मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

परिचय

शिक्षण : MBBS, DGO, DNB from BJ Medical College Pune

डॉ गोपालकृष्ण गावडे हे पुणे येथील सिंहगड रोड वरील प्रसिद्ध City Fertility Center या टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे डायरेक्टर आणि IVF consultants म्हणून कार्यरत आहेत, तसेच सिंहगड रोड वरील Gurudatta Diagnostic Centre & Annual Heath Check Up Clinic चे डायरेक्टर म्हणून ते कार्यभार बघतात.

डॉ गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रूग्नालयांमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ म्हणून सेवा पुरवतात. सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभाई पटेल cantonment हॉस्पिटल पुणे येथे गेल्या आठ वर्षांपासून मानद सेवा पुरवत आहेत.

आजवर त्यांनी पाच हजारापेक्षा (५,०००) जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका सैनिकाला आवश्यक असणारे बॕटल गिअर म्हणजे असॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जॅकेट (bullet Proof Jacket), हेल्मेट(helmet), नाईट विजन गोगल्स (Night Vision Goggles) आणि इतर सामुग्री यांच्या साठी लागणारी रक्कम (दोन लाख) सैन्य दलास भेट देतात. तसेच 2019 पासून हे अभियान इतरांनी चालवावे यासाठी जनजागृती सुद्धा डॉक्टर करत असतात.

डॉ गावडेंनी दोन पुस्तके लिहली आहेत.

  1. असामान्य यश मिळवणारे मन नक्की कसा विचार करते याचा शोध घेणारे स्मार्टर सेल्फिश हे पुस्तक आणि
  2. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ गावडेंना आलेल्या हृदयदस्पर्शी अनुभवांचे संकलन असलेले पुस्तक अनुभुति अशा दोन पुस्तकाचे ते लेखक आहेत.

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

तेव्हा मी सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावात छोटे हॉस्पिटल चालवत होतो. 2019 साल चालू होते. पानशेत धरणाच्या खाली BSF चा मोठा कँप आहे. तेथील जवानांना मी मोफत वैद्यकीय सेवा देत असे. आधून मधून BSF चे जवान मला दाखवायला येत. असाच एका दुपारी पस्तिशीच्या आसपासचा एक जवान दाखवायला आला. 

“डाक्टर साहब, बुखार से शरीर तप रहा है. थंड भी लग रही है.” त्याने त्याच्या उत्तर भारतीय हिंदी टोनमध्ये आपला त्रास सांगितला. 

“लघवीको आग हो रही है क्या? आग मतलब जलन.” मी आपल्या गुलाबी हिंदीत त्याला विचारले.

“नही डाक्टर साब” 

“घसा दुखता है क्या?” 

“ना” 

“संडास पतला हो रहा है? पेट दर्द वगैरा?”

“नही. बाकी कुछ भी तखलिफ नही. सिर्फ थंडी-बुखार है.” 

“अच्छा, बेड पर लेटो. जरा BP वगैरा जांच कर लेता हुँ.” 

तो जवान उठला आणि बुट काढुन एक्झामिनेशन बेड वर झोपला.

मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कप बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला. “इधर क्या हुआ था?”

“गोली लगी थी साहब.”

मी उडालोच, “यह गोली का जखम है?” 

“एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था.” त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला. 

“बाप रे, फिर बचे कैसे? आप सनी देओल हो क्या?” 

“काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की खुन की बडी नली फटी नही. वक्त पर फस्ट एड मिला. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था.”

“यह सब कहाँ हुआ था?”

“व्हॕलीमे साहब, कश्मीर व्हॕली में.”

मी त्याला तपासले. आम्ही दोघे परत आपापल्या जागांवर स्थानपन्न झालो. मी त्याला हिमोग्राम, युरीन, डेंगू, मलेरिया, टामफॉईड अशा दोन तीन तपासण्या करायला सांगितल्या. औषधे लिहून दिली. कशी घ्यायची ते समजावून सांगितले. आराम, हायड्रेशन वगैरे काही पथ्य सांगितली. पण त्याची पुर्ण स्टोरी ऐकायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती.

“तो व्हॕलीमे क्या हुआ था उस दिन? यह सब कैसे हुआ था?” 

“कुछ नही साहब, हमको इंटिलिजंस मिला की एक गाँवमे एक घरमें टेररिस्ट छुपे है. तो हमने गाँवका कॉर्डन कर लिया. काॕर्डन कर लिया मतलब गाँव को घेर लिया. रात का वक्त था. लाईट भी नही थी. टेररीस्ट किस घर में छुपा है पता नही था. तो हर घर की तलाशी शुरू हुई.

हम चार लोक एक घर में घुसे. एक जेसीओ और हम तीन जवान थे. घर मे पुरा अंधेरा था. जेसीओ साहबने जैसेही टॉर्च लगाया तो कोनेसे ब्रस्ट फायर आया. सामनेवाले तीनोंको गोली लगी और हम गिर पडे. पिछे वाले चौथे जवानने टेररीस्ट के गन के मझल फ्लॕशके ओर अंदाजेसे गोलीयाँ चला कर उसे मार डाला. 

जेसिओ साहब और मेरे सबसे अच्छे दोस्तने जगहपरही दम तोड दिया. मै मरते मरते बचा. बस मेरा वक्त नही आया था उस दिन.” मित्राच्या आठवणीने त्याचा आवाज कातर झाला होता. कंसल्टिंगमध्ये काही क्षण शांतता होती. 

“आपने नाईट व्हिजन गॉगल्स या बुलेटप्रुफ जॕकेट नही पहने थे?” मी आश्चर्याने विचारले. 

“कहाँ साहब? दस-बारा साल पुरानी बात है. तब यह सब चिजें कहा मिलती थी? नाईट व्हिजन गॉगल्स तो आज भी सिर्फ स्पेशल फोर्सेके पास होते है. आज भी बहुत सारे जवानोंके पास पुरानी इंसास राइफल होती है. वह AK के मुकाबले उतनी कारगर नही है.” मी अवाक होऊन ऐकत होतो. 

“चलो साहब, निकलता हुँ. खुन जाँच कराके रिपोर्ट दिखाने आता हुँ. तब तक गोली चालू करू न?” तो उठला.

“हाँ हाँ. चालू करीए. व्हायरल ही लग रहा है. ठिक हो जाओंगे. लेकिन आजकल डेंगू और मलेरिया के पेशंट भी मिल रहे है. इसलिए जांच जरूरी है.” 

“ठिक है साब.” असे म्हणत तो केबीनच्या बाहेर पडला. मी मात्र विचारांमध्ये गढून गेलो.

आपली सेनादले आज किती खराब परिस्थितीत लढत आहेत! ही परिस्थिती सध्या हळूहळू सुधारते आहे. तरी पण ही परिस्थिती पटकन सुधारण्यासाठी माझ्यासारखे सामान्य नागरीक काही करु शकतो का?     

2004 सालापासून सैन्य बुलेटप्रुफ जोकेटची मागणी करत आहे. पण ती अंशतः पुर्ण व्हायला 2016 उलटला. भारताचा शत्रू AK 47रायफल ने लढतो आणि आमचा सैनिक मात्र त्याचा सामना इन्सास सारख्या निकृष्ट रायफलने करतो. आपल्यावर वेळ आली तर अशा विषम परिस्थितीत लढून आपण आपला जीव धोक्यात घालू का? टेररिस्ट असल्याचा संशय असलेल्या आंधाऱ्या खोलीत आपण असे नाईट व्हिजन गॉगल्सशिवाय शिरण्याचे धाडस करण्याचा विचार तरी करू का? आणि ते ही बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय?  

दरम्यान मधल्या सरकारने उद्योजक आणि शेतकऱ्यांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. लाख लाख कोटींचे अनेक घोटाळे झाले. पण सैन्याच्या बुलेटप्रुफ जॕकेट वा आधुनिक रायफल सारख्या मुलभुत गरजा मात्र पुर्ण झाल्या नाहीत. 

या काळात कितीतरी जवानांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या असतील. कितीतरी स्रिया विधवा झाल्या आणि कितीतरी मुलं अनाथ झाली असतील. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या वाट्याला सहानुभूती आणि बंदुकीच्या तीन फैरींची सलामी सोडल्यास फार काही पडले नसेल. 

वायुसेनेला अजूनही सत्तर वर्षांपुर्वीची जुनी मिग 21 विमाने वापरावी लागत आहेत. नेव्हीची एकमेव विमान वाहक नौका आणि बहुतेक लढावू जहाजे सेकंड हँड आहेत. कुणासाठी मी माझा जीव धोक्यात घालतोय हा प्रश्न प्रत्येक सैनिकाला पडत नसेल? कमी पगार, कुटुंबापासूनचा अनेक महिन्यांचा दुरावा, अपुऱ्या साधनसामुग्रीने शत्रूचा सामना, सतत जीवावरचे संकट, अशा परिस्थितीत काम करूनही भारतीय सैनिकांचे मनोबल आणि राष्ट्रभक्ती टिकून आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. 

प्रत्येक जन आपल्या हितांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले हित नक्की कशात आहे हे कळण्याचा स्मार्टनेस सर्वांमध्ये असतोच असे नाही. कुटुंबाचे रक्षण झाले तर कुटुंब आपले रक्षण करते. राष्ट्राच्या सीमांचे रक्षण झाले तरच राष्ट्र आपले रक्षण करते. कुटुंब, समाज वा राष्ट्र यासारख्या संकल्पना जपण्यात घटक जनांचा दुरोगामी स्वार्थ असतो. कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत. 

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

लेखक – श्री मनोज मेहता

डोंबिवली. मो. ९२२३४९५०४४ 

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर☆

श्री सदानंद  कवीश्वर

? इंद्रधनुष्य ?

☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर

राणी लक्ष्मीबाईचा ८ वर्षांचा मुलगा दामोदरराव यांच्या पाठीवर कापड बांधून घोड्यावर स्वार होऊन ब्रिटीशांशी लढतानाची राणीची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कोरलेली आहे.

दाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही, की ‘ लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्यानंतर झाशीच्या अल्पवयीन राजपुत्राचे काय झाले ?’

राणीचा मुलगा दामोदरराव आणि त्याच्या पुढच्या ५ पिढ्या इंदूरमध्ये निनावी जीवन जगल्या, ते अहिल्या नगरी राहिले, हे केवळ मोजक्याच लोकांना माहीत आहे.

कोणतीही सरकारी किंवा सार्वजनिक मदत न मिळाल्याने, राणीच्या वंशजांच्या पहिल्या दोन पिढ्यांनी आपले जीवन अत्यंत गरिबीत आणि भाड्याच्या घरात घालवले.   त्यांना शोधण्यासाठी कधीही, कोणीही प्रयत्न केले नाहीत.

खरेतर, राणीचे वंशज २०२१ पर्यंत शहरात राहिले होते. नंतर ते नागपुरात स्थलांतरित झाले, जिथे सहाव्या पिढीतील वंशज आता एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि निनावी जीवन जगणे पसंत करतात.  झांशीवाले हे बिरूद त्यांच्या नावावर जोडून त्यांनी झाशीशी असलेला संबंध आजही जिवंत ठेवला आहे.

लेखक : सॉफ्टवेअर अभियंता योगेश अरुण

प्रस्तुती : सदानंद कवीश्वर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

१६ ऑगस्ट….  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी …. त्यानिमित्ताने …….. 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत….. 

मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, 

कठीण वज्रास भेदू ऐसे. 

भले तरी देऊ कासेची लंगोटी, 

नाठाळाचे माथी हाणू काठी. 

… या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. कृष्णबिहारी संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ‘आओ मनकी गाठे खोले’ या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ‘ बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. ‘

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ‘ हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ‘ ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडिलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

(त्यांच्यावरील हा लेख माझ्या अष्टदीप या पुस्तकातून. या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला आहे.)

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉलमध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली, की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे.सासू, सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे. पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी.मुलांची बस येणार नव्हती.सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती.तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येताना मुलांना घेऊन येऊ.”

नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं. लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे.त्यानंतर बहुधा पहिल्यांदाच दोघे बाहेर जात होते.एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना.

तिने छानपैकी तयारी केली.  दोघेही निघाले. मुलांना शाळेत सोडलं. तिला खूप वेगळं वाटत होतं.स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागली , पण मग सासू सासरे घरात नाहीत,असं आठवलं नि परत निर्धास्त झाली.

त्याने मॉलकडे गाडी वळवली. मॉलमधले मोठमोठे शॉप्स बघत दोघे चालत होते.ती तिथल्या बायकाही बघत होती.

वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस.मेकप मध्ये असलेल्या तिच्याहून अधिक वयाच्या बायका. एकदम मॉडर्न.अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती.जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती. पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…

एका दुकानापाशी थांबली.होम डेकोरचं साहित्य होतं तिथे. ती हात लावून एकेक बघत असताना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे. काही कामाचं नाही. चल इथून.” दुसरीकडे प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं  मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”

“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं.तू चल इथून.”

ती निघाली,

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढया बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.

तो म्हणाला, “जड आहे खूप.”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून.”

“असं काही नसतं.तुला नाही कळत त्यातलं.चल.”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली.

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले.

ती म्हणाली, ” मी मुलं खातात, तसा पिझ्झा खाणार.”

तो म्हणाला, “मी ऑर्डर देऊन येतो.”

“मी जाऊ का? तुम्ही बसा.”

तो हसला,”तुला नाही जमणार.मॉल मध्ये आहोत आपण.कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही.”

तीही हसली.तिनेही आपलं ‘न जमणं’ मान्यच केलेलं.

तो काउंटर वर गेला.गर्दी होती तिथे.

ती आजूबाजूला बघू लागली.

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता.

मॉलमध्ये त्या फ्लोरच्या मधोमध एक छोटासा स्टेज होता. आजूबाजूला बरीच गर्दी होती.माईकवरुन आवाज येत होता.

काय असेल? तिला कुतूहल वाटलं.

नवरा लाईनमध्ये उभा होता. त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली.

“Now next contestant? Please step forward.”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते. सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरिरीने भाग घेत होत्या. ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली, तिला नाही.तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला.

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती, पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे? इकडे या.”

ते ऐकून ती अजूनच घाबरली.

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली. तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं.

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता.

 

इंग्रजीमधले अवघड स्पेलिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते. ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता.

तिला दरदरून घाम फुटला.

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, तिला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला-

लेफ्टनंट.

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं.

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता.त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली.तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं.

तिने बरोबर स्पेलिंग लिहिलं.

बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,

पुढचं स्पेलिंग- बुके.

तिला आठवलं, मुलांचे तपासलेले पेपर घरी आलेले, तेव्हा मुलाने हे स्पेलिंग चुकवलं होतं. टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलं.ते तिच्या लक्षात होतं.

एक बाई आऊट झाली.

आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली.

पुढचं स्पेलिंग- रेस्टरन्ट.

तिच्या डोक्याला मुंग्या आल्या.सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं.डोळ्यात पाणी जमू लागलं.

नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोलून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात.

फक्त नजर तीक्ष्ण हवी.”

तिला येईना. तिने आजूबाजूला पाहिलं.

लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,

“कॉंटिनेंटल रेस्टोरेंट.”

तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं.

दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,

ती जिंकली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,

माईकवर तिचं नाव ऐकलं, तसा तो ट्रे टेबलवर ठेवून तिकडे पळाला.

त्याला सगळं समजलं. तो हैराण झाला.

सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती. मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…

ती आनंदाने त्याच्यापाशी आली,”तू आणि इंग्रजी स्पेलिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेलिंग विचारलेली की काय? हा हा हा.” तो या गोष्टीकडे गंमत  म्हणून बघून हसत होता.

“अशी स्पेलिंग होती, जी तुम्हालाही जमली नसती.”

“मग तुला कशी जमली?”

“कसं आहे ना,

आजवर तुला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही, हेच ऐकत होते. आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला.तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी.पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले.कदाचित, उशिराच…”

तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..

नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला.सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला. काही जमेना..

तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,

“सोडा, तुम्हाला नाही जमणार.”

जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, आधिपत्य गाजवणं म्हणतात.

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

माझ्या प्रिय देशबंधूंनो आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा! 🙏🇮🇳💐

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ ला ७६ वर्षे पूर्ण झालीत, म्हणून आपला देश ७६ वर्षांचा तरुण झाला असे म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या बेड्या, जाच आणि अत्याचार अनुभवणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने प्राणपणाला लावून लढणारे तरुण स्वातंत्र्यसैनिक आता नव्वदी आणि शतकाच्या मध्ये असतील.  हे मोजके प्रत्यक्षदर्शी सोडले तर बहुसंख्य लोकांना हेच माहिती नाही की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्याकरता अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडलेले आहे. त्यातील मोजकी नावे अर्थातच नेत्यांची, बहुतेक तर अनामिकच राहिले, त्यांच्याकरता मला महान कवी कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात:

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील ‘सोहळा’ अन्य कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा का आणि कसा आहे? आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या शून्य प्रहरी  तिरंगा फडकावला. त्यांचे जगप्रसिद्ध भाषण सगळीकडे उपलब्ध आहेच, पण त्यातील एक वाक्य मला नेहमीच भावते, नेहरूजी म्हणाले होते, “आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल.” सुरुवातीची कांही वर्षे या नवोन्मेषात प्रगतीचा आलेख उंच उंच चढत गेला. मात्र ही चढती भाजणी लवकरच स्थिरावली. स्वातंत्र्याने सर्व समस्यांचे निराकरण होईल, या आशावादावर अवलंबून राहणे कठीणच होते. नवीन सुनेला घरची जबाबदारी मिळेपर्यंत खूपच उत्सुकता असते. ‘मला राज्य मिळू दे, मग मी काय करते ते बघाच’ हे कधी मनात तर कधी ओठावर आणून सांगणारी सून जबाबदारीचे भान आल्यावर लवकरच सासूसारखी केव्हा वागायला लागते, ते तिचे तिलाच कळत नाही! नंतर हे राजकर्त्यांना देखील कळायला लागले.

मंडळी, आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागरूक असतो तेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करतो आहे का? हे भान असणे महत्वाचे नाही का? एक रोजचेच उदाहरण! रस्त्याच्या कडेला ‘फुटपाथ’ नामक छोटीशी मार्गिका असते, तिला चांगले रंगवून वगैरे ठेवल्याने ती पायदळ चालणाऱ्यांना चांगलीच ठसठशीत दिसत असते. मात्र गर्दीच्या वेळी याच फुटपाथवरून शिताफीने स्कूटर, मोटारसायकल इत्यादी वाहनांनी ती व्यापलेली असते. बिच्चाऱ्या कारवाल्यांसाठी ती अंमळ अरुंद असते! आता पायिकांनी कुठे अन कसे चालायचे याचे धडे कोणी द्यावे? थोडक्यात काय, ‘माझे स्वातंत्र्य तर माझे आहेच अन तुझे बी माझेच’ असा कारभार आहे! मला संविधानाने अधिकार दिलाय, तसा तो इतरांना देखील दिलाय, हे समाजभान अन राष्ट्र्भान कसे येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतांना त्याची ‘इव्हेंट’ का होते? ध्वनिक्षेपक ठराविक राष्ट्र्भक्तीने भारलेली गाणी प्रसारित करीत असतो. कधी लहान मुले ‘पाठ करून “आजादी”  विषयी त्यांच्या वयाला डोईजड होतील अशी शाळा शाळांमधून भाषणे देत असतात. त्यांच्या स्मरणशक्तीचे आणि शिक्षक व पालकांच्या मेहनतीचे खूप कौतिक करावे हे अगदी स्वाभाविक! पण या निष्पाप मुलांना त्या टाळ्याखाऊ भाषणाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणे हे संबंधित वडिलधाऱ्यांचे कर्तव्य असावे! म्हणजे ही पोपटपंची न राहता खरीखुरी देशभक्ती होईल. कोण जाणो अशातूनच एखादा मुलगा व मुलगी देशसेवेचे व्रत घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघेल!     

शेवटी असे वाटते की, ‘या देशाने मला काय दिले?’ असा प्रश्न ज्यांना वारंवार सतावतो त्यांनी ‘मी देशाला काय देतोय?’ या एकाच प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्यावे! आपल्या मुलाला शिक्षण देताना पालक त्यावर केवळ ५ ते १० टक्के खर्च करतात, उर्वरित खर्चाचा भार समाज उचलतो. हे आपल्या देशाचे अनामिक नागरिक आपल्या या प्रगतीचा किती वाटा उचलत आहेत, हे ध्यानात आले तर या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कांही अंशी कळेल!   

या शुभ प्रसंगी सर्वांचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन,

धन्यवाद! 🙏🇮🇳💐

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनानंद… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

सृजनानंद… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये एक चित्रकार दडला आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्य रुपी कॅनव्हास वर तो आपले कर्तुत्व रेखाटतो. परिस्थितीनुसार त्याला जी शिकवण संस्कार शक्ती बुद्धी मिळते त्याचा तो ब्रश प्रमाणे वापर करतो. निसर्गतः त्याच्याकडे विविध रंग उपलब्ध आहेत. ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार,’ आचार आणि उच्चार. त्याने, फक्त सुंदर रंगांची योग्य निवड करून ते कल्पकतेने चित्रात भरायचे असतात. म्हणजे सृजनानंद निर्मिती तयार होते. पण स्वकर्तुत्वाने अशी कलाकृती निर्माण करताना त्याला प्रथम दुःख विरह संकटे यातना यातून पार पडावेच लागते. म्हणूनच  सर्व रंग मिसळून तयार होणारी काळी चौकट चित्राला शोभून दिसते. चित्राला सुरक्षित ठेवते आणि चित्राचे सौंदर्य वाढवते.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

??

☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे. 

माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच ! 

तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता. 

रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची. 

सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि… 

तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग  एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो.  म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो. 

मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो. 

शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.

रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे. 

आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे. 

काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.

आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे. 

अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची ! 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आपल्या देशात दोन प्रमुख राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. 

१) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट. 

२) भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी.

या दोन्ही दिवशी आपण झेंडावंदन करतो. उंच आकाशात झेंडा फडकवून त्याकडे पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु या दोन दिवशी झेंडा फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे किती जणांना माहिती आहे ?

१५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीला ध्वजारोहण असे म्हणतात.

इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉईस्टिंग (Flag Hoisting) असे म्हणतात, परंतु अनेक जण त्याचा उच्चार फ्लॅग होस्टिंग असा करतात. त्या दोन्हीही शब्दांच्या उच्चारामुळे अर्थात जमीन अस्मानाचा फरक पडतो. फ्लॅग हॉईस्टिंग म्हणजे ध्वजारोहण.

आता याला ‘ध्वजारोहण‘ का म्हणतात हे पाहू. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे आधी तो पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्या दिवशी झेंडा हा ध्वजस्तंभाच्या मध्यभागी अथवा मध्याच्या खाली फोल्ड करून ठेवलेला असतो. १५ ऑगस्टच्या सकाळी तो झेंडा खालून वरच्या टोकापर्यंत चढविला जातो आणि त्यानंतर तो फडकविला जातो. याचा अर्थ असा आहे की आधी हा झेंडा आकाशात नव्हताच आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे प्रत्यक्ष आकाशामध्ये असलेला ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून आपला झेंडा वरती चढविला गेला आणि आपल्या झेंड्याचा मान सर्वोच्च झाला. 

२६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपला देश स्वतंत्र होताच. फक्त तो प्रजासत्ताक झाला. त्यामुळे या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला घडीबंद करून चढवलेला असतो. फक्त खालून दोरी ओढून तो आकाशात फडकविला जातो. आपला तिरंगा हा आपल्या देशात सर्वोच्च मानाचा झेंडा असून प्रजेमधील प्रत्येकाला त्याकडे अभिमानाने मान उंच करून पाहता यावे म्हणून तो वरती टोकावर असलेला झेंडा फक्त फडकावला जातो. त्याला इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफरलिंग (Flag Unfurling) असे म्हणतात.

आणखी एक फरक म्हणजे, १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला फक्त दोरी ओढून राष्ट्रपती तो फडकवतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते हे याचे कारण असावे. 

१५ ऑगस्टला ‘ लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर … राजपथावर झेंडा फडकावला जातो, हा आणखी एक फरक. 

दोन्ही दिवशी ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीतला फरक प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. जय हिंद ! 

स्वातंत्र्य दिनाचा विजय असो !!

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा

 ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असतं, ती भावना म्हणजे ‘मैत्री’

 सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे ‘मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे…. कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते, समजावते ती ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलीकडे जाऊन आदर करते ती ‘मैत्री’

एकमेकांच्या उणिवांसहित केलेला स्वीकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’

एकमेकांचा आदर करते आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी ‘मैत्री’

खरंच किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

लेखिका – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares