मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 घरात कोणी पाहुणे आले की घराला आनंद होतो, घर खुश होतं असं मला वाटते ! घराचे घरपण हे माणसांमुळे असते आणि येणारा पाहुणा जर हवाहवासा वाटणारा असेल तर घर अधिकच आनंदित होतं ! तसं आज झालं !

रोजचा दिवस ” रंग उगवतीचे” सदराने आनंदमय करणारे लेखक श्री. विश्वास देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी, सौ श्रद्धा ताई देशपांडे आज आमच्या घरी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आले. अर्थातच त्यांच्या येण्याने चैतन्यमय वातावरणात गप्पा सुरू झाल्या. नाश्त्यासाठी इडली, सांबार, चटणी, रव्याचा लाडू असा साधाच मेनू होता. सौ. श्रद्धा वहिनींचा उपवास असल्याने फळे, कॉफी वगैरे होते. पण या सर्वांपेक्षा त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल अधिक उत्सुकता होती. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली 

” चांदणे शब्द फुलांचे “, “ अजूनही चांदरात आहे “ आणि “ आनंद निधान “ ही पुस्तके मी घेतली.. आता प्रत्यक्ष वाचेन तेव्हा त्यावर काही लिहिता येईल. त्यांच्या आधीच्या प्रकाशित झालेल्या “ अष्टदीप “ ह्या पुस्तकाची प्रत ही आत्ताच माझ्या हातात आली. त्यातील प्रत्येकाबद्दल माहिती असली तरी सरांच्या दृष्टिकोनातून या सर्व थोर व्यक्तींबद्दल चांगले वाचायला मिळणार आहे याची खात्री आहे.

रंग उगवतीचे सदर सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली हे पटतच नाही ! अरेच्चा, आत्ताच तर सुरू झालं हे सदर ! हे सदर इतकं नाविन्यपूर्ण असते की रोजचा रंग नवा ! सरांना विषय तरी इतके सुचतात की, ‘ साध्या ही विषयात आशय मोठा किती आढळे !’ याचा प्रत्यय ते लेख वाचताना येतो. सरांचा आणि माझा परिचय गेल्या तीन वर्षातला ! माझ्या ” शिदोरी” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनी ते मान्य करून आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. अतिशय मृदू स्वभाव, सावकाश शांतपणे बोलणे, चांगली निरीक्षण शक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. लेखनातील सच्चेपणा, साधी सरळ प्रवाही भाषा, यामुळे वाचकांशी त्यांना ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असा संवाद साधता येतो. व्यक्तिचित्रण कोणतेही असो, साध्या कामगाराचे असो किंवा मोठ्या व्यक्तीचे, त्यातील बारीक-सारीक तपशीलही त्या लेखात येतात, आणि ते चित्रण मनाला भावते ! वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, पण वाचकांचे प्रेम, आपुलकी मिळणे हा मोठा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे !

प्रथमतः मी सरांचे ” रामायण महत्त्व आणि व्यक्ती विशेष “ हे पुस्तक वाचले होते. रामायण आपणा सर्वांना परिचित आहेच, परंतु देशपांडे सरांनी ते अभ्यासपूर्ण लेखातून चांगले सादर केले आहे. त्यामुळे रावण असो वा मंदोदरी, प्रत्येक व्यक्ती-रेखा छान, वास्तव अशी लिहिली आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाविषयी मला आदर आहे. यंदा त्यांना तितीक्षा इंटरनॅशनल चा पुरस्कार मिळाला आहे. या मान्यवर लेखकाचे स्वागत करताना स्वाभाविकच मला खूप आनंद मिळाला. देशपांडे सर आणि सौ. श्रद्धा वहिनींच्या सहवासात घालवलेला हा वेळ संस्मरणीय राहील, त्याची साक्ष हा त्यांच्यासोबत काढलेला फोटो देत आहेच !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री  शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल देगलूरकर सरांच्या घरी एक अप्रतिम पेंटिंग पाहीले, त्यांना प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत ह्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले. कालपासून हे पेंटिंग डोक्यातून जात नाहीये. ज्या घटनेतून संस्कृतमधल्या पहिल्या छंदोबद्ध कवितेचा आणि पर्यायाने रामायणासारख्या महाकाव्याचा जन्म झाला, त्या क्रौंचवधाच्या घटनेचे हे चित्र, वासुदेव कामतांसारख्या सिद्धहस्त चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले.

मूळ कथा अशी आहे की गंगेची उपनदी असलेल्या तमसा नदीच्या तीरावर ऋषी वाल्मिकींचा आश्रम होता. एकदा भल्या पहाटे नित्याची आन्हिके उरकायला ऋषी वाल्मिकी भारद्वाज ह्या आपल्या शिष्यासह तमसातीरी आलेले असताना त्यांना प्रियाराधनात गुंग असलेली क्रौंच म्हणजे सारस पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी आयुष्यात एकदाच जोडीदार निवडतात आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. त्यांचे प्रियाराधनाचे नृत्यही बघण्यासारखे असते. कितीतरी वेळ नर आणि मादी क्रौंच पक्षी स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती गिरकी घेत नृत्य करत असतात. असेच नृत्य पहाटेच्या त्या धूसर, निळसर प्रकाशात ऋषी वाल्मिकींनी पाहिले असावे आणि त्या डौलदार, देखण्या नृत्याने ते क्षणभर हरवून गेले असावेत.

पण त्याच क्षणी कुणा व्याधाचा बाण वेगाने आला आणि एका क्रौंच पक्ष्याचा वेध घेऊन गेला. आपल्या जोडीदाराला पाय वर करून तडफडताना बघून मादी क्रौंच पक्षी करूण विलाप करू लागली. ते बघून ऋषी वाल्मिकींचे कवी हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून अवचित शब्द उमटले,

‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शास्वती समा।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्।।’

म्हणजे, “हे निषाद, तुला कधीच प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण तू ह्या काममोहित अश्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीची अकारण ताटातूट केली आहेस. ” 

अतीव करुणेतून जन्मलेले हे संस्कृतमधले पहिले काव्य. स्वतःच्याच तोंडून निघालेला तो श्लोक ऐकून ऋषी वाल्मिकी भारद्वाजांना म्हणाले,

‘पादबद्धोक्षरसम: तन्त्रीलयसमन्वित:।

शोकार्तस्य प्रवृत्ते मे श्लोको भवतु नान्यथा।।’

म्हणजे शोकातून जन्मलेला हा श्लोक आहे, ज्याचे चार चरण आहेत, प्रत्येकात समान अक्षरे आहेत आणि एक नैसर्गिक छंदोबद्ध लय आहे.

करुणेतून जन्मलेले हे काव्य ऐकूनच साक्षात ब्रह्मदेवांनी वाल्मिकी मुनींना आदिकवी अशी पदवी दिली आणि त्यांना सांगितले की त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची कथा छंदोबद्ध काव्यातून जगाला सांगावी, जी जोपर्यंत या पृथ्वीतलावर नद्या वाहतील आणि पर्वत उभे असतील तोवर लोकांच्या मनातून नष्ट होणार नाही! 

यावत् स्थास्यन्ति गिरय: लरितश्च महीतले।

तावद्रामायणकथा सोकेषु प्रचरिष्यति॥’

ह्या सुंदर आणि करुण कथेच्या त्या निर्णायक क्षणाचे हे चित्र आहे. पहाटेचा निळसर, धूसर, अस्फुट प्रकाश पसरलेला आहे, पण आभाळ अजून काळवंडलेलेच आहे. तमसेचा प्रवाहही निळसर, तलम, स्वप्नवत आहे. बाण वर्मी लागलेला क्रौंच पक्षी पाय वर करून पाण्यात पडलेला आहे, त्याच्या छातीवर रक्ताचा लालभडक डाग आहे, शेजारी मादी पक्षी चोच उघडून आक्रोश करते आहे. बाण लागल्यामुळे तडफडणाऱ्या पक्ष्याची पिसे वाऱ्यावर उडून गिरकी घेत खाली येत आहेत आणि ह्या विलक्षण करुण पार्श्वभूमीवर शुभ्र वस्त्रधारी तपस्वी ऋषी वाल्मिकी अर्घ्य देता देता थबकले आहेत. त्यांचा चेहरा वेदनेने विदीर्ण झालेला आहे. त्या वेदनेमागे सात्विक संतापही आहे आणि त्या भावनेतून जन्मलेला जगातला पहिला काव्यमय शोक श्लोकरूपात उमटत आहे असे हे चित्र! 

ऋषी वाल्मीकींच्या चेहऱ्यावरची रेषा न रेषा बोलतेय. त्यांचे दुःख त्या पहाटेच्या निळसर आभाळाइतकेच विशाल आणि सर्वसमावेशक आहे. चित्रकार वासुदेव कामत हे त्यांच्या पोर्ट्रेट्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र काढताना केवळ ’हुबेहूब व्यक्तीसारखेच चित्र काढणे’ हा इतकाच निकष कधीच नसतो.

व्यक्तिचित्र काढताना ते तांत्रिकदृष्ट्या निर्दोष तर असावेच लागते, पण ज्या व्यक्तीचे चित्र ज्या क्षणी काढले गेले, त्या क्षणाची भावस्थिती अचूक टिपणे हे सोपे नसते आणि त्याहीपेक्षा महत्वाचा असतो तो त्या चित्राचा पाहणाऱ्या रसिकाच्या हृदयाला थेट भिडणारा अनुभवही, जो चित्र चांगले की अत्युत्तम हे ठरवतो. क्रौंचवधाच्या ह्या चित्रात हे तिन्ही घटक सुरेख जुळून आलेले आहेत. हे चित्र आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो आणि चित्र पाहणा-या माणसाचे मनही ह्या चित्रातल्या अपार करुणेने ओलावल्याशिवाय राहवत नाही.

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

एक दिवा त्यांच्यासाठी..

दुरितांचे तिमिर जावो

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

जो  जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।।

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे!  यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित  आहे .

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे.  पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो.  आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का?  केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे.  आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा  विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारण परत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन.  बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे.  एका  गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलच  आमचंही घर.  तिथली माणसं ,तिथलं वातावरण ,तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात.  पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही.  वृद्ध, थकलेल्या गात्रांची, काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली.  नाव, गाव ,स्थान कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित अनामिका.  पण अभावीतपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही.  आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे.  पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा.  आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही  तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही.  या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे ,फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत  वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही.  त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला.  या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता,आवशक्याता  जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट असे, रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले.  तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले ,कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने  केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात.

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच.  ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या  लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची ,सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची  जबाबदारी?  या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया.  एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया. 

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत.  जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती  पणती होऊया.तिथे जाणीवांचा,संवेदनाचा उजेड पेरुया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पाचवा दिवा –

ज्या महिलांना भीक मागणं सोडायचं आहे, अशा महिला माझ्याकडे काम मागत आहेत 

मी गाडगे बाबांचा भक्त आहे, गाडगेबाबांचे विचारसरणीला अनुसरून आम्ही अशा सर्व महिलांची एक टीम तयार केली आहे, या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे 

या माध्यमातून या महिन्यात पुण्यातील वेगवेगळे भाग स्वच्छ करवून घेऊन त्यांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे ..कपडे दिले आहेत ….याव्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवल्या आहेत. ! 

आमच्या या टीमला पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान चे ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे, यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट ! 

या सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात. 

अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे… म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी…. ! 

यासाठी मी तुझी माफी मागणार नाही….  किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही…. 

कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे…. आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस… तर मी कशाला येऊ मंदिरी ??? 

सहावा दिवा – 

ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होते अशा रुग्णांना, दवाखान्यात ऍडमिट करून उपचार केले. डोळे ऑपरेशन करून चष्मे दिले, दिव्यांग व्यक्तींना काठ्या कुबड्या आणि लागेल ते इतर वैद्यकिय साहित्य दिले. 

आमच्या परीने आम्ही असा नैवेद्य अर्पण केला. 

सातवा दिवा – 

हे नऊ दिवस लोक अनवाणी पायाने रस्त्यावर चालतात….! 

माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचे लोक वर्षानुवर्षे, अनवाणी पायाने चटके सहन करत जगत आहेत… 

मग यांच्या पदरात अजुन पुण्य का नाही मिळाले ?  याचा विचार करत आम्ही हि प्रथा बदलली…. 

या नवरात्रात ज्यांच्या पायी चप्पल नाही, अशा सर्वांच्या पायी चप्पल घातली… ! 

माते तुला हे आवडलं नसेल, तर माझ्या तोंडात चप्पल मार, पण यांच्या पायी मात्र चप्पल राहू दे, उन्हात खूप पाय भाजतात गं…. !!!

आठवा दिवा –

ज्यांनी आयुष्यभर पोरांच्या अंगावर मायेची चादर पांघरली, परंतु आता जे रस्त्यांवर आहेत, अशा रस्त्यावरील  सर्व आई बापांना, येणारे थंडीचे दिवस लक्षात घेवून गरम शाली आणि इतर कपडे दिले आहेत. 

नववा दिवा – 

अनेक महिलांकडे अनेक प्रकारचे कला कौशल्य असते, या कला कौशल्याचा वापर करून यांना आणखी प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून वस्तू तयार करवून घेऊन आपण त्या विक्री करणार आहोत 

आणि येणारा पैसा हा सर्व त्या महिलांना जाईल, असा विचार करत आहोत. 

अनेक भिक मागणाऱ्या महिलांना यामुळे एकाच वेळी व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्या त्यांची घरं चालवू शकतील….

यांना प्रशिक्षण देण्यासाठी, एका जागेची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. परंतु आम्हाला अजून कोणतीही जागा मिळालेली नाही. 

कामाचं खूप कौतुक होतं… अवॉर्डस मिळतात … सर्टिफिकेट मिळतात…. 

परंतु अवॉर्ड आणि सर्टिफिकेट ने आपण दुसऱ्याचं पोट नाही भरू शकत बाबा,’ हे माझ्या माईनं (आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी) माझ्या कानात खूप पूर्वीच सांगितलं होतं…! 

असो….काहीतरी होईलच…  हा नववा दिवा राखून ठेवलाय, त्या प्रशिक्षणाच्या जागेसाठी …! 

पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई….परंतु पोराच्या जीवनाचा विचार करतो तो बाप…! 

मला जे दिसते ते माझ्या पोराला सुद्धा दिसावं म्हणून जमिनीवरून कडेवर उचलून घेते ती आई…! 

पण मला जे दिसतंय, त्यापलीकडचं पोराला दिसावं म्हणून, पोराला डोक्यावर उचलून घेतो तो बाप…!!

आपण सर्वजण समाज म्हणून आमची कधी आई झालात तर कधी बाप झालात…. !! 

आमच्यावर प्रेम आणि माया करतांना, तळागाळातल्या समाजाला समरसून मदत करताना, आपण सर्व सीमा ओलांडल्या…! 

आमच्यासाठी हीच विजयादशमी…. हाच दसरा…!

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहज पुणे शहरातून स्कूटरवर फेरफटका मारला आणि मोकळ्या रस्त्यांवरून जाताना एकदम  ३५-४० वर्षांपूर्वीचा “फील” आला. 

कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सिंहगड रस्ता वगैरे रस्त्यांवर दाट झाडी होती. हे रस्ते निवांत होते. अगदी रात्री १०-१०.३० नंतर तर लक्ष्मी रोडही  निवांत असे. चक्क बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून रात्री गप्पागोष्टी करता येत. लक्ष्मी रोडला एक चहाचं दुकान रात्रीही चालू असे. तिथे बहुधा कामावरून परतणारे, थकलेभागलेले कामगार चहा पीत. रात्री उशीरापर्यंत इराणी हॉटेले चालू असत आणि पहाटे लवकर उघडत. रात्रीच्या शो ला सिनेमा बघून येताना गुडलक, रीगल, सनराईझ, पॅराडाईज, लकी, नाझ वगैरे ठिकाणी किंचित विसावून चहा घेण्यात मजा होती. क्वचित् खोबरं लावलेला केक नाहीतर क्रीमरोल, नाहीतर बन-मस्का खाऊन पोटोबा शांत केला जाई. रात्री पुण्यात रस्त्यावरून भरभर जाणारे म्हणजे एकतर सिनेमा पाहून परतणारे किंवा कामावरून घरी परतणारे असत. माझे वडीलही हाय‌ एक्स्प्लोझिवज् फॅक्टरीमध्ये खडकीला नोकरीला होते. सेकंड शिफ्ट संपल्यावर एच. ई.तसेच अम्युनिशन फॅक्टरीमधले कामगार एकमेकांच्या सोबतीने खडकी ते फर्ग्युसन रस्ता असा प्रवास अपरात्री करत. अपरात्री सहकारनगर, अरण्येश्वर, पौड फाटा वगैरे भागात यायला रिक्षावाले नाखूष असत ( ही फॅशन जुनी आहे , आजची नाही…). अपरात्री एकट्यादुकट्याला सायकल मारत जायला भीती वाटायची. त्यात जोशी-अभ्यंकर खून प्रकरण झाल्यावर तर अख्ख्या पुणे शहरातच दहशत पसरली होती. पुढेही  “हाकामारी” वगैरे अफवांमुळे भीती वाटायची. 

पुणं हे सायकलींचं शहर तर होतंच, पण नंतरही अनेक वर्षं बजाज सुपर, कब, एम एटी हीच वाहनं होती. त्यापूर्वी तर लूना, व्हेस्पा आणि लॅंब्रेटा ही वाहनं. मोटारीही मुख्यत्वे एम्बॅसिडर आणि फियाट याच होत्या, क्वचित् प्रीमियर पद्मिनी… बाकी भारी गाड्या फक्त इंग्रजी चित्रपटात पडद्यावरच दिसत. रात्री पुण्यातले बहुतेक रस्ते अजगरासारखे शांत, सुस्त पहुडलेले असायचे आणि दिवसाढवळ्याही दुतर्फा वाहतूक असून रस्ते “मोकळे” वाटायचे. आतासारखी वाहतूक “अंगावर” येत नव्हती. मुख्य  म्हणजे सायलेन्सर काढून ट्रिपल सीट जात, माकडासारख्या आरोळ्या ठोकत जायचं आणि सिग्नलला पच्च् करून तोंडातला गुटख्याचा  तोबरा थुंकायचा…. हा जंगली प्रकार नव्हता. 

तेव्हाची वाहतूक आठवली, की त्या आठवणीनं मन गलबलून येतं…

त्याकाळची वाहतूकही त्याकाळच्या पुण्यासारखीच होती…..

शांत…. सभ्य……सौम्य…..!!!

लेखक :  श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड,  पुणे.

संग्राहक : श्री माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

दसरा संपला होता. दीपावली जवळ आली होती. तेवढ्यात एके दिवशी काही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात  शिरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली!

त्यांनी विचारलं, “जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी  ‘लक्ष्मी पूजन’ का केलं जातं ? श्रीरामाची पूजा का नाही केली जात?”

या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये न कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता, न कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते! कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! तेवढ्यात, शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला!

त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, “दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच ‘सत्ययुग’ आणि ‘त्रेतायुग’ यांच्याशी जोडलेला आहे!

सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती! म्हणून ‘लक्ष्मी पूजन’ केलं जातं!

भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते! त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं! म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे!

म्हणूनच या पर्वाची दोन  नावे आहेत, ‘लक्ष्मी पूजन’ हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं “दीपावली” हे त्रेता युगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!

हे उत्तर मिळाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं! अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या चमूलादेखील यावर काय बोलावं हे कळेना!

आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!

एका वृत्तपत्राने माझी मुलाखत देखील घेतली!

त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठं अप्रूप होतं!

पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो, ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत  “लिबरर्ल्स” (वामपंथी) म्हटलं जातं,त्यांनी पाठवलेला होता. ही वामपंथियांची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन कॉलेज तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की “जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात ‘लक्ष्मीपूजना’चं औचित्य काय आहे?” एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होती !

परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबच झाली!

एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ शकतो. तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपसात काय नातं आहे ? आणि दीपावली मध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं?

याचं खरं उत्तर पुढीलप्रमाणे :

लक्ष्मी जेव्हा सागरमंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली! तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं.

कुबेराची वृत्ती कंजूषपणाची होती. तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला!

इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली! तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं. धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती!

लक्ष्मीनं आपलं गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाचीतरी नेमणूक कर!”

लक्ष्मी म्हणाली, “यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे! त्याला वाईट वाटेल!”

तेव्हा भगवान विष्णुंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर!

मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की “कुबेर धनभांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस!”

श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, “देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!”

लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली!

तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले! कुबेराकडे केवळ धन-भंडारावर पहारा करण्याचंच काम शिल्लक राहिलं.

गणपतीची उदार बुद्धी बघून, लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचेसोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल!

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात!

लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं. आणि या काळात श्रीविष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी-गणेश यांची पूजा केली जाते!

(पहा कसा विरोधाभास आहे की या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी ह्या सणाबद्दल पाठ्यपुस्तकात कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे!)

व्हाट्स ॲप साभार –

लेखक : श्री.अप्पा पाध्ये गोळवलकर

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? क्षण सृजनाचे ?

💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

    कुठे गेला अवचित

   भाऊ राया दूरवर…

    राहिली ना भाऊबीज

   असे मनी हुरहुर…|

 

     कसे आता सांगू कुणा

  दुःख मनातले माझ्या…

    विस्कटल्या वाटा साऱ्या

   माहेरच्या तुझ्याविना…|

 

    परतीच्या तुझ्या वाटा

     अशा – कशा हरवल्या….

     आशेच्या साऱ्याच लाटा

      विरुनिया आता गेल्या…|

 

     नको जाऊ विसरून

     बहिण -भावाचे नाते….

      तुझे – माझे बालपण

       अजूनही खुणावते…|

– शुभदा भास्कर कुलकर्णी

माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने  सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते.  पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर ,  कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी

वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात  पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?

गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.

हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.

मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.

तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली  “तिथं “.

नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.

तीने लगेच सांगितले  ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “

ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून  तिच्या कडून हार घेतला.  लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले  “राहुंदे ठेव तूला”.

पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.

आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला.  उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे  ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब ,  कोवळ्या वयातील  मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला.  खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती  खाऊ   महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.

आम्ही घरी पोहचेपर्यंत तो  रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत

राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!! 

या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. ! 

तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. ! 

आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!  

यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. ! 

या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!! 

आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे  जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….! 

काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… ! 

येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!

अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू….  तिथं आभाळात जाऊन झेप घे…  तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!

आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. ! 

पहिला दिवा –  

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….! 

बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ? 

आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ?? 

…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….

…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….! 

दुसरा दिवा –

फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून…  पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत. 

या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.

या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…

… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????

या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…! 

तिसरा दिवा –

भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता. 

सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!

आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.

संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले. 

…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…! 

आई आणि बापाला अजून काय हवं ? 

माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!! 

चौथा दिवा –

ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… ! 

गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!! 

घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत. 

हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!! 

— क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे ☆

श्री सतीश खाडे

 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे

अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती.

बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले.

येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्‍चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे सन १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते.

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल ‘हे कसं शक्य आहे?’ तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल…. 

…अन् नदी जीवंत झाली. 

ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला.

…. तर त्याचं झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते.

गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते.

पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली.

जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.

मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली… आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली.

अन्नसाखळीचे महत्त्व…

आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले.

या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले.

हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य.

तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी.

याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.

ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे.

यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे.

© श्री सतीश खाडे.

मो. 9823030218

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares