मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम  आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच  पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “

“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.” 

“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते 

मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं  मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे?  संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले  नीताचे. 

“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,

नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”  

सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी  मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.” 

पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !

माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.  

नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि  नीताचे भाऊ  भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची.  सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या  रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?”   रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला  ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच. 

त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची  मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार..  नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही. 

नीताला  ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू  केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही  ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या. 

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

निमिषच्या फोनवर मेसेज आला ‘ फिरायला जायचं आहे, येशील का ? वेळ संध्याकाळी पाच ते सात.’  त्याने चटकन yes रिप्लाय केला. त्याने पत्ता पाठवला. त्याने वॉकिंगच्या स्मायली टाकल्या. आईची चाहूल लागली की फोन बंद केला. आई बघत राहिली. काही विचारावेसे वाटले; पण त्याचा मुड जाईल म्हणून गप्प बसली. चहा घेणार ? विचारले तर मानेनेच नकार दिला. आई निघून गेली.

हल्ली सतत हेच चालले होते. संध्याकाळी 4 नंतर तो जायचा ते 11 पर्यंत यायचा नाही. आईला काळजी वाटायची. सरळ साधा, हळवा, प्रेमळ असणारा निमिष पदवी मानसशास्त्रात घेतली होती. पण नोकरी मिळत नव्हती. कोणताही व्यवसाय करावा तर त्याला भांडवल देण्याची ऐपत नव्हती. नोकरी नाही तर छोकरी नाही हे व्यवहारी गणित त्यांच्याबाबतीत जुळून आलेले. वडीलही कापडाच्या दुकानात काम करत होते. आई डबे करत असे.

त्याच्या बाहेर जाण्याचे गूढ वाढत चालले होते. आईला आता काळजी वाटू लागली की हा रोज कुठे जातो. ह्याला काही वाईट संगत लागली की काय ? असे वाटू लागले होते. आज काल वाट्टेल ते ऐकायला येत होते. अगदी मुले पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात त्या सर्व वाईट गोष्टी वाटून गेल्या. स्मगलिंगपासून जिगेलोपर्यंत सगळ्या शंका डोकावून गेल्या. त्याचे काय चालले आहे ते कळत नव्हतं. आजही तो बाहेर पडला की निमिषची आई, सुहृदाने बाबांना, सुमितला फोन केला. आजही निमिष न सांगता गेला. आजही कुणाचा तरी मेसेज आला आणि तो गेला. मला त्याची फारच काळजी वाटू लागली म्हणाली. बाबा म्हणाले “ तो जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण ही बोलायचे नाही. तो वाईट मार्गाला जाणार नाही याची खात्री आहे. तू शांत रहा मी आल्यावर बोलूया “आणि फोन ठेवला.

फोन ठेवला खरा पण काळजी तर त्यांनाही वाटत होतीच दुकान मालकाला सांगून आज लवकरच बाहेर पडले. नेहमीची बस मिळाली नाही म्हणून थोडे वाट पहात झाडाखाली थांबले. एवढ्यात त्यांना निमिष दिसला. त्याला हाक मारावी म्हणून तोंड उघडणार एवढ्यात त्यांना त्याच्याबरोबर एक वयस्कर बाई दिसली. तिच्या सोबत हा चालला होता. ती बाई त्याच्यासोबत बरीच ओळख असल्यासारखी बोलत होती. ते गप्प बसले. त्याचे ह्यांच्याकडे लक्ष नव्हते, ती दोघे निघून गेली. बाबांना काहीच कळेना. ह्या बाई कोण ? तसेच घरी आले. निमिष आलाच नव्हता. पत्नीला काही बोलले नाहीत.

दोन दिवस गेल्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला, “ परवा निमिषला मॉलमध्ये बघितले एका महिलेसोबत. तुझा विश्वास बसणार नाही म्हणून फोटो काढून आणला. बघ जरा ह्या कोण आहेत. तुमच्या बऱ्याच नातेवाईक स्त्रिया मला माहिती आहेत. ह्या वेगळ्याच वाटल्या. त्यांनी फोटो पाहिला. त्या दिवशीच्या बाईपेक्षा ही वेगळीच होती.”  आता मात्र ते चक्रावले पण तसे दाखवले नाही. त्याला म्हणाले ? हो, ह्या तुला माहिती नाहीत. पत्नीकडच्या आहेत.” घरी गेल्यावर पत्नीशी बोलायचे ठरवले.

घरी आल्यावर सुहृदाला म्हणाले, “ मला तुझ्याशी बोलायचे आहे;”  तर ती म्हणाली “ आधी मला बोलू द्या. आज माझी मावशी नाटकाला गेली होती. तिथे तिला निमिष vip रांगेत बसलेला दिसला. ह्याने तिला ओळख दिली नाही. जाताना मोठ्या गाडीने निघून गेला. तिने बघितले. एवढी मोठी गाडी घेतली आम्हाला बोलली नाहीस असे म्हणून ती रागावली व फोन बंद केला. आता मात्र हद्द झाली. हा काय करतो ते आज कळलेच पाहिजे.”  एवढ्यात बाबांचा फोन वाजला मालकांचा होता. घरी अर्जंट पत्नीसह बोलावले होते. बाबा म्हणाले आधी जाऊन येवू मग बोलू.

मालकाच्या घरी मोठी पार्टी सुरू होती. सर्वांना आमंत्रण दिले होते. घरात देखरेखीसाठी विश्वासू असल्याने ह्यांना बोलवले होते. मालकांच्या वडिलांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होता. सगळी तयारी झाली होती. आता त्यांची एन्ट्री होणार म्हणून सगळे त्यांच्यावर फुले टाकायला उभे राहिले होते. शानदार गाडी, दाराशी आली त्यातून उतरला तो निमिष. त्याने आजोबांना धरून उतरवले. सुमित व सुहृदा त्याला तिथे बघून चमकले. काहीच बोलले नाहीत. सोहळा पार पडला. सगळे घरी जाण्यासाठी निघाले. निमिषला आजोबा म्हणाले, “ तू आपल्या गाडीने जा, रात्र झाली आहे.” त्याने बाबांना जाताना पाहिले. त्यांना थांबवले.  ‘ गाडीतून जाऊ ‘ म्हणाला. सुमितला वाटले ह्याने मालकांच्या वडिलांच्या केअरटेकरची नोकरी पत्करली आहे. त्यांचा स्वाभिमान दुखावला होता.

पण आजोबांनी निमिषचे कौतुक करायला सुरुवात केली. ते म्हणाले, “ तू फार भाग्यवान आहेस की हा तुझा मुलगा आमच्यासारख्या वृध्द एकाकी लोकांचा आधार बनला आहे.”  सुमितला कळेना हे काय बोलत आहेत. आजोबा म्हणाले, “ हा तुझा मुलगा जे काम करत आहे, त्याचे खूप मोठे पुण्य त्याला मिळणार आहे.”  त्यांनी विचारले, “  तुम्ही ह्याला कसे ओळखता, तुमची ह्याची भेट कशी झाली ?”  

त्यावेळी निमिष म्हणाला मी सांगतो बाबा ऐका….. “ मी कामाच्या शोधात खूप फिरत होतो. त्यावेळी मला तऱ्हेतऱ्हेच्या माणसांशी गाठ पडली. मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो.  तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला. मग त्या म्हणाल्या ‘ माझा नातू तुझ्याएवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच. दिवसभर कोणाशी बोलणार? कामाच्या बायकांव्यतिरिक्त कोणी येत नाही. कोणाशी बोलू ? मग इथे बागेत येते. कोणाशी तरी बोलत राहते. ऐकून घेणारे कोणीतरी भेटते. बोलले की जीव हलका होतो. नाहीतर खाण्याखेरीज तोंड उघडत नाही दिवसभर. बरं निघते मी. ये उद्या बोलायला असाच.” 

त्या आजीशी मी फार बोललो नाही. त्याच खूप काही बोलल्या तरी त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच. मी विचार केला या जगात अशी एकाकी असणारी अनेक माणसे आहेत. त्यांना फक्त ऐकणारे कुणीतरी हवे आहे. साथ देणारे हवे आहे… सिनेमाला, नाटकाला, खरेदीला, फिरायला, खेळायला, बोलायला आणि त्यापेक्षाही ऐकायला माणूस हवा आहे. मोबाईल, टीव्ही या यांत्रिकी मनोरंजनाचा माणसाला कंटाळा आला आहे. घरात माणसे कमी, असलेली कामावर जाणारी, घरी आली की मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसणारी, कुणाला कुणाशी बोलायला, बोलणे ऐकायला वेळ नाही. एखादी कलाकृती बघताना सोबत जर समान इंटरेस्ट असणारा असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने हे काम करायचं ठरवलं. मग एक जाहिरात तयार केली…..  

“ एकटेपणा विकत घेणे आहे….  तुमचे ऐकणे, तुम्हाला खरेदीला, नाटकाला, सिनेमाला, बँकेत जाण्यासाठी सोबत करणारा एक साथीदार मिळेल. कोणतेही अनाहुत सल्ले न देणारा, तुम्हाला जज न करता तुम्हाला सोबत करणारा, गॉसिप न करणारा, विश्वासार्ह साथीदार मिळेल.” –  संपर्क क्रमांक दिला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला खूप फोन येवू लागले. ह्यात मी स्वतःला काही बंधने घालून घेतली. वेळ, स्थळ माझ्या मर्जीने ठरवतो. आधी त्यांचा बायोडाटा बघतो आणि मग ठरवतो. ह्यातून अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या. पैसे मिळू लागले. त्याचाच एक भाग म्हणून या आजोबांशी ओळख झाली. म्हणून आज कार्यक्रमाला आलो होतो. हे मला तुम्हा दोघांना सांगायचे होते पण तुम्हाला हे आवडणार नाही असे वाटले. ह्यात काही लपविण्याचा हेतू नव्हता. त्यादिवशी मावशीला मी नाटकाला दिसलो ते असेच एका काकूंना नाटकाची खूप आवड. पतीला अजिबात नाही म्हणून सोबत केली. बाबा तुम्हालाही बघितले होते. त्या मावशींना रस्त्यावर खरेदी करायला आवडते पण घरच्यांच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून करता येत नाही. मग मला बोलावले त्यांनी. आम्ही मनसोक्त खरेदी केली. एका आजीना वाचायचा नाद आहे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो, तर एका मावशींना खूप बोलायला आवडते. दिवसभर घरी कोणीच नसते ऐकायला सगळे कामाला जातात, मी त्यांचा श्रोता होतो.”

“आई बाबा मी कोणतेही वाईट काम करत नाही. उलट मदतच करत आहे. तुमचे चांगले संस्कारच मला इथे उपयोगी पडतात. कुणाचा सुहृद, कुणाचा सखा, कुणाचा श्रोता, कुणाचा खरेदीचा पार्टनर तर कुणाचा खाबुगिरीतला दोस्त. माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे करतो आहे. ह्याला इतका रिस्पॉन्स मिळेल असे वाटले नव्हते. पण मनुष्याच्या एकाकीपणामुळे माझ्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.” 

आई-बाबा निमिषकडे बघतच राहिले. नव्या युगातील या नव्या व्यवसायाचे कौतुक करावे की, माणूस सगळ्यात असून एकटा पडला ह्याची खंत वाटावी, ह्या द्विधा मनस्थितीत घरी परतले.

लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद

पंढरपूर.

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आय.टी. क्षेत्रात काम करणारे सुशांत प्रज्ञा आपापल्या कंपनीत अतिशय चांगले काम करत होते. लग्न करून शहरात नोकरी निमित्ताने स्थिर होऊ पहात होते.

दोघांचाही पगार लाखांच्या पलिकडचा त्यामुळे सगळ्या ऍम्यूनिटिज असलेल्या महागड्या टाऊनशिपमधे त्यांचे सर्व सोयींनी युक्त असे टू बीएचके चे घर. 

सकाळी उठून दोघेही आपापल्या कारनी ऑफिसला जायचे. संध्याकाळी यायची वेळ निश्चित नाही पण यायचे आणि तरी समोर लॅपटॉप उघडून बसायचे आणि मोबाइलवर सतत कॉल्स. 

एकमेकांशी बोलायला वेळ नाही आणि धडपणे जेवायला जमत नाही. अशी गत•••. स्वयंपाक करायचा कोणी? बाईने केला तरी तो थंड स्वयंपाक खायचा कोणी? नकोच असले काही म्हणून दोघांनीही रोज आपल्या आवडीचे जेवण बाहेरून मागवायचे, जमलेच तर एकत्र जेवायचे नाहीतर ज्याला जसे जमेल तसे त्याने खाऊन घ्यायचे. 

एकमेकांबरोबर कुठे जाणे सोडाच, पण एकमेकांशी धडपणे बोलताही येत नव्हते त्यांना. पाच दिवस काम दोन दिवस सुट्टी, असे असले तरी सुट्टीच्या दिवशीही एकतर बरेच उशीरा उठायचे आणि मग ५ दिवसांचे कामाचे प्लॅनिंग, काही क्लायंटसच्या शंका कुशंका सोडवणे आणि इतर काही गोष्टींमुळे दोघे आपल्यातच व्यग्र.

कामापुरते जुजबी गोष्टीच ते एकमेकांशी बोलायचे. घर आणि रहाणीमान पाहून सगळ्यांना वाटायचे ‘ वा काय मस्त संसार चालला आहे राजा राणीचा ••’ त्यांच्या आपसातील प्रेमाचा(?) हेवाच वाटायचा प्रत्येकाला.

१-२ महिन्यांनी गावाकडून बोलावणे यायचे. मग दोघांनी आनंदाने प्रेमाने जावे की नाही? पण नाहीच, त्यावरूनही कधी सुशांत तर कधी प्रज्ञा चिडायची. अरे आपल्याला आपली काही स्पेस हवी की नाही? एरवी नोकरी, क्लायंटस आणि सुट्टीच्या दिवशी काय तर म्हणे आई-बाबा आजी यांना भेटायला जाऊन दमायचे. कधी मिळणार आपल्याला आपल्यासाठी स्पेस?

झाऽऽऽले या दोघांमधे कोणी नको म्हणून गावाकडच्यांनी यांना शहरात रहायला परवानगी दिली, अभिमानाने कौतुकाने यांच्याबद्दल गावातल्या सगळ्यांना सांगत होते. मग हे दोघेच एकत्र रहात होते तरी त्या दोघांनाही मनाप्रमाणे एकमेकांना वेळ देता येत नव्हता, तसेच स्वत:साठीही वेळ देता येत नव्हता, तेवढी स्पेस त्या दोघांना मिळत नव्हती ही फॅक्ट होती•••

एका विकेंडला असेच गावाकडे जाण्यावरून दोघांचेही बिनसले. प्रज्ञा म्हणाली, “ यावेळी मी नाही येत, तूच एकटा जा.”  तर सुशांत म्हणाला, “ तुझ्या आई बाबांकडे मी येतो ना? मग माझ्या आई बाबांकडे जाताना तुला का प्रॉब्लेम येतो?”  ती म्हणाली, “ मी पण येतेच की, पण आज मला शांतता हवी आहे. मला माझी स्पेस हवी आहे. थोडी विश्रांती हवी आहे. तर तू मला माझी स्पेस देणारच नाहियेस का? ”

असे बोलून ती एका बेडरूममधे जाऊन दार लावून बसली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. डोके ओढणीने बांधून घेतले. पडदे ओढून अंधार करून ती पलंगावर पडली. हळूहळू तिला थोडे शांत वाटायला लागले, आणि तिला तिची आई आजी दिसू लागले•••

आई बाबा काका काकू आजी, आम्ही दोघे भावंडे आणि चुलत दोन भावंडे, असे ९ जण एका कुटुंबात रहात होतो. आई घरातील मोठी सून म्हणून सगळी जबाबदारी तिच्याकडे होती. पण सगळ्यांच्या आवडी निवडी, आजीचे मत, सगळे सांभाळून ती आनंदाने रहात होती. वडिलांच्या कामात हातभार लावून मधेअधे सिनेमा नाटके फिरायला जाणे हे सगळे ती करू शकत होती. 

मग प्रज्ञाला आठवले … एकदा तिने आईला याविषयी विचारलेही होते, “ तू कसे हे सांभाळू शकतेस? कसं जमतं गं तुला? “ तेव्हा आई म्हणाली होती, “अगं हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच करते ना? मग आपल्या माणसांसाठी काही केले तर ते कष्ट जाणवत नाहीत. ते कष्टच वाटत नाहीत. फक्त त्यासाठी थोडी तडजोड आवश्यक आहे.”

“अजून एक सांगते बघ••• मला जेव्हा त्रास व्हायला लागतो ना? तेव्हा मी सासूबाईंचा विचार करते. अगं आपलं तर तेव्हा २०-२५ जणांचं कुटुंब होतं. तरी त्यांनी नाही सगळं सांभाळलं? त्यांना पती पत्नींना एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडाच पण एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. मग एकमेकांशी बोलणे नाही जमले तरी कोणाच्याही नकळत एकमेकांना स्पर्श करणं. काही खोड्या करणं यातूनच तर प्रेम बहरलं. एकमेकांच्या हृदयात घर केलं. ( हृदयात स्पेस निर्माण केली) सगळं घर हसतं खेळतं ठेवलं.”

“मग त्यांच्याही सासर्‍यांचे निधन झाले म्हणून घराच्या वाटण्या झाल्या आणि त्यांच्या ४ मुलांसवे वेगळ्या राहू लागल्या. तरी सणवार,लग्न, मुंज आदि सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी इतरांच्या मनातही असलेली स्पेस जपलीच ना? तेव्हा घरात जागा नसेल कदाचित पण प्रत्येकाच्या मनात निश्चित जागा होती. हे सगळे पाहिले आणि मग थोडा त्याग, थोडी आपल्या भावनांना मुरड घालता आली तर आपणच आपली स्पेस निर्माण करू शकतो हे पटलं. म्हणून मी पण सासूबाईंच्या नकळत त्यांचा हा गुण चोरला म्हटलीस तरी हरकत नाही.” 

प्रज्ञाला हे आठवले मात्र. तिने डोळे खाडकन उघडले . तिच्या मनात असंख्य विचार भिरभिरून गेले. आपण दोघेच रहात असलो, घर मोठं असलं तरी आपल्याला स्पेस नाही हा किती कोता विचार आहे हे लक्षात आले. आपल्याला स्पेस मिळण्यासाठी कुणाच्यातरी मनात स्पेस निर्माण करता यायला हवी हे तिला पटले. 

तेव्हा स्पेस नसेलही कदाचित, पण एकमेकांच्या मनातील स्पेसमुळेच सगळी सुख दु:खे संकटे यांना सामोरे जायचे धैर्य मिळत होते, खंबीरता लाभत होती. आता एवढी स्पेस असूनही एकमेकांच्या मनातच स्पेस नाही त्यामुळे संकटकाळी अडीअडचणींना एकट्यानेच सामोरे जावे लागते आहे.  तेवढे धैर्य आपल्यात नसले तरी वरवर ते आपण दाखवतो आणि आतल्या आत खचतो. 

ही खच कोणाच्याही हृदयात स्पेस नसल्याने कोणालाच कळत नाही. आता आपणही अशीच स्पेस निर्माण करायला हवी हे तिने आता भांडून घेतलेल्या स्पेसने तिला शिकवले होते.

प्रज्ञा बाहेर आली आणि सुशांतला म्हणाली,” चल आपण गावाकडे जाऊ.” गावाकडील लोकांच्या मनात स्पेस करण्याच्या या विचाराने सुशांतच्या हृदयातील तिची स्पेस जरा बळकट झाली होती.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण  पहिले – पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?” नरेशने विचारलं – आता इथून पुढे)

“आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप,फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात.मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं.अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो.आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी.मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं”

नरेशला आपलं आयुष्य आठवलं.नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं.अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं.हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही.निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल.तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.

” मीही आता ठरवलंय.उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं” नरेश म्हणाला ” आताशी तर आपण साठी गाठलीये.अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला”

” तसं झालं तर सोन्याहून पिवळं.पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो”

सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला

” डोंट वरी यार.तुही काही लवकर मरत नाहीस.आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी.बरं ते जाऊ दे.तुझी मुलं काय करताहेत?लग्नं झाली असतील ना त्यांची?”

“हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत”

नरेशचा चेहरा पडला.वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.

“घरबीर बांधलंस की नाही?”त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं

” हो तर!तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे.मुलगा चांगला कमावतोय.तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना!तुझी कार मात्र झकास आहे हं”

“तू केव्हा पाहिलीस?”नरेश आनंदाने फुलून म्हणाला

“मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो”

“अच्छा!लग्न लागल्यावर चल.तुम्हांला गाडीतून घरी सोडतो”

“अरे मी आणलीये ना माझी गाडी.तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे.माझं काम भागतंय तिने”

नरेशचा चेहरा पडला.”अरेच्चा!आपण  कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत.मग आपण एवढा गर्व का करतोय?”त्याच्या मनात विचार आला.सुनीलला कमी लेखून आपण मोठी चुक करतोय हेही त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली.अर्ध्या तासात लग्न लागलं.सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते.तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते.सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला.त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली ” हे आमचे भागवत सर.यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं.शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं” तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.

सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला.त्याला आठवलं.निवृत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती.ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.

नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं.आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं.आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला.म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली.आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते.हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला.एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला.या वयातही संगीत आपल्याला आवडतं,आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला.अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता.वपु.काळे,चेतन भगत,पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली.स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र आहे असं तो आजपर्यंत मानत होता.पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला.एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली.सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं.आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला.सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं.

सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते.ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं.आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.

टुरला दोन दिवस बाकी होते.तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता.जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले.चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली.कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला.पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला.त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले.सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं.घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता.अँब्युलन्स बोलवण्यात आली.त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं.ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.

“कसं वाटतंय?”त्याच्या बायकोने मीराने विचारलं.त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं.उजवा गुडघा भयंकर दुखत होता.

“मला काय झालं होतं?”खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं.    “तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता.त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय.त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे.”

” मग करुन टाका.आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय”

डाँक्टर हसले. म्हणाले,

“साँरी मिस्टर नरेश.यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर.तुमची शुगर आणि बी.पी.जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही.आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही.दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत.हार्टमधल्या ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल.माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं.आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही”

नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.

जाऊ द्या .तुम्ही अगोदर बरे व्हा.मग बघू कुठे जायचं ते” ती त्याला समजावत म्हणाली ” जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल!”

नरेश काही बोलला नाही.पण त्याला समजून चुकलं होतं.त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं.नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील.त्यात आनंद,उत्साह यांचा अभाव असेल.जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं.आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता.खरंच होतं ते!आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या.’अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात ‘ असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं.क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला.आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.) इथून पुढे — 

पण अरबस्थानातील ज्यु टोळ्यांनी मुहम्मद पैगंबराला ज्युं धर्माचा पैगंबर म्हणून स्वीकारले नाही. या नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयातीमध्ये ज्यु लोकांविषयी अपशब्द येऊ लागले. मदिनेतील तीन ज्यु कबिल्यांना छोटी छोटी कारणे काढून मदिनेतून हाकलून देण्यात आले. नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयतीमध्ये ज्यु लोकांचे समूळ उच्चटन करण्याचा आदेश मुसलमानांना दिल्याचे दिसते. 

ई स 632 मध्ये मुहंमद पैगंबर साहेबांचा मदिनेत मृत्यू झाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या तलवारीच्या धाकाने संपूर्ण अरेबीया मुस्लिम झाला होता. परंतु पैगंबरांच्या मृत्यू नंतर बहुतेक सर्व अरब जमातांनी उठाव करून इस्लामचे जोखड टाकून दिले आणि ते परत आपल्या पूर्वज्यांच्या बहुईश्वरवादी धर्माकडे वळले. पैगंबरांच्या वारसदारांची पहिली दोन वर्ष हा उठाव दडपण्यात गेली. नंतर मुस्लिम अरब टोळ्यांनी अरबस्थानाच्या बाहेर प्रचंड वेगाने साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. वाळवंटातील प्रतिकूल हवामानात राहणाऱ्या अरब लोकांमध्ये कमालीचा काटकपणा आलेला होता.  क्रूरपणा नसेल तर वाळवंटासारख्या प्रतिकूल हवामानात जिवंत राहनेही शक्य नसते. वळवंटी भागात जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला क्रूरपणा अरब लोकांमध्येही आलेला होता.  त्यात अरबांमध्ये नव्या धर्माच्या शिकवणी नुसार धार्मिक कडवेपणा निर्माण झालेला होते. धर्मवेडाने आंधळे झालेले अरब लढताना मरून जन्नतमध्ये जाण्यासाठी उतावळे झाले होते. त्यांनी निर्भीडपणे मोठमोठ्या फौजा अंगावर घेतल्या. अरब फौजांनी लवकरच आजूबाजूचे सर्व देश जिंकून घेतले. ई स 638 साली अरब मुसलमानांनी जेरूसलाम जिंकून घेतले. 

एकाच कुरैश काबील्यातील मुहम्मद पैगंबरांच्या हशीम या भावकीचे उम्मायद या भावकीशी पाच पिढ्याचे वैर होते. या उम्मयद या भावकीचा अबू सुफियान हा मुहम्मद पैगंबरांच्या आक्रमक धर्मप्रचारामुळे त्यांचा कट्टर शत्रू झाला होता. पुढे मदिनेला स्थलांतर केल्यावर मुहम्मद पैगंबरांची ताकत वाढत गेली. मुसलमानांनी मक्केच्या कुरैश लोकांच्या व्यापारी काफील्यांची लूटमार सुरु केली. त्यातून दोन्ही गटात संघर्ष होऊ लागले. मदिनेतील मुसलमाचे मक्केतील मूर्तिपूजक कुरैश लोकांसोबत झालेल्या प्रत्येक युद्धात अबू सुफियान मुसलमानांच्या विरुद्ध लढला होता. पुढे पैगंबर साहेबांनी मक्का जिंकल्यावर अबू सुफियानला नाविलाजास्तव मुसलमान व्हावे लागले होते. नंतर उमर खलिफा असताना या अबू सुफियानच्या मुलाला म्हणजे मुआवियाला सिरिया-पॅलेस्टीन या प्रभागाचा गव्हर्नर नेमले गेले. अबू सुफियान आणि त्याचे कुटुंबीय स्वतः होऊन मुसलमान झाले नव्हते. परिस्थिती समोर झुकत ते ”मरून मुटकुन मुसलमान’ झाले होते. त्यामुळे ते कधीच कडवे मुसलमान झाले नाहीत. मुआवियाची बायको ख्रिश्चन होती. त्याच्या सैन्यात सिरिअन ख्रिश्चन सैनिकच जास्त होते. या मुआवियाने पैगंबरांचा सख्खा चुलत भाऊ आणि लाडक्या लेकीचा नवरा असलेल्या अली विरुद्ध साफिनचे युद्ध केले. या युद्धात त्याने तीस हजार मुसलमान मारले. या मुआवियने मुहम्मद पैगंबरांच्या हसन(अली आणि फातिमाचा मुलगा) या नातवाकडून खलिफत काढून घेतली. याच मुआवियाने हसनला त्याच्याच बायकोमार्फत विष घालून मारले. या मुआवियाचा मुलगा याजिद हुसेन सोबत झालेल्या करारा विरुद्ध खलिफा झाला. त्याच्या आदेशानुसार मुहम्मद पैगंबराच्या हुसैन या दुसऱ्या नातवाला करबालाच्या युद्ध मैदानात ठार मारले गेले.

जिझिया कर मिळाला की मुआविया आणि इतर उम्मायद खलिफा धर्मनिरपेक्ष होते. झिजिया मिळणे कमी होऊ नये म्हणून एका उमायद खलिफाने इस्लामात धर्मांतर करण्यावर बंदी घातली होती. त्यांनी कुराणच्या आदेशा विरुद्ध अरब नसलेल्या नवमुस्लिमांवरील झिजिया बंद केला नाही. वरवर मुस्लिम असल्याने उम्मयदांच्या आधीपत्याखाली जेरूसलाम असल्याना ज्यु लोकांची फारशी कत्तल झाली नाही. पण मुस्लिम प्रशासनात शेतीवरील असलेल्या वाढीव करामुळे आणि जिझिया सारख्या जाचक करप्रणालीमुळे धरपरिवर्तन वा पलायन हेच मार्ग शिल्लक होते. धर्माच्या बाबतीत कट्टर असलेले ज्यु लोक परत मायाभूमीतून परगंदा होऊ लागले. त्यांचे परंपरिक शत्रू असलेल्या मूर्तिपूजक ग्रीक पॅलेस्टिनी लोकांनी इस्लामात धर्मपरिवर्तन करून घेतले. तरी काही ज्यु जास्तीचे कर भरून आपल्या मातृभूमीत पाय रोवून होते.

पुढे पोप अर्बन दुसरा याच्या प्रेरणेमुळे युरोपतील ख्रिश्चन सम्राज्यांनी येशूची पवित्र भूमी मुस्लिम लोकांपासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पुकारले. क्रूसेडर फौजेने ई स 1099 साली जेरूसलाम जिंकून घेतले. शहरात असलेल्या सर्व मुस्लिम आणि ज्यु लोकांची सरसकट कत्तल झाली.

पुढे मायभूमीत ज्यु लोकांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांमुळे अनेक ज्यु युरोपातील धर्मनिरपेक्ष वातावरणात स्थायिक झाले. फ्रान्स आणि जर्मनीत स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना ॲश्कनाझी ज्यु म्हटले गेले. स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना सफारडीक ज्यु म्हटले गेले. इजिप्त यमन आणि इराक मधील ज्यु लोकांना मिझराही ज्यु म्हटले गेले. मध्य आशिया आणि कोकसस पर्वत रांगामध्ये वसलेल्या ज्यु लोकांना बुखारान ज्यु म्हटले गेले. बाहेरून आलेले हे हुशार लोक कानामागून आले आणि तिखट झाले. कष्टाळूपणामुळे ते लवकरच श्रीमंत झाले तसेच मोठमोठ्या पदावर जाऊन बसले. त्यांच्या प्रगतीवर जाळणारे लोक वाढू लागले. मग त्यांच्या धार्मिक वेगळेपणावरून युरोपात ज्यु विरोधी वातावरण निर्माण केले जाऊ लागले. बरेच ॲश्कनाझी ज्यु सतराव्या आणि अठराव्या शतकात धर्मनिरापेक्ष असलेल्या अमेरिकेत स्थायिक झाले. 

ई स 1516 मध्ये जेरूसलाम ऑटोमन तुर्क सम्राज्याचा भाग झाले. ऑटोमन सम्राज्य जिझिया कर दिल्यानंतर तसे काही अंशी धर्मनिरपेक्ष होते. ते सुद्धा कुराणाप्रमाणे फारसे चालत नव्हते. अशा काहीश्या धर्मनिरापेक्ष वातावरणात जेरूसलाम मधील ज्यु लोकांनी परत कष्टाने आपली प्रगती केली. ज्यु लोकांनी व्यापारात प्रगती केली आणि मोठ्या प्रशासकीय पदांपर्यंत ज्यु पोहचले. 1492 नंतर पोर्तुगाल आणि स्पेन मधून हाकलून दिलेल्या सफारडीक ज्यु लोकांना ऑटोमन सम्राट बायझीड दुसरा याने त्यांना त्यांच्या मायाभूमीत स्थायिक होऊ दिले.

युरोपात राहणारे ज्यु लोक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते. त्यांच्या प्रगतीचा तिरस्कार करणाऱ्यांचे प्रमाण युरोपात हळूहळू वाढू लागले होते.

1860 मध्ये ज्यूविश पत्रकार थिओडॉर हर्झ याने ‘डर जुडेनस्टेट’ अर्थात ‘ज्युंचे स्वतःचे राज्य’ नावाचे पत्रक काढले. ज्युसाठी त्यांच्या पारंपरिक मायाभूमीत स्वतःचे राज्य असावे आणि जगातील सर्व ज्यु लोकांनी तिथे राहायला जावे असा विचार त्याने मांडला. त्याला जगभरातील ज्यु लोकांनी पाठिंबा दिला. 1897 ला स्वित्झरलंड मधील बेझेल येथे पहिली झायोनिस्त परिषद भरली. ज्युसाठी स्वतःचे राज्य असावे यासाठी जगातील मोठया नेत्यांची मनधरणी सुरु झाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पण ज्यु लोकांनी आपला प्रयत्न सोडला नाही. पहिले महायुद्ध चालू असताना त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. 1917 साली ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र सचिव अर्थर बालफोर यांनी जाहीरनामा काढून मध्यपूर्व भागात ज्यु लोकांना हक्काची मायभूमी असावी असे जाहीर केले.

1019 साली पहिले महायुद्ध संपले आणि ऑटोमन साम्राज्य नष्ट झाले. मध्यपूर्वचा हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्या वेळी रोमन सम्राटाने मुद्दाम दिलेल्या पॅलेस्टीन या नावानेच ज्युंची मायभूमी ओळखली जाई. हा भाग ब्रिटिश अंमलाखाली आल्यावर जगभरातून लाखो ज्यु लोग या भागात स्थानांतरित झाले. स्थानिक अरब लोकांचा या स्थानांतराला विरोध असल्याने ज्यु लोकांचे अरब लोकांसोबत खटके उडू लागले. ज्यु लोकांनी आपल्या वस्त्यांची सुरक्षा करण्यासाठी 1920 साली हागानह (Defence) ही पॅरामिलिटरी संघटना सुरु केली. ज्यु लोकांचे होणारे स्थलांतरण आणि ब्रिटनचा त्याला न होणारा विरोध पाहून अरब लोकांनी 1936 ते 1939 या वर्षात मोठा हरताळ पाळला.

ब्रिटनने 1939 साली व्हाईट पेपर काढून जु आणि अरब लोकांचे वेगवेगळे राज्य व्हावे अशी फाळणीची योजना मांडली. अरब लोकांनी ती फेटाळली आणि उठाव केला. ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला. 

– क्रमशः भाग तिसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पश्चात्ताप… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको-मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला. हाँलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटलं. लग्न लागायला फक्त पंधरा मिनिटं बाकी असतांना उपस्थिती एवढी कमी कशी? त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणूकीत गेल्यामुळे हाँल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हाँलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं.

“तुम्हांला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाहिये” नरेश जरा अवघडून बोलला

“काय राव नरेश मला ओळखलं नाही? अरे मी सुनिल भागवत. आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं? “

नरेशच्या डोक्यात ट्युब पेटली.

“हो हो आठवलं. अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण!अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस? आपण तर एकाच वयाचे असू ना? “

“यार किती वर्षांनी भेटतोहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास? “सुनीलने त्याला उठून आलिंगन दिलं.

“चल बसून निवांत बोलूया. लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे”

दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला “बघ यार सुनील या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही. उशीराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला? “

“जाऊ दे रे. हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना नाचण्याचा. करु दे त्यांना भरपूर एंजॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एंजॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का? आणि बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर्ड झालोय. तुझं काय? अजून करतोच आहेस का नोकरी? “

” नाही रे. मीसुध्दा रिटायर झालोय. पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर्ड होतांनाही शिक्षकच होतास का? “

” शेवटची दोन वर्ष हेडमास्तर होतो. म्हणजे तसा शिक्षकच”

” तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दँटस् ए व्हेरी बोअरिंग जाँब. त्यात काही थ्रिल नाही, चँलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत. मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येतंय. दारु पिणं काय!विद्यार्थीनींवर बलात्कार काय!बापरे!या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र पार बदनाम करुन टाकलंय”

सुनील चिडला नाही. हसून म्हणाला,

‘ शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करुन घेतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारीत्र्यहिन  शिक्षकच आले असतील. त्यातून वीसपंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणूका आहेत, वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरव्हिजन आहे, पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं नाही. बरं मला एक सांग, तू कुठल्यातरी सरकारी खात्यात होतास ना? “

” हो मी सुपर क्लास वन आँफिसर होतो. खरं तर एक मामुली क्लार्क म्हणून मी नोकरी ची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लासवन आँफिसर झालो” नरेश अभिमानाने म्हणाला ” आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करुन घेणं किती अवघड आणि चँलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत”

” वा खुप छान. पण मलाही तेच म्हणायचंय. तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का? “

” अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणंघेणं नसतं”

” शिक्षकांचीही तीच परीस्थीती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पुर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासतात. त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्दयावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आपली किंमत कळते”

” पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे. माझ्याकडे बघ. मला नोकरीत असतांना किती मानमरातब मिळायचा. शिवाय माझा पगार, वरची कमाईही भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे, आलिशान गाडी आहे. मुंबई पुण्यात लक्झरीयस फ्लँट आहेत. दोन्ही मुलं बंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रग्गड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय. तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे? “

नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं. तो हलकसं हसला आणि म्हणाला

” या अगोदरही फाँरेनला कुठे गेला होतास? “

नरेशने नकारार्थी मान हलवली

“जमलंच नाही रे. कामात खुप बिझी असायचो. क्लास वन आँफिसरला वेळ कुठून असणार? “

सुनीलने स्मित केलं

” नरेश मी एकवीस देशात फिरुन आलोय. “

 काय्य!!!काय सांगतोस? “आ वासून नरेश त्याच्याकडे पाहू लागला

“हो नरेश. तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय. मागच्याच महिन्यात मी कोरीयाला जाऊन आलो”

नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरुन तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं.

” बरं मला एक सांग भारतात तू कुठंकुठं जाऊन आलाहेस” सुनीलने विचारलं

” महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरु असं ठरवलं होतं”

” तुला काही आजारबिजार आहेत? “

“आहेत ना. बीपी आणि डायबेटीस. कोलँस्ट्रोलही वाढलंय. कारे असं का चारतोस? “आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरुन हात फिरवत नरेशने विचारलं

“नरेश अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीसा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? मला सांग गोव्यातल्या बिचवरच्या सुंदर मुलींना पाहून तुला आता काय मजा वाटणार आहे? उत्तराखंडमधल्या व्हँली आँफ फ्लाँवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेलास तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस. ही प्रेक्षणीय स्थळं पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत. नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहिसा झालेला असतो. “

नरेश चिडून म्हणाला

“मला एवढं लेक्चर देतोहेस. तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का? “

सुनील हसला.

” नरेश शिक्षकी पेशा मी जाणूबुजून स्विकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं. त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्नं पहात होतो. घरच्या गरीबीमुळे ते शक्य नव्हतं. पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित, विज्ञान हे माझे आवडते विषय. त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खुप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खुप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करुन मी अख्खा भारत पालथा घातला. या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं. सायकल काढली. ग्रुप जमा केला. सायकलने नेपाळला जाऊन आलो”

“बापरे नेपाळला? “नरेश थक्क होऊन म्हणाला.

“नुसतं नेपाळच नाही तर, गोवा, लडाख, अरुणाचल, मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो. युरोपलाही जाणार होतो पण पैशांअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहीत भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय. राँक क्लायंबिंग, रँपलिंग, व्हँली क्राँसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहित होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत  नाहीत म्हणून मी तारुण्याचा पुरेपुर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मँनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतो. त्यामुळे मँनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले. अर्थात मी ते कधी मनावर घेतलं नाही. मी माझ्या पध्दतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो. तू ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’हा पिक्चर बघितलाय? “

“नाही “

” जरुर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल”

” पण कारे इतकं सगळं करत असतांना तुझं घरादाराकडे दुर्लक्ष होत असेल? “नरेशने विचारलं.

“अजिबात नाही. कारण मी या गोष्टी सुट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही. घर, परीवार, छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरुन जगलो. संगीताचीही मला आवड होती. माझा आवाज चांगला नव्हता. त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्यं शिकलो. बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन ही वाद्यं वाजवण्यात पारंगत झालो”” पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा? ” नरेशने विचारलं. 

—-पश्चात्ताप—-  क्रमश: भाग 1 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शत्रुत्वाचा नायनाट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

 शत्रूत्वाचा नायनाट… श्री मकरंद पिंपुटकर

मंदार एंटरप्राईझेसच्या रवी सरांना डायमंड मिल्समधून कोण्या बॅनर्जीचा फोन आला होता. “मैं डायमंडसे बॅनर्जी बोलता है. ये तुम लोगोंने क्या बकवास भेजा है इधर ?”

डायमंड मिल : भारतातील टेक्सटाइल जगतातले खूप मोठे नाव – अगदी रेमंड, बॉम्बे डाईंगसारख्या दिग्गज टेक्सटाइल कंपन्यांच्या तोडीचे. 

ऑर्डरनुसार customised मशिनरी बनवून देणे ही रवी सरांच्या मंदार एंटरप्राईझेसची खासियत. डायमंड मिल हे त्यांचे जुने कस्टमर. इतके जुने की करोडो रुपयांच्या डायमंड मिलचे मालक वीरेनभाई त्यांच्या वैयक्तिक परिचयाचे होते. 

डायमंड मिलला यावेळी टेक्सटाइल मशिनरीमधील एका मशीनचा एक भाग वेगळ्या पद्धतीने modify करून हवा होता. त्याप्रमाणे modify केलेले भाग रवी सरांनी डायमंड मिलमध्ये पाठवलेले होते. मोरे नावाच्या ज्या मॅनेजरांनी ऑर्डर फायनल केली होती, त्यांच्या कंपनी e mail account वर mail पाठवून हे भाग कसे जोडायचे (assemble करायचे) ते रवी सरांनी विस्ताराने कळवले होते. त्यांचा काही निरोप / प्रति उत्तर आलं नाही, त्यामुळे सगळं आलबेल आहे असं ते समजत होते आणि आत्ता अचानक हा फोन आला होता. 

दोन पाच मिनिटांनी बॅनर्जीचा पहिला आवेग आणि आवेश शांत झाल्यावर रवी सरांना अर्थबोध झाला तो असा की मोरे दोन महिन्यांपूर्वीच कंपनी सोडून गेले होते. त्यानंतर हे सुटे भाग व मेल पोचले होते. मोरे नोकरी सोडून गेले असल्याने, त्यांची मेल कोणी तपसलेलीच नव्हती.  

हा बॅनर्जीदेखील गेली अनेक वर्षे टेक्सटाइलमध्येच काम करत होता, बॉम्बे डाईंगमधून आता मोऱ्यांच्या जागेवर, डायमंडमध्ये आला होता. त्याच्या देखरेखीखाली त्याने ते भाग जोडून (assemble) घेतले होते व मशीन चालवायचा प्रयत्न केला होता. 

या मशीनमध्ये गिअर बॉक्स होता, एका बाजूला हे भाग गिअरमध्ये अडकवायचे व दुसरी बाजू लॉक करायची असायची. एकदा यंत्राची जोडणी झाली की त्यातील ऑईल ठराविक तापमानापर्यंत तापवावे लागायचे, याला तीन एक तास लागायचे. तेल तापलं की मगच यंत्र चालू करता यायचे. 

इथे अडचण अशी होत होती की लाहिरीने यंत्र जोडणी करून घेऊन तेल तापवले की गिअर बॉक्सवाली बाजू उष्णतेने प्रसरण पावायची, गिअर्स सटकायचे आणि त्यामुळे यंत्र चालू होत नव्हते.

बॅनर्जीने दोन तीनदा यंत्राची जोडणी करायचा प्रयत्न करून बघितला आणि दर वेळी तो असफल ठरला, इकडे दर वेळी वीरेनभाईंचा यंत्राबाबत चौकशी करणारा फोन यायचा, त्यांना नकारार्थी उत्तर द्यावं लागायचं, त्यामुळे बॅनर्जी वैतागला होता आणि त्याने भडकून रवी सरांना फोन केला होता.

“साला, कैसा काम करता है ? हर बार गिअर चार चार इंच मिसमॅच होता है ? वो मैं कुछ नहीं जानता. मेरे को कल सुबह तुम खुद इधर हमारे कंपनीमे मंगता, तुमने आने का, मशीन चालू कर के देने का, नहीं तो अपना सडा हूवा मटेरियल, अपने खर्चे से, वापस ले जाने का. बस, बात खतम,” म्हणत रवी सरांचे काही न ऐकून घेता त्याने फोन ठेवला देखील.

दुसऱ्या दिवशी रवी सर, त्यांच्या एका मदतनीसासोबत, डायमंड मिलमध्ये पोचले. काय घडल्याने चूक होत आहे याचा त्यांना प्राथमिक अंदाज आला होता. त्यानुसार, तिथल्या मुख्य फिटरकडून बॅनर्जी कोण आहे, कसा आहे, त्याच्या देखरेखीखाली हे मशीन कसे जोडले होते ही माहिती ते घेत होते. 

बॅनर्जी आला, आणि आल्याआल्या त्याने आदल्या दिवशीचा आक्रस्ताळेपणा पुन्हा सुरू केला. “मेरा कोई भी फिटर मैं तेरे को नहीं देगा. तेरी इनसे पुरानी जान पेहचान हैं, तू कोई temporary झोल कर के मशीन चालू हुवा ऐसा दिखायेगा, और तेरे जानेके बाद फिरसे सब ठप हो जाएगा,” असं म्हणत त्याने त्या मुख्य फिटरची तेथून उचलबांगडी केली, एका अक्षरश: गेल्याच आठवड्यात रुजू झालेल्या एका तद्दन नवशिक्या कामगाराला यांच्यासोबत दिले.

बॅनर्जीने त्याच्या एका खास माणसाला तिथे तळ ठोकून बसवलं आणि बजावलं, “अपने कंपनीसे और कोई भी इनको हेल्प करने के लिये आना नहीं चाहिए. मेरे को हर घंटे reporting चाहिए.”

“देखिये बॅनर्जीभाई, मुझे लगता हैं assembly करते वख्त आपसे कोई गलती हुई है. मैं आप को समझाता हूं …” काय चुकलं आहे आणि काय केले पाहिजे हे रवी सर बॅनर्जीला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण बॅनर्जी उलट आणखीनच गरम झाला.

“तू मेरा मिष्टेक निकालता हैं ? मैं क्या कल इस लाईन मे आया ? जा, जाकर बॉम्बे डाईंग मे पूछ. लोग आज भी मेरा तारीफ करता हैं उधर,” बॅनर्जी संतापाने लालपिवळा झालेला. “तेरा कोई नाटक नहीं चाहीये. मिश्टेक खुद करनेका और बिल मेरे नाम पर फाडनेका ! मैं खुद वीरेन भाई को फोन कर के बोलनेवाला है,” म्हणत बॅनर्जीने खरंच वीरेनभाईंना फोन लावला आणि आपली कैफियत सांगू लागला. 

“और आपसे मिस्टेक हुवा होगा तो ?” त्याचा फोन चालू असताना रवी सरांनी शांतपणे त्याला विचारलं. 

“तू ये मशीन चालू करके दिखायेगा, तो मैं on the spot resign करेगा, इस्तिफा दे देगा. वीरेन सर, आप भी सून लो, मैं इस्तिफा दे देगा. लेकीन इस से मशीन चालू नहीं हुवा, तो इसका punishment क्या, ये आप को तय करना होगा.”

प्रकरण भलतंच चिघळलं होतं. साधारण चार तासांनी बॅनर्जीच्या माणसाने त्याला फोन केला, “सर, वो मशीन चालू हो गया, सर.”

“इतने जलदी ? ऐसे कैसे हो सकता हैं ? रूक, मैं अभी आया,” म्हणत बॅनर्जी तेथे पोचला, “वो मेजरींग टेप ला इधर. गिअर कितना बाहर आया है देख ले.”

गिअर व्यवस्थित जोडले गेले होते, अजिबात mismatch नव्हते. 

बॅनर्जी बघतच राहिला. “ये अभी temporarily जैसेतैसे जगह पर अटका होगा. जरा दस मिनिट मशीन चलने दे, देख, वो गॅरंटीसे फस जायेगा. ये मशीन चालू करने के बाद जो नुकसान होगा, वो तेरे माथे पर,” रवी सरांकडे बोट दाखवत बॅनर्जीने मशीन चालू करायला लावले. 

तास होऊन गेला, मशीन सुरळीत चालू होते. 

“सर, आप मेरी बात सुनिये. मेरे खयाल से आपने assemble करते वख्त …” रवी सर सांगायचा प्रयत्न करत होते. 

“No, no, no, no. मेरे को ग्यान मत दे,” म्हणत बॅनर्जी तेथून निघून गेला.

रवी सरांनी वीरेन भाईंना फोन करून मशीन सुरू झाल्याचे सांगितले. Fitting करताना दुसरी बाजू मोकळी / फ्री ठेवून, गिअरची बाजू लॉक करायची होती, तापणाऱ्या तेलाने दुसरी बाजू प्रसरण पावणे अपेक्षित होतं. हे लक्षात न घेता, बॅनर्जीने दुसरी बाजू लॉक केली, गिअर मोकळे ठेवले, त्यामुळे उष्णतेने गिअर प्रसरण पावले आणि mismatch झाले. पण हे स्पष्टीकरण ऐकून घ्यायची त्याची तयारीच नव्हती.

“कोई बात नहीं, रवी, मैं बोलता हूं उसको. तू एक काम कर, बहुत रात हो गयी है. तू आज इधर कंपनी गेस्ट हाऊस मे ही रुक. Dinner वगैरा कर ले. कल सुबह ब्रेकफास्ट कर के आराम से निकल,” वीरेन भाई रवी सरांना आश्वस्त करत होते.

बॅनर्जीसुद्धा कंपनी गेस्ट हाऊसलाच उतरला होता. जेवताना दोघे एकमेकांसमोर आले. बॅनर्जी अजून घुश्श्यातच होता. रवी सरांनी पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, त्याने तो उडवून लावला.

“मेरे को तेरे साथ कुछभी बात नहीं करने का. वादे के मुताबिक मैं अपना इस्तीफा वीरेन भाईको सोप दिया हैं. खुश ? Happy ?” बॅनर्जी फणफणला. 

रात्र गेली. सकाळी चहा घेताना बॅनर्जी रवी सरांच्या समोर आला. त्याचा घुस्सा आता शांत झाला होता, वास्तवाची जाणीव बहुधा त्याला आता भेडसावत होती. पहिल्यांदाच तो रवी सरांशी नीट बोलत होता.

“Good morning, रवी साब. वो सॉरी, मैं बहोत गलत ढंग से पेश आया आपसे. आपका मशिन अभी भी अच्छे से चल रही हैं. मुझे मेरे असिस्टंटने बताया मैने क्या गलती किया वो. Actually, मेरे “एक्स”असिस्टंटने बताया – ऐसा कहना चाहिए. वो, गुस्से मे, कल मैने resignation दे दिया, और वीरेन भाईने उसे accept कर लिया. आप के पहचान मे कोई जॉब हैं तो बोलिये, रवी साब.” बॅनर्जी अगदीच मवाळ झाला होता. 

योगायोगाने, रवीच्या ओळखीतल्या एका कंपनीत एक तोलामोलाचा जॉब होता. रवीने शब्द टाकला, बॅनर्जीला इंटरव्ह्यूचे बोलावणे आले, आणि चार दिवसांत तो त्या नव्या कंपनीत रुजूदेखील झाला.

नंतर एकदा बोलताना वीरेन भाई रवी सरांना सांगत होते, “अरे, रवी, तू कैसा आदमी है ? वो बॅनर्जी बिना वजह से तेरा दुश्मन बन रहा था, और तू हैं के अपनी खुद की शिफारस देकर उसको जॉब लगवाया ?” 

मंद हसून रवी सर म्हणाले, “अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकन म्हणाले होते – एखाद्या शत्रूला हरवायचे असेल, त्याला नेस्तनाबूत करायचे असेल, तर त्याला तुमचा मित्र करा. There is no better way to destroy your enemy, than making him your friend. (Abraham Lincoln). दोस्ती झाली, की दुश्मनी संपते. बस, मी एवढंच केलं. मी शत्रूला नाही संपवलं, सर. मी शत्रूत्व संपवलं.” मंद हसत रवी सर सांगत होते आणि वीरेन भाई गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “समता सोसायटी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “समता सोसायटी …” ☆ श्री मंगेश मधुकर 

“साहेब,मला आपला फ्लॅट भाड्याने पाहिजे.” 

“चाचा,सकाळीच चेष्टा करताय की काय!!,भाडं  परवडणारं नाही आणि तुम्ही तर या सोसायटीमध्ये..”

“माझं काम आणि हा व्यवहार दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.आम्हांला भाड्याची अडचण नाही”

“चाचा,स्पष्टच सांगतो.राग मानू नका.तुम्हांला फ्लॅट देऊ शकत नाही.कारण विचारू नका.प्लीज …”

फोन कट झाला.

“बघितलं.हे दुतोंडी सभ्य, शिकलेले लोक.मोठमोठया गप्पा मारायच्या आणि स्वतःवर वेळ आली की…….” हताशपणे चाचा म्हणाले. 

दोन महिन्यांपासून सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी चाचांची धडपड चालू होती. तीन-चार ठिकाणी विचारणा केली पण सगळीकडून नकार आला. प्रश्न पैशाचा नव्हता तर चाचा करीत असलेल्या कामामुळे नकार मिळत होता. सोसायटीत इतकी वर्षे इमाने- इतबारे काम करून सुद्धा अशी वागणूक मिळत होती म्हणून चाचा दुखावले. या सोसायटीत फ्लॅट घेऊन रहायला यायचेच हे मनोमन ठरवले आणि प्रयत्न सुरु ठेवले. अपेक्षेप्रमाणे नकार मिळत होताच पण चाचांनी हार मानली नाही आणि एके दिवशी अनपेक्षितपणे होकार मिळाला. देशमुख फॅमिली नवीन घरात शिफ्ट होणार होती.चाचा देशमुखांना भेटले आणि कोणतेही आढेवेढे न घेता देशमुख तयार झाले. व्यवहार पक्का झाला. ना हरकत प्रमाण पत्रासाठी देशमुखांनी कमिटीकडे अर्ज केला आणि वादाला तोंड फुटले. देशमुखांच्या नवीन भाडेकरूविषयी संमिश्र प्रतीक्रिया आल्या.जास्त करून नकारात्मकच होत्या. अनेकांना हा निर्णय मान्य नव्हता.सभासदांच्या तीव्र भावनांचा विचार करून अध्यक्षांनी तातडीची मिटिंग बोलावली. 

ऐन थंडीच्या दिवसात सोसायटीच्या टेरेसवर मिटिंग सुरु झाली.एका बाजूला विरोध असणारे सभासद तर दुसऱ्या बाजूला देशमुख. काहीजण मात्र तटस्थ होते.

“देशमुख.पुन्हा एकदा सांगतो.विचार करा”एका चिडलेल्या सभासदाने डायरेक्ट विषयाला सुरवात केली. 

“आता पुन्हा कशाला विचार करायचा.निर्णय तर केव्हाच झाला.” देशमुख.

“सोसायटीची बाजूपण समजून घ्या.”

“फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा तुमचा खाजगी प्रश्न आहे.सगळं नियमानुसार आहे तरीही…”

“पुन्हा तेच.नवीन भाडेकरू सर्वांना चांगलाच माहिती आहे.त्यांच्याकडून सोसायटीला काहीही त्रास होणार नाही.याची खात्री आहे”देशमुख.

“चाचांबद्दल प्रश्नच नाही. इतकी वर्षे झाली त्यांच्या कामाविषयी एकही तक्रार नाही” 

“तक्रार,अहो मागे एकदा चाचा आठवडाभर सुट्टीवर होते तेव्हा बदलीवर आलेल्या माणसामुळे किती त्रास झाला हे चांगलंच माहिती आहे. चाचा म्हणजे एकदम भला माणूस. कामाला एकदम चोख” 

“हो,ना कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं की आपलं काम”

“बघा.माझ्या मनातलं सगळं तुम्हीच बोलून दाखवलं. साधा सरळ व्यवहार आहे. अपेक्षित भाडे द्यायला चाचांची तयारी आहे. त्यामुळे आमच्यातल्या व्यवहाराला काहीच अडचण नाही” देशमुखांनी पुन्हा एकदा निर्धार जाहीर केला.

“जगात फ्लॅट भाड्याने घेऊन राहणारे हजारो लोक आहेत. कोणालाही द्या पण चाचांना नको” 

“उलट मी म्हणतो अनोळखी माणसांना देण्यापेक्षा चाचांना द्यावा” देशमुख.

“अहो,त्यांच्या घरात भरपूर माणसे आहेत.जागा अपुरी पडेल” 

“तो त्यांचा प्रश्न आहे.आपण कशाला त्यात पडायचे”..  देशमुख 

“तुम्ही उगीच हट्ट करीत आहात.फायनल सोल्युशन सांगतो फ्लॅट मला भाड्याने द्या.जो व्यवहार ठरला आहे त्यापेक्षा पाचशे जास्त भाडे देतो”एक सभासद भडकले.

“अहो,काहीही काय बोलताय?आपल्याला कशाला हवाय फ्लॅट ??” भडकलेल्या सभासदांच्या सौ.ने त्यांना दटावले.

“या देशमुखांचे वागणं विचित्रच आहे.इथं गोंधळ घालून स्वतः चालले आहेत दुसरीकडे रहायला आणि सगळे  एवढं समजावत आहेत पण यांची गाडी चाचांच्या स्टेशनावर अडकली आहे.” सभासद आजी कुरकुरल्या.

थंडी असली तरी मिटिंगमधले वातावरण तापले होते.एकीकडे सभासदांचा पारा वाढत होता तर दुसरीकडे देशमुख नेहमीप्रमाणे शांत होते. कोणीच मागे हटायला तयार नव्हते.

“आपण लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ” 

“नवीन पायंडा पाडू नका. माझा फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा निर्णय सोसायटीने घेऊ नये.

सोसायटीचा संबंध फक्त ना हरकत प्रमाणपत्र देण्यापुरता आहे. तेव्हा प्लीज..” .. देशमुख.

“सर्व कमिटीचा विरोध असताना हा हट्ट बरोबर नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे.” 

“त्रास????मला वाटलं सोसायटी या निर्णयाचे कौतुक करेल. पण इथं भलतंच झालं आणि सगळ्याच सभासदांचा विरोध नाहीये.” .. देशमुख.

“ज्यांना त्रास नाही ते कशाला विरोध करतील. तुमचा फ्लॅट आमच्या मजल्यावर आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास तर आम्हांला होणार आहे.” 

“आणि आमचं काय हो !! चाचा तर शेजारीच रहायला येणार” 

“एक मिनिट. इतकावेळ चाललेली चर्चा ऐकली. कमिटीचा अध्यक्ष या नात्याने माझं मत सांगतो. देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे. सर्वांना विनंती आहे की माणुसकीच्या नात्याने विचार करा” 

“अहो,चाचा आपल्या सोसायटीत रात्री वॉचमनचे काम करतात आणि दिवसभर सगळ्या बिल्डींगचा कचरा उचलण्याचे व साफसफाईचे काम करतात.” 

‘जसं तुम्ही आयटीमध्ये, तुम्ही बँकेत आणि तुम्ही पेशंट तपासण्याचे काम करता तसंच चाचा काम करतात. त्यांचे काम आणि आमच्यात होणारा व्यवहार याचा परस्पर काहीही संबंध नाही” देशमुख.

“ते माहितीय हो, पण तरीही कचरेवाला सोबत राहायला येणार म्हणजे जरा ….” 

“अहो, कचरेवाले आपण आहोत. चाचा तर साफसफाई करतात. दिवसातले जवळपास पंधरा तास चाचा सोसायटीतच असतात. स्वतःच्या घराइतकीच सोसायटीची काळजी घेतात.”

“एकदम बरोबर बोललात, कुठल्या जगात आहात. स्वतःला मॉडर्न समजतो आणि स्मार्ट फोन,लॅपटॉप वापरतो आणि एवढा मागासलेला कद्दू विचार करतो. उलट चाचा आपल्या इथं राहायला येणार ही अभिमानाची गोष्ट आहे,” 

“चाचा अनेकवर्षे जवळच्या वस्तीत राहतात. मोठा मुलगा रिक्षा चालवतो तर धाकटा आयटीत आहे. घरात कमवणारे हात वाढल्यामुळेच नातवंडांच्या भवितव्याचा विचार करून चाचांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला.” .. देशमुख.

“चाचांची परिस्थिती आहे आणि नियमानुसार ते सोसायटीत रहाणार आहेत यात वावगं काहीच नाही. मला वाटतं इथं प्रोब्लेम चाचांचा नाहीये. खरा प्रोब्लेम आपलाच आहे” 

“म्हणजे ? ”.. अध्यक्ष 

“वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या मनोवृत्तीचा हा प्रोब्लेम आहे. काळानुसार रहाणीमान,कपडे,खाण-

पिणं सगळं बदललं, पण मनातले विचार, खोलवर रुजलेल्या समजुती त्या बदलल्या नाहीत. बोलण्यात असलेली समता कृतीमध्ये आणायची वेळ आली की मग असे वाद सुरु होतात.”

“प्रामाणिक आणि मेहनती माणूस म्हणून चाचांना अनेक वर्षापासून ओळखतो.कष्ट करून ते आपल्यासारखे आयुष्य जगत आहे अशा माणसाला विरोध कशासाठी???तर ते करीत असलेल्या कामामुळे?? हे योग्य नाही” .. देशमुख.  

“हे साफ चूक आहे.देशमुख. मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. कामाचा निकष लावायचा तर सोसायटी मधील सगळ्याच बिल्डींगमध्ये बरेच बदल घडतील. तेव्हा त्याविषयी न बोललेलं बरं”

“आपल्या एरियातला भाई हा गुंड,उद्या जर त्याने सोसायटीत फ्लॅट विकत घेतला तर आपण विरोध करणार का?? कोणामध्ये हिंमत आहे??आपण सगळे मध्यमवर्गीय मनातल्या मनात चडफड करून निमुटपणे सहन करू. हे चाचा तर आपलेच आहेत.देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे” 

“मी काही फार मोठे आणि जगावेगळ काम करत नाहीये.आपण जसं मुलांच्या भवितव्याचा विचार करतो त्याचप्रमाणे चाचांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर ही आपल्यासाठी सुद्धा फार मोठी संधी आहे. जगाला दाखवून देऊ की सोसायटीतील लोक फक्त नावातच नाही तर वागण्यामधून सुद्धा समता पाळतात.” देशमुख बोलायचे थांबले. कोणीच प्रतिक्रिया दिली नाही.सगळे एकमेकांकडे पाहत होते. 

“देशमुख,आता चर्चा बस झाली.उद्या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जा” अध्यक्षांनी जाहीर केले.

“एक मिनिट. चाचा आमच्या शेजारी रहायला येणार आहेत म्हणून…” पुन्हा एकदा तणावपूर्ण शांतता. 

“म्हणून काय????”  अध्यक्षांनी विचारलं.

“माझी एक अट आहे.ती सोसायटीला पूर्ण करावीच लागेल. फ्लॅट जरी देशमुखांचा असला तरी चाचांना किल्ली मी देणार आणि हे फायनल आहे. काय देशमुख” 

“मान्य. चाचा,अभिनंदन.

सगळे तयार झाले. “ आता चहा पाहिजे” देशमुखांनी मोबाईलवरून चाचांना माहिती दिली.

काही वेळाने साठीपार केलेले, पांढरा पायजमा, फुल बाह्यांचा ढगाळ शर्ट, गांधी टोपी घातलेले, गोल चेहरा आणि मोठाले डोळे, जाडजूड पांढरी मिशी, खुरटी पांढरट दाढी ,जेमतेम पाच फुट उंची आणि भक्कम शरीरयष्टीचे चाचा चहाची किटली हातात घेऊन टेरेसवर आले.

“वा,जियो चाचा, चहाचं नाव काढलं आणि तुम्ही चहा घेऊन आलात. या, माझ्याशेजारी बसा” .. अध्यक्ष.

चाचांना पाहिल्यावर सगळ्या सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

अनपेक्षितपणे झालेल्या स्वागतामुळे चाचा गडबडले.

“चाचा,वेल कम”सगळ्यांनी चहाचे कप उंचावले. तेव्हा

चाचांनी हात जोडून आभार मानले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -3 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -3 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

(“तू जा रे… एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो… जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.) – इथून पुढे —

मी दबक्या पावलांनी बाहेर आलो. ‘लपटनसाहेब’ खंदकाच्या भिंतीवर काही तरी चिकटवताना दिसले….. बॉम्ब! त्यांनी खंदकाच्या ओल्या भिंतीमध्ये तीन गोळे चिकटवले… त्या गोळ्यांना सुतळीसारखे काहीतरी एकमेकांना जोडून बांधले आणि त्या सुतळीची उरलेली गुंडाळी शेगडीपर्यंत आणून ठेवली.. खिशातून काडेपेटी काढली आणि शिलगावली…. सुतळीने आग पकडली असती तर सबंध खंदक हवेत उडाला असता आणि आम्हां दहा जणांच्या चिंधड्या उडाल्या असत्या…. आमच्यात बोधासिंगही होता… त्याच्या आईला, सरदारणीला मी शब्द दिला होता.. त्याला काही होऊ देणार नाही म्हणून.!…..

मी वीजेच्या चपळाईने नकली ‘लपटन’ साहेबाच्या दिशेने धाव घेतली. तो सुतळीला आग लावण्याच्या अगदी बेतात होता…. मी माझ्या दोन्ही हातांनी माझी रायफल वर उचलून तिच्या दस्त्याचा एक जोरदार फटका त्याच्या कोपरावर हाणला…. तो तीन ताड उडून पडला. त्याच्या हातातली काडेपेटी दूर पडली.

दुसरा प्रहार मी त्याच्या मानगुटीवर केला…. ‘अरे देवा!’ अशी किंकाळी मारत तो खाली पडला आणि त्याची शुद्ध हरपली. मी त्याने भिंतीवर चिकटवलेले तिन्ही गोळे काढून दरीत फेकून दिले. जर्मनाला ओढत आणून शेगडीपाशी उताणे झोपवले. त्याच्या खिशात तीन-चार लिफाफे, डायरी मिळाली… ती मी माझ्या खिशात टाकली. “वाह रे! नकली लपटनसाहेबा! तु भाषा तर थोडीफार शिकून आलास…. पण तुला हे माहित नाही की शीख सिगारेट ओढत नाहीत, आमच्या भागात नीलगायी आढळत नाहीत, मुसलमान नोकर हिंदुंच्या देवांना कशाला पाणी घालेल? तुला वाटले तू ह्या लहनासिंगला उल्लू बनवशील… अरे लपटन साहेबासोबत पाच वर्ष काढलीत मी… त्यांना ओळखण्यात मी चूक करीनच कशी?… 

तो जर्मन थोडा शुद्धीवर आला तेंव्हा मी त्याची मनोसोक्त मस्करी चालवली. पण… माझी चूक झाली होती.. त्या हरामखोराच्या पॅन्टच्या खिशाची तपासणी करायला मी विसरून गेलो.

त्याने जणू काही खूप थंडी वाजते आहे म्हणून आपले दोन्ही हात खिशात घातले आणि खिशातल्या पिस्तुलातून गोळी झाडली ती माझ्या मांडीत घुसली! मी माझ्या हेनरी मार्टिन रायफलीतून त्याच्या कपाळावर दोन गोळ्या धडाधड डागल्या…. त्याला कपाळमोक्ष प्राप्त झाला. आवाज ऐकून खंदकातले सात जण बाहेर धावले… ”काय झाले?” आजारी बोधाने आतूनच ओरडून विचारले…. मी म्हणालो… “तू झोप.. काही झालं नाही. एक भटकं कुत्रं घुसलं होतं आपल्या खंदकात….. त्याला पाठवून दिलं वर!” एवढं म्हणून मी माझ्या पटक्याच्या कापडानं माझी जखम घट्ट बांधून टाकली.. रक्त बाहेर येणं थांबलं.

एवढ्यात सत्तर जर्मनांनी अचानक दरीच्या बाजूने खंदकावर आक्रमण केले…. आम्ही आठ आणि ते सत्तर…. मी उभा… ते जमिनीलगत झोपून फायर करत होते…. आम्ही आठजणांनी त्यांचा पहिला हल्ला रोखला…. दुसरा रोखला… जबाबी फायरींग जोरात सुरू होते. जर्मन सैनिक त्यांच्याच सहकारी मृत सैनिकांच्या मुडद्यांवर पाय देऊन आमच्या खंदकाच्या दिशेने येत होते!

आता आम्ही संकटात होतो…. तेवढ्यात जर्मनांच्या पाठींवर गोळ्या बरसू लागल्या…. सुभेदार साहेब निरोप मिळताच अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरले होते. पुढून आम्ही संगिनी भोसकत होतो आणि मागून सुभेदार हजारासिंग साहेबांचे सैनिक त्यांना भाजून काढत होते. आम्ही जर्मनांना जणू फिरत्या जात्यातल्या जोंधळ्यासारखं दळायला सुरूवात केली… 

चकनाचूर! त्रेसष्ठ जर्मन प्राणांना मुकले होते आणि आमच्यातले एकूण पंधरा वाहेगुरूंच्या चरणी लीन झाले होते…. माझे जीवाभावाचे साथीदार मला सोडून गेले होते…. पण नकली लपटन मला दिसला नसता तर आमची खूप मोठी हानी झाली असती!

या संघर्षात सुभेदार साहेबांच्या उजव्या खांद्यातून एक गोळी आरपार निघून गेली होती…. आणि माझ्या बरगडीत एक गोळी रुतून बसली होती… खोलवर! 

मी खंदकातली माती माझ्या या जखमेत दाबून भरली…. कमरेला पटक्याची उरलेली पट्टी बांधली…. आणि माझी जखम कुणाच्याही लक्षात आली नाही… मी ही याकडे दुर्लक्ष केले! वजीरासिंगने जीवाच्या आंकाताने धावत जाऊन सुभेदारांना रोखले होते, इकडे मी नकली लपटन साहेबाचा डाव उधळून लावला होता….

सारी कहाणी ऐकून सुभेदार हजारासिंग अभिमानाने भरून गेले होते… “वाह रे पठ्ठे…” त्यांनी आम्हां दोघांना शाबासकी दिली!

अंधार होता अजूनही… उजाडायला वेळ होता. आमच्या गोळीबाराचा आवाज तिथून दोन-तीन मैलांवरील आमच्या तुकड्यांनी ऐकला… त्यांनी पाठीमागे कंट्रोलला खबर दिली… दोन डॉक्टर आणि दोन रूग्णवाहिका आमच्यासाठी निघाल्या आणि दीड तासांनी पोहोचल्या… आमच्यातले जखमी वेदनेने विव्हळत होते… माझी जखम ठणकत होती.

डॉक्टरांनी गाडीच्या प्रकाशात सर्वांवर तात्पुरती मलमपट्टी केली आणि जवळच्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये सर्वांना हलवण्याचा निर्णय घेतला… तिथे पोहोचेपर्यंत उजाडणार होते. एका गाडीत आपल्या जवानांची प्रेतं ठेवली… त्या गाडीत जागाच उरली नाही. 

दुस-या गाडीत जखमी भरले… त्यात फक्त आता दोनच लोकांची जागा होती. मी, सुभेदार आणि बोधा मागे उरलो होतो… बोधाला खूप ताप चढला होता…. ‘ताप मेंदूत जाऊ शकतो!’ मी विचार केला आणि सुभेदार साहेबांना बोधाला घेऊन गाडीत चढायला लावले… ते काही मला मागे सोडून जायला तयार नव्हते… उशीर होत होता… त्यांना माझी जखम दिसली असती तर ते माझ्याशिवाय पुढे गेले नसते. त्यांनी माझ्या मांडीत झालेली जखम पाहिली वाटतं… पट्टी तरी बांधून जातो म्हणाले… मी नको म्हटलं.. थोडीच आहे जखम! अंधार होता! मी उभा होतो..उभा राहू शकत होतो म्हणजे मी ठीक होतो! शिवाय गाडीत जागा तशीही नव्हतीच!

मी त्यांना सुभेदारणीची शपथ घातली… “हे बघा.. माझ्या जखमा फार नाहीत… .सुभेदारणीने मला काही सांगून ठेवले आहे.. एक महत्त्वाचे काम सोपवले आहे.. तुम्ही गाडीत चढा नाहीतर सुभेदारणी माझ्यावर नाराज होतील… तुम्हांला त्यांची शपथ आहे सुभेदारजी!…. बोधा गाडीत आलाय ना…. जा… निघा…” गाड्या निघाल्या!

“तुम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यावर माझ्यासाठी गाडी पाठवालच की… आणि या जर्मनांचे मुदडे न्यायला गाड्या येतीलच…. आणि हो सुभेदारणीला पत्र लिहाल ना तेंव्हा त्यांना माझा नमस्कार सांगा…. म्हणावं लहानासिंगने त्यांनी सांगितलेले काम निभावले!”

सुभेदारजींनी जाता जाता माझा हात पकडला आणि म्हटलं “पत्र कशाला लिहू? आपण तिघेही आपल्या घरी जाऊ सोबत.. तू उद्या लवकर हॉस्पिटलला पोहोच. सुभेदारणीला तुच सांग तुझ्या तोंडाने… आणि काय रे? तुला काय सांगितलं होतं सुभेदारणीनं?”

मी म्हटलं, ”सुभेदार साहेब,.. जा, गाड्या निघाल्यात… मी जे सांगितलं तसं पत्रात लिहाच आणि घरी गेल्यावर सांगाही सुभेदारणीला… म्हणावं ‘लहनासिंगने शब्द पाळला!’

गाड्या निघाल्या… मी जमिनीवर कोसळलो…. पंचवीस वर्षांपूर्वीच्या सगळ्या स्मृती फेर धरून माझ्याभोवती नाचू लागल्या…. बाजारात भेटलेली ‘ती’ दिसू लागली…. आणि माझी शुद्ध हरपली… कायमची !

— समाप्त — 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -2 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

(सुभेदार साहेब म्हणाले, ”अजून फक्त दोन दिवस. दोन दिवसांनी ताज्या दमाची कुमक येईल, मग आपण मागे हटू.”) इथून पुढे.. 

अधून मधून एखाद-दुसरा तोफगोळा येऊन आदळायचा खंदकाच्या आसपास.आजूबाजूचं बर्फ आकाशात उंच उडायचं आणि त्याचा फवारा खंदकात दबकून बसलेल्या आम्हां शिपायांच्या अंगावर यायचा.

आधीच थंडीने हाडं गोठलेली. अंगावर कितीही कपडे चढवले तरी शरीरात गेलेली थंडी जणू तिथं मुक्कामालाच आल्यासारखी. नाही म्हणायला एक घासलेटची शेगडी होती शेकायला. पण तीही बिचारी थंडीने काकडत असायची. तिचा धूर मात्र नाकपुड्यांमध्ये आपसूक जाऊन बसायचा. खंदकात साचलेलं बर्फाळ पाणी बादली बादलीने गोळा करून बाहेर फेकण्याचं एक कामच होऊन बसलं होतं.

बोधासिंग थंडी तापाने फणफणला होता. मी जवळच्या दोन्ही कांबळी त्याच्या अंगावर पांघरल्या. शिवाय आपल्या अंगातला उबदार कोटही त्याला चढवायला दिला.

“आणि मग तुम्ही कसे राहणार या थंडीत?” बोधाने लहनाला विचारलं.

“अरे,बेटा! मला पुरे एवढं. आणि या देशातल्या गो-या मडमांनी उबदार कोट पाठवलेत आपल्यासाठी… आपण त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी इतक्या दूरवरून इथं लढायला आलोय म्हणून! तसलाच एक कोट सकाळीच आलाय पलटणीत. तोच घालीन मी आता. आणि शेगडी आहेच की उबेला. तु झोप, बेटा.” असं म्हणत मी बोधासिंगची पहारा नाईट-ड्यूटी असताना त्याच्याऐवजी खंदकच्या तोंडापाशी माझी रायफल ताणून उभा राहिलो. माझी दिवसाची पहा-याची ड्यूटी तर मी आधीच पूर्ण केली होती.

बोधा आता गाढ झोपी गेला होता. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि बर्फ पडतच होता…. शरीरातली ऊब शोषून घेत होता! गोऱ्या मॅडमनी पाठवलेल्या गरम कोटांची मी बोधाला सांगितलेली गोष्ट म्हणजे एक निव्वळ थाप होती.

मी या बोधाची जरा जास्तच काळजी घेतोय हे इतरांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. मी त्याला माझी कोरडी जागा झोपायला देतो आणि स्वतः मात्र चिखलात पडून राहतो थंडी सहन करीत, हे सर्वांनी पाहिलं होताच.

“त्या पोराला आपला गरम कोट देतोयेस खरा… पण इथं न्यूमोनियानं मरणा-यांची संख्या काही कमी नाही, लहानासिंग!” असं ते बजावत असत. यावर मी गप्प राहत असे…. काय बोलणार? सुभेदारणीनं सांगितलं होतं ना… बोधा आणि सुभेदार आता तुझ्या हवाली म्हणून!

मध्यरात्र हलकेच आत आली. खंदक एकदम शांत होता. दूरवर कुठंतरी एखादा गोळा फुटलेला ऐकू यायचा. या असल्या लढाईचा उबग आला होता सर्व जवानांना. लढाई म्हणजे कशी पाहिजे.. आर नाही तर पार. हातघाईची पाहिजे… आता तलवारी नसतात, पण संगिनी तर असतात. चालून आला कुणी अगदी जवळ आणि रायफल ताणायला सवड नाही सापडली तर सरळ घुसवायच्या त्याच्या छाताडात… काम तमाम!

माझ्या मनात लढाईच सुरू होती…. आणि इतक्यात दूरवरून कुणी ताडताड चालत येताना दिसलं… मी सावध झालो. आकृती जवळ जवळ आली. हे तर आपले कमांडरसाहेब… लपटन साहेब! तोच रूबाब, तोच दिमाख, तीच चाल. अंधारातही ओळखलं त्यांना. फक्त चेहरा स्पष्ट दिसत नव्हता साहेबाचा… अंधारच इतका होता!

साहेब जवळ येताच मी त्यांना कडक सलूट बजावला. “सुभेदार हजारासिंग!” त्यांचा आवाज ऐकूनच सुभेदार साहेब लगबगीने खंदकाच्या बाहेर आले… त्यांनीही या वरिष्ठ अधिका-याला सलूट ठोकला.

लपटनसाहेब ऊर्दूत बोलले, ”सुभेदार हजारासिंग, आपले इथले पन्नास पैकी निवडक चाळीस सैनिक घेऊन त्या दोन शेतांपलीकडच्या खाईकडे लगेच निघा. तिथे पन्नास जर्मन सैनिक लपून बसलेत. दारूगोळाही फारसा शिल्लक नाही त्यांच्याकडे असा माझा अंदाज आहे. मी तुमच्या मदतीला रस्त्यात एका वळणावर पंधरा जणांची एक शस्त्रसज्ज तुकडी ठेवलीये… त्यांना घेऊन जर्मनांवर हल्ला चढवा… रात्रीचा अंधार आपल्या बाजूने आहे आणि आपले सैनिक दुश्मनांचं रक्त प्राशन करायला उतावळे झालेत!… आपल्या खंदकाच्या मागील बाजूने अलगद बाहेर पडा… निघा! खंदकाचा ताबा घ्या… मी सकाळी उजाडताच आणखी कुमक पाठवतो…. गुड लक!” असे म्हणून त्या साहेबांनी खिशातली सिगारेट काड्याच्या पेटीतील काडीने शिलगावली आणि खंदकाकडे पाठ करून ते उभे राहिले…. शांतपणे!

पन्नासपैकी एकही जण मागे राहायला तयार नव्हता. बोधासिंगही निघाला. मी त्याला थांबवले. नको येऊस म्हणालो. मीही निघालो तर सुभेदारसाहेबांनी बोधाकडे फक्त बोट दाखवले…. मला समजलं… बोधाची काळजी घ्यायला साहेब मला थांबायला सांग्ताहेत. हुकूम मानावाच लागतो आणि बोधाला सोडून मी जायला मनातून तयारही नव्हतो म्हणा!

सुभेदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली चाळीस जणांची तुकडी अंधारात कूच करती झाली…. जर्मनांवर हल्ला करण्यासाठी!

बोधासिंग मात्र पडूनच होता. त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते उठायचे…. कोवळं पोर ते! सैनिकी जीवनात इतक्या लवकर अशा भयंकर लढाईला सामोरे जावे लागेल आणि तेही अशा परदेशी थंडीत? त्याने कल्पनाही केली नव्हती.

कसे बसे दहा जण मागे राहायला बाध्य झाले. मी, बोधा आणि बाकीचे आठ सरदार असे दहा जण!

पाच-दहा मिनिटांनी ‘लपटन’ साहेबांनी मला विचारले “सिगारेट पिणार?” आणि त्यांनी मागे वळून माझ्यापुढे सिगारेट धरली.

ती सिगारेट त्यांच्या हातून घेताना खंदकाच्या तोंडापाशी असलेल्या शेगडीच्या प्रकाशात मला साहेबाचा चेहरा ओझरता दिसला! लपटनसाहेबांचे लांब केस असे अचानक एखाद्या कैद्यासारखे कमी कसे कापले गेलेले दिसताहेत. आणि ऊर्दू भरभर बोलताहेत खरे पण हे तर पुस्तकी, छापील ऊर्दू! आपल्या लपटनसाहेबाला तर ऊर्दूची चार वाक्येही धड बोलता येत नाहीत…! गेली पाच वर्षे मी आणि लपटनसाहेब एकाच रेजिमेंटमध्ये तैनात आहोत. मी साहेबांना नाही ओळखणार? हे तर कुणी भलतेच दिसताहेत…. पण खात्री करून घ्यावी!

“साहेब, आपण भारतात कधी परतायचं? मी त्यांना विचारलं.

“लढाई संपेलच आता. मग लगेच निघू. पण का? हा देश आवडला नाही वाटतं?” त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांचं छापील ऊर्दू मला आता जास्तच खटकू लागलं होतं.

“तसं नाही, साहेब!. पण तुमच्या सोबत शिकारीवर जाण्याची मजाच काही और! आठवतं साहेब, मागील वर्षी आपण शिकारीला गेलो होतो जगाधरी जिल्ह्यात, तुम्ही खेचरावर बसला होतात. नीलगायीची शिकार केली होती आपण. तुमचा खानसामा अब्दुल्ला सुद्धा होता बरोबर. तो बिचारा रस्त्यातल्या मंदीरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा… आठवतं? आणि साहेब, तुम्ही त्या नीलगायीची शिंगे शिमल्याला पाठवली होती ना? किती मोठमोठी शिंगे होती ना नीलगायीच्या त्या… चार चार फुटांची असतीलच ना?”

या सर्व प्रश्नांसाठी साहेबाचं एकच उत्तर होतं ”हो, आठवतंय तर! एक एक शिंग चार फुट चार इंचाचं.”

“तु सिगारेट पेटवत का नाहीस?” साहेबांनी मला मध्येच विचारलं.

“थांबा साहेब, खंदकातून काडेपेटी घेऊन येतो.” मी काडेपेटीचा बहाणा करून घाईतच खंदकात शिरलो. थांबलो असतो तर साहेबांनी मला त्यांच्या खिशातली काडेपेटी देऊ केली असती. अंधारात झोपलेल्या वजीरासिंगला मी ठेचकाळलो.

“काय आकाश बिकाश कोसळले की काय लहना? झोपू दे की थोडं.” त्यानं रागानेच म्हटलं.

मी म्हटलं, ”लपटनसाहेबांच्या पोशाखात मृत्यू आलाय खंदकात…. चल ऊठ. अरे, तो आलेला अधिकारी जर्मन आहे…. लपटनसाहेब बहुदा मरून गेले असावेत किंवा जर्मनांनी त्यांना कैद केले असेल. याने त्यांचा पोशाख घालून येऊन आपल्याला फसवलंय. वाटेत दबा धरून बसलेले जर्मन आता सुभेदार साहेबांच्या तुकडीचा खात्मा करणार हे निश्चित. तू खंदकातून बाहेर पडून वा-याच्या वेगाने त्यांना गाठ… फार दूर नसतील गेले ते अजून. त्यांना म्हणावं… मागे फिरा… पुढे धोका आहे!” मी एका दमात त्याला सांगितलं.

“पण लहनासिंग… तुम्ही इथे आठच जण उराल… इथं हल्ला झाला तर?”

मी दबक्या आवाजात पण निर्धाराने म्हणालो, “तू जा रे…. एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो…. जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.

– क्रमशः भाग दुसरा

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares