मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे.  प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव.  शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल  पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं.  गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय.  मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र!  प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत.  अगदी  महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे.  असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री.  या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)

☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा

नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।

 

हिर्‍यांची कटी मेखला दिव्य शोभे

आकाशगंगा सजविण्यास लाभे

शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या ।१।।

 

जरी रात्र काळी निशानाथ भाळी

किती कौतुकाने मिरवी झळाळी

रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।

 

रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

तृप्त शशांक धन्य ती रजनी

संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।

डाॅ. निशिकान्त श्रोत्री.

हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.

असून रंग काळा रुपेरी

हा साज सजली निशा

 नटूनी थटूनि  घेऊनि

 येईल धुंदी नशा …

यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी.  पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.

 *हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे

 आकाशगंगा सजविण्यास लाभे

 शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या …

 

प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.

कटी, हिर्‍यांची मेखला दिव्य शोभे

सजविण्यास आकाशगंगा लाभे

कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या…

खरोखरच ही चार चरणे  वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते

जे न देखे रवी ते देखे कवी

 किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!

 निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची  साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा  काळ्या निशेचा  हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे.  खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.

 जरी रात्र काळी निशानाथ भाळी

 किती कौतुकाने मिरवी झळाळी

 रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

 लपेटुनिया भवती दाही दिशा…

ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे!  तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.

 रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी  दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे.  ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.

  रजनीकांत प्रणये  निशा तृप्तझाली

  धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा…

वा! क्या बात है कविराज?  या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली  आहे.

ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..

हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!

समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!

खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!

अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।

निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे.  अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.  याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.

डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते.  निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे.  इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य.  इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये?  निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.

डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.

यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.

लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.

एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर.  प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे.  विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे.   दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे.  कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation)  दाद द्यावी तितकी थोडीच आहे.

रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे.  तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात.  गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे.  स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.

हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे?  कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच  काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का?  कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते.   कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला.  कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे.  असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.

या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे  कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

लेखक : श्री धनंजय देशपांडे

लातूर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सामान्यातील असामान्य…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ ll सामान्यातील असामान्य ll – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री विष्णू झेंडे

अखंड सावधान असावे! दुश्चित कदापि नसावे!

तजविजा करीत बसावे! एकांत स्थळी !!

– समर्थ रामदास.

रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री 10 च्या आसपासची वेळ होती. मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन’वर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.

पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले, आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault rifles घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.

श्री. झेंडे ज्याठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.

असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.

बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला, आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.

लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.

साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.

झेंडेंच्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.

नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले. त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवरदेखील गोळीबार चालू केला.

त्या गोळीपासून झेंडे बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं, आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.

सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.

त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास 52 लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता. एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.

अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सीएसटी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पाहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं 26/11 पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.

आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरीदेखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.

लेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छोटीशी कृती… — लेखक : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छोटीशी कृती… — लेखक : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

छोटीशीच गोष्ट असते एखादी. सहज शक्य आहे म्हणून कोणीतरी काहीतरी करून जातं आणि त्यातून दुसऱ्या शक्यता निघत जातात आणि अंतिमतः जो परिणाम असतो तो कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठा आणि सुखद धक्का देऊन जाणारा असतो. दिवाळीची पणती छोटीशीच असते, पण ती लावण्याची छोटीशी कृती आजूबाजूचा प्रत्येक अंधारा कोपरा उजळवून टाकणारी असते!

तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या साड्या पिकोला द्यायला म्हणून माझ्या नेहमीच्या दुकानात गेले होते.तिथे एका दुपट्यावर एक छोटंसं बाळ होतं. खूप मोठ्याने रडत होतं. मुलगी होती. आकारावरून तीन-चार महिन्यांची वाटत होती. तिच्या हातात दुधाची बाटली होती. पण मुलीचा वरचा ओठ दुभंगलेला असल्यामुळे तिला दूध नीट पिता येत नव्हतं.

‘कोणाची मुलगी आहे?’ मी विचारलं, तर प्रतिभा म्हणाली, ‘तिचे आई-बाबा मोठ्या भावंडांना घेऊन समोर डॉक्टरकडे आलेत. मोठ्याला ताप आहे आणि ही इतकी रडत होती की  आईला काहीच करता येत नव्हतं, म्हणून मीच तिला इथे ठेवायला सांगितलं. भूक लागली असेल म्हणून शेजारून बाटली आणि दूध आणलं, पण तिच्या ओठांमुळे तिला पिता येत नाहीये.’बाळ रडतच होतं, आम्ही दोघीही तिला गप्प करू पहात होतो. पण ती काही ऐकत नव्हती.

तेव्हढ्यात त्या बाळाची आई दोन जरा मोठ्या मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करून आलीच. मोठा पाचेक वर्षांचा, दुसरा अडीच-तीन वर्षांचा असावा. धाकटा आजारी असावा, कारण त्याचा चेहरा अगदी मलूल होता. दुकानात आल्या आल्या तिने मुलीला मांडीवर घेतलं आणि नीट दूध पाजायचा प्रयत्न करायला लागली. तापाने आजारी मुलगा अगदी तिला बिलगून उभा होता तर मोठा मुलगा पलीकडेच उभा होता. बाळाचं रडणं काही थांबत नव्हतं. उत्तरेतलं कुटुंब होतं. बिहारमधलं.

‘कितने महिने की है’? मी विचारलं. त्या बाईचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मला जे बाळ तीन-चार महिन्यांचं वाटलं होतं, ते चक्क आठ महिन्यांचं होतं! पण बाळाच्या क्लेफ्ट लिप मुळे ती नीट गिळू शकत नसल्यामुळे तिची वाढ खुंटली होती.

‘इसका ऑपरेशन हो सकता है, बच्ची बिलकुल ठीक हो जायेगी, पता है ना’? मी विचारलं. तर ती बाई म्हणाली, ‘पता है, डाक्टरने बोला है. पर खर्चा बहुत होगा ना, इसलिये पैसे जमा कर रहें हैं.’

तिचा नवरा एका सोसायटीत वॉचमन होता आणि पदरात तीन मुलं! तिच्याकडे सर्जरीच्या खर्चाला पैसे जमा होईपर्यंत अजून बराच काळ उलटून गेला असता! त्या बाईला मी अजून काही सांगणार तर ती म्हणाली ‘इनको आने दिजिये’. आता तिचे ‘इनको’ कुठे तरी कामाला गेले होते. ते परत येईपर्यंत ह्या केसमध्ये आपण काय मदत करू शकतो, ह्याचा मी विचार करत होते.

एकदम मला आठवलं, की माझ्या एका मित्राचा भाऊ आग्र्यामध्ये कॉस्मेटिक सर्जन आहे, तो अशा

 प्रकारच्या सर्जरी करतो, हे मला माहिती होतं. म्हणून मी लगेच त्याला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली. तो म्हणाला की स्माईल ट्रेन नावाची संस्था अशा सर्जरी करायला मदत करते. त्याने मला त्याच्या ओळखीच्या स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाचा नंबर दिला. मी त्याला फोन करून त्याच्याकडून पुण्याचा नंबर मिळवला. माझ्या डॉक्टर मित्रातर्फे कॉल गेल्यामुळे त्यांनी लगोलग पेशंटची सर्व माहिती लिहून घेऊन मला पुण्याच्या लोकमान्य इस्पितळाचा नंबर दिला.

स्माईल ट्रेनतर्फे होणाऱ्या पुण्यातल्या सर्व क्लेफ्ट लीप सर्जरी तिथे होतात. मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली, तोपर्यंत त्या बाळांचे बाबाही तिथे आले होते. त्यांना मी सर्व माहिती दिली. ते म्हणाले की त्यांची आठवड्याची सुट्टी बुधवारी असते. परत लोकमान्य मध्ये फोन करून बुधवारच्या ओपीडीची वेळ, हॉस्पिटलचा पत्ता, कुणाला भेटायचं, बरोबर कुठले केसपेपर आणायचे वगैरे सगळी माहिती काढून त्या जोडप्याला दिली. त्या मुलीच्या बाबांचा नंबर घेतला आणि मी माझ्या कामाला निघून गेले.

त्यानंतर फॉलो-अप करायला म्हणून दोन-तीन आठवड्यांनी मुलीच्या बाबांना फोन केला, तर त्यांनी उचललाच नाही. मग एकदा प्रतिभाला विचारलं तर ती म्हणाली की त्यानंतर ते आलेच नाहीत. पुढे काय झालं ते कळलं नाही म्हणून मला उगाचच चुटपुट लागून राहिली. स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाला फोन केला तर तो म्हणाला पुण्याची माहिती त्याच्याकडे नाहीये. मला काही दिवस ती मुलगी, तिचा तो दुभंगलेला ओठ आणि तिचं केविलवाणं रडणं आठवत राहिलं. पण नंतर माझ्या कामाच्या, प्रवासाच्या व्यापात मी विसरून गेले.

परवा अचानक दिवाळीच्या दिवशी प्रतिभाचा फोन आला. कामात होते म्हणून मी तो घेतला नाही. आज परत तिच्याकडे साड्या घ्यायला गेले होते, तर ती म्हणाली, खूप आनंदून की ‘त्या दिवशी त्या बाळाचे आई-बाबा आले होते, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. त्या बाळाचं ऑपरेशन झालं. आता ती व्यवस्थित दूध पिते, अंगाने पण भरलीये. ऑपरेशन एकदम फ्री मध्ये झालं, छान झालं म्हणून ते लोक सांगत होते’.

मलाही ऐकून खूपच आनंद झाला. न राहवून मी लगेच परत त्या मुलीच्या बाबांना फोन लावला. परत कोणी उचलला नाही. पण थोड्या वेळाने त्या मुलीच्या आईचाच फोन आला. ’कैसी है बेटी?’ विचारल्याबरोबर ती धो-धो बोलत सुटली. मुलगी आता व्यवस्थित होती, नीट दूध पीत होती, सॉलिड खाणंही आता हळू हळू सुरु केलं होतं त्यामुळे अंगा-पिंडाने सुधारली होती. दिवाळीसाठी ते पूर्ण कुटुंब आता गावी बिहारला गेलं होतं. ‘तीस तारीख को आयेंगे ना दीदी तब आपसे मिलने जरूर आयेंगे, बहुत बहुत धन्यवाद आपका’. आनंद नुसता निथळत होता तिच्या स्वरातून.

मीही तिच्या आनंदात उजळून निघाले होते. रस्त्यावर चालता चालता माझ्या चेहऱ्यावर इतकं मोठं हास्य होतं की येणारे जाणारे थबकून बघत होते. खरंतर मी खूप मोठं असं केलं काहीच नव्हतं. मी फक्त माझा थोडा वेळ आणि माझा शब्द वापरला होता.

ऑपरेशन लोकमान्यच्या डॉक्टरांनी केलं होतं, खर्च स्माईल ट्रेनने केला होता. पणती वेगळ्याच कुणाची होती, तेल कुणी दुसऱ्याने टाकलं होतं, ज्योत पेटवणारे हात तिसऱ्याचे होते, फक्त ज्योत पेटवणासाठी लागणाऱ्या काडीचं काम माझ्या हातून झालं होतं. पण त्या पणतीचा प्रकाश मात्र आमची साऱ्यांचीच मनं उजळवून गेला होता.  यंदाच्या दिवाळीची ही मला मिळालेली  सर्वोत्तम भेट!

लेखिका:सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याच्या पुस्तकातून… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आयुष्याच्या पुस्तकातून? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पु.ल.देशपांडे यांच्या नाटकातला एक प्रसंग आठवला. एका केसचा साक्षिदार म्हणून एका स्त्रीला साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे केलेले असते. वकील नाव विचारतात ती नाव सांगते. पुन्हा वकील तिला म्हणतात वय? तर ती बाई म्हणते, आता गरीबाला कसलं आलय वय? आन अडाण्याला कसली आलीय जन्मतारिख?

कोर्टात एकच हशा. असो यावरून प्रश्न पडला अडाणी कोणाला म्हणायचे? अडाणी लोक पण अनुभवाचे बोल बोलताना सहज म्हणतात, नुसतं शाळा कालेजात जाऊन चार पुस्तकं वाचून शानपन येत नसतं•••

मग शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध आहे का? असेल तर वरचा डायलॉग का बोलला जातो? नसेल तर मग माणूस शिकतो का? अर्थातच शिक्षण म्हटले की पुस्तकांचा संबंध येतोच. मग एवढी शेकड्याने पुस्तके वाचून, हाताळून जर शहाणपण आले नाही म्हणत असतील तर असे कोणते पुस्तक आहे जे अशिक्षीत लोकही वाचून शहाणपणाच्या गोष्टी करतात?

मग लक्षात आले, प्रत्येक चराचराचे आयुष्य म्हणजे त्या चराचराचे पुस्तकच नाही का? अनुभवाचे गुरू प्रसंगांच्या पानातून हे पुस्तक ज्याचे त्याला शिकवत असतात. त्याच अनुभवाच्या जोरावर शिकलेले ज्ञान त्यांना शहाणपण देत असते. म्हणून शाळेत न गेलेली व्यक्ती अशिक्षित असू शकेल पण अडाणी नाही.

किती महत्वाचे असते ना हे पुस्तक? जन्माचे मुखपृष्ठ आणि मृत्यूचे मलपृष्ठ घेऊन आलेले पुस्तक ज्याचे त्यानेच लिहायचे असते.

पुस्तके जशी वेगवेगळ्या विषयाची, वेगवेगळ्या लिखाणाची वेगवेगळ्या प्रकाराची असू शकतात तशीच प्रत्येकाच्या आयुष्याची पुस्तके वेगवेगळी असू शकतात पण या एकाच पुस्तकात सगळ्या प्रकारची सगळ्या विषयाची प्रकरणे असतात.

कधी त्यात दोन ओळी, तीन ओळी, चारोळी, कविता,गझल,मुक्तछंद सारख्या असंख्य कविता मिळतील

तर कधी, पॅरॅग्राफ, लेख,निबंध, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे लिखाण मिळेल.

प्रत्येक पान हे उत्सुकतेने भरलेले असते. मधे अधे लिखाणाला पुरक अशी चित्रे मिळतील. लेखनातील पात्रेही किती केव्हा कशी पुढे येतील हे खुद्द लेखकालाही माहित नाही.

प्रत्येकालाच असे पुस्तक लिहावेच लागते.

मग अशी पुस्तके काळाच्या पडद्याआड गेली की काही दिवस हळहळून ही विस्मरणात पण जातात.

पण खरे सांगू? प्रत्येकाने आपले पुस्तक लिहीताना आपल्या पुस्तकाची प्रत कोणाला काढावी वाटेल असे लिखाण केलेले असावे. या पुस्तकाचा आदर्श कोणीतरी घ्यावा असे लिखाण करून मग आपले पुस्तक बंद करावे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  

“मावशी,अगदी थोडं दुखेल हं म्हणत सुनंदाने मला इंजेक्शन दिलं मला रोज इंजेक्शनची सुई टोचवायची म्हणून तीच हळहळायची.

मी म्हटलं,”अगं तू इंजेक्शन देत्येस म्हणून तर मी बरी होत्ये ना.गेला महिनाभर तू माझी किती काळजी घेत्येस. या सुईने तर तुझं आणि माझं इतकं छान  नातं जोडलंना गं बाई “.

तिने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली,

“मावशी तुम्ही आयुष्यभर या सुईसारखी किती प्रेमाने नाती जोडली आहेत ऐकतेय ना मी पण, तुम्हाला भेटायला येणार्या लोकांकडून”.

” हो गं बाई, मी आपली माणसं  जोडण्याचं काम करत राहीले हेच माझ्या आवडीचं काम “.

“पण तुला गंमत सांगू का?”

“नाही,पण तुला वाटेल, काय म्हातारी बडबड करतेय, पण तू आहेस ना  गं माझं ऐकायला म्हणून बोलावसं वाटतय “.

इतर वेळेस कोण असतं इथे ?कामापुरतं येतात निघून जातात.

सुनंदा म्हणाली,” नाही मावशी बोला ना मला आवडेल ऐकायला” 

मग मी सरसावलेच,” अगं एकटीच असले ना की काही बाही सुचतं बघं. आत्ता तू सुईचा विषय काढलास ना तर मला नेहमी वाटतं माणसानेच तर सुई शोधली त्यात त्याचे गुण येणारच.

बघ ना….

घरात बाई सगळं जोडते शिवते  बारिक सुईने अगदी बारीक दोरा घालून जसं कुणालाही न दुखवता ती घरातली नाती जपते आणि ती दृढ करते.

पण घरात सुद्धा सगळ्यांना एकच सुई चालत नाही आई बरोबर वेगळ्या सुया वापरते.

 त्या सुईचा एक भाऊ असतो बघ दाभण नावाचा,जाड गोणपाट शिवायला वापरतात बघ.

 जेव्हा दांड मुलं निबर तनामनाची असतात तेव्हा बारिक सुई नाही कामाची तिथे दाभणच पाहिजे दोन दणके धाकदपटशा लागतोच.

ते आईला बोबर ठाऊक असतं जे सगळ्यांना ताळ्यावर आणून एकसंध ठेवेल.

वाकळ गोधडी शिवताना बघ जरा लांब सुई लागते.

खूप अंगभर टाके घालायचे असतात ना.

जेव्हा सर्वांना एकत्र बांधून एकमेकांना एका बंधनात ठेवायचं तेव्हा अशी लांब सुई सगळ्यांना एकत्र बांधून एकमेकांना नात्यांची उब द्यायला शिकवते बघ.

आणि ती क्रोशाची सुई पाहीली आहेस का तू ?

अगं खूप काम केलं मी त्यावर.

त्या सुईला नेढं नसतं बरका नुसता थोडसं नाक वाकवून तो भास केलेला असतो पण धागा बरोबर अडकतो बघ त्यात अशी माणसं असतात बघ फार न गुंतता आपल्या जवळ हात धरुन  ओढून पण छान सुबक जाळीदार काम करुन दाखवणारी पण चटकन वेगळी होणारी जेवढ्यास तेवढं वागणारी त्यांना सौंदर्य असतं पण नात्याची उब नसते.

फार गुंतत नाहीत ती कुठं.  

आणि जरा कुठे एखादा धागा निघाला की पार सगळं कसं सहज उसवत जातं कळतच नाही.

आणि शेवटीss तुमच्याss विणकामाच्या सुयाss त्याना का सुया म्हणतात ?नाही नेढं नाही टोक. मला तर आजकाल event साजरे करणारे असतात किनई ते अश्या सुयांसारखे वाटतात.

अगदी कुणालाही न दुखवता सगळ्यांना पटापट हलवत राहतात एकमेकात गुंतून काम करत असतात तेव्हा असं वाटतं अगदी गळ्यात गळा वाटतो पण काम झालं की प्रत्येक जणं इतका वेगळा होतो की इथे थोड्या वेळापूर्वी अगदी एकमेकांजवळ येऊन  काही छान प्रसंग उभा केला होता असं वाटतच नाही.

कुठेही गाठ नाही सुई टोचल्याची खूण नाही.

कर्तव्य म्हणून सारं काही.

जशी  विणकामाच्या बाबतीत पण गंमत आहे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत उब.

दोन सुया दोन हातात नाचत नाचत धागे जोडत उब तर निर्माण करतात पण…पण सुईतून एक धागा ओढत गेलं की सगळं विणकाम उसवलं की तिथे काही दिसतच नाही काही विणलं होतं का नाही ते. अगदी तसच.

मध्ये कुठे नात्यांच्या गाठी बांधलेल्याच नसतात या सुयांनी पण खरी सुई कुणाची सांगू तुमच्या डॉक्टर लोकांची.

त्यांना साक्षात दंडवत बघ.

माणसाचं फाटलेलं शरीर जोडून परत एकसंध करणं सोपं नाही किती बारिक दोरा त्यांच्या चिकाटीचा,किती बारिक सुई त्यांच्या ज्ञानाची, अलगद हाताने टाके घालणं आणि परत ते आत विरघळून जातील असं पाहणं हे फक्त देवाचे हातच करु शकतात बघ.

त्यांची सुई पुनर्जन्म देते गं रुग्णाला आणि तुमच्यावरचा म्हणजेच देवावरचा आमचा विश्वास दृढ करते.

एकच वाईट वाटतं बघ इतक्या  सुयांनी किती मदत केली आपल्याला…..

पण बाप्पाने, डोक्यावरच्या फाटक्या आभाळाखालचं एखाद्याचं  फाटकं नशिब शिवायची सुई दिली नाही बघ माणसाला…….

“सुईबाई गं… तुलाही वाईट वाटत असेल ना मी इतकं सगळं शिवते मग मला असं नशिब का नाही शिवता येत?” 

दुवा तरी मिळाला असता.

सुनंदाने पाहिलं मावशी  आपल्याच तंद्रीत होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते 

ते पाहून सुनंदालाही आपला कढ आवरावा लागला….

तिला वाटलं किती दुखण्यातूनही यांनी मन संवेदनशील राखलय.

असं जगावं आजूबाजूचं जग न्याहाळत त्यातील गंमती शोधत.

लेखिका : सौ. नीलिमा लेले.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऋग्वेद व ग्रामोफोन… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ऋग्वेद व ग्रामोफोन… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

२० नोव्हेंबर १८७७ रोजी एडिसनने पहिला आवाज मुद्रित केला. व तो ग्रामोफोन वर पुन्हा वाजवून दाखवला. अशा प्रकारे ध्वनीचेही मुद्रण म्हणजे तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकता येऊ शकतो.

मथळा वाचून आपणास प्रश्न पडेल की ऋग्वेदाचा व ग्रामोफोनचा काय संबंध?

जगातील पहिला आवाज रेकॉर्ड झाला तो मँक्समुल्लर यांच्या आवाजात.

आवाज रेकॉर्ड करुन पुन्हा ऐकवायचा प्रयोग इंग्लंड मधे एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

मॅक्समुल्लर यांना एडिसनने खास जर्मनीहून बोलावून घेतले होते. 

मँक्समुल्लर यांनी पहिल्याच रेकॉर्डींगला ऋगवेदातील पहिली ऋचा ‘ अग्नीमिळे पुरोहितम् ‘ ही म्हटली.

ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. हिंदू धर्मातील चार वेदांमध्ये ऋग्वेद हा प्रथम वेद आहे. ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून ऋग्वेदाची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते.

तसेच ऋग्वेद संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ आहे असेही मानले जाते. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल सुमारे इ.स.पू.५००० च्या सुमारासचा असावा असा लोकमान्य टिळक यांनी मांडलेला अंदाज आहे. ऋग्वेदाची मांडणी व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली.

ऋग्वेदातील सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. ‘अग्निमिळे पुरोहितम्’ हे ऋग्वेदाचे पहिले सूक्त आहे.

पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सुरू झाली.

ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे.

ऋचा रेकॉर्ड झाल्यावर पुढिल प्रक्रियेला काही कालावधी लागला. मधल्या काळात मँक्समुल्लर यांनी म्हंटलेली ऋचा ,त्याचा अर्थ, ऋगवेद व इतर वेद ,संस्कृत भाषा ,हिंदू संस्कृती या बद्दल विवेचन केले.

जगातील पहिल ध्वनी संदेश हा वेदातील ऋचा आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.  

महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन व मँक्समुल्लर यांना अभिवादन।।।

लेखक : अनामिक

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला आठवतंय,

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपणसुद्धा !

भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची.

    

आता तसं नाही.

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !

खूप महाग झालंय बालपण !

   

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती.

फुल टाईम ‘आईच’ असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय.

जॉबला जातेय हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते!

मित्रसुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं ‘बट्टी’ म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी !

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”

मैत्री बरीच महाग झालीय आता.

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय.

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

  

एवढंच काय, तेव्हाचे

आमचे संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले.

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात,पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची.

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं !

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं !

  

कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं.

पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

   

म्हणून म्हणतोय, आहोत तोवर आठवत रहायचं.

नाहीतरी ह्या स्मृतीगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

मध्यंतरी एका कार्यक्रमाला जायचा योग आला तेव्हा त्यांनी माझा परिचय करून देताना माझ्या बद्दल काही माहिती सांगून ओळख करून दिली.तेव्हां जरा लक्षात आल एकाच व्यक्तीची किती वेगवगळ्या प्रकाराने ओळख दडलेली असते.ती ओळख कधी नात्यातून तर कधी आपण करीत असलेल्या कामावरून तर कधी कधी आपला स्वभाव, आपला जनसंपर्क ह्यावरून ठरत असते.

एकदा नोकरीत असतांना सर्व्हिस बुकमध्ये बोटांचे ठसे घेतले तेव्हाही ही आपली अजून एक ओळख हे ध्यानात आले.  इंशुरन्स पाँलिसी काढतांना ओळख म्हणजेच आयडेंटिटी मार्क विचारतात ही पण एक ओळखच. अशा निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या एकाच व्यक्तीच्या ओळखी बघुन अचंबित व्हायला झालं.

सहजच मनात आलं खरचं एवढीच असते आपली ओळख?आपली आयडेंटिटी?नक्कीच नाही.

मग ठरवलं आपली ओळखं आपली आयडेंटिटी आपण स्वतः तयार करायची.

सहसा घरच्या सगळ्या जबाबदा-या पार पाडता पाडता स्त्रीला स्वतः चा विसरच पडतो आणि मग इतर लोक जसे तिला गृहीत धरायला लागतात तसेच ती पण स्वतः ला गृहीत धरायला लागते.

कोणाची बायको,कोणाची आई म्हणून ओळख असणं आनंद देतचं पण आपल्या ओळखीला परिपूर्णता तेव्हाच मिळते जेव्हा आपली आपल्या स्वतःवरून ओळख पटते.

तिचं सगळं वागणं,बोलणं,आवडनिवड,सोयी ह्या सगळ्या घरच्यांचा आधी विचार करूनच ठरल्या जातात.अर्थात हा तिच्या स्वभावाचाच भाग असतो.ह्याचे प्रमाण सिमीत असेल तर तिला त्यात आनंदही मिळतो. ह्या गुणांमुळे घर एकत्र बांधून ठेवायला मदतच होते. पण ह्याचा अतिरेक झाला तर ती स्वतः मधील “स्व” च विसरते.

ह्याचाच परिणाम म्हणजे स्वतःचा स्वतः वरील विश्वास उडतो म्हणजेच आत्मविश्वास कमी होतो. लहानसहान बाबींमध्ये सुध्दा दुसऱ्या वर अंवलंबून राहायला लागतो.

समोरच्यांच्या मतांचा आदर जरूर करावा पण तेवढेच आपल्या मतांनाही प्राधान्य द्यावे.

शेवटी काय तर आपण केलेले कर्म आणि करीत असलेले कार्य च खरी दाखवतात आपली आयडेंटिटी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares