मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

शलाका आज मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीचा मुलगा आता बारावीला होता. जोरात अभ्यास चालला होता त्याचा. “ काय रे, तूही आईबाबांसारखा डॉक्टर होणार का? आमचा नितिन बघ. गेला बाबा मलेशियाला. छान चाललंय त्याचं अगदी ! “ शलाकाने ध्रुवला सांगितलं. ध्रुव म्हणाला, “ मावशी, माझं असं काहीही नाही. मी डॉक्टरच व्हावं असा काही आईबाबांचा आग्रह तर बिलकूल नाही. आणि मी सगळे ऑप्शन्स ओपन ठेवलेत. मार्क्स काय मिळतील त्यावर आहे सगळे अवलंबून.  प्रयत्न करणं फक्त माझ्या हातात ! ” ध्रुव शांतपणे म्हणाला.  

शलाका आणि सुशील दोघेही डॉक्टर होते.शलाका स्त्रीरोग तज्ञ आणि सुशील  सर्जन ! शलाकाला नितिन आणि नीति अशी दोन मुलं ! शाळेत असताना दोन्ही मुलं अतिशय हुशार होती. मुलांचे आजोबा त्या दोघांचा ठाकून  ठोकून अभ्यास करून घ्यायचे. हाडाचे शिक्षक होते आजीआजोबा दोघेही ! मुलांना सुरेख मार्क्स मिळाले, पहिले नंबर आले की आजी आजोबांना धन्य धन्य व्हायचे. सुशील त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मध्यमवर्गात सगळे बालपण गेले, पण सुशीलची कशाबद्दलही कुरकुर नसायची कधी. नेहमी अभ्यासात पहिलाच नंबर. अकरावीला बोर्डात आला होता सुशील आणि इंटरला  त्याला नामांकित  मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. आईवडिलांना धन्यधन्य झाले… हा घराण्यातला पहिला डॉक्टर मुलगा. त्याने सहज पूर्ण केले शिक्षण आणि एम एस ला प्रवेश घेतला. सर्जन झाल्यावर एका मोठ्या हॉस्पिटलला नोकरी घेतली त्याने आणि मोठा फ्लॅटही लगेचच घेतला. पण तोपर्यंत चाळीत रहाण्यात मात्र कोणताही कमीपणा वाटला नाही कधी सुशीलला !

आता राहणीमान सुधारले होते, आणि  मुलीही सांगून यायला लागल्या होत्या. सुशीलने त्याच्याच वर्गातल्या शलाकाशी लग्न ठरवलं. चांगलीच होती तीही, स्त्रीरोगतज्ञ आणि हुशार. पण श्रीमंत घरातून आल्यामुळे जरा गर्विष्ठ सुद्धा. पण सुशीलची पसंती महत्वाची होती. शिवाय त्याच्याच व्यवसायातल्या साथीदाराचा त्याला हॉस्पिटलमध्येही खूप उपयोगही झाला असताच.   सुशील शलाकाचे हॉस्पिटल छान चालू लागले. आजी आजोबांनी लेकाचे वैभव मनसोक्त उपभोगले. त्यांच्या समवयस्क लोकांबरोबर विमानाने प्रवासही केले,आणि तृप्त झाले.

 नीति नितीन– ही दोन्ही नातवंडेही अभ्यासात चांगलीच होती. पण आजी आजोबांनी सतत त्यांचा अभ्यास  करून घेतल्यामुळे त्यांची स्वतः नोट्स  काढणे, आपला अभ्यास आपण करणे, कोणते चॅप्टर्स महत्वाचे असतात हे सगळे स्वतःचे स्वतः जाणून घेणे, अशा महत्वाच्या आणि आवश्यक गोष्टींची सवय गेलीच होती… म्हणजे खरंतर तशी सवय लागलीच नव्हती. सगळे घरीच आयते सांगितले जात असे, आणि ते फक्त  घोकंपट्टी करून उत्तम मार्क्स मिळवत असत. 

पण शाळेत असेपर्यंत हे सगळे ठीक होते. दहावी पर्यंत पहिल्या तीन नंबरात येणारी नीति, कॉलेजच्या पहिल्या वर्षात कशीबशी फर्स्ट क्लास टिकवू शकली.कॉलेजचा अभ्यास तर आजी आजोबा घेऊ शकत नव्हते, आणि यांची आत्तापर्यंतची स्पून- फीडिंग ची सवय आता एकदम जाणार तरी कशी होती? परिणामी नीतिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं लक्षण काही दिसत नव्हतं. तिने बीएस्सी ला प्रवेश घेतला. शलाकाची अतिशय इच्छा होती– म्हणजे अशी महत्वाकांक्षाच होती.. की दोन्ही मुलं  डॉक्टरच झाली पाहिजेत. पण नीतिला कुठेही प्रवेश मिळाला नाही आणि भरमसाट पैसा देऊन कसातरी प्रवेश मिळवला असता, तरी ती हे शिक्षण पूर्ण करेलच याची खात्री तरी कुठे वाटत होती शलाकाला? 

काहीवेळा सुशीलला वाटायचं, ‘ या मुलांना वाढवण्यात आपण कुठे चुकलोय का ?’  एकदा तो आपल्या वडलांजवळ बसला आणि म्हणाला, ” बाबा, आपण चाळीत राहिलो, अगदी सामान्य परिस्थितीत सुद्धा  मी शिकलो, कुठेही डोनेशन न देता डॉक्टर झालो, मग ही मुलं अशी कशी?”

आजोबा म्हणाले, “राग येईल तुला, पण याला तुम्हीच कारणीभूत आहात. आणि शलाकाचे तरी ‘आई’ म्हणून किती लक्ष आहे सांग मुलांवर? सतत तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता, आणि त्याला पर्याय नाही हेही बरोबरच आहे.  पण म्हणून ती मुलं मागतील त्या गोष्टी तुम्ही त्यांच्या हातात देता हे बरोबर आहे का ? विचार कर जरा. नुसते बाहेरचे भरमसाट क्लास लावून काय उपयोग? मुळात एक गोष्ट लक्षात घे..  तुमची मुलं तुमच्यासारखी हुशार नाहीत.. दुर्दैवाने ! त्यांच्याकडून उगीच भलत्या अपेक्षा ठेवू नका. खरं सांगू का, मला नाही वाटत नितिनलाही मेडिकल झेपेल. करू दे की त्याला जे हवं ते ! त्यात कमीपणा मानायचे काय कारण आहे? करील तो पुढे पीएचडी सुद्धा. त्याचा कल कशाकडे आहे ते बघा ना ! तुम्ही डॉक्टर म्हणून त्यानेही डॉक्टरच  व्हायला हवे का? संगळ्यांचीच नसते तेवढी कुवत हे लक्षात घ्या रे जरा. “ 

सुशीलला बाबांचं म्हणणं तंतोतंत पटलं. तो लगेच शलाकाशी हे बोलला.. पण तिला ते अजिबात पटले नाही. “ हे बघ सुशील, नितीन डॉक्टरच झाला पाहिजे. आपले एवढे मोठे हॉस्पिटल….  आपल्यानंतर बघणार कोण मग ते ? आजोबा  आहेत जुन्या पिढीचे ! त्यांचं काय ऐकत बसतोस? हल्ली पैसे टाकले की कुठेही मिळते ऍडमिशन. आपण पाठवू त्याला परदेशात. आणि आता तू मध्येच असा नकारार्थी विचार करू नकोस.” पण सुशीलला तिचे म्हणणे अजिबात पटले नाही.  तो त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशीही बोलला. मनोज म्हणाला, “ अरे आपल्या मुलांनी आपलाच व्यवसाय पुढे चालवला पाहिजे असं कुठंय ? आता माझेच बघ की. आमच्या किरणला मेडिकलला मुळीच नव्हते जायचे. तो इंजिनिअरिंगला गेला आणि छान चाललंय की त्याचं. उत्तम नोकरी मिळालीय. आम्ही कधीही त्याच्यावर आमची मतं लादली नाहीत. न  का होईनात मुलं डॉक्टर. आपल्यानंतर आपल्या व्यवसायाचे काय..  हा विचार आपल्या मुलांनी केलाच पाहिजे हे मला तरी नाही पटत. सुशील रागावू नकोस, पण तुझी शलाका जरा वेगळीच आहे. बघ बाबा, तिच्या हट्टापायी मुलांचं भलतंच काही नुकसान होऊ नये याचा तू विचार करावास असं मी सुचवेन तुला.” मनोजने सुशीलला सावध केलं.  

एकदा सुशीलने  नितीनला विचारलंही होतं, “ नितिन, तुला काय व्हायचंय पुढे? मी तरी तुझ्यावर माझी मतं लादणार नाही. तुझा कल कशात आहे? “

नितिन म्हणाला होता,” बाबा, मला आर्टिस्ट व्हायचंय. माझं ड्रॉईंग बघा ना किती छान आहे. मला जेजे  स्कूल ऑफ आर्टस्ला जायला आवडेल. पण आईला  ते आवडणार नाही हे मला माहिती आहे. ती म्हणेल तेच मला करावे लागणार बाबा.” 

नितिनला  बारावीला खूप कमी गुण मिळाले आणि भरपूर पैसे खर्च करायला लागून मलेशियाला मेडिकलला प्रवेश मिळाला त्याला.

–क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

अल्प परिचय

शिक्षण – Bsc.B.ed.MMR.PGDPC

सम्प्रत्ति – निवृत्त शिक्षिका

अमृताचा चंद्र ह्या माझ्या व्यक्तिचित्रण पुस्तकास म.रा.सा.प.चे अनुदान प्राप्त. विविध मासिके आणि दैनिकात कथा प्रसिद्ध.

?जीवनरंग ?

☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

टे्रन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग दिल्लीला झालं. 6 महिने अजिबात रजा घेता आली नाही. आता, कधी एकदा गंधाला भेटू असं त्याला झालं होतं. तिला भेटण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता.

उद्या येतोय असं त्यानं कुणालाच कळवलं नव्हतं. 3-4 दिवसात कामाच्या व्यापात फोन झालाच नव्हता. तिचाही आला नव्हता.ं. आपल्याला समोर पाहून, गंधाला कसा सुखद धक्का बसेल, हे श्रेयसला डोळ्यासमोर दिसत होतं. तिचा चेहेरा कसा फुलून येईल, मोहोरून येईल, त्याच वेळेस कळवलं नाही, म्हणून रागवेल, डोळ्यात पाणी पण येईल, मग आपण तिची कशी समजूत काढू याच सुखस्वप्नात, तो रंगून गेला.

रागवल्यावर आपण तिची समजूत कशी काढू, ती मात्र तिच्या खास स्टाईलने कट्टी-फू करेल. जीभ काढून दाखवेल. अन् आपल्या काळजाचं पाणी-पाणी होईल. हाऽय!

गंधा-गंधा-गंधा! वेडं केलं होतं गंधाने त्याला. अगदी लहानपणापासूनच! दोघांची घरं शेजारी-शेजारीच होती. दोघांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, सख्य होतं. कुणीही त्यांच्याकडे पहातांना त्यांना शुभाशिर्वाद द्यायचे. जणू परमेश्वरानं ‘एकमेकांसाठी’ म्हणूनच जन्माला घातलं होतं. त्यांच्यात कधी ताई-दादा झालं नाही. नकळत्या वयापासून दोघं एकमेकांशी प्रेमाने वागत. धट्टा-कट्टा श्रेयस लहानग्या गंधाला उचलून फिरवायचा. तिला घेऊन झोक्यावर बसायचा. तिला उष्टं चॉकलेट भरवायचा. वय वाढत गेलं, तसतसं दोघांमधले प्रेमाचे बंध अधिकच घट्ट होत गेले. तारुण्यात हे प्रेम अधिकच गहिरं झालं. दोघांमध्ये आकर्षण वाढलं. एकमेकांशिवाय जग शून्य वाटू लागलं. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. श्रेयस रजा घेऊन आला की साखरपुडा करून घ्यायचा. नंतर लवकरच लग्न असं मोठ्यांनी ठरवलं होतं.

सार्‍या आयुष्यात पहिल्यांदाच दोघं एवढे दिवस एकमेकांना सोडून राहिले होते. आता श्रेयस 6 महिने भेटणार नाही, या विचाराने गंधाच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. श्रेयस वरवर तिला चिडवत होता, तोही फार दुःखी झाला होता. तिच्यापासून दूर जातांना…

आता 6 महिन्यांचा दुरावा संपला होता. उद्या…! उद्याच! गंधा आपल्या मिठीत असेल या विचाराने तो अधीर झाला होता. फक्त काही तास…! हो, पण गंधा ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा जीव तळमळत रहाणार होता. घरी पोहोचला तरी!

आई-बाबा नव्हतेच अपेक्षेप्रमाणे. आईची सकाळची शाळा. बाबांचा शनिवारचा दौरा!

सारं आवरून श्रेयस शांतपणे पेपर वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती.

वाचता-वाचता, त्याचा डोळा लागला. अचानक तो दरवळ जाणवला. खास! गंधाचा! तो टक्क जागा झाला. त्याचा विश्वासच बसेना! होय! निशिगंधा आली होती. चक्क! त्याच्या अगदी समीप! नाजूक निमुळत्या बोटांच्या ओंजळीतून त्याच्या चेहेर्‍यावर मोगर्‍याची फुलं ओतत होती. तिच्या दाट लांबसडक वेणीतही मोगर्‍याचा गजरा होताच नेहमीप्रमाणे. त्या-त्या ऋतुतल्या फुलांचा गजरा कायम तिच्या केसात असाचयाच! तिची आजी रोज म्हणजे रोज लाडक्या निशूसाठी गजरा करायची. बागेतल्या फुलांचा. त्यामुळेच निशिभोवती कुठला न् कुठला सुगंध कायम दरवळत असायचा. म्हणून तर श्रेयस तिला गंधा म्हणायचा! गंधाही त्याच्या मनात सारखी दरवळत असायची. तिचा दरवळ कायम त्याला वेढून असायचा. आताही ती त्याच्या मनातूनच जणू त्याच्या समोर येऊन उभी होती. अगदी समीप!

खरं तर तो तिला सरप्राईज देणार होता. पण प्रत्यक्षात तिनेच इथे येऊन त्याला धक्का दिला होता; तोही असा सुगंधी! सुंदर! त्याची आवडती आकाशी रंगाची, बारीक काठांची म्हैसूर सिल्कची साडी नेसून आली होती. सुंदर काळ्याभोर केसांमध्ये माळलेला मोगर्‍याचा गजरा, बदामी डोळे, रेखीव भुवया, केतकी वर्ण, लालचुटुक ओठांचं धनुष्य. नीतळ गळा, कमनीय बांधा… किती पाहू, पाहत राहू, असं त्याला झालं होतं. तेवढ्यात गंधाने तिचा केसांचा पुढे ओलेला शेपटा मागे टाकला. तिच्या केसांचा स्पर्श श्रेयसच्या चेहर्‍याला जाणवला. मोगर्‍यांच्या गंधाने तो रोमांचित झाला. त्याने चटकन् तिला पकडण्यासाठी हात पुढे केला. ती चटकन् एक गिरकी घेऊन मागे गेली. तिच्या पदलालित्याने श्रेयस वेडावून गेला. आसूसून तिच्याकडे पहात पहात तो पुढे पुढे गेला. ती मागे जात-जात भिंतीला टेकली. त्याने दोन्ही बाजूंनी हात भिंतीला टेकवले. तिला हलताच येईना. कैद झाली.

त्याची जवळीक… जीवघेणी! ती अस्वस्थ! स्तब्ध झाली! लाजेने पापण्या जडावल्या. दोघांचे श्वास एकमेकांत अडकले. ती चटकन् खाली बसली. सुळकन् बाहेर निसटली. तो निराश होऊन वळला. त्यानं टेबलावरची डबी घेतली. त्यातली अंगठी काढून तिच्या समोर धरली. खुणेनेच तिला जवळ बोलावलं. ती आली. तिच्या बोटात तो अंगठी घालणार, एवढ्यात बाहेर आईचा आवाज आला.

दोघांचीही भावसमाधी तुटली. तो चटकन् बाहेर आला. हे काय? आई-बाबा दोघेही इथे कसे? शाळा…ऑफिस सोडून? त्याला आश्चर्य वाटलं. आईलाही तो कसा काय आला, याचं आश्चर्य वाटलं. आई जवळ आली, तर आईचा नेहेमीचा प्रसन्न चेहरा खूप सुकलेला होता. डोळेही रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याला काही कळेना. त्याला पाहून तर आई त्याच्या कुशीतच कोसळली. हुंदक्यांनी तिचं सारं शरीर गदगदत होतं. तिच्या मागोमाग बाबाही आत आले. तेही गंभीर होते. श्रेयसच्या काळजात चर्रर् झालं. तो आईला घेऊन हॉलमध्ये आला. ते तिघंही सोफ्यावर बसले.

मघाशी त्याच्याजवळ बसलेली गंधा त्याला दिसली नाही. तो हाक मारू लागला. आई, गंधा कुठे गेली? गंधा, ए गंधा, अगं कुठं गेलीस? आई बघ का रडतेय. इकडे ये ना… तो जो-जो गंधाला हाका मारू लागला, तसतशी आई जोरजोरात रडू लागली.

श्रेयस बाहेर येऊन म्हणाला, ‘‘बापू गंधा गेली का? आत्ता आली होती ना?’’

बापूने डोळे विस्फारले अन् तोंडावर हात ठेवला. त्याला काही कळेना.

बाबा उठले, त्याच्याजवळ आले न् म्हणाले, ‘‘श्रेयस आत ये.’’

‘‘काय झालं बाबा? अहो गंधा आता आली होती. इथे माझ्याजवळ बसली होती. कितीतरी वेळ. खरंच. कुठं गेली अशी न सांगता?’’

बाबा म्हणाले, ‘‘अरे कशी येईल ती? शक्यच नाही.’’

‘‘का? का नाही येणार? अहो खरंच आली होती. इथेच माझ्याजवळ बसली होती.’’

आता तर आई खूपच रडायला लागली. रडत रडत म्हणाली, ‘‘अरे कशी येईल ती? आता कधीच नाही येणार.’’

‘‘का पण? असं का म्हणतेस आई? काही भांडण झालं का? सांग ना?’’

एव्हाना बापू, शांताबाई दोघंही खोलीत येऊन उभे होते. तेही रडत होते.

2-3 मिनिटं तशीच गेली. कुणी काहीच बोलेना. त्याला ती 2-3 मिनिटं 2-3 वर्षांसारखी वाटली. मग आई म्हणाली, ‘‘अहो सांगता का त्याला? कसं सांगायचं पण? तुम्हीच सांगा.’’ कसंबसं बोलून पुन्हा रडायला लागली. ‘काय सांगायचं’

‘बोल ना’ त्याची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती.

शेवटी त्याचे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, ‘‘श्रेया गंधा गेली सोडून आपल्याला. आत्ताच सकाळी 8 वाजता. तिकडंच होतो आम्ही. 3-4 दिवस ताप आल्याचं निमित्त झालं अन् आज सकाळी…’’ असं म्हणून तेही डोळे पुसू लागले.

‘‘क्काऽय? क्काऽय सांगता बाबा? काहीही काय बोलता? अहो मी 8 वाजता घरात होतो. विचारा बापूला. माझं सगळं आवरून इथंच बसलो होतो पेपर वाचत. तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती. चांगला अर्धा तास इथेच बसली होती.’’ हे बोलतांना त्याचा आवाज फाटला होता.

‘‘अरे कसं शक्य आहे बाळा? ती गेली रे राजा गेली…’’ रडतच पुढे म्हणाले, ‘‘खूप तपासण्या झाल्या. मेंदूत काही इन्फेक्शन झालंय, कदाचित मुंबईला हलवावं लागेल असे डॉक्टर म्हणाले. पण… पण म्हणून असं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं रे.’’

‘‘आता… आता सगळंच संपलंय. सगळंच!’’ असं म्हणून ते धाय मोकलून रडू लागले.

‘‘अहो काहीही बोलताय तुम्ही. हे बघा, हे बघा, तिने आणलेली मोगर्‍याची फुलं. ही बघा इथेच आहेत. ही बघा. इथे सोफ्यावरच आहेत. मी खोटं सांगतोय का?’’

खरंच तिथे मोगर्‍याची फुले पडलेली होती. शुभ्र, ताजी, सुगंधित!

आई-बाबा-बापू-शांताबाई सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना! फुलं खरंच होती तिथे.

काय बोलावं कुणालाच काही सुचेना. श्रेयसनं ती फुलं घेतली – गोळा करून. म्हणाला, ‘‘चला तुम्हाला दाखवतो. गंधा तिकडे असेल तिच्या घरी.’’ श्रांत, क्लांत, ढासळलेले बाबा त्याच्या बरोबर गेले. पाय ओढत.

घरात गेल्या-गेल्या निशिगंधाचं पार्थिव समोरच दिसलं.

तो ‘‘गंधाऽऽऽ’’ करून मोठ्ठ्यानं ओरडला. त्याबरोबर ती फुलं तिच्या पार्थिवावर पडली. अन् तोही कोसळला.

मोगर्‍याचा गंध दरवळतच राहिला… त्याने आणलेली… अंगठी… तिच्याजवळ पडलेली होती.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं-  अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.  आता इथून पुढे )

“कुठे गेली होतीस?” त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली.बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं.अजित आत आला.

” बरं वाटतंय का त्याला?”त्याने विचारलं.तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली.मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.

” साँरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे…..”

उत्तर न देता अनू रडत राहिली.अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं.त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला.

रात्री दोन वाजता त्याला जाग आली.अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.तो उठून बाहेर आला.अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.

” मी घेऊ त्याला?”त्याने अनूला विचारलं.तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं.अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला.एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते.मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही,ओरडत नाही.प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते.बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही.त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या.

दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं.पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक.तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही.अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची.

कंपनीत आलं की अजितला आज आँर्डर येणार नाही ना याची भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं.नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणउतारा केला.राचीची आँर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या आँफिसमध्ये गेल्याचं कळलं.नक्कीच तो आपली आँर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली.पण आता त्याने मनाची तयारी केली होती.अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती.पण तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हेही त्याला माहित होतं.आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला सुटी घेऊन यावं लागणार होतं.धावपळ होणार होती,त्रास होणार होता पण इलाज नव्हता.सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार कठीण होतं.

तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं.त्यात दुपारी शिपाई जी.एम.साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला.जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.

” मे आय कम ईन सर”

” येस कम ईन”

तो जी.एम.साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.

” हँव अ सीट माय बाँय”

अजित अवघडून  बसला.जी.एम.साहेबांनी ड्राँवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.

“धीस इज युवर आँर्डर.”

शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती आँर्डर आली होती.पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं.अजितच्या पायातलं त्राण गेलं.त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.

“काँग्रँच्युलेशन्स फाँर युवर प्रमोशन!”

त्याच्या कानावर जी.एम.साहेबांचे शब्द पडले आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

“प्रमोशन?विच प्रमोशन?”त्याने आश्चर्याने विचारलं.

“येस! यू हँव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट आँफ प्राँडक्शन मँनेजर.”

अजितला फारसा आनंद झाला नाही.राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला सांभाळणं सोपं नव्हतं.

” सर राचीका प्लांट कैसा है?जस्ट आस्कींग टू हँव अ नाँलेज बिफोर जाँयनिंग. “

“यु आर नाँट गोईंग टू राची.यु विल वर्क हिअर अँज प्राँडक्शन मँनेजर.”

“व्हाँट?”अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस माय बाँय”जी.एम.हसत म्हणाले.

“व्हाँट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?”

” उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाँज व्हेरी अँरोगंट पर्सन. ही नाँट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हँड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाँज व्हेरी मच नोन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाँर धीस पोस्ट. “

जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राँडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं होतं.म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता.

आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला.वाटेत त्याने पेढे घेतले.घरात तो शिरला तर बाळ हाँलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता.अनू किचनमध्ये काहितरी करत असावी.अजित बँग ठेवून बाळाकडे गेला.बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला.त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला.त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला.त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला.त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला.अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला.मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला.त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.

” द्या इकडे त्याला माझ्याकडे” अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.

” राहू दे ना थोडा वेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय.”

“नको.तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना” अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण आज बाळाचा मुड वेगळाच होता.त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली.आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला.अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.         ” बदमाश!विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते”हताश होऊन अनू म्हणाली.

“अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज” अजित कळकळीने म्हणाला.”     तो विसरेल. तुम्हीही विसराल हो.पण मी कशी विसरेन.नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात.त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं.बरं तरी सोफ्यावर आदळलं,फरशीवर आदळलं असतं तर…” बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.

” चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्या दिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो.”

” पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता.आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय.पण आँफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही.त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटँक आला होता.त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता.”

“अरे बापरे!अगं मग सांगायचंस ना!आपण गेलो असतो त्यांना भेटायला.”

” काय सांगणार?मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात.मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली.”

” आय अँम एक्स्ट्रिमली साँरी अनू.खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं.खुप पश्चाताप होतोय गं.माफ कर ना मला प्लीज!”

” मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस,निष्पापांचाच बळी गेला आहे.माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता.बस.परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे.”

” तुझी शपथ,अनू मी परत असं कधीही करणार नाही.”

बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं.आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.

” एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राँडक्शन मँनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली.बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ.”

“अहो त्यांना माईल्ड अटँक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाँक्टरांनी घरी पाठवलं.’      “मग तर पेढे खायलाच पाहिजे” असं म्हणून अजितने बँगेतला पेढ्यांचा बाँक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

“साहेब चला,पाटीलसाहेब बोलावताहेत”

कामात गुंतलेल्या अजितला शिपाई म्हणाला, तसं अजितने मान वर करुन त्याच्याकडे पाहिलं.

” कामात आहे जरा. येतो थोड्या वेळाने”

“अर्जंट आहे असं म्हंटले साहेब. घेऊनच ये म्हणाले साहेबांना”

” ठिक आहे.तू चल पुढे ,मी येतोच आवरुन” मोठ्या नाराजीने अजित म्हणाला.शिपाई गेला तसा त्याने लँपटाँप बंद केला.खरं तर त्याचा कामाचा मुडच गेला होता.पाटीलसाहेबांनी बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट सुनावण्यासाठी बोलावलं असणार याचा त्याला अंदाज होता.कारण आजपर्यंत पाटीलसाहेब चुकूनही त्याच्याशी कधी चांगलं बोलला नव्हता.आपल्याकडून काय चुक झाली असावी याचा विचार करतच तो साहेबाच्या केबिनजवळ पोहचला.” संतोष पाटील,प्राँडक्शन मँनेजर ” या पाटीवर त्याची नजर गेली.”संतोष” या नावाचं त्याला हसू आलं.”कसला संतोष?हा तर असंतोष फैलावणारा माणूस” त्याच्या मनात आलं.दारावर टकटक करुन तो आत गेला.नाकावर घसरलेल्या चष्म्याने पाटील साहेबांनी त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं.

” सर तुम्ही मला बोलावलंत?”अजितने विचारलं.

“मि.शेवाळे कलकी डे शिफ्टमें प्राँडक्शन कम क्यू हूँआ?”

मराठी असुनही साहेबाने पुन्हा त्याच्याशी हिंदीत बोलावं हे पाहून अजितचं डोकं सणकलं. ” सर मशीन खराब झाली होती ती रिपेअर करण्यात दोन तास गेले. तसा रिपोर्टही मी सबमिट केलाये”

” मशीन क्यूँ खराब हुई?आप लोग मशीनको मेंटेन नही रखते हो इसलिए ना?”

“सर मशीन जुनी झालीये.तिचे बरेच पार्टस गंजलेत.तिला रिप्लेस करणं आवश्यक आहे”

“मेरेको सिखा रहे हो क्या?और मैने तुमको कितनी बार बोला है की हिंदीमें बात करो लेकीन तुम्हारी तो मनमानी चल रही है.”

साहेब उध्दटपणे बोलला तशी संतापाची एक तिडीक अजितच्या डोक्यातून गेली.तो जरा जोरातच बोलला, ” साहेब तुम्ही मराठी मी मराठी.मग आपण हिंदीत बोलायचं कशाला?”

” इस कंपनीचा मालिक बिहारका है. तो वो जिस भाषामें बात करता है उसी भाषामें हमे बात करना है.”

“साहेब असा कुठे नियम आहे?आपले जी.एम.साहेब तर साऊथ इंडियन आहेत ते तर नेहमी इंग्रजीतून बोलतात.आपल्या एच.आर.ही साऊथ इंडियन आहेत त्यांच्याशी ते तामिळ भाषेत बोलतात.”

‘ याचा अर्थ असा झाला कीबमी चुकीचं बोलतोय. हे बघ, मला काहीवुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मी ज्या कामासाठी तुला बोलावलं, त ऐक. जरखंडाच्या राची मध्ये आपला एक प्लांट सुरू होतोय. तिथे काही इंजींनीयर्सची गरज आहे. मी तुझं नाव प्रपोज केलय, एव्हा तयार रहा. एका आठवड्यात तुझी ऑर्डर येईल. ते ऐकून अजित सुन्न झाला. त्याच्यावर जणू आकाश कोसळलं.

” साहेब माझी आई खेड्यावर रहाते तिला कँन्सरच्या ट्रिटमेंटसाठी वारंवार मुंबईला न्यावं लागतं. घरात चार महिन्यांचं बाळ आहे. कसं शक्य आहे मला इतक्या दुर जाणं?आणि आपल्याकडे दुसरे बिहारी इंजीनियर्स आहेतच की, त्यांना पाठवा ना तिकडे. ते एका पायावर तयार होतील “अजित गयावया करत म्हणाला.

” मै कुछ नही सुनना चाहता. अपने यहा इतने बिहारी काम करते है.इनकी भी तो कोई प्रॉब्लेम होगी! क्या उनको माँ-बाप, बिवीबच्चे नही है? ये तो कभी तुम्हारे जैसी कहाँनियाँ सुनाते नही.”

“साहेब ही कहाणी नाही……”

“देखो भाई तुमको जाना तो पडेगा. नही तो नोकरी छोडके घरपे बैठ जाना. जाओ अपना काम करो.आँर्डर के लिए तय्यार रहना”

अजित खचलेल्या मनाने तिथून बाहेर पडला.संताप,निराशा आणि रांचीला गेल्यावर आईवडिलांचे,बायकोचे होणारे हाल यांच्या चित्रांनी त्याच्या मनात वादळं निर्माण होत होती. 

ही कंपनी एका बिहारी मालकाची होती.स्थापन केल्यानंतर त्याने अगोदर स्थानिक मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची भरती केली होती.अजित त्याचवेळी इथं एका बिहारी मित्रामुळेच जाँईन झाला होता.काही दिवसांनी मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची गळती सूरु झाली.मराठी कामगार काम करत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं.काम सोडून गुटखा,तंबाखू खाणं,वेळीअवेळी चहा प्यायला जाणं,गप्पा मारणं,सुपरव्हायजर्सला दमदाटी करणं असे प्रकार सुरु होते.अजून काही दिवसांनी स्थानिक राजकीय नेते कंपनीत युनियन स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजल्यावर मालकाने मराठी कामगारांना डच्चू द्यायला सुरुवात केली.अजितचं काम चांगलं होतं.खेड्यातल्या शेतमजुराच्या गरीब कुटुंबातून तो आला असल्यामुळे त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळे तो आपलं काम इमानेइतबारे करत होता.शिवाय तो मेहनती आणि हुशारही होता.त्यामुळे कंपनीने त्याला धक्का लावला नाही. हळूहळू कंपनी बिहारी कामगार आणि सुपरव्हायजर्सनी भरुन गेली.अजित एकटाच मराठी इंजीनियर तिथे उरला.मागच्या वर्षी संतोष पाटील नावाचा प्राँडक्शन मँनेजर कंपनीत रुजू झाला तेव्हा अजितला आपला मराठी माणूस आल्याचा खुप आनंद झाला होता.पण हा आनंद फार काळ टिकला नाही.संतोष पाटील इतर बिहारी सुपरव्हायजर्सशी प्रेमाने बोलायचा.त्यांना शाबासकी द्यायचा.पण अजितशी तुसडेपणाने वागायचा.त्याच्या कामात मुद्दामच चुका काढून कामगारांसमोरच पाणउतारा करायचा.अजित त्याच्याशी मराठीत बोलायला लागला की तो हटकून हिंदीत बोलायचा.मराठीत बोलण्यावरुन त्याने अजितला ” मेरे मराठी होनेका गलत फायदा उठानेकी कोशीश मत करना” अशी अनेकदा ताकीदही दिली होती.बिहारी मालकाला इंप्रेस करण्यासाठी तो हे करतोय हे अजितला समजत होतं.तो मनातल्या मनात त्याला खूप शिव्या घालायचा.पण बाँस असल्याने मर्यादेने वागणं भाग होतंच.

शिफ्ट संपली.अजित कंपनीतून निघाला तो डोक्यात राग घेऊनच.एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाचा जाणूनबुजून छळ करावा याचा त्याला राहूनराहून संताप येत होता.

ऐका वळणावर तो डावीकडे वळणार तोच राँगसाईडने एक बाईकवाला येऊन त्याला धडकला.अजित वाचला पण त्याची बाईक खाली पडली.

“काय रे हरामखोर.ट्रँफिक रुल माहित नाहिये तर गाडी चालवतोच कशाला?” अजित त्याच्यावर ओरडला.तसा तो बाईकवाला बाईकवरुन खाली उतरला.

” हरामखोर कुणाला म्हणतो रे ×××××”

दोघांची बाचाबाची सुरु झाली.शब्दाला शब्द वाढत गेला.दोघांभोवती गर्दी जमा होऊ लागली.लोक दोघांना समजावू लागले.पण दोघं पेटले होते.दोघांची हाणामारी सुरु होणार इतक्यात ट्रँफिक पोलिस पळत आला.दोघांना समजावून बाजुला केलं.अजित जायला निघाला.पोलिसाने गर्दी पांगवली आणि राँग साईड घुसणाऱ्या पोराला बाजूला कोपऱ्यात  नेलं.त्या पोराने पाचशेची नोट काढून पोलिसाच्या हातात ठेवली आणि बाईकला किक मारुन तो ऐटीत निघून गेला.अजितने ती देवाणघेवाण पाहिली आणि तो अधिकच संतापला.पण स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आपल्या बाईकचं तुटलेलं मडगार्ड पाहून त्याने बाईक उचलली आणि घराकडे निघाला.

तो घरात शिरला तेव्हा बेडरुममधून बाळाच्या रडण्याचा आवाज त्याला आला.बँग ठेवून तो बेडरुममध्ये गेला तेव्हा अनू बाळाला कडेवर घेऊन त्याला थोपटत फिरत होती.

” काय झालं का रडतोय तो?” अजितने विचारलं. त्याच्या स्वरातला कठोरपणा पाहून ती चकीतच झाली पण शांत स्वरात त्याला म्हणाली.

“अहो काही नाही त्याने सू केलीये म्हणून रडतोय.बदललेत मी त्याचे कपडे.जरा बेडवरची चादर बदलायची राहिलीये.जरा धरता का याला.थोडं फिरवा.तोपर्यंत मी चादर बदलून घेते.”

अजितने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला घेऊन बाहेरच्या हाँलमध्ये आला.त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला.पण आज बाळानेही त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं असावं.तो रडणं थांबवायचं नाव घेत नव्हता.दिवसभर घडलेल्या घटनांनी तापलेल्या अजितच्या डोक्यात आता संताप शिरु लागला.

“ए बाबा,बस कर ना आता. किती रडशील?आधीच डोकं तापलंय माझं.बस कर” पण बाळ शांत व्हायचं नाव घेत नव्हता.अजितने जरा जोरातच त्याच्या पाठीत चापट मारली.     ” पटकन शांत हो म्हंटलं ना तुला.बस कर”अजित त्याच्यावर खेकसला.पण चापट मारण्याने आणि अजितच्या खेकसण्याने बाळ अजूनच जोरात रडायला लागला. अजितचा आता संयम संपला.बाळाला दोन्ही हाताने त्याने समोर धरलं आणि तो मोठ्याने ओरडला, ’”बंद कर तुझं रडणं.”

एक क्षण बाळ शांत बसलं. दुसऱ्याच क्षणी त्याने दुप्पट आवाजात भोकाड पसरलं.अजितचा संताप अनावर झाला आणि त्याने बाळाला सोफावर फेकून दिलं.अजितच ओरडणं पाहून बाहेर येत असलेल्या अनूने ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात किंचाळली

“अहो काय करताय…..?”आणि ती सोफ्याकडे धावत गेली.इतक्या वरुन फेकल्यामुळे क्षणभर स्तब्ध  झालेलं बाळ आता किंचाळू लागलं.अनूने पटकन त्याला उचलून छातीशी धरलं.

“असं फेकतात बाळाला?”अजितकडे रागाने आणि दुःखाने पहात ती म्हणाली.तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.

” लवकर शांत कर त्याला.त्याच्या रडण्याने डोकं फाटतंय माझं” अजित तिच्यावर ओरडला.

“अहो आजारी आहे तो. ताप आहे त्याला.तापात रडतातच मुलं! ” रडतरडत अनू म्हणाली आणि बाळाला घेऊन बाहेर अंगणात गेली.अजित कपडे न काढताच बेडरुममध्ये गेला आणि बेडवर त्याने स्वतःला झोकून दिलं.मणामणाचे घाव त्याच्या डोक्यात पडत होते.दिवसभरातल्या घटनांनी त्याचं मानसिक संतुलन पार बिघडून गेलं होतं.बराचवेळ तो तळमळत पडला होता.एक तासाने त्याला जरा बरं वाटू लागलं.त्याने कानोसा घेतला.बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता.आपण मगाशी बाळाला फेकल्याचं त्याला आठवलं आणि भीतीची एक शिरशिरी त्याच्या शरीरातून निघून गेली.बापरे!त्याला काही झालं तर नाही ना?अनू त्याला दवाखान्यात तर नाही घेऊन गेली?खरंच त्याला काही झालं असेल तर?मानेला काही झटका बसून…..! त्याविचारासरशी तो घाबरून उठला.बाहेरच्या हाँलमध्ये आला.अनू आणि बाळ दोघंही तिथे नव्हते.तो बाहेर अंगणात आला मग गेट उघडून तो बाहेर रस्त्यावर आला.पण कुठेही त्या दोघांचा पत्ता नव्हता.तो परत आत आला.मोबाईल उचलून त्याने अनूला फोन लावला.रिंग वाजली पण अनूचा मोबाईल समोरच टेबलवर होता.ती मोबाईल घरातच ठेवून गेली होती.बाळाच्या काळजीने आता अजितला घाम फुटला.त्याचा तो गोड ,हसरा चेहरा आठवून त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.जीव कासावीस होऊ लागला.तिरीमिरीत तो उठला.अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.

क्रमश: भाग १

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोहनमाळ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ मोहनमाळ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

भागिरथीबाई वयाच्या ८१व्या वर्षी वारल्या. काल दिवसकार्य झालं आणि आज चौदाव्याचं गोडाचं जेवण!आता जरा आराम करून मंडळी आपापल्या घराकडे निघणार होती. गजानन आणि त्याची बायको गडी माणसांकडून मागची आवरा-आवर करून घेण्यात गुंतली होती. हो, हातासरशी कामं करून घेतली नाही, तर परत कामाला माणसं कुठून मिळणार?  बाकीची तीन मुलं, त्यांच्या बायका, एक मुलगी आणि जावई माजघरात बसली होती. त्यांची हलक्या आवाजात कुजबुज चालू होती.

भागिरथीबाईंना एकूण नऊ मुलं झाली, पण आज घडीला चार मुलगे आणि एक मुलगी तेवढी जिवंत आहेत. सगळी, लग्न, पोरंबाळं होऊन रांगेला लागलेली. मोठा गजानन आणि त्याचं कुटुंब, भागिरथीबाईंसोबत रत्नागिरीजवळ चिखलीला राहात होतं. त्याच्या पाठचा सुरेश, रमेश, आणि वसंता ही मुंबईत, तर नंदा पुण्यात स्थिरावलेली.

चिखलीतलं  जुनं कौलारू घर तसं लहानच, पण दरवर्षी काही ना काही दुरूस्तीचा खर्च असायचाच. म्हणून मोठ्या मनानं सगळ्या भावंडांनी घरावरचा हक्क सोडून, ते गजाननाच्या नावावर करून दिलं होतं. थोडी नारळ-सुपारीची झाडं आणि आंब्याची कलमं होती. दरवर्षी सगळे भाऊ, एकेक जण करून आठ दिवस राहून जायचे.गाडीनी आसपासच्या कोकणात फिरायचे आणि जाताना आपल्या वाटणीचे आंबे, नारळ, कोकमं असं गाडीत भरून घेऊन जायचे. नंदा तर  बोलून चालून माहेरवाशीण, ती देखील सहकुटुंब दोन-तीन आठवडे मुक्काम ठोकून असायची. जाताना सारा वानोळा घेऊन जायचीच.

गजानन आणि माधवी, मोठेपणाचा आब राखत, सगळं हसून साजरं करायचे.तक्रार करायचा स्वभावच नव्हता दोघांचा! माधवी लग्न होऊन नेन्यांच्या घरात आली, तेव्हा धाकटी नंदा अवघी  दोन वर्षांची तर होती.आणि बाकी तिघे शाळेत जाणारे.

नंदा सहा वर्षांचीअसतानाच, माधवीचे सासरे लकवा होऊन अंथरुणाला खिळले. मग सासूबाई त्यांच्या शुश्रूषेत गुंतल्या आणि कुटुंबाचा बाकी सारा भार  गजानन आणि माधवीवर पडला.

पोटची पोरं असल्यागत सगळ्यांना सांभाळलं होतं तिनं! शिक्षण संपल्यावर दिरांना नोकऱ्या लागल्या आणि लग्न करून त्यांचे संसारही थाटून दिले होते. पंधरा वर्षे सासरे आजारी होते. त्यांचं पथ्यपाणी, आल्यागेल्याचा पाहुणचार, सासूबाई आणि स्वतःचा संसार माधवीनं छान सांभाळला होता. सासरे गेले आणि सासूबाईंनी संसारातून पूर्णच लक्ष काढून घेतलं. गेली सात-आठ वर्षे त्याही अस्थमा आणि संधिवातानं बिछान्यावरच होत्या. गजानन घरातली पिढीजात भिक्षुकी चालवत होता. थोडं नारळ-सुपारीच्या बागेचं उत्पन्न येत होतं. त्यावर त्यांचा निर्वाह ठीक चालला होता. पण वेळेला हातात नगद पैसा नसायचा.त्याला एक मुलगा, एक मुलगी. मुलगा  इंजिनिअर होऊन नुकताच नोकरीला लागला होता चिपळूणला. मुलगी बी. काॅम. झाली होती. तिच्या लग्नाचं बघायचं होतं आता.

गडी माणसांकरवी कामं मार्गी लावून, गजानन आणि माधवीदेखील माजघरात येऊन टेकले. नणंदा-भावजयांची जरा नेत्रपल्लवी झाली. नंदा थोडी माधवीजवळ सरकली.

‘वहिनी,दमलीस ना ग! आईचं तुम्ही खूप केलंत!आईचं काय आमचं सगळ्यांचंच केलंस बाई तू! आता चार दिवस सवड काढून तू आणि दादा माझ्याकडे या आराम करायला.’ माधवीच्या दिर-जावांनीही नुसत्या माना हलवल्या.

‘मी काय म्हणते,’ आईचे काही दागिने होते का ग? मला वाटतं एक मोहनमाळ होती ना पाचपदरी? नाही म्हणजे तसं काही नाही म्हणा, पण आठवण म्हणून सगळ्यांना देता येईल ना काहीतरी, ती मोडून!या सगळ्यांचंच मत आहे हं असं!

‘मोहनमाळ म्हणजे ७-८ तोळ्याची तरी असेल ना हो वन्सं! ‘ वसंताच्या बायकोनं विचारलं.

माधवीला काय बोलावं सुचेना. ती आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघू लागली. गजानन हाताने थांबा अशी खूण करत, माडीवरच्या त्याच्या खोलीकडे गेला. येताना त्याच्या हातात एक कागदी लखोटा होता. त्याने आतला कागद काढून नंदाच्या हातात ठेवला. ती सोनाराकडची पावती होती. माधवजी शाह.. त्यांच्या नेहमीच्या सोनाराचा सही-शिक्का होता त्यावर. पाकिटातच मोहनमाळ  होती.

‘सगळ्यांना वाचून दाखव नंदा काय लिहिलंय ते!’ गजानन म्हणाला.

‘मोहनमाळ, वजन चार तोळे, दहा मासे.. लाखीमणी.  सोन्याचा मुलामा’.

‘अरे, पण आई तर एकदा म्हणाली होती की बाबांच्या आजारपणात पैशासाठी तू दोन्ही गहाण टाकलंय.’

‘हो, बरोबर आहे. बाबांच्या औषधपाण्यासाठी पैसा पुरत नव्हता. त्यात ऐन पावसाळ्यात स्वैपाकघरातली भिंत ढासळली. पैशाची सोय करणार तरी कुठून? म्हणून एकदा फोन केले होते सगळ्यांना नाईलाजाने. पण त्यावेळी तुमचीही प्रत्येकाची काही ना काही अडचण होतीच. आईने तिची ही मोहनमाळ जीवापाड जपली होती,तिच्या माहेरची आठवण म्हणून  तिच्या लग्नात तिला घातली होती ती. एकदाच कधीतरी ती गहाण ठेवायची वेळ आली होती. पण थोड्याच दिवसांत बाबांनी ती सोडवून आणली होती.

मी माधवजींकडे ती घेऊन गेलो. त्यांनी ती माळ हातात घेऊन तीनतीनदा पाहिली आणि मला म्हणाले,’ गजा, अरे ही सोन्याची नाही. नुसता मुलामा आहे वरून सोन्याचा! असं कसं झालं? तुझ्या आईची  मोहनमाळ एकदा मी पाहिली आहे. ती पिवर सोन्याची होती. तुझे बाबा एकदा गहाण ठेवायला आले होते. मी त्यांना म्हणालो,’ अरे हे स्त्रीधन घरात राहू दे. मी देतो ना तुला पैसे. आपले मैत्रीचे संबंध किती जुने आहेत.’ पण त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही.

पण मला नाही कसं म्हणायचं? म्हणून म्हणाले, ‘ तुझं बरोबर आहे माधव, दुसरी काही सोय होते का बघतो.’

तेच्यानंतर माझे वडील आजारी झाले म्हणून मी गुजरातला गेलो. वडील गेले म्हणून महिनाभर तिकडेच होतो.

‘ मी आल्यावर तो भेटायला आला होता मला. मी पैशाची सोय झाली का विचारलं. तेव्हा म्हणाला मुरली मारवाड्याकडून घेतले होते. पण नंतर कोणाची थकबाकी आली आंब्याची, दोन वर्षांची आणि  सोडवली माळ. मला वाटतं तवाच कायतरी झोल केला असणार मुरलीनं! आतातर तो पण देवाघरी गेला. कोणाला धरणार? ‘

मी सटपटलो. ही तर मुरलीनं घोर फसवणूक केली होती. आणि बाबांनी विश्वासानं तो दागिना खरा समजून घेतला होता परत. आईनं घेऊन हडप्यात ठेवून दिला. आता आईला काय आणि कसं सांगायचं? एकतर तिला खूप धक्का बसणार, नाहीतर माझ्यावरचा पण विश्वास उडणार. एकूण सर्व परिस्थिती खूपच नाजूक होती.

माधवशेठ मदतीला धावला. त्याने ही पावती करून दिली,आणि मोहनमाळ मला परत केली. माझी पैशाची गरज भागवली. घराची भिंत उभी राहिली. बाबांच्या औषधपाण्याची सोय झाली. आईला मात्र मोहनमाळ गहाण ठेऊन पैसे आणल्याचं सांगितलं. पण त्याचे पैसे तर फेडायला हवेच ना! माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात ते तरी कसं जमणार? मग माधवशेठनी मला त्याच्या पेढीचं हिशोबाचं काम सोपवलं. महिना ३०रू.पगार! ते पैसे मी न घेता कर्जफेड करायची. ३००० रूपयाचं मुद्दल फेडायचं तरी आठ वर्षे जाणार होती. व्याजाची गोष्ट माधवनी केलीच नाही. त्यातच बाबा गेले, पुन्हा त्यांच्या दिवसकार्याचा खर्च झाला. त्यामुळे दोन-तीन महिने ती कर्जफेड करणंही झालं नाही. घराचीही काही न काही डागडुजी करावी लागतच होती.

तशात माधवशेठनी बायको खूप आजारी पडली. टायफॉइडनी ती अंथरुणालाच खिळली.त्याचा मुलगा-सून गुजरातेत. माधवी घरचं सांभाळून रोज तिच्याकडे जायची. तिचं सर्व अंथरूणातच करावं लागत होतं. पण ते करायची. तिला पथ्याचं काही करून जबरदस्ती भरवायची. तिच्या या शुश्रुषेमुळे मायाबेन आजारातून उठली. तिनं हिचे पाय धरले, ‘ तुझ्यामुळे मी जिवंत राहिले. माझ्या कातड्याचे जोडे घातले तरी तुझे उपकार फिटणार नाही.मी तुला काय देऊ?’

‘ माझ्या धाकट्या बहिणीसारखीच ना तू! मग घरच्या माणसाची काळजी आपणच घ्यायला नको का? ‘ माधवी म्हणाली.

माधवीनं कोणत्या अपेक्षेनं थोडीच तिची सेवा केली होती. ही तर माणुसकी आहे ना! आणि आपल्या वेळेला माधवनी मदत केली, त्याला गरज आहे तेव्हा आपणही करायलाच हवी की! पण त्यानंतरच्या दसऱ्याला माधवशेठ आणि मायाबेन आईला भेटायला आले होते.

जाताना माधवशेठ मला एक लिफाफा देऊन गेला. त्यामध्ये दहा हजार रुपये होते आणि कर्जफेड पूर्ण झाल्याची पावती सही-शिक्क्यानिशी होती.

‘ तू काही बोलू नको. माझी पण आईच आहे ही!तिला तिचा जिन्नस दे,खूप आनंद होईल बघ तिला! आणि तिचं औषध-पाणी नीट होऊ दे.  काय लागलं तर बिनधास्त सांगायचं मला.’ असं म्हणून त्यानं मिठी मारली घट्ट! ‘

मग मी आईला तिची मोहनमाळ दाखवून, कर्ज फिटल्याचं सांगितलं.  तिनं खूप आनंदानं ती मोहनमाळ  स्वतःच्या गळ्यात घालायला माधवीला सांगितलं. खूप समाधान वाटलं म्हणाली आणि मग पुन्हा ती माळ काढून माधवीच्या हातात दिली.

‘ नंदा, आईची आठवण म्हणून तुम्हाला हवं तर  तुम्ही कोणीही ती घेऊन जा. आमचं दोघांचं काही म्हणणं नाही ! गजानन म्हणाला आणि माधवीनंही मानेनं होकार दिला.

नंदाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि इतरांच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन  अनुवादीत कथा – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन  अनुवादीत कथा – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

१. आदलाबदली  २.  हॅँग टिल डेथ  ३. वखवखलेले डोळे

१. आदलाबदली

आभाळातून मोत्यांची झडी लागली होती. मोठे मोठे शुभ्र मोती जमिनीवर विखरून पडत होते. आकाश निरखणारं तिचं अबोध मन खिडकीपाशीच रेंगाळलं होतं. ओलसर, थंड, तरीही उमललेले मोती. तिचे हरणासारखे डोळे एकटक त्या मोत्यांकडे एकटक बघत होते.

तिचे उत्सुक डोळे जसे काही बोलत होते, जसा काही आकाशात खजिना आहे. त्याचा दरवाजा चुकून उघडा राहिला आहे आणि त्यातले सगळे मोती खाली पडताहेत. ती किलबिलल्यासारखी म्हणाली, ‘ हे देवा! अशा तर्‍हेने तर तुझा सारा खजिनाच संपून जाईल! ‘

तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि तिच्या निरागसतेकडे पाहू लागलो.

ती दिवसभर घरात एकटीच असायची. त्या खिडकीपाशी बसायची. संध्याकाळ होताच घरात हालचाल, गडबड सुरू व्हायची. येणार्‍यांपैकी कुणी तिला पाणी मागायचं, कुणी जेवण. कुणी काही, तर कुणी काही. ती धावत-पळत सगळ्यांची कामे करायची. 

रात्री उशिरा सगळे आपापल्या खोल्यातून जात, तेव्हा ती आपली सारी कामे संपवून खिडकीपाशी येऊन बसायची आणि तारे मोजायची. अनेकदा तारे मोजता मोजता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, जशी काही ती त्या तार्‍यांमधे कुणाला तरी शोधते आहे. कधी खळखळून हसायची, जसं काही जे शोधत होती, ते तिला सापडले आहे. कधी कधी गुणगुणायची, ‘ये चाँद खिला, ये तारे हँसे…’

तिचं असं गुणगुणणं ऐकून आतमध्ये बसलेली माणसे फुसफुसायची, ‘ असं वाटतय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटचं प्रोग्रॅमिंग करताना त्यात इमोशनल कोशंटचं परसेंटेज जरा जास्तच फीड झालय!’

भावशून्य मशीन बनत चाललेल्या त्या माणसांमध्ये, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट, प्रत्येक क्षणी आपला इमोशनल कोशंट वाढवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्या मशीन बनलेल्या माणसांमध्ये त्या रोबटचे मशीनमधून  माणसात रूपांतर होण्याची वाट बघत होतो.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

२.  हॅँग टिल डेथ

मीनू, मी बघतले, जेव्हा जेव्हा तुला वाईताग येतो, किंवा तू काळजीत, चितेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपात उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा हसरा होतो. अखेर ता कपाटात असं आहे तरी काय?’

पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.

‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहीलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडताच म्हणाला.

मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.

‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’

‘अं… तो तर एक हॅंगर आहे. ….रिकामा हॅंगर…’

‘ होय पलाश. तो हॅंगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्‍या चिता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी  त्यांना म्हणते,

‘मरेपर्यंत लटकत रहा!’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘

आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हॅंगर लटकलेले आहेत.

  ♥ ♥ ♥ ♥ ♥ 

३. वखवखलेले डोळे

‘खरोखर काळ काही बदलला नाही. पुराणकाळात इंद्राने अहल्येवरती जोर-जबरदस्ती केली होती आणि आज-कालची ही पोरं येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक मुलीची छेडछाड काढत रहातात. ‘ टी. व्ही.वर काही तरी बघत आजी म्हणाली.

‘ही इंद्राची काय गोष्ट आहे आजी?’ मी सोफ्यावर माझी पर्स फेकत विचारलं.    ‘अग, प्रथम हात-पाय धू. चहा- पाणी होऊ दे. मग सांगते. रोज रोज बसने येऊन जाऊन करण्याने तू थकत असशील ना!’ आजीने वात्सल्याने विचारले.

‘ हुं…. आता सांग.’ मी चहा पिता पिता पुन्हा विचारलं.

‘असं घडलं की इंद्राची वाईट नजर अहल्येवर पडली, तेव्हा गौतम ऋषींच्या शापाने त्याच्या सगळ्या शरीरावर योनी उमटल्या. नंतर त्या पुढे डोळ्यात बदलल्या. ‘

‘डोळ्यात? ‘

‘हो ना! म्हणून तर इंद्राला हजार डोळे आहेत.’

इतकं ऐकताच मी उठून उभी राहिले आणि कपडे झाडू लागले.

‘आता तुला काय झालं? आणि कपडे का झाडते आहेस?’

‘इंद्राचे ते हजार वखवखलेले डोळे, आजही समाजामध्ये पसरलेले आहेत. मी ते माझ्या अंगावरून झाडून दूर करते आहे.’

केवळ झाडण्याने काम नाही भागणार पोरी. ते फोडण्याची गरज आहे.’ आजी दृढ स्वरात म्हणाली.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

मूळ लेखिका – सुश्री अनघा जोगळेकर  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग 2 ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग 2 ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)

(मागील भागात आपण पाहिले, सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.” – आता इथून पुढे )

“बोला ना. काकू म्हणजे तुमची आई एकदम ok आहे. छान progress आहे त्यांची.”

“नक्की ना ?” हिच्या आवाजात कंप.

“म्हणजे ? मी समजलो नाही. काही त्रास होत आहे का त्यांना घरी ? पण इथं काही बोलल्या नाहीत त्या तसं. आणि रिपोर्ट्ससुद्धा छान आहेत त्यांचे.” आता बुचकळ्यात पडण्याची पाळी डॉक्टरांची होती. 

“तिच्यात जर चांगली सुधारणा होत असेल, तर मग तुम्ही सगळेच जण इतरांपेक्षा इतका जास्त वेळ का तिच्यापाशी थांबलेले असता ? काहीतरी बिनसलं असल्याशिवाय थोडी असं होणार आहे ?” तिनं आपल्या मनातली खदखद शेवटी बोलून दाखवलीच.

डॉक्टर क्षणभर गप्प झाले, आणि मग जणू स्वतःलाच स्पष्टीकरण (explanation) दिल्यासारखं ते बोलू लागले.

“तुला जेव्हा कळलं की तुझ्या आईला कॅन्सर झाला आहे, तेव्हा तुला त्याचा मानसिक त्रास झाला ना ? आम्ही सगळे तुझ्या आईची जास्तच काळजी घेत आहोत हे पाहिल्यावर तुझा जीव घाबरा झाला ना ?

अग, तुझ्यासाठी तुझी आई ही एकच पेशंट आहे जिची तुला काळजी आहे, फिकीर आहे. आणि त्यामुळे तुझ्यावर हे दडपण आलं. आमचं तसं नाही. रात्रंदिवस, दररोज, आपल्या या केंद्रावर असंख्य रुग्ण येत असतात. आम्हाला त्या सगळ्यांचीच, तुला तुझ्या आईची जितकी आहे ना, तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच काळजी असते.

काकू सुदैवी आहेत. त्यांचा रोग लवकर ध्यानात आला. त्यांची काळजी घ्यायला तुम्ही सगळे त्यांच्या अवतीभवती आहात. सगळेच जण असे भाग्यवान नसतात. काहींचे रोग उशीरा detect झालेले असतात, आपले उपचारांचे – औषधांचे दर खूप कमी असूनही काहींना आर्थिक अडचणींमुळे तेवढे पैसे उभे करणंही कठीण असतं.

आणि मग हे सगळे रुग्ण, त्यांचे सगेसोयरे ही सगळी दुःखं आमच्यापाशी मोकळी करतात. तक्रार करायची म्हणून नव्हे, कोणावर खापर फोडायचं म्हणून नव्हे पण निदान बोलून भार हलका करण्यासाठी – रितं होण्यासाठी.

पण या सगळ्याचा आम्हाला खूप ताण येतो, खूप दडपण येतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जेव्हा रुग्ण हताश होतात किंवा प्राण सोडतात, ते बघून आतमध्ये तुटतं खूप काही. नाऊमेद व्हायला होतं. नैराश्य येतं.

अशा सगळ्या वातावरणात, तुझी आई – आमच्या काकू, आमच्यासाठी एक आशेचा किरण आहेत, प्रसन्न करणारी एक सुखद झुळूक आहे. इतरजण मिळालेल्या उत्तरांमध्ये (solution) प्रॉब्लेम शोधत बसतात, तुझी आई प्रॉब्लेममध्ये उत्तर (solution) शोधून काढते.

इतर सर्व पेशंट आमच्यासाठी सर किंवा मॅडम असतात, तुझी आई दुसऱ्या वेळेपासूनच आमची सर्वांचीच काकू झाली.

पहिल्या केमोच्यावेळी काकूंची हाताची नस सापडत नव्हती, टेक्निशियन पंधरा मिनिटे भोसकाभोसकी करत होता. पण या माऊलीने हूं का चू केलं नाही.

नंतर एकदा ते इंजेक्शन / सलाईन out गेल्याने (शीरेतून बाहेर आल्याने) हात सुजला, पण no complaints. औषध ऊष्ण पडल्याने आग आग झाली, तरी काही निषेध नाही. ‘अरे, माझ्या भल्यासाठीच करताय ना तुम्ही हे सगळं !’ उलट हे सर्टिफिकेट आम्हाला.

फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी काकूंच्या फॅमिली डॉक्टरांचा हात जरा जड लागला. खूप दुखत राहिलं – तरीही त्यांची तक्रार नाही.

साईड इफेक्टमुळे पहिल्याच केमोनंतर भसाभस केस गळले, पण तोंडावर नाराजीची खुणसुद्धा नाही.

पण दुसऱ्या केमोनंतर फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी आमच्या सिस्टरने हलक्या हातानं इंजेक्शन दिलं तर केवढं गौरवलं तुझ्या आईने तिला.

एवढ्या तेवढ्या कारणावरून डायरेक्टरना तक्रारी करणारे पेशंट आणि नातेवाईक सवयीचे आहेत आमच्या, पण दरवानापासून डॉक्टरपर्यंत आम्ही सगळे कसे “मस्त” आहोत (हा तुझ्या आईचा शब्द, बरं का) हे कौतुकाने सांगायला आमचे प्रमुख डॉ. श्रीकांतदादा बडवे यांना फोन करणारी तुझी आई एकटीच.

पहिले प्रथम त्यांनी कौतुक केलं ते केंद्रातील स्वच्छतेचं. अल्प दरात सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी टापटीप, स्वच्छता अप्रतिम आहे असं सर्टिफिकेटच देऊन टाकलं त्यांनी.

बरं हा नुसता वरवरचा पोशाखी फोन नव्हता बरं. आमच्या केंद्राचं सविस्तर समालोचनच होतं ते.

डॉक्टर असूनही दुर्गेश काटकर सरांचं अक्षर कसं सुंदर आहे, त्यांनीच कशी त्यांना काकू म्हणायला सुरुवात केली हे त्यांनी सांगितलं.

डॉ. निधी कशा प्रसन्न वदनाने पेशंटचे टेन्शन दूर करतात, अगदी पराग तावडेदादांची झुबकेदार मिशी, प्रशांतसर प्रभूदेसाईंची भिकबाळी, मितभाषी पण कार्यतत्पर स्वप्निल, अक्षता – कविता – सुनयना – सीमा या आमच्या सिस्टर, वॉचमन दुबेकाका – या सगळ्या सगळ्यांचं नावासकट, त्यांच्या प्रत्येकाच्या चांगुलपणासकट इत्थंभूत वर्णन काकूंनी सरांकडे केलं.

आम्ही स्टाफ सगळे इतकी वर्षे एकमेकांबरोबर आहोत. आम्हाला माहीत नाही, पण कोणाचा मुलगा कितवीत आहे, कोणाची परीक्षा आहे, कोणाच्या सासूला – वडिलांना बरं नाहीये – हे सगळं सगळं काकूंना ठाऊक आहे. आणि दर वेळी आवर्जून त्या त्याप्रमाणे चौकशी करतात.

आणि हे आमच्यासाठी खूप नवीन आहे, आणि खूप सुखावणारं आहे.

तुला वाटतंय की तुझ्या आईला बरं नाही आणि म्हणून तिच्या उपचारांसाठी आम्ही तिच्याभोवती गराडा घालून असतो, पण वास्तव त्याच्या एकदम उलटं आहे.

आम्ही आम्हाला बरं वाटावं यासाठी तिच्याभोवती रुंजी घालत असतो.

देवळात बसलं की कसं प्रसन्न वाटतं, बॅटरी रिचार्ज होते, तसं आमचं आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त वेळ तिच्याजवळ थांबतो.

केमो तिची चालू आहे, पण थेरपी आम्हाला मिळत आहे.”

डॉक्टर सांगत होते आणि लेक आपले डोळे पुसत होती.  

 – समाप्त –

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)

ती – एक मध्यमवर्गीय मुंबईकर. हम दो, हमारे दो – आदर्श सुखी संसार. निर्व्यसनी कुटुंब. चारचौघींसारखी नोकरी केली. मुला मुलीची लग्नं करून दिली. वयानुसार ती आणि नवरा निवृत्त झाले. And they lived happily ever after. सगळं कसं छान चाललं होतं.

नोकरीनिमित्त लेक नुकताच बंगळुरूला गेला होता, सूनबाई आणि नात अजून मुंबईलाच होत्या. लेकीचंही लग्न झालेलं, जावई – नातू गुणी होते.

सगळं कसं छान चाललं होतं, आणि हिलाच कोणाची तरी दृष्ट लागली. निमित्त झालं रात्री सारखं उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

गंभीर आवाजात सांगितलं – ”वाईट बातमी अशी आहे की तुमच्या गर्भाशयावर कॅन्सरची एक छोटीशी गाठ आहे, पण चांगली बातमी ही आहे की गाठ अगदी छोटी आहे, कॅन्सर प्राथमिक अवस्थेतलाच आहे आणि एका छोट्या ऑपरेशनने ती गाठ काढून टाकता येईल.”

रोगाचं निदान समजल्यावर लेक बंगळूरूहून तडकाफडकी मुंबईला निघून आला, मुलगी माहेरी आली. रोगाचं नावच असं जबरदस्त होतं की सगळ्यांचे चेहरे शोकाकूल होते.

सगळ्यांचे म्हणजे ही सोडून.

तीन तीन आठवड्यांच्या अंतराने केमोथेरपीचे एकूण तीन डोस द्यायचे, त्यानंतर गाठीचे स्वरूप पहायचे आणि मग गरज पडली तर शस्त्रक्रिया आणि मग पुन्हा तसेच केमोचे तीन डोस असं उपचारांचं वेळापत्रक ठरलं.

चौकशीअंती ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या केंद्रात केमोथेरपी घ्यायची हे ठरलं, आणि आपल्या दोन्ही मुलांसह appointment घेऊन ही केंद्रातील डॉक्टरांना भेटायला हजर झाली.

डॉक्टर खूप छान होते, त्यांचं नावच तिला खूप भावलं – डॉ विजय शरणागत. कॅन्सरवर विजय मिळवण्याचा संकेत आणि शरणागत भाव – नावातली ही अर्थगर्भ जोडगोळी तिला सुखावून गेली, आश्वस्त करून गेली.

तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, संयतपणा मात्र डॉक्टरांना गोधळवून गेला. न राहवून त्यांनी विचारलंच – “पेशंटला का नाही आणलंत ?”

ती मनापासून हसली, म्हणाली, “ही काय, मी आले आहे की.”

आश्चर्याच्या धक्क्यातून सावरल्यावर, सोप्या शब्दांत काय झालं आहे, काय आणि कसं करायचं हे डॉक्टरांनी विस्ताराने समजावून सांगितले. केमोचे औषध कसे दिले जाते, औषध घेताना आणि नंतर काय त्रास होऊ शकतो तेही सांगितले आणि विचारलं, “सहा सात तास लागतात एक डोस घ्यायला. मग कधीपासून उपचारांना सुरूवात करू या ? या आठवड्यात का पुढच्या ?”

“नंतर कशाला ? आज करता येईल ना सुरुवात ? मग आजच करू या की.” ती.

“अगं आई, आपण जरा दोन मिनिटं बोलू या का ? घरी बाबांना सांगूया आणि …” मुलगा या तडकाफडकी निर्णयापासून आईला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.

“अरे, बघ. आज डोस घेतला की तू दोन चार दिवस थांब. मग तुला बिनघोर रुजू होता येईल कामावर. उगाच उशीर कशाला तुला ?

बरं, आज नाही तर चार दिवसांनी, हीच treatment घ्यायची आहे ना ? मग उगाच उशीर कशाला ?” तिचा practical approach.

केमोचा पहिला डोस झाला, दुसऱ्या दिवशी घ्यायचं इंजेक्शन  समितीच्या केंद्रातून न घेता तिनं तिच्या फॅमिली डॉक्टरांकडून टोचून घेतलं, मग समिती केंद्रात आठवड्याभरानंतरचा फॉलो अप झाला. बघता बघता आणखी दोन आठवडे भुर्रदिशी उडून गेले आणि दुसऱ्या केमोची वेळ आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीचे इंजेक्शन – या वेळी मात्र आग्रहाने समितीच्या केंद्रातच, पुन्हा फॉलो अप.

दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मुलाला एक गोष्ट जाणवली होती की नर्सेस असोत वा डॉक्टर्स वा अन्य कोणी स्टाफ, ते आईकडे अंमळ जास्तच वेळ थांबत होते.

का बरं असेल असं?

सांगताना तर अगदी minor आहे, काळजीचं काहीच कारण नाही, असं सांगत होते. पण अन्य पेशंटकडे मिनिट दोन मिनिटांत चौकशी करून, सल्ला देऊन पुढे जात होते, आणि हिच्या पलंगाशी मात्र पंधरा वीस मिनिटे डेरा ठोकून बसले असायचे सगळे !

काय प्रकार काय आहे हा नक्की ?

त्याने ही शंका बायकोला, बहिणीला बोलून दाखवली. पुढच्या वेळी त्यांनीही पाहिलं, आणि खरंच होतं त्याचं observation.

दुसऱ्या केमो आणि त्याच्या फॉलो अपच्या वेळीही हाच सीन राहिल्यावर मात्र लेकीच्या काळजाचा ठाव सुटला, डोळ्यांत छप्पन सशांची व्याकुळता घेऊन ती डॉक्टरांकडे धडकली.

“सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.”

क्रमश:  भाग १

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इच्छापूर्ती…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ इच्छापूर्ती…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मागील भागात आपण पाहिले– तुलसीदासजींनी “सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी॥“ ही चौपाई लिहिली. या प्रभृतींना संपूर्ण विश्वच श्रीराममय झाल्याचे जाणवत होते, तेव्हा कुठे त्यांना श्रीरामचंद्रप्रभू भेटले. यावरून तुलसीदासजींची एक गंमतीशीर गोष्ट आठवलीय. ऐका तर. – आता इथून पुढे)

ही चौपाई लिहिल्यानंतर तुलसीदासजी विश्रांती घेण्यासाठी घराकडे निघाले होते. रस्त्यात त्यांना एक मुलगा भेटला आणि म्हणाला, “अहो, महात्मा या रस्त्याने जाऊ नका. एक उधळलेला बैल लोकांना ढुशी मारत हिंडतोय. तुम्ही तर त्या रस्त्याने मुळीच जाऊ नका कारण तुम्ही लाल वस्त्रे धारण केली आहेत. 

तुलसीदासजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ‘मला माहीत आहे. सर्वांच्यात श्रीराम आहेत. मी त्या बैलासमोर हात जोडेन आणि निघून जाईन.’  

तुलसीदासजी जसे पुढे गेले तसे उधळलेल्या त्या बैलाने त्यांना जोरदार टक्कर मारली आणि ते धाडकन खाली पडले. त्यानंतर तुलसीदासजी घरी जायच्याऐवजी सरळ रामचरितमानस जिथे बसून लिहित असत त्या ठिकाणी गेले. त्यांनी नुकतीच लिहिलेली ती चौपाई काढून फाडून टाकणारच होते, तितक्यात मारूतीराया प्रकट झाले आणि म्हणाले,    

“श्रीमान, हे काय करताहात?”

तुलसीदासजी खूप संतापलेले होते. त्यांनी ती चौपाई कशी चुकीची आहे, हे सांगण्यासाठी नुकत्याच घडलेल्या घटनेचा वृत्तांत मारूतीरायांना कथन केला.

मारूतीराया स्मित हास्य करत म्हणाले, “श्रीमान, चौपाई तर शंभर टक्के योग्य आहे. त्यात चुकीचं काहीच नाही. आपण त्या बैलामधे श्रीरामांना तर पाहिलंत. परंतु बालकाच्या रूपात तुमचा बचाव करण्यासाठी आले होते त्या श्रीरामांना मात्र तुम्ही पाहिलं नाहीत.”  हे ऐकताच तुलसीदासजींनी मारूतीरायांना मिठी मारली.

आपणही जीवनातील लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि एखाद्या मोठ्या समस्येला बळी पडत असतो. असो.”

बुवा पाणी पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात समोरचे आजोबा पुन्हा बोलले, “म्हणजे श्रीरामप्रभू हे सामान्य भक्तांना भेटत न्हाईत. फक्त मोठ्या भक्तानांच भेटतात असं म्हणायचं.”

“आजोबा, विसरलात काय? अहो शबरी कोण होती? या श्रीरामानेच शबरीला कीर्तीच्या शिखरावर पोहोचवलं आहे. मागासलेल्या समाजातील त्या वृद्ध विधवेने उष्टी करून दिलेली बोरं, हसतहसत चाखणारा हा श्रीराम जगातल्या कोणत्याही सभ्यतेत तुम्हाला भेटणार नाही. एका सामान्य नावाड्याचा मित्र झालेल्या श्रीरामाची गोष्ट सांगतो. ऐका.

सुमंतांचा निरोप घेऊन श्रीरामप्रभू वनवासाला जाण्यासाठी शरयू नदीच्या काठावर पोहोचले. श्रीरामांना पाहताच त्या नावाड्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. श्रीरामप्रभू जवळ येताच त्या नावाड्याच्या मुखातून शब्द उमटले, “यावे प्रभू ! किती वेळ लावलात इथे यायला? किती युगांपासून मी तुमची वाट पाहतोय.”

श्रीरामांनी स्मितहास्य केलं. अंतर्यामीच ते. श्रीराम शांतपणे म्हणाले, ‘मित्रा, आम्हाला पलीकडच्या तीरावर सोड. आज हा राम तुझ्याकडे एक याचक होऊन आला आहे.’      

नावाड्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले, तो कसेबसे म्हणाला, ‘महाप्रभू, तुम्ही येणार आहात हे मला माहीत होतं. मीच नव्हे तर ही धरती, ही सृष्टी, हा शरयू नदीचा तट कितीतरी युगांपासून याच क्षणाची प्रतिक्षा करत आहोत. हा सर्वात महान क्षण आहे. अखिल जगातील प्राणीमात्रांना जे भवसागर पार करवतात, ते प्रभू आज एका निर्धन नावाड्याकडे दुसऱ्या तीरावर पोहोचवा म्हणून याचना करत आहेत.’

श्रीरामांना नावाड्याची भावविवश स्थिती कळली. त्याची मनस्थिती निवळावी म्हणून ते म्हणाले, “आज तुझी वेळ आहे मित्रा ! आज तूच आमचा तारणहार आहेस. चल, आम्हाला त्या तीरावर पोहोचव.”

नावाड्याने श्रीरामाकडे मोठ्या भक्तिभावानं पाहिलं आणि म्हणाला, “प्रभू, तुम्ही मला वरचेवर मित्र म्हणून का संबोधन करताहात? मी तर तुमचा सेवक आहे.”

श्रीराम गंभीरपणे म्हणाले, “एखाद्याने आपल्या जीवनात लहानसेच का होईना उपकार केले असेल तर मरेपर्यंत तो आपला मित्रच असतो. मित्रा! तू तर आम्हाला नदीच्या दुसऱ्या तीरावर सोडणार आहेस. हा राम, हे उपकार कधीच विसरू शकत नाही. या रामासाठी तू जन्मभर मित्रच राहशील. आता त्वरा कर….”

नावाड्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले. तो म्हणाला, “महाप्रभू ! एवढी कसली घाई आहे? आधी त्याचं मोल तरी ठरवू द्या. आयुष्यभर नाव वल्हवत एका वेळेच्या अन्नाची तरतूद करत राहिलो. आज एका फेरीतच मला सात जन्म पुरेल इतकी कमवायची संधी मिळाली आहे. बोला द्याल ना? तुम्ही हो म्हणत असाल तर नाव पाण्यात सोडतो…”

“मित्रा, जे पाहिजे ते माग ! मात्र हा राम आज राजमहालातून बाहेर पडताना काहीही घेऊन निघालेला नाही. परंतु मी तुला तुझ्या इच्छापूर्तीचे वचन देतो. माग, काय मागायचं आहे ते…”

नावाड्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले नाहीत. परंतु त्याचे डोळे स्पष्टपणे सगळंच सांगत होते, “फार काही नको प्रभू!  बस्स. मी आता जी सेवा तुम्हाला देणार आहे, तीच सेवा मला परत करून टाका. इथे मी तुम्हाला नदी पार करवतो आहे. तुम्ही त्यावेळी मला भवसागर पार करवून द्या.” 

श्रीरामाने सीतेकडे क्षणभर पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. नावाड्याला त्याचं उत्तर मिळालं. तो त्या क्षणाचं सोनं करू इच्छित होता. तो हळूच बोलला, ” प्रभू ! मी असं ऐकलं आहे की तुमच्या चरणस्पर्शाने शिळादेखील स्त्रीमध्ये परिवर्तित होते म्हणून. मग माझ्या लाकड़ी नावेचं काय होईल? आधीच माझी बायको डोके खात असते. जर ही नावसुद्धा स्त्री झाली तर ह्या मी दोघींना कसं सांभाळू? थांबा, मी एका लाकडी पात्रातून पाणी आणून तुमच्या चरणांना स्पर्श करवून पाहतो. लाकडावरसुद्धा शिळेसारखा प्रभाव पडतो का नाही ते कळेल…”

नावाडी धावत धावत जाऊन घरी पोहोचला. लाकडाच्या पात्रात पाणी भरून आणलं. जसं तो रामाचे पाय मनोभावे धूत होता, तसं त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. दीर्घ प्रतिक्षेनंतर नावाड्याची कित्येक जन्मांची तपश्चर्या फळाला आली होती. तो भावुक झाला. अश्रूंवाटे तो निर्मळ, निर्विकार होऊन गेला.

त्याने लाकडी पात्राला स्वत:च्या कपाळाला लावलं. नाव प्रवाहात सोडली. सगळेजण नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन नावेतून उतरले. तत्क्षणी श्रीरामांच्या मनात चाललेली चलबिचल, अगतिकता सीतामाईंच्या लक्षात आली.

सीतामाईंनी त्वरित स्वत:च्या बोटातील अंगठी काढली आणि नावाड्याला भेट म्हणून देऊ केली. “माई, तुम्ही वनवास संपवून आल्यानंतर जे काही भेट म्हणून द्याल ते मी आनंदाने स्वीकारेन.” असं म्हणत त्याने अंगठी घेण्यास नकार दिला.

या प्रसंगातून श्रीराम आणि सीतामाई या दोघांतलं सामंजस्य प्रकट होत होतं. एकमेकांवर गाढ प्रेम असेल तर तिथे शब्दांची आवश्यकता नसते. एकमेकांच्या भावना समजून घ्यायला डोळ्यांची भाषाच पुरेशी असते.”

कीर्तनाची सांगता करताना बुवा म्हणाले, “आपण सर्वचजण श्रीरामभक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं एकमेकांशी जोडले गेलो आहोत. प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा प्रयत्न करूया. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला, श्रीराम जयराम, जय जय राम !!”

कार्यक्रमानंतर राघव आणि जानकीचे डोळे मात्र त्या मोटारसायकलवरच्या दोघा युवकांना शोधत होते. परंतु ते दोघे कुठेच दिसले नाहीत.

“कोण जाणे, राघवाची इच्छापूर्ती करण्यासाठी साक्षात श्रीरामचंद्रप्रभू आणि लक्ष्मण हे दोघे बंधू तर आपल्या मदतीला धावून आले नसतील ना?”  हा विचार जानकीच्या डोक्यात घोळत होता. राघवची कार मात्र कोल्हापूरकडे स्वच्छंदपणे सुसाट निघाली होती.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इच्छापूर्ती…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

अल्प परिचय 

श्री व्यंकटेश देवनपल्ली, एम् ए. एल.एल.बी.

बॅंकेतील एक्केचाळीस वर्षाच्या सेवेनंतर असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त. मातृभाषा तेलुगु. शिक्षण मराठी माध्यमातून. मूळ सोलापूर. सध्या बेंगलुरू येथे वास्तव्य व वकिली व्यवसाय.  

श्रीकृष्णदेवराय रचित ‘आमुक्तमाल्यदा’ ह्या तेलुगु काव्यप्रबंधाचा मराठी व हिंदी गद्यानुवाद, साहिती समरांगण सार्वभौम- श्रीकृष्णदेवराय (चरित्र ग्रंथ), राजाधिराज श्रीकृष्णदेवराय (ऐतिहासिक कादंबरी) व ‘इंद्रधनु’ आणि ‘स्वानंदी’ (लघुकथासंग्रह) प्रकाशित.

? जीवनरंग ❤️

☆ इच्छापूर्ती…– भाग- १☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राघव आणि जानकी पुण्यात हजर होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या छोटेखानी देवळातल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिरात अखंड रामनाम जप सुरू होता. दुपारी बारा वाजता श्रीरामजन्माचा सोहळा भाविकांच्या जयघोषांत संपन्न झाला.

श्रीरामास अभ्यंगस्नान घातल्यानंतर पाळण्यात घालण्यात आले. ‘राम जन्मला गं सखे.., राम जन्मला!’ हे गीत उपस्थित स्त्रियांनी मोठ्या उस्त्फूर्तपणे गायलं. पुरोहितांनी विधीवत पूजा आणि  पौरोहित्य विधी संपन्न केला. प्रभू श्रीरामांच्या जयघोषांत व गुलालात सगळेच भाविक पूर्णपणे न्हाऊन गेले.

रात्रीच्या भजन-कीर्तनाने रामनवमीच्या महोत्सवाची सांगता होणार होती. वामन शास्त्रीबुवांचे कीर्तन, भजन ऐकणे ही एक मोठी पर्वणी असायची. त्यांच्या कीर्तनात सगळंच असायचं. उत्तम वक्तृत्व, संगीत, काव्य-नाट्य-विनोद यांचा अंतर्भाव असायचा. धर्मशास्त्रातला त्यांचा दांडगा व्यासंगच सर्व श्रोत्यांना बांधून ठेवायचा. कीर्तनाला खचाखच गर्दी असायची. त्यांचं निरूपणही तसंच गहन गंभीर असायचं.  परंतु क्षणभरात एखादी विचारज्योत पेटवून, ते मिट्ट काळोखात हरवलेल्या श्रोत्यांच्या अंत:करणात प्रसन्न प्रकाश पसरवत असत. राघवला आज बुवांच्या कीर्तनासाठी थांबता येणार नव्हते. जानकीला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत हजर व्हायचं होतं. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे कारने पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले. रस्त्यात शुकशुकाट होता. घुप्प अंधारातून गाडी वेगाने निघाली होती. काहीतरी बोलावं म्हणून जानकीनं विचारलं, “राघवा, आज काय मागितलंस श्रीरामाकडे?” गीतरामायणातील गदिमांची अलौकिक शब्दकळा आणि बाबूजींचे स्वर्गीय सूर यात हरवलेला राघव क्षणभरात भानावर आला आणि स्मितहास्य करीत म्हणाला, “जानकी, तुला ठाऊक आहे. मी श्रीरामाकडे कधीच काही मागितलं नाही. मागणारही नाही. मी आज जो काही आहे, तो श्रीरामामुळेच आहे. मी फक्त त्याचे आभार मानतो. माझा राम अंतर्यामी आहे. मला काय हवंय, ते त्याला पक्कं ठाऊक असतं. असो. आपण निम्म्या रस्त्यावर आलो आहोत. पुढचा रस्ता थोडा कच्चा आहे. थोडे सावकाश जावे लागेल.” 

का कोण जाणे, जानकीला आज थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. तिच्या मनात उलटसुलट विचार येत होते. अशा किर्र अंधारात गाडी बंद पडली तर… आसपास कुणी मदतीला धावून येणार नव्हता. तिच्या मनात शंकाकुशंका घोळत होत्या आणि अचानक कारच्या एका बाजूला खडखडल्यासारखं झालं.

राघवनं गाडी बाजूला घेतली. पाहिलं तर काय, समोरच्या एका चाकाचं टायर पंक्चर झालं होतं. अवतीभवती काहीच दिसत नव्हतं. तितक्यात पावसाची भुरभुरही सुरू झाली. डिक्कीतून जॅक आणि स्पॅनर काढून मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये राघव टायर काढण्याचा प्रयत्न करत होता. बोल्ट घट्ट झाले होते. काही केल्या फिरत नव्हते. तितक्यात मोटारसायकलवरून जाणारे दोघे आडदांड युवक येऊन थांबले. त्यांनी विचारलं, “काय झालं काका?”

टायर पंक्चर झाल्याचं राघवनं सांगितलं. ते आपणहून म्हणाले, “आम्ही काही मदत करू शकतो का?”

जानकीला मात्र मनातून भीती वाटत होती. कोणी चोर दरोडेखोर असतील तर काय करायचं? ती हळूच बाहेर आली. त्या मुलांनी सांगितलं, “काकू तुम्ही आतच बसा. तुमच्या हातातला मोबाईल द्या. त्या उजेडात लगेच स्टेपनी लावून देऊ.”

‘मोबाईल आणि तो कशाला?’ या विचारानं जानकीच्या मनात धडकीच भरली. तिने नाईलाजाने मोबाईल दिला. त्या दोघा बलदंड युवकांनी घट्ट झालेले बोल्ट ढिले केले. काही वेळातच स्टेपनी बदलली आणि मोबाईल परत केला. जानकीने त्यांना देण्यासाठी पर्समधून आधीच पाचशेची नोट काढून ठेवली होती. युवकांनी पैसे घेण्यास नकार दिला.

“आम्हाला काही द्यायची तुमची इच्छा असेल तर इथे देवळात चाललेल्या कीर्तनाला थोडा वेळ तरी हजेरी लावून जा.” असं म्हणताच राघवने जानकीकडे पाहिलं आणि त्यांची कार निमूटपणे त्या मोटरसायकलच्या पाठोपाठ निघाली. लगतच असलेल्या रामाच्या देवळाजवळ जाऊन पोहोचले. राघव आणि जानकी आत गेले.

कीर्तनकार बुवांनी नुकतीच सुरूवात केलेली होती. गुराखी कसं चुकार गुरांना चुचकारत घराकडे वळवत असतो, तसं श्रोत्यांना धार्मिक प्रवचनाकडं वळवायचं होतं म्हणून बुवांनी सगळ्यांना भजनात ओढलं.

“म्हणा, रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम… सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥” सगळे श्रोते गाण्यात तल्लीन होऊन गेले.

त्यानंतर बुवा बोलायला लागले, “ज्या श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला, त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा ही आपल्यासाठी जगण्याची एक ताकद देते….” 

बुवा श्रोत्यांच्या अंतरंगाला हात घालत होते. एक एक ओवी बुलंद आवाजात ऐकवत होते. पाठोपाठ निरूपणही करीत होते. हळूहळू गर्दी वाढत होती. विशेष म्हणजे त्यात युवकांचीही संख्या मोठी होती. पण त्यात ते दोघे युवक मात्र कुठेच दिसत नव्हते.

समोर बसलेल्या एका आजोबाने मधेच विचारलं, “बुवा, श्रीरामाचं दर्शन होतं का हो?”

त्यावर बुवा हसून म्हणाले, “आमचे कीर्तनकार गुरू वामनशास्त्री म्हणतात की जवाहिऱ्याचं दुकान थाटायचं असेल तर भक्कम भांडवल लागतं. त्यासाठी चणेदाणे, लाह्या करून विकणाऱ्या भडभुंजाचं भांडवल असून चालत नाही. काया-वाचा-मनसा रामाला भेटण्याची अनिवार ओढ, तळमळदेखील तेवढीच भक्कम असावी लागते. फार कशाला, तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून सांगा. या रामाच्या देवळात वर्षभरात दर्शनासाठी किती वेळा आलात? मला वाटतं, आजच रामनवमीच्या दिवशी आलात! जागोजागी असलेली मारूतीरायांची देवळे बघा. कशी वर्षभर तुडुंब भरलेली असतात. कशासाठी? तर प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसलेली आहे. भीतीचं निर्मूलन फक्त मारूतीरायाच करू शकतात, या श्रद्धेपोटी लोक त्यांच्या देवळात जातात. प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे मर्यादापुरुषोत्तम. त्यांनी धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. जिथे श्रीराम आहेत तिथे मारूतीराया निश्चित असतात. समर्थ रामदासस्वामी, भद्राचलमचे भक्त रामदासु आणि तुलसीदासजी यांच्या ठायी ती ओढ, ती तळमळ होती म्हणूनच त्यांना श्रीरामचंद्र प्रभूंचे दर्शन झाले.

समर्थ रामदासस्वामी त्यांच्या एका हिंदी रचनेत म्हणतात, “जित देखो उत रामहि रामा। जित देखो उत पूरणकामा।” तर भद्राचलमचे भक्त रामदासु म्हणतात की “अंता राममयम, जगमंता राममयम अंतरंगमुना आत्मारामुडु। अंता राममयम..” तुलसीदासजींनी “सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी॥“ ही चौपाई लिहिली. या प्रभृतींना संपूर्ण विश्वच श्रीराममय झाल्याचे जाणवत होते, तेव्हा कुठे त्यांना श्रीरामचंद्रप्रभू भेटले. यावरून तुलसीदासजींची एक गंमतीशीर गोष्ट आठवलीय. ऐका तर.

क्रमश: – भाग १

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares