मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“आई, येत्या सत्तावीस एप्रिलला अनु आणि प्रिया विथ फॅमिली आपल्याकडे येणार आहेत!” सुधीरनं मोठ्या उत्साहात सांगितलं. 

“गेल्या कित्येक वर्षात त्या एकत्र कधीच फिरकल्या नाहीत. तर आताच दोघींना एकाचवेळी यायचं कसं सुचलं? तेहि असं अचानक?” सरस्वती खिन्न मनाने बोलली.

“अगं असं काय करतेस? येत्या तीस एप्रिलला तुझी पंचाहत्तरी साजरी करायचीय आहे ना?”

“माझी पंचाहत्तरी साजरी करायची काही आवश्यकता नाही. मी वयाने वाढले आहे, त्यात माझं काय कर्तृत्व आलंय? तो काळाचा नियम आहे, त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.” सरस्वती अनिच्छेनेच बोलली.

“आई तू म्हणतेस ते खरं आहे. अगं कृतज्ञतेचा म्हणून एक भाग असतो. आई वडिलांची पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे प्रियजनांना साजरे करावेसे वाटतात. आई, हे सगळं या दोघी बहिणींनी मिळून हे ठरवलंय. त्या दोघींचं ह्या निमित्ताने मनमिलाप झालं असेल तर मी कसं नाही म्हणू?” सुधीरनं सांगितलं. पण सरस्वतीला ते खरं वाटलं नाही. ती काहीच बोलली नाही.           

सुधीरनं लगेच अनुला फोन लावला. “अनु, तुम्ही सहकुटुंब सत्तावीस एप्रिलला इथे हजर असणार आहात. मी कसलीही सबब ऐकून घेणार नाही. येत्या तीस एप्रिलला आईची पंचाहत्तरी साजरी करायचीय. अनु आणि प्रिया या दोघींनीच हा कार्यक्रम आखला आहे म्हणून मी आईला पटवून सांगितलंय. ती किती खूश झाली, हे तुला कसं सांगू? तुम्ही दोघी आता एकत्र येणार नसाल तर कधी येणार आहात गं, आई गेल्यावर?.. खूप झालं तुमचं नाटक. तुम्हा सगळ्यांची रेल्वेची तिकीटं मी उद्या बुक करतोय. समजलं?” अनु काही बोलायच्या आतच सुधीरनं फोन ठेवून दिला. प्रियाला फोन लावून त्यानं तेच संभाषण रिपीट केलं.             

कित्येक वर्षानंतर, नागपूरहून अनसूया आणि नाशिकहून प्रियवंदा त्यांच्या मुलांच्या सोबत एकाच दिवशी माहेरात येऊन पोहोचल्या. दोन्ही लेकी, चारी नातवंडांना पाहून सरस्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रसन्न चांदणं पसरलं. कधीकाळी उन्हाळ्याच्या सुटीत ही मंडळी दरवर्षी न चुकता यायची आणि जाताना एकाच दिवशी जायची.

नातवंडांनी भरलेलं गोकुळ पाहून सरस्वतीला काय करू, काय नको असं व्हायचं. कुठल्या दिवशी काय बेत करायचा ते सरस्वती आधीच ठरवायची. त्यानुसार सून सुजाता कामाला लागायची. 

त्या मेनूत सरस्वती एकदा तरी न्याहरीला गव्हाची गूळ घालून केलेली लापशी स्वत:च्या हातानं बनवायचीच. त्यात काजू बदामाचे तुकडे पेरलेले असायचे, त्यावर तुपाची धार पडताच खमंग वास सुटायचा. सुरूवातीला एका बाऊलमधे  लापशी घेऊन सरस्वती आपल्या मऊशार सायीसारख्या हातानं ती सगळ्या नातवांना प्रेमानं एक एक घास भरवायची. दोन्ही मुलींची चार आणि सुधीरची दोन मुलं अशी एकंदरीत सहा नातवंडे डायनिंग टेबलवर पाहून सरस्वतीचा जीव आनंदाने भरून जायचा. 

सरस्वतीच्या तिन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी ह्याचं वरदान लाभलेलं होतं. सगळी मुलं एकाच वयाची होती. फार तर दोन तीन वर्षाचं अंतर. सरस्वतीला मुद्दलाचा विसर पडला होता, ती व्याज पाहूनच हरखून जायची.   

सुधीरमामा तालेवार नसला तरी मोठा दिलदार माणूस. आणि भाचरांवर जीव ओवाळून टाकणारा. उन्हाळा म्हटलं की आंब्याचेच दिवस. भाचरं यायच्या आधीच हापूस आंब्यांच्या पेट्या आणून ठेवायचा. सुधीरमामाला आंब्याची छान पारख होती. आमरसासाठी हापूस तर कापून खायला केशर, बदाम, लालबाग, लंगडा, तोतापुरी घेऊन यायचा. प्रत्येक आंब्याची वेगळीच चव असायची. आंब्यांचा घमघमीत सुवास सर्वत्र दरवळत असायचा. सगळी मुलं एकत्र बसून हसतखेळत कधी आमरस पुरी तर कधी आमरस धिरडं आणि त्या सोबत कुरडया, पापड्या, मिरची भजी, मसालेभात हादडायचे. वामकुक्षी म्हणत मुलं तासभर झोप काढायचे. कधी त्यांचे पत्त्यांचे डाव रंगत असत तर कधी कॅरम बोर्ड लागायचा. 

संध्याकाळ झाली की सगळी मुलं आजीबरोबर शुभंकरोती म्हणायचे. आजी-आजोबा चांदण्याच्या आकाशाखाली बसून रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी सांगायचे. मामा व्हीसीआर सोबत एकाद्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट भाड्याने घेऊन यायचा. सिनेमा पाहून झाला की रात्रीच्या जेवणाची वेळ व्हायची. कुणालाच तशी जास्त भूक नसायची. कधी पावभाजी तर कधी साधी खिचडी किंवा थालीपीठ खाल्लं की भागायचं. 

गच्चीवर संध्याकाळी पाईपने पाणी मारून ठेवल्याने सगळी मुलं रात्री झोपायला ते गच्चीवरच जात असत. तोवर गच्ची थंड झालेली असायची. त्यावर मस्त गाद्या पसरून मुलं ठिय्या मांडत असत. गप्पा गोष्टी करत, रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकत पडायचे. थंड हवेच्या झुळकीने झोप अनावर झाली की आकाशातले नक्षत्र, तारे मोजत हळूहळू डोळे मिटत मस्त झोपायचे. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडल्यावरच उठायचे. कुणीही उठवायला यायचा नाही.

सर्व मुलांच्या दरम्यान एक अतूट स्नेहाचा घट्ट धागा होता. दोघा बहिणींचं अतिशय घट्ट सख्य होतं. प्रियंवदेची मुलं अभ्यासात खूप हुशार होती. प्रियंवदा मोठ्या उत्साहाने तिच्या मुलांची प्रगती अनसूयेला सांगायची. बघता बघता मुलांच्यातल्या निरोगी स्पर्धेचं रूपांतर कधी असूयेत झालं हे कुणाला कळलंच नाही. दोघा बहिणींच्या नात्यात खोल दरी निर्माण होत गेली. मुलांचं आजोळी येणं बंद झालं. 

संस्कार वर्ग, पोहण्याचे क्लासेस, गिटार क्लासेस, व्हेकेशन बॅचेस, त्यासाठी एक ना अनेक कारणं होती. त्यामागचं खरं कारण वेगळं होतं हे कळायला सरस्वतीला वेळ लागला नाही. अनसूयेच्या मनात असूयेनं स्थान मिळवलं. ताईला माझ्या मुलांची प्रगती पाहवत नाही हे प्रियंवदेच्या मनात घर करून राहिलं. 

मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.     

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे – 

मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी  मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.”  त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान  काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “ 

देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “     “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !” 

“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “ 

“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त  वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय  करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची.  बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही  खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.

.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं  लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “ 

“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !” 

“ बाई,”  संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू.  जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.

देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत.  मग तिचं फारसं  येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.

आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “  बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….”   बकुळ हसत म्हणाली.

देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका  ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ” 

देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.

जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !

कुठे पूर्वीची कामवाली बकुळ !  शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि  हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.

देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार ! 

देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “ 

“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.

देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली  “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.

“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “ 

आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ”  देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.

देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये  देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “ 

बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.) — इथून पुढे – 

त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. —शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते. 

विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे. 

‘‘गुड मॉर्निंग जाधव’’

‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’

‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’

‘‘बोला.’’

सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.

‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’

‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’

‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’

‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’

‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’

जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’

‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील. 

‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्‍या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’

‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’

‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’

जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला. 

‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, ‘ सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन. ‘ 

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

” हे बघा आई, मी बिझी आहे. उद्या मला मिटींग्स आहेत.एवढा काही वेळ नाही मला, मी कुमारिकेच्या घरी अथर्व बरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईन,” सायली म्हणाली .

” अगं, संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला. नीट पूजा करू, तुझ्या वेळेनुसार बोलवू, ” सासूबाई म्हणाल्या .

” आई , अहो, भाव महत्त्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय.संध्याकाळी कंटाळा येतो खूप, ” सायलीने चप्पल घालता घालता म्हटलं.

” सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता? “

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला. सासूबाई म्हणाल्या, ” शिरीष, तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्त्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव  ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या , कर्तव्य विसरतोय, असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही, शिरीषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय, असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात. तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही, पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हटलं की तुम्हाला वेळ नसतो , थकलेले असता. घरच्या आरतीलाही चार वेळा ‘या रे’ म्हणावं लागतं. कुठलाही उपास म्हटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही, असं म्हणून मोकळे होता. पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…”

सायली म्हणाली ,  “आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय.”

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे, उपास तापास , देवधर्म म्हणजे स्वतःच्या मनाला , शरीराला लावून घेतलेलं बंधन . हे unproductive आहे, असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय . आहेत , बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली, तुला म्हटलं, आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल , तू म्हणालीस, भाव महत्त्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन.अगं, दे ना तू दान. पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील- आजोबांना नमस्कार कर , तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत, त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला भाव महत्त्वाचा, ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो . उद्या अथर्व तुला, मला , शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल, तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला . परवाचंच घे , घरी भजन आहे, म्हटल्यावर तू नाक मुरडलंस , वेळ नाही म्हणालीस पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं, त्यात रंगून गेलीस.फेरदेखील धरलास आमच्याबरोबर. हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो , हे मात्र खरं आई. इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी!आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच!” सायली म्हणाली .

“हो ना ? तू रे शिरीष ,  सोवळं नाही,पण निदान आंघोळ करून आरती कर, म्हटलं की हेच- भाव महत्त्वाचा . अरे, त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते. आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं . एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही. मग गोंधळ घालायचा का विचारलं की ‘आई , भाव महत्त्वाचा, देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला . अरे देव-देवी काहीच म्हणत नाहीत , हे सगळं आपल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी आहे . एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना, प्रथा जपा रे . हे बघ. नेहमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या, तेवढं नाही करू शकले आणि सायली, तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे . तरीही सारासार विचार करून जे जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्त्वाचा पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते .

हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात .मनाचे डाएट म्हणा ना. ते किती प्रमाणात करायचं, ते ज्याचं त्याने ठरवावं. पण करावं, असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं. आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो. पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून , मेकप करून आपण जातो . दांडिया खेळू नये, असं नाही. पण आपलीही संस्कृती, परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचं. तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना. मग श्रद्धा , अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू ,सारखं भाव महत्त्वाचा म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी.उद्या असेन मी, नसेन मी…” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते . असे  शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्किंगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्किंग लॉटमधून त्याने शिताफीने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही, कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीस जण निवडले गेले. आणि या वीस जणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकुलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती. खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली – 

‘‘ आप विश्वासजी है ना ?’’

‘‘ हा, आप कौन ?’’

‘‘ मै, रचना.. एन चॅनल की तरफसे -’’

‘‘ क्या है ?’’

‘‘ मेरे सुपीरियर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’

विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्किंग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरियर बसला होता. 

‘‘ हाय मिस्टर विश्वास, मै शशांक .. फ्रॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा.  हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परीक्षकके रुप में काम करें ’’

‘‘ लेकिन मेरी कमिटमेंट…..’’

‘‘ कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप फ्री है,’’

‘‘ मुझे सोचना पडेगा ’’

‘‘ कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे ’’

रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिला पण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्‍या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खूष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.

विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्किंग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला. 

‘‘ मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’

‘‘ बघू , अजून दोन परीक्षक आहेत ना?’’

रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –

‘‘ तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा. “

‘‘ बर, बघू.’’ असं म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘ या आधी प्रत्येक स्पर्धेत धक्काच बसला ’’ 

‘ धक्का का बसला ?’  विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मूळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते…  तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधरा जण कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाच जण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला…..  केदार पासवान…  १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्‍यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या , १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायचं ठरवलं. “काय गं, तुला माहीत आहे का, नवरात्र का करतात?” आईने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी. कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं, पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे, असं. त्याला शास्त्रीय आणि वैचारिक दोन्ही आधार आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही, तूच ठरव,” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका.

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती. मग सगळ्या प्रकारची धान्यं थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे टेस्टिंग केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला, म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलंस.अगं, या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय?तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःखं समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp!”

 “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वगैरे-त्यांचं मोटिवेशन गं.” -आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता लास्ट , ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली संपणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हटलं ना, टेस्टिंग किटमधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे, हे त्या दिवशी कळतं. मग, तुमची काय ती पायलट स्टडी गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरंच काही सांगत होती.

“आणि आई , मला माहीत आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.”- आई.

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

Select मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं.) इथून पुढे — 

“वास्तविक, गेल्यावर्षी या घराचं वाटणीपत्र झालं. तेच तुझ्या वहिनीच्या जिव्हारी लागलं. ‘तुम्ही भावांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून चांगलं शिक्षण दिलंत आणि आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंत. तुम्हीच स्वत:ला घरातला एकमेव कर्तासवरता समजून स्वत:च्या उत्पन्नाची उधळपट्टी करीत होता. कुठलाही भाऊ स्वत:च्या खिशात हात घालत नव्हता. माझ्या या वेडीचं म्हणणं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही. आता अशी पश्चाताप करायची वेळच आली नसती.’ म्हणून ती खंत व्यक्त करायची. 

मी तिला सांगायचो, ‘अगं ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, ज्याचे त्याला मिळत असते आभाळगाणे किंवा माती. भले आपली मुलं जास्त शिकली नसतील. पण आज स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर काहीतरी कमवत आहेत ना? ते महत्वाचे आहे. आपल्या दोघांना फुलासारखं जपताहेत ना? बस्स, अजून काय हवं आहे?’ पण ते तिला पटायचं नाही. आणि एके दिवशी ध्यानी-मनी नसताना अचानक हृदयघाताने देवाघरी गेली.” 

तितक्यात सतीशच्या सुनेने चहा आणला. ‘माझी मोठी सून निर्मला’ असं सांगत सतीशने तिला माझी ओळख करून दिली. निर्मलाने मला नमस्कार केला. “मामंजीकडून आणि आमच्या सासूबाईंच्याकडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.” असं म्हणत ती निघून गेली. 

चहा घेता घेता सतीश म्हणाला, “माझी दोन्ही मुलं वेगवेगळा व्यवसाय करतात. तुझी वहिनी गेल्यावर मीच त्या दोघांना दोन खोल्यांत वेगळा  संसार थाटून दिला. माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था एक महिना माझी मोठी सून पाहते. एक महिना माझी धाकटी सून पाहते. एरव्ही देखील काही चांगलंचुंगलं केलं की ते माझ्यासाठी पाठवतातच.

दोघीही सुना मला हवं नको ते पाहतात. न्याहारी, चहा, दोन वेळचं जेवण अगदी वेळेवर माझ्या खोलीत आणून देतात. सकाळी कामावर जाताना आणि रात्री कामावरून आली की दोन्ही मुलं माझ्याकडे येऊन विचारपूस करून जातात. आणखी काय हवंय सांग? 

तुला आठवतं का? तुझ्या आग्रहाला बळी पडून मी एक विमा उतरवला होता. सुदैवाने त्याचे हप्ते नियमितपणे भरत होतो. गेल्या वर्षी त्याची बर्‍यापैकी रक्कम आली आणि तेच पैसे बॅंकेत गुंतवले. महिन्याला बाराशे रूपये व्याज येतं. त्यात माझं औषधपाणी व इतर खर्च भागतात. कुणाकडे एक रूपया मागत नाही. झालंच तर दोन्ही सुनांच्या घरी अधूनमधून पालेभाजी आणून देतो.”           

“तुझा वेळ कसा जातो?” असं विचारल्यावर सतीश थोडासा खुलला. “अरे ती काही समस्या नाही. लायब्ररीतली सगळी पुस्तकं आपले मित्र आहेत. बहुतेक करून आत्मचरित्रे वाचतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठे येतात असे डोळे दिपवून टाकणारे सोनेरी क्षण? तसंच अगदी कडेलोट व्हायच्या क्षणी ही माणसं स्वत:ला सावरून परत कशी ठामपणे उभी राहतात, आणि आपण कसे लहान लहान संकटात कोलमडून जातो हे लक्षात येतं.

पुस्तक वाचून झालं की उत्तराची अपेक्षा न ठेवता मी त्या लेखकाला पोस्टकार्डावर एक खुशीपत्र लिहून पाठवतो. दुसर्‍याला अत्तर लावताना तुमची बोटंही सुगंधी होतात म्हणतो ना तसे. 

आता बघ, संध्याकाळचे साडेसहा वाजले की दंगा करणारी ही सगळी कार्टी, हातपाय तोंड धुऊन दप्तर घेऊन माझ्या खोलीत येतात. आसनं टाकून शुभं करोति म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागतात. मी तिथंच पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. कुणाला काही अडलं की माझ्या जवळ येऊन विचारतात. गणित, सायन्स, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयातलं काहीही.

आपल्या मास्तर लोकांनी असं काही घोटून घेतलंय की आज पन्नास वर्षानंतर देखील ते पुसलं गेलेलं नाही. माझ्या खोलीत काळा कापडी बोर्ड लटकवलेला आहे. त्यावर मी गणितं सोडवून दाखवतो. निबंध कसे लिहायचे त्याचे मुद्दे सांगतो. ही मुलं दोन तास अभ्यासात अगदी गढून जातात आणि साडे आठ वाजले की भुर्र्कन उडून जातात. माझाही वेळ अगदी पंख लावल्यागत उडून जातो.”         

सतीशने समोरच्या हातगाडीवाल्याला बोलावून अर्धा डझन केळी विकत घेतली. तितक्यात खेळ संपवून परत आलेल्या प्रत्येक मुलाच्या हातात सतीशनं एक एक केळं ठेवलं. सगळी पोरं धूम ठोकून पळाली. 

मी सहजच म्हटलं, “सतीश, यात तुझी नातवंडं कुठली?” 

सतीश केविलवाणं हसत म्हणाला, “खरं सांगू? या सहा नातवंडात, चार नातवंडे माझ्या दोघा भावांची आहेत. अरे, या घराच्या वाटण्या झाल्या आहेत. पण नातवंडांच्या वाटण्या झाल्या नाहीत, त्यामुळे ही सहाही नातवंडे अगदी माझ्याच वाटणीला आली आहेत असं समजतो. माझे भाऊ, मला मोठा भाऊ मानत असतील की नाही माहीत नाही पण मी या सर्व नातवंडांचा ‘मोठा आजोबा’ आहे. अगदी लहानपणापासून ही मुलं माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. मी या जगातून जाईपर्यंत ही सगळी नातवंडं फक्त माझीच असणार आहेत!” 

सतीश बराच भावुक झाला होता. संध्याकाळ होत आली होती. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. आता निघावं म्हणून मी उठायला लागलो. तेंव्हा सतीशनं थरथरत्या हातानं माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू त्याला मला सोडायचंच नव्हतं. ‘पुढच्या वेळी आल्यावर निवांत भेटेन’, असं म्हणत जड मनाने मी माझ्या मित्राचा निरोप घेतला.    

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. “काय कधी आलास?” असं विचारतच भास्कर आत आला. बऱ्याच वर्षानी त्याला पाहत होतो. दाढीचे खुंट वाढलेले. अंगात अघळपघळ सदरा पायजमा. भास्कर आमच्या पूर्वीच्या घराशेजारी असायचा. अर्थात अजूनही तिथेच राहतो. 

त्याची आई कुठल्या तरी सरकारी डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होती. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचा तिने खूप प्रयत्न केला. मुलगी सुनिता पदवीधर झाली, मात्र भास्कर मॅट्रिकही पास होऊ शकला नाही. मग त्याने खाजगी नोकरी धरली. 

मी विचारलं, “आई कशी आहे?” 

त्यावर मान खाली घालून बोलला, “बरी असेल. वडील गेल्यानंतर आईला काही दिवसांसाठी घेऊन जाते म्हणून सुनिता घेऊन गेली. नंतर आम्ही आईला नीट सांभाळू शकणार नाही म्हणून तिला परत पाठवायचं नांवच काढत नाही. 

या गोष्टीला तीन वर्ष झालीत. सुरक्षिततेच्या नांवाखाली आईचे सगळे दागिने आधीच सुनिताने स्वत:च्या ताब्यात घेतले. तिचा खरा डोळा आईच्या हजारांच्या पेन्शनीवरही होता. हे सगळं पूर्वनियोजित होतं. माझ्या वाटणीला तेवढं भाड्याचं राहतं घर आलंय बघ.”

एक मात्र खरं की भास्करचं त्याच्या आईवर निस्वार्थी प्रेम होतं, यात शंकाच नाही. ही विलक्षण गोष्ट ऐकून मी चाटच पडलो. 

तो पुढे म्हणाला, “बरं ते जाऊ दे. तुझा मित्र सतीश भेटला होता. त्याने तुझी आठवण काढली. गेल्यावर्षी त्याला स्ट्रोक आला होता. पठ्ठा चिवट आहे. जरा हालचाली मंद झाल्या आहेत, पण तो आपल्या पायावर उभा आहे. जमलंच तर भेट त्याला.” असं म्हणून भास्करने निरोप घेतला.      

मध्यंतरी मी सांगलीला असताना माझा एक वर्गमित्र मला भेटायला आला होता. व्यापाराच्या निमित्ताने आला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलात जेवायला गेलो. भरपूर गप्पा मारल्या. “गावी आल्यावर नक्की फोन कर” असं म्हणून त्यानं निरोप घेतला.

नंतर एकदा गावी गेल्यावर त्या मित्राला मोबाईल लावला. मी ‘हॅलो’ म्हणताच तिकडून आवाज आला. “हां बोल, कसा काय फोन केलास? काही काम होतं कां?”

त्याच्या अशा अनपेक्षित कोरड्या प्रतिसादाने मी चांगलाच वरमलो. “अरे नाही. चुकून तुझा नंबर लागला वाटतं. आय अ‍ॅम सॉरी!” म्हणून फोन कट केला. त्यानंतर कधी कुणा मित्राला फोन करण्याच्या किंवा भेटण्याच्या फंदात पडलो नाही….                

सतीश माझा खूप जवळचा मित्र होता. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘चला मित्राला भेटू या’ म्हणून मी स्कूटीवरुन निघालो. वीसेक वर्षानंतर मी त्या परिसरात जात होतो. सगळंच कसं बदलून गेलं होतं. शोधत शोधत सतीशच्या घराजवळ आलो. उन्हं उतरली होती. बाहेर सहा सात मुलं अंगणात खेळत होती. त्या मुलांना सतीशच्या विषयी विचारलं. त्यांनी तिथेच झाडाखाली खुर्ची टाकून बसलेल्या गृहस्थाकडे बोट दाखवत, ओरडून सांगितलं, “आजोबा तुमच्याकडे कोण आलंय पहा.” मी गाडी लावली. 

बऱ्याच कालावधीनंतर मी सतीशला भेटत होतो. खूपच कोमेजलेला दिसत होता. मुळांपासून उखडलेल्या झाडाची जशी स्थिती होते तसा तो खुर्चीत आक्रसून बसला होता. आपल्या नेहमीच्याच चिरपरिचित पांढरा पायजमा आणि कुर्ता या वेषांत होता. त्याच्या मनाच्या स्थितीप्रमाणेच कपड्यांवर देखील सुरकुत्या पडल्यामुळे तो केविलवाणा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं. तो किती ऐटीत असायचा. मी पहिल्यांदाच त्याला असा पाहत होतो. 

माझ्या डोक्यावरील कॅपमुळे त्यानं मला लगेच ओळखलं नाही. कॅप काढताच, खुर्चीतून सावकाश उठून उभा राहिला आणि हात हातात घेऊन म्हणाला, “अरे, किती वर्षांनी तुला माझी आठवण आली? चक्क दहा वर्षानंतर भेटतोयस. तुझी वहिनी नेहमी तुझी आठवण काढायची.”

एव्हाना लांबून पाहणाऱ्या मुलांच्या लक्षात आलं की ‘हा कुणीतरी आजोबांचा जवळचा मित्र असणार’. ते धावतच आले. 

सतीशने त्या पोरांना सांगितलं, “बाळांनो, आत जाऊन दोन कप चहा टाकायला सांगा.”

पोरं पळतच आत गेली. जीभ जड झाल्यानं, त्याला बोलायला काहीसं अवघड जात होतं.   

मी विचारलं,“कसा आहेस?” तर खिन्नपणे म्हणाला, “बरा आहे म्हणायचं. आला दिवस ढकलायचा. तुझी वहिनी सोडून गेली, एकटा पडलो.”

मी म्हटलं, “वहिनी अशा अचानक निघून जातील असं वाटलं नव्हतं.”

सतीश घुश्शातच म्हणाला, “जाऊ दे, गेली तर गेली. मला काही फरक पडत नाही.” 

खरं तर हा वरवरचा त्रागा होता. वयाच्या अठराव्या वर्षीच सतीशचं लग्न झालं होतं. त्यांचं एकमेकावरचं घट्ट प्रेम काही झाकलेलं नव्हतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच, कसाबसा हुंदका दाबत तो म्हणाला, “अरे, तिने तरी असं मध्येच दगा द्यायला नको होतं. आताच मला तिच्या सहवासाची खरी गरज होती.”

काही वेळ स्तब्धतेत गेला. घसा खाकरत सतीश पुढं सांगत होता, “तुला तर माहीत आहे. आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्या भावांचा वेगळा व्यवसाय होता. खरेदी विक्रीत मिळणारी दलाली हा माझा बिनभांडवली धंदा होता. सचोटीच्या व्यवहारामुळे मी भरपूर पैसे मिळवत होतो. मी एकटाच निस्वार्थीपणाने घरात लागेल तो खर्च करीत होतो.

‘जो पर्यंत तुम्ही बाजारात उभे असाल तोपर्यंत तुमचे उत्पन्न चालू राहील. त्यानंतर काय? आपल्या म्हातारपणासाठी चार पैसे मागे टाका.’ असं तुझी वहिनी सारखं सांगायची पण मी कधी मनावर घेतलं नाही. 

ती जिवंत होती तेव्हाच मी गंभीरपणे आजारी पडलो. सहा महिने बिछान्याला खिळून होतो. उत्पन्नाचं साधन गेलं. 

भावांची मुलं कर्तीसवरती झाली होती आणि घर सांभाळायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा अचानक वेगळे होण्याचा प्रस्ताव पुढे आला. अखेर भावाभावांच्यात घराच्या वाटण्या झाल्या. माझ्या हिश्श्याला त्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या आल्या.”

आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. 

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. 

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन.”

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली. 

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा. 

” करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.”

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. 

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते. 

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. 

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली. 

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर.”

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच.” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप.  ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते. 

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares