मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ कृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………

पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ‘आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित आहे हे नंतर जाणवतंच’ कधीकाळी बाबांच्या तोंडून कानावर पडलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता.’त्या’ला मी इतकी वर्ष मानत आलो होतो.या सर्व घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!)

असोशीने धरून ठेवायला धडपडत होतो ते हातातून निसटून गेलं होतं आणि जे मिळणं शक्यच नाही असं गृहित धरलं होतं ते मात्र अगदी अनपेक्षितपणे मला मिळालं होतं! स्टेट बँक आणि युनियन बँक यांच्या बाबतीतले परस्परविरोधी  असे हे दोन प्रसंग ‘सगळं सुरळीत होईल,काळजी नको.’ हे बाबांचे शब्द सार्थ ठरवणारेच होते!

समोर गडद अंधार पसरलेला असताना निरंजन साठे माझ्या आयुष्यात आले होते. आणि मला डॉ. कर्डकांकडे  सुपूर्द करून गेले होते.होय.कारण मला नेमणूकपत्र मिळालं ते होतं डाॅ.कर्डक यांच्याच अधिपत्याखालील रेक्रूटमेंटसेलला जाॅईन होण्यासाठीचं!डाॅ.कर्डक आणि निरंजन साठे यांचं हे अल्पकाळासाठी असं माझ्या आयुष्यात येणं माझ्या मनावर  अमिट ठसा उमटवणारे ऋणानुबंध जसे तसेच माझ्यावरील ‘त्या’च्या कृपालोभाची प्रसादचिन्हेसुद्धा!

युनियन बँकेत मी १३ मार्च १९७२ रोजी जॉईन झालो आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बँकिंगक्षेत्रातल्या माझ्यासारख्या नवोदितांना सुरुवातीचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरिएड म्हणजे खूप मोठे दडपण वाटत असे.तो प्रोबेशन पिरिएड समाधानकारक पूर्ण झाला तरच नोकरीत कायम केल़ जायचं. हे सहा महिने रजाही मिळणार नव्हती. म्हणून मग जॉईन होण्यापूर्वीच मी घरी जाऊन सर्वांना भेटून यायचं ठरवलं. त्या भेटीत समाधान मात्र मिळालं नाहीच. हळूहळू परावलंबी होत चाललेले माझे बाबा अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या नेमक्या गरजेच्यावेळी मला त्यांच्याजवळ रहाता येत नाहीये या विचाराने मी अस्वस्थ होत असे.त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्याच त्यांनी स्वतःचा थरथरता हात क्षणभर कसाबसा  वर उचलून मला आशीर्वाद दिला. तेच हळवे क्षण सोबत घेऊन मी बाहेर पडलो आणि आयुष्यातल्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं!

लवकरच माझ्या निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारं एक प्रलोभन  माझी वाट पहात दबा धरून बसलेलं होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. माझा प्रोबेशन पिरिएड संपला आणि मी नोकरीत कन्फर्म झालो,त्याच दिवशी मला एक पत्र आलं आणि ते युनियन बँकेतल्या सुरळीत सुरू झालेल्या माझ्या रुटीनला परस्पर छेद देणारं ठरलं!

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मी भावाच्या सल्ल्याप्रमाणे स्टेट बँकेच्या नवीन भरतीच्या जाहिरातीनुसार पुन्हा अर्ज केला होता आणि तिथे नव्याने पुन्हा रिटन टेस्ट न् इंटरव्ह्यूही देऊन आलो होतो. अर्थात तेव्हा माझ्या दृष्टीने तो फक्त एक उपचार होता. म्हणूनच असेल मी ते विसरूनही गेलो होतो. पण नेमकी त्याचीच आठवण करून देणारं हे पत्र होतं. स्टेट बँकेकडून नवीन अपॉइंटमेंट ऑफर करणारं ते पत्र पाहून मला क्षणभर आश्चर्यच वाटलं.दुसऱ्याच क्षणी आता यापुढे कसलीच अस्थिरता नको असंच वाटत राहिलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं योग्य ठरेल? पुन्हा नवीन नोकरी, पुन्हा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड..सगळं सुरळीत होईल? आणि नाही झालं तर? पुन्हा ती विषाची परीक्षा नकोच‌.

मी ते पत्र ड्राॅवरमधे ठेवून दिलं आणि तो विषय माझ्यापुरता मिटवून टाकला. घरी सविस्तर तसं कळवून टाकलं. माझं पत्र मिळताच भावाचा लगेच फोन आला. त्याने मला वेड्यातच काढलं.म्हणाला,

“हे बघ,असा अविचार करू नकोस. आजच तुझ्या पत्राला मी सविस्तर इन्लॅंडलेटर लिहिलंय.आईलाही कांही लिहायचंय म्हणाली म्हणून ते घरी तिच्याकडे ठेवून आलोय. तिचं लिहून झालं कि ती ते पोस्टात टाकेल. सर्वबाजूने विचार केला तरीही स्टेट बँक जॉईन करणंच तुझ्या हिताचं आहे हे लक्षात ठेव. ते कसं हे सगळं सविस्तर पत्रात लिहिलंय. ते वाच आणि तसंच कर.”

मी मनाविरुद्ध ‘हो’ म्हटलं आणि फोन ठेवला. लगेच त्याचं पत्रही आलं. पत्रातला प्रत्येक मुद्दा योग्य आणि बिनतोड होता.

एकतर त्या काळी या परिसरात युनियन बँकेच्या फक्त दोन ब्रॅंचेस होत्या. कोल्हापूर आणि जयसिंगपूर.याउलट स्टेट बँकेचं ब्रॅंचनेटवर्क मात्र तालुका  पातळीपर्यंत विस्तारलेलं होतं. त्यामुळे युनियन बँकेत बदली मिळणं शक्य नव्हतंच पण स्टेट बँकेत मात्र अल्पकाळात सोईच्या जागी सहजपणे बदली मिळू शकणार होती.पे स्केल्स आणि इतर सवलतीही  युनियन बँकेच्या तुलनेत स्टेट बँकेच्याच आकर्षक होत्या. युनियन बँकेची प्रमोशन पॉलिसी ‘स्ट्रीक्टली ऑन सिनॅरीटी बेसिस अशीच होती, त्यामुळे प्रमोशनच्या संधी जवळजवळ नव्हत्याच.स्टेट बँकेत मात्र हीच पॉलिसी मेरीटला प्राधान्य देणारी होती.

हे सगळं वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले. आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो. मी लवकरात लवकर जवळचं पोस्टींग मिळून तिकडं यावं म्हणून ती अधीर झाली होती. तिने लिहिलेला शब्द न् शब्द माझ्या मनात रुतत चालला होता.

‘हे झोपूनच असतात.बोलणं जवळजवळ हवं-नको एवढंच. त्यांना त्रास नको म्हणून या विषयी मुद्दाम काही सांगितलेलं नाहीये.तू जवळ आलास, अधून मधून कां होईना भेटत राहिलास तर त्यांनाही उभारी वाटेल.’

हे वाचून बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. भावनेच्या आहारी जाऊन कां होईना पण मी मन घट्ट केलं. आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायची हा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच.

‘बाबा हिंडतेफिरते असते तर त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता.’ हा विचार मनात घोळत असतानाच मी हातातल्या इन्लॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि क्षणभर थबकलोच. आत दुमडायचा जो आडवा फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात कांही मजकूर लिहिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? छे! कसं शक्य आहे?बाबांचं अक्षर आणि असं? विश्वासच बसेना. पण ते बाबांनीच लिहिलेलं होतं! थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. आणि म्हणूनच ते वेडंवाकडं आणि केविलवाणं दिसत होतं. मात्र प्रयत्नपूर्वक एकेक अक्षर जुळवायचा आटापिटा करून मी ते वाचल्यानंतर जे कांही हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

सर्वप्रथम मी निवेदन करतो की हरिपाठावर या आधी अनेक संत आणि अधिकारी सत्पुरुषांनी चिंतन लिहिले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या पाठावर ‘काही’ लिहिणे हे खरंतर माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाचे काम नाही, तरीही मी माझ्या सद्गुरूंच्या आधाराने यथामती लिहिण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहे.  

भगवंत प्राप्तीचा सर्वांगसुंदर मार्ग सर्व संतांनी स्वानुभूतीने सामान्य मनुष्यासाठी खुला करून दिला आहे. मनुष्य स्वाभाविकच स्वतःवर प्रेम करतो, त्यानंतर तो त्याच्या आवडीच्या माणसांवर, त्याच्या वस्तूंवर, घरादारावर, गाडी घोड्यावर, संपत्तीवर प्रेम करीत असतो. संत सांगतात त्याप्रमाणे हे प्रेम अंशतः का होईना स्वार्थी असतेच असते. या नश्वर जगात मनुष्य निःस्वार्थी प्रेम करू शकत नाही. जो मनुष्य निःस्वार्थी प्रेम करतो, तो सर्वांना आवडतो, त्यामुळे ती देवालाही प्रिय होतो. एका गीतात श्री. वसंत प्रभू म्हणतात

“जो आवडतो सर्वांना | तोचि आवडे देवाला|`” 

परमार्थ साधणे म्हणजे अधिकाधिक निःस्वार्थ होणे. परमार्थ मार्गात गुरू शिष्याला नाम देतात आणि मग शिष्य त्या नामाचा अभ्यास करून परमार्थ साधण्याचा यत्न करीत असतो. माऊलींचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना हरिनाम दिले. त्या नामाचा अभ्यास करून ज्ञानदेवांनी ज्ञांनदेव ते ज्ञानेश्वर  इतकाच पल्ला गाठला नाही तर विश्वाची माऊली होऊन अवघाचि संसार सुखाचा करीन अशी ग्वाही दिली. माऊली म्हणतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥”

{अर्थ:- संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सुखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.

सामान्य मनुष्याला स्वतःचा प्रपंच नेटका करता येतोच असे नाही, कारण त्याच्या प्रपंचात स्वार्थ जास्त असतो. संत होणे म्हणजे अत्यंत निःस्वार्थ होणे. म्हणून सर्व संत विश्वाचा प्रपंच करतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरांसारखे संत विश्वमाऊली होत असतात.

माउलींचा हरिपाठ हा सर्वमान्य आणि लोकप्रिय हरिपाठ आहे. आजही अनेक ठिकाणी त्याचे नित्य पठण केले जाते. सातशे वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ गावोगावी कसा पोहचला असेल आणि मागील सुमारे सातशे वर्षे तो नित्य म्हटला जात असेल तर जागतिक आश्चर्य नव्हे काय ? 

भगवन्नामाचे महात्म्य, महत्व आणि महती आपल्याकडील सर्व संतांनी मुक्त कंठानी गायिली आहे. ‘बिनमोल परंतु अमोल’ अशा नामांत मुक्ती, भुक्ती व भक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे आई सर्वसंतांनी उच्चरवाने प्रतिपादित केले आहे. नामाने भवरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे, तर सर्व शाररिक व मानसिक रोग नाहीसे करण्याची अगाध शक्ती भगवंताच्या नामांत आहे. प्रपंच व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात. अत्यंत नाजूक व साजूक असे भगवंतांचे प्रेमसुख मिळण्याचे भाग्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकालाच प्राप्त होते. संसार ‘असार’ नसून तो परमेश्वराच्या ऐश्वर्याचा अविष्कार आहे अशी दृष्टी नामानेच प्राप्त होते. कर्म, वर्ण व धर्म यांचे बंड मोडून भगवतप्राप्तीचा मार्ग संतांनी केवळ नामाच्या बळावर सर्वाना खुला केला आहे. हरिपाठ म्हणजे विठूमाऊलीच्या गळ्यातील सत्ताविस नक्षत्रांचा हार आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण शिकवणुकीचे सारं म्हणजे हा हरिपाठ आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. एक कल्पना मांडतो. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या सुमारे नऊ हजार ओव्या आणि हरिपाठाचे सत्तावीस अभंग. नऊ हजार ओव्यांचा अभ्यास सामान्य मनुष्याला तसा कठीणच जाणार यात वाद नसावा. पण तरीही ज्याला थोड्या वेळात आणि कमी श्रमात परमार्थ प्राप्ती करायची आहे त्याने या सत्तावीस अभगांचा अभ्यास केला तरी त्याचे काम होईल असे माऊली सांगतात. या हरिपाठ चिंतनाच्या निमित्ताने आपली सर्वांची नामावर असलेली निष्ठा आणिक वृद्धिंगत होवो ही सद्गुरू आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना  करतो, सर्व सुजाण वाचकांना नमन करतो.

जय जय राम कृष्ण हरी।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकास तूर न लागू देणे… लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकास तूर न लागू देणे लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

‘ताकास तूर न लागू देणे.’ ही म्हण आपणास परिचित आहेच. 

या म्हणीचा प्रचलित अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला अजिबात पत्ता लागू न देणे. 

पण इथे ताक हा  दही घुसळून केलेला पेयपदार्थ आणि तूर म्हणजे एक द्विदल कडधान्य अभिप्रेत नाही. तसा असता तर या म्हणीचा आणि त्याच्या अर्थाचा अर्थाअर्थी संबंध लागला नसता. तर याविषयी वेगळी माहिती आहे ती अशी…

इथे ‘ताक’ शब्द नसून ‘ताका’ शब्द आहे.   

ताका म्हणजे कापडाचा तागा. जुन्या शब्दकोशात हा अर्थ दिला आहे. 

आणि तूर हे द्विदल धान्य असा अर्थ इथे नाही. हातमागावर कापड विणण्यासाठी धागे गुंडाळून घ्यायचे जे विणकराच्या डोक्यावरचे आडवे लाकूड/तुळई असते तिला ‘तूर’ असे म्हणतात. हा ही शब्दकोशातील अर्थ आहे. 

म्हणजे या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की, ताग्याचा आणि तुरीचा संबंधच येऊ न देणे.  थोडक्यात एखादी गोष्ट पार पडण्यासाठी जो कळीचा घटक आहे, तोच होऊ न देणे किंवा होणार नाही ह्याची काळजी घेणे.

तर अशी आहे ‘ताकाच्या तुरी’ची गंमत ! 

लेखिका : सुश्री मुग्धा पानवलकर

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,”आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”

फोनवर ती बरेच काही बोलत होती.बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”

मला हसूच आलं.

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो.

हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

खरंतर…आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.

कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते.

तसंच…

आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…

जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण,आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.

जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.

आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो…

मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे.

काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. 

अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे…

पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.

मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.

ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.

आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.

या पलीकडे काय असू शकते?

लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.

मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे…

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ म्हण बदलायची वेळ आली ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🌧️ म्हण बदलायची वेळ आली ? 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे !  या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण, म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !

हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी.  त्यामुळे होत काय, खराखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !

मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का !  सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी परत एकदा कांद्या भज्या बरोबर आल्याच्या चहाचा घोट घेतला आणि भरून पावलो !

© प्रमोद वामन वर्तक

०७-०७-२०२४

ताजा कलम-  कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत, कारण हा निसर्गकोप नक्कीच नाही !

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंढरीची वारी — ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

??

☆ पंढरीची वारी…  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पंढरीच्या वारीला सातशे / आठशे वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोनाचा काळ सोडला तर यात खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. काय असेल पांडुरंगाकडे? का जातात इतकी लाखो माणसं पंढरीच्या वारीला? इतकी धाव, इतकी ओढ का दिसते माऊलीच्या भेटीसाठी? पंढरीचा पाडुरंग भेटल्यावर खरंच समाधानी होतात का हे भक्त? ही भक्ती खरंच, खरी असते का? 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, 

चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू || 

विठ्ठलाचे नाव घेवू होऊनि निसं:ग 

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || 

इतकं निस्संग, निर्मळ, स्वतःला हरवून विठ्ठलात लीन होऊन जगता येते?  बुद्धाच्या मते जीवन हे दुःखमय आहे. न शमणारी तृष्णा हे दु:खाचे मूळ कारण आहे. दुःख निवारणासाठी त्यांनी अष्टांग मार्ग आणि पंचशील सांगितले. दुःख आणि वेदनेचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतोच. सामान्य माणसाने वारी हे दु:ख निवारणार्थ साधलेला एक मार्ग तर नसेल..! वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत वाटते का? असे अनेक प्रश्न मला विद्यार्थी जीवनात पडायचे..

आई म्हणायची, 

सखू निघाली पंढरपूरा 

येशी पासूनी आली घरा ! 

घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखंदुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत, एकमेकांना नमस्कार करत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तन-मन-भान विसरुन पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. देहभान विसरुन मनाच्या आनंदाचा वारकऱ्यांनी साधलेला हा परमोच्च क्षण असावा.

“पुंडलिक वर दे हरी विठ्ठल,

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय !” 

असा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मीणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्या सारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा समतेचा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.

माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दूसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडीलांना संकष्टी सुद्धा करु द्यायची नाही. फक्त एकादशी करायची असा तिचा आग्रह. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होते. पण आम्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरा केले जायचे. माझ्या आईने स्वाक्षरी  करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. ती कधी शाळेत गेली नव्हती. पण माझी आई म्हणजे लहानपणीची शाळा आणि मोठेपणीचे जीवन विद्यापीठ होते. सगळे अभंग तिला तोंडपाठ असायचे. तीचे बालपण कर्नाटकातले. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडीओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थीत करेल. हा तिचा विश्वास होता. वडील तलाठी नंतर सर्कल म्हणून प्रमोशन मिळाल्यावर नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची. संतांचे अभंग हाच तिच्या ज्ञानाचा झरा होता. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे त्यावेळी मंदिरात आणि घरी वाचन व्हायचे, ते ऐकायला ती जात असे. वडीलही तिच्या सोबत भजनात रमून जायचे. त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यात भक्तीचा सुगंध दरवळत राही. भजनी मंडळात अनेक जाती धर्माचे लोक होते. ते खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत होते. पांडुरंगाच्या भक्तीने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले होते एका पातळीवर आणले होते. हा खूप मोठा आनंदाचा भाग होता. वारीने सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना सामावून घेतले आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्हाला मानवता हा एकच धर्म माहीत होता.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ 

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे 

अशाच भावनेची कालची वारी होती. आजचीही वारी भक्ती या एकच भावनेने एकत्र चालते असे माझे मत आहे. अशा भक्तिमय वातावरणातले माझे बालपण. 

आईचे सगळे लक्ष अभंगाकडेच असायचे. ती बऱ्याचदा मला विणा घेऊन भजनाला बसवायची.

तुकोबा म्हणतात तसे

“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे” 

अगदी अशीच होऊन जगायची माझी आई…

तुकोबांच्या अभंगानी तिला नवे विचार मिळाले. तीने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला आठवत नाही. एवढेच काय ती चालत वारीला कधीच गेली नाही. मुलाबाळांना मागे ठेवून जाणे तिला मान्य नव्हते. मुलाबाळांना गर्दीत घेऊन जायला नको म्हणून आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपूरला घेऊन जायची. वडील सोबत असायचे. आम्ही दोन दिवस तिथे मुक्काम करुन मनसोक्त दर्शन घेऊन परतायचो. 

जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला पांडुरंग आपल्याला बळ देईल किंबहुना तोच संकटाना सामोरे जाण्याचं बळ देतो असे तिला वाटायचे.

सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी 

देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी 

हे तीचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र यापैकी काहीच तिला माहित नव्हते. पण तिला जगणं, माणसांना समजून घेणं, आणि मनाचा समतोल साधणं माहित होते. म्हणूनच विवेकाच्या पातळीवर जाऊन अयोग्य वागणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बेदखल करणं तिला शक्य झाले असेल. सगळी सुखंदुःखं तुळसीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती..! हे मी पाहिले आहे. आज तीच्या या श्रद्धारुपी निष्ठेचे मला राहून राहून आश्चर्य आणि कौतुक वाटते. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिला संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली काम सुद्धा ती न डगमगता, न कंटाळता आनंदाने करायची. तीच्या तोंडी सतत अभंग. ती काम करत अभंग गुणगुणायची.

“कांदा, मुळा,भाजी अवघे विठाई माझी.”

असे म्हणत तिची कामं चालू असायची. मला आठवतंय जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा एक गाणं ती नेहमी म्हणायची… 

 कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो 

 हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो. 

बहिणाबाईची कविता तिला माहित होती.

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर 

आईला कविता पाठ होती. रेडीओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची ! आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विठोबा किंवा पांडुरंग म्हणजे आपण आपल्या जगण्या वागण्यात मनाशी केलेला एक उत्तम, निस्पृह, निर्मळ, विवेकी संवाद व निश्चय आहे. असे मला माझ्या आईच्या भक्तीतून जाणवले.

विज्ञानाने शरीरा बरोबर मनाच्या अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि योग्य उपचार पद्धती विकसित करण्यात यश मिळविले आहे. विज्ञानाकडून उत्तर मिळाले असले तरी विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. येथे कर्मकांडाला अजिबात थारा नाही. हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातली तर आपल्याही मदतीला विठोबा/ पांडुरंग नक्की येईल. म्हणूनच

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण 

एकवीसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नव्हते. असे होणे शक्य नाही असे मला वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसामागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात स्त्रीयांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची ओपीडी , hospitals तुडूंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ/ मानसविकार तज्ञ संख्येने तसे खूपच कमी आहेत. 

माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी, समतेचा आग्रह धरणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. माणसाना बोलत करणं, प्रसंगी त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या मनातील वादळांना वाट करून देण्याची नितांत गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच असतो. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थीत होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने मन मोकळं करण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट त्यांच्या माघारी दूसऱ्या कुणाला सांगू नये. एवढे मोठे मन प्रत्येकाकडे असायला हवे. मनोविकारांना मात्र औषधोपचारीची गरज असते. हे विसरून चालणार नाही. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. माणसा माणसातील प्रेमभाव मैत्र भाव टिकून राहणे त्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे.

माणसांच्या मनात भक्तीचा मळा फुलावा. जो जे वांच्छील तो ते लाभूदे ! आणि मानवी जगणे सुखाचे होऊदे. हीच मागणी माणसातल्या पांडुरंगाकडे.

माणूस जेव्हा एक पायरी वर चढतो तेव्हा तो देव होतो. माणूस जेव्हा एक पायरी खाली उतरतो तेव्हा तो राक्षस होतो.

आई , तू नाहीस हे माहित आहे तरीही..

।। भेटी लागी जीवा। लागली से आस ।। 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे पाय जमिनीवरच आहेत… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी 

? इंद्रधनुष्य ? 

माझे पाय जमिनीवरच आहेत… 🖋️ ☆ डॉ. माधुरी जोशी 

— ओपरा विनफ्रे 

माझे पाय जमिनीवरच आहेत…

 मी आता फक्त छान बूट घालते” 

मला मुलाखती फार आवडतात.प्रत्यक्ष समोर,यू ट्युबवर,दिवाळी अंकातल्या, साहित्य संमेलनाच्या,प्रासंगिक….स ग ळ्या…..मग कलाकार, साहित्यिक,लेखक,शास्त्रज्ञ, नाटककार, संगीतकार, शैक्षणिक क्षेत्रातले…अगदी वडापाव विकणाऱ्यापासून बिल्डर पर्यंत कुणीही व्यावसायिक..कुणीही असो….कारण प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक , सांस्कृतिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय प्रश्न वेगळे…उत्तरं वेगळी….मार्गही वेगळे..‌.

मला आठवतं पूर्वी नॅशनल टी व्ही वर कमलेश्वर मुलाखती घ्यायचे…मजूर बायका,मोलकरणी,रस्ते झाडणाऱ्या ,बोहारणी,भाजीवाल्या..‌..अशा कुणाच्यातरी…अत्यंत सह्रदयतेनी सहज बोलून एक आगळंच विश्व उलगडायचे …त्यांना बोलकं करंत अगदी अनोळखी जग दाखवायचे….हे सारं आपल्या देशातलं…

पण वेगळीच संस्कृती,मग वेगळाच लढा,वेगळेच प्रश्न … सगळ्यांना तोंड देत निराशेच्या गर्तेतून अत्युच्च शिखरी जाणारी परदेशी माणसं पाहिली मुलाखतीत….मग आपली अडचण अगदीच क्षुल्लक वाटायला लागली..निराशेवर मात करायचं बळ मिळालं… आपल्याकडच्या सारखेच ते लढतांना पाहिले…दोन्हींनी मन थक्क झालं.‌.त्यांचा लढा, चिकाटी,यश पाहून.

तर एका मुलाखतीत भेटली आफ्रिकन अमेरिकन महिला…ओपरा विनफ्रे नाव तिचं…‌‌पहा हं ..‌जगातला सर्वोत्तम टॉक शो तिच्या नावावर..दोन दशकं Top rating मुलाखतींचा कार्यक्रम घेणारी….२०११ मधे “विशेष ऑस्कर पुरस्कार”मिळवणारी..‌‌.जगातल्या १०० विशेष व्यक्तींपैकी एक..‌.. २०१३ मधे ओबामांकडून “सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान” मिळवणारी….आणि हे ठळक … अजून बरंच बरंच काही….कुणी म्हणेल एका व्यक्तीच्या आयुष्यात एवढं?तर कुणी म्हणेल असे किती तरी आहेत….होय खरं आहे….पण या गौरवाच्या यशाच्या मालिकेबरोबरंच कमाल आहे संघर्ष लढ्याची आणि सकारात्मकतेची…..

कोण होती ही ओरपा? होय होय ओरपाच होतं तिचं नाव …पण लोक ओपरा असंच बोलवत…मग तिनं तेच नाव स्विकारलं….तिची आई लोकांकडे मोलकरणीचं काम करी..काबाडकष्ट….१५व्या वर्षीच तिला ही मुलगी झाली.Single Mother …म्हणजे अजून झगडा….ती सदैव कामात.या मुलीकडे लक्ष द्यायला तिला वेळंच नव्हता.दारीद्र्य पाठी लागलेलं..‌इतकं काम करूनही जेमतेम दोन घास पोटात…मग चिमुकली पोर दिसेल मिळेल ते ऊष्टमाष्टं खाई,…कचऱ्यातंच खेळ मांडी..‌‌वळण वगैरे कोण लावणार?…,नव्हतंच कुणी…कसंबसं ६व्या वर्षांपर्यंत आईनं सांभाळलं आणि हे गाठोडे आपल्या आईकडे पाठवून दिलं….तिथेही फारसा फरक नव्हता….पण वेळेवर दोन घास पोटात जात.आजी मायेनं काळजी घेई.न्हाउमाखू घाली.स्वच्छ ठेवी…रविवारी चर्चमध्ये नेई.बायबल कानावर पडे…गोष्टी सांगे.थोडंफार शाळेत जाणं होई.मग अक्षर ओळख झाली.पण पैसा दुर्मिळच….सभोवती बऱ्या घरातली मुलं असंत.आपला कमीपणा झाकण्यासाठी ती घरातच पैसे चोरायला लागली‌.आजीनं हे मान्य करणं शक्यच नव्हतं…..परत रवानगी आईकडे झाली.ती मोठी होत होती.मग गल्लीतल्या पासून नातेवाईक,भाऊ,मित्र साऱ्यांनी अत्याचार केले.त्यातून एक मूल झालं.पण अशक्त असल्यानं ते जगलं नाही.ते सुटलं आणि ती पण…..ती शाळेत जात होती खरी पण सोबतची श्रीमंत मुलं पाहून तिला न्यूनगंड वाटे…पुन्हा चोऱ्या…खोटे आभास….तेच दुष्टचक्र…..दुःख,दारीद्र्य,दैन्य,,वेदना ,यातना, अत्याचार हाच शब्दकोश जगण्याचा…त्या चोऱ्यांनी आई वैतागली आणि तिला सावत्र बापाकडे टेनेसीत दिलं पाठवून..

पण हा Turning point ठरला…जीवनाचा स्वरंच बदलला.तो फार चांगला “माणूस ” होता.तिथे शिस्त होती.नियम होते… सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगणं सुरक्षित होतं.‌.‌मोजकं पण समाधानी होतं.परिस्थितीनं गांजलेली ही मुलगी हुषार आहे.बुद्धीमान आहे.तिला संधी हवी.ज्ञान हवं.दिशा हवी.तिच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकायला हवी हे सारं सारं त्यानं जाणवलं.ती खरंच हुषार बुद्धीमान होती.. वाह्यात,मवाली,चोरटी,टारगट ही तिची ओळख संपली,मिटली आणि ती एक” ब्रिलियंट स्टुडंट ” झाली.ओल्या मातीचा गुणांनी भरलेला घट झाला.तिच्या बोलण्यात वेगळंच कौशल्य जाणवे.. नाटकात ती फार छान अभिनय करी…. अशाच एका नाटकाच्या रिहर्सलला एका व्यक्तीला तिचे गुण जाणवले आणि आपल्या रेडिओ चॅनल वर त्यानं तिला न्यूज रीडरची पोस्ट दिली…हा उज्वल भविष्याचा देखणा दरवाजाच होता.पहिलं दार होतं ते राजरस्त्याकडे उघडणारे…‌‌

ती ऑफर तिनं स्विकारावी…पण अभ्यास सोडला नाही…नोकरी करत करत स्कॉलरशिपचा अभ्यास केला …ती मिळवली पण….. कॉलेज अक्षरशः गाजवलं….ती दोन ब्युटी कॉंटेस्ट जिंकली….Miss Tenesi आणि Miss Black National Beauty……आता तिला बाल्टीमोर टी व्ही वर न्यूज रीडरची नोकरी मिळाली…मग ती मेरीलॅंडला गेली.असं काम करणारी ती “पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ” ठरली.हे खूपच ग्रेट होतं.मोठा गौरव होता तिचा…..

ती फारच सेन्सिटिव्ह होती. बातमी कोरडेपणानी बा त मी न करता त्यातला इमोशनल आस्पेक्ट पहावा असं तिचं मत होतं.पण अत्यंत प्रॅक्टिकल मालकाला हा इमोशनल व्ह्यू नको होता…आणि या वादात जॉब गेला.परत निराशा…..पण यावेळी अनुभव, आत्मविश्वास,शिक्षण सोबत होतं . आणि एक रस्ता बंद झाला की नवे अनेक उघडतात असं म्हणतात तसंच झालं.. “People are talking ” अशा Talk show ची ती होस्ट झाली.ती लोकांना सहजपणे बोलकं करी…लोकही मोकळेपणाने बोलत.हा कार्यक्रम फारच लोकप्रीय झाला.( माझ्या मनात कमलेश्वर आणि आमीर खान चे कार्यक्रम उमटून गेले.)मग शिकागोचा Morning Show मग Oprah Show रांगच लागली.. दोन दशकं म्हणजे २० वर्ष हे शो Top rating show म्हणून गाजले आणि Oprah होस्ट म्हणून….ती सर्वात श्रीमंत ,पैसे मिळवणारी कलाकार होती.

ती श्रीमंत झाली पण तो जुना काळ ती कधीच विसरली नाही आणि Oprah Winfrey Leadership Academy चा जन्म झाला.तो तिच्या कर्तुत्वातला समाज कारणाचा कळस मानला पाहिजे.जे आपण सोसलं ते इतरांना सोसायला लागायला नको म्हणून तिनी अनेकांना मदत केली.दिशा दिली.मार्ग दाखवले … नाही तर ते निराशेने संपले असते किंवा गुन्हेगारीकडे वळले असते.

२०११ मधे तिला विशेष ऑस्कर पुरस्कार दिला गेला.Times,Forbes सारख्या जगद्विख्यात मासिकांच्या कव्हर पेजवर तिला मानाचं स्थान मिळालं.२०१३ मधे ओबामांनी तिला ” सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान ” प्रदान केला.

कुठून कुठे आलं जीवन?एका दरिद्री गलिच्छ वस्तीत अपमानित असुरक्षित जगणारी Oprah किती उंचीवर पोहोचली.झगडत यशस्वी झाली.

तिची मतं ठाम होती.त्यानुसार तिनं कुणाची कॉपी केली नाही.स्वतःच्या विचारांनी ती Authentic झाली.तिनी फक्त यश हे ध्येय मानलं नाही..‌ती नवनवे मार्ग शोधत राहिली.ती फार ईमानदार, प्रामाणिक होती.समोरच्याची अडचण ओळखून तिनं योग्य सुंदर दिशा दिली.मदतीचा हात देत ग्रहदशाच बदलली म्हणा ना….अनेक घरं तिच्यामुळे सुखी झाली.तिनं आधाराचा हात सोडला नाही आणि अशा ६८,०००/ लोकांना तिनं हात दिला.

तिचा भूतकाळ भयंकर होता.पण तो मागे सोडून तिनं भविष्य घडवलं.भूतकाळ विसरा आणि जीवन नव्यानं Design करा असं म्हणते ती.. आणि तसं तिनं केलंही…

कुणी म्हणेल हे मिळणं तिच्या दैवात असणार…बरोबर आहे..‌‌दैवाची साथ हवीच…‌पण दैवात लढा पण असतो तो आपण पहायचा आणि शिकायचं….कारण प्रयत्नांचं मोल कधीच कमी होत नाही ‌..केवळ ३२ व्या वर्षी १२०चॅनल्सवर तिला १०लाख लोक पहात होते. संकटात आतल्या आत ती अनेकदा तुटली असेल….पण लढाई सोडली नाही.हार मानली नाही..‌परिस्थिती इतकी पालटली की तिनं तिच्या चॅनलचं नाव ठेवलं “HARPO” अगदी तिच्या “OPRAH ” नावाच्या उलटं.‌ कमाल आहे ना!!

म्हणूनच वाटतं… असं काही पाहिलं ऐकलं की मनात येतं

“कितीही निराश असा….हे जगणं पहात रहा

मात करा अडचणींवर,

मग आशेचे किरण बोलावतीलंच पहा

जगणं त्यांचं देईलच दिशा,,,

कमीत कमी लढायचा तरी

घेऊया वसा!!”

आणि हो …एवढ्या यशानंतर तिच्या त्या वाक्याने तर मी हाललेच आत…ती म्हणते….

“माझे पाय जमिनीवरच आहेत

फक्त मी आता छान बूट वापरते !!!”

 सलाम!!!! हॅट्स ऑफ खरंच !!!

 

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांतीप्रिय माणसं … – लेखिका : सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ शांतीप्रिय माणसं … – लेखिका : सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली.  आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने सुखावली. सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून ‘ये बस’ म्हणाली. नाश्त्याला काय करायचं हे विचारायला आले होते, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली. 

(‘शांतीप्रिय माणसं’ ग्रंथातून साभार)

लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? विविधा ?

☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

रविवारची सकाळ. उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खरं म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.

अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील, घरात आई-बाबांचे छत्र होतेच. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता. सकाळी सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून  शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता.

त्यावेळी त्या शिस्तीचा खरंतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेवर ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. …आता असं वाटतं आमच्या आई-बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला, पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं.

हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.

हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे-सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता असं अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला.

पूर्वी आई-वडील म्हणायचे, “वळण नसेल तर सासरी गेल्यावर जड जाईल. आत्ताच शिका सगळे”. आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”

पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात “कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना”, आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला.

आता आपण, म्हणजे आमची पिढी नकळतपणे आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते असं नाही, आई देखील मुलीच्या या बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल नं?

आता असं वाटतं, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगतांना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.

आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही, पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय नं काम, मग सारखे मुलांना बोलून ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे आणि मोकळे व्हायचे’. सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे. गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचा. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.

मला असं वाटतं, म्हंटल तर प्रॉब्लेम, म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग! ‘बोलू का नको? सांगू का नको?’

मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे.

सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते. कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. नवी पिढी, नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.

घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे. चारित्र्य, व्यसने, पार्ट्या, कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल सांगू कशी तुला मी?’ या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.

मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक  चुकीची गोष्ट थंडपणे पहाणे हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे.

ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.

संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे, पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’

खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे, समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते.

केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच ‘सांगु कशी तुला मी ?’ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी गरज आहे.

आजचा हा लेख श्री. उदय मोडक, धारवाड, कर्नाटक यांच्या सौजन्याने.

लेखक : डॉ. शमा देशपांडे

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares