मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे  ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

आत्ताच्या पिढीला “गुराखी” हा शब्दही माहीत नसेल.  पण श्रीकृष्ण कथा ऐकली असेल तर श्रीकृष्ण गुरं हाकायला रानात जात असे आणि त्याच्या बासरी वादनाने गाई गुरं मंत्रमुग्ध होऊन आवाजाच्या मागे मागे जात वगैरे आपण वाचलेलं आहे.

पण आता ना इतकी गुरं ढोरं राहिली, ना कृष्ण अन् त्याची बासरी.

पण इथे ऑस्ट्रेलियात मात्र विस्तीर्ण पसरलेली कुरणं, हजारोनी गुरं ढोरं.

पण ती हाकायला माणसंच नाहीत. इतकी वर्ष मोटार सायकल वर बसून तीन चार माणसांकडून 3000 हेक्टर वर हे काम करून घ्यायचे. .पण शांतपणे चरणा-या गुरांना ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. सोबत एखाद दोन कुत्रीही सोबतीला द्यायला लागायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं. एका कळपातून हाकून मूळ जागी परत आणणे, परत दुसरा कळप असे करता करता दूर दूर जावं लागणा-या दुचाकीस्वार गुराख्यालाच घरी जेवायला येता यायचं नाही. ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं.

मग आणले हेलीकाॅप्टर… पण ते प्रकरण तसं खर्चिक.  श्रीमंत मालकांनाच ते परवडायचं.

आपल्या भारतात आत्ता आत्ता कुठं तुरळक ड्रोनचा वापर शेतीत औषधं फवारणीसाठी होऊ लागला आहे.  बाकी सगळे ड्रोन हे एकतर भारतीय सैन्याचे नाहीतर लग्नाच्या रिसेप्शनच्या शूटींगचे.

पण इथे जगात प्रथमच एकाने ड्रोननी गुरं हाकायची ठरवली, त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करवून घेतली आधी ती उडवून प्राणी दिलेल्या कमांड ऐकतात का ते तपासलं आणि हळूहळू त्याचा वापर वाढवत वाढवत हजारोंचा कळपच्या कळप हॅक् हॅक् न करता, पाठीवर दंडुका न मारता , हवा तसा, हव्या त्या दिशेला, थांबा म्हणलं  की थांबणारा, घराकडं चला म्हणल्यावर मुकाट माघारी फिरणारा असा Drone चा भन्नाट वापर सुरू केला आहे.  शेतक-यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहे.  हातासरशी गेलाच आहे ड्रोन 35 मीटर ऊंच तर कुठे पीक किती वाढलं आहे, पाणी आहे शेतात की घालायला हवंय हे सगळं एका जागेवरून ठिम्म न हालता ड्रोनवरील हातसफाईने करत आहे.  गुरांची संख्या पण मोजता येते, आसपास एखादा कोल्हा आला तर त्याला हा  ड्रोन हुसकावतो सुध्दा.  हेलीकाॅप्टरच्या आवाजापेक्षा गाईंना ड्रोनचा आवाज सुसह्यही वाटतोय. त्यांना ड्रोनचा आवाज ऐकला की वाटतं कुठला तरी किडा गुणगुणतोय.

आता पुढचा प्रयोग हे सगळे आख्या जगातून  जिथे कुठे इंटरनेट, GPS आहे अशा कुठूनही करता यायला पाहिजे याची चाचपणी सुरू आहे.

या प्रयोगशील शेतक-याची एकच व्यथा आहे ती म्हणजे त्यांचे संरक्षण खाते, सरकार पटापटा परमिशन देत नाही.  खरेतर सरकारही अजून ह्या बद्दल तितके जागरूक नाही शिवाय अशा वापरास ऊठसूट परवानगी दिली तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा गैरवापर तर होणार नाही ना हे अजमावून पाहात आहे. 

पण एकंदरीत उपयोगिता बघता, हळूहळू का होईना पिझ्झा डिलीव्हरी साठी ड्रोनच्या वापरापेक्षा ह्या अशा उपयुक्त कांमासाठी, जिथे आधीच मनुष्यबळ खूप कमी आहे आणि चराऊ कुरणं नजर ठरत नाही इतकी दूर आहेत, तिथे परवानगी द्यायच्या विचारात सरकार आहे. हेक्टरी फक्त एक डाॅलर खर्च येत असेल तर शेतकरी आग्रह धरणारच ह्या सुविधेचा.  पैसा, वेळ, श्रम वाचणा-या या सुविधेचा लाभ हळूहळू वाढणार आणि  ” Technology –  शाप की वरदान ” अशा निबंध लिहीणा-यांना

 ” वरदान ” मुद्दा पटवायला हा एक किस्सा लिहीता येणार .

गाईंच्या गळ्यातील घंटांचा मंजूsssळ नाद,

सांज ये गोकुळी,

धूळ उडवीत गाई निघाल्या

 

असं काही नसलेल्या देशात

ड्रोन हाच गुराखी!

— समाप्त —

लेखिका – सुवर्णा कुलकर्णी

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दे धडक बेधडक… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

दे धडक बेधडक… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

।।आकाशी झेप घे रे पाखरा

      सोडी सोन्याचा पिंजरा ।।

जगदीश खेबुडकरांच्या या काव्यपंक्ती आठवल्या आणि मनात विविध विचार प्रवाह वाहू लागले.  झेप घेणे,  भरारी मारणे, “लाथ मारीन तिथे पाणी काढेन”,  भयमुक्त,  निर्भय,   धडाडीचे आयुष्य जगणे,  “हम भी कुछ कम नही” “मनात आलं तर खडकालाही पाझर फोडू”  हे सारं  नक्कीच सदगुणांच्या यादीतले  गुणप्रकार आहेत यात शंकाच नाही.  भित्रा माणूस काहीच करू शकत नाही.  तो मागेच राहतो.  कसंबसं जीवन जगतो, कधीही प्रकाशझोतात सकारात्मकपणे येतच नाही.

सकारात्मकपणे   हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे.  धोका पत्करण्यामागे दोन बाबींचा अंतर्भाव खचितच आहे.  यश आणि नुकसान  या त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे धोका पत्करताना  सावधानता, नियमांची चौकट, आत्मभान, स्वसामर्थ्याची ओळख आणि उडी मारण्यापूर्वी पाण्याच्या संभाव्य खोलीचा घेतलेला अंदाज म्हणजेच परिपक्व,  समंजस धाडस  नाहीतर फक्त बेधडकपणा, एक प्रकारचा माज, मिजास,  गर्व आणि पर्यायाने प्रचंड हानी!  वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक..

पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कल्याणीनगर मध्ये घडलेली “पोरशे कार धडक घटना ही या प्रकारात बसते.  या घटनेनिमित्त अनेक स्तरांवरच्या, अनेक बाबींविषयी अपरंपार घुसळण झाली— होत आहे. प्रामुख्याने बदलती जीवनपद्धती,  यांत्रिकतेचा अतिरेक,  हरवलेला कौटुंबिक संवाद, बेदरकारपणा, “ नियम आमच्यासाठी हवेत कशाला”, “हम करे सो कायदा”  ही बेधुंदी,पैसा, सत्ता याचा गैरवापर,  २४x७ बोकाळलेली माध्यमे आणि नको त्या वयात नको ते अनुभवण्यास उपलब्ध झालेले मैदानं, ना कोणाचे बंधन ना कोणाची भीती आणि या पार्श्वभूमीवर पौगंडावस्थेतलं,  गोंधळलेलं, अमिबा सारखं ना आकार ना रूप असलेलं एक बेढब, भेसूर,  अधांतरी लटकणारं मन, शरीरात रक्तप्रवाहात चाललेलं संप्रेरकांचं सुसाट वादळ आणि त्या वादळाला शांतवण्यासाठी  अस्तित्वात नसलेली आधारभूत समंजस, परिपक्व यंत्रणा.

मी जेव्हा या सद्य  घटनांच्या पार्श्वभूमीवर मागे वळून माझे आयुष्य साक्षी भावाने पहाते तेव्हा मला सहजच वाटते इतर भावंडांमध्ये मी अधिक धाडसी होते. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावासा वाटायचा. नवनवीन गोष्टींबाबत प्रचंड औत्सुक्य असायचं.(ते आजही आहे) एकाच वेळी वडील सांगत,” पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. त्याचवेळी इतर कौटुंबिक सदस्य मला “हे करू नकोस ते करू नकोस” असेही सांगायचे.  मी काही “बडे बाप की बेटी”ही नव्हते.  तशी मी बाळबोध घराण्यातच वाढले.  ठरवून दिलेल्या सांस्कृतिक आणि आचारसंहितेच्या नियमबद्ध चौकटीतच वाढले.  तरीही माझं एक पाऊल प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी उत्सुक असायचं. कधी परवानगीने तर कधी छुपी-छुपे मी ते उचललंही.  एक धडकपणा माझ्यात होता म्हणून अगदी काही वर्षांपूर्वी मी रिप लायनिंग केलं, पॅरासेलिंग केलं, थायलंडला अंडर सी वॉक” केला. मनावर प्रचंड भय असतानाही भयावर मात करत अशी मी अनेक साहसकृत्ये  नक्कीच केली. जेव्हा ड्रायव्हिंग शिकले तेव्हा दुतर्फा झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवाविशी वाटली पण आता असं वाटतं की अनेक भीत्यांच्या वर एक भीती सतत होती आणि तिचं वर्चस्व नाकारता आलं नाही ती म्हणजे सद्बुद्धीची.  मन आणि बुद्धीतला वाद नेहमीच विवेक बुद्धीने जिंकला म्हणून माझ्या कुठल्याही धाडसात धडक असली तरी बेधडकपणा नव्हता. सावधानता होती हे नक्कीच. एक वय असतं धोक्याचं, प्रचंड ऊर्जेचं, सळसळणाऱ्या प्रवाहाचं. नदीचं पात्र सुंदर दिसतं पण जेव्हा तीच नदी किनारे सोडून धो धो पिसाट व्हायला लागते तेव्हा ती सारं जीवन उध्वस्त करते म्हणून फक्त एकच…

थोडं थांबा, विचार करा, योग्यायोग्यतेचा मेळ घाला. नंतर दोषारोप करण्यापेक्षा वेळीच यंत्रणांना चौकटीत रोखा, बाकी कुठल्याही कायद्यापेक्षाही मनाचे कायदे अधिक संतुलित हवे आणि तसेच शिक्षण सुरुवातीपासून अगदी जन्मापासून देणारी भक्कम मानवीय  संस्था हवी.

 बैल गेला झोपा केला अशी स्थिती उद्भववायला नको.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत ☆ श्री संभाजी बबन गायके 

War is not just a strong wind that blows into our lives; it is a hurricane that rips apart everything we hold dear.

अर्थात, युद्ध म्हणजे काही केवळ आमच्या आयुष्यांत सुटलेला जोराचा वारा नव्हे…हे तर वादळ असतं आमच्यापासून आमचं सर्वस्व हिरावून घेणारं! गांभिर्याने विचार केला तर हे निरीक्षण अत्यंत वास्तववादी म्हणावं लागेल. महिला आणि मुले युद्धात सर्वाधिक प्रमाणत बाधित होतात, असा जगाचा आजवरचा इतिहास आणि वास्तवही आहे. मागील पिढीला पाकिस्तान्यांनी त्यांच्याच देशबांधवांवर आणि विशेषत: भगिनींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा माहित आहेत. वांशिक संघर्ष हा शब्द केंव्हातरी आपल्या वाचनात येऊन गेला असेल बहुदा! अफ्रिका खंडातील अनेक देश गेली कित्येक दशके वांशिक संघर्षात अडकून पडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद या देशांमध्ये विविध देशांतील सैन्यातील अधिकारी,सैनिक यांचा समावेश असलेली शांतीसेना पाठवून किमान शांतता राखण्याचा प्रयत्न करत असते. आपला भारत या १२४ देशांपैकी सर्वाधिक सैन्य पाठवण्या-या देशांत ९व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमात भारतीयांची कामगिरी नेहमीच सर्वोत्तम ठरत आलेली आहे. सध्या सहा हजारांपेक्षा जास्त भारतीय सैनिक अफ्रिकेत कार्यरत आहेत. 

   भारताच्या युएन पीस किपींग फोर्से पथकात पुरूष सैनिकांसोबतच महिला सैनिकांचे एक छोटेखानी पथकही सहभागी असते. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मेजर राधिका सेन यांनी ३२ आंतरराष्ट्रीय महिला सैनिक असलेल्या पथकाच्या कमांडींग ऑफिसर म्हणून अतिशय अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या पथकाला एंगेजमेंट प्लाटून (इंडियन रॅपिड बटालियन) असे नाव आहे. कांगो किंवा कॉंगो या देशात त्यांना कामगिरी सोपवण्यात आली होती. पुरुष सैनिकांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्य पथकासोबत आपल्या महिला सहका-यांसह हिंसाचार ग्रस्त भागांत गस्त घालणे, वेळ पडल्यास सशस्त्र प्रतिकार करणे ही त्यांची कर्तव्ये तर होतीच. पण या सैनिक महिलांकडून एक आणखीही कार्य अपेक्षित होते…ते म्हणजे युद्धमुळे बाधित झालेल्या महिला आणि मुलांना सर्वप्रकारचे साहाय्य करणे. 

   या संघर्षामध्ये प्रतिस्पर्धी वंशातील पुरूष सैनिकांची निर्दयी हत्या करणे ही तर सर्वसामान्य गोष्ट असते. मात्र महिला हाती सापडल्या तर त्यांची अवस्था अगदी जीणं नको अशी करून टाकली जाते. किंबहुना शत्रूचे मर्मस्थान म्हणजे त्यांच्या महिला. त्यांची जितकी जास्त विटंबना करता येईल तेव्हढी विजयी सैन्य करीत असते. दुर्दैवाने काही वंशातील सैन्यातील महिलाही यात मागे नसतात. अर्थात यात भरडल्या जातात त्या महिलाच. 

  या पिडीत महिलांना मानसिक आधार देण्याचं,जीवन प्रशिक्षण देण्याचं काम आपल्या मेजर राधिका सेन यांनी अत्यंत प्रभावीपणानं पार पाडलं. मेजर सेन यांनी या महिलांचा विश्वास जिंकून त्यांना एकत्रित केलं. त्यांच्यासाठी आरोग्य,मानसिक समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिलं. बलात्कार पिडीत अल्पवयीन मुली, तसेच महिलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी मेजर राधिका या हक्काचं स्थान ठरलं. 

  आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी यासाठी मेजर राधिका यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्री-अपरात्री त्या आपल्या पथकासह सज्ज असायच्या. इंग्लिश संभाषणाचे वर्ग सुरु करण्यात त्यांनी यश मिळवले. हल्ला होण्याच्या परिस्थितीत बचाव करण्याची तंत्रेही त्यांनी महिलांना,मुलांना शिकवली. गरज पडली तेंव्हा त्यांनी या महिलांना सशस्त्र संरक्षणही पुरवले..आपल्या जीवाची पर्वा न करता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वरीष्ठांच्या सहकार्याने संघर्षग्रस्त पुरुषांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी कांगोच्या उत्तर किवु या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 

   हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या राधिका सेन या ख-यातर आय.आय.टी. मुंबई येथे बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनियरींचे शिक्षण घेत होत्या, पण सैन्यदलात सेवा करण्याच्या त्यांच्या पूर्वीपासूनच्या इच्छेने उचल खाल्ली आणि हे क्षेत्र सोडून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळवला आणि आठच वर्षांच्या सेवेनंतर त्यांची थेट यु.एन.पीस किपींग फोर्समध्ये मेजर म्हणून नियुक्ती झाली. केवळ एकाच वर्षाच्या कारकीर्दीत मेजर राधिका यांनी अतुलनीय कामगिरी करून प्रतिष्ठेचा मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ दी इअर पुरस्कार प्राप्त केला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणा-या ह्या दुस-या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. या आधी २०१९ मध्ये मेजर सुमन गवानी यांनी संयुक्तरित्या हा पुरस्कार पटकावला होता. 

३० मे २०२४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला आहे. चला,आपण सर्वजण मिळून मेजर राधिका सेन यांचे अभिनंदन करूयात.! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

।श्रीराम। आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे आपल्या लगेच लक्षात येईल. आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. ‘ज्याला कृष्णाचा ‘काला’ समजला त्याला वेगळी ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकविण्याची बिलकुल गरज नाही’ असे एक वचन प्रसिद्ध आहे.

चुकून कुणाला पाय लागला तर नुसते ‘क्षमस्व’ किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं ‘सॉरी’ म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने ‘नमस्कार’ करणारी आपली संस्कृती आहे. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते.जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( ‘अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी’ ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ बनविताना आणि आकाशातून ‘सांताक्लाज’ नावाचा कोणी ‘देवदूत’ येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. याला वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी ‘व्रत’ धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.

“सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||”

वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त ( साधारण हजार वर्षे) असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणार वृक्ष आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे  वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. ‘पुसंवन’ विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत.

श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. ‘आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच’. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि  त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.

खरंतर ‘वटपौर्णिमा’ हाच *वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व *’तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे’ आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही ‘जाणीव’ त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात उजवली,रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या ‘कहाणी’चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित  केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे.

ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. म्हणून ‘वडाचेच पूजन का?’ हा प्रश्नच गैर आहे असे वाटते. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!

स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पूजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत ‘स्त्री’ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी ‘कोमल’ ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी ‘दुर्गा’ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते. स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. कोणत्याही गोष्टीचे ‘मर्म’ न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.

हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या ‘आत्मारामा’स विसरला नाही तर त्याला ‘स्व’रूपाची नक्कीच ओळख होईल. आत्मारामाची ओळख करून घेण्यातच  मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे ‘आत्मारामाची भेट’ !!!

ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील  मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर  सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान ७ जन्म अर्थात हजार वर्षे  तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?

पूर्वी लग्न ही ‘संस्कार’ म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रीयांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा प्रवास करायचा आहे अर्थात ‘आनंताचा’ प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.

आज विवाहामागील  ‘संस्कार’ लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे. सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज वटपौर्णिमा साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली ‘कुटुंब व्यवस्था’ अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो. आपल्या ‘कुटुंबरुपी’ वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच हिंदू धर्माचा वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्रीराम। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

भूरभूर …भूरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन 

“येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत नाचायला लागली.

पाऊस वाढला. मुलं आत गेली.बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी  साठलं  होतं .थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील..

“पाऊस आला धो धो

पाणी व्हायलं सो सो सो

पाण्यात बोट सोडली सोडली

हातभर जाऊन बुडली बुडली”

बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच…

माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस.. नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या वेळी पाऊस पडायचाच नाही. कोरडा रेनकोट दप्तरातून न्यायचा आणि परत आणायचा. कंटाळून एके दिवशी रेनकोट घरीच ठेवला .त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळी धुवांधार पाऊस सुरू झाला. भिजत घरी यायला आवडायचं पण त्यापेक्षा आपण आज नेमका रेनकोट घरी ठेवला याचं दुःख वाटत होतं. तेवढ्यात  शाळेच्या गेटपाशी हातात रेनकोट घेतलेली आई दिसली .. रेनकोट घालून मिरवत घरी येता आलं..

किती  किती आनंद झाला होता..

शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात येत होता बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या

“आज आपण फक्त कविता म्हणू” तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. दिवस सुगीचे सुरू झाले, उघड पावसा ऊन पडू दे, ने मजसी ने परत मातृभूमीला ,ऐल तटावर पैल  तटावर एकामागोमागे कविता म्हटल्या….  शेवटी बाईंनी “बाई या पावसान…” हे गाणं म्हटलं .बाईंचा आवाज किती गोड आहे हे तेव्हा कळलं. बाईंचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं .त्या गाण्यातील ..”जीवलग कोठे बाई पडे अडकून नच पडे चैन “..ही ओळ आठवली.. त्यावेळी बाईंनी ते गाणं का म्हटलं.. ते आज  इतक्या वर्षानंतर समजलं.

शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर वेगळीच दुनिया समोर आली. त्यात पहिल्या ट्रीपचा अनुभव तर  कितीतरी आठवणी देऊन गेला.. लोणावळा ते खंडाळा पायी जायची ट्रीप .वर्गातल्या तरुण मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा ,गाणी ,खोड्या आणि वरून पाऊस ..

हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे राहायचे .खुळ्यासारखा कोणाचा तरी कुणावर जीव जडायचा.. कॉलेज पुरती नाती ..अशा हळव्या पावसात ट्रीपला जी मजा येते ती आयुष्यात परत कधी येत नाही. हुरहुरती मनं घेऊन   ट्रिपहून  परत यायचं असतं… खरं म्हणजे तसं फारसं काही घडलेलं नसतं …पण म्हटलं तर खूप घडलेले  असतं..

कॉलेजच्या त्या रमणीय  जगातून बाहेर यावं लागतं. कॉलेजातले मित्र तेवढ्यापुरतेच असतात . एखाद दुसरा जवळचा होतो इतकंच..

नवरा मात्र दुसराच कोणीतरी होतो. तोही खूप आवडतो .लग्नानंतर वेगळे जग सुरू होतं .हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात काळेमणी आले की गृहिणी  दिसायला होतं.. अल्लडपणा हरवतो.  मंगळवारी मंगळागौरीचा मोठा थाट आईने मांडलेला असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. पूजेला  आठ मुली येणार आहेत. अस आई घोकत असते .त्याच दिवशी धुवांधार पाऊस येतो. मुली  येतात की नाही? पूजा होते की नाही? अशी आईला काळजी असते. पण भर पावसात मुली येतात आईचा जीव भांड्यात पडतो.

“जय देवी मंगळागौरी ” ही आरती म्हणताना आईचा तो नथ घेतलेला सात्विक चेहरा कृतकृत्य झालेला असतो. पाऊस म्हटलं की आईचा तो चेहरा आठवतो…

संसारचक्र पुढे जात राहते. बाकी काही असलं तरी नवऱ्याबरोबर पावसाची मजा मात्र  लुटता येत नाही. तो  बिचारा कर्तव्य तत्पर जबाबदार माणूस असतो. दोघे बाहेर फिरायला जातात. अचानक आभाळ भरून येते. वारा सुटतो.. पाऊस येणार ..असं वाटतं आता पावसात दोघांनी हातात हात घेऊन मस्त भिजत घरी यावं वगैरे रोमँटिक कल्पना आपल्याला सुचायला लागतात .आपलं लक्ष जमिनीवर नसतच …तेवढ्यात नवरा चटकन रिक्षा नाहीतर टॅक्सी थांबवतो .आपण काही न बोलता चढून बसतो.. शाहण्या बाईसारख्या..

बाहेर धो धो पाऊस सुरू असतो अंग जरा ही ओलं न होता भर पावसात आपण कोरडे घरी येतो. पण त्यातही आनंद वाटायला लागतो .कारण आता संसारात मनापासून रमायला झालेलं असतं.

बाहेर पाऊस कोसळायला लागल्यावर नवरा मुलं घराच्या चार भिंतीत सुरक्षित असले की हायसं वाटतं .त्या क्षणी बाहेर पाऊस बघायला जायला वेळ नसतो. सगळ्यांसाठी  खायला काहीतरी  गरम करून देण्यात आनंद असतो. आता आईची जागा आपण घेतलेली असते . 

घराच्या गॅलरीत खुर्चीवर अनेक  पावसाळे पाहिलेले दोन जीव सासू-सासरे बसलेले असतात .गतजीवनाच्या  कितीतरी आठवणी त्यांच्यासोबत असतात. त्यांचीच त्यांना साथ असते.

कधी कधी ते दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत.  नुसते पावसाकडे बघत बसतात…

पावसाकडे बघतात का अजून काही बघतात कळत नाही…

एक खुर्ची रिकामी झाल्यावर सासूबाईंचा एकटा जीव निःशब्द होऊन जातो. त्यांच्याकडे बघता बघता आपल्या डोळ्यात पाऊस उतरतो.

” पुढचा पावसाळा मी पाहीन असं वाटत नाही “असं म्हणत पावसाकडे बघत बसलेल्या त्या आठवतात.. खरंच पुढच्या पावसाळ्यात दुसरी खुर्ची ही रिकामी होते. गॅलरी उदास सुनी सुनी होऊन जाते..

मनात विचार येतो.. आपलेही बरेच पावसाळे पाहून झाले .अजून किती आहेत कोण जाणे ?

पावसाचे हे असंच आहे .त्याच्याकडे बघताना आठवणींच्या सरी धावून यायला लागतात… भावनांनी भिजवून टाकतात ..डोळे ओलावतात..

पावसाळ्यात कधीतरी असा एखादा दिवस येतो.. खिडकीतून ,गच्चीतून, गॅलरीतून ,दारातून कुठूनही आपण पाऊस बघत असतो. अशावेळी आपण एकटे असलो तर  कुठली तरी आठवण मनात येतेच…

डोळे भरून येतात. मन कातर होतं वेडबागडं होतं .. भूतकाळाचे दरवाजे उघडतात …आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो.

म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं..स्वैर सोडावं  आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा..

काहीही म्हणा पण हिवाळे,उन्हाळे येतात आणि जातात….. हा पावसाळा मात्र आर्त करून जातो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. 

नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. 

पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. 

हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।

माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.

त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

अनायासेन मरणं :

मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.

विनादैन्येन जीवनं :

जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:

मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.

हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”

मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.

आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.

संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.

आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. 

आपल्या जीवनाची  ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरू राहिला. खूप प्रयत्न करूनही हाती काही न लागताच अखेर  हातातून सगळं निसटून गेलंच.स्टेट बॅंकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्द होऊन नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली. केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी पुन्हा नव्याने अर्ज केला. त्याच दरम्यान माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने शिवडीतल्या ‘स्वान मिल’च्या  पीडीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपूंज्या पगाराची नोकरी मिळाली आणि नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली!

पुढे जे घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच, पण ते योगायोग मात्र अघटीत म्हणावेत असेच होते!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरीत्या शब्दशः खरेही ठरले.)

मिलमधल्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच होता.त्याच धकाधकीत स्टेट बॅंकेचा नव्याने केलेल्या अर्जामुळे पुन्हा रिटनटेस्टसाठी काॅल आला.ती टेस्ट होऊनही महिनाभर उलटून गेला.रोजचं रुटीन अक्षरश: कसंबसं रेटणं सुरु होतं. मिलमधली नोकरी एक तर खाजगी. मिलमजुरांची आणि इतर स्टाफची पीएफ् खाती वर्षानुवर्षे अपडेटच केलेली नव्हती. त्यामुळे ऑडिटर्सनी घेतलेल्या स्ट्रीक्ट ॲक्शनमुळे ते प्रदीर्घकाळ पेंडिंग असलेले काम शिकून घेऊन ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण माझ्यावर असायचं.आमचे मॅनेजर शास्त्रीसाहेब तर कायम कातावलेलेच असायचे. कामासंदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांच्याकडे जाऊन सांगण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मी अदबीने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो की मला पाहून त्यांचं कपाळ आठ्यांनी भरून जायचं. ते कामच अतिशय एकसूरी आणि किचकट असल्यामुळे खूप कंटाळवाणं वाटायचं न् तिथं माझ्या शंकांचं निरसन करुन कामाला गती देणारं कुणीही नव्हतं. तरीही ती नोकरी माझी गरज म्हणून मला टिकवणं भागच होतं. कामासाठी रोज रात्री उशीरपर्यंत बसायला लागायचं. खूप उशीर झाला की बस नसल्याने भुकेल्यापोटी शिवडीहून दादरपर्यंत चालत यावे लागे.या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बहिणीच्या घरी मिळणारं घरपण हाच एकमेव दिलासा होता.

बहिणीचं मूळ सासरघर कोल्हापूरला होतं. तिथं घरी सर्वांना आणि इस्लामपूरला आमच्या आईबाबांनाही भेटण्यासाठी म्हणून बहिणीने रजा घेऊन थोडे दिवस तिकडं जाऊन यायचं ठरवलं.तिला पोचवायला मेहुणेही जाणार होते.दोन चार दिवस राहून ते परत येणार होते. त्या दरम्यान दादरला एकट्यानंच रहाणं माझ्या जीवावर आलं होतं. ते न सांगताच समजल्यासारखं माझी डोंबिवलीची मावशी एकदा दादरला बहिणीकडे आली होती, तेव्हा ती ‘तुम्ही जाऊन परत येईपर्यंत याचे इथे जेवणाचे हाल कशाला?थोडे दिवस बदल म्हणून मी याला डोंबिवलीला घेऊन जाते’ म्हणाली.मी चार दिवस मावशीकडे रहायचं आणि मेहुणे परत येतील तेव्हा मी त्यांना दादर स्टॅंडवर उतरवून घ्यायला यायचं न् मग दोघांनी दादरच्या त्यांच्या घरी जायचं असं सगळं आमचं  निघतानाच ठरलं. हे सगळं मला त्यावेळी सोईचं वाटलं खरं, पण तेच पुढं माझ्या आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ करणार होतं याची तेव्हा आम्हा कुणालाच कल्पना नव्हती ! आज इतक्या वर्षानंतर ते सगळं आठवतं तेव्हा या सगळ्या घटनाक्रमात लपलेल्या अघटीत योगायोगाचं आश्चर्य वाटतं एवढं खरं!

ठरल्याप्रमाणे मी त्या रविवारी डोंबिवलीहून माझी बॅग घेऊन मेहुण्याना उतरवून घ्यायला निघालो. त्यांची बस रात्री साडेआठला येणार होती. उशीर व्हायला नको म्हणून मी आठ वाजताच तिथे जाऊन बसची वाट पहात थांबलो.बस अनपेक्षितपणे तासभर उशिरा आली. तिथून चित्रा टॉकीजसमोरच्या इस्माईल बिल्डिंगमधल्या घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. सामान घरी ठेवून,फ्रेश होऊन लगेच बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं. आम्ही गडबडीने कुलूप काढून दार ढकललं तर समोरच शटरमधून आत टाकलेली दोन तीन पत्रे पडलेली होती. पुढे होऊन मी ती उचलली आणि पाहिलं तर त्यात एक लिफाफा चक्क माझ्या नावाचा होता ! इथे या पत्त्यावर आणि माझं पत्र? उत्सुकतेपोटी तो लिफाफा उचलला आणि घाईघाईने उघडून पाहिला तर आत ‘युनियन बॅंक आॅफ इंडिया’ कडून आलेलं एक पत्र होतं. मुंबईत आल्याबरोबर मी मेहुण्यांच्या सल्ल्याने माझ्या मनात नसतानाही इथल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधे नाव नोंदवलं होतं त्याची आठवण करुन देणारं ते पत्र होतं! कारण ते पत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे मागवलेल्या यादीनुसार नुकत्याच राष्ट्रीयीकरण झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने मला पाठवलेलं ते रिटन टेस्टचं कॉल लेटर होतं! जीवघेण्या उकाड्यांत अनपेक्षितपणे मनाला स्पर्शून गेलेली ती गार वाऱ्याची झुळूकच होती जशीकांही! हे अनपेक्षित पत्र म्हणजे ‘स्वान मिल’ मधल्या रुक्ष,कोंदट वातावरणातून मला तात्काळ बाहेर पडणं सहजसुलभ  करणारी एक संधीच होती.त्या अनपेक्षित आनंदाच्या भरात क्षणाचाही विलंब न लावता मी ते कॉललेटर झरझर वाचून पूर्ण केलं आणि त्याचक्षणी सगळी शक्तीच कुणीतरी काढून घेतल्यासारखा मटकन् खुर्चीत बसलो. पत्र धरलेला माझा हात थरथरु लागला. डोळे नकळत भरून आले.

फ्रेश होऊन जेवायला जायच्या तयारीने मेहुणे बाहेर आले आणि मला पहाताच थबकले.

“काय रे? काय झालं? कुणाचं..कसलं पत्र आहे ते?”

मी सून्न होऊन गप्प बसलो.आता बोलण्यासारखं कांही शिल्लक होतंच कुठं? मी न बोलता ते पत्र त्यांच्या हातात दिलं.

“ओह्…” तो धक्का त्यांनाही अनपेक्षित होता. कारण प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं,म्हणजे साधारण आठवडा होऊन गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता. कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजे शनिवारची आणि वेळ दुपारी अकराची होती. अर्थातच रिटर्न टेस्ट कालच होऊन गेलेली होती!

हातातोंडाशी आलेला सुग्रास घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मन कोंदट अंधाराने भरुन गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अनपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित झाली!

क्रमश:..  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.) – इथून पुढे — 

आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवरात उभे होते. माझ्या बायकोला हें काही पसंत नव्हते.ती झाड उभ करताना तिकडे फिरकली ही नव्हती.

आता झाड जगवणे हें महत्वाचे होते, आमच्या घरी कामाला येणारी शांता कडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली.

दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती, सायंकाळी घरी आल्यावर पाहिले, शांता ने पाणी घातले होते पण झाडें मलुल दिसत होती. मी रात्री उठून झाडाकडे गेलो, पाने आणि देठ पिवळे होतं होते. सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती, बरीच पाने पिवळी झाली होती. मी कॉलेजच्या वर्देसरांना फोन लावला, त्याचे म्हणणे, जुनी पाने गळून पडत असावीत, त्याची काळजी करू नका, नवीन कोंब येतात का पहा.

मी सकाळ दुपारी सायंकाळी मध्यरात्री झाडाकडे पहात होतो. पाणी शेणखत घालत होतो, पण काहीच प्रगती नव्हती.

मी निराश झालो. बायको म्हणत होते ते खरेच उगाचच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते. मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले ऐकले, कोणी म्हणाले “असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते, या दिवसात जगणे कठीण,’.दुसऱ्याचे म्हणणे “रोज पाणी घालू नका, त्यामुळे मुळे कुजतात ‘.

एकांदरीत सर्व मला हसत होते, चेष्ठा करत होते.

मी दुःखी होतं होतो. एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो, त्या करिता किती पैसे गेले होते? माझी किती मेहनत? आणि सर्वांनी माझी चेष्ठा करावी? बायकोने जाता येता टोमणे मारावे?

आज सहा दिवस झाले, जांभळीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती. त्यावर कोठेही नवीन कोंब येत नव्हते. माझा पराभव झाला होता, आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते. आजूबाजूची लोक, शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती.

माझे कशातच लक्ष नव्हते. अजूनही शांता पाणी घालतंच होती.

एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्दे सरांकडे गेलो. सरांकडे माझा पराभव मान्य केला. सरांनी शिवाजी विदयापीठतील biology चे प्रमुख डॉ सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांचेशी बोलायला सांगितले.    

मी रात्री डॉ सामंत यांना फोन लाऊन सर्व हकीगत सांगितली. सामंत यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, मग ते बोलू लागले 

डॉ सामंत -वकीलसाहेब, तुमच म्हणणं मी ऐकलं, तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलंत आणि तुमच्या घराच्या आवारात लावलत.

पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील? तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेलं, तर तुम्हाला राग नाही का येणार?

मी -येणार सर, निश्चित येणार, पण मी माणूस आहे आणि ते तर झाड..

डॉ सामंत -इथेच आपली गफलत होते. तुम्हाला काय वाटते, झाडाला संवेदना नाहीत? राग नाही? दुःख नाही? आनंद नाही? झाडांना सहवास, प्रेम नको असत?

मी -सर, मला काहीच माहित नाही याबद्दल..

डॉ सामंत -तुम्ही कोकणात राहता, तुमच्या घरा शेजारी एक नारळीच झाड बागेतील झाडापेक्षा पाचपट उत्पन्न देत, बरोबर..

मी विचार केला, डॉ बरोबर आहे. आमच्या घरच्या बाथरूम चे पाणी घरा शेजारील माडा ला जाते त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्त नारळ धरतात.

मी -हो डॉ साहेब, बरोबर.

डॉ सामंत -याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरचंचा सहवास मिळतो.

भारतीय शस्त्रज्ञ् डॉ जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे, वनस्पतीना सुद्धा राग, दुःख, वेदना, आनंद असतो. त्याना सहवास हवा असतो.

मी -मग डॉ माझे काही चुकलं का?

डॉ सामंत -खूपच चुकलं. रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेलंय झाडाला उपटून काढतांना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का?

मी -नाही.. नाही.. मला याची काही कल्पना नव्हती.

डॉ सामंत,-ते झाड दुःखी झालाय. तुम्ही त्या झाडाची क्षमा मांगा. त्याला जाता येता गोंजारा. त्याच्या बुंध्यवर डोकं टेकवा, सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्या नंतर मला फोन करा.

डॉ नी फोन ठेवला.

मी हडबडलो. मला वनस्पतीच्या  सवेंदना, भावना या विषयी काही कल्पनाच नव्हती, शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच विषयी धडा होता पण तो पाच मार्कचा एव्हडाच इंटरेस्ट.

मी घरामागे आलो, चांदण्यात जांभळीचे झाड निश्चिल उभे होते. त्याचावर नाही फादी नाही पान. मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागलो “क्षमा कर मला, क्षमा कर, तुला न विचारता तुला उपटून काढलं मी. दुष्ठ माणूस आहे मी. माझ चुकलं… कितीतरी वेळ मी रडत होतो.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो, आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती शिंपले. अर्धातास मी झाडासोबत होतो.मग मी कोर्टात गेलो, रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यसमोर ते जांभळीचे झाड होते. रात्री घरी आलो, हातपाय धुतले आणि झाडाकडे गेलो. परत परत त्याची क्षमा मागितली. झाडाला गोंजारले, त्याचाशी गप्पा मारल्या.

माझ्या बायकोने माझ्याशी बोलणे सोडल होते. माझे जे काय चाळे चालले होते, त्याची मनातल्या मनात ती चेष्ठा करत असणार.

शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती, परत एकदा पाणी घालत होती.

दहा दिवस झाले असतील, मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो, एव्हड्यात शांता आली आल्या आल्या ती झाडाकडे आली, आणि मोठ्याने ओरडली “भाऊंनू, ह्या बघा, झाडाक कोंब येता.. हेकाच पुढे फादी येतली आणि पाना पण येतली ‘.

मी धावलो, खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते.

मी झाडाच्या बुंध्यवर डोकं टेकले आणि रडू लागलो. शांता चे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली, तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली.

माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे, झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते.

ते दोन कोंब हळूहळू मोठे होतं गेले. आणखी कोंब आले, आणखी कोंब आले… लालचुतुक पाने आली..

पाने जून झाली.. फाद्या मोठया झाल्या.. संपूर्ण जांभळाचे झाड पानांनी भरून गेले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भारतीय सैन्याने आपल्या दोन दिवसांच्या धाडसी  कामगिरीमुळे  आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली,  युगांडामध्ये इस्रायलने पूर्वी केलेला पराक्रम व भारताने आता केलेला पराक्रम हा सारखाच आहे.  

 भारतीय वायुसेनेच्या या कृतीने जग आश्चर्यचकित झाले आहे आणि भारताच्या उदयाचे कौतुक करत आहे.  भारतीय युगाची ही सुरुवात आहे असे जग  म्हणू लागले आहे.

सुदान मध्ये घडलेली ही घटना खूप धक्कादायक आणि थरारक होती .  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी युक्रेन आणि काबूलमधील भारतीयांची सुटका करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण ते नेहमीच्या औपचारिकतेसह योग्य विमानतळांवर दिवसा उजेडी घडलेल्या होत्या.  

सुदानमध्ये तसे झाले नाही,  सुदानची हवाई हद्द बंद आहे आणि कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही, फक्त अमेरिकेने आपल्या राजदूतांना वाचवण्यासाठी आपले हेलिकॉप्टर धाडसाने पाठवले आहेत. इतर सर्व देश तेथे ठप्प आहेत, विमानतळावरील लढाईमुळे उड्डाणे अशक्य होतात आणि इतर अनेक मार्गक्रमण  अशक्य होते.    

121 भारतीय देखील असेच अडकले होते आणि त्यांना वाचवणे हे मोठे आव्हान होते

पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलाला पूर्ण अधिकार दिले आणि भारतीय गुप्तचर सेवा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासहीत  भारतीय हवाई दल उत्साहाने मैदानात उतरले.

विदेशी विमाने सुदानमध्ये उडू शकत नाहीत आणि उड्डाण केल्यास दोन्ही बाजूंनी भीतीपोटी हल्ला होऊ शकतो, याशिवाय मुख्य विमानतळ जीर्ण आहे, अशा परिस्थितीत सुदानच्या परवानगीशिवाय भारतीयांची सुटका करावी लागणार आहे. हे आव्हान त्यांच्यासमोर होते. 

भारतीय गुप्तचरांनी सुदानची चौकशी केली आणि राजधानीच्या पलीकडे 50 किमी अंतरावर एक मानवरहित, बंद विमानतळ शोधला. तेथे विमान उतरविता येईल पण अनेक अडचणी आहेत.  

सर्व प्रथम, त्या विमानतळावर  कोणीही नाही, वीज नाही, दिवे नाहीत, हवाई वाहतूक नावाचे कोणतेही मार्गदर्शन नाही, येथे विमान लँडिंग किंवा टेक ऑफ करणे असो, धोका जास्त आहे.

विमान आले तरी  सुदानुना  चुकवून येणे अवघड आहे.   तसे पाहिले तर भारतीय विमानांना उड्डाणासाठी पेट्रोलमुक्त मार्ग नाही.  त्यामुळे अनेक समस्या या कार्यात आहेत. 

प्रथम, भारतीय हवाई दलाने आपल्या कमांडोसह एक मोठे विमान सौदी जेद्दाहला पाठवले, तेथून ते सुदानच्या बाजूने होते, जेणेकरून एकच इंधन भरणे पुरेसे होते.

भारतीय हवाई दलाने अत्यंत गुप्ततेत सनसनाटी कामगिरी  पार पाडली  १२१ लोकांना  संध्याकाळी शांतपणे  मानवरहित विमानतळाजवळ गुपचुप आणून लपवून ठेवले.  

त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाचा पराक्रम सुरू झाला. 

विमानात दिवे न लावता  अंधारात उड्डाण केले त्यामुळे कोणाच्याही नजरेस न पडता विमान ईप्सित स्थळी पोहोचले . हे उड्डाण करताना त्यांनी  नाईट व्हिजन अटॅक उपकरणे वापरली आणि उपग्रहाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विमानाने अंधारात उत्तम प्रकारे उड्डाण केले.

वैमानिकांनी रात्री विमान सुरक्षितपणे उतरवले आणि इंजिन चालूच ठेवले.  

विमानाचा दरवाजा उघडला आणि भारतीय कमांडो धावत आले आणि विजेच्या वेगाने विमानात १२१   जणांना घेऊन गेले. या गोष्टीस सात मिनिटे लागली.   सौदी अरेबियातील जेद्दाह येथे विजेच्या वेगाने जाणारे विमान उतरल्यानंतर भारतीय मायदेशी परतले. 

या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटत आहेत.  इस्त्राईल वगळता इतर कोणत्याही देशाने असे आव्हान स्वीकारले नाही आणि भारताने ते यशस्वी केले आहे.  हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होते , जर विमान अडकले किंवा लढाऊ विमानांनी  घेरले गेले असते  तर फार मोठा धोका होता. शनिवार २९.४.२०२३ रोजी हे घडले. 7 मिनिटांत सुदानमधून भारतीयांची सुटका झाली. 

प्रत्येक प्रकल्प सावधपणे परंतु धैर्याने संकल्पित केला जातो आणि आव्हान असतानाही तो कार्यान्वयीत केला जातो.  हा पराक्रम करणाऱ्या पायलट आणि क्रू चीफचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. 

त्यांच्या नावांची पुरस्कारांसाठी घोषणा केव्हा होईल हे नक्की कळेल. 

भारतीय हवाई दलाने मोठी कामगिरी केली असून प्रत्येक भारतीयाने छाती उंच करून अभिमानाने अभिवादन करण्याची वेळ आली आहे.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares