मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की “आपण ग्रामीण भागकडे जास्त लक्ष द्यावे.”

बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठीच  काढायचे.

लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही भाग डोंगराळ व जंगली  होते.

एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात ‘बडेरी’ नावाचे एक गांव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर्सचे अंतर डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे.

मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे.

तिथे कोणीतरी पी. के. व्यास नांवाचे मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि कां कोण जाणे, ते पद  सोडतही नव्हते. मी आदेश दिला की “त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये.  ही अचानक भेट असेल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल.

मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ, कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.

समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती.

शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.

वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरं तर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क गृहस्थ व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत.

त्याने सांगितलं की मुख्याध्यापक गुरुजी एव्हढ्यातच येतील.

आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो, तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षांचे सद्गृहस्थ, आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.

त्यांनी येताच आपला परिचय दिला, “मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरतही होते.” ते हसून म्हणाले.

त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नांव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, “तुम्ही प्रशांत व्यास म्हणजे इंदूरच्या गुजराती कॉलेजमध्ये होते तेच कां?”

त्यांनी सुद्धा ओळखल्यासारखे  आश्चर्याने विचारले, “आपण अभिनव आहात कां? अभिनव श्रीवास्तव !” मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे.”

वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता. खूप मेहनत करूनही, कधी तरीच मला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील.

आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे असायचा.

आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे, जिंकल्याचे समाधान वाटत होते. आणि खरं सांगायचं तर, मनांतूनही मी खूप खुष  होतो.

मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?”

त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, “एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसं तरी शिक्षण पूर्ण केलं. मार्क चांगले असले, तरी सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. पण नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गांवात बदली मिळाली.  आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात  निभावून जाईल.

मग तो हसत म्हणाला, “अशा दुर्गम गांवात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्नही नाही झालं. आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?

माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.

इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जेव्हढी जमेल तशी त्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.”

“आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो. 

रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गांवात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्तीचे अभियान ही चालवतो.

स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.

मनांत होतं, पण मी सी. ए. करूच शकलो नाही. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत ! आणि काही जण चांगल्या नोकरीतही आहेत.”

“माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो.

तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते.”

मी मधेच म्हणालो, “आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाही का?”

तो हसून म्हणाला, “मला कळतं की जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो.”

त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.

निघतांना मी त्याला म्हणालो “प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन”.

तो हसून म्हणाला “आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे.” असे म्हणून त्याने हात जोडले.

नोकरीत त्याच्यापेक्षा वरच्या पदावर आपली नियुक्ती झाल्याच्या यशामुळे माझ्या मनांत निर्माण झालेला अहंकार, गर्व 

हे सारे भ्रम एका क्षणांतच विरून  गेले !!

तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट  आणि  असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत  झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.

आपण माणसांची पारख, सुख – सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.

निघताना, त्या ‘कर्मऋषी’ला हात जोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, “तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!”

सारांश: 

आपले प्रशासकीय पद काय आहे किंवा काय होते, हे खरोखरच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे हे असते की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि कसे बनत आहोत.

मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव 

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

साऱ्या जगभर २१ मार्च हा दिवस कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.इराणचे कठपुतळी कलाकार जावेद जोलपाघरी यांनी हा डायस साजरा करण्याची कल्पना मांडली आणि २००३ पासून हा दिवस जागतिक कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.

इसवीसन पूर्व ४ थ्या शतकात महाकवी पाणिनी यांच्या अष्टाध्याई ग्रंथामधे पुतळा नाटकाचा उल्लेख आढळतो. भगवान शंकरानी लाकडी मूर्तीमध्ये प्रवेश करून माता पार्वतीचे मनोरंजन करून या कलेची सुरवात केली. उज्जैन नगरी च्या राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाला ३२ पुतळे जोडले होते आणि त्यातील प्रत्येक बाहुलीच्या तोंडी एक गोष्ट सांगितली आहे .त्या गोष्टी सिंहासन बत्तीशी म्हणून प्रसिद्ध आहेत.

जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कठपुतळीचा खेळ बघायला मिळतो. ह्याला मानवी हालचालींचे चित्रण म्हणता येईल. मनोरंजन ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आधीपासूनच्या संस्कृतीमध्ये होती. कुठल्याही कथांना सत्यात उतरवण्याची क्षमता. कथा सांगण्यासाठी अभिनय ही गोष्ट वापरली जाते आणि अभिनय ही सुद्धा एक कला आहे जी त्या कथेला जिवंतपणा आणते. इतिहासात कथा दाखवण्यासाठी भारतातील लेणी आणि मंदिरांमध्ये छान छान प्रसंग हे दगडांमध्ये कोरून दाखवले आहेत. इजिप्तमधील भित्तिचित्रामध्ये देखील असे खूप प्रसंग आहेत. आपण मानवी हालचालींचे असे सूंदर चित्रण कुठेही पाहिले नसतील असे चित्रण त्या कलाकारांनी करुन ठेवले आहेत.

प्राचीन ग्रीक आणि इतर संस्कृतींमध्ये दहाव्या शतकातच ‘झेट्रोपे’ ह्या गोल आकाराच्या फिरणाऱ्या अशा यंत्राचा शोध लागला होता. ज्यात वेगामुळे आकृती हलण्याचा भास निर्माण व्हायचा.

चार्ल्स एमिल रेनॉड ह्याने मानवी चित्रांच्या कात्रणांचा वापर करुन त्यांचे हात पाय हलवून पाहिले ऍनिमेशन बनविले आणि तेसुद्धा कुठल्याही फिल्म विना. ते बनवून त्याने लोकांना आश्चर्यचकित केले.

विष्णुदास भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला ‘ग्रांट रोड थिएटर’ येथे ‘इंद्रजित वध’ हा पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग करणाऱ्या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांचे रहस्य उलगडले आणि विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

Attachments area

Preview YouTube video Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

✨ लघु कथा  – – १.

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधांच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़ मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

✨ लघु कथा ..२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले ; त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रूंनी शाई फुटली होती.

✨ लघु कथा  – -३.

आजोबांच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ीन बरा… माझ्याजवळ दोन काठया असताना.

✨ लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवालदाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहोर आला नाही.

✨ लघु कथा  – -५.

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, “ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.”

✨ लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खूप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलंय.

✨ लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

✨ लघु कथा  – -८.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच 5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला, लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानशी साडी घ्या. त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

✨ लघु कथा  – -९.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावत-पळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

✨ लघु कथा  – -१0.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसांत फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

सकारात्मक रहा…

सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे !!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येणार आहेत याची मला कल्पना कुठून असायला? पण म्हणूनच ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास ‘त्या’चेच बोट धरून अगदी निश्चिंतपणे सुरू झाला होता एवढं खरं !!)

तथाकथित चमत्कारांवर माझा विश्वास नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवून भ्रमित होणंही योग्य नाही असंच मला वाटतं. त्या

बालवयातल्या मी प्रमुख साक्षीदार असणाऱ्या अनेक प्रसंगांच्या बाबतीत मात्र हे असं विश्लेषण करायची पात्रता त्यावेळी माझ्याजवळ नव्हती म्हणून असेल पण तेव्हा तरी ते चमत्कारच वाटले होते. आज इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगांचं पुनरावलोकन करताना मात्र मी म्हणेन की ते प्रसंग चमत्कार नसले तरी अनाकलनीय मात्र नक्कीच होते आणि त्यामागे ईश्वरी कृपालोभाचे संकेतही निश्चितच होते

आमच्या कुरुंदवाडच्या वास्तव्यातले असेच हे प्रसंग. तिथे बाबांचा नित्यदर्शनाचा नेम प्रतिकूल परिस्थितीतही कसा निष्ठेने सुरू होता हे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेले आहेच. त्यांच्या या निरपेक्ष सेवेनंतर ते निश्चितच कसोटीला उतरले असणार. एरवी हा प्रसंग अशा पद्धतीने घडलाच नसता.

तो काळ साधारण १९५४ ते १९५८ चा. विष्णूमंदिराच्या जवळच्या लेलेवकिलांच्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं.‌ मोठं स्वैपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि स्वतंत्र स्वयंपाकघर असलेल्या बाकी पाच खोल्यांचा ऐवज लेले कुटुंबासाठी अशी विभागणी होती.‌दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातलीच. त्यामुळे एकाच घरातले हे वेगवेगळे वास्तव्य केवळ सोय आणि सोबत म्हणून दोघांनी मनापासून स्वीकारलेलं होतं.

माझ्या पाठच्या भावाचा जन्म तिथलाच. ऑगस्ट १९५६ चा. त्याच्याच जन्माच्या वेळची ही गोष्ट. धुवांधार  पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला  (हा पंचगंगेचा एक फाटा) नेहमीप्रमाणे पूर आलेला. पुराचे पाणी गावभर पसरत आमच्या वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेले आणि धुवांधार पाऊस सुरूच. आईचे दिवस भरत आले होते.पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी कुठल्याही क्षणी घरात घुसू शकेल अशी ती अवेळ. त्यामुळे मुलांना वरच्या माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर एकत्र पडवीतच बसून होती. त्या काळात बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पावसा-पूरात सुईण येणार कशी ही विवंचना होती ती वेगळीच!

“दादा, आता काय करायचं?” लेले वकील बाबांना म्हणाले. बाबा काळजीत होतेच. त्यांनी आईकडे पाहिलं. खरंतर अशा परिस्थितीत आईचा जीव टांगणीला लागायला हवा होता पण निदान वरकरणी तरी ती शांतच होती.

“आपण काय करणार? होईल ते पहात रहायचं.” ती शांतपणे म्हणाली.

“ते खरंच.पण तुम्हाला अचानक त्रास सुरू झाला तर..?” लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या,त्या म्हणाल्या. त्यांच्या  बोलण्यात त्यांच्या मनातली काळजी लपून रहात नव्हतीच.  स्वतःचीच समजूत घातल्यासारखं आई म्हणाली,

“त्या सगळ्याचा भार दत्त महाराजांवर. संकट नाही यायचं. आणि आलंच तर शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.”

परिस्थिती चिंताजनक असूनसुद्धा आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडं तरी हलकं झालं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खूप वेळाने तिथे पडवीतच पसरलेल्या अंथरुणांवर सर्वजण आडवे झाले तरी कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे पहाटेच्या आसपास पावसाचा जोर हळूहळू ओसरत चालला आणि फटफटीत उजाडेपर्यंत उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या पाण्याने दोन पावलं माघार घेतली होती! आईचे दिवस भरत आल्याचं दडपण तिकडे सुईणीच्या मनावरही होतंच. त्यामुळेच ती विषाची परीक्षा नको म्हणून,स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सकाळी सकाळीच चिंब भिजल्या अवस्थेत कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत आमच्या घरी मुक्कामाच्याच तयारीने येऊन पोचली तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्याच दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला!पण…?

अतिशय अनपेक्षितपणे सगळं सुरळीत पार पडल्याचं समाधान मात्र दीर्घकाळ टिकणार नाहीय याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण दुसरं जीवघेणं संकट दबा धरून बसलेलं होतंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

माॅर्निग वाॅकला बाहेर पडले की ट्रॅकवर विविध वयाची, विविध तऱ्हेची माणसं भेटतात.तसाच तिथला निसर्ग ही वेळ काळानुसार बदलता दिसतो. 

अत्ता अत्ता पर्यंत हिरवेगार दिसणारे वृक्ष शिशिराच्या पानगळतीमुळे कसे उघडे बोडके दिसू लागले ते लक्षातच येत नाही. गुलमोहराची लांब लांब छोट्या छोट्या पर्णिका असलेली पाने चवऱ्या ढाळत असतात तर त्यावरील वाळलेल्या शेंगा तुटून खाली पडत असतात.त्यांच्यावर पाय पडला की कट्कन मोडतील इतक्या वाळक्या असतात. जणू निसर्ग कसा वाळत,सुकत चाललाय याची जाणीव करून देत असतात.

आंबा,फणस,वड यासारखी छाया आणि फळे देणारी झाडे जवळपास दिसत नाहीत,पण गुलमोहर,कॅकेशिया सारखी रंगीबेरंगी केशरी,जांभळी, गुलाबी रंगांची फुले असणारी झाडे मात्र रस्तोरस्ती दिसतात ! गंध नसला तरी त्यांची रंगांची विविधता डोळ्यांना सुखवते.थंडीची ऊब गेली रे गेली की सकाळच्या वेळी सूर्याचे आगमन प्रसन्न वाटते.इथल्या झाडांवर भारद्वाज आणि कोकिळा आपले अस्तित्व दाखवू लागतात.राखाडी रंगाच्या चिवचिव चिमण्या अंगणात दाणे टिपताना दिसत नाहीत पण चिमणीसारखाच एक छोटा पक्षी सगळीकडे झाडांवर दिसतो..

होळी जसजशी जवळ येते तसा निसर्गातील बदल अगदी स्पष्ट दिसायला लागतो. वाळकी झाडे, फांद्या होळीच्या ज्वाळेत टाकून सगळं वाईट नष्ट करून नवीन जगण्याला सुरूवात करावी त्याचेच हे प्रतीक म्हणजे निसर्गातील झाडेझुडपे असतात.

आता पंधरा दिवसांतच चैत्र येईल.चैत्राची सुरुवात म्हणजे सृजनाची चाहुल ! मग सुरू होईल खरा वसंतोत्सव ! रंगपंचमीला विविध रंग आणि पाणी उडवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते.सूर्याच्या वाढत्या झळांपासून संरक्षणासाठी निसर्ग आपल्याला छान फळे पुरवतो. कोकम, कैरी यांचे पन्हे शीतल असते तर कलिंगड, खरबूज सारखी फळे थंडावा देतात.आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे हे तर माहिती आहे आपल्याला ! चैत्रामध्ये चैत्र गौरीची पूजा करून आपण तिचा उत्सव साजरा करतो. घराघरातून पन्हं, कैरीची डाळ करून हळदीकुंकू केले जाते.देवीला झोपाळ्यावर बसून झुलवले जाते.देवीची आरास करायची, गुलाब पाण्याचे सिंचन करायचे, वाळा, मोगरा घालून माठातील पाणी सुगंधित ठेवायचे … किती किती तऱ्हांनी आपण चैत्र वैशाखाचा वणवा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो.

फाल्गुन पौर्णिमा झाली की पुढचे पंधरा दिवस म्हणजे संधीकाल वाटतो मला! उन्हाळ्याची सुरुवात आणि थंडीचा शेवट! सकाळचा गारवा अजून सुखद वाटतो.पहिल्यातून अजून मन बाहेर पडत असते, तर दुसऱ्यामध्ये अजून पदार्पण व्हायचं असतं! असा हा संधीकाल! मन आणि शरीर थोडे अस्थिर होणारच! नवीन वातावरणाला अनुकूल होण्यासाठी शरीरही थोडे कुरकुरत असतेच!

असा हा संधीकाल आयुष्यातही खूपदा डोकावतो. शाळा संपवून पुढील शिक्षणात पदार्पण करताना, शिक्षण संपवून नोकरी, उद्योगात प्रवेश करताना, गृहस्थाश्रम स्वीकारताना आणि नंतर संसारातून मुक्तता घेऊन ज्येष्ठत्त्व स्वीकारताना ! प्रत्येक स्थित्यंतराच्यावेळी थोडेतरी पाऊल अडखळतेच! मन ठेचकाळतं, पुढच्या आशा खुणावत असतात, मन मागेच रेंगाळत असते. असाही एक संधीकाल असतो. जो माणसाला सुखदुःखाच्या उंबरठ्यावर ठेवतो.त्यामुळे वाटते,संधीकाल म्हणजे हुरहूर लावणारा काळ! जो प्रत्येक क्षणाला लंबकासारखा हेलकावे असतो.कधी भूतकाळात तर कधी भविष्यात! वर्तमानाच्या उंबरठ्यावर क्षणभरच टेकतो तो, दोन्हीची सांगड घालीत!

निसर्ग हा नेहमी आशावादी असतो.पडलेल्या बी तून नवीन निर्माण करणारा! झाडाच्या वठत चाललेल्या खोडातही कुठूनतरी कोंब निर्माण करणारा! काही काळ तो सुप्तावस्थेत असेलही पण अनुकूल परिस्थिती येताच तरारून वर येणारा! निसर्गाचा चमत्कार वसंत ऋतूतील पालवीत दिसतो,गुलमोहराच्या केशरी फुलांत दिसतो, तर मोगरीच्या छोट्या कळीत दिसतो.

असा हा संधीकाल मी अनुभवते आहे.-निसर्गात आणि मनात! निसर्ग चिरंतन आहे.तो बदलत्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे.त्याच्यापुढे आपण  तर नगण्य आहोत.छोट्या आयुष्यातले छोटे छोटे बदल स्वीकारताना सुध्दा संधीकालात अडकून पडणारे! पुढे पाऊल टाकू की नको या संभ्रमात असणारे! शेवटी प्रेरणा देणारा तोच आहे, त्यामुळे प्रत्येक संक्रमणात तोच आपल्याला अलगद नेतो.

या संधीकालातून पुढे नेणारा .. आपल्या प्रत्येक पावलावर आशेचा किरण दाखवणाऱ्या नियंत्याला नमन करून सकाळचे प्रत्येक पाऊल मला अधिक ऊर्जा देऊ दे अशी प्रार्थना करत मी सकाळची फेरी संपवते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.) 

इथून पुढे —

बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्ष ही त्याच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. ह्या वेळेत त्याला योग्य चालना मिळाली तर बाळाचा मानसिक, बौद्धिक, आणि त्याच्या भाषेच्या वाढीचा आलेख उंचावतो.

IAP च्या guidelines अनुसार पाहिले दोन वर्ष बाळाला स्क्रीन टाइम अजिबात नको ! बाळ रडत आहे, लाव मोबाईल वर कार्टून, बाळ जेवत नाही लाव टीव्ही, आईला काम आहे तो एका जागी बसत नाही, दे लावून कॉम्प्युटर आणि बसू दे त्यासमोर! ह्या सवयी आपण लावत आहोत आणि त्यामुळे त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होतोय हे कुणाच्या गावीही नाही!

दोन ते पाच वर्षापर्यंत एक तास किंवा कमी स्क्रीन time असावा. स्क्रीन मोठी असावी, म्हणजे लॅपटॉप किंवा टीव्ही, त्याच्या बरोबर पालकांनी देखील बसावे. तो काय बघत आहे ह्याकडे लक्ष द्यावे. शक्यतो शैक्षणिक गोष्टींसाठी यांचा वापर व्हावा. 

मनोरंजनासाठी स्क्रीन time ठेवला की नकळत त्याचा वापर वाढतो. त्याच बरोबर मैदानी खेळ, पुस्तके, त्याच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळणे, गोष्टी सांगणे, गोष्ट सांगताना आपण हावभाव करत गोष्ट सांगणे, जेणेकरून मुले आपल्या चेहऱ्याकडे नीट निरखून बघत असतात, त्यांना मग emotions चेहरा बघून कळायला लागतात. 

मुलांचे घरातील इतर लोकांबरोबर मिसळणे ही व्हायला हवे. दोन ते पाच ह्या वयामध्ये मुलांचे सोशल स्किल्स देखील घडत असतात. इथे जर स्क्रीन time जास्त झाला तर ते अनेक गोष्टीत मागे पडतात. 

आणि सर्वात महत्वाचे हे की आधी पालकांनी आपला स्क्रीन time कमी करावा. मुले अनुकरणातून शिकतात. त्यांच्यापुढे आपण आदर्श घालून दिला तर ते लवकर शिकतील.

पाच सहा वर्षाचे मुल असेल तर त्याला आपण काही नियम घालून द्यावेत. ह्या वयात मुले नियम नीट पाळतात, त्यांना ते पाळल्यामुळे एक प्रकारे आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होते. आपण डिजिटल नियम घालावे ते वयानुरूप असावेत. वय वाढले की नवीन नियम आपण त्यात टाकावेत.

उदाहरणार्थ…

  1. स्क्रीन हे मुलांना शांत किंवा इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी वापरू नये.
  2. स्क्रीन time, मैदानी खेळ, अभ्यास, जेवण, कौंटुबिक वेळ आणि छंद ह्यांची योग्य सांगड घालावी. स्क्रीन झोपेच्या आधी किमान एक तास बंद असावा. त्यामधील नील प्रकाश झोप उडवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
  3. ह्याच वयात मुलांना कॉम्प्युटर समोर योग्य पद्धतीने कसे बसावे ते शिकवावे, पोक काढून किंवा मान वाकवून बसू नये. 
  4. स्क्रीन चालू ठेवून multy tasking करायचा प्रयत्न करू नये, म्हणजे शाळेचा अभ्यास किंवा गृहपाठ करत असताना कॉम्प्युटर किंवा मोबाईल बंद ठेवावा.
  5. मुले कॉम्प्युटर वर असताना आपण अधून मधून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, ते काय बघत आहेत ह्यावर बारीक लक्ष ठेवावे. कुठले ही गेम्स किंवा प्रोग्राम, ज्यात हिंसा आहे किंवा addiction लागण्या सारख्या गोष्टी आहेत ते टाळावे. Privacy setting, browser आणि app साठी safe search engine, आणि योग्य antivirus आहे ना ते खात्री करून घ्यावी.
  6. मुलांना शांतपणे चिडचिड न करता आणि ठामपणे, “आता स्क्रीन time ची वेळ संपली आहे” हे सांगणे महत्वाचे आहे. असे सांगितले तर मुले ऐकतात.

जरा मुले मोठी झाली, टीन एज जवळ यायला लागले की त्यांना insagram, ट्विटर, What’sapp, telegram ची भुरळ पडायला लागते. आपण घरी कितीही बंधने लादायचा प्रयत्न केला तरी शाळेत, क्लास मध्ये, मित्रांच्या मार्फत त्यांना ह्या गोष्टी कळणारच आहेत. अश्या सोशल साईटचा वापर कुठल्या वयात करू द्यावा हे त्या प्लॅटफॉर्मवरच लिहिलेले असते. मुले हे platforms वापरायला लागली की काही गोष्टी आपण त्यांना सांगायलाच हव्यात.

  1. सोशल मीडिया वर आपण दुसऱ्यांना तसेच वागवले पाहिजे, जसे त्यांनी आपल्याशी वागावे याची आपण अपेक्षा करतो.
  2. आपली भाषा सुसंस्कृत असायला हवी. 
  3. इथे लिहिलेले किंवा पोस्ट केलेले फोटो हे कायम स्वरुपी राहू शकतात ह्याची त्यांना कल्पना द्यावी. त्याचा वापर कोणी वाईट कामासाठी करू शकतो हे ही समजावून सांगावे.
  4. आपल्या घरचा पत्ता, फोटो, किंवा कुठले ही password आपण सोशल मीडिया वर टाकू नये.
  5. सोशल मीडिया फ्रेंड ला भेटायला एकटे कधी ही जाऊ नये, घरातील मोठ्यांना बरोबर घेऊन जाणे.
  6. येथे कोणी तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, bulling करत असेल तर तात्काळ घरातील जबाबदार व्यक्तीला सांगणे.

आणि इतके करून ही कोणी व्यक्ती तुमच्या मुलांना सोशल मीडिया वर त्रास देत असल्यास.. तुम्ही

  1. मुलाला कळू द्या की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि कायम त्याच्या बरोबर असणार आहात.
  2. मुलाला सोशल मीडिया पासून काही काळ ब्रेक घेऊ द्या.
  3. वाईट मेसेजला उत्तर देऊ नका.
  4. ते मेसेज save करून ठेवा, नंतर reporting साठी कामी येतात.
  5. हा bully माहीत असल्यास त्याच्या पालकांशी बोला.
  6. शाळेत शिक्षकांना कल्पना द्या, बऱ्याच शाळेत काही पॉलिसीज असतात अश्या bully साठी.
  7. तरीही हा त्रास थांबला नाही तर आपण सायबर पोलिसांकडे तक्रार करू शकता. हे आपण childline phone no 1098 वर रिपोर्ट करू शकतो

थोडक्यात आताच्या वातावरणात, म्हणजेच ह्या माहितीच्या अणुस्फोट झालेल्या सोशल मीडियाच्या जाळ्यात आपण अडकलो आहोत. आपली मुले तर पुरती गुरफटून गेली आहेत. त्यांना ह्या वेब च्या जाळ्यातून सही सलामत बाहेर काढून त्या जाळ्याचा चांगला वापर करायला आपल्याला शिकवायचे आहे. काट्याने काटा काढायचा हा प्रकार आहे.

प्रयत्न नक्कीच करूयात ! 

– समाप्त – 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. 

बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. 

दोन्हीही कसेही निघाले तरी  ‘पदरी पडले, पवित्र झाले’. 

दोघांनाही देवघरात स्थान,  दोघेही पुज्य.

 

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. 

हल्ली ऑन लाईन साईटवर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. 

 

नारळ म्हटलं कि मला धडधडतं . 

चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन 

हलवून वगैरे बघत असे. 

 

अण्णाला कळायचं हे गि-हाईक  नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. 

ये, लो ! म्हणायचा. 

मी विचारायचो ‘खवट’ निकलेगा तो ? 

तो म्हणायचा ‘तुम्हारा नसीब !!’

 

आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय !

 

खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. 

कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, 

उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी …. किती बहुगुणी !! 

 

थोडक्यात काय, 

नवरा काय ? नारळ काय ? 

गोड निघाला तर नशीब, 

खवट निघाला तर उपयोगी, 

हे कोकणी तत्त्वज्ञान. 

ह्याला जीवन ऐसे नांव !!

 

(याबाबत माझी एक विशेष सूचना…. या मध्ये “नवरा” या ठिकाणी “बायको”  लिहून ही वाचू शकता.अर्थात स्वतःच्या जबाबदारीवर…. मग खरी गंमत येईल.) 

लेखक –  श्री. पु ल देशपांडे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

धर्म बुडाला द्यूतपटावर नाही कुणाचा धाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||ध्रु||

*

अंधराज कर्णहीन झाला अंधपुत्रप्रेमाने

पितामहांनी नेत्र झाकले कर्तव्यशून्यतेने

धुरंधर गुरु कर्म विसरले मानवता अगतिक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||१||

*

दानवीर परी झोळीमध्ये नाही स्त्रीदाक्षिण्य

सहस्रदानांचे त्याला का मिळेल काही पुण्य

पतिव्रतेला संबोधी तो पतिता उपभोगिता

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||२||

*

उठी भीमा कसुनी तव बाहू दाखविण्या सामर्थ्य

चापबाण गाळून धनुर्धर दुर्मुखलेला पार्थ

याज्ञसेनी तेजस्वी अगतिक पांच पती नपुंसक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||३||

*

हरुनी जाता सर्वस्व कसा दारेवर अधिकार

धर्माहस्ते अधर्म कैसा झाला घोर अघोर

चंडप्रतापी पती असोनी शील होतसे खाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||४||

*

भगिनीसाठी अशा अभागन  तूच एक भ्राता

श्रीकृष्णा रे धावुन येई दुजा कोण त्राता

चीर पुरवूनी लाज राखी मम बंधुत्वाची भाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||५||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

काव्यानंद : धर्म  बुडाला

रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून भावणारी! नुकत्याच झालेल्या रामनवमीच्या दिवशी आपण रामायणाची आठवण नक्की केली असेल. आज महाभारताची आठवण करून देणार आहे .महाभारत हा अत्यंत प्राचीन संस्कृत ग्रंथ महर्षी व्यास यांनी गणपती कडून लिहून घेतला. या ग्रंथाचे आधीचे नाव जय होते. महाभारत हा भारताच्या धार्मिक, तात्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. महर्षी व्यासांनी मानवी भावभावनांचे अतिशय सुस्पष्ट रूप महाभारतातील व्यक्तिरेखां मधून करून दिले आहे. जीवनातील असा कोणताही गुण ,दुर्गुण ,स्वभाव नसेल ज्याचा ऊहापोह/परामर्श या काव्यात घेतलेला नाही  आयुष्याशी निगडीत अशा या महाभारताचा सर्वसामान्यांना तर मोह पडतोच पण कविमनाला त्यातील प्रसंग, कथा, व्यक्तित्व खुणावत राहतात. असंच काहीसं डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांच्या बाबतीत घडलं.द्रौपदीची अत्यंत महत्त्वाची भूमिका या महाभारतात आहे याची आपल्याला कल्पना आहे. तिचा करारी ,स्वाभिमानी स्वभाव आणि त्याच वेळेला त्याला असलेली अहंकाराची किनार यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व महाभारतात फार महत्त्वाचं ठरतं. तिच्यामुळे महाभारत घडलं असेही काही जाणकार मानतात .भर सभेत तिच्या बाबतीत घडलेला वस्त्रहरणाचा प्रसंग हा सर्वांना भावुक बनवणारा तसेच चीड  आणणारा आहे. या प्रसंगाने तिच्यासारखी स्त्री अबला होते आणि श्रीकृष्णाचा, तिच्या सख्याचा धावा करते हा प्रसंग कवितेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेला आहे.कवितेचे नांव  धर्म बुडाला  !  अगदी समर्पक नांव! या नांवापासूनच या कवितेतील काही वैशिष्ट्ये  मी रसग्रहणात्मक रूपाने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कविताच खरं तर इतकी अप्रतिम सुंदर आहे की मी काही वेगळे भाष्य करण्याची गरज यावर नाही याची मला कल्पना आहे.तरी पण—! या कवितेला स्वतःची एक उंची आणि त्याचबरोबर खोली पण आहे. मी आता म्हटलं तसं कवितेच्या नांवापासूनच या कवितेचे वेगळेपण जाणवायला लागतं .कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कवितेचा विषय स्पष्ट होतो.तसंच कवितेचे सार ही पहिल्या ओळीत विशद होत आहे असं वाटतं .द्यूतपटाचा खेळ खेळताना धर्म बुडाला आणि  कुणाला कुणाचा धाक उरला नाही असं कवी म्हणत आहे. येथे धर्म बुडाला ही शब्दयोजना मला फार महत्त्वाची वाटते. यातून दोन अर्थ ध्वनित होतात .एक म्हणजे खरा धर्म जो जीवन मूल्यांशी ,आचार विचारांशी निगडित आहे तो आणि दुसरा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर! दोघंही बुडाले किती सुंदर आणि चपखल शब्दयोजना आहे ही. द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था ही अशीच एका वाक्यात अत्यंत समर्पक शब्दात मांडली आहे. रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक अशा शब्दांत द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था मांडली आहे. ते सारे दृश्य या एका ओळीतून आपल्यासमोर उभे करण्याची ताकद या शब्दांत आहे. धृतराष्ट्र हा दुर्देवाने अंध होता या वस्तुस्थितीची जाणीव करून देताना तो  आपल्या  पुत्रा बद्दलच्या अंध प्रेमाने कर्णहीन ही  झाला आहे हे सत्य कवीने आपल्या समोर मांडले आहे. इथेही कर्ण हीन ही शब्दयोजना मला फार आवडली.द्रौपदीचा

टाहो , तिचा धावा त्याच्या कानापर्यंत पोहचतच नाहीये अशा अर्थाने ही  शब्द योजना!

तसेच अंधपुत्र हा शब्द ही फार परिणामकारक.धृतराष्ट्र तर दुर्योधनाच्या प्रेमात आंधळा आहेच. स्वतः दुर्योधन ही सत्ता, संपत्ती यांच्या मुळे अंध झाला आहे.उचित व अनुचित भान त्याला राहिले नाही.अंधराज व अंधपुत्र यांचा परस्परसंबंध सहजतेने , सहेतुक पणे सांगताना उत्तम अनुप्रास ही साधला आहे.

तसेच पुढे पितामह भीष्म जे अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, किंवा त्यांचा महाभारतामध्ये तसा लौकिक आहे, त्यांनी नेत्र झाकून घेतले अशी शब्दयोजना केली. म्हणजेच कर्तव्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले.तसेच धुरंधर म्हणून प्रसिद्ध पावलेले गुरू सभेमध्ये उपस्थित असताना ते स्वतः कर्म ,कर्मा प्रतीची श्रद्धा, निष्ठा विसरले.इथे  त्या व्यक्तिरेखेचा ,व्यक्तित्वाचा जो महत्त्वाचा अंश आहे त्याला अनुसरून त्यांनी काय करणे अपेक्षित होतं आणि त्यांनी काय केलं याचं मला वाटतं विरोधाभास म्हणता येईल अशा पद्धतीने सगळा प्रसंग काव्यबद्ध केलेला आहे .

आणि इथे सरांनी माणसे नव्हेत तर सारी मानवता अगतिक झाली असे लिहिले आहे.या मुळे तर ही कविता एका मोठ्या उंचीला गेली आहे असं मला वाटतं. यथार्थ, अर्थवाही शब्द योजना करून हा सारा प्रसंग कवीने उत्तम रीतीने शब्दबद्ध केला आहे, काव्यबद्ध केला आहे. तसेच पुढे कर्णाची  व्यक्तिरेखा येते तेव्हा हा कर्ण जो दानवीर म्हणून प्रसिद्ध आहे  त्याच्या झोळीमध्ये स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य मात्र नाही अशी स्पष्टोक्ती सहज पणे करून दिली आहे.सहस्त्रदाना पेक्षाही महत्त्वाचे स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य कर्णाच्या  दानशूर व्यक्तित्वाशी जुळत नाही,मेळ घेत नाही. आणि अशा या विरोधाभासातून कर्ण ही व्यक्तिरेखा ,तिचा फोलपणा दर्शविते. आणि एवढंच नाही तर कर्ण द्रौपदी सारख्या पतिव्रतेला  पतीता आणि एक उपभोग्य वस्तू समजतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या चारित्र्याची हीन पातळी या कवितेत अधोरेखीत केली गेली आहे. हे सर्व सांगताना पतिव्रता पतिता हा अजून एक सुंदर अनुप्रास साधला आहे.या शिवाय पतिव्रता पतिता उपभोगिता हे लयबध्द शब्द योजून कवीने  शब्दांवरील  हुकुमत दर्शविली आहे. पहिल्या दोन कडव्यात द्रौपदी समोर अत्यंत विचित्र, अपमानास्पद परिस्थिती उभी ठाकली आहे तिचं प्रत्ययकारी वर्णन अत्यंत ताकदीने उभे केले आहे. अशा या परिस्थितीत न्यायाने, धर्माने, जबाबदारीने, कर्तव्यबुद्धीने वावरणारे ज्येष्ठ लोक मूग गिळून गप्प बसले आहेत याची जाणीव झाल्यावर ती भीम आणि अर्जुन या आपल्या पतींना आवाहन करते .भीमाला ती म्हणते की हे भीमा!तुझं सामर्थ्य दाखव. तुझे बाहू कसून तुझे सामर्थ्य दाखव आणि माझे रक्षण कर. आता इथे सुद्धा बाहू कसून या दोन शब्दांत भीमाचे बाहू सामर्थ्य आणि कसून या शब्दांत द्रौपदीची त्याला केलेली आर्त आणि आर्जवी विनवणी  आपल्या ध्यानात येते. ती अर्जुनाला आवाहन करते. आणि त्याच्याकडे पाहून ती म्हणते हा धनुर्धर पार्थ धनुष्य व  बाण गाळून  हताश होऊन  दूर बसला आहे .गाळून या शब्दात अर्जुनाची अवस्था आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.  नुसतंच आवाहनाची तीव्रता नाही तर त्या व्यक्तिरेखांची परिस्थिती आपल्यासमोर या शब्दांतून अत्यंत ताकदीने कवींनी विदित केली आहे.

याज्ञसेनी द्रौपदीला लाभलं होतं  यज्ञाचे तेज.त्यामुळे अशा तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्वाच्या द्रौपदी पुढे तिचे अगतिक पाच पती नपुंसक ठरतात. त्यामुळे या तेजस्वी व्यक्तिरेखेच्या पुढे पतींचा नपुसंकपणा ही मनावर कोरला जातो.येथे याज्ञसेनी हे द्रौपदीचे नामाधिधान  अतिशय उचित! त्याचा परिणाम आपल्या मनावर ठसतो. तिची आर्त साद तिच्या परिस्थितीची जाणीव करून देते आणि तरीही कोणीच काही प्रतिक्रिया देत नाही हे पाहिल्यावर  ती धर्माचा विचार मांडते . धर्मराज जो   स्वतः हरला आहे त्याला  स्वतःच्या बायकोवर काय अधिकार उरतो असा योग्य सवाल करून  इथेही धर्मा कडूनच केलेला अधर्म ही वस्तुस्थिती  दर्शविली आहे.हा प्रचंड विरोधाभास आपल्या लक्षात येतो .तसंच घोर अघोर ही शब्दयोजना आहे त्या शब्दांतून द्रौपदी वरील अन्यायाची तीव्रता आपल्या मनावर ठसते .चंडी प्रतापी पती म्हणजे माता चंडीसम प्रतापी  पती  असूनही द्रौपदीचे शील धोक्यात आले आहे. आणि  आपण सर्वस्व म्हणतो ते स्त्रीचं शील खाक होणार ही भीती

द्रौपदीच्या मनात आहे. या  द्रौपदीच्या सगळ्या भाष्या वर सभा तटस्थ आणि त्रयस्थपणे  बसून आहे .वचनांचा ,शौर्याचा ज्येष्ठत्वाचा  आधार घेऊन द्रौपदी तिच्यावरील होऊ पाहणाऱ्या अन्यायाला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि तो फोल होतोय हे पाहून शेवटी भावा समान कृष्णाचा धावा करते .अभागी बहिणीसाठी तूच एक त्राता असे आवाहन ती करते. उत्तम शब्दयोजना पहा. भगिनी साठी अभागन तूच एक भ्राता! भ तसेच ग आणि न या शब्दांची द्विरुक्ती कवीच्या शब्द सामर्थ्याची आणि कल्पनाशक्तीची जाणीव करून देते .श्रीकृष्णा शिवाय आता दुसरा कोणीही त्राता उरला नाही ही गोष्ट द्रौपदीच्या  मनात पक्की होते आणि ती त्याला वस्त्र पुरवण्याची आणि त्यायोगे तिचं रक्षण करण्याची विनंती करते. आणि त्याला म्हणते माझ्या बंधुत्वाची भाक, आण, शपथ मी तुला देते आणि माझे रक्षण करण्याची विनंती करते .तर असा हा महाभारतातील वस्त्रहरणाचा एक महत्त्वाचा प्रसंंग ज्यामध्ये कितीतरी संमिश्र भावनांचा  अंतर्मुख करणारा   कल्लोळ  आहे.त्याच  एक दृश्यमान  चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्यात कवी यशस्वी ठरलेला आहे .आणि त्या सगळ्याचे श्रेय  समर्पक, अर्थवाही शब्दांची योजना यांना! पर्यायाने कवीला आहे हे नि:संशय!

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे

फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात.

रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांनी गुढ्या तोरणे उभारून रामरायाचे स्वागत केले. या दिवशी रेडिओवर माणिक वर्मांच्या भावपूर्ण आवाजातलं गाणं हमखास ऐकायला येतं आणि आपलं मन प्रसन्न करतं.

विजयपताका श्रीरामाची

झळकते अंबरी

प्रभू आले मंदिरी

*

गुलाल उधळून नगर रंगले

भक्तगणांचे थवे नाचले

रामभक्तीचा गंध दरवळे

गुढ्या तोरणे घरोघरी ग.

किती सुंदर शब्द ! खरोखरच वातावरणात रामभक्तीचा गंध दरवळत असतो. कारण गुढीपाडव्यापासून श्रीरामांच्या नवरात्राला सुरुवात होते. आपले सण, उत्सव किती सुंदर तऱ्हेने निसर्गाशी आणि ईश्वराशी जोडले आहेत. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नाते तेव्हाच त्यांना उमजले होते. पर्यावरण जपणे, त्याच्या साथीने जगणे हा त्यांच्या जीवनाचाच जणू एक भाग झाला होता. इको फ्रेंडली वगैरे शब्द आपण आज वापरत असलो तरी त्यावेळी जे काही होते, ते सगळेच इको फ्रेंडली होते. असे सण साजरे करण्यामागे पूर्वजांची दृष्टी किती विशाल आणि उदात्त होती, याचे प्रत्यंतर या सगळ्या सणांमागील पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा लक्षात येते. त्यामागे असणारा आरोग्याचा दृष्टिकोन, सामाजिक एकतेचा संदेश खूप महत्वाचा असतो. पण आपण जेव्हा हा उद्देश समजून न घेता हे सणवार साजरे करतो, तेव्हा मात्र ती एक औपचारिकता होते. सुटी, खाणेपिणे, मौजमजा यातच दिवस व्यतीत होतो. नवीन पिढीच्या दृष्टीने तर आपल्या या प्रथा, परंपरा समजून घेणे आवश्यक वाटते तरच भविष्यात आपली संस्कृती, सामाजिक एकोपा टिकून राहील.

गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा सण आजचा नाही. असे ,म्हणतात की ब्रह्माने याच दिवशी सृष्टी निर्मिली. गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षांपासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात. अगदी रामायणापासून त्यांची सुरुवात होते. गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी, कुटी वगैरे असा असला तरी खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे. एखादं मोठं काम करणं, शत्रूवर विजय प्राप्त करणं, हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणे असा वाक्प्रयोग केला जायचा. माधवदासांनी लिहिलेल्या ‘ उत्कट साधूनि शिळा सेतू बांधुनी… या श्रीरामांच्या मराठी आरतीत पुढील ओळी किती सुंदर आहेत बघा –

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।

लंकादहन करुनी अखया मारिला ।।

मारिला जंबू माळी, भुवनी राहाटीला ।

आनंदाची गुढी घेऊनिया आला ।।

श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर म्हणजेच एक अलौकिक असे कार्य संपन्न केल्यानंतर हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला. इथे गुढी म्हणजे विजयपताका असा अर्थ घेता येईल. अयोध्येच्या नगरजनांनी सडे शिंपून, रांगोळ्या काढून आणि गुढया तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हाही नगर वासियांनी श्रीकृष्णाचे असेच स्वागत केले होते असे म्हणतात. महाभारताच्या आदिपर्वात गुढीचा उल्लेख आढळतो. खरं तर असाही अर्थ घेता येईल की आपला देह हीच एक नगरी आहे. आपल्या हृदयमंदिरात आपण आनंदाची गुढी उभारून श्रीराम, श्रीकृष्ण यांचे स्वागत करतो. त्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे हवेत. आपल्या मनातील काम, क्रोध आदी वासना जेव्हा नष्ट होतील, त्यांच्यावर विजय प्राप्त होईल, तेव्हाच श्रीरामांचा प्रवेश आपल्या हृदयमंदिरात होईल. परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. तो सत चित आनंद म्हणजेच सच्चीदानंद आहे. तो आपल्या हृदयात प्रवेशला की आनंदाची गुढी आपोआपच उभारली जाते.

स्त्रीला आदिशक्ती मानून तिची पूजा पूर्वीपासून केली जाते. माता पार्वती म्हणजे आदिशक्ती. शंकर आणि पार्वती यांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो पार पडला. तेव्हापासून पाडव्याला स्त्रीच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते. गुढीपाडव्याचा उल्लेख म्हाईंभट यांनी लिहिलेल्या लीळाचरित्रातही आढळतो. ज्ञानेश्वरीत सुद्धा गुढीचा उल्लेख येतो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात-

अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।

सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।

अधर्म आणि दोष नष्ट करणारी सुखाची गुढी मी उभवितो. कोणाकडून ? तर सज्जनांकडून. सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या वाङ्मयातही गुढीचे उल्लेख आढळतात. चोखोबा तर म्हणतात-

टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।

चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन प्रवास करून आल्यानंतर दुर्लभ असा मानवदेह प्राप्त होतो. नरदेह प्राप्त होणे म्हणजे आनंदाची गुढी ! म्हणून भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊन आनंदाने टाळी वाजवावी.

गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे. आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे वेळू किंवा काठी. त्यावर आपले डोके म्हणजे घट. गुढीवरचे रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह. त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पाने म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक. गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचे प्रतीक. जेव्हा आपण आपली सुखदुःखे त्या परमेश्वररूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो, तेव्हा जीवनही गोड, अमृतमय होते. आरोग्याच्या दृष्टीनेही कडूलिंबाच्या पानांचे महत्व आहे. लिंबाची पाने चवीला कडू असली तरी गुणधर्माने थंड आहेत. पुढे सुरु होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावे म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ, मीठ, मिरपूड इ. घालून खातात.

संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेकवेळा गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो, तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचे प्रतीक त्यांना भासमान होते. मग ती गुढी हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तीची, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे. गुढी वारीत आणि रणांगणातही उभविली जाई. जशी एखादी ज्योत ( बटन ) खेळाडूंकडून पुढे नेली जाते, तशीच ती चपळ माणसांच्या हस्ते युद्धात आणि वारीत पाठवण्यात येई. त्याद्वारे काही संकेत दिलेले असत. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात –

पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनिया चपळा हाती गुढी ।।

शालिवाहन राजांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. शालिवाहनांच्या राज्यात अपार समृद्धी होती. पण त्यामुळे प्रजेत आळस आणि सैन्यामध्ये उत्साह आणि चपळता राहिलेली नव्हती. कुठलीही गोष्ट एकाच ठिकाणी वापर न होता पडून राहिली की ती गंजते किंवा बिनकामाची ठरते. तसेच शालिवाहनाच्या सैन्याचे झाले होते. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात राहिले नव्हते. अशातच शकांचे आक्रमण राज्यावर झाले. मग काय करायचे ? सैन्याला प्रशिक्षण द्यायचे किंवा नवे सैनिक भरती करायचे तर काही वेळ जाणारच. मग शालिवाहनांनी हजारो मातीचे सैनिक, हत्ती, घोडे तयार केले. त्याच्या साहाय्याने त्यांनी जुलमी अशा शकांचा पराभव केला. मग तो विजय लोकांनी गुढया तोरणे उभारून साजरा केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरु झाला. पण खरंच मातीचे सैनिक, हत्ती, घोडे लढले असतील का ? मला वाटतं त्याचा प्रतीकात्मक अर्थ आपण घ्यायला हवा. शालिवाहन राजाचे सैन्य मृत्तिकेसमान म्हणजे चैतन्यहीन, निरुत्साही झाले होते. त्यांच्यात मरगळ आली होती. मातीच्या सैन्यात प्राण फुंकणे म्हणजे त्यांच्यातील चैतन्याला आवाहन करणे, त्यांच्यातील स्वत्व, स्वाभिमान, शौर्य, देशाभिमान जागृत करणे. किती सुंदर अर्थ आहे हा !

जेव्हा जेव्हा समाजात अशी स्वत्वहीनता, मरगळ आणि गुलामगिरीची वृत्ती अंगवळणी पडते, तेव्हा तेव्हा त्या समाजात असेच प्राण फुंकावे लागतात. वर्षानुवर्षे गुलामी रक्तात भिनलेल्या समाजात असे चैतन्य समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची गुढी उभारता आली. स्वातंत्र्यपूर्व काळात असे चैतन्य लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, स्वा सावरकर यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तेजस्वी त्यागातून निर्माण झाले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली.

गुढी ही उंच उभारली जाते. ती आशाअपेक्षांचे प्रतीक असते. ती जणू आपल्याला सांगते, तुमचे ध्येय, आशा, अपेक्षा अशाच उंच असू द्या. त्यांना मर्यादा घालू नका. स्काय इज द लिमिट ! आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम, उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या. हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे.  कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात. त्या म्हणतात –

गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी

गेली साली गेली आढी, आता पाडवा पाडवा

तुम्ही येरयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.

या बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मनातली अढी सोडून देऊन एकमेकांवरचे प्रेम वाढवू या. आनंदाची गुढी उभारू या.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

आत्तापर्यंतच्या एकूण नऊ लेखांपासून मी माझ्या मतदानाविषयीच्या गोंधळाबद्दल आणि कन्फ्यूजन बद्दल लिहिले आहे. या लेखाद्वारे एक अंतिम गोंधळ आपल्यासमोर मांडतो आहे.

आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता जे दिसते आहे तीच परिस्थिती घटनाकारांना अपेक्षित होती का ? लोकशाही म्हणजे हीच परिस्थिती का ? तसे असेल तर आपल्याला खरेच लोकशाही योग्य आहे का ? नसेल तर आपण लोकशाही योग्य पद्धतीने राबवली नाही असे म्हणावे काय ? शेवटी लहान मुलाच्या हातात एखादे छान, कितीही चांगले आणि भारी खेळणे दिले तरी तो त्याची मोडतोडच करतो. त्याप्रमाणे लोकशाही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये, वृत्तीमध्ये नीट रुजलीच नाही, त्यांच्या हातात घटनाकारांनी ही राज्यघटना देऊन, तसेच तर केले नाही ना ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताची लढाई सुरू केली होती. आज ७५ वर्षाने जाती संघर्षाची लढाई आणि जाती विभाजनाची लढाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हेच अपेक्षित होतं ? प्रजा हीच सार्वभौम ? खरंच तसं आहे ? सर्व समाज घटकांचा समतोल विकास, खरंच होतो आहे ? सर्वांना समान संधी खरच मिळते आहे ? शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व खरंच आज आहे ? समता आणि बंधूभाव हा कुठे दिसतो आहे ?

सत्तर वर्षांपूर्वीची लोकशाही बाबत पाहिलेली स्वप्ने आम्हालाही माहित आहेत. आमच्यापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठे असलेल्यांनी ती आमच्याही डोक्यात भरवली होती. त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला पाहताना आनंद होईल ?

अशीच परिस्थिती. मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर …….

मी मत का द्यावं ?

मी मत द्यावं का ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares