मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

मायंदाळ म्हणजे काय? – बक्कळ 

बक्कळ म्हणजे काय? – पुष्कळ 

पुष्कळ म्हणजे काय? – लय 

लय म्हंजी काय? – भरघोस 

भरघोस म्हणजे काय? – जास्त 

जास्त म्हणजे काय? – भरपूर 

भरपूर म्हणजे काय? – खूप 

खूप म्हणजे काय? – मुबलक 

मुबलक म्हणजे काय? – विपुल 

विपुल म्हणजे काय? – चिक्कार

चिक्कार म्हणजे काय? – मोक्कार 

मोक्कार म्हणजे काय? – मोप 

मोप म्हणजे काय? – रग्गड 

रग्गड म्हणजे काय? – प्रचंड 

प्रचंड म्हणजे काय? – कायच्या काय 

कायच्या काय म्हणजे काय? — लय काय काय 


– आता तरी कळलं का.. काय ते…….

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मी कृतार्थ जाहले… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ मी कृतार्थ जाहले… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, ध्येयंं, नव्या वाटा, नवी क्षितिजे यांची आस बाळगणं त्यासाठी झोकून देणं या सर्वांसाठी लागते चिकाटी, जिद्द मनोबल. या दिशेचा मार्ग सरळ, सोपा नसतो. खाचखळग्यांचा, काट्याकुट्यांचा असतो. स्वप्नपूर्तीच्या मागे लागणाऱ्यांना भवतालचे अनेक घटक सतत मागे खेचत असतात, उणीवांवर बोट ठेवून मानसिक खच्चीकरण करत असतात, या सर्वांवर मात करून अंतप्रेरणेने चालत राहणं, ध्येयपूर्तीचा टप्पा गाठणं यासाठी प्रचंड मनोधैर्य लागतं.

A WILL WILL FIND A WAY

किंवा

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे एक ना एक दिवस यश दारात उभे राहते आणि त्या वेळेचा जो आनंद असतो त्याला सीमा नसते. अनेक घटिकां-पळांच्या तपस्येचं ते फळ असतं आणि त्या क्षणी “आपण हे करू शकलो, हे मिळवू शकलो” ही भावना कृतार्थ करते. जगणं सार्थ झालं असं समाधान लाभतं. याचसाठी केला होता अट्टाहास हा भाव उत्पन्न होतो.

याच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे मी कृतार्थ जाहले हे सुंदर गीत! या गीताचा आपण आज रसास्वाद घेऊया.

☆ मी कृतार्थ जाहले ☆

स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥ध्रु॥

*

चिमणीला पदरातिल गरुडपंख लाभले

उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥१

*

दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

संकल्परूप माझे या वांच्छनेस लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।२

*

नाही अहंकार कधी दंभ ना स्पर्शले

सेवेतुनि जगताच्या कर्मफला जाणिले

अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

यशोमन्दिरात आज मी कृतार्थ जाहले।३

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)

हे एक यशोगीत आहे. एक आनंदगीत आहे. साफल्याची भावना व्यक्त करणारे हे सुरेख शब्दातले गीत आहे. पूर्ततेचा आनंद, हर्ष आणि त्यानंतर येणारा कृतार्थतेचा भाव हे गीत वाचताना जाणवतो. एका यशप्राप्त कन्येचे मनोगत या गीतात व्यक्त केलेले आहे.

स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।ध्रु।

ध्रुवपदात कवितेतल्या आनंदमयी भावना जाणवतात. आनंद कसला तर स्वप्नपूर्तीचा. “अजी मी ब्रह्म पाहिले” सारखाच, त्याच तोडीचा आनंद गीतातल्या या कन्येला झालेला आहे. ती म्हणते,

“आज माझं कित्येक वर्षं मनात बाळगलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या यशाच्या शिखरावर मला कृतार्थ झाल्याचे समाधान लाभत आहे. ”

ध्रुवपदाच्या या ओळीतला यशोमंदिर हा शब्द खूपच लक्षवेधी आहे. यशाचे मंदिर किंवा यशाचे द्वार म्हणजे जणू काही मंदिरच. यशाला दिलेली ही मंदिराची उपमा फारच पवित्र, मंगलमय आणि सूचक वाटते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या यशाची ती ग्वाही देते.

चिमणीला पदरातिल गरुड पंख लाभले

उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले

देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले

यशो मंदिरात आज मी कृतार्थ जाहले. १

इतके दिवस मी लहान होते. पंखात माझ्या ताकद नव्हती. उडण्याचे सामर्थ्य नव्हते. म्हणून ते मिटलेल्या अवस्थेत होते पण माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जणू काही उंच गगनात सहजपणे भरारी मारणाऱ्या गरुडाचे पंखच मला लाभले आणि हे जग मी माझ्या मुठीत बंदिस्त करू शकले. जगाला माझं अस्तित्व मान्य करावंच लागलं. कर ले दुनिया मुट्टी मे हे माझं स्वप्न जणू काही पूर्ण झालं. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत मला आता आदर, अभिमान आणि आश्वासकता दिसत आहे. हेच मला हवं होतं आणि ते मी मिळवलं म्हणून माझा जन्म सार्थ झाला असे आता वाटत आहे. ”

हे संपूर्ण कडवं रूपकात्मक आहे. गरुडपंख लाभले या शब्दरचनेत आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याचा मनोमन उगम झाल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. कवीने योजलेल्या या रूपकात्मक शब्दातून जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवण्याचा अभिमान जाणवतो. “गुलामगिरीच्या शंखला तोडून उच्च स्थानावरचे माझे स्वतःचे असे एक राज्य निर्माण करण्यात मला यश लाभले आहे” हा विश्वास जाणवतो.

देवी साम्राज्याची या शब्दातून तिने रोवलेल्या विजयपताकेचा विलक्षण अभिमान आणि भाग्य ती उपभोगीत आहे हे दिसतं. आजपर्यंत जिला पायाची दासी मानलं जात होतं तिला देवीचं स्थान मिळालं. एका सक्षम सबल रूपात ती नव्याने अवतरली.

दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रहा नसे भीती

संकल्प रूप माझीया वांच्छनेस लाभले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले २

“यश तर पदरी आलंच पण मागे वळून पाहताना जाणवत आहे की या यशाचा मार्ग सोपा नव्हता. अवघड होता. सरळ नव्हता! वळणावळणाचा होता. एखाद्या असाध्य डोंगराचे शिखर गाठण्यासारखेच होते ते. अत्यंत साहसाचा हा मार्ग होता पण तरीही अंतर्मनाची कुठेतरी विलक्षण साथ होती, मनात जिद्द होती, चिकाटी होती, एक दुर्दम्य आशावाद आणि निग्रहही होता ज्यामुळे मनात दाटलेल्या भीतीवर मी मात करू शकले, निर्भय बनले. स्वशक्तीचा, स्वसामर्थ्याचा वेध घेऊ शकले आणि त्याच बळावर माझ्या या संकल्पांना, इच्छेला एक निश्चित असा आकार मिळू शकला. खरोखरच आज मी धन्य झाले.”

गिरीशिखराप्रति ही शब्दयोजना इथे अगदी चपखल आहे. कुठलाही डोंगर ओलांडणं हे अत्यंत साहसाचं आणि आव्हानात्मक असतं. उरी बाळगलेली स्वप्नं सत्यात उतरवणं हे येर्‍या गबाळ्याचं कामच नव्हे तर त्यासाठी गिरीशिखरावर पोहोचण्याइतकं सामर्थ्य हवं. . हे अधोरेखित करणारी ही शब्दयोजना वाचकाला नक्कीच भावते. या ओळींमध्ये वीरश्री जाणवते. वीर रसाचा इथे भावाविष्कार झालेला अनुभवास येतो.

गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती

साथ लाभता मना निग्रह नसे भीती

यात अनुप्रास आणि यमक हे दोन्ही अलंकार अतिशय सुंदरतेने गुंफले आहेत.

नाही अहंकार कधी दंभ मना स्पर्शले

सेवेतूनी जगताच्या कर्मफला जाणिले

अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले

यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ३

“मला जे हवं होतं ते मिळवताना माझी मानसिकता मात्र संतुलित होती. मी माझ्या मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही. माझ्या ध्येयमार्गावरून जाताना मी कुणालाही तुच्छ लेखले नाही. मी कुणीतरी इतरांपेक्षा वेगळी आहे असा अहंकार बाळगला नाही. कुठल्याही ढोंगीपणाचा बुरखा पांघरला नाही उलट एका सेवाभावाने मी जगताच्या जीवनातला अज्ञानांधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मी- ची ओळख पटवताना मी समाजाच्या जीवनप्रवाहाला कधीही अव्हेरलं नाही. त्यातूनच ठेचकाळत, शिकत, शिकवत, समजावत, पटवत शांततेच्या, अहिंसक मार्गाने मी माझ्या कष्टाचे फळ मिळवले आणि माझे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती नंतरही माझे पाय सदैव जमिनीवरच ठेवले. यशाने मी हुरळून गेले नाही. भले मी मनस्वी आनंदले असेन पण त्याची नशा किंवा धुंदी मी माझ्या मनावर येऊ दिली नाही. अखेर कोsहं या भावनेने मी एक निमित्तमात्र असे समजून समर्पित भावानेच या यशाकडे, तृप्त मनाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाहते.”

या गीतातला हा शेवटचा चरण अतिशय अर्थपूर्ण आहे, संदेशात्मक आहे. आनंद होणं ही सर्वसाधारण सामान्य भावना आहे. ती एक सहज अशी अभिव्यक्ती आहे पण त्याचा अवास्तव आकार न होऊ देणे हे सामान्यातले असामान्यत्व आहे आणि याच असामान्यत्वाचा पाठपुरावा कवीने या शेवटच्या चरणात जाता जाता सहज केला आहे.

वोपिले हा शब्द ज्ञानेश्वरी ची आठवण करून देतो आणि त्या शब्दातला गोडवा सांभाळून या गीतातल्या ओळीत तो अगदी बेमालूमपणे सहज गुंफलेला जाणवतो.

वोपिले म्हणजे अर्पिले, देऊन टाकले या अर्थाने इथे तो योजला असावा.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याच अर्थाचा बोध करणाऱ्या या शेवटच्या काव्यपंक्ती आहेत.

विश्वपदी वोपिले हा खूप विस्तारित, उदात्त अर्थांचा शब्दसमूह आहे. “ जिथून मिळालं तिथेच अर्पिलं” हा भाव तिथे आहे. “माझं यश हे आता माझ्यापुरतं मर्यादित नाही तर या यशामुळे जे सामर्थ्य, जी ताकद मला लाभली आहे त्याचा सुयोग्य उपयोग या विश्वासाठीच मी करेन. ” हा व्यापक निर्धार त्यात जाणवतो.

विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ।

जो जे वांछील तो ते लाहो।।

असा एक अव्यक्त दडलेला अर्थ या गीतात व्यापून राहिलेला आहे.

जे गीत एका सामान्य कन्येच्या यशोनंदाने सुरू होते ते गीत सहजपणे एका विश्वरूपी संदेशात रूपांतरित होते. केवळ १४ ओळीत डॉक्टर श्रोत्रींनी साधलेला हा महान अर्थ वाचकाला एका वेगळ्याच विचारप्रवाहात घेऊन जातो. धन्य तो कवी! धन्य त्याची शब्दलीला!

या संपूर्ण गीताची यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ही एक टॅगलाईन आहे आणि या टॅगलाईनला, या ओळीला साजेसा प्रत्येक चरणातला तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द …लाभले— वोपिले हे अतिशय लयबद्ध वाटतात. .

यश कोणते, यश कसले याचा स्पष्ट अथवा विशिष्ट असा उल्लेख या गीतात नाही. यश कोणतेही असू शकते. आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अगदी कोणतेही …. पण या गीतातला एक अंतर्गत भाव जाणवतो तो हा की कुठल्याही स्त्रीचे यश, तिची स्वप्नपूर्ती आणि पुरुषाचे यश– सामाजिक फुटपट्टीने मोजले तर त्यात महत् अंतर असते. पुरुषांपेक्षा एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो अधिक आव्हानात्मक आणि अवघड असतो. कुठेतरी कवीने या स्त्री संघर्षाचा सन्मान आणि दखल घेतल्यामुळे एका स्त्रीच्या भूमिकेतून मला त्याचे मूल्य अधिक वाटते हे निःसंशय …

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ श्रवण☆ सौ शालिनी जोशी

तीन मार्च हा श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त लेख:

☆ श्रवण ☆

‘श्रवण’ हे पहिले भाषिक कौशल्य आहे. त्याचे नंतर भाषण, वाचन, लेखन इत्यादी. श्रवण मध्ये मूळ धातू’ श्रु’ ऐकणे. पण ऐकणे आणि श्रवण यात फरक आहे. आपल्या कानावर बरेच आवाज पडत असतात त्यातील विशिष्ट आवाज लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण (listening)आणि ऐकणे म्हणजे नुसते आवाज कानावरून जाणे(hearing). वेदांना श्रुती म्हणतात. मग वेद वचन ऐकणारा तो श्रोता. आणि त्याने ऐकलेली वचने म्हणजे श्रुत. यावरून ज्ञानी माणसाला बहुश्रुत म्हणतात. ऐकणारे इंद्रिय कान याला कर्ण, श्रोत्र, श्रवण असे प्रतिशब्द आहेत.

आपल्या वैदिक संस्कृतीत श्रवणाला पूर्वापार महत्त्व आहे. कारण श्रवणाद्वारेच ज्ञानगंगा प्रवाहित राहिली. गुरु शिष्य शिक्षण पद्धतीत गुरुने सांगावे. शिष्याने ते मनापासून ऐकावे, मग कंठस्थ करावे व पुढील पिढीला सांगावे. अशी पद्धत होती. ज्ञानेश्वर म्हणतात ‘वक्ता तो वक्ताची नोहे। श्रोतेविण।’अधिकारी श्रोता नसेल तर वक्त्याचे बोलणे वाया जाते. इतके श्रवणाचे महत्व. विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाना यज्ञ रक्षणासाठी आपल्याबरोबर नेले. वाटेत चालता चालता त्यानी जो ज्ञानोपदेश केला तो राम-लक्ष्मण यांनी श्रवण केला. चित्तात धारण केला. तेथे लिहून घेण्याची गरज पडली नाही. श्रवण असे एकाग्रतेने करायचे असते. ते जेव्हा परमेश्वराच्या लीला गुणांचे होते. तेव्हा ती ‘श्रवण भक्ती ‘होते नवविधा भक्तीतील ही पहिली भक्ती.

गौतम बुद्ध एकदा झाडाखाली बसले होते. तेव्हा कोणी एक जण येऊन त्यांना अपमान कारक बोलू लागला. पण गौतम बुद्ध शांत होते. त्यांच्या शिष्याला याचे आश्चर्य वाटले. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले देणाऱ्याने दिले तरी काय घेणे ते आपण ठरवायचे असते. हाच श्रवण विवेक. तो माणूस मुकाट्याने निघून गेला. श्रवण केलेल्या गोष्टीचा माणूस विनियोग कसा करतो हे सांगणारी अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. एकदा अकबराने तीन सारख्या धातूच्या मूर्ती आणल्या आणि बिरबलाला त्यांच्यातील फरक ओळखायला सांगितला. बिरबल चाणाक्ष होता. त्याने एक तार घेतली. एका मूर्तीच्या कानात घातली. ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. म्हणजे असे काही लोकांचे श्रवण वरवरचे असते. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचे. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, तर तोंडातून बाहेर आली. म्हणजे त्याने ऐकले ते लगेच बोलून टाकले. पण तिसऱ्या मूर्तीच्या कानातील तार पोटात गेली. ती बाहेर आली नाही. म्हणजे त्याने ऐकले त्यावर विचार मनन केले. हे खरे श्रवण. समर्थ रामदास म्हणतात ‘, ऐसे अवघेची ऐकावे। परंतु सार शोधून घ्यावे ।असार ते जाणूनी त्यागावे ।या नाव श्रवण भक्ती । पण सगळेच ऐकले तरी त्यातले सार तेवढेच घ्यावे. म्हणून गणपतीला शुर्पकर्ण म्हणतात. सुपासारखे कान असलेला. सुप जसे फोलपट टाकून स्वच्छ धान्य ठेवते. तसेच गणपतीचे कर्ण. त्याचे श्रवण हा गुण सर्वांनीच घ्यावा.

कान हे श्रवणाचे प्रतीक. तो आपला आपण बंद होत नाही. जसे तोंड व डोळा बंद करता येतो. त्यामुळे त्याला नकार देता येत नाही. डोळा फक्त समोरचेच पाहतो. पण चारी बाजूच्या लहरी कानावरती सहजच पडतात. घरात बसलेले असताना विविध आवाज आपल्या कानावर ती पडतात. पक्षी किलबिलत असतात. रेडिओ सुरू असतो. पंख्याचा आवाज येत असतो. कोणीतरी काही बोलत असते. अशा गडबडीत कोणत्यातरी एका इच्छित आवाजावर लक्ष केंद्रित करणे हेच श्रवण कौशल्य. त्यासाठी गरज मनाच्या एकाग्रतेची. हाच खरा श्रोता. यालाच ज्ञानेश्वर अवधान म्हणतात. श्रोत्यांना वेळोवेळी सांगतात, ‘ आता अवधान ऐकले द्यावे ।मग सर्व सुखाची पात्र होईजे।’

कानावरून आलेले विविध वाक्प्रचार व म्हणी आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. उदाहरणार्थ बळी तो कान पिढी, कानामागून आला तिखट झाला, भिंतीला कान असतात, कान व डोळा या चार बोटाचे अंतर, कान टवकारणे इत्यादी

माणूस हा सौंदर्याचा भोक्ता. त्यामुळे कानाला सजविण्यासाठी त्याला दागिन्या घालण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्याला कुंडल असे म्हणतात. त्यासाठी बारशाच्या दिवशीच कान टोचतात. आपल्या सोळा संस्कारतील हा एक संस्कार. कानाच्या वरच्याभागी पुरुषही भिकबाळी नावाचा दागिना घालतात. ‘मकर कुंडले तळपती श्रवणी’ असे विठ्ठलाच्या कुंडलाचे वर्णन करतात. कुंडलांचा कुंडली जागृतीशी संबंध आहे असे म्हणतात. कान टोचण्यामध्ये शास्त्रीय कारणही आहे त्यामुळे आजारांची शक्यता कमी होते व स्वास्थ्य टिकते. या कुंडलावरून ‘वारियाने कुंडल हाले’ किंवा ‘बुगडी (म्हणजे कानातील दागिना) माझी सांडली ग’ अशी गाणी हे रचली गेली. असो कितीही दागिने घातले तरी

हस्तस्य भूषणानं दानं।सत्यं कंठस्यभूषणम्।

कर्णस्यभूषण शास्त्रं।भूषणैः किं प्रयोजनम्।

शास्त्र श्रवण करणाऱ्याच्या कानाला दुसऱ्या दागिन्यांची गरज नाही.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिढी अशीच घडवावी लागते” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“पिढी अशीच घडवावी लागते” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

४) मनमंजुषा —

 “ पिढी अशीच घडवावी लागते…. “ लेखक : मयुरेश डंके 

” पिढी अशीच घडवावी लागते “

” तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.

दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..

” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..

” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.

” तुम्ही पाठवा. ” 

” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ” 

” असं का बरं? ” 

” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही.” 

” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.

” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.

तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..

” मला माहिती पाठवा.. “

मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.

एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.

” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ” 

” नाही अजून. का रे? ” 

” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ” 

” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.

” पण असं का? ” 

” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “

” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ” 

” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ” 

” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ” 

“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ” 

” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ” 

” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.

काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.

” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ” 

“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “

” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.

” तसं जमणार नाही. ” मी.

” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ” 

” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.

असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.

“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.

नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं 

रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.

पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…

फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.

भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.

गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.

आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.

बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.

ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही १९ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा दहा दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ८ मे ते १९ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!

आपल्या मुलांना घडवण्यासाठी हे करायलाच हवं ना…

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…’ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…‘ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

महाकुंभची चर्चा गेली तीन चार महिने सुरू होती. मुळात जास्त गर्दीत जाण्याची अजिबात आवड नसलेली मी प्रयागराजला जाण्याचा विचारही केला नव्हता. लांबून बघू. वेगवेगळ्या वाहिन्यावरून आनंद लुटण्याचे ठरविले होते. फार धार्मिक नसल्याने तेही पुरेसे होते. पण पण पण खर सांगायचे तर माझ्यातला पूर्वीचा पत्रकार जागा झाला. एवढे लोक का जातात, आणि नक्की काय वातावरण असते हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि एका ग्रुपवर कल्पनाने विचारले महाकुंभला जायला कोणी तयार आहे का? लगेच होकार कळवला. बघता बघता दहाजणी तयार झाल्या. पण काही कारणाने फक्त चारजणी निघालो. आम्ही जात असलेल्या तारखा या आमच्या पथ्यावर होत्या.

आम्ही ज्या दिवशी पोहोचणार होतो, त्याच दिवशी महाकुंभत पंतप्रधान मोदी येणार होते. काय परिस्थिती असेल याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही सेक्टर १० मध्ये संस्कार भारतीच्या तंबूत होतो. तिथे अजिबात गर्दी नव्हती. त्या भागातील गंगा मैय्याचा किनारा मोकळा होता. आम्ही मनसोक्त गंगामैय्येत डुंबलो. अरे काहीच गर्दी नाही, उगाचच लोक घाबरवत होते, असे वाटून गेले. दुपारी बाहेर पडलो. नदीच्या दोन किनाऱ्यावर महाकुंभचे शहर पसरलेले आहे.

आमच्या भागात विविध संस्थांचे मंडप होते. नेत्र कुंभ, अमृतानंदमयी, रावेतसरकार असे विविध प्रवचनकार, सेवाभावी संस्था तसेच विविध राज्यांचे मंडप होते. मुख्यतः सांस्कृतिक आणि इव्हेंट असे या भागात होते. तर सर्व आखाडे दुसऱ्या किनाऱ्यावर होते. हे सर्व बघत प्रयाग शहरात आलो, तेव्हा गर्दीचा अंदाज आला. तरीही वाहनांना प्रवेश देण्याइतके रस्ते रिकामे होते. आम्ही चौघीही खूष होतो. आपले त्रिवेणी संगमावरचे स्नान सहज होईल. पण गंगा मैय्याच्या मनात जे असते तेच होते, अशी श्रद्धा प्रयागच्या नागरिकांमध्ये असते. त्याचे प्रत्यंतर आम्हाला आले. ६ फेब्रुवारीला प्रयागमध्ये लोकांचा समुद्र बघायला मिळाला. पण स्नान करायचेच या जिद्दीने आम्ही चालत राहिलो. किती चाललो माहित नाही. असेल १२-१४ किलोमीटर. मग खूप प्रतीक्षेनंतर स्नान झाले. संगमात उतरल्यावर मन शांतावले. सर्व क्षीण नाहीसा झाला. मन काही क्षणापुरते निर्विकार झाले. मग परतीचा प्रवास तेवढ्याच चालण्याने झाला. महाकुंभात सर्वजण समतल पातळीवर आल्याची जाणीव सुखावून जात होती. गाडीघोडा, पैसा काही उपयोगाचा नाही हे येथील गर्दी सांगून जात होती.

सुव्यवस्थेचा -स्वच्छतेचा कुंभ

या सर्व प्रवासात आम्हाला जाणवले ते खरंच शब्दांत मांडणे अवघड आहे. दिड महिन्याच्या काळात ४५ कोटी लोक येणार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड होते. पण प्रयागराजला गेल्यावर तिथल्या यंत्रणेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे लक्षात आले. गंगा मैय्याच्या पूरक्षेत्रात पूर्ण शहर सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहे. गंगा मैय्या सप्टेंबर पर्यंत तिथे मुक्काम ठोकून होती. ती आपल्या जागेवर परतल्यावर कामे सुरू झाली, असे स्थानिक सांगत होते. म्हणजे फक्त साडेतीन महिन्यांत अगदी वीजपुरवठ्यासाठीची यंत्रणा, मलनिःसारणाची सोय, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या सर्व उभारण्यात आल्या. प्रत्येक संस्थेला जागा ठरवून देण्यात आल्या. त्यावर मंडप, तंबू टाकण्याची आणि शौचालये उभारण्याची जबाबदारी संस्थांवर होती. पूरक्षेत्र असल्यामुळे सगळीकडे वाळूच वाळू. त्यावर सर्व रचना उभारली आहे. शौचालयाची प्लास्टिकची भांडी त्यात रोवण्यात आली आहेत. सर्व मैला एकत्र करण्यासाठी मोठ्या टाक्या जमिनीच्या खाली बसवल्या आहेत. दर दोन दिवसांनी त्या साफ करायला राज्य सरकारची मलनिःसारणाची गाडी येते. रस्त्यावर जागोजाग तात्पुरती शौचालये आहेत. पण ना त्यातून घाण बाहेर येते ना पाणी ना दुर्गंधी. साफ करणाऱ्यासाठी नेमलेले सेवक तत्परतेने काम करत होते. रस्त्यावर अगदी क्वचित कचरा दिसत होता.

श्रद्धेचा-मानवतेचा कुंभ

महाकुंभात येणाऱ्या भाविकांना खूप संस्था सेवा देत आहेत. प्रसाद म्हणून चहा, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वाटप सुरू आहे. इस्कॅानने तर लाखो लोकांना जेवण देण्याची सोय केली होती. महाप्रसादाच्या लाईनीमध्ये खूप तरूण मुलं-मुली उभी दिसली. ही मुले कोण हा प्रश्न मनात येतच होता तेवढ्यात रिक्षाचालकाने सांगितले की हे सर्व प्रयागमध्ये बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी आहेत. बहुतेकांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. गेल्या महिन्यापासून त्यांचा दोन वेळच्या जेवणाचे पैसे वाचले आहेत. अगदी सहजतेने मिळालेल्या माहितीने मनात येऊन गेले अरे हा श्रद्धेबरोबरच मानवतेचा कुंभ आहे. सर्वांच्या हातात स्टीलच्या एकसारख्या थाळ्या होत्या. जेवण झाले की प्रत्येक जण त्या धुवून पुढच्या भाविकाच्या हातात देतात, हेही रिक्षाचालकाने सांगितले.

गंगा मैय्याचे प्रेम

महाकुंभ नसताना किती श्रद्धाळू येतात, असे रिक्षाचालकाला विचारले. गंगा मैय्येच्या कृपेने पोटापुरता धंदा होतो. पावसाळ्यात मात्र गंगा मैय्या उग्र रूप धारण करते. ती माझ्या घराच्या पायरीपर्यत येते. कधी तीन कधी चार-पाच दिवस राहते आणि मग निघून जाते, हे रिक्षाचालक सांगत असतानाच मला कुसुमाग्रजांच्या मोडला नाही कणा या कवितेची आठवण झाली. गंगा मैय्येवर येथील लोकांच्या अपार श्रद्धा आहे.

.. तशीच भक्ती लड्डू गोपालवर आहे. आपण रोज जे जे करतो तसाच दिनक्रम ते लड्डू गोपालचा पाळतात. कुठेही जाताना गोपाल बरोबर असतोच. त्याला एकट्या घरी कसे ठेवायचे ही त्यामागची भावना. कुंभातही अनेकांच्या लड्डू गोपालची बास्केट होती. माझ्या परीघातील कोणीच एवढे श्रद्धावान नाही, त्यामुळे मी हे पाहून अचंबित झाले.

एकदंर हा महाकुंभ जितका साधू-संतांचा-भाविकांचा आहे. तितकाच तो स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेचाही आहे. माणसाच्या समुद्राला नम्रतेने शिस्तीत बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या यंत्रणेला खरंच सलाम करावासा वाटला. माताजी- बहेनजी- भैय्याजी- स्वामीजी म्हणत वर्दळ सुरळीत ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न खरंच सुखावून जात होता.

आम्ही चारचौघीच होतो. फक्त महिला म्हणून कुठेच कसलाच त्रास झाला नाही. अगदी लखनौवरून रात्री २ वा. प्रवास सुरू करायलाही आम्हाला भीती वाटली नाही. हा महाकुंभचा परिणाम की तेथील राज्य सरकारबाबत असलेला विश्वास सांगता येत नाही पण चार दिवसात कधीच कसलीच भीती वाटली नाही हे मात्र खरं.

– – – अतिगर्दीचे, वाहतूक कोंडींचे व्हिडिओ येत आहेत, ते खोटे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर परिस्थिती पुढे तेही शरणागत आहे. महाकुंभाचा धडा म्हणजे गंगा मैय्येच्या मनात असेल तर स्नान घडले. तिला शरण जा ती तुम्हाला आशिर्वाद देईलच.

लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुकोबारायांची होळी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

? इंद्रधनुष्य ?

☆ तुकोबारायांची होळी…  प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के 

‘मी होळीत काय आणि का जाळलं? ‘ याविषयी तुकोबाराय सांगतात,

 दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥ 

लोकं होळीत शेणाच्या गवऱ्या, लाकडं जळतात. पण तुकोबा म्हणतात..

” मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. ” 

दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही…

सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥ 

.. “दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुखं माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. ” 

…. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे…

आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥ 

.. मला सुखाची अपेक्षा का नाही? तर, “संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे. ”

आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड? ॥ 

“मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त ‘संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव’ एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील? ”

तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां? ॥ 

“मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता? ” 

…. सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.

धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य ती संतांची मांदियाळी

आपल्यातीलही सर्व दोष जळावेत म्हणून मनापासून शुभेच्छा 

प्रस्तुती –  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही. “

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे. “

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे? ” “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली…

एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो.

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे…

मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊदे. “

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता.

ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, ” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. ” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.

घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, ” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते! “

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, ” आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही. ” खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की, ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल!

देवाचे लक्ष आहे बरं का….

लेखक : अनामिक

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने… ‘ असं मुकेश यांनी गायलेलं एक गीत आहे. जगण्याची आशा जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माणूस इंद्रधनुषी सात रंगांची स्वप्न पहात असतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, ” या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”

खरोखरच हे जीवन विविधरंगी आहे. पण कधी कधी हेच जीवन एखाद्यासाठी भयंकर असे दु :स्वप्न बनू शकते. आयुष्य जिवंतपणी नरक बनतं. अशा वेळी जगणं नकोसं होतं. परंतु अशाही विपरीत परिस्थितीत काही माणसं हार मानत नाहीत. कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे असते. अशा परिस्थितीत ते असं काही जगतात की ते त्यामुळे त्यांचं जीवन सफल तर होतंच पण ते इतरांसाठी प्रेरणादायी बनतं. अशीच एक कथा ऑस्ट्रियातील विक्टर फ्रँकल यांची.

ते न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ होते. अभ्यास आणि संशोधन हेच जणू त्यांचे जीवन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांसाठी ते काम करत होते. जीवनाला कंटाळून निराश झालेल्या आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांना त्यापासून परावृत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले. विक्टर फ्रँकल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करून नाझी छळ छावण्यात पाठवण्यात आले. तिथे ते सगळे अपरिमित छळाचे बळी ठरले. या कालावधीत फ्रँकल यांनी आपल्या वडिलांचा, आईचा मृत्यू पाहिला. त्यांच्या गर्भवती असलेल्या पत्नीचे निधन झाले. परंतु या सगळ्या भयंकर, भीतीदायक वातावरणातून ते सुदैवाने वाचले, बाहेर आले आणि पुन्हा त्यांनी आपल्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी आपल्या जीवनातील जे अनुभव घेतले त्यावर आधारित Man’s Search for Meaning या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे ‘ अर्थाच्या शोधात ‘ या नावाने मराठी भाषांतर झाले आहे. डॉ विजया बापट यांनी हा अनुवाद केला आहे. फ्रँकल यांनी एकूण ३२ पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे एकूण ३४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

फ्रॅंकल यांच्या अनुभवाचे आणि जीवनाचे सार म्हणजे अर्थाचा शोध हे पुस्तक. त्यात ते म्हणतात, ” हे जीवन जर अर्थपूर्ण असेल तर मानवी जीवनातील दुःखालाही अर्थ असला पाहिजे. आपले भाग्य आणि मृत्यू या गोष्टी ज्याप्रमाणे टाळता येत नाहीत त्याप्रमाणेच दुःख ही न टाळता येणारी गोष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या दुःखाचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. दुःखाशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णता येत नाही.

आपल्या जीवनाला जर अर्थ नसेल तर जीवन भरकटते. आपण वाईट सवयींच्या आणि व्यसनांच्या आधीन होतो. माणसाच्या हातून सर्व काही हिसकावले जाऊ शकते. परंतु विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर त्याच्याकडे असेल तर ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. आपल्या भोवताली असणारी, आपल्या विरुद्ध असणारी परिस्थिती बदलण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर आपण स्वतःला बदलले पाहिजे. आपण घेतलेल्या भूमिकेत जगण्याचा अर्थ शोधण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.

जीवनात संकटे तर येणारच परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या जगण्याला नवा अर्थ देता यायला हवा. असा अर्थ तीन प्रकारे आपल्याला देता येऊ शकतो आणि त्यामुळे आपले जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. त्याबरोबरच ते इतरांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होऊ शकते.

१. आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ प्रत्यक्ष कामातून शोधत यायला हवा.

२. इतरांवर प्रेम करण्यातूनही तो शोधता येतो. आणि

३. दुःख, वेदना सहन करतानाही तो शोधता येतो.

असे हे तीन मार्ग आपल्या जगण्याला एक दिशा देऊ शकतात. यासाठी काही उदाहरणे आपण पाहूया. म्हणजे फ्रँकल यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आपल्याला लक्षात येईल.

त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कामातून जगण्याचा अर्थ, जगण्याची दिशा शोधता यायला हवी. ‘इकीगाई’ हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा हेच आपल्याला सांगतं की आपल्याला का जगायचं हे कळलं, तर कसं जगायचं हे नक्कीच कळेल. बाबा आमटे यांनी एका महारोग्याला अत्यंत भयानक अवस्थेत वेदनांनी तळमळताना पाहिलं. समाजाने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला जणू मरण्यासाठीच सोडून दिलं होतं. बाबांनी त्याची सेवा सुश्रुषा केली आणि मग कुष्ठरोग्यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आपले संपूर्ण जीवनच त्यांच्यासाठी समर्पित केले. त्यातून त्यांना जगण्याचा अर्थ कळला. त्यांचे जीवन म्हणजे समाजासाठी एक आदर्श असा वस्तुपाठ होता. पुणे येथे भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी भीक मागणाऱ्यांची वाईट अवस्था पाहिली. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना आतून वाटू लागले आणि आपले जीवन त्यांनी त्यांच्यासाठी समर्पित केले. अनेक भिक्षेकर्‍यांना त्यांनी रोजगार मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करतेच परंतु त्यापलीकडे जाऊन इतरांवर मानवतेच्या भावनेतून प्रेम करणे, इतरांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून काहीतरी समाजकार्य करणे हे सुद्धा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशी अनेक मंडळी आहेत की जी आपले काम करतानाच, इतरांसाठी देखील काम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. ती माणसे जगावीत, त्यांना चांगले खायला प्यायला मिळावे, चांगले कपडेलत्ते मिळावे म्हणून प्रयत्न करतात. संभाजीनगर येथील श्री चंद्रकांत वाजपेयी आणि त्यांचे सगळे सहकारी वाया जाणारे अन्न गोळा करून ज्यांना त्याची गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. नाशिक येथील श्री अशोक धर्माधिकारी आणि त्यांचे सहकारी आदिवासी स्त्रिया, मुले यांना आवश्यक त्या वस्तू दरवर्षी त्यांच्या भागात जाऊन पुरवतात. त्यांची दिवाळी आनंदाची करतात. अशी अनेक माणसे आहेत ही दोन नावे फक्त मी उदाहरणादाखल दिली. अनेक माणसे वृद्धाश्रमात जाऊन सेवा करतात, आपला वेळ देतात. आपले काम करता करताच या समाजोपयोगी गोष्टीही ते करत असतात. यातून त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ सापडतो आणि खरोखरीच त्यांचे जीवन धन्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशावर प्रेम केले. ‘ स्वतंत्रतेचे स्तोत्र ‘ या कवितेत ते म्हणतात

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण.

एक सुंदर सुविचार आहे, ” फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी जगलास तर जगलास. “

ज्यांनी स्वतः यातना सहन केल्या आहेत, वेदनांना तोंड दिले आहे अशी माणसे केवळ स्वतःचे दुःख कुरवाळत न बसता इतरांसाठी काम करून आदर्श घालून देतात. अशी पण खूप उदाहरणे आहेत. संतोष गर्जे हा स्वतः अनाथ असलेला तरुण! त्याने प्रचंड यातना सोसल्या आणि जगण्यासाठी संघर्ष केला. परंतु आपल्यासारख्या अनाथ लेकरांना अशा प्रकारचे जीवन जगावे लागू नये म्हणून अशा अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे. तो आणि त्याची पत्नी अनाथ मुलांना आई-बापांची माया देत आहेत, त्यांना जगण्यासाठी समर्थ बनवत आहेत. असेच एक उदाहरण आहे राहुल देशमुख यांचे. आता ते एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी आहेत. पण त्यांना लहानपणी शिक्षण घेत असताना काही काळानंतर अंधत्व आले. शिक्षण घेताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंध असल्यामुळे कोणी त्यांना होस्टेलला प्रवेश देखील देत नव्हते. आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पण इतर अंध विद्यार्थ्यांना आपल्यासारखा त्रास शिक्षण घेताना होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी राहूल यांनी वस्तीगृह सुरू केले, त्यांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था केली, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवस्था केली आणि त्यातून अनेक तरुण आज नोकरीला लागले आहेत मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. हरमन सिंग सिद्धू हा अपघातात गंभीर जखमी झाला आणि अनेक वर्षांपासून व्हीलचेअरला खिळून राहिला आहे. आपल्या वेदना शमवण्यसाठी अनेक प्रकारच्या गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. परंतु तो आपल्या वेदनांबद्दल चकार शब्दही बोलत नाही. लोकांनी अपघातापासून वाचावे म्हणून त्यांनी ‘ सुरक्षित पोहोचा ‘ ही संस्था सुरू केली आणि आज तिचे कार्य ते करीत आहेत. अशी प्रेरणादायी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत. या आणि अशा बऱ्याच व्यक्तींवर मी माझ्या पुस्तकांमधून लेख लिहिले आहेत आणि त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या गोष्टींचे तात्पर्य असे की आपल्या जीवनातील परिस्थिती जरी आपल्याला प्रतिकूल असेल तरी आपण निराश न होता किंवा खचून न जाता त्या परिस्थितीला धीराने तोंड देऊन आपले जीवन जगण्याची दिशा प्राप्त करू शकतो. मानवी जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे परंतु अशा दुःखाला कुरवाळत न बसता काही माणसे आपले दुःख विसरून इतरांसाठी मानवतेच्या भावनेतून कार्य करत राहतात आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधतात. अशावेळी जगण्याचा अर्थ कळतो जीवनाच्या अशा टप्प्यावर मग हे जीवन सुंदर आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा.

अशी माणसे म्हणजे आधुनिक संतच होत. ते दीपस्तंभ होत.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘दैवतीकरण’ साहजिकच!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“‘दैवतीकरण’ साहजिकच! ☆ श्री संभाजी बबन गायके 

११ मार्च २०२५… ३३६ वर्षे उलटून गेली छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाला. ११ मार्च १६८९ ते ११ मार्च २०२५ … या काळात स्वधर्मासाठी एवढा प्रचंड त्याग आणि वेदनांशी लढा इतर कोणाच्याही इतिहासात आढळून येत नाही!

शारीरिक छळाची वर्णने शब्दांत वाचून सहृदय माणसाच्या मनावर जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा ती अभिनित दृश्ये पाहताना होतो तो परिणाम अपरिमेय असतो. छावा चित्रपटातील शेवटची दृश्ये पडद्यावर पाहून जवळपास सर्वच प्रेक्षक नि:शब्द होतात, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.

क्रूरकर्मा औरंगजेब खरे तर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण एका वारामध्ये घेऊ शकला असता. पण त्याने त्यांच्या मृत्यूचा उपयोग उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर त्याच्या वाटेत येऊ पाहणा-या प्रत्येकाच्या मनात कायमची धडकी भरवण्यासाठी केला… हे सर्वश्रुत आहे! पण त्याचे हे मनसुबे पूर्ण झाले नाहीत… हा इतिहास आहे! अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा… हा या मराठी मातीचा बाणा आहे!

आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तींना सन्मान देण्याची मानवी सहजवृत्ती आहे. किंबहुना अवघ्या प्राणिसृष्टीमध्ये ही वृत्ती आढळून येते. मानवाने त्याच्यापेक्षा सामर्थ्यवानांस देव ही पदवी देण्याची रीत दिसून येते. राजाला भूदेव अर्थात पृथ्वीवरचा देवाचा अवतार किंवा देवच मानले जाते, हे आपण पाहू शकतो.

अखंड स्मरणीय थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब आणि धाकलं धनी अखंड स्मरणीय श्री संभाजी महाराज साहेब यांना रयतेने आपल्या मनातल्या गाभा-यात देवाचे स्थान दिले आहे, हे कोण नाकारू शकतो?

महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना गाभा-यात बसवणे, त्यांची पूजा करणे, आरती करणे याला विचारवंत माणसांचा आक्षेप आहे. या महापुरुषांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा विसर पाडून घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करणे इथपर्यंत हा आक्षेप योग्यच आहे. पण, या ‘देवांच्या’ विचारांवर चालणारी माणसं जर यांना देवत्व बहाल करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणाला कसा प्राप्त होतो, हा प्रश्न आहे.

प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण यांचे देवत्व मान्य करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे समाजाचे कल्याणच झाले आहे. अर्थात, देवत्वाचे स्तोम माजवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक प्राप्ती करून घेऊन आपले ऐहिक जीवन सुखमय करणारे लोकसुद्धा आहेत, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल… पण त्याला काही इलाज नाही. आपण केवळ आक्षेप नोंदवू शकतो… तोही तशी सोय असेल तर!

आधी सामान्य माणसे म्हणून दृष्टीस पडलेले महात्मे पुढे मठात, मंदिरांतल्या गाभा-यांत विराजमान झालेच की. त्यांच्या आरत्या, स्तोत्रे, ग्रंथ निर्माण झालेच की. त्यांच्यामागे खूप मोठा समुदाय असून ते अनेक लोकोपयोगी कामे सिद्ध करतात, हे ही खरेच आहे. आणि याला आक्षेप असण्याचे कारण नाही.

गेली कित्येक वर्षे श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळणारी, उपवास करणारी, विशिष्ट अन्न त्यागणारी, पादत्राणे न घालणारी हजारो माणसे आहेत. काही ठिकाणी मंदिरे सुद्धा निर्माण झाली आहेत. ‘जय देव जय देव जय श्री शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली आरती आहेच. यातून सामान्य लोकांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे. मराठी सैनिक जेंव्हा युद्धात ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशी गर्जना करत देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करतात त्यामागे ही देवत्वाचीच भूमिका असते.

केवळ देव मानून थांबू नका…. त्यांच्या देवत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा… हे सांगणे वेगळे आणि देवत्व देऊ नका! हे सांगणे वेगळे.

शेवटी, समाजात सामान्य लोक बहुसंख्येने आहेत हे मान्य करून त्यांच्या भावनांना यथायोग्य मान देत देत काही सुधारणा सुचवता आल्या तर जरूर तसे करावे.. पण सरसकट ‘नको’ हा विचार टिकणारा नसल्याने त्याज्य आहे!

मी चार वर्षांपूर्वी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एक आरती लिहिण्याचा असफल प्रयत्न केला होता. जमेल तसा युट्यूब विडीओ तयार करून प्रसिद्ध केला होता. यात श्री आशुतोष मुंगळे या गायकाने आवाज दिला आहे. ते शब्द संदर्भासाठी इथे देत आहे. यातूनही कुणी योग्य ती प्रेरणा घेऊ शकते!

☆ श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शब्दवंदना ….आरती! ☆

काव्य लेखन :- श्री संभाजी बबन गायके.

गायन:-आशुतोष मुंगळे

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया…

शालिवाहन शक पंधराशे एकोणऐंशी वर्ष

मराठी मातीला बहु जाहला हर्ष…

द्वादशी शुद्ध मास शोभला ज्येष्ठ

देहासी आले श्री शंभू नरश्रेष्ठ …

पुरंदराच्या हृदयी मावेना माया…

 *

शिवरायांच्या सईबाईंची उजवली कूस

घडवण्या समशेर सज्ज सह्याद्री मूस…

युवराजांच्या कंठी शोभे कवड्यांची माळ 

शिवगंधाने सजले भव्य रुंद ते भाळ…

जिजाऊ आतुरल्या शंभू बाळा पहावया…

 *

उधळला चौखूर शंभू रायांचा अश्व

रोमांचित झाले अवघे मराठी विश्व…

लढता शंभू भासे जैसा कोपला रुद्र

भेदी चक्रव्युहा अभिमन्यू सौभद्र…

भगवा विजयी गगनी पहा लागे फडकाया…

 *

आत्मसात करुनी शास्त्र भाषांचे ज्ञान

सभेत पंडितांच्या शंभू शोभे विद्वान…

रयतेचा राजा घेई न्यायाचा पक्ष

शिवरायांचा छावा शंभू प्रजाहित दक्ष…

सिंहाची गर्जना शत्रू लागे कांपाया…

 *

अवचित काळोखाने सूर्य झाकोनिया गेला…

उजेड अंधाराने खोल पाताळी नेला…

झुकली ना दृष्टी विझल्या नयनांच्या ज्योती

हर हर महादेव थेंब रक्ताचे गाती…

मृत्यू गहिवरला येता शंभुशी न्याया…

 *

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया…

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया!…

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 “  “ लेखक : अनामिक प्रस्तुती : शोभा जोशी 

जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!


“आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही! “

… ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.

माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.

मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी, मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली.. “ माय फादर. ” मीही ‘गुडमॉर्निंग’ म्हणालो.

टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, “ हिच्या नावापुढे सही करा. “

मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, ‘खरेच एवढे बिझी आहोत का आपण? ’

विचारातच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, “ बसून बघा सगळे पेपर. ” असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.

मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२.

– – टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुकलेली प्रश्नोत्तरे बघायला लागलो.

.. उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.

मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची. तिने असं केलं.. की मी रागवू शकत नाही म्हणून.

“बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं! “

“आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का? ” – मी.

“हो. सगळी माहीत आहेत. “

“मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज”

“कसं काय? ” ती गोंधळली.

“बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे. ” मी उत्तरलो.

ती परत ‘का? ‘

“कळेल नंतर! ” मी

मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो.

तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता.

मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.

अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, “ बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं? ”

“काहीच म्हणजे? “

“म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही! “..

मला हसू आलं.

मी तिला हसतच विचारलं, “तू शाळेत कचरा करतेस का? “

“नाही”. – ती.

“सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस? “

“हो”.

“तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस? “

“हो”.

“रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस? ‘

“हो”.

“नेहमी खरं बोलतेस? “

परत “हो”

“लगेचच मनापासून सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना?

‘हो बाबा हो.. किती विचारताय हो? ‘

“मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग. ” मी म्हणालो.

“ का पण? “

“हेच तर शिकायचंय आता तुला”

“आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?

“बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं. “

…. सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली,

“बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे? “

तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, “सुसंस्कृत”.

…. परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, “ त्यासाठी मी काय करायचं नक्की. ”

मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, “फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा! “

“मग ठीक आहे बाबा” तिच्या जीवात जीव आला.

एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, “बाबा, माझा रिझल्ट काय होता? मी पाहिलाच नाही की? “

मी म्हणालो, “रिझल्ट? तू दुसरी पास होणार! “

…. पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली,

“म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना? “

मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत ‘Yes’ म्हणलं.

 

हीच खरी शिकवण कुठे तरी लोप पावत चालली आहे, आणि आपण चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 

…. जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!

लेखक : अनामिक

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares