मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? मनमंजुषेतून ?

☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

माझ्या घरट्यात त्यांचं घरटं …….. 

दोन वर्षे  उलटली आता या गोष्टीला. १७ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळात आम्ही एक  सुंदर जीवनपट अनुभवला. कुतूहल, दया, काळजी,बालपण,पालकत्व, उत्साह ,भीती,आनंद अशा अनेक भावनांनी युक्त असा तो काळ होता आमच्यासाठी. 

२२ तारखेला मी आमच्या घराच्या गॅलरीमधल्या हँगीग कुंडीमध्ये पक्षी बसलेला पाहिला. गॅलरीचे दार उघडल्यावर भुर्रकन उडून गेला. साधा नेहमीचाच प्रसंग, त्यामुळे मी लक्ष दिले नाही. तो पक्षी जोडीने अधून मधून दर्शन देत राहतच होता. या जोडीने मला अजिबात थांगपत्ता न लागू देता हँगिंग कुंडीमध्ये त्याचा प्रशस्त बंगलाच  बनवून टाकला होता. सहज शंका आली म्हणून स्टूलवर चढून पाहिले तर सुंदर जीवांची वाट पाहत असणारं एक सुरेख घरटं तयार होतं. म्हटलं चला एक सुंदर अनुभव मिळेल आता. आणि त्या घरट्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. 

आता माझ्यातील मातृत्व जागे झाले, कारण ही कुंडी होती, त्यालाच लागून ग्रीलमध्ये कपडे वाळत घालायची दोरी बांधली होती. कपडे वाळत घालताना, काढताना त्या दोरीमुळे ती कुंडी हलत होती. धक्का लागून पक्षांची अंडी किंवा पक्षांचे पिल्लू खाली पडेल याची भीती जाणवली. त्यामुळे ती दोरी सोडून थोडीशी खाली बांधावी, जेणेकरून त्या पक्षांना त्रास होणार नाही असा विचार मनात येताच मी लगेचच अंमलबजावणीसाठी स्टूलवर चढून दोरी सोडू लागले. दोन मिनीटे देखील झाली नसतील तोवर ते दोन्ही पक्षी काही केल्या मला तेथे हात लावून देत नव्हते. मी मग ‘ थोडा वेळ जाऊ दे. मग पुन्हा आपले कार्य 

साधू ‘असा विचार करून मोर्चा किचनकडे वळवला. पक्षी जवळपास नाहीत याचा अंदाज घेऊन पुन्हा मोहीमेवर रुजू झाले. 

त्या दोरीच्या दोनतीन गाठी सोडून होईपर्यंत काहीतरी क्षेपणास्त्राप्रमाणे माझ्याकडे झेपावत आहे असे वाटले. तो पक्षी अक्षरश: सूर मारून येऊन मला हुसकावून लावत होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा कुठून आला कळलेच नाही. एकदम स्टूलवरचा एक पाय हलून तोल जाऊन मी पडते की काय असे वाटत असताना माझ्या प्रिय ग्रीलने मला वाचवले आणि पुन्हा एका short break साठी मी थांबले. ती दोरी सोडून खाली पुन्हा बांधण्याच्या पाच मिनिटांच्या कामाला अनेक व्यत्ययाने मला दोन तास लागले. पण शेवटी मोहीम फत्तेच केली. आणि एक आत्मिक समाधान मिळाले.

आता रोज उठल्याउठल्या स्टूलवर चढून पक्षाच्या घरटयाचं अवलोकन सुरु झालं. मी आणि माझा मुलगा रोज न चुकता हे काम उठल्याउठल्या करत असू. अर्थातच घरमालक आणि घरमालकीणबाई जवळपास नसताना.थोड्या दिवसांच्या  प्रतिक्षेनंतर घरट्यामध्ये एक अंडं आम्हाला दिसलं. दुसऱ्या दिवशी दुसरे आणि तिसऱ्या दिवशी तिसरे अशी तीन अंडी त्यांच्या घरट्यात विराजमान झालेली बघून मन अगदी लहान मुलां प्रमाणे बागडू लागलं. झाले.  आता आतुरता होती त्या नवीन पिल्लांची. मग रोज न चुकता आमच्याकडून फोटोसेशन चालू झालं. अकरा दिवसांनी एका अंड्यातून एका पिल्लाचे आगमन झाले. बाराव्या दिवशी तीनही जिवांची हालचाल बघून खूप आनंद झाला. 

ती गोंडस पिल्ले वाढताना बघणे म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. एका जीवनपटाचे आम्ही साक्षीदार झालो होतो. रोजच ते उत्सुकतेने घरटयात बघणे आम्ही आनंदाने करत होतोच. पण एक बालपण मी स्वत: देखील अनुभवत होते. अशातच एके दिवशी पक्षीणबाई रस्ता चुकून चक्क घरातच आल्या. अचानक तिचे असे घरात येणे मला एकदम घाबरवूनच गेले.. मी चटकन आधी पंखा चालू नाही ना हे चेक केले. तिच्या बाहेर पडण्यासाठीच्या घिरटया चालू होत्या पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग काही सापडेना. ती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. पण खिडकी बंद असल्याने बाहेर जाता येईना. मग खिडकी उघडल्यानंतर भुर्रकन उडून गेली. पण दोन मिनीटे घरात उच्छाद मांडला होता तिने. तेव्हापासून गॅलरीचं दार जास्त वेळ उघडून ठेवलेच नाही.

जसजशी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊ लागली तसतशी ही पक्षाची जोडी आक्रमक होऊ लागली. गॅलरी म्हणजे आमचं साम्राज्य आहे आणि इथे कोणीही पाऊल ठेवायचं नाही असा धमकीवजा इशारा आम्हाला मिळू लागला. आम्ही मात्र आमच्याच घरात (गॅलरीत ) चोरासारखं वावरू लागलो. कपडे वाळत घालताना तर घरट्यापासून लांबच घालायचे. जरा म्हणून घरटयाच्या जवळ कोणी दिसले की कुठूनही ही जोडी प्रगट व्हायची. आता फोटो काढणंही खूप अवघड झाले होते. मी आणि माझा मुलगा हे दिव्य कसेबसे म्हणजे एकाने पहारा द्यायचा आणि दुसऱ्याने फोटो काढायचा असे करत होतो.

तर अशा रीतीने आमचं सहजीवन चालू होतं. यात खूप भावलेली एक गोष्ट म्हणजे पक्षी जेव्हा जेव्हा पिलांना खाऊ घेऊन येत तेव्हा जर आम्ही कोणी तिथे असू तर ते घरट्याजवळच घुटमळत. पिलांचा आवाज आल्यावर आम्ही लगेचच बघायला जात असू. पण आम्ही नजरेआड झाल्यावरच ते पिलांना खाऊ घालत. पूर्वीच्या आजीबाई लेकी- सुनांना सांगायच्या ना ..  सगळ्यांसमोर बाळाला खायला द्यायचं नाही, तो सल्ला आठवायचा. आणि मग मी पण गॅलरीचे दार बंद करून घ्यायचे. मग ते पक्षी पिलांना चिमणचारा खाऊ घालत. पक्षी असो जनावरे असोत की माणूस…  सर्वत्र मातृ-पितृभाव सारखाच ना ! शक्यतो दोन्ही पक्षी एकाच वेळी बाहेर जात नसत. एक जण पहारा द्यायचा आणि एक जण पिलांना चिमणचारा आणण्यासाठी जायचा. दोघांनी आपापली कामे वाटून घेतली होती.

अशा रितीने १४ दिवस कसे गेले काही समजलेच नाही. आम्हाला वाटले होते, जसा अंड्याचा क्रम होता तशी त्यांची वाढ होईल. पण सर्व पिल्ले बहुदा एकाच वेळी उडून गेली. बराच वेळ झाला पक्षी आणि पिलांचा आवाज का नाही म्हणून वर चढून बघितलं तर घरटे रिकामे होते. आनंद झाला होता पिलं आता आपल्या पंखांनी सर्वत्र हुंदडतील म्हणून….  पण काहीतरी हरवल्यासारखं पण वाटत होतं .

चला … एक जीवनपट सुफळ संपूर्ण झाला याचे समाधान घेऊन मी जवळजवळ २०-२२ दिवसांनी त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घातलं.  मला वाटले होते ही वेल आता वाळते की काय. पण त्या वेलीनेही 

बिनपाण्याचा एवढे दिवस तग धरला होता. तीही त्या पक्षांना सहाय्य करीत होती. तिला पण मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती देखील बहरली होती….. 

दEurek(h)a

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने…🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने 🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“फाळणीमुळे भारत- पाकिस्तान हे दोन देश फक्त भौगोलिक दृष्ट्या विभक्त झालेत असे नाही, तर हजारो वर्षांपासून नांदत असलेली संस्कृती विभागली गेली. या दोन देशात एक दिलाने राहणाऱ्या कोट्यावधी नागरिकांची मने दुभंगली, त्यामुळे फाळणी ही अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे भळभळणारी एक जखम म्हणून या विशाल खंडप्राय देशात राहणाऱ्या लोकांच्या काळजात ठसठसत राहिली आणि त्याचे प्रतिबिंब सहाजिकच साहित्यात उमटले. कृष्णाजी वामन पेंडसे हा सव्वाशे वर्षांपूर्वी कोकणात जन्मलेला माणूस, तारुण्यात धाडसाने कराचीला नोकरीसाठी जातो. आपल्या कर्तबगारीने तेथे अधिकार पद मिळवतो, पण फाळणीच्या जबरदस्त तडाख्याने कोकणात माघारी येतो. या दैव दुर्विलासात त्याला त्याची सहधर्मचारिणी खंबीरपणे साथ देते.” —– 

— प्रदीप गांधलीकर यांनी मंगला काकतकर यांच्या “आनंदाचे डोही आनंद तरंग” या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.

(कै) मंगला काकतकर ही माझी आत्त्या, जन्मापासून कराचीत राहिलेली आणि फाळणीनंतर भारतात येऊन जिने खडतर आयुष्याला तोंड दिले. संगमनेर येथे शिक्षिकेची नोकरी केली व राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कार मिळवला ,अशी अतिशय कर्तृत्ववान ! तिच्या सांगण्यातून आणि लेखनातून त्यांनी अनुभवलेली फाळणी आम्ही पाहिली !

एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणाऱ्या व फाळणी झाल्यावर अचानक राहायलाही जागा नाही अशी परिस्थिती ! पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो त्याप्रमाणे सर्व कुटुंबाने भरारी घेतली व नव्या आयुष्याला सुरुवात केली.

तिच्या पुस्तकाची सुरुवातच “8 फेब्रुवारी 1947 ,या दिवसाची !” गौरी सदन “कराची येथे नवीन घराची वास्तुशांती ! पण वास्तुशांतीला फक्त घरचे लोक व दोन भटजी ! देशातील वातावरणच अस्थिर होते. तेव्हा जे अनुभवले ते तिने शब्द रूप केले, पुढील पिढीला ते कळावे म्हणून !

“फाळणी नंतरचे काव्य” या लेखात ती सांगते, ” आमच्या जन्मापासून कराचीचे आणि आमचे नाते होते. कराची कधी सोडावी लागेल असे मनातही आले नव्हते. कराचीत दंगली उसळल्यावर सर्व कुटुंब मनोरा (कराची पासून जवळच असलेले बेट,जिथे आजोबांनी observatory त नोकरी केली ! ) येथे उदास व खिन्न मनस्थितीत गेले, केवळ दोन बॅगा बरोबर घेऊन ! त्यानंतर मिळेल तसे हे सर्व कुटुंब भारतात परतले. आत्त्या  सांगायची, ” वडिलांना फाळणीमुळे असे काही घडेल याची कल्पनाच आली नव्हती. इंग्रजी राजवट गेली, पाकिस्तानची येईल !सर्वसामान्य लोकांना काय त्रास होणार?” पण घडले भलतेच ! पाकिस्तानी लोकांनी त्यांना घराबाहेर काढले । सामानाची लुटालूट केली. त्यानंतर सर्व कुटुंब जसं येता येईल तसा प्रवास करून (पाच दिवस बोटीचा)   मुंबईला आले, तिथून पुण्याला आले आणि काही काळाने कोकणात जाऊन स्थिरावले !

७५ वर्षे होऊन गेली या कालखंडाला ! पण माझ्या माहेरच्या पेंडसे कुटुंबाने भोगलेल्या फाळणीच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी जाग्या होतात आणि नकळत आपण हे सगळे भोगणाऱ्या कुटुंबाच्या साखळीची एक कडी आहोत ही जाणीव मनाला बोचत राहते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का ?

– भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे  बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे 

Involvement…. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं ….  

….. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही  स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या  हुशारीला आपण दाद किती वेळा देतो?

निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

… किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी, निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत..

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तुलना थांबवा… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

स्वतःची इतरांशी,

आपल्या मुलांची इतर मुलांशी,

आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी,

 आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्यांशी,

आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी

तुलना थांबवा…

 

एक छोटीशी गोष्ट…

एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो. त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात. त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो, याचा अभिमान असतो.

एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते, “हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही?”

तो पोपटाला जाऊन तसे सांगतोदेखील. पोपट म्हणतो, “जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते, तोपर्यंत मलासुद्धा असेच वाटायचे, की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.”

मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो,” तू किती सुंदर आहेस आणि नशीबवानसुद्धा. तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला.”

तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, “मला तर वाटते, सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तूच असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेऊ शकत नाही. तू स्वतंत्र आहेस.” हे ऐकून कावळ्याला कळते, तो किती नशीबवान आहे ते.

असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. पाच लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र- मैत्रीण बारा लाख कमावतात, त्यांची असूया वाटते. बारा लाख कमावणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो, ‘पैसा तर खूप मिळतोय. पण शरीर साथ देत नाही. यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला असता, तर शरीर चांगल असतं.’ ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे.

 

एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल.

कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते.  पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते, याचं कौतुक त्याला वाटत नसतं.

मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला, यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असतं, पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो, याचा विचार ती कधी करतच नसावी.

 

तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात.

 

थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं,की ‘तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आम्ही शाळेतून त्याच नाव कमी करत आहोत.’

दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले, “मी शाळेत का जाऊ शकत नाही?” तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की , “तुझ्याएवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही. म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तो ही स्वतःच करावा लागेल.” आणि हे उत्तर ऐकल्या पासून एडिसन स्वतः ला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले.

जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती, तर ते एवढे महान झाले नसते.

 

जे आपल्याला मिळतं, त्याला काहीतरी कारण नक्की असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही. पण जे मिळालंय, त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.

इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात. खूप त्रास होत असतो.

आपण दिसायला सुंदर नसू, पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल.

आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू.

आपण लाखात कमवत नसू,पण आपलं आरोग्य उत्तम असेल.

आपण बाहेर देशात नसू, पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू.

आपल्याकडे खूप पैसा नसेल, पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील.

जे त्याला मिळालं, ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा, ‘हे मला का मिळालंय? यातून मी काय उत्तम करू शकतो?’ याचा विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 128 ⇒ बुनियाद… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बुनियाद।)  

? अभी अभी # 128 ⇒ बुनियाद? श्री प्रदीप शर्मा  ? 

 

बुनियाद को हम नींव भी कह सकते हैं, नींव के पहले पत्थर को हम शिलान्यास कहते हैं। सबसे बड़ी नींव होती है, शुभ संकल्प ! किसी के कल्याण अथवा हित के लिए जो पहला कदम उठाया जाता है, बस वहीं से उस कार्य की नींव पड़ जाती है।

एक पक्षी भी नीड़ का निर्माण करता है, सर्दी, पानी, ठंड से बचने के लिए घोंसले का निर्माण करता है, एक चूहे को भी बिल की तलाश होती है और एक शेर को भी अपनी मांद अथवा गुफा की। और तो और जहरीले सांप भी अपनी सुरक्षा और संवर्धन के लिए पाताल तक जाने के लिए तत्पर हो जाते हैं।।

जितना बड़ा जीवन उतनी ही अधिक सुरक्षा की तैयारी। किसी देश अथवा संस्कृति का जन्म यूं ही नहीं हो जाता। सदियां लगती हैं उसको बनने और संवरने में। कई उतार चढ़ाव, उथल पुथल और उत्थान पतन के नियति चक्र से गुजरने के बाद ही उसका अस्तित्व कायम रह पाता है। Rome was not built in a day.

हमारे स्वर्णिम अतीत पर भी कई बार ग्रहण लगा, लेकिन जहां बुनियाद मजबूत होती है, वहां मुसीबतें आंधी और तूफान की तरह आती रहती हैं, हमें लगातार झकझोर और कमजोर करने की कोशिश भी करती रहती है, लेकिन हम जिस परिश्रम, पसीने और बलिदान की मिट्टी से बने हैं, उसे देखते हुए वह थक हारकर वापस चली जाती है।।

हमारी आज की सफलता, सुरक्षा और मजबूती का श्रेय भी हमारी मजबूत बुनियाद को ही जाता है, जो तब रखी गई थी, जब हम पैदा भी नहीं हुए थे। आप जीवन में कितने भी आगे बढ़ जाएं, पढ़ लिख जाएं, भले ही देश के राष्ट्रपति बन जाएं, लेकिन अपने खुद के बाप नहीं बन सकते। जबकि लोग आपके पिताजी को अवश्य कह सकते हैं, यह देखो, राष्ट्रपति का भी बाप जा रहा है।

राष्ट्र आपकी धरोहर है, बपौती नहीं, क्योंकि ऐ मां, तेरे बच्चे कई करोड़। सबका इस देश पर उतना ही अधिकार है जितना आपका और मेरा। एक संयुक्त परिवार के जिम्मेदार सदस्य की भांति आप भी परिवार की देखभाल कीजिए और अपना उत्तरदायित्व निभाइए, लोकतांत्रिक व्यवस्था का हिस्सा बनिए, और नि:स्वार्थ रूप से देश की सच्ची सेवा कीजिए।।

इतनी भी सावधानी जरूरी है कि कोई अवांछित तत्व आपकी लोकतंत्र की नींव को कमजोर अथवा खोखली ना कर दे। जब तक हमारे इरादे बुलंद है, हमारी इमारत भी बुलंद है। इसके रहनुमा बनें, रहगुजर बनें, आका अथवा अधिनायक नहीं क्योंकि यह भोली भाली जनता जिसे कभी सिर पर बैठाती है, समय आने पर उसे धूल भी चटा देती है।

अगर हमारे दिलों में एक दूसरे के लिए प्यार और परवाह है, तो बांटने के लिए बहुत है। लेकिन जहां दिलों में नफरत और वैमनस्य है, वहां सिर्फ दिलों का बंटवारा ही होता है, लोकतंत्र और इंसानियत की नींव हिल जाती है, केवल कोई देश ही नहीं, पूरी मानवता भी खतरे में पड़ जाती है।

हमारी इंसानियत जड़ें बहुत गहरी हैं, इन्हीं जड़ों ने हमें पूरे विश्व से जोड़ रखा है, क्योंकि पूरी वसुधा ही हमारी कुटुंब है। जय हिंद, जय जगत।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.) – इथून पुढे 

सद्य परिस्थितीत राष्ट्र ही सर्वात मोठी व्यवहारी संकल्पना आहे. देशाच्या अंतर्गत समाजकंटकांपासून न्यायप्रिय लोकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस व न्याययंत्रणा असतात. राष्ट्राचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी सीमेवर सेनादले कार्यरत असतात.  

दुसऱ्याच्या कष्टाचे ओरबडण्याला चोरी वा लुट असे म्हणतात. राष्ट्र सुद्धा चोऱ्यामाऱ्यांचा शॉर्टकट घेवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून तेथील साधनसंपत्तीची लुटालुटली केल्याची अगणित उदाहरणे इतिहासात सापडतील. 

भारताने मात्र आजवर कुठल्याही राष्ट्रावर असा अन्याय केला नाही. पण भारतीयांच्या या सभ्यपणाला कदाचित भारताची कमजोरी समजली गेली. त्यामुळे खैबर खिंडीतून भारतावर आजवर अनेक आक्रमणे आली. 

एक हजार वर्षांपुर्वी भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबुत होती की जगाच्या GDP च्या 37% वाटा एकट्या भारताचा होता. इतकी आर्थिक सुबत्ता असुनही सैन्यदले कमकुवत ठेवण्याची चुक आपल्या पुर्वजांनी केली. परिणामी एक हजार वर्षांची गुलामगिरी आणि प्रचंड आर्थिक शोषणाला भारत बळी पडला. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची GDP जगाच्या GDP च्या केवळ 3% इतकीच शिल्लक राहिली होती. कधी काळी सोन्याचा धुर निघणारा संपन्न देश स्वतंत्र होईपर्यंत पार उघड्या-नागड्या लोकांचा देश झाला होता.

सीमेवर सेना सज्ज असेल तर देशाअंतर्गतही शांतता आणि स्थैर्य राहते. देशाअंतर्गत शांतता आणि स्थैर्य असेल तर देशात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेती, व्यापार आणि उद्योगधंदे बसतात. परकीय गुंतवणूक निघून जाते. म्हणून देशांच्या सीमेवर शांतता राहणे महत्वाचे असते. 

सीमेवर पराक्रमी सेना पहारा करत असेल तर देशामध्येही कायद्याचे राज्य येते. शांत आणि स्थिर वातावरणात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. परकीय गुंतवणूक वाढते. तंत्रज्ञानाचा विकास होतो. आर्थिक सुबत्ता येते. या आर्थिक सुबत्तेतून सेना सक्षम होते. सक्षम सेनेच्या फक्त धाकाने शत्रू आक्रमणाची हिंम्मत करत नाही. त्यातून देशात अजून स्थिरता आणि स्थैर्य येते. अशा प्रकारे सेनेच्या रक्षणातून शेती-व्यापार-व्यवसाय वाढतात. तसेच शेती-व्यापार-व्यवसाय वृद्धीतून सेना सुदृढ होते. या सकारात्मक चक्रातून राष्ट्र बलवान आणि संपन्न होत जाते. 

देशाची सेना मजबुत करण्याची जबाबदारी फक्त एकट्या सरकारची नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असते. सेनेसाठी नागरिक जेव्हा तण-मन-धन अर्पण करतात तेव्हा सेना बलवान होते. सेनेवर नागरिक तण-मन-धन अर्पण करत असतील तर सेनेचे मनोबल वाढते. शेवटी प्रत्येक सैनिकाला ‘मी कुणासाठी जीव धोक्यात घालून लढतोय’ हा प्रश्न पडतोच की! 

पायाजवळचा स्वार्थ पाहणे सोडून सेना संवर्धनाचा दुरचा विचार करणारे सुज्ञ नागरिक ज्या देशात राहतात त्या देशाची सेनादले मजबूत होतात. ते जीव तोडून देशाचे रक्षण करतात. तिथेच प्रगती होते. हेच देश आज विकसित म्हणून गणले जातात. 

कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचे आपण देणे लागतो का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडायलाच हवा. कुणी असे म्हणू शकते की इतके मोठे सैन्यदल! मी एकटा अशी किती मदत करू शकतो? पण सामान्य भारतीयांकडे अशी एक शक्ती आहे जी कुठलाही बदल घडवून आणू शकतो. ती शक्ती आहे संख्याबळ!  

140 कोटींचा देश! प्रत्येकाने 100 रुपये दिले तरी 14000 कोटी जमतील. देशातील लोकांच्या एक वेळच्या चहा-नाष्ट्याच्या पैशात संपुर्ण सैन्याला बुलेटप्रुफ जॕकेट मिळाले असते. पण तरी जवानांना इतकी वर्षे वाट पहावी लागली. 

जर लोकांनी पैसे जमा केले तर हा सगळा पैसा योग्य मार्गाने जाणेही आवश्यक असते. नाहीतर अशा पैशांना वेगवेगळ्या वाटा फुटून तो पैसा ठगांच्या खिशात जातो. इंटरनेटवर थोडे पाहिल्यावर कळाले की सैन्यदलांनी त्यासाठी छान व्यवस्था करून ठेवलेली आहे.

National Defence Fund !   

1962 च्या युद्धात सामान्य जनतेने यथाशक्ति मदत केली व कोट्यावधी रुपये सैन्याला दिले. या पैशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी National Defence Fund ची स्थापना झाली. या फंडात आपण नेट बँकींगने आॕनलाईन पैसे पाठवू शकतो. 

2016 सालच्या उरी हल्ल्यानंतर मी हादरून गेलो होतो. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला रोमांचित केले होते. पण 2019 च्या जानेवारीत उरी चित्रपट पाहिल्यावर मी सर्जिकल स्ट्राईक मधील खरा थरार अनुभवला. त्यात डोणज्याच्या दवाखान्यात मला दाखवायला BSF चा हा जवान आला होता. त्याची गोष्ट ऐकली आणि अंगावर काटा आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हा जवान वाचला होता. त्याचा मित्र आणि सहकारी मात्र इतके नशीबवान नव्हते. सैन्यदलासाठी आपणही काहीतरी करावे हा विचार मनातून काही केल्या जाईना.

प्रत्येक वर्षी एका सैनिकाला लागणारे बॕटल गिअर खरेदी करता येतील इतके पैसे National Defence Fund मध्ये द्यावेत यावर मी विचार करू लागलो. मग नेटवर सैन्यदलांच्या सौद्यांविषयीच्या जुन्या बातम्या शोधल्या. सैन्यातील मित्रांना विचारले. थोडी माहिती मिळाली. 

Bullet proof jacket- कंपनी SMPP Pvt Ltd- किंमत प्रतिनग 35000 रुपये 

Assalt rifle- कंपनी SIG SAURE / कंपनी AK203- किंमत प्रतिनग साधारण 80000 रुपये 

Helmet- कंपनी Kanpur-based defence firm MKU- किंमत प्रतिनग 10800 रुपये 

Helmet mounted Night vision camera – कंपनी PVS 7 Gen 3 Night Vision Goggles- किंमत  65000 रुपये.

एकूण 35000 + 80000 + 10800 + 65000 = 190800 म्हणजे वर्षाला 200000 /- रुपये. 

हा सर्व विचार चालू असतानाच 14 फेब्रुवारी 2019 ची पुलवामाच्या आत्मघाती स्फोटाची बातमी आली. एक दहशदवादी स्वतःबरोबर चाळीस चाळीस जवान उडवून देतो. मन विषन्न झाले. देशाच्या शत्रूंची विद्ध्वंसक मानसिकता यातून पुन्हा जाणवली. दर वर्षी सैन्य दलाला दोन लाख रूपये द्यायचा मी तात्काळ निश्चय केला. 

खरे तर दोन लाख ही रक्कम माझ्या कमाईचा मोठा भाग होता. पण माझा निर्णय पक्का झाला होता. आता मागे फिरण्याचा विचारही शक्य नव्हता. माझ्या दवाखान्याशिवाय मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आॕपरेशन करायला जातो. त्याचे जे पैसे मिळतात ते या कामासाठी वापरायचे असे मी ठरवले. बायकोला बेत सांगितला. ती तर माझ्यापेक्षा जास्त खुष झाली.  “नक्की करा आणि घरखर्चाची चिंता करू नका. या कामात काही मदत लागली तर मलाही सांगा” असं ती म्हणाली. आणखी हुरूप वाढला.

पहिले इंटरनेट बँकींग ॲक्टिव्हेट करून घेतले. पहिले दोन लाख नॕशनल डिफेंस फंडाला पाठवले. काही मिळाले की आनंद मिळतो याचा अनुभव आजवर होता. देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली. 

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

स्वपरिचय

शिक्षण –B A, MSW, PGDPC

  • व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करीत आहे.
  • वाचन आणि लेखनाची आवड. विविध नामवंत वर्तमान पत्रामध्ये सामाजिक प्रकल्पा विषयी लेखन प्रसिद्ध तसेच सामाजिक आशय असलेल्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • २०१६ मध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश या नावाने लघुकथा लिहिली. ती व्हॉटसपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजतागायत सलग 373 रविवार विविध विषयांवरच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • संडे डिश या रजिस्टर ब्रॅंड नावाने दर रविवारी सकाळी प्रसिद्ध होणारी लघुकथा वाचणं हा अनेक रसिकांसाठी रविवारचं नवं रुटीन झालयं.
  • अभिवाचन,ऑडिओ,व्हिडीओ,पुस्तक या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वाचकांपर्यंत पोहचलेल्या संडे डिशचं पुस्तकही प्रसिद्ध झालंय.

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर

साल १९८६…

पावसाळ्याचे दिवस,मी सातवीत असतानाची गोष्ट.संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट,लाईट गेलेले,सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.

’काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………

……. माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना,नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. 

“ नाना,तुम्ही रडताय ”

“ नाही रे.पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला..  असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.

—- 

साल २०२3 

पावसाळ्याचे  दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम,जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …. ..चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला  पाहून बायको प्रसन्न हसली.

“देवाची कृपा !! सुखरूप आलात”

“काय भयानक पाऊस आहे. ”

“हो ना.तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार,फार भीती वाटत होती.”

“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”

“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”

“एवढ्या पावसात फिरायला??”

“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत.”

“छत्री??”

“नाही नेली. मी सांगितलं,जाऊ नका, तरीही बाहेर पडले.” 

“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”

“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते.  मग जा”

“नको.जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा !!!” 

अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत,रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं…..   ‘ काही गरज नव्हती.एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.

मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना  दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.

“ नाना,नाना मी बोलतोय.कुठे आहात ”..  काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो,हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील, ..  ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.

पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा  फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची  रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना,नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला. 

“नाना !!!” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.

“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.

“मी आहे काळजी नको” 

“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती.वाटलं की आता……” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.

“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”

“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास.”

“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता.” नाना फक्त हसले….. 

… घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.

काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं.  फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार …..

सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले…. 

“बाबा,फोन का रिसिव्ह करत नाही”

“पाऊस होता म्हणून…”

“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो” . 

नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

 ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमार देवतांना उद्देशून रचलेल्या सतरा ते एकोणीस या ऋचा आणि उषादेवतेला उद्देशून रचलेल्या वीस ते बावीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

आश्वि॑ना॒वश्वा॑वत्ये॒षा या॑तं॒ शवी॑रया । गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥

 अश्वधनुंच्या संगे घेउनी पशुधनाला या

सुंदरशा हे अश्विन देवा आम्हा आशिष द्या

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती दान आम्हा द्यावे

वैभवात त्या सुवर्ण धेनू भरभरुनी द्यावे ||१७||

स॒मा॒नयो॑जनो॒ हि वां॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यः । स॒मु॒द्रे अ॑श्वि॒नेय॑ते ॥ १८ ॥

 देवा अश्विनी उभयता तुम्ही राजबिंडे

अविनाशी तुमच्या शकटाला दिव्य असे घोडे

तुम्हा रथाचे सामर्थ्य असे अतीव बलवान

सहजी करितो सागरातही तुमच्यासाठी गमन ||१८||

न्य१घ्न्यस्य॑ मू॒र्धनि॑ च॒क्रं रथ॑स्य येमथुः । परि॒ द्याम॒न्यदी॑यते ॥ १९ ॥

 अजस्त्र अतुल्य ऐशी कीर्ति तुमच्या शकटाची

व्याप्ती त्याची त्रय लोकांना व्यापुनि टाकायाची

अभेद्य नग शिखरावरती चक्र एक भिडविले

द्युलोकाच्या भवती दुसऱ्या चक्राला फिरविले ||१९||

कस्त॑ उषः कधप्रिये भु॒जे मर्तो॑ अमर्त्ये । कं न॑क्षसे विभावरि ॥ २० ॥

 स्तुतिप्रिये हे अमर देवते सौंदर्याची खाण

उषादेवते  सर्वप्रिये तू देदीप्यमान 

कथन करी गे कोणासाठी तुझे आगमन

भाग्य कुणाच्या भाळी लिहिले तुझे बाहुबंधन ||२०||

 व॒यं हि ते॒ अम॑न्म॒ह्यान्ता॒दा प॑रा॒कात् । अश्वे॒ न चि॑त्रे अरुषि ॥ २१ ॥

 विविधरंगी वारू सम तू शोभायमान

तेजाने झळकिशी उषादेवी प्रकाशमान

सन्निध अथवा दूर असो तुझे आम्हा ध्यान

येई झडकरी आम्हासाठी होऊनिया प्रसन्न ||२१||

 त्वं त्येभि॒रा ग॑हि॒ वाजे॑भिर्दुहितर्दिवः । अ॒स्मे र॒यिं नि धा॑रय ॥ २२ ॥

 सामर्थ्याने सर्व आपुल्या ये करि आगमन

उषादेवते आकाशाच्या कन्ये आवाहन

संगे अपुल्या घेउनी येई वैभवपूर्ण धन

दान देई गे होऊनिया आमुच्यावरी प्रसन्न ||२२||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/ifGvMF3OiTs

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरेदी…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरेदी…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

“तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”

“होय आहे.”

“कधी घेतलात?”

“झाली की १५-२० वर्षे.”

“व्वा! शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता  बहुतेक.”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुधा . हिला माहीत आहे.”

“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”

“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो!”

“पण मग घेतला कशाला?”

“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.

चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली- जाळ्या, जळमटे फार छान निघतात.”

“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो . कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. ..मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी, ‘अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.’

मी म्हणतो,’तिला तूच कर.’ तर म्हणते कशी… ‘हे पुरुषांचं काम आहे.’ “

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा  आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.”

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

 

“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे. रोज करता की नाही व्यायाम?”

“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.”

“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…

“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.”

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”

“होता ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. हीपण म्हणाली होती की मी पण करीन व्यायाम. पण राहूनच गेले.”

“आता वापरून बघू यात का?”

“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.”

 

“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”

“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.”

“त्याचं काय करता?”

“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.”

“अरे व्वा! वहिनींचा त्रास कमी झाला असेल नाही.”

“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणीक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.”

“मग घेताना लक्षात आले नाही?”

“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.”

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय की बुवा?… हे बघा, ही म्हणाली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. मी विचारत नाही- का? कशाला?”

 

“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“हो. आहे ना.”

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.”

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.पंधरा”

“मधे कधी घालून बघितलात?”

“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.”

“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बस इतकाच.”

“काय किंमत होती?”

“त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू त्या अजून वापरतात?”

“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?”

“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना, दर वेळी तोच तोच शालू वापरला, तर इतर बायका हसतील, असे तिला वाटते.”

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत.”

“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. कधी घेतला?”

“फार वर्षे झाली.”

“कधी वापरला जातो?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. ३६ पीस होता. आता ३५ पीस राहिलेत.”   

“मग दुसरा बाउल आणायचा ना!”

“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.”

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते, क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही, कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.”

“शोकेसमध्ये छान दिसतो पण.”

“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.”

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“ बरेच !…खूप आहे की . राईस कुकर, कॉफी मशीन, शिवणाचं मशीन आणि अजूनही बरंच काही.”

उगाच हसू नका. तुमच्या घरात काही वेगळे नाही. तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशीच, हीच असणार.

पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नाशिक , पुना, मुंबई,तळेगावला घेतात. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात,तर रस्ताच विसरलेले असतात. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात.

 तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

😃

बामणिन् ग्येली खय् व्हती उनाची?

अगो बायो जाणार कुठे! लुगड्याला आखोटा लागून फाटलं होतं वीतभर. शेजारच्या वच्छिनं दिलेन् टांके घालून्. मला आता दिसत नाय गो नेढ्यात दोरा ओवायला.

व्हय् व्हय्. तां पन् खरां.

गो बाय् , तुज्याकडं  ताक गावल् काय गो लोटाभर?

आता कुठचं ताक उरायला! आणि बघितलंस्? मी दिसले रे दिसले, की मागामागीला सुरुवात!

तसां नाय् गो. आता पोरां येतिल नाय् सालंतून? तापून येतंत गो उनाची! त्यानला कोप कोप पिल्यावर वाइंच बरा वाटता. पन् ऱ्हावंदे. नको आता. बरां ता बरां. जाव मी आता घरी?

पाहीलंस्? ताक नसेल म्हटल्यावर चालली तशीच घरी! पोरांची काही काळजी आहे की नाही? चल माझ्याबरोबर. थोडं ताक शिल्लक असेलसं वाटतंय् दगडीत! असलं तर देते.

🌴

पूर्वीच्या काळी गांवा-खेडेगांवात बामणी-कुणबी बायका कुठे भेटल्या तर त्यांच्यात असे आपुलकीचे संवाद घडायचे. आपापल्या मराठीत. सहकार्य शब्दाचा केवळ जप न करता आचरण सहकाराचे होते.

🌴

😃

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares