किती वेळेस मी वाचलं असेल ह्याची गिनतीच नाही “नॉट विदाऊट माय डॉटर ” कुठलाही निराशेचा क्षण अलगद पुसून काढते हे पुस्तक. परक्या देशात परक्या माणसात आपल्या मुलींसाठी दिलेला एका आईचा एकाकी लढा. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही सत्य कथा.
बेट्टी महमुदी यांचे पती मुडी महमुदी हे अमेरिकेत डॉक्टर होतें. मूलतः इराणी आणि कट्टर धार्मिक, त्यांची मुलगी महातोब यांच्या भोवती ही कथा फिरते. लग्नानंतर चार वर्ष अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर स्वतःच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणायला मुडी दोघीना इराण मध्ये घेऊन जातो. तुम्हाला तिथलं वातावरण खूप आवडेल तुम्हाला हवं तेव्हा परतव येवू ह्या अटीवर दोघीना घेऊन इराण ला येतो.पण इथे आल्यावर तो एकदम बदलतो. आपल्या कुटुंबियांसमवेत मिळून अनेक बंधने लादतो.कट्टर धार्मिक वातावरण असलेल्या घरात तो बेट्टी आणि माहतोब ला घेऊन येतो. तिथे कट्टर धार्मिकता पाळाली जातं असतें. अस्वच्छता अज्ञान आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या ठिकाणी दोघी राहण्यासाठी अजिबात खूष नसतात मोकळ्याविचारांच्या बेट्टीला हे सहन करणे आणि बुरखा सॉक्स चादोर सह वावरणे असहाय्य होतें. ती अमेरिकन एम्बसीतून मदत मिळवण्याचा प्रयत्न करते पण पकडली जाते आणि तिच्या शारीरिक व मानसिक अत्याचारांना सुरुवात होते सुटकेचे सगळमार्ग संपलेले असताना बेटीने पुन्हा तसे करू नये म्हणून महातोब ला ठेवुन घेऊन तिला अमेरिकेत जायचे असल्यास जावे असेही तिला सांगण्यात आले. पण बेट्टी अजिबात तयार नव्हती योग्य संधी मिळे परियंत ती परिस्थितीशी समझोता करते आणि मुलीला जराही डोळ्याआड न करता जगत असतें अशातच अमेरिकेसोबत इराण चे युद्ध सुरूहोते आणि बेट्टीच्या हलामध्ये जास्त वाढ होतें. एका खासगी एजंटच्यामदतीने डोंगराळ भागातून बर्फाने आच्छादलेल्या डोंगरांमधून कधी चालत कधी घोड्यावर कधी टेम्पोने असा प्रवास करत ती तुर्कस्तानात दाखल होतें तिथे अमेरिकन एंबसी ची मदत घेऊन अमेरिकेत आपल्या आई वडिलांना जवळ पोहचते.
मुली साठी वाट्टेल ती हाल अपेष्टा सहन करत बेट्टी अमेरिकेत पोहचते पण मुलीशिवाय परतणे तिला नामंजूर असते.
एका आईच्या सहसची आणि चिकाटीची सत्य कथा प्रत्येकाने जरूर वाचावी.
कथेत खूप काही असे प्रसंग आहेत जिथे बेट्टीची जिद्द आपल्याला अतिशयोक्ती वाटते पण एक आई म्हणून विचार केला की एक आईसाठी हे अशक्य नाही असेही वाटते..
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “विवेकी पालकत्व” – डॉ. अंजली जोशी ☆ श्री ओंकार कुंभार ☆ ☆
पुस्तक -विवेकी पालकत्व
लेखिका – डॉ. अंजली जोशी
प्रकाशक – शब्द प्रकाशन
पृष्ठ संख्या – 204
किंमत – 275
नावावरून पालकांसाठीच वाटणारं हे पुस्तक पालकांसाठी तर महत्वाचे आहेच, त्याचबरोबर सर्वच स्री-पुरूषांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे.
या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्राच्या अनुषंगाने संशोधन करून पी.एच.डी ही पदवी संपादन केली आहे. एवढेच नाही तर स्वतःच्या मुलांचे संगोपन ही या पद्धतीने केले आहे. त्यामुळे हे लेखन अनुभवसिद्ध असे आहे.
विवेकी पालक होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. परंतु, निश्चितच ती अशक्य गोष्ट नाही. फक्त त्यासाठी नियमित सजगता मात्र हवी. आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात. आपल्यात बदल झाल्याशिवाय त्याची रुजवात पाल्यात होणार नाही हेही लक्षात घ्यायला हवे.
त्यासाठी आपल्याला हे पुस्तक सर्वतोपरी मदत करते. पुस्तकाची मांडणी खूपच सुंदर आहे. विविध उदाहरणांद्वारे रंजक पद्धतीने विवेकी पालकत्व हा विषय लेखिकेने मांडला आहे. त्यामुळे विषय व आषय समजायला सोपे जाते.
हे पुस्तक ज्यांच्यामुळे माझ्या वाचनात व संग्रहात आले व सातत्याने आम्हा मंडळींना वाचनास नेहमी प्रोत्साहित करत असतात, त्या श्री. राजेंद्र घोडके सरांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.
शेवटी सर्वांना विनंती की, आवर्जून सर्वांनी हे पुस्तक लवकरात लवकर वाचावे.🙏
सुनीताबाई देशपांडे! मराठी साहित्यसृष्टीतील एक अढळ तारा, महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके अन लोकप्रिय लेखक, पु. ल. देशपांडे ह्यांच्या अर्धांगिनी! हे एक सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व! प्रखर, तीक्ष्ण बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेली ही स्त्री मंगला गोडबोलेंच्या “सुनीताबाई” ह्या पुस्तकातून आपणासमोर विविध मनोज्ञ रूपात उलगडत जाते. पुस्तकाच्या सुरवातीलाच मंगलाताई म्हणतात की हा काही गौरव ग्रंथ किंवा स्मृती ग्रंथ नाही किंवा आरतीसंग्रह नाही तर त्यांना उमगलेल्या ह्या विलक्षण व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे संस्मरण नुसतेच रंजक नसून अनेक वेगवेगळ्या अर्थांनी उदबोधक झाले आहे. 1990 साली प्रसिद्ध झालेल्या सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी …’ ह्या परखड आत्मचरित्रपर पुस्तकाने साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली होती. अगदी मुखपृष्ठापासूनच आगळ्या वेगळ्या ठरलेल्या ह्या पुस्तकावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सुनीताबाईंवर भरपूर टीकाटिप्पणी ही झाली आणि तरीही त्यावर्षीच ते सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरलं. मंगला गोडबोलेंनी “सुनीताबाई” पुस्तकात “आहे मनोहर तरी..” मधले बरेच संदर्भ वापरले आहेत.
“सुनीताबाई” हे पुस्तक तीन भागांमधे विभागले आहे. “असं जगणं”, “असं लिहिणं” आणि “असं वागणं” !
“असं जगणं” मधे सुनीताबाईंच्या अगदी बालपणापासूनचे सगळे वर्णन आलेले आहे. सुनीताबाईंचे वडील म्हणजे रत्नागिरीचे प्रसिद्ध फौजदारी व सरकारी वकील सदानंद महादेव ठाकूर उर्फ अप्पा! त्यांच्याकडून आपण निवृत्ती तथा निर्मोहीपणा उचलला तर आई सरलादेवींकडून आपणास मोठ्यांदा बोलणं, कुणाचंही तोंडावर कौतुक न करता येणं, स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा, दीर्घोद्योगीपणा आणि लक्ख गोरा रंग ह्या गोष्टी वारसाहक्काने मिळाल्या असं त्या म्हणत. ही सारी स्वभाव वैशिष्ट्ये त्या आठही भावंडांमध्ये थोड्याफार फरकाने आलेली होती. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत रत्नागिरीत राहिलेल्या सुनीताबाईंसाठी ‘रत्नागिरी’ हा कायम जिव्हाळ्याचा विषय होता. लहानपणा पासूनच त्या अतिशय बुद्धिमान, मेहनती, ध्येयवादी, कलासक्त आणि जिद्दी होत्या. हातात घेतलेलं कुठलंही काम परफेक्ट करण्याकडे त्यांचा कल असायचा. सोळाव्या वर्षी मॅट्रिक च्या परीक्षेत अतिशय चांगले यश मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या भावासोबत मुंबईला आल्यात. पण त्याचवेळी ‘चले जावं’ चळवळीला तोंड फुटलं आणि सुनीताबाईंनी शिक्षणाला रामराम ठोकून स्वतः ला त्यात झोकून दिलं. चळवळीने त्यांच्या विचारांना आणखी समृद्ध करत जीवनाला एक वेगळी दिशा दिली. स्वतः मधल्या क्षमतेची त्यांना जाणीव झाली. साधेपणातल्या मूल्यांची ओळख पटली. स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मग माटुंग्याच्या एका शाळेत नोकरी पत्करली. तेथेच त्यांची पुलंशी ओळख झाली आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर स्नेहबंधात झाले. आणि बघता बघता पुलंमधल्या उमद्या कलावंताच्या प्रेमात सुनीताबाई केव्हा पडल्या त्यांनाही कळले नाही! त्या काळातही सुनीताबाईंचे विचार खूप सुधारक होते. लग्न नावाचे कृत्रिम बंधन त्यांना अनावश्यक वाटत होते. परंतु पुलंना कोणत्याही पद्धतीचे का होईना पण लग्न हवेच होते. त्यामुळे मग अतिशय साध्या नोंदणी पद्धतीने 12 जून 1946 ला त्यांचे लग्न पार पडले. त्यासाठी लागणारा आठ आण्यांचा फॉर्म सुद्धा दुसऱ्याला त्रास किंवा भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी स्वतःच आणून ठेवला होता! पुलंनी आपल्या ह्या लग्नाला “भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातला अभूतपूर्व विवाह” म्हणून गमतीने गौरवले आहे तर सुनीताबाईंनीही “आठ आण्यातलं लग्न” ह्या आपल्या लेखात हे सगळं वर्णन खूप खुमासदार केलंय! लग्नानंतर त्यांना अनेक बदलांशी जुळवून घ्यावे लागले. स्वतःच्या तत्वांना मुरड न घालताही त्यांना ते छान जमले. त्यामुळेच सासर आणि माहेर दोन्ही कडे त्याची पत कायम राहिली. “माईआत्या वॉज द फायनल ऑथॉरिटी इन ठाकूर हाऊस” असा अभिप्राय त्यांची भाचरं नेहमी देत.
लग्नानंतरचा काही काळ दोघांसाठीही खूप संघर्षाचा गेला. पण अत्यंत अल्प पैशात आपण जगू शकतो ह्या विचारधारेमुळे त्यांना त्याचे काही वाटले नाही. कष्ट करण्याची त्यांची नेहमी तयारी असायची. मित्रमंडळींच भरपूर पाठबळही होतंच. हळूहळू नाटक, सिनेमा, लेखन अशा सर्वच आघाडींवर पुलं नावारूपाला यायला लागले आणि नंतर त्या सगळ्याचे नियोजन करण्यात सुनीताबाई आकंठ बुडून गेल्यात. हे सगळं होत असताना ह्या विलक्षण बुद्धिमान स्त्रीने स्वतः च्या करिअर बद्दल कुठली ठोस विचार केला नाही. त्यादृष्टीने बघितलं तर त्या सर्वार्थाने आधुनिक काळातल्या डोळस पतिव्रता होत्या असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग हे छानच अधोरेखित करतो. सुनीताबाईंच्या एका वाढदिवसाला पुलं त्यांना म्हणाले, “सुनीता, तुला उद्या कोणती भेट देऊ सांग?” तर सुनीताबाईंनी काय मागावे? “तुझं आहे तुजपाशी” चा तिसरा अंक पुलंनी अर्धवट लिहून ठेवून दिला होता. सुनीताबाईंनी त्यांना तो अंक पूर्ण करून देण्याची मागणी केली आणि पुलंनी सुद्धा आपल्या पत्नीची ही मागणी आनंदाने मान्य केली आणि काही तास सलग बसून त्यांची तो अंक पूर्ण केला! वाढदिवसाची अशी अनोखी भेट मागणारी सहचरी मिळणं हे पुलंचं सुद्धा भाग्यच म्हणायचं! पुलंच्या पुढच्याही सर्व यशस्वी कारकिर्दीचे भरपूरसे श्रेय दर्जा बद्दल कुठलीही तडजोड न करणाऱ्या सुनीताबाईंकडे निश्चितच जाते. ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक सुप्रसिद्ध सहृदय, त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख ह्या सगळ्यांबद्दल ह्या पाहिल्या भागात सविस्तर प्रकाश टाकला आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग आहे “असं लिहणं!”. ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच लेखनप्रवासाचा एक आढावा घेतला आहे. कुशाग्र बुद्धी, विपुल आणि विविध प्रकारचे वाचन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, चिंतनशील वृत्ती इत्यादि सगळ्या गुणांमुळे त्यांना स्वतंत्र लेखन करणे अगदी सहज शक्य होते. परंतु वयाच्या साठीपर्यंत त्यांनी कधी फारसं लिखाण केलं नाही. मात्र त्यांचे पत्रलेखन अव्याहत सुरू होते. जी. ए. शी त्यांचा पत्रव्यवहार तर कित्येक दिवस सुरु होता. तेव्हा जी. ए. नी त्यांना अनेकदा स्वतंत्र लिखाणाबद्दल सुचविले. पण सुनीताबाई तो विषय तेथेच झटकून टाकत असत. बऱ्याच पुढे त्यांचा आणि जी. ए. चा हा पत्रसंवाद ‘प्रिय जी. ए..” ह्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. दोन भिन्नलिंगी व्यक्तींमधली निकोप, निर्मळ मैत्री अशी असावी म्हणून त्याचे वाचकांनी मनापासून स्वागतही केले. काही दिवसांनी 1983 साली त्यांचे वडील गेले आणि सुनीताबाईंना वयाच्या त्या टप्प्यावर आतापर्यंत काय मिळवलं अन काय गमावलं ह्याचा लेखाजोखा मांडावासा वाटला. आणि गतजीवनातलं जे जे आठवले ते ते त्या लिहायला लागल्या. पुढे जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला लेख ‘मौज’ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. आणि त्यांनी लिहिलेल्या काही आठवणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झाल्या त्या वाचकांना इतक्या आवडल्या की त्याचे पुस्तक व्हावे अशी चहुबाजूने मागणी होऊ लागली आणि अखेर “आहे मनोहर तरी ..” पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीस आले. ह्या पुस्तकाचे बाकी अभूतपूर्व असे स्वागत झाले. आणि सुनीताबाई एक प्रभावी, दखलपात्र लेखिका म्हणून वाचकांच्या समोर आल्या. ह्या पुस्तकावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा, टीकाटिप्पण्णी झाली. अनेक बाजूंनी त्याची चिकित्सा झाली. त्याच्या सुमारे अठरा हजार प्रति हातोहात विकल्या गेल्यात. अनेक मानाचे पुरस्कार ह्या पुस्तकाने पटकावले. हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले. महत्वाचे म्हणजे 1990-91 मध्ये खुद्द पुलंच्या पुस्तकां पेक्षा जास्त विक्री “आहे मनोहर तरी..” ची झाली! त्यानंतर ‘समांतर लेख’ , ‘सोयरे सकळ’ , ‘मण्यांची माळ’ वगैरे पुस्तकांबद्दल सविस्तर वर्णन आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते.
पुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे “असं वागणं..” ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच स्वभाव वैशिष्टांविषयी वर्णन आहे. त्यांची काव्याप्रती असलेली ओढ, त्यांच्यातली कर्तव्यतत्पर पत्नी, कठोर व्यवस्थापिका, आप्तस्वकीय आणि स्नेहीजण ह्याच्याशी त्याचे असलेले संबंध, त्याच्यामधला वात्सल्यभाव, कळवळा, वेदनेबद्दलची ची सहानुभूती, स्त्रीवादाचा पुरस्कार करत असूनही त्यांच्यातली गृहकृत्यदक्षता, संसारदक्षता अशा नानाविध पैलू अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना, प्रसंग ह्यात सविस्तर आलेले आहेत. मुख्य म्हणजे पुलंनी सुनीताबाईंचं हे सार्वभौमत्व जाहीरपणे मान्य केलं होतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी तर ‘माणुसकीचे आकाश” मध्ये त्यांचा गौरव करतांना म्हटलंय की ‘कलावंताच्या पत्नीला पदराखाली दिवा नेणाऱ्या बाईसारखे दिव्य करावं लागतं. दिवा विझू द्यायचा नाही, भडकू द्यायचा नाही आणि पदरही पेटू द्यायचा नाही. हे दिव्य सुनीताबाईंनी अतिशय समंजसपणे आणि आनंदाने केलं आहे.’ पुलंची प्रतिभा आणि प्रतिमा दोन्ही असोशीने जपणाऱ्या सुनीताबाईंसाठी ही महत्वाची पावतीच होती.
सरतेशेवटी ‘ऐसे कठीण कोवळेपण’ हा अरुणा ढेरेंचा एक स्वतंत्र लेख आहे ज्यात त्यांनी सुनीताबाईंचं एकूणच आयुष्य, त्यांचं कविताप्रेम, त्यांच्या स्वभावातले विविध कंगोरे, त्यांची प्रगल्भता, पुलंच्या एकूणच यशस्वी कारकिर्दीच्या मागे असलेले त्यांचे अथक परिश्रम, कुठलीही गोष्ट सर्वोत्तम करण्याचा ध्यास, पुलंच्या जाण्यानंतर त्यांनी वरवर तरी सहज स्वीकारलेले एकटेपण, अगदी शेवटी त्यांना आलेलं परालंबीत्व इ. अनेक गोष्टींविषयी विस्ताराने लिहलंय. वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर सुनीताबाई नावाचं लखलखीत व्यक्तिमत्व साकारत जातं आणि आपण नतमस्तक होतो !
☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆
पुस्तक – कृष्णकन्या संत सखू
लेखिका – सुश्री अनुराधा फाटक
प्रकाशक – रावा प्रकाशन
पृष्ठ संख्या – 64
किंमत – 120 रु
परिचय – मंजिरी येडूरकर.
श्रीमती अनुराधा फाटक
लेखिका अनुराधा फाटक यांची एक नवीन लघुकादंबरी, ‘कृष्णकन्या संत सखू’ रावा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने संत सखूचा अगदी बालपणापासून विठ्ठलाच्या पायावर देह ठेवेपर्यंतचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.आत्तापर्यंत आपण संत सखू भजनातून, गाण्यातून ऐकली होती, इथे मात्र कधी न बघितलेली सखू आपण सरूप पाहतो. नुसती पहात नाही तर हळूहळू आपण तिच्या डोळ्यात तिची कहाणी वाचायला लागतो, अनुभवायला लागतो. इतकी ती कथा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दचित्रात आहे. तिचा कृष्ण, तिचा विठ्ठल, तिची कृष्णामाई सगळं आपलं होतं. अर्थात कृष्णामाईच आपल्याला सखू ची गोष्ट सांगते आहे म्हणजे तिला आपल्यासमोर सरूप यायलाच हवं नं! अनुराधाताईंच्या शब्दात, वर्णनात इतकी ताकद आहे की त्या सखूची आपल्याला ओढ लागते. तिच्या अनिवार विठ्ठल भक्तीत आपणही कुठेतरी हरवून जातो. असं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं!
विशेष – छंद – वाचन, लेखन. सद्या लहान मुलांचे क्लासेस घेते.
पुस्तकावर बोलू काही
☆ “वन पेज स्टोरी” – डॉ. विक्रम लोखंडे ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆
पुस्तक – वन पेज स्टोरी
लेखक – डॉ विक्रम लोखंडे
प्रकाशक – साकेत प्रकाशन प्राइवेट लिमिटेड, औरंगाबाद
पृष्ठ संख्या – 128
आयुष्य हे एक अनुभवांचे पुस्तकच तर आहे असं आपण सहजच म्हणतो तसंच डॉ विक्रम लोखंडे यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपले काम करताना येणारे अनुभव या पुस्तकातून आपल्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने पोहचवले आहेत . रोज नवनवीन लोकांशी भेटी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात ,पेशंटच्या तसेच त्याच्या नातेवाईकांच्या भावना समजून घेताना डॉक्टरांना काय वाटतं होतं,त्यांच्या मनात कोणकोणते विचार येत होते आणि त्यातून जी कथा सुचत गेली त्याचे हे पुस्तक..वन पेज स्टोरी या नावातच पुस्तकाचं मोठं गुपित आणि यश दडलेले आहे कारण प्रत्येक कथा एका पानातच संपते. कथा एका पानावर संपते म्हणून ती कुठंही अर्धवट किंवा अर्थहीन,बोधविरहित मात्र नक्कीच वाटत नाही तर अगदी कमी वेळात बसल्या बसल्या एखादी कथा खूप काही सांगून जाते,एखादा छानसा बोध आणि वाचनाचा आनंद ,समाधान देवून जाते. आपल्या मनोगतात लेखक म्हणतात की, नवीन पिढी खूप फास्ट आहे, त्यांचा संयम कमी आहे, लांबलचक लेख वाचायला खूप कमी लोकांना आवडते. जास्त वेळ एकाग्र न राहू शकणाऱ्या,सगळं झटपट,थोडक्यात पटकन हवं असणाऱ्या या पिढीची आकलन क्षमता मात्र खूप जास्त आहे.नेमकं सांगितलेलं त्यांना पटकन समजतं आणि आवडतही. म्हणून हा लेखन प्रयोग. नेमका आशय,भावना पोहचवताना शब्दांची जी कसरत करावी लागत होती ती रोमांचक होती. लेखकाचे हे पुस्तक लिहितानाचे अनुभव वाचून खूप छान वाटले पेक्षा बऱ्याच गोष्टींची खरोखर गंमत वाटली. लिहणं ही मला सर्वोत्तम क्रियेटीव्हीटी वाटते . यात तुम्ही न जगलेली खूप सारी आयुष्यं जगता येतात. लेखकाचे हे वाक्य वाचून आपण जे थोडफार तोडकं मोडकं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो याबद्दल कौतुक वाटले.
या पुस्तकांत काही बोलक्या चित्रांसहित तब्बल 42 कथा आहेत. सर्वच्या सर्व हृदयस्पर्शी.
कथांमधून नाती, त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि आपेक्षाभंग याचं दर्शन लेखक करून देतात. प्रत्येक कथेतून लेखकाचा व्यापक दृष्टीकोन लक्षात येतोच पण कथेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक कथा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक भाग वाटू लागते. एक एक छोट्या कथांमधून लेखक आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेवून जात आहे हे आपल्या लक्षात ही येते आणि या कथा म्हणजे लेखकाने आपली केलेली आनंददायी फसवणूक वाटू लागते. एक डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना एक लेखक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टीकोन खरोखर खूप कौतुकास्पद वाटतो. या पुस्तकातून मला काय मिळालं हे सांगणं अवघड आहे कारण 42 कथा 42 नव्या गोष्टी सांगून गेल्या त्यातल्या नेमक्या एक एक बाबी सांगणं म्हणजे वाचकाची सत्वपरीक्षा ठरेल म्हणूनच मला इथे कथांचा सारांश देणे उचित वाटत नाही. शिवाय लेखकाने पुस्तकांत इतक्या कमी शब्दांत आपल्या भेटीला इतक्या छोट्या पण छान कथा आणल्या आहेत तर प्रत्येकीने त्या वाचूनच पाहायला काहीच हरकत नाही.. हो ना?
क्षणक्षणात नवं आयुष्य
पुस्तकाच्या पानापानांत
उलगडताना दिसतं
प्रत्येक पानावर नवं काहीतरी भेटतं..
प्रत्येक दिवशी नवं जगणं
नव्या अनुभवातून नवं शिकणं
रोज नवं कोणी भेटणं
भेटीतूनच एक कथा फुलणं…
त्याचं सुंदर पुस्तक बनलं
नाव त्याचं वन पेज स्टोरी ठरलं
एकाच पानात एक कथा
कधी आनंदी गाथा तर कधी सांगे व्यथा….
परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती” – लेखक – अतुल कहाते ☆ परिचय – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆
पुस्तकाचे नाव – भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती”
लेखक – अतुल कहाते
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या – ५०
पहिल्या भागात पॅरिस शहरातील आपले काम संपवून मैसूरला परतण्याआधी साम्यवादी देशांचा फेरफटका मारण्याच्या हेतूने ‘निस’ गावात पोहोचलेल्या तरुणास हादरवून सोडणारा अनुभव सांगितला आहे. रेल्वेच्या डब्यात स्थानिक तरुणीने सहज तिथल सरकारी वातावरण किती कडक आहे यावर काही संभाषण केलं. त्यावरून त्या दोघांनी बल्गेरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार विषयी टीकात्मक चर्चा केली या आरोपावरून त्या युवकाला व तरुणीला पोलिसांनी अटक केली. 72 तास अन्न पाण्याविना त्या युवकाचे झालेले हाल, तिथून त्याची झालेली सुटका, व त्याची विचारसरणीच पालटवून टाकणारा हा अनुभव यात वर्णन केला आहे.
हा युवक म्हणजे इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नागवार रामाराव नारायण मूर्ती.
मूर्ती यांचा जन्म म्हैसूर मधल्या ब्राह्मण कुटुंबातला. वडील शिक्षक,आई पाचवी शिक्षण झालेली,ही पाच मुली आणि तीन मुलं अशी भावंड,समाधानी कुटुंब. मुलांनी शिकावं अशी इच्छा असणारे आई-वडील. वडिलांना पुस्तक वाचन व शास्त्रीय संगीताची आवड तीच आवड मूर्तीनाही जडली.कमी पगार असल्यामुळे काटकसरीने, जबाबदारीने, विना तक्रार जगण्याचे कौशल्य आईकडून त्यांनी लहानपणी अंगीकृत केले. मूर्ती शाळेत हुशार होते.विज्ञान, गणित त्यांचे आवडते विषय.
घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाची निवड करताना केलेली तडजोड, महाविद्यालयात त्यांना मिळालेले यश, शिक्षणाबाबतची त्यांची वाटचाल इथे सांगितले आहे. वडिलांनी मूर्तींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यास आपण सक्षम नसल्याचे सांगूनही त्यांच्या वरती राग न धरता स्वतःच्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.
उच्च पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरी न करता कृष्णय्या या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार संगणक शास्त्राचा अभ्यास करण्याचे मूर्तीनी ठरवले. त्याबद्दलचे शोध निबंध वाचन त्यांनी सुरू केले संगणक शास्त्राचे ज्ञान संपादन करण्यासाठी केलेली वाटचाल इथे सांगितली आहे. त्यांची कम्युनिस्ट विचारसरणी विषयीची आपुलकी ही इथं नमूद केली आहे.मूर्तींचे संगणक शास्त्राचे ज्ञान बघून’सेसा’ या फ्रेंच कंपनीने त्यांना सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी पॅरिसला बोलवले.
पॅरिसमधील त्यांचे अनुभव, उद्योजकांबद्दल त्यांचा बदललेला दृष्टिकोण येथे सांगण्यात आला आहे. डाव्या विचारसरणीचे वारे डोक्यात असल्यामुळे मिळालेले पैसे गरजे पुरते ठेवून बाकीचे ते दान करत. तिथलं काम पूर्ण करून ते भारतात परतले. इथलं वातावरण त्यावेळी खूप तणावपूर्ण होतं. इथं आल्यावर मूर्तींनी एम.आर.आय नावाची कंपनी सुरू केली ज्यात त्यांना अपयश आलं.
या भागात सुधा मूर्ती यांची कौटुंबिक-शैक्षणिक माहिती, शैक्षणिक प्रवास, त्यांची जिद्द याची सविस्तर माहिती दिली आहे. मूर्तींची सुधा यांच्याशी झालेली भेट त्यातून त्यांचा प्रेममय प्रवास, सुधा यांच्या वडिलांचा विरोध, त्यांचा विवाह या भागात सविस्तर सांगितला आहे.
पुढील भागात नरेंद्र पटणी यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर संगणकाच्या टेप्स आणि डिस्कमध्ये डेटा एन्ट्री करण्याचा उद्योग सुरू केला. त्याचे सविस्तर वर्णन येथे आहे. तिथेच मूर्ती कामाला लागले. तिथला त्यांचा प्रवास, सहकाऱ्यांची माहिती, त्यांच्या कामाचा आढावा इथे सांगितला आहे. इन्फोसिसच्या निर्मितीची पाळमुळं ही इथेच रोवली गेली. सुधा यांचा त्यासाठीचा दृष्टिकोन आणि सहकार्य देखील आपल्याला समजते.
पुढे इन्फोसिसच्या जन्माची माहिती, ती निर्माण करण्यामागचा हेतू, त्यासाठी केलेली धडपड, अनेक तडजोडी, कंपनीतले कामाचे आराखडे, सहकाऱ्यांची आणि मूर्तींची विचारसरणी, पटणी यांची नाराजी, इन्फोसिसच्या यशाचा प्रवास इथे वाचायला मिळतो.
कंपनीला भांडवल मिळवण्यासाठी बँकेकडून कर्ज न घेता शेअर बाजारातून पैसे उभा करण्याचा निर्णय इथे सांगितला आहे. त्याची सविस्तर माहिती इथे वाचायला मिळते.
पुढील भागात भारतामध्ये संगणक क्षेत्रासाठी बदललेलं चित्र, भारतात आयटी क्षेत्रात झालेला बदल, शैक्षणिक- औद्योगिक प्रगती इथे वाचायला मिळते.कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचा,कर्मचाऱ्यांची काही माहिती इथे वाचायला मिळते.
सुधा मूर्ती यांचं मूर्तींच्या आयुष्यातले योगदान इथे सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाची उचललेली जबाबदारी,केलेल्या तडजोडीत,वाद न होऊ देता काढलेला मार्ग खूपच विचार करायला लावतो. इन्फोसिस फाऊंडेशनची धुरा त्यांनी कशी सांभाळली हेही यात समजतं.
इन्फोसिस मधून निवृत्त होऊन मूर्तींनी घरच्या वडीलधाऱ्याने वागाव तसं त्यांचं इन्फोसिसशी नातं ठेवलं पण त्यानंतर इन्फोसिस मध्ये झालेले चढ-उतार, इन्फोसिस वर-मूर्तींवर झालेल्या टीका इथे वाचायला मिळतात.
नुकसानीकडे चालणाऱ्या इन्फोसिसला तारण्यासाठी मूर्तींनी पुनरागमन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय,इन्फोसिस मधलं वातावरण,त्यांचं झालेलं कौतुक, काही टीका इथे सांगितल्या आहेत.
साधेपणातही सुंदर,समाधानी आयुष्य जगता येतं स्वतःच्या प्रगती सोबत इतरांचीही प्रगती व्हावी हा उदात्त हेतू असणाऱ्या या मूर्तींबद्दल वाचताना अभिमान वाटतो. हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.
मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आणि श्री. अच्युत गोडबोले व डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे लिहिलेलं “गणिती” हे अतिशय माहितीपूर्ण आणि तितकेच रंजक असे पुस्तक! गणितावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर ही एक मेजवानीच! गणितासारख्या अतिशय रुक्ष आणि क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या विषयावर तब्बल 465 पानांचे पुस्तक लिहिणे आणि वाचकाला अगदी शेवटच्या पानापर्यंत त्यात गुंतवून ठेवणे ही किमया अच्युत गोडबोलेच करू शकतात ह्याची हे पुस्तक वाचतांना खरोखरच प्रचिती येते!
तसं पाहिलं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गणित असतं. पण आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा माहिती नसते. पशु, पक्षी, वनस्पती सगळ्यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या घरांमध्ये, फर्निचर मध्ये, घरट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे गणित दडलेले असते. झाडांना येणारी पाने एक विशिष्ट क्रमाने येतात असे आढळून आले आहे. मधमाश्यांची उत्पत्तीही एका ठराविक क्रमाने होते, बऱ्याच फुलांच्या पाकळ्यांतही काही विशिष्ट क्रम दिसून येतो. ही क्रमरचना फिबोनाची क्रमिकेशी (Fibonacci series) मिळतीजुळती असते. 1,1,2,3,5,8,13,21,…. ह्या क्रमवारीला फिबोनाची सिरीज म्हणतात. ह्यातली प्रत्येक संख्या ( पहिले दोन वगळता) आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. निसर्गातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ही सिरीज आढळते.
तसेच सुवर्ण गुणोत्तर (Golden ratio) हा सुद्धा निसर्गात आढळणारा एक अफलातून प्रकार! तुम्ही पोस्ट कार्ड, ग्रिटिंगकार्ड, खिडक्या, दारांच्या चौकटी, फोटो, आरसे ह्यांचे आकार किंवा मनुष्य किंवा इतर प्राणी यांच्या शरीराचे आणि चेहऱ्याचे आकार बारकाईने बघितले तर एका विशिष्ट गुणोत्तरात असतात. तोच हा Golden ratio! त्यामुळेच ते आकार डोळ्याला आल्हाददायक वाटतात आणि म्हणूनच चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ह्या सगळ्यांमध्ये हा रेशो वापरलेला असतो. ह्या गोल्डन रेशो चा शोध सर्वप्रथम पायथॅगोरस ची पत्नी थेओना हिने लावला आणि नंतर यूक्लीड ने सर्वप्रथम त्याची व्याख्या केली.
सामान्यतः आपणास आपल्या आजूबाजूला सगळीकडेच गणित आहे ह्याची कल्पनासुद्धा नसते. अर्थात त्याने बिघडत काहीच नाही पण जेव्हा ते कळतं तेव्हा गणितातलं हे सौंदर्य आपल्या मनाला भुरळ पाडतं. प्रस्तावनेतच दोन्ही लेखकांनी हे अधोरेखित केलंय की हे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा उद्देशच मुळी लोकांना गणित किती सुंदर असू शकतं हे समजावं, ती शोधणाऱ्या गणितज्ञांची आयुष्ये कशा विविध चित्रविचित्र अनुभवांनी, घटनांनी भरलेली आहेत हे कळावं हा होता. आणि त्यांचा तो उद्देश ह्या पुस्तकाने अगदी सफळ संपूर्ण केलाय! आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक गोष्टींमध्ये दडलेल्या गणितातलं मुलतत्व सोप्या भाषेत वाचकांना समजावून सांगितले आहे.
पुस्तकात आर्यभट , ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर, रामानुजन, नीलकंठ यांच्यासारख्या भारतीय गणितज्ञांसोबतच पायथॅगोरस, युक्लीड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, पास्कल, फर्मा, नेपिअर ह्यांच्याविषयी, त्यांच्या अनमोल शोधांविषयी अतिशय रंजक माहिती दिलेली आहे. निसर्गातल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूंचं अचूक वर्णन आपण गणितामुळेच करू शकतो. विश्वरचनेचं कोडं उलगडण्यासाठी आज ज्या भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानातल्या अतिप्रगत थिअरीज वापरल्या जाताहेत त्याचा पाया हजारो वर्षांपूर्वी अनेक गणितज्ञांनी शोधलेल्या गणितावरच आधारलेला आहे. मात्र त्यासाठी त्यांना समाजाविरुद्ध कसा लढा द्यावा लागला त्याचीही इत्यंभूत माहिती आपल्याला ह्या पुस्तकात मिळते. पुस्तकाच्या सुरवातीलाच विश्वनिर्मिती झाल्यानंतर अंकांचा शोध कसकसा लागत गेला, त्यानंतर निरनिराळ्या आकृत्या त्यांची गणितं, त्यांचा देवळं, पिरॅमिड, घरं बांधण्यासाठीचा उपयोग इ बद्दल सुंदर विवेचन केलंय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर प्रचंड असे इजिप्शियन पिरॅमिड बांधताना त्या लोकांनी खगोलशात्र आणि गणिताची सांगड घातली होती. आजसुद्धा जगभरातल्या पर्यटकांचे ते एक आकर्षण स्थळ आहे.
आपल्याकडे इ. स. पूर्व 800 च्या सुमारास यज्ञवेदींच्या रचनेसंदर्भात काही विशिष्ट गणिती सूत्रांचा वापर केला जायचा. त्याला “शुल्वसूत्र” असं म्हटलं जायचं. त्या काळात गणिताचे सर्व ज्ञान मंत्रांच्या स्वरूपात होतं. Trigonometry चे अख्खे टेबल आर्यभटाने फक्त एका श्लोकात मांडले होते! अशा अनेक गोष्टी वाचतांना आपण आश्चर्यचकित होत जातो.
आर्यभटानंतर भारतीय गणितात अत्यंत मोलाची कामगिरी करणारा गणितज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त. त्याने जगाला “शून्य” म्हणजेच काहीही नसणे किंवा अस्तित्वविरहितता ही संकल्पना देऊन सगळ्याच गणितात प्रचंड क्रांती केली. मानवी मनाची ही सर्वात प्रगल्भ कृती होती असे लेखक म्हणतो. संपूर्ण जगाच्या गणिताचा चेहरामोहराच ह्या आविष्काराने बदलून टाकला!
आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त यानंतर महावीराचार्य, रंगाचार्य, भास्कराचार्य, नीळकंठ, माधवाचार्य यांनी भारतीय गणितात फार मोलाची कामगिरी करून ठेवली. भास्कराचार्यांचे “सिद्धान्तशिरोमणी” आणि “लीलावती” हे ग्रंथ त्यांच्या अमूल्य योगदानाची साक्ष देतात. काही लोकांचे म्हणणे आहे कि लीलावती भास्कराचार्यांचे पत्नीचे नाव होते. काहींच्या मते ते त्याच्या अतिशय लाडक्या मुलीचे नाव होते. लग्नानंतर लवकरच वैधव्य आल्यामुळे भास्कराचार्याने तिला माहेरी आणले आणि तिचा वेळ चांगला जावा म्हणून तिला गणित शिकवले. तसेच तिचेच नाव आपल्या ग्रंथाला दिले. आज सुद्धा गणित कसं शिकावं ह्याचा आदर्श म्हणून ह्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. तसाच केरळ मधला विद्वान गणितज्ञ म्हणजे नीळकंठ. त्याचेही “तंत्रसंग्रह” हे पुस्तक खूप गाजले. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या निश्चित वेळा काढण्याचं काम सर्वप्रथम नीलकंठाने केलं.
गणित म्हणजे केवळ मोजणे किंवा आकडेमोड करणे ह्यापलीकडेही काहीतरी आहे हे जगाला दाखवून देण्याचं श्रेय ग्रीक विचारवंत थेल्स याला जातं. त्यानंतर गणिताच्या इतिहासात अजरामर झालेला ग्रीक गणितज्ञ म्हणजे पायथॅगोरस! पायथॅगोरस ची ओळख प्रत्येकाला सातवी आठवीतच झालेली असणार. त्यामुळे सगळ्यांच्याच परिचयाचा! म्हणूनच त्याच्याविषयी सांगितली जाणारी एक छोटीशी कथा पुढे देते आहे.
ग्रीस मधल्या एका लहानश्या गावात डेमॉक्रिटस नावाचा एक अतिशय विद्वान गृहस्थ राहायचा. त्याला एकदा एक तरतरीत मुलगा लाकडाची मोळी विकण्यासाठी नेतांना दिसला. अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटक्या बांधलेल्या त्या मोळीने डेमॉक्रिटसचं लक्ष वेधून घेतले. त्याने त्या मुलाला “तुला मोळी कुणी बांधून दिली?” अशी पृच्छा केली असता तो मुलगा उत्तरला , “माझी मोळी मीच बांधतो, मला आईवडील नाहीत” “मोळी विकून काय करणार?” ह्या प्रश्नावर तो मुलगा उत्तरला की मोठेपणी त्याला डेमॉक्रिटस सारखे विद्वान व्हायचे आहे. ते ऐकताच डेमॉक्रिटस ला त्या मुलाबद्दल कुतूहल वाटले व त्याने त्याला मोळी सोडून पुन्हा पहिल्यासारखी बांधून दाखवायला सांगितले. त्या मुलाने तसे केले. त्याचे मोळी बांधण्यातले कौशल्य, सुसंगती, अचूकता अन नेटकेपणा बघून डेमॉक्रिटस खुश झाला अन त्याने त्या मुलाच्या पोटापाण्याची अन शिक्षणाची जबाबदारी घेतली. हाच तो सुप्रसिद्ध पायथॅगोरस!
अशा अनेक गणितज्ञांच्या आयुष्यातील आख्यायिका, कथा आपल्याला ह्या पुस्तकात भेटतात. अतिप्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात कशी झाली, त्याच्या वेगवेगळ्या शाखा कशा निर्माण झाल्यात त्याचा रोचक इतिहास आणि त्यांच्या सगळ्याच प्रवासाची एक सुंदर झलक आपल्याला ह्या पुस्तकातून दिसते .
खरं सांगायचं तर पुस्तकाचा आवाका इतका प्रचंड आहे की इतक्या थोडक्यात त्याबद्दल सांगता येणं खूपच कठीण आहे. एवढं बाकी नक्की की ज्यांचा गणित हा विषय आहे, ज्यांना गणितामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी तर हे विस्तृत पुस्तक म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे! मात्र असे असूनही ज्यांचा गणित विषय नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाहीच असे बाकी मुळीच नाही. ते सुद्धा पुस्तकातला काही भाग वगळून ह्या पुस्तकाचा आनंद निश्चितच घेऊ शकतात. एकंदरीतच प्रत्येक वाचकाला गणिताच्या अतिशय अद्भुत आणि रंजक विश्वाची एक सुंदर सफर हे पुस्तक घडवून आणतं ह्यात शंकाच नाही !
प्रसिद्ध कथा लेखिका राधिका भांडारकर यांचा पाचवा लघुकथा संग्रह र्हस्व नुकताच प्रकाशित झाला. कथा लेखनावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या राधिकाताईंचा हा संग्रह सुद्धा अतिशय वाचनीय झालेला आहे. या संग्रहात एकूण १३ कथा आहेत. सर्वच कथा आपल्या सर्वांच्या भावविश्वाशी सहजपणे धागा जोडतात. प्रत्येक कथा ही जीवनातल्या एकेका पैलूचे दर्शन घडवते.
सौ राधिका भांडारकर
कथा विषयांचे वैविध्यही खूपच भावते. आवर्जून उल्लेख करावा असा विषय म्हणजे स्त्रीचे ऋतुमती होणे. हा विषय तसा खुलेपणाने न बोलला जाणारा आहे. ‘ पाउल ‘ या कथेत या स्थित्यंतरातील स्त्रीची भावनिक आंदोलने खूप छान पद्धतीने टिपली आणि मांडली आहेत.
‘ पत्त्यांचा बंगला ‘ ही कथा समाजात घडणाऱ्या विलक्षण मनोव्यापाराचे दर्शन घडविते. अत्यंत हलाखीत बालपण गेलेल्या कथानायकाला परिस्थितीच महाराज बनवते. माणसांची दुखरी नस अचूक ओळखणारा तो धूर्त, चाणाक्ष नायक हे नाटक कसे वठवतो हे वाचण्यासारखेच आहे. एका वेगळ्याच विषयावरची ही कथा प्रभावी मांडणीने मनाची पकड घेते.
‘ पस्तीस – छत्तीस ‘ ही कथा मनमानी नवऱ्याचा इगो, वर्चस्व, रुबाब जपताना संसाराचा तोल सांभाळण्यासाठी करिअर सोडून देणाऱ्या एका हुशार, कर्तृत्ववान ‘ती’ ची कथा आहे. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी ही कथा अप्रतिम जमून आली आहे.
आणखी एक सुंदर कथा म्हणजे ‘ क्षपणक ‘. अतिशय बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी पण तितकाच अस्थिर स्वभावाचा पती आणि प्राणपणाने घर, संसार, मुलं, नवरा यांना जपणारी, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांची ही कथा. रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता त्या क्रियांना मदत करून शेवटी त्यातून बाहेर पडणारे क्षपणक म्हणजे कॅटाॅलिस्ट तो बनवितो. पण शेवटी तो मनापासून कबुल करतो की,’ त्याच्या खऱ्या आयुष्यातली क्षपणक तीच आहे.’ ही कथा अतिशय प्रभावी झाली आहे.
‘ उत्तरायण ‘ ही कथा ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली आहे . दुर्दैवाने बालविधवा झालेली कथा नायिका मोठ्या जिद्दीने, हिंमतीने पुढची वाटचाल करते. एकुलता एक मुलगा संस्कारी, सक्षम, कमावता बनतो. तिथेच तिचे उत्तरायण सुरू होते. लेखिकेने ग्रहताऱ्यांची भ्रमंती आणि मानवी जीवनाची वाटचाल यांची खूप छान सांगड घातली आहे .
सर्वच तेरा कथा एकापेक्षा एक सरस झाल्या आहेत. विषयही सामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने वाचक पटकन त्यांच्याशी जोडले जातात.
‘ चंद्रोदय ‘, ‘ शुभरजनी ‘ या आजकाल मुले परदेशस्थ आणि देशात पालक एकटे या वास्तवावर सकारात्मक भाष्य करणाऱ्या दोन सुंदर कथा आहेत. ‘चंद्रोदय’ मध्ये शिसवी पाटावर साक्षात चंद्रच जेवत होता या सुंदर वाक्याने होणारा कथेचा शेवट मनाची पकड घेतो.
‘ स्थळ ‘ कथा आजकालच्या लग्न जमणे, जमवणे या गोष्टींवर छान प्रकाश टाकते. यात लेखिकेने एक जबाबदार सदस्य म्हणून केलेली निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. शेवटही छान केला आहे.
कथांची शीर्षकं ही लेखिकेची खासियत आहे. सर्वच शीर्षकं वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पस्तीस छत्तीस हा आलिशान बीएमडब्ल्यू चा नंबर आहे. त्याचा तो स्टेटस सिम्बॉल. पत्त्याचा बंगला, शुभरजनी, परीघ, क्षपणक, पाउल ही शीर्षकं कथेला वेगळा आयाम देतात.
‘ वाळा ‘ म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना !पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे वयाची साठी पार झाल्यावरही परिस्थितीचा तगादा आणि मनातील वडिलांचे प्रोत्साहन यामुळे संगीत शिकून एक प्रतिथयश गायिका बनलेल्या नायिकेची ही कहाणी आहे. संगीतातील तपशीलवार बारकाव्यांचेही छान वर्णन आहे. त्यामुळे कथा रसाळ झाली आहे.
या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली र्हस्व ही कथा सर्वात लहान बहीण सर्वात आधी गेल्याने विलक्षण दुःखी झालेल्या मोठ्या बहिणीचे हे मनोगतच आहे.
” ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे ॥
केले नारायणे उफराटे ॥”
हा संत निवृत्तीनाथांचा अभंग वाचताना जसा जीव गलबलतो ही कथा वाचतानाही तशीच भावना मनी दाटून येते
सर्वच कथांमध्ये लेखिकेने अतिशय हळुवारपणे कथाबीज फुलवलेले आहे. त्यातून तिचे प्रगल्भ, संवेदनशील मन, वास्तवाचे सखोल निरीक्षण जाणवते. जगण्यातले काही तरल क्षण सामोरे येतात. सुंदर सकारात्मक संदेशही देतात.
कथेची भाषा अगदी सहज सोपी, ओघवती, चित्रदर्शी आणि मनाला भिडणारी आहे. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो.
या कथासंग्रहाला ज्येष्ठ लेखिका अरुणाताई मुल्हेरकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
राधिकाताईंनी हे पुस्तक आपले प्रेरणास्थान असणाऱ्या रसिक वाचकांना अर्पण केले आहे ही विशेष बाब आहे.
या आधीच्या कथासंग्रहांप्रमाणेच या कथासंग्रहाचे पण वाचक उस्फूर्तपणे स्वागत करतील यात शंका नाही. कारण याही कथा वाचनीय आणि प्रभावी आहेतच. त्यासाठी राधिकाताईंचे मनापासून अभिनंदन. यापुढेही त्यांच्या उत्तम उत्तम कथा रसिकांना वाचायला मिळोत यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा.
आज सांगलीतच काय महाराष्ट्रातही डॉ. दिलीप शिंदे हे नाव परिचित आहे. डॉक्टर हा रुग्णांचा देव असतो अशी श्रद्धा अजूनही लोकांच्या मनात रुजलेली आहे. पूर्वी संपूर्ण कुटुंबाचा एकच पिढीजाद डॉक्टर असे. त्याला सर्व कुटुंबाचा आरोग्य इतिहास माहिती असे त्यामुळे कुणाला कोणते औषध देणे गरजेचे आहे हे त्याला समजत असे. तेव्हा आजच्या सारखे स्पेशालिस्ट नव्हते. डॉक्टर व कुटुंबीय यांच्यात एक भावनिक बंध जुळलेला असे.असे डॉक्टर आता दुर्मिळच झाले आहेत. पण त्याला अपवाद असणारे एक डॉक्टर आहेत – डॉ. दिलीप शिंदे. त्यांनी लिहिलेले
सेवारती या पुस्तकाची थोडक्यात ओळख मी करून देण्याचा प्रयत्न करतेय. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातील दुर्मिळ होत चाललेली ध्येयवादी सेवावृत्ती डॉक्टरांच्या रक्तातच भिनलेली आहे. डॉक्टर हा जणू देवदूतच असतो. त्यांची “संवेदना” ही संस्था एक आदर्श सेवाभावी संस्था आहे. ‘ लागले रे नेत्र पैलतीरी ‘ अशा मनोवस्थेतल्या व अंथरुणावर खिळून पडलेल्या वृद्धांचा व त्यांची संवेदशीलतेने, प्रेमाने शुश्रुषा व देखभाल करणाऱ्या डॉक्टर पती – पत्नी आणि परिचारिका यांचं कोरोना काळातील जगणं शब्दबद्ध करणाऱ्या या कथा आहेत. यातील १२ ही कथांचे संक्षिप्त वर्णन थोडक्यात नाही करता येणार. पहिल्याच “औक्षवंत होऊया” यात संस्थेचा ४ था वर्धापन दिन व डॉक्टरांचा वाढदिवस येथील वृद्ध कसा साजरा करतात याचं हृद्य दर्शन आपल्याला घडतं. ‘ पुरुष सगळे सारखेच ‘ या कथेत समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती मुळे स्त्रीला होणार त्रास दिसून येतो. ‘ वडिलांच्या विरोधाचा अर्थ ‘ अशी ही वेगळ्या धाटणीची कथा आपल्याला बापाचे प्रेम कसं असतं याचा प्रत्यय देते. राहत्या घरात सेवा केंद्र करण्यास त्यांचा विरोध का असतो हे कथा वाचल्यावर लक्षात येते.
‘ मी लग्न करू का नको ‘ हा केंद्रातल्याच एका परीचारीकेला पडलेला प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करून जातो. लग्नानंतर ही नोकरी सोडायची अट मुलाकडून आल्यावर तिने दिलेला नकार आपल्याला पटतो. तिला ते काम मनापासून आवडत असते. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची भूमिका खूप महत्वाची असते., असे असूनही त्यांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. समाजाचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा निकोप नाही.
पुरुषाच्या यशस्वीतेमागे स्त्रीचे योगदानही मोलाचे असते ही गोष्ट डॉक्टर इथे विसरलेले नाहीत. ‘ बायकोचे योगदान ‘ ही कथा म्हणजे डॉ. नीलमचा जीवनपटच आहे. खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून ती पूर्णपणे समर्पित झालेली आपल्याला दिसून येते. सहजीवनात आलेल्या काही कठीण प्रसंगात तिने दिलेला आधार एखाद्या दीपस्तंभा सारखा भर भक्कम होता असे डॉक्टर कबूल करतात.
आता पुढच्या कथेकडे पाहू.
‘ सहजीवन आणि समजूतदारपणा ‘. या गोष्टीत एका वृध्द जोडप्याची स्थिती अशी आहे की आजोबा केंद्रात राहतात. मुलगा सून नोकरीवाले. आजोबा या दोघाशी नीट वागायचे पण आज्जी समोर आल्या की चिडचिड करायचे. बिचाऱ्या आज्जी बाहेरच बसून राहायच्या. १६ -१७ वर्षे ती दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. जर त्या दोघांनीही आपल्या सहजीवनात थोडा समजूतदार पणा दाखवला असता तर ही वेळ आली नसती.
‘ जे टाळणे अशक्य ‘ या कथेत डॉक्टरांचे बालपण आपल्या डोळ्यांसमोर येते. बालपणातल्या अनेक शालेय, शेतीच्या आठवणी त्यांनी विषद केल्या आहेत. काही काही अटळ गोष्टी दैवगतीने कशा निभावल्या गेल्या हे समजते.
दारूचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम यावर प्रकाश झोत टाकणारी कथा – ‘अवघड आहे’
संसाराची व स्त्रीची झालेली परवड आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. कळते पण वळत नाही अशी आजची स्थिती आहे. एका बाजूस दारू पासून मिळणाऱ्या महसुलाविना अडचणीत येणारे सरकार आणि दुसऱ्या बाजूला सरकारने दारूबंदी करावी अशी अपेक्षा असलेल्या स्त्रिया.. अवघड आहे.
एक आदर्श शिक्षिकेला, आदर्श पत्नी, आदर्श माता नाही बनता आले त्यामुळे तिचा झालेला कोंडमारा ‘ मला तिचे तोंडही बघणार नाही ‘ या कथेत दिसून येतो. मुलीच्या मनात बसलेली आढी शेवटी दूर होते हीच एक समाधानाची गोष्ट.
‘ लढण्यात शान आहे ‘ नावातच आपल्याला कथेचं सार समजून येते. संवेदना केंद्राची व्याप्ती जसं जशी वाढत गेली तस तशी जागेची कमतरता भासू लागली. वर्षभर अनेक खस्ता काढून डॉक्टरनी एक नवा प्लॉट घेतला. बांधकामात खूप अडचणी येत होत्या. त्यातच कोरोना वाढत चालला होता. प्रकल्प अर्धाच राहतो की काय याचा ताण आला होता. पण त्यांच्या सासऱ्यांच्या पाठिंब्याने तो प्रकल्प हळू हळू आकाराला येत होता. लढायला बळ देत होता.
स्त्री पुरुषांमध्ये असणाऱ्या इगोला जरा जरी धक्का लागला तर दोघानाही कशी घुसमट सहन करावी लागते, हे ‘ बंधन आणि स्वातंत्र्य ‘ मध्ये आपल्या दृष्टीला पडते. इथे डॉक्टर एक विधान करतात –
” प्रत्येक कुटुंबात स्त्री पुरुषांमध्ये सहकार्य आणि संघर्ष चालूच असतो. स्त्री यथाशक्ती स्वतःवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत राहते, मात्र त्याचवेळी सहकार्य करणेही तिला भाग पडत असते ‘. किती रास्त म्हणणे आहे ना.
यातील शेवटची कथा आहे –
‘ कोरोना आणि मरण ‘
कोरोना शब्द उच्चारला तरी मरणाची भीती आणि आठवण होते आणि मरण म्हंटले तरी कोरोनानेच मेला अशी शंका मनात येई. ही गोष्ट त्या कोरोना काळात मनात पक्की बसली होती. संस्थेतील आजी – आजोबांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते. अशा या अभद्र काळात एका आजींचा मोठा मुलगा कोरोना नव्हता तरी घाबरून वारला होता आणि ही गोष्ट त्या आजीपासून लपवावी लागली होती. पुढे त्या आजी घरी गेल्यावर त्यांना ही बातमी सांगितली गेली.
अशा या १२ कथांना ललित भाषेचा बाज आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी खूप मुद्द्यांचा उहापोह केलाय.त्यातील काही अधोरेखिते :
भरल्यापोटी जीवनाची निरर्थकता सांगणारे साहित्यिक जीवनाचे सकारात्मक पैलू गांभीर्याने घेतली एवढा प्रभाव या ” सेवारती” च्या कथा पडतात.
“संवेदना” हे दवाखाना व वृद्धाश्रमातील जे जे चांगले आहे त्याचा संगम असलेलं व प्रेम, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांची त्रिसूत्री जपणारे वृद्धसेवा केंद्र आहे
सेवारती च खरं सामर्थ्य आहे लेखक डॉ. शिंदे यांच्या स्वानुभवाधारीत कथा
सहजीवन कसं असावं, संसारातल व व्यावसायिक दोन्ही प्रकारचं, याचं नमुनेदार उदाहरण म्हणजे हे डॉक्टर दाम्पत्य एकंदरीत या कथांमध्ये, आजच्या गडद निराशेच्या व जगण्याची निरर्थकता प्रकर्षाने जाणवणाऱ्या कालखंडात आशेचे दीप माणसाच्या मनात पेटवत त्याची निराशा दूर करण्याचं सामर्थ्य आहे असं त्यांनी आपल्या ब्लर्बमध्ये लिहिलं आहे.
आपण सर्वांनी निदान एकदा तरी या कथा वाचल्या पाहिजेत.
परिचय – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(सौ. अक्षता गणेश जोशी आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)
अल्प परिचय
शिक्षण – बी. ए. (इतिहास) आवड – वाचनाची आवड आहे… ऐतिहासिक वाचन आवडते… वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय लेखनचा प्रयत्न करते…
पुस्तकावर बोलू काही
☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – व्हाय नॉट आय?
लेखिका – वृंदा भार्गवे.
पृष्ठ संख्या – २५२
अमेय प्रकाशन
मूल्य – २५०₹
जन्मतः माणसाला सुदृढ, निरोगी,धडधाकट आयुष्य मिळणे म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. ती टिकवणे आपल्याच हातात आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरी एखादी व्यक्ती त्याला अपवाद असू शकते. वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या एका चुकीमुळे पाणीदार डोळ्याच्या देखण्या देवू ची (देवकी) दृष्टी गेली.याचा परिणाम त्वचा,दात, केस,वर्ण या सगळ्यावर झाला.एवढं सगळं होऊन ही तिने आणि तिच्या आईने जिद्द सोडली नाही…
सत्य घटनेवर आधारित असणारी ही आहे “उजेडयात्रा”… कादंबरी,कथा,अनुभव कथन कशात ती बसू शकेल याची कल्पना नाही. ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आहे हे मात्र नक्की!!
“अंधारावर उजेड कोरणाऱ्या मायलेकीची कहाणी…”
लेखिकेने अतिशय सुरेख शब्दात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे. घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. डोळ्यांत पाणी तरळते…देव सुद्धा एखाद्याची किती परीक्षा घेत असतो…की मागच्या जन्मी चे पाप-पुण्या चा तर्क वितर्क आपण जोखत असतो… देवू च्या यातना सोसण्याला परिसीमा नाहीच…पण त्याहीपेक्षा तिचे स्वावलंबी होणे जास्त मनाला वेधून जाते…
तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन जातीबाह्य विवाह केला.दोन्ही बाजूंनी तसा विरोधच…सासरे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे एम.ए. करून इतिहासात बी.एड.केले. नवरा पुढे एम.फिल.कर असे म्हणत होता पण तिने शिक्षण थांबवून शिक्षकीपेशा स्वीकारला…
पंधरा वर्षाच्या संसारात दोन मुली मोठी रेणू 10 वर्षांची आणि धाकटी देवू (देवकी)साडेतीन वर्षांची.
काही तासापूर्वी तिच्याशी बोलत असणारा तिचा नवरा ज्याचे पोट थोडे दुखत असल्याचे निमित्त होऊन अकस्मातच गेला…ती आणि तिच्या मुली एकदमच बिचाऱ्या झाल्या. तिची शाळेतील नोकरी होती तरीही…
नवरा गेल्या नंतर सासरी होणारी मानसिक कुचंबणा,निराशेचे वातावरण तिला तिच्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी नको होते म्हणून मुलींना घेऊन ती माहेरी आली. बहिणीचे लग्न झाले होते, भावांनीही वेगळे संसार थाटले होते.लहानपणी भावा-बहिणींमधले प्रेम, परस्परांसाठी जीव तुटणे ही ओढ कोठे तरी हरवली आहे असे जाणवले…तिच कमतरता आई वडिलांच्या नजरेत जाणवली… सर्वार्थाने ती एकटी पडली होती. सगळीकडून तिला व्यवहारिकतेचे अनुभव येऊ लागले.तिने लक्षात ठेवले ते माणसाचे तत्वज्ञान… माणस जपायला पाहिजेत पण माणस वेगळी आणि नातलग वेगळे हे समजलेच नाही…
आपल्याला सगळे झिडकारत आहेत असे वाटू लागले.विरंगुळा काय तो दोन मुलींचा.रेणू अगदी नवऱ्यावर देखणी शांत,खळीदार हसणं… बाबा गेल्यावर उदास-गप्प गप्प रहायची, आता आपले हक्काचे नाही याची समज तिला लवकर आलेली.रेणूचा धाकटी म्हणजे देवू वर विलक्षण जीव. देऊ चे डोळे म्हणजे तिचा अँसेट… अतिशय बोलके,मोठाले डोळे, काळ्याभोर पापण्या प्रचंड मोठया,आकाशीसर पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाची बुब्बुळ… दोघीना रंगाचे भारी वेड…
तिला स्वतःला आर्टिस्ट व्हायचे होत पण एक वेगळंच आयुष्य तिच्या वाट्याला आलेलं…पण दोन्ही मुलीना मात्र त्यांच्या आवडीने जगू द्यायचे अस ठरवलेलं पण हे स्वप्न नियतीने पुन्हा उध्वस्त केलेले… ९ ऑक्टोबर १९९३ ला देवू ला अचानक सर्दी खोकला झाला. त्यातच ताप आला.अंगावर काढण्यापेक्षा बालरोगतज्ज्ञ यांच्या कडे घेऊन गेली.
त्या रस्त्याने त्या दवाखान्यात जात नव्हती तर ती तिच्या गोंडस,सुंदर पाणीदार डोळ्याच्या मुलीच्या आयुष्याची शोकांतिका लिहायला चालली होती.
औषध घेऊन ही ताप कमी येत नव्हता.घसा लालसर झाला शरीरावर ही डाग दिसू लागले,एक डोळा लाल झाला. पुन्हा डॉक्टरानी तेच औषध सुरू ठेवा असे सांगितले. तापाचे प्रमाण पुन्हा कमी जास्त होत गेले.पण डोळे मात्र लाल, त्यातून येणारा पांढरा स्त्राव,पूर्ण शरीरावर भयंकर रँश.वरचा ओठ पूर्णपणे सुजलेला…एका विचित्र संकटाची चाहूल तर नाही ना…
रक्ताची तपासणी करून आणून द्या मगच समजेल… तोपर्यंत सेपट्रन हे औषध चालू ठेवा…हे औषध अगदी ओळखीचे झालं होत. तपासणी मध्ये मलेरिया झाले एवढंच समजले. डॉक्टरानी ताबडतोब अँडमिट करायला सांगितले. 26 तारखेला डॉक्टरांनी देवू चा नवाच आजार जाहीर केला.”STEVENS JOHNSON SYNDROME” तिला तर समजलेच नाही. काळजी करू नका.ट्रीटमेंट बदलू असे डॉक्टर म्हटत. देवू च्या सर्वांगावर पडलेले लाल डाग आता काळ्या डागात परावर्तित झालेले.”ममा, रोज नवा फुगा तयार होतो बघ…”ती फोडाला फुगा म्हणायची… आता तिच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हते.ऍडमिट केल्यापासून सलायन,अनेकदा ब्लड काढण्यासाठी सुया टोचल्या जायच्या.पण देवू एकदाही रडली नाही. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे होते.देवू साठी आणि देवू च्या आईसाठी… या सगळ्यात तिला तिच्या धाकट्या दिराची मदत झाली.वेगवेगळे डॉक्टर यायचे ते सांगतात ते ऐकायचे त्यांच्या दृष्टीने तिची वेगळी केस असायची… अगदी हैद्राबादला मध्ये तिला दाखवले एक तर डोळ्यात आलेला कोरडेपणा आणि गेलेली दृष्टी… प्रत्येकाची वेगळी औषधे आणि त्यांचे चार्जेस….
(देवू च्या सुरुवातीच्या आयुष्यात जे वेदनादायी प्रसंग आले ते मला लिहणे सुद्धा त्रासाचे झाले जे याही पेक्षा तिने कोणावरही राग,दोष न देता सहन केले…खरच काय म्हणावे तिच्या सहनशक्तीला…)
या काळात तिला नवऱ्याची प्रकर्षाने उणीव भासली कारण तो फार्मासिस्ट होता…त्याच्या मुळे तिच्या देवू वरचे संकट तरी टळले असते… पण ती आठवण सुद्धा व्यक्त करायला सवड नव्हती….या दिवसात तिच्या सोबत तिचे आई वडील असूनही नव्हते आणि नसूनही होते.तिच्या मात्र सारख्या दवाखान्याच्या चकरा असायच्या.देवू कोणतेही आढे वेढे न घेता जायची.ज्यावेळी तिला कधीच दिसणार नाही हे कळाले तेव्हा निरागस मुलीने आईची समजूत घातली आणि तिलाच धीर दिला,”ममा तू रडतेस, मी चालेन हं… पण मला आता गाड्या दिसणार नाहीत… मी त्रास देणार नाही, शहण्यासारखी वागेन…तू मला काठी आणून दे.” या सगळ्यात तिचा धाकटा दीर आणि धाकटा भाऊ यांची साथ मिळाली.आणखी बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले ते सहानभूती म्हणून नाही तर देवू आणि तिच्या आईची जिद्द बघून…काळकर काका फ्रान्सहून येताना देवू साठी प्रिझर्व्हेटिव्ह फ्री टीअर ड्रॉप्स च्या ट्यूब आणल्या(डोळ्यातला ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी) एकही पैसा घेतला नाही, वावीकर बाईनी ब्रेल किट च हातात सोपवलं,देवू ला ब्रेल शिकवायची…
माणूसवेडी देवू कोणी आले की तिला प्रचंड आनंद व्हयचा.स्पर्शा चे ज्ञान तिला आता चांगले अवगत झाले होते.घरातल्या घरात ती सहज वावरू लागली… गप्प राहणाऱ्यातली मुळीच नव्हती ती.देवू ला आईच्या शाळेतच घातले. आई तिला पुस्तक मोठ्या ने वाचून दाखवत असत.एकक शब्द आणि त्याचा अर्थ…तिचे मार्क नेहमी छान असायचे…तिची हुशारी बघून इतर मुलांमध्ये न्यूनगंड येईल म्हणून तिचे प्रत्येक विषयातले मार्क कमी केले. हे कळल्यावर देवू च्या आईला खूप वाईट वाटले.पण त्या काही बोलू शकल्या नाहीत…पण काही शिक्षक असे ही होते की तिला योग्य मार्गदर्शन करत तिच्यावर त्यांचा जीव होता कारण ती हुशार आणि बुद्धीमान म्हणून नव्हे,तर तिला प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याची मनस्वी ओढ होती. असे चांगले वाईट अनुभव आले तरी त्या दोघी पुन्हा नव्याने सज्ज होत…तिच्या रेणू दि ची ही साथ खूप मोलाची होती.
देवू सातवीच्या वार्षिक परीक्षेत चारी तुकड्या मधून पहिली आली. सेमी इंग्लिश मिडीयम च्या वर्गासाठी निवडलेल्या मुलांच्या यादीत तिचा पहिला क्रमांक होता.तिची स्मरण शक्ती अफलातून होती.स्वतःचे वेळापत्रक स्वतः आखून त्याप्रमाणे पूर्तता झाली पाहिजे हा तिचा कटाक्ष असे.दहावी ला तिला 86% मार्क मिळाले. देवू च्या यशात नँब ने प्रचंड सहाय्य केले.तिथल्या लोकांनाही देवू चे वेगळे जाणवले असावे.फोन केल्यावर,”बोला देवू ची आई”काय हवं नको ते विचारायचे. दक्षिणेतल्या अंदमान सफरीसाठी महाराष्ट्र राज्यातून काही अपंग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात देवू चा ही समावेश होता.ती व्यवस्थित जाऊन आली ही…
देवू ने आर्ट्स ला ऍडमिशन घेतले. इकॉनॉमिक्स हा विषय तिला खूप आवडतो.शाळेतल्या प्रमाणे तिला कॉलेजमध्ये मैत्रिणी ही खूप छान मिळात गेल्या… “10 वी 12 वी त पहिलं येणं नाही ग एवढं क्रेडीटेबल… मला माणसांसाठी, त्यांच्या सुखासाठी काहीतरी करायचंय,त्यासाठी भरपूर शिकू दे ग मला’असे ती म्हणयची. देवूला संशोधनात रस आहे… जे तिला करावेसे वाटते त्याची पूर्तता झाली असे लेखिकेने दाखविले आहे…
या सगळ्या यशात देवू ला तिला आई, बहीण आणखी खूप जणांची साथ लाभली असली तरी तिची अभ्यासू वृत्ती, जिद्द, स्वतः चे विचार मांडण्याचे धाडस,सगळ्याच गोष्टीत शिस्तबद्धता…या तिच्या गुणांचे योगदान खूप महत्वाचे आहे…
हे प्रेरणादायी पुस्तक वाचनीय आहे.
धन्यवाद!!
संवादिनी – सौ. अक्षता जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈