मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राजकन्येची आई… — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

राजकन्येची आई…  ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी  इंग्लंडमुक्कामी असताना,आमच्या मुलीनं चार दिवस स्काॅटलंडला जाण्याचं नियोजन केलं होतं. एडिंबरो ह्या स्कॉटलंडच्या  राजधानीत आमचा मुक्काम होता. समृध्द प्राचीन परंपरांचे अवशेष तिथे जपून ठेवले आहेत. ते पाहून झाल्यावर एक दिवस जवळच्या समुद्रकिनारी  आम्ही फिरायला जाणार होतो.

सकाळीच तयार होऊन तिथल्याच  एका  हाॅटेलात नाष्टा करून आम्ही  एका बसने  समुद्राकडे जायला निघालो.

हवा थंड होती.पण तिकडच्या लोकांना सवय म्हणून बहुतेक लोक टी शर्ट आणि  बर्मुडा घातलेले होते.

काही वेळ बसमधून बाहेर पहात होतो. निसर्गसौंदर्याची  अनेक रूपं, बसच्या आत आणि बाहेर चकाचक स्वच्छता ,लोकांची सौजन्यपूर्ण वागणूक मी इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये  नेहमीचं आहे. त्यामुळे त्यात नवीन वाटत नव्हते. मी बसमध्ये पाहिलं.सगळीकडं स्तब्ध शांतता होती.अनेकजण आपापल्या मोबाईलमध्ये दंग होते तर काही डुलक्या घेत होते.

माझ्या पुढच्या सीटवर  एक जोडपं बसलं होतं. ते पाठमोरे होते. तरीही  त्यांच्या खांद्यावरचा भाग  स्पष्ट दिसत होता. दोघंही उंच होते. तरीही तिची शरीरयष्टी नाजूक होती. तिनं केसांचा बाॅबकट केला होता.

गडद निळ्या रंगाचा झिरझिरीत फ्राॅक तिनं घातला होता. ती राजकन्येसारखी आकर्षक दिसत होती.

कडेच्या खिडकीतून ती  बाहेर पहात होती. तिच्या मानाने तो खूप दणकट वाटत होता.दाट मिशा आणि डोक्यावरचे उभे राहिलेले केस यामुळे मला तो हिंदी सिनेमातल्या व्हिलनसारखा वाटत होता. थोड्या वेळात त्या व्हिलननं राजकन्येच्या खांद्यावर आपला हात टाकून तो तिला हसवायचा प्रयत्न करू लागला.ती शांत होती.

मनात विचार करू लागलो; सुंदर मुलींवर  जाळं टाकणं हा बलिष्ठांचा  जगभर चालू असणारा धंदा दिसतो.

त्याच्या प्रयत्नाला ती फशी  पडली वाटतं, कारण तिनंही  त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवली. मला तिची कीव आली तर त्याची चीड.

टिपीकल हिंदी सिनेमाची कथा मी मनात रंगवू लागलो. प्रवास कधी संपला ते कळलंच  नाही. एका मैदानात बसच्या ड्रायव्हरने बस उभी केली.आमचं डेस्टीनेशन आलं होतं. समोर प्रचंड मोठा जलसागर पसरला होता.त्यावर अजस्र पूल होते.बाहेर आलो. थंडी बोचत होती. मीही पत्नी आणि मुलीसोबत थंडीचे कपडे घालून सगळेजण जात होते तो अथांग समुद्र पहायला गेलो. 

सहज लक्ष गेले ते जोडपेही मला दिसले आणि धक्काच बसला.त्या सुंदर राजकन्येला उजवा हातच नव्हता. तिच्या बाॅबकटचे कारण  समजून आले. मी पहात होतो. त्याने आपल्या अंगावरचं जर्कीन काढून अलगद तिच्या अंगावर ठेवलं. पाण्याला जोर खूप होता  म्हणून  ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करून ठेवले होते.शिवाय अनेक सुरक्षारक्षकही लोकांना सूचना देत होते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून सगळी माहिती  देत होता.

काही वेळात एक छोटीशी बोट येऊन उभी राहिली. त्याला फेरी म्हणतात. लोखंडी जिन्यावरून फेरीवर  जायचं होतं. मी एका सीटवर बसून पहात होतो. तिला नीट चढता येत नव्हतं. तिला आधार देत त्याने तिला वर चढवलं. फेरीचा वेग वाढत होता. निसर्गाच्या आणि मानवी कर्तृत्वाच्या अनेक यशोगाथा आम्ही त्या स्फटिकशुभ्र जलाशयावर पहात होतो. फेरीवर जमलेली विविध रंगाची माणसं आनंदाने चेकाळली होती. मधूनच पाण्यात ती फेरी हिंदकळत होती. तेव्हा स्वतःला सावरण्याची कसरत करताना गमतीचे अनेक प्रकार घडून येत होते.

ती दोघं आमच्या जवळच्याच लाकडी बाकावर बसले होते.तिनं डाव्या हातानं फेरी पकडली होती,तरीही तिचा तोल जात होता.तो  तिला आधार देत उभा होता. 

फेरी शांत झाल्यावर त्याने आपली बॅग उघडून  कसला तरी बिस्कीटचा पुडा काढून एक बिस्किट तिच्या तोंडात दिलं. फेरी हिंदकळली, तशी तिच्या तोंडातून बिस्किट खाली पडलं. मग त्याने एका हातानं तिला सावरत दुसर्‍या हातानं नवीन बिस्किट काढून तिच्या तोंडात दिलं……. एखादी पक्षीण आपल्या  पिलाच्या चोचीत अन्न  भरवते तसा मला तो आता वाटू लागला आणि त्याच्याविषयीचा राग जाऊन ती जागा आदराने घेतली.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी झुंजता झुंजता…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

रणी झुंजता झुंजता…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

जिथे शहाणे पाय ठेवू धजत नाहीत तिथे मूर्ख जाण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं जात. १९४८ पासून हाच मूर्खपणा पाकिस्तान करत आलेलं होतं. आधीच्या तब्बल तीन युद्धांतले लाजीरवाणे पराभव आणि तमाम जागतिक राजकीय मंचावर झालेली छी:थू असा इतिहास असतानाही १९९९ मध्ये पाकिस्ताने पुन्हा भारतीय हद्दीत पाऊल टाकण्याचा मूर्खपणा केलाच. पण यावेळी त्यांनी चोरट्यांचा मार्ग अवलंबला आणि धूर्तपणे भारतीय लष्करी चौक्यांचा अवैध ताबा घेतला. अशी ठिकाणे ताब्यात घेतली की जेथून भारतीय हद्दीतील लष्करी मार्गांवर नियंत्रण मिळवता येईल आणि भारताला गुडघे टेकायला भाग पडेल. एका अर्थाने त्यांनी झोपलेल्या सिंहावरच जाळे टाकण्याचा प्रयत्न आरंभला होता. 

प्रचंड बर्फवर्षाव आणि इतर अनुषंगिक गोष्टींचा फायदा उचलत पाकिस्तान्यांनी टायगर हिल आणि लगतच्या सामरीकदृष्ट्या महत्त्वाच्या पर्वतशिखरांवर कब्जा केला होता. यात तोलोलिंग शिखराचाही समावेश होता. यावेळी त्यांची तयारी मोठी होती! काहीशा उशीराने का असेना पण  मोक्याच्या वेळी भारतीय सिंह जागा झाले….आणि त्यांनी आधी तोलोलिंग ताब्यात मिळवले. अर्थात यासाठीची किंमत रक्ताने मोजावी लागली. यापुढे रक्त,बलिदान हेच चलन राहणार होते या समरात…आणि शूर रक्ताची, धैर्यवान काळजांची कमतरता भारताकडे कधीच नव्हती आणि नसणार आहे! 

१७ हजार ४१० फुट उंची असलेले टायगर हिल ही अतिशय महत्वाची जागा होती. ती ताब्यात घेण्याआधी त्याच्या जवळची दोन ठिकाणे ‘इंडीया गेट’ आणि ‘हेल्मेट’ ही दोन शिखरे ताब्यात घेणे गरजेचे होते. यासाठी सैनिकांच्या अनेक तुकड्या मैदानात उतरवल्या गेल्या होत्या. ८,सीख बटालियन याच कामावर नेमली गेली होती. या बहादुरांनी या पर्वतशिखरांच्या जवळपास पोहोचून टायगर हिलवर तोफांचा भडीमार करण्यासाठी अगदी मोक्याची जागा हेरून तशी तयारी पूर्ण केली होती. सर्व बाजूंनी एकदम निकराचा हल्ला चढवूनच विजय मिळू शकणार होता. खालून वर चढणारे सैनिक पाकिस्तान्यांच्या गोळीबाराच्या,तोफांच्या अगदी अचूक निशाण्यावर येत होते. सत्तर ऐंशी अंश कोनांच्या टेकड्या उभ्या चढून जाणं एरव्हीही कठीण..त्यात आता तर वरून अक्षरश: आग ओकली जात असताना असे साहस करणे फक्त वीरांनाच शक्य होते…आणि असे वीर आपल्याकडे होते! 

वरिष्ठ सेनाधिकारी सामरिक डावपेच आखत होते…कुठे यश तर कुठे मृत्यूचा सामना होत होता. सैन्याच्या विविध तुकड्यांना विशिष्ट कामे सोपवली गेली होती…मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक धारातीर्थी पडत होते. लीव नो मॅन बहाईंड…अर्थात कुणाही साथीदाराला मागे सोडून यायचं नाही हे सेनेचं ब्रीद. या ब्रीदाला प्रसंगी प्राणांची आहुतीही देऊन जागलं जातं.  आपल्या साथीदारांचे रक्ताने माखलेले देह उचलून ते मागे आणण्याची जबाबदारी सुबेदार निर्मल सिंग आणि त्यांच्या सहका-यांना दिली गेली. त्यांचे गणवेश रक्ताने माखले…त्यांच्या दाढीचे केसही रक्ताने लालेलाल झाले होते. 

सदैव दाढी राखणे हा तर गुरूंचा आदेश सीख पुरूषांसाठी. कर्तव्यात अडसर ठरू नये म्हणून सीख सैनिक आपली दाढी एका विशिष्ट कापडी पट्टीने बांधून ठेवतात..त्याला ठाठा असं म्हणतात! सुबेदार निर्मलसिंगांचा आपल्या दाढीला लागलेलं रक्त पाहून पारा चढला…त्यांनी प्रतिज्ञा केली….माझ्या साथीदारांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याशिवाय मी ठाठा बांधणार नाही…मी दाढी मोकळी ठेवीन….आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांनीच तशी प्रतिज्ञा घेतली…आणि आसमंतात शीखांची युद्धगर्जना घुमू लागली….जो बोले सो निहाल…सत श्री अकाल ! 

.. ‘हम चलते है जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं…’ कवीने किती समपर्क शब्दांत लिहिलं आहे….गुहांमध्ये,कातळांआड लपून बसलेल्या पाकिस्तान्यांची काळजं शीखांच्या या आरोळ्यांनी हादरून गेली! 

यावेळी त्यांच्या समवेत एक विशी-बावीशीचे तरूण लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी होते….लेफ्टनंट कणद भट्टाचार्य. ते नुकतेच ८ शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. बंगालचा हा वाघ. कराटेमधील ब्लॅक बेल्ट धारक. घराण्यातील पहिलाच सैनिक होण्याचा मान मिळवणारा देखणा गडी. सैन्यात भरती झाल्यानंतर लगेचच युद्धात सहभागी होण्याचे भाग्य लाभलेला अधिकारी. कणद साहेबांच्या बटालियनचे कमांडर कर्नल जयदेव राठोड गोळीबारात जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी मागे न्यावे लागणार होते…पण मग मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला. लेफ्टनंट दर्जाच्या अधिका-याला सशस्त्र संघर्ष सुरू असताना प्लाटूनचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देता येत नाही, असा नियम असल्याने राठोड साहेबांनी चक्क युद्धाच्या मैदानातच कणद साहेबांना कॅप्टन पदी बढती दिली…..असं बहुदा प्रथमच घडले असावे. पण युद्ध जारी राहिले पाहिजे…थांबायला वेळ नाही ! 

मोजके सैनिक हाताशी. प्रचंड बर्फवर्षाव. अंगावर येणारे कडे आणि वरून सातत्याने होणारा गोळीबार,तोफगोळ्यांचा अचूक वर्षाव. यातूनही वर जायचे होते…शत्रूला वर पाठवायला. आता खाली बोफोर्स तोफा तैनात होत्या. खालून वर चढणा-या सैनिकांना कव्हरींग फायर देता यावा म्हणून त्या वरच्या पाकिस्तानी चौक्यांवर आगफेक करीत होत्या. कणद साहेबांनी आपल्या तुकडीची दोन भाग केले आणि दोन्ही बाजूंनी चढाईला आरंभ झाला. भारतीय सैन्य या बाजूने असे अचानक येईल असे पाकिस्तान्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. आपले लोक पाकिस्तान्यांच्या अगदी जवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांनी वरून तिखट मारा आरंभला. तशाही स्थितीत कणद साहेब आणि एका बाजूने सुबेदार निर्मलसिंग आणि इतर सर्व जवान वर चढाई करीत राहिले. अतिशय निमुळती,घसरडी जागा. शत्रू आरामात निशाणा साधतोय….एवढ्यात वर असलेल्या शत्रूचा निर्मल सिंगांना सुगावा लागला…जीवाची पर्वा न करता ते वर त्वेषाने चढून गेले…शत्रूला संधीही न देता त्यांना दोन जणांना यमसदनी धाडले. खड्ड्यांत लपून राहिलेल्या एका एका शत्रूचा शोध घेत त्यांनी अनेकजण अचूक टिपले. एका क्षणी तर प्रत्यक्ष हातघाईची लढाई झाली….शत्रू मारला जात होता ! अंधार दाटून आला होता. अन्नपाणी घेण्याचीही सवड नव्हती आणि ते फारसे शिल्लकही राहिलेले नव्हते. जखमी अधिका-यांना, साथीदारांना मागे सोडून पाकिस्तानी घुसखोर पळून जात होते. मृतांच्या खिशांत सापडलेल्या ओळखपत्रांवरून शत्रू कुणी मुजाहिदीन घुसघोर नव्हते तर पाकिस्तानच्या नियमित लष्करातील लोक या छुप्या हल्ल्यात सामील होते, हे सिद्ध होत होते.  

पण वरून होणारा गोळीबार सावज टिपत राहिला….आपले थोडेथोडके नव्हेत तर तब्बल तीस सैनिक जवान शहीद झाले होते….पण मोहिम फत्ते होत आली होती….इंडीया गेट आणि हेल्मेट शिखरे ताब्यात येणे म्हणजे टायगर हिल पादाक्रांत करणे अशक्य नाही ! ही शिखरे ताब्यात घेणे एकवेळ सोपे पण ती राखणे ही फार मोठी गोष्ट. सारागढी ची याद यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने अगदी कसोशीने ही शिखरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली होती. कारण टायगर हिल ताब्यात ठेवायची म्हणजे त्यासभोवतीची महत्त्वाची शिखरेही ताब्यात असायलाच पाहिजेत. सवयीप्रमाणे पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ल्यांमागून हल्ले चढवायला सुरूवात केली. पण कणद साहेब आणि निर्मल सिंग साहेब आणि इतर बहाद्दरांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही….शेवटची गोळी आणि शेवटचा श्वास शिल्लक असेतोवर हे शक्यही नव्हते….गड्यांनी गड राखले होते ! यात अनेक सिंह कामी आले !  या सिंगांच्या अर्थात सिंहांच्या दाढ्या अजूनही मोकळ्याच होत्या..आताही त्या रक्तातळलेल्या होत्या…यावेळी त्यांच्या स्वत:च्या शरीरातून वहात असणा-या रक्ताने. 

गुरू गोविंदसिंग साहेबांनी सांगून ठेवलं आहे…

हे ईश्वरा, मला असा वर द्या की,

शुभ काम करताना माझी पावले मागे सरू नयेत.  

युद्धात उतरलो तर माझ्या मनात शत्रूची भीती नको 

आणि मीच ते युद्ध जिंकावे. 

तुमचे गुणगान गाण्यात माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता असो 

जब आव की अउध निदान बनै अति ही रन मै तब जूझ मरों ॥

आणि जीवनाचा अंत रणभूमीमध्येच होवो….झुंजता झुंजता मृत्यू येवो! 

लेफ्टनंट कणद भट्टाचार्य(सेना मेडल),सुबेदार निर्मलसिंग (वीर चक्र) सुबेदार जोगिंदर सिंग (सेना मेडल), नायब सुबेदर कर्नेल सिंग (वीर चक्र), नायब सुबेदार रवैल सिंग (सेना मेडल) आणि इतर ३० जवान या मोहिमेत कामी आले. सर्वांचा नामोल्लेख इथे शक्य नाही. येत्या काही महिन्यांत कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव येतो आहे….वीरांचे स्मरण अत्यावशयक म्हणून हा प्रयत्न. – – जयहिंद !!! 

(यात अनुराधाताई प्रभुदेसाईंनी त्यांच्या लक्ष्य फाऊंडेशनसाठी घेतलेल्या कर्नल जयदेव सिंग राठोड साहेबांच्या मुलाखतीतील माहितीचाही समावेश आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे.घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात.तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना ? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक,उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातिथ्य असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर

आपल्या मेंदूमधे 1000 कोटी न्यूराॅन्स असतात.

आणि हे न्यूरल नेटवर्क खूप प्रभावी असते.

जर आपण या नेटवर्कला चांगला इनपुट दिला

तर नक्कीच चांगले आउटपुट मिळेल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधे सुद्धा कृत्रिम न्यूराॅन नेटवर्क बनविले ते.

आणि मग पाहिजे ते इनपुट देऊन नेटवर्क ऑपरेट करतात.

 

धीरूभाई अंबानीजी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, माझ्यापुढे खूप आव्हाने उभी होती. अडचणींचे डोंगर मार्गात आडवे होते.अपयशाचे अनेक फटके बसले. पण मी अडचणींकडे  शिकण्याची संधी म्हणून बघितले. मनाला असे प्रोग्राम केले की प्रत्येक अडथळा मला नवीन दिशा दाखवत गेला.

जेव्हा आपण मोठी स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लहान गोष्टींमधे घुटमळू नये. संत ज्ञानेश्वर एक दाखला देतात.

सांगे कुमुद दळाचिने ताटेl

जो जेविला चंद्रकिरणे चोखटेl

तो चकोरू काय वाळुवंटी l

चुंबितु असे।

जो चकोर चन्द्रकिरण चाखतो तो कशाला वाळूचे कण चाखेल?

मनाला असे प्रोग्राम करायचे की क्षुल्लक गोष्टींकडे लेट गो करता आले पाहिजे.

कुठलीही कृती करताना आपली सत् सद विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. कारण कधी कधी भावनेच्या भरात किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात पण मग अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते.

उदा. महान सायन्टीस्ट ओपनहायमर यांनी अमेरिकेसाठी  ऑटमब्माॅम्ब बनवला.जेव्हा मेक्सिकोच्या डेझर्टमधे त्याचे टेस्टिंग झाले तेव्हा ते इतके आनंदात होते. “गाॅड इज अब्सेंट” असे ते म्हणाले. परंतु नंतर मरेपर्यंत त्यांना गिल्ट फिलींग राहिले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मात्र ऑटमबाॅम्ब बनवायला नकार दिला.

मनात कुठल्या गोष्टी साठवायच्या व कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या याचेही प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. आपले मन वाईड लेन्स कॅमेरा सारखे असते. प्रत्येक पिक्चर क्लिक करत जाते. शिवाय मनाची स्टोरेज कपॅसिटीही प्रचंड असते. परंतु मनाला त्रास देणा-या गोष्टी, मत्सर, असुया, राग, द्वेष ताबडतोब डिलीट करता आल्या पाहिजेत.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’

… शाळेत असताना दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताबरोबर या प्रतिज्ञेने होत असे. कित्ती भारी वाटायचं. प्रतिज्ञा खणखणीत आवाजात म्हणायला मला खूप आवडायचं. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी शाळेत प्रतिज्ञा झाली नाही. हल्लीच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं तरी पुष्कळ आहे अशी परिस्थिती आहे. ते असो… 

… प्रतिज्ञा म्हटल्यावर, म्हणताना आपण जे म्हणतोय तसं वागलं पाहिजे हे आपोआप मनात रुजत गेलंच. पण त्याच पुस्तकात हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं वाचलं की प्रश्न पडायचा, हजारो वर्षांपूर्वी निघणाऱ्या सोन्याच्या धुराचं कवतिक मला आज का सांगितलं जातंय? अर्थात हा प्रश्न मी कधी कुणाला विचारला नाही, कुणी त्याचं आपणहून उत्तर दिलं नाही. 

मी शहरात जन्माला आले, शहरात वाढले. आपला देश कृषिप्रधान आहे या वाक्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्ष जावी लागली. शाळेच्या पुस्तकांनी मला काय दिलं माहित नाही पण शाळेने कळत नकळत माझ्यात ‘सेक्लुअर’ जगणं रुजवलं. त्यामुळे इतकी वर्ष मला माझा देश म्हणजे आजूबाजूचा समाज आवडायचा. त्यात त्रुटी होत्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या दिसायच्या, त्यांच्याशी दोन हात करावे लागायचे, पण तरीही राग यायचा नाही. कारण कितीही बुरसटलेला, कर्मठ असला तरी तो रक्त पिपासूं नव्हता. दुसऱ्याचं उघड उघड वाईट चिंतणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं भलं होणार आहे असं मानणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात गैर काहीच नाहीये, उलट ते मर्दुमकीचं लक्षण आहे असं म्हणणारा आणि मानणारा नव्हता. तो दंगेखोर असेलही, क्वचित प्रसंगी असहिष्णू होतही असेल पण त्वरेने सावरणारा आणि आपल्या चुकांचं उघड समर्थन करत त्या चुकांचा पायंडा पडावा यासाठी धडपडणारा नव्हता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता. 

सातवी-आठवी पासून मी एकटीने प्रवास करते आहे. एकटीने प्रवास करताना ना मला तेव्हा भीती वाटली ना माझ्या पालकांना. शाळेत असल्यापासून कॉलनीतल्या मित्रांबरोबर भटकत होते, कधी कुणी मुलगी असून मुलांबरोबर खेळते म्हणून टोकलं असेल पण तितकंच..त्याचा न्यूसन्स कधी झाला नाही. की कुणी गॉसिप करण्याच्या भानगडीत पडलं नाही. 

आज हे सगळं आठवण्याचं आणि लिहिण्याचं कारण, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आजूबाजूचा समाज मला अवस्थ करतोय. त्याचं वेळोवेळी खालावत चाललेलं रूप मला आतून पिळवटून काढतंय. 

त्रास होतोय कारण तो रक्तपिपासू बनला आहे. सतत काहीतरी ओरबाडून घेण्याच्या वृत्तीचा बनला आहे. हपापेलेला वाटायला लागला आहे. सतत काहीतरी हवंय, अशी भूक जी कधीच शमणारी नाहीये.. माणसं शांत नाहीत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. साधं सिग्नलवर कुणी कुणाच्या पुढे गेलं तर माणसं एकमेकांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत असतात. रस्त्यावर माणसे कावलेली आहेत. त्यांना कायम कसला तरी राग आलेला असतो. आणि तो राग आजूबाजूच्या सगळ्या सहप्रवाशांवर सतत काढला जातो. माणसे कधी नाहीत इतकी जाती आणि धर्माच्या नावाने वेडीपिशी झाली आहेत. अचानक अस्मितांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. 

असंख्य जाती आणि विविध धर्म-भाषा यांनी बनलेल्या आपल्या देशाची माती सहिष्णू बनली आहे कारण त्याशिवाय या मातीत गुण्या गोविंदाने कुणालाच जगता येऊ शकणार नाही. सतत माझी जाती-धर्म-भाषा श्रेष्ठ म्हणत दुसऱ्याच्या जीवावर उठायचं ठरवलं तर उद्या इथे रक्ताच्या पाटापलीकडे काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून पिढयानुपिढ्यांच्या मशागतीनंतर सहिष्णू जगणं तयार झालंय. जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण भिन्न असलो तरीही आनंदाने एकत्र राहू शकतो यात असणारी विलक्षण ताकद, सामर्थ विसरून माणसं कप्पाबंद आयुष्य जगू बघतायेत. माणसाला एखाद्या छोट्या चौकोनी खोलीत बंद करून टाकलं आणि तिथं ऊन, वारा, नवा चेहरा यातलं काहीही येणार नाही, दिसणार नाही याची काळजी घेतली, त्या खोलीत कोंडलेल्या माणसाला कुणाशीही बोलता येणार नाही याची काळजी घेतली तर त्या माणसाचं काय होईल, तसं काहीसं आता आपल्या समाजाचं झालं आहे असं अनेकदा वाटतं. सगळं कोंडलेलं. कोंदट. कुबट. 

मी शाळेत होते तेव्हा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या जाती धर्माचे आहेत याकडे माझ्या पालकांचं लक्ष नसायचं. रादर कुणाच्याच पालकांचं नसायचं. तो महत्वाचा मुद्दा नव्हता. पण आज आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांनी कुणाशी मैत्री करायची, याचे निर्णयही पालक घेऊ लागले आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीचा भारत मोठा ग्राहक आहे यातच आपली विकृत सामाजिक मनोवृत्ती दिसते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून स्वतःच्या गर्भार मुलीला जाळणारे वडील हा आपल्या समाजाचा कर्तृत्ववान चेहरा आहे. आणि अशा बापाचं समर्थन करणारे हे समाजाचं भीषण वास्तव. माणासांना मारणे गैर आहे, चूक आहे ही  जाणीव नसलेला आणि आदीम भावनांना खतपाणी घालून त्याच कशा योग्य आहे हे ठसवायला निघालेला आपला समाज बनला आहे. 

हे अचानक बनलेलं नाही..हळूहळू रुजत आता प्रस्थापित होऊ बघतंय. 

रोजच्या जगण्याच्या धबडग्यात माणसांच्या मनातला कोलाहल आता उघड उघड अंगावर येतो आहे. शहरं बकाल झाली आहेत. माणसं नुसतीच धावत आहेत. गावांच्या समस्या आहेत तशा आहेत. शेतकरी अस्वस्थ आहेत. बेकारी वाढली आहे. कर्मठपणा वाढतो आहे. माणूस असुरक्षित झाला की तो त्याचं जगणं जाती-धर्मात शोधायला सुरुवात करतो. आपण असुरक्षित मनाच्या माणसांचा देश बनलोय का? अशा रक्तासाठी चटावलेल्या देशात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाढवणार का? त्यांना आपण कसा आणि कसला समाज देऊ करतोय याचा थोडा तरी विचार आपण करणार की नाही?

सरकारं येतात जातात. राजकारणाच्या गणितात आपण सामान्य माणसांनी, जो हे देश खऱ्या अर्थाने चालवतात त्यांनी किती वाहवत जायचं, किती अडकून पडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कुठलं सरकार येतं याहीपेक्षा आपल्या समाजाची रक्तपिपासू वृत्ती बदलणं जास्त गरजेचं आहे. सतत रक्ताची तहान लागल्यासारखा दिसतो आपला देश !

… खरंच इतकं रक्तपिपासू बनण्याची गरज आहे का आपल्याला?ज्या देशाने जगाला अहिंसा शिकवली त्या देशाला कधीही न शमणारी रक्ताची तहान लागावी? 

मातीतल्या सहिष्णुतेची बाधा सगळ्यांना पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे. 

आपण एकमेकांच्या रक्ताला चटावलेला समाज नाहीयोत. हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगण्याची गरज आहे. 

हा देश ग्रेट होता की नाही माहित नाही, पण तो ग्रेट व्हावा यासाठी जात-धर्म-पंथ-भाषा-लिंग भेदाच्या पलीकडे भारतीय म्हणून विचार करायला हवाय. नाहीतर पुढल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. 

लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शौर्य मरण…’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शौर्य मरण’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित

महापराक्रमी  पृथ्वीराज चौहान सुलतानाविरुद्ध लढा देऊन,  विजयश्रीची माळ लेऊन परतले होते.

समोर पराजित झालेला सुलतान खाली मान घालून उभा होता. पृथ्वीराज महाराजांनी मोठा लढा देऊन विजयश्री मिळवली होती तरीही, पृथ्वीराज चौहानाचे पाय जमिनीवरच होते. अभयदान देणारा दाता नेहमी श्रेष्ठच असतो नाही कां? आणि त्या श्रेष्ठत्वाला स्मरून त्यांनी सुलतानाला अभय देऊन  बंधमुक्त केलं  होतं. 

पुढे अशा घनघोर लढाईची पुनरावृत्ती दोन वेळा झाली. विशाल अंतःकरणाच्या चौहानांनी सुलतानाला तीन वेळा अभय दिलं. पण सूडाच्या भावनेने, अहंकाराने पेटलेल्या सुलतानाने, त्या सैतानाने, आपल्या उपकार कर्त्यावरच चाल करून त्याचा पराभव केला. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो ना !  तसंच  झालं. सुलतानाने,घनघोर प्रबळ सैन्याच्या बळावर चौहानांचा पराभव केला. आणि तो महापराक्रमी नरसिंह पृथ्वीराज चौहान शत्रूच्या जाळ्यात अडकून जायबंदी झाला.

पिसाळलेला सुलतान शब्दांचे आसूड फटकारून विचारत होता,  “बोल चौहान क्या सजा   चाहिये  तुझे ? अब तो तुम हमारे कब्जेमे हो l और हमारे कैदी बन गये हो l  अब तुम्हारे लिये एकही सजा काफी है l हमारा इस्लाम धर्म स्वीकार करो …l बस यही एकही रास्ता है तुम्हारे लिये l “  

संतापाने लालबुंद झालेला तो नरकेसरी त्वेषाने म्हणाला, ” हमे सजा देनेवाले तुम कौन हो सुलतान? हमारी जान जायेगी लेकिन जबान नहीं जायेगी l हम जानकी कुर्बानी करेंगे लेकिन अपना धर्म कभी नही छोडेंगे ! “ डोळ्यातून अंगार ओकत दुभाषाला चौहान म्हणाले  ” सांग तुझ्या पाखंडी सुलतानाला, शरणागताला अभय देणाऱ्या धर्माची आमची जात आहे. तर कपट नीतीने उपकारकर्त्यावरच उलटणारी  तुझी सापाची जात आहे. अभय देऊन विषारी सापाला दूध पाजण्याची चूक झालीय आमच्याकडून.  प्राण  गेला तरी चालेल. पण इस्लाम धर्म आम्ही कधीही स्विकारणार नाही. आमच्या धर्माशी शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठच राहू.”  

चौहानांच्या डोळ्यातील अंगार बघून सुलतान आणखीनच चवताळला. त्या क्रूरकर्माने त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा फर्मावली  आणि तो पराक्रमी निरपराधी धर्मनिष्ठ पुरुष पृथ्वीराज चौहान पुरता  जायबंदी झाला. अनेक प्रकारे त्याचा छळ झाला, पण  निश्चयापासून  तो शूरवीर  जराही ढळला नाही . त्यांनी आपला धर्म सोडला नाही . त्यांच्या एकनिष्ठतेची आणि त्यांच्यावर चाललेल्या अन्वनित अत्याचाराची  बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या राज्यात सगळीकडे पसरली. चौहानांची प्रजा कासाविस झाली. स्वामीनिष्ठ सेवक बैचेन झाले .आणि मग त्यांच्यातलाच एक सेवक मनाशी मनसुबा रचून सुलतानासमोर हाजिर झाला. आणि म्हणाला …” आपको  सादर प्रणाम सुलतानजी l एक शेवटची संधी आम्हाला द्या. आमचे महाराज आवाजाच्या दिशेने निशाणा साधण्यात तरबेज आहेत . तुम्ही एकदा परीक्षा तर पहा ..  त्यांचा नेम चुकला तर मग खुशाल त्त्यांच्यावर तलवार चालवा .” 

सुलतान छद्मीपणे हसून म्हणाला, ” पागल हो गये क्या? वो अंधा क्या तिरंदाजी करेगा ? उसकी आखोंकी  रोशनी तो गायब हो गयी है l  मनावर कमालीचा ताबा ठेवत, सेवक शांतपणे म्हणाला, ” एक..  सिर्फ एक बार पहचान कर लो सुलतानजी” l अशी विनंती केल्यावर अखेर उत्सुकतेपोटी सुलतान तयार झाला .

मैदानात मोठे लोखंडी गोळे ठेवले गेले.आपल्या प्रजेसह, सैन्यासह,सुलतान तिथे विराजमान झाला. एक अंधा आदमी निशानेबाजी क्या करेगा ? हा  कुचकट भाव मनात होताच.  लोखंडी गोळे एकमेकांवर आदळले. ध्वनी झाला आणि बरोब्बर त्याच दिशेने पृथ्वीराजानी निशाणा साधला.. हे कसं शक्य आहे? सुलतान ठहाका मारून हसून म्हणाला  ” इसमे कुछ गोलमाल है” .. 

सेवकाने अदबीने उत्तर  दिले ” सुलतानजी आणखी एकदा परीक्षा पहायची असेल तर अवश्य बघा. पण त्याआधी तुम्ही स्वतः नेमबाजी करण्याची महाराजांना आज्ञा द्या, कारण आमचे महाराज तुमचे कैदी आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय ते बाण सोडूच शकत नाहीत.” या स्तुतीने सुलतान खुलला . त्याने विचार केला,  चौहान महापराक्रमी, युद्धकलानिपूण होगा तो क्या ! ये शेरका बच्चा पृथ्वीराज चौहान  अभी अपनेही कब्जे मे हैं ” …  आणि याचाच सुलतानाला गर्व झाला होता . मिशीवरून हात फिरवत सेवकाची विनंती त्यांनी मान्य केली. सेवक धावतच आपल्या स्वामींजवळ गेला. सुलतानाने विनंती मान्य केल्याची, सूचना, त्याला स्वामींपर्यंत पोहोचवायची घाई झाली होती .तो स्वामींजवळ पोहोचला. आपल्या स्वकीय भाषेतील कवितेच्या रूपाने, सुलतानाच्या आणि महाराजांच्या मधल्या अंतराचे मोजमाप, त्यानी आपल्या स्वामींना कवितेद्वारे सूचित केलं . जड साखळदंडांनी वेढलेला , दृष्टिहीन असा तो ‘ नरकेसऱी ‘  आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सज्ज झाला.

गडगडाटी हसून टाळ्या पिटत सुलतान छद्मीपणे म्हणाला .. ” चौहान.. अबे अंधे,कर ले नेमबाजी और दिखा दे अपनी होशियारी !”

आणि काय सांगावं मंडळी.. अहो  ! आवाजाच्या दिशेने बाण सूं    सूं   करीत सुसाट सुटला .आणि–आणि –सुलतानाच्या छातीत घुसला .कपट कारस्थानी सुलतान क्षणार्धात, खाली कोसळला. त्याच्या पापाचा घडा भरला होता. मैदान माणसांनी गच्च भरलं होतं. सुरक्षा दलाला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. हजारो लोकांच्या साक्षीने, सुसज्ज सैन्याच्या देखत, संरक्षक नजरेचं पात लवण्याच्या आतच पृथ्वीराजांच्या बाणाने शत्रूला यमसदनास  पोहोचवलं होत.   “दगा-दगा “असं ओरडतच सैन्य चौहानांच्या दिशेने धावले. आता खरी परीक्षा होती ती राजांच्या स्वामीनिष्ठ सेवकाची,

विजेच्या चपळाईने त्यानें राजांच्या छातीत पहिल्यांदा  खंजिर खुपसला  . लगेच तोच खंजिर   स्वतःच्या छातीत घुसवला . आणि- त्या दोघांना त्याक्षणीच  शौर्य मरण आलं. शत्रूच्या हाती पडून स्वामींची विटंबना होण्यापेक्षा त्या स्वामीनिष्ठ सेवकाने स्वामींबरोबरच स्वतःलाही खंजिर खूपसून ,मरणाला आपणहून कवटाळून संपवलं .आणि ते दोघे स्वामी, सेवक ‘ ‘  ‘नरवीरकेसरी ‘  अजरामर झाले.  

धन्य तो धर्मासाठी ,स्वामींसाठी प्राणांची आहुती देणारा कर्तव्यतत्पर सेवक आणि धन्य धन्य! ते पृथ्वीराज  चौहान .. .अशा शौर्य मरण पत्करणार्‍या त्या पराक्रमी ‘ नरकेसरींना ‘  माझा.  मानाचा मुजरा,– मानाचा मुजरा .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

महाराणी अहिल्याबाई होळकर

पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले ‘हीट अँड रन’ प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या…!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली…!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला…, जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता…आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला…त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते… पैशाने कायद्याला…माणुसकीला विकत घेऊ पहात होते…!  

या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे…! 31 मे…राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती…!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे…!

हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता…. असं मात्र वाटत रहातं…! 

“राजमाता अहिल्यादेवी होळकर…!”एक आदर्श व्यक्तिमत्व …! दानशूर…कुशल प्रशासक … वीरांगना…अतिशय न्यायप्रिय… दूरदृष्टी असलेल्या… पुरोगामी विचाराच्या… शिवभक्त…आणि… प्रजाहितदक्ष…पुण्यश्लोक…  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग…

अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते… वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते…!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात…! जवळच त्या वासराची आई… म्हणजेच गाय उभी असते…! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते… अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते…! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो… त्यांना हे दृश्य दिसते… आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे…!  त्यांना अतिशय वाईट वाटते… चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे…! त्या  अतिशय संतापतात…! आणि अतिशय रागात घरी येतात…आपल्या सुनेला विचारतात….”जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं … आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली….तर काय न्याय द्यायला हवा…?”

सून  म्हणते…,”  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले …त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा…!”

अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलवून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात…! तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले…त्याच पध्द्तीने…!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते…! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा…त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही…! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात…! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो… त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो…!    

शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात … त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात…! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते…! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते…! कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते… ! जणू ती सांगते की…’ हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे… एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये …आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये …! ‘ 

ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात…!  अहिल्यादेवींची समजूत काढतात…! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात…!

ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात…! प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘आई ‘असते…! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही…! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता…! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील…? मन किती खंबीर करावं लागलं असेल…!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे …!

आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे…पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी…! आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे…  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने…!

हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली …आणि हेच कदाचित समाज-प्रबोधनही असेल…!

लेखिका : डॉ सुनिता दोशी

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

हितगूज एकटीशी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

निवांत क्षण मला खूप आवडतात.स्वतःशी स्वतःचे हितगुज करायला.

कुठलीच साथसोबत न घेता कधी एकट्यानं कुठं भटकायला गेला आहात ? नाही ना.. तर मग रोजच्या या धावपळीत कधीच न जमलेलं स्वतःकडं पाहणं इथं सहज जमून जाईल..

स्वतःचीच सोबत करत एकटं…!

एकटीनं भटकणं मला नेहमीच आवडतं. मुळात ही स्वतः स्वतःला दिलेली वेळ असते. तिथं तुम्हाला फक्त तुमच्या विचारांसाठी वेळ देता येतो.. स्वतःच परीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं ते अशावेळी आवडून जातं.

आपण कुठलाही मुखवटा न चढवता मुक्त असतो. मला यात वेगळंच समाधान मिळतं…

मनसोक्त उनाड दिवस..!

मगाशी म्हटल्याप्रमाणेच मला एकटीला भटकायला जाणं जाम आवडतं. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, त्याच-त्याच माणसांमधून निवांतपणा हवा असतो ना तेव्हा मी हमखास बाहेर पडते.. मी मित्र- मैत्रीणी बरोबरही खूप भटकते तेव्हा मजा येतेच पण एकट्यानं भटकण्याचीही मजा काही औरच आहे…!

निसर्गाशी संवाद साधण्यासाठी एकटीनच बाहेर पडावंस वाटतं.. निसर्ग हा हक्काचा दोस्त कारण तो बोलत काहीच नाही फक्त ऐकत राहतो.. एकटं भटकण्यातलं सुख हा उपदव्याप केल्यावरच कळतं. एकट्या रानवाटांवर स्वतःची सोबत अनुभवणं, स्वतःला वेळ देणं अवचित जमून जातं…निसर्गाशी हितगुज करण्यासाठी…

एकांतामध्ये निसर्गाशी हितगुज करायला मिळतं.. निसर्ग माझ्याशी बोलतोय असंच वाटतं. शांतपणे विचार करायला मिळतो. एक प्रकारची प्रसन्नता मिळते… मी स्वतःला आजमावते…यातून स्वतःला चांगल्या-वाईट अनुभवातून ही आजमावता येतं बरं…

निर्णय घेता येतात..

     मनाशीच मी बोलते

   साठवणीचे बोल माझे

  गुज माझे स्वतःशी खोलते

माझी सगळं काही एकटीनं करायची इच्छा असते…

मला एकटीनं भटकण्याची कधी भीती वाटत नाही आणि वाटलीही नाही पण मला असं भटकणं खास करुन याच्यासाठी आवडतं की त्यामुळं स्वतःशी संवाद साधणं जमून जातं. अनेकदा स्वतःला वेळ देणं जमतच नाही. अशावेळी एकटं भटकायला जाणं मन शांत करणारं ठरतं. मनाच्या शांततेसह मला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते.. निसर्ग तर तुमची प्रत्येक पावलापावलावर सोबत करत असतो. असे अनेक अनमोल क्षण निसर्गानं या भटकंतीत मला दिले आणि नंतर आलेल्या अनुभवातून समृद्ध झाल्याचं समाधान ही मिळालं…

अचिव्हमेंटनं मन भरून आले.. येतं… आयुष्यात आणखी काय हवं नाही ?

      माझ्यात मी गुंतले

   ध्येय माझे माझ्या परीचे

    अंतरीच मी जागविले

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करताक्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या.त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला.

घरी येताना मन सहज विचार करू लागले की 50 एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला !

पर्यावरण म्हणजे काय? ही  सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, मातीआणि जमीन या सर्वांचे संतुलन! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार!

आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे!

हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे  तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली !

माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर

जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले ,ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे..

5 जून 1973 साली अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची  आपण काळजी करतो हे दिसून येईल!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सखी मंद झाल्या तारका… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सखी मंद झाल्या तारका… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

नुकताच आलेला ‘स्वरगंधर्व’ पाहिला.. आणि बाबुजींचा एक जुना किस्सा आठवला. वरळीच्या ‘रेडीओवाणी’ या स्टुडिओत काही गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. एक गाणं झालं.. मध्ये थोडा वेळ होता, म्हणुन बाबुजी चहा घेण्यासाठी खाली आले.ते एक छोटं रेस्टॉरंट होतं.

‘एक कप चहा.. एक रुपया ‘ असा बोर्ड होता. चहा आला..तो पूर्ण कपभर नव्हता.. थोडा कमी होता. बाबुजींनी वाद घालायचा सुरुवात केली. प्रश्न पैशाचा नव्हता.. तत्वाचा होता..वाद वाढला,पण तेवढ्यात रेस्टॉरंटचा मालक आला. त्याने बाबुजींना ओळखले.. पूर्ण कप भरुन चहा दिला.. इतकंच नाही तर लोणी लावलेली एक स्लाईसही दिली.. बाबुजी खुश झाले..नंतरचं रेकॉर्डिंग पण झकास झालं.

ते गाणं होतं….. ‘ सखी मंद झाल्या तारका.’ 

या गाण्याच्या खुप आठवणी आहेत. श्रीधर फडके एअर इंडियामध्ये अधिकारी होते. एअर इंडियाचं एक गेस्ट हाऊस होतं.. लोणावळ्याला. तेथे अधुनमधून तो पिकनिक ॲरेंज करायचा. अशीच एक पिकनिक ठरली. सुधीर फडके..राम फाटक.. सुधीर मोघे..श्रीकांत पारगावकर..उत्तरा केळकर अशी बरीच मंडळी होती. बाबुजींनी ठरवलं.. त्यांच्या काही गाण्यांच्या तालमी तेथेच करायच्या. लोणावळ्याच्या रमणीय परिसरात.. तरुण मंडळींच्या सहवासात तालमी छान रंगतील याची सर्वांना खात्री होती.

तर ‘सखी मंद झाल्या तारका ‘या गाण्याची तालीम सुरू झाली. गाण्याचे संगीतकार होते राम फाटक. त्यांचा आणि बाबुजींचा वाद सुरु झाला.

… ‘सखी मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का..यानंतर पुन्हा एकदा’..येशील का’ असा एक खटका आहे.तो बाबुजींना मान्य नव्हता. राम फाटक म्हणाले..त्या खटक्यामधेच खरी गंमत आहे.पण बाबुजी ऐकायला तयार नव्हते.

शेवटी राम फाटक म्हणाले…. “या गाण्याचा संगीतकार मी आहे “

त्यावर बाबुजी म्हणाले…. “मग मी हे गाणं गाणार नाही असं म्हटलं तर?”

राम फाटक म्हणाले…. “हा तुमच्या मर्जीचा भाग आहे.  ‌म्हणणार नसाल तर आत्ताच सांगा, म्हणजे मला दुसरा आवाज शोधायला सोईचं होईल.”

बाबुजींनी वाद थांबवला. खेळीमेळीच्या वातावरणात रेकॉर्डिंग पार पडलं..गाणंही पुढे खुप गाजलं.

मुळात हे गाणं जन्माला आलं कसं?तो ही एक किस्सा आहे.

१९६७-६८ मधली गोष्ट.राम फाटक नुकतेच पुणे आकाशवाणीवर रुजु झाले होते.त्यांनी एक कार्यक्रम बसवला..’स्वरचित्र’ हे त्याचं नाव.दर महीन्याला एक नवीन गाणं सादर करण्याचा हा कार्यक्रम होता.१९८० पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.

या कार्यक्रमात राम फाटकांनी खुप सुंदर सुंदर गाणी सादर केली.एखादं नवीन गीत शोधायचं.. त्याला चाल लावायची.. आणि एखाद्या गायकाकडुन ते गाऊन घ्यायचं अशी या कार्यक्रमाची संकल्पना.

राम फाटक यांनी या कार्यक्रमात पं‌.भीमसेन जोशी यांच्याकडून अनेक गीते गाऊन घेतली.ती गाणी म्हणजे एक अलौकिक ठेवा आहे.

तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल..

अणुरणिया थोकडा..

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा..

नामाचा गजर..

ज्ञानियांचा राजा ..

काया ही पंढरी..

ही सर्व गीते म्हणजे बावनकशी सोनंच आहे..पण ही सर्व गीते अभंग या प्रकारात येतात.राम फाटक यांच्या मनात एकदा आलं की भीमसेन जोशींकडुन एखादं भावगीत गाऊन घ्यावं.त्यादृष्टीने राम फाटक एखादं गाणं शोधु लागले.तोच कवी सुधीर मोघे आले.फाटक यांना एक मुखडा सुचला होता.तो होता..

‘सखी तारका मंदावल्या….. 

गाण्याची संकल्पना फाटक यांनी सुधीर मोघे यांना सांगितली..बरीच चर्चा झाली.. आणि कवी राजांनी थोडासा बदल करून पहिली ओळ लिहिली..

सखी मंद झाल्या तारका……. 

दुसरे दिवशी सुधीर मोघे पुर्ण कविता घेऊन आले.ते एक उत्कृष्ट काव्य होतं.उर्दू शायरीच्या धाटणीचे.राम फाटक यांनी अप्रतिम चालीत ते गुंफले.. यथावकाश पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रीत झालं. काव्य..चाल..गायन या सगळ्यांचीच उत्तम भट्टी जमली.. आणि एका अजरामर गीत जन्माला आलं.

कवी.. संगीतकार..गायक.. आणि अर्थातच समस्त मराठी रसिकांना या गाण्याने सर्व काही दिलं..

या गीतातच म्हटल्याप्रमाणे..

जे जे हवेसे जीवनी .. ते सर्व आहे लाभले.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares