मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

(काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.)       

सवैय्या

आता सवैय्या म्हणजे काय हे बघू या मंडळी! सवैया एक छन्द (वृत्त) आहे. चार ओळी (प्रत्येक ओळीत २२-२६ शब्द) अशा या छंदांना समूह रूपात हिंदीत ‘सवैया’ असे परंपरेने म्हणतात. रसखान यांचे सवैये फार प्रसिद्ध आहेत. निम्नलिखित कविता ‘मानुष हौं तो वही रसखानि’ ही त्यांच्या कृष्णभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. यात विविध प्रकारे कवी असे सांगतो की मला कृष्णाशिवाय काही नको. त्यांच्या साऱ्या कवितांचा आत्मा कृष्णलीला हाच आहे. कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा अलौकिक शब्दांत कवीने आपली कृष्णभक्ती प्रकट केली आहे. आता रसखान यांच्या या प्रसिद्ध कवितेचा आस्वाद घेऊ या. यांतील कांही मोजक्याच सवैयांचा अर्थ समजून घेऊ, कारण कविता रसपूर्ण तर आहे पण बरीच मोठी आहे. हे रसग्रहण करतांना कवीची कृष्णभक्ती जशीच्या तशी प्रस्तुत करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.

“मानुष हौं तो वही रसखानि”

मानुष हौं तो वही रसखानि, बसौं मिलि गोकुल गाँव के ग्वारन।

जो पसु हौं तो कहा बस मेरो, चरौं नित नंद की धेनु मँझारन॥

पाहन हौं तो वही गिरि को, जो धर्यो कर छत्र पुरंदर धारन।

जो खग हौं तो बसेरो करौं मिलि कालिंदीकूल कदम्ब की डारन॥

रसखान ब्रजभूमीशी इतके समरस झालेत की तेथील कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी त्यांना नाते जोडायचे आहे. कवी वरील सवैयात आपल्या इच्छा व्यक्त करीत म्हणतात, ‘देवा, माणसाच्या जन्माला घालायचे तर गोकुळातल्या एखाद्या गुराख्याच्या किंवा गवळ्याच्या जन्माला घाल, पशूच्या जन्माला घालायचे तर गोकुळातील नंदाच्या घरच्या गाई किंवा पाड्याच्या जन्माला घाल, रोज कान्हा वनात घेऊन जाईल याची ग्यारंटी! अन हो, दगडच व्हायचे तर जो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ना तिथेच पडून राहू दे मला. त्या पवित्र पर्वताचे छत्र करंगळीवर धारण करून कधी काळी इंद्रदेवाच्या कोपापासून गोकुळातल्या लोकांचे प्राण वाचवले होते त्या गिरीधराने! अरे पक्ष्याच्या जन्माला घातलेस तरी हरकत नाही, मात्र अशी सोय कर बाबा की, मी ब्रजभूमीवर जन्म घेईन अन कालिंदीच्या तटावरील एखाद्या कदंबाच्या फांदीवर आपले घरटे बांधीन. अरे कधी काळी याच कदंबाच्या फांद्यांचे हिंदोळे घेत असतील राधा अन गोपाळकृष्ण!  नाही तर याच कदंब वृक्षावर बसून तो कृष्ण मुरली वाजवून गोपींना रिझवीत असेल! असे माझे नशीब असेल का की, जिथे जिथे कृष्णाचा आणि गोपगोपींचा वास होता तिथंच मी पण जन्म घेईन?’  

या लकुटी अरु कामरिया पर, राज तिहूँ पुर को तजि डारौं।

आठहुँ सिद्धि, नवों निधि को सुख, नंद की धेनु चराय बिसारौं॥

ए रसखानि जबै इन नैनन ते ब्रज के बन बाग तड़ाग निहारौ।

कोटिक हू कलधौत के धाम, करील के कुंजन ऊपर वारौं॥

वरील सवैयात कवी रसखान यांना श्रीकृष्णाच्या बालपणीच्या वस्तूंचा भारीच मोह पडलाय असे दिसते. त्यांच्यासाठी ते कशा कशाचा त्याग करायला तयार आहेत हे बघा! ते म्हणतात, ‘या गवळ्याची काठी आणि कांबळे मला अतिप्रिय, त्यांच्यावरून त्रिलोकाचे राज्य जरी मिळाले तरी मी ओवाळून टाकीन! नंदाच्या गाई चरावयास घेऊन जायचे सुख मिळणार असेल तर आठ सिद्धी (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व) तसेच नऊ निधी (पद्म निधि, महापद्म निधि, नील निधि, मुकुंद निधि, नंद निधि, मकर निधि, कच्छप निधि, शंख निधि आणि खर्व) यांच्या सुखाचा मी त्याग करू शकतो. मी स्वतःच्या नेत्रांनी ब्रजभूमीतील वने, उपवने, उद्यान आणि तडाग हे सर्व जीवनभर बघत राहून ते नेत्रात साठवीन. ब्रजभूमीतील काटेदार वृक्षवेलींकरता कोटी कोटी सुवर्ण महाल अर्पण करावयास मी आनंदाने तयार होईन.’

सेस गनेस महेस दिनेस, सुरेसहु जाहि निरंतर गावै।

जाहि अनादि अनंत अखण्ड, अछेद अभेद सुबेद बतावैं॥

नारद से सुक व्यास रहैं पचि हारे तऊ पुनि पार न पावैं।

ताहि अहीर की छोहरियाँ, छछिया भरि छाछ पै नाच नचावैं॥

कवी वरील ओळींमध्ये म्हणतात, ‘शेष (नाग), गणेश,  महेश (शिव), दिनेश (सूर्य) आणि सुरेश (इंद्र) हे देव त्याचे (कृष्णाचे) निरंतर ध्यान करतात, त्याचे आकलन करू न शकलेले वेद त्याचे गुणगान असे गातात ‘तो अनादी, अनंत, अखंड, अछेद (छिद्र नसलेला) आणि अभेद्य, आहे.’ नारद मुनी, शुक मुनी, वेदव्यास सारखे गाढे ज्ञानी ऋषी मुनी ज्याच्या नावाचा सतत जप करतात, तरीही त्याचा भेद जाणू शकत नाहीत, असा परात्पर परब्रह्म असलेल्या या गोकुळातील बाळकृष्णाला या गवळणी (अहीर की छोरियाँ) ताकाचे भांडे (छछिया-ताक ठेवण्याचे मातीचे लहान भांडे) दाखवत नाचायला लावतात, कधी पैंजण घालायला लावतात तर कधी घागरा चोळी!’ जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण! त्याच्या लीला अपरंपार! आणि या जगदीश्वराला आपल्या मनाला वाटेल तसे नाचवणाऱ्या या गवळणींचे भाग्य किती थोर बरे! त्याचे बालरूप इतके मनमोहक आणि सुजाण असूनही अजाण गोपींसाठी हा अशा लीला करतो.

(असे म्हणतात की स्त्रीरूप घेऊन भगवान विष्णूंशी एकरूप होण्यासाठी देव आणि ऋषी मुनी यांनी गोपिकांचे रूप घेतले. पण गोपिका झाल्यावर ते आपले मूळ रूप विसरले आणि भोळ्या भाबड्या गोपिकांच्या रूपात त्यांना कृष्णाचा असा सहवास लाभला! खरे काय अन खोटे काय त्या पूर्णब्रह्म कृष्णालाच माहित, एक मात्र सत्य, जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण गोपींसाठी नृत्य करायला सदैव तयार असायचा, फक्त लोण्याचा गोळा अन वाडगाभर ताक द्यायला लागायचं!)

धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।

खेलत खात फिरैं अँगना, पग पैंजनी बाजति, पीरी कछोटी॥

वा छबि को रसखान बिलोकत, वारत काम कला निधि कोटी।

काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥

वरील सवैयात एक गोपी आपल्या सखीजवळ कृष्णाच्या सुंदर रूपाचे वर्णन करीत म्हणते, “सखे, अगं, धुळीत खेळून खेळून कृष्णाचं सगळं अंग धुळीने माखलय, कित्ती शोभून दिसतोय नाही हा असा! आणि त्याचे कुरळे केस बघ कसे सुंदर बांधले आहेत,, एक चोटी (चुट्टी) शिरावर शोभून दिसतेय (द्वारकेत गेल्यानंतर सोन्याचा मुकुट आला तरी ही बालपणीची शेंडी काहीं न्यारीच!) अंगणात खेळता खेळता खाणे अन खाता खाता खेळणे हे तर हृदयंगम दृश्य, खातो काय तर पोळी अन लोणी (माखन रोटी). असे धावत पळत अन पडत असतांना पायातील चाळ (पैंजण) छुनून छुनून वाजताहेत, ते नादब्रह्म म्हणजे सप्तसुरांपलीकडले, अर्थात आठवे!!!, आठवावा आठव्याचा (कृष्णाचा) आठवा स्वर, अर्थात त्याच्या पैंजणाची झंकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) त्याने पीतवर्णाची लंगोट घातलेली आहे (मोठे झाल्यावर पितांबर, धन्य हो, किसनकान्हा!). या कृष्णाच्या मनमोहक आणि मनभावन स्वरूपाने सगळ्यांना वेड लावलच आहे, त्याच्या सौंदर्यशोभेपुढे प्रत्यक्ष कामदेव आणि कलानिधी चंद्र देखील आपल्या करोडो सुंदर रूपांना ओवाळून टाकीत आहेत. अगं सखये, जरा बघ तरी, त्या मेल्या कावळ्याचे भाग्य कसे फळफळलेय ते, चक्क कृष्णाच्या हातातील ‘माखन-रोटी’ वर झपाटून डल्ला मारला आणि ती घेऊन कसा उडून गेला बघ!”

कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।

मोहनी ताननि सो रसखानि अटा चढि गोधन गैहै तौ गैहे॥

टेरि कहौ सिगरे ब्रज लोगनि काल्हि कोऊ सु कितौ समुझे है।

माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥

रसखान वरील ओळींमध्ये गोपी कृष्णाच्या प्रेमात किती वेड्या झालेल्या आहेत ते सांगतात. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, कृष्णाची मंद मंद सुरेल नादमधुर बासरी वाजते ना तेव्हा, माझ्या कानात कोणी बोटे घालावी, अर्थात मला ना त्याच्या बासरीची तान मुळी ऐकायचीच नाही बाई! तो ना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून येईल आणि मुद्दामच माझ्या मनाला मोहून घेणाऱ्या ताना घेत गायी चरायला नेत असता गवळी म्हणतात ती गाणी (गौचारण) गात बसेल. पण मी ना सर्व ब्रजवासीयांना ओरडून ओरडून सांगेन, मला भलेही काहीही अन कितीही समजावून सांगून बघा, पण हे सखी, या श्यामलतनु कृष्णाच्या मुखावरील ते मंद, मधुर स्मितहास्य तर माझ्या मनाचा ताबा घेतंय! मला माझं मनच आटोक्यात ठेवता येत नाहीय. तो माझ्या हृदयकमलाभोवती भ्रमरासारखा गोड गुंजारव अन प्रेमालाप करीत फिरतोय! अर्थात् मी कृष्णाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेय. मी इतकी व्याकुळ आणि उन्मत्त झाले आहे की काय सांगू अन कसं सांगू! मी सगळी लाज सोडून श्रीकृष्णाकडे धाव घेत आहे.”

मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।

ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥

भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।

या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥

कवीने या सवैयात गोपीचे कृष्णावरील आगळेवेगळे प्रेम प्रकट केले आहे. कृष्णाच्या वस्तूंना धारण करण्याची तिची कशी तयारी आहे बघा. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, मी ना आपल्या शिरावर (कृष्णासारखाच) मोरपंखाचा मुकुट धारण करेन. गुंजांची माळ गळ्यात घालीन, झालच तर पीत वस्त्रे परिधान करून हातात काठी घेऊन आणि गवळण बनून वनावनात गायी चरायला घेऊन जाईन अन त्यांच्या मागे फिरत फिरत छान रखवाली करीन. कृष्ण तर मला इतका परमप्रिय आहे, की त्याच्यासाठी मी वाट्टेल ते करीन, त्याला प्राप्त करायला तू सांगशील ते सोंग घेईन. पण एक लक्षात ठेव बाई, कृष्णाची जी मुरली आहे ना, जिला तो अधरात धरून ठेवतो, तिला मात्र मी माझ्या अधरात कध्धी म्हणून कध्धी धरायची नाही हं!” (सवत आहे ना!)

मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।

ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥

अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।

और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।

गोपिका म्हणतात, ‘शिरावर मोरपंख, ओठांत मुरली आणि गळ्यात वनमाळा घातलेल्या कृष्णाला बघत राहिल्याने मन वाऱ्यावर डोलणाऱ्या कमलपुष्पासारखं डुलतय. माझ्या अशा प्रेममग्न अवस्थेत कोणी वैरीण जरी उलटे सुलटे बोलली तरी सहन केल्या जातंय! रसखान म्हणतात, जेव्हा लावण्याचा गाभा अशा कृष्णाशी इतके स्नेहबंध जुळले आहेत की, कोणी एक म्हणू दे किंवा कोणी लाख वेळा टोकले तरी, आता इतर कुठलाच रंग असो व नसो, त्या सावळ्या कृष्णसख्याच्या रंगातच रंगून राहायचे आहे!’ जाता जाता याच अर्थाचे माणिकबाईंचे गाणे आठवले, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’

ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाला शोभायमान होते अशा कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही शब्द कुसुमांजली अर्पित करते!

– समाप्त – 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उसळ आणि उसळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 उसळ आणि उसळी ! 😅🤣😇 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक मी अज्ञानी काय सांगणार ?

आपापल्याला जिभेला पर्यायाने खिशाला जपा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आला की, सणांची रेलचेल असतेच असते. अगदी भराडी गौर, शिवामूळ, मंगळागौरी, नागपंचमी, शुक्रवारची सवाष्ण, वरदलक्ष्मी व्रत, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, पिठोरी मातृपूजन, पोळा ! दर दोन तीन दिवसाआड येणारे सण.

सर्व सणांचं ठीक आहे. पण मला नेहमीच जन्माष्टमीचं कायम नवल वाटायचं. श्रीरामजन्म, श्री दत्त जन्म  श्री हनुमानजन्म, जवळपास सगळेच मंदिरात होतात. मात्र कृष्णजन्माचा उत्सव हा मंदिरांसोबतच प्रत्येक घरी होतो. माझ्या माहेरी तर जन्माष्टमीला आम्ही गोकुळाष्टमी म्हणायचो. माझे वडील प्रख्यात मूर्तीकार. सकाळी आंघोळ झाली की ते गोकुळ करीत बसायचे. प्रारंभी गणपती, नंतर श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, राधा, काही गौळणी, अगदी पूतनामावशी सुद्धा. काही गायी वासरं, कालिया. श्रीकृष्णाचे मित्र वगैरे. मजा यायची. आम्हाला कुठलं काय येतंय ? पण शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता बाबा आम्हाला मातीकाम शिकवायचे. माणसं, प्राणी करणं कठीणच प्रकरण होतं. मग कुठे पाण्याचं टाकं, नाग, गौळणीच्या डोक्यावरचा माठ, फळं, ताकाचा डेरा असं काहीतरी करायचो. पुढे पोळ्यालाही वाडबैल वगैरे करताना तीच त -हा ! बाबा एकच वाक्य बोलायचे. ” आज ओल्या मातीला हात लावला नाही  तर पुढला गाढवाचा जन्म मिळतो. ” झालं. गाढव कोण होणार ? म्हणून आम्हीही करायचो. कळत नकळत असं कलेचं शिक्षण मिळत गेलं. नंतर त्यांची साग्रसंगीत पूजा नैवेद्य व्हायचा. दुपारी रात्रीच्या भजनाची आणि सुंठवड्याची तयारी असायची.

रात्रीचं भजन छानच रंगायचं. पंचपदी, शिक्का, गजर झाला की इतर भजनं व्हायची. त्या दिवशी कृष्णाची गाणी जरा जास्तच व्हायची. नंतर गवळण. ती झाली की कृष्णजन्म. कृष्णजन्म होताच गुलालाची उधळण होई. मग कृष्णाचा पाळणा. त्यावेळी घरातल्या स्त्रियाही त्यात सहभागी होत. शेवटी आरती आणि सुंठवड्याचा प्रसाद.

दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन आणि गोपालकाला. हे सर्व झालं की गोकुळाचं विसर्जन. इकोफ्रेंडली हा शब्द आज सर्वांना ठावूक झालाय, पण शंभर वर्षांपासून किंवा त्याच्याही आधी माझ्या माहेरी तो होता. कारण गोकुळाचं विसर्जन पाण्यात न होता, परसातल्या दोडक्याच्या किंवा पडवळाच्या झाडाखाली व्हायचं. सगळं गोकुळ आम्ही त्या वेलांच्या मुळाशी ठेवायचो. पूर्वी श्रावणात श्रावण बरसायचा. रंग नसायचेच त्या मुर्त्यांना. हळूहळू ती ओली माती मातीत मिसळून जायची.अनेकांच्या घरी हा कुळाचार पण आहे.

मला बालपणी पडलेला प्रश्न हाच होता, की कृष्णजन्म घरोघरी का होतो ? ब्रह्मा विष्णू महेश हे ठावूक होतं. उत्पत्ती स्थिती लय. पण स्थिती म्हणजे विष्णूरूप रामाचेही होते.. आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी प्रभू रामचंद्र. लहानपणी कळत नव्हतं पण जसजशी मोठी होत गेले तेव्हा स्वतःच विचार करू लागले. आजही कृष्ण कळला नाहीच. जरासा विचार केला एवढंच. रामाबद्दल वाटतो तो आदर. आदरयुक्त प्रेम. आणि कृष्ण वाटतो सखा. मनापासून प्रेम करावं असं वाटणारा.

आपल्या कुळाचाराचे देव कुण्या मोठ्या घरी असतात किंवा परंपरेने आपल्याकडे आलेलेही असू शकतात. पण सामान्यपणे आपल्या देवघरात कोण असतं ? श्री गणपती, अन्नपूर्णा आणि रांगता बाळकृष्ण ! सासरी जाताना आई लेकीला अन्नपूर्णा देते. ” तूही तुझ्या घरची अन्नपूर्णा हो ” असा आशीर्वाद देते. आणि दुसरा असतो बाळकृष्ण. मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ! देवाची पूजा करताना  ती मुलगी हळुवारपणे बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याचे वस्त्र बदलते. त्याला मुकुट, गळ्यात साखळी, हातात पायात कडे तोडे घालते. नटवते. सजवते. जसं आपल्या बाळाशी वागावं तशी ती लाडिक वागते. राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधते, स्वतःचा रक्षणकर्ता मानते. घरात काही घडलं तर त्याच्या कानात सांगते. जसं जिवाभावाच्या मित्राशी बोलावं तसं. आधार वाटतो त्याचा. आणि कधी काही सुचेनासं झालं की, त्याचाच सल्ला घेते.

कृष्णाने काय शिकवलं ? तुमचं कर्म तुम्हीच करा. यश आहेच. कारण मी पाठीशी आहे. सोबत आहे. कृष्णाने कुठला त्याग नाही केला ? जन्मतः च आईबाप दुरावले, नंतर नंद यशोदा दुरावले, राधा दुरावली, गोकुळ दूर गेले. असाही त्याग ? पुन्हा मागे वळून न बघण्याचा ? द्रौपदी सखी त्याची. तिचं लज्जारक्षण करणारा सखा तिचा.असूराच्या तावडीतून सोळा सहस्त्र एकशे नारींची त्याने सुटका तर केली. पण पुढे समाजातलं त्यांचं स्थान काय.. म्हणून त्यांना स्वतःचं नाव दिलं. पती म्हणून. बालपणी गुरं राखली, आणि मोठेपणी मित्राच्या रथाचा सारथीही झाला. त्याला योग्य मार्गदर्शन करीत जय मिळवून दिला.

…… आणि एवढं सगळं करूनही अलिप्त तो अलिप्तच राह्यला.

आपल्या मुखातून मातेला ब्रह्मांडाचे दर्शन घडवणारा कृष्ण माझ्या एवढ्याशा शब्दात बांधला जाणार आहे होय ? पण खरंच एवढं कायम वाटतं की, पुत्र, पिता, सखा, मित्र, अगदी पळवून नेणारा प्रियकर आणि नवरासुद्धा श्री कृष्णासारखाच असायला हवा.

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

(मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले. आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले.) — इथून पुढे — 

माझ्या घरात सगळीकडे फ्रेम करून लावलेली चित्रे होती. ती त्याने प्रामाणिकपणे व्यवस्थित पाहीली पण त्याची नजर काही तरी वेगळे चित्र शोधत होती. मग मी माझी नुकतीच पूर्ण केलेली पावसाची, दाट धुक्याची, जलरंगातील चित्रे दाखवली. आणि अर्शद एकदम खुष झाला. 

येस, येस, 

आय वाँट धिस टुडेज रेनी सिझन ॲटमॉसफियरीक वंडरफूल पेंटीग्ज.

दिस वील बी गुड मेमरीज फॉर मी. 

असे म्हणत त्याने ती तीन चित्रे सिलेक्ट केली. माझा अकाऊंट नंबर ऑनलाईन पेमेंटसाठी  विचारला पण माझ्याकडे तशी त्यावेळी सुविधा नव्हती. मग तो क्रेडीटकार्डची सुविधा उपलब्ध आहे का? असे विचारु लागल्यावर मी नकार दिला. कारण मी त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे एवढे सुरक्षित नव्हते.मग एटीएम मधून रोख पैसे देण्याचा पर्याय नक्की झाला.  बबल रोलच्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेली व्यवस्थित पॅक केलेली चित्रे त्याच्या गाडीतून अर्शदने मागच्या सीटवर ठेवली व आम्ही पाचगणीच्या शॉपींग सेंटरच्या पोस्टाशेजारच्या स्टेट बँकेच्या एटीएमला गेलो. त्याने पेमेंट काढून रक्कम हातात दिली.मग कितीतरी दिवस मनात साचलेले एक मोठे ओझे दूर झाल्याने मी रिलॅक्स झालो. कारण ती रक्कम पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतकी होती.आणि एटीएम शेजारच्याच पुरोहीत नमस्ते या हॉटेलमध्ये आम्ही निवांतपणे कॉफी पिण्यासाठी गेलो.

मला तर  फारच आश्चर्य वाटत होते की इतक्या धुवांधार पावसात हा माणूस माझ्याकडेच चित्र घ्यायला का आला असावा ? त्याला कोणी रेफरन्स दिला ? त्याला चित्रेच का घ्यावीशी वाटली ? तो या गावात शिकला,त्याचा व पाचगणीचा काय संबंध ? माझे अनेक प्रश्न मी त्याला विचारले. पण अर्शदने थोडक्यात प्रश्नांची उत्तरे दिली. 

आज खूप वर्षानंतर मी पाचगणीला आलो. शाळेत असताना हा वादळी पावसाचा दिवस, कडाक्याची थंडी, हे धुके मला सतत आठवत असते. आज सध्यांकाळी मी लॅपटॉपवर सहज पाचगणी पेंटीग्ज या नावाने सर्च मारला तर तुमच्या पेंटिंगचे फोटो दिसले. कुठूनतरी अचानक एक अज्ञात शक्तीने सुचवले किंवा मनात विचारांचे वादळच उठले की आताच जावून या चित्रकाराला भेटलेच पाहीजे. मी आता परदेशात स्थायिक झालो आहे.मनातल्या साचलेल्या या पावसाच्या धुक्याच्या आठवणी  चित्ररुपाने मला नेहमीच या परिसराची,तुमची व येथील पाचगणीच्या या भेटीची आठवण करून देत राहतील. प्रेमाने गळाभेट घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि माझी प्रत्यक्ष अनुभवलेली,घडलेली खरी  गोष्ट इथे संपली. 

डोक्यावर हुडी घालून चाललेला पाठमोरा अर्शद त्यादिवशी मला देवदूतासमान वाटला. कित्येक वर्ष ह्या नखशिखान्त पावसात ओलाचिंब झालेल्या या देवदूताची प्रतिमा मनाच्या अज्ञात पोकळीत स्वस्थ बसून राहिली होती आज या थिंक पॉझिटिव्हच्या लेखामूळे पुन्हा जागृत झाली, पुन्हा आठवली.

खरं तर मी नास्तिकही नाही व आस्तिकही नाही. मी नियमित देवपूजा व मंदिरानां भेटीही देणारा धार्मिक माणूस नाही. पण गेले कित्येक वर्ष  मला हा प्रश्न सतावतो की हे अज्ञात देवदूत मला का भेटत गेले ?  या देवदूतांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या वर्णाचे, स्त्री किंवा पुरुष असो वेगवेगळ्या रुपाने अडचणींच्या वेळी हजर कसे होतात ? आणि ते कधीकधी परत भेटतात किंवा कधी आयुष्यात भेटतही नाहीत. आपण कोणाला मदत केली किंवा मार्गदर्शन करून नवा रस्ता  दाखवला याचा त्यानां कधी अभिमान वाटत नाही. ते कुठे याचा नामोल्लेखही करत नाहीत. त्यांच्या भावविश्वात मी आता मदत केली आहे तर तुमच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा आहे असे त्यांचे वर्तन कधीही असत नाही.

मी हिंदू आहे व अर्शद मुस्लीम आहे म्हणून आमच्यामध्ये कधी असा दुजाभाव, दुराचाराचा विचार आला नाही. देवदूतानां कुठे धर्म,जात असते

आपल्या आयुष्यातील कठीण काळात सर्वतोपरी छोटी असो वा मोठी मदत करणाऱ्यानां देवदूतच म्हणावे लागेल ना ? 

म्हणजे देवदूतानां जात, धर्म, पंथ नसतो. मग आपण का जात,धर्म, पंथ व हिंदूत्व कवटाळून बसतो. मी तर मंदिराच्या परिसरात चित्र रेखाटण्यासाठी जात असूनही कधी आत जात नाही. देवाच्या दर्शनाला रांग दिसली की लांबूनच हात जोडतो. आणि देवाला मनातूनच सांगतो बाबा रे ! तुला तर माहीतच आहे की तुझ्यापासून काहीही लपवू शकत नाही.तू तर सर्वज्ञ आहेस, सगळीकडे तुझा वावर असतो मग रांगा लावून तुझ्याकडे येण्यासाठी वेळ कशाला घालवू ? रांगेत फुकट वेळ घालवायचा याला काय अर्थ आहे ? तू जे अडचणींच्या काळात मनुष्यरूपी देवदूत पाठवतोस ते काय कमी आहे का ? मग मनातूनच माझा नमस्कार स्विकार कर. 

यु नो एवरीथिंग अबाऊट मी.

आजही कधीतरी  मोठी अडचण आली की मला परत कधीही न भेटलेल्या हुडीवाल्या देवदूताची प्रतिमा आठवते. माझा तीस पस्तीस वर्षांचा चित्रकलेचा प्रवास अशा ज्ञात अज्ञात देवदूतांनी सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या मार्गाने अचानक प्रकट होवून भरघोस यशाशक्ती मदत केली. आमची चित्रकला बहरली, फुलली संपन्न झाली त्या या देवदूतांमूळेच. या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या मानवी सजीव देवदूतानां आज यानिमित्ताने मी नतमस्तक होऊन सप्रेम नमस्कार करतो.

मन, शरीर, बुद्धी व आत्मा या चार जीवनातील गोष्टींचे योग्य संतुलन असले की देवदूत भेटतातच, किंवा भेटले नाही तर कधी कधी आपणच कोणाचा तरी देवदूत बनून समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला, त्याची चिंतामग्न अवस्था समजून हातभार लावला, खरी मदत जर केली तर या जन्मात आपणही एक छान कर्म केल्याचे मानसिक समाधान नक्की मिळेल.

मी जरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी कधीही गेलो नाही तरी त्यांचे दोन शब्द मला नेहमीच प्रेरणा देतात. 

‘श्रध्दा’ और ‘सबुरी’.

आपल्या कामावर असलेली निस्पृह  निष्ठा,मनात असलेली प्रामाणिक इच्छाशक्ती व आपल्या जोपासलेल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक काम असो किंवा तुमच्या आवडत्या कलेवर असलेले निर्व्याज सच्चे  प्रेम असेल तर ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती करायला एक दिवस  देवदूत नक्की भेटायला येतो.तो नवनव्या वेषात येतो. कधी तो सरकारी अधिकारी म्हणून येईल, तर कधी शिक्षकाच्या, मित्राच्या रुपाने प्रकट होईल. कधी काळ्या कोटात वकीलाच्या रुपाने येईल तर कधी पांढरा कोट घालून डॉक्टरांच्या रुपाने येईल. कधी साध्या वेशात येईल, कधी टाय सुटबुटातील पोशाखात उद्योजकाच्या रुपाने येईल तर कधी हुडीवाला पोशाख घालून शांतपणे सुखाची पखरण करत व मदत करून निघून जाईल.

पण पक्का विश्वास ठेवा स्वतःवर 

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

🌟 🌟 🌟 🌟

(माझ्या चित्रकलेच्या अडचणीच्या संघर्षाच्या प्रवासात या हुडीवाल्या देवदुताला मी पार विसरूनच गेलो होतो. लेख लिहील्यानंतर त्या रात्री कित्येक वर्षांनी देवदूताचा गुगल, फेसबूक अशा समाज माध्यमांवर शोध घेतला तर देवदूत सापडला. मेसेंजरवर रात्री त्याला उशिरा मेसेज पाठवला तर देवदूताने मोठ्या उत्स्फूर्तपणे लगेच मला प्रतिसाद दिला. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात देवदूताना विसरतो पण देवदूत कधीच आपल्याला विसरत नसतात. या देवदूताचा चेहरा मला आठवत नव्हता. आज खूप वर्षानंतर त्या देवदूताचा बायोडाटा पाहीला तर हा स्मार्ट देवदूत त्यावेळी जागतिक बँकेचा प्रेसिडेंट होता.त्यांचा फोटो सुरुवातीला मुद्दाम दिला आहे.) 

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांची प्रतिक्षा ! 

७ सप्टेंबर,२०१९. या आधी त्या दोन डोळ्यांत कित्येक वर्षे फक्त चंद्रच चमकताना दिसायचा…अमावस्या असली तरी ! आज मात्र दोन्ही डोळ्यांत अमावस्या भरून राहिलेली आहे. हजारो किलोमीटर्स दूर आणि वर असणा-या चंद्राच्या अंतरंगातील ओलावा शोधून काढण्याच्या प्रयत्नात या माणसानं रक्ताचं पाणी केलेलं असताना त्या चंद्राने याच्याच डोळ्यांत दीर्घकाळ टिकून राहील असा ओलावा भरून टाकला ! 

सामान्य पुरुषाचं रडणं खरं तर भित्रेपणाचा,असहाय्यतेचं लक्षण मानलं जातं…पण शूर पुरुष जेव्हा रडतात तेव्हा त्यांचे अश्रू फुलांना जन्माला घालण्याचा प्रण करीत वाहात असतात. जगाला शंभर टक्के यशाचीच गोडी समजते. यापेक्षा कमी जग खपवून घेत नाही. शंभर आणि नव्व्याण्णव यामधील एकचा फरक नव्याण्णवची किंमत अगदी कमी करून टाकतो. 

कैलासविदवू सिवन...एका सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म. माध्यमिक शिक्षण मातृभाषा तमीलमध्ये घेतलेलं….खाजगी शिकवणी न लावताही अभ्यासात उत्तम गती. दैवाने प्रदान केलेल्या बुद्धीला कष्टाचं खतपाणी घालून देशाच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन केंद्राचा प्रमुखपदी विराजमान होण्याची किमया. आणि हाती घेतलेलं चांद्रयानाचं व्रत. कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षांचं भलंथोरलं ओझं वागवत वागवत प्रचंड कष्टानं चांद्रयान-२ विक्रम लॅन्डर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला निगर्वी, मितभाषी माणूस. त्यादिवशी चंद्रालाही हळहळ वाटली असेल…अगदी जवळ येऊनही चांद्रयानाला चंद्राशी नीट गळाभेट घेता नाही आली ! खरं तर फक्त ही गळाभेटच शिल्लक राहिली होती…बाकी जवळजवळ सर्व कामगिरी उत्तम बजावली होती चांद्रयान-२ ने. मात्र ऐनवेळी अपयशाने पायांत खोडा घातला आणि जगाच्या लक्षात त्याचं केवळ कोसळणं लक्षात राहिलं. आमराईमधल्या सर्वांत डेरेदार आम्रवृक्षावर वीज कोसळावी आणि फळं जळून जावीत अशी स्थिती झालेली… 

… तोंडातून शब्द फुटू शकत नव्हते तेव्हा आसवांनी शब्दांची जागा घेतली. टाळ्या वाजवण्याच्या बेतात असलेले अनेक हात खाली झाले, नजरा दूर झाल्या. उभ्या देशाचा विश्वास गमावल्याची भावना मनात जोरात शिरली…आणि आसवांचा बांध फुटला ! देशाच्या नेतृत्वाने सांत्वन केलं, धीराचे चार बोलही सांगितले. सबंध देश निराश झाला होताच…आणि ते साहजिकच होते. पण त्याचक्षणी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्धार झाला. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच ध्यासाने काम केले…चुकांचा मागोवा घेतला आणि त्या सुधारण्याच्या योजना नव्याने आखल्या. दिवस निघून गेले, वर्षे निघून गेली….आणि १४ जुलै २०२३ चा दिवस उगवला आणि २२ जुलै २०१९चा दिवस आठवला ! 

आजच्या २३ ऑगस्टला सुद्धा ७ सप्टेंबर मनात घर करून होता. चांद्रयान-२ शेवटच्या काही मोजक्या मिनिटांत यशापासून दूर जाऊन कोसळलं होतं ! आज असं व्हायला नको…पण गतवेळी झालेल्या चुका, अपघात यांपासून नव्या दमाच्या शिलेदारांनी धडा घेतला आहेच…सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री होती मनात….तसंच झालं….केवळ चांद्रयानच नव्हे तर के.सिवन नावाच्या या मोठ्या माणसाचं हळवं मनही चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं… डोळ्यांत पौर्णिमेचा चंद्र उतरला होता ! आताच्या आसवांना तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांपूर्वीच्या आसवांची याद आली…..मात्र त्या आणि या आसवांमध्ये पृथ्वी आणि चंद्र नव्हे तर जमीन-अस्मानाचा फरक होता….आताची आसवं आनंदाची होती…..! 

कैलासविदवू सिवन साहेब…हा देश आपला सदैव ऋणी राहील ! आपले हार्दिक अभिनंदन ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

महत्वाचे निवेदन

काव्यानंद  या सदरात मराठी भाषेतील  कवितेचे रसग्रहण  अपेक्षित  आहे.आज आम्ही अपवादात्मक  बाब म्हणून  हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण  प्रकाशित  करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य  प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य  पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.

संपादक  मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.         

सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले. 

त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे.  ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रचंड वेग,तीक्ष्ण धार आणि तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांना अतिशय मनापासून स्वतःत सामावून घेऊनही वरवर शांत,सौम्य वाटणारा पण त्या वेग,धार किंवा तीव्रतेमुळे अंतरंगी अफाट सामर्थ्य धारण करणारा असा हा अनोखा शब्द..आवेग!

या शब्दाचे विविध अर्थ पाहिले तर तो प्रत्येक अर्थ स्वबळावर ‘आवेग’ या शब्दाचा पैस सर्वांगाने व्यक्त करण्यास असमर्थ ठरतोय हे लक्षात येईल.

जोर, जोम,आवेश,झपाटा हे अर्थ आवेगाची सूचक रेखाकृती फारतर रेखाटू शकतील पण त्यात इतर विविध अर्थरंगभरण त्यांना शक्य होत नाही.तिरीमिरी, त्वेष, क्षोभ, प्रक्षोभ, मन:क्षोभ हे अर्थशब्द ‘आवेग’ या शब्दाच्या मुख्यत: करड्या रंगछटाच ठळकपणे व्यक्त करु शकतील. सळ,उबळ,उद्रेक,झटका, हे अर्थ फक्त आवेगामागची असह्यता  सांगू शकतील तर त्वरा, घाई, लहर, लाट, हे अर्थ त्याक्षणीच्या मनोवस्थेतली अधीरता सूचित करतील आणि लोंढा,तीव्रता,धार,तडाखा यासारखे अर्थ वरवर शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारख्या भासणाऱ्या ‘आवेग’ या शब्दातला चटका प्रत्ययास आणून देतील.

या सगळ्याच वरवर भिन्न वाटणाऱ्या अर्थशब्दांत आवेगाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी एकेक परस्परवेगळी रंगछटा लपलेली आहे!

असं जरी असलं तरी या सर्व अर्थशब्दांत एक समान धागाही आहेच.हे सगळे शब्द त्या त्या क्षणीची भावविवशता आणि भावनोत्कटताच व्यक्त करत असतात आणि त्याद्वारे या दोन्हीत लपलेल्या अधीर, उत्सुक, असह्य अशा विविध मनोवस्थाच सूचित करीत असतात.ते सूचन विविध रंगांमधून असलं तरी त्याक्षणीची मनाची अधीर हतबलताच व्यक्त करीत असते!

एका अल्पाक्षरी शब्दाचा हा अर्थपसारा खरोखरच अचंबित करणारा आहे. जोर, जोम, आवेश,द्वेष यातला प्रतिकारासाठीचा ठामपणा, तिरीमिरी,उद्रेक,झटका यातली असहायतेतून निर्माण झालेली अतिरेकी प्रतिक्रिया,क्षोभ,प्रक्षोभ यामधला तीव्र संताप, उमाळा,लाट यामधला मायेचा झरा, लोंढा,तडाखा,झपाटा यातून वेगाने होऊ घातलेला आघात,आणि उग्रता,धार यातली भयभित करणारी संतापाची तीव्रता हा सारा ऐवज सामावून घेणाऱ्या आवेगाचं या सर्व अर्थशब्दांतही लपलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे भावना वेगात उमटणाऱ्या भल्याबुऱ्या, तीव्र, लोभस, उत्कट वा अतिरेकी अशा सर्वच प्रतिक्रियांमागची नेमकी मनोवस्था! त्या अवस्थेतल्या अधीर, उत्सुक, अस्वस्थ मनाला सारासार विचार ओझरता स्पर्शही करु शकत नाही. त्या अवस्थेत भावनांची उत्कटता एवढी पराकोटीची असते की सारासार विचारासाठी आवश्यक असणारं स्वस्थपणच त्याक्षणी  मन हरवून बसलेलं असतं.मनाच्या त्या गारुडअवस्थेत आनंद असो  दु:ख असो वा प्रेम, माया किंवा क्षोभही ते इतकं उत्कट किंवा तीव्र असतं की त्या झपाटलेल्या आवेगात उमटणारी प्रतिक्रिया त्या अंगभूत उत्फुर्ततेनेच व्यक्त होते.ती जाणिवपूर्वक व्यक्त केली जात नाही तर ती नकळत व्यक्त होते! संतापाच्या भरात उचलला गेलेला हात असो, अत्यानंदाने होणारी थरथर न् डोळ्यात दाटणारे अश्रू असोत, किंवा प्रेमाने दिलेलं उत्स्फुर्त आलिंगन असो ते सगळं नकळतच घडत असतं आणि त्या त्यावेळी भावनातिरेकातून नकळत उमटणाऱ्या या सगळ्याच अस्सल नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भावनांमधील आवेगाचीच परिणती असते!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

मी निसर्गचित्रकार म्हणून जगायचे ठरवले होते . निसर्गात सतत फिरायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी निसर्गदृश्ये मनाला भुरळ घालतात ती जलरंगात उतरवत राहायचे हा माझा आवडता छंद आहे .

मी पाचगणीत राहायचो . हे तर महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड. निसर्गाने येथे दोन्ही हाताने भरभरून निसर्गवरदान देलेले गाव .अशिया खंडातील सर्वात मोठे टेबललॅन्डचे पठार , त्या पठारावरून दिसणारी चिखली , पांगारी ,भिलार , तायघाट , भोसे , राजपूरी गावांची व्हॅलींची दृश्ये , स्ट्रॉबेरीची शेती , उंचच उंच सिल्व्हर वृक्षांच्या सान्निध्यातील ब्रिटीशकालीन शाळा व बंगले . हिलस्टेशनची टिपिकल उतरत्या छपरांची घरे , धोम धरणाचे चमकणारे पाणी , कमळगड , नवरानवरीचा डोंगर , महाबळेश्वरच्या सह्याद्री व प्रतापगडाच्या पर्वतांच्या विशाल रांगा , जावळीचे खोरे , वाईचे गणपती मंदीर ,पेशवेकालीन दगडी घाटांचा परिसर व मेणवलीचा घाट चित्रित करताना मी देहभान हरपून जायचो . त्या दृश्यानां कागदावर जलरंगात रेखाटण्याचा माझा छंद इतका विकोपाला गेला होता की माझ्या घरच्यांनी मला पुर्णपणे दुर्लक्षित केले होते.

मी अभिनवला शिकलो व तेथे माझी स्वातीशी मैत्री झाली . नंतर लग्नही झाले पण आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात रमलो नाही . चित्रं काढली तरी ती विकायची कशी याची आम्हाला जाणीव नव्हती . आम्ही तीनचार ठिकाणी स्वतःची आर्ट गॅलरी तयार करून प्रदर्शन आयोजित केले . पण त्यात आम्हाला यश आले नाही. त्यात एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला व नाईलाजाने मला व स्वातीलाही आर्टटिचरची नोकरी करावी लागली . चित्रकारीता पूर्ण बंद करून टाय सूटबूट घालून मी एका ब्रिटीश स्कुलमध्ये स्थिरावलो . या स्कूलमध्ये नाश्ता ,जेवण , राहण्यासाठी बंगला , लाईटबील फ्री व इतर सर्व काही सुविधा होत्या पण पगार खूप कमी होता . सकाळी सात ते रात्री सात पर्यंत बारा तासांची व्यस्त नियोजनबद्ध बांधीलकी होती . फक्त रविवारची एक सुट्टी . चारपाच हजारात सर्व गरजा भागविण्यासाठी संघर्ष करायला  लागायचा. शेवटी कंटाळून आम्ही एकापाठोपाठ या पर्मनंट सुखाच्या नोकऱ्या कायमच्या सोडल्या व चित्रकार म्हणूनच जगायचे या वेड्या ध्येयाने प्रेरीत होऊन नवा प्रवास सुरू केला .

पाचगणी गावाजवळ असलेल्या रुईघर व्हॅलीत गणेशपेठच्या गावाबाहेर आम्ही एक जागा घेतली . या जागेला जायला सत्तर ऐंशी पायऱ्या चढून जायला लागायचे. घर बांधताना गाढवावर वाहून वीट वाळूची वाहतूक करावी लागली . समोर महू धरणाचे विहंगम दृश्य दिसणार होते . भिलार व कासवंड गावाची व्हॅली समोर दिसायची . आम्ही घरबांधणी सुरु केली आणि लवकरच सर्व प्रकारच्या सामानाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणींमूळे घराचे बजेट दुप्पट झाले . लवकरच पैसे संपले . चित्रकलेची साधना करत आता जगायचा नवा प्रयत्न आम्ही सुरु केला होता पण स्थिर पगार नव्हता .महिना संपल्यानंतर घरसामान किराणा वस्तू तर विकत आणायला लागणारच होत्या. त्यात सामान वाहतूक व साफसफाईसाठी सुधाकर कांबळे नावाचा गडी कामाला ठेवला होता . त्याला महिन्याला पगार द्यायचे ठरले होते . जीवन जगणे एक कठिण समस्या होती . पैशांशिवाय जगणे म्हणजे मोठी परीक्षाच समोर आली होती .

कलावंत मंडळी थोडी वेडी असतात , त्यानां व्यवहारज्ञान नसते , जगरहाटीचे सर्वसामान्य जगणे त्यानां माहीत नसते असे सगळेजण म्हणतात ते खरे असावे . व्हॅन गॉग नाही का व सतत चित्र काढत फिरायचा तशीच काहीशी माझी मनाची अवस्था झाली होती . आणि येथे तर दोन व्हॅनगाँग होते .असे रोज कलेसाठी वेडे होऊन जगणे म्हणजे रोज विस्तवावरून चालणे असते . जाणूनबूजून नेहमीची तयार वाट सोडून काट्याकुट्यातून प्रवास करत एका अनोळख्या , नव्या अवघड मार्गाचा तो प्रवास असतो . आम्ही अशा काट्यातून प्रवास करत असताना वास्तवात जीवन जगणे किती कठीण असते याची प्रॅक्टीकल झळ आम्हाला वारंवार बसत होती . पण नोकरी करायची नाही या मतांवर मात्र आम्ही दोघेही ठाम होतो .

आम्ही कलावंत आहोत , आम्ही  चित्रांसाठी जगतो ना? मग चित्रांनी आम्हाला का जगवू नये ? असा ठाम विचार मनात घेऊन आम्हीच निर्माण केलेल्या प्रश्नाला आम्हीच उत्तर देत होतो . ” चित्रांनीच आम्हाला जगवले ” पाहीजे हे नवे जीवनसूत्र डोळ्यासमोर ठेऊन जगत होतो . रोज चित्र काढणे, चित्र रंगवणे, चित्रमय राहणे म्हणजे जगणे. आपले जीवन जगणे म्हणजे चित्रनिर्मितीशी १००% प्रामाणिक राहणे या सुत्रांवर आमचे प्रयत्न सुरू असायचे . आलेला दिवस आम्ही आनंदाने चित्रमय जगत मस्त एन्जॉय करत होतो.

विहीरीत पाण्याचा साठा असला तरी विहिरीच्या तळाशी सतत जिवंत निर्झर वाहणारे झरे असावे लागतात तरच विहीर सतत पाण्याने भरत असते . तसे रोजचे जगण्यासाठी पुरेसा पैशांचा साठा असला तरी सतत नवीन पैशांचा पुरवठा करणारी यंत्रणा लागतेच . अन्यथा जवळ असलेला साठा एक ना एक दिवस कधीतरी संपतोच आणि ती वेळ आमच्यावर लवकरच आली . त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा .

महाबळेश्वर हे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गिरिस्थान आहे . त्याच्या शेजारी असलेलया पाचगणीतही कधीकधी प्रचंड पाऊस पडतो . त्यात आम्ही डोगरांच्या व्हॅली फेसिंगला राहत होतो . पावसाळ्यात कडाक्याची थंडी , धुके व पावसाचा तडाखा कायम लक्षात राहील असा असतो , कारण आमच्या घरावर पत्रा बसवला होता . या पत्र्यावर पावसाचा जोर वाढला की दणादण पावसाच्या गारांचा , पाण्याचा वर्षाव व्हायचा . पडणाऱ्या गारा दगडासारख्या टणाटण पत्र्यावर आपटायच्या . निसर्गाचे हे रौद्र रूप आम्हाला त्यावेळी विलोभनीय वाटायचे . पावसाळ्यात पर्यटकांची संख्या खूपच कमी व्हायची . शाळा  जून महिन्यांमध्ये नियमित  सुरु झाल्यामुळे पालकवर्गही यायचा नाही . त्यामुळे चित्र विकत जाण्याची अजिबात शक्यता नसायची . अशा वेळी शांतपणे बसून चित्रनिर्मिती करणे एवढेच हातात असायचे . पण महिन्याच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कसे कमवायचे ? याची चिंता नेहमीच असायची . असाच चिंतामग्न अवस्थेत असताना तो दिवस उजाडला. जो भावलेला व कायम मनात घर करून राहिला आहे .

त्यादिवशी भयानक गारांचा पाऊस कोसळत होता. गारांमुळे पत्र्यावर दगडांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते . सगळीकडे धुक्याचे इतके दाट पदर पसरले होते की पाचसहा फुटांवरचेही ढगाळ वातावरणामूळे  काहीही दिसत नव्हते . दिवसभर पाऊस ,पाऊस आणि नुसता  पाऊस . पावसामुळे हवेत गारठा वाढलेला होता . त्यात लाईट गेल्यानंतर तर नुसते बसून राहणे एवढेच हातात होते . मुख्य रस्त्यालगत मोठे लोखंडी गेट बसवले होते त्यानंतर सत्तर पायऱ्या चढून रात्रीच्या वेळी कोणी येण्याची शक्यता नव्हतीच . बंगल्यासमोर दुसरे गेट कुलूपबंद करून आम्ही दोघे निवांत बसून राहिलो होतो . बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता व मनात पैशांची, रोजच्या जगण्याची  चिंता खूपच भेडसावत होती त्यामुळे थोडासा अंधारही भयानक काळोखासारखाच भासत होता .

रात्रीचे सातआठ वाजले असावेत . रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती . स्वाती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली होती . हॉलमध्ये मी निराश मनाने बसून राहिलो होतो आणि अचानक खालच्या पायऱ्याशेजारचे गेट कोणीतरी उघडल्याचा आवाज आला . मी खाली डोकावले तर डोक्यावर हुडी असलेले जॅकेट घालून कोणीतरी अज्ञात तरुण व्यक्ती हळूहळू पायऱ्या चढून येत होती . पायऱ्या चढून आल्यावर  मोठे बंगल्याचे गेट कुलूपबंद असल्याने मी घाबरलो नाही . त्या अनोळखी हुडीवाल्या तरुणाने दरवाजात उभा राहून मला हाक मारली . 

मिस्टर काळे , प्लीज ओपन दी गेट ! 

आय वाँट टू बाय युवर पेटींग्ज . 

मी तर चकीत झालो . एवढया मोठया दाट धुक्याच्या पावसात  चिंब भिजलेली कपडे घालून सत्तर पायऱ्यांचा  हा डोंगर चढून कोण अनोळखी  इसम माझ्या दारात चित्र विकत घेण्यासाठी आला असावा ? कदाचित क्षणभर मीच स्वप्नात आहे की काय ? किंवा मनात जास्त प्रमाणात विचार करून मलाच काही  भास होतोय आहे की काय? असेही मला वाटू लागले .

माय नेम इज अर्शद सईद . 

आय एम स्टेईंग अब्रॉड. 

बट आय स्टडीड इन न्यू इरा स्कूल . 

आता हा पाचगणीतील एका शाळेचा माजी विद्यार्थी , ज्याची माझी कधीही भेट झाली नव्हती , अशा अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे येऊन चित्र विकत घेण्याची इच्छा प्रकट करावी आणि तीदेखील अशा प्रचंड पावसात पूर्णपणे भिजत . मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले . आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले .

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रत्येकाचा कृष्ण… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रत्येकाचा कृष्ण ☆ श्री सुनील देशपांडे

कृष्णचरित्राचा अभ्यास केल्यास, अभ्यास म्हणण्यापेक्षा चिंतन केल्यास, काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट कृष्णजन्माची…

कृष्णजन्म तुरुंगात झाला. माणसाला जन्मापासून अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मग तो कितीही संपन्न  किंवा राजघराण्यातील का असेना. जन्माआधीपासूनच मृत्यू  मागे लागलेला.  वातावरण भयभीत. अशा परिस्थितीमध्ये प्रासादातले सुख सोडून एका गुराख्याच्या घरी बालपण.  या ठिकाणी संपूर्ण उच्चनीचतेच्या आणि जातीयवादाच्या कल्पना मुळातच उखडून काढूनच श्रीकृष्णाचे बालपण पार पडत असतं. 

श्रीकृष्ण हा त्या त्या वयातील आणि विशेषतः बालवयातील घटनांमधून जास्त वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रकट झालेला जाणवतो. बालवयात संस्कार किती गरजेचे असतात आणि सुसंस्कारामुळे माणूस कसा घडत जातो याचा परिपाठच श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये आणि त्याच्या कुमारवयापर्यंतच्या चरित्रामध्ये आढळतो. श्रीकृष्ण चरित्र हे इतकं अद्भुत रसायन आहे की कळत्या न कळत्या वयातील बालकांपासून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, मनाला भावणारे आणि सर्वस्पर्शी असे हे चरित्र आढळून येते. म्हणूनच तर श्रीकृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुषोत्तम म्हणून केला जात असावा.  श्रीकृष्ण चरित्र ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, त्यामध्ये महर्षी व्यासांची प्रतिभा त्या व्यक्तिमत्त्वाच्या घडवणुकीत  प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीवर संचार करत असलेली आढळून येते. बाललीला, खोडकरपणा, खेळकरपणा  या सर्व बालपणीच्या नैसर्गिक भावनांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच हे व्यक्तिमत्व बालपणापासूनच आपले लाडके व्यक्तिमत्व होऊन जाते. 

एकदा एका निम्न प्राथमिक शाळेमध्ये साधारण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या एक दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.  त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं.  आता या मुलांना कृष्णाबद्दल काय सांगणार ? परंतु त्यांच्या दहीहंडीचा खेळ चालू असतानाच मला काही ओळी सुचल्या. त्या ओळींच्यावर त्या मुलांनी खूपच सुंदर नाच केला. त्या ओळी त्या मुलांना खूप आवडल्या त्या ओळी अशा होत्या,

खांद्यावरती  उभे राहूया उड्या मारुया कोणी.

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

पुढे पुढारी, 

कृष्ण मुरारी,

मागे सारी,

सेना न्यारी,

नाचू कोणी, गाऊ कोणी, 

उड्या मारूया कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

सुदाम आला, 

गोपी आला, 

गोटु आला, 

मोटू आला, 

उंच कुणी वा बुट्या कोणी, 

सारे खाऊ लोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी……  

उंच मनोरे, 

करती पोरे, 

वारे वारे, 

म्हणती सारे,

दमते कोणी, 

घसरे कोणी, 

मटकी फोड़े कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

करूया कल्ला,

हल्ला गुल्ला, 

चविष्ट काला, 

मट मट खाल्ला, 

यम्मी यम्मी म्हणते कोणी 

भरे तोबरा कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

हे गाणे त्या मुलांना इतके आवडले की त्याच गाण्यावर नाचत नाचत मुले घरी गेली. 

कसलं भाषण ? कसले प्रमुख पाहुणे ? 

लहान मुलांचा कृष्ण हा सगळ्यात आवडता देव (खरं म्हणजे देव हे आई वडील म्हणतात म्हणून त्याला देव म्हणतात) परंतु मुलांना तो देव न वाटता स्वतःचा सवंगडीच वाटतो.  म्हणूनच लहानपणापासून कृष्णचरित्राचे झालेले संस्कार हे लहान वयात व्यक्तिमत्त्व घडवण्याचे संस्कार आहेत. 

कुमार वयातील खोडकर पणा, तारुण्यातील शृंगारिकता. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन घेतलेले शिक्षण, त्या शिक्षणामध्ये सुद्धा गरीब श्रीमंतीचा भेद न करता जुळलेले मैत्रीबंध. गुरूंच्या घरी सगळ्या प्रकारची कामे करणे, गुरुप्रती आदर बाळगणे या सगळ्या घटनांवरून श्रीकृष्णाला खरे म्हणजे व्यासांनी कुठेही देवत्व बहाल केलेले नाही. श्रीकृष्णाचे देवत्व हे चरित्र ऐकणार्‍यांनी वाचणाऱ्यांनी त्याच्या विविध गुण प्रभावामुळे त्याला बहाल केलेलं आहे. 

लहानपणी त्याच्या चरित्रात त्याच्या बालपणातील चमत्कारांचे प्रसंग हे, कीर्तनकार कथेकरी आणि त्याच्या चरित्राचे गुणगान करणाऱ्या त्याच्या भक्तांनी नंतर श्रीकृष्णाच्या चरित्राला जोडलेले आहेत, असे मला वाटते. श्रीकृष्ण राजघराण्यात जन्मला, गुराख्याच्या घरात वाढला, गुरुगृही शिकला, सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातील व्यक्तींशी मैत्री केली. तो योद्धा होता पण अजिंक्य नव्हता. त्याचाही पराभव करणारा होताच. त्यालाही त्याच्या राज्यातून पळवून लावणारा भेटला. प्रजेसकट पळत पळत द्वारकेपर्यंत जाऊन तेथे आपल्या राज्याचे पुनर्वसन करावे लागले. ही खरं म्हणजे नामुष्कीची गोष्ट. परंतु या सर्वाचं जे काही विवेचन व्यासांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे. अर्थात या पराभवाचा बदला योग्य त्या व्यक्तीकडून त्याने घेतला हे अर्थातच ओघाने आलेच. अन्यायाच्या विरोधात लढणारा न्यायनिष्ठ पण न्यायनिष्ठूर नव्हे, तर समन्वयाने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा. शांती प्रेमी पण वेळप्रसंगी शांतीचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात कोणत्याही थरापर्यंत जाण्याचा सल्ला देणारा.  उत्कृष्ट राजकारणी आणि तत्त्ववेत्ता.

माझ्यासारख्या सामान्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास ही दूरचीच गोष्ट आहे.  पण किमान त्याच्या चरित्राचं चिंतन ही सुद्धा एका जन्मामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकणारी गोष्ट नव्हे.  त्यामुळे कृष्णचरित्राचा अभ्यास नव्हे पण कृष्ण चिंतन हा माझ्या विरंगुळ्याचा विषय आहे. मी कृष्णभक्त नव्हे, देव म्हणून मी त्याची पूजा करणार नाही. पण जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत व्यक्ती चरित्र म्हणून ते व्यक्तिमत्व मनावर प्रभाव पाडून जातं.   त्या चरित्राचे चिंतन हा प्रसन्नतेचा आणि मानसिक ऊर्जा वर्धनाचा भाग म्हणून मी त्या चिंतनात रमतो. 

वरील सर्व विवेचनात एक गोष्ट माझ्याही खूप उशिरा लक्षात आली. तुमच्याही लक्षात आली की नाही माहित नाही. परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा, मी  संपूर्ण लेखामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही खटकत नाही…..  यालाच तर अद्वैत म्हणत नसतील ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके 

अंक शिकवले जाताना ते एक ते दहा असेच शिकवले जातात. पण शून्य स्वतंत्र नाही शिकवला जात. शून्य असतेच….अध्याहृत ! त्याच्या पुढची पायरी म्हणजे दहाच्या पटीत शंभर पर्यंत. मानवी जीवनाचं सूत्रच जणू ही मोजदाद. आयुष्यमर्यादा शंभर आणि जन्माच्या एकातून आरंभ झालेला प्रवास शून्य नावाच्या अंतिमात विलीन होणं सुद्धा तेव्हढंच नैसर्गिक ! शून्याचा शोध तर जगाला भारताचीच देणगी. कुठलीही स्पर्धा, शर्यत सुरू करताना एक—दोन—तीन म्हटलं जातं. हा छोटासा प्रवास स्पर्धकांना भला भासतो. 

एरव्ही साध्या व्यवहारात एक तर दहा ते शून्य अशी गणती केली जात नाही. पण अवकाश मोहिमांमध्ये दहापासून मागे मागे सरणारा प्रवास शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागतो…हे भारताने चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या वेळी अनुभवले ! या आणि अशा अनेक मोहिमांच्या वेळी हे शून्य प्रत्यक्षात जगलेली एक महिला तीन सप्टेंबरला शून्यात विलीन झाली. एन. वल्लरमथी हे त्यांचं नाव. ‘ दिवसेंदिवस विकसित होत जाणारा, मोठा मोठा होत जाणारा चंद्र ‘ हा वल्लरमथी या नावाचा अर्थ….यापेक्षा आणखी कोणता योगायोग असू शकतो चांद्रमोहिमेत काऊंटडाऊन करणा-या व्यक्तीच्या बाबतीत? 

तमिळनाडूमधल्या अरियालूर मध्ये एक जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या वल्लरमथी यांनी माध्यमिक शिक्षण तमील भाषेत घेतले होते ! अंगभूत हुशारीच्या जोरावर त्यांनी इंजिनियरींग आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन मध्ये उच्च पदवी संपादन केली. एकोणीसशे चौ-याऐंशी साली वल्लरमथी इस्रो मध्ये आल्या. 

Insat 2A, IRS IC, IRS ID, and TES सारख्या अतिशय महत्त्वाकांक्षी अवकाश योजनांमध्ये त्या सहभागी होत्या. २०१२ मध्ये भारताने रडार इमेजिंग सॅटेलाईट -१ अर्थात ‘ रिसॅट ‘ हा भारताने स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केलेला उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या वल्लरमथी ! या कामाच्या शेवटच्या वर्षात वल्लरमथी दिवसातील फक्त पाच तास स्वत:साठी ठेवत. बाकी संपूर्ण वेळ प्रकल्पासाठी !  या कामगिरीबद्द्ल त्यांना दोन हजार पंधरा मध्ये ‘ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कारा ‘ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यासाठी वल्लरमथींना निवडण्यात येणे हे त्यांच्यासाठी आणि इस्रोमधील महिला शास्त्रज्ञांसाठी अभिमानाचे होते. 

अवकाशात प्रक्षेपक सोडण्यापूर्वीची वीस मिनिटे अतिशय महत्त्वाची आणि नाजूक असतात. इतक्या दिवसांची अथक मेहनत याच वीस मिनिटांमध्ये यशस्वी किंवा दुर्दैवाने अयशस्वी होणार असते. परंतू यातील शेवटची दहा-अकरा सेकंड्स खूपच तणावपूर्ण असतात. हाच तो काल….ज्यामध्ये जे काही शिल्लक राहिलं आहे ते सांगून मोहिम थांबवता येते..अन्यथा एकदा का शून्य झाले की आपल्या हातात काहीही नाही रहात ! हा काऊंटडाऊन उच्चारणारी व्यक्ती अतिशय प्रशिक्षित आणि बुद्धीमान असावी लागते. एरव्ही उलट आकडे उच्चारणे तसे सोपे काम असू शकते. पण एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मोहिमांमध्ये जराशीही चूक होऊन चालत नाही. आणि त्यात सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेत तर मानसिक तणाव किती मोठा असेल, याची कल्पना करवत नाही. हे आपण सर्वांनी चांद्रमोहिमेत अनुभवले असेलच. असो. माझ्यासारख्या किंवा आपणांपैकी ब-याच जणांना यातील तांत्रिक बारकावे माहित असण्याची शक्यता कमीच आहे. पण काऊंटडाऊन म्हणजे आय.पी.एल. सामन्यातील सामूहिक किंवा एखादा पूल सुरूंग लावून पाडण्याच्यावेळी केलेले काऊंटडाऊन..केवळ आकडे उच्चारणे नव्हे, हे मात्र समजते. 

चांद्रयान-३ मोहिमेवेळी हे काऊंटडाऊन करणा-या एक महिला होत्या, त्या ज्येष्ठ,अनुभवी अंतराळ शास्त्रज्ञ होत्या हे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जास्त समजले. आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा माणसाला कर्तव्यासाठी तहानभूक विसरायला लावते. वल्लरमथी यांना मोहिम यशस्वी झाल्यानंतर आणि आपले सूर्ययान आदित्य यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाल्यानंतर आपल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान निश्चितच झालेले असणार. यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी परलोकीची यात्रा आरंभ करावी, हा योगयोगच म्हणावा लागेल. ‘ एन.वल्लरमथी…आपला प्रवास निर्विघ्न पार पडो…तुम्हाला असलेलं अवकाशाचं वेड आता कदाचित तुम्हाला त्या विशाल,अनंत,अनाकलनीय अवकाशाची खरीखुरी सफर घडवत असेल. तुमच्या जाण्याचं काऊंटडाऊन खुद्द काळानेच म्हटलं असावं, असं वाटल्यावाचून राहवत नाही. 

… मॅडम  तुमच्या आत्म्यास सदगती मिळो, ही समस्त भारतीयांच्या वतीने अवकाशाच्या आणि सकल सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना. आपल्या भविष्यातल्या काऊंटडाऊनसाठी तुम्ही हव्या होतात..तुमच्या आवाजात आम्हांला दहा ते शून्य अंक नव्याने शिकल्यासारखं वाटलं !    

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares