मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी 

नातीने माझ्यापुढे वही धरली आणि मला म्हणाली, ” आजी तु शीला.. मग संवेदनाशीला कोण?” मी म्हणाले संवेदनाशीला अशी व्यक्ती नसते संवेदनाशीलता हा गुण आहे.. खरं तर ती क्षमता आहे म्हणून त्याला संवेदनक्षम असेही म्हणतात. म्हणजे पहा परवा दारात एक मरतूकडे कुत्रे कुडकुडत बसले होते… मग तू त्याला लगेच चादरीचा छोटा तुकडा टाकलास खायला दिलं कारण तू संवेदनाक्षम आहेस असं ज्याच्या मनात येतं ना दुसऱ्याबद्दल तो माणूस संवेदनाक्षम असतो… आता पाचवीतल्या मुलीला यापेक्षा वेगळं काय सांगणार… !

प्रत्येक माणूस संवेदनाक्षम असतोच हा गुणवर्धिष्ण होणं गरजेचं आहे… आपण लहान असताना संवेदनाक्षम असतोच पण जसे जसे मोठे होत जातो.. व्यवहारी बनत जातो.. जगाचा अनुभव घेत जातो तसे तसे ही संवेदना कमी होते. ही ज्याची टिकून राहिली त्याचे बालपण पण टिकते त्याला दुसऱ्याचं दुःखाशी समरस होता येते.

मला आठवतं लहानपणी म्हणजे सुमारे 60 /65 वर्षांपूर्वी आमच्या घरामध्ये झुरळं झाली होती त्यांना मारण्यासाठी कुणीतरी एक औषधाची डबी दिली. काड्यापेटी सारख्या तो बॉक्स होता आणि आत एक गुलाबी रंगाची पुडी होती. ते औषध पिठात मिसळून ठेवले की झुरळ खातात आणि मरतात. ते लहान मुलांपासून वेगळे ठेवावे असे त्या वेळेला आवर्जून सांगत अगदी नवीन औषध निघाले होते !आम्हा सगळ्या घरातल्या छोट्या मुलांना बोलवून.. याला हात लावायचा नाही.. हे निक्षून सांगितले आम्ही म्हणलं हे कशासाठी आहे? तर ते झुरळ मारण्यासाठी आहे विषय संपला!… मी चौथीत होते माझ्या डोक्यात विषय अधिक पक्का झाला झुरळ मारण्यासाठी औषध… खरंतर औषध बरं करण्यासाठी देतात मग हे मारण्यासाठी का वापरतात मग त्या झुरळाना किती वाईट वाटेल आणि समजा एक आई झुरळ आणि एक मूल झुरळ असेल किंवा एक मित्र झुरळ असेल तर त्यांना किती वाईट वाटेल कोणीतरी मेल तर आणि या माझ्या विचारातून मी दोन पानी संवाद लिहिला… दोन झुरळं एकमेकांशी बोलतात आणि माणसाने आपल्यासाठी मरावयाचे औषध तयार केले आहे त्यामुळे आपण आता नक्कीच मरणार ही माणसं किती वाईट आहेत ना…. असा विचार घेऊन मी मोठी फुलस्कॅप दोन पानं लिहिली होती अर्थात ती कुणाला दाखवली नाहीत त्यावेळेला ते लाज वाटत होती आणि खरंच आजपर्यंत मी कोणाशी बोलले पण नाही पण मला वाटतं ती माझ्या संवेदनाक्षम मनाची खूण होती आणि तिथूनच मी लिहायला सुरुवात केली असावी!

माणसं म्हातारपणी संवेदनाक्षम, हळवी होतात असं सर्वत्र म्हटलं जातं असं काही नसतं फक्त त्या त्या काळात आपण इतर भावनांना अधिक महत्त्व देतो. मग कधी कर्तव्याला कधी कठीण होण्याला कधी कठोर निर्णय घेण्याला आणि त्यामुळे ती संवेदनक्षमता थोडी बाजूला पडते याचा अर्थ माणूस संवेदन क्षमता हरवून बसलाय असं नसतं थोड्या अधिक प्रमाणात हे कमी होऊ लागले हे सत्य आहे आपण अगदी जेवण करीत टीव्हीवर दाखवली जाणारी प्रेत यात्रा पहात असतो हे कोणत्या संवेदनक्षमतेचे उदाहरण आहे? आपण थोडे बोथट झालो आहोत एवढे मात्र खरे!…….

प्रत्येक माणसाच्या अंगी संवेदनक्षमता असतेच त्याचे एक छान उदाहरण मी परवा एका कार्यक्रमात ऐकले रुळानुबंध नावाचे श्री कुलकर्णी यांचे पुस्तक आहे त्याबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की ते रेल्वे इंजिन चालवत असत त्यांच्या त्या डब्यात म्हणजे इंजिनाच्या आत एक फुलपाखरू आले आणि ते डबाभर इकडे तिकडे हिंडू लागले ब्रेकच्या याच्यावर बस वरती टपावर बस असे ते इकडून तिकडून धावत होते त्याला पाहण्यात लेखकाला खूप आनंद मिळत होता इथं पावेतो गाडी पंधरा-वीस किलोमीटर पुढे आलेली होती आणि लेखकाच्या मनात विचार आला.. अरे बापरे हे फुलपाखरू आपल्या सवंगड्यांना मित्रांना भावंडाला सोडून आता इतकं पुढं आलंय…. हे आता परत त्यांना कधी भेटेल ना?.. इतक उडून जाणं त्याला शक्य होईल का? त्याला मार्ग सापडेल का?.. कितीतरी प्रश्न… असा विचार हजार माणसांना घेऊन जाणारी रेल्वे चालवणाऱ्या माणसाच्या मनात हे येते, तो संवेदनाक्षम नाही का?.. मला ते ऐकल्यानंतर खूप मजा वाटली किती छोटी घटना किती जबाबदारीचे काम पण ते करत असतानाही हा माणूस किती संवेदनाक्षम होता…!

अनेक संवेदनाक्षम माणसांमुळे फार मोठी सामाजिक कार्य उभी राहिली आहेत… बाबा आमटे यांनी रस्त्यावर वेदनाने जखमाने तळमळत पडलेला महारोगी पाहिला आणि त्यांच्या संवेदनक्षम मनाला त्या यातना कुठेतरी भिडल्या आणि त्यातूनच कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी मोठे कार्य उभे राहिले… माझी मानस कन्या अनु आणि प्रताप मोहिते यांच्या संवेदनाक्षमतेमधून अनाथ मुले आणि बेघर झालेले आजी आजोबा संभाळण्याचे एक मोठे काम सोलापूर जवळ चालू आहे तेथील एकूण संख्या 80 आहे हा मुलगा फक्त रिक्षा चालवतो पण अनेकानी मदतीचा हात पुढे केला. अनु स्वतः 80 माणसांचा स्वयंपाक रोज करते एक मोठं काम उभे राहिले आहे ते त्यांच्या संवेदनक्षमते मधून…. ! दुसऱ्या माणसाचे दुःख आपल्या काळजाला भिडले की खूप मोठं काम उभे राहते! अशी संवेदनाक्षम माणस हवीत त्या कामाने त्यांना सुख नव्हे समाधान मिळाल आहे… कारण ती निस्वार्थी सेवा आहे… मुलांमधील संवेदना क्षमता आपण जपायला हवी त्यांचे टीव्हीवर खेळले जाणारे खेळ भयानक आहेत बंदुका मारामारी रक्त याला उडव हे क्रुरतेकडे कडे नेणारे आहेत त्यांचे अभ्यासातील धडे सुद्धा माहिती वजा आहेत भाषेच्या पुस्तकात भावना समृद्ध होतील असे धडे हवेत जसे की आमच्या लहानपणी पाडवा गोड झाला. बाळ जातो दुर देशी ही कविता आई ही यशवंत ची कविता दोन मेणबत्ती हा धडा देशभक्त बाबू गेनू चा धडा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातही गोपाळ सीता सुरेश अहमद त्यांची आई त्यांनी शेजाऱ्यांना केलेली मदत लिटिल मॅच गर्ल भयानक थंडीत ख्रिसमसच्या काळात काड्यापेट्या विकणारी ही मुलगी त्यात थंडीत गोठून मरते हे सगळे धडे माणसातली संवेदना वाढवणारे होते अशा धड्यांची गरज आहे तर ती संवेदनाक्षमता टिकेल. हाणामारीचे चित्रपट मुलांना आवडतात खलनायक हिरो वाटायला लागले आणि असे खलनायकावरती हिरो म्हणून बेतलेले चित्रपट हि आले हे दुर्दैव आहे माणसाची संवेदनक्षमता टिकवण्याचे कार्य मनोरंजनातून शिक्षणामधून साहित्यातून काव्यातून आपल्या घरातून.. घरातल्या मोठ्या माणसांकडून आणि समाजातून होणे गरजेचे आहे त्याबरोबर माध्यमांनी ही काय दाखवावे याचे भान ठेवून हे गुण वर्धिष्णू होतील असे काही दाखवणे गरजेचे आहे आपल्याला काय वाटतं? आपले मत नक्की नोंदवा

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

आनंदात रहायचे असेल तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसऱ्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका. त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही.. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा. तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पण स्वतःच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.

मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवते.

मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते. काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले. *नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायण ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची. लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.

मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे. अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय. ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्‍याची गरजच पाडणार नाही.

दुसर्‍याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते… हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका. रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो. उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल. आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.

परमेश्वराची आठवण स्मरणात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.

लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

ओंजळ☆ सौ शालिनी जोशी

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।

करमुले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।।

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.

ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.

एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,

भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।

अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।

११/७०८

ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण

निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.

अनंत हस्ते कमलाकराने

देता किती घेशील दो कराने।

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

(कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं किंवा कोकणी माणसांशी एकरुप होण्याच सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील एका सरकारी कर्मचारी महिलेची आपल्या कर्मभुमी कोकणाविषयीची सुंदर पोस्ट.) 

माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही… मी कोकणाशिवाय राहू शकत नाही… कारण, कारणं तर खूप आहेत..

कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत…

इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही… त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो…

इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे…

इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीच्या 20 आंबोळ्या(घावन) टाकून घर जेवू घालते इथली बाई..

फणसाच्या अठळ्या शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..

इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!

आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!

पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती… पण, आरडाओरडा न करता, एकमेकांनी श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली…

एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली…

मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प… मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2. 50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!

त्यांचं म्हणणं एकच,”माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील…”

कोकणात मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे… मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही… आपलीच पोरं म्हणून आईवडील त्यांना डोळसपणे समजून घेतात आणि मुलही स्वातंत्र्य मिळूनही संस्कारांच्या बाहेर कधी जात नाहीत. आईवडिलांना कमीपणा देत नाहीत.

येथली लोक बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत…

कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा… नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील…

जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे..

इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जणांनी गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!

आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!

सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते… त्यात गरिबांचे प्रेम असते..

भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..

मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे… पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही… उलट नारळातल्या गोड मलाईसारखा स्नेहच मिळाला.

माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही…

मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे… सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं इथली लोक आपुलकीने करतात…

इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे.. ओल्या नारळाची स्निग्धता आहे. हापुस सारखा स्वभावात राजबिंडेपणा आहे.

खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..

धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..

हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार…

अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं…

फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..

रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..

करवंद, जांभळे, तुरट गोड… तशीही काही मंडळी 

गणेशोत्सव, शिमग्याची (होळी) गोष्टच न्यारी… माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..

एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं…

अन मग… मी पण इथलीच झाले आहे… माहेराहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..

हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं

या मातीत मिसळून जायची तयारी आहे…

मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन…

माझं घर आहे इथं…

प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन… पण कोकण नाही सोडणार.

(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे. कारण धरतीवर कुठे स्वर्ग असेल तर तो कोकण आहे.)

लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख

रत्नागिरी

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी

😄 ०१-५० चढती कमान !

बालपण – शिक्षण – नोकरी – कारकून – प्रमोशन – साहेब – हाताखाली चार हुजऱ्ये –

बायको खुश – मुलं खुश –

इकडे तिकडे चोहिकडे –

आनंदी आनंद गडे…

🌸

🙂५०-६० समाधान !

वरची श्रेणी – पगार – निवृत्ती – निरोप समारंभ – पेन्शन – ग्रॅच्युइटी – मुलगा, मुलगी – दोघंही IT त – चांगली नोकरी – जावई भला – सगळे पाच, सहा आकडी पगार वाले – दोन नातवंडं – साठीशांतीला कधी नाही ते बायकोचे पण कौतुकाचे चार शब्द – स्वतःचा दुमजली बंगला -”समाधान निवास !”

🌸

😊 ६०-७० बोनस !

“साठी झाल्येय् असं वाटतंच नाही तुमच्याकडे बघून !” लोकांचं मत – माझी कॉलर ताठ – मलाही तसंच वाटतं – देवाच्या दयेने तब्बेत छान – काही म्हणता काहीही तक्रार नाही – आता कधी तरी सर्दी, पडसं, खोकला हे पाहुणे अधूनमधून यायचेच – काही वेळा खोकला मात्र हटता हटत नाही – आता सत्तरीही जवळ आल्येय्. मध्येच कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटतं! पण तरीही जगायचा कंटाळा आलेला नाही. देवानं मोठ्या उदारपणानं ही बोनस वर्षं दिल्येत, ती नाकारायची कशी ??

🌸

😔 ७०-८० नाईलाज !

सत्तरी झाली तेव्हाच वाटलं होतं, आता बस् झालं की! आता खरं म्हणजे पोथी गुंडाळून फळीवर किंवा कोनाड्यांत ठेवली जावी, हीच इच्छा. आज्ञा झाली की प्रस्थान कधीही हलवण्याची तयारी आहे. तरी पण आपल्या हातांत काय असतं? मुला-नातवंडांनी मोठ्या उत्साहाने पंच्याहत्तरी साजरी केली. पण, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून, मी केवळ नाईलाजाने सगळ्यांत भाग घेतला.

दाढी, अंघोळ, यांसारख्या रोजच्या कामांचा सुद्धा आताशा कंटाळा येऊ लागलाय्.

आता कोणतीही गोष्ट केवळ नाईलाज म्हणून करायची !

नाईलाज – नाईलाज – फक्त नाईलाज —

🌸

😖 ८०-९० आत्मनिर्भत्सना !

कशासाठी जगतोय तेच कळत नाही. आता कशातच राम वाटतं नाही. ओझं तरी किती दिवस टाकायचं दुसऱ्यांवर? एकदा आणि एकदाचं संपव रे बाबा !

🌸

😵‍💫 ९०-१०० शापित भूत !

घरातील बाकीचे :

गेले अडीच तीन महिने असेच निपचित पडलेलेच असतात. जवळजवळ वीस-बाविस दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर डॉक्टरच म्हणाले की आता घरीच घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरी इलाज संपले. आता कळत पण काहीच नाही. काय करायचं आपण तरी? वाट बघणे एवढेच आपल्या हातात !!!

🌸

याला जीवन ऐसे नांव !!

🍁 🍁

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

खरंच आम्ही वांझ आहोत…

(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.) 

“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”

“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.

“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.

“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले

”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.

…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.

रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.

आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.

परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.

काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…

… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”

सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.

शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.

सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…

“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”

जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.

मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.

मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.

… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.

– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.

– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.

मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.

पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.

… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…

म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.

योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….

इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।

माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…☆ श्री जगदीश काबरे ☆

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.

राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की, अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी मग तीच मुक्ररर झाली. तोच आज आपण साजरा करत असतो, तो हा राष्ट्रीय विज्ञान दिन.

विज्ञान म्हणजे काय? 

एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धुमाकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोनसारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ… आणि मनात कुठले शब्द येतात? न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान याच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर—

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.

२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशाप्रकारे विज्ञान हे निरंतर सत्याचा शोध घेत असते.

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत, त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वत:लाही समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.

वैज्ञानिक पद्धत कशी असते?

काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू म्हणजे गृहीतक ठरविणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता… प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पहात पुन्हा नव्याने सुरुवात करणे. आपले गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांनी चुकीचे ठरले नाही तरच ते गृहीतक स्वीकारणे आणि वैज्ञानिक सिद्धांत तयार करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होते पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात.

विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते… असायला हवी. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत.

खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळेच आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले आहे. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव आपण ऐकले असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आहे की, हे विश्व भौतिक आणि रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनाही भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहेत आणि असणार आहेत. म्हणूनच या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक-रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहत असतात आणि म्हणूनच विज्ञानसुद्धा निरंतर असते.

थोडक्यात काय तर, विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पध्दत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, गटाचा, पंथाचा, म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य, तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य हे असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालीक असून जगभर सर्वांना सारखीच लागू पडतात. तसेच ती सर्वमान्य असतात. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. म्हणून आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?

कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल. किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण”निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी कशी प्रगल्भ होते हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया…

वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.

विज्ञानाचे मर्म काय —

– – तेव्हा विज्ञानाचे मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवा…

 *

विज्ञान म्हणजे जग जाणण्याची कृती,

तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती.

 *

विज्ञान असते निसर्ग निर्मित

तंत्रज्ञान असते मानव निर्मित.

 *

विज्ञानाचा शेवट होतो तत्वज्ञानात 

तंत्रज्ञानाचा शेवट होतो मनवी मनात.

 *

म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वरदान 

तंत्रज्ञान मात्र शाप आणि वरदानही.

 *

विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट 

तंत्रज्ञान कधीकधी धरते अधोगतीची वाट.

 *

विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र 

तंत्रज्ञान मात्र कधीकधी होते अस्त्र.

 *

विज्ञानाने उजळतात निसर्गाच्या दशदिशा 

मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाची दिशा.

 *

विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती 

तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्या हाती.

 *

विज्ञानाचा विघातक उपयोग मानवच करिती,

तरीही विज्ञानालाच शिक्षित मंडळी दोष देती…

 *

म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा,

मानवाच्याच उद्धारा निवडावी विज्ञानाची दिशा.

*

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!

आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)

तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….

“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”

ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.

“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.

“होय? म्हणजे रे.. ?”

“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “

“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “

“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “

“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”

“माझ्या बाबांसारखी

तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “

ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.

“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “

“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”

तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,

“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…

“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “

“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “

“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “

“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “

मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!

पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.

ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”

मी भारावल्या सारखा ऐकत होतो.

“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”

“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.

सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.

“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “

“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.

” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता‌. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “

हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.

“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.

“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “

“म्हणजे?”

“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”

सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

Happy Birthday to – – – – 

आज २४ फेब्रुवारी. मी आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी सगळ्यांच्या खास मित्राला Happy Birthday अशा शुभेच्छा पाठवल्या.

आणि आश्चर्य म्हणजे मित्राकडून लगेच म्हणजे अगदी दुसऱ्या क्षणाला – Thanks a lot. We will always be in touch. Keep smiling all the time. असे उत्तर पण आले.

कोण असेल असा हा आपल्या सगळ्यांचा कॉमन मित्र ? Any guess!

One… two… & three… लक्षात येत नाही ना !

अहो, आपल्या सगळ्यांचा म्हणजे – तरुण स्त्री-पुरुष, लहान मुलं मुली, वयस्कर स्त्री-पुरुष, अगदी तान्ही बाळं, असे सगळे सगळे आणि अशा सगळ्यांना रोज दिवसातून अनेक वेळेला भेटणारा आपला जवळचा मित्र म्हणजे व्हॉट्सअप. त्याचा २४ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो.

Brian Action आणि Jan Koum यांनी २००९ मधे WhatsApp या मित्राला जन्म दिला. आणि २४ फेब्रुवारीला कॅलिफोर्निया मध्ये त्याचे What’s up असे नामकरण करण्यात आले.

व्हॉट्सअप ला मी शुभेच्छा पाठवल्यानंतर उत्तरादाखल व्हॉट्सअप नी सगळ्यांना सांगण्याकरता एक छोटासा संदेश पण मला पाठवला आणि लिहिले, की – तुमचा संपर्क परिवार खूप मोठा आहे, त्या सगळ्यांना माझा हा संदेश अवश्य पाठवा, हा त्यांच्याच फायद्यासाठी आहे.

व्हॉट्सअप चा संदेश असा आहे – 

सुधीर आणि मित्रहो, माझ्या संपर्कात जरूर जरूर रहा. कुणाला काही महत्वाचे निरोप द्यायचे असतील, काही महत्वाची डॉक्युमेंट्स पाठवायची असतील, काही छान फोटो / व्हिडीओ शेअर करायचे असतील, शुभेच्छा द्यायच्या आहेत, मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत, आमने सामने बोलायचे आहे, किंवा कुणाकडून काही छान माहिती तुम्हाला आली असेल तर ज्यांना ती उपयोगी होईल अशांना ती शेअर करा, वगैरे, अशाकरिता मला अवश्य बोलवा. 24 * 7 तुम्ही क्लिक केलं कि यायला मी तयार आहे.

पण एक सच्चा मित्र म्हणून माझी एक विनंती आहे. तुमची तब्येत छान राहावी / घरच्यांशी घरामधे सगळ्यांशी छान संवाद असावेत, वगैरे, या करता काही पथ्य मात्र आपण अवश्य पाळावीत, अशी माझी विनंती आहे.

ती पथ्य अशी आहेत – कुठलीही गाडी चालवत असाल तर तेव्हा मला बोलवू नका. वॉकिंग करत असाल, ऑफिसचे काम करत असाल, अभ्यास करत असाल, टॉयलेट मध्ये असाल, पूजा करत असाल, जेवत असाल, तर अशा वेळेस मला बोलावू नका. गादीवर आडवे असाल तर मला बोलावू नका, तुमच्याकडे तुम्हाला कुणी भेटायाला आले असेल, तर मला बोलावू नका. कुणाकडून काही माहिती / व्हिडीओ / फोटो तुमच्याकडे आले तर ते धडाधड सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करू नका. कुणाला ते पाठवावेत यावर थोडा विचार करा आणि मगच ते आवश्यक त्या ठिकाणी फॉरवर्ड करा. आणि महत्वाचे म्हणजे मला बोलावण्याचा अतिरेक तर नक्कीच टाळा.

जेंव्हा असा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही शरीराची काहीही हालचाल न करता एका ठिकाणी तासंतास बसून असता किंवा बेडवर आडवे असता. यामुळे आजार वाढतात, डोळ्यांवर ताण पडतो, आणि रेडिएशन चा त्रास तर वेगळा होतोच.

माझी फेसबुक, गुगल, युट्युब, इंस्टाग्राम या माझ्या मित्रांशी नेहेमीच भेट होत असते. मी वर जे माझे मनोगत मांडले आहेत, तेच त्यांचे पण विचार आहेत. यावर जरूर जरूर विचार करा.

तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळे आपला चक्क एकमेकांशी असा छान आणि वेगळा संपर्क झाला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. माझी “मन की बात” पण मला तुमच्याबरोबर शेअर करता आली. आणि तो एक वेगळाच आनंद पण मला मिळाला.

तुमच्या मित्र मैत्रिणींना / नातेवाईक मंडळींना माझे मनोगत जरूर सांगा. त्यांना नक्कीच त्याप्रमाणे बदलायला आवडेल, अशी आशा करतो. शेवटी – “पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना” हे तर आहेच !

चलो, बाय बाय सुधीर.

तुमचा मित्र – व्हॉट्सअप

मंडळी व्हॉट्सअप नी पाठवलेला संदेश आपल्याच फायद्याचा आहे. आपण सगळे जण यावर जरूर विचार करू आणि अंमलात आणूच आणू. आपल्या सगळ्या ग्रूप्स वर पण जरूर फॉरवर्ड करा.

लेखक : श्री सुधीर करंदीकर

मोबा 9225631100, ईमेल <srkarandikar@gmail. com>

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे

आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत) 

तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.

तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?

छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.

तिचे ओठ नाजूक होते?

ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का? 

जिवणी नाजूक? नाहीच.

डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.

सिंहकटी ? न न् नाही.

मग होतं काय तिच्यात?

आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.

सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं

तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!

ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!

डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!

त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल! 

त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!

त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता! 

त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य! 

ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!

सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव! 

संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!

आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!

परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम! 

एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!

हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता! 

 निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.

मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच 

मधुबाला!!

तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की! 

तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला! 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल? 

पण त्याने उत्तर दिले,

I can’t imagine!

दुसऱ्या एका ॲपला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला 

आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ? 

त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.

आज मधुबाला जिवंत असती तर ती 93 वर्षाची असती!

त्या चिरतरुण स्मृतीला वंदन! 

तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!

अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!

म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते 

मधुबाला ती मधुबाला!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares