☆ “हिरवा निर्सग हा भवतीने… जीवन सफर करा मस्तीने…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
ये ये आलास! .. अरे इकडे इकडे बघ वेड्या.. मी बोलवतोय तुला… इतक्या कडकडीत उन्हातान्हातून, धुळवटीच्या फुफाट्यातून तंगडे तोड करुन कुठं बरं निघालास.. बरं निघालास ते निघालास घरी सांगून सवरुन तरी निघालास आहेस ना.. कुठं जाणारं आहेस.. किती लांब जाणार आहेस.. कसा जाणार आहेस.. परत कधी येणार आहेस… घरी विचारलेल्या तुझ्या मायेच्या माणसांच्या प्रश्नांची नीट उत्तरे दिली आहेस ना.. नाहीतर ते उगाच तुझ्या काळजीत पडतील… दिवसभरात दिसलास नाहीस आणि अंधार पडल्यावर घरी परतला नाहीस तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल…. बघं मी सुद्धा किती किती प्रश्नांचाच भडिमार करतोय तुझ्यावर नाही का… अरे अजूनही तू उन्हातच का उभा राहिला आहेस… घामाने सगळंच अंग तुझं चिंब झालयं की… आणि चेहरा तर किती क्लांत झालेला दिसतोय… उन्हाच्या तावाने चेहरा लाल लालबुंद झालाय.. जसं काही घरातल्या माणसांवर रागावून चिडून संतापून तडकाफडकी घरा बाहेर पडलेला असावास असाच दिसतोस.. अरे ये रे या माझ्या हिरव्यागार थंड सावलीत येऊन बैस जरा.. हं हं त्या तापलेल्या मातीच्या पायवाटेवर बसू नकोस… या शांत हिरव्यागार कोमल अश्या तृणपातीवर बैस… वाटल्यास जरा पहुडशील… उन्हाच्या कावात चेचले अंगाला जरा थंडावा लागू दे.. वाऱ्याची झुळुकेने घाम सुकून गेला की थोडं तुला हायसं वाटेल.. बाहेरच्या रखरखीने मनात उसळलेल्या रूखरूणाऱ्या काळजी चिंता या इथं बसवल्यावर बघ कशा निभ्रांत होऊन जातील त्या… आणि हो आल्या आल्या तू मला सगळं सांगावासं असं माझं बिल्कुल म्हणणं नाही बरं… मला ठाऊक आहे ते.. तु घरापासून किती लांब आला आहेस.. एकही गोष्ट तुझ्या मनासारखी कुठेच कधीही घडून येत नसल्याने आणि तरीही सगळ्या गोष्टीला तुचं जबाबदार असल्याने.. कारण तुझं उत्तरदायित्त्व तुलाच निभाऊन न्यायला हवं असताना.. काळ किती प्रतिकुल असताना.. सगळंच प्रतिकुल घडत जातयं हे समोर दिसताना आपण किती हतबल आहोत याची जाणीव जेव्हा होते… तेव्हा राग, संताप, अनावर होतो… वादाच्या ठिणग्याने वणवा पेटतो तेव्हाच कुठलाही माणूस डोक्यात राख घालून घराबाहेर पडतोरे पडतोच.. जाउ दे सारे मसणात हाच टोकाचा विचार येतो मनात आणि पाय नेतील तिकडे माणसाचा दिशाहीन प्रवास सुरू होतो.. बाहेरही उन्हाळा आणि मनातही उन्हाळा… या उन्हाच्या लाही लाहीने जीव नकोसा होतो… वाटेत कुणी भेटलं.. का बरं म्हणून विचारलं तरी वाळली चौकशीने सुद्धा जखमेवरची खपली निघाल्यासारखी वाटते.. त्याचा सुद्धा अधिकच त्रास वाटतो… पण तू माझं ऐकलास इथं सावलीत घटकाभर बसलास मलाच फार फार बरं वाटलं बघं… इथं तुला गारव्यानं तनाला नि मनाला विश्रांती मिळाली.. मस्तक नि मनही शांत झालं.. डोळे ही निवले.. आणी संतापलेल्या विचारांचा धूरळाही खाली बसला असच दिसतयं तुझ्या या देहबोलीतून..
आता अविचार सोडून देऊन पुन्हा परतीचा घराकडचा मार्ग धरावास.. संध्यासमय जवळ येत चालला आहे.. आणि तुझ्या येण्याकडे तुझी घरातली सारी तुझी माणसं वाटेला डोळे लावून बसलेत…. कारण त्यांना तू आणि तूच हवा आहेस.. तुझ्या शिवाय त्यांना दुसरा कुठलाच आधार नाही हे तुलाही चांगलचं ठाऊक आहे… तेव्हा तू असाच घरा कडं जा.. आणि पुन्हा म्हणून अविचाराने असं पाऊल उचलू नकोस….
आज मी तुझ्या आजोबांनी लावलेल्या या झाडाने तुझी होत असलेली तगमग ओळखली म्हणून तुला या टोकाच्या निर्णया पासून परावृत्त तरी करु शकलो… तुझ्या आजोबांनी अगदी हाच विचार समोर ठेवून मला म्हणजे झाडाला उभं केलं.. वाढवलं.. त्यांना देखील तसाच अनुभव आलेला असणार… आणि असही वाटलं असणार की पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीलाही असाच अनुभव येत राहणार त्यात बदल काही होणार नाही तेव्हा त्या सगळ्यांना शांतता मिळावी विचारात परिवर्तन व्हावं असं वाटून मला इथं वाटेवर उभं करून गेलेत… मगं मी देखील पहात असतो असा कुणी रंजलेला गांजलेला पांथस्थ या वाटेवरून जाताना दिसतो का ते…. पण तू पुन्हा असं केलास आणि दुसऱ्याच रस्याला गेलास तर न जाणो माझ्या सारखं कुठलं झाडं तुला वाटेत भेटेल न भेटेल… पण माझी तुला सतत आठवण रहावी असं वाटंत असेल तर तू मात्र एक करू शकशील या गावाच्या माळरानाच्या वाटेवर माझ्यासारखी कितीतरी झाडं लावू शकशील की जेणेकरून त्याच्या सावलीत हिरव्यागार थंडाव्याने तिथं येणाऱ्या पांथस्थांना सुख समाधानाचा लाभ होईल…
शिक्षण – बी.एस.सी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हाॅस्पिटल मॅनेजमेंट.
छंद:—
ऑइल पेंटिंग, गायन, वादन.
आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललितबंधिंचे सादरीकरण व अभिवाचन.
विविधा
☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी☆
जगात शुभंकराकडं जसं मन आकृष्ट होतं, तसंच भयंकराचं देखील वेगळं आकर्षण आहे. लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा ठेवत प्रथम बाऊची आणि नंतर बागुलबुवाची भीती दाखवली जाते. या भीतीनं मनाचा एक कप्पा व्यापला जातो. लहान मुलं रडता रडता आपण कशासाठी रडत होतो हे विसरतात. त्यांच्या डोळ्याचे रांजण कोरडे पडतात. आवाजाची तान शिथिल होते, पण मायेची माणसं जवळ असल्याने अपेक्षा मात्र पूर्ण होते हे नक्की…. वय वाढेल तसं भीती एक मानसिकता होते. मनाला जाणवणारी संवेदना असते ती. अनाठाई भीतीनं विचारांचे पंख कापले जातात. भीतीनं कापरं भरलेलं मन, ‘सिदन्ती मम गात्राणी मुखम् च परिशुष्यते’ अशी तक्रार करायला सुरुवात करतं. मन पुट पुटायला लागतं ‘भय इथले संपत नाही. ‘ भयानक हा स्थायीभाव असणारा हा रस नवरसातला एक… जणू लाव्हाच!
आयुष्याला एक शिस्त असावी म्हणून माणसाने देव, धर्म, नियमावली, जाती, समाजमान्यता या भयांना जन्माला घातलं. मुकपणे पाहणाऱ्या या निसर्गाला देखील माणूस खाऊ की गिळू असं करू लागला. म्हणूनही ही बंधने असावीत. हास्य रस हा केवळ मनुष्य प्राण्यात स्त्रवतो परंतु भयरस मात्र समस्त प्राणिमात्रात दिसून येतो. साहित्यसृष्टीही या रसाने व्यापून गेली आहे. केवळ भयकथा लिहिणारे लेखक प्रसिद्ध आहेत. चित्रपट सृष्टीतील भयपटांचा एक चाहतावर्ग आहे. मृत्यू, सूड, खून, मारामारी, रक्तरंजित कथा यांचे सिनेमे पाहणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. ‘भुताचा पिक्चर सुपरहिट’ हे समीकरण बनलंय. आताशा माणसं भुतांना घाबरत नाहीत. ती स्वतःच चालती-बोलती भूतं झालीत. माणूसच माणसाला घाबरायला लागलाय. पूर्वी भुतं तरंगायची पण आता माणसंच हवेत असतात. त्यांचेच पाय जमिनीला लागत नाहीत. ती स्वतः भूतं झालीत. मारामाऱ्या, युद्ध, मृत्यु, खून, सूड यांची शस्त्र घेऊन ही भूतं पृथ्वीवर नंगा नाच करू लागलीत. त्यांच्यावर इलाज करणारा यांत्रिक बोलवायला हवा. ही भूतं निसर्गालाही डिवचतात. त्यानं निसर्गाचाही कोप होतो. निसर्गाची प्रतिक्रिया म्हणून पाझरलेला भयरस तर अति दाहक! आताशा नवरसातून निर्माण झालेले राग, द्वेष, त्वेष, मत्सर, लालसा, अहंकार यांची भूतं मनाच्या रंगमंचावर नंगानाच करू लागली. आयुर्वेदात भयज्वर भयअतिसार अशा रोगांवर भयचिकित्सा सुरू झाली आहे आहे हे आपल्या संस्कृतीचं दुर्दैव आहे..
मोठे होऊ तसं बाऊ गेला… बागुलबुवा गेला. नंतर आला करोना नावाचा गब्बर सिंग! ! जो डर गया वो मर गया असं म्हणून थैमान घालू लागला. भितीची अनेक रूपं दाखवू लागला. भीतीतून अस्वस्थता वाढू लागली आणि अनामिक विचारांना मोकाट वाव मिळाला. आणि मग उत्तराऐवजी नवीन प्रश्नच निर्माण झाले. समाजाच्या अवहेलनेची भीती, जिथे जिथे आपण जोडले गेलोय तो जोड तुटण्याची भीती. आर्थिक विपन्नतेची भिती अपयशाची, अज्ञानाची, अज्ञाताची, निर्णय चुकल्याची अशा अनेक भीतीने जीव ग्रासून गेलाय.
जीवन आव्हानांचा सागर आहे त्याकडे कसं पाहायचं लढून म्हणजेच फाईट करून की पळून जाऊन म्हणजे फ्लाईट घेऊन की फ्राईट होऊन म्हणजे थिजून हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा भयरस आटेल.. आणि तो मनकंपनास कारणीभूत होणार नाही…
गणेशोत्सव बघायला बाहेर पडल्यावर दणकून चालल्यावर सणकून भूक लागायची. अर्ध शतकापूर्वी पुणेकरांनाही बाहेरचं खाण्याचा शौक होता, पण अर्थाजनाला मर्यादा असल्यामुळे पदार्थ घेण्याला आणि खाण्यालाही निर्बंध असायचा. आप्पा बळवन्त चौकातून पुढे गेल्यावर भडभुंजाची भट्टी लागते. आतल्या बाजूला सतत भट्टी रसरसलेली असायची. 1 की. ज्वारी तांदूळ घेऊन, आई, काकू तिथून लाह्या फोडून आणायच्या. लालबुंद झालेल्या मोठ्या कढईत वाळू टाकून त्यात जोंधळे टाकले की फटाफट चांदण्यासारख्या चांदणी आकाराच्या शुभ्र लाह्या उमलून यायच्या. एरवी कंटाळा करणारे आम्ही, इथे मात्र आवर्जून जायचो कारण वाळूच्या उबेतून बाहेर पडलेले गरमागरम चणे फुटाणे, लाह्यांचे प्रकार बोकणा भरून खाता येत होते ना! म्हणून तर ही धडपड. तर अशा भडभुंज्याकडे हारीनें लावलेली आमच्या बजेटमध्ये बसणारी, कोरडी भेळ घेऊन आम्ही गणपती बघायला बाहेर पडल्यावर, पायाबरोबर तोंडही चालायचे. आमच्या मोठ्या बहिणी, जातांना बरोबर वर्तमानपत्र घ्यायच्या. नाहीनाही! वाचायला नाही हो! भेळ पसरून खायला पेपर हवा ना, अहो! तेव्हा कुठे होत्या पेपर डिश ? एखाद्या ओट्यावर ठाण मांडून कागदावरच्या कोरड्या भेळेच्या दहा मिनिटात फडशा पाडत होतो आम्ही. भेळ वाल्याकडची सणसणीत मिरची खातांना डोळे पांढरे झाले तर, बरोबर घेतलेल्या प्रवासी फिरकीच्या तांब्यातलं पाणी एका दमात रिकामं व्हायचं. तेव्हां काही आता सारखा बिसलेरीचा शोध लागला नव्हता. आमचा आपला स्वच्छ, चकचकीत घासलेला फिरकीचा तांब्याच बरा होता. पुण्यात सगळे गणपती बघायला, अगदी अख्ख पुणं पालथं घातलं जायचं. खाऊ गल्लीतली कोपऱ्यावरची हॉटेलं आम्हाला खुणवायची हो! पण बजेट ? हॉटेल बिल बसायला हवं ना त्यात! मग काय भेळेवरच भागवून आम्ही पुढे सरकायचो.
टिळक रोडवरचं जीवन, बादशाही, फडतरे चौकातले स्वीट होम, सदाशिव पेठेजवळचं पेशवाई, दत्त उपाहारगृह, आनंद विलासची मिसळ, घावन, संतोष भुवनची पुरी भाजी आणि बेडेकरांची प्रसिद्ध मिसळ हे सारं सारं काही नजरेआड करून प्रभा विश्रांती गृहाकडे आमचे पाय वळायचे. कारण तिथला बटाटेवडा स्वस्त आणि मस्त असायचा. तो वडा मात्र आम्ही दणकून हादडायचो. कारण तो चवदार आणि फ्रॉकच्या खिशाला परवडेल असा म्हणजे फक्त चार आण्याला मिळायचा. चवीला चवदार चटणी असायचीचं वाढणाऱ्याला जरा मस्का मारला की दोन चमचे चटणी जास्तच मिळायची.
श्रीमंत पोरं मात्र केसांचा कोंबडा उडवत, बापाच्या पैशावर, सिगरेटचा धूर सोडत, इम्प्रेशन पाडायला पोरींना रीगल, गुडलक कॅफे, सनराइज, पुना कॉफी हाऊस, मध्ये स्पेशल ‘च्या’प्यायला घेऊन जायची. सोळाव्या वरीसातलं धोक्याचं पाऊल, या रेस्टॉरंट मध्येच घसरायचं. म्हणजे प्रेमात पडायचं. त्यावेळी ‘मेळे’ असायचे. गजानन वाटवे, जोस्ना भोळे यांचा कार्यक्रम ऐकण्याऐवजी, ‘केला इशारा जाता जाता ‘करण्यातच प्रियकर प्रेयसींचा वेळ जायचा. तिकडे चोरून बघत कानाडोळा करुन आम्ही आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी परिसरात यायचो. पण घरी परततांना अचरबचर न खाण्याने, मन आणि पोट शांत असायचं.
जास्तीत जास्त पाच रुपये खर्च करणारे आम्ही, आजच्या पिढीला दोन, पाच हजार खर्च करून बिल देतांना बघतो नां, तेव्हां आम्ही अचंबित होतो. बाई गं! खाण्यावर हा केवढा खर्च?त्यांचेही बरोबर आहे म्हणा खाण्याचे दिवस आहेत त्यांचे. आणि मिळवतायेत पण ते तेवढे पैसे. माझ्या भावाला शरद आप्पाला आणि बहिणीला लीलाला कुलकर्णी भेळ फार आवडायचीनु. म. वि हायस्कूल कडे जातांना आनंदाश्रमाच्या अलीकडे छोट्याशा कोपऱ्यात श्री. कुलकर्णीनी आपला भेळेचा संसार मांडला होता. वाहनं चुकवत ओल्या वेळेचे बोकणे भरतांना भेळ खाणाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडायची पण ती ‘हटके’ भेळ खायला लोकं सहाच्या आत धडपडत हजेरी लावायचीचं. कुलकर्णी भेळ, गोड आणि चविष्ट बनवायचे पण त्यांच्या जिभेवर मात्र तिखट होतं. त्यांचा काटेकोर नियमच होता, सहानंतर, भेळेच दुकान बंद होणार आहे. सहाच्या पुढे काटा गेल्यावर ते स्पष्ट सांगायचे, “वेळ संपली, आता तुम्ही निघा. उद्या भेटू. ” शिष्ठ वाटणारे हे कुलकर्णी मनाने उमदे होते. दुर्दैवाने माझा भाऊ स्वर्गवासी झाला. त्याची नेहमी तिथे हजेरी असायची. माझ्या वडिलांची काही उधारी तर राह्यली नाही ना?असं विचारायला नंतर माझा भाचा हेमंत त्यांच्याकडे गेला व वडील नसल्याची दुःखद बातमी त्यांनी कुलकर्णींना सांगितल्यावर ते ताडकन उठले, हेमंतला जवळ घेऊन सगळ्यांसमोर उभं करून म्हणाले, ” ह्याला म्हणतात संस्कार. शरद माजगावकरांनी कधीच उधारी ठेवली नाही. लोक उधारी बाकी ठेवतात, पैसे बुडवतात. तोंड लपवतात पण हा त्यांचा मुलगा वडिलांच्या पश्चात त्यांची उधारी राह्यली आहे का? हे विचारायला इथे आला आहे. अशी पितृऋण फेडणारी मुलं ह्या जगांत आहेत. मग तुम्ही सांगा! कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे म्हणून. सगळे गिऱ्हाईक कुलकर्णीच्या कौतुकाने भारावले. आणि माझ्या भाच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अशी होती ती सुसंस्कारित त्यावेळीची पिढी. त्यांच्या संस्काराच्या पायावर आजच्या आदर्श पिढीची इमारत उभी आहे, नाही का! भेळवाल्या कुलकर्णींना आणि वाचकहो तुम्हालाही धन्यवाद.
आम्ही मैत्रिणी दापोलीला ट्रीपला गेलो होतो. तिथे उंच सावळा तरतरीत असा शंकर आम्हाला गाईड म्हणून मदत करत होता. तो अत्यंत नम्र आणि शांत होता. तिथेच राहणारा असल्याने त्याला पूर्ण दापोली माहीत होते. दिवसभर तिथे हिंडलो. संध्याकाळी शंकरने सहजपणे विचारले,
” तुम्हाला डॉल्फिन बघायला आवडेल का?”
” इथे दिसतात?”
” हो… पण पहाटेच समुद्रात लांबवर जावे लागेल मग तुम्हाला डॉल्फिन दिसतील. “
“खरच.. का? आम्ही परत विचारले. “
“हो… मात्र अगदी सकाळी लवकरच निघूयात “
आम्ही” बरं ” म्हणालो. खुश झालो होतो.
शंकर यायच्या आत आम्ही सगळ्याजणी तयार होतो. भल्या पहाटे निघालो. तेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. जोरात आवाज येत होता. समुद्र खवळला होता. ईतका की.. त्या आवाजाची भिती वाटत होती…
तो म्हणाला, ” जसं जसं पुढे जाऊ तसा समुद्र शांत होत जातो. काळजी करू नका. “
समुद्रात आतं आतं जायला लागलो. खरचं मग आवाज कमी कमी झाला. गाणी, गप्पा सुरू होत्या.
एका ठराविक ठिकाणी गेल्यावर त्याने बोट थांबवली. वरती निळं आभाळ आणि खाली निळाशार समुद्र… बाकी आसपास काहीही नव्हते.
तो म्हणाला…
“आता कोणी एक शब्दही बोलू नका. काही वेळातच तुम्हाला डॉल्फिन दिसायला लागतील.. “
क्षणातच शांतता पसरली एकदम निरव शांतता….
खरोखरच ती जाणवत होती अजून काही क्षण गेले…..
आसपासचे पाणी स्थीर झाले..
आणि अचानक समोरच पाण्यावर डॉल्फिन दिसायला लागले…
त्यांचा तो खेळ कितीतरी वेळ आम्ही पाहत होतो…
काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळाले…
त्या अफाट समुद्रात चोहीकडे पाणी फक्त आमची बोट…..
आणि ते डॉल्फिन ते सुळकन् पाण्याच्या वर येत होते. नाचत होते. परत आत जात होते. त्याचे पाणी कारंजा सारखे ऊडत होते.
काही वेळेस शांतता असायची आणि परत त्यांचा खेळ सुरू होऊन तो रंगात यायचा…
सहज नैसर्गिक असं त्यांचं चालू असेल पण ते बघताना विलक्षण गंमत वाटत होती.
आम्ही त्यात रंगुन गेलो होतो…….
इथे डॉल्फिन बघायला मिळतील असे आम्हाला वाटलेच नव्हते. त्यामुळे अजूनच आनंद झाला होता.
“चला निघूया आता… “
असा शंकरचा आवाज आल्यावर आम्ही भानावर आलो.
कोणाला परत जावं अस वाटत नव्हतं.. पण बराच वेळ झाला होता निघणं भाग होतं..
येताना शंकरनी परत बोट थांबवली म्हणाला,
” तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो खाली बघा”
आम्ही सगळ्याजणी खाली बघायला लागलो..
तिथे समुद्राचा तळ दिसत होता.. नितळ स्वच्छ…
रंगीबेरंगी दगड, वाळू, नाजूक असे शंख शिंपले… त्यातले छोटे छोटे रंगीबेरंगी मासे ईकडे तिकडे जात होते. त्यांचा अनुपम्य खेळ चालला होता..
स्तब्धच झालो…
खाली त्यांच अस एक जग होत…
अगदी भारावून गेलो होतो…
किती तरी वेळ बघत होतो..
विलक्षण गोड निरामय आनंद देणार असं ते होतं.
त्या शांततेतला आनंद आम्ही घेतला………
निसर्ग शिकवतो आपल्याला कोलाहाला पासून दूर दूर जायचे.
नि:शब्द शांत बसायचे…
मगच आतले ते अनाकलनीय गूढगर्भी….
कधी न जाणवलेले दिसते….
स्पंदने जाणवतात…
शब्दांची आवश्यकता नसते….
आज पहाटे शंकरची आठवण आली. त्यानी दाखवले म्हणून आम्ही ते पाहू शकलो त्याचा अर्थ समजून घेऊ शकलो. असे दाखवणारा शंकर भेटला… याचाही मला आनंद झाला. निघताना आम्ही त्याचे खूप कौतुक केले… त्याला दिलेले बक्षीस तो घेत पण नव्हता.. शांतपणे हसत होता.. आम्हीच त्याला बळजबरीने ते घ्यायला लावले…
मनात आलं तो अनुभव आपल्याला परत कसा बरं मिळेल…. विचार केल्यावर एक लक्षात आलं… त्यासाठी बाहेरच जायला हव अस नाही.. घरी पण शांत बसता येईल की… म्हटलं बघू प्रयोग करून…
शांतपणे बसले. मनात आलं आज आपल्याच अंतरंगातच जरा डोकावून बघू…
हळूहळू आत जायला लागले
मन शांत करत खोलवर गेले
होतं का ते पारदर्शी?
होतं का ते स्वच्छ?
लक्षात आलं ती जबाबदारी माझी बाहेरचं जग खूप बघून झालं आता पुरे…
अर्थात हे इतकं सोपं नाही आचरणात आणणं त्यातूनही अवघड..
पण लक्षात आलं..
ही वाटचाल करताना मार्गदर्शन करायला शिकवायला आपले संत आहेतच….
रामदास स्वामींची आठवण झाली…
” बैसोनी निवांत शुद्ध करा चित्त तया सुख अंतपार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलीया”
ऋषीमुनी निसर्गाच्या एकांतात जाऊन तप का करत असतं याचा थोडासा उलगडा झाला…
प्रयत्न करत राहू…
कधी न बघितलेले डॉल्फिन आम्हाला बघायला मिळाले….
इथेही असंच काहीतरी आनंदाच गवसेल…
माहित नसलेलही काही समजेल… ही श्रद्धा ठेवूनच प्रयत्न करायचा फळ देणारा तो आहेच…
☆ “मरणाला मिठी मारणारा योद्धा-धन्वंतरी!…”☆ श्री संभाजी बबन गायके☆
मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग
मरण त्याला काही अगदीच अनोळखी नव्हतं. वैद्यकीय व्यवसायात आणि पुढे सेनेत जबाबदारी सांभाळली तेंव्हा त्याने कित्येक जखमी शरीरं, शत विक्षत देह पाहिले… आणि अर्थात कित्येक मृत्यूसुद्धा! सैन्यसेवा आणि मरण एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत राहतात… काहींचा हात सुटतो.. काहींचा सुटत नाही! त्यादिवशी मृत्यूदूत त्याला अगदी समोरासमोर भेटले… नव्हे त्यातील एक तर त्याच्याच दिशेने येताना दिसला!
गोष्ट आहे वर्ष २०१० मधील फेब्रुवारी महिन्यातील. त्यादिवशी २६ तारीख होती आणि मेजर डॉक्टर साहेबांना अफगाणिस्तान देशातील राजधानी काबूल मधील भारतीय दुतावासात कर्तव्यावर रुजू होऊन केवळ तेराच दिवस उलटलेले होते. त्यांचा १४ मे १९७२ रोजी सुरु झालेला जीवनप्रवास मणिपूर पासून सुरु होऊन आज ते अफगाणिस्तान मध्ये होते.
जात्याच बुद्धीमान असलेले मेजर साहेब १९९६ मध्ये एम. बी. बी. एस. डॉक्टर झाले. पण अभ्यासासोबत साहेबांना खेळाची आणि त्यातल्या त्यात शरीरसौष्ठव क्रीडाप्रकाराची अतिशय जास्त आवड होती. क्रीडा वैद्यक शास्त्राचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी मोठ्या हौसेने पूर्ण केला होता.
भारतीय सैन्यात निष्णात वैद्यक अधिकाऱ्यांची नेहमीच गरज असते. पण त्यासाठीची निवड प्रक्रिया अतिशय कठीण मानली जाते. या अधिकारी मंडळींना डॉक्टरकी तर करावी लागतेच, पण गरज पडली तर हाती शस्त्रही धरावे लागते.
१५ फेब्रुवारी २००३ रोजी मेजर साहेब सिल्चर येथील लष्करी रुग्णालयात रुजू झाले. त्यांना वैद्यकीय ज्ञान तर प्रचंड होतेच पण सैन्यात त्यांना सैन्य प्रशिक्षणही प्राप्त झाले.
अतिउंचावर लष्करासाठी रस्ते बांधणी करण्याची जबाबदारी असलेल्या Border Road Organization या GREF अर्थात General Reserve Engineering Force (GREF) मध्ये साहेबांची नेमणूक झाली. भारतीय सैनिकांना ते वैद्यकीय उपचार देत असतच पण परिसरातील इतर नागरीकांनाही त्यांच्या सेवेचा लाभ देत असत.
अरुणाचल प्रदेश हा तर अतिशय दुर्गम प्रदेश. तिथे मेजर साहेबांसारखे निष्णात डॉक्टर उपलब्ध असणे, ही तेथील सामान्य नागरीकांच्या दुष्टीने सुदैवाची बाब होती.
९ फेब्रुवारी २००६ मध्ये डॉक्टरसाहेब आगरतळा येथील लष्करी रुग्णालयात बदलून गेले… आणि हे रुग्णालय त्यांनी अक्षरश: एकहाती चालवले. तेथील जवानांना त्यांनी आपल्या क्रीडावैद्यक शास्त्रातील अभ्यासाचा आणि अनुभवाचा खूप फायदा करून दिला. वेळ मिळेल तेंव्हा फुटबॉल आणि badminton खेळणे हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. असा माणूस सर्वांना प्रिय होईल यात नवल नव्हते.
२००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आंतराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धांत साहेबांनी खेळाडूंच्या अंमली पदार्थ सेवन करून खेळणाऱ्या खेळाडूंविरोधात कडक सेवा बजावली. त्यांनी २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. आगरतळा येथे लष्करी वैद्यकीय रुग्णालयात काम करीत असताना वेळात वेळ काढून त्यांनी इतर खाजगी, शासकीय रुग्णालयांतही विनामूल्य सल्लासेवा उपलब्ध करून दिली होती.. हे विशेष.
२००७ मध्येच त्यांना सैन्य सेवा मेडल आणि अतिउंचीवर उत्तम सेवा केल्याबद्द्लचे पदक प्रदान केले गेले. सैनिक निवडीसाठी असलेल्या वैद्यकीय पथकातही त्यांनी अतिशय उत्तम सेवा केली.
२०१३ वर्ष सुरु झाले होते. त्यावेळी भारताचे अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये वैद्यकीय कार्य सुरु होते. साहेबांचा अनुभव आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहून त्यांना काबूल मध्ये Indian Medical Mission मध्ये सहभागी करून घेण्यात आले… हा एक मोठा बहुमान समजाला जातो!
युद्धग्रस्त, हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक भारताने मानवतेच्या भूमिकेतून उभारलेल्या या वैद्यकीय सेवा कार्याचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. तिथल्या नूर गेस्ट हाऊस मध्ये भारतीय डॉक्टर्स मंडळींची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. अर्थात या गेस्ट हाऊसला भारतीय सैन्याने सशस्त्र संरक्षण पुरवले होतेच. कारण अफगाणिस्तान मधील परस्पर विरोधी गट कधीही हल्ला चढवू शकत होते. खरे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून चाललेले हे सेवाकार्य होते.. पण अतिरेकी मनाला ह्या बाबी समजू शकत नाहीत… हेच खरे!
त्यादिवशी या गेस्ट हाऊस मध्ये सहा लष्करी वैद्यकीय अधिकारी, ५ सह-वैद्यकीय कर्मचारी आणि इतर काही अधिकारी वास्तव्यास होते. आणि या इमारतीवर अतिरेकी हल्ला चढवण्यात आलाच… भयावह हल्ला. पाचशे किलो आर. डी. एक्स. ने भरलेले एक वाहन या इमारतीच्या अगदी समोर आले. त्यातून तीन हल्लेखोर उतरले आणि इमारतीकडे धावले.. याच इमारतीच्या पलीकडील इमारतीत अन्य काही परदेशी लोक वास्तव्यास होते… आधी भारतीय पथकाला मारले की ते अतिरेकी तिथून पुढील इमारतीत जाणार होते…
तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी विरोध करताच त्या वाहनचालकाने ते वाहन स्वत:सह इमारतीच्या सीमा भिंतीवर धडकवले. हा धमाका इतका मोठा होता की तिथे साडे तीन मीटर बाय अडीच मीटर खोलीचा खड्डा पडला! वाहनातून आधीच उतरून पळत आलेल्या चालून आलेल्या तिघा अतिरेक्यांनी मग या इमारतीवर हातगोळे फेकले… आणि ती इमारत पेटली!
कामावर निघायच्या तयारीत असलेल्या डॉक्टर्स लोकांकडे एकच हत्यार होते… स्टेथोस्कोप.. आणि हे हत्यार जीव वाचवणारे होते… पण स्वत: डॉक्टर मंडळीचा जीव वाचवण्याच्या क्षमतेचे नव्हते.
सर्वजण त्यातल्या त्यात सुरक्षित असणाऱ्या खोल्यांकडे पळाले…. पण त्यांना अतिरेक्यांनी पाहिले… क्षणार्धात एके ४७ रायफली धडाडल्या… हातगोळे फेकले जाऊ लागले… आश्रय घेतलेल्या खोल्यांमध्ये आता मृत्यूचे तांडव सुरु झाले… काही माणसं मारली गेली!
मेजर लैश्राम मात्र त्या आगीने वेढलेल्या खोलीतून थेट बाहेर पडले… एक अतिरेकी त्याच खोलीच्या दिशेने धावत येत होता… त्याच्या हातात शस्त्रे होतीच… हातगोळे सुद्धा होते. मेजर लैश्राम सुद्धा त्याच्या दिशेने विद्युतवेगाने धावत सुटले… मेजर स्वत: खूप जखमी होते.. रक्तबंबाळ झालेले होते…
अतिरेक्याने हातगोळा फेकण्याआधीच लैश्राम साहेबांनी त्याला मिठी मारली… त्याचे दोन्ही हात जखडून टाकले…. तारुण्यात शरीरसौष्ठ्व सरावाने कमावलेले स्नायू आता खरोखरीचे बळ दाखवू लागले… तो अतिरेकी खूप धिप्पाड, बलदंड होता.. पण मेजर साहेबांची हिंमत त्याच्यापेक्षा भारी होती… पण त्या हल्लेखोराकडे आणखी एक जालीम शस्त्र होते…. शरीराला गुंडाळून घेतलेली स्फोटके! तो सुसाईड मिशनवर होता…. त्याच्यासोबत तो अनेक जीवांना घेऊन परलोकी जाण्यास सज्ज होता….!
मेजरसाहेबांनी त्याला असा दाबून धरला की त्याला श्वास घेणे दुर्धर झाले… रायफल चालवणे तर दूरच… त्याच्या हातातल्या हातगोळ्यांचा त्याला वापर करणेही शक्यच नव्हते… यात बराच वेळ गेला… त्यामुळे इतरांना तिथून सुरक्षित निसटून जाण्याचा अवधी मिळाला.
शेवटी त्याने करायचे ते केलेच.. त्यापासून मात्र साहेब त्याला दुर्दैवाने रोखू शकले नाहीत… त्याने कमरेला लावलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला… क्षणार्धात दोघांच्याही देहांच्या चिथड्या उडाल्या… रक्ता-मांसाचा चिखल नुसता! पण यात साहेबांचे रुधीर त्यागाच्या, देशभक्तीच्या सुगंधाचे वाहक होते! आपल्या इतर दहा सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी या डॉक्टर साहेबांनी आपले प्राण अर्पण केले होते…
औषध उपचारांनी प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनी आपले रक्त शिंपडून इतरांचे प्राण राखले! ही कामगिरी केवळ अजोड… नि:स्वार्थी आणि मोठ्या शौर्याची. संकट आले म्हणून माघारी न पळता संकटाला आपल्या पोलादी बाहुपाशात घेणाऱ्या भारतीय सैनिकाचे रक्त होते ते….
शांतता काळातील सर्वोच्च सैन्यपदक ‘अशोक चक्र’ डॉक्टर साहेबांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले. त्यांच्या बंधूंनी हे पदक तत्कालीन राष्ट्रापती महोदया महामहीम श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने आणि भावाच्या आठवणींनी भरलेल्या काळजाने स्वीकारले.
मणिपूर मधील नाम्बोल गावात हुतात्मा मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग साहेब यांच्या मागे त्यांचे पिताश्री आणि मातोश्री त्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. आईबाबा लहानग्या ज्योतीन साहेबांना लाडाने इबुन्गो म्हणून हाक मारत.
विविध प्रकारे त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न झाले आहेत. पण भारतातील खूप लोकांना हे नाव अद्याप बहुदा माहीत नसावे… असे वाटले… म्हणून हा लेखन-प्रयास!
जय हिंद! जय हिंद की सेना!
(ही माहिती लिहिताना मेजर जनरल ए. सी. आनंद साहेब, (विशिष्ट सेवा मेडल विजेते) यांच्या लेखाचा आणि इंटरनेटवरील इतर साहित्याचा आधार घेतला आहे.)
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥
अर्थ : आणि (ती भक्ति) अमृतस्वरूपा (ही) आहे.
विवरण : द्वितीय सूत्रात परमप्रेम हे भक्तीचे यथार्थ स्वरूप आहे, असे स्पष्ट केल्यानंतर या सूत्रात त्या प्रेम भक्तीचा एक महत्त्वाचा विशेष श्री नारदमहर्षि सांगतात, ती प्रेमरूपा भक्ती ‘अमृतस्वरूपा’ आहे. अमृत म्हणजे मरण-विनाश-बाधरहित अवस्था अथवा स्वरूप होय.
विवेचन:
सर्व संतांनी सत्संगाचा महिमा गायिला आहे. भक्ति करणे म्हणजे भगवंताशी संग करणे, असे म्हटले तर अधिक उचित होईल. एखाद्या मनुष्याचा हात चुकून कोळशाला लागला तरी त्याचा हात काळा झालाच म्हणून समजा. याच सूत्रानुसार भगवतांच्या थोड्याशा सत्संगाचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो.
अमृत शब्दाचा प्रचलित अर्थ असा आहे की जे मृत्यू पासून आपल्याला वाचवते ते अमृत. समुद्र मंथनातून अमृत निर्माण झाले असे म्हणतात…..
थोडक्यात जे आपल्याला अमर करते ते अमृत. आजपर्यंत अनेक लोक जन्माला आले आणि मृत्यू पावले. त्यांची गणती करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातील काही मोजक्या लोकांची नावे आपल्या लक्षात आहेत, इतिहासाला ठाऊक आहेत. ज्यांनी या धरती साठी, समाजासाठी, योगदान दिले, त्याग केला, विशेष कार्य केलं त्यांचीच नावे समाजाने लक्षात ठेवली आहेत. त्यातील प्रमुख नावे ही संतांची आहेत. आपल्याला आपल्या मागील चौथ्या किंवा दहाव्या वंशजाचे नाव सांगता येईलच असे नाही पण माउलींचे, समर्थांचे, तुकारामांचे, अर्थाचे संतांचे गोत्र ही पाठ असेल,. ही किमया नव्हे काय ? ही किमया कशामुळे घडली असेल….?
प्रत्येक संतांनी आपल्या आवडीनुसार भक्ति केली असेल, नवविधा भक्तीचा अंगिकार केला असेल, पण भक्ति च केली यात बिल्कुल शंका नाही. भक्ति करणारा मनुष्य देहाने जातो, पण नामरूपाने, कीर्तिरूपाने अमर होतो, अमर राहतो हे सिद्ध होते.
मेलेल्या मनुष्याला अमृत देऊन काही काळापुरते जिवंत करणे आणि भक्ताला मरण प्राप्त झाल्यानंतरही अनंत काळ अमर करणे , यात अमृत श्रेष्ठ म्हणता येईल की भक्ति….? आपल्या मनात भक्ति हेच उत्तर आले असेल ना ?
अमृत स्वरूपा असे नारद महाराज म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ कसा घ्यायचा ? सरळ अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की भक्ति मुळे मनुष्य अमृत समान होऊ शकतो…!
स्वरूप म्हणजे आपले रूप असा अर्थ घेतला तर आपले रूप आरशात दिसते तसे आहे की कसे ? आरशात दिसते ते बाह्य रूप आहे आणि दिसत नाही, जे अंतर्यांमी आहे ते आत्मरूप आहे. भगवंताला जाणणे म्हणजे अंतर्यामी असलेल्या आत्म तत्वाला जाणणं….
शबरी मातेची कथा आपल्याला माहित आहे. काही शे बोकडांची हत्या होऊ नये, म्हणून ही मुलगी लग्नाच्या आदल्या दिवशी घर सोडून निघाली ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली. मातंग ऋषींनी तिला सांगितले की तू अखंड नाम घे, प्रभू श्रीराम तुझे दर्शन घ्यायला येतील….! तिचा तिच्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता. गुरू वाक्य प्रमाण मानून तिने साधना करायला सुरुवात केली. तिला राम कसे असतील हे माहीत असण्याचे कारण नव्हतं. तिने आपल्या मनात रामाची प्रतिमा तयार केली. अर्थात ते आपल्या मातंग ऋषींसारखेव असतील……! जटाभार ठेवलेले, वल्कले नसलेलं…! शबरी जसे रूप मनात धरले, अगदी त्याच रुपात येऊन रामाने तिला दर्शन दिले. एवढेच नव्हे तिची उष्टी बोरे भगवंताने आनंदाने खाल्ली. लक्ष्मण तिला म्हणाला की ही बोरे उष्टी आहेत. त्यावर ती म्हणाली की ही बोरे दिसायला उष्टी आहेत, पण खऱ्या आज ती अभिमंत्रित आहेत. हे सामर्थ्य भक्तीने प्राप्त होऊ शकते….!
☆ “आंबामेव जयते…” – लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
अलीकडे ‘पहिला आंबा खाणं’ हा एक इव्हेण्ट झालाय. सुरुवातीला आंब्याचा भाव (अर्थात हापूस) हा डझनाला बाराशे रुपये असतो. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा बाराशे रुपये पगार हा ‘वलयांकित’ पगार होता. ‘‘मला फोर फिगर पगार आहे, ’’ हे ‘मेरे पास माँ है’ थाटात सांगितलं जायचं. आता त्या भावात बारा आंबे मिळतात.
आपण आंबे विकणाऱ्याला ‘चल एक आंबा वर घाल’, असं टिपिकल मध्यमवर्गीय थाटात सांगितलं की तो वर सुनावतो, ‘‘एक आंबा म्हणजे किती रुपये झाले कळतं ना?’’ नशीब तो विचारीत नाही, ‘कोथिंबीर, लिंबू किंवा दोन बोंबील आणि आंबा यांतला फरक कळतो ना? सरळ वर घाल म्हणून काय सांगताय?’
दर मोसमात आंब्याचा भाव वाढतो आणि दर मोसमात त्याचं कारण दिलं जातं की, ‘यंदा फळ जास्त आलं नाही’. ‘चांगला आंबा परदेशात पाठविला जातो म्हणून यंदा बाजारात आंबा नाही, ’ हेही अलीकडे या प्रश्नाचं दुसरं उत्तर असतं. पुढेपुढे ‘किती आंबे खाल्ले’ ही इन्कम टॅक्सकडे जाहीर करण्याची गोष्ट ठरू शकते आणि आयकर विभागाच्या धाडीत दहा पेट्या आंबा सापडला ही बातमी ठरू शकते. पण तरीही आंबा हा मराठी माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक कायम राहणार. सोन्याचे भाव वाढतात म्हणून लग्नात मुलीच्या अंगावर दागिने घालणं थोडंच कमी होतं? लहानपणी आईने आंब्याचा पहिला घास भरवला, तिथपासून आजपर्यंत आंबा मी प्रेमाने खात आलोय.
मी जिभेने सारस्वत असल्यामुळे सांगतो, मला बांगड्याएवढाच आंबा आवडतो. तुम्ही मला पेचात टाकणारा प्रश्न विचाराल की, ‘बांगडा की आंबा?’ तर हा प्रश्न, तुला डेटवर कुणाबरोबर जायला आवडेल? माधुरी दीक्षित (अर्थात तरुण) की श्रीदेवी (तरुणच). (आणि हो, मीपण तरुण.) तर उत्तर, दोन्ही, असं असेल. तसंच आंबा आणि बांगड्याबद्दल असेल. तळलेला बांगडा आणि आमरस हे एकाच वेळी जेवणात असणं यालाच मी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणतो.
माझ्या लहानपणीसुद्धा हापूस आंबा महाग असावा. कारण तो खास पाहुणे आले की खाल्ला जायचा. आमरस करण्यासाठी पायरी आंबा वापरला जायचा आणि ऊठसूट खायला चोखायचे आंबे असत. बरं, पाहुण्याला हापूस देताना आंब्याचा बाठा खायला देणं अप्रशस्त मानलं जाई. त्यामुळे बाठा माझ्या वाट्याला येत असे. मला बाठा खायला किंवा चोखायला अजिबात लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. दोन मध्यमवर्गीय संस्कार माझ्यात आजही अस्तित्वात आहेत. एक, आंब्याचा बाठा खाणे आणि दुसरा, दुधाचं भांडं रिकामं झाल्यावर जी मलई किंवा तत्सम गोष्ट भांड्याला चिकटते, ती खाणे. कसले भिकारडे संस्कार, असा घरचा अहेर (माहेरहून आलेला) मला मिळायचा! पण ज्यांनी तो आनंद घेतलाय त्यांनाच माझा आनंद कळू शकेल. एवढंच काय की, घरचं दूध नासलं की मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यात साखर घालून आई ते आटवायची आणि त्यातून जे निर्माण व्हायचं त्यालाच ‘अमृत’ म्हणत असावेत, अशी लहानपणी माझी समजूत होती. आता हा आनंद दुष्ट वैद्यकीय विज्ञानामुळे धुळीला मिळालाय. देवाने माणसाला कोलेस्टेरॉल का द्यावं? आणि त्यात पुन्हा वाईट आणि चांगलं असे दोन प्रकार असताना वाईट कोलेस्टेरॉल का द्यावं? बरं ते कोलेस्टेरॉल जर निर्माण करायचं, तर ते मलईत वगैरे टाकण्यापेक्षा कारलं, गवार किंवा सुरणात टाकलं असतं तर बिघडलं असतं का? आंबाही फार नको, असं सुचविताना डॉक्टर त्यात पोटॅशियम असतं ते चांगलं, असा उःशाप देतो ते बरं असतं.
मला जवळपास सर्व फळं आवडतात. कलिंगड, द्राक्ष (द्राक्षाच्या सर्व पेयांसह), संत्र्यापासून जांभूळ-करवंदापर्यंत. करवंदाच्या आतल्या रंगावरून कोंबडा की कोंबडी खेळ खेळत मी अनेकदा करवंदं खाल्ली आहेत. आता फक्त आठवते ती ग. दि. माडगूळकरांची लावणी, ‘जाळीमंदी पिकली करवंदं’. अजूनही कोकणाच्या दिशेने गेलं की करवंदांची जाळी दिसते. वाटतं कधीकधी लहानपणात शिरावं. मनाला वाटलं तरी शरीराला ते समजावणं कठीण जातं. करवंदाच्या जाळीत आणि लाल एस. टी. त शिरण्याची माझ्या शरीराची सवय गेली ती गेलीच!
असो, तर मी सांगत काय होतो? हं, फळं सर्व आवडली तरी आंबा हा फळांचा खऱ्या अर्थाने राजा! तो मला जेवणाच्या ताटात किंवा बशीत कुठल्याही रूपात आवडतो. आमच्या घरी आंबा खास पाहुण्यांना (बायकोची आवडती माणसं) हा सालंबिलं कापून, छोटे तुकडे करून एका ‘बोल’मध्ये छोट्या फोर्कसह पेश केला जातो. असं साहेबी आंबा खाणं मला बिलकूल आवडत नाही. आंबा खाताना हात बरबटले पाहिजेत, सालंसुद्धा चोखलीच पाहिजेत आणि जमलं तर शर्टावर तो सांडला पाहिजे. तरच तो आंबा खाल्ल्यासारखा वाटतो. आंबा ताटात असताना मासे सोडून इतर पदार्थ मला नगण्य वाटतात. विव्ह रिचर्डस् बॅटिंग करताना मैदानावरच्या इतर सर्व गोष्टी नगण्य वाटायच्या तशा! आंबा खाण्यासाठी चपाती, परोठ्यापासून सुकी भाकरही मला चालते.
फक्त एकच गोष्ट मला जमलेली नाही. आमरस भातात कालवून भात ओरपणे! माझ्या एका मित्राला ते करताना पाहिलं आणि मला त्या मित्रापेक्षा आंब्याची कीव आली. आंब्याची गाठ भाताशी मारणं हे मला एखाद्या गायिकेने औरंगजेबाशी विवाह लावण्यासारखं वाटलं. भात ओरपायला आंबट वरणापासून चिकन करीपर्यंत अनेक गोष्टी असताना आमरसाचा वापर का करावा?
आंब्याच्या मोसमात पूर्वी मला लग्नाला जायला आवडे. म्हणजे मी अशा काळाबद्दल म्हणतोय जेव्हा जेवणाच्या पंगती असत, बुफे नसे आणि जेवण हे मुंबईएवढं कॉस्मॉपॉलिटन नव्हतं. आता मराठी लग्नातही ताबा पंजाबी, गुजराती, चिनी, थाई, दाक्षिणात्य, इटालियन, अमेरिकन पदार्थांनी घेतलाय. त्या वेळी सारस्वत लग्नातली कोरडी वडी (जी ओली असून तिला कोरडी का म्हणत ते सारस्वत जाणे), पंचामृत आणि अनसा-फणसाची भाजी! ही भाजी त्या वेळी फक्त श्रीमंत सारस्वत लग्नात असे. कारण त्या भाजीत आंबा, अननस आणि फणस असे त्रिदेव असत. त्यामुळे तिला ग्रेट चव येई. त्या काळी सारस्वत लग्नात अनसा-फणसाची भाजी ठेवणं हा स्टेटस सिम्बॉल होता.
आंब्याचा आणि लग्नाचा संबंध हा जुनाच आहे. किंबहुना आंब्याचा उल्लेख रामायण, महाभारतातही आहे. तसंच पतंजलीचं महाभाष्य आणि पाणिनीची अष्टाध्यायी या ग्रंथांतसुद्धा आहे. हिंदूंच्या सर्व सणांत आणि उत्सवांत आंब्याला महत्त्व दिलं गेलंय. जवळपास सर्वच धार्मिक विधी आंब्याच्या पानाशिवाय होत नाहीत. मंगलकार्यात, मंडपात आणि दारावर आंब्याच्या पानांची तोरणं बांधायची पद्धत आहे. कोणत्याही कलशावर आम्रपल्लव ठेवून मग त्यावर नारळ किंवा पूर्णपात्र ठेवतात. वटपौर्णिमेला स्त्रिया आंब्याची वाणं देतात. आम्रफल हे वांझपण नष्ट करणारं आणि गर्भप्रद मानलं जातं.
आंब्याच्या सुमारे दोनशे जाती आहेत, पण माणसाप्रमाणे आंब्यांतला जातिभेदही मी मानत नाही. हापूसपासून राजापुरी, तोतापुरी, बाटली आंबा वगैरे कुठलाही आंबा मला आवडतो आणि मी तो खातो. लहानपणी तर मी कैरीपासूनच सुरुवात करायचो. किंबहुना शाळा-कॉलेजात असताना एप्रिल-मे महिन्यात आंबा आणि सुट्टी या एवढ्याच दोन गुड न्यूज असायच्या. बाकी सर्वच बॅड न्यूज! आधी परीक्षा, मग तिचा निकाल! गीतकार-कवी शैलेंद्रने एका गाण्यात म्हटलंय, ‘जब गम का अंधेरा घिर आए, समझो के सवेरा दूर नहीं’. परीक्षा-निकालाच्या ‘अंधेऱ्या’नंतर (खरंतर त्यामुळे डोळ्यांपुढे अंधारी आल्यानंतर) ताटातल्या आंब्याचं महत्त्व जास्त वाटायचं. तो त्या ‘सवेरा’सारखा वाटायचा. मुंबईत कैरी-आंबा हीच वसंताची चाहूल. एरवी कोकीळ इथे मुंबईत कुठे ऐकायला येणार! आणि ‘परीक्षा आलीए तरी झोपतोय कसला, ऊठ लवकर, ’ हे वडिलांच्या तोंडचे शब्द कोकिळेच्या तोंडातून ऐकायला आले असते तरी ते कर्कशच वाटले असते.
‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’, ही कविता शाळेत न शिकवताही आम्हांला पाठ होती. भारतीय वाङ्मयात आंब्याला, आम्रवृक्षाला मोठं स्थान आहे. कालिदासाच्या निसर्गवर्णनात वसंतागमनसूचक तांबूस, हिरव्या आणि पांढुरक्या आम्रमंजिरीचं वर्णन नेहमी असतं. कामदेवाच्या पंचगटात आम्रमंजिरीचाही अंतर्भाव आहे.
आंबा नुसता जसा मला नुसता खायला आवडतो तसा कुठल्याही रूपातला आंबा मला आवडतो. उदा. कैरी, कैरीचं पन्हं, लोणचं, मोरांबा, आंबटगोड लोणचे, आंबापोळी वगैरे वगैरे! फक्त आंब्याच्या कोल्ड ड्रिंक्सच्या वाटेला मी जात नाही. अवाजवी आणि फालतू साखरेला शरीरात यायचं आमंत्रण का द्या? आणखीन एक प्रश्र्न मला पडतो. नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, पण मग आम्रवृक्ष काय कमी उपयोगी नाही. कैरी-आंबा सोडा, बाठा किंवा कोयीचं पीठ पौष्टिक असतं. झाडाचं लाकूड उपयुक्त असतं. आंब्याच्या झाडाच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात. तिच्यापासून रंगही तयार करता येतात. आंब्याचं झाड औषधी असतं, असं म्हणतात.
चला, आता दीड-दोन महिने आमच्या घरी मासळी, आयपीएलपेक्षा आंब्याची चर्चा जास्त असणार. पलीकडच्या कर्वेबाईंनी हापूस स्वस्तात मिळविल्याचा टेंभा मिरविल्यावर माझ्या बायकोचा चेहरा ख्रिस गेलचा कॅच सुटल्यासारखा होणार. पण पुढे आजचा मेनू काय, हा प्रश्न नवरा विचारणार नाही, याचं समाधान असणार. कारण बाजारातला हापूसच काय, बाजारातला शेवटचा बाटली आंबा संपेपर्यंत नवरा शांत असणार.
‘आंबामेव जयते!’
🥭🍑
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
(मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या रिव्हर्स स्वीप ह्या त्यांच्या पुस्तकातून साभार)
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र– ताईच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्वपूर्ण साक्षीदार होतीच. अर्थात पुढे तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहेत याची शक्यता मात्र त्याक्षणी मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!)
अतिशय प्रेमाने, कर्तव्य भावनेने आम्ही दिलेले पैसे आमच्या भावनांचा विचार करून, आम्हाला बरं वाटावं म्हणून तरी ताईनं घ्यायला हवे होते, असेच मला वाटत असे. पण हे वाटणं किती चुकीचं, एकांगी विचार करणारं, ताईवर अन्याय करणारं होतं हे आईच्याच बोलण्यातून एकदा मला स्वच्छ जाणवलं.
असंच एक दिवस आई सांगत होती, “अरे तुम्ही सद्भावनेने दिलेले पैसे घेणंही ती नाकारते म्हणून किती वाईट वाटायचं तुला. पण तुम्हा सर्वांच्या पैशाचं कांहीच नाही. त्याही पुढचं सांगते.
‘माझ्या नवऱ्याच्या निवृत्तीनंतर आलेल्या पैशावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ असं म्हणायची ती. या विचारानेही ती सतत खंतावत असायची. मला खूप वाईट वाटायचं. मी परोपरीने तिला समजवायची. पण तिची समजूतच पटायची नाही. ‘अगं तुझे भाऊ आपण होऊन, मदत म्हणून देतायत तुला तर घेत कां नाहीस? प्रत्येकवेळी नको कां म्हणतेस?’ असं मी तिला एकदा म्हंटलं तर म्हणाली, ‘ आई, एकदा घेतले ना तर ती सुरुवात ठरेल. मग त्याला शेवट नाही. आमच्या मुलांना आम्ही कांही फार मोठी इस्टेट ठेवणार नाही आहोत, मग त्यांना कर्जंतरी का म्हणून ठेवायची?’
‘अगं, कर्ज म्हणून ते कुठं देतायत ? ते कुणीच दिलेले पैसे परत मागणार नाहीयेत ‘
‘ त्यांनी नाही मागितले तरी परत द्यायला नकोत? माझ्या भावांनी तरी ते पैसे कष्ट करूनच मिळवलेत ना? मग? मी त्यांची मोठी बहीण असून त्यांना कधीच काहीच देऊ शकले नाही, मग त्यांच्याकडून घेऊ कशी? नको आई. ते मला नाही आवडणार. परमेश्वर देईल तेच फक्त माझं. “
ताई गेल्यानंतर पुढे कितीतरी दिवस तिच्याच संदर्भातलं हे असंच सगळं आईच्या मनात रूतून बसलेलं होतं. त्या आठवणींमधलं ‘परमेश्वर देईल तेच फक्त माझं’ हे ताईचं एक वाक्य पुढे घडून गेलेल्या आक्रितामागचा कार्यकारणभाव सामावून घेणारं आणि म्हणूनच अतिशय महत्वाचं होतं हे आईच्या बोलण्यातूनच मला जाणवलं, ते ताईला लाॅटरीचं बक्षिस लागल्याचं समजल्यानंतर! कारण त्यासंदर्भात माझ्या मनात निर्माण झालेल्या सगळ्याच प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं देणारंच ते वाक्य होतं! ! त्यातला शब्द न् शब्द पुढे माझ्या ताईच्या सात्विक कणखरपणाचं प्रतीक जसा तसाच तिने अतूट श्रध्देने प्राप्त केलेला तिचा परमेश्वरावरील अधिकार सिध्द करणाराही ठरला! !
” तू भाऊबीजेला आला होतास तो प्रसंग आठवतोय ना तुला?” एकदा बोलता बोलता आईनं विचारलं.
” हो. त्याचं काय?”
“तो प्रसंगच निमित्त झालाय पुढच्या सगळ्याला.. “
” म्हणजे?”
“भाऊबीजेदिवशी तुला रिक्षापर्यंत पोचवून केशवराव घरी परत आले ना तेव्हा त्यांना तू काय म्हणालास हे तुझी ताई खोदून खोदून विचारत राहिली. बराच वेळ त्यांनी सांगायचं टाळलं तेव्हा खनपटीलाच बसली. शेवटी त्यांना ते सांगावंच लागलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्ही सगळी भावंडं एकमेकांना धरून असल्याचं पाहून मला तुम्हा सर्वांचं खरंच खूप कौतुक वाटलं. पण तुझी ताई? ते सगळं ऐकून ती मात्र खूप अस्वस्थ झाली. केशवरावांचं बोलणं संपलं, तसं आतल्या आत घुसमटत रडत राहिली. आम्ही तिला ‘काय झालं’, असं विचारलं, समजावलं तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. डोळे पुसले. भिंतीचा आधार घेत उठायचा प्रयत्न करू लागली. मी तिला सावरायला पुढे येईपर्यंत ती भिंतीच्या आधाराने स्वतःला सावरत आत देवघरापर्यंत आली. देवापुढे निरांजन लावलंन् आणि तशीच अलगद डोळे मिटून देवापुढं बसून राहिली. मी तोवर आत येऊन तिचं अंथरूण, पांघरूण झटकून नीट केलं आणि सहज डोकावून पाहिलं तर अजूनही तल्लीन अवस्थेत ती देवापुढे बसून होती! पुढचं दृश्य पाहून मी चरकलेच. तिच्या मिटल्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली,.. चेहरा गदगदत होता, चेहऱ्यावरची नस न् नस थरथरत होती..! .. मी लगबगीने पुढे धावले. तिला उठवायला हात लावणार, तेवढ्यात आत आलेल्या केशवरावांनी मला थांबवलं. ‘तिला थोडावेळ बसू दे… बरं वाटेल.. ‘ हलक्या आवाजात ते म्हणाले.
थोड्या वेळाने ती शांत झाली. एकाग्रतेने नमस्कार करून शांतपणे डोळे उघडले. पदराने चेहरा खसखसून पुसला. आधारासाठी हात पुढे केला आणि उठली. आत जाऊन पडून राहिली. मग तिने केशवरावांना हाक मारून बोलावून घेतलं.
‘तुम्ही मला नेहमी तुला काय हवं, असं विचारता ना? मोकळेपणाने सांग, मी आणून देईन असं म्हणता. हो ना? आज मी सांगणाराय. जे सांगेन ते ऐकायचं. मागेन ते मला आणून द्यायचं.. ‘ ती म्हणाली.
केशवरावांनी तत्परतेने ‘सांग, काय हवंय.. ?’ असं विचारलं.
‘आज बुधवार आहे. उद्या गुरुवार. उद्यापासून दर गुरुवारी मला पाच रुपयांचं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट आणून द्यायचं’
‘लॉटरीचं तिकिट? भलतंच काय?’
‘यात भलतंसलतं काय आहे? मला हवंय. ‘
‘अगं पण कां? कशासाठी?’
‘ते योग्य वेळ आली कीं सांगेन. मी आजपर्यंत इतक्या वर्षात हट्टानं कांही मागितलंय कां तुमच्याकडं? नाही ना? आज मी सांगतेय म्हणून ऐकायचं. बाकी दुसरं मला काहीही नकोय.. ‘
ती म्हणाली होती.
तिला पाच लाखांचं बक्षीस लागलं तो तिसरा गुरुवार होता.. “
आई सांगत होती. तिचा प्रत्येक शब्द मला अधिकच बुचकळ्यांत टाकणारा होता.
“बक्षीस लागल्यानंतर ताईची प्रतिक्रिया काय होती?”
“खूप आनंद झाला होता तिला. हे सगळं कां.. कसं घडलं याचा उलगडा भारावलेल्या अवस्थेत ती स्वतःच जेव्हा बोलली तेव्हा झाला. तुझं आणि केशवरावांचं बोलणं तिला समजलं तेव्हा जणू कांही आपला केविलवाणा भविष्यकाळ तिला अस्वस्थ करू लागला होता. आपल्या या आजारपणात नवऱ्याचे फंड/ग्रॅच्युइटीचे सगळे पैसे संपून जाणार हे तिला स्पष्टपणे दिसत होतंच. ते संपले की कुणाकडून तरी पैसे मागावे लागणारच हे तिला तीव्रतेने जाणवलंही, पण तेच तिला मान्य नव्हतं. त्या अस्वस्थतेत तिने त्यादिवशी देवासमोर बसून गजानन महाराजांना साकडं घातलं होतं..!
‘माझ्या नवऱ्याने रात्रंदिवस जागून आणि कष्ट करून ४० वर्ष राबल्यानंतर त्याला जे पैसे मिळालेत त्यावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ हा तिचा प्रश्न होता! ‘ते सगळे पैसे माझ्या औषधपाण्यांत संपल्यानंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या म्हातारपणात आपल्या मुलांच्या संसारात एखाद्या आश्रितासारखं कां म्हणून पडून रहायचं? मला माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडं काहीही मागायचं नाहीय. नशिबाने माझ्या पदरात टाकलेले हे भोग मला मान्य आहेत. पण कृपा करून तुम्ही माझ्या या घरातली ही आर्थिक लूट थांबवा. त्या बदल्यात माझं हे यातनामय आयुष्य चार सहा महिने वाढवा हवं तर. माझे सगळे भोग, यातना, दु:ख.. तोंडातून ब्र ही न काढता मी निमूट सहन करेन. पण मी अखेरचा श्वास घेईन, तेव्हा माझ्या नवऱ्याने घाम गाळून मिळवलेले साडेतीन लाख रुपये जसेच्या तसे त्याच्याजवळ शिल्लक रहायला हवेत… ‘
ही गजानन महाराजांसमोर तिने मांडलेली तिची कैफियत होती! आणि.. आणि.. महाराजांनी तिचं गा-हाणं ऐकलं होतं…! “
आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर! आणि त्याच क्षणी हे ‘गजानन महाराज’ कोण हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती! !
‘तू स्वतःच एकदा वेळ काढून ही पोथी वाच म्हणजे तुला नीट समजेल गजानन महाराज कोण ते.. ‘ असं माझी ताईच एकदा मला म्हणाली होती आणि आता ते जाणून घ्यायची प्रेरणा द्यायलाही माझी ताईच अशी निमित्त झाली होती!
पुढच्या सगळ्या शोधाचा त्या दिशेने सुरू झालेला माझा प्रवास आणि त्या प्रवासवाटेवर आलेले अनुभव माझ्या ताईच्या जाण्याच्या दुःखाचं सांत्वन करणारे होतेच आणि अलौकिक आनंदाच्या स्पर्शाने मला कृतार्थ करणारेही! ! त्या अनुभवांचा माझ्या अंतर्मनाला झालेला स्पर्श हा माझ्या आठवणींमधला अतिशय महत्त्वाचा तितकाच मोलाचा ठेवा आहे!
☆ “ही देशाची खरी कन्यारत्ने …”☆ श्री संभाजी बबन गायके☆
होय, याच त्या कर्नल सोफिया कुरेशीमॅडम. तुम्ही आज भारताने पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे media briefing करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी ! आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग !!
– – एक ASEAN मध्ये गवसलेलं रत्न ! आणि एक आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न !
या दोघींनी आज जे केलं.. तो खरा इतिहास असणार आहे !
The Association of South East Asian Nations अर्थात ASEAN संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिणपूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे.
— — थायलंड,व्हिएतनाम,म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स,मलेशिया,ब्रुनेई,लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक,इंडोनेशिया,कंबोडिया इत्यादी बहुदा १८ देश आसीयान मध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना, त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात,त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते.
या सर्व अठरा देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव २०१६ मध्ये पुण्यात पार पडला. यापैकी १७ देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते…मात्र भारतीय सैन्यतुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे! भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात Corps of Signals मध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामांत त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायांत आघाडीवर असतात.
Asean सारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे ! त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे Chief of Defence Staff या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपीन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना..’ त्या अंगभूत नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत..’ असे गौरवोद्गार काढले, हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे!
गुजरात मध्ये वडोदरा येथे १९८१ या वर्षी जन्मलेल्या सोफिया या microbioligy विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते..त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी १९९९ मध्ये OTA Chennai येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही mechanized infantry मध्ये कार्यरत आहेत!
सोफिया यांनी UN Peace Keeping Force मध्ये आणि पुढे Congo या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना military negotiations आणि सेवाकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
आजच्या briefing मध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाश कन्या असा आहे..त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकिर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता. आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान,कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते! चिता आणि चेतक नावांची अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात…अडीच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते. व्योमिका सिंग यांनी २१,६५० फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मणिरंग शिखरावर यशस्वी चढाई सुद्धा करून दाखवली आहे! २००४ मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम २०१७ मध्ये विंग कमांडर बनल्या!
या दोघींनी ही briefing ची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली .. आणि त्यांच्या द्वारे भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे….सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेभळट देशाला या आरशात काही दिसेल, ही अपेक्षा !
☆ अशी विचित्र नावे का? ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
पुण्यात अनेक मारुती मंदिरे आहेत. पण त्यात विचित्र नावाची काही मंदिरे आहेत. त्यासंबंधी काही माहिती.
1) पत्र्या मारुती
पुण्यात ससून रुग्णालयाचे काम चालू होते. त्यासाठी पत्रे मागवले होते. रुग्णालय बांधताना त्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. त्यात काही तुकडेही होते. त्या सर्व तुकड्यांचा उपयोग करून नारायण पेठेत एक मंदिर बांधले गेले. त्यात मारुतीची प्रतिष्ठापना केली. लोक साहजिकच त्या मंदिराला पत्र्या मारुती मंदिर असे म्हणू लागले. पुण्यात लक्ष्मी रोड आहे. तिथे शगुन चौक आहे. त्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना एक चौक लागतो. त्या चौकात हा पत्र्या मारुती आहे.
2) जिलब्या मारुती
जिलब्या मारुती मंदिर पुण्यातील तुळशीबागे जवळ आहे. खूप वर्षांपूर्वी तिथे एक हलवायाचं दुकान होतं. तो हलवाई रोज खूप जिलब्या बनवायचा. पण प्रथम तयार झालेल्या जिलब्यांचा एक हार बनवायचा आणि श्रद्धेनं त्या मारुतीच्या गळ्यात घालायचा. ते पाहून लोकांनीच त्याला जिलब्या मारुती असे नाव ठेवले.
3) दुध्या मारुती
हे मंदिर शुक्रवार पेठेत आहे. मंदिराच्या परिसरात पूर्वी गाई-म्हशींचा गोठा होता. तिथे खूप दूध तूप मिळत असे. येथील गोठ्यातील गवळी या मारुतीवर दुधाचा अभिषेक करायचा. इतर ठिकाणी सर्व देव पाण्याच्या अभिषेकाने थंड होत असतात. येथे मात्र दुधाचा अभिषेक. म्हणून या मारुतीला दुध्या मारूती असे नाव पडले
4) बटाट्या मारुती
हे मंदिर पुण्यातील शनिवार वाड्यातील मैदानावर आहे. पूर्वी इथेच भाजी मंडई भरत असे. आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विक्री करत असत. तिथे कांदा बटाटा खूप प्रमाणात विकला जात असे. बटाटा विकणारे शेतकरी या मंदिराच्या शेजारीच बसत असत म्हणून त्याला बटाट्या मारुती असे नाव पडले
5) उंबऱ्या मारुती
.. हे मंदिर बुधवार पेठेत आहे. हे मंदिर उंबराच्या झाडाखाली आहे म्हणून याला उंबऱ्या मारुती असे नाव पडले.
6) खरकट्या मारुती
लक्ष्मी रोडवरील तुळशी बागेत हे मंदिर आहे. पूर्वी दर्शनासाठी आजूबाजूचे खूप लोक येत. त्यावेळेस हॉटेल्स नव्हती. ते घरूनच जेवण बांधून आणत असत. ते बांधून आणलेली शिदोरी मंदिराच्या परिसरात बसूनच खात असत. तिथे त्यांचे खरकटे पडत असे म्हणून त्याला खरकट्या मारुती असे नाव पडले.
7) रड्या मारुती
हे मंदिर गुरुवार पेठेत आहे. पूर्वी लोक या मारुती समोर मृतदेह ठेवून रडत असत. म्हणून ला रड्या मारुती असे नाव पडले.
8) उंटाड्या मारुती
पुण्यात रास्ता पेठेत केईएम हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफीला त्या हॉस्पिटल समोर थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा म्हणून त्याला उंटाड्या मारुती असे नाव पडले
9) डुल्या मारुती
पुण्यात हे मंदिर गणेश पेठेतील लक्ष्मी रोडवर आहे. हे मंदिर खूप पूर्वी स्वामी समर्थांनी बांधले आहे असे म्हणतात. पानिपतच्या युद्धात आपले मावळे अहमद शहा अब्दालीशी लढत होते. ते युद्ध अत्यंत गंभीर होतं. युद्धाचे हादरे या मारुतीला देखील बसू लागले. तो अक्षरशः डुलू लागला. म्हणून त्याला डुल्या मारुती असे म्हणू लागले.
10) भांग्या मारुती
पुण्यात शिवाजी रोडवर रामेश्वर चौक आहे. त्या चौकात हे मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपती कडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकत असत. भांगदेखील विकली जात असे. म्हणून या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले.
– – वर्षानुवर्षे या मंदिरांची अशीच नावे आहेत. ती नावे बदलण्याचा देखील काही लोकांनी प्रयत्न केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देखील मंदिरांची ही विचित्र नावे बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. ही नावे पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक अस्मितेचा आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत असे लोकांचे ठाम मत आहे. त्यामुळे अजून तरी हीच नावे या मंदिरांना दिली गेली आहेत.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈