दिलेल्या आहेराची किंमत दुस-याच्या लेखी काय असते, हे लहानपणीच मी अनुभवलं होतं.. मी आहेर द्यायचो नाही पण घरी आल्यावर एका पेटीत ती आहेराची रक्कम जमा करायचो….. या गोष्टीला अकरा वर्षे झाली. मागच्या महिन्यात पेटीतील रक्कम मोजली.

अडीच लाख झाली. त्यात मी माझे स्वत:चे अडीच लाख घातले… पाच लाख या अनाथ लेकरांच्या लग्नसोहळ्याला दिले. त्यातून त्या जोडप्याचा लग्नसमारंभ केला जाईल आणि संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा संसार उभा राहील..

…. गरज नसणा-या श्रीमंत लोकांना पद्धत म्हणून उगीचच आहेर करून नावे ठेवून घेण्यापेक्षा आहेराची गरज असणा-यांना आहेर केलेला बरा… नाही का? “

आता लाज वाटण्याची वेळ उपस्थितांची होती..

.. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी अजयकडे पाहिले नि टाळ्यांच्या कडकडाटाने त्याला मानवंदना दिली…

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares