मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राहून गेलेलं स्मारक” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “राहून गेलेलं स्मारक” ☆ श्री सुनील शिरवाडकर

एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेल्यानंतर तिचे स्मारक होते. अगदी स्मारक झाले नाही तरी त्याविषयी चर्चा तर होतातच.ते व्हावे की नाही.. व्हावे तर कुठे व्हावे.. कसे व्हावे यावर बरेच वादविवाद होतात.अलिकडे तर ‘स्मारक’ हा विषयच टिकेचा,कुचेष्टेचा झालेला आहे.

नाशिकला मात्र तात्यासाहेब शिरवाडकरांचे घर हेच स्मारक म्हणुन जपुन ठेवलेले आहे. तात्यांची ती खोली.. बसण्याची खुर्ची.. लेखनाचे टेबल..त्यावर असलेल्या तसबिरी.. चार्ली चैप्लीन आणि गडकर्यांच्या. तेथे गेल्यानंतर क्षणभर भास होतो..आत्ता तात्या आतल्या खोलीतुन बाहेर येतील..श्रीराम श्रीराम म्हणत.

असंच अजुन एक स्मारक माझ्या बघण्यात आलं होतं.गणपती पुळ्याजवळच्या मालगुंड गावी. कवी केशवसुतांचं.त्यांचंही रहातं घर असंच जपुन ठेवलंय. दाट माडांच्या बनातलं ते कौलारू घर.लाल चिर्यांपासुन बनवलेलं.बाहेर पडवीत असलेला झोपाळा.. आतील माजघर..स्वयंपाकघर.. त्यातीलच ती शंभर वर्षापुर्वीची भांडी. कुसुमाग्रज तर म्हणालेही होते एकदा.. हे केवळ घर नाही तर ही मराठी काव्याची राजधानी आहे.

ग.दि.माडगूळकरांचं पण एक असंच स्मारक होणार होतं.माडगुळ या त्यांच्या गावी.तेथे त्यांचं घर होतं.आणि एक मळा. मळ्यात होती एक छोटीशी झोपडी. तीन बाजुंनी भिंती. दार वगैरे काही नाही. गावातील इतर घरे धाब्याची.फक्त या झोपडीवर लोखंडी पत्रे. म्हणून याचे नाव.. बामणाचा पत्रा.

गदिमा.. म्हणजे अण्णा तसे रहात पुण्यात. पण कधी शहरातील धकाधकीच्या आयुष्याचा त्यांना कंटाळा येई.कागदावर नवीन काही उतरणं मुष्किल होई.अश्यावेळी त्यांना साद घाली तो हाच ..बामणाचा पत्रा.

इतर वेळी याचा वापर गोठ्यासारखाच.पण अण्णा आले की त्याचे रुपडे बदलुन जाई.सारवलेल्या जमीनीवर पांढरीशुभ्र गादी..लोड..तक्के.त्या कच्च्या भिंतीवर असलेल्या खुंटीवर अण्णांचे कडक इस्त्रीचे जाकीट.. सदरे..खाली बैठकीवर निरनिराळे संदर्भ ग्रंथांचे ढीग.हे अण्णांचे स्फुर्तीस्थान होते.

पुर्वाभिमुख असलेल्या या झोपडीत अण्णा मग मुक्काम ठोकत.इथली सकाळ त्यांना मोहवुन टाके.ते म्हणतात..

“गावात चाललेल्या जात्यावरीर ओव्या झोपलेल्या कवित्व शक्तीला जागे करतात. पहाटे वार्यावर येणारा पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो.सारे वातावरणाच असे की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठुन उभ्या पिकांमधुन हिंडुन येतो. दवात भिजलेली जोंधळ्यांची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो,तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढर्या आणि बोचर्या रेघोट्या मारतात.”

हिंडुन आलं की सुस्नात होऊन लेखनाच्या बैठकीवर ते येत.या मातीचाच गुण..झरझर शब्द कागदावर उतरत जात.मधुन घरचा डबा येई.बाजरीची भाकरी, लसणीची खमंग चटणी, आणि सायीचे दही. कधी जेवणासाठी घरी चक्कर असे. अण्णा म्हणतात..

“आपल्या स्वतःच्या रानात पिकलेल्या शाळुची पांढरीशुभ्र भाकरी.. उसातल्या पालेभाज्या.. घरच्या गाई म्हशींचं दुधदुभतं..माणदेशात पिकणाऱ्या गुलाबी तांदळाचा चवदार भात..आणि वाढणारी प्रत्यक्ष आई.

जगातल्या कुठल्याही पक्वानाने होणार नाही एवढी त्रुप्ती त्या जेवणाने होते. मग पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे मला बोलावणे येते. उजव्या हाताची उशी करुन मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतील ढेकळे मला रुतत नाही, खडे टोचत नाही. झोप अगदी गाढ लागते.”

तर असा हा ‘बामणाचा पत्रा’.अनेक अजरामर कवितांचा, कथा, पटकथांचा जन्म इथेच झाला.तो गाव..बामणाचा पत्रा,आणि गदिमा..हे अगदी एकरुप झाले होते. गदिमा गेले त्या वर्षी गावातली खंडोबाची यात्रा भरली नाही की कुस्त्यांचा फड भरला नाही.

गदिमा गेल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर प्रथमच गावी आले होते.गदिमांचे वर्गमित्र आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब देशमुख यांनी गावकर्यांची इच्छा बोलुन दाखवली. ते म्हणाले…

तुम्ही तिकडे मुंबई, पुण्यात आण्णांचे काय स्मारक करायचे ते करा.पण आमची एक इच्छा आहे.या गावी.. या वावरात अण्णांचं एक स्मारक हवं.

व्यंकटेश माडगूळकरांना पण  पटलं ते.त्या रात्री ते ‘बामणाच्या पत्र्या’तच झोपले.सकाळी उठले. समोर पूर्व दिशा उजळत होती. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या अण्णांचे स्मारक आकार घेत होतं.

ही सभोवार हिरवी शेते..हवेत भरुन राहिलेला ओल्या जमीनीचा, उभ्या पिकांचा गंध..मधे हा ‘बामणाचा पत्रा’..हाच तो दगड,ज्यावर बसुन अण्णा आंघोळ करत..बापु रामोशी भल्या पहाटेच तात्पुरत्या चुलवणावर मोठा हंडाभर पाणी तापवुन ठेवी.आंघोळ करतानाचे त्यांचे ते शब्द कानात घुमताहेत..

‘हर गंगे भागीरथी’.

विहीरीचं पाणी त्यांच्या डोक्यावर पडलं की खरंच त्याची गंगा भागीरथी होऊन जाई.

त्यांना वाटलं..

शिल्पकार भाऊ साठ्यांना बोलावुन घ्यावं.या आंघोळीच्या दगडाच्या जागी एखादं शिल्प त्यांच्या कल्पनेतुन घडवावं.वास्तुशिल्पी माधव आचवल यांनाही बोलवावं.त्यांच्या कल्पनेतुन इथे बरंच काही करावं.आजुबाजुला कायम फुललेली बकुळ, पलाशची झाडे लावावी. त्याखाली बाके.इथेच ती अण्णांची आरामखुर्ची ठेवावी. जानेवारीच्या थंडीत अण्णा इथे येत.त्यावेळी त्यांच्या अंगावर असणारा तो कोट..इथेच खुंटीवर टांगलेला असावा. त्यांची ती लोखंडी कॉट..ती पण इथेच कोपर्यात राहील. अण्णांची पुस्तके, हस्तलिखितं..सगळं इथं आणु.

हे गाव..इथली झाडंझुडं..पाखरं..पिकं..माणसं..हे सगळं मिळुनच इथे एका लेखकाचं स्मारक बनवु या.

व्यंकटेश माडगूळकरांच्या कल्पनेतलं हे स्मारक व्हायला हवं होतं..पण  नाही झालं..त्याचं दुःख आहेच.पण अखेर स्मारक म्हणजे काय?कशासाठी असतं ते?

तर ती व्यक्ती कायम स्मरणात रहावी यासाठीच ना!

आणि गदिमांचा उर्फ अण्णांचा विसर कधी पडेल हे संभवतच नाही. चैत्राची चाहुल लागली की ‘राम जन्मला गं सखे..’ हे आठवणारच आहे. आणि आभाळात ढग दाटून आले की ‘नाच रे मोरा..’ ओठांवर येणारच आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या स्मारकाची जरुरच काय?

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सांत्वन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे..

बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलंय. पण धीर धर. काही दिवसातच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारखे रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत निरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना..

अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतूपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती..

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मुळं आहेत आणि त्यांच्याव्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे,.हे एकदा,उमगले की दुःखाचा लवलेश नाही “ 

“आपली मुळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदर्यासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुख-दुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाह्य रूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते. एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।” 

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग ! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणसं करीत असलेली चूक आपण का करायची? माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळं यापलीकडे जाऊन कायम मुळाकडेच पाहण्याची खोड मला लागली. ‘घट्ट  मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते ”

 “ तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू ..  शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खूप हलकं हलकं वाटतं ! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मुळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्वतयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजुतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला स्वतःहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मुळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रफू” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “रफू” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

काल  दुपारी मी टॅक्सीने माहीमहून सिटीलाईटला चालले होते. शोभा हॉटेलच्या सिग्नलला माझी टॅक्सी थांबली.. तेव्हा माझे लक्ष साडीच्या दुकानाच्या बाहेर बसलेल्या रफफू वाल्याकडे गेले. तो बऱ्याच कलरचे कापडाचे कापलेले छोटे छोटे तुकडे एकत्र बांधलेल्या गठ्ठ्यातून उलट सुलट करून शोधत होता. तो बहुदा रफू करायला मॅचिंग कापड शोधत असावा. आत्तापर्यंत मी रस्त्यावर रफू करताना पाहिले होते पण का कोणास ठाऊक आज माझ्या डोक्यात एक विचार येऊन गेला की खरंच एखादी साडी ड्रेस पॅन्ट किंवा कोणत्याही चांगल्या कपड्याला हा रफूवाला किती सफाईने  पडलेले छिद्र अशाप्रकारे दुरुस्त करतो की आपल्याला कळत पण नाही की अगोदर इथे फाटले होते आणि आपण ते  वस्त्र वापरू शकतो.

एखाद्या नवीन कपड्याला छोटेसे भोक पडले तर आपला जीव चुटपुटतो, आपल्याला ते वस्त्र वापरतायेणार नाही याचे वाईट वाटते.. रफू वाल्याच्या हातातल्या कलेने आपण ते वस्त्र वापरू शकतो मग मनात विचार आला की कधीकधी आपल्या एवढ्या मौल्यवान आयुष्यात एखादे नाते खराब झाले तर आपण दुखावतो ,कधी कधी ते नाते संपुष्टात येते. एखादा बॅड पॅच आला‌ तर निराश होतो. मग अशावेळी आपण रफूवाला का होत नाही? तेवढाच पॅच रफू करून परत नव्याने जीवनाकडे पहात तो पॅच विसरून जात नाही . अशावेळी रफूवालयाचे‌ तंत्र आपणआत्मसात केले पाहिजे, अशावेळी कोणती सुई कोणत्या रंगाचे धागे मिक्स करून वापरायचे व पॅच भरून काढायचा  व नव्याने सुरुवात करायची हे पाहायला हवे. थोडासा पॅच दिसेल पण परत नव्याने ते वस्त्र वापरू शकतो यासाठी फक्त हवे असते छोट्या छोट्या रंगीत आठवणींचे गाठोडे आणि प्रेमाची सुई. कोणास ठाऊक कोणत्या वेळी कोणते चांगले क्षण दुखावलेले नाते रफू करायला उपयोगी पडेल व आपण आनंदी होऊ.

चला तर मग या नवीन वर्षात छोट्या छोट्या जुन्या चांगल्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया आणि वेळ पडेल तेव्हा रफू वाला होऊया.

लेखक – अज्ञात.

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं?’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.

यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय?’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ.इ.’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या…’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये…’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं…’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!

त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,

‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ

चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं….’

‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,

‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’

‘तेच तर आम्ही म्हणतो…’

सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.

‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’

मी त्यांना थांबवत म्हणते.

‘आमच्या घरात नेहमीच घडतं  माझ्या इच्छेप्रमाणे

जेव्हा एकमत असेल तेव्हा

आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे

दुमत असेल तेव्हा…’

क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ!’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!

विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.

घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. माय स्पेस किंवा माझा अवकाश याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.

मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी.एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून जागं असलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

सुधीर ना तू ?

अरे तुझ्या नावातच धीर धरणे आहे.

काळजी करु नकोस,

आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत.

सर संघ चालकांचे हे प्रेरणादायी शब्द सुधीर फडके यांना अडचणीच्या वेळी उभारी देऊन गेले.

काही दिवसांपूर्वी  जागतिक पुस्तक दिनानिमित्य एका शाळेत माझ्या पुस्तकातील ‘उत्प्रेरक’ या प्रकरणावर बोलताना मी म्हणालो होतो की आयुष्यात अशा काही व्यक्ती / घटना- प्रसंग  / गोष्टी येतात की ते तुमच्यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ बनतात.

आज ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर माझ्यासाठी हा सिनेमा नक्कीच ‘उत्प्रेरक ‘ ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा सिनेमा पहायचा राहिला हे शल्य हा सिनेमा पाहून थोडे का होईना कमी झाले.

स्वत: निर्माण केलेल्या वीर सावकर सिनेमाची ४ तिकीटे विकत घेऊन फडके सिनेमा बघायला येतात ही सिनेमाची सुरवात. दूरदर्शन वरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातील मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात उलगडू लागतो.

अत्यंत संघर्षमय तारुण्याचा काळ, आत्महत्या करावी इतका टोकाचा विचार पण सुदैवाने संघ स्वयंसेवक म्हणून मिळत जाणारी मदत आणि एका  टप्यावर आयुष्याला मिळालेली कलाटणी. थक्क करणारा बाबूजींचा हा प्रवास

मुंबई – नाशिक- मालेगाव – पंजाब-कोलकत्ता- कोल्हापूर – पुणे या त्यांच्या प्रवासाबरोबर प्रत्येक घटनेला अनुसरून त्यांचीच गाणी,यांची छान गुंफण झाली आहे

हा माझा मार्ग एकला – ते – फिटे अंधाराचे जाळे व्हाया गीत रामायण ऐकता ऐकता ३ तास कसे संपतात कळत नाही

गदिमा – बाबूजींची जुगलबंदी छान रंगलीय

काही टवाळखोर निरीक्षणे

१) दूरदर्शन च्या आवारात बाहेर फिरताना काही क्षण सुनील बर्वें मधे अजीत पवार यांचा भास  झाला. तर सिनेमातील आशा भोसलेंच्या केसांचा रंग जरा पांढरा असता तर अगदी सुप्रिया ताई…😬

२) गीत रामायण रौप्य महोत्सवी कार्यक्रमात पुण्याला अटलजी त्यांच्या भाषणात म्हणतात ‘सुधीर फडके और मेरा पुराना रिश्ता है’😳  ( इथे आमचाच घोळ झाला)

३) अंकित काणे हे आमचे फेसबुक मित्र. त्यांनी आधीच एक पोस्ट टाकून या सिनेमात त्यांनी पु.लं.ची भूमिका केली हे सांगितले होते म्हणून बरं. नाहीतर हे पु.लं आहेत हे कळलेच नसते 😷

४) किशोर कुमार हे विनोदी नट होते पण त्यांचं फारच विनोदी पात्र इथे सादर केले गेले आहे . 😄

बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांनी म्हणलेले गाणे

‘ दिन है सुहाना आज पहिली तारीख है ‘

तर योगायोगाने आज १ ल्या तारखेलाच

गुरु ग्रह मेषेतून, वृषभ या रसिक राशीत गेला असताना आमच्यासाठी

ग्रह आले जुळुनी, अनुभवली सगळी सुरेल गाणी 🎼

#माझी_टवाळखोरी 📝

#स्वरगंधर्व_सुधीर_फडके

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे आजोळ… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.) – इथून पुढे —

इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे  खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे.  ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो.  त्यावेळी  भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे.  आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे.  संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला  घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरिमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो.  त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या  लाटा, तो थंडगार वारा, समोर  धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा.  या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.

दुसरं— टाईम इज मनी.

आणि तिसरं— इफ यू सेव्ह पेनी पाऊंड विल सेव्ह यु.

समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.

मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची.  तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या  जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही  खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये  गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.

पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे,  निवडणे वगैरे. ही सारी कामं   सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी    आदिवासी माणसं  असायची आणि त्यातही बायाच  असायच्या. त्यांचं  वागणं,  बोलणं,काम करताना गाणं,  त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं  मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची.अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी  रमायची.माझी भावंडं मला चिडवायची.पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.

निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो.  तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही  माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.

ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,

“जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे.”

‘आक्खा आंबा’ ही  कल्पना खूप मजेदार आहे बरं का?

भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद  यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे.   म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?

आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं! 

”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते.” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं.  त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.

आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता  लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे,” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका.”

“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची  शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या  अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.

पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक पेला दुधाची कहाणी… – संग्राहक : श्री सुनिल शिराळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ एक पेला दुधाची कहाणी… – संग्राहक : श्री सुनिल शिराळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तोन्से माधव अनंत पै. 

एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ!!!

खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल… 

पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही…

संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य!! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. 

या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्या आज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं! 

अशीच एक पेला दुधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. 

कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या तोन्से माधव अनंत पै यांचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावातच त्यांनी दवाखाना सुरु केला.  

खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं पण त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून तोन्से माधव अनंत पै यांनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं… सर्दी, खोकला, हगवण, उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. 

एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. 

अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत. मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार! 

थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. 

डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्याची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. 

दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे!

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. 

असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘पिग्मी डिपॉझीट स्कीम’. 

इथे या कथेचा पहिला भाग संपला. 

बायकांना बचतीची सवय लागली. 

पैसे जमा झाले. 

पण पुढे काय??? 

इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय…!

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी का पडतात याचं कारण समजावलं… त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. 

पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  

“पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून?” 

यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. 

“घरी गाय पाळा!” 

हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. “एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार?” 

डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, 

“मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या.”  

पुढचा प्रश्न होता- ‘कर्ज परत करायचे कसे?’ 

यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली…  

“बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल.”

लक्षात घ्या, हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर-अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली. त्यानंतर ‘मी पण – मी पण’ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. 

हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूधसंस्था उभी राहिली!

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरू केली. तिचं नाव होतं…

‘कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड’. 

१९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात ऊडुपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लिअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. 

याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या ‘मणिपाल विद्यापीठा’ची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण ‘सिंडीकेट बँक’ म्हणून ओळखतो!

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे… 

डॉक्टर टी.एम.ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे! 

डॉक्टर टी.एम.ए. पै यांच्या आयुष्यातल्या आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील…

डॉक्टर टी.एम.ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांची ओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. 

त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी.एम.ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. 

त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी! 

डॉ. पै यांनी केलेली मदत धीरुभाई अंबानी कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा! 

आजही रिलायन्सचा मुख्य बँकर ‘सिंडीकेट बँक’च आहे. 

काही महिन्यांपूर्वीच ‘सिंडीकेट बँके’चे ‘कॅनरा बॅंके’त विलीनीकरण झाले… पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही!

संग्राहक : श्री सुनिल शिराळकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एका म्हातारीची गोष्ट… – लेखक : बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एका म्हातारीची गोष्ट… – लेखक : बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

“एक म्हातारी होती. ती झोपडीत राहत असे. ती अत्यंत गरीब होती. तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतु तिथले शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली. एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे. म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. तो तिला म्हणाला. “म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस – मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले आणि त्यांनी झाडाला हात लावला रे लावला की ते झाडाला चिकटून लटकत रहातील आणि माझ्या संमतीशिवाय ते सुटणारच नाहीत.” साधू म्हणाला ‘तथास्तु!’ दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. सर्व ओरडत होते, “म्हातारे सोडव!, म्हातारे सोडव! झाडाला पुन्हा हात लावणार नाही. आम्हाला क्षमा कर.” असे त्यांनी कबूल केल्यावर म्हातारीने त्यांना सोडून दिले.

आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. ती यमराजाला म्हणाली, मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस मरणाचा लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.” म्हातारी म्हणाली, “माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिकटले आणि ओरडू लागले, “म्हातारे सोडव, म्हातारे सोडव” म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन. मी स्वतः इच्छा करेन, त्याच वेळी मरेन. मला इच्छामरणी करशील तर तुला  सोडवेन.” यमराज म्हणाले. “तथास्तु!” त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधीच मरणार नाही. तिचे नांव आहे :

भारतीय लोकशाही !!

“संसदमार्ग – लोकशाहीचा राजमार्ग “ : पुस्तकातून साभार.

लेखक : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?  विविधा ?

☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

एक विचार की आजचे वास्तव?

आधुनिक शिक्षणाने औद्योगिक क्रांतीला लागणारे कामगार तयार झाले का? होय. पण त्याच आधुनिक शिक्षणाने पारंपरिक आणि सामाजिक जीवनातील श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करून टाकली का? दुर्दैवाने त्याचेही उत्तर होकारार्थी आहे.

शेतकऱ्यांना शेती नको, कष्टकऱ्यांना मोलमजुरी नको, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कष्ट नकोत आणि स्त्रियांना घरकाम नको, त्यातही स्वतःच्या मुलांना पूर्णकालिक आई होऊन मोठे करण्याचे दिव्य तर नकोच नको. कोणालाही शारीरिक कष्टाची कामेच नकोशी झाली आहेत. सगळ्यांना खुर्चीत बसून आरामात मिळणारा पगार हवा आहे.

श्रमाची एक खासियत आहे. शारीरिक, अंगमेहनतीची कामे क्वचितच कुणाला आवडतात. पण एकदा का श्रमाची सवय शरीराला जडली की शरीरही तिला सोडू इच्छित नाही. श्रमाने तयार होणारे न्यूरल पाथवेज आयुष्यभर साथ देणारे ठरतात. शारीरिक श्रम ही एक थेरपी आहे. मनात दुःखाचा, अपमानाचा, क्रोधाचा आगडोंब जरी उसळला तरी त्याला शांत करण्याची किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती श्रमात आहे.

मला मनस्वी राग आहे त्या सर्व तथाकथित समाजसुधारकांच्या शिकवणुकीचा ज्यांनी पुस्तकी शिक्षणाला महत्त्व देता देता श्रमाने मिळणाऱ्या भाकरीची किंमत शून्य करून टाकली. या जगात अशी कुठलीही अर्थव्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि येणार नाही जी सगळ्यांना व्हाइट कॉलर जॉब देऊ शकेल. ब्लू कॉलर जॉब हे जगाचे वास्तव आहे आणि ते कधीही कमी महत्त्वाचे नव्हते.

शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, घरकामाला बायका मिळत नाहीत, चांगले कामसू आणि होतकरू व्हाइट कॉलर स्टाफ मेंबर्ससुद्धा आजकाल मिळत नाहीत, विद्या ही कष्टाने अर्जित करायची गोष्ट आहे हे आजकालच्या परीक्षार्थींच्या गावीच नसल्याने वर्कफोर्समध्ये गाळ माल भरला आहे ज्यांच्या हातात केवळ कागदाचे तुकडे आहेत, ज्ञान नाही. कारण कुठल्याही प्रकारचे कष्ट कोणालाच नको आहेत. घरातील मोठ्या माणसांची सेवा नकोशी झालीय, लहान मुलांना त्यांचे समाधान होईपर्यंत वेळ देणे नकोसे झाले आहे, सुनेला घरकामात मदत करायला सासूला नकोसे झाले आहे आणि बायकोला घरकामात मदत करायला नवऱ्याला नकोसे वाटत आहे. मी चार पुस्तके शिकले आणि बाहेरून कमावून आणते म्हणजे माझा आणि घरकामाचा आणि स्वयंपाकाचा संबंध नाही हे लग्नाआधी डिक्लेअर करण्यात मुली आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यता वाटू लागली आहे. एकूण काय, आनंदी आनंद आहे सगळा!

हे सगळं डोळ्यासमोर घडतंय तरी आपलं काही चुकतंय अस कोणालाच वाटत नाहीये. सगळे कसे बदललेली परिस्थिती, जीवनशैली, इ. ना दोष देण्यात व्यस्त आहेत. पण ते बदलणारे आपणच आहोत, हे मात्र कोणालाच मान्य नाहीये.

एकीकडे श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करणे आणि दुसरीकडे माणसातील मीपणा वाढीस लावणे, ह्या आधुनिक शिक्षणाने निर्माण केलेल्या अशा समस्या आहेत की, त्या समस्या आहेत हेच मुळी लोकांच्या लक्षात येत नाही.

श्रमाने अहंकार ठेचला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे! मग मोठ्या माणसांनी सुनावलेल्या खड्या बोलांचा राग येत नाही, धाकट्यांनी काळजीपोटी केलेल्या प्रेमळ सूचनांचा त्रास होत नाही, घरातल्या किंवा ऑफिसमधल्या आळशी माणसांनी न केलेल्या कामामुळे आपल्यावर वाढलेल्या बोजाचा अवाजवी त्रास होत नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे, माझे काही अस्तित्व आहे आणि इतरांची मर्जी राखता राखता माझे अस्तित्व कसे नष्ट होत चालले आहे आणि काय माझ्या शिक्षणाचा उपयोग, चूल मूल शिवाय मला आयुष्य आहे किंवा मी काय पैसे कमावण्यासाठी आणि इतरांना आधार देण्यासाठीच जन्माला आलो आहे का, असे प्रश्न लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पडणे कमी होते.

या पोस्टद्वारे आधुनिक शिक्षणाचा विरोध करायचा नसून आधुनिक शिक्षणामुळे केवळ लाभ नाही तर हानीही झाली, हे निदर्शनास आणणे आहे. आणि ती हानी वैचारिक, सांस्कृतिक पातळीवर घडून आली आहे, हे शोचनीय आहे.

जाता जाता एक वास्तवात घडलेला प्रसंग: माझी एक आंबेडकरवादी मैत्रीण होती. तिच्या मोठ्या बहिणीला जिने पदव्युत्तर शिक्षण घेतले तिच्या सासरी तिला खूप जाच होऊ लागला. त्याला अनेक कारणे होती पण त्यातील एक मुख्य कारण असे होते की ही बहीण पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्या कारणाने शेतीत सासरच्यांची मदत करू इच्छित नव्हती. माझ्या मैत्रिणीचेही असे म्हणणे होते की शिक्षण घेतले तर तिने मोलमजुरीची, कष्टाची कामे का करावीत? हाच माझा मुद्दा आहे: शिक्षण घेतले की स्वतःच्या घरच्या शेतीतही काम करणे कमीपणाचे वाटावे, हे जे ब्रेनवॉश काही तथाकथित समाजसुधारकांनी गेल्या अडीचशे वर्षांत भारतीयांचे घडवून आणले आहे ना, ते आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे.

लेखिका – सुश्री परिज्ञा पुरी 

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो – 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार  गाव.  झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर,  हिरवे माळरान,  कौलारू,  चौसोपी,  ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा,  शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड.  सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं.  प्रचंड दंगामस्ती,  सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा  सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं.  गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती.  तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती. 

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर,डबा ऐसपैस, लगोरी,  लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती.  विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट  कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये  बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा  पत्ता – धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत,  मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी.  सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ  म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी,  इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी,प्रसन्नमुखी  मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस  वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते.  खूप आठवणी आहेत.  माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं  आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई.  वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं  की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत.  तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची  पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार निरेचा अनुभवही  फारच आनंददायी असायचा. 

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक,  अतुल आणि संध्या.  संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची.  सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं.  आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं,  मज्जा करायची. धम्माल! 

धमाल तर होतीच.  पण?  हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात  ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे  होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप,  स्वच्छ.  फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही.  दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला,  वॉशबेसीनवरचा  पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात  सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे,शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ  सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची  निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने  त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा. 

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून  घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा.  पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं.  आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही  भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत  विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका  सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली.  तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या,  मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती.  पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

 – क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares