☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा…
मानाच्या पहिल्या कसब्यातील गणपतीला, श्री गणेशाला कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची प्रार्थना करून, मानाचे आमंत्रण देऊन, मंडळी श्री जोगेश्वरी कडे वळायची. तिथेही जगदंबेला साडीचोळी, ओटी, पत्रिका अक्षत, पान सुपारी देवून मानाच आमंत्रण दिलं जायच. अर्थात श्री गणेश, जोगेश्वरी कृपेने कार्य निर्विघ्नपणे पार पडायचचं आणि वाजंत्री सनईच्या सुरांत शुभमंगल शुभ कार्य साजरं व्हायच. व्हीनस बँड किंवा अप्पा बळवंत चौकातला’ प्रभात ब्रास बँड वरातीची रंगत वाढवायचा. त्याकाळी गाजलेली सुंदर गाणी बँड वर वाजवली जायची. मुलगी सासर घरी गृहप्रवेश करतांना हमखास ‘ जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ‘ हे गाणं बँडच्या सुरातून अलगद बाहेर पडायचं तेव्हां डोळे भरून आलेल्या वधू मायचा पदर डोळ्याकडे जायचा आणि वधू पित्याचा कंठ दाटून यायचा. पाठवणीच्या त्या हळव्या क्षणी बँन्ड वाल्यांच्या सुरेल स्वरांनी सगळ्यांनाच गहिवरून यायच. इतकं ते गाणं बँड वाले अगदी सुरेख, तन्मयतेने वाजवायचे जोडीला कारंजा सारखे उंच उसळणारे भुईनळे लाल, पिवळ्या चांदण्याची बरसात करायचे. झगमग करणाऱ्या गॅस बत्त्या वरातीची शान वाढवायच्या. माझ्या नातवाची चि. यज्ञसेनची मुंज 2012 साली झाली. इतकी दणक्यात आणि अप्रतिम झाली होती की अशी मुंज उभ्या आयुष्यात प्रथमच आम्ही बघितली. डोळ्याचं पारणं फीटलं आणि आमच्या जन्माचं सार्थक झाल. पूर्वीपासून चालत आलेलं प्रसिद्ध ‘खाऊवाले पाटणकरांचे’ दुकान बाजीराव रोडला आहे त्यांनी मौजीबंधनासाठी उत्तम सहकार्य केले होत. गुरुगृही अध्ययनासाठी आश्रमात आलेल्या बटूचा प्रवेश देखावा, इतका सुंदर होता की आम्ही त्या काळात त्या सोज्वळ रम्य वातावरणात पोहचलो. चि. राजेश चि. प्रसाद या दोन्ही मामांसह बटू मांडवात आला माझा हा नातू चि. यज्ञसेन इतका गोड दिसत होता की नजर लागू नये म्हणून, बोट काजळडबी कडे वळलं. मांडवात बटू प्रवेश देखावा अतिशय सुंदर अप्रतिम होता ‘खाऊवाले पाटणकरांनी’ उत्तम योजना केली होती पालखी वजा शामियान्यातून आमचा यज्ञसेन बटू सगळ्यांचे आशिर्वाद घेत शुभ कार्य मंडपाच्या दिशेने कार्यालयात प्रवेश करीत होता मातृभोजनाला बसलेली माझी लेक सौ मीनल व चि. यज्ञसेंनच्या चेहऱ्यावरचे तेज बघून जिजामाता आणि शिवबा आठवला. आमचे जावई श्री सुजित सु. जोशी कमालीचे हौशी आहेत पेशवे काळात पुण्यामध्ये शुभ, आनंद प्रसंगी हत्तीवरून साखर वाटली जायची आमच्या जावयांनी चि. यज्ञसेनची भिक्षावळ त्याला हत्तीवर बसवून साजरी केली. पगडी घातलेला पेशवाई थाटातला मुंज मुलगा अंबारीत खुलून दिसत होता. ‘हौसेला मोल नाही आणि हौसेला तोड नाही’ म्हणतात ही म्हण जोशी कुटुंबांनी सार्थ करून दाखवली. हा नेत्र दीपक सोहळा अवर्णनीय होता. पुण्यातले प्रत्येकजण शुभ मौज्य बंधन, शुभविवाह सोहळा श्री गणेश श्री जोगेश्वरीचे आशिर्वाद घेऊनच साजरा करायचे आणि आजतागायतही करतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या श्रीगणेशाला आणि श्री जोगेश्वरीला माझा नमस्कार..
☆ वाय फाय बालपण… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
(टॉस झाला राज्यावर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.) — इथून पुढे —
इकडे राजा आणि पक्क्याने डाव सुरु केला. हातात दांडू घेऊन चिंन्नी ठेवली व उंच हवेत उडवत दांडूने जोरात मारली. चिन्नी जोरात हवेतून भिरभिरून उडाली राज्या कॅच घ्यायच्या प्रयत्नात पळत पळत गेला खरा त्याचा लक्ष्य वर हवेत होतं. वर बघत बघत तो पळत होता, नेमक वाटेत शांता पाण्याची घागर घेऊन जात होती. ती आडवी आली अन राज्याची धडक शांतला लागली. शांताची पाण्याची घागर पडली आणि राज्या शांताच्या अंगावर पडला. पारावर बसलेली लोक आली अन राज्याला बडवायला लागली. तस शांता पण लाजून चूर झालेली तिचा परकर पूर्ण भिजला होता. घोडे आणि घोडेसवार ह्यांना काही कळलंच नाही काय झाले ते. पक्क्याने तर चावडीच्या मागच्या बोळातून पसार झाला. राज्या बसलेल्या लोकांच्या तावडीत सापडला.
घोडे अन घोडेसवार ह्यांच्या ढुंगणावर काठीने मार बसल्यावर ती उठली आणि मिळलं त्या रस्त्याने पळत सुटली. तेवढ्यात शांताची आई काठी घेऊन आली तस गाव गोळा झाले. सगळ्यांनी सुटका करून घेऊन मारुतीच्या देवळात लपून बसली. राज्या अन पक्क्या पण तिथे आले, काय झाले ते पक्क्याने सांगताच जोर जोरात हसत बसली.
शांता लग्नाला आलेली पोर दिसायला देखणी, सावळा रंग मॅट्रिक पास होऊन घरातील घरकाम करत होती. तिची आई गौरा तणतणत काठी घेऊन आली.
मेल्यानो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत. माजलेत नुसते. आता दावतेच माझा हिसका असं म्हणत इकडं तिकडं मुलांना हुडकायला लागली. तेव्हड्यात बायक्का आली म्हणाली. गौरा गावची पोर हैती, लहान हाईत. खेळता खेळता असं व्हतंय. जा गुमान तूझ्या घरला आता.
मी सांगते त्यांना असं म्हटल्यावर गौरा घरी गेली. अन पडदा पडला.
तस सगळी जण मारुतीच्या देवळातन निसटली आणि सरकार वाड्याच्या पटांगणात आली.
ती जागा पूर्ण पटवर्धन सरकाराची पडीक होती. तिथे कोण पण जात नसे.
तिथलाच चिरर घोडा डाव परत चालू झाला. पक्क्याने परत चिन्नी दांडू वर घेतला आणि हवेत उंच उडवत मारला.
मगाचीच घोडी त्यावरचे घोडे स्वार परत बसलेले. असच खेळ खेळता खेळता चिन्नी उंच उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडली. त्याला जोरात लागलं. तस सगळीच मुलानी घर जवळ केलं.
दुपारची जेवण झाली तस परत गल्लीत मुलं जमा झाली. सगळ्यांनी हातात हात घेत चकले. नंन्तर जो शेवट राहिला त्याला घोडा केला. आणि त्याच्यावर पळत येऊन पाठीवर दोन हात ठेवायचे आणि दोन तंगड्या फासून त्याला ओलांडून जायचे. एकलम खाजा दुब्बी राजा तिराण भोजा चार चौकडी असा खेळ सुरु झाला ओलांडून असं करता करता एकाला पाठीवरून ओलांडता आले नाही. दोघेही पडली त्यातला गजाच्या नाकाला मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले तसा डाव सम्पवण्यात आला.
फाल्गुनी महिना तस उन्ह सुरु झालेलं. शिमग्याचे तसेच वार्षिक परीक्षेचे वेध लागलेले. त्यावेळी शौचालये नव्हती. निसर्ग विधि उघड्यावर ओढ्या काठी किंवा गावंधरीत शेतात होतं असे. आमची सगळीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी विधिला जात. कारण कुठे कुठे शेणकुटाचा (गोवऱ्या ) हुडवा रचला आहे. ते पाहून ठेवत. जवळपास कोण आहे, नाही ह्याची पण दखल घेतला. कारण शिमग्याला तो हुडवाचं उचलायचा आमचा प्लॅन असे. प्रत्यके हुडव्यात जवळपास हजार बाराशे शेणकूट असतात.
एक दोन हुडवा उचलला तरी आमची होळी सात आठ फूट उंच जाणारी होती. झाले मग हे काम रात्रीच दहा नंन्तर करायच असेलतर घरी कळणार. म्हणून परीक्षा जवळ आली अभ्यासाला आमच्या घरी झोपायला जाणार असं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या घरात सांगे. त्यामुळे कुणालाही संशय येत नसे.
आमचा लांब लचक सोपा होता सहजपने दहा पंधरा मुलं मावत होतीच. एक पान पट्टी ( गुडार – झाडीपट्टी ) हंथरली की सगळेच जण झोपत. फक्त येताना ते त्यांची वाकळ, चादर काहीतरी घेऊन येत असतं. एवढा जामा निमा पुरेसा होता.
घरातले दहा पर्यंत झोपत. आम्ही बाहेरून कडी लावत असू जेणेकरून घरात त्रास नको म्हणून. दोन दिवस अभ्यास झाला. पुढे दहा नंन्तर दोन रिकामी पोती घेउन दोन टीम करून पसार.
वेशीबाहेरची, हाळ विहीर आजूबाजूला एक टीम दुसरी टीम पांनंदी कडे. त्यावेळी गावात लाईट पण नव्हती. आम्ही अंदाजे जाऊन शेण कूट गोळा करायचे. व कुणालाही संशय नं येता पागेतील जागेत ढीग रचायचा. असं सगळं चालू होतं. एक दिवशी गम्मत झाली. सगळेच जण चिंचोळ्याच्या विहिरी कडे गेलो. तिथे हुडवा होता. तो हुडवा खुरप्यानी फोडला तीन पोती भरली. चौथ्या पोते भरताना सागऱ्याने हात घातला अन काय ते बोंब मारत खाली निजला. काय झाले कळेना.
मग सगळी जण पोती उचलून पागेकडे आले. सागऱ्याला सायकल वरुनं आणला. आणि त्याला कट्ट्यावर बसवले तो तळमळत होता. कळा पार एकाच हाताला खांद्यापर्यंत गेल्या. मग कळले ह्याला हुडव्यात विंचू चावला होता. घरातून पाणी आणून पाजले. रात्री गावातील डॉक्टरला उठवला आणि इंजेकशन करून आणले. मग शेवटी त्याला आमच्या घरात एक औषध होते. ते चावलेल्या ठिकाणी लावले. मग सगळी झोपली. झोपायला रात्री एक वाजला.
पुढे गावात चर्चा चालू झाली. शेणकूट गायब होतायत. जेवण ते लोक सावध झाले. तोपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झाले होते.
शेवटी शिमग्याची पौर्णिमा उजाडली. संध्याकाळी आमची रसद बाहेर काढून गल्लीतील चौकात होळी रचली. ती जवळपास चार फूट रुंद आणि सात फूट उंच होळी रचली गेली. होळी पेटवायला चार मशाली तयार झाल्या. नेहमीप्रमाणे मारुती च्या देवळात नंदादीप वर मशाली पेटवून होळी प्रज्वळीत केली. गल्लीतील सगळ्या घरातील नैवेद्य नारळ त्यात घातले गेले. रात्री धापर्यंत होळी पेटलेली. त्यात कोणी हरभर भाजले कोणी कणसं, भाजून प्रसाद म्हणून वाटू लागले.
दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली. काही जणाकडून पैसे पण वसूल केले. व रात्री उठून मदत केली म्हणून डॉक्टरांचे बिल पण देऊन त्याची सांगता केली.
आता मात्र सगळी जण अभ्यास करण्यात गुंतले. परीक्षा जवळ आलेली. रात्री अभ्यास दिवसा शाळा. घरातील पण कोणीच काम पण सांगत नव्हतेच.
परीक्षा चालू झाल्या, सम्पल्या.
तस बारा बैलाचं बळ आला. घरची कामे. शेतातील कामे वेळ मिळाला की पत्ते कुटणे. जर बुधवार मात्र रात्री नऊ वाजता सोपा गच्च भरु लागला. आमीन सायांनी आणि बिनाका गीत मला ऐकण्यासाठी कान आतुर होऊ लागले. त्यावेळी गावात एकमेव HMV चा रेडिओ बाहेर आणून लावत असू. ते गीत ऐकण्यात धन्यता पण होती. परीक्षा झाल्या तरी मुलं मात्र आमच्या सोप्यातच झोपत होती. त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता.
☆ “एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…” मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे ☆
श्री के पी रामास्वामी
एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…
२७, ५०० मुली असलेला माणूस ?
हो! त्याला असेच म्हणतात – अप्पा.
(दक्षिणेमध्ये वडिलांना आप्पा असे संबोधतात)
त्याचे खरे नाव? के पी रामास्वामी. कोइम्बतूर येथील केपीआर मिल्सचे मालक. व्यवसायाने कापड उद्योगपती. कर्मचारी त्यांना अप्पा असे संबोधतात
कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते कर्मचारी टिकवून कसे ठेवावे? खर्च कसे कमी करावे आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे. असेच सर्व बोलत असताना, हा माणूस संपूर्ण जीवनक्रम बदलण्यात व्यस्त आहे.
कसे?
गिरणी कामगारांना पदवीधर बनवून. शिक्षणाला चांगल्या जीवनाची पायरी बनवून.
हे सर्व एका साध्या विनंतीने सुरू झाले. त्याच्या गिरणीतील एका तरुण मुलीने एकदा त्याला सांगितले होते –
“अप्पा, मला शिक्षण घ्यायचे आहे. माझ्या पालकांनी गरिबीमुळे मला शाळेतून काढून टाकले, पण मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. “
त्या एका वाक्याने सर्व काही बदलले…
त्याच्या कामगारांना फक्त पगार देण्याऐवजी, त्याने त्यांना भविष्य देण्याचा निर्णय घेतला.
त्याने गिरणीतच एक पूर्ण शिक्षण व्यवस्था उभारली.
आठ तासांच्या शिफ्टनंतर चार तासांचे वर्ग.
वर्गखोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, अगदी योग अभ्यासक्रम देखील.
सर्व काही पूर्णपणे निधीयुक्त. कोणतीही फी नाही, अट नाही.
आणि निकाल?
२४,५३६ महिलांनी त्यांच्या १०वी, १२वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्या आहेत.
अनेक आता परिचारिका, शिक्षिका, पोलिस अधिकारी आहेत.
या वर्षीच तामिळनाडू मुक्त विद्यापीठातून २० मुली सुवर्णपदक विजेत्या झाल्या
आता, तुम्हाला अपेक्षा असेल की एखाद्या व्यावसायिकाला कामगार नोकरी सोडून जाण्याची चिंता असेल. जर या महिला निघून गेल्या तर काय? कामगार स्थिरतेचे काय?
के पी रामास्वामी काय म्हणतात ते येथे आहे –
“मी त्यांना गिरणीत ठेवून त्यांची क्षमता वाया घालवू इच्छित नाही. त्या गरिबीमुळे येथे आहेत, स्वेच्छेने नाही. माझे काम त्यांना भविष्य देणे आहे, पिंजरा नाही. “
आणि तो नेमके तेच करतो….
त्या निघून जातात. स्वतःचे करिअर घडवतात.
आणि मग? त्या त्यांच्या गावातील अधिक मुलींना गिरणीत पाठवतात. हे चक्र सुरूच आहे.
हा केवळ सीएसआर उपक्रम नाही. हा खऱ्या अर्थाने मानव संसाधन विकास आहे.
अलिकडेच झालेल्या एका दीक्षांत समारंभात ३५० महिलांना त्यांच्या पदव्या मिळाल्या. आणि के पी रामास्वामी यांनी एक असामान्य विनंती केली –
“जर तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी त्यांना कामावर ठेवू शकलात, तर त्यामुळे इतर मुलींना पुढे शिक्षण घेण्याची आशा मिळेल. “
विचार करा. कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य चालवणारा माणूस व्यवसाय मागत नाही. तो नोकऱ्या मागत आहे – त्याच्या कामगारांसाठी.
आपण हे कधी कुठे पाहिले आहे?
ही कथा फक्त केपीआर मिल्सबद्दल नाही. ही नेतृत्व, कॉर्पोरेट नीतिमत्ता, राष्ट्र उभारणीचा धडा आहे.
बी-स्कूलने हे शिकवले पाहिजे.
एचआर व्यावसायिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.
आणि जगाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला समजेल अशी ही सगळीकडे पसरवण्यासारखी सत्यकथा. तुम्ही काय करणार. पोहोचवणार इतरांपर्यंत?
☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
तसा मी खूप व्यावहारिक माणूस आहे. जाताना माझ्या आईने मला सांगितले होते.
“मिलिंद… तुला सुखी राहायचे असेल तर फक्त एकच गुण तुझ्या अंगी बाणवून घे, ‘जितक्या लवकर एखाद्याशी जोडला जाशील, तितक्याच लवकर त्याच्यापासून दूर होता आले पाहिजे’. थोडक्यात मोह धरला तर दुःखी होशील. “
ही गोष्ट मी इतकी मनाशी रुजवली आहे की जो पर्यंत कुणी माझ्या सोबत आहे, मी त्याचा असतो. ज्यावेळी तो दूर जातो, मी त्याला विसरून जातो. कुणाला हा दुर्गुण वाटू शकतो पण माझ्यासाठी तो गुण आहे. बरे ही गोष्ट माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे की अनेकदा लोकांना मी पाषाणहृदयी वाटतो. आई असताना मी कायम तिचा सारथी असायचो. तिला कुठेही जायचे तरी तिच्यासोबत मी असणारच. तिच्या आजारपणातही मी तिच्याजवळच बसलेला असायचो. त्यामुळे त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता, आई गेल्यावर याला किती त्रास होईल? पण ती ज्या दिवशी गेली त्याच दिवसापासून माझे हसणे, विनोद करणे चालू झाले. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. सकाळी आई जाते आणि संध्याकाळी हा हास्यविनोद करतोय? म्हणजे याचे वागणे खोटे होते की काय? हे मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसून यायचे. पण माझ्यात काही फरक पडला नाही. आजही मी तसाच आहे.
हे सगळे आठवण्याचे कारण… काल खूप दिवसांनी भद्रकाली मंदिरात गेलो होतो. पायऱ्या चढताना मनात विचार आला, या पायऱ्या बोलू शकल्या असत्या तर किती छान झाले असते? माझी पणजी ( माझ्या आईची आजी ) आणि माझी आजी कायम दर्शन झाल्यावर या पायऱ्यांवर बसलेल्या असायच्या. माझ्या आईचे बालपण याच पायऱ्यांवर खेळण्यात गेले. मीही माझ्या आईला अनेकदा इथे दर्शनाला घेऊन आलेलो.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमीच्या ठिकाणी पादत्राणे काढली आणि देवीसमोर जाऊन उभा राहिलो. मागे कीर्तन चालू होते. ऐकायला ८/१० लोकच असतील. देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती. दर्शन घेताना मला माझी आई आठवत होती त्यामुळे आपोआपच डोळे भरून आले. आई ज्याप्रमाणे देवीच्या पुढे बनवलेल्या पावलांवर डोके ठेवून दर्शन घ्यायची मीही अगदी त्याचप्रमाणे दर्शन घेतले आणि दरवाज्याजवळील आतल्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. थोड्या वेळात काही स्त्रिया दर्शनाला आल्या. त्यांचे वय साठीच्या आसपास असेल. त्या प्रत्येकीत मला माझ्या आईच्या काही गोष्टी दिसू लागल्या. काहींची वेशभूषा माझ्या आईसारखी, काहीची केशभूषा आई सारखी. काहींचे चालणे, काहींचे बोलणे आईसारखे. आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मनात म्हटले… आई काही आपल्याला सोडायला तयार नाही. हेहेहे…
काल रात्री खूप दिवसांनी आई स्वप्नात आली.
“बरे झाले… देवच पावला म्हणायचा. ” आईने म्हटले.
“कशाबद्दल?”
“वाकडी वाट करून देवीच्या दर्शनाला जाऊन आलास. एरवी कुणी सांगितले असते तर म्हणाला असतास, ‘देवीला मनातल्या मनात मनोभावे नमस्कार केला तरी पोहोचतो, त्यासाठी मंदिरातच का जायला हवे?” तिने हसत म्हटले आणि मलाही हसू आले. कारण अनेकदा तिने मला मंदिरात दर्शनाला चल म्हटल्यावर मी हेच वाक्य बोलायचो.
“हेहेहे… मी जरी मंदिरात जात नसलो तरी बाहेरून नमस्कार करतो. आणि कलियुगात हीच गोष्ट जास्त पुण्य देऊन जाते. “
“ठीक ठीक… पण मंदिरात जात जा असाच. मी तुला कायम तिथे भेटेल. कुणा ना कुणाच्या रुपात. ” तिने माझ्याकडे रोखून बघत म्हटले.
“आई… एक विचारू?”
“विचार… “
“मी, तू गेल्यावर रडलोही नाही, तू म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा मोह ही धरला नाही तरी मंदिरात गेल्यावर तुझ्या आठवणीने माझे डोळे का डबडबले?” मी विचारले तसे आईच्या चेहऱ्यावर नेहमीचे चिरपरिचित स्मित झळकले.
“कारण तू मोह धरला नसला तरी तुझ्या हृदयात प्रेम कायम आहे. त्यामुळेच तुला समोर येणाऱ्या स्त्रीमध्ये मी दिसते. तू कायम मला शोधत असतोस आणि मीही त्यांच्या रुपात तुझ्यासमोर येते. लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुला माझी गरज असेल, मी कायम तुझ्या जवळपास असेल. “
“अरे.. !!! मोह आणि प्रेम एकच ना?”
“नाही… मोह आणि प्रेम जरी वरकरणी एक वाटत असले तरी त्यात फरक आहे. मोहात स्वार्थ असतो, प्रेम निस्वार्थ असते. मोहात माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो, प्रेमात दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. मोह अल्पकालीन असतो, प्रेम कायमस्वरूपी असते. मोह बांधून ठेवतो, प्रेम कशातही अडकवत नाही. त्यामुळे याबद्दल फारसा विचार करू नकोस. जसा आहे तसाच रहा. ज्यावेळी तू मला कोणत्याही स्त्रीमध्ये बघशील, तिचा आदर करशील, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम टिकून राहील. ” आईने सांगितले आणि मला जाग आली. आई असताना भलेही मी स्वतःला तिचा सारथी म्हणवून घेत होतो पण माझी आईच खऱ्या अर्थाने माझी सारथी आहे. ज्यावेळी मी अर्जुनासारखा संभ्रमित होतो, ती श्रीकृष्णासारखी मला उपदेश करते. तुम्हीही ज्यावेळी संभ्रमित व्हाल, फक्त तुमच्या आईला आवाज द्या, ती कृष्ण बनून तुमच्या मदतीला हजर असेल यात शंका नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- “तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकूळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्याने समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे मला शप्पथ सांगते, खरंच माहित नव्हतं. ते सगळं
दत्तगुरुंनीच माझ्याकडून लिहून घेतलं हे आज माझ्या लक्षात आलंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा… !” लिलाताई म्हणाली. )
तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते मनात भरुन राहिलेलं समाधान सोबत घेऊनच. समाधानाबरोबरच क्षणकाळापुरती कां होईना पण मनात निर्माण झालेली कांहीतरी राहून गेल्याची भावनासुद्धा होतीच. कारण लिलाताईने बोलून दाखवले होते ते तिच्याच मनातले विचार. पण नेमकं तसंच घडलं असेल? दत्त महाराजांनी खरंच ते त्या शब्दांत लिहायची प्रेरणा तिच्याही नकळत तिला दिली असेल? मनात अशी शंका घेणं मला योग्य वाटेना पण त्याचं समाधानकारक उत्तरही मला सापडेना. तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा मनाला स्पर्शून गेलेल्या समाधानामुळे मन थोडं शांत होतं खरं पण या सगळ्या
अघटितामागचं गूढ मात्र उकललेलं नव्हतंच. माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून ते गूढ अधिकच गहिरं होत चाललेलं होतं.. !
मी घरी आलो. रुटीन हळूहळू सुरू झालं. आरती पूर्णपणे सावरली नसली तरी तिने आता मात्र लवकरात लवकर सावरायला हवं, तिने नव्याने सुरुवात करायला हवी असं मला मनापासून वाटतं होतं. तिच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं होतं. ती तेव्हा आमच्या लग्नानंतर लगेचच मिळालेला युनियन बँकेतला जॉबच करीत असे. सुदैवाने कोल्हापूरमधे तेव्हा आमच्या बॅंकेच्या दोन ब्रॅंचेस असल्याने तिचं पोस्टिंग दुसऱ्या ब्रॅंचमधे सहजपणे होऊ शकले होते. तिची खरंतर शिक्षणक्षेत्रात काम करायची इच्छा होती. म्हणून तिला ही नोकरी अचानक मिळाली तेव्हा ती फारशी आवडलेली नव्हती. आता मात्र एकटेपणातून आणि पुत्रवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही नोकरीच तिला मदतीची ठरणार होती. समीर गेल्यानंतर पुढे जवळजवळ एक महिना बिनपगारी रजा घेऊनही ती स्वस्थ नव्हतीच. म्हणूनच असं एकटेपणात रुतून बसणं हा आपल्या दुःखावरचा उतारा नाहीये हे तिलाही हळूहळू जाणवू लागलेलं होतं.
“चार दिवस का होईना जॉईन हो. तुझ्या प्रदीर्घ रजेमुळे स्टाफ शॉर्टेजचा त्रास ब्रॅंचमधील सगळ्यांनाच सहन करायला लागतोय. आपली गरज होती तेव्हा तेच सगळे मदतीसाठी धावून आलेले होते ना? मग निदान आता तरी त्यांचा त्रास वाढू नये याचा विचार आपण करायला हवा की नको? तुझं मन तिथं नाही रमलं तर एक महिन्याची नोटीस देऊन जॉब रिझाईन करायचं स्वातंत्र्य तुला आहेच. पण यापुढे असं अधांतरी नको राहूस. ” मी माझ्या परीने तिला वेळोवेळी हे सगळं समजावत रहायचो. अखेर तिने प्रयत्न करून पहायचं ठरवलं आणि एकटेपणाच्या खाईतून ती हळूहळू माणसात आली. वेगळं वातावरण, नवे विषय, नवी व्यवधानं यामुळे आपसूक ती नकळत सावरू लागली. तरीही मला बँकेतून घरी यायला तिच्यापेक्षा खूप उशीर व्हायचा. संध्याकाळी ती एकटी घरी आल्यानंतर बंद दाराआड समीरच्या व्याकूळ करणाऱ्या आठवणी तिच्या स्वागताला हजर असायच्याच.. ! त्या तशा रहाणारच होत्या. त्यांनी निघून जावं असं मलाही वाटत नव्हतं. पण त्या आठवणींमधे हिने रुतून बसू नये यासाठी माझे प्रयत्न असायचे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिवस नवीन बाळाची चाहूल लागली! त्या जाणिवेच्या स्पर्शाने तिचे डोळे पाणावले. पण ते दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू होते! समीर नक्की परत येणार आहे ही खूणगांठ माझ्या मनात पक्की होती पण आरतीला मात्र अजून मनापासून ते सगळं स्वीकारता येत नव्हतं.
यथावकाश या खेपेलाही तिच्या काळजीपोटी तिचे आई-बाबा बाळंतपणासाठी तिला आपल्या घरी सांगलीला घेऊन गेले. इकडे मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ. तिकडचाच विचार आम्हा सर्वांच्या मनात सतत ठाण मांडून असायचा. समीरच्या स्वागतासाठी मी मनोमन अतिशय उत्सुक होतो पण ते उघडपणे व्यक्त करता येत नव्हतं तर दुसरीकडे आईच्या मनात सगळं सुखरूप पार पडेल ना याचीच काळजी असे!
बँकेत कामाच्या व्यापात काही काळ माझं मन गुंतून रहायचं खरं पण ते तेवढ्यापुरतंच. सांगलीहून येणाऱ्या निरोपाची वाट पहाणारं माझं मन उत्सुक अस्वस्थतेमुळे सतत बेचैनच असायचं.
असंच एक दिवस मी कामात व्यग्र असताना कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी मान वर करुन पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते! मी क्षणभर पहातच राहिलो त्यांच्याकडे न् भानावर येताच ताडकन् उठून उभा राहिलो. ते काय सांगतायत हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते पण उत्सुक मन मात्र आतल्याआत थरथरत होतं…. !!
“तुम्ही असे अचानक?”
“हो. खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय. मुलगा झालाय… “
“आरती कशी आहे? आणि बाळ… ?”
“तिनेच ‘समक्ष जाऊन सांगून या’ म्हणत मला लगोलग पाठवलंय. बाळ गोड आहे. तीन किलो वजन आहे बाळाचं. घरी आईंनाही सांगा लगेच. मला निघायला हवं… “
” नाही नाही.. असं कसं?” मी म्हणालो. “घरी नाही तरी निदान समोरच्या रेस्टाॅरंटमधे काॅफी तरी घेऊया” म्हणत मी ड्राॅवर बंद केला तसं त्यांनी मला थांबवलं.
“नाही… खरंच नको. तुम्ही कामात आहात, व्यत्यय नको. मी शाहुपूरीत माझ्या बहिणीकडे जाऊन हा निरोप सांगणाराय. तिथं खाणंपिणं होईलच. म्हणून नको ” त्यांनी मला समजावलं. जायला वळले आणि कांहीतरी आठवल्यासारखं थांबले. त्यांनी खिशात हात घालून कागदाची एक घडी बाहेर काढली आणि…
” हे तुमच्या बायकोने दिलंय तुमच्यासाठी.. ” ते हसत म्हणाले आणि ती घडी माझ्या हातात देऊन निघून गेले..
ती घडी उलगडून पाहिलं तर थरथरत्या हातानं लिहिलेली ती मोजक्या शब्दांची फक्त एक ओळ होती….
‘आपला.. समीर.. परत आलाय.. ‘
ते वाचलं आणि एक अनामिक अशी सुखसंवेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली.. त्या स्पर्शाने मी शहारलो! कसाबसा खुर्चीत टेकलो. ओलसर नजरेने त्या अक्षरांवरून नजर फिरवीत त्या कागदाची अलगद घडी घातली आणि ती खिशात जपून ठेवली.. !
“आपल्याला पुन्हा मुलगा झाला तर आपला समीरच परत आलाय असंच तुम्ही म्हणणार…. पण मी.. ? तुम्हाला कसं सांगू? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले कीं केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तोss.. आहे माहित? त्याचे टपोरे डोळे’ गोरा रंग’, लांबसडक बोटं, दाट जावळ… सगळं मनात जपून ठेवलंय हो मीss. आपल्याला मुलगा झालाच तर तो आपला समीरच आहे कीं नाही हे फक्त मीच ठरवणार… बाकी कुणीही नाहीss…. ” कधीकाळी आरतीच्याच तोंडून बाहेर पडलेले हे शब्द आणि त्यानंतरचं तिचं खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवरचं घुटमळणं मला आठवलं आणि पूर्णतः नास्तिक असणारी तीच आज मला ‘आपला समीर परत आलाय’ हे अतिशय आनंदाने, मनापासून सांगत होती !! यापेक्षा वेगळं मला तरी दुसरं काय हवं होतं?
ही अतिशय करूण आणि तितक्याच भयावह अशा अरिष्टाची अतिशय सूचक अशी सांगताच आहे असं मला त्याक्षणी वाटलं खरं पण ते तेवढंच नाहीये हे मात्र तेव्हा माहित नव्हतं. पुढे जवळजवळ १४-१५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर एक दिवस अतिशय अकल्पितपणे मला समजलं ते या सगळ्या अघटीतामधे लपलेलं गूढ उकलणारं एक रहस्य.. !!
तोवर ‘समीर परत आलाय’ ही भावना आमच्या निखळ समाधानासाठी आम्हाला पुरेशी होती. पण तो कसा परत आला.. सगळं कां आणि कसं घडलं याची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. १५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ती उकल झाली.. आणि.. मी त्यातला थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक झालो… !!
☆ वाय फाय बालपण… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
पाव चीट्टी मिट्टी घोडा पुक डोळा झूल !!
एकलम खाजा, डुब्बी राजा तिराण भोजन चार चौकडे पंचलिंग पांडु सायमा गांडू सात कोतडे आष्टिका नल्ली नवी नवं किल्ली दस गुलाबा !!!
मंडळी काय आठवतंय का बघा!! नाही आठवत, बरं. अहो हीच तर आमची परिभाषा! हेच आमचे परवलीचे शब्द. होय हे शब्द आता कोणाला माहित पण नसणार. आमच्या बालपणीचा मोबाईल ग्रुप. आम्ही एका ठिकाणी कधीच शांत बसलो नाही. आमचा ग्रुप हा फिरता होता. अगदी पिंपळावरचा मुंजा! आता गल्लीतील खोताच्या कट्ट्यावर असलो तरी, एकदम डोक्यात काय शक्कल येईल, व सगळेच एकदम गप्प होतील सांगता येत नव्हतं.
त्यावेळी मोबाईलचं काय साधा फोन सुद्धा कुठेही नव्हता! फोन फक्त पोस्ट ऑफिस मध्येचं बघायला मिळणार.
आमची चांडाळ चौकडी ह्या गल्लीतून त्यागल्लीत तर कधी चावडीत, तर कधी कुणाच्याही मळ्यात धुडगूस घालणारी.
सुट्टीचे दिवस तर आम्हाला दिवाळी सारखे वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की, गल्लीतील चौकात यायचे, मग चिंन्नी दांडू पाव चीट्टी मिट्टी — चालू व्हायचे.
ते अगदी घरातील कोणीतरी बोलवे पर्यंत. अरे ये पांड्या तुला पोटाची काय खबर हाय की नाय असं डबाड्याची काशी वरडत यायची. झाले मग सगळी सावध व्हायची. डबाड्याची काशी म्हणजे, गल्लीतील आग, दिवसा ढवल्या तिच्या समोरून कोण जात नसे. उठ पांड्या तुझं मड मी बसवलं असं आरडत येणारी पांड्या ची आई काशीबाई! आली तुला पटकी आं, असं उद्धार करणारी पांड्याची आईच, भाकर तुकडा गिळ अन म्हसर सोड असं तीन म्हटलं की, सगळेच घरचा रस्ता धरायचे. पण सगळीच जेवण करून प्रत्येक जण आपापल्या घरातील म्हसर सोडून सगळीच जण मोती तळ्या कडे.
गल्लीतून नाही म्हटली तरी पंचवीस जनावर! सगळी जण चावडीला वळसा घालून वेशीत, वेशितून मारुतीच्या देवळा जवळून हम रस्ता. तेथून मिरज रोडवर तीतून खालच्या अंगाला ओढा पार केलं की मग मोती तळ. मोती तळ तस गावंधरीत असल्याल. मोती तळ्याच्या आजूबाजूला गायरान जमीन. तिथे सगळी म्हसर गेली की आम्ही परत रिकामेच.
म्हसर एकदा सोडली की झाले. परत आमची टोळ की, चिंचेच्या झाडाखाली हजर.
त्याला झाडाखाली आरामात बसलो की झाले. किरण्या खिश्यात पत्ते घेऊन यायचं. हळूच पत्ते काढले की, पक्क्या डोक्यावरचं खोळ करून आणलेलं पोत झटकून हांतरायचा. खोता चा सागऱ्या, पक्या, हणम्या, किरण्या, राज्या असे सगळेच मिळून पत्ते कुटण्यात गर्क. असा डाव रंगत आला असताना सिद्राम येऊन बोन्म्ब मारायचा.
सुकाळीच्यानों म्हसर दुसऱ्यांच्या रानात सोडून पत्ते खेळता व्हय असं म्हटला की आम्ही काय ते समजायचो.
नक्कीच जवळच असलेल्या सिद्रामच्या शेतात म्हसर चर्याला गेलेत. म्हटल्यावं सगळी खडकन उभी ते धुमशान सिद्रामच्या मळ्यात दाखल.
बघतोय तर काय सगळ्या म्हशी गाजरच्या मळ्यात आरामात चरत होत्या. तोपर्यंत सिद्रामची बायको बोंब मारत आलीचं. मड बशीवलं तुमचं, म्हशी आमच्या रानात सोडून, पत्ते कुटत बसता काय?
सरळ गावात जाते अन तुमच्या घरात जाऊन सांगते. असं म्हटल्यावर सगळीच तिच्या पाया पडू लागली गया वया करू लागली. काकू आमची चूक झाली, परत असं होणारच नाही. त्यावर ती त्रागा करत म्हणे, ह्या पिकाचे नुकसान तुमचा बाप भरून देणार काय ? असं सगळं रंगात येत असताना पक्या पुढ झाला अन गचकन तीच पाय धरु लागला. कारण ती पक्याची चुलत मावशी लागतं होती. मग सगळं वातावरण थंड झाल्यावर, म्हसरांना सरळ मोती तळ्यात सोडल आणि सुटका करून घेतली. आता म्हशी आणि पाणी ह्यांचं जूनं नातं. एकदा का म्हैस पाण्यात गेली की दोन तास गच्चन्ति. बिनघोर होऊन सगळी परत झाडाखाली आले. पत्ते गोळा करून ठेवले.
राज्या हणम्या दोघेही चिंचच्या झाडावर चढली आणि खाली पिकलेल्या चिंचा खाली टाकू लागले तस आम्ही गोळा करत बसलो. एव्हाना संध्याकाळ झालेली. म्हसरांना पाण्यातून कसबस बाहेर काढून घरी परतत, रविवारी सकाळची खेळण्याची अखणी पण झालेली.
आणलेल्या चिंचेत मीठ लसूण गूळ घालून त्याला उखळात चेचलं आणि जोंधळ्या च्या धाटवर त्याला बांधून सगळ्यांना वाटलं. तशी सगळी परत संध्याकाळी तोंडात घणं घट धरून लॉलीपॉप सारख चोखु लागली. खोताच्या दगडी कट्ट्यावर गप्पा चालू झाल्या.
परत दबड्याची काशी आली आणि बोंब मारायला सुरवात केली. तस सगळीजण घरात पसार झाली. रविवार सुट्टी सकाळ उठून धपाधुपी खेळायचं ठरले. चेंडू कुणाकडं नव्हताच. मीच शेवटी घरात आलो. घरात केळीच्या पानांचे द्रोण होते, त्यावर केळीच्या पानांचा चेंडू होता तो घेतला. त्यावर कपडाच्या चिंद्या गुंडाळून बॉल तयार केला अन धपाधुपी चालू झाली. बऱ्याच वेळा तो चेंडू गटारीत पण पडला तसाच उचलला. आणि कापडं रंगीत व्हायला लागली. चेंडू किरण्याच्या हातात लागला. त्याने समोर असलेल्या हणम्या वर नेम धरला व मारला. नेमक हन्म्याने वार चुकवला तो खाली बसला अन समोरच्या पडवीत पोथी वाचत बसलेल्या मोरे काकांच्या तोंडाला लागला ते गटारीच्या
शिक्क्या सकट! ते बघून सगळी पोर घरात पसार झाली. तस शिंदडीच्यानों करत मोरे काका काळ तोंड घेऊन बाहेर आले. बघतात तर कोणच नाही. रागात शिव्या देऊन न्हणी घरात तोंड धुवायला गेले.
मुलं पण घरात जाऊन शिळी भाकरी दही चटणी खाऊन परत चावडीत जमा झालेली. चावडीच्या पटांगणात चिरर घोडा खेळायचं ठरले. त्यात दोन पार्ट्या करायला पाहिजे होत्या. दोन कॅप्टन झाले बाकीचे जरा लांब जाऊन एकमेकांना संगणमत करून कॅप्टन जवळ जोड्यानी जवळ आले. आला आला घोडा काय काय फोडा असा त्यांचा वाय फाय शब्द होता. एक जोडी आली म्हणाली तुम्हाला राम पाहिजे की कृष्ण, एकानी राम घेतला दुसऱ्या नी कृष्ण अश्या विविध नावानी जोड्यांचे वरगीकरण झाले व ग्रुप तयार झाला. आता दोन्ही कॅप्टननी टॉस करायचा होता. पण पैसे कुणाकडंच नव्हते. मग नेहमी प्रमाणे पातळ दगड घेतला, त्यावर एका बाजूला थुंकी लावली. त्याचाच टॉस तयार केला. पाऊस पाहिजे का उन्ह! पाऊस म्हणजेच थुंकी लावलेलीली बाजू.
त्याच्या विरुद्ध उन्ह टॉस झाला राज्या वर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.
☆ पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
मध्यंतरी ‘लोकसत्ता’ मधील बुकमार्कच्या पानावर आलेला ‘आणि पुस्तके चालू लागली’ हा लेख वाचल्यावर साहजिकच नुकतंच हाती आलेलं पुस्तक आठवलं. पुस्तकाचं नाव: ‘When Books Went To War’ आणि लेखिका आहे, मॉली गप्टील मॅनिंग. माझी एक सवय आहे पूर्वीपासून, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना, त्यात कधी, कुठे त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकाचं नाव, संदर्भ आला, की मी लगेच ते नाव माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत लिहून ठेवते. असंच या पुस्तकाबद्दल मी बहुधा निरंजन घाटे यांच्या ‘मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट’ या पुस्तकात वाचून लिहून ठेवलेलं होतं. हे पुस्तक तेंव्हा माझ्या मुलानं मला पाठवलं होतं.
1933 च्या सुमारास जर्मनीमधे अर्थातच, हिटलर आणि त्याचा लाडका सेनापती गोबेल्स यांच्या डोक्यातून निघालेली आणि शाळा-कॉलेज मधे शिकणाऱ्या उत्साही किशोरवयीन आणि तरुण मुलांमार्फत राबवून घेतलेली एक भयंकर मोहीम होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपण बरंच काही वाचलेलं असतं, पण या मोहिमेबद्दल मात्र या आधी मी तरी कुठेही, काहिही वाचलेलं नव्हतं.
जर्मनीतील मोठमोठ्या शहरात, मध्यवर्ती चौकात मोठ्ठाल्ले ओंडके चितेसारखे रचून त्यात शेकडो, हजारो पुस्तकांच्या आहुती दिल्या गेल्या! बर्लिन, फ्रॅन्कफर्ट अशांसारख्या शहरातील विद्यापिठांच्या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथ आणून या होमात त्यांची आहुती देण्यात आली!
हजारो विद्यार्थी आपापल्या विद्यापिठांचे विशिष्ट रंगाचे कपडे घालून, हातात मशाली घेऊन मोठ्या अभिमानाने या मिरवणुकीत सामील झालेले होते. बर्लिनच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ‘समारंभां’ साठी पावसाळी हवा आणि प्रचंड गारठा असतानाही चाळीस हजार प्रेक्षक हजर होते. आणि अशा पावसाळी हवेतही या मुलांचा उत्साह, आनंद उफाळून ओसंडत होता!
कितीतरी गाड्या “अन-जर्मन” पुस्तकं भरून घेऊन या मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या. आणि हे विद्यार्थी(?) मानवी साखळी करून एकमेकांकडे देत, ही पुस्तकं त्या चितेत भिरकावत होते. नाझी एकतेच्या विरोधी विचार असलेली सर्व पुस्तकं ही देशद्रोही ठरवून नष्ट केली जात होती. देशाच्या प्रगतीला विरोधी विचारांमुळे अडथळा निर्माण होत आहे, म्हणून, हे विचार असलेली पुस्तकं जाळण्यायोग्य आहेत, असं या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलेलं होतं. सिग्मंड फ्रॉईड, एमिल लुडविग, एरिक मारिया रिमार्क हे सगळे लेखक, तज्ञ देशविरोधी लिखाण करत आहेत, असं सांगून त्यांची पुस्तकं जाळण्यात आली. एका मागून एक मोठमोठ्या लेखकांची, शास्त्रज्ञांची पुस्तकं जाळली जात होती, आणि गर्दीमधून हर्षनाद, आरोळ्या उठत होत्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घडवून आणलेला आहे, अशा अफवा उठलेल्या असल्या, तरी, या कार्यक्रमात येऊन गोबेल्सने भाषण दिल्याने हा कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने घडवून आणला गेलेलं आहे, हे जाहीर झाले! हिटलरच्या आदर्शवादाशी जुळणारी विचारसरणी समाजात निर्माण करण्यासाठी तो आपली ताकद वापरत असे.
बर्लिनच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चालू असताना, रेडिओवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि तो चित्रितही करण्यात आला. आणि नंतर देशभरातल्या थिएटर्समधे ही फिल्म मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यात येऊ लागली. जसजसा हा प्रचार होत गेला, तसतसे ठिकठीकाणी असे पुस्तकं जाळण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. ज्यू विद्वान व लेखकांची तर सर्व पुस्तकं जाळण्यात आलीच, पण समता, बंधुत्व, समन्यायी व्यवस्था यावर लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांनाही तोच रस्ता दाखवण्यात आला!
नंतर तर नाझींनी लेखकांची, पुस्तकांची यादीच जाहीर केली. कार्ल मार्क्स, अप्टन सिंक्लेयर, जॅक लंडन, हेन्रीक मान, हेलन केलर, अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस मान आणि ऑर्थर स्च्नित्झलर. प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तकं जाळण्याच्या कार्यक्रमाला असाच हजारोंचा समुदाय जमलेला असायचा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची प्रचंड प्रसिद्धी देशभर केली जात असे.
पण हेलन केलर पासून अनेक मोठ्या, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनीही या गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या नावे पत्र लिहून निषेध केला. एच. जी. वेल्सने लंडनमधे निषेधपर जोरदार भाषण केले. 1934 मधे, पॅरीसमधे अशा जर्मनीत जाळलेल्या आणि बंदी घातलेल्या पुस्तकांची लायब्ररी स्थापन करण्यात आली. जर्मनीतून आलेल्या काही निर्वासितांनी देणगी म्हणून अशी पुस्तके या लायब्ररीला दिली. आणि युरोपातील लोकांनीही आपल्याकडे असलेल्या अशा चांगल्या लेखकांची पुस्तकं या लायब्ररीला देणगीदाखल दिली.
अमेरिकेतही वर्तमानपत्रांमधून जर्मनीतील या असंस्कृत मोहिमेचा जाहीर निषेध करण्यात आला.
नंतर हळुहळू हिटलरची मजल पुस्तकांकडून ज्यू लोकांच्या छ्ळापर्यंत, त्यांच्या उच्च्चाटनापर्यंत जाऊन पोचली आणि मग त्याने युरोपातले लहान-सहान देश आक्रमण करून गिळंकृत करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर फ्रेंच रेडीओ वरून त्यांच्या विरूद्धच अपप्रचाराची राळ उडवत आपली वक्र नजर फ्रान्स आणि इंग्लंड वरही असल्याचं जाहीर केलं! आणि मग सगळा युरोपच युद्धाच्या ज्वाळांमधे होरपळू लागला.
हिटलरचा लोकशाही विरोध शेवटी अमेरिकेपर्यंत पोचणार याची निश्चिती वाटू लागल्यावर अमेरिकेलाही खडबडून जागं व्हावं लागलं. पहिल्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेली सर्व युद्धयंत्रणा परत रुळावर आणण्याचं अवघड काम आधी करावं लागणार होतं.
सुरुवातीला जेंव्हा 1939-40 मधे युरोपात युद्धज्वाळा फैलावू लागल्या होत्या, तेंव्हा अमेरिकन नागरिकांचा या युद्धात सामील व्हायला विरोधच होता. पण बरेच जण असे होते, की ज्यांना यातली अपरिहार्यता कळत होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सह अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा अप्रिय सल्ला सरकारला दिलेला होता. त्यांनी हिटलरचे लष्कर किती शक्तिमान आणि यंत्र-शस्त्र सज्ज आहे, आणि त्याने फ्रांसला कसे जेरीस आणले आहे, याचाही दाखला दिला होता. आणि आपण बेसावध असताना जर या सुसज्ज लष्कराला तोंड द्यायची वेळ आली तर कशी दुर्दशा होऊ शकते, याचीही कल्पना दिलेली होती.
हिटलरने स्वतःला लोकशाहीचा कट्टर शत्रू म्हणून जाहीर केले होते आणि अमेरिका ही सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सौम्य-सभ्य अशी लोकशाही नव्हती काय? आणि ‘शत्रू बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला करून त्याला गारद करायचा’ हाच हिटलरचा प्रमुख डावपेच असायचा. तेंव्हा आपण वेळीच सावध होऊन तयारीला लागलं पाहिजे, असा त्या वृत्तपत्रांमधील लेखांचा एकूण रोख होता.
1940 च्या सप्टेंबर मधे अमेरिकेच्या कॉन्ग्रेसने ‘सिलेक्टिव्ह ट्रेनिंग अॅन्ड सर्व्हिस’ कायदा मान्य केला. या कायद्यानुसार 21 ते 35 या दरम्यान वय असलेल्या सर्व पुरुषांना लष्करी सेवेत भारती होणे आवश्यक होते. नंतर या कायद्यात दुरुस्ती करून 18 ते 50 वयाच्या पुरुषांना लष्करी सेवेत भरती होणे अनिवार्य करण्यात आले.
लष्करात भरती झालेल्या या लाखो लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी, लष्कराने 46 केंद्र बांधून फर्निचरसकट सज्ज करायचं ठरवलं होतं, पण तेवढा निधीच त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सक्तीची भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देणं तर दूरच, उलट त्यांच्या रहाण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे मोठेच आव्हान लष्करापुढे उभे राहिले. अगदी तळामुळापासून करायच्या या तयारीला खूप दिवस लागणार होते. आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडून मंजूर होऊन मिळायलाही वेळच लागणार होता!
आधी सक्तीची लष्कर भरती आणि नंतर पैसा हातात येईल तेंव्हा कॅम्प तयार करणं यामुळे या भरती झालेल्या लोकांचे विलक्षण हाल झाले. त्यामुळे त्याचं मानसिक धैर्य खूप खच्ची झालं! अनेक कॅम्प्समधे रहाण्याची, जेवणखाण्याची आणि शौचालये किंवा स्नानगृहांची व्यवस्था नव्हतीच जवळपास! आणि या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा युद्धसामग्रीचाही पत्ता नव्हता. लष्कराची अवस्था खरोखरच शोचनीय झालेली होती!
अशा तऱ्हेने उपलब्ध साधनसामग्री मर्यादित कसली, जवळपास नसतानाही, संगीत (गाणा-यांनी गाणे!) आणि मर्दानी खेळ यांनी थोडीफार करमणूक करून घेत असत हे प्रशिक्षणार्थी. पण एकमेकांना अनोळखी असलेल्या या लोकांना इतक्या वाईट परिस्थितीत सतत एकमेकांबरोबर रहावं लागत असल्यामुळे, मोकळा वेळ असेल तेंव्हा शक्यतो एकटं बसावं, घरच्यांना पत्रं लिहावीत किंवा एकट्यानेच काहीतरी वाचत बसावंसं वाटत असे.
लष्करातील वरचे अधिकारी हे जाणून होते, की या कॅम्प्समधील रहाणीचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि या प्रशिक्षणार्थींना हवी असलेली करमणूक, मनोरंजन याची व्यवस्था केल्याशिवाय त्यांचं मानसिक धैर्य उंचावणार नाही, आणि परिणामकारक प्रशिक्षणही देता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, निर्णायक आहे!
पण जिथे रहाण्यासाठी इमारती आणि चालवण्यासाठी बंदुकी अशा लष्करी प्रशिक्षणासाठी आवश्यक अशा प्राथमिक गोष्टी पुरवण्यासाठीच धडपड चाललेली असताना चित्रपटगृहे आणि खेळांसाठीच्या उत्तम सुविधा पुरवणं अशक्यच होतं! तेंव्हा, त्यांना अशी करमणूक द्यायला हवी होती, की जी लोकप्रियही असेल आणि परवडणारीही! आणि ती म्हणजे पुस्तकंच होती त्या काळात!
मोबाईल फोन नव्हते, आणि टी. व्ही. पण प्रत्येक काना कोपऱ्यात पोचलेले नव्हते असा तो काळ होता. इतके लोक पुस्तकं वाचण्यासाठी इतके उत्सुक होते, हे वाचूनच मन भरून येतं!
पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुस्तकं पुरवण्यात आली होती, पण या दुसऱ्या महायुद्धात जितक्या जास्त संख्येने पुस्तकं पुरवण्यात आली, तो जागतिक विक्रम अजून मोडला गेलेला नाही!
या पुस्तकांसाठी एक मोठी मोहीमच अमेरिकेत, देशभरात चालवली गेली! देशभरातील ग्रंथपालांची (लायब्ररीयन्स) एक संघटना होती. तिच्या सभासदांनी एकत्र येऊन, स्वयंसेवकांची मदत घेऊन एक देशव्यापी मोहीम आखली. जागोजागी, ठिकठिकाणी छापील पत्रकं लावली. या पत्रकांमध्ये आपापल्या घरी असलेली पुस्तकं सैनिकांसाठी दान करायचं आवाहन केलेलं होतं. ही पुस्तकं ज्या त्या गावातल्या लायब्ररीत आणून द्यायची होती. मग तिथून ती एका ठिकाणी गोळा करून जिथे जिथे सैनिक लढत होते, किंवा प्रशिक्षण घेत होते, तिथे तिथे पोचवण्यात आली.
जवळपास 40 लाख पुस्तकं अशा प्रकारे गोळा करून सैनिकांसाठी पाठवण्यात आली. या मोहिमेसाठी कित्येक जणांचा हातभार, कष्ट, पैसा सगळंच कामी आलं होतं. हे सगळे तपशीलही मुळातून वाचण्याजोगे आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.
या पुस्तकांनी सैनिकांसाठी काय केलं, हे अमेरिकन लष्करातील एका मेजरच्या शब्दात : “आमच्या, आणि आमच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशांच्याही सैनिकांचं आयुष्य जगण्याजोगं केलं या पुस्तकांनी! अमेरिकन सैनिकांचं ते विलक्षण चैतन्यही जागं केलं या पुस्तकांनी! आणि आमचे सैनिक अजूनही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिलेत तेही या पुस्तकांमुळेच!”
अशा प्रकारे, हिटलरने सुरु केलेल्या फक्त युद्धालाच नव्हे, तर त्यानं प्रत्यक्षात आणलेल्या पुस्तकं जाळण्याच्या अमानुष, असंस्कृत मोहिमेला अमेरिकेने हे सुसंस्कृत, जोरदार उत्तर दिलेलं होतं आणि माणसाविरुद्ध आणि माणुसकीविरुद्ध चालवलेल्या प्रत्यक्ष युद्धात आणि सांस्कृतिक युद्धातही हिटलरचा दणक्यात पराभव केला, त्याची ही कहाणी!
लेखाचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ! हा ‘ पिल्लू सोडणे ‘ काय प्रकार आहे हे मला खरोखरच काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. पहिल्यांदा माझ्या एका मित्राकडून हा वाक्प्रचार मी ऐकला. मला त्या शब्दाची मोठी गंमत वाटली. मग मी कुतूहलाने त्याचे बोलणे ऐकत राहिलो. माझा हा मित्र एका राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होता. त्याच्या बँकेत घडलेल्या गमतीजमती तो संध्याकाळी फिरायला जायचे वेळी मला सांगायचा. अमुक एक असं म्हणाला. तो तसं म्हणाला. काही लोकांकडे खूप कामं असायची. नेमून दिलेली कामं करणं त्यांच्या जीवावर यायचं. मग ते काहीतरी पिल्लू सोडून द्यायचे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मॅनेजरला अशी काहीतरी गोष्ट सांगायचे की ती त्याला नाकारताही यायची नाही. म्हणजेच एखादी सांगयाची. ती गोष्ट मॅनेजर खरी मानून चालायचा आणि पुढे चालून ती प्रथा पडायची. म्हणजेच ते सोडून दिलेलं पिल्लू हळूहळू मोठं व्हायचं.
आपल्या अवतीभवती सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो. काहीही माहिती नसताना ते एखादं पिल्लू सोडून देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते अफवा पसरवण्याचं काम करतात. यालाच कोणी कंड्या पिकवणे असेही म्हणतात. असं एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून देऊन हे लोक नामानिराळे होतात आणि मग आपण सोडून दिलेलं पिल्लू मोठं होताना पाहून त्यांना मोठी गंमत वाटते किंबहुना तो त्यांचा एक खेळच असतो. मग त्यामुळे कोणाला मनस्ताप झाला, कोणाचे नुकसान झाले तरी त्यांना पर्वा नसते किंबहुना तसे व्हावे हीच त्यांची सुप्त इच्छा असते. जाणाऱ्याचा जीव जातो पण पाहणाऱ्याचा खेळ होतो अशातला हा प्रकार !
एकदा सोडून दिलेले असे पिल्लू म्हणजे जणू काही अनाथ पोर ! त्याला ना आई, ना बाप ! मग ते हळूहळू मोठे होत जाते. ते कसेही वागले तरी त्याची जबाबदारी कोणावरच नसते. दुपारी माध्यान्हाच्या वेळेला पडणारी आपली सावली लहान असते, पण जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी ती मोठी होत जाते. तसेच हे पिल्लू ही सुरुवातीला लहान असते. नंतर मोठे होत जाते. पण सावलीमुळे कोणाचे नुकसान होत असल्याचे ऐकिवात नाही. फक्त भयपटात सावल्या भीती दाखवण्याचे काम करतात तो भाग वेगळा ! पण हे असली पिले मोठी झाली म्हणजे समाजाचे भयंकर नुकसान करतात.
कोरोनाच्या कालावधीत तर कितीतरी भयंकर अफवा पसरवण्यात आल्या किंवा पिल्लू सोडण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा फायदा झाला असेलही पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. काहींनी नको त्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवले कोणी अमुक एक औषध उपलब्ध नाही म्हणून अफवा पसरवली. कोणी काही तर कोणी काही. त्रास मात्र सगळ्यांना झाला.
सध्या जे दहा रुपयाचे नाणे चलनात आहे, त्याबद्दलही मध्यंतरी कोणीतरी पिल्लू सोडून दिलं होतं की हे नाणे बंद झाले आहे. आमच्या गावातील तर बऱ्याच लोकांनी ते दहा रुपयाचे नाणे घेणे बंद केलं होतं. बँकेतील लोकांना विचारले तर ते म्हणाले की असा कोणताही निर्णय रिझर्व बँकेने घेतला नाही शेवटी रिझर्व बँकेलाच असं जाहीर करावं लागलं की हे नाणं बंद केलेलं नाही, ते चलनात आहे. पण तोपर्यंत बऱ्याच लोकांना मनस्ताप सोसावा लागला होता.
हल्ली सोशल मीडिया हे कुठले तरी पिल्लू सोडून देण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे लोकांच्या जातीय किंवा धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडिया वरून बऱ्याच वेळा पसरवल्या जातात आणि मग पोलिसांना किंवा राज्य शासनाला अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करावे लागते. पूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याबद्दलही विविध अथवा उठवल्या होत्या. अमुक एक तेल आरोग्यासाठी चांगलं आहे आणि अमुक एक तेल आरोग्यासाठी घातक आहे अशा प्रकारची खेळी तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी अनेक वेळा खेळली आहे आणि आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. शेंगदाणा तेल आरोग्यासाठी वाईट, खोबरेल तेल आरोग्यासाठी वाईट अशा प्रकारचा अपप्रचार त्यासाठी करण्यात आला. या सुद्धा एक प्रकारच्या अफवाच होत.
काही दिवसांपूर्वी जळगावजवळ एका रेल्वे अपघातात १२ जणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्यालाही अशा प्रकारची अफवाच कारणीभूत होती. कोणीतरी अशी अफवा पसरवली की रेल्वेच्या डब्यात आग लागली आहे. लागलीच त्या डब्यातील प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उड्या मारल्या. त्यावेळी गाडी एका रेल्वे वळणावरून धावत होती. विरुद्ध बाजूने वेगाने येणारी एक्सप्रेस लोकांना वळण असल्यामुळे दिसली नाही. त्यांनी बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या घेतल्या आणि क्षणार्धात त्या गाडीखाली सापडून त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. एखादी अफवा पसरवण्याचे परिणाम केवढे भयंकर होतात ! मग ती जाणूनबुजून पसरवलेली असो की नसो !
बऱ्याच वेळा अशा अफवा पसरवल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगे घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारची अफवा पसरवणारे हेतूपुरस्सर अशा अफवा पसरवतात आणि आपला अनिष्ट हेतू साधून घेतात. काही राजकीय व्यक्तींचा देखील अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. चित्रपटातूनही आपण अशा घटना पाहतो. त्यांनीही अशाच प्रकारे आपली पोळी भाजून घेतली आहे. पण याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत त्याशिवाय समाजात दुफळी निर्माण होते ती वेगळीच ! बऱ्याच वेळा गर्दीच्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा जत्रेत कोणीतरी काहीतरी अफवा पसरवतं आणि मग चेंगराचेंगरी होऊन हजारो लोकांचे बळी जातात. अशाही अनेक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. पण समाज शहाणा होत नाही हे दुर्दैव !
म्हणून समाजाचे देखील एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. ती म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवणे. त्यासाठी आपल्याला पोलीस, विविध स्वयंसेवी संस्था, बँका वेळोवेळी आवाहन करीत असतातच. अशी एखादी संवेदनशील गोष्ट आपल्या कानावर पडली तर आपण त्यावर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची खात्री करून घ्यावी आणि मगच योग्य ती पावले उचलावी. एक जबाबदार नागरिक म्हणून अशी खबरदारी आपण तर घेतलीच पाहिजे परंतु आपल्या मुलांना देखील अशा गोष्टींवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही अशी शिकवण दिली पाहिजे. शाळा, कॉलेजेस मधून सुद्धा अशा प्रकारची जागृती घडवून आणणे आवश्यक आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण अफवा न पसरवण्याचा आणि खात्री केल्याशिवाय अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा निश्चय करूया.
(28 फेब्रुवारी.. राष्ट्रीय विज्ञान दिन.. एक अनमोल आठवण)
माझी मैत्रीण आणि मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, डॉ. मानसी राजाध्यक्षने मला बीएआरसीमधील ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदे’च्या, सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात ‘मंगलदीप’ कार्यक्रमासाठी विचारले नि अत्यानंदाने मी या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमास होकार दिला. तत्क्षणी डोळ्यांपुढे मी सर्व वैज्ञानिकांसमोर गातेय असे मनोहारी दृश्य तरळले आणि एका इतिहास घडवणार्या कार्यक्रमाचा वर्तमानपट चालू झाला. हा कार्यक्रम सर्वांच्या चिरंतन स्मरणात रहावा, या ध्येयानं मी झपाटले. गाण्याबरोबर विज्ञानाशी सांगड घालून निवेदनही उत्तम व्हावे, या तळमळीने विज्ञानावरची माहिती जळी-स्थळी, मधुमक्षिकेप्रमाणे गोळा करत गेले.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून रियाझ करताना ‘मंगलदीप’ डोळ्यांसमोर फेर धरू लागला. कोर्या कॅनव्हासवर माझे रंगांचे फटकारे सुरू झाले. संध्याकाळी प्रचंड मोठे आवार असलेल्या जगप्रसिद्ध बीएआरसीमध्ये शिरताना ‘उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा’ असा आनंद होत होता. खचाखच भरलेल्या सभागृहात समोरच बसलेले थोर वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. जयंतराव नारळीकर, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी व अनेक विद्वान मंडळी मला ऐकायला आलेली पाहून मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला! ‘‘बालपणी शाळेच्या पुस्तकात ज्या दिग्गजांची नावे वाचली त्यांना पाहण्यासाठी, ते दिसतात कसे, बोलतात कसे हे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम मी त्वरित घेतला, ’’ असे सांगितले. यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात देशाच्या खर्या हिरोंचे स्वागतच केले. ‘न हि ज्ञानेन सदृशमं, पवित्रं इह विद्यते, ’… ‘‘या जगात ज्ञानाशिवाय इतकी पवित्र आणि सुंदर कुठलीच गोष्ट नाही, ’’ असे सांगून या बुद्धिवंतांसमोर ‘मंगलचरणा गजानना’ या बुद्धिदेवतेच्या वंदनेने प्रारंभ केला. नंतर कविवर्य शंकर रामाणींच्या ‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी म्हटले, ‘‘ही एका स्पेशल जागी म्हणजे न्हाणीघरात स्वरबद्ध झालीय! जिथं कॉन्सन्ट्रेशन होतं. ’’ अशाच जागी आर्किमिडीजलाही त्याचा सिद्धांत सुचल्यावर तो ‘युरेका युरेका’ म्हणत ध्यानमग्न अवस्थेत बाहेर आल्याचे सांगताच, छप्पर फाड के टाळ्या कोसळल्या! अक्षरशः लाव्हारस भूगर्भातून उसळल्यासारखा! एकाच वेळी माझ्या नि हजार बुद्धिमंतांच्या मनातले विचार, एक होऊन त्याला अशा टाळ्या येणं याला मी ‘परमेश्वरी कृपाप्रसाद’ म्हणेन. मी म्हटलं, ‘दिवे लागले…’ ही कविता शंकर रामाणींऐवजी थोर शास्त्रज्ञ एडिसननेच विजेच्या दिव्याचा शोध लावल्यावर ‘युरेका युरेका’ म्हणण्याऐवजी ‘दिवे लागले रे दिवे लागले… तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले…’ असेच म्हटले असेल.
त्या काळी विजेच्या दिव्याचा अन् अनेक शोध लावून एडिसनने संपूर्ण जग देदीप्यमान केलं, उजळवलं आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींनी समाजाला असं भरभरून दिलंय, की ‘कुणी जागले रे कुणी जागले…’ आपण सारे एकत्र गाऊन हे सभागृह सुरांनी उजळूया… विज्ञानाशी व एडिसन, आर्किमिडीज यांच्याशी नाळ जुळल्याने सारे सभागृह गात गातच टाळ्या वाजवत समरसून गेले.
आत्तापर्यंत संपूर्ण हॉलभर रसिकांनी ‘पद्मजाला’ अलवारपणे ओंजळीत उचलून, एका सुंदरशा कमळाच्या पाकळ्यांवरती स्टेजवर विराजमान केलं होतं.
पुढचे काव्य इंदिरा संतांचे! केवळ सजीवच नाही, तर संपूर्ण निसर्गातल्या निर्जीव गोष्टींनाही जिवंतपणे मांडण्याची ताकद त्यांच्या कवितेत दिसते. तसंच वनस्पतींनाही प्राण्यांप्रमाणे जीव असतो, त्याही श्वासोच्छ्वास करतात, असं सिद्ध करणार्या थोर वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचं कार्य आणि इंदिराबाईंच्या काव्याची गुंफण घालून ‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…’ म्हणत सोनचाफ्याच्या पावलांनी आलेल्या सर्वांचे पुन्हा स्वागत केले. शास्त्रज्ञ हा कल्पनेची मोठी झेप घेतो आणि त्याचे स्वप्न सत्यात उतरवतो. ‘स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले…’ हेच खरं! परंतु कवीच्या बाबतीत मात्र ‘जे ना देखे रवी ते देखे कवी, ’ असं म्हणतात. मंगेश पाडगांवकरांबद्दल हेच म्हणावे लागेल. कारण मध्यंतरी ‘‘शुक्र हा ग्रह आहे की तारा?’’ असं विचारल्यावर अनेक सुजाण मंडळींनी अगदी सहज तारा असं उत्तर दिलं
( हशा!) ‘शुक्रतारा मंद वारा ’सारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे शुक्र हा नक्कीच ‘तारा’ आहे, असा सर्वांचा ‘ग्रह’ होतो. पण माझा तसा ‘आग्रह’ नाही. हा श्लेष ऐकून प्रत्येकजण खळाळून दाद देत होता. नंतर पाडगांवकरांची ‘मी तुझी कुणी नव्हते’ कविता गायले, ज्यातही शुक्रतारा आहेच!
त्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत !… सूर्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली पृथ्वी (कणखर स्त्री) सूर्याला म्हणते…
‘‘परी भव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे,
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे…’’
हे संगीतात माळलेलं, पृथ्वीचं परिवलन नि परिभ्रमणही सादर केलं. ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडणारे नि ‘आकाशाशी जडले नाते’ असलेल्या डॉ. नारळीकरांना मी हे गीत अर्पण केलं. टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना स्वीकारताना त्यांच्या चेहर्यावर अतुलनीय आनंद दिसत होता.
त्यानंतर ‘केव्हा तरी पहाटे…’ झाल्यावरच्या धो धो टाळ्या म्हणजे ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचेच…’ होते. मी म्हटले, ‘‘इथं अनेक स्वयंप्रकाशी, देदीप्यमान तारे या नभांगणात तेजाळत आहेत. ’’ तेव्हा या चांदण्यारूपी टाळ्या म्हणजे अंगावर प्राजक्ताचा सडाच होता !
यानंतर भारताला ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ हा महामंत्र देणार्या, तसंच १९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर भारताची ज्ञान आणि विज्ञानातली प्रगती, यांचं महत्त्व ज्यांनी अधोरेखित केलं, असे भारताचे लाडके माजी पंतप्रधान… अटलजींची कविता ‘गीत नया गाता हूँ…’ किस्सा सांगून सादर केली. अटलजींच्या कवितांचे रेकॉर्डिंग त्यांना ऐकवण्याकरिता आम्ही १३ मे १९९८ ला दिल्लीला गेलो. त्याच दिवशी नेमकी पोखरण अणुचाचणी झाल्याने पी. एम. हाऊस मीडियावाल्यांनी गच्च भरलेले.
भारतावर इतर देशांचा प्रचंड दबाव असल्याने तणावामुळे अटलजींना भेटणे कठीण होते.
शेवटी ३ मिनिटे ठरलेली भेट, ते त्यांच्या कवितेत रममाण झाल्याने २० मिनिटांपर्यंत लाभली… या चाचणीने शांतताप्रिय भारताने, ‘हम भी कुछ कम नहीं’ हे जगाला दाखवून दिले. ‘‘या चाचणीच्या मुख्य चमूचे तसेच थोरियमवर आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक असलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांना मी अभिवादन करते…’’
माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच टाळ्यांचा महापूर झाला!
डॉ. काकोडकरांचा हजार शास्त्रज्ञांच्या साक्षीने त्यांच्याच बीएआरसीमध्ये माझ्या सुरांनी सन्मान करतानाच्या अलौकिक क्षणी, माझा ऊर नि डोळे अभिमानाने भरून आले.
कार्यक्रमाची सांगता मी संगीत नि शास्त्रज्ञांचे नाते उलगडत केली. ‘‘भारतरत्न डॉ. कलाम साहेब उत्तम वीणा वाजवत. ’’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहर्यावर १००० व्हॅटचा तेजस्वी प्रकाश होता. आज ते असते तर कार्यक्रमाचा मुकुटमणी ठरले असते.
दिल्लीतील माझ्या संसदेच्या कार्यक्रमात डॉ. राजारामण्णांना उत्कृष्ट पियानो वाजवताना जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ. राजारामण्णांचे नाव ऐकताच, आपल्याच घरच्या व्यक्तीचे नाव घेतल्याचा आनंद आणि टाळ्या टाळ्या टाळ्या…! (नंतर मला कळले की, ते डॉ. काकोडकरांसारख्या अनेक महान वैज्ञानिकांचे गुरू होते.)
तसेच फॅबियोला गियानोटी ही स्त्री वैज्ञानिकही उत्तम पियानो वाजवते. हर्शेलसारख्या संगीतकाराने सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा, युरेनसचा शोध लावून मग खगोल शास्त्रज्ञ म्हणून नाव केले.
‘‘विश्वातला प्रत्येक शास्त्रज्ञ हा देश व मानव कल्याणासाठी झटत असतो. ज्ञानेश्वरी तर विश्वकल्याणाचे सार आहे, ’’ असे सांगत मी संपूर्ण वंदे मातरम्ने सांगता केली.
रसिकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मी डॉ. नारळीकरांना भेटले. ‘‘पृथ्वीचे प्रेमगीत मला परत कुठे ऐकायला मिळेल?’’…. हा प्रश्न ‘वन्स मोअर’सारखा आनंद देऊन गेला.
डॉ. काकोडकरांना भेटल्यावर, ‘‘तुमचे शब्द गातात नि सूर बोलतात’’ असा त्यांनी गौरव केला.
संपूर्ण कार्यक्रम नि टाळ्यांचा पूर आजही मनात इंदिराबाईंच्या शब्दाप्रमाणे रुंजी घालतोय…