मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला माफ करा… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मला माफ करा…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

आज राघवेंद्राला दुरंतो एक्सप्रेसने दिल्लीला जायचं होतं. पुण्यातल्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही म्हणून आईला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्यानं घर सोडलं. स्टेशनवर लवकर पोहोचले. ट्रेन सुटायला अजून अवधी होता. त्यानं आईला वेटिंगरूममध्ये बसवलं. पेपरस्टॉलवरून काही मासिकं विकत घ्यायला गेला तेव्हा समोरून येणारी व्यक्ति त्याला ओळखीची वाटली. त्याच्याबरोबर एक वृद्ध गृहस्थ आणि इतर दोघे बॅगा घेऊन चालले होते.

ते लोक काहीसे पुढे गेल्यावर, काहीसे आठवल्याने राघवेंद्राने “अहो, महेशसाहेब” म्हणून हाक मारली. 

त्या गृहस्थानं पटकन मागं वळून पाहिलं आणि थांबून राहिला. तो महेशच होता. त्याला भेटून जवळपास वीस वर्षे झाली होती. 

राघवेंद्र आणि महेश एकाच कॉलनीत राहणारे वर्गमित्र आणि अभ्यासात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. राघवेंद्र नेहमीच महेशहून वरचढ असायचा. कॉलेजला गेल्यावर त्यांचे मार्ग बदलले. महेशच्या बाबांनी बावधनला घर बांधल्यानंतर ते कॉलनी सोडून गेले. त्यानंतर पुन्हा त्यांची कधी भेट झाली नाही. 

महेश आता सेंट्रल एक्साईजमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे असं कुणाकडून तरी कळलं होतं. राघवेंद्र त्याच्या जवळ जात म्हणाला, “साहेब, मला ओळखलंत का?” राघवेंद्रने ‘साहेब’ म्हटल्यामुळे महेशचा अहंकार सुखावला होता. 

“का नाही ओळखणार? तुझ्यात तसा काही फारसा फरक पडलेला नाही. आहे तसाच आहेस. ठेविले अनंते तैसेचि रहावे….” असं म्हणून मिश्किलपणे हसत पुढे बोलला, “काय करतोस? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेस?” 

“मी, प्राध्यापक आहे. तुम्ही म्हणता तसे मी आहे तसाच आहे आणि चित्ती समाधानही आहे.”  

महेश मनातल्या मनात विचार करत होता. आज मी त्याच्याहून कितीतरी उंचावर आहे. आज मी केवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे आणि हा मात्र प्राध्यापकच आहे. बोलता बोलता ते वेटिंगरूममध्ये आले.

“राघवेंद्र, तू अव्वल नंबरचा विद्यार्थी होतास ना? पण तुला सरकारी नोकरी मिळवता आली नाही. खरं आहे ना?” महेशनं सहेतुक विचारलं. 

“मी प्रयत्नच केला नाही. एम टेकला गोल्डमेडल मिळाल्यावर प्राचार्यानी मला केबिनमध्ये बोलावलं अन म्हणाले, ‘तुझ्यासारख्या विद्यार्थ्याने स्वत:च्या अर्थाजनासाठी ही पदवी न वापरता विद्यादानासाठी वापरावी. तुझ्या शिकवण्याने कित्येक मुलांचे भवितव्य घडेल. कदाचित मोठ्या कंपनीतल्यासारखा पगार मिळणार नाही. अर्थार्जन कमी होईल. परंतु कित्येक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होशील. मला त्यांचं म्हणणं पटलं. प्राचार्यानी नेमणुकीचं पत्र हातात दिलं. असो.”

“आता तुम्ही कुठे निघाला आहात साहेब?” असं म्हणत राघवेंद्रानं नकळत महेशवर मात केली. 

“उद्यान एक्सप्रेसने बाबा बेंगलुरूला चालले आहेत, तर त्यांना सोडवायला आलोय.” महेशने सांगितलं. 

“ते एकटे जातील काय?” राघवेंद्रने भाबडेपणानं विचारलं. 

“त्यांच्या सोबतीला ऑफिसातला एक कर्मचारी आहे. अरे मला अजिबात वेळ नसतो. मी सेंट्र्ल एक्साईजमध्ये असिस्टंट कमिशनर आहे.” 

“एवढे मोठ्या हुद्द्यावर आहात म्हटल्यावर तुम्हाला वेळ मिळणे शक्यच नाही.” 

“राघवेंद्रा, मघापासून मी तुला अरेतुरे करतोय आणि तू मला अहोजाहो करतो आहेस. बरं, तू कुठे चालला आहेस सांग.”

“महेश, तुम्हा सरकारी अधिकारी लोकांचा मान असतो. चार-चौघात अरेतुरे कसं म्हणणार? कॉलेजच्या बाहेर आम्हाला कोण ओळखतो? बरं असो. अरे, मी आईला घेऊन दिल्लीला चाललोय. माझा धाकटा भाऊ राहुलला ओळखतोस ना? तो दिल्लीला असतो. त्यानं तिथे एक फ्लॅट विकत घेतलाय. आम्ही वास्तुशांतीला चाललो आहोत. आईला सांधेदुखीचा तसंच हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे. गेल्यावर्षी बाबा गेल्यानंतर ती थोडीशी डिप्रेशनमध्ये गेली होती.”        

“आईला सांभाळणं तुला एकट्याला फारच अवघड जात असेल. तुम्ही दोघे भाऊ सहा सहा महिने सांभाळता वाटतं.”

“छे छे ! महेश मी असा विचार देखील करू शकत नाही. आई-बाबा सुरूवातीपासूनच पुण्यात राहिले आहेत. इथेच वाढले आहेत. त्यांना दुसरीकडे करमत नाही म्हणून ते राहुलकडे कधीच राहायला गेले नाहीत. केवळ पोट भरण्यासाठी म्हणून दर सहा महिन्याला त्यांनी निर्वासितांच्यासारखे बाडबिस्तरा गुंडाळून दुसरीकडे जावं ही कल्पनाच मला पटत नाही. 

आज आम्ही दोघे भाऊ आहोत म्हणून सहा-सहा महिन्याची वाटणी करावी असं म्हणतोस. जर आम्ही तिघे भाऊ असतो तर आईबाबांना चार-चार महिने वाटून घ्यायचं की काय?

माणसाला फक्त दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न नसतो. समाजप्रिय माणसाला कुणाशी सतत तरी संवाद साधावं असं वाटत राहतं. राहुल आणि वहिनी कामावर गेल्यावर दिल्लीसारख्या ठिकाणी ते कुणाशी संवाद साधतील, सांग ना?

“राघवेंद्रा, असं म्हणून कसं चालेल? आईने राहुललासुध्दा जन्म दिलाय. हा व्यवहार आहे. त्यांनं देखील आईला सहा महिने सांभाळायला हवं. तू एकट्यानेच ह्या जबाबदारीचं ओझं का उचलावं? माणसानं असं भावनाप्रधान होऊन चालत नाही. थोडंसं व्यावहारिक असायला हवं. वहिनी काही बोलत नाहीत काय?”

“महेश, मुळात मी आईला सांभाळतो आहे ह्या भ्रमात कधीच नाही. आईबाबांनीदेखील मुलांचा भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांच्या वर्तमानकाळाचा बळी दिला आहे. आमचे शिक्षण, आमचं भवितव्य ह्यातच ते गुरफटले होते. त्यांनी स्वत:चा विचार कधीच केला नाही. 

ज्या आई-बाबांनी निरपेक्ष मनानं मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं त्यांना मी सांभाळतोय असं कधी मानलंच नाही. त्यांनी आम्हा मुलांना कधी ओझं मानलं होतं काय? मग त्यांच्या वृद्धत्वात मी त्यांना ओझं का समजायचं? 

माझी पत्नी रेणुचं म्हणत असशील तर, एकदा ‘आमच्या सासूबाई राहुल भावोजींच्याकडे जायला नाही म्हणतात.’ असं ती कुणाशी तरी बोलताना मी ओझरतं ऐकलं होतं. दोन तीन दिवसानंतर मी तिला सहज म्हटलं, “रेणु, आपल्याला दोन मुलं आहेत. म्हातारपणी तू कुणाकडे राहायचं ठरवलंस? मोठ्याकडे की धाकट्याकडे?” तर ती पटकन म्हणाली, ‘माझी मर्जी मला ज्या मुलाकडे राहावेसे वाटेल मी त्याच्याकडे राहीन. मला कोण अडवतं बघू.’ 

मग मी तिला हसत हसत म्हटलं, “रेणु, माझी आई देखील तुझ्यासारखाच विचार करते बघ. ती सुद्धा म्हणते की मी मरेपर्यंत राघवेंद्राकडेच राहणार आहे, मला कोण अडवतं बघू म्हणून.’ खरं आहे. इथे माझ्याकडे राहायचं की राहुलकडे राहायचं हे आईच ठरवू शकते. नाही का?’  त्यानंतर रेणु ह्या विषयावर आजवर कधीच बोलली नाही. 

“राघवेंद्रा, मुळात आईवडिलांना आपण एकट्यानेच का सांभाळायचं हा प्रश्न आहे.” 

“जर मी एकटाच मुलगा असतो तर आईबाबा आणि आम्ही सगळे एकत्रच राहिलो असतो ना? दुसरी गोष्ट, माझा भाऊ राहुल आईला सांभाळायला नाही म्हणतो म्हणून ती माझ्याकडे राहते असं समजू नकोस. आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.  

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विकी माऊस – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

☆ विकी माऊस – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

(सतीश अंकल म्हणाले होते, ” जर मला देव भेटला  आणि त्याने मला वर मागायला सांगितला तर मी त्याला म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”) आता पुढे….

‘त्यांना काय माहित आमची लहान मुलांची  दुःखं ! मोठी माणसं कधी आम्हाला मनासारखं करू देत नाहीत. खेळू देत नाहीत. टीव्ही पाहू देत नाहीत… सारखं आपलं नो..नो,डोन्ट… डोन्ट… डोन्ट! काही शंका विचारली तर ओरडा खावा लागतो…. पुन्हा ती शाळा… होमवर्क’ रडत असला तरी रोहनचं विचार चक्र चालूच होतं. स्टडीरूम मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्या समोर तो अखंड बसून होता. नंतर कसाबसा चार घास खाऊन झोपला.

सकाळी उशिरा, कलाऑन्टीने उठवल्यावर उठला. रेंगाळत पेंगाळत बसला. आज मेच्या सुट्टी दिलेल्या होमवर्कला तो हात पण लावणार नव्हता. बोर्नविटा पिता पिता दोन-चार चमचे विकीच्या पिंजऱ्यात गेले. त्याचे निरीक्षण करता करता त्याच्याशी खूप गप्पा मारून झाल्या. विकीला खायला कायआवडेल

याचे ऑन्टी बरोबर डिस्कशन ही झाले. रोहन बाबा ‘ त्याला ‘ घरात सांभाळणार आहे हे ऐकून ऑन्टी गालातल्या गालात हसत होती.

आंघोळ, नाश्ता आवरल्यावर ऑन्टीने टीव्ही लावून दिला. तो आणि पिंकी मिकी माऊस, डॉगी प्लूटो ,डोनाल्ड डक, गुफी पेटे यांची दंगा मस्ती पळापळी पहाण्यात रंगून गेले. थोडे टॉम अँड जेरी… नंतर थोडा छोटा भीम…. वेळ कसा गेला कळलंच नाही. मधून मधून विकीला पाहण्याचा मोह ही रोहन आवरू शकत नव्हता.

संध्याकाळी बाबा जरा लवकर घरी आला होता. बाबाच्या  अवतीभवती घुटमळत बाबाला काय आणि कसे सांगायचे, पटवून द्यायचे याचे प्रॅक्टिस रोहन करत होता. चहा पिता पिता बाबा म्हणाला,” रोहन बेटा बैस इथं. पहिल्यांदा तुझं काय म्हणणं आहे ते सांग.” पुन्हा डोळ्यात आपण होऊनच अश्रू दाटून आले. जे बोलायचं ठरवलं होतं ते काहीच आठवेना. मग जे सुचलं ते बोलू लागला, “बाबा, गणपती बाप्पाचा पेट ॲनिमल उंदीरच होता ना?….. मग माझा?”…. त्याला पुढे बोलू न देता बाबा म्हणाला, “अरे ती पुराणातली कथा आहे… आणि तो उंदीर गणपती बाप्पाचे वाहन होता. बाप्पाला पाठीवर बसवून नेणारा उंदीर किती मोठा असेल…. कल्पना कर. आणखी म्हणजे शंकराचे वाहन नंदी, विष्णूचे गरुड, कार्तिकेयचे मोर! त्यावेळी आत्ता सारख्या स्कूटर, बाईक, कार नव्हत्या ना.” हे सगळं आपल्या मनाने रचून या चिमुरड्याला पटेल असं करून सांगताना बाबाला घाम फुटला .

बाबाचे बोलणे ऐकता ऐकता रोहन बाबाच्या मांडीवर डोके ठेवून सोफ्यावर कधी आडवा झाला त्याला कळलेच नाही. 

“तो उंदीर आपल्या आपणच पिंजऱ्यात आलाय” रोहन म्हणाला. “तो पण इतक्या वर आपल्या आठव्या मजल्यावर! मग राहू दे ना तो इथे.” “ठीक आहे, हे बघ आपल्या घरात मुंग्या, झुरळे, कोळी, डास, माश्या, पाली असे कितीतरी जीव जंतू आपण होऊन शिरतात. तसाच हा उंदीर! त्यांना कोणी पाळत नाही. ते सगळे आपल्याला त्रास देतात. रोगराई पसरवतात. मागं एकदा तुला आठवतंय? एका उंदरानं पिंकीच्या दोन वह्या, एक पुस्तक पूर्णपणे  कुरतडून टाकलं होतं. आणखी म्हणजे कावळा चिमणी यासारख्या पक्षांना पण कोणी पाळत नाही.” बाबाचं म्हणणं थोडं थोडं  रोहनला पटू लागलं होतं.

“तू त्या उंदराकडे बघ, त्यानं पिंजऱ्यातलं काही खाल्लंय?”रोहननं उठून काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं.कालपासून विकीला सगळ्यांनी दिलेला खाऊ पिंजऱ्यात तसाच पडून होता. विकी फास्ट रन पण काढत नव्हता. त्याच्या डोळ्यातली चमक पण नाहीशी झाली होती. रोहनला हे बघून खूप वाईट वाटलं. पुन्हा तो बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर आडवा झाला. रोहनच्या डोक्यावर, केसातून हात फिरवता फिरवता त्याला थोपटत बाबा म्हणाला,” बाळा, पिंजऱ्यात तो काहीच खाणार नाही. असाच मरून जाईल. त्याला कळलंय की आपण मृत्यूच्या सापळ्यात अडकलोय. जर आपण आता त्याला बाहेर सोडलं तर तो बाहेर पळून जाईल. ‘पेट’ म्हणून आपल्या घरात थांबणार नाही. एखादं मांजर किंवा कुत्रा त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकेल. किंवा तो आणखी कोणाच्यातरी घरी जाऊन उत्पात माजवेल.”बाबा त्याला आपण ‘पेट’का पाळत नाही याबद्दल बरेच काही सांगत होता.रोहन विचारात गुंतला होता, ‘बाबाच्या बोलण्यातलं काही आपल्याला समजतंय काही नाही, काही पटतंय काही नाही! पण बाबाचं असं प्रेमानं थोपटणं आपल्याला खूप छान वाटतंय’

पुन्हा रोहनच्या मनात शंका आली,” बाबा तू मला रागवू नकोस. मी तुला एक विचारतो. टीव्हीवर तर मिकी माऊस, पेटे का कोणीतरी ती कॅट… प्लूटो, गुफी डॉग्स सगळे एकत्र खेळतात. दंगा करतात. कॅट माऊसला नाही खात!.. मग ते सगळं खोटं असतं का? टॉम- जेरी, छोटा भीम काहीच खरं नाही ?”

 “हे बघ, आत्ता तुला ही सगळी कार्टून सिरीअल्स आवडतात. हो ना?… मग मनात काही शंका न आणता ती एन्जॉय कर. अरे हे फॅन्टसी मध्ये रमायचंच वय आहे बाळा. जसा जसा मोठा होत जाशील तसं तसं तुला सगळं आपोआप समजेल.” बाबाचं म्हणणं त्याला पटलं होतं. ‘म्हणजे आपण थोडे थोडे मोठे आणि स्ट्रॉंग होऊ लागलोय.’त्याच्या मनात विचार आला .

बाहेर पिंकी ताई आणि मित्र-मैत्रिणींचा गलका त्याला ऐकू आला. खेळायला बाहेर जाता जाता त्याला वाटलं,’ आपण आता थोडे थोडे बिग आणि स्ट्रॉंग झालोय.  मग आता सारखं रडायचं नाही. बाबाला हे सांगताना की बाबा तू विकीला जलस्नान का जलसमाधी जे काय ते देऊ शकतोस. त्यानं दोन्ही डोळे ताणून धरून डोळ्यातलं पाणी रोखलं.

…… पण विकीच्या पिंजऱ्याजवळ जाऊन ” बाय बाय विकी ! ” म्हणताना त्याच्या डोळ्यातून दुष्ट अश्रू गालावर ओघळलेच !…

— समाप्त — 

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ ☆

हाताची कोपरं बाल्कनीच्या कट्ट्यावर टेकवून दोन्ही हात गालाला लावून रोहन बाल्कनीत उभा होता. सोसायटीत शिरणाऱ्या प्रत्येक कारवर तो नजर ठेवून होता.’आज आधी बाबा येतो का आई?एक खूप छान बातमी त्यांना सांगायचीय आणि नेमका आज त्या दोघांना उशीर होतोय’… रोहनचं विचार चक्र चालू होतं. ‘यापेक्षा आपण कला ऑन्टी बरोबर पिंकी ताईला आणायला तिच्या डान्स क्लासला गेलो असतो तर खूप बरं झालं असतं’.. ऑन्टी त्याला सांगून सांगून थकली,अन् शेवटी एकटीच गेली.

इतक्या दूर पायी चालत जायचा त्याला कंटाळा आला होता. शिवाय पैसे पण जवळ नव्हते सहा लॉलीपॉप आणायला!… चार आपल्या चौघांना, एक कला ऑन्टीला आणि एक’ विकीला’. ‘तोआपल्याकडे आलाय तर वेलकम सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं.’ विचार करून कंटाळला तसा तो दरवाजा उघडून कॉरिडॉर मध्ये आला. मोहितच्या घरातून  अंकल ‘स्टेफीला’ फिरवून आणायला बाहेर पडले होते.”स्टेफीऽ स्टेफीऽ” रोहनने हाक मारली. कान टवकारून त्याच्याकडे बघून मान हलवत स्टेफी लिफ्ट कडे धावली.

कित्ती क्यूट आहे स्टेफी’ रोहन विचार करत होता. ‘सगळ्यांच्याच घरात एक ना एक ‘पेट’ आहे. डाॅगी तर खूप जणांच्याकडे आहेत. शिवाय मांजरे, बर्ड्स, फिश पण आहेत. शिवानीकडे तर गिनीपिग आहे, त्यांच्या टेरेस वरील मोठ्या टॅंक मध्ये कासव सुद्धा आहे. ऋषीकडे दोन ससे आहेत आणि मृणाल कडे मुंगुस !फक्त… फक्त आपल्याकडेच ‘पेट’ नाहीय. आईला कितीला सांगितलं नुसती हसते. म्हणते,” बघू या, पिंकी आणि तू जरा मोठे व्हा मग आणूया एखादा छानसा प्राणी.” बाबा तर हसत म्हणतो “आपल्या घरातच आहोत की आपण चार प्राणी!…. आणखी एकाची भर कशाला?… आपल्या घराला तू प्राणी संग्रहालय म्हण किंवा सर्कस!”… पण नाही, आज रोहन कडे सुद्धा एक छानसा, छोटासा प्राणी आलाय. दुपारची वेळ… कला ऑन्टी ने हाक मारली, “रोहन बाबा, जरा लवकर इकडे ये….हा बघ पिंजऱ्यात एक उंदीरआलाय.” रोहन धावत आला. “ओऽहोऽ हो!”… उंदीर बघून तो आनंदाने नाचायलाच लागला. पिंकी क्रीम बिस्कीट चे छोटे छोटे तुकडे करून पिंजऱ्यात टाकू लागली. दोघंजणं जाम खुष! “ताई तो कसा पिंजऱ्यात छान रन काढतोय बघ. आता आपण ह्याला सांभाळू. हाच आपला ‘ पेट’….आणि त्याचे नाव काय ठेवू या?”दोघेजण विचार करू लागली.”कास्मो, नाही तर बॉस्की” कसं आहे?” पिंकी म्हणाली. रोहननं नकारार्थी मान हलवली. “पिंकी ताई जसा मिकी माऊस असतो ना तसा हा विकी माऊस! विकी नाव छान आहे ना?” “हो रे, मस्तच!” पिंकी उद्गारली. तोपर्यंत त्यांच्या मित्र-मैत्रिणीचा घोळका घरात आला आणि पिंजऱ्या भोवती गोल करून उभा राहिला. “हाय कित्ती क्यूट!”… “त्याचे पाणीदार डोळे पाहिलेस?”…” आणि नजर बघ किती शार्प आहे.” ” सो नाईस!”…” सो एनर्जिक”… “कसा क्रिकेटर सारखा रन काढतोय बघ”… “यार तुमचा विकी आम्हाला फार आवडला.” सगळे मित्र-मैत्रिणी म्हणत होते. शेजारी राहणाऱ्या एक दोघांनी तर काहीतरी खाऊ आणून पिंजऱ्यात टाकला.

आई बाबा एकदमच घरी आले. दोघांना विकी माऊसची कथा इत्थंभूत सांगून झाली. “आपण आता विकीला पाळणार आहोत.बाबा बघ,आला की नाही आपल्याकडे पण एक पेट.” रोहनच्या तोंडाला खळ नव्हती. आई, बाबाला आपण कितीही सांगितलं तरी कमीच आहे असं त्याला वाटत होतं. शेवटी “विकी बाय”म्हणत तो खेळायला निघून गेला.

” काय वेडा मुलगा आहे. आता काय करायचं?” आई म्हणत होती. बघू या उद्या संध्याकाळी देऊन टाकू त्याला जलसमाधी.” बाबाचं हे बोलणं बॅट घेऊन जायला घरात आलेल्या रोहननं ऐकलं. त्या बिचार्‍या सहा वर्षाच्या चिमुरड्याला त्याचा अर्थही कळला नाही.      

“जलसमाधी म्हणजे काय रे ?” रोहनने एक थोड्या मोठ्या मित्राला विचारलं. “जल मीन्स वॉटर अँड समाधी मीन्स?…. आय डोन्ट नो!” तोउत्तरला. दुसरा एक जण विकीला बघून गेलेला, एकदम जोरात ठासून म्हणाला ,”अरे वेड्या, तुझे बाबा विकीला पाण्यात बुडवून मारणार आहेत.” 

“ओह् नो!”रोहन रडकुंडीला आला. धावत घरात आला.

“बाबा तू आपल्या विकीला मारणार आहेस? पाण्यात बु..ड.वू…न”…. हुंदके देत देत तो विचारू लागला.” हे बघ बेटा, तू अजून लहान आहेस. फक्त सहा वर्षाचा… काही गोष्टी तुला समजण्यासारख्या नाहीत. मी तुला उद्या समजावून सांगेन.” बाबा त्याची समजूत घालत होता.

रोहनचं रडणं आणखीनच वाढलं. “सारखं सारखं तू आणि आई मी काही विचारलं तर हेच म्हणता, तू अजून लहान आहेस, मोठा झालास की तुला आपोआप समजेल. कधी होणार मी मोठ्ठा?” विचारताना हुंदके आवरत नव्हते…. आणि परवा ते सतीश अंकल, तुझे दोस्त म्हणत होते, “कशाला तुला मोठं व्हायचय रे?  मोठेपणीची दुःखं,त्रास, कटकटी, जबाबदाऱ्या… हे भगवान !मोठेपण चांगलं नसतं बच्चू ,जर मला आता देव भेटला आणि त्याने मला वर मागायला सांगितलं ना, तर मी म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”

क्रमशः भाग पहिला 

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढवरा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ढवरा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला. “ – इथून पुढे) 

आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचेपर्यंत सुज्याच्या दारात जेवणाची पहिली पंगत बसली होती. सुजाच्या घरासमोर आणखी शे -दीडशे माणसं जेवणाच्या प्रतीक्षेत उभी होती. घराच्या उजव्या बाजूला चुलवानावर एक मोठं तपेलं ठेवलं होतं. त्यात बहुतेक मटण शिजवलं असावंकारण दोन माणसं त्याला भकाभका जाळ घालत होती.तर एकजण मोठ्या पळ्याने मटण बाजूच्या मोठया परातीत काढत होता. दोन जाणती माणसं मटणाच्या खड्याचे द्रोण अंदाजाने भरून देत होती.सुजाच्या घरासमोर 200 वॉटचा मोठा बल्ब लावला होता. त्याच्या उजेडात पंगत बसली होती. आम्ही पुढे जाताच आमच्या तोंडावर उजेड पडला ते पाहून मोठ्या मुलांनी, ” हितं नग, आपुन तिकडं चला, आडबाजूला,” असा इशारा केला. कारण उजेड सोडून थोडा अंधारात उभे राहणं त्यांनी पसंत केलं. त्यांनी तसं का केलं ते मला काही समजत नव्हतं त्यामुळे मी मात्र उजेडात उभा राहून माझा वर्गमित्र असलेल्या सुज्याला शोधत होतो…

 तेवढ्यात कुठून कसं काय माहित सुज्याने मला पाहिलं आणि धावत माझ्याकडं आला. “आयला इज्या (लहानपणी मला कोणी ‘ विजय ‘म्हणत नव्हते इज्या प्रेमाने माझ्या नावाचा केलेला  अपभ्रंशच प्रचलित होता)आलाच व्हयं?लय भारी वाटलं…!” मी म्हटलं, “व्हयं आम्ही समधी आलोय. कुठं हाईत बाकीची?”

 “ती काय तिकडं अंधारात उभी राहिल्यात समदी. त्यांनला लाज वाटतीय उजेडात उभं राह्यची.”

“बरं, बरं असूदे, चल, तुला आमची शेरडं दाखवतो.” असं म्हणत सुजाने माझ्या सदऱ्याला धरून मला ओढतच त्याच्या शेळयांच्या गोठ्याकडे नेलं. तिथं मला त्याने त्यांच्या आठ ते दहा शेळ्या आणि दोन-चार करडं दाखवली. त्याच्याकडं इतक्या शेळ्या अन त्याचं पत्र्याचं मोठं घर बघून तो खूप श्रीमंत असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे  मित्र म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटत होता…!

“सुजा, आयला लईच भारी वाटतंय इथं येऊन,”मी सुजाचा हात धरून म्हटलं.

तोपर्यंत इकडं पहिली पंगत जेवण करून उठली होती आणि दुसरी पंगत बसत होती. तेवढ्यात मला आमच्यातल्याच कुणीतरी हाताला धरून ओढत नेलं,”चल, जेवायला उशीर व्हाईल अंधार पडलाय रात व्हईल आपल्याला घरी जायला,” मोठा भाऊ मला म्हटला.

मी म्हटलं ” सुज्या, चल की आपण दोघं शेजारी बसून जेऊ. ” 

” व्हयं गड्या, मलाबी लय भूक लागलीया,”सुज्या उत्तरला.

पंगतीच्या शेवटच्या टोकाला सुज्या मग मी आणि मग एकेक करून आम्ही सगळे पंगतीत बसलो होतो. मोठी पोरं मला काहीतरी इशारा करत होती,” सुज्याला  नगं हित आपल्या शेजारी जेवायला बसवू. ” असं काहीतरी म्हणत होती पण मी म्हटलं, “मी सुज्या बरोबरच जेवणार…!  शाळेतबी आम्ही दोघं संगच जेवतो.”

माझ्या या हट्टा पायी पुढे काय घडणार याची मोठ्या मुलांना चाहूल लागत होती. आणि झालेही तसेच. कोणीतरी सुज्याच्या अन माझ्या तोंडावर अचानक बॅटरीचा उजेड मारला…!  मग बाकीच्यांच्या तोंडावर सुद्धा मारला. मोठ्या पोरांनी तेव्हा माना खाली घालून आपली तोंडे लपवली…

पत्रावळेवाला आम्हाला पत्रावळ्या वाढणार तेवढ्यात सुजाला त्या बॅटरीवाल्या इसमाने त्याच्या बखोटीला धरून फराफरा ओढत त्याच्या घराकडे नेलं….

त्यानंतर तावातवाने एक जण ओरडला, ” ये उठा, उठा, च्याआयला  पाहुण्यावाणी ऐटीत जेवायला बसलाय की सगळी? उठा बघू? व्हा  तिकडं?सगळे पाहुणे जेवून झाल्यावर तुम्हाला बोलावतो, “असे म्हणून त्या गृहस्थाने आम्हाला भर पंगतीतून उठवले….!  

तिथे एकच गोंधळ उडाला…! आरडाओरड, शिवीगाळ ऐकू येऊ लागली. 

हा काय प्रकार आहे? ते मला काही समजत नव्हतं आणि ते समजण्याचं माझं वय सुद्धा नव्हतं…!

सगळ्यांची जेवणं झाल्यावर शेवटच्या पंगतीला आपल्याला जेवायला मिळणार इतकंच काय ते मला मोठ्यांनी समाजावून दिलं.

पण आत्ता पंगतीतून उठवून आपल्याला शिव्या का घालतायेत  तेच मला कळत नव्हतं…! 

मोठी पोरं पण काहीच बोलत नव्हती कारण त्यांना या गोष्टींची  अगोदर पासूनच सवय होती.त्यांनी फारसं मनाला लावून घेतलं नव्हतं. कधी का असेना शेवटी जेवायला मिळण्याशी त्यांचा मतलब होता.

त्या वस्तीवर तिथे वडाची तीन मोठाली झाडे होती. तिथल्या एका मोठ्या वृक्षाच्या बुडक्यात आम्ही सगळे गोळा होऊन बसलो होतो. तीन वडांच्या झाडाचा तो सुंदर गुच्छा होता. कदाचित त्यामुळेच तर त्या वस्तीला  ‘वडाचामळा’ असे नाव पडले होते.

पुरुषांच्या दोन-तीन मोठ्या पंगती झाल्यावर मग महिलांच्याही दोन पंगती बसल्या होत्या. आमच्या पोटात तर कावळे ओरडत होते त्याही पेक्षा काळाकुट्ट अंधार पडल्याने आपण घरी कसे जाणार याची मला भीती वाटत होती. जेवायला आपला कधी नंबर येणार ते काहीच समजत नव्हतं…

अखेर सगळे जेवून झाल्यावर एका भल्या माणसाने आम्हाला आवाज दिला, ” ये पोरांनो? या जेवायला… ”  त्याच्या त्या हाकेने त्याही परिस्थितीत आम्हाला इतका आनंद झाला होता की काही विचारू नका…! 

आम्ही सगळे अक्षरशः धावत जाऊन एका ओळीत जेवायला बसलो. मग पत्रावळी आल्या,द्रोण आले…

पत्रावळ्यावर ज्वारीची भाकरीवाढली गेली. भाकरी कसली?सगळ्यात शेवटी आता फक्त भाकरीचे  तुकडेच उरले होते…! तेच वाढले होते.

मटणाचा रस्सा द्रोणात वाढला तो सुद्धा अगदी ढवळून निघालेला होता. कोणाच्यातरी द्रोणात शेळीच्या लेंढी एवढा मटणाचा खडा पडत होता. मग तो शेजारच्यांना खिजवायचा… पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. त्यांनी जे पानात वाढलं होतं तेच आम्हाला त्यावेळी पक्वानाहूनही अधिक प्रिय होते. पण काही असो, जे काही शिल्लक होते ते त्या भल्या माणसांनी आम्हाला अगदी भरपेट वाढले होते.

रस्सा म्हणजे कडान पिऊन आमची पोटे अगदी गच्च झाली होती. माझं लक्ष अधनंमधनं सुज्याच्या घराकडं जात होतं.  पण कशाचं काय?तो जो एकदाचा घरात गेला तो पुन्हा काही शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही… 

आम्ही जेवून उठलो घरचा रस्ता चालू लागलो. रस्त्याने काही दिसत नव्हते. खूप रात्र झाली होती. कुणी डोळ्यात बोट घातले तरी समोरचे काही दिसणार नव्हते इतका अंधार गुडूप तिथे झाला होता…

गावापासून लांब वस्ती असल्याने तिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या. 

पण आमचे म्होरके तयारीचे होते. ते अंधारातून नीट वाट काढत होते.

आम्ही जेवून परतताना अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील. आम्ही कोणाशी काही न बोलता अगदी गुपचूप चाललो होतो. तेवढ्यात इतका वेळ शांत झालेल्या स्पीकरचा आवाज अचानक कानावर आला… कुणीतरी माईकवर जोरात ओरडले, ” शेरडं घरात बांधा, लांडगे आलेत…! ”  बापरे…! लांडगे असा शब्द ऐकल्याबरोबर आमची एकच गाळण उडाली…! मी, भूषण, रवी आणि विकास आम्ही लहान होतो त्यामुळे लंडग्याच्या भीतीने आम्ही जोरजोराने रडू लागलो. त्यातच कुणीतरी ओरडलं, ” आज आमोशा हाय. मागं-पुढं भूतबी असत्याल नीट चला …!” मग काय आम्ही त्या रानात ठो ठो बोंब मारायचेच बाकी होते पण लगेच माझ्या भावाने त्या सगळ्यांना दरडावून आमच्या भोवती सगळ्यांनी कडं केलं आणि मग आम्ही लहान मुले त्यामधून चालू लागलो तेव्हा कुठे आम्हाला धीर आला. तरीपण भीती ही वाटतच होती. आम्ही भीतीने अक्षरशः थरथर कापत होतो…! तो प्रसंग आजही आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो…! 

आम्ही गावच्या ओढ्यात आलो तेव्हा सुद्धा, ” लांडगा आला…!  शेळ्या घरात बांधा..!”अशी अनाउन्समेंट स्पीकरवर चालूच होती.

आम्ही गावात शिरलो तोपर्यंत गाव मात्र सामसूम झाले होते…

जागी होती ती फक्त गावात रात्री पहारा देणारी मोकाट कुत्री…! 

आमची झुंड पाहताच ती  जोरजोराने भुंकू लागली. त्यातून कसेबसे बाहेर पडून आम्ही घरी पोहोचलो…

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर सुज्या म्हणाला, ” काय इज्या?हाणलं का मटण दाबून?”

मी म्हटलं, ” व्हयं गड्या,  निब्बार हाणलं लयं मज्जा आली …!” 

— समाप्त — 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढवरा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ढवरा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

त्यावेळी मी इयत्ता 3 रीत होतो. सुज्या आमच्या वर्गात होता. तो सगळ्यात लहान होता. दिसायला गोरापान लालभडक गाजरासारखा होता. त्याचे डोळे किंचित घारे होते. पण तो रडका होता. कोणी त्याची खोडी काढली की लगेच भोकाड पसरायचा. रडताना त्याचे गाल लालबुंद  व्हायचे. याशिवाय तो अतिशय भित्रा होता. त्यामुळे वर्गातली जवळपास सगळीच मुले त्याच्यावर आपला हात साफ करून घ्यायची. त्याच्या डोक्यावरची टोपी सतत वाकडी असायची. म्हणजे तो ती सरळ घालायचा परंतू येताजाता कोणी ना कोणी सुज्याच्या डोक्यावर टपली मारून त्याची टोपी वाकडी  होत असे.मग तो आणखीनच चिडिला जाऊन भोकाड पसरत असे.आमच्या वर्गात गुरुजींनी दहा -दहा मुलांचे गट पाडलेले असायचे. त्यांच्याकडे वेगवेगळी कामे सोपावली जायची. सुज्या माझ्या गटात होता. मी गट प्रमुख होतो. भूषण, आंध्या (आनंद), फरीद, परबती, पट्ट्या (सुनिल)ही सगळी आमची भित्री गँग होती. त्यातले त्यात मी थोडा डेअरिंगबाज असल्याने लीडर होतो. 

एके दिवशी दुपारी वर्गातली मधली सुट्टी झाली. आम्ही खाऊ आणायला शाळे शेजारीच असलेल्या दुकानात गेलो. माझ्याकडे पाच पैसे होते त्याची मी चिक्की घेतली. तेव्हा त्या पाच पैश्याच्या मला चिक्कीच्या छोटया छोटया पाच वड्या मिळाल्या…!  मी एक वडी तोडून तोंडात टाकली व दुसरी माझा जीवश्च कंठश्च मित्र भूषणला दिली. मग आंध्या पुढं येऊन म्हणाला, ” मलाबी दे की रं येक… मी कसा परवादिशी तुला पेरू दिला.” मी आठवू लागलो तेव्हा आठवले, सहा एक महिन्यापूर्वी कधीतरी आंध्याने ताराबाईकडून एक पेरू विकत घेतला होता. त्यावेळी आम्ही सगळे त्याच्या तोंडाकडे पहात होतो परंतू तो मात्र मोठया साहेबांच्या ऐटीत पेरू कडाकडा फोडून खात होता. त्याच्याकडे पाहून आमच्या तोंडातून अक्षराशः लाळ टपकायला लागल्यावर मग त्याने त्यातली एक फोड आम्हा पाच जणात वाटून दिली होती. त्यातला 5 वा खारट मिट्ट झालेला तुकडा माझ्या वाट्याला आला होता. तो ही मी मोठया आनंदाने चाटून खाल्ला होता. ते आठवून मी आंध्याला माझी एक चिक्कीची वडी दिली. मग फरीद आणि सुज्या अशी त्याची वाटणी झाली… त्यावेळी पैसा फार नव्हता परंतू आनंद मात्र उदंड होता. विशेषता: तो सहजीवनात अधिक वाटला जायचा. त्या कोवळ्या निरागस वयात सुद्धा आम्हाला एकमेकांची मने कळत होती आणि जपता सुद्धा येत होती हे त्यातले विशेष होते. त्या तेवढ्याश्या शिदोरीवर त्यातल्या अनेक मित्रांशी आजही माझी मैत्री घट्ट टिकून आहे.

माझ्याकडून चिक्कीचा एक तुकडा मिळाल्यामुळे सुज्या माझ्यावर जाम खुश झाला. चिक्कीचा तुकडा चघळतच तो म्हणाला, ” दोस्तांनो, तुमाला एक जम्मड सांगतो. ” 

मी म्हटलं, ” काय? “

आंध्या म्हटला, ” सांग की लका. “

” आज ना आमच्या घरी ढवरा हाय, समद्यानी जेवायला या.” ढवरा हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकल्याने म्हटले, ” सुज्या ढवरा मजी काय रं? ” 

तो म्हटला, ” मला पण माहित न्हाय पण आमच्या घरी सगळ्या गावाला मटान जेवायला हाय एवढं माहीत हाय. चार दिवस झालं आमच्या दादांनी दोन बोकडं खास ढवऱ्यासाठी घरात आणून ठेवल्याती,तुमी या जेवायला सगळी. उशीर करू नगा.” मटण म्हटल्यावर मी जिभल्या चाटायला लागलो. म्हटलो, ” व्हयं सुज्या येतो आम्ही तुझ्या घरी समदी. ” 

” मला न्हाय जमणार मला बकऱ्याकडं झोपाय जावं लागतंय, तुमी जावा बाकीची. ” असं म्हणत आंध्यानं पहिली नकार घंटा वाजवली…

पाठोपाठ फरीद म्हटला, ” आमच्या घरी तर रोजच मटान असतं खाऊन कटाळा येतो मला, मी न्हाय येत.” 

मग राहता राहिलो मी आणि भूषणच. मी खेदाने म्हटले, ” सुज्या आरं, आमाला बारक्या पोरांना कोण पाठवतंय रातचं जेवायला?मंग कसं येऊ? मला तर काईच कळंना?”

” आता बघा तुमचं तुमी. ” असं म्हणत सुज्या वर्गात पळाला. 

वर्गात गेल्यावर माझं गुरुजींच्या शिकवण्याकडं काही केल्या लक्ष लागेना. मी एकासारखा फक्त सुज्याकडं पहात होतो. त्याच्या निमंत्रणाचं काय करायचं?हा एकच विचार राहूनराहून माझ्या डोक्यात घोळत होता….

अखेर मी सुज्याला पाठीमागून त्याच्या पाठीत ढोसून म्हटलं, ” आयला सुज्या, कसं काय करायचं? मला तर लयं मटान खाव वाटतंय. “

त्यो म्हणला, ” ये की मंग लेका.” 

” येतो की पण कुणाबरं येऊ? “

” ये की तुमच्या वाड्यातली म्होटी पोरं घिऊन.”

” आयला सुज्या, लयभारी माझ्या तर लक्षातच येत नव्हतं, काय करावं त्ये.तू लयभारी आयड्या दिलीच! ” 

” पण सुज्या,  तुझ्या घरची काय म्हणणार न्हाईत ना? आमाला सगळ्यांनला जेवाय वाढत्याल ना? ” 

” मंग? तुला काय वाटलं? मी हाय की! तू माझा मैतर म्हणल्याव कोण काय म्हणलं… “

” बरं येतु. “

” सुजाच्या घरी मटण खायला जाण्याच्या नादात दुपारापासून गुरुजींनी वर्गात काय शिकवलं त्यातलं मला काहीच कळलं नव्हतं… पाच वाजता शाळेची घंटा टण टण वाजल्यावरच मी भानावर आलो…! शाळा सुटल्यावर घरी जाता जाता मोठ्या पोरांना ही आनंद वार्ता सांगितली…! ते सगळे तयारच होते. 

अंधार पडायला लागल्यावर तिन्ही संजेला आई कामावरनं घरी आली. मी तिला धावत जाऊन मिठी मारून म्हटले, ” आई मी मटान जेवायला जाऊ का? “

” कुटं? ” 

“वडाच्या मळ्यात, सुज्याच्या घरी, त्यानं मला बोलावलंय.” मी एका हातानं चड्डी ओढत आईला एकादमात सगळं सांगितलं… “

” अगं बया! इतक्या लांब अन रातचं? नगं माझ्या राज्या… ” 

” आई, सगळी पोरं निघाल्यात…”

” मंग जा.”

संध्याकाळ झाली तशी सगळ्या पोरांची जमवाजमव झाली. प्रमोद, रवी, संदिप, भाऊ, माझा मोठा भाऊ राजेंद्र, चंदर नाना,राज्या,प्रल्हादनाना असे करताकरता दहा पंधरा जणांचा मेळा जमला. 

” ईज्या नक्की ढवरा हाय ना? ” माझ्या मोठया भावाने मला दरडावून विचारलं. 

” व्हयं, सुज्यानं मला दुपारीच सांगितलंय, घरी दोन बोकडं पण आणून ठिवल्यात असं त्यो म्हणत होता. 

” मंग चला… ” 

मोठा भाऊ आमच्या टोळक्याचा प्रमुख होता. त्यानं इशारा केला तशी सगळी पोरं वडाच्यामळ्याच्या दिशेने रस्ता चालू लागली.

गावापासून वडाचा मळा साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटर होता. पण मटण खायाच्या ओढीने सगळे खुशीत झपाझप पावले टाकीत चाललो होतो…

आमचा मोर्चा गावचा ओढा ओलांडून म्हस्कोबा मंदिराच्या पुढे निघाल्यावर लांबवर माईकचा आवाज येऊ लागला तसा आम्हाला धीर आला. त्यावेळी गावात कुठलेही कार्य असेल की तिथे स्पीकर वाजायचा. कार्यक्रम नियोजित ठिकाणी असल्याची ती एक खूणच होती.

आम्ही कार्यक्रम स्थळाच्या अर्धा किलोमीटर जवळपास आलो तेव्हा माईकवर सूचना चालू होती, ” देव -देव झालेला आहे.तरी, आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला. 

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक बोधकथा : आनंद चेंडू… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ एक बोधकथा : आनंद चेंडू ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक खूप गरीब माणूस… त्याचे नाव नारायण. शेतकरीच होता. अखंड काळ्या आईची सेवा करण्यात गुंतलेला. पण कोणत्याही वेळी त्याच्याकडे पहा.. कायम हसतमुख. सगळ्यांच्या मदतीला धावणारा, सगळ्यांना आपला सहारा देणारा. त्याच्या सान्नीध्यात जो कोणी येईल त्याला दिलासा वाटायचा. एक अनामिक सुख मिळायचे.

सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटायचे. कसा काय हा माणूस नेहमी आनंदी असतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडायचा. त्याच्यावर कितीही संकटे येऊ देत, कितीही अडचणी येऊन ही  हसतच त्यावर मात करायचा.

शेवटी न रहावून त्यालाच हा प्रश्न विचारून याचे रहस्य जाणून घेऊया ठरले.

एक दिवस गावामध्ये मोठी जत्रा होती. त्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऐनवेळेस एका कार्यक्रमाचे सादरकर्ते येऊ शकत नसल्याचे कळवले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आयोजक नाराज झाले. त्यांना खूप वाईट वाटून दु:ख झाले.

पण नारायण होतं असं कधी कधी त्यात कशाला वाईट वाटून घ्यायचे म्हणाला… नेहमी प्रमाणे हसरा चेहरा ठेवला… आणि जाऊ दे बाकी जत्रा बघायला मिळतेय ना? त्या निमित्ताने जास्त वेळही मिळतोय या समाधानाने तो आनंदी झाला व तेथून जाऊ लागला.

तेवढ्यात आयोजकांनी त्याच्याच मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याला स्टेजवर बोलावले.

प्रश्न पहिला :- तुमचा व्यवसाय कोणता आणि त्यातील समस्या काय काय आहेत?

नारायण :- व्यवसाय म्हणजे फायदा तोटा आला. म्हणून मी शेती करत असलो तरी त्याला माझा व्यवसाय मानत नाही. काळ्या आईची सेवा करणं असं मी मानतो. त्यामुळे आईच्या सेवेतून फायदा मी बघतच नाही तर त्यातून मिळणारे फळ असे मी मानतो आणि मग आईने दिलेले फळ जसे आपल्या आईने केलेले जेवण कोणी एकटा नाही खात तर सगळे मिळून खातो तसे सगळ्या बांधवाना ते देण्याचा प्रयत्न करतो. यामधे मला मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकलो याचे समाधान मिळते आणि मी आनंदी होतो.

यातील समस्या म्हणजे पाऊस वेळेवर पडत नाही पडलाच तर योग्य प्रमाणात पडत नाही, त्यातूनही चांगले पीक मिळाले तरी अडते, दलाल योग्य भाव देत नाहीत, वेळेवर वाहनेही उपलब्ध होतं नाहीत.अशा अनेक सांगता येतील…

प्रश्न दुसरा :- तरीही तुम्ही कसे समाधानी रहाता?

नारायण :- मी अशावेळी जगाकडे पहातो, माझ्यापेक्षा जास्त अडचणी असलेल्या लोकांकडे बघतो आणि यातूनही आशावाद अंगी घेऊन सतत काही चांगलं होणार आहे असे मनाला समजावतो. त्यामुळे मला मी दुसऱ्यांपेक्षा जास्त बरा आहे ही जाणीव होते आणि मी आनंदी होतो. जे होते ते चांगल्यासाठीच ही धारणा ठेऊन आता काहीतरी चांगले घडणार आहे हे जाणून त्या चांगल्याच्या स्वागतासाठी मी आनंदी होतो.जगाकडे पाहिल्यावर आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळणार आहे आणि त्यातून मिळणारे ज्ञान हे प्रगतीसाठी उपयोगी ठरणार असल्याने प्रगतीचित्र डोळ्यापुढे आणून मी आनंदी होतो.

प्रश्न तिसरा :- तरी पण जे भल्या भल्याना जमत नाही ते तुम्ही कसे जमवता? काय आहे याचे रहस्य?

नारायण :- रहस्य तर काहीच नाहीये. हे एक सोपे तंत्र आहे. मी दुःख झाल्याचे तोटे जाणतो म्हणून मी सतत मनाला दुःखी न होण्याची करणे सांगत असतो. त्यामुळे मन दुःखी होतं नाही, पर्यायाने आनंदी होते.

दुसरे असे की आनंदाच्या मागे लागायचे नाही असे ठरवल्याने आनंद पुढे पळतोय आपल्या हाती लागतं नाही हे दुःख होतं नाही. दुसरे आनंदी बघितले की ते आनंदी राहू शकतात मग आपण का नाही असे मनाला सांगितले की मन निदान आनंदी रहायच्या प्रयत्नाच्या नादात नकळत आनंदी होते. किंवा कोणी दुःखी दिसला तर आपल्याला ते दुःख नाही ना या विचाराने आनंद मिळतो आणि दुःखीतांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करून जर त्याचे दुःख हलके केले तर त्या समाधानाने पण आनंदी रहाते.

तिसरे आणि महत्वाचे म्हणजे आनंद कोणती वस्तू नाही की ती मिळवायला पाहिजे. ती एक शाश्वत गोष्ट आहे जी स्वतःमधे असते याची कायम जाणीव ठेवली पाहिजे आणि आनंद कोणत्याही गोष्टीत नसून तो आपल्या दृष्टीत असला तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद दिसेल. मग आपोआप आनंद मिळेल.

आपण जेवढे जे देऊ त्याच्या कैक पटीने ते आपल्याकडे चेंडू जमिनीवर आपटल्यावर अधिक उसळून परत आपल्याकडे येतो तसा दुसऱ्यांना दिलेला आनंद परत आपल्याकडे येतो मग परत हाच आनंद आपण दुसरीकडे पाठवला तर तेथूनही हा आनंद चेंडू परत आपल्याकडे येतो आणि या आनंद चेंडूच्या टप्प्याचा आनंदही आपल्याला मिळून एक चिरंतन निरंतर आनंद अनुभव आपण घेऊ लागतो.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? जीवनरंग ?

सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

सेवानिवृत्त्त वरिष्ठ आभियंता,जीवनप्राधिकरण विभाग,अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली वार्ता सर्वत्र राज्यभर पसरली खरी. परंतु पोलीस तपास हेरखाते चौकशीत रात्री कुठून तरी चार फोन आलेले मोबाईलवरती आढळले. सदरील नंबरवर साईबरकडून हार्डवेअर सिस्टीम आॕडिओ काॕलींग ओपन करुन पाहिले तर एकच संदेश वेगवेगळ्या चार व्यक्तींनी केलेले ऐकविणेत आले.

“ हॕलो साहेब,तुमच्यावर दोन कोटी जलपुरवठा खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप असून सकाळी अटक सत्रासाठी आमचे हेरपथक येणार असून आपण मानसिकदृष्ट्या संतुलनाने सज्ज रहावे.”

रात्री ठिकः १२ः०५ ,१२ःः०७,१२ः०९व १२ः११.या वेळेत झालेले फोन आढळले.

व आत्महत्या पहाटे ४ः५४ च्या सुमारास झालेले तपासात निषपन्न झाले.

मात्र दुसऱ्या  दिवशी अधिकाऱ्यांचा वाढदिवस होता व त्यांना “महाराष्ट्र राज्य प्राधिकरण उत्कृष्ठ जीवन सेवा” हा विशेष सन्मानार्थ प्रशासकिय पुरस्कार जाहिर झालेली बातमी सर्व मिडीया प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.

चौघांना ताब्यात घेतले असता आॕफिस स्टाफ मित्रवर्गाने वाढदिवस व पुरस्कार बातमी आश्चर्याचा आनंदी हेतूने थट्टा  केल्याचा एकच रिपोर्ट चारी मित्रांकडून आला.

परंतु फोनवरील थट्टेने एका सेवाशील अधिकाऱ्याला पुरस्कार सन्मानास जीवंतपणी पहाता न आलेचे दुःख सर्व जि.प .व प.स. पासून सर्व प्रशासकिय खात्यास लपवता आले नाही. शोकांजलीकरिता तीन दिवस सुट्टी प्राधिकरण खात्यास जाहिर झाले.

१५ आॕगष्ट रोजी हा पुरस्कार सन्मान त्यांचे पश्चात श्रीमती पत्नीस अर्पण करणेत आला.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन बोधकथा : प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ दोन बोधकथा – प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(१) प्रयत्नांती परमेश्वर…

अजय विजय दोघे मित्र. अभ्यासात खेळात अतिशय हुशार. दोघे मोठे झाल्यावर चांगले नाव कमावतील अशी सगळ्यांना खात्री. दहावी 90 टक्केपेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झाले. दोघांनीही सायन्स निवडले.

परंतु 10 वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या दोघांनाही ते अवघड वाटू लागले. अजय प्रयत्नवादी असल्याने आजपर्यंतची घोकंपट्टी करून अभ्यास करायची पद्धत त्याने सोडून समजून घेऊन मग स्व अध्यनाची सवय लावून जिद्दीने आपल्या शिक्षण पूर्तीकडे पावले टाकू लागला.

विजय मात्र अवघड आहे… कसे जमणार… समजत नाहीये… अशी कारणे सांगून पहिल्या काही महिन्यातच त्याने शाखाच बदलून कॉमर्स निवडले आणि पुढील शिक्षण सुरु केले.तेथेही अकाउंट्स अवघड वाटल्याने क्लासला जाऊन तो बीकॉम झाला.

अजयही बी एस सी झाला. आवडू लागल्याने पुढे इंजिनिअर झाला. Ms करण्यासाठी परदेशात गेला.नोकरी करत शिक्षण  करत Ms पण पूर्ण केले आणि गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी पण लागली.

विजय मात्र बीकॉम नंतर ca करावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करू लागला. पण अवघड… जमेना… दिले सोडून. Mba साठी ऍडमिशन घेतली पण तेही जमेना… लॉ करावे वाटून तेही प्रयत्न केले पण ते सुद्धा जमले नाही.

शेवट खूप खटाटोप करून कोणाच्या तरी वशिल्याने एका खाजगी कंपनीत चिकटला एकदाचा. पण पगार कमी म्हणून जेमतेम महिनाखर्च भागवून जीवन जगू लागला.

गावातले सगळे आश्चर्य चकितच झाले. असे कसे झाले? का झाले? दोघेही बुद्धिमान समजत असताना एकावर अशी परिस्थिती का आली?

गावातली एक आजी म्हणाली पडलो झडलो तरी चालेल पण प्रयत्न कधीच सोडले नाही पाहिजेत. ओल्या झाडावर चढू पहाणारे माकड चार फूट वर गेले तर तीन फूट खाली येते. परत प्रयत्न केला तर तसाच अनुभव येऊनही ते दोन फूट वर पोहोचलेले असते. असेच प्रयत्न चालू ठेवले तरच ते शेंड्यावर पोहोचू शकते.

किंवा दह्यात पडलेल्या बेडका प्रमाणे जो प्रयत्न सोडतो तो दह्यात बुडून मरतो पण जो प्रयत्न करत रहातो तो दह्याचे ताक करून त्यावर निर्माण झालेल्या लोण्यावर उभे राहून उडी मारून बाहेर पडून स्वतःची सुटका करू शकतो.

येथे अजयने प्रयत्न सोडले नाहीत. अपार कष्ट घेतले त्याचे फळ म्हणून त्याचे चांगले झाले. तर विजयने प्रयत्नच सोडले दुसरा मार्ग निवडला त्या मार्गावर पण अडचणी येताच जाऊदे म्हणून सोडून देत गेला परिणामी तो त्याच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला. त्याचे वाईट काही झाले नाही असे म्हटले तरी फार प्रगती झाली नाही ध्येयापासून भरकटला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही.

म्हणूनच कोणी कधीच प्रयत्न करणे सोडू नये. त्यामुळे नकळत का होईना थोडी थोडी प्रगती होत असते हे निश्चित. मग ध्येय साध्य होणारच. कितीही झाले तरी प्रयत्नांती परमेश्वर हे खरेच.

(२) करावे तसे भरावे…

राहुल आणि सचिन दोघे जिवलग मित्र. दोघांनाही एक एकच मुलगा. सारख्याच वयाचे. राहुल आणि त्याची बायको रागिणी दोघेही चांगल्या कंपनीत नोकरीला. त्यामुळे त्यांचा मुलगा रोहन लहानपनापासून पाळणाघरात राहिला. अगदी पहिली पासूनच त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये घातले. अगदी अद्ययावत सुविधा त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे खूप चांगले शिक्षण त्याने घेतले पण पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आणि आपल्या आवडीच्या मुलीशी विवाह करून तेथेच स्थायिक झाला.

सचिन पण चांगल्या हुद्द्यावर चांगल्या कंपनीत कामाला. त्याची बायको सुप्रिया पण सुशिक्षित चांगल्या नोकरीत होती. पण मुलगा सर्वेशच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली. काही दिवस ती घरीच होती. मग सर्वेश शाळेत जाऊ लागला आणि तिने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती घर तर सांभाळू शकत होतीच पण सर्वेशकडे लक्ष देतादेता आता अर्थार्जनही करू शकत होती.

सर्वेशही इंजिनियर होऊन अनेक छोटे मोठे कोर्सेस करून त्याने आधी काही वर्ष नोकरी करून स्वतःची इंडस्ट्री उभी केली. आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी विवाह केला. ती पण त्याला व्यवसायात मदत करत होती.

अगदी दोन्ही मित्रांचे सगळेच उत्तम चालले होते.राहुल सचिन दोघेही रिटायर्ड झाले होते. राहुल रागिणीला मुलाबद्दल खूप अभिमान होता. पण रिटायर्ड झाल्यानंतर काही दिवस ते परदेशात जाऊन राहूनही आले पण परत आल्यावर त्यांना एकटेपण जाणवू लागले. मुलगा आपल्यापाशी नाही ही खंत सतावू लागली. रोहनला त्यांनी भारतात परत ये म्हणून सांगितले पण त्याने नकार दिला.

परंतु सचिन सुप्रिया अगदी समाधानाचे आनंदाचे जीवन जगत होते. नातवंडा बरोबर रमत होते. सर्वेश आई बाबांकडे विशेष लक्ष देत होता काळजी घेत होता.

राहुलला सचिनचा हेवा वाटू लागला. उगीचच मनात तणाव वाढून मैत्रीत अंतर पडू लागले.

काही दिवसात रागिणी देवाघरी गेली आणि राहुल याहूनच एकटा पडला. एकाकीपण खायला उठले तेव्हा रोहन काही दिवसांसाठी आला. त्याने राहुलला परदेशात या म्हटले पण राहुल तयार नसल्याने त्याने निर्विकारपने राहुलची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आणि तो परदेशात जायला निघाला तेव्हा राहुल म्हटला नको रे रोहन मला असे येथे सोडून जाऊ. रोहन लगेच म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या सोयीसाठी मला पाळणाघरात ठेवले होतेच की. नंतरही तुमच्या पार्ट्या, नोकऱ्या याच्या आड मी येऊ नये म्हणून मला बोर्डिंगमध्ये ठेवलेच होते की. मग मी माझ्या सोयीसाठी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं तर कुठं बिघडलं?

नाईलाजाने राहुल वृद्धाश्रमात राहू लागला.

सचिन पण वयानुसार अशक्त झाला होता. पडल्याचे निमित्त होऊन त्याचे दोन्ही पाय अधू झाले होते. पण सर्वेश रोज रात्री सचिनची सेवा करायचा सुट्टीच्या दिवशी महिन्यातून दोनदा तरी पाटकुली घेऊन बाहेर नेऊन आणत होता.एकदा राहुलला भेटायला सुद्धा घेऊन गेला . सर्वेश सगळे आनंदाने करत असल्याचे पाहून राहुलने विचारले तू कसे हे करतोस? तेव्हा सर्वेश म्हणाला मी लहान असताना बाबांनी नाही का मला शी शू साठी नेले? साफही केले? मला पाठकुली घेऊन इकडे तिकडे फिरवले? अगदी माझ्या मुलासाठी पण केले. मग आता मी तेच त्यांच्यासाठी केले तर कुठे बिघडलं?

सचिन राहुलला भेटून गेला आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातली मोठी चूक समजली. न कळतं तो बोलून गेला करावं तसं भरावं हेच खरं…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शीरखुर्मा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.)  – इथून पुढे —- 

आडबाजूला भिंतीला टेकून बाळूभाई च्या दारात आम्ही दोघे उभे राहिलो. बाळूभाईंच्या घरातून येणाऱ्या जाणाऱ्याला निरखून पाहू लागलो.पण आमच्याकडे कुणी पाहत नव्हते. तर कुणी पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते.

पाच मिनिटे आमचा हा असा कार्यक्रम चालू होता. एका क्षणी अचानक तीन-चार लोक बाळू भाईंच्यासोबत घरातून शीरखुर्मा पिऊन बाहेर पडले. त्यांना पाहून आम्ही आमची तोंडे बाजूला केली. ते लोक बाहेर जाताच आम्ही पटकन उडी मारून दरवाजात गेलो.  बाळू भाईंची  एक पोरगी चांद समोरच होती. ती आम्हाला, ” या ” म्हणाली त्यात्याबरोबर आम्ही समोर बसायला टाकलेल्या पोत्यावर दोघे अगदी ऐटीत जाऊन बसलो…!  योगायोगाने त्यावेळी आमच्या दोघांच्या अंगावर नवे नसले तरी थोडेफार बरे कपडे होते.

घरातून चांदची आई म्हणजेच भाभी बाहेर आल्या. आम्हाला पाहून त्यांनी विचारले, ” कुणाचे रे तुम्ही?”

बिचकत मी म्हटले, ” जानरावदादाचा. “

मी घाई घाईत आडनाव न सांगता फक्त माझ्या वडिलांचेच नाव सांगितले. ते एकूण भाभी म्हणाल्या बापूंचे व्हयं! बसा, बसा. मी आलेच शीरखुर्मा घेऊन… आणि मग काय वातावरण एकदमच बदललं…आम्ही जाम खुश झालो. थोड्याचवेळात भाभी पटकन दोन वाट्या शीरखुर्मा आणि बशीत पाच सहा चोंगे घेऊन बाहेर आल्या. आमच्या पुढे ते ठेवत म्हणाल्या, ” खावा.” आम्ही चमच्याने शिरखुर्मा खाऊ लागलो. हा हा हा… काय काय तो गोडवा! अगदी अमृतासमान होतं ते पक्वान आमच्यासाठी. भजासारखे गोल गोल दिसणारे ते चोंगे तर फारच गुलगुलीत होते. आम्ही एका वेळी ते दोन-दोन चोंगे  आमच्या दोन्ही गालातून कोंबत होतो. शीरखुर्मा तर तोंडाला वाटी लावूनच पीत होतो.

” थांबा दमानं प्या, अजून थोडं आणते मी, ” भाभी म्हणाल्या आणि चक्क त्यांनी लगेचच आम्हाला अजून एकेक चमचा शिरखुर्मा वाढला, प्रत्येकी दोन सोंग सुद्धा वाढले.

हासगळा चमत्कार कसा काय होत होता…! मलातर काहीच कळेत नव्हतं….  खरं सांगायचं तर तेवढा विचार करण्याचं ते माझं वय सुद्धा नव्हतं आणि ती वेळ सुद्धा नव्हती…

तेवढ्यात ”  बापू कसे आहेत? ” भाभींनी मला विचारले. तसे मी मानेनेच हो म्हटले. पण खरे तर त्यांचा प्रश्न ऐकून मला गांगरल्यासारखे झाले होते. कारण  बापू म्हणजे  ‘जानराव बापू’ ते गावातले सवर्ण जातीतले एक प्रतिष्ठित गृहस्थ होते ते गावचे माजी सरपंच होते.त्या उलट आमचे वडील म्हणजे नावाचेच जानराव,अत्यंत गरीब शेतमजूर. त्यांना सगळे नावानेच हाक मारायचे. केवळ आम्ही घरातलेच त्यांना आवडीने दादा म्हणायचो इतकेच. 

आपल्याला समजून घेण्यात  भाभींची काहीतरी गफलत झाली आहे ते माझ्या लगेच लक्षात आले होते. पण चला वडिलांच्या नावाचा आपल्याला काहीना काहीतरी फायदा होतोय ते माझ्या लक्षात येत होते. भाभी आणखी काही बोलणार आणि आपला पचका होणार त्यामुळे आम्ही चड्डीला हात पुसून घरातून तात्काळ पळ काढला…! आणि सरळ मशिदीच्या मागून चौकात आलो तिथे अजय आणि दादण्या भेटले. अजयने आम्हाला विचारले ” मिळाला का रे शीरखुर्मा तुमाला ?” 

” आरं, लई पोटभर खाल्ला “,मी म्हटले.

” आयला आम्हाला काहीच न्हाय मिळालं…! “,तो केविलवाणी तोंड करून म्हणाला. त्या दोघांच्याकडे पाहून मला खूपच वाईट वाटलं थोडा विचार करून मी म्हटलं,” चला माझ्याबरोबर. ” 

“कुठं” 

“बाळूभाईच्या घरी,शीरखुर्मा खायला.”

मग काय ते हरखलेच की!

मी पुढं आणि माझ्यामागे ते दोघं आणि त्यांच्या मागे भूषण येऊ लागला.

मी बाळू भाईंच्या घरात हळूच डोकवलं. त्यांच्या दुसऱ्या पोरीनं भाभींना  खुणावले, “मगाशी आये हुये वो लडकी पुनिंदा आये है.” 

” या….या आत या “,  भाभींनी मला पाहताच आत बोलावलं. 

” आमचे दोस्त हाईत त्यांना बी खायचंय हे… ” मी सांगितलं.

” बसा, बसा मी शीरखुर्मा आणते… ” असं म्हणून भाभी आत गेल्या. 

आम्ही चौघे एका ओळीत बसलो मी सगळ्यांना नीट बसवण्याचं काम करत होतो.

भाभींनी शीरखुर्मा देताच अजय व दादण्या हे दोघे शीरखुर्मा पिऊ लागले. “कुणाबरोबर आला वस्तीवरून?” भाभींनी मला प्रश्न केला. 

” आम्ही दोघे चालत आलो. ” भूषणकडे बोट दाखवत  मी म्हणालो.

“बापू आल्यात का?” 

” व्हयं आल्यात तिकडं गावात “, मी भाभींच्या प्रश्नाला कशीबशी वाकडीतिकडी उत्तरं देत होतो.

खरे तर मी या दोघांच्या वाट्या लवकर संपण्याची वाट बघत होतो.परंतू शीरखुर्मा गरम असल्यामुळे त्यांनाही तो भरभर पिता येत नव्हता. मी भूषणला इशारा केला. आम्ही दोघांनी बशीतला एकेक चोंगा घेत बशी मोकळी केली.तसा  ” ये माझं भाजं दे…! ” दादण्या जोरात ओरडला. 

” ये गप उठ, बास झालं… ” मी म्हणालो. 

तेवढ्यात भाभी म्हणाल्या, ” थांबा,थांबा अजून देते चोंगे पण भांडू नका.”

त्या बशी घेऊन चोंगे आणायला गेल्या तोपर्यंत आम्ही सगळे त्यांच्या घरातून फरार झालो.

आम्ही चौघे खुशीत पिपरणीच्या झाडाखाली आलो तिथे खेळू लागलो. तेवढ्यात तिकडून विकास आला.

” काय रे,  खाल्लास का शीरखुर्मा? ” दादण्यानं त्याला विचारलं. 

” न्हाय रं… मला कुणीच नेलं न्हाय शीरखुर्मा खायला. ” विकास नाराजीनं म्हणाला.

” आरं मग जा की ह्यांच्याबरोबर बाळूभाईच्या घरी.आरं लय मज्जा हाय नुसती. “दादण्या पुढे म्हणाला.

“काय लेका मला काहीच मिळालं नाही ,  मला घेऊन चला की तिकडं,”  विकास विनंती करू लागला.

थोडा विचार करून मी म्हटलं, ” चला ” मग सगळेच बाळूभाईच्या घराकडे निघालो. तशी ती दोघं मागे सरकली.

विकासला घेऊन मी बाळूभाईच्या घरी गेलो. तिथे पुन्हा तेच आम्हाला पाहताच बाळूभाईच्या दुसऱ्या मुलीने आपल्या आईला खूणवलं. आता मी थेट घरात शिरलो आणि विकास कडं बोट करून म्हणालो, ” ह्यो एकटाच राहिलाय त्याला लय भूक लागलीय.”

” बरं, बरं असुद्या या…या… बसा म्हणत बाबींनी तिसऱ्यांदा माझं स्वागत केलं.

आम्ही दोघे ऐटीत बसलो. भाभी शिरखुर्माची एक वाटी आणि चोंग्याची बशी घेऊन आल्या. वाटी खाली ठेवताच विकास ने एक भुरखा मारला. अन तेवढ्यात बाळूभाई घाईघाने घरात आले.आल्याबरोबर त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघे टरकलोच…! आम्ही दोघे पळण्याची गडबड करू लागलो. मी बशीतले दोन चोंगे हातात घेतले.

“अहो,जानराव बापूंची मुले आहेत “, भाभी म्हणाल्या.

” कोण? ही? ” भाई आमच्याकडे पाहून उत्तरले.

ते ऐकून मी तर गारठलोच…! आता आपली काही धडगत नाही. मी विकासला खूणवलं, उठण्याविषयी मी त्याला डिवचू लागलो पण तो काही केल्या वाटी सोडेना.

त्याचवेळी बाळूभाई भाभींच्या कानाला कान लावून माझी खरी ओळख सांगून लागले. माझ्या ते लक्षात आल्यावर मी उठून सरळ बाहेर पळू लागलो. माझ्यामागे चड्डी धरून विकासही बाहेर पडला….घारघाईत बाहेर पडताना अर्धी वाटी शिरखुर्मा त्याच्या अंगावर सांडला होता. त्याचे ओघळ त्याच्या गोलाकार ढेरीवरून सरळ खाली ओघाळत होते…

एका दमात पळत आम्ही वाड्यात येऊन चावडीत धापा टाकत दाखल झालो. माझ्या हातातल्या दोन चोंग्याचा  त्यावेळी पार भुगा झाला होता…. 

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

शीरखुर्मा  हे एक वर्षातून एकदाच मिळणारे दुर्मिळ असे पक्वान ! रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी मोठा उत्सव असतो त्यांच्या आनंदाला त्यादिवशी उधान असते. त्यादिवशी मुस्लिम बांधव आपल्या सर्व नातेवाईकांना,शेजाऱ्यांना, प्रतिष्ठित, निमंत्रित, मित्रपरिवार, जमातवाले इत्यादी सर्वांना अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने आपल्या घरी बोलावतात आणि शीरखुर्मा खाऊ घालतात.

त्यादिवशी शीरखुर्मा हे जगातले सगळ्यात मोठे पक्वान असते. ती केवळ एक शिरखुर्माची वाटी नसते… तर ती वाटी असते बंधुत्वाची…! ती वाटी असते समतेचे प्रतीक…! एवढेच नव्हेतर ते असते समाजा समाजातील माणसांच्या प्रेमाचे अलोट प्रतिक…!   म्हणूनच तर गावातील कुठल्याही जातीचा माणूस असो तो वर्षातून एकदा आपल्याला शीरखुर्मा खायला मिळणार याची वाट पाहत असतो आणि तो खायला मिळाल्यावर स्वतःला भाग्यवान समजत असतो.

तसे पाहिले तर शीरखुर्मा म्हणजे  एक शेवयांची खीर असते जी मुस्लिमेत्तर लोकांच्या घरी सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता येते. त्यामध्ये सुद्धा दूध, केशर आणि महागातले ड्रायफ्रूट्स घातलेले असतात. तरीपण त्याला शीरखुर्माची गोडी येत नाही कारण शिरखुर्म्यात मुस्लिम बांधवांचे प्रेम असते… त्याचा गोडवा खिरीमध्ये मिसळलेला असतो.तर त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येईल?

खूप वर्षापूर्वीची माझ्या बालपणीची एक गोष्ट आहे. त्यावेळी मी साधारणपणे 11ते 12 वर्षांचा असेन. तो एक रमजान इदचा दिवस होता.  सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. आम्ही आंघोळ करून चावडीपुढे खेळत असताना पोपटदादा अचानक तिथे आला. तो खूपच खुशीत दिसत होता. दररोज याच वेळी तो अर्धी पावशेर घेऊन टाईट असायचा. त्यामुळे त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. कोणाची तरी दारू पिऊन दुसऱ्याच कोणालातरी शिवीगाळ करणे,  कोणाबरोबर तरी भांडण करणे हे त्याचे रोजचे ठरलेले असे परंतु त्यादिवशी मात्र तो एकदम खडकमध्ये होता. विशेष म्हणजे तो आपल्या दोन्ही पायावर सरळ उभा होता…!

आपल्या ओठावरून जीभ फिरवत आमच्याकडे बघून तो म्हणतो कसा, ”  पोराहो, जावा… शीरखुर्मा पिऊन या, मी आत्ताच चार वाट्या शीरखुर्मा पिऊन आलो. ” एवढे बोलून त्याने एक जोरकास ढेकर दिला.

आम्ही त्याला विचारलं, ” दादा शीरखुर्मा म्हणजे काय असतं?”

“अरे येड्यांनो, आज  ईद आहे ना? त्यामुळं मुसलमानांच्या घरी प्रसाद म्हणून सगळ्यांना शीरखुर्मा देत्यात.”

तुम्हाला मोठ्या माणसांना देत असत्याला आम्हाला बाराक्या पोरांना कोण देणार?मी विचारले.

“अरे पोरांनो, ते लहानांना,थोरांना सगळ्यांनाच देत्यात जावा तुम्हाला बी देत्याल, आजच्या दिवशी कोण न्हाय म्हणणार न्हाय. ” 

 “पण,कुणाच्या घरी जायचं आम्ही? ”  मी विचारलं. 

“अरे, कोणाच्या बी घरी जायचं… समशेर,ताया, रमजानभाई, बरकतभाई जाफरभाई,मुन्नाभाई नाहीतर आपला बाळूभाई आहेच की..! त्याच्या घरी जा. सगळी आपलीच हाईत.

पोपटदादांनी आम्हाला अगदी सविस्तर माहितीदेवून आम्हाला शीरखुर्मा खायला जाण्यासाठी प्रोत्साहीत केले.

मग मी हळूच म्हटलं,” आम्हाला सोडा की कुणाच्यातरी घरी, तुमच्या वशिल्याने.”

“अरे,त्याला वशिला कशाला लागतोय?कोणीबी जातय कोणाच्याबी घरी आज सण आहे त्यांचा कोणी कोणाला नाही म्हणत नाही.जावा, पळा लवकर… “

“आईला ‘लईच भारी झालं की! मग जाऊ का मी समदीच ?%

” अरे जावा जावा लवकर नाहीतर सगळा शीरखुर्मा संपून जाईल… “

संपून जाईल म्हटल्याबरोबर आम्ही सणाट पळालो…

सगळेजण वाडा ओलांडून मशिदीकडे गेलो. तिथे माशिदीवर भलमोठ्ठा स्पीकर लावला होता.  स्पीकरवर बहारदार  कव्वाली ऐकायला येत होती.

सगळे मुस्लिम बांधव नवनवीन कपडे घालून डोक्यावर अर्ध चंद्राकर टोप्या घालून आनंदाने इकडून तिकडे धावत होते. समोर आल्यावर एकमेकांच्या गळाभेटी करत होते. त्यांच्या भाषेत एकमेकांना काहीतरी म्हणत होते. सगळेजण आपापल्या घराच्या विरुद्ध दिशेला जात होते. ते एकमेकांकडे शीरखुर्मा खायला जात होते असा त्याचा अर्थ होता. आम्ही ते सगळे लांबून पाहत होतो. तर गावातले बरेच लोक सुद्धा मुसलमानाच्या वाड्यातून अगदी मिटक्या मारत बाहेर येत होते. शीरखुर्मा खाऊन आलो म्हणजे गावात आपला किती वट आहे, आपली किती पथ आहे, मुसलमान लोक आपल्याला किती मानतात.हे प्रत्येकाच्याच देहबोलीतून जाणवत होते.

आमच्यातले दोघेजण समशेर भाईच्या वाड्याकडे गेले. दोघे आताराच्या घराकडे गेले. बरकत भाईच्या घराकडे मी आणि भूषण वळलो. बरकत भाईंचे घर खूप मोठे होते. इकडे गावी त्यांचा मटणाचा धंदा होता. घरातल्या महिलांचा बांगड्याचा धंदा होता. त्यामुळे घरात चांगलीच बरकत होती. परंतु त्या घरी माणसांची खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला आत जाण्याची डेरिंग होत नव्हती.

पांढराशुभ्र कुर्ता पायजमा घातलेले मोठमोठाले, दाढीवाले लोक,पान खाऊन लालसर तोंड झालेले ते मोठे लोक पाहिल्यावर आम्ही त्यांच्या दारातूनच काढता पाय घेतला.

बरकत भाईच्या शेजारीच एका मिलिटरीमनचे घर होते पण तिथे भाभी  घरी एकटीच होती. लहान पोरं कुठेतरी खेळायला गेली होती.  आम्ही तिच्या घरात डोकावल्यासारखं केलं तर आतून आवाज आला, ” कोण पाहिजे रे इनको? किसके लडके है तुम?” भाभींचा  असा आवाज कानावर पडताच आम्ही तिथून कलटी मारली अन थेट मशिदीच्या मागे उभे येऊन उभे राहिलो… मनात विचार केला आज काय आपल्याला शीरखुर्मा मिळत न्हाय. पण शीरखुर्मा न खाता घरी परत जायचं तरी कसं? मन माघर घ्यायला तयार होत नव्हते. मग मी भूषणला म्हटलं, ” काय होईल ते होईल आपण आता माघार घ्यायची नाही. ” भूषणही म्हणाला होय चाललं. ” शिरखुर्मा खाल्ल्याशिवाय आज घरी जायचं नाही. असा आम्ही चंगच बांधला होता. तेवढ्यात समोरून रामूसवाड्यातून आमचा नाना आला. तो स्वभावाला एकदम भारी आणि दिलदार माणूस होता. त्याच्याजवळ पैसे असल्यावर कोणी काही मागावं तो कोणाला नाही म्हणायचा नाही. प्रेमाच्या माणसावर तर तो  पैशांची उधळण अगदी मुक्तपणे करीत असे परंतू त्याचा एक वीक पॉइंट होता तो असा की तो अत्यंत स्वाभिमानी होता. त्याला कुणी कुणापुढे हात पसरलेलं आवडायचं नाही. आता आम्ही शीरखुर्मा पिण्यासाठी दारोदारी फिरतोय हे त्याला कधीच आवडलं नसतं. त्याला तसं कळलं तर तो आम्हाला फोकाने मारल्याशिवाय राहणार नाही. त्या भीतीनेच मग आमची गाळण उडाली! नानाला समोर पाहताच भूषण पळाला. मी ही त्याच्या मागे पळालो. बाकीचेही वाट दिसेल तिकडे पळाले.भूषण पुढे आणि मी मागे मशिदीला वेडा मारून रस्त्याने सरळ नळापर्यंत जाऊन नळापासून बोंदऱ्याच्या  बागेतून थेट धोंडीरामनानाच्या दुकानाला वळसा घालून गावात शिरलो…! पुढे भिमजी नानांच्या दुकानासमोरून तेली नानाच्या दारातून जाफर भाईंच्या दारात आलो.

जाफरभाई आपला गरीब मनुष्य होता.टेलरिंग काम करायचा. तो एक साधा टेलर होता. त्याच्याकडे नवीन कपडे कमी पण जुनेच कपडे जास्त शिवायला यायचे. तो आणि त्याची बहीण कसेबसे दिवस काढत होते. त्याची ती परिस्थिती आम्हाला माहीत असल्यामुळे त्यांच्या घरी शीरखुर्मा खाण्यासाठी जाताना मला वाईट वाटायला लागले.त्यामुळे आम्ही ते टाळले. त्याच्या पुढचं घर माझा वर्गमित्र असलेल्या फरीदचं होतं म्हणजे ते बंदच असायचं कारण ते सगळे लोक मुंबईला असायचे. फक्त झेंड्याला म्हणजे यात्रेला सगळे गावात यायचे.

फरीदचे घर ओलांडून आम्ही पुढे आलो पुन्हा त्या भाभीच्या दारात आलो जिने मघाशीच आम्हाला हाकललं होतं. आता त्यापुढे एकच घर होतं ते म्हणजे बाळू भाईचं. तेवढा एकच पर्याय आता आमच्याकडे होता. बाळूभाई सुद्धा अत्यंत गरीब मनुष्य होता.  त्याला चार मुली आणि दोन मुलगे होते. त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय असल्याने संसार कसाबसा तरी चालत होता. आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares