मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार…. स्व. वि. दा. सावरकर ☆

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे

येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे ॥ ध्रु.॥

ऐकोनि तुझ्या भाटांच्या

गप्पांसि गोड त्या त्यांच्या,

व्यापांसि विसावा माझ्या

जीवासि ये घरीं तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडती बा रे ।

आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ॥१॥

विस्तीर्ण अनंता भूमी

कवणाहि कुणाच्या धामीं

ठोठावित बसण्याहूनी

घेईन विसावा लव मी

येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे ।

हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ॥२॥

ज्या गाति कथा राजांच्या

सोनेरि राजवाड्यांच्या

मी पथें पुराणज्ञांच्या

जावया घरा त्या त्यांच्या

चाललो युगांच्या क्रोशशिला गणितां रे ।

तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ॥३॥

दुंदुभी नगारे शृंगे

गर्जती ध्वनीचे दंगे

क्रांतिचे वीर रणरंगे

बेभान नाचती नंगे

मी जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे ।

अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ॥४॥

कोठूनि आणखी कोठे

चिंता न किमपि करिता ते

ही मिरवणूक जी मातें

नटनटुनि थटुनि या वाटे

ये रिघूं तींत तों नाचनाचता मारे ।

पथ शिरे स्मशानी! ज्यांत तुझें ते घर रे ॥५॥

सोडुनी गलबला सारा

एकान्त पथा मग धरिला

देताति तारका ज्याला

ओसाडशा उजेडाला

चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे ।

अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ॥६॥

जरि राजमार्ग जे मोठे

तुझियाचि घराचे ते ते

घर अन्य असेलचि कोठे

या अरुंद आळीतुनि तें

मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे ।

हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ॥७॥

घर दुजे बांधु देईना

आपुले कुणा उघडीना!

या यत्न असा चालेना

बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे ।

तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे ॥८॥

कवी – वि. दा. सावरकर

या कवितेचा आकृतीबंध मोठा लोभस आहे. प्रत्येक  कडव्यात यमकाने अलंकृत चार छोट्या ओळी व तद्नंतर प्रत्येक  कडव्यात ध्रुवपदाशी नातं सांगणाऱ्या दोन मोठ्या ओळी. सर्व आठ कडव्यांतल्या या सोळा मोठ्या ओळी व ध्रुवपदाच्या दोन अशा अठराच्या अठरा ओळी अज्ञाताच्या बंद घरा/दाराविषयी भाष्य करतात व संबोधनात्मक, रे (अरे) ने  संपतात. यामुळे कवीची आर्तता, अगतिकता अधोरेखित होते तसेच यामुळे कविता एवढी गेय होते की आपण ती वाचतावाचताच गुणगुणू लागतो.

सावरकरांनी ही कविता ते अंदमानात २५+२५ अशी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेंव्हा लिहिलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, की ५० वर्षांचा तुरुंगवास झालेल्या माणसाची मनःस्थिती कशी असेल. त्यातून  तो माणूस असा की ज्याला मातृभूमीसाठी फक्त राजकीय नाही तर सामाजिक क्रांती देखिल घडवून आणण्याची तीव्र इच्छा होती. तुरुंगवासांत आपलं जीवन व्यर्थ  जाणार. आपल्या हातून देशसेवा घडणार नाही या विचाराने त्यांना हतबलतेची जाणीव झाली असेल. हे विश्व संचलित व नियंत्रित करणार्‍या अज्ञात शक्तीला याचा जाब विचारावा किंवा त्यालाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग पुसावा असं वाटलं असेल. किंवा कदाचित मृत्यूने येथून सुटका केली तर पुन्हा भारतमातेच्या उदरी जन्म घेऊन  परदास्यातून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असंही त्यांना वाटलं असेल. यासाठी त्या अज्ञाताच्या घराचा बंद दरवाजा किती काळ आपण ठोठावत आहोत पण तो उघडतच नाही असा आक्रोश सावरकर या कवितेत  करत आहेत. ही आठ कडव्यांची कविता सावरकरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीचं दर्शन घडविते.

ध्रु.) अज्ञाताचं घर हे जीवनमृत्यूच्या आदिपासून अंतापर्यंतच्या चक्राकार मार्गावरचे स्थान आहे. जीवनाचे सगळे मार्ग येथूनच सुरू होतात व याच रस्त्याला येऊन मिळतात.

1) सावरकर त्या अज्ञातास उद्देशून म्हणतात, तुझे स्तुतीपाठक म्हणतात म्हणून, मी त्यांच्यावर विश्वसलो, मला वाटले की तुझ्या घरी मला थोडा विसावा मिळेल. पण तुझ्या घराचं बंद दार ठोठावून मी दमलो तरी ते उघडतच नाही.

2) ही भूमी विशाल आहे. तुझ्या घराचं न उघडणारं दार असं ठोठावित बसण्यापेक्षा मी कुणाच्याही घरी जाऊन थोडी विश्रांती घेईन पण तुझ्या घरापाशी येणार नाही कारण ही वज्राप्रमाणे कठीण असलेली तुझ्या घराची दारे सदोदित बंदच असतात.

3) पोथ्यापुराणांतून ज्ञानी माणसांनी सांगितलेल्या राजे राजवाड्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या मार्गावरून मी युगांचे ‘मैलाचे दगड’ओलांडत त्यांच्या घरी जाऊ लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी तुझेच घर होते.

4) दुंदुभि, नगारे यांच्या आवाजांच्या कल्लोळात क्रांतीवीर जेथे बेभान होऊन नाचत होते त्या मार्गावर मी त्यांच्यातलाच एक होऊन चालू लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी पण तुझेच घर होते.

5) मी नटून थटून या मिरवणुकीत सामील झालो. ही मिरवणूक कुठून कुठे जात आहे हे ठाऊक नसतानाही नाचत नाचत त्या वाटेवरून जाऊ लागलो तर ती वाट स्मशानात जाऊन पोचली व तिथेही तुझेच घर होते.

6) हे सगळं सोडून मग मी मिणमिणत्या प्रकाशातल्या, उदास अशा एकांत मार्गावरून जाऊ लागलो. तो उंच सखल रस्ता चढ उताराचा, वळणावळणाचा होता पण तो सुध्दा शेवटी तुझ्या घरापाशीच जाऊन पोचला.

7) तुझ्या घराकडे जाणारा राजमार्ग  सोडून मी दुसर्‍या घराच्या शोधार्थ अरुंद रस्त्यावरून, अणुरेणूंच्या बोगद्यातून जाऊन पाहिलं पण शेवटी तुझ्या घरापाशीच येऊन पोचलो.

8) तू आपलं घर उघडत नाहीस, दुसरं बांधू देत नाहीस. माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत पण मला प्रयत्न सोडून देऊन बसणं पण प्रशस्त वाटत नाही म्हणून मी पुनःश्च तुझ्या घराची बंद दारं ठोठावत आहे.

सावरकर अज्ञात शक्तीला उद्देशून म्हणतात, ” जीवनाचे सर्व मार्ग जर तुझ्यापाशी येतात व तुझ्यापासून सुरू होतात तर आता माझ्या जीवनाचा मार्ग मला अशा ठिकाणी घेऊन आला आहे की मला पुढचा मार्गच दिसत नाही. म्हणून  तू मला मार्ग दाखव जेणेकरून मी माझ्या देशसेवेला अंतरणार नाही. यासाठी मी तुझ्या घराचे बंद दार ठोठावतो आहे. तू  दार उघडतच नाहीस म्हणून मी निरनिराळ्या मार्गांनी जाऊन दुसरे पर्याय शोधून पाहिले पण सगळे मार्ग  शेवटी तुझ्या बंद दाराशीच येतात. तू तुझे दार उघडत नाहीस, दुसरे घर बांधू देत नाहीस म्हणजे तू सोडून दुसरं कोणी मला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल अशी शक्यता तूच निर्माण केली नाहीस वा करू दिली नाहीस म्हणून मी पुनःपुन्हा तुझेच दार ठोठावत आहे व ठोठावत राहेन” असं सावरकर त्या अज्ञात शक्तीला ठणकावून सांगत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँडवर बराच पसारा पडला होता.  सिंकमध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊचवर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटरवर होता.  तिने पाहिलं तर जॉर्जचा फोन होता.

” हॅलो ! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर ”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्सबर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटरमध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं, ” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.” 

हर्षलला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता, ” बी ब्रेव्ह अमिता  खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.” आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.

 “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर. 

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले..  पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनोचा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेकवर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटरमध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला !  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबरने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठसुट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशीचे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला ऍडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला.आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोसच्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली 

अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

“ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला आंघोळ घालायची का?”

“आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत असेल का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली. ) – इथून पुढे —- 

“मीनल, तुला खोटं वाटेल, पण मला पहिल्यांदा मुलगीच हवी होती. त्यानं माझी इच्छा पूर्ण केली. नंतर त्याच देवानं न मागता माझ्या पदरात मुलगाही टाकला. आणखी काय हवं?

इतकी वर्षे मी केवळ एका आशेवर तग धरून होते की माझा मुलगा माझं भविष्य बदलेल. माझे कष्ट आणि माझ्या भावना समजून घेईल. काठीला लटकवलेले गाजर पाहून त्या गाजराच्या आशेने मूर्ख गाढव जशी गाडी हाकत असते, अगदी तशा गाढवासारखी माझी स्थिती झालीय. एखाद्याच्या कष्टाचं चीज होणं नियतीलाच मंजूर नसावे. 

अलीकडे सोनू पैश्यासाठी सारखा तगादा लावत असतो, नाही म्हटलं की अंगावर धावून येतो. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यात मी आवडती प्राध्यापिका असेन, पण घरांत मी अप्रिय कशी होत गेले हेच मला कळले नाही. माझ्याविषयी त्यांच्या मनांत हे नावडतीचं बीज कधी रोवलं गेलं हे माझ्या लक्षातच आलं नाही.       त्यांच्या सुखासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी म्हणून मी माझ्या स्वत:साठी कमी आणि त्यांच्यासाठी जास्त जगत असते. माझी ऐपत नसताना देखील मुलांनी मागितलेली प्रत्येक वस्तू आणून दिली. मी जगावेगळं काही केलं असा माझा भ्रम नाही. खूप वर्षापूर्वी लिहिलेल्या माझ्याच कवितेच्या ओळी ओठावर येतात. ‘ओंजळीत निखारे धरून ठेवले/ आपल्यांना उब मिळावी म्हणून/ निखाऱ्यांचं मला दु:ख नाही/पण असं का व्हावं?/ हात भाजत असताना देखील/ आपल्यांनीच त्यात तेल ओतावं !’ तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस ना? मग सांग मी आता माझ्या मुलाशी कसं वागावं?” 

सुसि हवालदिल झाल्यासारखी दिसत होती. अखेर आता तिच्या हाती काय उरलं होतं? एवढे कष्ट सोसून देखील जर त्याची कुणालाच जाणीव नसेल तर अशी विफलता येणं साहजिकच आहे. जीवनातल्या कित्येक अडचणीना तोंड देत तिने स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली होती.

“सुसि, वाढत्या मुलांशी कसे वागावे हा आजकालच्या सर्वच पालकांसमोरचा कळीचा प्रश्न आहे.  जगभरातील माता या प्रश्नाने धास्तावलेल्या आहेत. आपल्याला जे काही मिळाले नाही ते आपल्या मुलांना कसे मिळेल यासाठी पालक आपले आयुष्य पणाला लावतात. स्वतः वाटेल तो त्रास सहन करून, स्वतःच्या आवडी-निवडीला मुरड घालून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करीत असतात.

माझ्या मते पालकांनी घरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना स्थान द्यावे. त्यासंबंधी जी चर्चा होईल ती त्यांच्या कानांवर पडण्याने सुद्धा त्यांच्यात खूप फरक पडतो. घरासाठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली कर्जे याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. त्या कर्जाचे हफ्ते किती, त्यावरील व्याज किती हे त्यांना कळायला हवे. वर्षाकाठी त्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च हेही त्यांना कळायला हवे. घरातील छोटे-मोठे होणारे खर्च त्यांना लिहायला सांगावे.

खूप वेळा मुलांचे मित्र मैत्रिणी उच्चभ्रू परिवारातून आलेले असतात त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा किरकोळ वाटायला लागतात. या जगात आपल्यापेक्षा देखील बिकट परिस्थितीत राहणारे परिवार आहेत हे त्यांना पटवून द्यायला हवे. समाजात एक प्रतिष्ठित पंच म्हणून जो लोकांच्या समस्या सोडवत असतो त्या तुझ्या नवऱ्याला तर ही समस्या चुटकीसरशी सोडवता यायला हवी. यात कसलं आलंय मानसशास्त्र? त्यांच्यावर ही जबाबदारी टाक. बरं ते जाऊ दे. काय म्हणते, तुमची सुकन्या आणि छकुली नात? लेकीकडे मज्जा करून आलीस वाटतं.”   

तिच्या तोंडून “ठीक आहे.” एवढेच शब्द बाहेर पडले. माझ्या लक्षात आलं. तिच्या ओठांतून जे बाहेर पडलं होतं आणि तिच्या डोळ्यांतून दिसणारे भाव या दोन्हीत काही ताळमेळ दिसत नव्हता. 

ती हळूच म्हणाली, “अगं काय सांगू, माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय जिचं पोटच भरायचं नाही, त्या कन्येला आताशा माझा स्वयंपाक आवडेनासा झाला होता. इथे आली तेव्हा रोज बाहेरून काहीतरी मागवण्याची फर्माईश असायची. मी प्रेमाने सगळं निमूटपणे करीत होते. तरी देखील जाताना लेक म्हणालीच, ‘आई, हे काय सगळ्याच आया करतात, तू काही वेगळं केलं नाहीस.’ लेकीचे ते शब्द मला कापत गेले. 

तिचं लग्न झाल्यापासून तिच्याकडे एकदाही गेले नव्हते आणि तूच आग्रह केलास म्हणून मी गेले. दुसऱ्या दिवशीच कन्येनं सांगितलं, ‘आई, तुला जायचं असेल तर जा, बाबा आणि सोनूचे हाल होतील.’ ते माझ्या जिव्हारी लागलं. मी कशी राहणार? माझं घर कन्येसाठी हक्काचं होतं, तिचं घर माझ्यासाठी थोडेच हक्काचे असणार आहे? 

मोठ्या बाता मारून गेलेल्या मला परत यायला तोंड नव्हतं. मी माझी वर्गमैत्रिण सुलभाने आग्रह केला म्हणून तिच्याकडे चार दिवस राहिले आणि परत आले. मीनल, आताशा मला असं काय होतंय, हे कळेनासे झाले आहे. सतत काहीतरी हरवल्याची जाणीव होते आहे, नेमके काय हरवले आहे ते मात्र कळत नाही अशी अवस्था झाली आहे.” ती हतबल दिसत होती.  

मी म्हटलं, “ सुसि, तू काहीही हरवलं नाहीस. तुझे आहे तुझ्यापाशी. निर्व्यसनी प्रेमळ पती, स्वावलंबी कन्या आणि वंशोद्धारक मुलगा सगळं तुझ्याकडे आहे. आम्हाला हक्क दाखवणारी अशी एक मुलगी हवी होती. सोनूसारखा एक मुलगा हवा होता. पण काय करणार?” तिनं सुस्कारा टाकत असं म्हटल्यावर, मीच एखाद्या हरलेल्या योद्ध्यासारखी तिच्यासमोर शस्त्रे टाकली. सुसिच मला कितीतरी वेळ धीर देत बसली.  

दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं. “गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी,  काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?” 

 – समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

दारावरची बेल वाजली. दार उघडलं, पाहते तो काय? सुहासिनी, नावाप्रमाणेच अतिशय मोहक हसू ल्यालेली मैत्रिण समोर उभी होती. 

सुहासिनी दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, सावळीच पण नाकीडोळी नीटस, नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे आणि अत्यंत चौकस नजर. फिक्कट रंगांच्या साड्या, त्यावर शोभेलसा मॅचिंग ब्लाउज घातलेला. तोंडात खडीसाखर. अगदी कायम मनमोकळे हसणे. गेली अनेक वर्ष सुहासिनी ही अशीच आहे.

तिची गळाभेट घेत मी आनंदमिश्रित आश्चर्याने विचारलं, “आज अचानक अशी तू इकडे कशी?” ती सोफ्यावर रिलॅक्स होत म्हणाली, “तू काल म्हणत होतीस ना की गिरीशदादा सकाळीच बाहेरगांवी जाणार आहेत म्हणून. आज मीही एकटीच होते, म्हटलं तुझ्याकडे चक्कर टाकावी. चालेल ना?”

“अग, चालेल काय, धावेल सुद्धा.” आम्ही खळखळून हसलो. सखूबाई लगेच आमच्यासाठी चहा टाकायला आत गेल्या. मी म्हटलं, “उद्याच्या लेक्चरची तयारी झालीय का?” 

“आम्हा मराठी प्राध्यापकांना कसली आलीय तयारी? तुला माहीतच आहे, माझ्या सर्व आवडत्या कवींच्या कविता मला कशा तोंडपाठ आहेत त्या. अर्थात त्यात माझी हुशारी कमी, अगदी मनामनांत ठसले जाणारे त्या कवींचे योगदान जबरदस्त आहे. माझं त्यावर चिंतन, मनन सारखं चालू असतं. पण तुझं तसं नाही, कारण तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रशुद्ध शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मला त्यात इंडस्ट्रिअल, क्लिनीकल, चाईल्ड, स्कुल सायकोलॉजी वगैरे असतं एवढीच जुजबी माहिती आहे. ते ऐकूनच टेन्शन येतं.” सुहासिनी म्हणाली.

“हो, या प्राध्यापकीत कितीही मुरलेलो असलो तरी उद्या काय शिकवायचे आहे हे समजावून घेऊन त्याच्या नोट्स काढाव्याच लागतात. तयारीशिवाय जाणं निदान मला तरी आवडत नाही.” 

….तितक्यात चहा आला.   

प्रतिकूल परिस्थितीत जे घट्ट पाय रोवून उभे असतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन जमते. पंचवीस वर्षापूर्वी आम्ही दोघी एकाच वर्षी प्राध्यापकीला सुरूवात केली होती. सुहासिनी प्रथम श्रेणीत बी.ए. पास झाली. सुहासिनीसारख्या सुंदर मुलीचं स्थळ जमायला अवघड गेलं नाही. शेखर कुठल्याशा कंपनीत क्लार्क होता. सुहासिनीने एम.ए. ला अ‍ॅडमिशन घेतलेली होतीच. लग्नानंतर तिने मराठीत एम.ए. करताना गोल्ड मेडल मिळवलं. एम. फिलसाठी अ‍ॅडमिशन घेतली. त्याच दरम्यान घरी पाळणा हलला. घरी लक्ष्मी आली पण खर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड जात होते. 

नशिबाने महाविद्यालयात तिची नेमणूक झाली. आता स्थिरता येईल असे वाटत असतानाच शेखरची कंपनी बुडाल्याने त्याची नोकरी गेली. परत कुठे नोकरी शोधायचा त्याने प्रयत्न केला नाही. त्याला समाजकार्याची आवड होतीच. निरपेक्ष वृत्तीने अडल्या नडलेल्या लोकांची कामं करून देणं हे आता त्याचं व्यसन होऊन बसलं होतं. 

सुहासिनीने चकार शब्द काढला नाही. कुणी काही बोललं की ती म्हणायची ‘नवऱ्यानं कमवायचं अन बायकांनी घरी बसून राहायचं, आता ते दिवस गेले. मी कमवते अन माझा नवरा बसून खातो याचं माझ्या मनांत किल्मिष नाही की माझ्या नवऱ्याच्या मनांत अढी. तुम्हाला काय त्याचं? दुसरं, माझा नवरा समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने जगावेगळे काम करतो आहे.’ असं सांगायची.

आपल्या हिमतीवर तिने आपल्या दोन्ही मुलांना नीट वाढवलं. कन्येला उच्चविद्याविभूषित केलं. कन्येला कुठेतरी नोकरी लागून तिला आपल्या पायावर उभी केल्याशिवाय तिच्यासाठी स्थळंही पाहायला तयार नव्हती. नोकरी मिळताच तिच्या मनासारखं तिचं लग्नही जमलं. मुलगी सुस्थळी पडली पण एकुलती एक कन्या आपल्यापासून कित्येक मैल दूर होणार म्हणून सुहासिनीच्या जीवाची घालमेल होत होती. त्यावेळी मीच तिला समजावून सांगितलं होतं. ‘सुसि, एवढी हुरहुर लावू नकोस ग, तिच्या जीवाला. आपल्या स्वत:च्या विश्वात ती नव्या नवलाईने जाते आहे, तिची पावले जड होऊ देऊ नकोस. या काळजाच्या तुकड्याच्या पंखांत तूच बळ दिले आहेस म्हणूनच तर नव्या दिशेला भरारी मारण्याचे स्वप्न तिला पाहता आले. तू दिलेल्या संस्काराच्या बळावर ती घट्ट पाय रोवून उभी राहील. लक्षात ठेव, तिला तुझी गरज देखील भासणार नाही.’ झालंही तसंच, ती कन्या सुहासिनीला पार विसरून गेली. 

पहिलटकरणीचं हक्काचं घर म्हणून कन्या आईकडेच आली होती. कॉलेज सांभाळत सुहासिनीने लेकीचं सगळं केलं. दोन महिन्यानंतर लेकीला, नातीला सोडायला म्हणून पहिल्यांदा दिवाळीच्या सुटीत मुलीच्या सासरी गेली होती. आपल्या लेकीनं घर छान सजवलं आहे म्हणून तिला खूप आनंद झाला. तिने मला खास फोन करून सांगितलं होतं. 

त्यानंतर आज ती पहिल्यांदाच अशी वेळ काढून माझ्याकडे आली होती. चहा संपला. सुहासिनी गप्पच होती. 

काही वेळाने सुसि म्हणाली, “मीनल, तू त्या दिवशी बरोबर बोलली होतीस. मला आता ते प्रकर्षानं जाणवतं आहे. मी आता केवळ गरजेपुरती राहिली आहे. का कोण जाणे, आताशा सारखं वाटतं आहे की आपले म्हणवणारे लोक फक्त स्वार्थासाठी माझा वापर करताहेत. माझी मुलं आणि त्यांच्या भविष्याचा ध्यास एवढंच माझं लक्ष्य होतं.   

शेखरला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे स्वीकारूनच मी मुलांच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष दिलं. त्यांची प्रत्येक मागणी मी पूर्ण करीत राहिले. हे सगळं मी एकटीच्या जीवावर करत होते. शेखरच्या वडिलार्जित इस्टेटीतला एक तुकडा आपल्या हाती लागेल तेव्हा लागेल, आपलं स्वत:च एक घर असावं म्हणून छोटंसं कां होईना, घर बांधून घेतले. त्याचे हप्ते भरतेच आहे. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी पेलली. दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली. 

— क्रमशः भाग पहिला.

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक हास्य कथा -> मो-“बाइल वेडी” – लेखक : डॉ. आनंद काळे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ एक हास्य कथा -> मो-“बाइल वेडी” – लेखक : डॉ. आनंद काळे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

गेली २० वर्षे  मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आले की  काही रुग्ण चांगलेच लक्षात रहातात अन त्याहीपेक्षा अधिक लक्षात रहातात ते त्यांचे नातेवाईक.

आता पर्वाचाच एक किस्सा सांगतो .

सकाळीच एका २५ ते ३० वर्षे वयाच्या पुरुष रुग्नाला घेउन एका ४५- ५०च्या स्त्रीने ओपीडीत  प्रवेश केला . त्यांच्या सोबत होता त्यांच्या गावातला एक सज्जन .

मानसिक आजारची लक्षणे त्या तरुणात साफ दिसत होती . शून्यात असलेली नजर , अस्ताव्यस्त कपडे , वाढलेली दाढी अन चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव .

शेजारी बसलेल्या त्याच्या आईकडे माझे लक्ष गेले. नेटनेटकी नववार साडी ,कपाळावर टेबल टेनिसच्या चेंडू एव्हढे मोठे कुंकू, डोक्यावर भला मोठा अंबाडा अन नुकतच पान खाल्यामुळे लाल झालेले ओठ .

त्या स्त्रीने सुरुवात केली .

” दागदर, हे बगा हे माझ पोरग , गेल्या आठ दिसापासून ……..”

 एव्हढ्यात ” माळ्याच्या माळ्यामंदी पाटाच पाणी जात …..” मोबाईलची रिंग टोन ऐकू आली .

आवाज कुठून येतोय याचा काही मला अंदाज लागत नव्हता . या बाईने आंबाड्यात तर नाही ना ठेवला मोबाईल . डोक्यात एक विचार चमकून गेला .😳🧐

त्यानंतर  त्या स्त्रीने केलेल्या ज्या प्रक्रियेने ज्या जागेवरून मोबाईल दृष्टीक्षेपात आणला  ते बघून मी डोळे मिटले .

डोळे उघडल्यावर ती स्त्री मोबाईलवर संवाद करताना दिसली  . ” हॅलू , ….हा सखूच बोलतेय  … काय झाल ग कमळे …..आज नाही  भीसी ..   उद्या हाय … व्हय …या बारीस लागली ना मला भीसी तर श्यामसंग चा नवा मोबाईल घेनार हाय ..

मी मारला व्हता तुले मोबाईल सकाळी  पण तीकडून ती बाइ विंग्रजीत कायबाय बोलत व्हती… … बर म्या काय  म्हणते …”

आजूबाजूचे  वातावरण अन आम्हा पामरांबद्द्ल अनभिज्ञ होवून सखूबाई तल्लीन होवून मोबाईलवर  बोलत होत्या .

शेवटी त्यांना माझी दया आली . ” इकड   विठूला आणलय दाग्दरकड. त्याच झाल दोन मिंटात की लगेच लावते बघ .” त्यांनी कमळीला सांगत मोबाईल कट केला .

इतकावेळ धोरोदत्तपणे मी मोबाईलचे संभाषण संपण्याची वाट पहात होतो .  ” काय त्रास होतोय विठूला “

स्वत:च्या मनावर ताबा ठेवत मी विचारले .

“२ हप्त्यामाग एकदम नादर व्हता बघा. . जुन्या नोकीयाच्या जाड ठोकळ्यासारख्या मोबाईल वानी. एकदम ठणठणीत!.  बायकू गेली कवरेजच्या बाहेर! “

“ म्हणजे ?”😳 मी विचारले

“सोडून  गेली हो…. तव्हापासून बिघडलय बगा .”

“  काय बदल वाटतोय त्याच्यात?”

“मधीच बोलता बोलता “रेंज” सोडतय बघा”

“ काय ?” मी  उडालोच.😳🙃

“ म्हणजे बोलता बोलता लाइन सोडून बोलतो.” तीचं उत्तर.

“बर ! अजून काय त्रास होतोय?” माझा चिवटपणा.

सखूबाई उत्तर देणार इतक्यात पुन्हा ” माळ्याच्या मळ्यामंदी  ही मोबाईल ट्यून वाजली . या वेळी मी डोळे बंद करण्याच्या आत मोबाईल सखूबाईने उचलला होता .

” काय ग रखमे?”

माझा धीर आता सुटू लागला होता .

“ हे बघ . रातच्याला पीठल भाकर कर . चार मुठी बेसनात २ गीलास पाणी टाक अन चांगल रटरट शीजू दे . किती बार्या  सांगितल तुला तेच .  जरा डोक लाव की . अस काय करायलीस शीम कार्ड नसलेल्या मोबाईल वनी”

सखूबाईने मोबाईल कट केला अन त्याला अदृश्य करत माझ्याकडे वळल्या.

” तर म्या सांगत व्हते दागदर , मधून मधून कधी कधी “ह्यांग” बी होतो ? “

“काय होतो?”🧐

“मोबाईल जसा ह्यांग व्हतो ना तसा गच्च व्हतो बघा”

आता माझच डोक ह्यंग व्हायची वेळ आली होती .

” लघवी संडासला काही त्रास ? ” माझा हिस्टरी घेण्याचा प्रयत्न चालू होता .

“चार दिस झाले बघा संडासला झाल नाही”. खातच नाही काइ त्यो.. .आता मला सांगा डागदर  इनकमिंगच नाही तर आवुट गोइंग कस राहिल ?”

सखूबाईच्या मोबाईल क्षेत्रातल्या प्रगाढ पांडित्याने मी आता चांगलाच प्रभावित झालो होतो .😇😱

” डिसचार्च झालेल्या मोबाईल वानी वागतोय बघा . आता बायको नाही म्हणजे चार्जर् नाही . कितीदा सांगीतल त्याला मिसेसला एक मिस्ड काल तरी  दे म्हून. पण ह्यो ऐकतच नाही.”.

” एव्हढ्यात अजून एक मोबाइल ची ट्यून वाजली . ” निसर्ग राजा ऐक सांगतो “

आता हा कोणाचा मोबाइल ? मी प्रश्नार्थक मुद्रेने वर पाहिले . हा सखूबाईचा तर नक्कीच नसणार . सोबतच्या गावाकडच्या कार्यर्कत्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला

“काय रामराव , कुठ हाइत तुम्ही.. . या येळीस झेड पी च्या विलेक्षणच तुमच तिकीट  फिक्स दिसतय . बाकी सगळ्याले डिलीट मारणार तुम्ही यंदा .  फेश्बुकावर लै चमकू लागले तुम्ही !!”

मी हताशपणे संभाषण संपण्याची वाट बघू लागलो .

इतक्यात सखूबाई त्या सद्गृहस्ताला बोलल्या .” ए बारकू . मूट करण मोबाइल . डॉक्टरकड आल्यावर मोबाईल शायलंट ठिवायच माहीत नाय का तुला.”

पुढे मी काही बोलण्याच्या आत सखुबाई सुरू झाल्या .

“हे बगा दागदर , तुम्हाला काय करायच ते करा.सगळ बील प्री पेड करते. पोस्ट पेडची भानगडच नाही . पण एकदाच फार्मेट का काय म्हणते ते मारा अन चक करून टाका सगळ.”

“ मव्हा भाउ हाय वडाफून च्या सेंटरात . त्यो म्हणला कशाला जाती डागदरकड . मी गूगळ करतो अन सांगतो तुला ट्रिटमेंट .ते त्याच गुग्गुळ काय माझ्या डोक्यात डाउनलोड झाल नाही बघा  म्हून आणल तुमच्याकड.”

सखूबाईच हे मोबाईल रुपक मी आणि विठू ( पेशंट )अगदी शांतपणे ऐकत होतो. फरक एव्हढाच की विठूच्या डोक्याच्या मोबाईलला नेटवर्कच  नव्हते अन  सखूबाईच्या अखंड बडबडीने माझ्या डोक्याचे नेटवर्क कधीच कंजेस्टेड झाले होते.

” हे बघा सखूबाई, या प्रकारच्या मनोविकाराची उपाययोजना ……”

मला मध्येच तोडत सखूबाई म्हणाल्या

” जरा एक मिनिट डागदर , हे तेव्हढ वाटस अप वर आंगठे , फुग अन फुल टाकते . शेजारच्या मंदीच्या लेकराचा ह्य्यापी बर्थ डे हाय”

सखूबाईनी मोबाईल मध्ये एखाद्या १०० ची स्पीड असलेल्या टाइपिस्टलाही लाजवेल अशा वेगाने टाइप केले .

माझ्याकडे वळत त्या म्हणल्या . “तुम्हाला काय करायच ते करा पण मव्ह पोरग चांगल नीट करून द्या ” एखाद्या नव्या टच स्क्रिन च्या मोबाईलवानी”

मी हवालदील .

“  ते औशीध गोळ्या धाडा मला वाटस अप वर”

सखूबाई उठल्या अन माझ्याकडे सरसावल्या .

“ ईकड बघा डॉक्टर . लांबवलेल्या हातातल्या मोबाएलकडे माझ्याशेजारी उभ राहून पहात त्यानी मला सांगितल.

“ए विठ्या , मेल्या बघ की त्या मोबाईलकडे. आपल्याला दागदर बरूबर शेल्फी काढायचीय.”

शेल्फी काढून सखूबाई, विठू अन त्यांच्याबरोबरचा तो इसम बाहेर पडले .

माझ्या डोक्याच्या मोबाईलच्या हार्डवेअर , सीम कार्ड अन बॅटरी यांच्या एकत्रित ताळ्मेळाची  पार वाट लागली होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी मी वाट्स ॲप उघडले .एका अननोन नंबरवरून आलेला एक मॅसेज बघीतला “. गूड मार्निग दागदर “. बरोबर एक फोटो पाठवला होता. आदल्यादिवशीचाच  सखूबाई अन विठु बरोबरचा सेल्फी होता . .

फोटोत आपले लाल ओठ दाख्वत सुहास्य वदनाने  सखूबाई दिसत होत्या. शेजारी मी अन विठू .  माझ्या चेहऱ्यावरचे भाव मात्र  विठुच्या चेहर्यावरील भावापेक्षा फार काही वेगळे नव्हते .😃

इतक्यात माझ  मोबाईल खणाणला . “डागदर , पलीकडे सखूबाई होत्या . तुम्हाला पाठवलेला फोटू डीपी म्हून ठिवला तर बर राहीन का?

बिगीनी सांगा . मोबाईलची बॅटरी संपायली”.

माझी बोलती बंद झाली . माझा मोबाइल चार्ज्ड होता पण माझीच बॅटरी खलास झाली होती.😇🙃

लेखक : डॉक्टर आनंद काळे

औरंगाबाद.

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एखाद्याचं नशीब — भाग-२ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ एखाद्याचं नशीब — भाग-२ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही. मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत.)  इथून पुढे —

वरदाच्या बाबतीत झालेली फसवणूक, नंतर घटस्फोट यामुळे त्या घरावर अवकळा आल्यासारखं झालं होतं. जवळच्या मित्र-मंडळींनाही समजत नव्हतं, ही कोंडी फोडावी तरी  कशी? पण  काळ कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. मुकुंदरावांच्या कुटुंबालाही ते लागू होतंच.

मुकुंदराव परत बांधकामाच्या साईटवर जाऊ लागले होते. पण एरवी काम करताना सगळ्यांबरोबर चालणारे हास्य – विनोद  बंद झाले होते. संभाषणही कामापुरतंच.

मोहिनीच्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी नियमित औषधं घ्यावी लागत होती. 

वरदा घरातल्या कामात आईला मदत करत होती. पण अगदी मिटल्यासारखी. जेवढ्यास तेवढं बोलणं आणि बाकी वेळ काहीतरी वाचत नाहीतर शून्यात नजर लावून बसणं, हाच तिचा दिनक्रम होता आता!      

दरवर्षीप्रमाणे दोन्ही वर्षी गणपती उत्सवही साजरा झाला. फक्त आधीचा उत्साह मात्र नव्हता त्यात. यावर्षीचा गणेशोत्सव आठवड्यावर आला होता. सकाळी मुकुंदराव हाॅलमध्ये पेपर वाचत बसले होते. ते घरात असले म्हणजे समोरचा दरवाजा उघडाच असायचा. ‘नमस्कार, काका येऊ का?’, आवाजासरशी मुकुंदरावांनी दाराकडे नजर टाकली तर भोसल्यांचा रमाकांत सपत्नीक दारात उभा होता.

“अरे, रमाकांत ये ना. या घरात यायला तुला परवानगी का हवी? शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून इथे येतोस की ! .”

“खरंय काका, मी आपलं सहज काही तरी बोलावं म्हणून बोललो हो!” असं म्हणत तो आत आला. दोघांनी वाकून मुकुंदरावांना नमस्कार केला आणि रमाकांतची बायको वरदा आणि काकूंना भेटायला आतल्या खोलीत गेली.

रमाकांत गावातला हुशार पोरगा. त्याला डाॅक्टर व्हायचं होतं पण त्याच्या बाबाला या शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अशावेळी मुकुंदरावांनी त्याला सर्व मदत केली होती आणि तीही निरपेक्ष वृत्तीने.

डाॅक्टर झाल्यावर पाच वर्षे रमाकांत मुंबईतल्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये नोकरी करत होता. अनुभवासाठी ते आवश्यकच होतं. त्याला आपल्या गावातच मोठं हाॅस्पिटल काढायचं होतं, कारण दहिवलीच्या आसपासच्या परिसरात एकही मोठं हाॅस्पिटल नव्हतं. 

सरकारी दवाखान्यात नेहमीच स्टाफ आणि सुविधांचा दुष्काळ! गंभीर स्थितीतला रूग्ण कल्याण-अंबरनाथच्या दवाखान्यात पोचण्याआधीच राम म्हणायचा. हे त्यानं लहानपणापासून पाहिलं, अनुभवलं होतं. आता त्याच्या काही डाॅक्टर मित्रांच्या सहकार्याने त्याला ही कामगिरी पार पाडायची होती. त्याची बायको रोहिणी स्त्रीरोगतज्ज्ञ होती, तिचा सहभाग तर मोठाच होता. मुकुंदरावांचाही याबाबत सल्ला घ्यावा यासाठी तो आज आला होता.

मुकुंदरावांनी दहिवली आणि कर्जतच्या दरम्यान एक मोठा भूखंड विकाऊ असल्याचं रमाकांतला सांगितलं. जमीनीचा मालक परिचयाचा असल्याने व्यवहार वाजवी किमतीत होईल याची त्यांनी खात्री दिली. बँकेचे कर्ज मिळायलाही काही आडकाठी होणार नव्हती, कारण जमिनीची सगळी कागदपत्रं व्यवस्थित होती. 

मुकुंदरावांनी लगेच त्या माणसाला फोन लावून, दुपारी जागा बघायला येत असल्याचं कळवलं.  रमाकांत आणि त्याच्या बायकोला जागा पटली तर दोन दिवसांनी बाकीच्या मित्रांनाही बोलवणार होते जागा पहायला. आणि बघता बघता जागेची पसंती होऊन, कर्जाची सोयही झाली. गणपती उत्सवही यथासांग पार पडला. 

रमाकांत आणि रोहिणी आठवडाभर मुकुंदरावांकडे मुक्काम ठोकून होते. कारण तो आणि त्याचे आई-वडील तीन वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला गेले होते, मुंबईत रोज ये-जा करणं रमाकांत आणि रोहिणीला सोयीचं होतं म्हणून! 

मुकुंदरावांनी स्वतःच्या देखरेखीखाली हाॅस्पिटलचं बांधकाम करून घेणार असल्याचं सांगितलं. रमाकांत आणि रोहिणीनं, वरदानं या बांधकामाच्या हिशोबाची बाजू सांभाळावी यासाठी तिला मनवलं. तिच्या रिकाम्या मनाला काहीतरी गुंतवणूक मिळावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. रमाकांत सख्ख्या भावासारखा असल्याने वरदाला त्याला नाही म्हणताच आलं नाही.

हाॅस्पिटलच्या निमित्ताने रमाकांत, रोहिणी आणि त्याच्या इतर मित्रांची उठबस मुकुंदरावांकडे अनेकदा होऊ लागली. नवीन कामाच्या जबाबदारीत मन गुंतवल्यामुळे मुकुंदराव आणि वरदा दोघेही आपापल्या दुःखातून थोडे बाहेर पडले. या साऱ्याचा चांगला परिणाम मोहिनीच्या तब्येतीवरही झाला.

जागतिक मंदीचा परिणाम म्हणून विनयला अमेरिकेतील नोकरी गमवावी लागली. तिथे नवीन नोकरी मिळणंही दुरापास्त झालं. त्यामुळे त्यानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सोफियाला अमेरिका सोडून भारतात येणं मान्य नव्हतं आणि मुलाची जबाबदारी घेण्याचीही तिची तयारी नव्हती. याची परिणिती त्यांच्या घटस्फोटात झाली. 

विनय आपल्या चार वर्षाच्या लेकाला, जाॅयला घेऊन दहिवलीला परतला. इतक्या वर्षातला दुरावा, मुलाच्या आणि नातवाच्या प्रेमापोटी, मुकुंदराव आणि मोहिनीनं मोठ्या मनाने मिटवून टाकला. मिळेल ते काम, नोकरी स्वीकारून पुनश्च श्रीगणेशा करायचं विनयनी ठरवलं. मुकुंदरावांच्या कामातही जमेल तशी मदत तो करू लागला.

भागीदार म्हणून हाॅस्पिटलच्या कामासाठी फेऱ्या घालता घालता कल्याणच्या आर्थोपेडिक सर्जन असलेल्या डाॅक्टर सर्वेश कुलकर्णीनी वरदाच्या मनातही जागा पटकावली. त्याचा मोठा भाऊ डेंटिस्ट आणि आई-बाबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. रमाकांतचा मित्रच असल्याने वरदाविषयी सगळी माहिती त्याला आपोआपच मिळाली. वरदाच्या बाबतीत जे काही घडलं, त्याची माहिती कुलकर्णी कुटुंबाला मिळाली होती आणि त्यात वरदाकडे काहीच उणेपणा नाही, हे त्यांनाही पटलेलं होतं. लवकरच वरदा आणि सर्वेशचं शुभमंगल अगदी साधेपणाने, पण समस्त दहिवलीकरांच्या उपस्थितीत पार पडलं. 

देवधर कुटुंबावरचं नैराश्याचं सावट दूर झालं. जाॅयच्या सहवासानं आजी-आजोबांमध्ये एक नवीन चैतन्य आलंय, घराला घरपण आलंय. रमाकांत आणि त्याच्या मित्रांनी या कुटुंबाचा परीघ विस्तारला आहे. त्यामुळे काहीना काही कारणांनी या कुटुंबाची एकमेकांच्या घरी हजेरी लागत आहे. आता विनयसाठीही वधू संशोधन चालू आहे. त्यामुळे उगाच काहीतरी विचार करत एकटं बसायला, कोणाला सवडच नाहिये.

वाईट परिस्थितीतही आपलं मनोबल टिकवून ठेवलं पाहिजे, कारण बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हेच खरंय! तुम्हालाही पटलं ना?

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एखाद्याचं नशीब — भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ एखाद्याचं नशीब — भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

मुकुंदराव देवधर म्हणजे दहिवली गावातली प्रतिष्ठित आणि दिलदार असामी! वय ५२ वर्षे, उंची पावणेसहा फूट, लख्ख गोरा रंग आणि किंचित तपकिरी झाक असलेले भेदक डोळे, असं एकूण रूबाबदार व्यक्तिमत्त्व !

मुकुंदराव सिव्हिल इंजिनिअर, बांधकाम व्यवसायात त्यांनी चांगलंच नाव कमावलं होतं. त्यांचा प्रशस्त बंगला त्यांच्या वैभवाची साक्ष द्यायला पुरेसा होता. त्या शिवाय चार गुंठे जमीनीवर आंबा, नारळ, सुपारी, पेरू, चिकू अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड केली होती. त्यातूनही बरंच उत्पन्न मिळत होतं.

शिवाय गावातील दोन पतपेढ्या, ज्युनियर काॅलेजच्या कमिटीवर ते होते आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसंबधी संस्थेचेही सन्माननीय सदस्य होते. अडल्या पडल्याला मदतीचा हात द्यायला नेहमीच ते पुढे व्हायचे. त्यामुळे गावात त्यांना आदराचं स्थान होतं.

बांधकाम व्यावसायिक असले तरी मुकुंदराव साहित्य – कला यांचे शौकीन होते. गणपतीला त्यांच्या बंगल्यासमोर मोठा मांडव घातला जायचा. तबला-पेटीच्या साथीनं दणक्यात आरती व्हायची. गावातली मंडळी आरतीला आवर्जून हजेरी लावायची. रोज किमान २०-२५ माणसं पंगतीला असायची. 

गौरी-विसर्जनापर्यंत रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचीही मेजवानी असायची. काव्य वाचन, कथाकथन, कीर्तन, भजन, हिंदी-मराठी वाद्यवृंदांचे गाण्याचे कार्यक्रम अशी धमाल असायची. पण सगळे कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडायचे. या कलाकारांचा पाहुणचार देवधर कुटुंब अगदी अगत्याने करायचं. 

आत्ता सगळं आलबेल दिसत असलं तरी मुकुंदरावांचं आधीचं आयुष्य इतकं सुखाचं नव्हतं. 

त्यांची आई त्यांना जन्म देऊन लगेच देवाघरी गेली होती. वडिलांची  फिरतीची नोकरी. ते सरकारी नोकरीत, मृद्संधारण विभागात होते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करण्यासाठी त्यांना कायम खेडोपाडी जावं लागायचं, तिथे मुक्काम करावा लागायचा. त्यामुळे वडिलांच्या आईनं, आजीनेच मुकंदरावांना सांभाळलं. पण ते आठवीत असताना तीही वारली. मग दहावीपर्यंत ते मामाकडे राहात होते. मामाकडे राहायची-खायची सोय असली तरी मामीनं त्यांच्याकडे ‘विकतचं दुखणं’ या भावनेनंच पाहिलं.  पुढच्या शिक्षणासाठी मग त्यांनी वसतीगृहात राहणं पसंत केलं आणि नेटानं अभ्यास करून सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तमरित्या पास झाले. पण पोरकेपणाची जाणीव त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती. 

इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर काही वर्ष त्यांनी सरकारी नोकरी केली. यथावकाश लग्न झालं. मुलं झाली. नंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसवून पैसा कमावला. जमीन विकत घेतली, मोठ्ठा बंगला बांधला. मधल्या काळात वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

मुकुंदरावांची पत्नी मोहिनी, मुलगा विनय आणि मुलगी वरदा असं छान चौकोनी कुटुंब होतं. विनय टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर, नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला आणि तिकडच्याच सोफियाशी लग्न करून तिकडेच स्थायिक झाला. मुकुंदराव या प्रसंगाने पार उध्वस्त झाले. आपलं कुटुंब म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं.  मुलगी तर लग्न करून सासरी जाणारच! एक मोहिनीच काय ती त्यांच्याजवळ राहणार होती. लग्न झाल्यापासून ते मोहिनीला सोडून कधीच राहिले नव्हते. व्यवसायानिमित्तही कुठे बाहेरगावी राहावं लागणार असेल तर ते मोहिनीला सोबत घेऊन हाॅटेलमध्ये राहायचे. 

वरदानं एम. काॅम., एम. बी. ए. केलं होतं. तिचं लग्न मागच्याच आठवड्यात पार पडलं. जावई निखिल पण उच्च शिक्षित आणि ऑस्ट्रेलियात नोकरीला होता. लग्नासाठी म्हणून भारतात आला होता. त्याचे आई-वडील मुंबईत, मालाडला राहात होते. निखिल त्यांचा एकुलता एक मुलगा. ओळखीतल्या एकानी स्थळ सुचवलं आणि पंधरा दिवसांत लग्न झालं सुद्धा.

नवपरिणित दांपत्य कुटुंबियांसमवेत चार दिवस कुलदैवताच्या दर्शनासाठी कोकणात गेलं होतं. त्यानंतर दोनच दिवसांत जावई ऑस्ट्रेलियाला जाणार होता. वरदाचा व्हिसा आला की ती पण तिकडे जाणार होती. दोन आठवडे तरी त्यासाठी लागणार होते.

लेक तिकडे रवाना झाली की आपण दोघं मस्त लाईफ एंजॉय करायचं, असं मुकुंदरावांनी ठरवून टाकलं होतं. त्याला कारण होतं त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य! आतापर्यंत भरपूर धावपळ केली, कष्ट उपसले. आता कामाचा व्याप कमी करायचा, मोहिनीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, असा ते  विचार करत होते. 

लेक आणि सासरची मंडळी कोकणातून परतली. दोनच दिवसांनी निखिलही ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्याआधी वरदा आणि निखिल दहिवलीला धावती भेट देऊन गेले. नंतर वरदा आपल्या सासरी मालाडला होती. तिचीही जायची तयारी एकीकडे चालू होती. 

असंच कपाटात काही तरी शोधताना तिला निखिलची काही कागदपत्रं हाती लागली. त्यात ऑस्ट्रेलियातल्या त्याच्या नेमणुकीच्या पत्राची काॅपी देखील होती. तो तिथल्या एका हाॅटेलमध्ये वेटरचं काम करत होता. त्यामुळे त्याचा पगारही अगदीच थोडा होता. वरदाला फार मोठा मानसिक धक्का बसला. कारण निखिल एम. बी. ए. फायनान्स असल्याचं, लग्न जुळवताना सांगितलं होतं. आता लग्न ठरवताना पुरावे थोडेच मागतो आपण? परस्पर विश्वासावरच अवलंबून असतं सगळं! आणि परदेशातल्या स्थळाचं आकर्षणही भुरळ घालतंच की आई-वडिलांना आणि मुलींनाही! 

मग तिनं इतरही कागदपत्रं बारकाईने बघितली. निखिल  बारावीच्या परीक्षेत जेमतेम ३६% मिळवून पास झाला होता. तिनं मग त्याचं बी. काॅम आणि एम. बी. ए. चं सर्टिफिकेट गुगलवर पडताळून बघितलं. पण गुगलवर नोंद आढळत नाही, असा शेरा येत होता. ही फार मोठी फसवणूक होती.

वरदाला काय करावं हेच कळेना. तिनं मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या एका मैत्रिणीकरवी पुन्हा तपास केला. पण या विद्यार्थ्याची नोंदच तिथे नव्हती. 

आपली काही महत्त्वाची कागदपत्रं आणायला आपण माहेरी जात आहोत, असं सांगून ती घराबाहेर पडली आणि दहिवलीला आली.

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते आणि तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. ती आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर स्वतःला झोकून देऊन ओक्साबोक्शी रडू लागली.

तिला अशा अवस्थेत घरी आलेली पाहून मोहिनी भांबावून गेली. तिनं मुकुंदरावांना फोन करून ‘लगेच घरी या, वरदा आलीय’, एवढंच सांगितलं.  मोहिनी फक्त तिच्या डोक्यावर हात फिरवत, काय झालं म्हणून विचारत राहिली. तासाभरात मुकुंदरावही घरी पोचले. तोवर वरदा थोडी शांत झाली होती. रडत-रडतच तिनं आई-बाबांना सर्व हकीकत सांगितली. 

मोहिनीला दुःख आणि संतापानं अश्रू आवरेनासे झाले. मुकुंदराव या धक्क्याने आधी एकदम निःशब्द झाले आणि नंतर संतापाने तोंडाला येईल ते बडबडू लागले. असा बराच वेळ गेला. 

मग मुकुंदरावांनी आपटेंना, त्यांच्या वकील मित्राला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाला त्यांनी फोन केला. ते देशमुखकाकाही हे सर्व ऐकून चकित आणि दुःखी झाले. ‘मुलाच्या आई-वडिलांनी दिलेली माहितीच आपण सांगितली’, असं ते म्हणाले. त्यांनी तिरीमिरीत निखिलच्या वडिलांना फोन लावला आणि अशी फसवणूक केल्याबद्दल त्यांची हजेरी घेतली. पण त्यांच्या बोलण्यातून, निखिलने या सर्व गोष्टींचा त्यांना पत्ताच लागू दिला नव्हता, हे कळत होतं. निखिलनं आपल्या आई-वडिलांचीही फसवणूक केली होती. 

कालांतराने वरदाला घटस्फोट मिळाला. पण या धक्क्यातून ती स्वतःला सावरू शकली नाही. लग्न या प्रकाराचा तिनं धसकाच घेतला आणि आपण आता लग्नच करणार नाही असं तिनं आई-वडिलांना निक्षून सांगितलं.

मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही. 

मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत. 

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चळवळ – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  माधुरीचा नाईलाज झाला. या हत्येबद्दल जयचे आईबाबा फारसे बोलायला उत्सुक नव्हते. मग माधुरीच आजुबाजूला जमलेल्या तरुण मुलांकडे पाहून म्हणाली, ‘‘ही तरुण मंडळी कशाला जमली आहेत?’’ – आता इथून पुढे)

जयची आई उद्गारली, आमच्या बाजूच्या जिल्ह्यात एका मोठ्या नदीवर नवीन धरण बांधण्याचे सरकारने ठरविले. या धरणाने कितीजणांना विस्थापित केले जाणार आहे याची सरकारला कल्पना नाही. बहुतेकजण आदिवासी लोक, त्यांनी कुठे जायचे? सरकार त्यांना आसामच्या बॉर्डरवर घर देऊ इच्छिते पण ते आपले गाव सोडून जायला इच्छुक नाहीत. आता त्यांना जबरदस्तीने हाकलले जाऊ शकते. त्या विरुध्द आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाची तयारी येथे सुरु आहे. या आमच्या घरात सायंकाळी आंदोलनातील नेते जमतात. रोज चर्चा सुरु आहे. सरकार चर्चेसाठी बोलावते का बघायचे. मागे मोटर कारखान्याच्या विरोधात आंदोलन झाले त्यात ३० तरुण मुलं मारली गेली. आमची कन्या, होणारा जावई, मुलगा सर्व या मोटर कारखान्यामुळे…. जयचे वडील बोलता बोलता थांबले. क्षणभर थांबून ते जोराने म्हणाले, ‘‘पण मोटर कारखाना इथून दुसर्‍या राज्यात गेला हे महत्त्वाचे. आमच्या गरीब लोकांच्या जमिनी परत मिळाल्या. आम्ही विजय मिळविलाच. या धरणाला पण आमचा विरोध आहेच. या धरणाची गरज नाही आम्हाला. सरकारला तो निर्णय रद्द करावाच लागेल. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. अगदी आमचे प्राण…. बोलता बोलता जयचे बाबा थांबले. माधुरीच्या लक्षात आले. बहुतेक त्यांना आपल्या मुलांची आठवण आली असणार. जयची आई हळूच माधुरीला म्हणाली, ‘‘माधुरी, जयला भेटलेलीस इतक्यात?’’

 ‘‘होय आई’’ माधुरी म्हणाली.

 आई चटकन आत गेली आणि एक मिठाई बॉक्स घेऊन आली.

 ‘‘माधुरी, माझं एक काम कर, ही बंगाली मिठाई आहे. संदेश. जयला फार आवडते संदेश मिठाई. पुण्याला गेलीस की जयला भेटून ही मिठाई दे. म्हणावं, आईकडून ही शेवटची मिठाई…. कदाचित…..’’

आईला मोठा हुंदका आला. माधुरी पुढे गेली. आईच्या खांद्याभोवती हात घालून तिने आईला जवळ घेतले. क्षण दोन क्षण त्या दोघी एकमेकींच्या मिठीत अश्रू ढाळत होत्या. दुसर्‍या क्षणी आई बाजूला झाल्या. माधुरीला म्हणाल्या, ‘‘जयला सांग एक मोठ्ठं धरण बोडक्यावर मारलंय सरकारनं, त्याच्या विरुध्द आंदोलन सुरु होत आहे. त्याची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे तुझ्या आईबाबांना अजिबात वेळ नाही.’’ एवढं बोलून आई झटकन आत गेली. जयचे बाबा पण उभे राहिले. माधुरी त्यांना नमस्कार करुन निघाली. माधुरीने बाहेर पडतापडता पाहिले, मघा आत गेलेली जयची आई बाहेर महिला कार्यकर्त्यांच्या गराड्यात बोलत होती.            

माधुरी आणि सुप्रिया गाडीत गप्पगप्प होत्या. काहीवेळानंतर माधुरी सुप्रियाला म्हणाली, ‘‘सुप्रिया चळवळ म्हणजे काय? चळवळीतले कार्यकर्ते कसे असतात हे आज मला कळाले, मी इथे आले नसते तर कदाचित कळलेच नसते.’’ रात्रौच्या विमानाने माधुरी पुण्यात पोहोचली. दुसर्‍या दिवशी नेने सरांना भेटून तिने सर्व वृत्तांत सांगितला. नेने असोशिएटस् तर्पेâ तुरुंगाधिकार्‍याकडे जयची भेट मागितली गेली आणि यावेळी माधुरी एकटीच तुरुंगात पोहोचली. थोड्यावेळाने मागच्या वेळेसारखाच सशस्त्र पोलीस बंदोबस्तात जय बाहेर आला. ‘‘हाय माधुरी, काही काम होत का? केस केव्हा सुरु होणार?’’

‘‘बहुतेक पंधरा दिवसात’’

‘‘नाही, माझं आयुष्य किती शिल्लक राहिलं याचा हिशेब करतोय.’’

माधुरी आवेगाने म्हणाली, ‘‘असं बोलू नकोस जय, मला यातना होतात.’’      ‘‘एवढी इमोशनल होऊ नकोस माधुरी, माझ्या मनाची तयारी झाली आहे. का आली होतीस?’’

‘‘मी तुझ्या घरी जाऊन आले, तुझ्या आईबाबांना भेटून आले.’’

‘‘कशाला गेली होतीस ? केस संदर्भात ? अजून या केसमधून मी सुटेन अशी आशा वाटते का तुला?’’

‘‘वकीलाने आपल्या अशिलाच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करायलाच हवे जय, आणि दुसरं म्हणजे बंगालमधील चळवळीतील तुझ्या आई-बाबांना पण समजून घ्यायचं होत.’’

‘‘हो, आमचं कुटुंब चळवळीतीलं, आम्ही आमचा स्वार्थ कधी पाहिलाच नाही. आईबाबांना नोकरीत पगार मिळायचा तोपण निराधार कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व्हायचा. माझ्या आई-बाबांना आम्ही दोनच मुलं नव्हतो, अशी शेकडो मुलं आमची भावंडं होती.’’

‘‘जय, आजुबाजूला स्वार्थी माणसांची डबकी पाहिली की तुझे आईबाबा उत्तुंग वाटतात रे! अशी माणसं अजून या जगात आहेत हे खरं वाटत नाही. जय बंगालमध्ये एका धरणाविरुध्द आंदोलन सुरु झाले आहे आणि तुझे आई-बाबा त्या आंदोलनात पुन्हा सक्रिय झाले आहेत. तुमच्या घरात कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. त्यांना माझ्याशी बोलायला सुध्दा वेळ नव्हता.’’

‘‘छान आहे, चळवळ, कार्यकर्ते हा त्यांचा श्वास आहे. मागच्या आंदोलनात मोटर कारखान्याच्या मालकाला शेवटी कारखाना बाहेर न्यावाच लागला. शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या.’’

‘‘पण जय, त्यासाठी किती किंमत मोजावी लागली ? तीस मुलं जागच्या जागीच मृत्युमुखी, त्याशिवाय….’’

‘‘त्याशिवाय तनुजा, विश्वास, मी असंच म्हणायचं आहे ना माधुरी ? चळवळीतील लोक जीवाची पर्वा करत नाहीत. “

एवढ्यात माधुरीला आठवण झाली. तिने पर्समधील जयच्या आईने दिलेला संदेश मिठाईचा बॉक्स बाहेर काढला, तो जयसमोर धरुन माधुरी म्हणाली, ‘‘जय तुझ्या आईने तुझ्या आवडीची संदेश मिठाई पाठविली आहे.’’

‘‘संदेश मिठाई ? ही मिठाई मला फार आवडते. ’’ तो मिठाईचा बॉक्स जयने हातात घेतला, बॉक्स गोंजारला, ‘‘माधुरी, गेले दोन महिने तुरुंगातील अन्न खाऊन शरीराला त्याची सवय झालीय, त्या शरीराला ही तुपातली संदेश मिठाई खाऊन पुन्हा ती सवय मोडायला नको. माधुरी ही मिठाई माझ्यातर्फे  तुला भेट. नाहीतरी माझ्यासाठी तू एवढे करतेस याचा उतराई मी कसा होऊ?’’

‘‘जय असं बोलू नकोस रे !’’

‘‘मला समजतयं माधुरी, मी पण तरुण आहे, तरुणाईच्या सर्व संवेदना माझ्याही मनात आहेत. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम दिसत आहे पण ही वेळ चुकीची आहे. तुझं लग्न ज्या तरुणाशी ठरलयं त्याच्याशी लग्न कर आणि सुखी हो.’’ एवढं म्हणून जय आत निघून गेला. तो संदेश मिठाईचा बॉक्स हातात घेऊन माधुरी बाहेर पडली.

पंधरा दिवसानंतर विजयकुमार चौहान हत्येची सुनावणी चालू झाली. प्रतिकला कल्पना होती, माधुरी नुसती जय सरकारची वकिल नव्हती ती मनाने त्याच्यात अडकली होती. त्यामुळे प्रतिक रोज कोर्टात हजर राहत होता. सकाळी तो आपल्या गाडीतून माधुरीला आणत होता, सायंकाळी घेऊन जात होता.

सरकारी वकिलांनी अनेक पुरावे दाखल करुन जय सरकारला फाशी देण्याची विनंती केली.

माधुरीने पुराव्यातील त्रुटी दाखवून जयचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशी ऐवजी कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली.

जय ने विजयकुमार चौहान व त्याच्या अंगरक्षकाची गोळी मारुन हत्या केल्याचे मान्य केले.

कोर्टाने जय सरकारला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

माधुरी शांत होती. तिने शांतपणे कोर्टाचा निकाल ऐकला. पोलीस बंदोबस्तात जयला नेत असताना माधुरी आणि प्रतिक त्याला समोरे गेले. जय म्हणाला, ‘‘माधुरी, एक महिन्यापूर्वी तुझी ओळख नव्हती. पण माझ्यासाठी तू जी धडपड केलीस त्याला तोड नाही. आता माझ्यासाठी एकच कर, मी जिवंत असेपर्यंत तुझे आणि या तरुणाचे लग्न होऊ दे. ती बातमी मला ऐकू दे. ही माझी शेवटची इच्छा समज.’’

पोलीस जयला घेऊन गेले.

२ डिसेंबर रोजी प्रतिक आणि माधुरी यांचे लग्न झाले. दुसर्‍या दिवशी माधुरी प्रतिकसह जयला तुरुंगात भेटून आली. तिघांनी नेहमी मित्र गप्पा मारतात तशा गप्पा मारल्यात. बाहेर पडताना माधुरीने जयला पाहून घेतले. जयने हसत हसत माधुरी-प्रतिकला निरोप दिला.

२१ डिसेंबर रोजी विजयकुमार चौहान हत्येबद्दल जय सरकारला फाशी दिले गेले.

बंगालमधील धरणाच्या विरोधातील आंदोलन सुरुच आहे. भारतात आणि जगात भूमीपुत्र आपल्या हक्कांसाठी सरकारबरोबर आणि उद्योगपतींसोबत लढतच आहेत. आंदोलने करतच आहेत. चौहानांसारखे पोलीस अधिकारी अधिकारांचा वापर करुन निरपराधा लोकांवर गोळीबार करीतच आहेत. त्यात तनुजा सारखी तरुण मुल हकनाक मरतच आहेत, विश्वास सारखे तरुण रस्त्यात गोळी खातच आहेत आणि जय सारखे फासावर जातच आहेत. सरकारची दडपशाही सुरुच आहे. आंदोलने सुरुच आहेत. पुन्हा गोळीबार… पुन्हा फाशी… सारे चालू राहणार आहे….. चालूच राहणार आहे….

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चळवळ – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(मागील भागात आपण पहिले – ‘‘नाही गं, काय तरी काय?’’ असे म्हणत माधुरीने फाईलमध्ये लक्ष घातले. पण त्या फाईलमध्ये तिचे लक्ष कोठे लागायला ? माधुरीच्या लक्षात आल प्रतिकचे दोन फोन येऊन गेले कालपासून या गडबडीत त्याचा फोन घेणे काही जमले नाही. तिने त्यास सायंकाळी ५ वाजता वैशाली कॅफेमध्ये भेटूया असा मेसेज केला. – आता इथून पुढे)

सायंकाळी माधुरी वैशालीवर पोहोचली तेव्हा प्रतिक तिची वाटच पाहत होता. ती दिसताच त्याने कॉफीची ऑर्डर दिली. त्याच्या समोर बसताच माधुरी बोलू लागली, ‘‘सॉरी प्रतिक, कालपासून कामात होते, नेने सरांनी एका केसची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय, तुला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी सोलापूर रोडवर सकाळच्यावेळी माजी पोलीस अधिक्षक चौहान साहेबांची झालेली हत्या,’’

‘‘हो तर, आठवतं तर! मी रोज त्याच रोडने ऑफिसला जातो. हत्येमुळे त्या दिवशी रस्ता बंद केलेला त्यामुळे मी दोन तास उशिरा पोहोचलो ऑफिसात.’’

‘‘त्याच हत्येमधील पकडलेला आरोपी जय सरकार ची केस कोर्टाने नेने असोशिएटस् कडे पाठविली आहे. आणि नेने सरांनी ती केस माझ्याकडे दिली आहे. म्हणजे कोर्टात मी जयची बाजू मांडणार’’

‘‘मग त्याकरिता त्या खुन्याला तुला भेटावं लागणार?’’ – प्रतिक

‘‘होय, काल नेनेसरांबरोबर भेटले मी त्याला. विलक्षण अनुभव होता तो. आणि माधुरी जयची पार्श्वभूमी, कलकत्त्यातील आंदोलन चिरडणारे अधिक्षक चौहान आणि गोळीबारात तीसजन मृत्युमुखी, त्यात जयची बहिण तनुजा मृत्युमुखी आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुण्यात आलेले विश्वास आणि जय हे सर्व प्रतिकला सांगत सुटली. हे बोलताना जय बद्दल माधुरी एवढे भरभरुन बोलायला लागली की तिला त्याचे भानच नव्हते. तिचे दहा मिनिटे जय बद्दल भरभरुन बोलणे ऐकून प्रतिक उद्गारला, ‘‘माधुरी तू एका खुन्याबद्दल बोलते आहेस की प्रियकराबद्दल?’’

माधुरी दचकली. मग हळूच म्हणाली, ‘‘खरचं प्रतिक, कुणीही प्रेमात पडावं असाच आहे जय’’ एवढं म्हणून माधुरी गप्प झाली. मग ती आपल्याच विचारात मग्न झाली. प्रतिकच्या लक्षात आले. आता माधुरी मुडमध्ये नाहीय. तो पण गप्प राहिला.

रात्रौ बेडवर पडल्यापडल्या माधुरी सकाळचे सुवर्णाचे बोलणे आठवू लागली – ‘‘माधुरी तू जयच्या प्रेमात पडलीस की काय?’’ सायंकाळी प्रतिक म्हणाला, ‘‘माधुरी तु एका खुन्याबद्दल बोलते आहेस की प्रियकराबद्दल?’’ माधुरी विचार करु लागली. खरंच मी जयच्या प्रेमात पडले की काय? जयच्या आठवणीने ती मोहरली. त्याच्या सोबतच्या काल्पनिक विश्वात रमली. एवढ्यात तिला आठवले. अरे ! जय, चौहान हत्येतील आरोपी आहे आणि काही आश्चर्य झाले नाही तर त्याला फाशी… माधुरी दचकली. आपले लग्न प्रतिकशी ठरले आहे. मग आपल्या मनाची अशी द्विधा परिस्थिती का झाली आहे? छे ! छे !! जयचा विचार मनातून काढून टाकायला हवा. माधुरीने एक पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचता वाचता झोप यावी म्हणून, पण आज झोपही तिच्यावर रुसली. नेहमी तिच्यावर प्रसन्न असलेल्या झोपेचा आज लपंडाव सुरु होता आणि रात्रभर जय तिचा पिच्छा सोडत नव्हता. पहाटे चारच्या सुमारास ती दचकून जागी झाली. तेव्हा तिच्या स्वप्नात आपण जयसोबत वैशालीमध्ये कॉफी पित होतो असे होते. मग तिला आठवले आज सायंकाळी प्रतिकसोबत आपण वैशालीमध्ये कॉफी प्यायलो. मग स्वप्नात प्रतिक यायचा सोडून जय का आला ? फक्त एकदाच जय तुरुंगात सशस्त्र पोलीसांसोबत आणि नेनेसरांसोबत भेटला. त्यातील दोन किंवा तीन वाक्ये आपल्यासोबत बोलला असेल तरीही पूर्ण शरीरभर,मनभर तो व्यापून का गेला? असे का व्हावे ? तो देखणा होता म्हणून ? अत्यंत कुशाग्र बुध्दीचा होता म्हणून ? छे छे ! आपली आयुष्याची सव्वीस वर्षे पुण्यासारख्या शहरात गेली. नूतन मराठी सारखी शाळा, एस.पी. सारखं कॉलेज, प्रायोगिक नाट्य ग्रुप्स, लॉ-कॉलेज मध्ये कितीतरी देखणे, हुशार, श्रीमंत तरुण आजुबाजूला होते. कित्येकजण मित्र होते. अनेकांना आपल्याशी मैत्री वाढवायची होती. पण आपण कुठेच अडकलो नाही. दोन महिन्यापुर्वीच नात्यातल्या प्रतिकचे स्थळ आले आणि त्याचे आईबाबा आणि आपले आईबाबा यांच्या संमत्तीने प्रतिकशी लग्न ठरले. आपले आजपर्यंतचे आयुष्य सरळ रेषेत गेलेले. पण दोन दिवसापूर्वी जय समोर आला आणि मनातल्या समुद्रात वादळ शिरले.

सकाळी उठल्याबरोबर माधुरीने निश्चय केला आपल्याला जयच्या आठवणीपासून दूर जायला हवे, तो आपला अशिल आहे एवढेच लक्षात ठेवायचे. ऑफिसमध्ये गेल्यागेल्या तिने नितीनला भेटायला बोलावले आणि जय आणि विश्वास संबंधात जी कागदपत्रे जमवायला सांगितली होती त्यासंबंधी आढावा घेतला. अजूनही पुराव्यातल्या त्रुटी शोधायला सांगितल्या. नेने सरांचा तिला मेसेज आला. बहुतेक चौहान हत्येची केस पंधरा दिवसात स्टॅण्ड होणार. त्यामुळे आपली तयारी लवकर करायला हवी. माधुरीला वाटायला लागले आपण जयच्या आईवडीलांना भेटायला हवे. त्याचे आणखी कोण जवळची मंडळी असतील त्यांना भेटायला हवे. कोण जाणे काही तरी नवीन माहिती मिळायची. माधुरी नेने सरांच्या केबिनमध्ये गेली. ‘‘सर, मला वाटतं मी बंगालमध्ये जाऊन जयच्या आईवडीलांना भेटायला हवे. त्याची कोण जवळची मंडळी असतील त्यांनासुध्दा भेटायला हवे.’’

‘‘माधुरी, तुला मी मागेच बोललो होतो, जयच्या नातेवाईकांना एकदा भेटणे योग्यच. तू येत्या शनिवारी कलकत्त्याला जाऊ शकतेस काय? कलकत्त्यात माझे मित्र आहेत सुब्रतो नावाचे. त्यांची लॉ फर्म आहे. ते सर्व व्यवस्था करतील. मी मनालीला सांगतो तुझी तिकिटे बुक करायला. मला उद्या भेट.’’ दुसर्‍या दिवशी मनालीने माधुरीची कलकत्ता जायची यायची तिकिटे तिच्याकडे दिली. शनिवारी सायंकाळी ५च्या सुमारास कलकत्ता विमानतळाबाहेर आली तेव्हा सुब्रतोंची सेक्रेटरी सुप्रिया तिची वाटच पाहत होती. सुप्रियाने तिला हॉटेलपाशी नेले आणि जयच्या गावी जाण्यासाठी सहावाजता गाडी घेऊन येते, प्रवास चार तासांचा आहे आणि जय च्या आईवडीलांना पुण्याहून नेने असोशिएटस् तर्फे माधुरी सामंत भेटायला येणार असल्याचे कळविल्याचे सुप्रिया म्हणाली.

सकाळी ६ वाजता सुप्रिया ड्रायव्हरसह हजर झाली तेव्हा माधुरी तयारच होती. माधुरी सुप्रियाशी हिंदीत बोलायला लागली. ‘‘सुप्रिया पुण्यामध्ये जी पोलीस अधिक्षक चौहान यांची भररस्त्यात जी हत्या झाली आणि विश्वास चक्रवर्ती जागेवरच मारला गेला आणि जय सरकार पकडला गेला याबाबत इकडची प्रतिक्रिया काय?’’

सुप्रिया – ‘‘माधुरी खरं सांगू, चौहानांबद्दल बंगालच्या लोकांना कमालीचा राग होता, त्यांची पोलीस अधिक्षक कारकीर्द अरेरावीची होती. मोटर कारखान्यांच्या विरोधात जे आंदोलन झाले ते चिरडून टाकण्यासाठी त्यांनी गोळीबाराची ऑर्डर दिली आणि तरुण कॉलेजमधली मुलं मारली गेली. चौहानांचा खून झाल्याचे कळताच लोकांना आनंद झाला पण विश्वास, जय सारखी तरुण मुलं पोलीसांच्या तावडीत मिळाली याचे लोकांना वाईट वाटले.

चार तासांचा प्रवास करुन माधुरी आणि सुप्रियाने जयच्या गावात प्रवेश केला. आणि थोडीफार चौकशी केल्यानंतर त्यांची गाडी घरसमोर आली. त्या घराकडे माधुरी एकटक पाहत राहिली. छोटासा बंगला होता. बाहेर हिरवळीवर तरुण मुलं-मुली हातात कागदपेन घेऊन बसले हाेते. काहीजण घरातून बाहेर ये-जा करत होते. माधुरी आणि सुप्रिया हिरवळीवरुन चालत घराच्या दिशेने निघाल्या तेव्हा एक तरुण मुलगी बाहेर आली आणि सुप्रियाशी बंगालीत बोलू लागली आणि दोघींना आत बेडरुमध्ये घेऊन गेली. माधुरी बसलेल्या खोलीचे निरीक्षण करत होती. रविंद्रनाथ टागोरांचा एक मोठा फोटो होता. त्याच्याकडे पाहत असतानाच जयचे आईबाबा खोलीत आले. माधुरीच्या लक्षात आले. जयने आईचा तोंडवळा आणि बाबांची उंची घेतली आहे.

‘‘नमस्कार, मी माधुरी सामंत, पुण्याच्या नेने असोशिएट्स मधील वकील’’

‘नमस्ते, तुम्ही येणार याची कल्पना सुब्रतोच्या ऑफिसमधून दिली होती. तुम्ही जयचे वकिलपत्र घेतले? का ? त्याने चौहानांच्या हत्येचा कबुलीजबाब दिला आहे ना पोलीसांकडे ?’

‘‘जयने कबुली जबाब दिला असला तरी माननीय कोर्टाने जयच्या वतीने कोर्टात केस चालविण्याची विनंती केली आणि नेने असोशिएटस् ने ही केस चालविण्यासाठी माझी नियुक्ती केली.

जयचे वडील म्हणाले, ‘पण एवढे लांब येण्याचे कारण?’

‘‘आम्ही जयच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न करणार. चौहान हत्येसंबंधात काही नवीन माहिती मिळते का याकरिता मी इकडे आले.’’

‘या माहितीचा फारसा उपयोग होणार नाही माधुरी. जयने पोलीसांकडे हत्येचा कबुली जबाब दिला आहे आणि कोर्टात सुध्दा तो हत्येची कबूली देईल. तो बंगालमधील सरकार घरण्यातील मुलगा आहे. आम्ही मरणाला घाबरत नसतो. माधुरीचा नाईलाज झाला. या हत्येबद्दल जयचे आईबाबा फारसे बोलायला उत्सुक नव्हते. मग माधुरीच आजुबाजूला जमलेल्या तरुण मुलांकडे पाहून म्हणाली, ‘‘ही तरुण मंडळी कशाला जमली आहेत?’’

क्रमश: भाग-२ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चळवळ – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(मागील भागात आपण पहिले –  आपल्याला फक्त दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे. तेव्हा तुम्ही आणि तुमचा साक्षीदार विश्वास चक्रवर्ती बंगालमधून पुण्याला का आला हे मला कळणे महत्त्वाचे आहे. आता इथून पुढे )

जय सरकार – नेने असोशिएट्स च्या सुरेश नेनेंनी प्रश्न केला तुम्ही आणि तुमचा साथीदार विश्वास चक्रवर्ती बंगालमधून पुण्याला का आलात ? याकरिता सहा वर्षापुर्वीचा काळ डोळ्यासमोर आणावा लागेल. बंगालमधील एका लहान शहरात माझे आईबाबा राहत आहेत. दोघेही तेथील कॉलेजमध्ये प्रोफेसर. मी जय आणि छोटी कॉलेजमध्ये जाणारी बहिण तनुजा. आई वडिल प्रोफेसर्स असले तरी चळवळीतील होते. आंदोलनात भाग घेत होते. अन्यायाविरुध्द बोलत होते. लिहित होते. आमच्या घरी आंदोलनकर्त्यांची उठबस असायची. थोडक्यात आंदोलनकर्त्यांचे मुख्य केंद्र आमचे घर होते. सहा वर्षापूर्वी बंगालमध्ये मुंबईच्या उद्योगपतीने मोटर कारखाना सुरु करण्याचे ठरविले. त्याकरिता बंगाल सरकारने जबरदस्तीने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्या विरुध्द आंदोलन झाले. माझे आईबाबा आंदोलनात सक्रिय होते. एकदा जिल्हाधिकार्‍याकडे या जमिनींबद्दल मोर्चा होता. हजारो लोक मोर्च्यात सामील झाले होते. माझ्या आईवडिलांना आधीच स्थानबध्द केले होते, पण माझी कॉलेजमध्ये जाणारी बहिण तनुजा. तिचा कॉलेजमधील मित्र विश्वास चक्रवर्ती आणि शेकडो कॉलेज विद्यार्थी या मोर्चात सामील झाले होते. या वेळी पोलीस अधिक्षक होते विजयकुमार चौहान. मोर्चा मोडून काढण्याचा त्यांनी हुकूम केला. पहिल्यांदा अश्रूधुर आणि नंतर गोळीबार करण्याची ऑर्डर दिली. त्यात तीस माणसे गोळी लागून मृत झाली. माझी १९ वर्षाची बहिण तनुजा त्यापैकी एक होती. विश्वासच्या दंडाला गोळी लागली पण तो बचावला. आम्हा सर्वांची लाडकी बहिण एवढ्या तरुण वयात आम्हाला सोडून गेली. माझ्या आईवडीलांवर आणि अशा कित्येक पालकांवर असा मोठा प्रसंग आला. विश्वास चक्रवर्तीची तनुजा खास मैत्रिण. दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते. मोर्चात विश्वास आणि तनुजा बाजू-बाजूला होते. विश्वास थोडक्यात बचावला. त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्यानंतर माझा हात हातात घेऊन त्याने पोलीस अधिक्षक चौहान यांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. आणि त्यासाठी माझे सहाय्य मागितले आणि मी त्याला शब्द दिला. पण चौहानला मारणे तेवढे सोपे नव्हते. त्यांना कडेकोट पोलीस संरक्षण होते. म्हणून मी आणि विश्वास नक्षलवादी संघटनेत सामील झालो. नक्षलवाद्यांकडे संघटना होती. कार्यकर्ते होते, हत्यारे होती, पैसा होता. समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांची त्यांना सहानुभूती होती. आमच्या मनाची तडफड त्यांना समजली. त्यांनी सर्व प्रकारचे मदत करण्याचा शब्द दिला. दरम्यान चौहान पुण्याला स्थायीक झाल्याचे कळले. आमचे कार्यकर्ते त्यांच्या मागावर होतेच. मी आणि विश्वास या आधी चार वेळा पुण्याला येऊन गेलो. चौहानांचे घर, त्यांची सोलापूर रोडला असलेली शेतजमीन, याची माहिती, नकाशे आमच्याकडे होते. चौहान रोज सकाळी साडेनऊला आपल्या घरातून बाहेर पडतात आणि दहा वाजता आपल्या शेताकडे पोहोचतात हे माहित झाले होते. तसेच त्यांच्या गाडीत एक अंगरक्षक असतो हे कळले होते. पुण्यातून सोलापूर रोडला वळून दोन मिनिटावर स्पॉट निश्चित झाला होता. विश्वास मोटरसायकल चालवणार होता आणि मी पिस्तुल घेऊन मागे बसलो होतो. दोघांच्याही अंगात निळे जॅकेट होते. प्लॅननुसार सर्व पार पडले. पण अंगरक्षकाने गोळीबार केला आणि विश्वासला वर्मी गोळी लागली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. मी रस्त्यावर पडलो. आणि पळण्याचा प्रयत्न करत होतो परंतु लोकांच्या तावडीत सापडलो. खरं तर माझ्या पिस्तुलात भरपूर गोळ्या होत्या, त्या रस्त्यावरील लोकांवर मी वापरल्या नाहीत, कारण ते माझे दुश्मन नव्हते. दुश्मन फक्त चौहान होता. त्याला संपवायचे होते. तो संपला पण तनुजानंतर तिचा आणि माझा जवळचा मित्र विश्वास पण गेला.  

जय नेनेंकडे वळून म्हणाला – ‘‘मी पोलीसांकडे हत्येचा कबुली जबाब लिहून दिलेला आहेच, तेव्हा वकिलसाहेब तुमची ही तरुण सहकारी माझा कसला बचाव करणार? आता मला जगायचे नाही, माझी लाडकी बहिण मारली गेली, मित्र विश्वास मारला गेला आमच्या घरी माझे आईवडिल जिवंत आहेत फक्त, खरंतर त्यांच्यातला जीव कधीच गेलाय.’’ जय बोलायचा थांबला. नेनेसाहेब स्तब्ध झाले होते. माधुरी स्तब्ध होती.

‘‘ओके. तरीपण वकिल म्हणून आमचे कर्तव्य आहे, तुम्हाला या हत्येच्या आरोपातून मुक्त करणे. गरज पडेल तेव्हा माधुरी तुम्हाला भेटेलच. तिला सहकार्य करा. आम्ही तुमची केस कोर्टात लढणार.’ एवढे बोलून नेने आणि माधुरी बाहेर पडली.

नेनेंची गाडी जेलमधून निघाली आणि पाच मिनिटानंतर गाडी एका बाजूला उभी करुन नेने म्हणाले, माधुरी या जयची कथा विलक्षण आहे, चुटपुट लावणारी आहे. युपीएस्सी परीक्षेत देशात पंचेचाळीसावा आलेला तरुण आज हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि त्याला फाशी होण्याची शक्यता आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात असलेल्या अधिकाराने कायदा धाब्यावर बसवतात आणि चौहानांसारखे पोलीसांमधील अधिकारी सत्ता राबवतात. आंदोलने चिरडतात आणि त्यातून तनुजासारखे कोवळे जीव नाहक मरतात. काही वेळा आपल्या देशात लोकशाही आहे की हिटलरशाही असा प्रश्न पडतो.’’

माधुरी गप्प होती. जयच्या व्यक्तिमत्त्वाने माधुरी दिपून गेली होती. त्याचे दिसणे, त्याचे बोलणे, त्याचे सद्गदीत होणे सारेच वेगळे. नेने सरांनी गाडी पुन्हा सुरु केली. ‘‘माधुरी नितिनला सांगून या केसविषयी लागतील ती कागदपत्रं मिळव. जय आणि विश्वासचे विमान तिकिट, हॉटेलमधील वास्तव्य, त्यांनी वापरलेली गाडी, सोलापूर रोडवरील साक्ष दिलेले लोक यांची भेट घे. पोलीसांच्या तपासात चुका या होतातच. त्या चुकांवर लक्ष दे. शिवाय बंगालमध्ये जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेट. त्याकरिता कलकत्त्याला जावे लागले तरी हरकत नाही. आणि वेळोवेळी मला रिपोर्ट देत जा. पण माधुरी तुला सांगतो मला हा जय सरकार फार फार आवडला. खरंतर तो एक आदर्श, हुशार सरकारी अधिकारी व्हायचा ते सोडून काय झाले बघ!’’

गाडी ऑफिसजवळ आली आणि माधुरी गाडीतून उतरुन आपल्या केबिनमध्ये गेली. खुर्चीत बसली आणि तिच्या डोळ्यासमोर आला तरुण, रुबाबदार जय सरकार. तिने मोबाईलमध्ये पाहिले. प्रतिक, तिच्या चार महिन्यानंतर होणार्‍या नवर्‍याचे दोन मिस्डकॉल होते. मघा तुरुंगात जय समोर असताना मोबाईल स्विच ऑफ केला होता. तिने तो चालू केला. प्रतिकचा मेसेज पण आला होता फोन करण्यासाठी. पण माधुरीने त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी तिच्या डोळ्यासमोर होता जय.

माधुरीने नितीनला बोलावले आणि चौहान हत्येसंबंधी सर्व पुरावे जमा करायला सांगितले. तसे जेट विमान ऑफिसमध्ये जाऊन जय आणि विश्वास यांच्या आगमनाची तारीख, हॉटेलमधील वास्तव्य, खरेदी केलेली मोटरसायकल, पेट्रोल भरण्याची जागा इत्यादी सर्वांची खात्री करायला सांगितली. ती स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि इन्स्पेक्टर कोल्हेंकडून हत्येची माहिती घेतली.

सायंकाळी थकून माधुरी घरी पोहोचली. तेव्हा तिच्या अवतीभवती जय होता. प्रतिकला फोन करण्याची तिला इच्छा होईना. वॉश घेऊन माधुरी गॅलरीत बसली तेव्हा तिला तुरुंगात जय बोलत असतानाचा शब्द न् शब्द आठवत होता. कल्पनेनेच तिला जयचे आईवडील, चळवळीतील त्याचे सहकारी, कॉलेजमध्ये जाणारी लहान बहिण तनुजा, तिचा मित्र विश्वास चक्रवर्ती सारे कसे डोळ्यासमोर येत राहिले. युपीएस्सीचा अभ्यास करणारा जय, युपीएस्सीची परीक्षा देणारा जय आणि नंतर तनुजाच्या मृत्युने कोळसलेले जय आणि त्याचे आईबाबा, विश्वास सारे सारे कल्पनेनेच डोळ्यासमोर येत होते. मग जय आणि विश्वास यांचे नक्षली चळवळीत सामील होणे, वारंवार पुण्याला येणे, चौहानांचा पाठलाग करणे, मोटरसायकलवरुन चौहानांवर गोळ्या मारणे आणि मग विश्वासचा डोळ्यासमोर मृत्यु पाहणे, मग लोकांकडून आणि मग पोलीसांकडून पकडले जाणे, किती मार खाल्ला असेल जयने? पोलीस अधिक्षकांची हत्या करणार्‍याला पोलीसांनी किती छळले असेल? कल्पनेनेच माधुरीच्या डोळ्यात पाणी आले. गळ्यात हुंदका आला. आता काय करु शकते मी जयसाठी ? मी त्याला सोडवू शकते का? माधुरीच्या जीवाची घालमेल होत होती. दोन वेळा जेवणासाठी आई हाक मारुन गेली पण माधुरीचे लक्ष नव्हते.

रात्री जेवताना आईशी ती जय सरकारबद्दल बोलली. तिचा प्रत्येक घास जय च्या आठवणीतून तोंडात जात होता. तुरुंगात जयला कसले अन्न मिळत असेल? या विचाराने तिचा घास घशात अडकत होता. दुसर्‍या दिवशी वकिलरुममध्ये तिची मैत्रिणी सुवर्णा भेटली.

सुवर्णा – ‘‘काय गं माधुरी, काल चौहान हत्येच्या खुन्याला भेटायला गेलेलीस ना तुरुंगात? भिती नाही वाटली?’’

माधुरी – ‘‘भिती! कदाचित कालची भेट आयुष्यातील सर्वोत्तम भेट ठरावी. मी भेटायला गेलेला तरुण गुन्हेगार खराच पण युपीएस्सी परीक्षेत देशात पंचेचाळीसावा आलेला, सुशिक्षित आईबाबांचा मुलगा, तरुण, देखणा, अतिशय संवेदनाशील असा अठ्ठावीस वर्षाचा तरुण होता. त्याला भेटणे ही अविस्मरणीय घटना ठरली माझ्या आयुष्यात.’’ आणि माधुरी सुवर्णाला जय सरकारबद्दल सांगत सुटली. माधुरी कोसळणार्‍या धबधब्यासारखी बोलत राहिली आणि सुवर्णा ऐकत राहिली. एवढं ऐकून घेतल्यावर सुवर्णा म्हणाली – ‘‘माधुरी तु जयच्या प्रेमात पडली की काय?’’ तिच्या या प्रश्नाने माधुरी भानावर आली.

‘‘नाही गं, काय तरी काय?’’ असे म्हणत माधुरीने फाईलमध्ये लक्ष घातले. पण त्या फाईलमध्ये तिचे लक्ष कोठे लागायला ? माधुरीच्या लक्षात आल प्रतिकचे दोन फोन येऊन गेले कालपासून या गडबडीत त्याचा फोन घेणे काही जमले नाही. तिने त्यास सायंकाळी ५ वाजता वैशाली कॅफेमध्ये भेटूया असा मेसेज केला.

क्रमश: भाग-२ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares