मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

उन्हाळा सुरु झाला की मला काही मंडळी आवर्जून आठवतात. त्यांना जणू सूर्य म्हणजे आपला शत्रू वाटतो. आणि कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी ही मंडळी काय हा सूर्य,किती ते उन अशी सतत तक्रार करत असतात. याला बऱ्याच प्रमाणात मीडिया पण जबाबदार आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिराती मनावर फार परिणाम करतात.

त्या विरुद्ध काही मंडळी सूर्योपासना करतात. त्या विषयी फार आदर वाटतो.

उन्हाळा सुरु झाला की, आपण सहज म्हणतो, ‘ काय हा उन्हाळा. केव्हा संपणार? ‘ पण हा सूर्य तळपलाच नाही तर पुढे पावसाळा कसा येणार? आणि धनधान्य कसे पिकणार? आणि हा सूर्य प्रकाश सगळ्याच जीवसृष्टी साठी आवश्यक असतो. कित्येक कामे सूर्यावर अवलंबून असतात. आपली दिनचर्या जरी घड्याळावर अवलंबून असेल तरी इतर सृष्टी साठी मात्र सूर्य आवश्यक असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्य आवश्यक आहे. त्याच्या शिवाय आपण दिवसाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला आवश्यक आणि महत्वाचे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्य प्रकाशात सहज व मोफत मिळते. पृथ्वीवर ज्या भागात काही महिने सूर्य उगवत नाही त्यांना सूर्याचे दर्शन,त्याची उब खूप महत्वाची वाटते.

सूर्याचे अनन्य साधारण महत्व आहे आणि ते सर्वांना माहिती आहे.  ज्या वेळी सूर्य जास्त प्रखर असेल त्यावेळी आपण आपले विविध उपयांनी संरक्षण करु शकतो. त्या साठी सूर्याला नावे ठेवणे योग्य नाही. आपण मोठी माणसे जसे वागतो,बोलतो त्याचेच अनुकरण लहान मुले करतात. आपण जर त्यांना सूर्याचे महत्व सांगितले तर त्यांना आपण चांगली दृष्टी, चांगले विचार देऊ शकतो. आपण ज्या निसर्ग देवता मानतो त्यांचे पूजन करतो त्यात सूर्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. म्हणून  सूर्याची कधीही निंदा करू नये.

हे व्रत म्हणून आपण नक्कीच आचरणात आणू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

मृणाल

मृणाल म्हणजे माझी आतेबहीण. माझ्यात आणि तिच्यात  फार फार तर एखाद्या वर्षाचं अंतर असेल म्हणजे आम्ही तशा बरोबरीच्याच. एकत्रच वाढलो,  एकत्र खेळलो,  बागडलो, मोठ्या झालो आणि आयुष्याला जशी वळणं  मिळत गेली तसं तसे आपापल्या विश्वात रमलो.

पण आज मागे वळून बघताना, मृणाल एक व्यक्ती म्हणून तिचा विचार करताना माझ्या मनात अनेकविध अनेक रंगी भावना जागृत होतात.  कळत नकळत आपण या व्यक्तीमधल्या कोणत्या आदर्श मूल्यांकडे आकर्षित होत गेलो किंवा आजही आकर्षित होतो याचा विचार माझ्या मनात येतो आणि एकाच वयाच्या जरी असलो तरी त्या त्या वयातल्या वैयक्तिक गुणांचे मापन करताना मृणाल माझ्यापेक्षा अनेक बाबतीत सरस्, सर्वश्रेष्ठ होती—आहे  आणि तिच्या या श्रेष्ठत्वाचा पगडा अथवा सरसतेचं  प्रभुत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच होतं असं वाटतं. 

गोष्टी अगदी किरकोळही असतील. म्हणजे ज्या वयात मला साधी कणिक भिजवता येत नव्हती त्या वयात मृणाल अगदी सफाईदारपणे सुंदर मऊ गोलाकार पोळ्या करत असे.  कुमुद आत्या कधी आजारी असली तर क्षणात ती साऱ्या घर कामाची जबाबदारी लीलया उचलत असे.  अगदी तिच्या आईप्रमाणे घरातलं स्वयंपाक पाणी व इतर सारी कामे, शिवाय आईच्या औषधपाण्याचं वेळापत्रक सांभाळून, सर्व काही आवरून शाळेत वेळेवर पोहोचायची.  शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती होती. एकही दिवस गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा झाली नसेल.  सुंदर हस्ताक्षरातल्या तिच्या वह्यांची आठवण आजही माझ्या मनात आहे.  शिवाय ती नुसतीच अभ्यासू किंवा पुस्तकी किडाही नव्हती.  लहान वयातही तिचं वाचन दांडगं होतं.  तिला कोणतंही पुस्तक द्या ते ती एका बैठकीत वाचून काढायची. वाचनाचा वेग आणि आकलन या दोन्हीचा समतोल ती कसा काय साधायची याचं मला आजही नवल वाटतं.  जे पुस्तक वाचायला मला एक दोन दिवस तरी लागायचे ते ती काही तासातच कशी काय संपवू शकते याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं आणि अशा अनेक कारणांमुळे असेल पण ही समवयस्क  आतेबहीण  मनातल्या मनात माझी गुरुच बनायची.  नकळत मी ही माझ्या मनाला सांगून पहायची,” मृणाल सारखं आपल्यालाही हे आलं पाहिजे…जमलं पाहिजे.”

एक मात्र होतं तिचं लहानपण आणि माझं बालपण -काळ एकच असला तरी आमच्या भोवतालचं वातावरण वेगळं होतं. मृणाल भावंडात मोठी होती म्हणून तिला जन्मत:च मोठेपण लाभलेलं होतं. आई-वडिलांची, भावंडांची ती अतिशय लाडकी होती हे नि:संशय.  तिचे पप्पा ज्यांना आम्ही “बाळासाहेब” म्हणत असू- ते  एक चतुरस्त्र  व्यक्तीमत्त्व नक्कीच होतं. शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार होतं. शिक्षण याचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तकीय किंवा केवळ जगण्यासाठी उपयुक्त साधन एवढंच नव्हे तर ते कसं चौफेर आणि अवधानयुक्त असावं याबद्दल ते खूप आग्रही होते.  आपल्या तिन्ही मुलांनी नेहमीच उच्च स्थानावर असायला हवं म्हणून ते जागरूकही होते.  त्याबाबतीत ते काहीसे कडक  आणि शिस्तप्रिय मात्र होते.  काहीसं छडी लागे छम छम विद्या येई घमघम  या काव्यपंक्तीचा लाक्षणिक अर्थ त्यांच्या कृतीत जाणवायचा. त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा.   आदराबरोबर भीती वाटायची आणि मला असंही तेव्हा वाटायचं की मृणालभोवती एक धाक आहे,  काहीसं दडपण आहे.  ज्या मुक्त वातावरणात मी वाढत होते त्यापेक्षा मृणालभोवतीचं वातावरण नक्कीच वेगळं होतं. बाळासाहेबांची आणि माझ्या वडिलांची वैचारिक बैठक,  दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील भव्यता जरी समान असली तरी कुठेतरी विचारांच्या प्रतिपादनात नक्कीच साम्य नव्हतं आणि याच फरकाचा परिणाम आमच्या जडणघडणीत होत असावा पण असे जरी असले तरी माझ्या आणि मृणालच्या अनेक आघाडीवरच्या प्रगतीत महत्  अंतर होतं.  हे अंतर पार करण्याची जिद्द माझ्यात नव्हती  पण मी विलक्षण प्रभावित मात्र व्हायची. 

सुट्टीत आम्ही नेहमी एकत्र खेळायचो. विशेषतः आमचे  बैठे खेळ खूपच रंगायचे. त्यातले ठळक खेळ  म्हणजे कॅरम,  पत्ते आणि बुद्धीबळ.  कॅरम आणि पत्ते खेळताना  माझ्या मनात नेहमीच छुपा विचार असायचा की, “मृणालच आपली पार्टनर असावी.  तिच्या विरोधात नको बाई खेळायला.” कारण त्यातही ती अग्रेसरच होती पण त्यात मला जाणवायचा तो तिचा समजूतदारपणा.  खेळताना “कुठे चुकले” हे मात्र ती सांगायची  पण ते सांगताना तिचा सूर अगदी विलंबित लईत असायचा.

तिच्यात आणि माझ्यात खेळताना एक फरक जाणवायचा तो म्हणजे मला खेळायला खूप आवडायचे,  माझी वृत्ती खेळकर होती पण “खेळाडू” हा किताब मला मिळू शकला नाही.  याउलट मृणाल मैदानी खेळात, बैठ्या खेळात,  बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या खेळातही प्रवीण  होती. आमच्या शाळेच्या टीमची तर ती कॅप्टनच होती. अंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात तिची उल्लेखनीय कामगिरी होती आणि खेळातलं हे प्राविण्य तिने महाविद्यालयीन स्तरावरही  गाजवलं.  तिला मिळणाऱ्या ट्रॉफीज  पाहून त्या बालवयात, उमलत्या वयात तिच्याविषयी वाटणाऱ्या कौतुकानेच नव्हे तर “मी का नाही तिच्यासारखी होऊ शकत?” या वैष्यम्यानेसुद्धा  मी भारावून जायचे. 

खरं म्हणजे आमच्या परिवारामध्ये वेगवेगळी गुणसंपदा तशी प्रत्येकात होती पण मृणाल मला नेहमीच सर्वगुणसंपन्न वाटायची.  दिवाळीत  तिने काढलेल्या मोठमोठ्या सुबक रांगोळ्या, तिचे भरत काम,  तिचे शिवणकाम,  तिने बनवलेला फराळ या सगळ्यातला तिचा जो उत्कृष्टपणा असायचा त्याने मात्र मी थक्क व्हायचे.  केवळ तिच्या गुणांची यादी देणे हा मात्र माझा या लेखनाविषयीचा उद्देश नक्कीच नाही.

तिच्या आयुष्याचा आलेख मांडताना म्हणजे अगदी शाळेत सतत पहिला नंबर मिळवणाऱ्या शाळकरी मुलीपासून ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या गव्हर्नमेंट कॉलेजच्या  डीन पदी पोहोचणारी,  पीएचडीचे अनेक विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थीप्रिय  एक बुद्धिमान स्त्री म्हणून तिच्याकडे  पाहताना टप्प्याटप्प्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.  अनेकविध गुणांची शिदोरी बांधून देताना त्या अज्ञात परमेश्वराने तिच्या भविष्यातल्या नियतीविषयीचा विचार आणि तरतूद करून ठेवली  होती का?

कुमुदआत्या  गेली तेव्हा मला वाटते मृणाल कॉलेजच्या पदवी क्रमाच्या शेवटच्या वर्षाला असेल.  विनू, अनिल (तिचे  धाकटे भाऊ) तर लहानच होते. खरं म्हणजे अर्धवट वयात ज्यांचं मातृत्व हरवतंं  तेव्हा  त्यांचं  बिथरलेपण काय असू शकतं याची मी नक्कीच साक्षीदार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त एका क्षणात  प्रौढत्वात विरघळणारी  बाल्याची रेषा मला अधिक कंपित करून गेली.  क्षणात तिने डोळ्यातले अश्रू पुसले होते आणि लहान भावांचे भविष्य आणि वडिलांचं पोरकेपण,  एकाकीपण अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने स्वतःच्या झोळीत पेललं.  एका क्षणात तिने एक वेगळं मातृत्वच  स्वीकारलं जणू आणि आनंदाने नसलं तरी  विनातक्रार तिनं  ते सांभाळलं.  सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय,  साधुत्व म्हणजे काय,  संतपण  कशाला म्हणायचं याविषयीचे अदृश्य सूक्ष्म सूत्र मला मृणालच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच शोधता आलं.

कुमुदआत्या गेल्यानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे खरोखरच एक यज्ञ होता,  एक तपस्या होती.  जगण्याची तिची भूमिकाच पार बदलून गेली होती. भावंडांना आईची उणीव तिने कधीच भासू दिली नाही आणि पहाडासारख्या  शिस्तप्रिय, कडक व्यक्तिमत्त्वांच्या वडिलांसाठीही ती सावली बनून राहिली. स्वतःच्या साऱ्या कायिक, ऐहिक सुखाच्या तिनं जणू काही समिधा केल्या पण आईविना जगताना परिवारातला आनंद टिकवण्यासाठी ती धडपडत राहिली.  विनू  आणि अनिल मार्गी लागल्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ती चाळीशीत पोहचली होती.  अर्थात  तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर,  करिअरचे उच्चतम टप्पे पार केलेलेच होते. अपार जिद्दीने आणि चिकाटीने शिष्यवृत्ती मिळवल्या, परदेशी सेमिनार गाजवले. विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले.  शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गरजेचा घटक म्हणजे गुणांकनातला प्रामाणिपणा. तिने तो कायम जपला. स्पर्धात्मक परीक्षेसाठीच्या परीक्षकांच्या पॅनलवर असताना तिला करोडपती बनण्याची अनेक प्रलोभने दाखवली गेली पण तिने ती अत्यंत तात्विकपणे झुगारून लावली आणि त्यासाठी तिला ते पदही सोडावे लागले पण त्यामुळे ती यत्किंचितही  विचलित झाली नाही. 

खरं सांगू जेव्हा मी आणि मीच नव्हे तर तिच्या आजूबाजूचे सारे समवयस्क एका ठराविक चाकोरीतलं सुखी आयुष्य जगत होते तेव्हा मृणाल मात्र जीवनातली अडथळ्यांची शर्यत अथकपणे नेटाने खेळत होती. सर्वगुणसंपन्नतेची  शिदोरी तिला कोणा अज्ञात शक्तीने बांधून दिली होती त्या बळावर ती खंबीरपणे स्वाभिमानाने तिचं जीवन जगत होती.

अनेकवेळा मला ती काहीशी घट्ट विचारांची वाटते. तिच्यात एक क्रिटीक आहे असंही जाणवतं. ती पटकन् किंवा उगीचच समोरच्याला बरं वाटावं म्हणून कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही.हा गुण समजायचा की तिच्या व्यक्तीमत्त्वातला अभाव मानायचा हे मला माहीत नाही. पण ती एक आवडती प्राध्यापिका, प्राचार्य होती. तिने अनेकांना घडवलं याचा अर्थ तिने कुणाही गुणवंताचं मानसिक खच्चीकरण न करता किंवा अवास्तव कौतुकही न करता त्याचा यशाचा मार्ग त्याला दाखवून दिला हे सत्य आहे. शिक्षक कसा असावा याचा ती वस्तुपाठच आहे.

एका अपघातात तिला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालं तरी पण कधी असहाय्यतेचं अथवा अधूपणाचं भांडवल करून जगणं तिने मान्य केलं नाही. अशाही परिस्थितीत आजही  कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी,  सामाजिक वा  इतर अनेक ठिकाणी तिची मनापासून उपस्थिती असते. 

इतक्या मोठ्या पदावर विराजमान असतानाही निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनासाठी केवळ सामाजिक करंटेपणाशी,  संकुचित जळाऊ वृत्तीशी तिला विनाकारण लढा द्यावा लागला होता.  स्वतःच्या शारीरिक व्याधींचाही बाऊ न करता केवळ “भागधेय” असं समजून ती कणखरपणे लढत राहिली.  ती शरण कधीच गेली नाही.

आजही आजारी नवऱ्याची मनापासून सेवा करताना तिचा तोल ती कधीही  ढळू देत नाही.  आम्हीच तिच्यावरच्या प्रेमामुळे तिला काहीबाही सूचना देत असतो पण ती एकच सांगते,” ठीक चाललंय्  माझं.  करू शकते मी.  इतका काही त्रास नाहीये.”

अमेरिकेवरून येणाऱ्या धाकट्या भावासाठी आजही त्याच वात्सल्याने ती त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवते.  माझ्या मनात नेहमी येतं इतक्या गुणसंपन्न बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य कसं असायला हवं होतं..? निवांत आरामदायी…  असं नक्कीच नाही जे आज तिचं आहे.  जगत असताना कदाचित तिच्या हातून फार मोठ्या भावानिक  चुका झाल्या का? कुठेतरी व्यवहारात ती कमी पडली का? की तिच्या आयुष्यातल्या सुखाच्या वेळाच चुकल्या?

ती मला एकदा म्हणाली होती, “ सुख म्हणजे  नक्की  काय असतं ते मला माहीत नाही पण मी माझ्या दुःखाला, वेदनांना शंभर टक्के देऊन  त्यांना मात्र माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे.”  अशावेळी मला तिच्या स्त्रीत्वात एक कणखर पौरुष दिसतं. 

पुन्हा पुन्हा मी मृणालचा विचार करते तेव्हा मला वाटतं मृणालसारख्या व्यक्ती इतरांनाच उदाहरणादाखल असतात, आधारभूत असतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती कधी निराधार नसतातच.  त्यांच्या अंतरातलं बळ हाच त्यांचा आधार असतो.  बाह्य जगाच्या आधाराची त्यांना गरज नसते का? एक मात्र नक्की की स्थितप्रज्ञतेचे प्रवाह  मला तिच्या जगण्यात नेहमी जाणवतात.  खिंड लढवणाऱ्या योध्याचे दर्शन  मला तिच्यात होते.  मी असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती आहे किंवा अवास्तव केलेलं ग्लोरीफिकेशन आहे असं मला या क्षणीही अजिबात वाटत नाही. 

मृणाल या शब्दाचाही मला खरा अर्थ तिच्यात सापडतो… ..  कमळाचा देठ .. ..  तो कुठे दिसतो का?   चिखलात  घट्ट रुतलेला असतो.  आपल्याला दिसतात ती फक्त पाण्यावरची गोजिरवाणी सुरेख उमललेली कमळं… … मृणालही अशीच आहे.  जीवनरूपी दलदलीत  पाय घट्ट रोवून रुतलेली. चेहऱ्यावर मात्र सदैव हास्याचं कमळ फुललेलं. 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

साक्षात शंकर महादेवाची पत्नी गणपती आणि कार्तिकेयाची माता असलेल्या पार्वतीला सुद्धा कधीतरी खूप एकाकी वाटे. भगवान शंकर ध्यानात मग्न आणि पुत्र आपापल्या उद्योगात. त्यामुळे तिला वाटले आपल्याला समजून घेणारी आपल्या भावनांची कदर करणारी अशी एक कन्या आपल्याला हवी. एकदा भगवान शंकर तिला इंद्राची राजधानी अमरावती येथे घेऊन गेले. तेथे सुंदर वृक्षवल्ली पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तेथे कल्पवृक्ष पाहून तिला खूप आनंद झाला .  तिने आपल्याला एक मुलगी हवी अशी इच्छा बोलून दाखवली. कल्पवृक्षाने तिला एक सुंदर बालिका दिली. पार्वती खुश झाली. तिने तिचे नाव ठेवले अशोक सुंदरी. दुःख दूर करणारी एक सुंदर स्त्री म्हणजे अशोकसुंदरी. अशोकसुंदरी हळूहळू मोठी झाली. तारुण्याने मुसमुसली .तेव्हा पार्वतीने तिच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. चंद्रकुलात उत्पन्न झालेला राजपुत्र नहुुश हा आपला जावई व्हावा असे तिला वाटले. तिने अशोक सुंदरीला सांगताच तिला सुद्धा ते पटले .एक दिवस हुंड राक्षसाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिला लग्नाविषयी विचारले. तिने नकार देताच त्याने तिचे कपटाने अपहरण केले. अशोक सुंदरीने त्याला शाप दिला, मी साक्षात पार्वती देवीची कन्या आहे .तुझा मृत्यू नहुशाच्या हातून घडेल असा मी तुला शाप देते. मग  ती तिथून निसटली. व कैलास पर्वतावर पार्वतीकडे गेली. इकडे घाबरलेल्या हुंडा राक्षसाने नहुशाचे पण अपहरण केले.  तेथील एका दासीने त्याला गुपचूप पळवले आणि वशिष्ठ ऋषींच्याकडे सुपूर्द केले. वशिष्ठ- अरुंधती यांनी त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला खूप शिकवले . त्याने हुंड राक्षसाशी युद्ध करून त्याला ठार केले आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. अशी ही पार्वतीची पर्यायाने शंकर- पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

१६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही सण, समारंभ, उत्सव, सोहळे असे असतात की जे आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दिवसांच आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या वैयक्तिक घटनांचा समावेश असतो आणि ज्या आपल्या मातृभूमीवर आपण मनापासून प्रेम करतो तिच्यासंदर्भातील महत्वाच्या घटनांच्या दिवसाचा पण त्यात समावेश असतो.

आपल्या भारताच्या इतिहासात काही दिवस असे आहेत की जे प्रत्येक भारतीयाने समजून घेतले पाहिजे किंवा त्या बद्दल माहिती ठेवली पाहिजे. कारण त्या दिवसांचा आत्ताच्या पिढीवर तसेच आजच्या वर्तमानावर प्रभाव जाणवून येतो. त्यातलाच एक हा “विजय दिवस’. 16 डिसेंबर ! भारत आणि पाकीस्तान देशांमध्ये ज्या ज्या लढाया झाल्या त्या मध्ये एक महत्वपूर्ण लढाई म्हणजे १९७१ ची. त्या युद्धा नंतरच भारताने पाकीस्तानला हरवून बांगलादेश या नव्या देशाला जन्माला घातलं. सर्वात कमी झालेली मनुष्य हानी हे १९७१ च्या युद्धाचं एक वैशिष्ट्यं. अर्थात त्या मागे असलेले सैन्याचे अप्रतिम नियोजन व तो निर्णय घेण्याची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हिम्मत.

इंदिरा गांधी किवा पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याकडे बहुतांश लोक खूप एका बाजूने बघतात असे मला वाटते.

कोणताही मनुष्य असो तो त्याच्या आयुष्यात काही निर्णय बरोबर घेतो तर काही चूक. पण खास गोष्ट अशी चूक निर्णय घेतांना ते चूक निर्णय आहे हे तेव्हा कोणाच्याच लक्षात येत नाही. तसचं या महान लोकांच्या बाबतीत झालं.

पण राजकीय विचार जरा बाजूला ठेवले आणि १९७१ च्या युद्धाचा नीट अभ्यास केला तर या मागे इंदिरा गांधी याची निर्णय क्षमता आणि नियोजन करण्याची पद्धत या बद्दल कौतुक नक्की वाटेल. या युद्धाच्या यशामागे तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल सँम मानेकशॉ यांचा प्रंचड मोठा हात व इंदिरा गांधीची साथ होती. तेव्हाच्या पश्चिम पाकीस्तानने पूर्व पाकीस्तानवर केलेले प्रचंड अत्याचार व त्यातून हजारो बंगाली लोकांचे भारतात स्थलांतर यामुळे भारत पण या युद्धात ओढल्या गेला.

पण घाई घाई मध्ये चुकीचे निर्णय न घेता, थोडा काळ थांबून व शांत नियोजन करून अवघ्या १६ दिवसात पाकीस्तानला आपण आत्मसमर्पण करायला भाग पाडलं. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर हे सर्वात मोठे आत्मसमर्पण ठरले. आज सुद्धा तो फोटो एक मोठ्या इतिहासाची साक्ष व ख-या अर्थाने आयकाँनिक समजल्या जातो. ज्या मध्ये भारताकडून ले. ज. जगजीत सिंग अरोडा व पाकीस्तान कडून ज. नियाझी यांनी आत्मसमर्पणाच्या करारावर स्वाक्ष-या केल्या व तो दिवस होतां १६ डिसेंबर.

म्हणून हा दिवस आपण” विजय दिवस” म्हणून साजरा करतो. आजच्या पिढीला त्या दिवसाचे महत्व जेवढं कळायला हवं तेवढं कदाचित कळतं नसेलही. पण अभ्यासाने कळलं की त्या दिवसानंतर खूप गोष्टी बदलल्या हे पण खरं. जसं एक नवा कोरा देश जन्माला आला, पाकीस्तान ची ताकद कमी झाली. भारत सुध्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रीय भाग घेऊन निर्णय तडीस नेऊ शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. तेव्हा भारत एवढा श्रीमंत नसतांनाही स्थलांतरीत लोकांना काही काळ ठेऊन घेऊन, स्विकारुन दयाळू मानवतेचं दर्शन संपूर्ण जगासमोर चित्रीत झालं. युद्धाच्या आधी रशिया सोबत मैत्री करार करून आपला आंतरराष्ट्रीय दबदबा भारताने वाढवला. १९७१ च्या युद्धात जे युद्ध कैदी होते त्यांना काही काळानंतर सुखरूप पाकीस्तानात सोडून देण्यात आले. त्यात सुध्दा भारताचा मानवतावादी दृष्टीकोन संपूर्ण जगाला दिसला. त्या युध्याच्या विजयानंतर मा. इंदिरा गांधीच्या प्रसिद्धीला मात्र सीमाच नव्हती. एक स्त्री पंतप्रधान असा अचंबित करणारा निर्णय घेऊ शकते हेच मुळात भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला पचणारी गोष्ट नव्हती. पण इंदिरा गांधीनी हे करून दाखवलं.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला नेहमी पिछाडीचा किंवा एक गरीब देश असंच हिणवल्या जायचं. ह्या घटनेनंतर मात्र हे चित्र हळू हळू बदललं व त्या नंतर झालेल्या अणुस्फोट चाचणीने तर संपूर्ण जगाचे डोळे उघडल्या गेले.

मी जसे आधी बोलले की एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेते तर काही बरोबर, पण आपण एक समंजस नागरिक म्हणून नेहमी चुकीच्या निर्णयाबद्दल बोलण्या पेक्षा कधी आपलं मन मोठ करून चांगल्या गोष्टी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणून इंदिरा गांधी व तत्कालीन सैन्याला “विजय दिवस” हा अभूतपूर्ण दिवस आमच्या सारख्या सामान्य जनतेला दाखवल्यामुळे मनापासून सलाम आणि धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

कधीकधी आपल्याला लाभलेलं मैत्र फारच अकल्पित असतं. माझ्या मैत्रीच्या वर्तुळात अशीच एक सहेली माझ्या हातात हात गुंफून गेली चाळीस वर्षे उभी आहे.

तिची माझी ओळख रत्नागिरी आकाशवाणीच्या केंद्रात झाली. तेव्हा मी खारेपाटणला वास्तव्याला होते. माझे पती श्रीनिवास तिथल्या शेठ म. ग. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक होते. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद काळे हे सत्यकथा या गाजलेल्या मासिकाचे लेखक होते. त्यांचे अनेक कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीवर होते. त्यांनी माझ्यातला होतकरू लेखक ओळखला होता. अशाच एका आकाशवाणी फेरीत त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं.

“पंडितबाई, तुम्हाला आकाशवाणीवरून कार्यक्रमासाठी आमंत्रण येईल हं. कवितेचे विषय तेच देतील. “असा निरोप त्यांनी आणला आणि मी उत्कंठतेने त्या निमंत्रणाची वाट पाहू लागले.

खरंच एक दिवस तो लिफाफा आला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कवितेचा विषय होता, ‘कुटुंबनियोजन’. तेव्हा तर मी नवखीच होते. दे दणादण सुचवल्या घरी सुखी राहण्यासाठी कविता ‘बनवल्या’. काव्यवाचनाची जोरदार प्रॕक्टीस वगैरे करत नवऱ्याला जेरीस आणलं. आणि अखेर तो दिवस आला.

रत्नागिरी आकाशवाणीच्या त्या इमारतीत पाऊल टाकलं. पहिल्यांदाच आकाशवाणीची इमारत बघत होते. गेटवर व्हिजिटर्स रजिस्टर भरणं वगेरे नवीनच होतं. आत गेले. कार्यक्रम विभागात माझं पत्र दाखवलं.

“वैशाली पंडित ना ? ये ये. मीच रेकाॕर्डिंग करणार आहे. घरकुल कार्यक्रम मीच घेते. “असं म्हणत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्त्रीने माझं स्वागत केलं.

‘…याच त्या ‘नीता गद्रे. ‘

प्रथमदर्शनीच मला त्या खूप आवडल्या. त्यांचा आवाज किंचित बसका तरीही आत्मविश्वास दाखवणारा होता. व्यक्तिमत्वात ठामपणा आणि आपलेपणा यांचं मजेदार रसायन होतं. कुरळ्या केसांची महिरप गोऱ्यापान चेह-यावर खुलत होती. वेषभूषेतली रंगसंगती त्यांची अभिरूची दाखवत होती.

माझ्या हातातलं स्क्रीप्ट घेऊन त्यांनी वाचलं.

“छान समजून घेतलायस विषय. मस्त झाल्यात कविता. सरकारी विषय तू सोपेपणाने कवितेत मांडलायस. “अशी दाद त्यांनी दिल्यावर मला जो काय आनंद झालाय तो झालाय.

त्या सफाईनं रेकाॕर्डींग रूमकडे निघाल्या. त्या चालण्यात डौल होता. त्यांच्या हालचाली फार सहज पण पाॕलिश्ड होत्या. मला रेकाॕर्डींग रूम, तिथलं टेबल, तिथला माईक सगळं नवीन होतं. आधी स्वतः त्या माझ्याबरोबर आत आल्या. कागद कसे धरायचे, कागदांचा उलटताना आवाज कसा होऊ द्यायचा नाही याचं मला ट्रेनिंग दिलं.

“आता वाचायचं बरं का बिनधास्त. काळजी करू नकोस. छानच होईल रेकाॕर्डींग. “असा धीर त्यांनी दिला.

जाड काचेच्या पलिकडून उभ्या राहून नीता गद्रेंनी मला सुरू कर अशी खूण केली.

एक दोन रिटेक झाले तरी न चिडता मला प्रोत्साहन देत त्यांनी रेकाॕर्डींग संपवलं.

… ती नीता गद्रेंशी माझी पहिली भेट.

नंतर मी आकाशवाणीच्या निमंत्रणाची वाट बघायला लागले ती फक्त नीता गद्रेंशी भेट व्हावी म्हणून.

नंतरच्या सगळ्या भेटीत नीताताईंमधलं साहित्यरसिकत्व मला खूप समजत गेलं. या बाई केवळ आकाशवाणीच्या औपचारिक अधिकारी नाहीत. स्वतःला साहित्याची उत्तम जाण आहे. श्रोत्यांना सकस कार्यक्रम ऐकवण्याचं भान आहे. ती आपली जबाबदारी आहे, तीही सरकारी चौकटीत राहून पूर्ण करायचं आव्हान आहे हे त्या जाणून होत्या. करियरवर मनापासून प्रेम करणा-या नीताताईंनी माझ्या मनात खास जागा निर्माण केली.

त्यांचा ‘तांनापिहि’ हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मी त्यांची फॕनच झाले. विशेषतः त्यातली ‘ओझं’ही कथा तर मला बेहद्द आवडली होती. गृहिणीला मध्यवर्ती व्यक्तिरेखा करून लिहिलेली ही कथा मला स्पर्श करून गेली. मी लगेचच त्या पुस्तकावर अभिप्राय लिहिणारं पत्र त्यांना पाठवलं.

लगोलग त्याचं उत्तरही नीताताईंकडून आलं. त्यात त्यांनी, ‘तुला मी माझ्या आणखीही काही पुस्तकांची नावं देते तीही वाच. (भोग आपल्या कर्माची फळं )’ असं मिश्किलपणे लिहिलं होतं. ते मला जामच आवडलं होतं. नंतर खरोखरच ती फळं मी चाखली.

त्यांचं ‘एका श्वासाचं अंतर’ हे पुस्तक तर एका जीवघेण्या आजारावर मात केलेल्या जिद्दीची कहाणी आहे. ते पुस्तक मी माझ्या परिचयातील काही डाॕक्टर्सनाही वाचायला दिलं होतं. एका प्रसिद्ध रूग्णालयात पेशंटला किती हिडीसफिडीस केलं जातं, अक्षम्य अशी बेफिकीरी दाखवली जाते याचा पर्दाफाश त्यांनी निर्भीडपणे केला होता. नंतर त्या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती, आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची जाहीर हमी दिली होती असं ही समजलं.

नीताताई रत्नागिरी केंद्रावर तेरा वर्षे होत्या. नंतर सांगली, कोल्हापूर आणि मुंबई अशा सेवा करत त्या निवृत्त झाल्या. मध्यंतरी आमची गाठभेट बरीच वर्ष नव्हती. पुन्हा एकदा मुंबई आकाशवाणीवर त्या असताना त्यांनी मला माझ्या एका कवितेसाठी खास संधी दिली. परत आम्ही जुन्या उमाळ्याने भेटलो.

आता त्या निवृत्त जीवनात स्वतःचे दिवस अनुभवत आहेत. नभोनाट्य, ब्लाॕग्ज, लेखन, वाचन, प्रवास यांत सुरूवातीची वर्षे आनंदात गेली. आता शारीरिक थकव्याने मर्यादा आल्यात. आमचा फोनसंपर्क वाढला आहे. निवृत्तपणाच्या इयत्तेत मी त्यांच्याहून आठदहा वर्ष मागेच असले तरी आम्ही अगं तुगं करू लागलो आहोत. एकमेकींची हालहवाल जाणून घेत आहोत. चॕनेलवरच्या मालिकांवर यथेच्छ टीका टीप्पणी करून खिदळतो आहोत, राजकारणातल्या सद्य स्थितीवर फुकटच्या चिंता वहातो आहोत, जीव कासावीस करून घेत आहोत. मतदान केल्याच्या काळ्या शाईच्या मोबदल्यात इतकं तरी करतोच आहोत.

… एक मैत्रकमळ असं पाकळी पाकळीने फुलत गेल्याचा आनंद दोघीही अनुभवतो आहोत ! 

© सुश्री वैशाली पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुख म्हणजे काय ?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सुख म्हणजे काय ?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

एक अत्यंत यशस्वी, परंतु कामाच्या ताणाने वैतागलेला एक अधिकारी होता. एकदा सुट्टी घेऊन तो एका निवांत गावी गेला. एके दुपारी त्याला एक कोळी आपली बोट किनाऱ्याला लावताना दिसला. त्याने सकाळी जे काही मासे पकडले होते. ते व्यवस्थित एका टोपलीत ठेवलेले होते. कुतूहलानं तो अधिकारी त्या कोळ्याजवळ गेला.

‘‘आज तुझी भरपूर कमाई झालेली दिसतेय. ’’ कोळ्यानं पकडलेल्या माशांकडे पाहत तो उद्गारला! ‘‘इतके मासे पकडायला किती वेळ लागला तुला?’’ त्यानं विचारलं.

‘‘फक्त काही तास!’’ दुपारच्या उन्हात अंगाला आळोखेपिळोखे देत कोळी उत्तरला. ‘‘माझं आजचं काम संपलं. ’’ 

हे ऐकून तो अधिकारी चक्रावला. ‘‘मग उरलेल्या दिवसाचं तू काय करणार?’’ त्यानं विचारलं.

कोळी हसून म्हणाला, ‘‘घरी जाईन, कुटुंबाबरोबर एकत्र जेवण करेन, एक डुलकी काढेन, माझ्या मुलांबरोबर खेळेन. संध्याकाळी गावात जाऊन मित्रांबरोबर संगीताचा आनंद घेईन. एवढं पुरेसं आहे. ’’ 

अधिकाऱ्याच्या भुवया उंचावल्या. तो काहीसा गोंधळला. त्याने विचारलं, ‘‘पण जर तू अधिक वेळ मासेमारी केली असतीस तर तुला आणखी पैसे मिळाले असते. त्यातून तू आणखी मोठी बोट विकत घेऊ शकला असतास, हाताखाली चार माणसं ठेवू शकला असतास आणि आणखी जास्त मासे पकडू शकला असतास. त्यात बस्तान बसल्यावर तुला बोटींचा ताफा विकत घेता आला असता, माशांची निर्यात करता आली असती, खूप पैसा मिळवून तू श्रीमंत झाला असतास. ’’ 

कोळ्यानं हसत विचारलं, ‘‘आणि इतक्या पैशांचं मी काय केलं असतं?’’ 

अधिकारी म्हणाला, ‘‘श्रीमंत होऊन तुला व्यवसायातून निवृत्ती घेता आली असती, हातात आरामासाठी भरपूर मोकळा वेळ असला असता, कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवता आला असता आणि तुला जे आवडेल ते करता आलं असतं. ’’ 

मंद स्मित करत कोळ्यानं त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘पण… हेच सगळं तर मी आत्ताही करतो आहे ना!’’

साथींनो, या घटनेवरून आपल्या लक्षात यायला हरकत नाही की, ज्या सुखासाठी पैशाच्या मागे आपण धावत असतो ते सुख आपल्याला मिळतच नाही, उलट आपल्यापासून दूर गेलेले दिसते. परिणामी आपलीच दमछाक मात्र होते. एक प्रसिद्ध म्हण आहे, “ पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही. ” अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? 

सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल, तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. थोडक्यात काय तर, सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल, असं वाटत नाही का?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फिदाई हुसैन हवेली / मीना बाजार कोठी” – लेखिका : सुश्री प्रमिला बत्तासे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “फिदाई हुसैन हवेली / मीना बाजार कोठी” – लेखिका : सुश्री प्रमिला बत्तासे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

(ऐतिहासिक दस्तावेजांप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीमहाराजांना जिथे कैदेत ठेवले, ते ठिकाण…)

मागील आठवड्यात 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी आग्रा येथे पर्यटनासाठी गेलो होतो. दोन दिवस आधी जयपुर फिरून झाले होते. जयपूरहून निघून आग्र्याला येताना रस्त्यात फतेहपूर सिक्री बघितले. तेथील मुघल बादशाह अकबर यांचा भव्य महाल बघितला. तिथल्या गाईडच्या तोंडून अकबराच्या हिंदू पत्नी जोधाबाई यांच्यासाठी बांधलेला महाल, त्यांच्यासाठीच स्वतंत्र स्वयंपाक घर इत्यादी, इत्यादी बघून झाले. दुसऱ्या दिवशी आग्र्याला आल्यावर प्रथम आग्र्याचा किल्ला बघितला. भरपूर भव्यदिव्य आहे. सोबत गाईड घेतलेला असल्यामुळे बरीच माहिती, छोटे छोटे बारकावे तो सांगत होता. हा किल्ला बघत असतानाच एका सुंदर अशा महालात गाईडने माहिती दिली की इथे औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवले होते. त्यांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे ते इथेच कैदेत राहिले. तिथून ताजमहालाची भव्य वास्तू स्पष्ट दिसत होती. या ताजमहाला कडे बघत बघतच त्यांच्या कैदेतली वर्षे संपलीत कैदेतच त्यांचा अंत झाला..

अर्थात हा सगळा इतिहास मी दुसऱ्यांदा ऐकत होते. या आधी पाच वर्षांपूर्वी आम्ही गार्डन्स क्लब चे सदस्य हा किल्ला बघून आलो होतो. त्याही वेळी गाईड कडून ही सगळी माहिती ऐकलेली होती. त्यामुळे माझे लक्ष तिकडे जेमतेमच होते.

किल्ला बघून होत आला होता. प्रतीक आणि त्याच्या बाबांची काहीतरी खुसुर- फुसुर गाईड बरोबर चालू होती. सुनील शी बोलताना नंतर कळले की हे दोघेही गाईडला विचारत होते, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले गेले होते ती जागा कोणती? ती आम्हाला बघायची आहे. ( ही गोष्ट खरंतर पाच वर्षांपूर्वीच्या ट्रिपमध्येही आमच्या कुणाच्याही लक्षात आली नव्हती आणि याही वेळी माझ्या लक्षात नव्हतीच).

गाईडने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली होती. किल्ल्यामध्ये तर तशी कुठलीही जागा नव्हती, जिथे त्यांनी शिवाजी महाराज येथे होते असे सांगितले.

शेवटी गुगल बाबा ची मदत घेऊन या दोघांनी गाईडला गुगल वरील लोकेशन दाखवले. ‘शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा’ असे गुगल वर टाकले तेव्हा ह्या किल्ल्यापासून पाच किलोमीटर वरील एक लोकेशन गुगलने दाखवले. गाईडने अर्थातच खांदे उडवले. आमच्याबरोबर येण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण या दोघांच्या मनातली जिज्ञासा संपली नव्हती.

आपण आग्र्यामध्ये दोन दिवस राहायचे, अकबर, जहांगीर यांचे राजवाडे बघायचे, शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाला पुढे नतमस्तक व्हायचे आणि ज्या साम्राज्यामध्ये आमचा मराठी राजा शंभर दिवस कैदेत होता त्या जागेवर, त्या वास्तूमध्ये माथा न टेकता आग्रा सोडायचे हे आमच्या मनाला पटेना. गाईडला निरोप देऊन आम्ही किल्ल्याच्या बाहेर पडलो आणि गुगल लोकेशन नुसार शिवाजी महाराजांच्या कैदेचे ठिकाण शोधायला सुरुवात केली.

भोसले आणि बत्तासे असा सात जणांचा ग्रुप बरोबर असल्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर सारखी एक मोठी गाडी केलेली होती. तीच गाडी घेऊन निघालो. आग्रा शहर एका बाजूला टाकून बाहेरच्या रस्त्याला लागलो. शहरापासून लांब नव्हता, पण शहराच्या बाहेरून जाणारा म्हणजे एखाद्या गावकुसासारखा तो रस्ता होता. लोकेशनच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे आमची गाडी थांबली. पुढचा रस्ता नीरुंद आणि काटेरी झाडांनी वेढलेला होता. ड्रायव्हरने गाडीवर ओरखडे पडायला नकोत म्हणून पुढे येण्यास नकार दिला.

गाडी तिथेच उभी करून मी, सुनील रश्मी व प्रतीक आम्ही चौघे चालत चालत त्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या एका बाजूला गावकुसा बाहेरची वस्ती जाणवत होती. रस्ता काटेरी तर होताच वर अस्वच्छही खूप होता. पायाखालच्या रस्त्याचे, रस्त्याकडेच्या घाणीचे फार काही वाटतच नव्हते, कारण 400 मीटरच्या अंतरावर आपल्याला हवे ते ठिकाण दिसू लागले होते. शेवटी एका खूप मोठ्या इमारती जवळ आम्ही येऊन थांबलो. भले मोठे लोखंडी गेट बंद होते. आजूबाजूला झाडी वाढलेली होती. ‘राजा जय किशनदास भवन’ असे ह्या इमारतीवर नाव होते. गेट जवळ गेल्यावर एक छोटेसे फाटक नजरेत आले. त्याला कडी होती पण कुलूप नव्हते. कडी काढून सरळ आत घुसलो. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हते. गेटच्या आत मात्र स्वच्छता होती. हवेली पूर्ण बंद होती पण कोणाचातरी वावर तिथे आजूबाजूला आहे एवढे लक्षात येत होते. कुणाला काही विचारावे असे आजूबाजूला कोणी नजरेतही येईना. इतक्यात शेजारच्या वस्तीतील एक जण आमच्यासमोर आला. ‘क्या चाहिये आपको?’

आम्ही थोडसं चाचरतच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत आणि शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले होते ती जागा बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत. गुगलने आम्हाला या जागेवर आणून सोडले आहे, हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ‘आप सही जगह पर आये हो’ त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले.

त्या माणसाने जी काही माहिती दिली ती अशी होती – या इमारतीला ‘कोठी मीना बाजार’ किंवा ‘कोठी मीना बाजार हवेली’ असे म्हणतात. शिवाजी महाराजांना अटक करून इथेच नजर कैदेत ठेवले होते. 99 दिवस ते इथे होते आणि शंभरव्या दिवशी ते इथून निसटले.

मुघल राजवटीनंतरच्या काळात कोठी मीना बाजार हवेली ब्रिटिशांच्या ताब्यात होती. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा 1857 मधे ही कोठी लिलावात विकली होती. राजा जय किशनदास या व्यक्तीने ती खरेदी केली होती. सध्या राजा जयकिशनदास यांचेही कुणी वारसदार या कोठीमध्ये राहत नाहीत. फक्त त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक-दोन कुटुंब आजूबाजूला आहेत. बाकी बऱ्याचशा जागेवर अतिक्रमण पण झालेले आहे. गुगल सर्च वर नंतर बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने या जागेत शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्याचा घाट घातलेला आहे. त्याला अर्थातच स्थानिक जागा बळकावणाऱ्यांनी विरोधही केलेला आहे आणि हा निर्णय कायद्याच्या आधीन आहे. त्यामुळे ही वास्तू जैसे थे अशी उभी आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. फक्त ब्रिटिशांनी ही वास्तू राजा जय किशन दासला लिलावात दिल्याचा उल्लेख असलेली एक पाटी तिथे बघायला मिळाली. दरवाजे अर्थातच बंद असल्यामुळे आत जाता आले नाही. तिथेच बाहेर उभे राहून शिवाजी महाराजांच्या धैर्याला, धाडसाला आणि शौर्याला आठवत नतमस्तक झालो. डोळे भरून ती वास्तू मनात साठवली आणि परत फिरलो. चार-पाच दिवसांच्या सहलीमधे जयपूरचा हवामहल, अमेर फोर्ट, फत्तेपूर सिक्रीचा अकबराचा किल्ला, आग्र्याचा किल्ला, ताजमहाल हे सगळं बघत फिरत होतो. पण या ट्रिप मध्ये खरे समाधान वाटले ते मीना बाजार कोठीची इमारत बघून.

इथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे आणि आग्र्यात जाणाऱ्या तमाम मराठी माणसाची पाऊले इकडेही आधी वळावीत असे मनोमन वाटले. या मीना बाजार कोठी पर्यंत पोहोचता आले याबाबत खूप समाधान वाटले.

पाच वर्षांपूर्वी आग्रा फिरताना हा इतिहास आपल्याला आठवलाही नव्हता याची खंत सुद्धा वाटली.

असो.

पण या वेळच्या समाधानाचे सगळे क्रेडिट अर्थातच माझ्या इतिहास प्रेमी नवऱ्याला आणि शाळेत शिकलेला सर्व इतिहास तोंडपाठ असणाऱ्या माझ्या प्रतीकला.

लेखिका : सुश्री बत्तासे प्रमिला

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जेवणावरून स्वभाव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “जेवणावरून स्वभाव” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत.

जसे: हस्ताक्षर, सही, दिसणे, काही लकबी, वगैरे वगैरे.

 

पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट–

जेवताना,

जेवण्याच्या आधी वा

नंतर…

जेवणाराची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

 

म्हणजे बघा…

 

समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो.

जसे की,

१) ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

२) तळण, पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अश्या माणसांत, संयम कमी असतो.

३) वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे साधी सरळ असतात. ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

४) भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात. यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

५) जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

६) लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स?- हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

७) काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.

 

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.

 

अ) पहिला: जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि

ब) दुसरा: जेवणानंतरची प्रतिक्रिया असणारे.

 

१) जेवणाच्या आधी ताट,

भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत कां नाही? – हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे कां नाही?- हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात.

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात. अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच Category तील असतात.

२) पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही.. आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढवून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो.

हे लोक मत्सरी असतात. सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते.

३) गोड पदार्थ वाढला जात असताना

“मी काय म्हणतो? फक्त बासुंदीच आहे, म्हणजे १६० रुपये ताट! स्वस्त पडले. “

असा डायलॉग मारणारे, मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी कंजूष मनोवृत्तीचे असतात.

४) जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक

“बाकी सगळे ठीक होते, पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते. ” म्हणणारी अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात.

समोर चांगले ताट वाढले आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून, असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

५) ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी !

या सर्वांपलीकडे एक विशेष Category आहे.

६)जेवण झाल्यावर

“ताक आहे का?” म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर

“अरेरे, ताक असते ना तर, मजा आली असती. “

असा शेरा मारणारे कुजकटच.. !.

 

वाचा आणि ठरवा!

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ज्ञानसविता… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

‘ ज्ञानसविता ‘ म्हणावी अशी विलक्षण बुद्धिमान, कर्तबगार आणि कार्यसमर्पित असणारी माझी पत्नी डॉ. सौ. अपर्णा श्रोत्री हिचे १० डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. आता केवळ तिच्या असंख्य आठवणी मनात अविरत रुंजी घालत राहिल्या आहेत. अपर्णाने आपले सारे आयुष्य मातृत्वाच्या सेवेच्या संवर्धनात आणि आपल्या शिष्यांना तरबेज आणि निपुण करण्यात वेचले. तिच्या त्या अविरत कार्यापुढे आज पुन्हा एकदा नतमस्तक होतांना मला अगदी माझ्याही नकळत सुचलेली ही कविता — जणू मी मनःपूर्वक तिला वाहिलेली श्रद्धांजलीच – – 

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली

उजळूनी साऱ्या विश्वाला कर्मप्रभा शाश्वत झाली ||धृ||

*

देवि सरस्वति खिन्न जाहली ज्ञानकोशही स्तब्ध जाहला

मातृत्वाचा विरस जाहला धन्वंतरीही सुन्न जाहला

यमपाशाचा वेध निष्ठुर देवी शारदा निष्प्रभ झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||१||

*

गुरुस्थानी ती शिष्यगणांच्या सकलांची माता होती

ज्ञान देऊनी कुशल बनविले मातृत्वाची सेवक होती

सक्षम केले लक्ष करांना मातृसेवा बळकट केली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||२||

*

ज्ञान अर्पिले प्रेम वर्षले वात्सल्याची माता ती 

कवच होऊनी निरामयाचे मातृत्वाची रक्षक ती

वसा घेउनीया सेवेचा मातांच्या अजरामर झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||३||

*

धनसंपत्ती कीर्ति प्रतिष्ठा मनात नव्हती अभिलाषा 

गर्भवतींचे रक्षण करणे जीवनात घेतला वसा

शिष्यगणांना निपुण करुनीया कर्मसिद्ध जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||४||

*

समाजसेवा अंगिकारली कुटुंब अपुले विश्व जाणुनी

जोखीम भरल्या मातांसाठी कवच जाहली झणी धावोनी

विद्ध होउनी मृत्यूने मातांच्या कार्या सिध्द जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||५||

*

अंतर्यामी अखंड अविरत सुरक्षीत प्रसूतीचा ध्यास 

सुदृढ शिशु जन्माला यावे सदैव जागृत होती आंस

साध्य कराया पावन ध्येया बहुत ग्रंथ संपदा लिहिली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||६||

*

अजातशत्रू जीवनात या विश्वाची ती सखी जाहली

जन्म देऊनी दोन बालका लाखोंची आई झाली

पत्नी होऊन एक क्षणाची कालातीत माता झाली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||७||

*

निरोप अपुला तृप्त मनाने घेउन निजधामा गेली 

समाधान तिज आत्म्याला कर्तव्याची बूज राखली

आपपराचा भाव कधीही मनी ठेवुनी ना जगली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||८||

*

कर्मापासुनिया निवृत्ती अंतर्यामी तृप्त होऊनी 

झेप घेतली ब्रह्म्यालागी निजदेहाला अंतरली

सद्गती लाभो तुला अपर्णा दिव्य प्रार्थना आळविली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||९||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचा पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक यांची संगती 

गीता हा चार पात्रांमधील संवाद ! धृतराष्ट्र, संजय, अर्जुन, आणि श्रीकृष्ण. गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने आणि शेवट संजय याच्या उत्तराने. त्यामुळे यातील संगतीचा विचार महत्त्वाचा ठरतो.

धृतराष्ट्र बहि:चक्षुनी आंधळा आहेच पण, पुत्र प्रेमामुळे अंत:चक्षुनेही अंध आहे. त्याला युद्धाचे वर्णन सांगणार संजय हा धृतराष्ट्राचा एकनिष्ठ सेवक व सारथी. त्याला व्यासांनी दिव्यदृष्टी दिली होती. तो व्यासांचा शिष्य होता. राजमहालात आपल्या स्वामींच्या पायाशी बसून रणांगणावरील युद्धाचे वर्णन सांगण्यासाठी त्याची योजना. अर्जुन पंडूपुत्र श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्ण त्याच्या रथाचा सारथी तसेच अर्जुनाचा मित्र, सखा, बंधू, प्रत्यक्ष परमात्मा.

गीतेचा पहिला श्लोक म्हणजे धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न. धृतराष्ट्र उवाच,

“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:l

मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जयll” (१/१)

हे संजया, धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पंडूच्या पुत्रांनी काय केले? गीतेत हा एकमेव श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि तो त्याचा स्वभाव, इच्छा व्यक्त करायला पुरेसा आहे. पुत्रप्रेमात गुंतलेला धृतराष्ट्र त्यांच्या जयाची वार्ता ऐकायला उत्सुक आहे. भिष्म, द्रोण, कर्ण दुर्योधनाच्या बाजूला आणि सैन्यही पांडवांच्या सैन्यापेक्षा दीडपट. त्यामुळे कौरवच युद्ध जिंकणार असे वाटत आहे. ‘ मामका:’ हा शब्दच आपल्या मुलांचे प्रेम आणि पंडूचे मुलगे असा परकेपणा निर्माण करतात. हे युद्ध होणारच. पण निर्णय ऐकायला तो उत्सुक आहे. बाहेरून शांत पण अंतस्थ तणावग्रस्त असे व्यक्तिमत्व.

गीतेत पुढे संजयाने केलेले युद्धाच्या तयारीचे वर्णन, अर्जुनाला झालेला मोह, त्याचा युद्ध न करण्याचा निश्चय, कृष्णाने त्याचे केलेले मतपरिवर्तन, त्यासाठी सांगितलेले तीन योग, स्वधर्माची- स्वकर्माची जाणीव, आत्म्याचे अविनाशित्व इत्यादी उपदेशाने अर्जुनाचा मोह दूर होऊन त्याचे युद्ध करायला तयार होणे हे विषय येतात. हे सर्व तत्त्वज्ञान ऐकून संजयाला आत्मिक आनंद मिळाला होता. धृतराष्ट्राच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी संजय याची. युद्धभूमीवर पांडवांचा जय होणार याची खात्री संजयाला आहे. पण तसे सांगितले तर आपल्या स्वामींना रुचणार नाही आणि खोटे बोलावे तर आपल्या मनाला पटणार नाही. म्हणून मोठे खुबीदार उत्तर मोठ्या चतुर्याने, आडपडद्याने संजय देतो. प्रत्यक्ष तोंडाने कौरवांचा पराजय होईल असे न सांगता,

” यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर :l

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममll ” (१८/७८)

जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ तेथे श्री, विजय, भूती आणि निती असे माझे निश्चित मत आहे. प्रत्यक्ष युद्ध घडायच्या आधीच आपले मत सांगून संजय मोकळा झाला. एक सर्वत्र, सर्व काळी योग्य असे सत्य त्याने सांगितले. श्रीकृष्ण स्वतः योगेश्वर सर्व योग जाणणारे आणि तसा मार्ग दाखवणारे, तत्त्वज्ञानी, सर्वज्ञ आणि त्यांना साथ पार्थ म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारा, धनुर्धारी अर्जुन. म्हणजेच बुद्धीला ज्यावेळी पराक्रमाची जोड मिळते तेव्हाच विजय आणि वैभव प्राप्त होते. जे दुर्योधनाकडे नव्हते. त्यामुळे अर्जुन म्हणजे त्याचा भाऊ युधिष्ठिर जिंकणार आणि त्याला सर्व वैभव प्राप्त होणार. असे आपले ठाम मत सांगण्याचे धैर्य संजयला प्राप्त झाले, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले बोधामृत ऐकून. अशा प्रकारे पहिल्या आणि शेवटच्या श्लोकाची संगती. म्हणून गीता ही संजयाच्या भावाने ऐकण्यासाठी, अर्जुनाच्या भूमिकेतून आचरण्यासाठी आणि श्रीकृष्ण बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि आंधळ पुत्र प्रेम नसावं हे दाखवण्यासाठी आहे. श्रीकृष्ण म्हणजे तत्वज्ञान आणि अर्जुन म्हणजे कर्म यांची सांगड आहे.

हे युद्ध एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मुलांमध्ये, दोन वृत्तीं मधील आहे. आसूरी आणि दैवी. तेव्हा असुरी वृत्ती कडून दैवी वृत्तीकडे वाटचाल करणे महत्त्वाचे. आपल्यामध्येही दोन्ही प्रकारचे गुण असतात. शरीराच्या रणांगणावर लढाईसाठी एकत्र आलेले. तेव्हा अंत:करणातील श्रीकृष्णाचे स्मरण करून अर्जुन रूपाने साधना करावी आणि दुर्गुणांवरती विजय मिळवावा.

गीतेची सुरुवात ‘धर्म’ या शब्दाने आणि शेवट ‘मम’ या शब्दाने म्हणून ‘धर्ममम ‘ म्हणजे माझा धर्म. म्हणजेच स्वधर्म- स्वकर्तव्य सांगणारी गीता. त्याचे आचरण हेच गीतेचे सार. अशा आचरणाने कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करता येते. कुरु म्हणजे कर आणि क्षेत्र म्हणजे शरीर. धर्माधिष्ठित विहित कार्याला शरीर लावणे म्हणजेच कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करणे. पलायनवाद सोडून समर्थपणे प्रसंगाला तोंड द्यायला शिकवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. दुर्गुणावर सद्गुणांचा हा विजय. त्यासाठी गरज बुद्धीची आणि साधनेची मग सुखच सुख. हे जाणणे हीच गीतेच्या पहिल्या व शेवटच्या श्लोकाची संगती.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares