मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ४ – संत सोयराबाई…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ४ – संत सोयराबाई… ☆ सौ शालिनी जोशी

संत सोयराबाई या संत चोखोबांची पत्नी होत्या. १४ व्या शतकातील मंगळवेढ्याचे हे कुटुंब. नवऱ्याबरोबर ग्राम स्वच्छतेत काम करणाऱ्या सोयराबाई पण त्यानी सांगितलेले तत्त्वज्ञान अचंबित करते. जातीव्यवस्थेला प्रश्न विचारून दलीतांच जगणं त्यांनी वेशीवर मांडलं. त्यांना चोखोबा गुरुस्थानी होते. चोखोबांची सगुणभक्ती, नामभक्ती, अभंग रचना या अध्यात्मिक जगाबरोबर त्यांच्या गरिबीतल्या संसारातही त्या अर्धांगिनी होत्या. नामस्मरणातून त्यांनी भक्तीयोग सांगितला. त्या म्हणतात,

नामेची पावन होती जगी जाण l नाम सुलभ म्हणा विठोबाचे ll

संसार बंधने नामेचि तुटती l भक्ती आणि मुक्ती नामापाशी ll

त्यांची नामभक्ती हे त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. असे ९२ अभंग त्यांनी लिहिले आणि अभिमानाने स्वतःचा उल्लेख ‘महारीचोखियाची’ असाच केला. त्यांच्या अभंगांची भाषा साधी, सरळ, सोपी पण रसाळ आहे. हळूहळू सगुणाच्या वाटेकडून निर्गुणाच्या वाटेकडे त्या चालू लागल्या आणि मग शब्द स्फुरु लागले.

अवघा रंग एक झाला l रंगी रंगला श्रीरंग ll १ ll

मी तू पण गेले वाया l पाहता पंढरीच्या राया ll. २ ll

नाही भेदाचे ते काम lपळून गेले क्रोध काम ll ३ ll

देही असोनि विदेही l सदा समाधिस्थ पाही ll ४ ll

पाहते पाहणे गेले दूरी l म्हणे चोखियाची महारी ll५ ll

किती सोप्या भाषेत सोयराबाईनी आपला अनुभव सांगितला. शेकडो वर्षे लोटली तरी आजही ते शब्द आपलं मन हळव करतात, मंगल करतात. किशोरीताईंच्या स्वर्गीय आवाजाने हा अनुभव अमर केला आहे.

शूद्रांच्या सावलीचाही विटाळ मानण्याचा तो काळ होता. तरीही त्यांनी भागवतांच्या मांदियाळीत मानाचे स्थान मिळवले. समाजाने त्या कुटुंबाचा छळ केला. खालची म्हणून नुसता अपमान नाही तर मारही खावा लागला. ती व्यथा सोयराबाईंच्या अभंगातून दिसते. त्या म्हणतात, ‘हीन हीन म्हणूनी का ग मोकलिये l परि म्या धरिले पदरी तुमच्याl’ विठोबाच्या दर्शनाची आज धरली म्हणून बडव्यांनी चोखोबाना कोंडून मारले. इच्छा असूनही देवाची भेट झाली नाही.

सोयराबाईनी शरीराच्या विटाळा संबंधी धर्मशास्त्रने निर्माण केलेल्या कल्पना साफ नाकारल्या. देहापासून निर्माण झालेली आणि देहात गुंतून पडलेली विटाळाची संकल्पना त्या स्पष्ट करतात. देहाच्या निर्मितीमध्ये विटाळ ही सक्रिय सहभागी झालेला असतो. म्हणून देह आहे तेथे विटाळ असणारच. मग कोणताही वर्ण विटाळातून अलिप्त राहू शकत नाही. असे असेल तर सर्व मानव जातच विटाळलेली, अपवित्र, अस्पृश्य म्हटली पाहिजे. म्हणून स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर केलेला विळालाचा आरोप मानवनिर्मित आहे. असा तर्कशुद्ध युक्तिवाद सोयराबाईनी केला. त्या थेट पांडुरंगालाच प्रश्न विचारतात,

देहासी विटाळ म्हणती सकळ l आत्मा तो शुद्ध बुद्ध ll

देहाचा विटाळ देहीच जन्मला l सोवळा तो झाला कवण धर्म ll

विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान l कोणी देह निर्माण नाही जगी ll

म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी l विटाळ देहांतरी वसतसे ll

 देहीचा विटाळ देहीच निर्धारी l म्हणतसे महारी चोखियाची ll

यातून विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे त्या स्पष्ट करतात.

उशीराने पुत्र प्राप्ती झाल्यावर आनंदीत झालेली सोयरा बारशासाठी विठ्ठलरखमाईला आमंत्रण देते. ‘विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी’ असे ती म्हणते. असे म्हणतात की विठ्ठल तिचे बाळंतपण करण्यासाठी तिच्या नणंदेचे, निर्मलेचे रूप घेऊन एक महिना तिच्या घरी राहिला होता. शेवटी देव भावाचा भुकेला. कर्ममेळा हा सोयराबाईं चा मुलगा. निर्मळा ही नणंद तर बंका हा निर्मळेचा नवरा. हे सर्व कुटुंब विठ्ठल भक्त. सर्वांनी चोखोबांना गुरुस्थानी मानलं होतं. सर्वांच्याच अभंग रचना अर्थपूर्ण व परिस्थितीचे चित्र उभे करणाऱ्या आहेत. पराकोटीचे दारिद्र्य, अपमान, अवहेलना व्यक्त करण्याचे अभंग हेच एकमेव साधन त्यांच्याकडे होते. संतांच्या मांदियाळीत हे कुटुंब वेगळे उठून दिसते.

सोयराबाईंची समाजाचे उपेक्षा केली. त्यांना लिहिला वाचायला येत नव्हतं म्हणून त्या निरक्षर असल्या तरी त्याच खऱ्या सुशिक्षित, सुसंस्कृत ठरतात.

चित्र साभार – संत सोयराबाई अभंग – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana – संत साहित्य 

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आजच्या ६५, ७०, ते ७५ वयोगटाचा जो आईवर्ग आहे तो प्रचंड व्यस्त आहे. खरतर हा आनंदाचा भाग आहे तरी चिडचिड होते.

आईचा योगवर्ग, भिशी, मदत सप्ताह, सत्संग, पूजा, महत्वाच्या भेटी गाठी, बँकेच्या फेऱ्या, वाढदिवस, नाटक अशी एक ना अनेक कामं यामध्ये हा आइवर्ग खूप व्यस्त असतो. आईला फोन केला तरीही वेळ बघा, तिला वेळ आहे का विचारा… आईला आपल्या घरी राहायला बोलवलं तरी तिला Time table बघून मगच एखाद दिवस वेळ असतो. इकडे आल्यावर पण मैत्रिणीचा फोन येणार, ” लेकिकडे गेलात का, उद्या येता ना पण, आपलं हळदीकुंकू ठरलं आहे. ग्रुप वर टाकलंय “

झालं.. आईची लगबग सुरू… शेवटी मला म्हणणार, तूच ये गं निवांत तिकडे रहायला..

आईला आता वेळच नाही आपल्यासाठी? हे मनात येऊन जातं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं. या किती आनंदी राहतात! यांच्या ग्रुपला एकदा भेटायला गेले होते, मस्त धमाल असते. Gossip वैगेरे काही नाही, सूना बिना सगळं विसरून एक एक उपक्रम चालू असतात. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन चालू असतं. त्यांचे ते काही तास मस्त जातात. आर्थिक स्वातंत्र्य आणि तब्येतीची काळजी घेतल्याने त्यांची सेकंड इनिंग मनासारखी चालू आहे. उगाच कुठल्याही गोष्टीत अडकत नाहीत. समविचारी, समदुःखी आणि सम वयस्कर लोकांमध्ये राहणे जास्त आनंद मिळतो.

मला आठवतं माझ्या आजीला असा ग्रुप नव्हता. मंदिरात वैगेरे थोडा वेळ जायचा. त्यामुळे सूना नणंद नातवंडं मुलं इतकंच जग. घरात तेच तेच विषय.. आर्थिक स्वातंत्र्य ही नव्हतं. पण आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. मोकळीक मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो.

आनंदी आणि समाधानी आई पाहणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे ही बिझी आई स्वीकारायला हवी. तिची वेळ पाळून तिच्या सोबत मिळतील ते आनंदाचे क्षण रहायला हवं. चला आई आता दुपारी फ्री असेल फोन करून घेते पटकन……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली.

ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या -एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते.

त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती.

यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते.

पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या.

त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ 

शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏

(संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर © सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज) 

लेखक : श्री विश्वास साव

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देव… – कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ देव… – कवी : कुसुमाग्रज  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही.. !

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवी आणि काव्य… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ कवी आणि काव्य… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

कवितेविषयी माझंही एक छोटंसं स्फुट -***

✍ “ कवी व काव्य”

✍ गद्य विद्वत्तेची रांग

पद्य तुक्याचा अभंग

अगदी मोजक्या शब्दात काव्याची केलेली व्याख्या. सर्वांना पटेल आणि रुचेल अशीच,.

कोण असतो कवी ?

काय असतं काव्य ?

व्हिक्टर ह्युगो म्हणतात, त्याप्रमाणे कवी म्हणजे एका देह कोशात सामावलेली समग्र सृष्टी.

एखाद्याला जे काही सांगायचंय ते गद्यात चार पाने किंवा चारशे पाने होईल. आणि तेच काव्यात फक्त चार ओळीत सांगता येईल,. ही आहे ताकद कवितेची.

सुख दुःख, प्रेम विरह, श्रीमंती गरिबी, आई वडिल, परमेश्वर, पंचमहाभुते, भूत भविष्य वर्तमान, कुठलाही विषय कवीला आणि पर्यायाने काव्याला वर्ज्य नाही.

एकाच कवितेतून प्रत्येक रसिक वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो.

कसं असतं काव्य?

 अक्षरे सांधुनी ओली

शब्दांचे राऊळ झाले

अर्थाच्या गाभाऱ्याशी

कवितेचे विठ्ठल आले

आणि अशा काव्याला म्हणावंच लागत नाही की,

” माझे काव्य रसाळ रंजक असे

ठावे जरी मन्मना

” द्याहो द्या अवधान द्या ” रसिकहो

का मी करू प्रार्थना ? “

रसिकहो, कवी या शब्दाच्या भोवती किती आवरणं असावीत? आणि काव्याचे तरी किती प्रकार?

ओवी, अभंग, श्लोक, भूपाळी, आरती, वेचे, कविता, गझल, अष्टाक्षरी, भावगीत, भक्तीगीत, बालगीत, बडबडगीत, बोलगाणी, पाळणे, डोहाळे, उखाणे, लावणी, पोवाडे ‘, समरगीत, स्फूर्ती गीत, देशभक्ती गीत, प्रार्थना अबबब. आणखी कितीतरी आहेत. तरीही कवीची ही काव्यकन्या दशांगुळे उरलेली असतेच.

जवळजवळ प्रत्येक कवीने काव्या विषयी खूप काही लिहून ठेवलंय

केशवसुत तर साभिमान म्हणतात

आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे

आणि हे खरं आहे. श्री रामप्रभू घराघरात पोहचले कारण, वाल्मिकी, तुलसीदास आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्यामुळे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.

कवी हा आपल्याच एका विश्वात रमणारा प्राणी असतो. त्याच्या आनंदात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं. कवीला येणारा अनुभव हा साधुसंतांना येणाऱ्या आध्यात्मिक आनंदाच्याच जातीचा असतो.

कवितेवर जो प्रेम करू शकतो, काव्यानंदाचा जो उपभोग घेऊ शकतो, त्याचा आत्मा कधीही मलीन होणे शक्य नाही. त्याच्या ठायी मानवी दोष, उणिवा, दुबळेपणा, असेलही कदाचित, पण त्याचा आत्मा मात्र सदैव एका तेजोमय वातावरणात भरारी घेत असतो. प्रत्येक कवी हा ” ज्ञानोबामाऊली तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासा इतकाच मोठा आहे.

उंची इमला शिल्प दाखविल

शोभा म्हणजे काव्य नव्हे

काव्य कराया जित्या जिवाचे

जातीवंत जगणेच हवे

राहिला प्रश्न रासिकाचा

रसिकहो थोडेसे तरी काव्य आपल्या वृत्तीत असल्याखेरीज तुम्हाला खऱ्या काव्याचा साक्षात्कार कुठेही होणार नाही.

शेवटी काय ?

कवी मनमोहन म्हणतात

शव हे कवीचे जाळू नका हो

जन्मभरी तो जळतची होता

फुले त्यावरी उधळू नका हो

जन्मभरी तो फुलतची होता.

धन्यवाद!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आई मी आता मोठा झालोय बघ.. करून येऊ दे कि मला एकट्याने जंगलची सफर… घेऊ दे कि मला शिकारीचा अनुभव… कळू दे इतर प्राण्यांना या छोट्या युवराजची काय आहे ती ताकद… जंगल राजांच्या दरबारात मलाही जायचं राजांना मुजरा करायला… आलो आहे आता तर सामिल करुन घ्या मला तुमच्या सैनिक दलात.. मी लहान कि मोठा याचा फारसा करू नका विचार तुम्ही खोलात… बऱ्या बोलानं जे तुमचा हुकूम पाळणार नाहीत… त्यांची काही मी खैर ठेवणार नाही.. जो जो जाईल विरोधात या राजाच्या त्याचा त्याचा करीन मी फडशा फडशा… मग तो कुणी का असेना दिन दुबळा वा बलवान… त्याला राजा पुढे तुकवावी लागेलच आपली मान… राजाच्या पदरी मुलुखगिरीचा होईन मी शिपाईगडी.. स्वारीला जाऊन लोळवीन ना एकेका शत्रूची चामडी.. गाजवीन आपली मर्दुमकी मग खूष होऊन राजे देतीलच मला सरदारकी… मग दूर नाही तो दिवस चढेल माझ्या अंगावरती झुल सरसेनापतीची.. बघ आई असा असेल तुझ्या लेकराचा दरारा… भितील सारी जनाता कुणीच धजणार नाही माझ्या वाऱ्याला उभा राहायला.. मिळेल मला मग सोन्या रूप्याची माणिक मोत्यांची नि लाख होनांची जहागिरी.. जी माॅ साहेब म्हणतील तुला सदानकदा कुणबिणी वाड्यात करताना चाकरी… ते दिवस नसतील कि फार दूरवर बघ यशाचे आनंदाचे नि सुखाचे आपले दारी गज झुलती.. आई मी आता मोठा झालोय बघ करू दे कि मला राजाची चाकरी… “

“अरे तू अजून शेंबडं पोरं आहेस.. अजूनही तुझं तुला धुवायचं कळतं तरी का रे… नाही ना.. मग आपण नसत्या उचापतींच्या भानगडी मध्ये नाक खुपसू नये समजलं… आपला जन्म गुलामगिरी करण्यासाठी झालेला नाही.. ताठ मानेने नि स्वतंत्र बाण्याने जगणारं रे आपलं आहे कुळ… जीवो जीवस्य जीवनम हाच आहे आपल्या जगण्याचा मुलमंत्र… पण म्हणून काही उठसुठ विनाकारण आपण दीनदुबळ्यांची शिकार करत नाही… जगा आणि जगू द्या हाच निर्सागाचा नियम आपण पाळत असतो… आणि अत्याचार कुणी करत असेल इथे तर त्याला सोडत नसतो.. पण जे काही करतो ते स्वबळावर… कुणाच्या चाकरीच्या दावणीला बांधून गुलामगिरीचं जिणं कधीच जगत नाही… त्यांनी म्हटलं पाहिजे असा कनवाळू राजा दुसरा आम्ही कधी पाहीलाच नाही… असा ठेवलाय आपण प्रेमाचा दरारा सगळ्या जंगलाच्या वावरात… म्हणून तर आजही आपलं आदरानं नावं घेतलं जात घराघरात… तुला व्हायचं ना मोठं मग हे स्वप्न तू बाळगं आपल्या उराशी… राज्यं असलं काय नि नसलं काय काही फरकच पडत नसतो आपल्याला असल्या टुकार, लबाड, विचाराशी… आपणच आपल्याला कधी राजे म्हणवून घ्यायचंय नाही ते रयतेने विनयाने, आदराने म्हणत असतात ते पहा ते निघालेले दिसताहेत ना ते आमचे राजे आहेत… समजलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

गुंडीचं उडुपी हॉटेल –

श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या अन्नदान उपक्रम मुळे माझे मन मागे मागे अगदी जुन्या पुण्यात पोहोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते गुंडीचं उडुपी हॉटेल सकाळ ऑफिस कडे जाणारा श्री जोगेश्वरी च्या जवळचा बोळ म्हणजे चालू करांचा बोळ. ‘बोळ’ हा त्यावेळचा परवलीचा शब्द होता. कारण तिथून पुढे वेश्यावस्ती लागत होती पानाचा तोबरा काजळ, केसांचे फुगे, रंगीबेरंगी साड्या, लाल भडक ओठ अशा त्या नेहमी नटून खिडकीत बसून असायच्या. आम्हाला तिथे जायला बंदी होती. पण का?हे काही कळायचं नाही, आणि विचारायची प्राज्ञा पण नव्हती शनिवार वाड्यावर किंवा जिजामाता बागे कडे जायला त्या बोळा चा शॉर्टकट होता. एकदा हिम्मत करून आम्ही मैत्रिणी तिथून गेलो आमचे भेदरलेले चेहरे बघून त्या हंसायला लागल्या हातवारे करून डोळे मिचकावून आम्हाला जेव्हा त्या बोलवायला लागल्या नां तेव्हा अहो!आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली एका दमात आम्ही तो बोळ ओलांडला. शालू करांच्या बोळ्याच्या तोंडाशी असलेल्या गुंडीच्या हॉटेलमध्ये त्या बायका राजरोस पणे शिरायच्या. जोगेश्वरीच्या खिडकीतून आम्ही चोरून बघायचो. चहा पिऊन बनपाव खाऊन पैसे न देता बेधडक त्या बाहेर पडायच्या. नवलच वाटायचं बाई आम्हांला! पै न पै वसूल करणारे हॉटेल मालक हात चोळत बसायचे. आणि तो तांडा गेल्यावर त्यांचा उद्धार करून डोळे गरागरा फिरवायचे. आमच्याकडून मात्र एका गोळीचे पाच पैसे पण सोडायचे नाहीत असं वाटायचं वाचले तर ते पाच पैसे उद्या उपयोगी पडतील. कधी कधी तर गोळी घेऊन पाच पैशाचं गाणं मुठीत आवळून पैसे न देता पळायचा आमचा विचार असायचा, हे लक्षात आल्यावर मालक ओरडायचे, “ए चाललात कुठे? गोळीचे पैसे टाका. पैसे कुणी द्यायचे तुमच्या काकांनी की मामांनी?त्या बायकांना सूट देणारे मालक आपल्याला गोळ्या फुकट का देत नाही या विचारांनी नाक फुगवून पाय आपटत आम्ही हॉटेलच्या पायऱ्या उतरायचो. गुंडी बारा महिने बंडी (जाकिट) घालायचे. अस्सा राग यायचा त्यांचा. सुरेश माझा भाऊ जरा बंडं होता. तो म्हणाला एक दिवस मी या गुंडी मालकांच्या बंडीचं बटणचं तोडणार आहे त्यावेळच्या पोरकटपणाचे आता हसू येतयं. ज्येष्ठ नागरिकात जमा झालेले आम्ही म्हणजे मी आणि सुरेशपरवा ह्या आठवणीने पोट धरून धरून हसलो. पण बरं का मंडळी! आमच्याकडून पैन पै वसूल करणारे गुंडी तसे सत्पात्री दान देणारेही होते. दुकान उघडल्यावर पहिला चहाचा कप दाराशी आलेल्या भिकाऱ्याला ते द्यायचे आणि नंतर भटक्या कुत्र्यांसाठी पावाची लादी मोकळी करायचे. ते पुढे आणि कुत्री त्यांच्या मागे हा सीन बघितल्यावर आम्ही म् ओरडायचो, ” अरे ते बघ दत्त महाराज चाललेत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आम्हाला कंजूष वाटणारे श्री गुंडी कुत्र्यांना देवासारखे वाटायचे. जोगेश्वरी च्या परिसरात प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देण्याची दानत होती. सुवासिनी सणावारी आवर्जून मंदिरात येणाऱ्या गरीब ब्राह्मणांना पोटभर जेवायला घालून वस्त्रदान दक्षिणा देऊन संतुष्ट करायच्या. नवरात्रात माझ्या आईकडे तर नऊ दिवस सवाष्ण असायची. गरिबी असली तरी घासातला घास मुंजा, ब्राह्मणांसाठी गाईसाठी पण बाजूला काढला जायचा. श्रावण, भाद्रपद, अश्विन महिन्यात तर दानशूरतेचा कळस गाठला जायचा, कुमारीका सवाष्णी श्रीजोगेश्वरीच रूप समजून पुजल्या जायच्या आणि मायेची सावली ती जोगेश्वरी माता अनेक रूपातून अनेकांना दर्शन देऊन तृप्त करायची. अगदी खरं आहे हे! जोगेश्वरीची लीला तिचा महिमाच अघाध आहे. जय अंबे जय जोगेश्वरी माता की जय

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

लग्नाचे मस्त रिसेप्शन सुरू होते. लोक रांगेमध्ये नवरदेव- नवरीला शुभेच्छा देत… भेटवस्तू देत…. फोटो काढत…. पुढे पुढे सरकत होते. झाल्यावर जेवणाचा मस्त आस्वाद घेत होते.

“अरे.. अरे…. हे काय करतोस? चक्क नोट फाडतोस. “

असा मोठाsss आवाज झाल्यामुळे, हॉलमधील सर्वांनीच स्टेजकडे वळून पाहिले. काहींना कसला गोंधळ आहे… तो कळेच ना… म्हणून सर्वजण स्टेज जवळ जमा झाले.

“अरेssss नकुल ! काय करतोयस तू? चक्क पाचशेची नोट फाडली! हा माझा अपमान आहे. असं कोणी करता का?”

असं म्हणून त्या जवळच्या नातेवाईकाने, नवरदेवाशी भांडायला सुरुवात केली. तेव्हा हॉल मधे कुजबूज सुरू झाली. त्यांच्या भांडणावरून एवढे कळाले की,

भेट म्हणून आलेले पैशाचे पाकीट तिथेच फोडून त्यातील पाचशेची नोट सर्वांसमोर फाडली होती. हे सर्व पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. कारण नवरदेव.. नकुल… हा अतिशय समजूतदार मुलगा होता. तो असे काही करेल; असे कुणालाही वाटले नव्हते. थोड्या वेळ शांतता पसरली. जेवणाऱ्यानीही आपले जेवण मध्येच थांबवले.

सर्वांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून, नकुलने माईक हातात घेतला आणि तो शांतपणे बोलू लागला.

“मी असे केले; त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप आश्चर्य आणि माझा रागही आला असेल. पण यामागेही काही कारण आहे. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सर्वजण खूप चांगले लोक आहात. छान पैकी जेवणाचा आस्वाद घेत आहात. पण मला असे आढळले की ९०% लोक आपले जेवणाचे ताट अर्धवट जेवून, जेवणाच्या ताटात बरेचसे पदार्थ टाकून देत आहेत. कुणी कुणी तर वाटीभर भाजी घेऊन, एक घास खाऊन, तशीच वाटी डस्टबिन मध्ये टाकली. असे आजच नाही तर; बऱ्याच ठिकाणी मी पाहतो. मला तुमचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही… तुम्ही पोटभर जेवा पण अन्न वाया घालवू नका. भले गर्दी असेल तर पदार्थ संपल्यावर पुन्हा रांगेत उभे राहावे लागते; पण फार वेळ नाही लागत हो! एकदम वाढून घेतल्याने अंदाज येत नाही. म्हणून अन्न तसेच टाकून दिले जाते. आज आपल्या भारतात कितीतरी जण उपाशी झोपतात. तुम्हाला मी एक ५००रुपयाची नोट फाडली तर किती राग आला!!! पण…. तुम्ही जेव्हा आपल्या ताटात बरेच उष्टे अन्न टाकता तेव्हा पाचशे रुपये पेक्षा जास्त किमतीचे अन्न वाया घालवत आहात;; पण ते कळून येत नाही…. आपणाला याची जाणीवही नसते किंवा जाणवत असेल तरी, दुर्लक्ष करतो का आपण? एक चपाती किंवा एक भाजी किंवा कुठलाही अन्नपदार्थ बनवण्यासाठी, ते उगवण्यापासून ते तुमच्या ताटापर्यंत खाण्यायोग्य बनवण्यासाठी… अनेक जणांचे हात लागलेले असतात. त्यांची मेहनत असते… वेळ आणि पैसा घालवलेला असतो! मग तो कोणाचा का असेना!!

‘मला कुठे खर्च येतो ?

मी कशाला काळजी करू?’

असा विचार असतों का तुमच्या मनात?

जी गोष्ट अन्नासाठी तीच पाण्याबाबत आहे.

हे तुम्हाला दर्शविण्यासाठी, मी पाचशेची नोट फाडली. आता तुम्हाला वाटेल की, तेवढ्यासाठी नोट फाडायची काय गरज? नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण काळजी करू नका! ही फाडलेली नोट खोटी होती. आणि या माझ्या छोट्याशा नाटकात माझा हा मित्रही सहभागी होता. “

असे म्हणून त्याने त्याला मिठी मारली. दोघांनी भांडण्याचे उत्तम नाटक केले होते.

हे ऐकल्यावर सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. एव्हाना प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आणि राग निघून गेला होता.

त्यानंतर नकुलने सर्वांना शपथ घ्यायला लावली की,

“मी कुठेही.. म्हणजे 

घरामध्ये…

हॉटेलमध्ये….

लग्नामध्ये….

अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. “

त्या रिसेप्शन मधून बाहेर पडलेला प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती… सुसंस्कृत होऊन घरी गेला.

प्रत्येकाला तो विचार खूप म्हणजे खूपच आवडला.

लेखक : सविता भोसले / सुनील इनामदार

मो.  ९८२३०३४४३४.

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.

कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.

मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.

मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”

ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “

मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.

संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – ही घटना म्हणजे – दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्या क्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी बघणारं ठरलं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!!)

“हे गजानन महाराज कोण गं?” त्यादिवशी मी कांहीशा नाराजीने ताईला विचारलेला हा प्रश्न. पण ‘ते कोण?’ हे मला पुढे कांही वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर समजलं. अर्थात तेही माझ्या ताईमुळेच. तिच्या आयुष्यात आलेल्या, तिला उध्वस्त करू पहाणाऱ्या चक्रीवादळातही गजानन महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच ती पाय घट्ट रोवून उभी राहिलीय हे मी स्वतः पाहिलं तेव्हा मला समजलं. पण त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती! तिचं उध्वस्त होत जाणं हा खरं तर आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का होता! या पडझडीत ते ‘आनंदाचं झाड’ पानगळ सुरू व्हावी तसं मलूल होत चाललं.. आणि ते फक्त दूर उभं राहून पहात रहाण्याखेरीज आम्ही काहीही करू शकत नव्हतो. नव्हे आम्ही जे करायला हवे होते ते ताईच आम्हाला करू देत नव्हती हेच खरं. तो सगळाच अनुभव अतिशय करूण, केविलवाणा होता आणि टोकाचा विरोधाभास वाटेल तुम्हाला पण तोच क्षणभर कां होईना एका अलौकिक अशा आनंदाचा साक्षात्कार घडवणाराही ठरणार होता !!

एखाद्या संकटाने चोर पावलांनी येऊन झडप घालणे म्हणजे काय याचा प्रत्यय आम्हा सर्वांना आला तो ताईला गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा! या सगळ्याबाबत मी मात्र सुरूवातीचे कांही दिवस तरी अनभिज्ञच होतो. मला हे समजलं ते तिची ट्रीटमेंट सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर. कारण मी तेव्हा विदर्भ मराठवाड्यातल्या ब्रॅंचेसचा ऑडिट प्रोग्रॅम पूर्ण करण्यांत व्यस्त आणि अर्थातच घरापासून खूप दूर होतो. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे मला वेळ मिळेल तसं मीच तीन चार दिवसांतून एकदा रात्री उशीरा लाॅजपासून जवळच असलेल्या एखाद्या टेलिफोन बूथवरून घरी एसटीडी कॉल करायचा असं ठरलेलं होतं. कामातील व्यस्ततेमुळे मी त्या आठवड्यांत घरी फोन करायचं राहूनच गेलं होतं आणि शिळोप्याच्या गप्पा मारायच्या तयारीने नंतर भरपूर वेळ घेऊन मी उत्साहाने घरी फोन केला, तर आरतीकडून हे समजलं. ऐकून मी चरकलोच. मन ताईकडे ओढ घेत ‌राहिलं. ताईला तातडीनं भेटावंसं वाटत होतं पण भेटणं सोडाच तिच्याशी बोलूही शकत नव्हतो. कारण तिच्या घरी फोन नव्हता. ब्रँच ऑडिट संपायला पुढे चार दिवस लागले. या अस्वस्थतेमुळे त्या चारही रात्री माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. आॅडिट पूर्ण झालं तशी मी लगोलग बॅग भरली. औरंगाबादहून आधी घरी न जाता थेट ताईला भेटण्यासाठी बेळगावला धाव घेतली. तिला समोर पाहिलं आणि.. अंहं… ‘डोळ्यात पाणी येऊन चालणार नाही. धीर न सोडता, आधी तिला सावरायला हवं.. ‘ मी स्वत:लाच बजावलं.

“कशी आहे आता तब्येत?”… सगळ्या भावना महत्प्रयासाने मनांत कोंडून टाकल्यावर बाहेर पडला तो हाच औपचारिक प्रश्न!

“बघ ना. छान आहे की नाही? सुधारतेय अरे आता.. “

ताईच्या चेहऱ्यावरचं उसनं हसू मला वेगळंच काहीतरी सांगत होतं! ती आतून ढासळणाऱ्या मलाच सावरू पहातेय हे मला जाणवत होतं.

केशवरावसुद्धा दाखवत नसले तरी खचलेलेच होते. त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून, उतरलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलता बोलता भरून येतायत असं वाटणाऱ्या डोळ्यांवरून, त्यांचं हे आतून हलणं मला जाणवत होतं!

मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान. त्यांची समजूत तरी कशी आणि कोणत्या शब्दांत घालावी समजेचना.

“आपण तिला आत्ताच मुंबईला शिफ्ट करूया. तिथे योग्य आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतील. ती सगळी व्यवस्था मी करतो. रजा घेऊन मी स्वत: तुमच्याबरोबर येतो. खर्चाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. ताई सुधारेल. सुधारायलाच हवी…. “

मी त्यांना आग्रहाने, अगदी मनापासून सांगत राहिलो. अगदी जीव तोडून. कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं, उशीर झाला,.. आणि ताईची तब्येत बिघडली तर.. ? ती.. ती गेली तर?.. माझं मन पोखरू लागलेली मनातली ही भीती मला स्वस्थ बसू देईना.

केशवरावांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आणि मलाच धीर देत माझी समजूत घातली. बेळगावला अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि तिथे सर्व उपचार उपलब्ध आहेत हे मला समजावून सांगितलं. त्यांनी नीट सगळी चौकशी केलेली होती आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वदृष्टीने विचार केला तर तेच अधिक सोयीचं होतं. मी त्यापुढं कांही बोलू शकलो नाही. ते सांगतायत त्यातही तथ्य आहे असं वाटलं, तरीही केवळ माझ्याच समाधानासाठी मी तिथल्या डॉक्टरांना आवर्जून भेटलो. त्यांच्याशी सविस्तर बोललो. माझं समाधान झालं तरी रूखरूख होतीच आणि ती रहाणारच होती!

केमोथेरपीच्या तीन ट्रीटमेंटस् नंतर ऑपरेशन करायचं कीं नाही हे ठरणार होतं. ती वाचेल असा डॉक्टरना विश्वास होता. तो विश्वास हाच आशेचा एकमेव किरण होता! केमोचे हे तीन डोस सर्वसाधारण एक एक महिन्याच्या अंतराने द्यायचे म्हणजे कमीत कमी तीन महिने तरी टांगती तलवार रहाणार होतीच आणि प्रत्येक डोसनंतरचे साईड इफेक्ट्स खूप त्रासदायक असत ते वेगळंच.

ताईचं समजल्यावर माझी आई तिच्याकडे रहायला गेली. त्या वयातही आपल्या मुलीचं हे जीवघेणं आजारपणही खंबीरपणे स्वीकारून माझी आई वरवर तरी शांत राहिली. घरातल्या सगळ्या कामांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. तिच्या मदतीला अजित-सुजित होतेच. औषधं, दवाखाना सगळं केशवराव मॅनेज करायचे. ताईचे मोठे दीर-जाऊ यांच्यापासून जवळच रहायचे. त्यांचाही हक्काचा असा भक्कम आधार होताच. हॉस्पिटलायझेशन वाढत राहिलं तेव्हा योग्य नियोजन आधीपासून करून तिथं दवाखान्यांत थांबायला जायचं, आणि एरवीही अधून मधून जाऊन भेटून यायचं असं माझ्या मोठ्या बहिणीने आणि आरतीने आपापसात ठरवून ठेवलेलं होतं. प्रत्येकांनी न सांगता आपापला वाटा असा उचलला होता‌. तरीही ‘पैसा आणि ऐश्वर्य सगळं जवळ असणाऱ्या माझं या परिस्थितीत एक भाऊ म्हणून नेमकं कर्तव्य कोणतं?’ हा प्रश्न मला त्रास देत रहायचा. जाणं, भेटणं, बोलणं.. हे सगळं सुरू होतंच पण त्याही पलिकडे कांही नको? सुदैवाने ताईच्या ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च करायची माझी परिस्थिती होती. मला कांहीच अडचण नव्हती. ‘हे आपणच करायला हवं’ असं मनोमन ठरवलं खरं पण आजवर माझ्यासाठी ज्यांनी बराच त्याग केलेला होता त्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि भावाला विश्वासात न घेता परस्पर कांही करणं मलाच प्रशस्त वाटेना. मी त्या दोघांशी मोकळेपणानं बोललो. माझा विचार त्यांना सांगितला. ऐकून भाऊ थोडा अस्वस्थ झाला. त्याला कांहीतरी बोलायचं होतं. त्याने बहिणीकडं पाहिलं. मग तिनेच पुढाकार घेतला. माझी समजूत काढत म्हणाली, ” तिच्या आजारपणाचं समजलं तेव्हा तू खूप लांब होतास. तू म्हणतोयस तशी तयारी मी आणि हा आम्हा दोघांचीही आहेच. शिवाय मी आणि ‘हे’ सुद्धा खरंतर लगेचच पैसे घेऊन बेळगावला भेटायला गेलो होतो. केशवरावांना पैसे द्यायला लागलो, तर ते सरळ ‘नको’ म्हणाले. ‘सध्या जवळ राहू देत, लागतील तसे खर्च करता येतील’ असंही ‘हे’ म्हणाले त्यांना, पण त्यांनी ऐकलं नाही. “मला गरज पडेल तेव्हा मीच आपण होऊन तुमच्याकडून मागून घेईन’ असं म्हणाले. मला वाटतं, या सगळ्यानंतर आता तू पुन्हा त्यांच्याकडे पैशाचा विषय काढून लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. जे करायचं ते आपण सगळे मिळून करूच, पण ते त्या कुणाला न दुखावता, त्यांच्या कलानंच करायला हवं हे लक्षा़त ठेव. ” ताई म्हणाली.

केशवराव महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. फंड आणि ग्रॅच्युइटी सगळं मिळून त्यांना साडेतीन लाख रुपये मिळालेले होते. अजित आत्ता कुठे सी. ए. ची तयारी करीत होता. सुजितचं ग्रॅज्युएशनही अजून पूर्ण व्हायचं होतं. एरवी खरं तर इथून पुढं ताईच्या संसारात खऱ्या अर्थाने स्वास्थ्य आणि विसावा सुरू व्हायचा, पण नेमक्या त्याच क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच येऊन उभं राहिल्यासारखं ताईचं हे दुर्मुखलेलं आजारपण समोर आलं होतं.. !

“तुला.. आणखी एक सांगायचंय…. ” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहिण म्हणाली.

पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसे उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares