मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्पाय गर्ल”… लेखक : श्री शिरीष अंबुलगेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

१९२७ मध्ये रंगून (तत्कालीन बर्मा, आत्ताचे म्यानमार) शहरा HVतील एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी ‘सोन्याचा चमचा’ घेऊन जन्माला आली ! हो, अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच; कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते! सुखवस्तू घरातील मंडळींनी त्या मुलीचे नाव “राजमणि” ठेवले. राजमणिच्या वडिलांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता. त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदतदेखील करीत असत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेते किंवा भारतीय व्यावसायिक रंगूनला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.

एकदा गांधीजी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. घरातील सर्वांचा परिचय झाला. राजामणि मात्र कुठे दिसली नाही म्हणून सर्वजण तिला शोधत असता, घराच्या बागेत राजमणि हातात बंदूक घेऊन निशाणेबाजी करतांना आढळली. दहा वर्षाच्या एका मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले, ते तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, “बेटी, तुला बंदुक शिकायची काय गरज?”

“इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी”, आपले निशाणावरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजमणि उत्तरली.

“हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली, आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत. तुलादेखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आलं पाहिजे,” गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले.

“का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही.” अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजामणि उत्तरली, “मी मोठी झाल्यावर निदान एकातरी इंग्रज अधिकाऱ्याला शूट करणार!”

गांधीजी अवाक होऊन ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत.

#एके दिवशी राजमणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणाने ती पेटून उठली. गांधीजींची ‘अहिंसा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्ध चा ‘सशस्त्र लढा’; यात तिला नेताजींचा प्रखर विरोध अधिक भावला!

#एका सभेमध्ये नेताजींनी लोकांना अपील केले की, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी. हे ऐकून सोळा वर्षाच्या राजमणिने आपले सारे सोन्याचे दागिने काढून नेताजींच्या ‘आझाद हिंद सेनेला’ (INA-Indian National Armi- आयएनए) दान केले.

‘एवढे सारे सोन्याचे दागिने कुणी दिले?’ याची चौकशी करत असताना नेताजींना कळाले की, एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर; ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजमणिच्या घरी गेले. सर्व दागिने राजामणिच्या वडिलांच्या हाती सुपूर्द करतांना नेताजी म्हणाले, “मला वाटतं, आपल्या मुलीने चुकून हे सर्व दागिने आम्हाला दिले आहेत. मी ते सर्व परत करायला आलो आहे.” खरंतर, राजमणिच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं; त्यामुळे त्यांच्या मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नेताजी परत करीत असणाऱ्या त्या दागिन्यांकडे पहात ते फक्त हसले. तेवढ्यात राजमणि तिथे आली. समोरचा प्रकार पाहून ती रागात उद्गारली, “हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत; वडिलांचे नाही! मी आता ते आपल्याला दान केले आहेत आणि दान केलेली वस्तू मी परत घेत नाही.”

#त्या षोडशवर्षीय मुलीचा दृढनिश्चय पाहून नेताजींना तिची प्रशंसा केल्याशिवाय रहावले नाही, ते राजामणीला म्हणाले, “लक्ष्मी येते आणि जाते; परंतु सरस्वतीचं तसं नाही. सरस्वती म्हणजे बुद्धी! ती आली की परत कधीच जात नाही; तर ती सतत वाढत जाते! तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस; म्हणून मी आजपासून तुझं नाव “सरस्वती” ठेवतो! त्या दिवशीपासून राजमणि आता “सरस्वती राजमणि” या नावाने ओळखू जाऊ लागली.

परंतु राजमणी एवढ्यावरच थांबली नाही. तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली. तिला त्यांच्या आर्मीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली. सरस्वती राजमणिचा निश्चय एवढा पक्का होता की; नेताजी तिला नाही म्हणू शकले नाहीत. तिला ‘आयएनए’ मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले!

सुरुवातीला सरस्वती राजमणि सैन्याच्या सेवा-सुश्रुशेचं काम करू लागली. परंतु केवळ या कामावरती सरस्वती राजामणिचे समाधान झालं नाही. तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं. #तिची जिद्द आणि बुद्धी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली. इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या ‘आयएनए’ च्या कार्यालयापर्यंत पोचवणे अशी महत्वाची जिम्मेदारी देण्यात आली. अशाप्रकारे सरस्वती राजमणि ही सर्वात कमी वयाची गुप्तहेर ठरली!

खरंतर गुप्तहेराचे काम म्हणजे; सदैव प्राण संकटात ठेवणे! गुप्तहेर जर पकडला गेला तर त्याला हाल-हाल करून मारण्यात येतं, शिवाय आपली माहिती शत्रूला जाण्याची शक्यता असते; म्हणून गुप्तहेर जर शत्रूकडून पकडला गेला तर त्याला स्वतःच प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात. आझाद हिंद सेनेसाठी आपले प्राणपणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत-हसत स्वीकारली!

#लांबसडक केस कापण्यात येऊन मुलांसारखे छोटे केस करून झाले. मुलींच्या पेहरावाऐवजी मुलाचे कपडे घालण्यात आले. राजमणि आता “मणि” नावाने मुलगा झाला! तसेच वेष बदलून नीरा आर्य, मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणीदेखील हेरगिरीच्या कामगिरीसाठी नियुक्त केल्या गेल्या.

सफाई-कर्मचारी, लाउंड्री- बॉय आदींच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळविते झाले. काकदृष्टीने आणि प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या छावणीतील हालचाली, गोपनीय माहिती, बातम्याच नव्हे तर प्रसंगी शस्त्रदेखील नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचवणे सुरु झाले. सुमारे दोन वर्षे त्यांची हेरगिरीची कामगिरी बिनबोभाटपणे चालू होती. दुर्दैवाने एकेदिवशी “दुर्गा” इंग्रजांच्या तावडीत सापडली. तिचे आत्महत्येचे प्रयत्न विफल झाले. इंग्रजांनी तिला पकडून जेलमध्ये बंदिस्त केले! आता सारेच बिंग बाहेर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून पळून जाणे सरस्वती राजामणिच्या मनाला पटेना. शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचे ठरवले. पुन्हा आपला वेष बदलून; ती दुर्गाला जिथे डांबून ठेवले होते तिथे पोचली. पिनच्या सहाय्याने कुलूप उघडून दुर्गाला सोडवले आणि पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन दुर्गासह पसार होण्यात यशस्वी झाली. परंतु लगेचच हि बाब इंग्रज सैन्याच्या निदर्शनास आली. एकच गोंधळ माजला, “लडकी भाग गयी, लडकी भाग गयी” करीत इंग्रजी सैन्याने शोधाशोध सुरु केली. सरस्वती राजामणि, नीरा आर्य आणि दुर्गा जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या. त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले, मुली हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी मुलींच्या दिशेने गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी सरस्वती राजामणिच्या पायाला लागली. रक्ताळलेला पाय तसाच घेऊन ती खुरडत खुरडत पळू लागली. कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते! आझाद हिंद सेनेच्या त्या शूर सेनानी होत्या! आता पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या… गोळीमुळे झालेली भळभळती जखम घेऊन नि उपाशीपोटी त्यांनी तीन दिवस झाडावरच काढले. केव्हढे ते साहस, धडाडी, सहनशीलता, जिद्द, त्याग नि नेताजींवरील निष्ठा!

जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अदमास घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचल्या. अवघ्या अठरा वर्षाच्या त्या कोवळ्या सरस्वती राजामणिचे धाडस नि जिद्द पाहून नेताजी खुश झाले. #तीन दिवस पायात बंदुकीची गोळी घुसून राहिल्याने सरस्वती राजामणि एका पायाने कायमची अधू झाली. या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजमणिला आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झाँसी ब्रिगेड’ मध्ये “लेफ्टिनेंट” चे पद देऊन तिचा सन्मान केला!

इ. स. १९४५ मध्ये इंग्रजांचा विजय होऊन दुसरे विश्वयुद्ध समाप्त झाले. आझाद हिंद सेना बरखास्त करून नेताजींनी सैनिकांना भारतात परतण्याची मुभा दिली. दुर्दैवाने त्याच दरम्यान तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि आझाद हिंद सेनेचे हजारो देशभक्त पोरके झाले!

#पुढे दोन वर्षात १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. या नव्या भारताला सरस्वती राजामणि सारख्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची गरज उरली नव्हती. भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्या सुखी नि ऐश्वर्यसंपन्न तारुण्याची राखरांगोळी करून घेणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या वाट्याला उपेक्षाच आली!

#एकेकाळी सोन्याच्या खाणींची वारसदार असलेल्या सरस्वती राजमणि; चेन्नईमधील एका पडझड झालेल्या घरात किरायाने राहू लागल्या. “सुमारे पंचवीस वर्षांनंतर” मिळालेली स्वातंत्र्य सैनिकांची मिळालेली तुटपुंजी पेन्शन यावरच त्यांची गुजराण चाले. तशाही परिस्थितीत त्यांनी समाजसेवाच केली. ड्रेसेस शिवणाऱ्या टेलरकडून उरलेल्या कापडाचे तुकडे त्या आणायच्या. त्यांना जोडून, त्याचे कपडे शिवून; ते गरीब नि गरजू लोकांना फुकटात देऊ करायच्या.

दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर; एका शोध पत्रकाराने ‘सरस्वती राजमणिला’ शोधलं. त्यांची माहिती आणि सद्यस्थिती वर्तमानपत्रात छापली. तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या निदर्शनास ती बातमी आली; पन्नास वर्षानंतर का होईना पण जयललिताजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सरकारी घर आणि भत्ता देऊ केला!

दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सरस्वती राजमणि या शूर सेनानीने शेवटचा श्वास घेतला!

#चेन्नईमधील छोट्याशा सरकारी घरात आयुष्य काढणाऱ्या सरस्वती राजामणि, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनसंग हीरोज’ चे प्रतिनिधित्व करतात. ज्यांना ना इतिहासाच्या पानांवर गौरवास्पद स्थान मिळाले, ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले, ना हि जनतेने त्यांच्या कर्तृत्वाचे गीत गायले! हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही; तो नवीन पिढीपर्यंत पोचला नाही तर कदाचित त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार देखील नाही आणि मग स्वातंत्र्य म्हणजे केवळ “सत्याग्रह आणि अहिंसेचे बक्षीस” अशीच धारणा बनली जाण्याचा धोका संभवतो. सरस्वती राजामणिसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण सारे त्यांचे ऋणी आहोत, स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांचे कर्तृत्व आणि योगदान सर्वदूर पोचवण्याचे काम केलेतरी आपण काही प्रमाणात त्यांचा गौरव करू शकलो असे म्हणता येईल.

“स्पाय गर्ल” “सरस्वती राजमणिला” ही एक श्रद्धांजली ! जय हिंद !

लेखक : श्री शिरीष अंबुलगेकर

मुंबई, मो 7021309583

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक बोधकथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक बोधकथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? जाणून घ्या कारणं…

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. 

त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!’

प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही, हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो.  जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात.   तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.

एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा कि…रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते…तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते… माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत…आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत…

नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा… कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभ असतं…! 

“माझं चुकलं…”  हे शब्द समोरच्याचा काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं”…हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत होवो हीच आज वारुणी योग दिनी सदिच्छा… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रामका गुणगान करिये… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ राम का गुणगान करिये… ☆ श्री विश्वास देशपांडे

पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायिलेले ‘ गुणगान करिये रामका ‘ हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच ! 

मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ‘ रामका गुणगान करिये.’ रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करतो, ते त्यांच्यात विशेष असे अलौकिक गुण आहेत म्हणून. आपण रावणाचं, कंसाचं, औरंगजेबाचं गुणगान करत नाही. आपण आपल्यासमोर असेच आदर्श ठेवतो की ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल, प्रेरणा घेता येईल. आजच्या या लेखात प्रभू श्रीरामांचे असेच काही गुण आठवू या. त्या निमित्ताने त्यांचं गुणगान करू या.

सुरुवातीला मला डोळ्यासमोर दिसतो तो, वसिष्ठांच्या आश्रमात शिकणारा राम. राम राजपुत्र असला तरी, आश्रमात तो एक वसिष्ठ ऋषींचा आज्ञाधारक शिष्य म्हणूनच वावरतो. इतर शिष्यांबरोबरच आश्रमातील सगळी कामे करतो, नियम पाळतो. इतर विद्यार्थी जे काही अन्न ग्रहण करतील तेच अन्न तोही ग्रहण करतो. कुठेही राजपुत्र असल्याचा तोरा तो मिरवत नाही. आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर निघताना वसिष्ठ ऋषींचा आणि गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन तो निघतो. त्यावेळी गुरुमातेला तो म्हणतो, ‘ या आश्रमात तुम्ही आम्हाला मातेचे प्रेम दिले. मातेची आठवण येऊ दिली नाही. आमची पुत्रवत काळजी घेतली. या आश्रमातील वास्तव्यात माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर, आपण उदार मनाने मला क्षमा करावी. ‘ केवढा हा नम्रपणा !

आश्रमातील शिक्षण पूर्ण करून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आपल्या गृही परततात. आता खरे तर काही दिवस त्यांचे मौजमजेचे आणि विश्रांतीचे. पण अशातच विश्वामित्र ऋषी येतात. त्यांच्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात म्हणून संरक्षणासाठी रामाला आपल्याबरोबर पाठवण्याची मागणी करतात. वसिष्ठ ऋषींच्या समजावण्यानंतर दशरथ राजा रामाला विश्वामित्रांसोबत पाठवतो. अशा वेळी राम आनंदाने त्यांच्याबरोबर जातो. सोबत लक्ष्मणही असतोच ! लक्ष्मण हा रामाची सावली आहे. सावली जशी आपली साथ सोडत नाही, तशीच लक्ष्मणही रामाची साथ कधीच सोडत नाही. विश्वामित्रांसोबत वनातून जात असताना राम आपल्या मधुर वाणीने आणि आज्ञाधारकतेने विश्वामित्रांचे मनही जिंकून घेतो. त्यांना म्हणतो, ‘ कदाचित माझ्या शिक्षणात काही अपूर्णता राहून गेली असावी. मला तुमच्याकडून काही नवीन शिकायला मिळावे म्हणूनच ही नियतीची योजना असावी. ‘ विश्वामित्र आपल्या या गोड आणि तेजस्वी शिष्यावर बेहद्द खुश होतात आणि राम लक्ष्मणाला काही दिव्य अस्त्रं बहाल करतात, जी त्यांना पुढील काळात उपयोगी पडतात. ‘

मग मला आठवतो तो राम की ज्याला राज्याभिषेक होणार असतो. खरं तर केवढा आनंदाचा हा प्रसंग ! आणि त्यानंतर लगेच कैकयी आपले दोन वर दशरथाकडून मागून घेते. एका वराने रामाला वनवासात पाठवावे आणि दुसऱ्या वराने भरताला राजा करावे. दोन्ही टोकाचे प्रसंग ! एक अति आनंदी होण्याचा, तर दुसरा अति दुःखी होण्याचा. पण या दोन्ही प्रसंगात रामाची स्थितप्रज्ञता आपल्याला दिसते. तो आनंदाने हुरळून जात नाही की वनात जावे लागेल म्हणून दुःखी होत नाही. कोणतीही परिस्थिती संयमाने कशी हाताळावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम. म्हणूनच तो ‘ मर्यादापुरुषोत्तम ‘ आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात सागराचे गांभीर्य आहे.

दशरथ राजामध्ये रामाला वनवासात जा म्हणून सांगण्याची हिंमत राहिलेली नसते. पण आपल्या पित्याने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून तो आनंदाने वनवासाला जायला निघतो. खरं तर प्रजा त्याच्या बाजूनं असते. त्याने उठाव केला तरी प्रजेने त्याची साथ दिली असती एवढा तो प्रजेला प्रिय होता. पण रामाचा निर्धार, रामाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यात कालत्रयीही बदल होणार नाही. सीतेसारखी तरुण आणि त्रिभुवनात जिच्या सौंदर्याची कोणी बरोबरी करू शकणार अशी पत्नी. नुकताच विवाह पार पडलेला. अशा वेळी आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीचा मोहही त्याला अडवू शकत नाही. सीता नंतर त्याच्यासोबत जाते हा भाग वेगळा.

कैकयीमुळे आपल्या प्राणप्रिय असलेल्या बंधूला वनात जावे लागते हे लक्ष्मणाला कळते, तेव्हा तो कैकयीची निर्भत्सना करतो. अशा वेळी राम त्याला सुंदर शब्दात समजावतो. ‘ लक्ष्मणा, अरे जशी माता कौसल्या, माता सुमित्रा तशीच माता कैकयी. माता ही सदैव आदरणीय असते. ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि ‘ हे त्याचे ब्रीद आहे. ‘ नाहीतरी मला काही ऋषीमुनींची भेट घ्यायची इच्छा आहे. वनात गेल्यानंतर अनायासे ही इच्छा पूर्ण होईल, ‘ असे अत्यंत समजूतदारपणा आणि त्याच्या मनाचे औदार्य दाखवणारे उद्गार तो काढतो.

वनात असतानाही भरत त्याला भेटायला येतो. अयोध्येला परत येण्यासाठी खूप विनवणी करतो. परंतु राम त्याला निर्धारपूर्वक नकार देतो. शेवटचे अस्त्र म्हणून तो वसिष्ठांची पण तशीच इच्छा आहे असे रामाला सांगतो. पण राम भरताला म्हणतो, ‘ एकदा आपण वडिलांना जे वचन दिले ते पाळले नाही तर रघुकुलाच्या कीर्तीला कलंक लागेल. ‘ ‘ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई .’ हे ब्रीद कसोशीने पाळणारा राम आहे. या ठिकाणी दुसरा कोणीही असता तर भावाने विनंती केली, वसिष्ठांचीही तशीच इच्छा होती, असे सोयीस्कर उद्गार काढून अयोध्येला परत जाऊ शकला असता.

रामाने एकदा ज्याला आपले म्हटले, हृदयाशी धरले, त्याची साथ कधीच सोडली नाही. मग तो गुहक असेल, निषादराज असेल, सुग्रीव असेल किंवा बिभीषण असेल. शरणागताला आश्रय देणे, प्रसंगी आपल्या प्राणांचे मोल त्यासाठी द्यायला तयार होणे हे रामाचे ब्रीद होते. मित्र जोडताना जातपात, उच्चनीच, स्त्रीपुरुष असा भेद रामाने कधीच केला नाही. रामाने रावणावर विजय मिळवला, लंका जिंकली. ठरवले असते तर तो लंकेचा राजा होऊ शकला होता. पण तो मोह त्याला नव्हता. रावण जर रामाला शरण आला असता, तर रामाने त्याचेही मनपरिवर्तन केले असते. त्याचे राज्य त्याला परत दिले असते. पण तसे व्हायचे नव्हते. कोणी तरी रामाला विचारले, ‘ तुम्ही बिभीषणाला राज्य द्यायचे वचन दिले आणि ते त्याला दिले. पण जर रावण तुम्हाला शरण आला असता, आणि त्याने राज्याची मागणी केली असती तर काय ? ‘ अशा वेळी रामाने फार सुंदर उत्तर दिले आहे. तो म्हणतो, ‘ रावण माझ्याकडे आला असता तर, त्याला मी अयोध्येचे राज्य दिले असते आणि आम्ही चारही भाऊ अरण्यात निघून गेलो असतो. ‘ असे मनाचे औदार्य दाखवणारे उदगार फक्त रामच काढू शकतो. रावणाचा वध झाल्यानंतर त्याचा यथोचित अंत्यसंस्कार करावा असे तो बिभीषणाला सुचवतो. मृत्यूनंतर वैर संपते आणि त्याचा आदर्श रामाने घालून दिला.

रामाच्या चरित्रात असे त्याच्या गुणविशेष दर्शवणारे अनेक प्रसंग आहेत. महर्षी वाल्मिकींनी देखील श्रीरामाला देव म्हणून आपल्यासमोर ठेवले नाही. त्याच्या गुणांची पूजा आपण बांधावी, त्याचे अनुकरण करावे हाच त्यांचा उद्देश होता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले आहेत, तेच उद्गार तंतोतंत रामालाही लागू होतात. समर्थ म्हणतात

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु ।

अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ।।

अशा या गुणनिधी असलेल्या रामाचे गुणगान करू या. त्याचे थोडे तरी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या. जय श्रीराम !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘श्रीराम’: काश्मीरचं सांस्कृतिक संचित – लेखक : श्री फैसल शाह ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘श्रीराम’: काश्मीरचं सांस्कृतिक संचित – लेखक : श्री फैसल शाह ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

काश्मिरी भाषेत इंद्रधनुष्याला राम दून म्हणतात. राम दून म्हणजे रामाचं धनुष्य. इथले रजई विणणारे कारागीर कापूस पिंजण्यासाठी धनुष्याची जी दोरी वापरतात तिलाही दून असंच म्हणतात. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या जवळच असणाऱ्या एका शांत- निवांत खेड्यात मी लहानाचा मोठा झालो. अक्रोडाच्या वनराईतून आम्ही सारी मुलं या मायावी कमानींचा मागोवा घेत फिरायचो. त्या अद्‍भूत सौंदर्यानं तर आम्ही मोहून जात असूच पण राम दून या शब्दानं माझ्यावर टाकलेली मोहिनी त्यापेक्षा जास्त जबरदस्त होती.*

इतकं सुंदर रंगीबेरंगी धनुष्य स्वत:जवळ बाळगणारा हा राम कोण बरं असेल? आणि या नैसर्गिक कमानीला हे असलं गूढ नाव कसं काय पडलं असेल ? की याचा कुणा पिंजाऱ्याशी काही संबंध असेल ? अशा अनेक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती मी माझ्या वडिलांवर करायचो. माझे वडील एक शिक्षक होते आणि अनेकविध भाषा त्यांनी स्वतःच प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेल्या होत्या.

पण असे प्रश्न मी विचारले, की दरवेळी एका काश्मिरी अंगाईतील “राम राम भद्रेन बूनी” अशी सुरुवात असलेल्या दोन ओळी ते म्हणत असत. आणि मग लगेच शिक्षकाच्या भूमिकेत शिरून या इंद्रधनुष्यातील तानापिहिनिपाजा असा रंगांचा विशिष्ट क्रम मला सांगत. पुढे ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी असे ओळीने सारे रंग मला समजावून देऊ लागत. आमची ही गाडी शेवटच्या रंगावर आली, की माझ्या प्रश्नातल्या रामाची चर्चा आता पुन्हा केव्हातरी करावी लागेल हे मी मनोमन समजून चुकत असे.

अति प्राचीन काळापासून काश्मीरमध्ये अद्वैतवादी शैवपंथाचं प्राबल्य आहे. परंतु इस्लामचं आगमन होण्यापूर्वीच्या काळात भगवान श्रीराम आणि रामायणही काश्मिरी जाणिवेत तितकेच खोलवर रुजलेलं आहे, हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. कल्हणरचित राजतरंगिणी हे बाराव्या शतकातील एक ऐतिहासिक इतिवृत्तात्मक काव्य आहे. काश्मीरचा राजा दुसरा दामोदर यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा कल्हणानं त्यात तो सांगितलेला आहे.

श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला ‘दामोदर करेवा’ असं नाव दिलेलं आहे ना, तोच हा राजा. 

कल्हण सांगतो, की एकदा या राजा दामोदरानं धर्मधुरिणांना भोजन द्यायला नकार दिला. त्या वेळी संतप्त झालेल्या त्या धुरिणांनी त्याला तू सर्प होशील असा शाप दिला. मात्र या शापाला एक उ:शापही होता. राजा दामोदर यानं संपूर्ण रामायण एकाच दिवसात श्रवण केलं तर मात्र हा शाप निष्फळ ठरेल, असा तो उ:शाप होता. प्राचीन आणि मध्ययुगीन काश्मिरात रामायणाचं पठण अतिशय लोकप्रिय होते, याचा हा अत्यंत स्पष्ट पुरावा होय.

तरीही आता इतकी शतके उलटून गेल्यावर आणि इतक्या ऐतिहासिक उलथापालथी झाल्यानंतर आजही राम हा काश्मिरींच्या जाणिवेचा भाग उरला आहे का, हा प्रश्न येतोच. सांस्कृतिक प्रवाहाचं सातत्य म्हणता येईल असं काही खरोखरच अस्तित्वात असतं काय ? काश्मिरी मुस्लिमांच्या पिढ्यांमागून पिढ्यांनी भगवान रामाचा वारसा आपल्या सुप्त मनात कसा काय जपला असेल ? या आणि अशा इतरही काही बाबी समजून घेण्याची माझी इच्छा होती.

आमच्या गावात पंडितांची बरीच घरे होती. ते सारे बाजार भागात राहत. आम्ही टेकड्यांच्या बाजूला राहायचो. पण मी सहा वर्षाचा झालो तेव्हा आमच्या शेजारी राहणारे सारे पंडित दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळं गाव सोडून निघून गेले. त्या काळातलं फारसं काही मला आता आठवत नाही. पण एक गोष्ट मला आजही स्पष्ट आठवते. हिवाळ्यातले थंडगार वारे संध्याकाळी धुरकटून येत.

आमच्या घराच्या कुंपणावरून अंगणात राख येऊन पडत होती. वाऱ्याच्या झोताबरोबर अर्धवट जळलेले कागदही येत होते. गावच्या पूर्वेला दूरवर उफाळलेल्या भयानक ज्वाळा आम्ही पाहतच राहिलो होतो. 

दहशतवाद्यांनी सगळ्या पंडितांना जम्मूकडे निघून जायला भाग पाडलं होतं. त्या दहशतवाद्यांचे काही सहानुभूतीदार होतेच गावात. ते रोज एक अशा नेमाने पंडितांची मोकळी घरे एकेक करून पेटवून देत होते.

निर्मनुष्य झालेल्या त्या घरांमधून अर्धवट जळालेल्या वह्या, कपड्यांच्या जळक्या चिंध्या आणि अक्रोड वृक्षांची काळवंडलेली पाने गावभर विखरून पडत होती. इतिहासाचे निषिद्ध अवशेष ज्वाळांच्या मुखातून वारा जणू खेचून बाहेर आणत होता. आख्खं काश्मीर त्या काळात वैश्विक जिहादी केंद्र बनत चालले होते. अशा काळरात्री कुणी आमच्याशी राम आणि रामायणाच्या गोष्टी करेल, अशी सुतराम शक्यता नव्हती.

या गोष्टीला बरीच वर्षे उलटल्यावर एक परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी म्हणून मी जिल्हा प्रशासनाचा अनुभव घेत असताना बालपणी पडलेल्या त्या प्रश्नांचा भुंगा पुन्हा माझ्या कानात भुणभुण करू लागला. 

एकदा माझ्या कामाचा भाग म्हणून काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील सुथरण नावाच्या एका खेड्यात मी गेलो होतो. रामायणाच्या कथेची या गावातील आवृत्ती ऐकून मी थक्कच झालो.

जिथं पाहावं तिथं हिरवीगार कुरणं आणि पाईन वृक्षांची राई दिसत असलेलं सुथरण किंवा सीताहरण नावाचं हे गाव अतिशय मोहक दिसत होतं. धरतीवर जणू स्वर्गच अवतरला होता. पण त्या काळात या दुर्गम गावी जायला पक्का रस्ता नव्हता. तिथल्या लोककथेनुसार याच गावातून रावणानं सीतामाईचं अपहरण केलेलं होतं. त्या लोकांनी मला गोड्या पाण्याचा एक खळाळता झरा दाखवला. जवळच एक विशाल खडक होता.

त्यांनी मला सांगितलं, की श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण आपल्या १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात एके दिवशी अगदी याच ठिकाणी आले होते. जवळच कांच्छेतपूर नावाचं आणखी एक छोटेसं गाव होतं. काश्मिरी भाषेत कानछेत म्हणजे कान तुटलेली. यात नक्कीच रावणाची बहीण शूर्पणखा हिचा संदर्भ उघड दिसत होता. वाल्मिकी रामायणानुसार लक्ष्मणानं तिचंच नाक आणि कान छाटून टाकले होते.

चौदाव्या शतकात काश्मिरात इस्लामचं आगमन झाले. काश्मिरातील बहुसंख्य लोकांनी हा नवा धर्म स्वीकारला. पण शैव पंथ आणि सुफी इस्लामची वैश्विकता काश्मिरी जाणिवेत सदासर्वकाळ घट्ट रुजलेलीच राहिली. लल्लेश्वरी ऊर्फ लाल देद आणि शेख उल आलम यांच्या शिकवणुकीमुळं मुस्लीम प्रजा हिंदू आणि मुस्लीम यात भेद न करणारी बनली.

संघटित धर्मातील दृढ कट्टरतेपेक्षा समन्वयवाद आणि अतींद्रिय आध्यात्मिक अनुभूतीच काश्मिरी लोकांनी अधिक मोलाची मानली. सांस्कृतिक निर्मितीचा भाग म्हणून विविध कला, काव्य, संगीत, वास्तुकला, कारागिरी, उत्सव आणि धार्मिक परंपरांची निर्मिती झाली. त्या सर्वांनी इस्लाम, हिंदू आणि बौद्ध मतांचं मीलन घडवून आणले आणि काश्मीरला शांततापूर्ण सहजीवनाचं एक अनन्यसाधारण उदाहरण बनवलं.

असं असलं तरी भगवान शिवाचा अंमल असलेल्या प्रदेशात रामाचं भ्रमण होणं ही बाब मला बराच काळ चक्रावून टाकत राहिली. पण मग आणखी एका ठिकाणाची माहिती मला मिळाली. हे ठिकाण सुथरणपासून १५० किमी अंतरावर होते. कूपवाडा जिल्ह्यातील फर्किन नावाचे गाव होतं ते. उंच टेकड्यांमधली ती एक चिमुकली वस्ती होती.

सुथरण गावाशी तिचा सुतराम संबंध नव्हता. त्याही गावात “राजा राम की लादी” नावाचं एक स्थळ होतं. सुथरणसारखीच एक आख्यायिका या स्थळाशीही निगडित होती. या स्थळाजवळही एक गोड्या पाण्याचा झरा आहे. तो सीता सर या नावानं ओळखला जातो. रामाच्या वनवास काळात सीतामाई या झऱ्यापाशी येऊन गेल्या असं सांगितलं जातं.

कूपवाड जिल्ह्यातले फर्किन आणि मध्य प्रदेशातील ओरछा या दोन्ही ठिकाणात एक साम्य दिसतं. तिथंही ‘भगवान राम राजाराम’ याच नावानं ओळखले जातात. संपूर्ण भारतात रामाला राजाराम म्हणणारी अशी फारच थोडी ठिकाणं सापडतात.

भगवान राम हे इंडोनेशियापासून थायलंडपर्यंत आणि कोरियापासून कूपवाडापर्यंत उसळत वाहत राहिलेल्या भारताच्या आध्यात्मिक प्रवाहाचे समृद्ध चिरस्रोत आहेत. काश्मिरी जाणिवेत, भाषेत, म्हणीत, वाक्प्रचारात, लोककथांत, आख्यायिका आणि मिथकात, कलाप्रकारांत, विचारपद्धतींत, स्थळांच्या नावात आणि लिखित सामग्रीत भगवान राम गेली हजारो वर्षे ध्रुवीय ज्योतीप्रमाणं प्रकाशत राहिले आहेत.

एक मुस्लीम या नात्यानं भले मी आज एका भिन्न धर्माचं आचरण करत असेन पण माझी ओळख, माझा इतिहास आणि माझा वारसा श्रीरामाचं स्तवन करतो. ख्यातनाम उर्दू कवी डॉ. इकबाल यांनी श्रीरामाचं वर्णन इमाम ए हिंद (हिंदनायक) आणि भारताचं भूषण अशा शब्दांत केलंय. भारतीय या नात्यानं भगवान रामाच्या काश्मीर यात्रेची स्मृती आम्ही काश्मिरी लोक आमच्या सांस्कृतिक संचिताचा हिस्सा म्हणून भक्तिभावानं जतन करतो.

लेखक : श्री फैसल शाह  

(लेखक हे मूळचे जम्मू-काश्मीरमधील ‘आयएएस’ अधिकारी असून सध्या केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात कार्यरत आहेत.)

[email protected]

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उडी शेवटची… — लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ उडी शेवटची… — लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

व्हेल हा मत्स्य योनीतला राजस मासा, व समुद्रातील सर्वोच्च भक्षक!  (Apex Predator). असं म्हणतात की व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. पूर्ण वाढलेला व्हेल जवळजवळ 200 टन वजनाचा आणि शंभर फूट  लांब इतका असतो. Toothed व Baleen असे व्हेल चे दोन प्रकार. डॉल्फिन, पॉर्पोईज या व्हेलच्याच उपजाती.   पृथ्वीवरील सर्व ठिकाणी समुद्रात व्हेल्सचा वास असतो.  त्यांची आवाज काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. समुद्राखालून सोनार लावल्यास व्हेलचे आवाज ऐकू येतात. व्हेल्सच्या या आवाजांचा वापर करून युद्धामध्ये गुप्तहेर पाणबुड्या टेहळणीसाठी वापरतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व कोणाला समजू नये.

व्हेल बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु आज मी व्हेलच्या शेवटच्या उडी बद्दल लिहिणार आहे.  दर्यावर्दी  लोकांची अशी एक म्हण आहे  – “When a whale falls, everything grows” हे कसे काय? तेच सांगणार आहे. असा विश्वास आहे की, व्हेल माशात एक अजब क्षमता असते. मरण जवळ आल्याची पूर्व सूचना! जेव्हा ही वर्दी येते तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कोठेतरी शांत व एकांत स्थळ  निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर कवायती करणार असतो. त्याचे हे शेवटचे व उत्तम सादरीकरण असणार असते. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो अगदी शांतपणे, लयबद्ध व आनंदात ! शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन तो त्याची शेवटची उडी मारतो, डोळे बंद करतो, श्वासही बंद करतो व समुद्रतळाकडे हळूहळू जाऊ लागतो. होय… आता मरणास तो आनंद, संयम व निर्भीडपणे  सामोरा जातो. हीच ती व्हेल ची शेवटची उडी.

व्हेल ची ही शेवटची उडी अनेक नवनिर्मितीला आमंत्रण देत असते.  शार्क व ईल माशांना याचा पहिला सुगावा लागतो.  ते तुटून का पडत नाहीत? कारण एवढा प्रचंड महाकाय मासा त्यांना अनेक दिवस खाद्य म्हणून पुरणार असतो. जेव्हा व्हेलचे शरीर समुद्रतळावर येऊन स्थिर होते तेव्हा समुद्रतळातले छोटे छोटे मासे (Crustaceans) त्यातील प्रोटीन्स व ऑरगॅनिक पदार्थ खाऊ लागतात. ते त्या शरीरात वस्ती करूनच राहतात.  जवळजवळ दोन वर्ष ही प्रक्रिया चालते. व्हेलच्या शरीरातील सर्व काही खाऊन फस्त झाल्यावर जो उरतो तो फक्त त्याचा सांगाडा! त्यांचे प्रजनन तर चालूच असतं. आता यापुढे काम असतं एका बॅक्टेरियाचं. (Anaerobic Bacteria). सांगाडा पोखरून त्यातील लिपिडचे विच्छेदन करून त्यापासून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण केला जातो. ही प्रक्रिया येथेच थांबत नाही तर यातूनही व्हेलचे जे पार्थिव असते त्याचे रूपांतर रिफ (प्रवाळ) मध्ये होते. हेच ते समुद्र जलचरांचे छोटे छोटे निवास. शंभर वर्ष ही प्रक्रिया चालते व एका व्हेल माशाचा शेवटचा अणु रेणू ही वापरला जातो. व अशा प्रकारे एका व्हेलच्या शरीरातून ४३ प्रजाती व जवळपास १२,४९० जीव जीवाणूंना रोजगार  व जीविताचा आधार होतो पुढील जवळ पास शंभर वर्षे … एक व्हेल समुद्र तळाशी जातो, जेणेकरून एवढे सगळे जीव जीवाणू त्यावर जगू शकतील …

लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं.. 

जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना  ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो. 

त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.  

नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. “कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू” असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही  बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते.. 

जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं. कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!”

स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.  

जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये काम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले. 

स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी!  एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते. 

जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा.

बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, “Nothing is so healing as the human touch.”

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

📖 वाचताना वेचलेले 📖

ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

कुठलीही गोष्ट फार काळ ताणून धरली की ती तुटतेच! मग ती पतंग असो,श्वास असो,नात्यातील वादविवाद असो, हट्ट असो काही ताणले की गोष्ट तुटतेच! म्हणूनच “योग्य वेळी योग्य गोष्टींना ढिल देता आलाच पाहिजे.”असे बाराव्या वर्षांपासून शैव पंथीतील काश्मीरमधील संत लल्लादेवी सारख्या म्हणायच्या!

कधीकधी माणसातील अहंकारच काही गोष्टींना ढिल देऊ देत नाही.पण ताणल्यामुळे जर काही तुटले तर दोष मात्र माणूस लगेच देवाला देतो.माणसं कित्येक वेळा वाईट गोष्टींचे खापर देवावर फोडतात.तेव्हा शंकराच्या असीम भक्त लल्लादेवी म्हणतात तुम्ही कितीही देवाचे करा देव तुम्हाला मृत्यू दिल्याशिवाय रहाणार नाही.मृत्यू अटळ आहे. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर तुम्ही श्रध्दा ठेवा देवावर!

हेच तत्वज्ञान संत लल्लादेवी ढिल हा एक शब्द घेऊन आपल्या  अभंगातून सांगतात. ताणून धरणं हा माणसाचा स्वभाव आहे.आणि आपण ताणून धरल्यावर ढिली डोरी छोडना हा देवाचा स्वभाव आहे.कारण वो शंकर  भोळा आहे.तो कधीच  रागवत नाही. 

हे रब्बा

ढिली है डोरी 

कैसे संभालू गठडी 

मैं ये मिठाई

एक ढिल दिल्यावर सगळ्या गोष्टी  सुरळीत होऊ शकतात.हा ढिल इतर माणसं आचरणात का आणत नाही ह्याचे लल्लादेवींना दुःख होते.

लोंग ढिले है 

ढिल नहीं जानते 

असं म्हणत आपलं दुःख कधीही दुसऱ्याला न सांगता, समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत लल्लादेवी ह्या आजच्या काळाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील! संत लल्लनदेवी प्रज्ञावंत होत्या.परंतु शक्ती पेक्षा सहनशक्ती श्रेष्ठ हे तत्व उराशी बाळगून मनाच्या आणि शरिराच्या जखमा कधीच त्यांनी इतरांना दाखवल्या नाहीत.उलट ८० टक्के जखमा ह्या केवळ नामस्मरणाने भरतात हे त्यांनी आपल्या दिवसरात्र नामस्मरणाने दाखवून दिले.तुम्ही जितकं देवा जवळ जाता तितक दुःख कमी होत.कोणत्याही अंधाराला आपण सामोरी जाऊ शकतो.एक अलौकिक उजेड लल्लनदेवींना मिळाला होता.म्हणूच लहान वयात लग्न होऊन काश्मीरला सासरी आल्यावर सासरकरांच्या प्रचंड त्रासाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

रस्सी कच्चे धागे की

खिच रही है नाव

जाने कब सुन मेरी पुकार

करे दे भवसागर पार

आपल्या श्वासांना रस्सीची उपमा देत संपूर्ण काश्मीरी लोकांवर, काश्मिरी पंडितांवर भावनिक शब्दांचे गारूड घातले लल्लनदेवींनी!

जर गुराखी नसेल तर गुरं इकडे तिकडे जाणारच.म्हणून आपल्या इंद्रियांचे आपण गुराखी बनलं पाहिजे म्हणजे वासना इकडे तिकडे जाणार नाहीत.मोह उरणार नाही.असे म्हणत  हजारांहून अधिक अभंग त्यांनी लिहिले.

सासू त्रास देऊन थकली परंतु लल्लनदेवी त्रास सोसून थकल्या नाहीत.लल्लादेवींशा जेवायला वाढायच्या आधी सासू कंकर ( छोटे दगड ) आधी ताटात वाढून त्यावर चावल ( भात ) वाढायची.लल्लन सगळी शीत कंकर मधुन वेचून वेचून खायची.जेवण झालं की लल्लनदेवी ते कंकर टाकून न देता, प्रामाणिकपणे ते सगळे कंकर स्वच्छ धुऊन पुन्हा सासूला नेऊन द्यायची.म्हणजे सासूला तेच कंकर पुढच्या जेवणामध्ये सासूबाईंना सहज टाकता येतील. लल्लादेवींना वाटायचं ज्या गोष्टीने सासुबाईंना आनंद मिळत असेल ,तर तो त्यांचा आनंद आपण का हिरावून घ्यायचा.इतकी साधीभोळी विचारसरणी  लल्लनदेवींची होती.

स्वतःला शिवतत्त्व मानणाऱ्या लल्लादेवींना साक्षात शिवाने ज्ञानबोध दिल्याने त्यांच्या हृदयातही शिवा सारखा भोळा भाव नांदत होता.केवल इश्वरके साथ ही मनुष्य का असली रिश्ता है…वही असली परमसुख है| बाकी तो माया है|….पती मुलं संपत्ती ह्या सगळ्यांवर भरभरून प्रेम करतात स्त्रिया कारण त्यांना ते आपले समजत असतात.पण आपल्याच आत असणाऱ्या आत्म्यावर त्या प्रेम करत नाही.       शिवशंकराचा शोध घेणं हाच त्यांचा ध्यास होता.त्यासाठीच रानावनात भटकंती व्हायची.तासंनतास शिवाच्या नामस्मरणात गुंग असणाऱ्या लल्लादेवींना लोक नंतर वेडी समजायला लागले.एकदा लल्लनदेवींच्या अंगावर फाटकी वस्त्रे पाहून एका व्यापाराने एक चुनरी त्यांना दिली. लल्लनदेवी खांद्यावर चुनरी टाकून निघाल्या! निघताना लल्लनदेवीनीं त्या चुनरीचे वजन केले.दिवसभर त्या इकडे तिकडे ती चुनरी घेऊन फिरत होत्या.कोणी त्यांची निंदा केली की त्या डाव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या… आणि कोणी त्यांच्याशी प्रेमाने वागवले की उजव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या! दिवसभर त्या कधी डाव्या कधी उजव्या बाजूला गाठी मारत होत्या…. संध्याकाळी लल्लनदेवी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे आल्या…..गाठीच्या चुनरीचे त्यांनी व्यापाऱ्याला वजन करायला सांगितले.व्यापारी म्हणाला वजनात काहीच फरक नाही.सकाळी होत तितकेच वजन आहे.

तेव्हा लल्लनदेवी व्यापाऱ्याला म्हणाल्या… वजनात फरक पडणारही नाही.पण ह्या गाठींच वजन किती मोठं तत्वज्ञान सांगतात आपल्याला की लोकांनी केलेली स्तुती आणि निंदा ह्य दोघांमुळे मुळ वस्तूत काहीच फरक पडत नाही.म्हणून ज्ञानी माणसांनी सुख आणि दुःख ह्या दोघांचा शांतपणे स्विकार केला पाहिजे.

इतक्या सहज तत्वज्ञानाला हात लावणाऱ्या लल्लादेवींचे अभंग लोकांना मौखिक पाठ होते.लल्लालेवीनीं मुद्दाम हे अभंग संस्कृतमध्ये न लिहिता ते काश्मिरी भाषेत लिहिले.आज सातशे वर्षा नंतरही त्यांचे २६५ वर अभंग काश्मीरमध्ये लोकप्रिय आहेत.

काळाचा संघर्ष असला तरी जुम्मा मशिदी समोर आपला देह सोडणाऱ्या लल्लनदेवींनी सुध्दा मुक्ताबाई,जनाबाई सारखीच देवाची आराधना केली.शिवशंकरात समरस होण्याच्या प्रयत्नातच सामान्यांना तत्वज्ञान सांगितले. म्हणूनच सर रिचर्ड टेंपल यांनी द वल्ड ऑफ लल्ला ह्या ग्रंथात आपण भारतीय तत्वज्ञानाकडे केवळ लल्लादेवीमुळे वळलो असे स्पष्ट लिहिले आहे.

सर ग्रीअरसन यांच्या लाल वाखीयनी ह्या ग्रंथरुपी पुस्तका मध्ये म्हंटलेच आहे की जातपात न मानणाऱ्या लल्लादेवींच्या अभंगना प्रत्येक भाषेत प्रसिद्धी मिळाली आहे.ग्रीक,फ्रेंच, जर्मन, उर्दू,सिंधी,कन्नड अशा अनेक भाषांमधून आजही लल्लनदेवी लोकांच्या हृदयात बसल्या आहेत. आजही लल्लनदेवींच्या सिंधी अभंगात योग , देव, धर्म ह्या गोष्टी आढळतात.  

मन का आइना

साफ करोगे

तो अपनीही रूह

शैव धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्वांचा लल्लादेवींनी सुरेख संगम साधला आहे.

 

लेखिका : प्राची गडकरी

प्रस्तुती : अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

मनाच्या उंबरठ्यावर खूप गर्दी होती. मेघ दाटल्यासारखे मनातले आभाळ भरून आले होते. फक्त डोळ्यातून अश्रू वाहणे राहिले होते. नजर कोणत्याच नजरेला मिळालेली नव्हती. वीज जेव्हा क्षणार्धात धरणीचे चुंबन घेते. आणि क्षणातच तिच्या कवेतून पसार होते. अशी भेट बहुदा झाल्यानंतरच असवांची वाट मोकळी होणार होती.

मनातल्या दाटलेल्या आभाळाच्या मनात खूप काही लपून होतं. गरज होती आभाळ रितं होण्याची आणि मेघ अश्रू वाहण्याची. काळेभोर ढग का साटतात? कसे तरंगतात? हवे तिथे बरसतात का? की नको तेथे कोसळतात आणि कोसळेलच तर का ?  असे प्रश्न माझ्या मनात का उपस्थित होतात. मला कळत नाही.

कुणाला काय घेणे, देणे त्या दाटलेल्या ढगांचे आणि वाहणा-या आसवांचे! तहानलेल्या भावनांची तहान आसवांनी मिटेल का ? की तहान भागवण्यासाठी किती वेदनांची दारे ठोठावयाची यालाही काही मर्यादा आहे की नाही? डोक्याला फेटा जितका वेळ राहतो, तेवढेच सुख वाटेला येते. फेटा उतरला की दु:ख पुन्हा सिंहासनावर येऊन बसते. सुख दु:खाच्या या लपंडावात किती बुध्दीबळाचे प्यादे, हत्ती, घोडे, उंट, वजीर मारले जातात. अखेर राजा ही चुकत नाही. कारण या डावात एक हारल्याशिवाय दुसरा जिंकणार कसा? एकाला हारावेच लागते हा नियमच आहे. किती नियमात राहू…की बरसून जाऊ  मेघ होऊन एकदा त्या मुक्ततेने कोसळणा-या सरींसारखा! की वादळ होऊ आणि साठलेली काळजावरची धूळ उडवून टाकू! म्हणजे काळीज कसे आहे, हे तरी समजेल!

बरसल्यावर निदान मृदगंधातून तरी हृदयापर्यत पोहचता येईल. बाहेरून कसं ओळखायचं मन, की कोणत्या फोटोमध्ये किंवा कोणत्या सेल्फीमध्ये दिसेल हे मन! श्वासातून क्षणभर मनाला स्पर्श करून  मृदगंधाला सोबत घेऊन, मनापर्यत पोहचून मनाशी हितगूज करून पुन्हा  श्वासातून बाहेर येता तरी येईल. क्षणभर का होईना निखळ मनामनांची भेट होईल. शेवटी हा आभासचं!

आभाळ भरलेले असताना कबूतरांची जोडी खिडकीच्या आस-याखाली येवून बसताना दिसली. गुटरगुटर आवाज करत चोची जवळ चोच आणत जणू येणा-या संकटावर मात कसे करायचे? याचा विचार करत होते की काय? की सुटलेला गार वारा, मौसमातला थंडावा, ऋतूहळवा, प्रितीचा बहर, कुठेतरी पाऊस चालू असताना वा-या सोबत वाहणारा मृृदगंधचा स्वाद घेत प्रेमाचे संवाद करत असतील. याचा विचार माझ्या मनात येत होता. कोण आपल्याला पाहतं का? तसेतर वेळ्ला किती महत्व आहे आपल्याला माहीत आहे. मिळालेला वेळ ते हितगूज करण्यात घालवतात. एकमेकांना काय हवं काय को याची विचारपूस करतात हे काय कमी आहे का?  या जिवंत उदाहरणाकडे मी एकटक पाहत बसलो होतो.

चहा मला करायला येतो. या वेळी घरात कोणीच नव्हतं. मी चहा बनवायला घेतला. मला चहा जास्त लागत नाही. मी अर्धा कपच चहा घेत असतो. तो माझ्या मनाप्रमाणे व्हावा हे अपेक्षित असतं. दूध थोडसं, चहा पावडर, चिमूटभर साखर सोबत आल्ह किसून टाकलं आणि उकळी येऊन दिली. चहा गाळून घेतला, चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून त्या कबूतराच्या जोडीकडे बघत गालातल्या गालात हसत ऋतुराजाच्या या प्रेमळ देखाव्याच्या स्वागतासाठीच जणू मी सज्ज झालो होतो.

आता हा मेघराजा कसं बरसणार, हे दाटलेले आभाळ मोकळे होताना वीज कितीदा धरणीला चुंबनार, आणि कितीदा मखमली जखमा करून सोडून जाणार, या कबूतराची जोडी माझ्या खिडकीच्या आस-याला थांबणार, की अजून कोणता आसरा शोधणार, हा वादळवारा गारवा देणार की डोक्यावरचे छप्पर घेऊन जाणार हे शेवटी प्रश्न ते प्रश्नचं……..चहा संपला आणि शेवटी माझ्याकामाकडे मी वळालो….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

काल, परवाची गोष्ट असावी, मी सकाळी सकाळी आपला भाजी मंडईत भाजी घेत होतो, एवढ्यात अचानक बालपणीचा मित्र भेटला. तीस पस्तीस वर्ष जरी झाले असले तरी चेहेरपट्टीच्या खाणा खुणा तश्याच होत्या.पुढे गळा भेट झाली, समोरच्या टपरीवर चहा पीत पीत, आठवणींच्या हिंदोळ्यावर तास दीड तास कसा गेला ? ते कळलंच नाही पण मोठा आनंद देऊन गेला हे मात्र नक्की 

पुढं मित्र त्याच्या वाटेनं गेला, मी माझ्या वाटेला..

मनी विचार करू लागलो, की खरंच ही अचानक भेट किती आनंद दायी घडून आली…

खरंच आपण बऱ्याच गोष्टी ठरवून करू पाहतो, पण त्या एवढया आनंद देत नाही, जेवढ्या सहज घडून येतात. 

होय आयुष्यातल्या या सहजतेचा आनंदच विरळा..

आता हेच घ्याना, आपल्या ला गाणं ऐकायचा मूड असतो 

मग आपण लगेच मोबाइल मध्ये गाणी शोधतो, अवघ्या जगातील संगीत तिथं उपलब्ध असतांना, आपण मग हे लाऊ की, ते असं करता करता दहा, पंधरा मिनिटं अशी निघून जातात, गाण्याचा मूड ही जातो, मग कुठलं तरी नेहेमीच एकून कानाची  तृषार्तता भागवतो….

आता जरा, आपलं बालपण आठवा, एकच रेडिओ घरी दिवसभर चालू असायचा, कधी कुठलं गाणं लागेल त्याचा ठाव नाही, पण जे लागेल ते आनंदाने ऐकायचो, हा झाला सहजतेचा आनंद…..

आता टीव्ही चं ही घ्या, आपल्या लहानपणी आठवड्यातुन शनिवारी रविवारी एखादा दुसरा सिनेमा लागायचा, पण त्या साठी आठवडा भर उत्सुकता असायची, कारण सहजता असायची, केवढा  मोठा आनंद…..

आज आपल्या टी व्ही वर शेकडो सिनेमा ची चॅनेल आहेत, पण एक सिनेमा आपण धड पाहत नाही, किंवा जाहिराती त्या पाहू देत नाही, प्रचंड उपलब्धतेमुळे त्याचा आनंदच गेला….

तुमच्या आमच्या नाते संबंधाचही तेच, पूर्वी माणसं एक मेकांकडे यायची जायची, सहज एखादा पाहुणा यायचा.. चहा पाणी गप्पा टप्पा व्ह्यायच्या  मनं मोकळी व्हायची 

आता तशी होत नाही, मग आम्ही  कृत्रिम तेचे मित्र सोशल मीडियावर शोधतो, हे असं झालं आमची   भूक तिचं आहे, पण आता त्यासाठी आम्ही  खरं खूर अन्न पाणी न खाता त्याची

चित्र  पाहून भूक भागवण्याचा  प्रयत्न करत आहोत..

लग्न समारंभात आम्ही अचानक पणे भेटतो, गाठी भेटी घेतो, याय जायचं आमंत्रण ही देतो….

अन शेवटी एक वाक्य म्हणतो……

मी तसा रिकामाच आहे…

पण येतांना, एक फोन करून या..

अन तिथंच सहजतेचा आनंद हिरावून बसतो…

 

आता हे झालं बाहेरचं, अगदी आपल्या घरातलं च घ्या 

कुटुंबामध्ये पूर्वी संवाद साधतांना नर्म विनोदी पणा असायचं 

हास्य विलाप व्हायचा, भांडणा तली कटुता त्याने दूर व्हायची. आता अहंकारापायी, मोबाईल मुळे एकमेकांशी बोलनासो झालो, मग खास हसण्यासाठी, पैसे भरून सकाळी सकाळी, हास्य क्लब ला जातो, आणि नैसर्गिक हास्य सोडून, कृत्रिम हास्य विकत घेतो, ते कितपत आनंद देणार, तास दीड तास……..

आता आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बघा केवढ्या सहज होत्या, सकाळी न्याहारीला आम्ही  कधी शिळा परतलेला भात, तर कधी  पोळीचा भाकरीचा तिखट चुरमा खायचो  त्यानं आम्हाला कधी ‘ ऍसिडिटी ‘ झाली नाही क्वचित कधी तरी पोहे, उपमा  आम्ही खायचो..असा हलका फुलका नाष्टा घ्यायचो, आता त्याचा ब्रेकफास्ट झाला.. ब्रेड बटर, आम्लेट, पिझ्झा  बर्गर खातो, त्यानं वजन वाढतं.  आता पुढं गम्मत पहा..

 

मग खास पैसे खर्चून जिम लावतो, पायी न जाता महागडी गाडी घेऊन जातो, अन मग तिथं ट्रेंड मिल वर चालू लागतो 

पुढं डाएटसाठी खास कन्सल्टंट चा सल्ला हजार, दोन हजार रुपये देऊन घेतो, अन तो काय सांगतो…

सकाळी हलकं, फुलकं खा….

ही कृत्रिमता आम्ही विकत घेतो, आणि सहजता हरवून बसतो 

 

…… म्हणून म्हणतो मित्रांनो आयुष्यातली सहजता टिकवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिकता जपा, कारण   

ठरवून केलेल्या गोष्टी फारसा  आनंद देणार नाहीत…

 

लेखक : श्री सुमंत खराडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆  श्री मकरंद पिंपुटकर

गोष्ट खूप जुनी. २००८ सालापूर्वीची. साल नमूद करायचं कारण म्हणजे २००८ साली भारतात गूगल मॅप पहिल्यांदा अवतरलं, त्याच्या आधीचा हा प्रसंग.

तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी/डहाणूजवळील असवाली येथील सूर्यहास चौधरींच्या “जंगल फार्म” येथील हा प्रसंग thejunglefarm.in

निसर्गाच्या सान्निध्यात, जैवविविधता, पर्यावरण, adventure आणि unlimited धमाल याचं अफलातून मिश्रण म्हणजे “जंगल फार्म”. पैसा फेकून AC खोल्यांमध्ये निव्वळ ऐदीपणे लोळणे याच्यापलीकडे ज्यांची बुद्धी चालते अशांसाठी अप्रतिम पर्वणी.

बार्डाचा डोंगर, असवाली धरण, कोसबाड हिल, बोर्डी – घोलवड – डहाणूचे समुद्रकिनारे आणि खुद्द जंगल फार्मवरील अनेकविध उपक्रम या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी दोन तीन दिवससुद्धा कमी पडतात आणि यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजांतून, मित्रमंडळासोबत अथवा IT/ अन्य कंपन्यांमधून अनेकजण इथे येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात.

या वेळी, एका IT कंपनीतून बस भरून ४०-४५ जण मुंबईहून “जंगल फार्म”ला येत होते. पश्चिम द्रुतगती मार्गाने चारोटी टोल नाक्यानंतर त्यांनी डावीकडे डहाणूसाठी वळण घेतले, पुढे सागर नाक्यापर्यंत आले आणि मग त्यांच्यातल्या एकाने सूर्यहास दादांना फोन लावला. 

“सूर्यादादा, आम्ही सागर नाक्यापर्यंत आलो आहोत, आता डावीकडे वळून “पार नाक्या”ला येतो आणि मग बोर्डीच्या रस्त्याला लागतो,” तो फोन करणारा सांगत होता. 

सूर्यादादाने ते कितीजण आहेत, कसे येत आहेत, बसने येत आहेत म्हटल्यावर बसचा नंबर काय वगैरे माहिती विचारून घेतली आणि मग तो बोलू लागला.

“तुम्ही मला वाटत पहिल्यांदाच येत आहात ना जंगल फार्मला ?” दादाने खात्री करून घेतली, “डहाणू ते बोर्डी साधारण २० किलोमीटर अंतर आहे आणि तिथून आपलं जंगल फार्म आणखी १० किलोमीटर. खरं सांगायचं तर रस्ता थोडा confusing आहे. पण माझ्या एका मित्राने मला एक नवीन सॉफ्टवेअर पाठवले आहे. तुम्ही जर फोन चालू ठेवलात आणि तुमचा मोबाईल डाटा चालू ठेवलात, तर तुम्ही कुठे आहात, आजूबाजूला काय आहे, ते मला इथे माझ्या फोनवर समजू शकतं.”

मुंबईहून येणाऱ्या ITवाल्याचे कान टवकारले. असं काही सॉफ्टवेअर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाकडे असावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसावा, याचं त्याला अप्रूपही वाटलं आणि वैषम्यही.

“तुम्ही फोन चालू ठेवा,” सूर्यादादा पुढे बोलत होता, “मी जरा ते सॉफ्टवेअर चालतं आहे ना खात्री करून घेतो, म्हणजे कसं यायचं ते मला तुम्हाला सांगता येईल.”

पुढच्या पाच मिनिटात पुढे कसं यायचं ते सूर्यादादा मुंबईच्या ग्रुपला सांगत होता. बस कितीही वेगात धावली किंवा तिची गती कमी झाली, तरी सूर्यादादांच्या सांगण्यातले landmarks चुकत नव्हते. 

पुढे सहज सांगताना जेव्हा दादाने “जरा म्हशींचा घोळका येत आहे, सांभाळून हां” किंवा “तुमच्या मागून स्कूल बस येत आहे” अशा बारीक सारीक खाणाखुणाही सांगितल्या, तेव्हा बसमधल्या समस्त मुंबईकरांसी अचंबा जाहला.

पाऊण एक तासानंतर बस असवाली धरणाजवळील कच्च्या रस्त्यावरून “जंगल फार्म”च्या रस्त्याला लागली, आणि गेटमधून आत वळली. सूर्यादादाचा फोन चालूच होता, त्यामुळे हा सगळा प्रवास निर्धोक निर्वेध पार पडला. 

सगळे जण उतरले, बसमधून सामान काढायला लागत होते, तेवढ्यात सूर्यादादा एका गाडीतून बसपाठोपाठ “जंगल फार्म”मध्ये शिरला. 

बसमधल्या माणसाने त्याचा कॉल कट केला आणि तो सूर्यादादांना भेटायला धावला. त्याला ते सॉफ्टवेअर बघायचे होते, समजावून घ्यायचे होते. 

सूर्यादादा त्याला भेटले आणि म्हणाले, “तुम्ही एवढ्या दुरून मुंबईहून आले आहात, दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा पिताना निवांत बोलू.”

हातात चहाचा कप घेतल्याघेतल्या तो फोनवरचा माणूस दादाच्या खनपटीला बसला, “दादा, हे कसं काय तुम्ही केलंत ते सांगा ना. म्हणजे बस कुठे आहे, कुठे वळायचं, एवढंच नाही तर मागेपुढे म्हशी आहेत, शाळेची बस आहे हे सगळं सगळं तुम्हाला कळत होतं. कोणतं सॉफ्टवेअर आहे ते सांगा तरी आम्हाला. तुम्ही आम्हाला ते विकू शकाल का ?” वगैरे वगैरे. 

चहा पित, मिश्किल हसत सूर्यादादा म्हणाला, “माझं secret मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. 

असलं कुठलं सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही. अहो, तुमची बस डहाणूला सागर नाक्याला होती, तेव्हा तुमच्या मागोमाग माझी गाडी होती. त्यामुळे कुठे वळण आहे, मागेपुढे कोण आहे हे मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि मी तुम्हाला तसं सांगत होतो. बाकी ते मोबाईल डाटा चालू ठेवा – सगळं उगाच बनवाबनवी होतं.”

बसमधल्या IT तज्ञांनी कपाळावर हात मारला. सूर्यादादांनी त्यांना सहजी गंडवलं होतं. 

“अर्थात, हे असं नकाशा दाखवणारं सॉफ्टवेअर पुढेमागे येईलही कदाचित,” दादा गंभीरपणे सांगत होते.

“गूगल मॅपच्या रूपाने आता तसं ॲप आलं आहे खरं, पण मागच्यापुढच्या म्हशी ओळखता येण्याची सोय अजूनही गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई करू शकले नाहीयेत,” जंगल फार्मची धुरा आता समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या मुलाला – तपन (8830262319) ला ही जुनी आठवण सांगताना, डोळे मिचकावत सूर्यादादा सांगत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares