मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांग पावसा सांग मला… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांग पावसा सांग मलासौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सांग पावसा सांग मला

काय देऊ मी सांग तुला

फुललेला तू ऋतू दिला

रंग गुलाबी फुला फुला

*

पाकळी मजला मोहविते

कळी कळी उमलून देते

हिरव्या हिरव्या पर्णपाचुच्या

देठासंगे घेई झुला

सांग पावसा……

*

कधी मी बावरुनी जाते

गोड खळी गाली येते

प्रेम झुल्यावर घेताना

हिंदोळा हा खुला खुला

सांग पावसा……..

*

अवचित लाली आलेली

सर ओलेती न्हालेली

कुंतलात मग अलगद माळून

छेड छेढतो कानडुला

सांग पावसा………..

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 244 ☆ गजानन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 244 ?

☆ गजानन☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बनविले खास

सुंदर मखर

बसविले त्यात

गजानन ॥

*

केली पूजाअर्चा

आर्पिली जास्वंद

झाले आनंदीत

गजानन ॥

*

दुर्वा हरळीची

केवडा पाहून

 गेले की मोहून

 गजानन ॥

*

मोदक सुबक

खीर तांदळाची

तृप्त की जहाले

गजानन ॥

*

खिरापत रोज

आवडेच भारी

लाडू पेढे खाती

गजानन ॥

*

आरती म्हणता

दिन-रात आम्ही

झाले की प्रसन्न

गजानन ॥

*

दहा दिवसाचे

असती पाहुणे

दरवर्षी येती

गजानन ॥

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“…  श्री सुहास सोहोनी ☆

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

येति स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

*

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

*

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

*

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

*

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद*, चौथ्यातुन…

*

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

*

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “बोला जय जय गणराया…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बोला जय जय गणराया☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तुझ्या दर्शने हरती विघ्ने,

 जाती लयाला चिंता,

आनंदाची असे पर्वणी,

आगमन तुमचे बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 पूजतो तुजला भावभक्तीने,

 सान-थोर हा मेळा,

पार्थिवातूनी चैतन्याची,

 देसी प्रचिती बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 हात जोडूनी, नमन तुला हे,

 पायी ठेवता माथा,

 सकला देई विवेकबुद्धी,

 विद्याधीश तू बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 गोड मानूनी घ्यावे तू रे,

 अर्पियले जे तुजला,

 भक्तिभाव जो मनीमानसी,

 ओळखीसी तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 चिंतन व्हावे तुझ्या गुणांचे,

 ध्यास जडो ज्ञानाचा,

 जाण राहू दे माणुसकीची,

 माणसात तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “विश्वनायक” ☆ श्री दयानंद घोटकर ☆

श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्वनायक ☆ श्री दयानंद घोटकर

हे सुमुखा, हे विनायका

विश्वाधिपती, नमो नमः ।।

*

सर्वारंभी, तुझेच पूजन

अग्रभागी, तू देवलोकी

चराचरी तू, अणुरेणुतून

ज्ञान विज्ञानी, तिन्ही लोकी…

*

रक्तवर्णी, जास्वंद पुष्प अन्

दुर्वा, बेल, शमी, प्रिय तुला

शक्ती, भक्ती, अन् संयमाचा

वरदनायक, ऋद्धी सिद्धीचा..

*

स्थूल सूक्ष्म तू, सगुण-निर्गुण

पाशांकुश, धारक योद्धा

सकल कलांचा, तू निर्माता

प्रणवरुपी, शुभ-लाभ पिता…

*

वेद व्यासमुनी, तुज विनविती

महाकाव्याच्या, लेखना

तूच देसी, प्रतिभा-प्रतिमा

साहित्याची, तूच प्रेरणा…

*

नृत्य-नाट्य, रंग-वेष, अभिनय

निर्मिसी, जगती, श्रेष्ठ कला

सूर-ताल, सूर्य-चंद्रासम दिधले

चित्र-शिल्प, दिले या जगताला…

*

आनंद देसी, शांती देसी

मांगल्य देसी, सकल जीवा 

कलावंत तू, विद्याविभूषित 

वंदनीय, सा-या विश्वा…

© श्री दयानंद घोटकर (प्रेमकवी)

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भक्तिगीत)

आल्या गौरी गं, महालक्ष्मी गं माहेरवाशिणी भादव्यात

लिंबा लोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥ धृ.॥

उंबऱ्यावर माप ओलांडी किणकिण घंटारव त्यात

बालगोपाळ सारे आनंदी घरामध्ये हो चिवचिवतात

देखणी आरास पाहून हसती गौरी गं कश्या मनात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥१॥

 *

देवघरात तेज पसरे लेकुरवाळ्या  आल्या माहेरात

वस्त्र माळा गं, नवे शालू गं, दाग दागिने त्यांच्या गळ्यात

दूर्वा आघाडा सोळा पत्री ही फुल हार पहा सजतात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥२॥

 *

फराळाचा ग केला थाट गेले सारे त्यांच्या पोटात

सोळा भाज्या ग कोशिंबिरीही पुरणाचे जेवण ताटात

चित्रांन्न साखर भात पंचपक्वान्न गौरींच्या थाटात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥३॥

 *

गोविंद विड्याचा मान त्यांना गं, पाणी ठेवले चांदी तांब्यात

त्यांच्या बाळांचे सारे कौतुक पाहून गाली पहा हसतात

गाठी घेऊन खिर कानवला नैवेद्याच्या दहीभातात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥४॥

 *

निरंजने गं, नंदादीप हे समया पहा तेजाळतात

सारी सुमने गंधाळलेली धूप दीप गं दरवळतात

लेकी निघाल्या सासुराला ग मोती हळूच ओघळतात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥५॥

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेशाचे आगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ गणेशाचे आगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 गेले श्रावणाचे पाऊल,

 लागे भादव्याची चाहूल!

 हिरव्या दुर्वांची दिसे माळ,

 अन जास्वंदी लाल लाल!… १

*

रुळते सोंड छातीवर,

 दोंद त्याचे असे मोठे!

 कान त्याचे हत्तीपरी,

 सुपा सारखेच वाटे !…. २

*

 छोटे छोटे डोळे त्याचे,

 बघती सारी लगबग !

आपल्या आगमनाने,

 आली सर्वांनाच जाग. !… ३

*

 येतो पाहुणा म्हणून,

 पृथ्वीवरी चार दिस !

 त्याच्या आनंदात करू,

 मोदकाचा गोड घास !…. ४

*

 बुद्धिदाता, एकदंत,

 सर्वांस प्रिय असतो !

 त्याचे आगमन न्यारे,

साऱ्यांनाच मोद देतो !…. ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || लवकर येई तू रे बाप्पा ||☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ || लवकर येई तू रे बाप्पा || ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

लवकर येई तू रे बाप्पा ..  लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

आतुरले रे सारे प्रियजन 

सजविले घर, सजले अंगण 

आनंदाचा ठेवा देण्या, हाच मार्ग सोप्पा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

दुर्वा आणि जपा सुमने 

शेंदूर आणि शमीची पाने 

पंचखाद्य नैवेद्याने 

भरून सज्ज खोपा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

आलास की तू, नकोच जाऊस 

सदैव राहो तव कृपा पाऊस 

श्वासागणिक तव स्मरणाने

पार संकट टप्पा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मातृवंदना…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मातृवंदना…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

भाग्य लाभले मज,

तुझ्या उदरी जन्मल्याचे |

संस्कार दिलेस मजला,

जीवनी पवित्र मांगल्याचे |

*

सोसल्यास अनंत कळा,

तळपत्या उन्हाच्या झळा |

कमी होऊन दिला नाहीस लळा,

तूझ्या मातृत्वाचा ऐसा जिव्हाळा |

*

जीवन माझे सरिता,

तू तिचे उगमस्थान |

काठी मायेचा ओलावा,

माऊली तू किर्तीमान |

*

कौतुके लोण्याहून मऊ,

चुकता वज्राहून कठोर |

दूर तुझ्या पासून जाता,

श्वासागणिक तुला घोर |

*

तुझ्या उदरातून केला,

जीवन प्रवास सुरु |

बोबडे बोल सुधारले,

तूच माझी आद्य गुरु |

*

वात्सल्यमूर्ती तू जीवनात 

शिरी मायेची शितल सावली |

जन्मदे तुझे किती थोरपण 

वात्सल्यसिंधू वाहे माऊली |

*

देव धर्म केला अपार,

असंख्य केलेस उपवास |

तुझ्या व्रतवैकल्याचे पुण्य,

आशिर्वाद माझ्या जीवनास |

*

हाडा मासाचा गोळा,

दिलास तू देहासी आकार |

सामर्थ्यही तूच दिलेस,

तुझे स्वप्न करीन साकार |

*

काळाच्या चाकावर,

वार्धक्य जरी तुझ्या वाटेला |

लेकरासाठी उभी खंबीर,

कोणत्याही कठीण घटकेला |

*

कितीही लिहावे तुझ्यावर,

अपूर्णतेची सल मनी राहते |

‘आई’ या दोन अक्षरासाठी,

पवित्र गंगा नयनी वाहते |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

☆ रसग्रहण :  माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

माणूस स्वतः हरवला आहे यातील गर्भितार्थ मनाला भिडतो. तो माणुसकीला ही विसरला. त्याला याविषयी काहीही घेणेदेणे नाही.

“जिव्हा चटावली म्हणताना भुकेविषयीचा सात्विक भाव नाहीसा झाला आहे हे अधोरेखित केले आहे.. “चटावली” शब्दांतून परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता नेमकेपणाने ध्यानात येते. बदलत्या परिस्थितीमुळे घरातील चूल रुसली आहे अशी कल्पना करून उत्तम चेतनगुणोक्ती अलंकार योजिला आहे. “कोपऱ्यात” या शब्दातून होत असलेले दुर्लक्ष कळते. पंगतीत पोट भरलेल्या लोकांना आग्रह केला जातो. पण भुकेल्या माणसाला घासही मिळत नाही याची जाणीव व पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करताना देश स्वतःच्या संस्कृतीला विसरतो आहे. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृतीतील भावना दुर्लक्षित होते आहे.

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

वर्तणुकीचे व हरवलेल्या माणुसकीचे वर्णन केल्यानंतर समाजाचे बदलते भान आणि वर्तन विशद केले आहे.. मदिरापानाची अवाजवी व गैरवाजवी प्रतिष्ठा देताना तिचे पेले फेसाळताना दिसतात. पण लहान बालकांना पूर्णान्न ठरणारे आईचे दूध मात्र आटत चाललेले आहे. माया व लहान मुलांना स्तनपान न देण्याकडे स्त्रियांचा वाढता कल लक्षात येतो. लहान मुलांचे ओठ सुकून गेले आहेत. त्यांची तहान भूक भागत नाही. मूलभूत गरजांविषयी माणुसकी जपली जात नाही. नात्याने पाहिले जात नाही हे सूचित केले आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने दूधाचा नाश झाला तरी बालकांची क्षुधा नजरेआड होते. ती भूकही सुकून जाते असे म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचा समर्पक वापर केल्याने परिस्थितीची तीव्रता समजते.. असे असूनही कुणालाही दुःख होत नाही. या अर्थी आंसू, अश्रू आटून गेलेले आहेत. मातृत्वाच्या भावनेला प्रामाणिक न राहणारी ही भावना फैलावल्यामुळे मातृत्वाची मान ही झुकली आहे असे म्हणताना “मातृत्वाची मान झुकणे” यातून मांडलेला गर्भितार्थ अतिशय भेदक आहे. मातृत्वही शरमून गेले आहे. चेतनागुणोक्ती कवितेच्या आशयाला उंची व खोली प्रदान करतो.

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

प्रत्येक माणूस हा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. स्त्रीच्या रूपात माय, बहिण व लेक ही मिळते. या सत्याकडे दुर्लक्ष करून स्त्री गर्भ मात्र खुडला जातो. “खुडे” या शब्दातून “कळी खुडणे” या अर्थाने कळी व तिचा विकास अशा जीवन क्रमाशी स्त्री गर्भाचा मेळ साधला आहे. समाजाची मूल्ये वर्धन करणारी, संस्कार करणारी स्त्रीचे अस्तित्व आवश्यक आहे. हा व्यापक विचार करण्यात समाज भावनिक दृष्ट्या कमी पडत आह. मी आणि माझेच खरे व स्वतः पुरते आत्मकेंद्री जगणे हा जणू आयुष्याचा नियम झाला आहे. अपवाद म्हणूनही समाजाचे भान ठेवण्याचे भान जपले जात नाही.

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रंग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

भूक तहान या नंतर या निवारा अर्थात घर याविषयी कवी सांगतो कि श्रीमंतांना व श्रीमंतांची उत्तुंग मोठी घरे असतात. परंतु दीनदुबळ्यांना मात्र “वास नसे” म्हणताना त्यांना घर, अधिवास नसणे हा भाव मांडला आहे. गरजेपेक्षाही जास्त असणे व गरजेपुरते ही नसणे हा विरोधाभास, विषमता लक्षात येते. श्रीमंतांच्या घरी गाड्यांची रांग लावताना पैशाचा अपव्यय दिसून येतो. त्याच वेळेस स्त्रियांसाठी लज्जा रक्षणार्थ वस्त्रही उपलब्ध नसते. धरतीवरील निर्दयी कठोरवृत्ती प्रकर्षाने मांडली आहे. “निर्दयी कठोर धरती” मधील श्लेषात्मक अर्थ ही अतिशय उच्च प्रतीचा आहे. पृथ्वीतलावर वास करणारे लोक निर्दयी व अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज भागवणारी धरती ही निर्दयी बनलेली आहे. गगनालाही कणव नसे म्हणताना वरुणराजाची कृपा नसल्याने लक्षात येते.. देव गगनात वास करतो असा समज आहे. त्या दृष्टीनेही त्याला कणव येत नाही असा श्लेषात्मक अर्थ आशयाला पूरक ठरतो. संपूर्णपणे विपरीत परिस्थिती मांडून माणुसकी कशी हरवत चालली आहे हे प्रत्येक कडव्या गणिक उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

समाजाचे अध:पतन दाखवताना माणुसकीप्रमाणे त्याचे नैतिक पतनही कसे होत आहे सांगितले आहे. लावणी पाहताना दंग झालेले लोक त्या नादामध्ये स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात. घरातील सुवासिनीचा, स्त्रीचा अश्रूही सुकून गेला आहे याचे भानही पुरुषजात ठेवत नाही. “अश्रू सुके “असे म्हणताना दुर्लक्षित परिस्थितीचा सामना दीर्घकाळ चाललेला कळतो आहे. लावणीच्या बैठकीत पैशाची उधळण होते. मुलांच्या विद्याप्राप्तीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. व शैक्षणिक फीया थकून जातात, बाकी राहतात. विभ्रमांनी मन रमवून काळाचा व पैशाचा अपव्यय केला जातो. क्षणिक सुखात दूरदृष्टीचा अभाव दिसतो.. संपूर्ण घराघराचा ऱ्हास, विध्वंस होऊ शकतो याकडे तीळमात्र लक्ष दिले जात नाही. आर्थिक, मानसिक शारीरिक व नैतिक पातळीवरील चांगला समाज चांगला देश निर्माण करू शकतो. परिपूर्ण समाजाची आस न ठेवल्यामुळे एकूणच माणूस म्हणून जगण्याच्या विविध भागांवर कवीने प्रकाश टाकला आहे. व माणुसकीच्या लोप पावण्याने अंध:कारमय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

विविध पातळ्यांवर हरवलेली, लोपलेली माणुसकी कवीने उदाहरणे देत शब्दांकित केली आहे. विपरीत वातावरणात विकल, हतबल, उदास मनाला आता कसलीही आशा नाही. काही बदल, सुधारणा होईल असे स्वप्न पहायचीही आशा उरली नाही. ” स्वप्न ही ना पहायची ” यातील श्लेषात्मक अर्थ अत्यंत अर्थपूर्ण. स्वप्न पाहायची नाहीत म्हणजे ती सत्यात उतरणार नाहीत याची जाणीव असल्याने ती पाहायची नाहीत व परिस्थितीमुळे स्वप्न पहायची आशा उरली नाही हा दुसरा अर्थ. ही गोष्ट सत्यात उतरेल याची शाश्वती मनाला उरलेली नाही. विस्तवासम दाहक वास्तवाने आशा मनातल्या मनात जळून जाणार, गुदमरून जाणार. “गुदमरणे” या शब्दातून तगमग, कळकळ, जीवाची काहिली लक्षात येते. हा समाज आता असाच राहणार का, यालाच समाज म्हणायचे का आणि इथे असेच जगायचे का असे विविध प्रश्न कवीच्या सजग व खिन्न मनाला पडलेले आहेत. या प्रश्नातूनच त्याचे नकारात्मक उत्तरही अध्याहृतपणे दिलेले आहे.

संपूर्ण कवितेत यमक, अनुप्रास या बरोबरच साहित्यिक अलंकारांची योजना केल्याने नादमयता व अर्थपूर्णता दिसून येते.

डोळ्यांत अंजन घालून वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी ही कविता ! अत्यंत हृदयस्पर्शी तर आहेच तिचे सामाजिक मोलही अनमोल आहे. समाजभान असणारे लोक प्रयत्नशील असतात. स्वतःचा व्यावसायिक पेशा समर्थपणे व यथार्थपणे सांभाळून, सामाजिक भान सजगपणे साहित्यातून सक्षमपणे व भाषेचे सौंदर्य जपून मांडण्याचे अनमोल कार्य डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी नेहमीच केलेले आहे.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares