☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन?’
कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.
भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.
कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.
‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.
इकडे आमच्या विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही…. औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.
खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही… पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.
रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?
पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?
तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?
…… आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.
…… अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.
…… मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.
……. माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!
☆
लेखक : श्री विवेक घळसासी
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पहिल्या प्रकारचे वाचक हे एखादा विचार वाचला की तात्काळ व्यक्त होणारे म्हणजेच प्रतिक्रिया देणारे असतात.
दुसऱ्या प्रकारचे वाचक एखादा विचार वाचल्यावर त्यावर चिंतन मनन करून त्या विचाराला योग्य शब्दात प्रतिसाद देणारे असतात.
आणि तिसऱ्या प्रकारची माणसे विचार वाचल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. पण स्वतः मात्र त्या विचारावर विचार करत असतातच. अशा वाचकांना ‘सायलेंट रीडर्स’ असे म्हणतात. कुठल्याही ग्रुपमध्ये अशा सायलेंट रीडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
तेव्हा आपण जे काही विचार मांडतो त्या विचारावर इतरांची व्यक्त व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. त्यासाठी तो माणूस विवेकी नाही, त्याला बोलायची भीती वाटते, अशा पद्धतीचे आपले मत मांडणे हेच तर खरे अविवेकीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.
आपण जे विचार मांडतो ते दोन गोष्टींसाठी… एक तर आपल्याला आपले मन मोकळे करायचे असते म्हणून आणि दुसरं म्हणजे तो विचार मांडून इतरांकडून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळवायचे असते म्हणून.
मग अशा वेळेला आपल्या विचारावर कोण किती प्रतिसाद देतोय हा मुद्दा अत्यंत गौण आहे. आपण आपले विचार मांडत राहावे, वाचणारे वाचत राहतील, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देत राहतील, प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया देतील आणि सायलेंट रीडर्स तो विचार वाचून त्यांना पटला असेल तर स्वतःमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करत रहातील अन्यथा वाचून सोडून देतील. या पलीकडे आपला विचार मांडल्यानंतर त्यावर कोणी कसे व्यक्त व्हावे यावर आपला कुठलाही हक्क राहत नाही. म्हणून आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दोष न देता शांतपणे आपले विचार मांडत राहावे हेच खरे.
माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.
तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे
“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.
त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..
“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.
पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,
“बच्चे कंपनी चलो”
मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.
एक आजोबा म्हणाले,
“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “
“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.
झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….
एक जण तर स्पष्ट म्हणाली,
” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…
“लगेच आजचं सांगायच”
” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”
तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.
जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.
मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.
गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.
घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..
” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “
” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.
” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”
” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”
” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “
दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.
गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.
सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.
गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…
काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.
मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.
तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..
मुलं म्हणत होती,
” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “
“ताई किती छान आहे”
” ताई तु मला फार आवडतेस”
“ताई तु जाऊ नको ना”
ताई तुच आम्हाला हवी आहेस”
” ताई किती छान शिकवते”
मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….
ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…
सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…
तिचेही डोळे वहात होते…
ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…
मी बघत होते…
माझ्या मनात विचार आला..
या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.
या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…
ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.
मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..
त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…
त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…
आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.
” किती बारीक झाली आहे “
नाहीतर… ” किती जाड झाली आहे”
” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “
“केस पांढरे झाले आहेत.. “
“डाय तरी करायचा “
“ही नीटच राहत नाही “
“कसले कपडे घातले आहेत”
” ईतक्यातच चष्मा लागला का? “
” पोट किती सुटलय… “
वगैरे वगैरे…..
तशी यादी खूपच मोठी आहे…
किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….
हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…
☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!”☆ श्री संभाजी बबन गायके☆
श्री. बजरंग निंबाळकर
भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!
मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!
शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!
आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!
त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.
त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!
शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!
थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!
अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!
खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!
त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!
(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)
☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे ‘चष्मा’ एक साधन. वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्या समोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.
इतिहास
काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ. स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला. प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.
दृष्टिदोष
विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.
गोलीय भिंगे
नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.
चित्याकृती भिंगे
दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.
लोलक बहुकोनी भिंगे
कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.
द्विकेंद्री भिंगे
लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.
त्रिकेंद्री भिंगे
यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.
विशेष प्रकार
उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.
प्रायोगिक अवस्थेतील चष्मे
१) अंधांसाठी चष्मा
विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.
२) अंतरानुसार बदलणारा चष्मा
द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.
संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण
(संदर्भ : मराठी विश्वकोश/गोखले, श्री. पु. टोळे )
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
“याला म्हणतात” – Positive Thinking 🤣 🤣
— जराशी गंमत
शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे…. मी हातावरील छडीची घाण पुसत असे.
मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो. 😎
माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत, कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत… 🤣 🤣 🤣
मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत… 😅
कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…
उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा. 😮
परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत. 😟 🤣
कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती
माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्या मारायला सांगितल्या जात असत.
त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत. 🤣
मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….
तू शाळेत का येतोस? … तुला ह्याची गरज नाहिये… 🤣
वाह!! काय ते सोनेरी दिवस होते! 😟
अजूनही आठवतात मला!! 😜
………. याला म्हणतात “positive thinking.” 😃😃
सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी……. 😇
☆
लेखक : अज्ञात (म्हणजे …. एक अतिशय अभ्यासू, झुंजार, कर्मठ, विश्वासू आणि जागरूक विद्यार्थी)
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆
चौदाशे वर्षाच्या चांगदेवाना या बारा तेरा वर्षाच्या मुलीने ‘चांगदेव पासष्टीचा’ अर्थ उलगडून सांगितला. ‘चांगा कोरा तो कोराच’ अशा शब्दात चांगदेवांची थट्टा करणारी मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. यांनी तिचे शिष्यत्व पत्करून तिचा गौरवच केला. नामदेव तिच्याविषयी म्हणतात, ‘लहानगी मुक्ताबाई जशी सणकाडी। केले देशोधडी महान संत।’ते योग्यच आहे. हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ठ चांगदेवांना ज्ञान देणारी मुक्ताई खरोखरच जगावेगळी. चांगदेवानी तिला आपली आई मानलं. बौद्धिक, ज्ञानमय, मनोमय मातृत्व मुक्ताबाईंनी चांगदेवाना दिले. चांगदेवाना उद्देशून रचलेल्या पाळण्यात त्या म्हणतात,
समाजाभिमुख व अर्थपूर्ण असे ४० अभंग मुक्ताबाईंनी लिहिले. त्यातील एक प्रसिद्ध अभंग,
मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी।
थोर नवलावर झाला, वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळासी जाय, शेष वंदी त्याचे पाय।
माशी व्याली घार झाली, तेणे मुक्ताई हासली।
समाजातील तीन प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करणारा हा अभंग. विद्वांनानाही विचार करायला लावणारी अशी ही गुढ रचना, लहान वयात मुक्ताबाईंनी केली. यातील पहिली ओळ त्यांचेच वर्णन वाटते.
संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर सासवडला सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थ- यात्रा करत निघाले. १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर अचानक वीज कडाडली. आदिमाता लुप्त झाली. मेहुण येथे त्यांची समाधी आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप असणाऱ्या भावांची ही बहीण आदिमाया मुक्ताई. तिच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवाने केले,
वीज कडाडली निरंजनी जेव्हा। मुक्ताई तेव्हा गुप्त झाली।
अशाप्रकारे अभिमान, अस्मिता, परखडपणा यांचे बरोबर मार्दव व हळूवारपणा यांचे रूप म्हणजे मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याला मुक्ताईनगर नाव दिले आहे.
स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेली, तीन आत्मज्ञानी भावांची बहीण असुनही वेगळे व्यक्तिमत्व असणारी मुक्ताबाई अमर झाली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील पहिली संत कवियत्री ठरली. नामस्मरणाने विदेही होण्याचा मार्ग त्यांनी स्त्रियांना तसेच सर्व लोकांना दाखवला. सदेह मुक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. स्त्री पुरुष समानतेची त्या प्रचारक ठरतात.
☆ दिसतं असावं…… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलाने विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्य नाही लग्न होईस्तोवर, बरं, त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.
धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात.
त्यांच्या वयाचे एकत्र छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्त चौकश्या – तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का – अशाच. कुणाकडे सुनेने, मुलीने मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्त वेळ बसता येतं. पण जेवणं झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग ‘चला लवकर’चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.
आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. ‘आयुष्यमान भव’ हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो.
गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, ‘माणसाने दिसतं असावं रे’. खरंय, माणसाने दिसतं असावं, कोण कधी ‘नसतं’ होईल काय सांगावं?
☆ सैनिकांचा धर्म !!! – मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त) ☆ मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
इंद्रधनुष्य
२ ) “ सैनिकांचा धर्म “ इंग्रजी लेखक : लेफ्ट. कर्नल दिलबाग सिंग दबास मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा ‘४ राजपुताना रायफल्स बटालियन’चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला ‘फौजियों का गांव’ म्हणूनच ओळखले जात असे.
युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले.
काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.
त्यांचा हेका एकच होता – “पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!”
टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, “मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।” (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!”)
दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. ‘१७ जाट’ बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली.
१७ जाट बटालियनच्या ‘डेल्टा’ कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, “दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ. “
एके दिवशी बटालियनच्या ‘ऑप्स रूम’मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल ‘ऑप्स रूम’मध्ये येऊन दाखल झाले.
“अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?” असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, “सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली. ‘४ जाट’चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?”
बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा ‘व्हेल बॅक’ टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी ‘व्हेल बॅक’ टेकडी काबीज केली.
मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीर चक्र’ प्रदान करून सन्मानित केले गेले.
देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोन नावेच आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र ‘राष्ट्र सर्वोपरि’ हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म!
मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈