ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

श्री.विठ्ठल हरी कुलकर्णी :

मराठीतील लेखक,समीक्षक,चरित्रकार विठ्ठल हरी कुलकर्णी यांचा आज स्मृतीदिन.(1982)शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील महाविद्यालयात प्राध्यापक पदी नोकरी केली. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास अशा विविध टोपणनावानी लेखन केले.सदर लेखन त्यांनी ज्योत्स्ना,तुतारी,प्रतिभा,विविधवृत्त या विविध नियतकालिकांमधून केले.व्यक्तिचित्रे या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य लेखक,व्यक्ती यांच्यावर चरित्रपर लेखन केले आहे.त्यांनी निबंध स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेखन ह त्यांनी केले आहे.अखेरच्या काळात त्यांनी जाॅर्ज बर्नार्ड शाॅ आणि अच्युत बळवंत कोल्हटकर व्यक्ती आणि वाड्मय हे दोन मोठे अभ्यासंपूर्ण चरित्रग्रंथ लिहिले. व्यक्तीरेखा आणि वि.ह.कुलकर्णी निवडक लेख हे त्यांचे दोन ग्रंथ 1986 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

धर्मपाल कांबळे.:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव आपणा सर्वांचेच परिचयाचे आहे.पण त्यांचे सर्व साहित्य संपादित करून तीन खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचे महत्वपूर्ण कार्य ज्यांनी  केले ती संशोधक व्यक्ती म्हणजे धर्मपाल कांबळे.ते पुण्यातील पोस्टामध्ये पोस्टमनची नोकरी करत होते.त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती.वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी तीन खंडांत साठे यांचे साहित्य प्रसिद्ध केले.पहिल्या खंडात पोवाडे,लावण्या व गाणी आहेत.दुसरा खंड लोकनाट्याविषयीचा आहे.तिस-या खंडात त्यांच्या कथा आहेत.त्यांचे स्वतःचे लेखन विपुल प्रमाणात आहे.त्यापैकी काही:

अण्णा भाऊ साठे – आंबेडकर चळवळीचे वारसदार, प्रबोधनकार ठाकरे – व्यक्तित्व, कार्य, साहित्य मृत्यूकडून जीवनाकडे, भारतरत्न राजीव गांधी इ.

प्राप्त पुरस्कार व सन्मान :

चंद्रशेखर आगाशे पुरस्कार, नाट्य चित्र कला अकादमीचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पुणे पोस्टस् टेलिग्रामवर सोसायटीचा गुणवंत कामगार पुरस्कार.

आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन!.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया, इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ७ डिसेंबर –  संपादकीय  ?

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

आज लोकप्रिय गीतकार, राजकवी भा.रा. तांबे यांचा स्मृतीदिन. आज त्यांची आठवण काढताना एकापेक्षा एक सरस कविता आठवू लागताहेत. त्यांच्या विषयी विस्तृत माहिती वाचा, आजच्या मनमंजुषेत – ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी ….’

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :  इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ६ डिसेम्बर –  संपादकीय  ?

डाॅ.भि.रा.तथा बाबासाहेब आंबेडकर :

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन !(1956)

बाबासाहेब हे थोर न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनितीज्ञ, तत्वज्ञ, कायदेतज्ञ,समाज सुधारक,दलितोद्धारक,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सर्वांना ज्ञात आहेत.मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स या संस्थातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.सर्वांत प्रतिभाशाली व सर्वांत उच्च विद्याभूषित राजकारणी अशी त्यांची ख्याती होती.

त्यांना मराठी,इंग्रजी,संस्कृत,हिंदी,पाली,फ्रेंच,जर्मन,गुजराती, बंगाली, कन्नड आणि पारसी या भाषा येत होत्या.इंग्रजीत त्यांनी  विपूल लेखन केले आहे.22 ग्रंथ,पुस्तके व 10 शोधनिबंध पुर्ण असून 10 ग्रंथ अपूर्णावस्थेत आहेत.मराठी व अन्य भाषांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांच्या लेखनात त्यांनी धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा यावर भर दिला आहे.त्यांच्या साहित्याचे आतापर्यंत 22खंड प्रकाशित झाले आहेत.अद्याप अनेक खंड प्रकाशित करावे लागणार आहेत एवढे साहित्य उपलब्ध आहे.सर्वांत जास्त लेखन करणारी राजकीय व्यक्ती असा त्यांचा उल्लेख करता येईल.

ते उच्च विद्याभूषित तर होतेच,पण त्यांना अनेक सन्मानही मिळाले होते.कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डाॅक्टर ऑफ लाॅ ही व उस्मानिया विद्यापीठाने डाॅक्टर ऑफ लिटरेचर ही मानाची पदवी दिली.भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे.शिवाय बोधिसत्व,मैत्रेय या बौद्ध धर्मातील उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.त्यांच्या नावाची व छायाचित्राची पोस्टाची तिकीटे,चलनातील नाणी काढून ह त्यांना गौरविण्यात आले आहे.                                                                       

भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान हे किती मोलाचे आहे हे शब्दात सांगणे अवघड आहे.जगभरात कौतुकास पात्र ठरलेल्या  संविधानाच्या या निर्मात्यास स्मृतीदिनी लाख लाख प्रणाम.!  

पद्मजा फाटक :

विविध मासिके,दूरदर्शन अशा  माध्यमातून साहित्य सेवा करणा-या पद्मजा फाटक यांचा आज स्मृतीदिन.(2014)

एकोणीसशे ऐशी च्या दशकात सुंदर माझे घर,शरदाचे या सारख्या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकांचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते.  

ललित,कथा,बालसाहित्य,प्रवासवर्णन,चरित्रात्मक असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.प्रसन्न,खेळकर लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.किडनीच्या आजाराने दीर्घकाळ त्रस्त असूनही त्यांनी आपल्या लेखनातील ताजेपणा टिकवून ठेवला.आयुष्य मजेतच जगायचं अस म्हणत आजारपणानंतरचे लेखन त्यांनी ‘मजेत’ या टोपण नावानेच केले.

गर्भश्रीमंतीचे झाड,आवजो,रत्नाचं झाड,बाराला दहा कमी,वडील व मुलगी यांच्यातील नाते उलगडून दाखवणारे,’बापलेकी’ हे संपादित पुस्तक,चंमतग चष्टीगो हे बालसाहित्य ,शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचे चरित्र ,ही त्यांची काही प्रमुख पुस्तके.स्त्री मासिकातील ‘पुरूषांच्या फॅशन्स’ हा त्यांचा लेख खूप गाजला होता.

गर्भश्रीमंतीचे झाड या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

2014 मध्ये त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ?

☆☆☆☆☆

मुरलीधर खैरनार :

छ.शिवरायांची सुरतेची लूट सर्वांनाच ठाऊक आहे.या लूटीतील बराच मोठा हिस्सा गायब झाला होता.त्याच्या घेतलेल्या शोधाची अभ्यासपूर्ण कथा ‘शोध’ या कादंबरीतून सांगणारे मुरलीधर खैरनार यांचा आज स्मृतीदिन.(2015)

खैरनार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.ते इतिहासाचे अभ्यासक तर होतेच.पण नाट्यकर्मी,निर्माता,दिग्दर्शक,अभिनेता,मुक्त पत्रकार,संघटक अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या.आवर्त,आणखी एक नारायण निकम,अजब न्याय वर्तुळाचा,घालिन लोटांगण,शुभमंगल इ.नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.गाढवाचे लग्न या पुन्रनिर्मित नाटकाचे ही त्यांनी दिग्दर्शन केले व त्याचे शेकडो प्रयोग झाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणा-या सर्जनशील लेखनासाठीच्या अभ्यासवृत्तीचे ते प्रथम मानकरी ठरले.

अ.भा.नाट्य परिषद,अ.भा.विद्यार्थी परिषद,शेतकरी संघटना,या संस्थांचे ते पदाधिकारी होते.संघटनेच्या ग्यानबा या मासिकाचे त्यांनी संपादन केले होते.

शोध या त्यांच्या कादंबरीला सार्वजनिक वाचनालय,नाशिक आणि म.सा.प.चा ह.ना.आपटे पुरस्कार मिळाला होता.

2015 मध्ये त्यांचे निधन झाले.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया,दिव्यमराठी ,म.टा.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ५ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज ५ डिसेंबर : –

ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्लेषणापासून ते बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांच्या सखोलतेपर्यंत, आपल्या अतिशय बारकाईने केलेल्या अभ्यासपूर्ण समीक्षेसाठी ख्यातनाम असलेले ज्येष्ठ समीक्षक श्री. मधुकर वासुदेव, म्हणजेच  म.वा. धोंड यांचा आज स्मृतिदिन. ( ०४/१०/१९१४ –०५/१२/२००७ ) 

‘आपल्या अतिशय मर्मग्राही आणि धारदार लेखनाने मराठी समीक्षेच्या प्रांगणात स्वतःचा स्वतंत्र असा ठळक ठसा उमटवून गेलेले समीक्षक ‘ असे श्री. धोंड यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. कुठल्याही प्रकारच्या साहित्याची समीक्षा करतांना, त्याला अगदी मूलगामी संशोधनाची जोड असलीच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. आणि त्यामुळे साहित्याचा अभ्यास करतांना त्यांच्या चौकस मनाला अनेक प्रश्न पडत असत. आणि त्या प्रश्नांची उत्तरे सापडेपर्यंत ते थांबत नसत. त्या संदर्भातल्या ज्ञात-अज्ञात अशा सगळ्या संदर्भांचा ते चिकाटीने शोध घेत असत. असा सूक्ष्म अभ्यास करणे हा त्यांचा जणू उपजत व्यासंग होता, याची प्रचिती त्यांनी केलेल्या प्रत्येक समीक्षेत आवर्जून येते. त्यांच्या समीक्षेला साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, अशा वेगवेगळ्या अभ्यास-क्षेत्रातले संदर्भ असायचे, ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक लेखनात एक समृद्धता नक्कीच जाणवायची. 

समीक्षेबरोबरच त्यांनी स्वतःही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. “ काव्याची भूषणे “ हे त्यांचे पहिले पुस्तक, ज्यात काव्यातील अलंकार व अलंकारशास्त्र या विषयावर सोदाहरण अशी 

विस्तृत चर्चा केलेली आहे. “ मऱ्हाटी लावणी “ हे पुस्तक म्हणजे ‘ लावणी ‘ या वाङ्मयप्रकारासंदर्भात केलेले सर्वांगीण आणि सखोल विवेचन आहे. हा एक विशेष आणि महत्वपूर्ण ग्रंथ समजला जातो. याची दुसरी आवृत्ती “ कलगीतुरा “ या नावाने काढली गेली. कुठल्याही विषयातील त्यांच्या चिंतनाचं वेगळेपण आणि स्वतंत्रता यामध्ये प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.   

“ज्ञानेश्वरी“ म्हणजे तर त्यांनी आयुष्यभर घेतलेला ध्यासच होता. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचे फक्त निरूपण किंवा भाष्य नाही, तर ती ‘ मराठी गीता ‘ आहे हे त्यांचे ठाम मत अर्थातच त्यांच्या गाढ्या अभ्यासातून प्रकट झालेले होते. ज्ञानेश्वरीला विश्वसाहित्यात मानाचे स्थान मिळणे हा मराठी भाषेचा आणि साहित्याचा गौरव असल्याचे ते अभिमानाने म्हणत असत. “ ज्ञानेश्वरीतील लौकिक दृष्टी “ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे, त्यांच्या समीक्षणाचे, विश्लेषणाचे, एक वेगळेच मर्म उलगडून दाखवणारे ठळक उदाहरण आहे असे उचितपणे म्हटले जाते. या ग्रंथाला १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. 

ऐसा विटेवर देव कुठे, तरीही येतो वास फुलांना, चंद्र चवथीचा, जाळ्यातील चंद्र, ज्ञानेश्वरी–स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य, अशी त्यांची इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. इतर अनेक संतांच्या साहित्याविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. याव्यतिरिक्त, रणजित देसाईंची ‘ स्वामी ‘ कादंबरी, आणि विजय तेंडुलकर यांचे ‘ सखाराम बाईंडर ‘ यावरही त्यांनी समीक्षणात्मक भाष्य केले आहे. 

“समीक्षा“ ही साहित्याची वेगळी वाट अतिशय सुशोभित आणि समृद्ध करून गेलेल्या श्री. म.वा.धोंड यांना मनःपूर्वक प्रणाम. ?  

☆☆☆☆☆

आजपासून आम्ही चित्रकाव्य हे चित्रकार सुश्री उषा ढगे यांचे सदर सुरू करत आहोत. दर 15 दिवसांनी चित्र आणि त्याचं वर्णन करणारी कविता आपल्या भेटीला येईल.

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ४ डिसेंबर –  संपादकीय  ?

अरुण हळबे यांचा जन्म २८ मे १९३४ ला झाला.  ते इतिहास संशोधक होते. लेखक होते आणि शिक्षकही होते. यवतमाळ येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमधून ते शिक्षक म्हणून निवृत्त झाले.’शतकातील यवतमाळ’ हा त्यांचा गाजलेला संशोधन ग्रंथ.यातील लेखन सादर स्वरूप ‘लोकमत’ मध्ये येत होते.  या शिवाय त्यांची पुस्तके म्हणजे १.डरकाळी (शिकार कथा), २.गानहिरा ( हिराबाई बडोदेकर यांच्यावरील चरित्र ग्रंथ),  ३. लोकनायक ( बापूजी आणे –चरित्र ग्रंथ )याशिवाय वर्तमानपत्रातून त्यांचे अनेक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत.

भारत सरकारने राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव केला होता.

अरुण हळबे  यांना त्यांच्या आज स्मृतिदिनी सादर वंदन   ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ३ डिसेम्बर –  संपादकीय  ?

बहिणाबाई चौधरी - विकिपीडिया

बहिणाबाई चौधरी

(११ ऑगस्ट, इ.स. १८८० – ३ डिसेंबर, इ.स. १९५१)

जगण्याचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात नेमकेपणाने सांगण्या-या  कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन.(1951).

स्वतः निरक्षर असूनही उच्च शिक्षितांनी ज्या कवितांचा अभ्यास करावा अशा  कवितांच्या रचना बहिणाबाईंनी केल्या आहेत.ऐन तरूण वयात वैधव्य प्राप्त झाल्यामुळे आयुष्याला सामोरं जाऊन झुंझताना येणारे अनुभव,दिसणारं जग,भवतालचा निसर्ग त्यांनी आपल्या अहिराणी या बोलीभाषेतून कवितेत उतरवला. अहिराणी, खानदेशी आणि मराठी भाषेतून त्यांनी काव्यरचना केली आहे. त्या निरक्षर असल्यामुळे लिखित स्वरूपात त्या सर्वच्या सर्व उपलब्ध नाहीत.पण त्यांचे चिरंजीव कवी सोपानदेव चौधरी यांच्या प्रयत्नातून ज्या कविता उपलब्ध झाल्या त्या लोकांसमोर येऊ  शकल्या आणि मराठी कवितेला एक अनमोल खजिना प्राप्त झाला. संसार, माहेर, शेतीची साधने, कापणी, मळणी, शेतीतील प्रसंग, सण, सोहळे हे त्यांच्या कवितांचे विषय. जे अनुभवलं ते लिहीलं   त्यामुळे कसदार साहित्य निर्माण झालं.

‘आला सास,गेला सास,जीवा तुझं रे तंतर,

अरे जगन-मरन एका सासाचं अंतर’

हे शब्द असोत किंवा

‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ हे शब्द ;

जगण्याची अनिश्चितता,स्त्री ची सुख दुःखे असे कितीतरी विषय त्यांनी सहजपणाने  हाताळले आहेत.

‘अरे संसार संसार ,जसा तवा चुलावर’ हे गीत तर आपल्या सर्वांच्या परिचयाचे  आहेच. पण अशा कितीतरी कविता त्यांच्या ‘बहिणाबाईंची गाणी’ या संग्रहीत काव्यसंग्रहात वाचायला मिळतात.हे त्यांचे काव्य ‘फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या रूपाने इंग्रजीत जाऊन पोचले आहे.श्री.के.ज.पुरोहित यांनीही काही कवितांचे भाषांतर केले आहे.हा त्यांच्या कवितांचा सन्मान आहे.एवढेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र विद्यापिठालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.एका अशिक्षीत कवयित्रीच्या नावाने विद्यापीठ निघावे असा सन्मान जगात बहुतेक पहिलाच असेल.

जगणं आणि अनुभवणं  शब्दांतून साकारणा-या कवयित्रीला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम! ?

☆☆☆☆☆

केशव मेश्राम :

ज्येष्ठ लेखक केशव मेश्राम यांचाही आज स्मृतीदिन आहे. परंतू दि 24/11/21च्या अभिव्यक्तीमध्ये आपण त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वविषयी जाणून घेतले आहे.म्हणून पुनरावृत्ती टाळत आहोत.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश, बहिणाबाईंची गाणी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज दादा धर्माधिकारी, वामन चोरघडे, आणि गं.बा.सरदार  या तिघांचा स्मृतिदिन।

दादा धर्माधिकारी यांचा जन्म मध्य प्रदेशातील बैतुल इथे १८८९ मधे झाला. ते गांधीवादी विचारवंत होते. भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागा. ते परिवर्तनवादी विचारसरणीचे होते. चळवळीत  गेल्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.त्यांना कॉलेजची पदवी नव्हती पण त्यांचे वाचन उदंड होते. हिन्दी, संस्कृत, मराठी, बंगाली , गुजराती, इंग्रजी ग्रंथांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिन्दी, मराठी आणि गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

दादांच्या बोधकथा – भाग १ ते ३, तरुणाई, दादांच्या शब्दात दादा भाग १ व २ (आत्मचरित्र) ,प्यिय मुली, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, स्त्री- पुरुष सहजीवन इ, त्यांची मराठीत पुस्तके आहेत. त्यांच्या कार्यावरही पुस्तके  लिहिली गेली आहेत.

दादा धर्माधिकारी जीवंदर्शन, विचारयोगी दादा धर्माधिकारी, स्नेहयोगी दादा धर्माधिकारी ही पुस्तके तारा धर्माधिकारी यांनी संपादित केली आहेत.

☆☆☆☆☆

वामन चोरघडे यांचा जन्म नागपूरयेथील नरखेड इथे १६ जुलै १९१४ मध्ये झालात्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अम्मा नावाची लघुकथा लिहिली. त्यांच्या कथा वागेश्वरी, सत्यकथा, मौज इ. दर्जेदार नियतकालिकातून प्रकाशित झाल्या.

वर्धा व नागपूर येथील जी.एम. कॉलेज येथे  त्यांनी अध्यापन केले. प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा व्यावसायिक प्रवास झाला. मराठी साहित्य आणि अर्थशास्त्र यात त्यांनी पदवी घेतली होती .स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांनाही दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

वामन चोरघडे यांचे प्रकाशित साहित्य –  

असे मित्र अशी मैत्री , देवाचे काम – बालसाहित्य, जडण-घडण –आत्मचरित्र (१९८१) चोरघडे यांची कथा – (१९६९), ख्याल, साद, सुषमा, हवन, पाथेय, प्रदीप, प्रस्थान, यौवन इ. त्यांचे कथासंग्रह आहेत. याशिवाय, वामन चोरघडे  यांच्या निवडक कथा भाग१ व २ , संपूर्ण  चोरघडे (१९६६) इ. त्यांचे कथासंग्रह आहे.

विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. १९७९ साली चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

☆☆☆☆☆

 गं.बा.सरदार यांचाही आज स्मृतिदिन. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती वाचा याच अंकात.

 

या तीनही साहित्य श्रेष्ठींच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ३० नोव्हेंबर –  संपादकीय  ?

श्री.बाळकृष्ण भगवंत बोरकर(बाकीबाब) :

हिरवळ आणिक पाणी पाहिल्यावर ज्यांना गाणे सुचते,ज्यांच्या काव्यातून निसर्ग बरसत असतो,फुलपाखरू उडू लागता ज्यांचं मनही उडू लागतं,लाटांच्या तालात जे खर्जातिल गायन ऐकतात,उदयास्तांची रंगलिपी जे सहजपणे वाचू शकतात,ज्यांनी कधी पुण्याची मोजणी केली नाही,ज्यांना कधी पापाची टोचणी लागली नाही आणि ‘असेच आहे धुंदपणाने,वयास चकवित फुलावयाचे’ हा ज्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे ; अशा बा.भ.बोरकर म्हणजेच बाकीबाब यांचा आज जन्मदिवस!

गोमंतकाच्या निसर्गरम्य भूमीतील बोरी या स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या छोट्याश्या खेडेगावात 30/11/1910 ला त्यांचा जन्म झाला.आज त्यांच्या जन्म दिनी त्यांच्या साहित्य उद्यानात हा एक फेरफटका!

बोरकरांच्या साहित्याविषयी बोलायचे,लिहायचे म्हणजे साक्षात निसर्गाविषयी लिहायचे.आवाक्यात न येणारा हा निसर्ग आणि तसंच त्यांचं साहित्य.आनंद असो,दुःख असो,प्रेम असो किंवा अन्य काही,निसर्गापासून दूर जाणे ज्यांना कधी जमलेच नाही असा हा गोमंतकाला भूषण असणारा साहित्यिक! त्यांनी कथा,कादंब-या लिहील्या असल्या तरी बा.भ.बोरकर म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर येते ती स्वतःच्या कविता गाऊन दाखवणारी ,डोक्यावरील केस उडत आहेत,हाताचे आणि चेह-यावरील भाव मुक्तपणे उधळत आहेत अशी त्यांची मूर्ती! वयाच्या 23 व्या वर्षी ‘प्रतिभा ‘हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह मडगाव येथील साहित्य संमेलनात प्रकाशित झाला.1934 साली बडोदा येथील वाङ्मय परिषदेत त्यांनी,’दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ ही त्यांची रचना गाऊन सादर केली आणि कवी म्हणून त्यांची  ख्याती झाली.सुरूवातीच्या काळात त्यांनी चौदा वर्षे  शिक्षक म्हणून नोकरी केली.पण नंतर 1955 ते 1970 या काळात त्यांनी आकाशवाणी पुणे आणि गोवा येथे वाङ्मय विभागाचे संचालक या पदावर काम केले व निवृत्त झाले.

ललित,कथा कादंबरी,चरित्रात्मक प्रबंध असे अनेक प्रकारचे लेखन त्यांनी केले.काही पुस्तकांचे अनुवादही केलेत.पण एक आनंदयात्री कवी म्हणून त्यांनी रसिकांच्या ह्रदयात स्थान मिळवले ते त्यांच्या आशयघन,तालबद्ध,वृत्तबद्ध,निसर्गसौंदर्याने ओथंबलेल्या कवितांमुळेच!समृद्ध शब्द भांडार,जीवनातील तृप्ततेचे दर्शन,आध्यात्मिक विचारांची बैठक आणि ओळीओळीतून ठिबकणारा निसर्ग हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

प्रतिभा,जीवन संगीत , दूधसागर,आनंदभैरवी,चित्रवीणा,गितार,चैत्रपूनव, चांदणवेल, कांचनसंध्या,अनुरागिणी,चिन्मयी हे त्यांचे काही काव्यसंग्रह.याशिवाय त्यांनी चार कादंब-या,दोन कथासंग्रह,दोन चरित्रात्मक प्रबंध,चार ललित लेख संग्रह,कुसुमाग्रज कवितांचा संपादित काव्य संग्रह आणि सहा पुस्तकांचा अनुवाद असे विपुल लेखन केले आहे.याशिवाय कोकणी भाषेतील त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सासाय या त्यांच्या कोकणी भाषेतील पुस्तकास एकोणीसशे एक्सायाऐशीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले आहे.

निसर्गाच्या सोबतीला आपली कविता ठेवून  बाकीबाब आठ जुलै एकोणीसशे चौ-याऐशीला  त्याच निसर्गात विलीन झाले. 

☆☆☆☆☆

श्री.विजय देवधर :

विजय देवधर हे पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्राॅपिकल मीटिऑराॅलाॅजी येथे वरिष्ठ  तांत्रिक अधिकारी या पदावर कार्यरत होते.त्यांनी लेखनाचे तंत्रही उत्तम आत्मसात केले होते.नवल,विचित्र विश्व अशा मासिकातून त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला.रहस्यकथा,साहसकथा,शौर्यकथा,गुप्तहेरकथा हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.अनेक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यानी केले आहेत.सुमारे पन्नास पुस्तके त्यांच्याकडून लिहीली गेली आहेत.

त्यातील काही पुस्तके अशी :

कथा साहसवीरांच्या,कावा,गियानाहून पलायन,गोष्टी साहसांच्या,प्राणीमात्रांच्या जगात,रोमहर्षक शिकारकथा,साहसांच्या जगात, हेरांच्या अजब जगात, प्राण्यांचा डाॅक्टर,(बालसाहित्य),मोटारसायकलिस्ट चिपांझी(बालसाहित्य)…इत्यादी

अनुवादित साहित्य : 

अस्वलांचा शेजार,डाॅ.नो, डेझर्टर,डेडली गेम,नो कम बॅक्स,बर्म्युडा ट्रॅगल,मृत्यूलेख,द सेव्हन्थ सिक्रेट इत्यादी.

पुणे येथे 30/11/2012 ला त्यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन. ?

☆☆☆☆☆

श्री.आनंद यादव :

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचा आज जन्मदिन.आपण त्यांच्या साहित्याविषयी दि.27/11 च्या अंकात म्हणजे त्यांच्या स्मृतीदिनी जाणून घेतले आहे.म्हणून येथे पुनरावृत्ती टाळत आहोत. 

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २९ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

गोपीनाथ तळवलकर  (२९ नोहेंबर १९०७ ते ७ जून २००० )

आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमातील मुलांचे लाडके नाना म्हणजे, गोपीनाथ तळवलकर  . ते पुणे केंद्रावर बालविभागाचे प्रमुख होते. बालोद्यान कार्यक्रम दर रविवारी सकाळी १० वाजता बाळ- गोपाळांच्या गच्च उपस्थितीत सादर होई. अतिशय बालप्रिय आणि लोकप्रिय असा हा कार्यक्रम होता.

मुलांसाठी वा.गो. आपटे यांनी ‘आनंद मासिक काढले होते. गोपीनाथ तळवलकर  त्याचे ३५ वर्षं संपादक होते.  

त्यांची काही पुस्तके –   आकाश मंदीर,  छाया प्रकाश, आशियाचे धर्मदीप, चंदाराणी, निंबोणीच्या झाडाखाली (बलवाङ्मय) सहस्त्रधारा ( आत्मचरित्र) त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच सौम्य, ऋजु आहे. त्यात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार याचा लावलेशही नाही.

माणूस पाक्षिक सुरू झाल्यावर त्यामध्ये प्रसिद्ध होणार्‍या कवितांसोबत त्यांचा आस्वाद दिला जाई. ते पान गोपीनाथ तळवलकर लिहीत. 

आज त्यांच्या  जन्मदिंनानिमित्त त्यांना मन:पूर्वक अभिवादन. ?

☆☆☆☆☆

माधव ज्युलियन – ( २१ जानेवारी १८९४ – २९ नोहेंबर १९३९)

माधव ज्युलियन हे मराठीतले प्रतिभा संपन्न कवी. त्यांचे नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. रविकिरण मंडळाची स्थापना त्यांनी केली. या मंडळाबद्दल अत्रे एकदा म्हणाले होते, या मंडळात रवी एकच आहे. बाकी सगळी किरणे आहेत. तो रवी म्हणजे माधव ज्युलियन.

माधव ज्युलियन यांनी शिक्षणानंतर फर्ग्युसन इथे १९१८ ते १९२४ फारसी भाषा शिकवत. मुंबई विद्यापीठात मराठी साहित्यात डी. लिट. पदवी मिळवलेले ते पहिले साहित्यिक. ‘छंदोरचना’ या ग्रंथासाठी त्यांना १ डिसेंबर १९३८ मधे माधव ज्युलियन डी. लिट. मिळाली.

माधवराव पटवर्धन यांनी ज्युलियन नाव का घेतले, याबद्दल अनेक दंतकथा आहेत.

त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. कवितांव्यतिरिक्त त्यांनी भाषाशास्त्रीय लिखाणही केले आहे. ‘भाषाशुद्धीविवेक’ या त्यांच्या ग्रंथात, कालबाह्य झालेल्या मराठी भाषेतल्या शेकडो शब्दांची सूची दिलेली आहेत. काव्यचिकित्सा  व काव्याविहार आशी आणखी दोन पुस्तके काव्याची चिकित्सा करणारी आहे. याशिवाय त्यांची आणखी पुस्तके –

  • उमरखय्यामच्या रुबाया – १९२९ – अनुवादीत २. तुटलेले दिवे ( यात एक सुनितांची मालाहे दीर्घ काव्य  आणि अनेक स्फुट कविता आहेत. ) ३. नकुलालंकार – १९२९ –. दीर्घकाव्य  ४. विरहतरंग – खंडकाव्य ५. मधुलहरी हे रुबायांच्या अनुवादाचे दुसरे पुस्तक त्यांच्या निधनानंतर रुबायांच्या अनुवादाचा तिसरा संग्रह निघाला.

त्यांचे २९ नोहेंबर १९३९ ला निधन झाले. त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्यावर ३ चरित्र ग्रंथ प्रकाशित झाले. १. स्वप्नभूमी माधव ज्युलियन- शंकर. के. कानिटकर ( कवी गिरीष), २. डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन ३. माधव ज्युलियन- गं. दे. खानोलकर 

त्यांच्या पत्नी लीलाताईंनीही आमची ११ वर्षे या पुस्तकात त्यांच्या सहजीवनाच्या आठवणी दिल्या आहेत.

त्यांच्या कवितांपैकी त्यांच्या गाजलेल्या कविता म्हणजे- प्रेमस्वरूप आई , मराठी असे आमुची मायबोली.

☆☆☆☆☆

रियासतकार सरदेसाई – (१७ मे १८६५ – २९नोहेंबर १९५९)

रियासतकार सरदेसाई यांचं नाव गोविंद सखाराम सरदेसाई . यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कमशेत इथे झाला. ते मराठी इतिहासकार व लेखक होते. त्यांनी मराठी साम्राज्याचा इतिहास, ‘मराठी रियासत’ या नावाने ८ खंडात लिहिला आहे. ‘मुसलमानी रियासत’ ३ खंडात मांडली आहे व ब्रिटीश रियासत २ खंडात. यातून महाराष्ट्राचा सुमारे १००० वर्षांचा इतिहास लिहिला आहे. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्याच्या योगदानासाठी त्यांना १९५५  मधे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे.

रियासतकर सरदेसाई आणि माधव ज्युलियन यांचा आज स्मृतिदिन. या निमित्त या दोघांनाही मानाचा मुजरा. ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. माहिती स्त्रोत – इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २८ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज २८ नोहेंबर :- 

आपल्या कादंबरी-लेखनातून इतिहासाचे जणू पुनर्दर्शन घडवणारे नामांकित लेखक श्री. विश्वास पाटील यांचा आज जन्मदिन. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असणारे श्री पाटील यांनी ऐतिहासिक विषयांबरोबरच इतर वेगवेगळ्या विषयांवरही दर्जेदार लेखन केलेले आहे. पानिपत, महानायक, संभाजी, या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, आणि रणांगण हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले आहे. याचबरोबर, चंद्रमुखी, झाडाझडती, पांगिरा, लस्ट फॉर लालबाग, अशा त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेखसंग्रह, आणि ‘  फ्रेडरिक नित्शे– जीवन आणि तत्वज्ञान ‘ हा अभ्यासपूर्ण चरित्रग्रंथ, या पुस्तकांनाही रसिक वाचकांची  पसंतीची पावती मिळालेली आहे. 

श्री. पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्या हिंदीत अनुवादित केल्या गेल्या आहेत, हेही विशेषकरून माहिती असायला हवे. 

त्यांच्या अतिशय गाजलेल्या ‘ पानिपत ‘ या कादंबरीला ‘ प्रियदर्शिनी पुरस्कार ’, गोव्याचा ‘ नाथमाधव पुरस्कार ‘, कलकत्त्याच्या ‘ भाषा परिषदेचा पुरस्कार ‘, यासह इतर पस्तीसपेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच “ झाडाझडती “ या कादंबरीला लोकप्रियतेबरोबरच, अतिशय मानाचा समजला जाणारा ‘ साहित्य अकादमी पुरस्कार ‘ देऊन गौरविले गेले आहे ( सन १९९२ )

श्री. विश्वास पाटील यांच्याकडून यापुढेही अशीच उत्तमोत्तम आणि रसिकमान्य साहित्य-निर्मिती होवोया आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना हार्दिक शुभेच्छा.?

☆☆☆☆☆

चित्रपट अभ्यासक आणि अनेक मराठी संगीत-दिग्दर्शकांचे चरित्र-लेखक अशी खास ओळख असणारे श्री. मधू पोतदार यांचाही आज जन्मदिन. ( २८/११/१९४४ — ८/१०/२०२०). 

लोकप्रिय संगीतकारांबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल आणि कारकीर्दीबद्दल साद्यन्त माहिती देणारी त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. —-

जनकवी पी. सावळाराम, मानसीचा चित्रकार तो ( वसंत प्रभू ), संगीतकार राम कदम, वसंतलावण्य ( वसंत पवार ), वसंतवीणा ( वसंत देसाई ).

याव्यतिरिक्त,  विनोदवृक्ष ( वसंत शिंदे), कुबेर ( मास्टर अविनाश ), देवकीनंदन गोपाळा ( गाडगे महाराज ), अशी त्यांनी लिहिलेली चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. 

त्यांची इतर काही प्रसिद्ध पुस्तके अशी —– ‘ मराठी चित्रपट संगीतकार कोश  ‘, ‘ इतिहासातील वेचक आणि वेधक ‘, धर्मपथ ‘, तसेच ‘ शिक्कामोर्तब ‘ हा कथासंग्रह. 

“ छिन्नी हातोड्याचा घाव “ या संगीतकार राम कदम यांच्या आत्मचरित्राचे उत्तम शब्दांकन श्री पोतदार यांनीच केलेले आहे. 

एक अतिशय अभ्यासू, हसतमुख आणि उत्साही व्यक्तिमत्व ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. मधू पोतदार यांना मनःपूर्वक आदरांजली. ?

☆☆☆☆☆

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन. ( ११/४/१८२७ — २८/११/१८९० ). 

महान विचारवंत, समाजसुधारक, शेतकरी, अस्पृश्य तसेच बहुजन समाजाच्या समस्यांना प्राधान्य देत पुरोगामी विचारांचा फक्त पुरस्कारच नाही, तर प्रत्यक्ष आचरणातून त्या विचारांचा सातत्याने पाठपुरावा करणारे खऱ्या अर्थाने समाजसेवक ठरलेले ज्योतिबा. — त्यांच्या या अद्वितीय कामाला त्यांच्या लेखनकार्याचीही भक्कम जोड होती. 

त्यांनी लिहिलेला ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला महत्वाचा ग्रंथ, सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. फुले यांच्यातला उपजत थोर तत्वज्ञ या ग्रंथात ठळकपणे दिसून येतो. ‘ सत्यमेव जयते ‘ हे या ग्रंथाचे मूळ सूत्र होते, असे म्हणता येईल. नव्या सर्वसमावेशक धर्माचे तत्वज्ञान यात विशद केलेले आहे. हा ग्रंथ म्हणजे सत्यशोधकांचा आचारधर्म, जो माणसाला सुखाकडे नेणारा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य-समता-बंधुभाव या मूल्यांना मध्यवर्ती स्थान देणारा आहे, आणि म्हणूनच, त्यातले हे पायाभूत मौलिक विचार म्हणजे ज्योतिबांचे संपूर्ण व्यक्तिमत्व हुबेहूब साकारणारे चित्र आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 संत तुकारामांच्या अभंगांचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी त्या धर्तीवर अनेक रचना केल्या होत्या. जागतिक स्तरावरच्या सामाजिक विषमतेचे भान असल्याने, ‘ गुलामगिरी ‘ हा त्यांचा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला होता. त्याकाळच्या उपेक्षित बहुजन समाजाच्या उपेक्षित प्रश्नांकडे सरकारचे, आणि त्याहीपेक्षा एकूणच समाजाचे लक्ष वेधणे या हेतूने त्यांनी वृत्तपत्रातून लिखाणही केले होते. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, यासारख्या ग्रंथांमधून तेव्हाची चिंताजनक सामाजिक स्थिती आणि त्यातून बाहेर पाडण्याचे मार्ग यावर भाष्य करत, या क्रांतिकारी आणि सुधारणावादी लेखकाने तेव्हाचा उपेक्षित पण निद्रिस्त समाज, आणि त्या समाजाची शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद, या दोहोंना जागृत करण्याचा जणू विडाच उचलला होता. या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी नाटक, पोवाडे, निबंध, पत्रे, जाहीर प्रकटने, काव्यरचना, निवेदने, अशा विविध प्रकारच्या साहित्याचा जनजागृतीसाठीचे माध्यम म्हणून उपयोग करून घेतला होता. यापैकी ‘ नाटक ‘ हे माध्यम, परिवर्तनवादी चळवळ जास्त सशक्त आणि परिणामकारक व्हावी या हेतूने, त्यांनी एखाद्या शस्त्रासारखे वापरले होते. ‘ तृतीय नेत्र ‘ हे त्यांनी १८५५ साली लिहिलेले नाटक हे पहिले लिखित मराठी नाटक होते, आणि ज्योतिबा फुले हे पहिले मराठी नाटककार होते असे म्हटले जाते. पण या नाटकाचे प्रत्यक्ष किती प्रयोग झाले, त्याला कसा प्रतिसाद मिळाला, याची ठोस माहिती मात्र उपलब्ध नाही. १८५५ मध्ये लिहिलेल्या या नाटकाच्या हस्तलिखित प्रती  १९७९ साली प्रा. सीताराम रायकर यांना मिळाल्या ही एक नाट्यपूर्ण घटनाच म्हटली पाहिजे. 

फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत १८८८ मध्ये त्यांना ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली गेली. 

महात्मा फुले यांच्यावरही असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. तसेच त्यांचे एकूण व्यक्तिमत्व, अफाट समाजकार्य यावर बरीच नाटके आणि चित्रपटांचीही निमिर्ती केली गेली आहे. 

महात्मा फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अनेक संस्था उभारलेल्या आहेत. त्यांच्या नावाने बरीच साहित्य संमेलने नियमित भरवली जातात. त्यांच्यावर काढलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित दूरदर्शन मालिकाही निर्मिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे स्थापन केले गेले आहेत.

भारतीय समाजक्रांतीचे जनक ‘ अशीच ज्यांची ख्याती मानली जाते, त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली. ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares