☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव.
– – गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते.
त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे..
महाराष्ट्रात होता एक भाग… “मुंबई” त्याचं नाव…
मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते.
“अतिथी देवो भव… !” या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.
हळूहळू परिस्थिती बदलू लागली.
“अतिथी” जास्त आणि “यजमान” कमी झाले.
मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.
सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. – – मराठी आपली वाटत नव्हती.
प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.
त्यांना एक युक्ती सुचली… दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.
त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील.
सर्वांचाच, अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल,
म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.
आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली.
…. मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना.. मराठी कोणीच बोलेना.. बोलीभाषा ही बदलली.
सगळ्याचा नुसता काला झाला… शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.
अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर.. माफ करा हं… आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं…..
…. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.
त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.
इतक्यात त्या मुलानं विचारलं,
“Which language is this? “
‘मम्मी’ खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.
पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,
“अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस “मराठी भाषा” प्रचलित होती;
आता कोणी नाही ती बोलत. ”
पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण – –
हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं… कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!
महाराष्ट्राची शान “मराठी” भाषा!
मला एकाने विचारले “ तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतोस? “
आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं – –
– – “ आमच्या घरात “तुळस”आहे, ‘Money plant’नाही.
आमच्या स्त्रिया “मंदिरात” जातात, ‘PUB’ मध्ये नाही.
आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.
आम्ही “मराठी” आहोत, आणि मराठीच राहणार !
तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,
याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही. ”
अरे गर्व बाळगा तुम्ही – – मराठी असल्याचा.
“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेते
‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.
“भाऊ” ‘Bro’ झाला… !!
आणि “बहीण ” ‘Sis’… !!!
दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’ झाली.
घरची “भाकर” आता कशी आवडणार हो.. ५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली.
मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय…. आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा…
*आजपासूनच शक्यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया. *
आज २७ फेब्रुवारी.. आज मराठी भाषा दिवस आहे.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.
जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.
माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !
जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे
मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.
कुणाला ती घायाळ करते,
तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.
तिच्यातून अमृत झरते,
तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.
जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.
अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
‘जगणे व्हावे गाणे’! जगणे आणि गाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. गाण्याशिवाय जगण्याला अर्थ नाही आणि जगण्याशिवाय गाण्याला! जगताना जो ताल, सूर आपण अनुभवतो तोच गाण्याची संबंधित केला की त्याला योग्य असे गाणे आपल्या ओठावर येते. आपल्या मूड प्रमाणे आपण गाणे गुणगुणतो, आवाज चांगला असेल तर गातो, किंवा नसेल तर फक्त ऐकतो! आपल्या मनात त्या गाण्याच्या सूरांचे प्रतिसाद उमटत असतात. आपण आनंदी मूडमध्ये असलो तर आपोआपच लतादीदींची ” ‘आनंदी आनंद गडे’ किंवा’ माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे.. ‘ अशा प्रकारची गाणी आठवतात.
पण तेच एखादी दुःखद घटना घडली की मनात “जन पळभर म्हणतील हाय हाय.. ” यासारखे अर्थपूर्ण गाणे आठवते किंवा मुकेशची दुःखी हिंदी गाणी आठवतात! गाणं आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाशी निगडित असते. ज्याला गाणं आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच! कोणी मराठी, कोणी हिंदी गाणी ऐकत असेल तर कोणी भक्ती गीते, भावगीतांचा प्रेमी असेल तर कोणाला उडत्या चालीची गाणी आवडत असतील! एखादा लताचा फॅन असेल तर दुसरा आशा भोसले किंवा सुमन कल्याणपुरचा! याशिवाय अनेक गायक गायिकांचे फॅन ही असतातच!
काहींना जुनी गाणी आवडतात तर काहींना नवी गाणी आवडतात. काहींच्या मते गाण्यात जुने-नवे असे नसतेच. गाण्याचा सूर महत्वाचा!चाल चांगली पाहिजे!
आपल्या गायनाच्या आवडी विविध प्रकारच्या असतात. एखाद्याला एखाद्या गायक-गायिकेचे इतके प्रेम असते की, तिचे/त्याचे नाव त्याच्या घरावर, गाडीवर कुठेही लिहिलेले आढळेल! असा एक आमचा परिचित आहे सुद्धा की, तो फक्त ” आशा ” प्रेमी आहे! तिच्या गाण्यातच त्याचे ‘जगणे’ चालू असते. विरह गीते ऐकणाऱ्यांचा वर्ग वेगळाच असतो! बरेचदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असा विषय हे असू शकतो. एखाद्याला हलकीफुलकी गाणी आवडतात तर एखाद्याला फक्त जुनी गाणी आवडतात. पूर्वीच्या काळी रेडिओ हेच हिंदी, मराठी गाणी ऐकणाऱ्यांसाठी साधन होते. त्यापूर्वी ग्रामोफोन वापरला जाई पण असे हे ग्रामोफोन बहुतेक सधन वर्गाकडेच असत!
एक काळ असा होता की घरात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर प्रत्येकाकडे नसे. पण हॉटेलमध्ये असणाऱ्या टेप रेकॉर्डर वर विशिष्ट गाणे लावण्यासाठी काही पैसे देऊन ते गाणे लावायला सांगितले जात असे. बरेचदा इराण्याच्या हॉटेलवर हा व्यवसाय चालत असे.
बालगंधर्वांच्या काळामध्ये त्यांची गाणी ऐकत जगणारा एक मोठा वर्ग होता! दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीत ऐकणे हेही गाण्याच्या चाहत्यांचे स्पेशल दालन असे. संगीत नाटके बघणे आणि त्यातील पदे ग्रामोफोनवर ऐकणे ही एक सुसंस्कृत समाजात असलेली एक आवड होती..
आणि ही गोष्ट अर्थातच मोठेपणा ची समजली जाई..
पुढे रेडिओ आला आणि विविध प्रकारची गाणी वेगवेगळ्या वेळी रेडिओवर ऐकायला मिळू लागली. सकाळी भक्ती गीते, नंतर मराठी चित्रपट गीते यावर लोकांचे टाईम टेबल बनू लागले.
हिंदी गाण्यांमध्ये बिनाका गीतमाला, सांज गीते या सारखे कार्यक्रम फेमस झाले!
एक तारखेला ‘खुश आहे जमाना आज पहिली तारीख है ‘या गाण्याने सकाळच्या जुन्या हिंदी गाण्यांची सुरुवात झाली की मन खुश होत असे! टेप रेकॉर्डर आला आणि गाण्याच्या शौकिनांना एक नवीन विश्व सापडले! एकच गाणे अनेक वेळा आवडीप्रमाणे ऐकायला मिळू लागले. यासंबंधी माझी एक आठवण माझ्या मिस्टरांच्या गाण्याच्या आवडीशी निगडित आहे. त्यांना “उगवला चंद्र पुनवेचा” हे बकुळ पंडित यांनी गायलेले गाणे इतके आवडत असे की, पौर्णिमा जाऊन अमावस्या उगवली तरी त्यांच्या टेपवर हे गाणे वाजतच असे!
जगण्याशी गाण्यांचा इतका निकटचा संबंध असतो की त्या आपल्या आवडीवर प्रत्त्येकाचे जगणे चालू असते!
बालपणी ऐकलेली “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” किंवा “सांग सांग भोलानाथ ” यासारखी गाणी अजूनही लहान मुलांना आवडतात आणि ती आयुष्यभर लक्षात राहतात. तरुणपणात चंद्राची गाणी किंवा प्रेमाची गाणी ऐकणे तरुणांना आवडते तर प्रौढ लोकांना सुधीर फडके यांची गाणी मोहात पाडतात. असा हा ऐकिव गाण्यांचा काळ संपला आणि टीव्ही आला. तेव्हा जगणे आणि गाणे अधिकच जवळचे झाले. टीव्हीच्या वेळेनुसार आपल्या आवडत्या गायक गायिकांना टीव्हीवर बघत आपण गाण्याचा आस्वाद घेऊ लागलो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टिव्ही आला आणि गाण्यांची दुनिया अधिकच रंगीबेरंगी झाली. ‘ “बागो मे बहार है” म्हणत फिरणारी राजेश खन्ना आणि शर्मिला जोडी बघताना नजरेला जीवन अधिकच रंगीबेरंगी वाटू लागले. ‘जगणे व्हावे गाणे’ अशी रंगीत स्वप्नं डोळ्यासमोर येऊ लागली.
अशावेळी अमोल पालेकर चा “रजनी गंधा” आठवतो. मध्यमवर्गीय तरुण गाण्यातच आपल्या प्रेयसीला कसा शोधत असतो त्याचे मनमोहक चित्रण ‘रजनीगंधा ‘या सिनेमात आहे. जगण्याशी गाण्याचे नाते अतूट आहे आणि ते प्राचीन काळापासून आहे. गाण्याच्या मैफिलीतून गाणारे जुने गायक जीव ओतून गाणे गात की जे मनाला जाऊन भिडत असे.
या संबंधीची तानसेन यांची गोष्ट आपल्या ला माहिती आहे. त्यांच्या गाण्याने पशू, पक्षी जवळ येऊन गाणे ऐकत तर विशिष्ट राग -मल्हार गायल्या वर पाऊस ही पडत असे!
ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, टीव्ही, मोबाईल अशी विविध साधने दुनियेत आली आणि जीवन गाणे अगदी घरात येऊन थांबले! गाणं नसेल तर जीवन नाही अशीच परिस्थिती आली!
आता तर कानामध्ये बड्स(buds) घालून मुले गाणी ऐकत गाड्या चालवतात, काम करतात आणि अभ्यासही करतात.. माझ्या नातीला ती जर गाणं ऐकत अभ्यास करत असेल तर मी जरा रागावते, “अगं, गाणं ऐकत तुझं अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित होणार?” तर ती म्हणते, “आजी, गाणं ऐकतच माझा अभ्यास चांगला होतो आणि गणित लवकर सुटतात!” तर अशीही गाण्याची जादू!
गाण्याचा उपयोग नाटकांतून ही चांगला केला गेला. बालगंधर्वा सारख्या गायकांनी गाण्याला नाटकात प्रतिष्ठा मिळवून दिली.
अलीकडे तर गायन हे काही आजारांवर एक थेरपी म्हणून वापरले जाते, तर प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारच्या गाण्यांची सुरावट ऐकली तर त्याचा गर्भावर परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच ‘गर्भसंस्कार’ करण्यासाठी गायन कलेचा उपयोग होतो!
काही लोकांना गाण्याचे हे महत्त्व कळत नाही. ती केवळ “रडगाणी”च गात राहतात. हाही गाण्याचा एक प्रकार! कितीही चांगली परिस्थिती असली तरी सतत तक्रार करायला, रडायला यांना आवडते त्यांच्या जीवनात रडण्याचीच संगत असते! अशी माणसे सोबतीला नको वाटतात.
गाणं जगण्याला अधिक सुसह्य करतो आणि जगणे आनंदमय करते! असा हा जगणं आणि गाणं याचा निकटचा संबंध असतो.. अशावेळी मला लतादीदींचे गाणे आठवते, ” माझे जीवन गाणे…, गाणे.., व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, गाती एकच गाणे, गाणे, माझे जीवन गाणे, गाणे!’ तर असं हे गाणं! गाण्याने जीवन समृद्ध बनते. आणि जगणं हे सुरमयी बनते! जगणं आणि गाणं या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत ज्यात आपल्याला मनापासून आनंद मिळतो!
भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस म्हणजे माघ वद्य चतुर्दशी. या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची भक्ती भावाने पूजा व उपासना करतात. शिवलीलामृत, शिवमहिम्न, रुद्र अशा ग्रंथांचे पारायण करतात. मूर्तीला अभिषेक करतात. बेल व धोत्र्याचे फुल वाहतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी व इतर शिवमंदिरात जत्रा भरतात. या पूजेमागे काही कथा सांगितल्या जातात.
त्यातील एक पौराणिक कथा-
समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. पृथ्वीचा नाश करू पाहणारे ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला. देह काळा पडला. वैद्यानी रात्रभर जागरणाचा उपाय सांगितला. तेव्हा सर्व देवानी रात्रभर जागरण व नृत्य केले. शंकराने तांडव नृत्य केले. म्हणून आजही महाशिवरात्रीच्या रात्री जागर केला जातो. म्हणून ही चतुर्दशीची रात्र महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते.
अशीच आणखी एक पौराणिक कथा-
एक पारधी सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार मिळाली नाही. एक हरीण पाणी पिण्यासाठी आले. पारधी बाण सोडणार इतक्यात ते हरीण म्हणाले,’ मी माझ्या कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेऊन येतो’.पारधी ‘हो’ म्हणाला. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. व झाडाखाली शिवपिंड होती. पारध्याने सहज नकळत किंवा सावज स्पष्ट दिसावे म्हणून बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. ती पाने शिवपिंडी वरती पडली. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आले. त्याच्या बरोबर त्याचे कुटुंबही आले. प्रत्येक जण ‘मला मार, मला मार’ असे पारध्याला विनवू लागला. ते पाहून पारध्याच्या मनात त्यांच्या विषयी दया उत्पन्न झाली .प्राणी असूनही हरणे आपले कर्तव्य विसरत नाहीत. मी ही माझ्या मानवता धर्म, दया धर्म पाळला पाहिजे. त्यांने त्या सर्वांना जीवदान दिले. हे पाहून शिवशंकर सर्वांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्या हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याध म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले.तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशीच शिवाची कृपा सर्वांवर व्हावी म्हणून ही शिवाची उपासना .
शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस असेही म्हणतात. भगवान शिव हे आदि गुरु त्यांच्या पासून योग परंपरा निर्माण झाली. योग विज्ञान उगंम पावले .हजार वर्षे ध्यान केल्यावर ते स्थिर बनले, तो हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून बघतात.
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆
जयोस्तुते
*
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवाs स्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
*
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तू ची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी
*
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्य तू ची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट होशी
*
मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते
*
हे अधम रक्त रंजिते सुजन पुजिते
श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते
*
तुझं साठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरत भूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे
*
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला
होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला
सुधा धवल जानवी स्त्रोत तू का गे त्यजिला
स्वतंत्रते भगवती ss
या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्परोज घे ताजे वेणीला
*
ही सकल संयुता, अमुची माता, भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्याची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्यजिले उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
☆
– स्वा. विनायक दामोदर सावरकर.
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र ☆
स्वा. सावरकरांच्या अनेक उत्कृष्ट कवितांमधूनही ही कविता मला अतिशयच आवडते. मोराचा पिसारा ज्याप्रमाणे सुंदर रंग लेवून मोराचा बाज खुलवितो, त्याचप्रमाणे आशयसौंदर्य, भाषासौंदर्य व काव्यसौंदर्याने मराठी भाषेचा बाज खुलविणारी तसेच छंदबद्ध, वृत्तबद्ध व लयबद्ध असलेली ही कविता मला फारच आवडते.
स्वा. सावरकरांचे विचारधन म्हणजे शुद्ध, निखळ सौंदर्य! त्याला आणखी आशयघनता देऊन आणि विविध अलंकारांनी नटवून त्यांनी ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे. देशप्रेमाची तीव्र भावना व उपजत बुद्धिमत्ता यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.
आपण काव्यार्थाचा आस्वाद घेऊ या. कवितेकरता घेतलेली मध्यवर्ती कल्पना अतिशय सुंदर रितीने त्यांनी आपल्यापुढे मांडली आहे.
आपण आपल्या संस्कृतीत जलदेवता, अग्निदेव, वरुणदेव मानले आहेत. त्यांचा कोप होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो. हीच कल्पना डोळ्यापुढे ठेऊन, स्वतंत्रतेलाच देवी मानून, तिने पारतंत्र्यातून भारतमातेला मुक्त करावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे स्तोत्र लिहिले आहे.
आपण बघतोच की घरात कर्त्या पुरुषाची हुकूमशाही असली, वागण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसले तर सगळ्यांचाच जीव गुदमरतो. परकीय सत्तेच्या अंमलाखाली पूर्ण देशच त्याकाळी गुदमरला होता. त्यातून सुटकेसाठीच्या इच्छेच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.
” हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले”
हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट आहे.
अशाच देशभक्तिच्या उदात्त आशयसौंदर्यानी युक्त अशी ही कविता आहे. शब्दसौंदर्य व इतरही अलंकारांनी नटलेल्या कवितेचे वर्णन करायला खरं म्हणजे माझ्यासारखीचे शब्दच अपुरे पडतील.
जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य खुलायला स्वातंत्र्य अत्यावश्यक असते, हे किती सुंदर कल्पना व शब्दांचा मेळ घालून या कवितेत त्यांनी मांडले आहे बघा…..
स्वातंत्र्यामधे काय सामावलेले नसते?म्हणूनच स्वातंत्र्य-देवीला आळवतांना ते म्हणतात….
“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती!श्रीमती राज्ञी तू त्यांची”
हे स्वातंत्र्यदेवते!आमच्या राष्ट्राचे मूर्तीमंत चैतन्य तूच आहेस. पारतंत्र्यात असल्याने, तुझी अनुपस्थिती असल्याने साहाजिकच ते चैतन्यच आज हरवले आहे. तसेच नीती आणि संपत्ती यांची देखील तू राणी आहेस. कारण नीतिमत्ता काय?किंवा संपत्ती काय ? जो आपल्याला पारतंत्र्यात ठेवतो त्याच्या मर्जीवरच अवलंबून असते.
स्वातंत्र्यदेवते! तू कशी आहेस? तर…
“परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी”
परवशतेचा काळ म्हणजे एक अंधःकारमय पर्व, या पर्वात मिळालेले थोडीशीही स्वातंत्र्याची आशा म्हणजे पर्वणीच!ही आशा म्हणजेच जणू लखलखणारी चांदणीच!जी आपल्याला आकर्षित करू शकते. योग्य प्रतिमान वापरून ‘चमचम’ ‘लखलखशी’ सारख्या शब्दांनी काव्याचे माधुर्य वाढतेच व ते वाचणे म्हणजे आपल्यालाही आनंदाची पर्वणीच!
प्रत्येकच कडव्यात मांडलेल्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना म्हणजे शब्द आणि विचार यांचा अपूर्व संगमच! उपजत बुद्धिमत्ता व सुंदर कल्पना यांचे दुग्ध-शर्करा मिश्रणच!हे काव्यरसाचे मिश्रणच रसपाना साठी आपल्या समोर ठेवले त्यांनी. रसपान करतांना त्यांच्या आर्त शब्दांचे घोटही आपल्या मनाला भिडतात.
पूढे ते लिहितात…
“गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली”
हे कडवे वाचतांना तर एक अपूर्व शब्दचित्रच आपल्यापुढे डोलते. गालावरच्या लालिमायुक्त सौंदर्याचे
फूल केव्हा विलसेल? गालावरच्या सुंदर फुलाची लाली मुक्त विहार करणार्या व्यक्तिच्या गालावरच विलसू शकेल. गालावरचे फूल किंवा फुलांचेच गाल ही एकमेकांवरच्या प्रत्यारोपाची भ्रांतिमान कल्पना एक अपूर्व शब्दमाधुर्य निर्माण करते. ते फक्त रसिकांनाच जाणवू शकते, व्यक्त करणे कठीणच!
पुढे देवीला किती अर्थपूर्ण विशेषणे लावतात बघा….
“तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूची”
हे स्वातंत्र्यदेवते! सूर्याचे तेज तथा सागराचे गांभीर्यही तूच आहेस. अतिशय तेजस्वी असूनही ग्रहण लागल्यावर तो तेजोहिनच होतो. ग्रहण सुटल्यावरच त्याला परत पूर्वीचे तेज प्राप्त होते. सागराच्या गंभीरतेचा अर्थ तरी काय आहे?उथळ किनार्यावर, आपल्या मनातली खळबळ, लाटांच्या स्वरुपात धडकवण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आतल्या खोल समुद्राला गंभीरतेचे सौंदर्य प्राप्त होते नं!विचारस्वातंत्र्य नसतांना मांडलेल्या तत्त्वज्ञानाला काय अर्थ आहे?ते ही परतंत्रच असते. आणिबाणीत स्वराज्यात देखील आपण ते अनुभले आहेच.
त्यांची स्वातंत्र्याबद्दलची ओढच इतकी जबरदस्त होती की त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना सहजस्फूर्तच वाटतात. भारतीय तत्त्वज्ञानातील कल्पनांचा आधार घेऊन पुढे ते म्हणतात….
“मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती”
मोक्ष आणि मुक्ति तरी काय?तुझीच म्हणजेच स्वातंत्र्याचीच रूपे! इतकेच नाही तर या जगात जे काही उत्तम! उदात्त! आणि नितांत सुंदर आहे त्याला ‘तुझा’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा’ परीसस्पर्श असतोच! कारण राजकीय दडपशाही असेल तर कुठलाही योग्य विचार, तत्त्वज्ञान मांडण्याचे स्वातंत्र्यच कुठे असते?पृथ्वी गोल आहे आहे हे सिद्ध करू शकत असला तरी शास्त्रज्ञाला ते मांडायचा अधिकार राजसत्तेच्याच मर्जीवर!
म्हणूनच दुर्गामाता, कालीमातेप्रमाणेच अधम अधम लोकांच्या रक्ताने रंगलेल्या व चांगल्या लोकांचे पूजन करणार्या देवतेला ते सांगतात….
“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण चराचर शरण”
स्वातंत्र्यासाठी जगण्याची इच्छा असणारी पूर्ण चराचर सृष्टी तुलाच शरण जाते, तुला मिळवण्याचीच धडपड करत असते. म्हणूनच आम्हा सगळ्या भारतवासीयांतर्फे मी तुला प्रार्थना करतो की आम्हाला अलिंगन द्यायला तू लवकर ये”.
” सकल चराचर शरण चराचर शरण”
अनुप्रासयुक्त ओळी मधून नादमाधुर्याबरोबरच आशयही द्विगुणीत होतो. अलंकाराचे सौंदर्य जपतांना अर्थाची ओढाताण कुठेही होत नाही या काव्यात!आशयासोबत अलंकार रत्नजडीत दागिण्यांप्रमाणे मिरवतात या कवितेत.
यानंतरच्या कडव्यात तर त्यांचा सूर अतिशयच हळवा व लाडिक झाला आहे. ते म्हणतात….
“हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का वीट तुला आला”
प्रत्यक्ष भगवान शंकरालाही कैलास पर्वतावर रहाण्याचा मोह झाला आणि तुला मात्र येथे क्रीडा करायला देखील यावेसे वाटत नाही?
यानंतरची कल्पना बघा किती सुंदर आहे! ते म्हणतात, जान्हवीचा सुधाधवल स्त्रोत अप्सरांना देखील सरसे करण्याला आवडतो. भारतभूमीला ‘सुवर्णभूमी’ म्हटल्या जाते. या सुवर्णभूमीत रहायला काय कमी पडले तुला?हवं तर कोहिनूरचे ताजे पुष्प वेणीत माळायला घे पण इथे वास्तव्याला लवकर ये. पूर्वीप्रमाणेच आमच्यावर प्रेम कर. माझ्या सकलगुणसंपन्न मातेसाठी, तुला प्राप्त करण्यास यश मिळावे म्हणून मी माझ्या शब्दांची आरती करतोय तुझी!
खरंच! या शब्दप्रभूने किती आंतरिक तळमळीने व सुंदर शब्दात आळवणी केली आहे या स्तोत्राद्वारे!
मम्मटाने काव्यप्रकाशात काव्याच्या रसास्वादासाठी अनेक निकष व अलंकारांचे वर्णन केले आहे. स्वा. सावरकरांनी देखील अर्थालंकार व शब्दालंकारांची पखरण करीत, उत्तमोत्तम कल्पना व प्रतीमांच्या आधारे काव्याची एक मनोहर यात्रा या कवितेद्वारे आपल्याला घडवली हे आपण बघितलेच. काव्यात गेयता असेल तरच एखादे सुंदर काव्य संदेशासकट लोकांपुढे सादर होते. मधुकर गोळवलकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लतादिदींनी आपल्या मधुर आवाजात गाऊन अजरामर केले आहे. अर्थातच स्वा. सावरकरांची किर्ती म्हणजे ‘स्वयमेव मृगेंद्रता!
मम्मटानी काव्यप्रकाश मधे म्हटले आहे..
“काव्यं यशसेsर्थकृते, व्यवहारविदे, शिवेतरक्षतये,
सद्यःपरनिवृत्तये, कांतासंमिततयोपदेशयुजे”
काव्य यश, पैसा, कल्याणकारी, वाचल्याबरोबर आनंद देणारे, पत्नी व मित्राप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे असावे.
देशासाठी घरादाराची होळी झालेल्या या देशभक्ताला अर्थप्राप्तीची अभिलाषा कधीच नव्हती.
पारतंत्र्यरूपी अमंगलाचा नाश व्हावा व देशाचे कल्याण व्हावे हेच यातून सूचित होते. सद्यः परिस्थितीत लोकांपुढे कार्याचे उद्दिष्ट काय असावे याचा परिपाठच या स्तोत्राने घालून दिला आहे.
त्यांच्या काव्याचे गाण्यामधून जे सुंदर रुपडे रसिकांपुढे येते ते हे गीत रसिक आपसुकच गुणगुणतात व नंतर त्यांच्याही मनात सावकरांइतकी नसली तरी अंशतः का होईना, देशभक्तिची भावना जागृत होते. त्यातूनच देशाने वेळोवेळी पुकारलेल्या आव्हानांना आपण एकत्र येऊन प्रतिसाद देतो. कानीकपाळी अोरडून सांगितलेल्या भाषणापेक्षा सुंदर काव्यातून निर्माण होणारी जागृती नक्कीच दीर्घकाळ परिणामकारक ठरते.
कुठलाही भाव मनात नसतांना ‘जयोस्तुते’ हे भावपूर्ण गीत कानावर पडते त्यावेळी गाण्यातील एकेक शब्द रसिकांच्याही मनात घर करून रहातो. त्यावेळी उरलेले असते ते गाण्याचे शुद्ध, सात्त्विक स्वरुप! आणि ते आपल्याला आनंदाची वारंवार प्रचिती आणून देत असते.
या काव्यात संस्कृतप्रचुर शब्द असूनही काव्याची मधुरता कुठेही कमी होत नाही. तसेच मला तरी असे वाटते की पहिल्यांदा वाचतांना काव्य थोडे कठीण वाटले तरी पुन्हा वाचतांना काव्य दुर्बोध वाटत नाही. मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेतल्यानंतर अनेक शब्दांचा अर्थ आपल्यापुढे आपोआप उलगडत येतो. कुठलेही कठीण शब्द उगाच मधे आल्यासारखे बोचत नाहीत. उलट हवा तो आशय व्यक्त करणारे व काव्याची गोडी वाढवणारेच वाटतात. ऐकणार्या प्रत्येकाला, तो कुठल्याही प्रकारच्या पारतंत्र्यात असला तरी हे गीत स्वातंत्र्याची ओढ लावल्याशिवाय रहाणार नाही. हेच या काव्याचे मोठे यश आहे असे मला वाटते.
हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘
या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.
आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.
नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘
ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.
चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?
चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला.
दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली, तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.
आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.
तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.
आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन.
ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘
सांगलीतले तरुण भारत स्टेडीयम. श्रोत्यांची तुडुंब गर्दी. आज एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच मंगेशकर गाणार होते! लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर.
मंचावर जणू आकाशगंगाच अवतरली होती… त्यात लतादीदी धृवपदी विराजमान. साधी माणसं या चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं… जगदीश खेबुडकर या भारी माणसाने आणि संगीत दिले होते.. आनंदघन अर्थात खुद्द लता मंगेशकर यांनी.
म्युझिक अरेंजरने इशारा केला… वन. टू… थ्री…. स्टार्ट ! गाण्याचा प्रारंभच मुळी होता एक हलक्याशा तालवाद्याच्या ठेक्याने…. त्या तालवादकाने धडधडत्या काळजाने आणि थरथरत्या हाताने आपले ते नाजूक वाद्य स्वामी समर्थांचे स्मरण करून छेडले…. अचूक… अगदी अचूक ! आज त्याने चूक करून चालणारच नव्हतं…. दिदींनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण श्रोतृवृंद अक्षरश: मोहरून गेला! गाणं ज्या तालवाद्याने सुरु झाले होते.. त्याच वाद्याच्या तालात अगदी नाजूक पावलांनी चालून थबकले…. अर्थात टाळ्यांचा कडकडाट झालाच! दीदीने मग राजाच्या रंग म्हाली सुरु केले आणि मग या राजाची भीड चेपली गेली!… हा वादक होता…. राजू! अर्थात सोमनाथ रघुनाथ साळुंके. पुण्यातून सांगलीत या कार्यक्रमासाठी राजू जावळकर, रमाकांत परांजपे हे वादकही गेले होते आणि त्यांनी या वादकाला सोबत नेले होते…. मंगेशकरांचा वाद्यवृंद या राजूसाठी अगदी नवखा होता!
सोमनाथ यांचा जन्म एरंडवण्यातल्या गणेशनगर वस्तीत तेरा जानेवारी चौसष्ट रोजीचा! वडील त्यांच्या तारुण्यात गोवा मुक्ती लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक. पुढे पोटासाठी त्यांनी दैनिक केसरीमध्ये कंपोझर म्हणून नोकरी केली. परंतु आधुनिक छपाई यंत्रे आली आणि हे खिळे जुळवणारे कालबाह्य झाले. मग रघुनाथराव ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. खाणारी तोंडे आणि येणारे रुपये… मेळ बसणे शक्य नव्हते. सोमनाथ यांचे मोठे बंधू सुद्धा याच व्यवसायात आले कारण पर्याय नव्हता. धाकट्या सोमनाथला शिकावेसे वाटत होते.
मनपा ५५ नंबर १ली ते ४थी. पाचवी ते सातवी ३० नंबर. आठवी नववी नारायण पेठेतील वेलणकर हायस्कूलमध्ये. आणि हॉटेलचा कचरा टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, water प्रूफिंगची कामे करून देणे, सायकलवर फिरून वर्तमानपत्रे घरोघरी पोहोचवणे ही आणि अशी कित्येक किरकोळ कामे करून दहावीचा अभ्यास करण्यासाठी आपटे प्रशाला नाईट स्कूलमध्ये जाणे असा क्रम सुरु झाला.
हे जीवनचक्र सुरु असताना सायकलच्या दोन चाकांनी भुरळ घातली. आणि सोमनाथची स्वप्नं वेगाने धाव घेऊ लागली. श्रीगोंदेकर नावाच्या मित्राची एक साधी सायकल मिळाली… तिच्यात modification करून तिची रेसिंग सायकल बनवली Roadster! आणि मग स्थानिक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला आरंभ केला….. जिंकण्याची चटक लागली ती इथूनच.
त्या काळी पुण्या-मुंबईमध्ये सायकल रेसचे वेड होते. खंडाळा घाट वेगात पार करणा-याला घाटांचा राजा किताब मिळायचा. आधुनिक सायकलवाले हा घाट चोवीस मिनिटांत चढायचे आणि आपला हा राजा जुनी सायकल दामटत त्यांच्या मागोमाग पोहोचायचा… केवळ चार मिनिटांचा फरक असायचा! नंतर पै-पै जमवून सोमनाथ यांनी ४६००० हजार रुपयांची रेसर सायकल विकत घेतली.
या खेळात पैसा मात्र फारसा नव्हता! कित्येक स्थानिक स्पर्धांमध्ये सोमनाथ यांनी कप्स, ढाली मिळवल्या. इतक्या की घरात ठेवायला जागा पुरेना. लाकडी ढाली तर सोमनाथ यांच्या मातोश्रींनी चक्क बंबात घालायला वापरल्या!
सायकल रेसिंग मध्ये सोमनाथ यांनी एकदा नव्हे दोनदा राष्ट्रीय मजल मारली. प्रॉमिस कंपनीने १५ जानेवारी ते २० जानेवारी १९८९ या कालावधीत मुंबई ते गोवा अशी ६८० किलोमीटर्स अंतराची पाच दिवसांची सायकल रेस आयोजित केली होती. पूर्ण देशभरातले सायकलपटू सहभागी होते. आपले सोमनाथ त्यांच्या त्या सायकलवर स्वार झाले आणि त्यांनी तिस-या क्रमांकाने गोवा गाठले…. ५७ तास, ५७ मिनिटे आणि ५८ सेकंदात! गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमनाथ यांनी पारितोषिक स्वीकारले…. वडिलांनी गोवा मुक्ती आंदोलनात घेतलेल्या सक्रीय सहभागाला जणू ही आदरांजली म्हणावी!
प्रॉमिस कंपनीच्या स्पर्धेतले हे यश प्रॉमिसिंग सोमनाथ यांना चांगल्या नोकरीचे प्रॉमिस मात्र देऊ शकले नाही. पोलिस खाते, बँक्स, शासकीय सेवा यांना सोमनाथ यांचे कर्तृत्व दिसले नाही. मग सोमनाथ यांनी सायकल एका कोप-यात ठेवून दिली!
पण सोमनाथ यांनी आणखी एक छंद जोपासला होता… वाद्य वादनाचा. जिथे कुठे वाद्य वाजवली जात तिथे सोमनाथ जात…. तिथल्या लोकांची काहीबाही कामे करून देत… आणि ते वाद्य कसे वाजवले जाते… त्याचे निरीक्षण करीत…. अशी सुमारे चाळीस वाद्ये सोमनाथ वाजवायला शिकले! मग लोक त्यांना वाद्ये वाजवायला बोलावू लागले.
मंगेशकरांच्या सांगलीतल्या कार्यक्रमासाठीही त्यांनाही असेच बोलावले गेले होते. पण त्या कार्यक्रमानंतर त्यांना पुढे काही विशेष काम मिळाले नाही.
अभिनव पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन होते. त्यात काही वाद्ये वाजवायला कुणी तरी पाहिजे होते. सोमनाथ यांचे मोठे बंधू या शाळेची वर्दी करीत असत…. म्हणजे रिक्षा काका होते. शिरीष निर्मळ हे त्यावेळी तिथे नुकतेच सेवक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी सोमनाथ यांच्या भावाकडे निरोप दिला आणि सोमनाथ यांचा अभिनव परिवारात वाजत गाजत प्रवेश झाला! इथे काही वर्षे सेवक म्हणून सेवा दिल्यानंतर सोमनाथ यांना आदर्श शिक्षण मंडळीच्या कार्यालयात नेमणूक मिळाली.
याच नोकरीच्या आधारे २७/१२/९४ रोजी सोमनाथ विवाहबद्ध झाले. आता कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमांत ताल वाद्ये वाजवून सोमनाथ संसाराच्या ऐरणीला ठिणगी ठिणगीची फुले वाहत जमेल तसा भाता वरखाली करीत होते.
आणि एकेदिवशी ऐरण प्रसन्न झाली बहुदा. श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टने गणेश क्रीडा कला मंचावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजला होता. पुण्यातील प्रसिद्ध हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर यांनी सोमनाथ यांना या कार्यक्रमात संधी मिळवून दिली. उषाताई मंगेशकर होत्या गाण्यास. पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रेक्षकात उपस्थित होते. त्यांनी सोमनाथ यांची कला ऐकली आणि त्या रात्री बारा वाजता सोमनाथ साळुंके यांना पंडितजीचा फोन आला… सर्व वाद्ये घेऊन उद्याच्या कार्यक्रमास हजर रहावे! उषाताईसोबत तर शनिवार वाड्यासमोर झालेल्या कार्यक्रमात एका गाण्यात साथही देण्याची संधी सोमनाथ यांना मिळाली होती. विशिष्ट ढंगाच्या आवाजामुळे आणि उत्तम पाठांतर असल्याने पल्लेदार वाक्ये सोमनाथ सहजी म्हणू शकत होते.
अशा गावात तमाशा बरा.. इशकाचा झरा…. पिचकारी भरा… उडू दे रंग.. उडू रंग… मखमली पडद्याच्या आत…. पुनवेची रात… चांदनी न्हात… होऊ दे दंग.. चटक चांदणी चतुर कामिनी… काय म्हणू तुला तू हाईस तरी कोण? छबीदार छबी.
पुढे अनुराधा पौडवाल यांच्या सोबत अनिल अरुण यांच्या रजनीगंधा कार्यक्रमात सोमनाथ यांची तालवाद्ये वाजली. डोंबिवली मध्ये आशा ताईनी मोठा कार्यक्रम केला.. त्यात सोमनाथ होते… ताईन्च्या घरी सराव करता करता आशा ताईने केलेला पुलाव चाखण्याची संधीही त्यांना लाभली.
उषाताई, आशाताई, हृदयनाथ, भारती मंगेशकर यांनी या प्रामाणिक सोमनाथला जीव लावला. जीवघेण्या आजारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अगदी व्ही आय पी कक्षात उपचार दिले… तेही अगदी विनामूल्य. कलेची कदर करणारी ही माणसे म्हणूनच मोठी आहेत!
हाती लागेल ते वाद्य वाजवणे आणि मिळेल ते गाणे गाणे हा या जंटलमन राजूचा शिरस्ता. त्यातूनच आम्ही सातपुते चित्रपटात अशोक सराफ यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी साधली… सोनू निगम, वैशाली सामंत यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नाव झळकले… राजेंद्र साळुंके! मित्र त्यांना राजा म्हणत त्यातूनच राजेंद्र नाव रूढ झाले.
अभिनव पूर्व प्राथमिक…. आदर्श शिक्षण मंडळी…. आदर्श मुलींचे हायस्कूल… कै. सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल… आणि शेवटी अभिनव हायस्कूल अशा नोकरीचा प्रवास करताना आपण मोठे कलाकार आहोत, शिपायाचे काम कसे करू असे प्रश्न सोमनाथ उर्फ राजूकाका यांना पडले नाहीत. रात्री कार्यक्रम करून यायला उशीर झाला तरी सकाळी कामावर शाळेत वेळेत हजर राहणे हे राजूच्या अंगवळणी पडले होते. कार्यक्रम या शब्दातील पहिले का आणि शेवटचे म हे अक्षर मिळून काम असा शब्द होतो!
शाळेच्या कार्याक्रमात हक्काचा तालवादक म्हणून सेवा बजावली… संबळ विशेष आवडीचा. त्यांच्या मुलानेही, धनंजयने बी. पी. एड. करून शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु केले आहे. हा मुलगाही राजू काकांना ताल से ताल मिला करीत अनेक मोठ्या कलाकारांना वाद्य साथ करीत आहे….. तो सर्व वाद्ये वाजवतो.
सोमनाथ उर्फ राजू यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. स्वामी समर्थ कलाकार पुरस्कार, गंधर्व पुरस्कार आणि असे अनेक. सलग १२१ गाणी वाजवण्याचा त्यांचा विक्रम लिम्का बुक मध्ये नोंदला गेला आहे. ३१ जानेवारी, २०२५ रोजी राजू काका निवृत्त झाले. आजपर्यंत त्यांनी कित्येक प्रसिद्ध कलाकारांना साथ केली आहे. त्यात उषाताई मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, दयानंद घोटकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रा. नरेंद्र चिपळूणकर, राजू जावळकर, डॉक्टर राजेंद्र दूरकर, विवेक परांजपे, दयानंद घोटकर हे राजू यांचे मित्र, मार्गदर्शक!
अभिनव पूर्व प्राथमिक मराठी—आदर्श शिक्षण मंडळी कार्यालय—आदर्श मुलींचे विद्यालय—कै. सौ. सुशीलाबाई वीरकर विद्यालय आणि शेवटी तीन वर्षे अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, अशी त्यांची सेवा झाली !
कष्टाच्या ऐरणीवर श्रमाचे घाव घालीत सोमनाथ म्हणजे राजू काकांनी अनेकांची आभाळागत माया मिळवली आहे….. त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची चवरी वरखाली होत राहावी…. ही प्रार्थना !
☆ देवघर… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
आपण सगळे सश्रद्ध लोक वर्षातून एकदोनदा किंवा आणखी काही वेळा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतो.
काही आणखी सश्रद्ध माणसं तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवदर्शन घेतात. एखाद्या मठात, देवळात नित्यनेमाने जातात. देवालय हे एक पवित्र स्थान असते, यात शंका नाही. कारण, देवळात रोज त्रिकाळ पूजाअर्चा, अभिषेक, मंत्रोच्चार वगैरे सुरु असतात. तिथे वेगळी शक्तिस्पंदने असतात.
पण माझ्या मते आपल्या निवासस्थानातील देवघर ही जागादेखील तितकीच बलवान आणि उत्कृष्ट असते, हेही कायम लक्षात ठेवा.
तुमच्या देवघरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसेलही, रोजच्या रोज कदाचित षोडशोपचार पूजाही होत नसेल; पण आपल्या खाजगी कौटुंबिक देवघराविषयी आपल्या मनात खास स्थान असते. आपण निदान तिथे रोज हात जोडून प्रार्थना करत असतोच. आपल्या प्रार्थनांची सकारात्मक शक्ती देवघरात एकवटलेली असते. तुमच्या देवघरातील मूर्तींशी तुमचं विशेष कनेक्शन असतं…आईने माहेरहून दिलेली अन्नपूर्णा, बाळकृष्ण, आजोबांनी हरिद्वारहून कोणे एके काळी आणलेला शाळिग्राम, आजीने रामेश्वरहून आणलेलं दगडी शिवलिंग, एखादं पुरातन नाणं, अनेक पिढ्या देवघरात सुखेनैव असलेला खंडोबाचा टाक… काय नं काय…
ही सगळी मंडळी तुमची परिचित असतात. रोज तुमच्या प्रार्थना ते ऐकतात, तुमच्या खापर पणजोबांचे शब्दही त्यांच्या कानी पडलेले असतात. तुमचे कठीण संघर्षांचे, कटकटीचे, आनंदाचे, सुखाचे सगळे दिवस त्यांच्यापैकी प्रत्येकाने अनिमिष नेत्रांनी बघितलेले असतात. तुम्ही कधीही घराबाहेर गेलात तरी तुमच्या अनुपस्थितीत देवघर घराची काळजी घेतं, यावर तुमचा ठाम विश्वास असतो. जुने देव भग्न झाले किंवा अन्नपूर्णेची पळी मोडली तरी तुमचं मन खट्टू होतं. काही अपरिहार्य कारणांमुळे देव विसर्जन करावे लागले तर तुम्ही डिस्टर्ब होता, नवीन बनविलेल्या मूर्तींशी कनेक्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो.
प्रत्येक मूर्तींशी तुमचं सुरेख नातं असतं.
जुन्या शाळिग्रामवरचा एक चकचकीत ठिपकाही तुम्हाला माहिती असतो. समर्थांच्या मूर्तीच्या पाटावरचं डिझाईनही तुमच्या नीट लक्षात राहतं.
लक्षात ठेवा…. तुमचं देवघर हे खूप सुरेख शक्तिपीठ आहे. ते कायम सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, फाफटपसारा न मांडता आटोपशीर आणि देखणं ठेवा. रोज जमेल तशी पूजा करा.मूर्ती अधूनमधून उजळवा. रोज तुपाचे निरांजन, चंदन उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा. तुमचे घरचे देव, कुलदेवता आणि सद्गुरु पण महत्त्वाचे आहेत.
लेखक: अज्ञात
संग्राहक – श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
‘मौन म्हणजे काय?’ विचारल्यावर रमण महर्षींनी चूप राहणे म्हणजे मौन नाही तर तेच अनंत असं प्रकटीकरण आहे, असे सांगितले. वाणी आणि कुठलाही संकल्प नसलेली अवस्था म्हणजे मौन आहे! ते साधण्यासाठी कुठलीतरी धारणा मनात घेऊन त्याचं मूळ शोधलं पाहिजे. अशा एकाग्रतेनेच मौन प्राप्त होईल हे अभ्यासाने शक्य आहे. कोणतीही मानसिक क्रिया न करता केलेली साधना म्हणजे मौन आहे. मनाला वश करणे हेच खरं मौन आहे.
ज्यावेळी स्त्रिया डोक्यावर घागर घेऊन इतर बायकांशी बोलत असतात.. चालत असतात. तेव्हा त्यांचं लक्ष डोक्यावरच्या घागरीतल्या पाण्यावरच असतं त्या केवळ बोलत असतात. अशाच प्रकारे जेव्हा एखादा ज्ञानी पुरुष समाजात वावरत असतो. तेव्हा त्याच्या साधनेत कुठलाही प्रकारची बाधा तो येऊ देत नाही. कारण त्याचं मन हे त्या घागरी सारखं ब्रह्मात स्थिर असतं.
माणसाचा स्थायीभाव हा शांती आहे. पण मन मात्र त्यामध्ये बाधा आणत असल्याने तो अशांत बनतो. त्यामुळेच मौन साधल्याने आपोआपच शांतीकडे प्रवास सुरू होतो.
मनाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर आपणास लक्षात येईल की ते लपून बसते ते दिसतच नाही. आत्ता इथे तर थोड्यावेळात दुसरीकडे!असं ते लपाछपी खेळतय. मात्र मन दुसरं तिसरं काही नसून विचारांची सरमिसळ आहे. आपल्या विचारात संकल्पाची निर्मिती झाल्यामुळे आपण त्याच्या निवारणासाठी, पूर्तीसाठी पुन्हा विचार करू लागतो. ह्या स्थितीला.. प्रक्रियेला आपण मन ह्या संज्ञेने संबोधतो.
विचार आणि विवेक जोडणारी गोष्ट म्हणजे बुद्धी होय. अहंभाव, मन, बुद्धी ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आपण ज्याला वस्तुतः आत्मा मानतो ते वास्तविक पाहता अहंभाव, मन किंवा बुद्धी ह्यापैकीच कुणाची तरी कल्पना असते. कोणत्याही संकल्पनेचा उदय हा ‘मी’ पणातूनच होतो. त्या मीपर्यंत पोहोचणे कठीण काम आहे कारण तो सतत असणारच आहे तो नष्ट होणे शक्य नाही. ‘दृष्टीम ज्ञानमयी कृत्वाम. ‘ आपल्या दृष्टीला ज्ञानमय करणे म्हणजे सगळीकडे समत्व आणि ब्रह्मत्व दिसेल. मात्र आपला दृष्टिकोन बाह्य झाल्याने बाहेरच्या वस्तूंवर टिकून असल्याने आपल्याला हे सगळं लक्षात येत नाही. पण दृष्टीला अंतर्मुख केल्याने.. आत अजून डोकावून बघितल्याने आपण केवळ आणि केवळ आत्मा आहो हे लक्षात येईल.
चोर जसा स्वतःलाच शोधून देणार नाही. तसं मनही शोधायला गेल्यावर ते स्वतःला शोधून घेणार नाही. नजरेसही पडणार नाही. कारण ते खोटं आहे. खोट्याचा शोध घेतला तर तो लागणारच नाही कारण ते आहेच नाही. तो एक भास असतो आपली तशी मान्यता असते. ह्यामुळे खरं असलेलं आत्मतत्त्व आपण हरवून बसलो आहे. म्हणून आत्म्याचा शोध घ्या.. मनावर राज्य करण्याचा तोच एक उपाय आहे. आणि तेच सत्य आहे.
आपण कागदावर लिहिलेले अक्षर वाचतो.. मात्र हे करत असताना केवळ अक्षरांवर आपले लक्ष असते त्याला आधार देणाऱ्या कागदावर नाही.. अगदी तसंच आपलं झालेला आहे.. आत्म्यावर असलेल्या मन आणि अहंभाव ह्यालाच आपण महत्त्व देत आहोत त्याला आधार देणाऱ्या आत्म्यावर कुणाचेही लक्ष नाही. ह्या दोष कुणाचा आहे ?आपलाच! जसं की एखाद्या कॅनव्हास वर चित्रकार अलग अलग चित्रे रेखाटतो देखावे काढतो. अगदी तसंच आपणही आपल्या मनपटलावर अनेक अनेक स्वप्निल चित्रे रंगवत असतो. ती नाहीशी होणारी असतात मात्र त्या मनपटलाला आधार देणारा.. पृष्ठभूमी देणारा कॅनव्हास.. आत्मा आपण विसरून जातो. आपण आत्म विचारात सलग्न असलं पाहिजे. तेव्हाच लोक विचार आपोआप निघून जाईल. अनात्म निघून जाईल. हाच खरा आत्मविचार आहे. आत्मा ह्या शब्दातच देह, मन, मनुष्य, व्यक्ती, परमात्मा, इत्यादी चा समावेश असल्याचे लक्षात येईल.
आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भविष्याच्या चिंतेबद्दल.. संशयाबद्दल विचार करणाऱ्याला पकडल्यावर लक्षात येईल की आत्म्यामध्ये स्थिर नसल्याने आपण क्षुब्ध होत आहोत.. भुकेजलेलो आहोत. जगातल्या चिंता आणि समस्यांनी आपण ग्रासलेलो आहोत. हे केवळ आत्म्यापासून दूर गेल्याने होते. म्हणून जर तुम्ही आत्म्याशी दृढतेने टिकून राहिला.. जुळून राहिला तर सर्व समस्या नाहीशा होऊन जातील लुप्त होतील. अशाने मन हळूहळू त्याच्या सर्व मागण्या सोडून देईल आणि तुम्ही आत्म्यामध्ये शांतीने जगू शकाल राहू शकाल.
-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.) – इथून पुढे —–
मागील दहा वर्षात किमान पाच हजार व्याख्यानासाठी उभा राहिलो असेन….
मात्र अजूनही माईक पुढे गेलो, तरी भीती वाटते…. मागून कोणी तरी येईल आणि पट्टीचा फटका मारेल…. !त्यावेळी केलेल्या चुकांची अजूनही भीती वाटते…
मी केलेल्या चुका या “गुन्हा” नव्हत्या… पण त्या चुकाच होत्या… ! हे आज कळतंय.
आमचे एक गुरुजी होते… ते म्हणायचे, ‘आपल्याला आपली चूक समजली म्हणजे समजा निम्मी सुधारणा झाली… !’
‘आपल्याला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर कायम माघार घ्यायची, कुणाशी वाद घालायचा नाही… ‘ हे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे.
– – पण माझ्यासारख्या रेड्याला हे काय कळणार ? पण ज्ञानेश्वर माऊली होऊन माझ्या शिक्षकांनी मला हे सांगितलं.
‘बाळा कुणाच्या कर्जात राहू नकोस पण आयुष्यभर एखाद्याच्या ऋणात रहा… ‘ हे सांगणारी माणसं, आता देवा घरी निघून गेली….
देवाचीच माणसं ही… तिथेच जाणार… !
मी अजूनही शोधतोय यांना…
तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील, तर हृदयाच्या तळ कप्प्यात आत्ताच यांना सांभाळून ठेवा, पुन्हा ते भेटत नाहीत माऊली !
वो फिर नही आते… वो… फिर नही आ…. ते… !!!
गतकाळात केलेल्या या चुका पुसायची मला जरी संधी मिळाली तरी मी त्या पुसणार नाही.
कारण या चुकांनीच मला बरंच काही शिकवलं…
“मान” म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी एकदा अपमानाची चव घ्यावीच लागते…
पोट भरल्यानंतर जी “तृप्तता” येते ती अनुभवण्यासाठी, कधीतरी उपाशी राहण्याची कळ सोसावीच लागते…
आपण “बरोबर” आहोत हे समजण्यासाठी आधी खूप चुका कराव्या लागतात…
जिथं अंधाराचं अस्तित्व असतं, तिथंच प्रकाशाला किंमत मिळते…
पौर्णिमेच्या चंद्राचं कौतुक सर्वांनाच असतं… पण हा चंद्र पाहायला सुद्धा रात्र काळीकुट्टच असावी लागते… ! त्याच्या प्रकाशाला काळ्या मध्यरात्रीचीच किनार लाभलेली असते… नाहीतर दिवसा दिसणाऱ्या चंद्राकडे कोण पाहतं ? आपल्या आयुष्यात आलेल्या काळ्या रात्री आपणही अशाच जपून ठेवायच्या…
आता थोड्याच वेळात उजाडणार आहे; हे स्वतःलाच सांगत राहायचं…
अमावस्या काय कायमची नसते…
बस्स पंधराच दिवसात माझ्याही आयुष्यात पौर्णिमा येणार आहे, हे स्वतःला बजावत राहायचं… !
– – आणि पुढे पुढे चालत राहायचं… !!!
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन, या महिन्यात केलेले काम थोडक्यात सांगतो.
ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा पाच ताई आपल्या मुलाबाळांसह भीक मागायच्या. या पाचही जणींना कामाला तयार केलं आहे. त्यांना नवीन हातगाड्या घेऊन दिल्या आहेत. 26 जानेवारी या पवित्र दिवसापासून त्यांनी काम सुरू करून भिकेपासून स्वातंत्र्य मिळवले आहे.
भिक्षेकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगायला सुरुवात केली आहे… भारताचे नागरिक आणि प्रजा म्हणून त्यांना आता ओळख मिळेल… माझ्यासाठी खऱ्या अर्थाने यावेळचा 26 जानेवारी प्रजासत्ताक झाला.!
रस्त्यावर पडलेली एक ताई, हॉस्पिटलमध्ये उपचार करून हिला बरं केलं. काम सुरू कर भीक मागणं सोड अशी गळ घातली. तिने मान्य केलं. तिची एकूण प्रकृती आणि अशक्तपणा पाहता हातगाडी ढकलणे तिला शक्य नव्हते.
हॉस्पिटलमध्ये तिच्याशी बोलत असताना, बाबागाडीमध्ये बाळाला बसवून एक ताई चाललेल्या मला दिसल्या.
हिच आयडिया मी उचलून धरली, विक्री करायचे साहित्य बाबा गाडीत ठेवून विक्री करायची, बाबागाडी ढकलायला सुद्धा सोपी…
समाजात आवाहन केले, आपणास गरज नसेल तर, तुम्ही वापरत नसाल तर मला बाबागाडी द्या…
बाबागाडीचा हट्ट लहानपणी कधी केला नाही, आज मोठेपणी मात्र मी बाबागाडी मागितली…
“लहान बाळाचा हट्ट” समजून, समाजाने माझा हा हट्ट सुध्दा पुरा केला.
हि ताई कॅम्प परिसरात बाबा गाडीत साहित्य ठेवून बऱ्याच वस्तूंची विक्री करते.
बाबागाडीचा उपयोग बाळाला फक्त “फिरवण्यासाठीच” होतो असं नाही… “फिरलेलं” आयुष्य पुन्हा “सरळ” करण्यासाठी सुद्धा होतो… !
मागे एकदा एक परिचित भेटले. मला म्हणाले, ‘घरात काही जुन्या चपला आहेत, तुला देऊ का ?’
मी द्या म्हणालो
त्यांच्या सोबतीने त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा घरातल्या नको असलेल्या चपला आणून दिल्या.
आठ दहा पोत्यांमध्ये भरलेल्या या चपलांच्या आता जोड्या कशा जुळवायच्या ?
चौथी की पाचवीच्या परीक्षेत जोड्या जुळवा असा एक प्रश्न असायचा, माझ्या तो आवडीचा.
आज डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा जोड्या जुळवा हाच प्रश्न समोर पुन्हा एकदा आला.
मग आमच्या काही भिक्षेकरी मंडळींना हाताशी घेतलं, साधारण निर्जन स्थळी जाऊन सगळी पोती खाली केली… आणि आम्ही सगळेजण लागलो जोड्या जुळवायला… !
काही चपला आमच्या लोकांना वापरायला दिल्या, उर्वरित चपला जुन्या बाजारात आमच्या लोकांना विकायला दिल्या.
“चपलीची पण किंमत नाही” असा आपल्याकडे एक शब्द प्रयोग आहे. पण याच चपला विकून, आमच्यातले अनेक लोक भीक मागणे सोडून प्रतिष्ठा मिळवत आहेत.
चप्पलला किंमत असेल – नसेल; पण आमच्या लोकांची किंमत वाढवली ती या पायताणांनीच…!
माझ्या दृष्टीने या चपलांची किंमत अनमोल आहे…!
दोन लोकांना ओळखीच्या माध्यमातून स्वच्छता सेवक आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस लावून दिले आहे.
रस्त्यावर ते जिथे बसतात रस्त्यावर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे सुरू आहे, डोळ्यांचे ऑपरेशन करणे, चष्मे देणे, रक्ताच्या विविध तपासण्या करणे, कानाची तपासणी करून ऐकायचे मशीन देणे इत्यादी इत्यादी वैद्यकीय बाबी सुरू आहेत.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरीब रुग्णांना रोजच्या रोज जेवण देत आहोत. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांची एक टीम तयार करून त्यांच्याकडून सार्वजनिक भाग स्वच्छ करून घेत आहोत त्या बदल्यात त्यांना कोरडा शिधा देत आहोत, साबण टूथपेस्ट, टूथ ब्रश या सुद्धा गोष्टी पुरवत आहोत.
(सध्या भीक मागणाऱ्या अनेक लोकांना भीक मागणे सोडायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. अशांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र तयार करून, त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची; असे स्वप्न गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे, अनेक कारणांमुळे ते सत्यात येऊ शकले नाही. परंतु येत्या महिन्याभरात असे प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती काही दिवसात देणार आहे)
असो..
आपण ज्या समाजात राहतो तिथे वय वाढलेल्या लोकांना ज्येष्ठ म्हटलं जातं…
मी ज्या समाजासाठी काम करतो, तिथे वय वाढलेल्या लोकांना म्हातारडा – म्हातारडी थेरडा – थेरडी म्हटलं जातं…
आपण ज्या समाजात राहतो तिथे कुणी गेलं तर, ते देवा घरी गेले, कैलासवासी झाले असे शब्दप्रयोग केले जातात.
आमच्याकडचं कोणी गेलं तर म्हणतात… त्ये मेलं… खपलं
– – वरील सर्व शब्द; अर्थ जरी एकच सांगत असले, तरीसुद्धा शब्दाशब्दांमध्ये प्रचंड अंतर आहे.
– – हे अंतर आहे… हा फरक आहे फक्त प्रतिष्ठेचा… !
हे जे काम आपल्या सर्वांच्या साथीनं सुरू आहे, ते फक्त या शब्दातले अंतर कमी करण्यासाठी…
शब्दातला फरक मिटवण्यासाठी…
“प्रतिष्ठा” नावाचा “गंध” त्यांच्या कपाळी लावण्यासाठी…!!!