मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मृतिगंध — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

४ ) मनमंजुषा —

 “ स्मृतिगंध “ लेखक : अज्ञात प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

स्मृतिगंध…..

 

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा….

भरपूर उपभोगलं त्यामुळे…. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…

 

आता तसं नाही…

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण…. !

 

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,

फुल टाईम ‘ आईच ‘ असायची तेव्हा ती…… !

 आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….

 

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते…. ! 

 

मामा चे गाव तर राहिलच नाही….

मामा ने सर्वाना मामाच बनवल….

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे….

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय….

 हा परिस्थितीचा दोष आहे…

 

मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची…. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !!!

 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !” 

मैत्री बरीच महाग झालीय आता.

 

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते…. !!! 

 

सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..

 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे…. !!!

 

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….

 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

 

एवढंच काय, तेव्हाचे 

आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले….

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो…

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड… !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार…

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…..

 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…. !! 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण…. , मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं….. !! 

 

काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..

पण आता….

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….

 

म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं……

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार…. ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा….

नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना….. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…☆ श्री जगदीश काबरे ☆

पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याच्या मागील अवकाशाची पार्श्वभूमी बदलते आणि सूर्य वेगवेगळ्या नक्षत्रांमधून जात असल्याचे दिसते. संपूर्ण चक्र 12 भागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला राशिचक्र म्हणून ओळखले जाते आणि ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रमण होते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना, सूर्याच्या पार्श्वभूमीवर राशीचक्र बदलत असताना पृथ्वीच्या अक्षाचा कल सारखाच राहतो. परंतु, त्यामुळे एक गोलार्ध सूर्यासमोर सहा महिने आणि दुसरा सहा महिने सूर्याच्या मागे राहतो. यामुळे पृथ्वीवरील सूर्यकिरणांचा कोन सतत बदलत राहतो आणि सूर्य सहा महिने उत्तरेकडे आणि सहा महिने दक्षिणेकडे फिरल्याचा आभास देतो. यालाच भौगोलिक भाषेत उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. मकर संक्रांतीत सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. कारण सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीनंतर, उत्तर गोलार्धात सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि हिवाळा कमी होऊ लागतो. भारतासह उत्तर गोलार्धात उन्हाळा वाढू लागतो. हे 21 जूनपर्यंत होते, त्यानंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते.

मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, उत्तर गोलार्धात 14-15 जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर 21 मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो, त्यानंतर उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.

सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सर्वज्ञात आहे, पण पृथ्वीवरून पाहताना पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं भासतं. याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. सूर्य उगवताना ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो दिसतो ती जागादेखील रोज बदलते. एक-दोन दिवसांमध्ये सूर्याच्या स्थानातला बदल फार लक्षणीय नसतो. पण महिन्याभरात ही जागा अगदी निश्चितपणे बदललेली दिसते. आणि वर्षभरानंतर सूर्य पुन्हा नेमक्या त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या त्याच जागी दिसू लागतो. या तारखासमूहांना त्यांच्या आकारावरून जी नावे दिली गेली त्यांनाच आपण राशी म्हणतो. थोडक्यात, वर्षभरात सूर्य या विविध तारकासमूहांमधून भ्रमण करतो आहे असं भासतं म्हणजेच सूर्य विविध राशीमधून प्रवास करत असतो. वर्षभरात सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा जो मार्ग त्याला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात.

या क्रांतिवृत्तावर सूर्याचं नेमकं स्थान कसं सांगायचं? मग त्यासाठी या क्रांतिवृत्ताचे बारा भाग पाडले आहेत. या बारा भागांना नावं देणं आलं. त्या प्रत्येक भागात दिसणाऱ्या तारकासमूहातले तारे काल्पनिक रेषांनी जोडले (हे म्हणजे लहानपणी ‘बिंदू जोडून आकृती तयार करा’ असा खेळ असायचा तसंच झालं!) तर तयार होणाऱ्या आकृतीचं पृथ्वीवरच्या विविध गोष्टींशी साधर्म्य आहे असं लक्षात आलं आणि नावांचा प्रश्न सुटला. मग ज्या तारकासमूहातली आकृती मगरीसारखी दिसत होती त्याला नाव दिलं मकर रास, वगैरे वगैरे. अनेकांना असं वाटतं की, राशींनी या अथांग अंतराळाचे बारा भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. राशी या केवळ सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे भाग आहेत. आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग हा या अथांग अंतराळावर मारलेला एक छोटासा काल्पनिक पट्टा आहे.

वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाले तर सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात खरे तर 21 डिसेंबर होते, जेव्हा सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरेकडे सरकायला लागतो. परंतु, भारत आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या देशांमध्ये हा प्रभाव मकर संक्रांतीच्या दिवशी अधिक प्रभावी मानला जातो. ती तारीख 14 किंवा 15 जानेवारी असते. सध्या हा फरक 24 दिवसांचा आहे. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. दर 1500 वर्षांनी पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या अक्षात होणाऱ्या बदलामुळे हा फरक दिसून येतो. आजपासून 1200 वर्षांनंतर ही तारीख बदलून फेब्रुवारी महिन्यात येईल. 2001 ते 2007 पर्यंत 14 जानेवारीला मकर संक्रांत येत होती. पण 2008 मध्ये 14 जानेवारीला 12. 07 मिनिटांनी संक्रांत आली, त्यामुळे संक्रांतीचा सण त्याच वर्षी 15 जानेवारीला झाला. दरवर्षी ही वेळ 6 तास 9 मिनिटांनी पुढे सरकते आणि चार वर्षांत ती 24 तास 36 मिनिटांनी पुढे सरकते. परंतु, लीप वर्षामुळे ती 24 तासांनी मागे सरकते म्हणजेच दर चार वर्षांनी ती 36 मिनिटांनी पुढे सरकते. काही वर्षांत संक्रांतीची तारीख पुढे सरकते. सन 2009 ते 2012 पर्यंत संक्रांतीचा दिवस 14-14-15-15 होता. हे चक्र 2048 पर्यंत चालू राहील, त्यानंतर ते 14-15-15-15 असेल. नंतर 2089 पासून ते 15-15-15 -15 होईल. हे दर 40 वर्षांनी होईल. परंतु, 2100 हे वर्ष लीप वर्ष असूनही, 400 ने भागल्यास लीप वर्ष मानले जाणार नाही, कारण ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल, तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. म्हणून 2100 ते 2104 पर्यंत संक्रांतीच्या तारखा 16-16-16-16 अशा असतील.

सामान्यतः भारतातील सर्व सण हे चंद्राच्या चक्रानुसार असतात, त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. म्हणूनच होळी, दिवाळीसारखे सण वेगवेगळ्या तारखांना येतात. परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण आहे, जो सूर्याच्या भासामान भ्रमाणावर आधारित असतो. इंग्रजी कॅलेंडर देखील सूर्याच्या यात गतीवर आधारित आहे. म्हणून मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला सध्या येते.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु. ल. – दि ग्रेट…” – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “पु. ल. – दि ग्रेट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला* होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय…

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

The only & only Great पु ल!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. “. आता समोरून त्या बाईक वर बसून गेलेली आमच्या मंदी सारखी वाटली!.. ती बाईक चालवणाऱ्याने जरा जास्तच स्पीड मधे माझ्या समोरून नेली ना!.. तिनं मला बघून तिकडं तोंडच फिरवलं!… थोडसा ओझरता चेहरा दिसला दोघांचा… कोण असावा बरं तो? दोघांनी डोक्याला हेल्मेट घातलं असल्याने नीट ओळखता आलं नाही… ती माझी मंदी होती का ? का आणि कुणी दुसरीच होती?… छे! छे! माझी मंदी असं छचोर वागणार नाहीच मुळी!… हं आता आठवलं त्या कर्णिकची शर्मिलाच असणार!… मला बऱ्याच वेळेला दिसलीय ना ती कुणा मित्रांच्या बरोबर हिंडताना… तिचं लक्ष नसायचं इतका मी तिच्या जवळून कितीतरी वेळा गेलोय… पण आपल्याला काय करायचं त्याबाबत… त्या कर्णिक जवळ काही बोलायची सोय नाहीच म्हणा… त्यांना तिचं हे असलं वागणं ठाऊकही असेल, कदाचित त्यांची संमती असेल तिला असं उंडगेपणा करायला… बाकी सोसायटीत उलटसुलट चर्चा काय कमी चालतात?… लोकांची कुठे तोंड बंद करता येतात का?… का म्हणून या पोरटीने आपला सुखाचा जीव धोक्यात टाकावा… चांगल्या कुटूंबातील मुलाशी लग्न करून कसा सुखाचा संसार करायचा सोडून… हेल मेट ची का अवदसा आठवतेय कुणास ठाऊक?… नशीब माझं मंदीवर चांगले संस्कार केले असल्याने आमच्या डोक्याला असला ताप नाही… आता घरी जाऊन आमच्या हिला हे सांगायला हवं.. या आर. टी. ओ. च्या आपली सुरक्षा आपल्या हाती या अभियानाचा हेल्मेट वापराचा सक्तीचा कायदा लागू केला त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांची ओळखच पटत नाही… आता हेच बघाना त्या मुलीने पण आमच्या मंदी सारखाच ड्रेस घातलाय कि.. मग मंदी तर नसेल… छे छे डोक्याचा पार भुगाच होऊन राहिलाय… “

“अगं मंदे काय तुझा बाप गं!… त्याच्या समोरून निघून पुढे आलो तर डोक्यात शंकेचं वारूळातला भुगा ऊकरत बसलाय… बघितलसं आपण दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे तो कनफ्युज कसा झालाय… आज जर आपण हेल्मेट घातलं नसतं, तर आपल्या दोघांची चेकमेटच त्यांने केली असती.. लग्न गाठी स्वर्गात ठरतात ना त्याच्या ऐवजी. मग आपली हेल मेट नक्कीच ठरली असती.. “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जसे आपण काही व्रत कथा वाचल्या की, त्यात प्रथम लिहिलेले असते ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ‘ त्याच प्रमाणे कोणती व्रते करावीत हे आपण बघत आहोत. ही व्रते जुनीच आहेत फक्त काळानुसार आपण त्यात थोडा बदल करुन अंमलात आणावे.

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा सहा ऋतूंनी आपले संवत्सर पूर्ण होते. आणि हे ऋतूचक्र अव्याहत चालू असते. त्या मुळेच संपूर्ण जीवसृष्टीला, माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळतात. कधी कधी काही ऋतूंचा त्रास होऊ शकतो. पण तो काही जणांनाच होतो. काहींना ऋतू बदलाचा पण त्रास होतो. या बदलाच्या काळात काहींना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. पण त्यात ऋतूंचा दोष नसतो. आपली प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्या नुसार आपल्याला त्रास होतात. पण आपण आहार, विहार, विश्रांती, यात ऋतू प्रमाणे बदल करुन कधी आवश्यक ती औषध योजना करुन हे त्रास, आजार नियंत्रित करु शकतो. परंतू या कोणत्याही ऋतूंची निंदा करणे योग्य नाही.

आपण निसर्गा कडे बघितले की निसर्ग प्रत्येक ऋतुशी कसे जमवून घेतो, पशुपक्षी कसे जमवून घेऊन राहतात हे समजते. आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहायचे हे शिकवतात. एक माणूसच असा आहे की आनंद शोधण्या पेक्षा दु:ख शोधत रहातो. आपल्याला जर कोणी आठवणी विचारल्या किंवा लिहायला सांगितल्या तर आनंदी प्रसंग फार कमी समोर येतात. आणि अवघड, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात. ही सवय जर आपण बदलू शकलो तर आपण कायम आनंदात राहू शकतो. हेच ऋतूंच्या विषयी करायचे. प्रत्येक ऋतुतील आनंद शोधायचा. आयुर्वेदिक औषधे देणाऱ्यांना या ऋतूंचे खूप महत्व असते. आपली संस्कृती, आपले सण समारंभ बघितले तर त्यात निसर्गाचेच पूजन दिसते. आपल्या पूर्वजांनी सगळे सण व त्यातील आहार, पूजा, व्रते त्या त्या ऋतू नुसार ठरवलेली होती. ऋतू बदलतात म्हणून तर आपल्याला विविध फळे, फुले यांचा आस्वाद घेता येतो. आणि अनेक प्रकारची धान्ये, भाज्या मिळतात. हा सर्व विचार करून विविधता देणाऱ्या ऋतूंचा सन्मान करु या. आणि या ऋतूंची निंदा बंद करु या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

|| जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे 

शहाणे करून सोडावे सकल जन ||

…. समर्थ रामदासस्वामींच्या आज्ञेनुसार काही दिवसांपूर्वी, मी दिसेल त्याला, भेटेल त्याला शहाणं करून सोडायचं चंग बांधला होता.

तर एक्झॕक्टमधे झालं काय होतं, मला साधारण पंधरा दिवसांपूर्वी प्रचंड खोकल्याने झोडपलं होतं. अन् आमचा खोकला म्हणजे खानदानी, काही झालं तरी महिना भरल्याशिवाय नरडं सोडणार नाही. मी घरातली होती नव्हती तेवढी सगळी औषधं ढसाढसा ढोसली, तरी मेला जाईना. मग मी आमच्या डॉक्टरीणबाईकडं व्हिजिट दिली… एका व्हिजिटीत तो गेला नाही म्हणून आणखी दुसऱ्यांदा दिली. पण दळभद्री खोकला जळूसारखा चिकटूनच राहिला.

मी लागोपाठ तीन रात्री टक्क जागी होते. म्हणून चौथ्या रात्री मी माझ्या उशा-पायथ्याशी खोकल्याशी लढण्याची जंगी तयारी करून ठेवली. पाण्याची बाटली, एका वाटीत चाटण, दुसरीत खडीसाखर, तिसरीत दालचिनी, चौथीत लवंग आणि लागली तर चपटी (इथे औषधाच्या बाटलीस ‘चपटी’ असे उपनाम देण्यात आले आहे, वाचकांनी नसते गैरसमज करून माझे चारित्र्यहनन करण्याची व्यर्थ खटपट करू नये) इतका सगळा जामानिमा तयार ठेऊन मोबाईलवर खोकला पळवण्याचे आणखी बारा घरगुती जालीम उपायही नजरेखालून घालवत बसले होते.

उपाय वाचून दम लागला म्हणून हळूच यू टयूबवर गेले तर त्यांच्या शॉर्ट्स मधे एक बाई समोर आली, अन् तिने अॕक्युप्रेशरद्वारे खोकला बंद करायची क्लृप्ती दाखवली… तळहातावर तेल लावायचे, आणि अंगठ्याच्या खाली मसाज करायचा अन् तळहाताच्या मागचा एक पॉइंट दाबायचा. दोन्ही हातांवर याचा प्रयोग करायचा. मी ते हुबेहूब तसच्या तसं केलं, आणि आडवी झाले.

वाचकहो, मला एकदाही खsक करून सुध्दा खोकला आला नाही. तो गेला तो गेला तो गेलाच ! 

जन्मात पहिल्यांदा माझा खोकला चुटुकन् गेला होता.

मैं तो सारा दिन खुशी के मारे उडी मार मारके थक गयी भाईशाब !

मग नंतरच्या दिवशी आमच्या ताई खोकल्याने हैराण दिसल्या, मी त्यांना तो उपाय अगदी फुकटात सांगितला. वरून ती बाई देखील पाठवली. त्यांच्या हृदयात आशेचा काजवा लखलखला.

मग दूरच्या जवळच्या समस्त नातेवाईकांना फोनवर कळवून टाकलं. पुस्ती म्हणून त्या बाईलाही त्यांच्याकडे ढकलून दिलं.

मग आम्ही मधे नाही का वणवण भटकत होतो, त्यावेळी ज्या दुकानात साडी घेतली, तिथे मिनिटामिनिटाला खाॕsक खाॕsक करून साडी खरेदीत व्यक्त्यय आणणाऱ्या दुकानदारीण बाईला सुध्दा मी प्रात्यक्षिक दाखवलं अन् त्याबद्दल तिने साडीवर तब्बल तेवीस रुपयांची भरघोस सूट दिली.

वाटेत माझा मित्र त्याच्याच बायकोबरोबर भेटला अन् केवळ खोकल्यासाठी दवाखान्याची पायरी चढणार म्हटल्यावर तिथल्या तिथे मी त्यांची वाट अडवून त्या अॕक्युप्रेशरद्वारे स्पेशालिस्ट बाईला त्यांच्याकडे धाडून टाकलं. मी त्यांचे साधारण रुपये पाचशे खडेखडे वाचवल्याबद्दल त्यांनी पिशवीतलं एक संत्र देऊन माझे ओलेत्या डोळ्यांनी आभार मानले.

दररोज सकाळ-सकाळी मुलाच्या शाळेच्या निमित्ताने आमच्या सोसायटीची साफसफाई करणाऱ्या भैयाभाऊंना माझ्या दर्शनाचा लाभ होतो. मला बघून बरेचदा देखो ना भाभीsss असा सूर लावून ते आमच्या सोसायटीवाल्यांची कुरबुर सांगत असतात. अशाच एका शुभ्र सकाळी भैयाभाऊंना माझ्या समोर खोकल्याची ढास लागली अन् मी तिथल्या तिथे ऐसा तळहात लेनेका और तेल लेके दुसरे हातसे कैसे मळनेका वगैरे शिस्तीत समजावून सांगितलं…..

‘हा हा समज गया भाभीजी! जैसा तंबाखू मे चुना लगाता है वैसाच ना? ‘

किती पटकन त्याला क्लिक झालं अन् तोपर्यंत मी इतरांना घसा फुगेपर्यंत तासभर समजावून सांगत फिरत होते.

त्या कालावधीत मला जो भेटेल आणि खोकेल त्याला मी त्या बाईची थोरवी पटवून देत होते.

शेवटी नवरा वैतागून म्हणाला, बाssई तू नाक्यावर जाऊन उभी रहा भोsपू घेऊन!

मुलगी म्हणाली, मम्मी तू एक भाड्याची रिक्षा करून त्यात स्पीकर लावून गल्लीबोळातून मार्गदर्शन करत का फिरत नाहीस? जास्त टार्गेट अचीव्ह होईल तुझं!

पोरगा म्हणाला, गल्लीबोळात फिरायला पप्पाची बाईकच‌ जास्त बरी पडेल!

परंतु नवऱ्याने स्पष्ट नकार दिल्याने ती योजना तिथल्यातिथे रद्द झाली.

तर समस्त जणांचा खोकला पळवून लावावा, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मधल्या कालावधीत मी माझ्या तोंडाचा पार किस पडला.

मात्र आता माझ्याच गेलेल्या खोकल्याने परत यू टर्न मारलाय आणि चार दिवसांपासून मी त्या अदृश्य तंबाखूला चुना लावून तळहातावर चोळ चोळ चोळतीये. दोन्ही हातावर रगडून रगडून आणि त्याच्यामागचा पॉइंट दाबून दाबून त्यातून आता कळा मारायला लागल्यात तरी तो खोकला हाय तिथ्थच हाय.

शेवटी काल मीच डॉक्टरांची पायरी चढून आले वाचकहो!

त्यातून ते ‘सकल जन’ आता माझ्या नावाने बोंबटया मारत बसलेत. काहींनी तर त्या बाईला सुध्दा माझ्याकडे परत धाडून दिलं.

डिसअपॉइंटमेंटचा कहर झाला हो अगदी कहर…

लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

राम राम मंडळी !!

ईश्वर कृपेने आपण सर्वजण सकुशल असाल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हा अक्षररूप तिळगुळ पाठवीत आहे.

” तिळगुळ घ्या गोड गोड बोला।”

पारंपारिक पद्धतीने मकरसंक्रांती साजरी करीत असताना आपण सर्वांना तिळगुळ देतो आणि त्यावेळी आपल्या तोंडात वरील उद्गार सहज येत असतात. हे नुसतं ऐकायलाही किती गोड वाटतं. आज सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळात सुद्धा एका अर्थाने निर्जीव तिळगुळ आपण एकमेकांस पाठवतो आणि त्यात सुद्धा खरा तिळगुळ मिळाल्याचा, खाल्याचा आनंद मानतो. किती लोकविलक्षण आहे हे! हिंदू धर्म सोडला तर जगाच्या पाठीवरील आज अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या कोणत्याही धर्मात अशी परंपरा असल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असेल याच्यामागे ? असे कोणाला सुचले नसेल की तशी बुद्धीच झाली नसेल ? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. आता एखाद्याच्या मनात प्रश्न का यावेत याचे वस्तुनिष्ठ उत्तर देणे तसे अवघडच. वरील प्रश्नाचा विचार करताना असे जाणवले की केवळ आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. तो ‘भोगावर’ आधारित नाही तर ‘त्यागावर’ आधारित आहे. ज्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याजवळील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला देण्यात समाधान मानते तसे हिंदू धर्म देखील देण्यात समाधान मानणारा, त्यागावर श्रद्धा ठेवणारा आहे. नुसता श्रद्धा ठेवणारा नाही तर तसे आचरण करणारा आहे.

“पेड हमे देते है छाया,

हवा नया जीवन देती है।

भूख मिटाने को हम सबकी,

धरती पर होती खेती है।।”

औरोंका भी हीत हो जिसमे

हम भी तो कुछ करना सिखे।”

मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यास कधी सुरुवात झाली ? पहिला सण (संक्रांत ) कधी साजरी केली गेली याची नोंद इतिहासास ठाऊक नाही. अर्थात ही झाली पुस्तकी माहिती. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मात असे लिहून ठेवणे, त्याचे श्रेय (स्वामित्व) घेणे आणि ‘स्वामीत्वा’च्या जीवावर ज्ञान बंदिस्त ठेवणे अपेक्षित नसावे म्हणून तर आपल्याकडील विविध प्राचीन विश्वविद्यालयात ज्ञान निःशुल्क मिळत असे आणि ते सर्वांना सुलभ होते. इतिहासात असे वर्णन आहे की परदेशातून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात / विषयांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असत.

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रमण असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्रमण अर्थात दक्षिणायन सुरु होते, तर मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. फार पूर्वी ही संक्रांत २३ डिसेंबर ला साजरी केली जायची. परंतु सूर्याच्या गतीचे गणित लक्षात घेता तर ७८ वर्षांनी ती एकेक दिवस पुढे जात ती आज १४ जानेवारी पर्यंत पुढे आली आहे. अशी हळूहळू ती पुढेच जात राहील. खगोल अभ्यासक असे म्हणतात की की ही संक्रांत काही शे वर्षांनी मार्च महिन्यात अर्थात ऐन उन्हाळ्यात येईल.

मकरसंक्राती आपल्याकडे साधारण तीन दिवस साजरी करण्यात येते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत. संक्रांत ही देवी असून देवीने शंकासूर आणि किंकरासूर राक्षसांवर मिळविलेला विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हीचे स्वरुप नेहमीप्रमाणे प्रसन्न, मंगलदायक नसून लांब ओठ, एक तोंड, दीर्घ नाक, नऊ बाहू असे आहे. थोडी अक्राळविक्राळ आहे. दरवर्षी हिचे वाहन, अस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वेगवेगळे असतात. आपले अलंकार आणि वस्त्र यातून ती भविष्यकाळ सुचवीत असते, असे मानले जाते. ‘संक्रांत आली’ अशी म्हण यामुळेच असावी असे म्हणता येईल.

दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो काळ थंडीचा असतो. त्यामुळे त्यावेळी तीळ आणि गूळ खाण्याची पद्धत आहे. तीळ हे थंड, स्निग्ध असतात तर गूळ उष्ण, बलवर्धक आहे. शरीर बळकट होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पदार्थ सामान्य मनुष्यास सहज उपलब्ध आहेत. हा सण देशाच्या विविध भागात विविध नावाने साजरा केला जातो.

*आपल्याकडील कोणताही सण साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन ‘सामाजिक बांधिलकी’ हेच असते. खास करुन रक्षाबंधन आणि मकरसंक्राती हे दोन सण विशेष करुन सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. एका सणात भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसे कंकणच बांधून घेतले आहे. जर अगदी मनापासून आणि व्यापक बुद्धीने हे कंकण प्रत्येक भाऊ (पुरुष) आपल्या मनगटावर बांधेल तर प्रत्येक बहीण (स्त्री )निरंतर सुरक्षित राहील. तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे सूत्र समाजातील प्रत्येक घटक पाळेल तर सारा भारत एक क्षणात तंटामुक्त होईल.

आपल्याकडे सर्व आहे. ज्ञान, विज्ञान अगदी सर्व आहे. फक्त डोळसपणे त्याकडे बघण्याची गरज आहे, काळानुरूप सणांचे अर्थ लावून ते समजून घेण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे. पूर्वी उद्योगांचा एकेक आदर्श नमुना आपल्याकडे होता. यास ‘स्वयंपूर्ण खेडी’ असे म्हटले जायचे. बारा बलुतेदार होते. ही बारा लोकं एकत्र येऊन एकदिलाने गावागाडा नुसती हाकत नव्हती तर कुटिरोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग घेत होती. कोणी मोठा नव्हता आणि छोटा नव्हता. सर्व एकसमान होते. इंग्रज येईपर्यंत ही परंपरा टिकली. परंपरागत व्यवसाय असल्यामुळे कारागीर गुणवत्तावान, कुशल होते. १४ विद्या आणि ६४ कला जगाला अलंकृत करीत होत्या. परंतु हे पांढऱ्या पायाच्या इंग्रजांना रुचले नाही, त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडले, हात तोडले, पाय तोडले नि देशी उद्योग नष्ट केले. बेकारी हा शाप इंग्रजांनी दिलेला आहे. त्यांनीच जातीपातींना उच्च नीच असा दर्जा दिला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमूळे आपल्याला सुद्धा इंग्रज सांगून, लिहून गेले तेच खरे वाटते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ढाक्क्याची मलमल प्रसिद्ध होती. त्यावेळी तलम पातळाची ( साडीची) घडी काडेपेटीत राहत असे वर्णन खुद्द इंग्रजांनी केलेले आहे. आज पुन्हा याचे स्मरण करण्याची गरज आहे. जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे आपण आपला जाज्वल्य पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास न विसरता पुढील पिढीत संक्रमीत करण्याची गरज आहे. ती काळाची मागणी आहे असे मला वाटते. सर्व काही सरकार करेल ह्या भ्रमात आपण राहू नये यापेक्षा जे मी करु शकतो ते मीच करेन आणि अगदी आत्तापासून करेन असा संकल्प आपण सर्वांनी या संक्रांतीच्या निमित्ताने करुया. *

देवीने शंकासुर आणि किंकरासुरावर विजय मिळविला. आपण मनातील शंकाकुशंका, हेवेदावे, समजगैरसमज, अनिष्ट रूढी, वाईट चालीरीती, भेदाभेद यावर विजय मिळवून एकसंघ, समरस हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. आज दुष्ट शक्ति जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. पण हिंदू विचार जा जोडणारा आहे. आणि दैनंदिन व्यवहारात तोडणाऱ्या पेक्षा जोडणाऱ्यालाच जास्त प्रतिष्ठा मिळते हे कोणीही विसरु नये. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून किंवा अशी वाक्ये नुसाती तोंडपाठ करुन आता चालणार नाही तर हे सर्व कृतीत आणण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया. माझे घर सोडून शेजारी, गावाच्या शेजारी असलेल्या माझ्या बंधूला मी तिळगूळ देईन आणि परस्परातील सुप्त रुपात असलेला स्नेह प्रगट करुन वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय आपण सर्वांनी करुया आणि ‘विश्वमैत्री दिन’ साजरा करुया

“तिळगूळ देऊ तिळगूळ खावू|

मनामनात स्नेह उजळवू|”

जन मनात विश्व मैत्र रुजवू||

भारतमाता की जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बोलणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “बोलणं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

“तिळगुळ घ्या गोड बोला” 

असं दर संक्रांतीला आपण म्हणतो. पण या म्हणण्यामागे फक्त औपचारिकता असते. खरंच आपण गोड बोलण्याचा किती प्रयत्न करतो ? ते जमत नसेल तर त्यासाठी आपलं बोलणं सुधारावं यासाठी खरच काही प्रयत्न करतो का? त्यासाठी आपण खरंच काही एक्झरसाइज करतो का? मागच्या वर्षीच्या माझ्या बोलण्यापेक्षा या वर्षीच्या बोलण्यामध्ये अधिक गोडवा आहे असं आपल्याला जाणवतं का? त्या जाणवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो का? हे सगळे प्रश्न मला पडत होतेच, परंतु आज ही एक पोस्ट कुणीतरी फॉरवर्ड केली. माहित नाही कोणी लिहिली पण ती खरोखरच बोलकी आहे वाचा तर —-

– – –

‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे.

आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.

तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! 

हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

 

‘आहे हे असं आहे’,

‘माझा आवाजच मोठा आहे’ 

‘मला अशीच सवय आहे’

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो. 🤨 

 

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. ‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन!

काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळत जातं.

शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.

 

आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

 

एक प्रयोग केला होता. सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची.

 वाढवत जायचे हे शब्द.

हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे.

शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

 

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.

वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात.

नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.

यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते.

 

कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.

 

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती (Time is Money) असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?

फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम  हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

 

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.

 

बोलणं म्हणजे,

निव्वळ शब्द थोडीच असतात?

 न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.

 वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.

मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात,

पण 

त्याआधी कसं बोलायचं,

 ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

 बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य : ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात…. 🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसं तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्तमहाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू”

 बाबा गंमतीने हसत म्हणाले. कांहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली. )

 आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतर हे सगळे प्रसंग नव्याने आठवताना त्या आठवणींमधला एकही धागा विसविशीत झालेला किंवा तुटलेला नसतो ते त्या अनुभवांच्या त्या त्या वेळी माझ्या अंतर्मनाला जाणवलेल्या अलौकिक अनुभूतीमुळे! आणि या अनुभूतीमधला मुख्य दुवा ठरली होती ती हीच लिलाताई!

 लिलाताई माझ्यापेक्षा जवळजवळ बारा वर्षांनी मोठी. अर्थातच माझ्या सर्वात मोठ्या बहिणीपेक्षाही सहा वर्षांनी मोठी. केवळ वयातलं अंतर म्हणूनच ती माझी ताई नव्हती तर तिने आपल्या सख्ख्या दहा भावंडांइतकंच आमच्यावरही मोठ्या बहिणीसारखंच प्रेम केलं होतं! मी तर तिचा तिच्या लहान भावंडांपेक्षाही कणभर जास्तच लाडका होतो. आम्ही त्यांच्या शेजारी रहायला गेलो तेव्हा मी चौथीतून पाचवीत गेलो होतो. त्याआधी मला अभ्यासात कांही शंका आली तर आईला किंवा मोठ्या बहिणीला विचारायचो. आता त्याकरता लिलाताई माझा पहिला चाॅईस असायची. तिचं शांतपणे मला समजेल असं समजावून सांगणं मला आवडायचं. माझी पुढची चारपाच वर्षे शाळेतल्या सगळ्या बौध्दिक स्पर्धांची तयारीसुध्दा तीच करुन घ्यायची चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, गद्यपाठांतर, गीतापठण, निबंधलेखन, हस्ताक्षर अशा सगळ्या स्पर्धांची तिने करुन घेतलेली तयारी म्हणजे खणखणीत नाणंच. अशा सगळ्या स्पर्धांत मला बक्षिसं मिळायची, कौतुक व्हायचं तेव्हा मिळालेलं बक्षिस, प्रमाणपत्र हातात घट्ट धरुन मी पळत घरी यायचो ते थेट शेजारी लिलाताईकडेच धाव घ्यायचो. तिला मनापासून झालेला आनंद, तिच्या नजरेतलं कौतुक आणि मला जवळ घेऊन तिने दिलेली शाबासकी हेच माझ्यासाठी शाळेत मिळालेल्या बक्षिसापेक्षाही खूप मोठं बक्षिस असायचं! तिच्यासोबतचे माझे हे भावबंध गतजन्मीचे ऋणानुबंधच म्हणायला हवेत. विशेषकरुन मला तसे वाटतात ते नंतर आलेल्या ‘अलौकिक’ अनुभवामुळेच!!

 बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती बाहेर जाऊन दत्ताला नमस्कार करुन आली, बाबांनी दिलेला तीर्थप्रसाद घेतला. बाबांना नमस्कार करून झरकन् वळली आणि डोळे पुसत खालमानेनं घरी निघून गेली.

 “किती गुणी मुलगी आहे ना हो ही? दुखावली गेलीय बिचारी. तिच्या डोळ्यांत पाणी बघून बरं नाही वाटत. “

 ” ते दु:खाचे नाहीत, पश्चातापाचे अश्रू आहेत. देव पहातोय सगळं. तो तिची काळजी नक्की घेईल. बघच तू. “

 बाबांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडलेल्या या सरळसाध्या शब्दांमधे लपलेलं गूढ त्यांनाही त्याक्षणी जाणवलेलं होतं की नाही कुणास ठाऊक पण त्याची आश्चर्यकारकपणे उकल झाली ती पुढे चारच दिवसांनी कुरुंदवाडच्या बिडकर जमीनदारांच्या घराण्यातून लिलाताईसाठी मागणी आली तेव्हा!!

 हे सर्वांसाठीच अनपेक्षितच नाही तर सुखद आश्चर्यकारकही होतं!

 लिलाताईच्या आनंदाला तर पारावार नव्हता. “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच, तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू. ” बाबांच्या अगदी अंतःकरणापासून व्यक्त झालेल्या या बोलण्यातला शब्द न् शब्द असा खरा झाला होता! कारण तिला मागणी आली होती ती कुरुंदवाडच्या जमीनदार घराण्याकडून!!

 “काका, मी लग्न होऊन सासरी गेले तरी आता नित्य दत्तदर्शन चुकवायची नाही. कारण कुरुंदवाडहून नृसिंहवाडी म्हणजे फक्त एक मैल दूर. हो की नै?” तिने बाबांना त्याच आनंदाच्या भरात विचारले होते.

 “तुझी मनापासून इच्छा आहे ना? झालं तर मग. तुझ्या मनासारखं होईल. पण त्यासाठी अट्टाहास नको करू. तू सासरी जातेयस. आधी त्या घरची एक हो. तुझं कर्तव्य चुकवू नको. बाकी सगळं दत्त महाराजांवर सोपवून निश्चिंत रहा. “

 बाबांनी तिला समजावलं होतं.

 पाटील आणि बिडकर या दोन्ही कुटुंबांची कोणत्याच बाबतीत बरोबरी होऊ शकत नव्हती. पाटील कुटुंब कसंबसं गुजराण करणारं. बिडकर जमीनदार घराणं. सख्खं-चुलत असं वीस बावीस जणांचं

एकत्र कुटुंब. उदंड धनधान्य. दुभती जनावरं त्यामुळं दूधदुभतं भरपूर. ददात कशाचीच नव्हती. रोज दिवसभर डोक्यावर पदर घेऊन वावरणं मात्र लिलाताईला एक दिव्य वाटायचं. इकडच्या मोकळ्या वातावरणामुळे या कशाची तिला सवयच नव्हती. पण सासरची माणसं सगळी चांगली होती. हिच्या डोक्यावरचा पदर पहिल्या दिवशी सारखा सारखा घसरत राहिला तेव्हा सगळ्या सासवा एकमेकींकडे पाहून गंमतीने हसायच्या. तिला सांभाळून घ्यायच्या. ‘सवयीने जमेल हळूहळू’ म्हणायच्या. दारापुढं हिने काढलेल्या रांगोळ्या बघून बायकाच नव्हे तर घरातले कर्ते पुरुषही तिचं मनापासून कौतुक करायचे. मूळच्याच शांत, हसतमुख, कलासक्त, कामसू, सुस्वभावी लिलाताई त्या आपुलकीच्या वातावरणामुळे अल्पकाळातच त्या घरचीच एक कधी होऊन गेली तिचं तिलाच समजलं नाही.

 “घरचं सगळं आवरून मी नृसिंहवाडीला रोज दर्शनाला जाऊन आले तर चालेल?”

 एक दिवस तिने नवऱ्याला विचारलं. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

 “एकटीच?”

 “हो. त्यात काय?”

 “घरी नाही आवडायचं. “

 “कुणाला?”

 “कुणालाच. मोठे काका नकोच म्हणणार. ते म्हणतील तीच पूर्व दिशा असते. “

 “मी विचारु त्यांना?”

 “तू? भलतंच काय?”

 “मग मोठ्या काकींना विचारते हवंतर. त्या परवानगी काढतील. चालेल?”

 तिच्या निरागस प्रश्नाचं त्याला हसूच आलं होतं.

 “नको. मी बोलतो. विचारतो काकांना. ते हो म्हणाले तरच जायचं”

 “बरं” तिने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली. काका काय म्हणतील या विचाराने रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.

 “देवदर्शनालाच जातेय तर जाऊ दे तिला. पण एकटीने नाही जायचं. तू तिच्या सोबतीला जात जा. त्यानिमित्ताने तुझंही देवदर्शन होऊ दे. ” काका म्हणाले. घरच्या इतर बायका़ंसाठी हे आक्रीतच घडलं होतं. ज्या घरच्या बायका आजपर्यंत नवऱ्याबरोबर कधी फिरायला म्हणून घराबाहेर पडल्या नव्हत्या त्याच घरची ही मोठी सून रीतसर परवानगी घेऊन रोज देवदर्शनासाठी कां असेना नवऱ्याबरोबर फिरून येणार होती याचं त्या सगळ्यांजणींना अप्रूपच वाटत राहिलं होतं!

 दुसऱ्याच दिवसापासून लिलाताईचं नित्य दत्तदर्शन सुरु झालं. पहाटे उठून आंघोळी आवरून झपाझप चालत दोघेही नृसिंहवाडीची वाट धरायचे. दर्शन घेऊन अर्ध्यापाऊण तासात परतही यायचे.

 लिलाताईच्या या नित्यनेमानेच तिला आमच्याशीही जोडून ठेवलं होते. कारण मोबाईल नसलेल्या पूर्वीच्या त्या काळात पाटील कुटुंबीयांपैकी बाकी कोणाशीच भेटीगाठी, संपर्क राहिला नव्हता. पण लिलाताई मात्र आम्हाला अधून मधून भेटायची ती तिच्या या नित्यनेमामुळेच. आईचाही पौर्णिमेला वाडीला जायचा नेम असल्याने दर पौर्णिमेला न ठरवताही लिलाताईची न् तिची भेट व्हायचीच. लिलाताई रोज तिथे आली की ‘अवधूत मिठाई भांडार’ मधेच चप्पल काढून ठेवून दर्शनाला जायची. पौर्णिमेदिवशी “लिमयेवहिनी आल्यात का हो?” अशी त्यांच्याकडे चौकशी ठरलेलीच. त्यांच्यामार्फत निरोपानिरोपी तर नेहमीचीच. कधी आईला सवड असेल तेव्हा आग्रहाने कुरुंदवाडला आपल्या सासरघरी घेऊन जायची. पुढे माझा नित्यनेम सुरु झाल्यावर आम्हीही संपर्कात राहू लागलो.

 हे सगळे घटनाप्रसंग १९५९ पासून नंतर लिलाताई १९६४ साली लग्न होऊन कुरुंदवाडला गेली त्या दरम्यानच्या काळातले. पण तिचा तोच नित्यनेम पुढे प्रदीर्घकाळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण झालेल्या दु:खाच्या झंझावातात मला सावरुन माझ्या दु:खावर हळूवार फुंकर घालणाराय याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.

 प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या वरवर सहजसाध्या वाटणाऱ्या घटनांचे धागेदोरे ‘त्या’नेच परस्परांशी कसे जाणीवपूर्वक जोडून ठेवलेले असतात याचा प्रत्यय मात्र त्यानिमित्ताने मला येणार होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकरसंक्रमण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ मकरसंक्रमण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

 – मकरसंक्रांत आली कि आपण पंचांग, कॅलेंडर पाहतो त्यावर बरच काही लिहिलेलं असतं मकर संक्रांति वर! म्हणजे त्या दिवशी संक्रांतीचा शुभकाळ, पर्वकाळ, पुण्यकाळ दान करायच्या गोष्टी कोणतं वस्त्र नेसायचं. याची शास्त्रशुद्ध माहिती असते. मकर संक्रांतीच्या आधी आपण धुंधुरमास साजरा करतो त्याचं महत्त्व मुलांना समजावून द्यावं लागत. नव्या मुगाची डाळ घालून केलेली खिचडी वांग्याची भाजी मटकीची उसळ असं चटकदार थंडीला पोषक जेवणं असत. आणि सूर्योदयाच्या आत हे भोजन करायचं. जणूं येणाऱ्या मकर संक्रमणात सूर्याचं स्वागतच. ते खरंच सुग्रास आणि चवदार काहीतरी वेगळं केल्याचं मनाला समाधान देणार असायचं. आता फारसं कोणी पहाटे उठून वगैरे करत नाही. त्या भोजनाचा आनंद सगळेच घेतात. त्यानंतर भोगी !. शक्ती म्हणजे देवी आणि कृषी म्हणजे शेती या दोन्हीचा समन्वय म्हणजे भोगीचा दिवस. भोग म्हणजे नैवेद्य त्याचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता. ही प्रसन्नता घेऊनच भोगी येते या दिवसांत सगळीकडे नवधान्यं, भाज्या सगळं नवीन आलेलं असतं त्याचा आनंद प्रसन्नता ही संक्रांतीपूर्वीच आलेली असते म्हणून भोगी प्रथम येते नंतर मकरसंक्रांत!. भोगीला, तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर लोण्याचा गोळा, खिचडी, तीळाची चटणी, आणि नवीन आलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, यांची मिळून केलेली भोगीची खास अशी चवदार भाजी. ! याचा नैवेद्य आणि भोजनही! संध्याकाळी दिवे लागणीनंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असायचा. तेव्हा नवीन वस्त्र परिधान करून हळदी कुंकू लावून विड्यांच्चा पानांवर, सुपारी, बदाम, खारका, सुकं खोबरं, लेकुरवाळ हळकुंड हातात देऊन नंतर सुवासिनी एकमेकींची हळद कुंकू लावून ओटी भरायच्या. याला विडा देणं- घेणं असं म्हणतात. आरसा कंगवा घेऊन त्यांच्या केसावरून फिरवायची एक रीत आहे. तिळाचा लाडू द्यायचा. वर पानांचा गोविंद विडा करून द्यायचा. संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम असायचा. कांरण. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी घरातील स्त्रिया आरशांत पहात वेणी- फणी असं काही करतच नसत. त्यामुळे स्त्रियांना हा दिवस फार महत्त्वाचा वाटायचा. आता हे फारसं कुणी करतांना दिसत नाहीत. आता परिस्थितिही बदलली. आहे. यानंतर येणारा दिवस म्हणजे मकर संक्रांत!

या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो शुभकाळ म्हणजे पुण्यकाळ पर्वकाळ सूर्याचं हे संक्रमण म्हणजे मकर संक्रांत!. तीळ वाटून हळदीसह अंगाला लावून अभ्यंग स्नान करून या दिवसाची छान सुरुवात होते. दारात, देवापुढे सूर्य मंडल रेखून त्याची पूजा करायची पद्धत आहे. ‘सूर्यपूजन’ यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तसेच मातीच्या सुगडांची पूजाही! मातीच सुगड हे आपल्या देहाचं प्रतीक आहे या सगळ्यात म्हणजे देहात पंचमहाभूतांच प्रतिक म्हणून नव्या धान्यांची ऊंस, गाजर, नव्या शेंगभाज्या, तीळ गुळ, आणि हळदीकुंकू घालून कापसाचे गेजा वस्त्र वाहून व दोऱ्यांनी म्हणजे सुताने बांधून सुवासिनी पूजा करतात पूजा करताना या सुगडाला हळदी कुंकवाने रंगवलेली बोटं उठवलेली असतात. अशी सुगडाची पूजा म्हणजे आपल्यातील देवत्वाची पूजाच. !पुरण, तिळगुळ पोळी-लाडूचा नैवेद्य दाखवून’ ज्ञान, आरोग्य, वस्त्र, धनसंपदा, निवारा ‘, मिळावा यासाठी प्रार्थना करून देवीला सौभाग्याचं दान मागतात. शस्त्र शास्त्र यांच्या उपासनेमुळे शक्ती, कृषी, ज्ञान यांच्या साधनेत येणाऱ्या, विघ्नांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. हळदी कुंकू म्हणजे पवित्र भावना किंवा विधी. या दिवशी हळदीकुंकू हलवा तिळगुळ आणि वस्तू लुटायच्या. आयुष्यात चांगल्या गोष्टी तिळा-तिळा न येतात वाईट गोष्टी मात्र पटकन येतात आपल्या शरीराची मनाची तिळा-तिळान वाढ होते कोणतीही गोष्ट थोडी थोडी म्हणजे तिळा-तिळाने वाटून घेतली की त्यातलं दुःख कमी होतं पण सुख तिळातिळानं वाढतं यासाठी आपलं सुख आनंद आपल्या जाणिवा आपल्या दुःखासह तिळासारख्या सर्वांना वाटाव्यात दुसऱ्याच्याही घ्याव्यात या भावना यामागे आहेत. हाच खरा मकर संक्रमणाचा म्हणजे आपल्याही मनाच्या स्थित्यंतराचा खरा सणं म्हणूयात! तिळगुळ हे स्नेहाची नात्याची, मैत्रीची गोडी, कायम राहावी यासाठी देतात घेतात. तिळासारखं स्वच्छ स्नेहलमनं आणि त्याबरोबरच गुळाची गोडीही वाढते. काटेरी हलवा काट्यांबरोबर संसारात गोडीही असते हे सांगतो काळ वस्त्र म्हणजे अंधाराचं प्रतीक असलं तरी त्यावरील बुंदके ठिपके असणं म्हणजे नक्षत्रांना आवाहन करण्यासारखंच असतं. असं वस्त्र नेसून हळदीकुंकू एका व्रताप्रमाणे करून वस्तू हा एक सामाजिक वसाही म्हणता येईल. एखादी वस्तू मुक्तपणे दुसऱ्यांना दान करणे लुटणं यात सात्विक आनंद असतोच याबरोबरच या दिवशी आपल्याला जीवन देणाऱ्या सूर्यनारायणाची प्रार्थना करावी ” हे सूर्य नारायणा तुझ्या प्रकाशाबरोबर तू पृथ्वीवर ये अन आमच्या तनां मनातल्या अंधारावर छान सुंदर स्वप्नांचं पांघरून घाल. तुझी आग नको प्रकाश दे. निरामय व आरोग्यमय जीवन दे. आमच्या ज्ञानाची, नात्यांची, स्नेहांची, कक्षा वाढव. “

मग काय.. “आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला………..

मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares