☆ मदत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?
दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का? तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा….
आर्ट ऑफ लिविंगचा बेसिक कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की ‘आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. ‘ वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.
आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, ‘आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो. ‘ त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, ‘बाजूला हो. आला मोठा मदत करणारा’. एक प्रयत्न तर फसला.
वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, ‘चल. तुला वडापाव खायला देतो. ‘ त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. ‘नको नको’ म्हणत दूर पळून गेली.
आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले. आणि ‘तुम्हाला काही मदत करू का’ असे विचारले. त्यावर त्यांनीही नकार दिला, ‘माझे वडे बिघडवून ठेवाल, ‘ असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.
आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, “आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही, मदत तीच व्यक्ती करते जिची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर ‘मी केली’असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा. “
ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की.
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. ‘बालपण’ जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.
विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. ‘बाहुली’ हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.
दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.
१९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.
भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. ‘भातुकली’ या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.
ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. ‘भातुकली म्हणजे करंदीकरच’ हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं ‘भातुकली’ प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे ‘भातुकली’ हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना “आमच्यावेळी हे असं होतं” हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.
करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे, तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं कपाट, चुली व शेगड्यांचे, भांड्याचे अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या, वेड्भांडे, शकुंतला भांडे, रुबवटा, ठेचणी या घरातून हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट, गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक खेळही आहेत. तसेच देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची.
१९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.
अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते.
लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व. या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे…
पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ?
खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!!
दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…!
अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… !
ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ? की आख्ख पुस्तकच फाडायचं….???
चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…!
पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!!
एकदा ही माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!! असो…
उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं…
घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते… मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)
तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!!
रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही….
रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ? असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!!
.. .. दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..!
स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो…
ही प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ?
मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस….
प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही….. उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…
काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!
दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणाबाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*
भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!
पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या…
ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…
मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…
तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… !
तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो… तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)
.. ही आजी मला दाद्या म्हणते… तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…
तर, हीच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते…. मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’
तिला मात्र, ‘ बहिरे, मर की आता थकली असशील…’ का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ? असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !
अशा सगळ्या गंमती जमती… जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….
तर ही ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे.
अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…!
एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’
मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’
बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…!
.. .. असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस, तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’
– ही संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….!
‘ न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? ‘ माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….!
30 एप्रिल 2024….. भारतातील ‘स्क्रेपरबोर्ड चित्रकला’ या अत्यंत कठीण विषयातील अग्रगण्य मानले जाणारे चित्रकार – श्री. शंकरराव फेणाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा रंजक माहितीपट अवश्य पहावा असाच आहे.
जवळपास ५५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील फोटो व जाहिराती उत्तमरित्या छापून येण्यासाठी फोटोग्राफीचे तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याने, ‘स्क्रेपर बोर्ड’ ही अत्यंत कठीण, ब्रिटिश शैलीची चित्रकला वापरली जाऊ लागली.
एका पुठ्ठ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा जाड लेप देऊन, त्यावर काळी पेलिकन शाई ओतून ती वाळल्यावर, एका अत्यंत सूक्ष्म टोकाच्या ‘निब’ने, उभ्या – आडव्या रेषा कमीजास्त वजनाने कोरून, त्या तयार झालेल्या टिंबांच्या सहाय्याने चित्र निर्माण करत असत . शिल्प तयार करताना जसा दगडातील नको तो भाग काढून टाकतात त्याप्रमाणे अत्यंत ‘सूक्ष्मतम’ असे हे काम असे. एखादे टिंब जरी चुकले, तरी संपूर्ण चित्र वाया जाण्याची शक्यता असल्याने, लक्ष पूर्णपणे केंद्रित करून, काटेकोरपणे, अचूक चित्र त्यातून निर्माण करावे लागे. छापताना हे चित्र उलटे छापले जाणार, हे लक्षात ठेवून, बारकाईने लक्ष ठेवून हे अत्यंत कठीण काम तासन् तास म्हणजे सलग जवळपास 18…20 तास करावे लागे. यात माझे बाबा शंकरराव फेणाणी यांचा हातखंडा होता. त्यांचे नेमके काम पहायचे असेल तर … प्रत्येक फोटो मोठा करून पाहिल्यास प्रत्येक बिंदूची कल्पना येईल. आणि ही चित्रे काढणे हे किती अवघड, किचकट आणि वेळखाऊ काम आहे याचीही जराशी कल्पना येईल.
भारतातील अगदी तुरळक आणि उत्तम ‘ स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट’ पैकी ते अग्रगण्य मानले जात.
माझे वडील म्हणून तर मला ते सदैव वंदनीय आहेतच. आज एक उत्तम आणि दुर्मिळ कलाकार म्हणूनही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना शतश:प्रणाम.
☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक !☆ श्री संभाजी बबन गायके☆
… कॅप्टन अमित भारद्वाज आणि हवालदार राजवीर सिंग !
“आई,नको हट्ट धरूस माझा चेहरा पाहण्याचा ! मला चेहरा असा उरलाच नाही गेल्या सत्तावन्न दिवसांत. कुडीतून प्राणांचं पाखरू उडून गेलं की पिंजराही चैतन्य गमावून बसतो. मातीतून जन्मलेला हा देह माती पुन्हा आपलासा करू लागते…अगदी पहिल्या क्षणापासून. आणि सत्तावन्न दिवस तसा मोठा कालावधी आहे ना! माती होत चाललेलं माझं शरीर तुझ्यातल्या मातेला पाहवणार नाही गं! तु माझा तो लहानपणीचा गोंडस, तुला मोहवणारा चेहरा आठव आणि तोच ध्यानात ठेव अखेर पर्यंत! ऐकशील माझं? आणि हो…माझ्या वस्तू,माझा युनिफॉर्म आणि आपला तिरंगा देतीलच की तुझ्या ताब्यात! त्या रूपात मी असेनच तुझ्या अवतीभोवती…सतत!
तु,पपा,दीदी….मला पाहू शकत नव्हतात….पण मी मात्र तुमच्या अवतीभवतीच घोटाळत होतो…इतके दिवस! आता तुमच्या सर्वांच्या देखत माझा देह अग्नित पवित्र होईल…तेंव्हा निघून जाईन मी माझ्या मार्गानं….स्वर्गात!
दीदीला मात्र मानलं पाहिजे हं…खरी शूर पोरगी आहे. तिला सर्व माहित होतं, पण तुम्हांला त्रास होऊ नये म्हणून ती तुम्हांला खोटा धीर देत राहिली… दादा, आहे… येईल… असं सांगत. तुम्ही दोघंही मग सांत्वनासाठी येणा-यांना छातीठोकपणे सांगत राहिलात….लढाई सुरू आहे…अमित जिंकून येईल! मी जिंकूनच आलो आहे… ममी… पपा!
१९९७ मध्ये ४,जाट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून सीमेवर कर्तव्यावर रुजू झालो तेंव्हा सर्व वरीष्ठांना ‘सर !’ म्हणून सल्यूट बजवावा लागायचा. आणि त्याची सवयही झाली होती दीड वर्षांत. १९९९…आता मी कॅप्टन झालो होतो.
एके दिवशी तो आला आणि मला “ लेफ्ट्नंट सौरभ कालिया,रिपोर्टींग,सर!” म्हणत त्याने कडक सल्यूट ठोकला. मला ‘सर’ म्हणणारं कुणीतरी आलं होतं याचा मला आनंद वाटला. माझ्यापेक्षा दीड दोन वर्षांनी धाकटा असणारा तो तरूण मला पाहताक्षणीच भावला. चारच महिन्यांपूर्वी माझ्या पलटणीत रुजू झाला होता. तो आता माझ्या हाताखाली असणार होता. मी त्याला या पलटणीच्या परंपरा,इतिहासाबद्दल शिकवू लागलो होतो. मी त्याला ‘बच्चा’ म्हणू शकत होतो…प्रेमानं.
१९९९ चा मे महिना होता. आणि एकेदिवशी खबर आली की आपल्या सीमेत काही घुसघोर आढळून आले आहेत. बर्फाच्या मोसमात इथे जीवघेणे हवामान असते…जगणे अवघड करून टाकणारे. म्हणून परस्पर सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांच्या अतिउंचावरील सैनिकी-चौक्या रिकाम्या केल्या जातात. आणि बर्फ वितळताच पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या चौक्यांमध्ये परततात. पण यावेळी पाकिस्तानने आपल्या लष्कराला टोळीवाल्यांच्या वेशात बर्फ वितळण्यापूर्वीच या चौक्यांमध्ये पोहोचवले होते. आणि त्यातून भारताच्या चौक्यांवर ताबा घ्यायला लावले होते. शत्रू भारतीय सैनिकांची वाटच पहात लपून बसला होता. भारताला याची खबर खूप उशीरा लागली,दुर्दैवाने! खरी परिस्थिती काय आहे हे पहायला चौक्यांपर्यंत एक पाहणी पथक पाठवायचं ठरलं. एक अधिकारी आणि चार जवानांची पेट्रोलींग पार्टी. तिथली भयावह परिस्थितीच माहित नव्हती. त्यामुळे मोठी कारवाई करण्याचा विचार झाला नाही. फक्त पाहून यायचं होतं माघारी….रिपोर्ट द्यायचा होता.माझा ‘बच्चा’ मोठ्या उत्साहात पुढे आला आणि म्हणाला….सर,मी जातो! आणि पेट्रोल पार्टी निघाली. सोबत नेहमी असतात तेव्हढी शस्त्रं होती….त्यादिवशी बरेच बर्फ पडत होतं. १५ मे, १९९९ चा दिवस होता हा. सौरभ फार तर १६ तारखेला परतायला हवा होता. पण त्याला बजरंग पोस्टजवळ पोहोचायला दुसरा दिवस उजाडला. “जयहिंद सर,बजरंग पोस्टवर मोठ्या संख्येने पाकिस्तानी आक्रमण झालं आहे…आमच्यावर गोळीबार होतो आहे…आमच्याकडे गोळाबारूद पुरेसा नाहीये…पण आम्ही सर्वजण लढू…तुमची मदत पोहोचेपर्यंत..ओव्हर अॅन्ड आऊट! आणि यानंतर सौरभचा काहीही पत्ता नाही. १६ मेची रात्र सरली. मग मात्र आम्ही सर्वच जण अस्वस्थ झालो. १७ तारखेला लवकरच मी ३० जवान घेऊन निघालो. यावेळेस दारूगोळा पुरेसा घेतला…..दिवसभर चढाई करीत बजरंग पोस्टच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पहाडावरून आमच्या पार्टीवर जोरदार गोळीबार,तोफांचा मारा सुरू झाला. पाहतो तर, आमच्यापेक्षा कित्येक पट संख्येने शत्रू वर निवांतपणे लपून आमच्यावर सहज नेम धरून हल्ला चढवतो आहे. सोबतच्या ३० माणसांचे प्राण आता संकटात होते. माघारी फिरणं युद्धशास्त्राला धरून होतं….मी सोबत्यांना पीछे हटो,निकल जाओ, असा आदेश दिला. वरून गोळीबार सुरूच होता. त्यांच्यावर कुणीतरी सतत गोळीबार करीत राहणं गरजेचं होतं..जेणेकरून माघारी जाणारे त्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार नाहीत. ही ‘कव्हरींग फायर’ची जबाबदारी मी स्विकरली…मी त्यांचा नेता होतो! एक वगळता बाकी सारे जवान हळूहळू मागे सरकत सरकत सुरक्षित ठिकाणी पोहोचायला निघाले. पण माझा ‘बडी’ ‘सहकारी’ हवालदार राजवीर सिंग यांनी जणू माझा आदेश ऐकूच गेला नाही,असा अभिनय करीत दुश्मनांवर गोळीबार सुरु ठेवला. ‘पीछे जाईये, राजवीर जी!” मी पुन्हा ओरडलो. “नहीं,साहबजी. हम आपको यहां पर अकेला छोड के नहीं जायेंगे!” राजवीर सिंग यांनी हट्ट धरला. “यहां से जिंदा लौट जाना नामुमकीन है! आप बाल बच्चे वाले इन्सान हो! मेरी तो अभी शादी भी नहीं हुई है! निकल जाईये!
“नहीं,साहब !” राजवीर म्हणाले..त्यांची नजर दुश्मनावर आणि बोटं रायफलच्या ट्रिगरवर…तुफान गोळीबारानं पहाड हादरून जात होते.
“यह मेरा हुक्म है,हवालदार राजवीर !” मी ओरडलो. त्यावर तो ज्येष्ठ सैनिक म्हणतो कसा…”यहां से जिंदा लौटेंगे तो आप मेरा कोर्ट मार्शल कर सकते हैं,साहब !” आणि असं म्हणत त्यांनी अंगावर गोळ्या झेलायला प्रारंभ केला. माझा नाईलाज झाला….मी नेम धरायला सुरूवात केली….दोघांनी मिळून किमान दहा दुश्मन तरी नष्ट केले असतील…पण त्यांची संख्याच प्रचंड होती. आमच्यावर आता एकत्रितच गोळीबार होऊ लागला…आडोसा कमी पडू लागला…त्यांचे नेम अचूक होते….राजवीर माझ्या आधी शहीद झाले…माझ्याही डोक्याचा दोनदा वेध घेतला दुश्मनांच्या गोळ्यांनी. आमच्या हातांची बोटं ट्रिगरवरच होती…आमचे प्राण निघून गेले होते तरी!
मग सुरु झाला खरा रणसंग्राम. या धुमश्चक्रीत आमचे देहही आपल्या सैन्याला तब्बल छपन्न दिवस ताब्यात घेता आले नाहीत. पण आमच्या देहांच्या साक्षीने आपल्या सैन्यानं पाकिस्तान्यांना धूळ चारली. आणि मोठ्या सन्मानाने माझा आणि राजवीर यांचा उरलासुरला देह ताब्यात घेतला. सन्मानपूर्वक आदरांजली वाहिली सर्वांनी. राजवीर त्यांच्या घरी आणि मी आपल्या घरी आलो आहे….अखेरचा निरोप घ्यायला!
ह्या जन्मीचं मातृभूमीप्रती असलेलं माझं कर्तव्य तर पूर्ण झालं आहे…तुझे ऋण फेडायला फिरूनी नवा जन्मेन मी ! जय हिंद ! “
( जुलै, २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कारगील येथे झालेल्या सशस्त्र संघर्षाला पंचवीस वर्षे पूर्ण होताहेत. या संघर्षातले पहिले हुतात्मा ठरले ते कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्यासोबतचे पाच जवान. कालिया साहेबांचा शोध घेण्यास गेलेल्या कॅप्टन अमित भारद्वाज साहेब आणि त्यांच्या सोबतच्या हवालदार राजवीर सिंग यांना १७ मे रोजी हौतात्म्य प्राप्त झाले. कॅप्टन भारद्वाज साहेबांची ही शौर्यगाथा त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिली आहे… त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून देण्यासाठी. कॅप्टन भारद्वाज साहेबांनी लेफ्टनंट ( पुढे कॅप्टन झालेल्या) सौरभ कालियासाहेबांचे स्वागत करणारी एक हस्तलिखित चिठ्ठी छायाचित्र स्वरूपात इथे दिली आहे. जय हिंद !)
☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!!☆ सुश्री शीला पतकी☆
वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या बाई माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो दोन महिन्यापूर्वी वारला मला जरा धक्काच बसला कारण मुलगा अगदी तरुण होता 23 24 वर्षांचा त्यावर त्या बाई म्हणाल्या त्याची बायको वीस वर्षाची आहे तिचे काय करावे मला समजत नाही मी म्हटलं किती शिकली आहे ?त्या म्हणाल्या आठवी नापास झालीय… कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास होता त्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले पोरगी देखणी आहे वयाने लहान आहे मी कामाला जाते घरात माझा तरूण मुलगा आहे म्हणजे तिचा दीरआहे मला काही सुचत नाही मी काय करू मी म्हणाले बाई शिकवा मुलीला शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही धुणेभांडे करत ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात… मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग बोलके डोळे लांब केस छान उंची बांधा हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते .मी म्हणाले हिला शिकवा त्या म्हणाल्या आता कुठे शाळेत पाठवणार …मी म्हणाले माझ्या शाळेत पाठवा..
नापास मुलांच्या ..तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकू….. त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती मी त्यांना सांगितले 8000 रुपये फी भरावी लागेल त्या म्हणाल्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी म्हणाले फुकट शिक्षणाची किंमत नसते मी तुम्हाला एक मार्ग सुचवते… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती मी त्यांना एक मार्ग सांगितला की सकाळी 8 ते 11 बालवाडीला सेविका म्हणून तीने काम करावे साडेअकराला शाळेत बसावे साडेपाचला शाळा सुटते जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे मी महिना तिला पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून ते कट केले जातील याप्रमाणे तिची काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची ही भरेन फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावी लागेल त्यांना ते पटलं पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या मी त्यांना दिलासा दिला ही माझी जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका त्या म्हणाल्या.. तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे तुम्ही सांभाळा मी म्हणाले हरकत नाही आता ती माझी जबाबदारी आहे याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मुलगी हुशार होती कामाला चपळ होती एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी नाही काम उत्तम व नेटके करत होती अभ्यासाची गोडी वाढली अनेक शिक्षकांनी आमच्या तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले तिचा उत्साह वाढला मुलगी खरंच हुशार होती पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दर महा मासिक घातलं जाते त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी आणि ते कार्य दुपारी बाराला असते याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची.. तिला काहीच कळत नव्हते संसार म्हणजे काय कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती म्हणाली बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय.. मी म्हणाले बोला त्या म्हणाल्या माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती ती हिच्या नावावर केलेले आहेत पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला तर अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरीयेईल काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो म्हणून ..अगदी खरे आहे मग काय विचार केलात त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते …खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते पण तरीही आईच्या सावध पणाने मी त्यांना म्हटलं का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमचा थोडासा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का त्या म्हणाल्या नाही हो बाई पोरीला सावत्र आई आहे बाप कुठवर बघणार माझ्या घरात तरी काय वेगळं आहे माझा नवरा आजारी पोरगा अपंग तिचा तो मुलगा झाडावरून पडून त्याचा हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडास अपंगत्व आलं होतं बाकी मुलगा चांगला होता निर्व्यसनी होता एका दुकानात काम करत होता बाईच स्वतःचा घर अगदी भर पेठेत होतं जुन्या चाळीत राहत असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते त्यामुळे दोन खोल्यांच छप्पर डोक्यावर होतं बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता या सर्व दृष्टीने विचार करता अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षितता या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच मी म्हणलं मुलीच्या वडिलांना बोलवून घ्या आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले बरोबर त्यांच्या नात्यातले चार माणसही आली बोला चाली झाल्या लग्न ठरले पण मी त्यांना एकचअट घातली की लग्न रविवारी करायचं मुलगी शाळा बुडवणार नाही एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले त्यांच्या गावाकडे म्हणजे त्यांचा जो देव होता तिथे जाऊन लग्न करायचे ठरले मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या अर्थात हे सगळे तिला एकटीला घेऊन समजून सांगितले तिला विचारले हे तुला चालणार आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस तुझी आणि नवऱ्याची बेडरूम जी होती तिथेच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे त्याच घरात तुला वावरावयाचे आहे हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? तिची मानसिक तयारी चांगली झाली होती ती म्हणाली हो मी हे करेन तो दीर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याचा आहे आणि ती माझी आई पण आहे तरीही आई आणि बाई या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याचं मी तिला सांगितले तुझा पहिला नवरा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस पुरुषांना हे आवडत नसते त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे पण त्याचा अहंभाव दुखावेल असे पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस आठवणी सांगू नकोस हे पथ्यपाळ म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल हे खरंतर खूप अवघड होते पण तिला निभावणे भाग होते झाले मग काय लग्न झाले सोमवारी नवी नवरी जावई पाया पडायला आले शाळा सुरू झाली जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला त्यानंतर आमची अभ्यासिका परीक्षा सराव परीक्षा हे सगळं पार पडलं आणि मुलगी 75 टक्के गुणांनी पास झाली ….मग पुढचा विचार सुरू झाला तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलवून घेतले आणि सांगितल की आता हिच्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षणाला दिले पाहिजे ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते लगेचच मी आमच्या इथे असलेल्या मुळे हॉस्पिटल मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षाच्या नर्सिंग कोर्स प्रवेश मिळाला आता या तिन्ही वर्षात मुल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या इतके मी त्यांना सांगितले खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या पण काय करणार इलाज नव्हता आणि त्यांनी हे सगळं वेळोवेळी ऐकल…अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली आणि लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच डॉक्टर महिलेने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती आज ती तिथे उत्तम काम करीत आहे दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे दोन गोंडस मुले झाली आहेत संसार सुखाचा चालला आहे स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…! मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख समाधान हे मला वाचता येते आणि लक्षात येतं की हे केवळ शिक्षणाने घडले आहे दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतात लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नसतो न शिकलेली मोठी झालेली माणसंही आहेतच पण ते वेगळे शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही तर सुखी होतो म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे शिका आपल्या आसपास असणार्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या जमलं तर एखाद्याला लिहायला वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…! मग काय करा सुरुवात जून मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा शिक्षणापासून वंचित असणाराना शिक्षणाची गोडी लावा त्याला प्रवाहात आणा इतके तरी आपण करू शकतो ना…….!
मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.
आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!
मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.
अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही. सत्तरीनंतर माझी अनेक परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.
पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.
कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,
“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.
त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”
या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.
“भारतीsss”
दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.
“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”
यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.
मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,
“मै हूँ ना!”
माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.
कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”
जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.
जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.
माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.
तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.
माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.
मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.
दक्षिण भारताचे मुख्य अन्न असलेली इडली ही आता संपूर्ण भारतातच नव्हे, तर पार सातासमुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटते आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. इडली हे नाव जितके नटखट आहे, तितकीच या इडलीकुमारीची कहाणी देखील मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझा पण नव्हता बसला. परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या ब-याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल का या इडलीकुमारीची कथा? चला तर मग, सुरु करु या!
भारतीय खाद्य इतिहासकार के.टी.अचैय्या यांच्या अभ्यासानुसार कर्नाटकातील काही कवितांमधे इडलीचा उल्लेख आढळतो. ‘इडलीगा वा इडरीका’ असं संस्कृतमधे त्यांना म्हटलं गेलं आहे. इडली, दोसा, वडा सांबार, अप्पे, उतप्पम् अशा विविध पदार्थांची नावे ऐकली की, आपल्या डोळ्यासमोर लुंगीवाला साऊथ इंडीयन अण्णा उभा राहतो. भारताच्या कानाकोप-यात सकाळी सकाळी कपाळाला पांढरे गंध लावलेले हे लुंगीवाले अण्णा इडली, दोसा विकतांना दिसतात. कोणी सायकलवर, तर कोणी हातगाडीवर, आपापली दुकाने घेऊन फिरतांना दिसतात. किती तरी अण्णा लोक या पदार्थांचे हाॅटेल्स टाकून श्रीमंत झालेले दिसतात. कारण साऊथ इंडीयन पदार्थांनी समस्त भारतीयांना तशी भुरळच पाडलेली आहे. त्यातल्या त्यात पांढरी स्वच्छ, मऊ, लुसलुशीत इडली म्हणजे समस्त आबालवृद्ध लोकांच्या गळ्यातील ताईतच!
तर अशी ही सर्वांची लाडकी इडली मूळ रुपात आपल्या येथील नाहीच आहे. ही इडलीकुमारी आली आहे इंडोनेशियामधून. तुम्ही म्हणाल की, काहीही सांगते. वर्षानुवर्षं आपल्या आहारात असलेली इडली इंडोनेशियाची कशी बरं असेल? परंतु हे खरं आहे. कन्नड खाद्य इतिहासकार श्री. के.टी.अचैय्या यांनी त्यांच्या पुस्तकात इडलीबद्दल लिहीतांना हे सांगितले आहे की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर ती इंडोनेशियामधून भारतात आली आहे. वडा सांबार, दोसा यांना दोन हजार वर्षांपूर्वीचा भारी भक्कम इतिहास आहे. परंतु इडलीला इतका प्राचीन इतिहास नाही. फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया, चीनमधे वाफवलेले पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात इडलीसारखा पदार्थ, जो आंबवून व वाफवून तयार केला जातो, हे त्या वेळेस कोणालाच माहीत नसावं आणि त्याच कारणामुळे जेव्हा सातव्या शतकामधे ह्युआन त्सांग नावाचा चीनी बौद्ध भिक्कू प्रवासाकरता भारतामधे आला होता, तेव्हा त्याला पदार्थ वाफवण्याचे भांडे आपल्या देशात कुठेही आढळले नव्हते, हे त्याने आपल्या प्रवास-वर्णनामधे नमूद करुन ठेवले आहे. अचैय्या यांच्या मतानुसार इंडोनेशियातील बल्लवाचार्यांनी पदार्थ वाफवून तयार करण्याची प्रक्रिया भारतात आणली असावी. इडली ही तांदूळ + उडीद डाळ यांना सात आठ तास भिजवून, नंतर रवाळ वाटून व परत सात आठ तास फर्मेंट करुन ज्याला ‘किण्वन’ही म्हटले जाते, अशा पद्धतीने तयार केली जाते.
इ.स. ९२०च्या शतकातील शिवाकोटाचार्य यांच्या लेखामधे इडलीचा उल्लेख आढळतो. ते असे लिहीतात की, दक्षिण भारतातील एका स्त्रीकडे एकदा एक ब्रम्हचारी अतिथी म्हणून आला असतांना, तिने बनवलेल्या अठरा प्रकारच्या व्यंजनांमधे ही इडली होती. इ.स. १०२० मधील एक कवी श्री चामुंडा राय यांच्या एका विवरणामधे इडली बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे होती की, ज्यामधे तांदळाचा उपयोग नव्हता केला व ती किण्वन म्हणजे आंबवलेली सुद्धा नव्हती. तर ही इडली म्हणजे फक्त उडीद डाळ ताकामधे भिजवून, नंतर ती बारीक करुन त्यामधे दह्याचे वरचे ताजे पाणी, काळी मिरी पावडर, हिंग, मीठ व कोथींबीर एकत्र करुन हवा तसा आकार देऊन तयार केलेला पदार्थ होता, जो इडलीसारखा दिसत होता, परंतु ती इडली नव्हती.
तांदूळ व उडीद डाळीपासून इडली फक्त इंडोनेशियात बनवली जात होती. तिला त्या देशात ‘केडली’ या नावाने संबोधले जात होते. आहे की नाही मजेशीर? आपल्याला इडलीची जुळी बहीण केडली, जी कुंभमेळ्यात हरवली होती, हे माहितीच नव्हतं.
इ.स. ८०० ते १२०० च्या शतकांमधे काही इंडोनेशियन राजे आपल्या भारतातील नातेवाईंकाकडे त्यांच्या गाठीभेटींकरता, लग्न समारंभांकरता, तसेच हे राजे वधू संशोधनाकरता देखील यायचे, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मुदपाकखान्यातील भारतीय आचारीदेखील ते सोबत आणत असत, जे आपापल्या शाही परिवारांच्या जेवणाकरता त्यांचे पारंपरीक पदार्थ तयार करत असत. त्यामधे या तांदूळ व उडीद डाळीचा किण्वन केलेला हा ‘इडली’ नावाचा पदार्थ होता. किण्वन म्हणजे आंबवलेला किंवा इंग्रजीत फर्मेंट केलेला पदार्थ असा अर्थ होतो. पदार्थ आंबवून म्हणजे किण्वन करुन व वाफवून करण्याची कला ही चीन, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार या देशांमधे जास्त प्रचलित होती. कारण तांदूळ उत्पादनामधे हे देश पहिल्यापासून अग्रेसर आहेत व तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळापासून अनेक वाफवलेले पदार्थ तयार करता येतात, हे त्यांना माहीत असावं. म्हणून वाफवलेल्या पदार्थांचा त्यांच्या आहारात जास्त समावेश असावा. इंडोनेशियातील राजपरिवारांच्या भारतीय मूळ असलेल्या आचा-यांनी तयार केलेला ‘केडली’ नावाचा हा पदार्थ भारतीय आचा-यांनी पण शिकून घेतला असावा.
हे आचारी जेव्हा भारतात राहिले, तेव्हा त्यांनीच तांदूळ व उडीद डाळ मिसळून लुसलुशीत पांढरी स्वच्छ इडली तयार करण्याचा आविष्कार केला असेल, जो संपूर्णपणे भारतीय असावा व केवळ त्यामुळेच इंडोनेशियाच्या केडलीच्या या जुळ्या बहीणीचा म्हणजे इडलीचा भारतीयांच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण झाला असावा. इंडोनेशियाच्या केडलीने आपली जुळी बहीण इडलीला भारतीयांच्या मनामधे स्थान मिळवून दिले व स्वतः केडली इंडोनेशियातच राहिली.
आपल्या भारतीय बल्लवाचार्यांनी या इडलीची अनेक बाळंतपणे करुन तिची नवनवीन रुपे जन्माला घातली. जुन्या इडलीकुमारीचा जन्म फक्त तांदूळ व उडीद डाळ यांचे मीलन झाले तरच शक्य होता, परंतु ही इडलीकुमारी भारतात आली व तिची अनेक रुपे तयार झाली. भारतामधे तांदळाचे लग्न फक्त उडीद डाळीसोबत न लावता – मूग डाळ, काळे उडीद यांचेसोबत लावून तिला नव्याने जन्माला घातले गेले. तिरुपती बालाजीला गेलात तर तिथे आजही काही ठिकाणी काळे उडीद वापरुन तयार केलेली काळी इडली मिळते.
आता तर या आधुनिक काळात इडलीची किती तरी रुपे पहायला मिळतात, जी इंडोनेशियातील लोकांनाही माहीत नसतील. यामधे दक्षिण भारत नेहमीच पुढे राहीला आहे. आता २१ व्या शतकामधे थट्टे इडली, मिनी इडली, पोडी इडली, रागी इडली, रवा इडली, मूग डाळ इडली, मिलेट्सची इडली, स्टफ इडली, बटर इडली, इत्यादी नवनवीन खानपानानुसार बनलेल्या इडलीने आपले जग व्यापून गेले आहे. मी तर असेही ऐकले आहे की आमच्या नागपूरमधे मिळणा-या काळ्या इडलीने खवयेगिरी करणा-या लोकांची उत्कंठा वाढीस लावली आहे. एम.टी.आर. व कांचीपूरम इडलीने तर आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आज इंडोनेशियाच्या केडलीपेक्षा तिच्या या भारतीय जुळ्या बहीणीचा, जिचे ‘नाव एक परंतु रुपे अनेक’ असे वैशिष्ट्य आहे, अशा इडलीचा दबदबा सर्व जगात पसरला आहे. तांदळापासून वाफवलेले इतके सारे पदार्थ बनू शकतात, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. भारतामधे आजमितीला तांदळाचे दोन लाख वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
भारताच्या मध्य भागात जर आपण उभे राहीलो, तर उत्तरेकडे विविध प्रकारचे पराठे, छोले भटुरे, कुलछे असे पदार्थ आपले चित्त विचलीत करतात. तर दक्षिणेकडचे वडा सांबार, इडली सांबार, मसाला दोसा हे पदार्थ मुखामधे लाळेची त्सुनामी आणतात. आपल्या देशात विविध प्रांतांनुसार चटपटीत व्यंजनेसुद्धा आपापल्या रंगारुपाने, चवीने विविधतेत एकता साधून आहेत. आपल्या सहिष्णु वृत्तीमुळेच इंडोनेशियातील केडलीला आपण इडलीची नानाविध रुपे देऊन भारतीय खाद्यसंस्कृतीमधे मानाचे स्थान देऊन अजरामर केले आहे. इडलीसारखे असे किती तरी पदार्थ आज भारतीयांच्या आहारात “मिले सूर मेरा तु्म्हारा, तो सूर बने हमारा” असे म्हणत हिंदुस्थानच्या घराघरात विराजमान झाले असतील. कोणालाही “अतिथी देवो भव” म्हणण्याची परंपरा, मग ते परकीय पदार्थ का असेनात, भारतीय लोकांनी परकीय खाद्यसंस्कृतीचे स्वागत करुन व तिला आपलेसे करुन कायम जपलेली आढळते. अशी गरमागरम, मऊ, लुसलुशीत पांढरी स्वच्छ जाळीदार हलकी इडली जेव्हा सांबारच्या आंबटगोड वाटीरुपी तळ्यात डुबक्या मारुन आपल्या जिभेवर विराजमान होते ना, तेव्हा तो स्वर्गीय अनुभव काय वर्णावा? या इडली सांबारासोबत ओल्या नारळाची चटणी खाल्ली की, ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा!
“अहाहा!!! क्या कहना इडली राजकुमारी, तुम्हारी तारीफ करते करते जबान थकती नही!”
आपली ही खाद्ययात्रा पुढेही अशीच चालू ठेवत, मी इथे इडलीकुमारीची कहाणी संपवते. खाद्यपरंपरेत अशीच एक नवीन पदार्थाची कथा मी तुम्हाला पुढील भागात सांगेन. तोपर्यंत अशी नवीन कथा वाचण्याची तुमची उत्कंठा वाढीस लागू द्या.
☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
सुंदर, शिडशिडीत दिसणे ही स्त्रीसुलभ भावना बाजूला ठेवून आपल्या पोटात असलेल्या जिवाला वाढायला जागा देताना आपल्या पोटाच्या वाढत्या आकाराचा विचार बाजूला पडतो आणि आरशात वाढलेल्या पोटाच्या जागी आतला जीव दिसून समाधान वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.
नऊ महिने बाळाला काय योग्य आणि अयोग्य आहे, त्यानुसार आहार, व्यायाम, व्यवहार करून त्याच्या येण्याच्या आधीपासून स्त्रीचं आयुष्य त्याच्याभोवती फिरू लागतं, तेव्हा स्त्रीची आई होते.
नऊ महिने भरल्यावर जगातील सर्वांत जास्त वेदनांपैकी एक असलेली प्रसूतीची वेदना बाळाच्या आवाजाने,दर्शनाने क्षणात विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.
बाळाला आपल्या मायेने ओतप्रोत भरलेला जगातील सर्वांत सकस आहार, आईचे दूध पाजताना तिला परमोच्च दैवी आनंदाची अनुभूती होते, तेव्हा स्त्रीची आई होते.
बाळाची शी, शू, लाळ, ओकाऱ्या असंख्यवेळा साफ करताना आणि आपल्या अंगावर झेलताना घाण वाटायच्याऐवजी शीचा रंग किंवा पोत बदलला की लगेच काळजी वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.
मुलांबरोबर खेळताना, त्यांचे सर्व करताना स्वतःचे छंद, आवडी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि अस्तित्वच विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.
जगापासून, त्यातील वाईट लोक आणि प्रवृत्तींपासून मुलाचा सांभाळ करताना हळवी, प्रेमळ, मितभाषी असलेली स्त्री देखील प्रसंगी दुर्गा बनू शकते तेव्हा स्त्रीची आई होते.
अपत्यजन्म, संगोपन ह्या चक्रातून अनेकदा जावे लागले, तरी तिच्या मायेच्या डोहाचे पात्र प्रत्येक अपत्याला आधीच्या सर्वांबरोबर डुंबता येईल इतके विशाल होत जाते, तेव्हा स्त्रीची आई होते.
मुले मोठी झाली, आपापल्या मार्गी लागली की आयुष्याची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याचे समाधान मिळते, तेव्हा स्त्रीची आई होते.
मुलांनी उतारवयात विचारले नाही, आपल्या उभ्या आयुष्याची गुंतवणूक बोगस कंपनीत झाली, हे लक्षात आले तरी मुलांचे फक्त चांगले चिंतत त्यांची सतत काळजी करणारे ह्रदय बनते, तेव्हा स्त्रीचे आई होते.
स्त्री ही अनंत काळची माता आहे असे म्हणण्याचे कारण कदाचित तिची आई म्हणून मुलांना असलेली गरज अनंतकाळ टिकणारी आहे!