मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्यसंस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.

वकील म्हणाले, “अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते रॉयल्टी वगैरे देतात?”

गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली.

करकऱ्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व ते म्हणाले, ”यावर सही करून द्या.”

गदिमांनी विचारले, “कशासाठी ?”

“ मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही.”

क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,

“मग गीतरामायण लिहिलं, याला काहीच अर्थ उरणार नाही. वकीलसाहेब, अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं? “

करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले.कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम अशा अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या. किती हा मनाचा मोठेपणा!गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात-

‘नच स्वीकारा धना कांचना

नको दान रे, नको दक्षिणा

काय धनाचे मूल्य मुनिजना

अवघ्या आशा श्रीरामार्पण’

*

प्रभू रामाच्या चरणी गदिमांची सेवा रुजू झाली आहे.

‘अवघ्या आशा श्रीरामार्पण!’

*****

लेखक : श्री.सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू).    

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ,,’वेलेन्टाइन डे’! वेलेन्टाइन डे हा शब्द काही वर्षांपूर्वी भारतात फारसा परिचित आणि प्रचलित नव्हता.आता मात्र ढिगाने ढिगारे जन्माला आलेत ह्या वेलेन्टाइनचे पोवाडे गायला!

आपल्या देशात प्रेमाची व्याख्या समर्पणाने सुरू होऊन भक्तीवर विसावते.परंतु दुर्भाग्य आपलं की ,आपण वेगाने आधुनिकीकरण नावाचा गुळगुळीत दाखला घेऊन पाश्चत्यांचे अंधानुकरण करण्यात बुडालेले ,नव्हे धुंद झालो आहोत.बुडणारा कधीतरी हातपाय हलवतो,पण धुंद झालेल्यांची तर मतीच गुंग असते.

असं म्हटलं जातं की,14 फेब्रुवारी 269 मध्ये संत वेलेन्टाइनला मारण्यात आलं. आणि त्या दिवसाला वेलेन्टाइन डे नाव दिलं गेलं.

राजा कलाउडियस ला सैनिकांचे प्रेम किंवा लग्न मान्य नव्हते  कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते असं त्याला वाटायचं, आणि वेलेन्टाइनने याचा विरोध केला म्हणून त्याना मारण्यात आलं हे एक कारण.दुसरं वेलेन्टाइन बंदी असताना कारागृहात त्यांना जेलरच्या मुलीशी प्रेम झालं .हे समजल्यावर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्याच्या आदल्या रात्री त्यांनी प्रेयसीला जे पत्रं लिहिलं त्यात युअर वेलेन्टाइन  असं लिहिलं त्यानंतर हा वेलेन्टाइन डे सुरू झाला.

रोम संस्कृती हे मानते ते ठीक आहे,पण आपण का म्हणून तो दिवस साजरा करतो?तर म्हणे प्रणय दिवस आहे,प्रेमाचा दिवस आहे.आता ह्या भारतीय विलायती गाढवांना कोण सांगेल की वसंत पंचमी काय आहे ?तर जातील लगेच गुगलबाबाच्या गुहेत!

ज्या देशातल्या युवापिढीला साधं गणतंत्र दिवस म्हणजे काय?रावण महाभारतात होता की रामायणात? हे माहीत नसतं त्यांना वेलेन्टाइन डे चा पूर्ण इतिहास माहीत असतो.दोष त्यांचा नाही आपला आहे.लेखक वृत्तपत्र, संपर्क माध्यमं हे खरे तर समाजाचा आरसा असतात.निदान त्यांनी तरी आपण भारतीय असल्याची जाणीव ठेवावी.

हग डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, किस डे, काय निष्पन्न होतं त्यातुन? आणि कुठले आदर्श तुम्ही निर्माण करता?हे करतांना कुठेतरी आतलं मन बोचणी देत असतं,हे योग्य नव्हे सांगून, मग ती सल लपवण्यासाठी मग हग डे ला शिवाजीराजे अफजलखान मिठीची उपमा द्यायची.प्रॉमिस डे ला बाजीप्रभूच्या पावनखिंडीची झालर लावायची.लाज वाटायला हवी देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांना इतकं स्वस्त करतांना!

आणि आपल्या संस्कृतीत सगळे दिवस आहेत की साजरे करायला,पूर्वजांसाठी पितृपक्ष,प्रेमासाठी वसंत पंचमी,भावासाठी रक्षाबंधन, पतीसाठी करवा चौथं,गुरुसाठी गुरू पौर्णिमा, एकेक दिवस प्रेम,कृतज्ञता,समर्पण,आणि संस्कारांनी परिपूर्ण आहेत. एकाच दिवशी सगळ्यांचा भाजीपाला करून खाणे निव्वळ बाजारीकरण आहे.त्यांची कदाचित ती संस्कृती असेल त्यांनी ती जोपासावी.कुठल्याही संस्कृतीला विरोध नाही पण भारतात त्याची गरज आहे का?

वसंतोत्सव प्रेमाचं प्रतीक नाही का? साक्षात सरस्वती कृष्णावर मोहित होऊन त्याला पतिरुपात स्वीकारण्याची इच्छा प्रकट करते तेव्हा कृष्ण स्वतःला राधेच्या प्रति समर्पित असल्याचे सांगून,सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी वरदान मागतो आणि पंचमीला देवीची पूजा करतो.हे असतं प्रेम!ही असते आस्था! आजच्या भाषेत सांगायचं तर ही असते कमिटमेंट!

संस्कृती प्रत्येक देशाला असते.कुठल्याही धर्म किंवा संस्कृतिला माझा विरोध नाही,तसेच विदेशी संस्कृती आपल्या देशात शेवाळासारखी पसरू द्यावी याला समर्थनदेखील नाही

वेलेन्टाइनला विरोध केला तर आम्ही जुनवाणी आणि तुम्ही मानता म्हणजे पुरोगामी ,असं होतं नसतं.

आपण जे काही करतो त्यातून काय निष्पन्न होतं हे महत्त्वाचं आहे.वेलेन्टाइनच्या नावाखाली मोकाटपणे वावरणं,महागडी गिफ्ट्स देणं घेणं,वारेमाप पैसा पार्ट्यांमध्ये घालवणं, हे अंधानुकरण किती अंधगर्तेत आपल्याला ढकलतंय याची तसूभरही कल्पना येत नाही खरंच खंत वाटते.आपल्या या मूर्खपणाचा पुरेपूर वापर मल्टिनॅशनल  कंपनीत असलेले शकुनी मनसोक्तपणे करून घेतात.चामडी आणि दमडी चा व्यापार म्हणजे असले सो कोल्ड डे…

बरं! वेलेन्टाइन डे अगदी आठ वर्षाचं पोर ही सांगू शकेल,कारण त्याच्या कानावर तेच पडतं आणि दृष्टीस तेच!त्यात त्याचा दोष नाही.आपण कारणीभूत आहोत.किती जणांना भगतसिंग, राजगुरू,सुखदेवला कोणत्या दिवशी फाशी दिल्याचं आठवतं?अरे तुमचे सगळे डे(निरर्थक) तर या तिघांनी जगून दाखवले.

१) हग डे-हसत हसत मृत्यूला कवटाळले.

2) प्रॉमिस डे-देशाला गुलामगिरीतून सोडवण्याची प्रतिज्ञा केली

3) टेडी डे-इंग्रजांना खेळणं बनवून सोडलं

4) चॉकलेट डे-मेरा रंग दे बसंती चोला म्हणत देशप्रेमाची गोडी लावली

5) किस डे-देशाच्या रक्षणासाठी भूमातेचे चुंबन घेऊन शपथ घेतली.

जर वेलेन्टाइनला फाशी दिल्याचा दिवस इतक्या उत्साहाने साजरा करता तर 23 मार्च हा ‘शहीद  दिन’ केवळ कागदोपत्री का? आपला शहीददिन किती देश साजरे करतात?

हे लिहिताना देखील रक्त उसळतंय आणि डोळे पाणावतात आहे ज्या देशात मृतात्म्यांच्या छायाचित्रासमोर पणती लावण्याची प्रथा आहे त्याची जागा आता मेणबत्त्यांनी घेतली.आपल्याकडचे वैभव सोडून दुसरीकडून उसने घेण्यात कुठली बुद्धिमत्ता दिसते तेच कळत नाही.मेणबत्त्या लावत लावत आपणही मेणाचे होत आहोत हे समजतच नाही का?वाढदिवस काय तर मेणबत्त्या विझवून करायचे.अरे आपल्या संस्कृतीमधले संस्कार बाजूला सारून का पाश्चात्यांच्या पायाशी लोळताय बाबांनो!मेणाचे पुतळे होऊनच जगा मग!जिथे एखाद्या विचाराची गर्मी मिळाली तिथे वितळले,जिथे नर्मी मिळाली तिथे घट्ट झाले.आचरण मेणासारखं, आदर्श मेणासारखे,आणि अस्तित्वही मेणासारखे!

त्यांच्या नकलाच करायच्या असतील तर शिस्तीच्या करा, टेक्नॉलॉजीच्या करा,वेळेच्या सदुपयोगाच्या करा,राष्ट्रविषयीच्या प्रेमाच्या करा,उत्तम बाबींचे अनुकरण करता येत नाही,तिथे भिंतीवरच्या पिचकाऱ्या आदर्श वाटतात!

क्षणाक्षणाला विरघळणाऱ्या मेणबत्त्यांचीं नाही,तर कोरीव काम करून रेखीव शिल्प साकार होऊ शकेल अशा पाषाणांची देशाला गरज आहे.जे अक्षत असतील, अटल असतील,त्यांचीच वंदना होते!त्यातूनच इतिहास सर्जतो!

हात जोडून कळकळीची विनंती आहे,देशासाठी फार काही करू शकत नसाल तर निदान स्वतःला आणि भावी पिढीला इंग्रजाळलेल्या अवस्थेत जगण्यापासून परावृत्त करा.इतकं केलं तरी भारतीय असल्याचे सार्थक होईल.

नाहीतर आहेच उद्यापासून ‘तेरी मेरी प्रेम कहाणी

मी तुझा राजा तू माझी राणी

बाकी सगळं पालथ्या घड्यावर पाणी…

*********

लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?

जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–

तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-

** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..

एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.

पण.. आमच्या घराचा  नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..

वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.

माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल  सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात..  निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे  लक्षात घेऊन .. रोज रात्री  कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.

— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —

 ” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”

पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून  बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही  अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.

**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा  होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )

—  तिला तो गार स्पर्श  सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.

**माझे वडील….  त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…

*वडिलांना आंघोळ  घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात  कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश  टाँवेल, V.I.P. Shorts  वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे  वापरली.

* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–

दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?

केवढी मोठी चूक झाली माझी !!!

मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन  बघता का? नवी कवळी करुन देता का?’  विचारले. माझ्या विनंतीवरून  ते  बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!

आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.

ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..

आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून  घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही…  वगैरे.. मी हसत असे.

कारण  काही  व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती.. 

हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.

— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे. 

****माझ्या मोठ्या नणंदताई  रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.

सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून  त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.

त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे  म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””

असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले

त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !

त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.

— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..

— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..

लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! 

जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा. 

एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती! 

कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते. 

अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून कश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी… 

स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालक विरहीत विमानांत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल,२०२०. 

अधिकाऱ्यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या…पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते.

रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते. 

ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी. 

त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले….

पॅरा एस.एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत. 

एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि ….

दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती. 

पहाट झाली. रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या दऱ्या. एका दरीच्या किनाऱ्यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत! 

सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्धा पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली….. 

पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच…. 

गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते. 

सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती…

तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…! 

एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही. 

आपल्या सहकाऱ्यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला. 

सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री.रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते! 

५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढऱ्या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणाऱ्या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का? 

सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे. 

🇮🇳 जय हिंद. जय हिंद की सेना. 🇮🇳

सोबत दिलेले छायाचित्र शेरींग साहेबांचे आहे. पुरस्काराचे वेळी घडलेल्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन केले जाते. ते ऐकत असतानाची त्यांची ही भावमुद्रा आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शनाया आईला विचारत होती, ‘आई तू किती शिकली आहेस गं?’

आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली, मग मंद हसली. ‘

आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूचं?’ 

‘अगं, आज शाळेत झिरो पिरेड (शून्य प्रहर) होता. त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते. कुणी म्हणालं, माझे बाबा डॉक्टर आहेत. कुणी म्हणालं, माझी आई सी ए आहे. कुणाचे आई बाबा दोघंही नावाजलेले वकील आहेत. असं काय काय सांगत होते. माझी वेळ आली तेंव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले. माझी आई खूप खूप शिकली आहे. ती डॉक्टर आहे. मला जेंव्हा ताप येतो तेंव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याचा घड्या ठेवते. माझ्या पोटात दुखतं तेंव्हा ती मला ओवा मीठ देते. ती गायिका आहे, कारण माझ्याबरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते. आणि मला झोप येत नाही तेंव्हा ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते. ती उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्टं, एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळतं तेंव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते. मला कधी कधी क्षुल्लक भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेंव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करुन देते. ती उत्तम ज्योतिष जाणते कारण माझ्या मनात काय चाललंय ते तिला बरोबर कळते. माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते. ती उत्तम शेफ आहे, कारण बाहेरचं खाऊन माझं आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते. ती उत्तम ब्युटीशीयन आहे कारण माझ्या गँदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते. ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणितं ती मला पूर्ण समजेपर्यंत शिकवत रहाते. ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते. ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाचवेळी अनेक गोष्टी ती लीलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री पार अवीट आहे. आई, तुला सांगू, सर्व मुलं आणि बाई तन्मयतेने ऐकत होती आणि माझं बोलणं झाल्यावर तास संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजवत होती. मला खूप रडू आलं.’

आई ऐकत राहिली. आपली शानू एवढी मोठी झालीये. तिने शनायाला जवळ घेऊन कुरवाळलं. 

‘आई, बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमाने! म्हणत होत्या, हिची आई खूप भाग्यवान आहे.’

— आईला गहिवरून आलं. तिने देवाला दिवा लावला आणि तूप, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. देव बोलला असता तर म्हणाला असता, ‘यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत नं धरणारी आहे. ही साक्षात माझी म्हणजे देवाची यत्ता आहे!’

लेखक – अज्ञात

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ ❤️ “व्हॅलेंटाईन डे” ❤️☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

आता पाश्चात्य लोकांचे पाहून आपणही मदर डे फादर डे साजरे करू लागलो आहोत.

आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? त्या दिवसासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात, कार्यक्रम आखले जातात, प्रेम व्यक्त केले जाते, रोमान्स ताजा ठेवण्यासाठी आटापिटा केला जातो आणि सगळेजण करतात म्हणून आपणही करतो. सगळेजण लॉंग ड्राईव्ह जातात म्हणून आपणही जातो. कॅण्डल लाईट साजरा करतात त्याचेही अनुकरण करतो काहीतरी भेट द्यायची म्हणून खिशाला परवडत नाही तरी खरेदी केली जाते, उसनवारीने  पैसे घेतले जातात आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतात.

पाच रुपयाचे गुलाबाचे फुल 25 रुपये देऊन खरेदी करतो पण या सगळ्याची परत गरज आहे का? कशासाठी पाश्चात्य लोकांचे अनुकरण करायचे?

ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी  पैसे खर्च करूनच केले पाहिजे असं कोणी सांगितलंय?

“प्यार करने के लिए पैसा नही लगता… और प्यार मे कोई सही या गलत भी नही होता| … प्यार सिर्फ प्यार होता है।”  म्हणून त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक दिवस भेटला नसेल तर त्याची घालून देता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल ,एखादे चांगले पुस्तक भेट देता येईल., आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देतायेतील की ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद होईल. त्यासाठी व्हॅलेंटाईन ग्रीटिंग देण्याची गरज नाही. त्या ऐवजी भांडण झालेल्या मित्र-मैत्रिणींचा समेट घडवून आणता येईल. मागील चूकीची माफी मागता येईल, दिलगिरी व्यक्त करता येईल हीच खरी प्रेमाची कसोटी ठरेल.हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल असे मला वाटते.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – शुभ्र फुलांची ज्वाला…— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – शुभ्र फुलांची ज्वाला – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० फेब्रुवारी… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा जन्मदिन… त्यानिमित्ताने त्यांच्या सहवासातील प्रसन्न आठवणी…)

ज्वालामुखीचा उद्रेक आणि बर्फासारखं शीतल व्यक्तिमत्व,तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? होय,मी केवळ पाहिलंच नाही, तर त्यातला प्रेमळ, खळखळ वाहणारा, नितळ, शुभ्र झराही अनुभवलाय. हिमालयाची उंची गाठलेलं हे व्यक्तिमत्व कोण बरं असेल? वयानं माझी आजी शोभेल,असं आमचं नातं जुळलं आणि हळूहळू आम्ही मैत्रिणीच बनून गेलो, हे माझं अहोभाग्य! ही मैत्रीण, अर्वाचीन काळातली गार्गी,मैत्रेयी-म्हणजे थोर साहित्य विदुषी दुर्गाबाई भागवत !

केवळ साहित्य विदुषीच नव्हे,तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्यसेनानी पासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! अंगकाठी किरकोळ, क्षीण जरी असली तरी वयाच्या नव्वदीतही बाईंची कुशाग्रबुद्धी, तोंडात बोटच घालायला लावे. शरीर पेलवत नसतानाही,”आत्ता मी तुम्हाला व्यायाम करून दाखवू का?” म्हणून झटकन् उठायचा प्रयत्न करणाऱ्या दुर्गाबाई पाहिल्या, की त्यांच्या मनाचा अवखळपणा, उत्साह,अगदी लहान मुलासारखा अखेरपर्यंत टिकून होता, हे जाणवतं.

दुर्गाबाईंची ओळख झाल्यावर, त्यांची बरीच पुस्तकं वाचली. सध्या दुर्गाबाईंचं ‘दुपानी’ हे पुस्तक ५व्यांदा वाचतेय.परत परत वाचूनही कंटाळा येत नाही. कारण वाचताना, त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं. मला त्यांचं लेखन ‘प्रांजळ’ तरीही सडेतोड, थेट मुद्द्याला हात घालणारं (आणि अंत:करणालाही) म्हणूनच चिंतनीय व विचार करायला प्रवृत्त करणारं वाटतं. दुर्गाबाई म्हणजे पी.एच.डी करण्यासारखाच विषय ! डॉ.मीना वैशंपायन, प्रतिभा रानडे यांसारख्या नामवंत  लेखिकांनाही त्यांच्यावर पुस्तक लिहावंसं वाटणं आणि लिहूनही बरंच काही सांगायचं उरलंय असं वाटणं, यातच सारं आलं.नव्वदीतही त्या अर्धमागधी भाषेतील ‘विशुद्धीमग्ग’चा वजनाला न पेलवणारा ग्रंथ मराठीत अनुवादित करत होत्या. त्यांचा नवनव्या गोष्टी करण्याचा, शिकण्याचा ध्यास पाहून आश्चर्य वाटतं.

बाईंचा ९० वा वाढदिवस त्यांच्या सुनबाई चारुताईंनी घरीच पण थाटात साजरा केला. त्यावेळी पत्रकार, टी.व्ही चॅनेल मंडळी जमली होती. अचानक बाईंनी मला, त्यांना आवडणारा संत एकनाथांचा अभंग गायला सांगितला. मी मनोभावे गायले. गाणे झाल्यावर बाईंनी कौतुकाने पाठ थोपटून माझा हात हाती घेतला, व थंडगार हात पाहून, उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, “Cold from outside, Warm from inside…!”

समाजात श्रेष्ठ वा थोर व्यक्ती कोण, याची व्याख्या करायची तर, सहज सोपी व्याख्या म्हणजे, जी व्यक्ती आपल्या सद् गुणांमुळे, आजूबाजूच्या व समाजातल्या इतरांनाही घडवते; ती व्यक्ती थोर! माझ्या जडणघडणीत मला आदरणीय कुसुमाग्रज,इंदिरा संत,आणि दुर्गाबाई भागवत म्हणजे ‘ब्रह्मा,विष्णू,महेश’च वाटतात. तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) प्रेमळ आज्ञा केल्याने, इंदिराबाईंच्या, शंकर रामाणींच्या व त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या,’रंग बावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ ह्या कॅसेट्स तयार झाल्या. प्रत्येक कवीचं व्यक्तिमत्व अभ्यासण्याच्या निमित्तानं, कविता व इतर साहित्याचंही भरपूर वाचन केलं गेलं. इंदिरा संतांनी तर मला अक्षरशः कवितेचं वेडच लावलं. या दिग्गजांच्या कविता गाता गाता एके दिवशी नवलच घडलं… शाकंभरी पौर्णिमेच्या पहाटे,दुर्गाबाईंना त्यांच्या वडिलांनी (स्मृतिदिनी) त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दुर्गाबाईंनी पहाटे चंद्रबिंब ‘अस्त’ होताना पाहून त्यांना स्फुरण आलं, ते असं –

|| देहोपनिषद ||

आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे,कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले,काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले ||७||

आणि नेमकं त्याच दिवशी मी, दुर्गाबाईंना इतर नव्या कविता म्हणून दाखवायला गेल्यावेळी, त्यांनी त्यांची, ही ‘एकमेव’ कविता माझ्या ओंजळीत दिली, व म्हणाल्या; “यापूर्वीच्या मी केलेल्या कविता मला नावडल्याने, मी त्या फाडून, जाळल्या. परंतु या देहोपनिषदाला तू सुंदर चाल लावून, उद्या दूरदर्शनवरील माझ्या मुलाखतीत गावंस, अशी माझी इच्छा आहे.” ‘देहोपनिषद’ हे अभंगाचं नाव वाचूनच, माझे धाबे दणाणले! मरणाला असे ठणकावून सांगणारी बाईच पाहिली नाही मी! कविताही चालीत बांधायला प्रथमदर्शनी कठीण वाटली. परंतु दुर्गाबाईंची आज्ञा – नाही म्हणायची माझी प्राज्ञाच नव्हती. मी त्याक्षणी तरी हो म्हटलं व घरी पोहोचेपर्यंत संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी अंतर्ज्योत’ पेटली! शब्दाशब्दाला न्याय देणारी,सुसंगत वाटेल अशीच चाल परमेश्वराने सुचवली…

दुर्गाबाईंनी माझ्या या पहिल्या पाऊलाचं, दुसऱ्याच दिवशी  दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ सुंदर गाणार आहे” म्हणून मोठ्या मनानं कौतुक केलं. बाळाचं पहिलं पाऊल पडलं आणि आत्मविश्वास आला की, त्याला जसे कुठे धावू आणि किती धावू असे पाय फुटतात, तशी मी – इंदिराबाई, कुसुमाग्रज, शंकर रामाणी, अटलजी, व्ही.पी.सिंग यांच्या, तसंच दुर्गाबाईंनी निवडलेले संत नामदेव, एकनाथांचे अभंग व इतर नवोदितांच्याही साठ एक कवितांना धडाध्धड चाली लावत गेले. अर्थात, प्रत्येक शब्दाला स्वरांनी न्याय दिला पाहिजे या निकषावर ! माझ्या लेखी, शब्दांमुळे सुरांना आणि सुरांमुळे शब्दांना अर्थ आला. केवढी भव्य नि सुंदर दृष्टी दिली दुर्गाबाईंनी मला ! या तिघांनीही मला कुबेराचं एक दालनच मोकळं करून दिलं, गर्भश्रीमंत केलं! हा खजिना, केवळ पुस्तकात न राहता, रसिकांसमोर सादर करण्याचं, कॅसेटद्वारे घराघरात पोहोचवण्याचं काम, नाशिकच्या भालचंद्र दातारांनी केल्यानं, दुर्गाबाईंनी त्यांचं खास अभिनंदनही केलं. तसंच माझी या परिवारातर्फे निघालेली पहिली ध्वनिफीत – ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ चे प्रकाशनही दुर्गाबाईंच्या शुभहस्ते झालं. त्यावेळी बाई सुंदर बोलल्या आणि गंमत म्हणजे, खच्च भरलेल्या सभागृहासमोर राग केदारची बंदिश गायल्यादेखील!

एकदा त्या आणि डॉ.कमलाताई सोहोनी (त्यांच्या भगिनी आणि भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ) जपानी चित्रपट पाहात होत्या. त्यातील स्वेटर विणणाऱ्या नायिकेने त्यांचे लक्ष वेधले. ती वेगळ्या पद्धतीने टाके विणत होती. तसे विणल्यास एका व्यक्तीचा, एका दिवसात स्वेटर पटापट विणून तयार होतो, असे त्यांनी बारकाईने पाहून, स्वतः प्रत्यक्ष विणून एका दिवसात एक स्वेटर तयार केला. बाईंची इतकी विलक्षण वेधक नजर ! कमलाताईंच्या निधनानंतर बाईंनी त्यांच्या ‘सपाता’ देखील पुजल्या. असं राम-भरतासारखं अलौकिक प्रेम!

कधीकधी दुर्गाबाई आणि इंदिरा संतांचं नातं पाहिलं, की मला पंडिता रमाबाई आणि डॉ.आनंदी जोशी आठवतात.दोघी मनस्वी,विद्वान,प्रखर स्वाभिमानी असूनही, एकमेकींबद्दल प्रचंड आदर,प्रेम बाळगणाऱ्या. दोघींनाही एकमेकींना भेटण्याविषयीची प्रचंड ओढ…समानशीलेषु व्यसनेषु सख्यं… हेच खरं! मी मुंबईहून बेळगावला इंदिराबाईंकडे जाताना व परतताना, दोघींनी एकमेकींना दिलेल्या ‘अनुपम पत्रां’ची पोस्टमन होण्याचं भाग्य मला लाभलं!

बाईंच्या तीन गोष्टी प्रामुख्याने मी कधीच विसरणार नाही, एक म्हणजे ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ त्यामुळेच, इतक्या विविध विषयात त्या प्रभुत्व मिळवू शकल्या. त्यांच्या हातची वाटाण्याच्या सालीची उसळ सुद्धा इतकी चविष्ट, स्वादिष्ट असे की, एकदा मी त्यांना या विशेष खमंगपणाबद्दल, ‘प्रमाण’ विचारले! त्या म्हणाल्या, “अगं मीही सगळ्यांसारखंच करते, फक्त त्यात थोडा ‘जीव’ ओतते!” तिसरी गोष्ट म्हणजे एकदा त्या मला म्हणाल्या, “ पद्मजा, प्रत्येक दिवस हा आपला ‘वाढदिवस’ म्हणून साजरा करावा.” बाईंच्या या आणि अशा अनेक गोष्टी मी हृदयात कोरल्या आहेत. एरव्ही कमालीच्या प्रेमळ, शांत असलेल्या बाईंनी ‘कराड साहित्य संमेलना’च्या अध्यक्षा असताना, एकटीने मंचावरून ‘ज्वाला’ होऊन, आणीबाणी विरोधात शिताफीने कणखर आवाज उठवला. ही त्यांची ताकद होती!

बाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्वचिंतनाचंही ! तत्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळेच बाईंचं त्याच्यावर प्रेम. याच थोरोवर इंदिरा गांधींनीं एक कविता केली होती. ती अशी…

“Whoever reads Thoreau,

Is struck

By the ethical force,

Of his ideas

And the clarity of his writing

 

Thoreau’s great influence

On Mahatma Gandhi

 

Is well known

His words ring long,

In the mind.

 

Those who live

In the storm of politics

Need the quiet pool within

For sustenance

 

Thoreau lived by such a pool.” – Indira Gandhi.

ही कविता वाचल्यावर दुर्गाबाईंना खूप आवडली व आणीबाणीत त्यांनी सोसलेले पराकोटीचे हाल विसरून, इंदिराजींचे सगळे गुन्हे माफ करून टाकले. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन !

© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “करिअर – स्ट्रेस – आणि वांझपण” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “करिअर – स्ट्रेस – आणि वांझपण” ☆ सौ. अंजोर चाफेकर

ती  त्यादिवशी घरी आली.एकटी असली, नवऱ्याला वेळ असला की नेहमीच यायची.

मलाही तिचं घरात मनमोकळं बागडणं आवडायचं.

त्यादिवशी शेजारणीचे १ वर्षांचे मूल माझ्याकडे बागडत होते. तिने पटकन त्याला मोठ्या प्रेमाने मांडीवर घेतले. इतक्यात तिचा नवरा डाॅ.प्रथमेश तिला न्यायला घरी आला. तिच्या हातात मूल बघून मला म्हणाला,

“ किती छान दिसते ना पियू बाळाबरोबर? “ — मला त्याची व्यथा जाणवली. 

ती दुसऱ्या दिवशी माॅर्निंग वाॅकला भेटली. ती जाॅगिंग करत होती. मी चालत होते.

“ आन्टी, मी चालते तुमच्या बरोबर. “ तिला मन मोकळे करायचे होते.

” बघितले ना, काल कसं बोलला तो ? मला नाही का वाटत मूल व्हावे? आता मी ३५ हून जास्ती आहे.

याला सर्व पाॅश हवे. घर घेतले. इंटिरिअरला दीड कोटी. नवीन क्लिनिकवर इतका खर्च केला. आम्ही दोघे dermatologist. एकेक लेझर मशीन १ कोटीच्या वरती. सर्व लोनचा EMI भरावाच लागतो. मी प्रेगन्सीत घरी बसू शकत नाही. तरी आम्ही मागे ट्राय केले, पण मिसकॅरेज झाले. आता भीतीच वाटते.”

माझ्या कांप्लेक्स मधली सोनिया. इतकी हुषार, एम्.बी.ए.झालेली. सर्व जगाची सफर केलेली. २०-२५ कंन्ट्रीज फिरून आलेली. बाबा गाडीतून रोज जुळ्या मुलींना फिरवते. मुली इतक्या गोड. 

“आन्टी मी ४० वर्षांची होईपर्यंत मूल होऊ देण्याचा विचारच नाही केला. माझी करिअर इतकी छान चालली होती. पण म्हटलं, ४० नंतर विचार करता येणार नाही. माझी तीन ivf cycles फेल गेली. आणि चौथ्या वेळी जुळे detect झाले. मग नऊ महिने बेड रेस्ट. मुलींना सांभाळायला ३ मुली ठेवल्यात. 

आता मुली वर्षांच्या झाल्यावर नवीन जाॅब शोधीन. मी घरी बसूच शकत नाही.”

माझ्या मुलीची नणंद. इतकी हुषार. इतकी सुंदर. स्वभावानी इतकी लाघवी. एम्.बी. बी. एस्. झाली.

लग्नासाठी मुलगा बघून दिला नाही. ती एम्.डी.झाली. मग फेलोशीप घेतली. आता ३६ वर्षांची झाली.

आता म्हणते, मुलगा बघा.

” तुला कुणी आवडला नाही का?”

” मामी ,मी माझ्या अभ्यासात इतकी फोकस्ड होते .मला  माझ्या कॅलीबरचा तर मिळायला नको.”

— तिला एकही मुलगा पसंतच पडत नाही. आता लग्न झाले तरी मूल नैसर्गिक होणे अशक्य. शिवाय पस्तीशीनंतर  मुलींची फर्टिलिटी कमी होते. मुलांचाही स्पर्म काउंट कमी होतो. त्यामुळे आय् व्ही. एफ्.सक्सेसफुल होईल याचीही खात्री नाही. बरं, त्यातूनही चाळिशीनंतर मूल झालेच तर त्याच्यात काॅन्जिनिअल डिफेक्टस, abnormilities राहण्याची शक्यता असते.

माझ्या मैत्रिणीची मुलगी नेहा, ३४ वर्षांची आहे. नुकतीच ती कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट झाली.

आता नेक्स्ट स्टेप म्हणजे डिरेक्टर. “ आन्टी, मी आता प्रेग्ननसीचा विचार नाही करु शकत. मी मॅटरनिटी लिव्ह घेतली तर माझ्या खालच्याला तो चान्स मिळेल.व ते मी नाही सहन करू शकणार. ३० ते ३८ ही आमच्या करिअरची क्रूशियल वर्षे असतात. मी माझे एग्ज फ्रीज करून ठेवलेत. “

– एग्ज फ्रीज करण्याचा विचार २० ते ३० व्या वर्षी करावा लागतो.

निमाचा जाॅब असा आहे की तिला खूप ट्राव्हल करावे लागते. ती म्हणते, “ मी सरोगसी पसंत करीन. 

म्हणजे मला नऊ महीने अडकून पडायला नको.”

नैसर्गिकरित्या गर्भारोपण हे आता मागे पडत चाललंय. सर्वजण टेक्नाॅलाॅजीचा उपयोग करतात.

१९८६ मधे जेव्हा डाॅ. इंदिरा हिंदुजाने भारतात पहिल्यांदा के ई एम् हाॅस्पिटलमधे टेस्ट ट्यूब बेबीची डिलीव्हरी केली, तेव्हा मूल न होऊ शकणा-यांना दिलासा होता.

नेहा म्हणते, “ काकी, आई सारखी पाठी लागली आहे .. मूल होऊ दे म्हणून. पण मी कामावरून घरी येते तेव्हा मी इतकी थकलेली असते. तो ही दमलेला असतो. इंटिमसी जमत नाही. वीकएन्डला आठवड्याची 

साचलेली कामे असतात. आणि आता इतकं पॅशनही वाटत नाही.”

हल्ली मुलीही दिवसाला सहा सात सिगरेट ओढतात. त्यामुळे एग्ज निर्माण होत नाहीत. फॅलोपिअन  ट्यूब  ब्लॉक होते. मुला मुलींचे कामाचे तास वाढलेत. कामाचा ताण वाढलाय. जाॅबचेही प्रेशर असतेच. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. त्यामुळेही infertility वाढते.

टेक्नाॅलाॅजी कितीही प्रगत झाली तरी स्ट्रेसमुळे ती कमीच पडणार…. आणि काळाबरोबर हा प्रॉब्लेम वाढतच जाणार…. पण विचार कोण करणार ? ….. आणि कधी ? ….

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

धर्माची आवश्यकता समाजाला का असते, हे सांगणारी घटना तुम्हा भावंडांना, तुमच्या मित्रांना योग्य वयात अनुभवायला मिळाली. 

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे आपल्या पूर्वजांनी चांगलं जाणलं. आणि त्या उत्सवाला धांगडधिंग्याचं स्वरूप न येऊ देता कलागुणांच्या, सद्गुणांच्या उत्कर्षाचं स्वरूप यावं यासाठी पायंडे घालून दिले. नियम केले. श्रद्धेची चौकट घालून दिली. 

तुम्ही आत्ता पाहिलंच असेल.. पुण्याहून १५००+ किमीवर आणि बेंगळुरूहून १९०० किमीवर असलेल्या श्रीराममंदिराच्या निमित्ताने तुमच्या सोसायटीत कितीतरी कार्यक्रम झाले. इतके लोक एकत्र आले. कुठेही खाण्यापिण्यावर भर नव्हता. पिण्याचा तर प्रश्नच नव्हता. खाण्यासाठी कुणीही कुठेही एखादा प्राणी, पक्षी, अगदी त्याचं अंडंसुद्धा मारलं नाही. नेहमीच्या कार्यक्रमांमधे येणाऱ्यांना खूश करणे हा एक मुख्य हेतू असतो. इथे तसं काही नव्हतं. जो तो त्याला करावंसं वाटतंय, म्हणून सहभागी होत होता. त्याचे काहीही लाड होणार नाहीत, हे पक्कं माहित असूनसुद्धा. विचार करून पहा आपल्या मनाशी.. आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यात काय काय फरक होता ते. 

कितीतरी जणांनी आपल्यातल्या कला जोपासल्या. सुंदर रांगोळ्या, दीपोत्सव, काव्य, गायन, वादन, नृत्य, जी जी म्हणून कला श्रीरामचरणी अर्पण करता येईल ती जे कलाकार आहेत त्यांनी केली. कल्पकता वाढीला लागली. आणि प्रत्येकाने ती “इदं न मम (हे माझं नाही), श्रीरामाय स्वाहा (श्रीरामाला अर्पण)” अशा भावनेनं सादर केली. किती लाईक्स, किती कौतुक हे विषय मागे पडले. करण्यातला आनंदच सुखावणारा ठरला. जाणवलं का तुम्हाला ते? 

जे कलांचा आस्वाद घेत होते तेही अती चिकित्सकपणा, कुचकटपणा करत नव्हते.. सगळ्यांना सगळ्यांचं कौतुक.. ही किती गोड गोष्ट होती ना?

याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम होता. त्याच्या चरित्रातच एवढी प्रेरणा आहे की ७००० वर्षांनीही लोकांना चांगलं जगण्याची तो प्रेरणा देतोय. म्हणूनच तो जरी हाडामांसाचा एक माणूस असला तरी एक राजा म्हणून विष्णूचा अवतार मानला गेला, आणि देवत्व पावला. इतका चांगला माणूस म्हणजे देवाचाच अवतार, अशी लोकांची भावना आजही आहे. मुळातच हिंदू धर्म प्रत्येक सजीव गोष्टीत, ज्यांच्यात चैतन्य (energy) आहे त्या सर्वांमध्ये असलेलं ते चैतन्य म्हणजे दैवी (divine) शक्ती मानतो. जे चांगले असतात, त्यांच्यात ती शक्ती अधिक. म्हणून आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक चांगले होण्यावर हिंदू धर्माचा भर आहे. आपल्यातला सर्वोत्तम कोण? तर हा मर्यादापुरुषोत्तम श्रीराम ! 

या उत्सवाआधी कित्येक जणांना ही काळजी होती की उत्साह उन्माद व्हायला नको.. हिंदूंनी अल्पसंख्यांकांना त्रास द्यायला नको. मी तरी अशा काही घटना ऐकल्या नाहीत. कारण उत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंना त्रास द्यायला कुणी आलंही नाही. ही देखील एक खूप मोठी जमेची बाजू. यात जास्त सांगत बसत नाही कारण आता पुढच्या २-५ वर्षात तुम्ही सुजाण नागरिक बनाल, मतदान करायला पात्र ठराल. हा अभ्यास तुमचा तुम्ही केलेला बरा. तुम्हाला पडणारे प्रश्न बऱ्याच लोकांना विचारा. आणि तुमची मतं तुम्ही ठरवा. 

पण सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहजगुण आहे. या जगाला चालवणारी काही एक शक्ती आहे, आणि ती शक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊ शकते. ज्याची त्याची त्या शक्तीच्या रूपाची कल्पना वेगळी असू शकते. अट एकच, त्या श्रद्धेनं माणूस सज्जन बनला पाहिजे. सुदृढ बनला पाहिजे. तसं असेल तर त्या माणसाच्या श्रद्धेचा आपण सन्मानच केला पाहिजे, हे हिंदूंच्या नसानसात आहे. तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्येही हे आहे, आणि तुमच्यातही आहे. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही हेच सांगाल. हीच आपली संस्कृती.

हे नेहमी लक्षात ठेवा.. आपण सज्जन तर असलेच पाहिजे. पण समर्थही असलं पाहिजे. त्यासाठीचा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम ! त्याचं चरित्र नक्की अभ्यासा !

पटलं तर तुमच्या मुलांना नक्की वाचायला द्या नाहीतर सोडून द्या

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दार आणि खिडकी…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!

दार ही राजवाट आहे  जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते.ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.

बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!

सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत.!जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..

जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.

साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.

मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला , नोकरीमधील संधी वाढल्या..

पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.

अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!

दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड ,मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!

संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares