मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तेरा साबून स्लो हैं क्या?…” – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “तेरा साबून स्लो हैं क्या?…” – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. “टूथपेस्ट में नमक” असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लौन्ग, दालचिनी, विलायची, अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती? आणि सगळ्याच टूथपेस्ट “डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड” असतात..  रातभर ढिशूंम ढिशूंम..

टूथब्रश च्या ब्रिसल्स वर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक!! कोनें कोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!

अंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादाम ने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरीबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..

आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला, मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. “दाग अच्छे हैं” हे इथं का नाही लागू होत काय माहिती..

मी “गॅस, नो गॅस” करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण “टेढ़ा हैं, पर मेरा हैं” म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..

केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी, हे गेलं चुलीत..

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील.

साबुन से पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!! (हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!) आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..

टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा, बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंगमशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे…

आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी “आया नया उजाला, चार बुंदोवाला”.. विसरून कसं चालेल..?

“अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?” हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे.. म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे महामूर्ख आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार.. ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं.. … आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग…

“इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला” म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाचसात पोरं नाचत येतील आणि “अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा”.. म्हणून माझ्या ४०,०००च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..

“पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो”च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय.. काल घेतलेल्या वस्तू, एक्सपायर व्हायच्या अगोदरच् आऊटडेटेड होताहेत.

माणसांचंही तसंच आहे म्हणा… असो. 

लेखक : डॉ. सचिन लांडगे.

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री राममूर्ती प्रतिष्ठापना… ☆ सौ. राधिका गोपीनाथ पंडित ☆

सौ. राधिका गोपीनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री राममूर्ती प्रतिष्ठापना… ☆ सौ. राधिका गोपीनाथ पंडित 

कुरूकवाडे…. कुलकर्णी, पंडित परिवारात रामराज्य सुरू झाले…… 

धुळे जिल्ह्यातील कुरुकवाडे येथील श्रीराम मंदिरात आणि समाधी मंदिरात पाऊल ठेवलं. अतिशय रेखीव, अप्रतिम पंचायतन मूर्ती बघून डोळ्यांचे पारणं फिटलं. डोळ्यात आनंदाश्रूनी गर्दी केली. समस्त कुरुकवाडेकर, पंडित, कुलकर्णी परिवाराची श्रद्धा, भक्ती, सढळ हाताने निर्मळ मनाने दिलेली देणगी, फळाला आली आणि राम दरबार सजला. मनात आलं उत्कट श्रद्धेचं रामराज्य यापेक्षा वेगळे ते काय असणार ? सासरच्या मूळ गावाचा, मूळ पुरुषाचा, कुलस्वामिनीचा अभिमान मनात दाटून आला.

कार्यक्रमाला सुरुवात झाली दिनांक 19 -8 -2023 पासून कलशात सप्त नद्यांचे पाणी घेऊन 11 जोड्या समस्त गावकऱ्यांसह सुवासिनींसह अनवाणी पायाने खेड्यातील दगड धोंडे ओलांडत धमणे वेशीपासून भक्ती-भावानी  मिरवणुकीसह निघाल्या. मनात अहिल्येची श्रद्धा, शबरीची भक्ती मावत नव्हती. रथयात्रा पुढे पुढे चालली होती. गावातल्या सुवसिनी सजल्या होत्या. रथमार्गावर सडा, रांगोळी, प्रत्येक घरावर गुढ्या तोरणं पताका लहरत होत्या. आसमंतात एकच निनाद निनादत होता… “श्रीराम जय राम जय जय राम.”

कुरूकवाडे मंदिरात श्री विष्णू श्रीराम सीता आले. लक्ष्मण हनुमानाचे आगमन झाले.. मूर्ती मंदिरात प्रवेशत्या झाल्या. 3 होम कुंडाची, होमहवनाची  जय्यत तयारी झाली होती.

एक नवीन माहिती मिळाली. जयपुरला छिन्नीद्वारे आघात करून मूर्ती आकाराला आणतांना शस्त्र वापरावी लागतात. त्यासाठी प्रतिष्ठापनेआधी कुटीरयाग होम करावा लागतो. तो प्रथम साग्रसंगीत करण्यात आला. 

नंतर प्रथम संस्कार झाला तो धान्य-संस्कार. हा संस्कार करतांना गावकऱ्यांनी यथामती, यथाशक्ती धान्य आणून दिलें. हां हां म्हणता म्हणता धान्याच्या राशी जमल्या. श्रीराम, सीता, लक्ष्मण तांदुळात विराजमान झाले. तर श्रीगणेश, श्री विष्णू, पादुका गव्हात स्थानापन्न झाले. धान्याचा प्रत्येक दाणा दाणा श्री पंचायतनाच्या पदस्पर्शाने पावन झाला. 

कौतुकाची गोष्ट म्हणजे आमचा बराचसा पंडित परिवार, अत्यन्त श्रद्धेने दिनांक 27 रोजी कुरुकवाडे येथे हजर झाला होता. मीनाताईंनी मला त्या धांन्यातल्या पवित्र अक्षता दिल्यावर मी  समस्त पंडित परिवाराला त्या वाटून दिल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, श्रद्धा, भक्ती बघून खूप समाधान वाटले.

धान्य यागानंतर झाला जलनिवास. 108 जडीबुटींनी सप्त नद्यांच्या जल संचयाने यथासांग स्नान घालून मूर्ती  पाण्यामध्ये ठेवल्या गेल्या.

त्यानंतर झाला शयन-याग. मूर्ती फुलांच्या बिछान्यावर मऊ गालीच्या वर झोपवण्यात आल्या. अतिशय नयनरम्य सोहळा होता तो. धान्य याग, जलस्नान, शयनयाग झाल्यानंतर होमहवनानंतर यथासांग प्राणप्रतिष्ठा झाली. आणि त्यानंतर अतिशय नयनरम्य, आनंदाने अंगावर रोमांच उभे राहतील असा पंधरावा, अत्यंत पवित्र असा संस्कार साजरा झाला आणि तो म्हणजे लग्न संस्कार. विवाह सोहळा, अंतरपाट मंगलाष्टकांनी, मंगल वाद्यांनी हा रम्य संस्कार गावकऱ्यांनी जल्लोषात धूमधडाक्यात साजरा केला. गदिमांचे गीतस्वर उमटले, ” स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.”… नंतर झाली पूर्णाहुती, आरती.

रोज भजन, कीर्तन, रामायण चालू असताना हौशी कलाकार श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या वेशात एन्ट्री करत होते. राम भक्त हनुमानाचा रोल केलेला उत्साही कलाकार ही मागे नव्हता. त्यामुळे सुरस रामायणाला सुरम्य शोभा आली होती. सळसळत्या उत्साहाने नाचत असलेले कुरूकवाडेकर श्रीराममय झाले होते. आनंदाने नाचत म्हणत होते ” सीतावर रामचंद्र की जय.”

28 रोजी कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता झाली. श्री आप्पा कुलकर्णी व भगिनी परिवारांनी श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तीवर छत्री चढवली.  मूर्तीच्या चेहऱ्यावरची सात्विकतेची तेजोवलये आणखीनच विकसित झाली.

या सोहळ्यासाठी सगळ्या लोकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यात श्री आप्पाच्या भगिनींचा  पण फार मोठ्ठा हातभार होता. महाप्रसादाचा लाभ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही समस्त पंडित परिवार कुरवाडेकर व कुलकर्णी परिवाराचे अत्यंत आभारी आहोत.

कुरूकवाडे, पंडित व कुलकर्णी परिवारांचा मुख्य सूत्रधार व आमचा प्रतिनिधी म्हणून श्री. अप्पा कुलकर्णी यांचा ह्यात फार मोठ्ठा आणि अत्यंत मोलाचा असा सिंहाचा वाटा आहे.

मोठ्या मनाचे आणि पडद्यामागचे कलाकार असलेले श्री अप्पा कुलकर्णी मोकळ्या मनाने गावकऱ्यांना मोठेपणा देऊन म्हणतात, “मी काहीच केलं नाही, हे सगळं गावकऱ्यांमुळे झालं.”

कार्याचे सूत्र, नेतृत्व, योग्य दिशा दाखवण्याचं मोठं काम श्री आप्पांनीच केलं आहे हे मान्य करावेच लागेल. एवढा मोठा पवित्र सोहळा पार पडतांना श्री आप्पांना त्यांच्या धर्मपत्नी व आमच्या सूनबाईने सौ. अलकाने उत्तम साथ दिली. शांत हसतमुख, सोज्वळ  चेहरा, आल्या गेल्यांचे स्वागत करतांनाचं अगत्य पाहून ती साक्षात अन्नपूर्णाच भासत होती.

क्षमस्व. जागेअभावी सगळ्यांची नावे मी नाही लिहू शकले. पण सगळ्यांचेच हातभार लागले आणि  सगळ्यांचेच आम्ही अत्यंत आभारी आहोत. कारण, ‘याची देही याची डोळा.’ असा हा सुंदर सोहळा तुमच्या सगळ्यांमुळेच आम्हाला लाभला आहे.

मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जयपूरला मूर्ती आणण्यासाठी गेलेली मंडळी सांगतात, जयपूरहून मूर्ती आणतांना त्यात जडत्व जाणवत होतं. दोन-चार जणांना हातभार लावावा लागला होता. पण त्याच मूर्ती प्रतिष्ठापना करताना अत्यन्त हलक्या भासल्या. इतकं त्यात दैवत्व आलं होतं की एका माणसाने सहज त्या उचलल्या. या भाग्यवान मंडळींना माझा मनापासून दंडवत..

आमचे कनिष्ठ चिरंजीव प्रसाद गोपीनाथ पंडित याच्यामुळेच आप्पा आणि आमच्यात ओळख होऊन कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. आणि समस्त पंडित परिवाराचा धागा कुरुकवाडे कुलकर्णींशी जोडला गेला. चि. प्रसादला तुमच्या कडून शुभेच्छा शुभचिंतन शुभाशीर्वाद मिळावा ही श्रीरामा जवळ कुलस्वामिनी जवळ आणि तुमच्याकडे प्रार्थना. 

इतर पंडित परिवाराने कुठलाही किंतु मनात न ठेवता सढळ हाताने निरपेक्ष मनाने श्री.अप्पाकडे देणग्या पाठवल्या ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

© सौ. राधिका गोपीनाथ पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

हल्ली जरा सुट्टी मिळाली, की जगबुडी झाल्यासारखे लोक ‘विकेन्ड’ साजरा करायला कुटुंबाला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात-आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातूरमातूर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूममध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.

सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जुंपायचं!

आपण नक्की का जातो वीकएंडला?

कशापासून लांब पळतो?

मला वाटतं,रोजची चाकोरी मोडणं हा त्यामागील महत्त्वाचा हेतू असतो.

चाकोरी म्हणजे काय?

नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचं घरकाम?

चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सऍप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?

सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्टसकट सर्व मिल्स मागवावी.

सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.

बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.

नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!

विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणारसुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!

अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.

आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत असं नाही ना ?

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झपूर्झा म्युझियम…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

झपूर्झा म्युझियम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(एक सुंदर सहल….)

 “झपूर्झा “म्हणजे काय हे प्रथम खरोखरच माहिती नव्हतं! आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुत यांची”झपूर्झा “ही लोकप्रिय व गाजलेली कविता!

‘झपूर्झा ‘  म्हणजे ‘झपाटले पणाने जगणे’ असा अर्थ घेतला जातो.

‘जा पोरी जा’ हे वाक्य झपाट्याने उच्चारल्यास ‘झपूर्झा’ असा शब्द ऐकल्याचा भास होतो, तसा ध्वनी होतो असे ट्रान्स लिटरेशन फाउंडेशन शब्दकोश नमूद करते.

अर्थाचे असे काही वाद असले तरी ‘झपूर्झा’  खरोखरच आपल्याला ‘जगणे कसे असावे’ हे तेथील प्रदर्शनीतून दाखवून देते. पुण्याजवळ कुडजे, या गावाजवळ हे म्युझियम  आहे. प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अजित गाडगीळ यांनी जुन्या गोष्टींचा संग्रह करून हे म्युझियम उभे केले  आहे. राजा रविवर्म्याची चित्रं ,१००/१५० वर्षांपूर्वीचे दागिने, साड्या, पैठण्या यांचे आठ वेगवेगळ्या गॅलरींमध्ये प्रदर्शन  आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे कला, चित्र, नाट्य, शिल्प या सर्वांशी इथे मैत्री जोडली जाते….

७ जानेवारीला योगा सेंटर ची *झपूर्झा*ला ट्रिप नेण्याचे ठरले आणि आम्ही दोघे त्यांंत सहभागी झालो.१७/१८ जणांची ट्रॅव्हलर गाडी बुक केली होती.. सकाळी १० वाजता निघालो.साधारणपणे पाऊण तासात आम्ही तिथे पोचलो.सकाळचे प्रसन्न वातावरण होते.घरून नाश्ता करून निघालो होतो, तरी वाटेत छोटे छोटेखाद्य पदार्थ खाणे चालूच होते.

‘झपूर्झा’ च्या गेटवर पोहोचल्यावर तिकिटे काढली आणि आत प्रवेश केला.( शनिवार/ रविवार रेट जास्त असतो) आत प्रवेश केल्यावर प्रथमच नटराजाच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन झाले. केशवसुतांची एक कविता आपले स्वागत करताना दिसली. आणि लक्षात आले की हे नुसतेच प्रदर्शन नाही तर इथे चांगल्या वाचनीय अशाही बऱ्याच गोष्टी आहेत.

शिरीष बेरी या प्रसिद्ध आर्किटेक्टने साडेसात एकर जागेत हे संग्रहालय उभे केले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण तिथे आहे. खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर जवळ हे ठिकाण असल्यामुळे हवेमध्ये चांगला गारवा असतो!

म्युझियमचा एकूण नकाशा पाहता तिथे आठ गॅलरीज्, ॲम्फी थिएटर, कॅफेटेरिया, ऑडिटोरिअम,सुवेनिअर शाॅप अशी सर्व दालने आहेत.

हे सर्व पाहण्यासाठी तीन-चार तास वेळ लागतो. तसेच इथे” पूना गेस्ट हाऊस”चे नाश्ता आणि भोजन यासाठी चांगले उपहारगृह असल्याने बरोबर खाद्यपदार्थ न्यावे लागत नाहीत आणि तशी परवानगीही नाही.

‘लाईट ॲन्ड लाइफ’ या पहिल्या दालनात सर्व प्रकारचे दिवे बघायला मिळतात. पितळ्याचे, चांदीचे, देवापुढील दिवे, समया, असे विविध प्रकारचे दिवे तेथे बघायला मिळतात.

दुसऱ्या दालनास’ ‘प्रिंट अँड इन प्रिंट ‘असे म्हणतात. तेथे छपाई तंत्राचा शंभर वर्षाचा इतिहास तसेच प्रिंटिंग संबंधी सर्व माहिती आहे. राजा रविवर्म्याची पेंटिंग्ज आहेत. चॉकलेटचे डबे, ट्रे,फ्रेम्स अशा जुन्या वस्तूंचे असंख्य नमुने आहेत.

तिसऱ्या दालना मध्ये 1832 च्या दरम्यान असणाऱ्या चांदी सोन्याच्या वस्तू, दागिने, भातुकली, विविध प्रकारच्या फण्या, सौंदर्य प्रसाधनांचे डबे, अत्तर दाण्या, गुलाब दाण्या इत्यादींचे प्रकार पाहायला मिळतात.

चौथ्या दालनात दुर्मिळ पैठण्यांचा  संग्रह आहे. तिथे प्रवेश करताच इंदिरा संत यांची “पैठणी” कविता वाचायला मिळते. पेशवाईतील विविध पैठण्या तेथे संग्रहित केल्या आहेत.

स्थापत्य कलेशी संबंधित निसर्गाशी मेळ घालणारे असे पाचवे दालन आहे. तिथून जवळच कॅफेटेरिया  आहे. इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच उकडीचे मोदक, पुरणपोळी, खास पुणेरी अळू यासह असणारे जेवण मिळते ,त्यामुळे अशा सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा फिरायला आणि फोटोग्राफी करायला उत्साह येतो.

बसण्यासाठी सुंदर जागा, समोर दिसणारे धरणाचे पाणी, वाटेत असणारे कमळाचे पाॅड्स आणि शेवटी असणारे शंकराचे मंदिर असा सर्व परिसर बघता बघता वेळ कसा जातो ते कळतच नाही!

साॅव्हनेअर शॉप हे बायकांच्या खरेदीचे आवडते ठिकाण! तिथे विविध प्रकारच्या पिशव्या, टी-शर्टस्, मग्ज्, पेंटिंग्ज, अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत.  विंडो शॉपिंग आणि थोडीशी खरेदी तेथे होतेच!

एक दिवस निसर्गरम्य परिसरात आनंदात घालवण्यासाठी हे ठिकाण खरोखरच अप्रतिम आहे! अजित गाडगीळ यांनी  ‘झपाटलेपणाने जगणे’ हा अर्थ खरोखरच सार्थ केला आहे हे  म्युझियम उभारताना!

आमचा सहलीचा दिवस असाच अविस्मरणीय झाला.जेवण आणि फिरणे करून येताना ३ च्या दरम्यान आम्ही सर्वजण योगा सेंटर मधील मनीषा मॅडमच्या घरी चहा, बिस्किटे घेऊन फ्रेश झालो.

लहानशा खेड्यातील त्यांचे घर खूपच छान वाटले. घराभोवती फुलांची झाडे , शेवग्याचे झाड तसेच छोटी छोटी वांग्याची झाडे पाहून आनंद वाटला.. येताना ताजे ताजे मुळे,पालक, चाकवत, शेवगा अशा खास गावाकडच्या ताज्या भाज्या घेतल्या.

निसर्गाचे हे रूप पाहून वाटत होते की, शहराच्या कृत्रिम जीवनापेक्षा हे किती आकर्षक आहे आणि निसर्ग आपल्याला किती देत असतो!

“देता किती घेशील तो कराने..”

अशी आपली अवस्था होते!

संध्याकाळी एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो. कालचा   संस्मरणीय दिवस मनामध्ये कायमचा घर करून राहीला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमुटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ चिमूटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

रोजच्याप्रमाणेच आजही तो घाईघाईत कामावर निघाला. आणि दोनच मिनिटांत घरी परतला. बेल वाजल्यावर आईने दार उघडलं, तिला वाटलं – हा बहुधा डबा, किल्ली, पाकीट काहीतरी विसरला धांदरटपणे. पण तो घरात शिरलासुद्धा नाही. दारातूनच आईला म्हणाला, “मी निघालो तेव्हा तू आंघोळीला गेली होतीस. तुला टाटा केला नव्हता, म्हणून परतलो. टाटा. चल, मी पळतो.” म्हणत तो परत गेलापण. आज त्याची रोजची ९:१३ चुकणार होती. पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आज दिवसभर हसू राहणार होतं.

आज ऑफिसासाठी डबा भरताना, तिनं एका छोट्या डबीत लिंबाचं लोणचं घेतलं होतं. तिच्या ऑफिसमधली स्मिता परवा दुसऱ्या कोणाला तरी सांगत होती, तिला सध्या लोणचं खावंसं वाटत होतं म्हणून. 

आज तो ऑफिसहून घरी येताना, गरमागरम बटाटेवडे घेऊन आला होता. त्याचे निवृत्त वडील चाळीतल्या त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसले होते. याने त्यांना ते वडे देऊ केले. हा शाळकरी असताना, त्याचे वडील ऑफिसमधून येताना, कधीकधी, त्याच्यासाठी असंच काहीतरी चटकमटक आणायचे. त्यांना ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे चष्म्याआडून लुकलुकले. 

त्याच्या गिरणीत – कंपनीत हडताळ चालू होता. खर्च भागवताना तो मेटाकुटीला आला होता. बायकोशी त्याचं यावरूनच बोलणं चाललं होतं. एवढ्यात त्यांचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला, त्याला दिली आणि म्हणाला, “बाबा, हे घ्या. माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत.”

लेकीच्या कॉलेजमध्ये आज “साडी डे” होता. हिने आज तिच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी लेकीला दिली.

ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणून ओळखला जाई, पण चहा पिऊन परतताना तो रोज वॉचमनसाठी चहा घेऊन येई, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.

त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले. हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला. दोन वर्षांपूर्वी ज्या मित्राशी भांडण झाल्याने अबोला धरला होता, तो आला, आणि पैशाचं एक पाकीट त्याला देऊन गेला, “राहू देत, लागतील,” म्हणाला. 

आज ती एक नवी रेसिपी ट्राय करत होती. Sugar free टॅब्लेटस् घालून मिठाई करत होती. सासूबाईंना मधुमेह असल्याने, कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं.

माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप नखरे होते तिचे. आज ती आई झाली होती, लेकाला सर्दी झाली होती. रात्री झोपला की शेंबडानं नाक चोंदायचं लेकाचं. त्याला कडेवर उभं धरून, ही रात्ररात्र बसून रहायची. 

आज तिचा वाढदिवस होता. हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी, आणि नाटकाची दोन तिकिटं.

या धकाधकीच्या जीवनात, सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरज नसते. ही चिमूटभर आपुलकी पुरते, घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुझी राख धुंडाळताना !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तुझी राख धुंडाळताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यादिवशी रडता नाही आलं,राजा ! माझं बापाचं काळीज देहाच्या आत होतं… क्षत विक्षत. आणि माझा देह जबाबदारीच्या वस्त्रांनी पुरता झाकलेला होता. डोळ्यांवर कातडं नाही ओढून घेता येत. डोळ्यांना पहावंच लागलं तुझ्याकडे. आणि मी पहात राहिलोही एकटक…. आणखी काही क्षणानंतर हे पाहणंही थांबणार होतं.

तुझ्या पलटणीचा मी प्रमुख. पलटणीतील सारेच माझे बच्चे. माझ्या एका इशाऱ्यासरशी मरणावर झेप घेणारे सिंहाचे छावे… वाघाचे बछडे. तू तर माझ्या रक्ताचा अंश. माझ्याच पावलांवर हट्टाने पाऊल टाकीत टाकीत थेट माझ्याच पंखांखाली आला होतास. कोणतीही मोहिम असू देत… तुला कधी मागे रेंगाळताना पाहिलं नाही. उलट पलटणीच्या म्होरक्याचा पोरगा म्हणून तू पुढेच सरसावयचा सर्वांआधी… बापाला कुणी नावे ठेवू नये म्हणून. 

आतापर्यंत तू प्रत्येकवेळी परत आला होतास दुश्मनांना यमसदनी धाडून. एखाद्या मोहिमेत आपल्यातलं कुणी कामी आल्याची बातमी यायची तेंव्हा धस्स व्हायचं काळजात. गोळी काही नातं विचारून शिरत नाही शरीरात. असे अनेक प्रसंग आले आयुष्यात जेंव्हा सैनिकांच्या मृतदेहांवर पुष्पचक्र अर्पण करावे लागले…. पूर्ण गणवेशात ! तूही असायचास की मागच्या एखाद्या रांगेत. तुझ्याच एखाद्या साथीदाराच्या शवपेटीला तुलाही खांदा द्यावा लागायचा. 

मी समोर आलो की तू  मला अधिक त्वेषाने सॅल्यूट ठोकायचा…. आणि मला ‘सर’ म्हणायचा. तुझ्या तोंडून ‘पपा’ अशी हाक ऐकल्याला खूप वर्षे उलटून गेली होती. लहानपणी तुझा सहवास नाही मिळाला तसा… मी सतत सीमेवर असायचो आणि तू तुझ्या आईसोबत दूरच्या गावी. बढती झाली आणि पलटणीत कुटूंब आणायची मुभा मिळाली तर तू सैनिक व्हायला निघून गेलास. परत आलास ते रुबाबदार अधिकारी होऊनच. तुझ्याकडे पाहताना मी माझं मलाच आरशात न्याहाळतो आहे, असं वाटायचं. 

‘पपा, तुमच्याच पलटणीत पोस्टेड होतोय…’ तुझा निरोप आला आणि पाठोपाठ ” सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलरिया रिपोर्टींग सर ! ” म्हणत तू  पुढ्यात हजर झालास. वाटलं पुढं होऊन तुला घट्ट मिठी मारावी. पण तुझ्यात आणि माझ्यात गणवेश होता…. वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यास पाऊलभर दूर उभं राहायला लावणारा. मात्र घट्ट हस्तांदोलन मात्र केलं मी. तू जन्मलास तेंव्हा तुझा एवलासा हात हाती घेतला होता… ते आठवलं. तोच हात आता सामर्थ्यशाली झाला आहे, या हातात आता अधिकार आलेला आहे… हे जाणवलं. मी म्हटलं होतं, ” वेलकम ऑफिसर ! ” यावर तुझ्या डोळ्यांत चमक दिसली होती. आज तुझे डोळे मिटलेत… ती चमक आता या म्हाताऱ्या होत चाललेल्या डोळ्यांना दिसणार नाही…. आणि आयुष्याच्या सायंकाळी मी कुणाच्या नजरेनं पाहणार? 

त्या दिवशीही तू नेहमीप्रमाणे मोहिमेवर गेला होतास. माझं सगळं लक्ष असायचं. पलटणीतली सारी पोरं माझीच तर होती. आणि तू त्यांच्यासोबत होतास, त्यामुळे तर ही भावना अधिकच तीव्र व्हायची. खरं तर तुझी इथली पोस्टींग आता जवळजवळ संपत आली होती. दुसऱ्या एखाद्या शांत ठिकाणी गेला असतास कदचित फार लवकर… तू गेलास खरा… पण कायमच्या शांत ठिकाणी. 

निरोप आला ! निघायला पाहिजे. सर्व तयारी झाली आहे. गाडी उभी आहे. मला तयार व्हायला पाहिजे. पूर्ण लष्करी गणवेश परिधान करायलाच पाहिजे… सैनिकाला अंतिम निरोप द्यायचा आहे. 

पण आज स्वत:चा मुलगा गेल्याची बातमी स्वत:तल्या बापाला सांगावी तरी कशी? एक कमांडिंग ऑफिसर म्हणून मुलाच्या आईला कसं सांगावं की तुझा मुलगा शहीद झालाय? आणि नवरा म्हणून बायकोला काय सांगावं? एवढा मोठा हल्ला तर कोणत्याही लढाईत झाला नव्हता माझ्यावर.

नेहमीच्या सफाईने आवरलं सगळं. तू फुलांच्या गालिच्यात पहुडलेला होतास. देहावर तिरंगा लपेटून. खरं तर तुझ्या जागी मी असायला हवं होतं. मीही मोहिमा गाजवल्या तरूणपणी. पण माझ्या वाटची गोळी नव्हती दुश्मनाच्या बंदुकीत. आणि असलीच तर तू आता तुझं नाव माझ्या नावाच्या आधी जोडलं होतं… गोळीला आपलं काम माहित होतं… ज्याचं नाव त्याच्यात देहात सामावून जायचं. 

छातीवर गोळ्या झेलल्याचं समजलं तुझ्या सोबत्यांकडून.. जे बचावले होते दुश्मनांच्या हल्ल्यातून. त्याआधी तू कित्येक दुश्मन उडवले असंही म्हणताहेत ही पोरं. छातीवर गोळी म्हणजे मानाचं मरण आपल्यात. इथं होणारी जखम जीवघेणी खरी पण जास्त शोभून दिसणारी. 

दोघा जवानांनी तालबद्ध पावलं टाकीत पुष्पचक्र पुढे नेलं. मी ठरलेल्या सवयीनुसार पावलं टाकीत तुझ्या देहाजवळ पोहोचलो. सर्वत्र शांतता… दूरवरच्या झाडांवर पाखरं काहीतरी सांगत होती एकमेकांना. कदाचित मोठं पाखरू लहान पाखराला… दूर कुठं जाऊ नकोस फार ! असं सांगत असावं…  हे मला आता तुला सांगता येणार नव्हतं.. तू श्रवणाच्या पल्याड जाऊन पोहोचला होतास… बेटा ! 

खाली वाकून ते पुष्पचक्र मी तुला अर्पण केलं… काळजीपूर्वक. एक पाऊल मागे सरकलो आणि खाडकन तुला सॅल्यूट बजावला… अखेरचा ! तुझ्या शवाला खांदा दिला. किती जड होतं ओझं म्हणून सांगू… साऱ्या पृथ्वीचा भार एकाच खांद्यावर आलेला. आणि मला खांदा द्यायला तू नसणार याची दुखरी जाणीव तर आणखीनच जड. 

पुढचं काही आठवत नाही. तुझ्या चितेच्या भगव्या ज्वाळांनी डोळे दिपून गेले… अमर रहेच्या घोषणांनी कान तुडुंब भरून गेलेले होते. आसवांना आज किमान सर्वांसमोर प्रकट व्हायला मनाई होती…. आसवं सुद्धा हुकुमाची ताबेदार. त्यांना माहित होतं एकांतात मी त्यांना काही अडवणार नव्हतो ! 

सकाळी तुझ्या राखेपाशी गेलो. एवढा देह आणि एवढीशी राख. मरण सर्व गोष्टी अशा लहान करून टाकते. अलगद हात ठेवला तुझ्या राखेवर…. अजूनही धग होती थोडीशी. असं वाटलं तुझ्या छातीवर तळवा ठेवलाय मी. असं वाटलं माझ्या या तळव्यावर तुझा हात आहे….. त्या मऊ राखेत माझा हात खोलवर गेला आपसूक… आणि हाताला काहीतरी लागलं ! 

तुझं काळीज भेदून गेलेली गोळी…. काळी ठिक्कर पडलेली आणि अजूनही तिच्यातली आग शाबूत असलेली. जणू पुन्हा एखादं हृदय भेदून जाईल अशी. तशीच मूठ बंद केली…. गोळीसह. 

तुला वीरचक्र मिळणार होतंच… आणि ते स्विकारायला मलाच जावं लागणार होतं.. तसा मी गेलोही. तुझ्या पलटणीचा प्रमुख म्हणून नव्हे तर तुझा बाप म्हणून. तोवर भरपूर रडून झालं होतं एकांतात… तुझी आई होतीच सोबतीला. शौर्यचक्र स्विकारताना हात किचिंत थरथरले पण सावरावं लागलं स्वत:ला. अनेक डोळे माझ्याकडे लागलेले होते…. सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलारिया यांचे वडील त्यांना मरणोत्तर दिले गेलेले शौर्यचक्र स्विकारताना रडले असते तर पुढे ज्यांना सैन्यात जाऊन मर्दुमकी गाजवायची आहे… त्यांची पावलं नाही का अडखळणार? आणि माझ्या गुरूदीपलाही हे रुचलं नसतं ! 

आजही ते शौर्यचक्र आणि ती गोळी मी जपून ठेवली आहे… त्याची आठवण म्हणून. माझ्या पोराने निधड्या छातीनं दुश्मनांचा मुकाबला केलेला होता…. ती गोळी म्हणजे त्याच्या पराक्रमाची गाथा सांगणारा एक दस्तऐवज… तो जपून ठेवलाच पाहिजे ! 

(दहा जानेवारी, १९९६. पंजाब रेजिमेंटच्या जम्मू कश्मिरमध्ये तैनात असलेल्या तेविसाव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्ट.कर्नल एस. एस. अर्थात सागर सिंग सलारिया साहेब आणि त्याच बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते त्यांचे सुपुत्र गुरदीप सिंग सलारिया साहेब….. एकविसाव्या वर्षी सेनेत आले आणि तेविसाव्या वर्षी देशाच्या कामी आले. एका धाड्सी अतिरेकीविरोधी कारवाईत गुरदीप साहेबांनी प्राणपणाने लढून तीन अतिरेक्यांना टिपले परंतू दुसऱ्या एका अतिरेक्याने अगदी नेम धरून झाडलेली गोळी छातीत घुसून गुरदीपसिंग साहेब कोसळले आणि अमर झाले. त्यांना मरणोत्त्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. या शौर्यचक्रालाच ही गोळी बांधून ठेवलेली आहे साहेबांनी…..   सेनेतून निवृत्त झालेले लेफ़्ट. कर्नल सागर सिंग सलारिया आता मुलाच्या आठवणीत जीवन जगत आहेत. गुरदीप सिंग साहेबांच्या मातोश्री तृप्ता २०२१ मध्ये स्वर्गवासी झाल्या. त्यांची ही कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपणासाठी जमेल तशी मांडली. इतरांना सांगावीशी वाटली तर जरूर सांगा.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वर्षाऋतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “वर्षाॠतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

खूप प्रेम करतोय मी निसटणा-या वर्षाऋतूवर! रेत मुठीतून निसटून जाते. तसे हे वर्ष अखेर निसटून जाताना मला दिसत आहे. पण या वर्षअखेर मी शून्य होणार आहे. हे माझ्या मनाला सांगून ठेवले आहे. कारण दान देत रहावे. पुण्य कमवत रहावे. कर्म चोख आणि वचन निभवावे. असाच फंडा माझ्या जीवनाचा मी करून ठेवला आहे. सुखाला दु:ख आणि दु:खाला सुख टिकून देत नाही. हे मी खूपदा अनुभवले आहे. म्हणुन सुखदु:खाची नाळ माझ्या संयममय संघर्षाशी बांधून ठेवली आहे.

वेळ आहे. निघून जाणार! हे शेवटी अटळ सत्य! भावनांच्या हिंदोळ्यावर! किती स्वप्नझुले झुलताना मन हसते. चोरपावलांनी आलेल्या आधार शब्दलहरीवर हरेक झुला गगनाला भिडतो! वारा झोका देत असताना सांजवेळी बासरीची धून मारव्यासोबत समीप होऊन माझ्या मनाला साद घालते. वसुंधरेने नेसलेला हिरवा शालू, आभाळाच्या ललाटी दिसणारा सोनेरी टिळा! पाहत पाहत, नववधुचा शृंगार दवबिंदुंचा साज पांघरून इंन्द्रधनुच्या रंगात रंगून जाताना!  माझे मन हरकून जाते. मनाच्या पैलतिरावर उन्मळून आलेल्या माझ्या भावना! मला आता कित्येक प्रश्न विचारू लागतात.

माझ्या खांद्यावरचे ओझे कुणीतरी उचलले! आणि मी मुक्तमोकळा श्वास घेत आहे. हे कल्पनेत नाहीतर! सत्यात उतरत पूर्ण झालेले स्वप्न! खरचं माझे हसून स्वागत करते. मी दिलखुलासपणे पाहत असतो. मी दिले काय? आणि मिळाले काय? याचा हिशोब मला सरते वर्ष देईलच! यात शंका नाही.

मी पूजा करतो. ती वर्षाऋतुची मूर्ती मंदिरातून गहाळ झाली. हे नियतीने दाखवून दिले. तेव्हा मी चोराला दोष दिला नाही. तर मीच ती मूर्ती कोरीव, सुभक आणि सुंदर घडवली. याचा मला खूप अभिमान वाटतो. यात चोराचे काही चुकले असेल! असे मला वाटत नाही. मग ती मूर्ती मनमंदिरी असो, वृंदावनी असो की एखाद्या नदी किनारी कदंबाजवळ असो! त्या मूर्तीसाठी शृंगाराची लेणी मी कोरून ठेवलेली आहेत. नवरसातले अमृत! मी माझ्या काळजात लपवून ठेवले आहे. फक्त मला या वर्षाऋतुसाठी गंधाळायचं आहे. इतकेच समजते! मनातून असा पाझर बाहेर येईपर्यत, अश्रू वाट अडवतात. अश्रूही अमृतमय होऊन जातात. मी एकदा अश्रू चाखून पाहिले आहेत. चव खारटचं! कोणता सागर त्या नयनरम्य परिसरामध्ये उसळत आहे! की वास्तवास आहे. मला अजून कळाले नाही. की त्या सागराचा किनारा कोणता? की किनाराच नाही. कसं सगळं समभ्रमीत ?

मी समर्पीत केलेले हरेक क्षण! माझा हेवा करतात. या वर्षाऋतूवर प्रेम करत असताना! मी खूप गोष्टींचा त्याग केला. या त्यागलेल्या गोष्टीशी तसा माझा कोणता घनिष्ठ सबंध नाही. नव्हता! म्हणून माझ्यापासून दुरावलेल्या गोष्टींची मला कधी साधी आठवणही येत नाही. आणि कधी येणारही नाही. एक ऋतू मनाला भावल्यानंतर नवे ऋतू, दहा दिशा अन् सहा सोहळ्यांच्या भ्रमीष्ठ भानगडीत कधी मी पडलो नाही. पडणारही नाही.

पतझड सावन बसंत बहार

एक बरस के मौसम चार मौसम चार

पांचवा मौसम प्यार का इंतजार का…

असे गुनगुनणारे माझे मन! नेहमी वर्षाऋतुच्या वाटेवर नजर रोखून असते. वचनबध्द, साचेबंध असलेले! माझे मन जरी थोडेफार हेकेखोर, गर्विष्ठ असले तरी ते दगाफटका करणारे नाही. याची खात्री मला आहे. शब्दांनी आधार मिळतो. पण कर्तव्याचं आणि जबाबदारीचे ओझे मात्र कमी होत नाही. त्याला समोर येऊन! हातभारच लावावा लागतो. मनानी करावे गुन्हे! अन् शरीराने भोगावी शिक्षा! हा न्यायनिवाडा मला मान्य नाही. ओंजळीतल्या सरींना! मी खाली पडून देणार नाही. की माझ्या जीवनरेखा कुणाला पुसून देणार नाही. ज्या भावनांनी मी चित्र रेखाटले. ज्या वैभवमय रंगांनी मी चित्र रंगवले. ते चित्र मी कोणत्या प्रदर्शनात मांडणार नाही. त्या वैभवमय झालेल्या चित्राला जगण्यासाठी लागणारा श्वास माझ्या श्वासातूनच देत राहीन! रोज नव्याने रंग भरत राहीन! या चित्राची जागा मनाच्या खोल कँनव्हासवरच  असेल आणि राहील.

जुन्या विचारांची पाने झडून गेल्यानंतर! चैतन्यमय विचारांच्या नवपालवीचे स्वागत करायला! मी सज्ज होणार आहे. ऋतुच्या मनराईतून प्रेमफुलांच्या कळ्या उमलू लागतात. तेव्हा मनभावनांच्या सुगंधी उत्कंटतेला आवर मला घालता येत नाही. हे तितकेच खरे आहे. चोरीला गेलेली मूर्ती पवित्र राहील! कारण तिच्या चरणी मी रोज सत्यफुले वाहिली होती. म्हणतात मूर्ती निर्जीव असते. पण मी माझ्या वर्षाऋतूमध्ये जीव ओतला आहे. त्यामुळे माझ्या भावनांची जाण नक्कीच वर्षाऋतुला असणार कदाचित! गतवर्षाऋतुची कात टाकताना! माझा ऋतू मी वसंतास बहल करेन!  मग तो ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत की शिशिर असो! ऋतू सूर्यावर आणि महिने चंद्रावर ठरतात!  निसर्गाची किमया कुणाला माहीत नाही. वर्षाऋतुचा खेळही असाच! हा खेळ सावल्यांचा! यामधल्या सावल्यांना मुखवटे नसले तरी भावना मात्र मी ओळखत असतो. सावल्यांच्या लपंडावामध्ये नेहमी वर्षाऋतूवर का डाव येतो! हे कळत नाही. की ती टाईमप्लीज म्हणून डाव अंगावर ओढून घेते. हे ही समजत नाही.

पण माझे ऋतू आणि महिने माझ्या स्वाभिमानावर आणि माझ्या वेळेवर, परतीच्या क्षणांवरच  ठरत असतात.. किंभवना मी ठरवत असतो. आणि वर्षाऋतुचा शृंगार करण्यास शिंपल्यातले मोती वेचून भावस्पर्शाच्या ओंजळीत साठवत असतो. वर्षाऋतुच्या प्रतीक्षेत….!!!!!!!

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे 

माझ्या लहानपणी दर श्रावण महिन्यात आमच्या पाचगणीच्या घरी वर्षातून एकदा सत्यनारायणाची पुजा असायची. या संपूर्ण महिन्यात एका धार्मिक ग्रंथाचे रोज रात्री जेवणानंतर अध्यायवाचन व्हायचे. माझे वडील जरा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनां फार उत्साह असायचा. एकत्र कुटूंब पद्धतीने आम्ही राहायचो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर होती. त्यावेळी जेवणानंतर सगळेच्या सगळे एकत्र बसायचे. कान देऊन माना डोलवत सगळे ऐकत राहायचे. वडील प्रत्येक ओळ वाचली की सर्वानां अर्थ समजून सांगायचे. दरवर्षी कधी हरिविजय, रामायण किंवा नवनाथांच्या कथांचा अध्याय लावला जायचा. त्या प्रत्येक अध्यायावर पहिल्या पानावर ब्लॅक ॲन्ड व्हाईट पेनने काढलेली रेखाचित्रे असायची. मी चित्रे पहात बसायचो. कधी कधी पाचगणीच्या लायब्ररीत चांदोबा किंवा अमर चित्रकथेची कॉमिक्स वाचायला मिळायची. ग्रंथपाल असलेले कमरुद्दीनचाचा आम्हा लहान मुलानां ती पुस्तके  फुकट वाचायला द्यायचे. त्यासाठी एक वेगळे कपाट विद्यार्थी वाचनालयात ठेवलेले असायचे.

बालवयात हाताने काढलेली ती रेखाचित्रे पाहून मी आचंबित व्हायचो. ती चित्रे पाहणे, त्याच्या कॉपी करणे, त्यांचा संग्रह करणे याचे नंतर वेडच लागले. पण आपणही कधी कॉमिक्स करू असे त्यावेळी जराही वाटले नाही.

पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी सहाय्यक समिती व महानगरपालीकेच्या घोले रोडवरच्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो. त्या रस्त्यावर नेहमी येणे जाणे व्हायचे. कोणी तरी सांगितले अमर चित्रकथा या कॉमिक्स कंपनीची पुस्तकातील चित्रे काढणारे चित्रकार प्रताप मुळीक या रामचंद्र सभामंडपाच्या गल्लीतच राहतात. मग एकदा मोठा धीर एकवटून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरी गेलो. मला कामाची गरज तर होतीच पण त्यापेक्षा प्रताप मुळीक दिसतात कसे हे पाहण्याची उत्सुकता खूप होती. अतिशय शांत स्वभावाचे, उंच, सडपातळ शरीरयष्टी, पँट व पांढरा झब्बा घातलेले, बुल्गानिन दाढी व डोक्यावर उलट्या दिशेने फिरवलेले केस व मिस्किल हास्य असलेले मुळीक सर पहिल्याच भेटीत आवडले. आणि त्यांनी कसलीही अट न ठेवता त्यांच्या मुलाच्या मिलींद मुळीकच्या परस्पेक्टीव्ह रेंडरींगच्या कामासाठी स्टुडिओत येण्याची व काम करण्याची परवानगी देखील लगेच दिली.

प्रताप मुळीक एक अफाट अलौकीक बुद्धीचे व्यक्तिमत्व आहे हे लवकरच लक्षात आले. त्यांचा मानवी शरीरशास्त्र व पौराणिक चित्रकथा काढण्यासाठी लागणाऱ्या सर्वच क्षेत्रातील व्यासंगाचा आवाका फार मोठा आहे हे लक्षात आले. उदा. पुरातत्व विभागातील वस्तूंचा, इमारतींचा, यथार्थदर्शनशास्त्राचा (परस्पेक्टीव्हचा ) ऐतिहासिक वस्तूंचा, तलवारी पासून त्या त्या काळातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा, प्राण्यांचा, घोडागाडी ते अत्याधुनिक गन्स, रेल्वे, जीप्स, वाहने, झाडे, डोंगरदऱ्या, आभुषणे, वेशभूषा यांचा इतका प्रचंड अभ्यास होता की कॉमिक्सचे स्क्रिप्ट आले की दोन तीन तासातच त्यानां संपूर्ण कॉमिक्सची चित्रे डोळ्यांसमोर दिसत व त्याच्यां मुक्त फटकाऱ्यांच्या शैलीत राम, कृष्ण, बुद्ध, येशू, महावीर, वेगवेगळे संत, महंत, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक थोर साधुपुरुष, महाराणाप्रताप ते शुजा, इन्स्पेक्टर विक्रम, नागराज, अमिताभ, अशी अनेक दृश्य अदृश्य सजीव, निर्जिव काल्पनिक व वास्तव पात्रे कागदावर पेन्सिलने उमटत. कधी आकाशातून, कधी डोंगरावरून, कधी समोरून, कधी खूप खालून दिसणारी वेगवेगळया प्रतलांवरची त्यांनां चित्ररेखाटने सहज करताना पाहून  पाहणाऱ्या आमच्यासारख्या नवशिक्या चित्रकारांचा मेंदू बधीर व्हायला लागायचा. वाटायचे किती काम करायला पाहीजे. सतत रेखाटने करायला हवीत. समोर दिसते ते  दृश्य मग ते घर, ऑफीस, शाळा, इमारती, दुकाने, रेल्वेस्थानके, बसस्टॉप, झाडे, डोंगर जेजे समोर दिसेल तशी सतत रेखाटने करण्याची सवयच लागली. हात बंद असला तरी मेंदू व स्मरणशक्ती कधी बंद पडू देऊ नका असे बाबा नेहमी सांगायचे. त्यांचा मुलगा मिलिंद साधारण आमच्या वयाचा तो त्यानां बाबा म्हणायचा म्हणून आम्हीसुद्धा त्यांनां बाबा म्हणायचो. स्त्री असो वा पुरुष नुसती ॲक्शन महत्वाची नसते, नुसती शरीराची ठेवण महत्वाची नसते तर माणसे बोलतात कशी ? त्यांचे हातापायाची, बोटांची पेरे, पंजाची ठेवण कशी बदलतात यावर लक्ष द्यावे प्रत्येक चेहरा बोलतो तो नीट पहा असे ते शांतपणे सांगत. मानवी भावभावनांचा अभ्यास करून माणसाचे सुख, दुःख, राग, हास्य, आनंद, क्रौर्य, त्रास अशा भावना चेहऱ्यावर दिसल्या पाहिजेत, प्रत्येक अँगलने त्याचे निरिक्षण करायला पाहिजे यावर त्यांचा भर असे. माणसाची उंची व त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांचा पोशाख वेगवेगळा असला पाहिजे. समोरचा माणूस साधू असला तर त्याचा सात्विक भाव चेहऱ्यावर आला पाहिजे, दुष्ट वृत्तीचा, गुंड माणूस दाखवायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या पोशाखातून, त्याच्या ॲक्शनमधून त्याचे कॅरेक्टर दिसले पाहीजे त्यासाठी माणसांचे सतत निरिक्षणे करत राहा असे ते सांगत, पौराणिक मालीकांमध्ये कर्णभूषणे, गळ्यातील हार, हातातली अंगठी असो वा कपाळावरील गंध असो त्याकडे लक्ष द्या. तलवारीची रचना, रथ, त्यांचे घोडे, बैलगाडी, वाघ, सिंह यांचे डोळे त्यातील भाव चित्रात दिसले पाहिजेत अशा अनेक छोट्या गोष्टी स्टुडीओमध्ये रेखाटन करताना ते सांगत असत. ते आमच्यासाठी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.

आपणही कॉमिक्स क्षेत्रात काम करायचे असे मी ठरवले होते. त्यासाठी रात्ररात्र जागून शिवाजीनगरच्या बसस्टॉपवर आम्ही काही मित्रमंडळी स्केचिंग करत असायचो. पण माझे दुर्देव असे की शिकत असतानाच त्यानां हैदराबाद येथील मोठ्या कॉमिक्स बनवणाऱ्या कंपनीने बोलावून घेतले व प्रताप मुळीक सहकुटूंब हैदराबादला काही वर्षांसाठी शिफ्ट झाले व आमचा कॉमिक्स शिकण्याचा अभ्यासही थंडावला.

१९८७-८८ साली अभिनेता अरुण गोविल, दिपिका यांची रामानंद सागर दिग्दर्शक व निर्माते असलेली ‘ रामायण ‘ ही सिरियल टिव्हीवर खूप प्रसिद्ध झाली, खूप गाजली. त्या कलाकारांना घेऊन अमर चित्रकथा या कंपनीने एक कॉमिक्स केले होते. त्यावेळी मी देखील माझ्या अभ्यासासाठी मुळीकांचे एक हस्तलिखित कॉमिक्स तयार केले होते. त्या संपूर्ण कॉमिक्सची रेखाटने, त्याची कॅलिग्राफी, त्याचे मुखपृष्ठ, अगदी वेळ देऊन मन लावून करताना प्रचंड आनंद मिळाला होता. आज तीन तपानंतर ते हस्तलिखित, हस्तचित्रित, रोटरींग पेनने सुलेखन केलेले  कॉमिक्स बाहेर काढले कारण त्याचा विषय होता ‘ रामायण ‘.

आज वाईला बाजारात गेलो होतो. सगळीकडे रांगोळ्या, भगवे झेंडे, गुढया, लहान मुलांच्या रामायणातील वेशभूषा, रामाची गाणी ऐकून व फेसबुकवरच्या अनेक चित्रकारांची रामायणावरील चित्रे पाहून मी केलेल्या सुनील कॉमिक्सची व मूळ चित्रकार प्रताप मुळीक बाबांची खूपच आठवण आली.

छतीस वर्षांपूर्वीचे एक हस्तलिखित कॉमिक्स माझ्या वडीलांची व प्रताप मुळीकांची आठवण करून गेले.

आता ती ध्यासाने पछाडलेली निरागस ध्येयवेडी माणसे काळाच्या पडद्याआड गेली.

आता उरल्या फक्त त्यांच्या आठवणी…. ‘ रामायण ‘ कॉमिक्सच्या रुपात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनोखी पहल — कणादकुमार अमर – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अनोखी पहल — कणादकुमार अमर – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ श्री मकरंद पिंपुटकर

आपल्या रोजच्या आयुष्यात चहाच्या टपरीपासून, भाज्यांच्या ठेल्यापासून, सायकलच्या दुकानांत अनेक ठिकाणी आपण शाळकरी मुलांना कामं करताना बघतो, घरकाम – धुणीभांडी करणाऱ्या मुलींना बघतो. चुकचुकतो, या मुलांनी शाळेत जायला पाहिजे म्हणतो, आणि मग तो विचार, ते चिंतन डोक्यातून काढून टाकतो आणि आपापल्या कामाला लागतो.

२०१६ साली, प्रयागराज (अलाहाबाद) मधील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MNNIT मधील कणाद कुमार अमर या विद्यार्थ्यानेही ही अशी कामं करणारी मुलं पाहिली. मात्र इतरांसारखा तो कोरडा हळहळला नाही, त्याच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.

त्याच्या ओळखीच्या या मुलांना तो भेटला. या मुलांना, त्यांच्याच वस्तीत – ‘नया गाव’ इथे, रोज संध्याकाळी तासभर तरी अभ्यासाला पाठवा, अशा त्याने त्या मुलांच्या आई वडिलांना विनवण्या केल्या.

“तुम्ही आमची मुलं पळवून नेणार आहात” पासून “धंदे के टाईम खोटी मत करना” पर्यंत अनेक उत्तरं मिळाली.

खूप मिनतवाऱ्या केल्यावर पंधरा विद्यार्थी मिळाले. कणाद आणि त्याचे पाच मित्र, त्यांचं कॉलेज संपल्यावर, नया गाव वस्तीत जाऊन या मुलांना शिकवू लागले. कॉलेज सांभाळून, इथं येऊन शिकवणं काहींना दगदगीचं वाटू लागलं – असे काही जण गळले, काही नवे स्वयंसेवक जोडले गेले. आणि कणादची ही ‘अनोखी पहल’ नया गावमध्ये रुजू लागली.

पण कणादला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्याला या उपक्रमाची व्याप्ती वाढवायची होती. वस्तीमध्ये एका वेळी आणखी विद्यार्थ्यांना शिकता येईल अशी जागा नव्हती. कॉलेज सांभाळून वस्तीपर्यंत शिकवायला येणं स्वयंसेवकांना धावपळीचं होत होतं.

मार्ग काढण्यासाठी कणाद सरळ जाऊन MNNIT च्या डायरेक्टर डॉ. राजीव त्रिपाठी यांना भेटला.

एरवीच्या तरुणाईच्या अनास्थेबद्दल निराश होणाऱ्या डॉ त्रिपाठी यांना कणादची संकल्पना, निर्धार भावला. त्यांनी संध्याकाळी ६ नंतर, MNNIT मधील वर्ग संपल्यावर, MNNIT मध्ये या मुलांना शिकवण्यास परवानगी दिली.

या परवानगीने दोन गोष्टी छान झाल्या. नया गावमधील भरपूर विद्यार्थ्यांना शिकवता येणार होतं आणि कॉलेजच्या स्वयंसेवकांना मुलांना शिकवण्यासाठी दूर जाण्याची गरज नव्हती. शे दीडशे विद्यार्थी या “अनोखी पहल”चा फायदा घेऊ लागले.

संध्याकाळची वेळ व्यवसायाच्या दृष्टीने गडबडीची आणि म्हणून महत्त्वाची. या वेळेला या शाळकरी मुलांची व्यवसायात जास्त मदत लागे. त्यामुळे पालक संध्याकाळी मुलांना शिकायला पाठवायला नाखुश असत. कणादने यावरही मार्ग काढला. दुपारी १२ ते २ या वेळात, जेव्हा MNNIT ला जेवणाची सुट्टी असे, त्या वेळात कणाद नया गावमध्ये जाऊन अशा मुलांना शिकवू लागला.

MNNIT मधील वर्ग रात्री ८ पर्यंत चालत. मग इतक्या उशीरा मुलं, विशेषतः मुली घरी कशा येणार अशी पालकांना काळजी होती. पुन्हा कणादने या विद्यार्थ्यांसोबत घरापर्यंत येण्याची जबाबदारी घेतलीही आणि निभावलीही.

कॉलेजला सुट्टया लागल्या. या मुलांचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी कणाद MNNIT लाच राहिला. “अनोखी पहल” सुरू राहिली.

सगळं छान रुळू लागलं होतं, ‘अनोखी पहल’चे विद्यार्थी चांगले गुण मिळवू लागले होते. निव्वळ शिक्षणच नव्हे तर उत्तर प्रदेशातील कडाक्याच्या थंडीला तोंड देण्यासाठी या मुलांसाठी मायेची उब आणि तशाच उबदार लोकरी कपडयांची सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांसाठी ‘अंत्योदय’ उपक्रमाअंतर्गत क्रीडास्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा (निबंधलेखन, quiz, काव्यलेखन आदि) आयोजित केल्या जाऊ लागले होते, सणवार साजरे केले जाऊ लागले होते…

… आणि करोना आला.

‘अनोखी पहल’चा चमू हटला नाही. डटून राहिला. शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेऊन त्यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. ‘अनोखी पहल’ आता MNNITचा अधिकृत उपक्रम झाला होता. संस्थेचे चार प्राध्यापक यात मदतीसाठी नेमले होते.

आता करोनाचे संकट गेले आहे. ‘अनोखी पहल’ जोरात, जोमात आणि जोशात सुरू आहे. विद्यार्थी उत्तमोत्तम यश संपादन करत आहेत, काही जण तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून खुद्द MNNIT मध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.

कणाद स्वस्थ बसलेला नाही, फक्त इथल्या उपक्रमाच्या यशावर संतुष्ट नाही. मिर्झापूर, उत्तर प्रदेश आणि IIT, खरगपूर  इथेही त्याच्या संवादातून आणि प्रेरणेतून हे उपक्रम यशस्वीरीत्या  सुरू झाले आहेत.

“हे असं फुटकळ पाच पन्नास विद्यार्थ्यांना शिकवून काय असा मोठा तीर मारला ?” असं काठावर बसून सल्ला देणारे, उंटावरून शेळ्या हाकणारे काहीजण विचारतीलही – त्यावर एक खूप छान कथा वाचली होती.

एका तलावाच्या काठावर काही मासे पाण्याबाहेर पडले होते, पाण्याअभावी तडफडत होते. एकजण एक एक करून ते मासे पुन्हा पाण्यात टाकत होता. दुसऱ्याने त्याला विचारलं, “अरे, इथे इतके मासे पडले आहेत. असे पाच पंचवीस मासे परत पाण्यात टाकून काय मोठा फरक पडणार आहे ?” 

पाण्यात पुन्हा दिमाखात पोहणाऱ्या एका माशाकडे पहात पहिला उत्तरला, ” त्या माशाला नक्की फरक पडला आहे. “

कणादच्या ‘अनोखी पहल’ ला हार्दिक शुभेच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावंच लागलं. मनात मात्र घरचं नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.

आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती. गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची.

गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली, ‘ताबा तस खै ?’ कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या गाडीची डागडुजी  करायला भीम गाडी घेऊन गेला.

कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं बाहेर आली. कुंतीनं आमचं स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला आणि आम्हाला बसायला त्यानं एक बाक आडवा केला. कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होतं. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होतं. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला.

माझ्या चेहर्‍यावरचं आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची सूत्र हातात घेतली. “दीदी, ही सगळी माझीच मुलं. ”  “तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची?” मी उडालेच. “हो. माझी, माझ्या पोटची. ” “पण.. आपला कायदा आहे ना.. दो या तीन.. ”  कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. “हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो. रोज कमावतो, रोज खातो. साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. “

त्यापुढे कुंतीने जे सांगितलं, ते या पृथ्वीतलावरचं वाटलंच नाही मला.

कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब. दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा सीमेवर पोचवण्याचं काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची-भाकरी सैनिकांसाठी पाठवायची. त्यांचा मोठा मुलगा राम, विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं. हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता. तिला मुलगा गेल्याचं दु:ख होतंच. पण मुलाची देशसेवा अर्ध्यावर राहिली, याची तिला जास्त खंत होती.

कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला. मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली, “दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. ” दोरजा म्हणाला, “पण एखाद्या मुलाला हे पटलं नाही तर. ” ” ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो. माझ्या दुधाचं हे मुलांवर असलेले कर्ज त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना. “आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला.

“चांगल्या  कामाला निसर्गही साथ देतो, दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना अंगाई म्हणून मी  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार गुणी आहेत. माझं ऐकतात. आमच्यासारखंच देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. ” मध्यंतरी भीमाची बहीण वारली. तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. “मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वांडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. “ती परत हसली. “सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. ” कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी भाकर्‍या कागदात बांधायला सांगत होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता.

हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर, एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली.

पण माझं नवरात्र हुकलं नव्हतं. आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.

कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या. माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.

लेखिका :डॉ. स्मिता दातार

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares