मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.

वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.

गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले 

कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….

“वक्त है मेहरबा आरझु है जवा

फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “

… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.

सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले 

एवढे मी भोगले की मज हसावे लागले “

ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.

हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो 

मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”

आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.

मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.

मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘

तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”

 

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे   ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

🫀 प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे  ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

(Valentine’s DaY Special…)

नैसर्गिक निवड प्रक्रियेचा भाग असलेले ‘प्रेम’ हे मनुष्याचे सर्वाधिक निरोगी वर्तन आहे. विज्ञान म्हणते की, आपल्या भाव-भावना हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या अन्य अवयवांवर थेट परिणाम करतात. असं काय असतं ह्या प्रेमात जे आपल्या आरोग्य-अनारोग्याचा अविभाज्य भाग आहे ? प्रत्येकाचे शरीर वय स्वभाव विचार परिस्थिती यानुसार ‘प्रेम’ वेगवेगळे असले तरी “तुमचं आमचं सेम असतं” असं का म्हणतात ??

रासायनिकदृष्ट्या मेंदूचा मनाशी संबंध असला तरी, प्रत्यक्षात मन हृदयाच्याच अधिक जवळ असते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे झाले तर आपण हृदयाचे चित्र काढतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर थेट परिणाम करतात. प्रेमामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाच्या Stress Hormone ची पातळी कमी होते. यामुळे हृदयगती कमी होऊन रक्त प्रवाह सुधारतो. अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. तणाव दूर होऊन स्नायूंना आराम मिळतो.

प्रेमात Oxytocin चा स्तर वाढतो, जे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. जसं जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुल एकमेकाशी जोडले जाते, अगदी तसेच नात्यात सुद्धा ऑक्सीटोसिन महत्वाची भूमिका निभावते. शांततेची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप अधिक चांगली लागते. मनात आनंदाची भावना Dopamine मुळे निर्माण होते. यामुळे ऊर्जा, एकाग्रता वाढते आणि एकाकीपणाची भावना कमी होते. प्रेमात हे अगदी सहज घडते.

आता प्रश्न असा की, हे सर्व घडते ते कोणत्या प्रेमामुळे ? तारुण्यातील प्रेम की अन्य कोणते प्रेम ??

तसं प्रेम हा आजवरचा सर्वाधिक संदिग्ध शब्द आहे. शब्दात व्यक्त करणे अशक्य असले तरी त्यात सौंदर्य, समाधान, समज, निस्वार्थीपणा, परिपक्वता, काळजी, सामर्थ्य, सकारात्मकता यांचा समावेश आहे.

इतरांवरील प्रेमाची सुरुवात स्वतःवरील प्रेमाने होते. जे लोक स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, त्यांना इतरांवर प्रेम करणे कठीण जाते. प्रेम कसे करावे ? हे शिकणे तिथून सुरू होते. प्रेम करणे म्हणजे पुढच्या व्यक्तीचा जसा आहे तसा, त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकार करणे.

असे केल्याने काय होते ? जगातील सर्वात अमूल्य गोष्ट आपल्याला लाभते, ते म्हणजे आंतरिक समाधान ! ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडतो. जे मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचेल त्या मार्गाने अथक प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला प्रेम केल्याने सहज मिळते.

सध्याच्या बहुतांश जीवनशैलीजन्य आजारांची (उदा- वंध्यत्व, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश इ. ) अनेकजण अनेक कारणे सांगत असले तरी, ‘प्रेमाचा अभाव’ हेही एक प्रमुख कारण त्यांच्या मुळाशी आहे. प्रेम हे तंत्रज्ञान वा औषध नसल्याने डॉक्टर ते लिहून देऊ शकत नाही, आणि ते विकतही मिळत नाही. अन्यथा या आजारांसाठी आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरजच पडली नसती.

आज ‘व्हॅलेटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुधारण्याची आपल्याला सुसंधी आहे. मनात राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. प्रेमाच्या मार्गाने असे हृदय आपण विकसित करू शकलो तर जन्माचे कल्याण होते. अन्यथा; जन्माला आला अन् मरून गेला… एवढेच घडते !

HàPPY Vålentine’s DåY

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड- मो ९४२३२६७४९२

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कोहिलू

१९६०/६१ साल असेल ते. एक दिवस भाईंनी (आजोबा -आईचे वडील) पप्पांना त्यांच्या ग्रँड रोडच्या ईश्वरदास मॅन्शन मध्ये बोलावून घेतले. अनेक वेळा अनेक कामांसाठी भाई पप्पांना असे बोलवायचे आणि पप्पा कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या फिरोजशहा मेहता रोडवर असलेल्या ऑफिस मधून ते बीईएसटी च्या बसेस बदलून ग्रँट रोडला पोहोचत. या वेळच्या त्यांच्या भेटीत भाईंचं नक्कीच काहीतरी विशेष काम असावं.

भाई पपांची वाटच पहात होते. त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.

“ जना! मी एक प्रस्ताव मांडतोय तुमच्यापुढे. ”

“ मांडा. ”

 “मला असं सुचवावसं वाटतंय की आता किती दिवस तुम्ही त्या धोबी गल्लीत राहणार? मला मालूला भेटायला यावसं वाटलं तर त्या लहानशा गल्लीत माझी गाडी पार्क करायलाही जागा नसते. ”

“ मग तुमचं काय म्हणणं आहे?” पप्पा थेट पण शांतपणे म्हणाले.

“ हे बघा जना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठाण्यातच तुम्ही एखादा चांगल्या भागात प्लॉट बघावा आणि बंगला बांधावा असे मला वाटते. ”

“ सुंदर कल्पना!”

 पांढरे स्वच्छ धोतर आणि सदर्‍यातलं, सहा फुटी उंच, गोरंपान, करारी डोळे असलेलं एक आदरणीय ताठ व्यक्तिमत्व! त्यांनी त्यांच्या लेकीसाठी ठेवलेला एक प्रस्ताव आणि होकार किंवा नकाराला टाळून दिलेलं पप्पांचं उत्स्फूर्त उत्तर.

 पण फार घोळ न घालता भाई पुढे म्हणाले, ” जना! तुम्हाला फक्त प्लॉट खरेदी, जागा निवडणे, कायदे, नंतरच्या बांधकामविषयक बाबी आणि यातायात सांभाळायची आहे. एकही पैसा तुम्ही खर्च करू नका. हा बंगला मला माझ्या लेकीला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. ”

 “तुमचा निरोप मी मालूला देतो. ” इतकं म्हणून काही अवांतर गप्पा मारून, चहा नाश्ता घेऊन पप्पांनी भाईंचा निरोप घेतला.

 या भेटीनंतर पप्पांची मनस्थिती नेमकी काय झाली असेल याचा आता माझ्या मनात विचार येतो.

आमचं रहातं घर जिजीचं होतं. जिजीच्या अपार कष्टातून ते उभं राहिलं होतं. पपांची जडणघडण त्याच घरात झाली होती. अनेक भावनिक आठवणींशी जोडलेलं होतं. शिवाय तसेही

 पप्पा पक्के थीअॉसॉफीस्ट होते. भौतिकतेपासून कित्येक योजने ते कायम दूर होते. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आनंदात वाहून जाणारे ते नव्हतेच पण देणारा आणि घेणारा यांच्या नात्यातला भावबंध जपण्याइतका संवेदनशीलपणा त्यांच्यात होताच आणि तितकाच अलिप्तपणाही ते सांभाळू शकत होते. शिवाय भाईंनी त्यांच्या मनातला हा विचार परस्पर स्वतःच्या लेकीला न सांगता जावयापुढे मांडला होता यातही कुठेतरी त्यांचा समंजसपणा, अदब, नम्रता, कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करण्याची वृत्ती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे कुणाचाच अभिमान दुखावण्याचा प्रश्न नव्हता. आपापल्या जागेवर दोघांचे श्रेष्ठत्व टिकूनच राहिले.

 परिणामी आमचं कुटुंब बंगल्याचं स्वप्न रंगवण्यात गुंग झालं.

 जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर, क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या घराजवळचा एक प्लॉट खरेदी करण्याचं नक्की ठरलं. हा प्लॉट पॅट्रीक कोहिलू नावाच्या कॅथलिक माणसाचा होता. वास्तविक तो जरी त्याच्या नावावर असला तरी तीन-चार भावांचा वडिलोपार्जित इस्टेट म्हणून कायद्याने त्यावर हक्क होता. दलाला तर्फे अनेक बैठकी, व्यवहारासंबंधीच्या, भाव निश्चित करण्याबाबतच्या पार पडल्या. प्लॉट घ्यायचा, की नाही घ्यायचा यावर कधी बाजूने कधी विरोधात चर्चाही झाल्या. प्लॉटची ही कॅथलिक मालक माणसं अतिशय चांगली आणि धार्मिक वृत्तीची होती. व्यवहारात कोणती फसवणूक होणार नाही याची खात्री झाल्यावर आणि पूर्व -पश्चिम, व्याघ्रमुखी, रस्त्याला लागून वगैरे भौगोलिक आणि पुराणोक्त बाबींचा, संकेतांचा नीट अभ्यास करून या जमीन खरेदीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि प्रारंभीचे साठेखत करून पपांनी संपूर्ण किमतीवरची पाच टक्के रक्कमही कोहिलू कुटुंबास कायदेशीर दस्तऐवज करून देऊन टाकली. साधारणपणे वर्षाच्या आत जमीन खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. मामला व्यवस्थित, निर्वीघ्नपणे पार पडला. आता पुढील एक दीड वर्षात बंगल्यात रहायला जाण्याची स्वप्नं आम्ही रंगवू लागलो.

 पण हकीकत हवीच. पप्पांचेच हे वाक्य. साधं कुठे प्रवासाला जायचं असलं वा एखादा कार्यक्रम ठरला असेल, कुणाला भेटायचं असेल तरी ठरलेला प्लॅन रुळावरून व्यवस्थित मार्गक्रमण करेलच याची कधीच हमी नसायची. काहीतरी प्रासंगिक छोटं मोठं विघ्न हे यायचंच आणि त्यालाच पप्पा विनोदाने “आपली हकीकत हवी” असे म्हणायचे.

 जमीन खरेदी बाबतची हकीकत मात्र एक अत्यंत कडवट घाव देऊन गेली. अचानक एका रात्री साऱ्या धोबी गल्लीत निजानिज झाल्यानंतर, आमच्या घराच्या खाली, दारू पिऊन पार नशेत असलेला, झिंगलेला एक माणूस जोरजोरात पप्पांच्या नावाने चक्क अत्यंत घाणेरड्या इंग्लिश शिव्या देऊन बोलत होता.

“ यु रास्कल, बास्टर्ड, सन अॉफ ए विच.. मिस्टर ढगे.. आय विल किल यु.. ”

 माझ्या पप्पांसारख्या संत वृत्तीच्या माणसाला अशा कोणी शिव्या देऊ शकतो यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही आणि हे केवळ त्याच दिवसापुरतं नव्हतं. नंतरचे एक दोन महिने तरी याच स्वरूपात ते कायम चाललं. ते दिवस फार वाईट गेले आमचे. रात्र झाली की आमच्या मनात एक भय दाटायचं. पपांना काही झालं तर? या भयाने आम्ही सारेच थरकापून जायचो.

 कोण होता तो माणूस?

 ज्याच्याकडून आम्ही जमीन खरेदीचा वायदा केला होता त्या पॅट्रीकचा हा वाळीत टाकलेला, व्यसनी भाऊ होता. वास्तविक जमिनीच्या या पैशात त्याचा कायदेशीर वाटा होता आणि तो त्याला दिला गेला नसावा म्हणून त्यांनी हा गलिच्छ, हिंसक, त्रास देणारा, धमकावणीचा मार्ग पत्करला होता आणि त्यात कुठेतरी आम्ही आणि आमचं बंगला बांधायचं स्वप्न विनाकारण भरडत होतं. वास्तविक हा त्यांचा कौटुंबिक मामला होता. त्यात आमचा दोष काय होता पण नाही म्हटले तरी एक माणूस रोज रात्री आमच्या घराखाली उभा राहून नशेत बरळतो, शिव्या देतो, नाही नाही ते बोलतो त्यामुळे आमच्या मध्यमवर्गीय, अब्रू सांभाळून, नीतीने जगणाऱ्या कुटुंबाला नक्कीच धक्का पोहोचत होता. गल्लीतले लोक पप्पांना म्हणायचे,

“ तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. ”

 हो.. खरं म्हणजे करायलाच हवी होती पण त्यातही एक गंमत होती. या कोहिलूला चार-पाच मुलं होती. त्याची बायको कुठेतरी घरकाम करून या दारुड्याचा संसार ओढत होती. रात्री हा माणूस शिव्या देऊन जायचा आणि एखाद्या सकाळी त्याची फाटकी तुटकी, बापुडवाणी दिसणारी बायको घरी येऊन पप्पांचे पाय धरायची, पोलिसात तक्रार करू नका सांगायची, त्याच्या भावांनी त्याला फसवलंय म्हणायची.. म्हणूनच तो असा बेवडा झालाय. त्याच्या मनात तुमच्याविषयी काही नाही म्हणायची. तो हार्ट मध्ये चांगला आहे असे बजावायची.

 कथा कोणाची आणि व्यथा कोणाला असे झाले होते.

 दारू पिऊन शिव्या देणाऱ्या झिंगलेल्या कोहिलूसमोर, खाली उतरून जिजी उभी राहायची.

“खबरदार! माझ्या बाबाला काही बोलशील तर? तुझ्या त्या क्रूसावरचा गॉड तुला कधी माफ करणार नाही. ”

 पप्पा मात्र शांतच असायचे. खरं म्हणजे त्यांनी त्याचा नुसता हात जरी पकडला असता तरी तो कळवळला असता. कदाचित बेशुद्धही झाला असता पण कुठलाही हिंसक मार्ग त्यांना हाताळायचाच नसावा. ते शांत राहिले. आमच्या भयभीत बालमनांवर मायेचं, धैर्याचं पांघरूण घालत राहिले.

 ॥ चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया॥

जणू काही या संस्कारांचाच प्रयोग आमच्यावर होत असावा.

अखेर एक दिवस पॅट्रीक कोहिलूला दलालातर्फे निरोप धाडून त्याला सारी हकीकत सांगितली गेली आणि हा तुमचा कौटुंबिक मामला असल्यामुळे झालेला जमिनीचा सौदा सामंजस्याने रद्द करावा असा निर्णय त्याला कळवण्यात आला.

पॅट्रिक आणि त्याचे इतर भाऊ पप्पांना भेटायला आले. त्यात हाही होता. पॅट्रीकने पप्पांची पाय धरून क्षमा मागितली.

“ हा जॉर्ज दारूत पैसे उडवतो. त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नाही म्हणून आम्ही त्याच्या हाती पैसे देत नाही पण त्याच्या हक्काची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवली आहे जी त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी यावी. तुम्ही सौदा रद्द करू नका. त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आमची. ”

अशा रीतीने ते प्रकरण निस्तरलं. आमच्या माथ्यावरच्या आभाळातला तो काळा ढग दूर झाला. वातावरणात विरघळूनही गेला. सारं काही शांत झालं. एक वादळ आलं आणि ओसरलं. मन थोडं ढळलं, पडलं.

आता मागे वळून पाहताना मनात विचार येतो कुठला धडा शिकवण्यासाठी हे घडलं असेल? एखादे कडू औषध प्यायल्यानंतर बराच काळ घशात कडवटपणा टिकून राहतो ना तसं मात्र झालं …

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सदाफुली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ सदाफुली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

उमलावं हिच्यासारखं…

बहरावं हिच्यासारखं…

ना असते ऋतूंची ओढ ना कधी मावळतीचे वेड…

नसते कधी ईश्वराच्या चरणी…

ना कधी कोणी केसात माळत…

तरीही बहरत राहते स्वतः साठी… अनेक रंगात…

कुठे आहे ती कडे कपारीत, तर कधी छान बगीचात, तर कधी एकटीच उंच डोंगरावर…

असतात कधी सोबती तर कधी एकटी…

तरीही बहरायचं एवढंच माहिती असतं…

मिळणार नसतो कधी मानाचा मुकूट…

ना मिळणार असते कधी कौतुकाची थाप…

असेच येतात अनेक प्रसंग तरीही रहायचं सदाफुलीसारखं नेहमी प्रसन्न…

ना उगवतीची आस ना मावळतीची भीती…

लक्षात ठेवायचं आपण नेहमीच बहरायचं…

आयुष्य जगायचं सदाफुलीसारखं…

 

 

… Always Be Happy… Anytime… Anywhere… In Any Condition

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता !) – इथून पुढे — 

दुसरी रात्र… पुन्हा एक चढाई.. आज आणखी एक शिखर काबीज करायचे होते…. जाताना एक सैनिक म्हणाला… ”जा रहा हूं साहब. ” त्यावर डॉक्टर साहेब सहज म्हणाले होते… ”देखो, जा तो रहे हो… लेकीन जीत के ही वापस आना!” तासाभरात तोच सैनिक जखमी होऊन उपचारासाठी परत आला! प्रचंड गोळीबारात त्याच्या कमरेला गोळी लागली होती… पण कमरेला बांधलेल्या गोळ्यांच्या सहा मॅगझीन (गोळ्या ठेवण्यासाठीची व्यवस्था) पैकी एका मॅगझीन मधल्या एका स्प्रिंगमध्ये ती गोळी अडकून बसली… हा बचावला! दुसरी गोळी डाव्या खांद्याला लागली…. हा उजव्या हाताने लढला… मग उजव्या हातालाही गोळी लागली… नाईलाज झाला! “साहब, मुझे पैरोंसे फायरींग सिखाई गयी होती तो मैं पैरोंसे भी लडता! लेकीन वापस नहीं आता… आप मुझे ठीक कर दो.. मै फिरसे जाना चाहता हूं लडने के लिये!”

एका सैनिकाच्या तर नाकात गोळी घुसली होती… त्याचे नाकच नाहीसे झाले होते… पण निष्णात डॉक्टर राजेश यांनी त्यालाही वाचवले… आता तो माजी सैनिक व्यवस्थित आहे.

हे एवढे देशप्रेम, एवढी हिंमत सैनिकांच्या मनात येते तरी कुठून हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीत आहे डॉक्टरांच्या मनातला. पण यातून एक निश्चित होते.. ते म्हणजे आपल्या देशाला अशा सैनिकांची वानवा नाही… आणि असणारही नाही!

आपल्या महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात एक गांव आहे.. आष्टी नावाचे. या गावाला शहीद आष्टी म्हणून इतिहासात ओळख आहे… १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात या गावातील पाच नागरीकांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्राणांची आहुती दिली होती म्हणून हे गाव शहीद अर्थात हुतात्मा आष्टी! येथे एक हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे. राजेश यांचा जन्म याच गावातला. वडील वामनराव डॉक्टर तर आईचे नाव कुमुदिनी. त्यांची शाळा या स्मारकामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम करीत असे. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते गायली जात… शाळकरी राजेश या गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये बासरी वाजवणा-या मुलांच्या पहिल्या रांगेत असत. तिथूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले. राजेश यांनी पुढे उत्तम शिक्षण घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजात एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले! समाजासाठी काही तरी उत्तुंग करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. आपण आय. ए. एस. अधिकारी व्हावं, ग्रामीण भागात जनतेची प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करावी, असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते घरी न सांगता थेट दिल्लीला पळून गेले… तेथे त्यांनी आय. ए. एस. होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. दिल्लीत राहण्याची सोय नव्हती म्हणून खासदार महोदयांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यु. पी. एस. सी. ची तयारी करीत असताना काही पैसे कमवावेत म्हणून त्यांनी तिथल्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली.. दिवसातील जवळजवळ वीस तास ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत. त्यातच त्यांच्या एका वरिष्ठ सहकारी डॉक्टरांनी त्यांना लष्करी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला… आणि तीन हजार उमेदवारांमधून डॉक्टर राजेश आढाव पहिल्या साडेतीनशे मध्ये निवडले गेले. पहिलेच जबाबदारी मिळाली ती जम्मू-कश्मीर मध्ये तैनात असलेल्या १३, जम्मू & काश्मीर रायफल्सचे वैद्यकीय अधिकारी म्हणून. सुमारे आठशे ते हजार सैनिक-अधिकारी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे काम! लवकरच डॉक्टर राजेश या कामांत रुळले… सैनिकी गणवेश अंगावर चढताच त्यांच्यातील देशभक्त, समाजसेवक पूर्ण जागा झाला!

जवान राजेश यांना डॉक्टर देवता म्हणून संबोधत असत. त्यांनी उपचार केले तर रुग्ण निश्चित जगतो.. असे ते मानीत असत. आणि ते खरे ही होते.. कारगिल लढाईत त्यांनी ९७ जवान आणि अधिकारी यांचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना विशेष सन्मान देण्यात आला!

सैनिकांचा खूप विश्वास त्यांनी कमावला होता. लढाईच्या काळात…. उंच पहाडावर असलेल्या सैनिकांना जेवण पोहोचवले जायचे. पहाटे बनवलेले खाद्यपदार्थ पहाडावर पोहचेपर्यंत खूप उशीर व्हायचा. एकदा भात दही असा बेत होता. तेथील वातावरणामुळे त्या भातावर असलेल्या दह्यावर एक वेगळाच थर दिसू लागला. जवानाना वाटले की दही खराब झाले… खायचे कसे? यावेळी डॉक्टर राजेश यांनी स्वत: ते दही खाल्ले… आणि म्हणाले… ”अगर मुझे आधे घंटे तक कुछ नहीं होता है.. तो यह दही खाने लायक है ऐसा समझो… ! ते पाहून ते भुकेलेले सर्वजण दही भातावर तुटून पडले! जवान मजेने म्हणायचे यह डॉक्टर साहब तो जादू टोना के डॉक्टर है!

एल. ओ. सी. कारगिल चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी डॉक्टर राजेश यांची भूमिका केली होती. विक्रम बात्रा साहेबांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातही डॉक्टर राजेश यांची भूमिका दाखवली गेली आहे.

कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या पत्नी दिपाली या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कारगिल मधून परतल्यावर 2 डिसेंबर २००१ रोजी डॉक्टर साहेब दिपाली यांचेशी विवाहबद्ध झाले… आणि तेरा दिवसांनी कर्तव्यावर पोहोचले… ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेण्यासाठी!

त्यांचे चिरंजीव ओम एम. बी. बी. एस. चा अभ्यास करत आहे. ओम लहान असताना जेंव्हा राजेश साहेबांच्या कारगिलच्या कहाण्या ऐकायचा… तेंव्हा त्याला त्या ख-या वाटत नसत… पण तो मोठा झाला आणि त्याला आपल्या पित्याची महान कामगिरी माहीत झाली!

कारगिल लढाईत एका डॉक्टर साहेबांना गोळी लागून ते हुतात्मा झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी घेऊन जेंव्हा बातमीदार डॉक्टर राजेश यांच्या घरी पोहोचले तेंव्हा यांच्या मातोश्री यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते… त्या म्हणाल्या… आम्ही दूध विकतो.. त्यात मी कधी एक थेंब पाणी मिसळले नाही… माझ्या मुलाला असे काही होणारच नाही! आणि त्यांचे शब्द खरे झाले… डॉक्टर साहेब सुखरूप होते… बातमी अर्धवट होती… राजेश यांना बॉम्बमधील धारदार splinter लागून त्यांना जखम झाली होती! दुधात थेंबभरही पाणी न घालणे याचाच अर्थ पूर्ण प्रामाणिक व्यवहार! यातून संस्कारही दिसतात!

कारगिल युद्धावेळी captain असलले डॉक्टर राजेश पुढे कर्नल पदावर पोहचले… त्यांना सेना मेडल दिले गेले. अशी कामगिरी करणा-या मोजक्या आर्मी डॉक्टर्समध्ये राजेश साहेबांचा समावेश आहे.

पुढे कोरोना काळातही डॉक्टर राजेश यांनी सैन्याची काळजी यशस्वीरीत्या घेतली. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.

 २९ जानेवारी, २०२५… आफ्रिकेतील कांगो येथून एक बातमी आली… संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तिथल्या लष्करी रुग्णालयाचे प्रमुख कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर एक नव्हे तर दोन RPG अर्थात Rocket Propelled Grenade म्हणजे रॉकेटवर बसवून डागला जाणारा हातगोळा पडला! पण सुदैवाने राजेश साहेब केवळ दहा सेकंद आधीच तिथून बाहेर पडले होते! त्यांचे आई-वडील, पत्नी यांची पुण्याई थोर आहे.. हेच खरे!

काल ६ फेब्रुवारी रोजी कर्नल डॉक्टर राजेश आढाव साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त माहिती घेऊन हा लेख लिहिला आहे. यात चुका तर असतीलच. पण डॉक्टर साहेबांचा पराक्रम अधिक लोकांना माहीत व्हावा… म्हणून हे धाडस केले आहे. विविध मुलाखाती, बातम्या पहिल्या… आणि किंचित लेखन स्वातंत्र्य घेऊन, कोणाचीही परवानगी न घेता लिहिले आहे.. क्षमस्व! पण माझी भावना प्रामाणिक आहे! कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ (Adhau असे spelling लिहिले जाते बऱ्याच ठिकाणी) यांच्यावर एक छान चित्रपट निघावा.. ही इच्छा आहे. किमान नव्या पिढीला आपल्या बहाद्दर माणसाची माहिती तर होईल. जयहिंद.

Happy Birthday, Colonel साहेब !

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात !’ — लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात ! — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रॉमिस डे म्हणजे

राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही –

असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे बाजीप्रभू देशपांडे

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं –

– असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे – 

थुंकतो मी तुझ्या जहागिरीवर, माझा जीव स्वराज्यासाठीच

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे मुरारबाजी देशपांडे 

*

प्रॉमिस डे म्हणजे- 

आमचं राज्य घेणं तर राहूदे औरंग्या, तुझीच कबर या मातीत बांधली जाईल

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे संताजी धनाजी 

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं ६० मावळे द्या, एका रात्रीत गड घेतो –

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे कोंडाजी फर्जंद

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं –

-असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे छत्रपति शिवाजी महाराज

*

असा असतो खरा

प्रॉमिस डे…

ते शिकूया, तसे प्रॉमिस पाळूया !

जय भवानी, जय शिवाजी…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#

…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे. 

सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.

तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची  प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य  जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

पायाशी लोळत विनवी नमून-   2

 *

धावसी मजेत वेगात वरून

आणिक खाली मी चालले चुरुन !

 *

छातीत पाडसी कितीक खिंडारे

कितीक ढाळसी वरून निखारे !   2

 *

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.

 *

ढगात धुराचा फवारा सोडून

गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2

 *

दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड

जगावे जगात कशाला भेकड !

 *

पोलादी टाचा या छातीत रोवून

अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2

 *

चला रे चक्रानों,फिरत गरारा

गर्जत पुकारा आपुला दरारा !

 *

शीळ अन कर्कश गर्वात फुंकून

पोटात जळते इंधन घालून ! 2

 *

शिरली घाटात अफाट वेगात

मैलांचे अंतर घोटात गिळीत !

 *

उद्दाम गाडीचे ऐकून वचन

क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2

 *

“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी

घुमले पहाड घुमल्या कपारी !

 *

हवेत पेटला सूडाचा धुमारा

कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2

 *

उठला क्षणार्ध भयाण आक्रोश

हादरे जंगल कापले आकाश

 *

उलटी पालटी होऊन गाडी ती

हजार शकले पडली खालती ! 2

या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्‍यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…

तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.

आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.

कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.

आगगाडी व जमीन  या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्‍या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन  या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून  कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…

आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.

थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…

ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…

आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…

त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…

अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…

मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…

आता काय झालं?… माझा प्रश्न..

काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…

तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…

प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे‌… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…

मी निरुत्तर…

पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…

पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…

आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…

त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…

एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…

येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…

यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.

आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…

आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

# जगाने ऐश्वर्य उपभोगावे म्हणून स्वतः स्मशानात राहतो तो शिव असतो…

# जगाला मांगल्याचे अमृत मिळावे म्हणून जो स्वतः हलाहल कंठी धारण करतो तो शिव असतो…

# पत्नीचे वाहन व्याघ्र, एका मुलाचे वाहन उंदीर, एकाचे मोर आणि स्वतःचे वाहन नंदी असताना, तसेच स्वतः कंठी व्याल {सर्प } धारण करतो ( अर्थात परस्पर विरोधी वाहनं/स्वभाव असताना… ) आणि तरीही गुण्या गोविंदाने स्मशानात आपला संसार थाटतो आणि आदर्श संसार करतो, तो शिव असतो…

# सर्व विद्यांचा निर्माता, सर्व कलांचा निर्माता, सर्व गुरूंचा गुरू असताना, सर्वांपासून अलिप्त राहून स्मशानात कायम ध्यानस्थ राहू शकतो, तो शिव असतो…

# आपल्याला असलेले सर्व ज्ञान जगाला प्राप्त व्हावे म्हणून सर्वप्रथम आपल्या पत्नीला देतो, तो शिव असतो…

# साऱ्या विश्वाचा पसारा सांभाळताना, त्यातूनच वेळ काढून आपल्या पत्नीशी निवांत गप्पा मारतो, तो शिव असतो…

( कोणत्याही कथेच्या आधी शिव पार्वती संवाद झाल्याचे आपल्याला आढळेल…! )*

# जो स्वतः शिव असताना, जगाचा आद्यगुरू असताना, अखंड रामनाम स्मरण करीत असतो, तो शिव असतो…

# जो देव दानव, मानव, भूतखेते सर्वांना पूज्य असतो, तो शिव असतो…!

# जो कधीही सत्याची कास सोडत नाही, त्यामुळे तो शिव होतो आणि जसा असतो तसा तो सुंदर दिसतो…

“सत्यम् शिवम् सुंदरम्”

भगवान शंकर महाराज की जय !!! सद्गुरू नाथ महाराज की जय!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

माझा एक दुकानदार मित्र आहे. वडिलोपार्जित व्यवसायात आहे. कधीही येता जाता त्याच्या दुकानापाशी हात करताना मला दुकानाबाहेर ठेवलेले उंदरांचे दोन पिंजरे दिसतात. पण त्यात पकडले गेलेले उंदीर मात्र कधी दिसले नाहीत. मी त्याला एकदा सहज विचारलं, “बाबा रे, आजतागायत एकदा तरी उंदीर सापडला का पिंजऱ्यात?” तो हसून म्हणाला,” दुकान सुरुवातीला नवं होतं,तेव्हां सहा महिने उंदीर सापडायचे. नंतर पुन्हा कधी सापडले नाहीत. सगळे उद्योग करुन झाले. भजी ठेवली,कॅडबरी ठेवली,चीज क्यूब्ज ठेवून पाहिले,नॉनव्हेजचे तुकडे ठेवून बघितले. पण हे उंदीर अफाट हुशार झालेत. त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट त्यात ठेवा,तो सापळा आहे,हे त्यांना अगदी बरोबर समजतं. ते सगळ्या दुकानात धुडगूस घालतात, पण सापळ्याकडे फिरकतच नाहीत. मी आपला रित म्हणून रोज मोठ्या आशेनं पिंजरा लावूनच दुकान वाढवतो.” मीही हसण्याचा आनंद घेऊन त्याचा निरोप घेतला. पण त्याचं वाक्य मात्र डोक्यात घुमत राहिलं – आजकालचे उंदीरसुद्धा हुशार झालेत…!

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या अगदी चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या दारी गायींसाठी एका मोठ्या सिमेंटच्या पात्रात पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात अनेकदा गायी फार लांबून लांबून पाण्यासाठी येतात. त्या कुणालाही कसलाही त्रास देत नाहीत. त्या येतात आणि पाणी पिऊन शांतपणे निघून जातात. पण एकानं त्या गायींना हुसकून लावण्याचा उद्योग सुरु केला. दगड मारणे, काठीने मारणे असे प्रकार सुरु केले. गायींचं त्यांच्या दारात थांबणं बंद झालं. आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जायच्या. पुढं एका दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी मी गायींना खाऊ घालत होतो, तेव्हां तेच गृहस्थ पुरणाची पोळी घेऊन आले आणि गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करु लागले. त्या गायीनं बाकी सगळ्यांचे गोग्रास घेतले, पण ह्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शांतपणे निघून गेली. गायीसुद्धा हुशार झाल्यात..!

हीच गोष्ट मधमाशांची आणि मुंग्यांची. एखाद्या ठिकाणी त्यांच्या जिवाला धोका असेल तर त्या ठिकाणी त्या वसत नाहीत. उलट त्या त्यांची अधिकाधिक सुरक्षितता शोधतात. माणसांचा उपद्रव होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतात. ‘लक्ष्मणरेषा’ नावाचा मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उपयुक्त असा खडू मिळतो. त्याच्या रेषा धान्याच्या पोत्याभोवती मारल्या तर मुंग्या त्या बाजूनं फिरकत नाहीत. पण त्यावरचा मार्ग बरोब्बर शोधून काढतात. एकदा उन्हात आईनं वाळवणं घातली होती आणि बाजूनं लक्ष्मणरेषा मारल्या होत्या. पण मुंग्या असल्या बिलंदर की, त्यांनी गच्चीत पडलेलं एक छोटंसं वाळकं भुईमुगाच्या शेंगेचं टरफल ढकलत आणलं आणि त्या रेषेवर ठेवून वेढा फोडला. संध्याकाळी उन्हं कलल्यावर गोळा करायला गेलो तर सगळा प्रताप लक्षात आला. पण तोवर मुंग्यांचा डाव बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. म्हणजे, मुंग्यासुद्धा शहाण्या झाल्यात..!

प्रश्न आहे तो आपण माणसांचाच..! पर्यावरणातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनसुद्धा जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं शहाणपण माणसाला का मिळवता येत नाही? स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन मार्ग काढता येत नसेल तर किमान इतरांच्या अनुभवातून तरी योग्य तो बोध मनुष्यप्राणी का घेत नाही? ‘जब वुई मेट’ नावाच्या हिंदी सिनेमात भर रात्री अनोळखी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या करिना कपूरला वयानं तिच्याहून वडील असणारा स्टेशन मास्तर “अकेली लडकी खुली हुई तिजोरी की तरह होती है” हे सांगत असतो. पण “यह ग्यान मुफ्त का है या इसके पैसे चार्ज करते हैं? क्योंकी चिल्लर नहीं है मेरे पास” असं मोठ्या तोऱ्यात सुनावणाऱ्या त्या करिना कपूरच्या तोंडचं ते वाक्य आपल्याला विनोदी वाटतं. पण त्या स्टेशन मास्तरच्या सांगण्यातली काळजी एकालाही दिसत नाही,जाणवत नाही. हाच तर आपल्या माणसांच्या शहाणपणातला उसवलेला टाका आहे.

रात्री तीन वाजता कुणालाही न सांगता, मित्रांसोबत घराबाहेर भटकणारी तरुण मुलंमुली दिसणं पुणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यात कुणालाच न सांगता, कॉलेजला दांडी मारुन, खोटं बोलून परस्पर लोणावळा, भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी भटकणारी मुलंमुली खरोखरच व्यवहारज्ञानी असतात का? सेल्फी काढण्याच्या नादात कड्यावरून कोसळलेली मुलं मुली, धोकादायक धबधब्यात उतरलेली माणसं खरोखरच प्रॅक्टिकली शहाणी असतात का? हा प्रश्न माझ्यासारखाच अनेकांना पडत असेल.

“आईवडील म्हणजे आपले सर्वात मोठे शत्रू” असं वाटणाऱ्या तरुण पिढीची आपल्या समाजात मुळीच वानवा नाही. मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या कित्येक गोष्टी अनेकांना ठाऊक असतात, पण त्यांच्या पालकांनाच ठाऊक नसतात. कित्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे पालक ॲड नसतात. आपल्या मुलामुलींचं मित्र-मैत्रीण मंडळ पालकांना माहितच नसतं. आपल्या आयुष्यात काहीही घडलं तरी घरच्यांना सांगावंसं मुलांना का वाटू नये? हा खरोखरच काळजीचा मुद्दा आहे. आपल्याच परिवारातल्या माणसांपासून मुलंमुली गोष्टी लपवून का ठेवतात? अत्यंत महत्वाच्या गोष्टींबाबत सुद्धा आईवडीलांपेक्षा त्यांना मित्र अधिक जवळचे का वाटतात? आपल्या आयुष्यातली अत्यंत मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा मुलंमुली पहिला फोन आपल्या पालकांना का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्यानं शोधलं पाहिजे.

नागरिकशास्त्र हा विषय १०० गुणांचा केला पाहिजे,असं आता अनेकांना वाटतं. ते समाजातली एकूण परिस्थिती पाहता खरंच आहे. पण त्याहीआधी व्यवहारज्ञानाचं आणि स्वतःची सुरक्षितता जपण्याचं शिक्षण आपल्या कुटुंबातूनच मुलामुलींना मिळणं नितांत आवश्यक आहे. जगण्यातलं शहाणपण शिकण्यासाठी मुंग्या,उंदीर,गायी किंवा अन्य प्राणिमात्र कुठल्याही वेगळ्या व्यवस्थेकडे जात नाहीत. त्यांना ते शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळतं. मधमाशा सुद्धा त्यांची कुटुंब प्रमुख असलेल्या राणीमाशीचं ऐकतात. जगण्यातली शिस्त मोडत नाहीत. मन मानेल तसं वागत नाहीत किंवा वडीलधाऱ्यांचं सांगणं धुडकावून सुद्धा लावत नाहीत. त्यांच्या जगण्यातले निसर्गधर्म आणि परिवार व्यवस्था ते पूर्ण निगुतीनं आणि आदरानं जपतात, मोडीत काढत नाहीत.

आईवडील आणि कुटुंबातल्या अन्य मोठ्या माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगला संवाद असणं, वागण्याबोलण्यात पारदर्शकता असणं म्हणजे बिनकोठडीचा तुरुंगवास नसतो. उलट तेच आपल्यासाठीचं अतिशय सुरक्षित आणि सहृदय वातावरण असतं, हे शहाणपण आपण माणसं कधी शिकणार? कारण, जगण्यातलं शहाणपण नसल्यापोटी जी किंमत मोजावी लागते, तिचा इन्श्युरन्स निघत नसतो..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares