मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

‘ चांदण्यांचं खळं ‘  या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. …. 

न्हवायिळा ग राम  बाई चैताचा गारयीवा

सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा

….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला

आकाशाचा पाळणा खाली धरती मावली

 नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली

राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली. 

कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा 

शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा

सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात- 

कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा

 लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा

 शितला सासुरवास केला ग केशोकेशी

 सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी

बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात. 

वनवास आला शितंसारख्या सतीला 

बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला

 सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला 

घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला

रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा  द्यावी लागली

सतीपणाचं सत्व  दाह आगिनं इजल 

सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल

गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती 

आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका 

शीतंला समजावती बोरीबाभळी बायका… 

सिता सतीला वनवास असा किती करतील

 लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील

नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला 

लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन

 वहिनीला न्याया आला मुरळी होऊन 

लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला 

वाट बघती समधी डोळे लावून दाराला

सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते 

‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘

वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती 

वसर वसर माऊली माझे माय धरत्री 

घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी

…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं. 

लेखक : श्री अभिजित साळुंखे 

माहिती संकलन :   सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सुरवातीला अधिक महिना, मग श्रावण महिना,त्या नंतर गौरी गणपती हयामुळे दोन अडीच महिने नुसती भक्तगणांची धावपळ होती. पूजाअर्चा , देवदर्शन, व्रतवैकल्ये, ह्यामध्ये बहुतेक सगळे गुंतले होतें. श्रावण आणि अधिक महिन्यातील व्रतवैकल्ये आणि गणपती महालक्ष्मी उत्सव ह्यांमुळे हे सगळे दिवस प्रचंड उत्साहाचे, चैतन्याचे आणि धावपळीचे गेलेत.

ह्या सगळ्या धावपळी नंतर प्रत्येकाला आता थोडीशी विश्रांती, थोडीशी शांतता, अगदी मनापासुन हवीहवीशी वाटते, नव्हे आपलं शरीर आता आरामाची, जरा उसंतीची आतून मागणी करीत असत.आता जर पंधरा दिवस जरा शांत, स्थिर गेलेत तर पुढें नवरात्र, दिवाळी ह्यासाठी लागणारा उत्साह, शक्ती आपल्यात तयार होईल असं मनोमन वाटतं.

सहज मनात आल ज्या प्रमाणे आपलं त्याचं प्रमाणे देवाचं सुध्दा असेल. त्यांचे ही हे सगळे दिवस प्रचंड व्यस्ततेत गेले असतील. ती देवळांमध्ये होत असलेली प्रचंड गर्दी, भक्तांकडून होणारा तो दूध पाण्याचा अभिषेकाच्या निमित्याने होणारा मारा, ती कचाकचं तोडण्यात येऊन देवाला वाह्यलेली फुलं, पत्री, तो प्रसादाच्या पदार्थाचा कधी कधी अतिरेक आणि सगळ्यांत कळस म्हणजे ह्या नंतर भक्तांकडून मागण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी नवसाची बोलणी, ह्या सगळ्यामुळे देऊळ वा देव्हाऱ्यातील देव सुध्धा जरा उबगलेच असतील नाही ?

अर्थातच मी संपूर्ण आस्तिक गटातीलच आहे, देवावर माझा प्रचंड विश्वास आहे, ह्या शक्तीपुढे कायम नतमस्तक रहावसच आपणहून वाटतं, फरक जर कुठे पडत असेल तर तो भक्तीत न पडता तो हे दर्शविण्याचा पद्धतीत पडतो. मला स्वतःला दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट हा देवाच्या दर्शनाने झाला तर मनापासुन आनंद मिळतो, सुख वाटतं. परंतु हे करतांना ती गर्दी असलेली देवळ, भरमसाठ तोडलेली फुलं, पत्री हे मनापासुन नको वाटतं वा कुणी केलेलं दिसलं ते मला अस्वस्थ करुन जात. असो

आता पंधरा दिवसाच्या ब्रेक नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी ह्यांचे वेध लागतील. तेव्हा सगळ्यांनी जरा विश्रांती घ्या आणि नव्या उत्साहाने परत सण, सोहळे ह्यांच्या स्वागताला सज्ज व्हा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

प्रिय नदीमाय, आज तुझ्या अत्यल्प वाहत्या पाण्यात मी एक कागदी नाव सोडली आहे. इतरांच्या नजरेतून लपवण्यासाठी कागदाची नाव केलेली आहे पण ती कागदी नाव नसून तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. सध्या तुझं वाहणं थांबलेलं असल्यामुळे निवांत वाच. मराठवाड्यात मान्सुन आगमनाचा पाऊस झाला नाही, परतीचा पाऊस चार दिवसांनी परतलेला असेल. पुढच्या हाहाकाराची चाहूल दिसतेय. माझ्या बालपणी तुझं खळाळतं रूप पाहिलेलं असल्यामुळे तुझी खंडमयता बेचैन करत आहे.

प्रिय नदीमाय, तुला वाटलं असेल की हे पत्र आजच का लिहिले असेल ? तर तुला सांगतो आज जागतिक नदी दिन आहे. नाही कळलं ? कळणार कसं गं तुला ?माझी भोळी माय. अगं आम्ही माणसं स्वतःचा जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा करतो. साधुसंतांचे, महापुरूषांचे, नारीरत्नांचे, वीरगाथांचे स्मरण  म्हणून जयंती पुण्यतिथी दिन साजरे करतो. निसर्ग शक्तीची पूजा म्हणून सण उत्सव साजरा करतो. तुझेही आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणून तुझाही दिवस साजरा करावा म्हणून जागतिक स्तरावर आम्ही ‘नदी दिन‘ साजरा करतो.

आता तुला प्रश्न पडला असेल की हे जग म्हणजे  काय आहे ? ती कथा खरेच खूप मोठी आहे. पण हीच कथा तुझ्या चित्तरकथेची पटकथा आहे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इतक्या लांबच्या वर्षाची आहे की एकवेळ ऋषीचे कुळ सापडेल, तुझेही मुळ सापडेल पण मनुष्य जन्माचा नेमका आरंभ बिंदू काळाच्या मापन चौकटीत मांडणं कठीण आहे. हवा, पाणी, जमीन हे पृथ्वीचे आरंभीचे घटक. या घटकांनीच जैविक व अजैविक उपघटकांची निर्मिती केली. नव जीव-निर्मितीचे वरदान लाभलेल्या पृथ्वीवर मानव नावाचा जीव आला. गुहेचा ,डोंगरकपारीचा आधार घेत हा माणूस सुरुवातीला जीव मुठीत घेऊन राहत असे. अन् आता मानवामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा जीव मेटाकुटीला आला आहे. पशूपालन व शेतीसाठी माणसाला स्थिर पाणवठ्याची गरज निर्माण झाली. ही गरज नदीमाईने पुरविली‌. म्हणून आरंभीच्या मानवी वसाहती नदीच्या आधारानेच उभ्या राहिल्या. स्थिर जीवनामुळे माणसाची अन्नासाठीची भटकंती थांबली व थांबवलेल्या वेळेत त्याने विकास, प्रगती नावाखाली इतक्या उचापती केल्या आहेत की त्यातून निसर्गाला अपरिमित झळ पोहोचली आहे. नदीमाय तू सुद्धा त्यातून सुटली नाहीस. तुझ्याही ते लक्षात आलेच असेल. माय म्हणून तू आम्हाला माफ करत असशील, हे मातृत्व म्हणून ठीक असलं तरी आता तुझ्या नरडीभोवती फास आवळला गेला आहे. शेवटच्या घटकेत तुझी सुटका झाली नाही तर पुढची मानवी पिढी तुझ्या कोरड्याठाक काठावर मरून पडलेली असेल.

नदीमाय, किती गं सुंदर तुझा जन्म. उंच पठारावर, डोंगरपर्वतावर, बर्फाच्या साठ्यातून तुझा जन्म. पृथ्वीच्या पृष्ठावर पावसाच्या आगमनाने ओढलेली तू एक साधी रेषा. पण अशा अनंत रेषा, अनंत प्रवाह एकत्र येत तू नदी होतेस. घनदाट जंगलातून, भयानक दरीखोऱ्यातून, धबधब्यातून ओसंडून वाहत तू विशाल रूप घेत धावत मानवी वस्तीत येतेस. केवळ शेती व पशुपालन या आमच्या प्राथमिक गरजा होत्या तोपर्यंत आपलं नातं माय नदी व पुत्र मानव असंच होतं. आमच्या घरात जन्मलेल्या मुलींना नदीची नावं आहेत. नदीचे उत्सव आहेत. चित्रपटाची गाणी, नावे यांतसुद्धा नदी आहे. नदी व मानव एकरूप आहेत. पृथ्वी हे जर एक मानवी शरीर मानलं तर नदी ही पृथ्वीची रक्ताभिसरण संस्था आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगीकरण, कारखानदारी, व्यवसाय, अर्थाचा हव्यास इत्यादी कारणांमुळे मानवाने नदीच्या नरडीला नख लावले. जमिनीवरील भूखंड माफियांची एक शाखा वाळू माफिया म्हणून उदयास आली. नदीमाय, हे वाळू माफिया कुणी परग्रहावरील एलिएन्स नसून धरतीच्या लेकरातीलच हव्यासी लोकांचा कंपू आहे, जो सातत्याने नदीमायीच्या थेट गर्भात लोखंडी खोऱ्यांचा मारा करून शेकडो वर्षांनंतर तयार होणाऱ्या वाळू कणांची भ्रुणहत्या करून चोरी करत आहे.

जंगलातील वनस्पतींच्या मुळातून, मृदागंध खडकातून तू आमच्यासाठी अमृत चवीचे पाणी आणलेस. 

पण नागरी वस्तीत येताच आम्ही तुला काय दिले- तर न विरघळणारे प्लास्टिक, किळसवाणे घाणेरडे पदार्थ, दुर्गंधीयुक्त सांडपाणी, कारखान्यातील विषारी जल, अपरिमित कचरा, किती किती म्हणून सांगावं ? असं सांगितलेलं पण काही माणसांना आवडत नाही म्हणून तर गुपचूप पत्र लिहिले आहे.

नदीच्या आश्रयाने आमची कथा लिहिली आहे, पण आम्ही मात्र तुझी चित्तरकथा केली आहे. पण काही माणसं खूप चांगली असतात. ब्रिटनचा एक नागरिक आहे ,मार्क ॲंजोलो– त्यानेच तब्बल पंचवीस वर्षे थॉम्पसन नदीवर स्वच्छता मोहीम राबविली. नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम जगाच्या नजरेत आणून दिले. 

त्याने ही समस्या व उपाय जगाच्या नजरेत आणून दिले. नदी स्वच्छतेसाठी व नैसर्गिक जलस्त्रोत मोकळे करण्यासाठी हा ‘ नदी दिन ‘ आहे.नदीच्या आयुष्याचा गोंडस पट विस्कटून टाकणाऱ्या चित्रपटाचे सर्व कलाकार मानवी वंशाचे आहेत. आमच्यातीलच काहींनी तुझी चित्तरकथा केली आहे म्हणून तर मी तुझी उपकारक कथा आमच्या बांधवांना सांगण्याचे मनावर घेतले आहे.

‘ सिंधु ‘सारखी प्रगत संस्कृती तुझी देणगी आहे. एवढेच नव्हे तर मानवी संस्कृतीचा उदय, विकास व प्रगतीचा तूच आधार आहेस. अन्नासाठी मासेमारी, पोटासाठी शेती, उद्योगासाठी वीज, निवाऱ्यासाठी वाळू, वाहत्या पाण्यामुळे वनस्पतींचा बीजप्रसार, या सर्वांचे मूळ तू आहेस. म्हणून नदीमाय तू जगले पाहिजेस.

जलस्त्रोताबाबत उपकार , जनजागृती व नदी संवर्धन करणारा एक सेवक पुत्र म्हणून मी तुझ्या कामावर असेन .हा शब्द तुला देतो  नदीमाय….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians) 

पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.

पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, “जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण.” लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला  डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’ 

ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.

अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत. 

त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा कापण्याची मोठ्या दांड्याची कात्री व अन्य बरेच काय-काय सामान असे. आणि ते डबे, झाकणे बनवताना बघायला खूप मजा वाटायची. मग वाड्यातल्या सगळ्या लहान मुलांचा तेवढा वेळ तिथेच त्याच्या भोवती मुक्काम असायचा. अगदी थोड्या वेळात सफाईदारपणे डबे, डब्यांची झाकणे अंगणात बसून तयार व्हायची. त्याच्या जवळ पत्रा पण असायचा, जरुरी प्रमाणे त्याचाही वापर करायचा व हे सारे थोडक्या पैश्यातच व्हायचे.

‘छत्री दुरुस्ती’, छत्रीच्या काड्या बदलणे, छत्रीचे कापड नीट करणे इत्यादी दुरुस्त्या करणारे कारागीर यायचे. मोडक्या छत्र्या थोडक्या पैश्यात घरी दुरुस्त करून मिळायच्या. त्याच्या खांद्यावर एक पिशवी व त्यात एक चपटा चौकोनी लोखंडी डबा असायचा त्यात दुरुस्तीला लागणारे खूप सारे सामान असायचे. पिशवीत छत्रीच्या काड्याही असायच्या.

‘नांव घालायची, भांड्यावर नांव.’ अशी एक आरोळी देत धोतर, शर्ट व टोपी घातलेला माणूस यायचा. त्याच्या कानावर नांव घालण्याचे  साधन-पंच ठेवलेले असे व एका कानावर हात ठेवून तो आरोळी द्यायचा. ते ‘नांव’ असं म्हणण्याच्या ऐवजी, ‘नामु घालायची नामू’, असेच काहीसे ऐकू यायचे. 

घरी येऊन त्याच्या जवळच्या लहानशा हातोडी आणि High Carbon Steel पंचने ठोकून, तो भांड्यांवर सुबक नांवे घालून द्यायचा. हल्ली मशीनने नांव घालतात. अगदी डझनाच्या हिशोबाने भांडी असायची. दुपारी  पाठीवर पोते घेऊन तांबे, पितळेची मोड घेणारा माणूससुध्दा दारावर यायचा. पूर्वी पितळी Stove वापरायचे खूप लोक. ते सुध्दा दुरुस्त करणारा माणूस दारावर यायचा. 

तसेच, तांबे पितळेच्या भांड्यांना ‘कल्हई’ करणारी माणसे तर ‘कल्हईची भांडी कल्हई’ अशीही आरोळी असायची. पितळी ताटे, वाट्या, पातेली अशा सगळ्या भांड्यांना कल्हई करत, लगेच त्यांचे रुप एकदम पालटत असे. भांड्यांना कल्हई म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा घरी ! कल्हई करताना बघताना खूप मजा वाटायची. एक वेगळाच वास यायचा – नवसागराच्या धुराचा. नवीन कल्हई केलेल्या भांड्यात जेवताना खुप छान वाटायचे. हे सगळे करत असताना माझी आजी व आई त्यांच्याशी पैसे ठरवताना घासाघीस पण करायच्या.

फार पूर्वी पिंजारी देखील दारोदारी येत. त्यांच्या खांद्यावर भलेमोठे धनुष्य-सदृश्य – तुणतुणे वाटेल – असे अवजार असे. कापसाच्या जुन्या गाद्यांमध्ये वापराने गोळे पुंजके होत. पिंजारी तो जुना कापूस पिंजून झकास reconditioned उशा-गाद्या बनवून देई.

सुया फणी पोत असे म्हणून डोक्यावर भली मोठी दुर्डी घेऊन दारोदारी हिंडून ह्या गोष्टी विकणारी जमात मात्र आजही अस्तित्वात आहे..

तर असे होते हे दारावर येणारे तंत्रज्ञ ! अगदी घरीच थोड्या वेळात, थोड्या पैश्यात अगदी डोळ्यासमोर दुरुस्ती व्हायची. कुठे हेलपाटे नाहीत, धावपळ नाही, की काही नाही. लहानपणी हे घराच्या अंगणात बसून बघताना खूप मजा वाटायची. हळूहळू सगळे बदलले व या कसबी जमाती गायब झाल्या. नामशेष झाल्या.

‘कालाय तस्मै नम:….

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माळ गुंफिताना…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆

माळ गुंफितांना । ऐका कवनाला । गुंफी कोण कशी माला ॥

घाली जगदंबा । त्रिगुणातीताला । त्रिगुणी बिल्वदली माला ॥

प्रकृतीदेवी गुंफी ।  देव विराटासी । नव नव सूर्यमालिकांसी ॥

प्रलयंकर काली । गुंफी महाकाला । ती नरमुंडचंड माला  ॥

उद्भवा घाली । घाली उद्भवाला । सृष्टी भूकंपांची माला ॥

गुंफी सत्यभामा । श्रीहरीला साची । माला पारिजातकांची ॥

माळ मोत्यांची । गुंफी रुचिरा ती । राणी राजाच्यासाठी ॥

फुलांची माला । माला ओवी रती ॥ आलिंगि त्या अनंगा ती ॥

विरहिणी परि ती ।  प्रिय स्मरण काला । ओवी अश्रूंची माला ॥

कवी – वि. दा. सावरकर

रसग्रहण

सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक  उंची व भावनिक  खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं.  त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.

जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात  वास करते असं मानलं जातं.

प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन

सूर्यमाला गुंफित आहे.

कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच  महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने  शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली  अशी कथा आहे.

सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.

सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.

शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर  उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.

विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावली… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सावली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.

पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य  वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.

वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!

माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.

अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे माहेरपण आणि… भाग – २ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ तिचे माहेरपण आणि… भाग – २ ☆ श्री मयुरेश देशपांडे

(राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”) – इथून पुढे. 

राधाक्काविषयी काय सांगणार…  तरूण वयात आई वडिलांशी भांडून शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी आली. वाट शोधता शोधता वाट चुकली. अध्यात्माची कास धरलेल्या माझ्या बाबांनी तिला वाट दाखवली. आमचीच खालची खोली राहायला दिली. माझ्यापेक्षा थोडी मोठीच पण माझ्या पिढीतली म्हणावे इतकी जवळची. आई बाबांच्या पाठीमागे तिचा आधार राहिला. हिला ना सासूचे रितेपण जाणवू दिले ना आईची आठवण. एवढे असूनही अट्टाहासाने तिने तिची चूल वेगळीच ठेवली. आणि त्या चुलीवर पुढचे चार दिवस आम्ही ताव मारणार होतो.

बाबा ही नाही ती वही, हे नाही ते पुस्तक, हा नाही तो शर्ट आणि ही नाही ती पॅन्ट…. . त्याच्यासाठी सगळेच अवघड होते पण कसेबसे जमवले आणि मुलाला घेऊन तो खाली आला. राधाक्काने दिलेला डबा घेऊन मुलगा शाळेच्या बसमध्ये बसला. मी सुटकेचा श्वास सोडू पाहात होतो, इतक्यात राधाक्काचा मागून आवाज आला, “अजून लेकीचे बघायचे बाकी आहे.” माझा हात कपाळाला जायच्या आधीच ती म्हणाली,

“ बस बस, तुझ्यासाठी चहा आणते.”

जरावेळ वर्तमानपत्र वाचून झाले तसे मी माझ्या पद्धतीने पोहे बनवायला घेतले. त्याचा खमंग वास बहुधा नाकात शिरला असावा, लेक जागी झाली. “आई काय बनवतीयेस ” अंथरूणातूनच आवाज आला. “आई नाही बाबा ” …

” हो पण पुढचे चार दिवस आमच्यासाठी आईच.” … 

” हे बघ तू माझीच फिरकी …” … 

” झाले का बाप लेकीचे सुरू?” खालून राधाक्काचा आवाज. 

” काही नाही प्रेमाचे भांडण “, त्याचे प्रत्युत्तर.

“ येऊ का मी वरती?” राधाक्काने वरचा सा लावताच…  ” नाही नाही, मी चाललीये आंघोळीला.” लेक कधी पळाली कळालेच नाही. नाष्टा झाला, आवराआवर झाली. ती तिच्या अभ्यासाला बसली. तो मध्येच तिच्या खोलीत डोकावला.

“बाबा, एव्हाना आईची परीक्षा सुरू झाली असेल ना?”

“माझी तर सकाळीच सुरू झालीये.”

“काय म्हणालास?”

“काही नाही, झाली असेल परीक्षा सुरू. तुझे आजोबा जाणार होते म्हणे परीक्षा केंद्रावर. परीक्षा संपली की करेल फोन नव्या सूचना द्यायला.”

लेक थोडी शहाणी होती, तिचे दप्तर तिनेच भरले. ” मी वेणी घालून देऊ का? “, त्याने विचारले. 

“नाही नाही, आई असती तरी हे काम राधाक्काचेच आहे.”, असे म्हणत ती खाली पळालीसुद्धा. 

“तिला थोडी मदत पण कर हो”, त्याने मागून सूचना दिली, पण ती ऐकायच्या आधीच लेक राधाक्काकडे पोहचली होती.

तिचाही डबा राधाक्का देणार होती. तेव्हा तो बाकीचे आवरण्यात गुंतला. लेक शहाणी असली तरी पसारा करण्यात मात्र अगदी त्याच्यावर गेली होती. त्याने तिची खोली आवरली आणि पंख्याखाली खूर्ची टाकून बसला. “आपल्या मागे घरात काय काय चाललेले असते ते आपल्याला काहीच माहित नसते.”, तो स्वतःशीच हसला.

मुलगी शाळेला गेली आणि पाठोपाठ मुलगा शाळेतून परत आला. म्हणजे आराम करायची उसंत नाहीच. 

“कपडे बदलून, हात पाय धुवून खाली ये रे. तुझे आणि बाबाचे पान एकत्रच वाढते.” मुलगा जिने चढत असतानाच राधाक्काची आज्ञा आली. आज गरमागरम आणि तेही राधाक्काच्या हातचे जेवायला मिळणार म्हणून मी आणि तोही खूश होता.

” त्याला वर गेल्या गेल्या झोपायला लाव रे. चार वाजता शेजारी शिकवणीला पाठवायचे असते.” वर येता येता आठवण वजा आज्ञा आली. त्याने मुलाकडे आणि मुलाने त्याच्याकडे पाहिले. एकूण काय, आई घरी नसली तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार कोणालाच करता येणार नव्हता.

मुलगा शिकवणीला गेला तसा आपणही जरा पडावे असा त्याने विचार केला. जरा डोळा लागतोय न लागतोय तोच मुलगी शाळेतून आली. “आज लवकर?” त्याने विचारले. 

“हो आज शाळेत शिक्षकांचा काही कार्यक्रम होता म्हणून लवकर सोडली.”, तिने तिच्या खोलीत जाता जाता माहिती पुरवली.

 “तू सकाळी आजचे वेळापत्रक बघितले नव्हतेस का?” वर त्यालाच प्रश्न. “अच्छा तेही आम्ही पालकांनीच पाहायचे का?” त्याचे आजच्या दिवसातील आणखी एक स्वगत. 

“बाबा मला जाम भूक लागली आहे, काहीतरी खायला बनव “, लेकीची आज्ञा आली. तो राधाक्काने आवाज द्यायची वाट पाहात होता. पण यावेळी राधाक्का वामकुक्षी घेत असते अशी आणखी एक माहिती मुलीकडून मिळाली.

“बाबा, छानपैकी नूडल्स बनव की.”

“हे बघ नुडल्स आरोग्यासाठी चांगले नसतात आणि म्हणून आईने पण सामानात ते भरले नाहीयेत.”

“कोण म्हणाले तुला? त्या सगळ्यात वरच्या फडताळात तो मोठ्ठा डबा आहे ना, त्यात एकदम खाली पाकीटं असतात. आईने जाण्यापूर्वीच आणून ठेवलेली. फक्त मला सांगून गेली की, भूक लागली आणि बाबा घरी नसला तर तुझ्यासाठी  आणि भावासाठी बनवून घे.”

“हो पण मग मी आहे ना घरी. छान उपमा बनवतो, भाऊपण येईल इतक्यात.”

भावाप्रमाणे तिचाही स्वैराचाराचा प्रयत्न साफ फसला.

संध्याकाळी तिचा फोन आला तोवर मुले खाली खेळायला गेली होती. तिची परिक्षा चांगली गेल्याचे कळाल्याने त्याला आनंद झाला, तर घरी सगळे व्यवस्थित असल्याचे कळल्याने तिला आनंद झाला. रात्री मुलांशी फोन जोडून देतो असे तो म्हटला खरे पण मुले खेळून आल्यावर जेवून कधी झोपी गेली त्यालाच कळलं नाही. आज त्यालाही खूप छान झोप लागली.

दुसरा दिवस असाच गेला. त्याने मोडकातोडका नाष्टा बनवला तर जेवणाचे मात्र राधाक्कावरच सोडले. तिसऱ्या दिवशी मुले चित्रपट पाहायला जायचे व बाहेरच खायचे म्हणून मागे लागली. बाहेर जाणे हा काही फार अवघड विषय नव्हता, तिला कळल्यावर तीही काही म्हटली नसती, पण दोघांना एकट्याने नेणे हे मोठे दिव्यच होते. मुलगा तसा अजून लहान असल्याने त्याचा हात सोडणे शक्य नव्हते आणि मुलीचे आपले हे घेऊ ते घेऊ चालले होते. अधूनमधून त्यांची भांडणे चालू होती ती वेगळीच. आता मात्र त्याला तिची उणीव भासू लागली. तिचा तरी पाय कुठे माहेरी टिकतोय, चौथ्या दिवशी पहाटेच्याच गाडीने परतली. ती येणार असल्याचा मागमूसही त्याला नव्हता. मुलगी दप्तर भरत असताना आवाज आला, ” थांब मी भरते दप्तर. तू तोवर खाली राधाक्काकडे जाऊन वेणी बांधून घे. आणि हो राधाक्काला सांग, आज मी पण आयते जेवायला येतीये.” दोघी मनमुराद हसल्या. मुलगी थोड्यावेळ आईला बिलगली आणि खाली पळाली.

आता आईला बिलगायची पाळी बाबांची होती एवढे कळण्याइतपत ती मोठी झाली होती.

समाप्त  

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा…” ☆ श्री सुनील देशपांडे

आयुष्याचा ७३ वर्षाचा प्रवास संपवून आज ७४ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बरंच आयुष्य जगून झालेलं आहे. बाकी आयुष्य फार थोडं उरलेलं आहे याचे जाणीव आहेच. खरं तर या दिवसाला वाढदिवस का म्हणतात हे समजत नाही. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतं. वाढतो फक्त एक आकडा. जगलेल्या आयुष्याचा.  त्या वाढलेल्या आकडेवारीमुळे  लोकांना या माणसाने काहीतरी केलं असेल असं वाटत असावं.

तसं पाहायला गेलं तर करण्याच्या इच्छा प्रचंड असतात. साऱ्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. अर्थात अपूर्ण इच्छाच जास्त असतात. पण तरीही  आयुष्यात समाधान बाळगावं अशा गोष्टी घडल्यास जाताना तरी चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल.

बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकातील कवितेच्या ओळी आठवतात ….. 

आयुष्याचा माग मिळेना, गुन्हा कळेना जगदीशा ।

कुठे कधी अस्पष्ट हसावी एखादी तरी स्मितरेषा।।

आयुष्यामध्ये चेहऱ्यावर स्मितरेषा उमटण्यासारख्या घटना तशा कमीच असतात.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।

परंतु आयुष्याच्या शेवटाकडे असताना सिंहावलोकन करताना काही समाधानाच्या स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर असणार आहेत.

मुले कर्तृत्ववान आणि आई-वडिलांची काळजी घेणारी असावीत हा सगळ्यात मोठा कौटुंबिक समाधानाचा ठेवा. त्याची एक स्मितरेषा !

आपल्या देशात अवयवदान आणि देहदान या सर्व महादानाचे प्रमाण वाढते आहे ही एक सामाजिक स्मितरेषा !!

साहित्य विश्वात छोटीशी लुडबुड करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेता आले ही मानसिक समाधानाची अजून एक स्मितरेषा!!!

रोटरी मार्फत समाजाच्या उपयोगाचे काही उपक्रम करता आले त्याची एक आंतरराष्ट्रीय सामाजिक स्मितरेषा!!!!

आपल्या देशाचा झेंडा वैज्ञानिकांनी चंद्रावर फडकवला आणि आता मंगळ पदाक्रांत करून शुक्रापासून सूर्यापर्यंत लक्ष्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आहे ही राष्ट्रीय स्मितरेषा !!!!!

पत्नीची साथ शेवटपर्यंत (कुणाच्या ? ते माहित नाही) असेलच ४६ वर्षांचा सहवास ही आणखी एक स्मितरेषा !!!!!!

काही मित्रमंडळी, काही नातेवाईक, समाजकार्यातील सहकारी या सर्वांच्या आठवणीमध्ये माझी एखादी तरी स्मृती नक्की असेल याचे समाधान ही एक स्मितरेषा !!!!!!!

अशा अनेक स्मितरेषा या जगातून एक्झिट घेताना चेहऱ्यावर असतील आणि ही समाधानाची लकेर घेऊन या जगातून एक्झिट मिळेल हा आनंदाचा भाग.

(आयुष्याचे शेवटचे पर्व हे पुण्यात घालवता येणे हे, पुण्याचे (?) असले तरी त्यामध्ये आयुष्यभर गमावलेले पुण्य खर्ची पडेल काय ? ही सुद्धा भीती आहेच.)  

आयुष्याच्या शेवटच्या पर्वात आनंदाचे डोही आनंद तरंग या अवस्थेत असणे हे सगळ्यात मोठे भाग्य माझ्या वाट्याला आले याचे समाधान खूप मोठे आहे.

शेवटी माझ्याच एका जुन्या कवितेच्या  ओळी …… 

‘शेवटचे मिटताना डोळे, चेहऱ्यावरती स्मित  विलसावे !’ 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोंड नसलेला गणपती… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

सोंड नसलेला गणपती !…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.

गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी इथे हे मंदिर आहे. 

आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते. याला “ नरमुख विनायक “ असेही म्हटले जाते. 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अलिप्त होण्यातलं सुख… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ अलिप्त होण्यातलं सुख…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.

एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.

खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!

आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.

वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.

आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.

आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे. 

आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.

साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.

अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं  मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील. 

रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares