मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

शनिवारी सकाळी मेघाचा, माझ्या मैत्रीणीचा हॉस्पिटलमधून फोन आला. “अंजूला मुलगी झाली. अंजू बरोबर दोन तास बसायला येतेस का? अमित नेमका कामासाठी बाहेरगावी गेलाय.”

मी अंजूसाठी तिला आवडणारी सालीच्या मुगाची खिचडी-कढी केली. पापड भाजले व डबे भरले. आल्याचा चहा थर्मास मध्ये भरला. गुलाबी कार्नेशनच्या फुलांचा गुच्छ घेतला आणि हॅास्पिटलमधे पोचले.

मी हॅास्पिटलच्या लॅाबीकडे जात असताना मेघाचा टेक्स्ट आला.. “डॅाक्टरांचा राऊंड झाला की मेसेज करते.”

मी लॉबीमध्ये बसले. आजूबाजूला बसलेले काळजीग्रस्त चेहरे, थकलेली शरीरे आणि नश्वर देह जवळून बघत होते. विधात्यानं रेखाटलेल्या आयुष्यरेषा लांबवण्याच्या प्रयत्नात दमून जाणारे जीव आपण ! पृथ्वीतलावरचा कितीही पैसा टाकून विकत न मिळणारा “वेळ” कसा वाढवता येईल त्यासाठी सर्व धडपड ! 

तेवढ्यात समोर लहान मुलांच्या वॅार्डमधे गडबड दिसल्याने विचारांची श्रुंखला तुटली. पोटात कालवलं.

 “ परमेश्वरा लहान मुलांना का आजार देतोस रे बाबा ” म्हणत असतानाच नीना दिसली.

नीना माझी आवडती विद्यार्थिनी ! सेवा करण्यासाठीच जन्माला आलेली !  उंच बांध्याची, हसताना मोहक खळया पडणारी अंतर्बाह्य सुंदर नीना नर्सच्या निळ्या कपड्यात फारच गोड दिसत होती. मी दिसताच लहान मुलीसारखी पळत आली.

“Mrs Ranade, so good to see you.” 

“कशी आहेस नीना” म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली. “पेडियाट्रिक वॉर्डमध्ये काम करतेस हल्ली? ठीक आहे ना सगळं?” मी विचारले.

हातातला स्टेथास्कोप तिच्या ऍप्रनच्या खिशात ठेवत ती म्हणाली, ” हो. आजची गडबड फार वेगळी आहे. आमचे छोटे पेशंटस एकदम खूष आहेत आज. अनेक शाळांकडून त्यांना आज मॅजिक रॅाक्सची भेट आली आहे. खरं तर त्याला “काइंडनेस रॉक्स”(Kindness Rocks) म्हणतात, पण मी त्यांना “मॅजिक रॅाक्स” म्हणते.

“मॅजिक रॅाक्स?? मी काही शाळांच्या पटांगणात कधी एखाद्या झाडाच्या बुंध्याशी, कधी बागेत, कधी बीचवर, रंगीबेरंगी, छान मजकूर लिहिलेले लांबट गोलाकार दगड बघितले आहेत. पण तो मुलांचा चित्रकलेचा प्रोजेक्ट वगैरे असावा यापलीकडे त्याचा फारसा विचार केला नव्हता. तेच का मॅजिक रॅाक्स?” मी नीनाला विचारले.

तेवढ्यात तिथे असणाऱ्या १४ वर्षाच्या पेशंटला नीना म्हणाली, “अरे, मॅडमना दाखव ना तुला आज काय मिळाले ते?”

त्याने उत्साहाने छोटी केशरी रंगाची गिफ्ट बॅग उघडली. त्यातून एक लांबट, गोलाकार दगड बाहेर काढला. हाताच्या तळव्यात मावेल एवढा. तो लांबट दगड वरून सपाट होता त्यामुळे आपण पाटीवर लिहितो तसे त्यावर लिहिणे शक्य होते. तो दगड पांढऱ्या रंगाने रंगवला होता. त्यावर केशरी बास्केटबॉलचे चित्र काढले होते. शेजारी लिहिले होते,” यार, लवकर बरा हो. पुढच्या मॅचला तू हवासच.”

तो त्याच्या प्लास्टरमधे असलेल्या पायाकडे बघत म्हणाला, “ नक्की खेळू शकेन मी पुढची मॅच.” आपण पुढची मॅच खेळत आहोत हे चित्र त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होते.

“ मिसेस रानडे ”, नीना म्हणाली, ” मनाने घेतले मॅच खेळायची की बघता बघता हा पळायला लागेल बघा. माझं काय होणार, कसं होणार म्हणून रडत बसले की हिलींगला वेळ लागतो.. मनाची शक्ती प्रचंड असते. ती नाही कळत आपल्याला ! ती शक्ती मॅजिक रॅाक जागी करतो असं मला वाटतं. “

“पेडियाट्रिक वॉर्डच काय..हल्ली सर्व पेशंटना…. जगातल्या सर्व पेशंटना हं ” म्हणत तिने माझ्याकडे वळून बघितलं.. “ हे उभारी देणारे रंगीबेरंगी रॅाक्स सुंदर संदेश घेऊन भेट म्हणून येतात. पेशंटचा मूड एकदम इतका सुधारतो की विचारू नका !”

पुढच्या खोलीत छोटा पेशंट होता. सात वर्षाचा ! त्यानेही आम्हाला त्याला आलेली भेट दाखवली. त्याच्या हातातल्या मॅजिक रॅाकवर शब्द होते “बी (Bee) हॅपी.” आणि त्यावर एक हसरा चेहरा, एक सूर्य, आणि एक मधमाशी (Bee) काढली होती. चित्रकार अगदी बिगरीतला होता हे दिसतच होते.

तो मुलगा म्हणाला, ” निखिलला चित्रं काढता येत नाहीत.. ही मधमाशी, हा चेहरा…हाहाहा..म्हणत तो मनापासून  हसत होता.

नीना म्हणाली,” बघितली मॅजिक रॅाकमधली शक्ती? साहेब सकाळी रडत बसले होते आणि आता बघा.”

पुढे लागलेल्या वॉर्डमध्ये एक इन्स्पेक्टर काका होते.  नीना म्हणाली,” यांना शेजाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने फार सुंदर रॅाक पाठवलाय.”  निळसर रंगाने रंगवलेल्या त्या दगडावर युनिफॉर्ममधल्या पोलिसांचे चित्र काढले होते. खाली लिहिले होते, ” काका तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. लवकर बरे व्हा आणि घरी या. हसायला विसरू नका.” नीना म्हणाली, “काका तुम्हाला मॅजिक रॅाक पाठवलेल्या मुलाला कॅडबरी द्या बरं का !” काकांनी त्यांचा रॅाक उचलून कपाळाला लावला. म्हणाले, ” भलेभले मला रडवू शकत नाहीत पण या पोरानं ही भेट पाठवून रडवलं बघा.”

लहानपणी जादूचा दिवा, जादूची सतरंजी वगैरे पुस्तकं वाचताना भान हरपल्याचे आठवत होते. पण एकविसाव्या शतकातला मॅजिक रॅाक मला नि:शब्द करून गेला होता.

एक साधा दगड .. पण त्याला शेंदूर लागला की त्याचा देव होतो.. एक साधा दगड.. पण त्याला छिन्नी हातोडा लागताच त्यातून हवा तो ईश्वर प्रकट होतो..  तसाच एक साधा दगड…ज्याच्यावरचे संदेश माणसाला उभारी देतात. “ तुम्ही एकटे नाही..आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर ” म्हणतात. 

काय लागतं माणसाला कठीण परिस्थितीतून जाताना? …… 

कुणीतरी आपलं हित चिंतत आहे, कुणीतरी आपली आठवण काढत आहे, कुणीतरी आपलं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे.. बस. . एवढंच हवं असतं…. मॅजिक रॅाकवर आलेले निरागस संदेश किती जणांचं  मनोधैर्य वाढवत होते. हिलींग घडवून आणत होते…. सगळेच अगम्य !

आता मला ठिकठिकाणी बघितलेले ” मॅजिक रॅाक्स ” आठवू लागले. जवळच्या बीचवर मला मॅजिक रॅाक दिसला होता. त्यावर सोनेरी रंगात लिहिले होते..  “ एखाद्या ढगाळलेल्या आयुष्यातले इंद्रधनुष्य बन !”

एकदा टीव्हीवर एका जवानाने त्याच्या मुलाखतीत ” तू घरी येण्याची मी वाट बघतेय.” लिहिलेला रॅाक दाखवला होता. मुलांनी शाळेत जे मॅजिक रॅाक्स विखुरले होते त्यावर “तू एकटा नाहीस”, “क्षमा”, “दया”, “आनंद”, “Love”, “Keep trying” असे शब्द लिहिले होते. एकावर “बाजीगर” लिहिलं होतं. “तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यातच आहे ” लिहिलेला गुलाबी मॅजिक रॅाक जाणाऱ्या-येणाऱ्याला  क्षणभर थांबावयास भाग पाडून अंतर्मुख करत होता.

कठीण आजाराशी झुंज देणाऱ्या एका मैत्रिणीला ”The worst is over” लिहिलेला रॅाक दिसल्याने आपण आता बरे होणार असा संदेश “वरून” आला आहे असं वाटलं होतं. मॅजिक रॅाक्स ठेऊन शुभशकून निर्माण करणाऱ्या काही परोपकारी जीवांना आयुष्याचा खरा अर्थ कळला होता. 

मनात आलं….. कागदावरचा संदेश व मॅजिक रॅाकवरचा संदेश यात पहिला फरक आहे स्पर्शाचा ! ज्या मातीतून आपण निर्माण होतो आणि ज्या मातीत परत जातो तिथला दगड हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून कदाचित त्याच्याशी पटकन नातं जुळत असावं. देवळातल्या गाभाऱ्याशी  व  तिथे असणाऱ्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडणाऱ्या जलाबरोबर जसं तत्क्षणी नातं जुळतं तसंच ! 

विचारांची आवर्तनं, मेघाचा टेक्स्ट आला “वर ये” , म्हणून थांबली. नीनाने मला दगडातला देव दाखवल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानले. “उद्या जेवायला ये” म्हटलं व थेट हॉस्पिटलच्या अंगणात गेले. एक लांबट गोलाकार बदामी रंगाचा दगड उचलला. तिथल्या नळावर धुऊन रुमालाने कोरडा केला.  पर्समधून गुलाबी शार्पी काढून त्यावर लिहिलं,

“अंजू-अमित तुम्ही खूप छान आई बाबा होणार आहात. तुमच्या प्रिन्सेसला खूप खूप शुभेच्छा ! “

घाईघाईने अंजूच्या खोलीकडे गेले.  तिला सर्व भेटी दिल्या व “मॅजिक रॅाक” पण  दिला.  तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. मावशी “काइंडनेस रॉक“ बनवलास ना माझ्यासाठी! सो वंडरफुल ! तुला कसे माहिती असते ग हे सगळे?”

मी गालातल्या गालात हसत तिला जवळ घेतले आणि म्हणाले, ” तू घरी आलीस ना की तू, मी व तुझी आई “धन्यवाद” देणारे रंगीबेरंगी मॅजिक रॅाक्स बनवू. तुझ्या प्रिन्सेसचं नाव लिहू त्यावर ! बाळाच्या बारशाला छान रिटर्न गिफ्ट होईल ना?”

एक लहानशी गोष्ट माणसासाठी काय करू शकते याचे हे उदाहरण आहे. 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अनुज नय्यर 

खूप व्रात्य होता हा मुलगा. उंच शिडशिडीत बांधा आणि अभ्यासासोबत खेळात अत्यंत कुशल ! पण त्याच्या खोड्या सर्वांना पुरत्या जेरीस आणणाऱ्या असत. गणिताच्या शिक्षकांचा हा तसा लाडका पण त्याच्या या स्वभावाचे गणित त्या शिक्षकांना कधी सोडवता आले नाही ! त्याला ते ‘उत्साहाचं गाठोडं’ म्हणत असत. 

असेच एका दिवशी साहेबांनी कुणाची तरी कुरापत काढली आणि सुंबाल्या केला. सर्वच त्याला शोधत होते… सरांनी तर चक्क फळ्यावर  लिहिले…. Wanted Anuj…. dead or alive! अर्थात हे सगळं गंमतीत! कारण  त्याच फळ्यावर दिलेलं गणित वर्गात अनुज शिवाय दुसरं कुणीच सोडवू शकत नव्हते! स्वारी मात्र दुसरीकडेच कुठे तरी नवीन खोडी काढण्यात दंग होती!

व्हॉलीबॉल खूप खेळायचा अनुज ! वडील म्हणायचे,”अरे, शर्ट खराब होईल !” तर यावर पठ्ठ्या शर्ट काढून खेळू लागला ! मग नंतर पँट खराब होईल असं वडील म्हणू लागले तेव्हा साहेब फक्त हाफ पँट घालून खेळत… पण खेळ पाहिजेच. पोराने चाळीतल्या एकाही घराची खिडकीची काच फोडायची म्हणून शिल्लक ठेवली नव्हती… पण तरीही त्याच्यावर कुणी डाफरलं नाही.. कारण पोरगं गुणाचं होतं. सर्वांच्या मदतीला धावून जायचं तर त्याच्या स्वभावाचा एक भागच होता.

पुढे अनूज आर्मी स्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी गेला आणि एक सच्चा सैनिक आकार घेऊ लागला… शाळेच्या अभ्यासात आणि खेळांच्या मैदानात ! पाहता पाहता अनुज सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडला गेला आणि तेथून उत्तीर्ण होऊन हा प्राध्यापक नय्यर साहेबांचा मुलगा सैन्य अधिकारीही झाला !

‘ तुला सैनिकच का व्हायचं रे? ‘ असं त्याला कुणीतरी तो अगदी लहान असताना विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, ” मला सियाचीन मध्ये जाऊन बघायचं आहे, थंडीचा माणसावर काय परिणाम होतो ते !”

आणि कर्मधर्मसंयोगाने त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती कारगिल मध्ये, आणि सहकारी होते लढाऊ जाट रेजिमेंटचे. एका वादळाला आणखी काय हवं असतं.. त्याला गर्जायचं असतं… फक्त वातावरण तयार झालं पाहिजे !

सैन्यात येऊन अनुजसाहेबांना जेमतेम दोन वर्षे झाली होती. जाट पलटणी मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळाली. मोकळा वेळ मिळाला की साहेब आई वडिलांना, मित्रांना पत्र लिहीत.. अगदी नेमाने ! इतके की सहकारी त्यांना letter man संबोधू लागले ! त्यांच्या अनेक पत्रांतून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कल्पना मांडल्या होत्या. ‘सामान्य निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवणे हा आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे ते नेहमी म्हणत. 

१९९९…. आपला देश क्रिकेटच्या विश्वचषकाच्या धुंदीत होता. तिकडे पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसत होता…. लपून छपून ! छुप्या रीतीने पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या वेषांत कारगिलच्या उंचच्या उंच पहाडांवर भारतीय भूभागावर हल्ला करता येईल अशा जागा पटकावून ठेवल्या होत्या. 

या घुसखोरीची खबर मिळाली तेव्हा तसा खूप उशीर झाला होता. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न देह पाहून आपल्या सैनिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ! आहे त्या परिस्थितीत, साधनसामुग्रीत भारतीय सैन्याने घुसखोरी मोडून काढण्याची मोहिम सुरू केली.

आपण युद्धक्षेत्रातच नेमणूकीस आहोत, याची खबर अनूजसाहेबांनी घरी लागू दिली नव्हती. उंच पहाडावरील एक महत्त्वाची जागा आपल्या ताब्यात घेणे अतिमहत्त्वाचे होते. सोळा हजारापेक्षा जास्त फूटावर असलेल्या त्या ठिकाणी चढाई करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. आणि हे करताना हवाईदलाची मदत घेणे गरजेचे होते. परंतू हवाईदलाची मदत पोहोचेपर्यंत थांबण्यात धोका होता.. पाकिस्तान आपली पकड अधिक मजबूत करू लागला होता… उशीर म्हणजे नुकसान !   

६ जुलै १९९९. उद्या सकाळी पहाडावर कब्जा करायला निघायचं होतं. अनूज साहेबांनी वडिलांना फोन लावला. सांगितलं नाही नेमकं कुठं हल्ला करणार आहेत ते, पण ‘मोठी कामगिरी करायला निघालोय’ एवढं मात्र सांगितलं.

प्राध्यापक नय्यर त्यांना म्हणाले होते, “देखो ! हार कर नहीं आना ! वरना मैं तुम्ही गोली मार दुंगा !” अर्थात हे सर्व प्रेमात आणि मुलावरच्या विश्वासानं बोललं जात होतं. हे दोघं केवळ मुलगा आणि वडील नव्हते तर दोन दोस्त होते, सखे होते !

त्यावर अनूज साहेब म्हणाले होते, “आपका बेटा हूँ… हारने की बात सोच भी नहीं सकता !” 

या पूर्वीच्या पत्रात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं…. ‘देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य पूर्ण करण्याआधीच मरण्याएवढा मी बेजबाबदार नाही पपा ! भारतीय सेना आणि भारतीय जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पाहून यावेळी मरणाचा विचार करणं अतिशय गैर ठरेल. शेवटच्या शत्रूच्या शरीरातून प्राण निघून जाईपर्यंत मी माझे श्वास घेतच राहीन… जयहिंद !’

पहाडावर चढाई सुरू झाली. पुढच्या तुकडीच्या हालचाली शत्रूने वरून अचूक टिपल्या आणि आगीचा वर्षाव सुरू केला. त्यात आघाडीचे सैन्याधिकारी, सैनिक जखमी झाले, धारातीर्थी पडले. मोहिम अयशस्वी होण्याची चिन्हे होती. 

दुसरी ताजी कुमक पहाडावर पाठवण्यात आली. यात अनूजसाहेब होतेच. पहाडावरून येणाऱ्या बातम्या त्यांच्याही कानी पडत होत्या. पहाडावर जाताना पुरेसा दारूगोळा सोबत असलाच पाहिजे, याचा त्यांना अंदाज होताच. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपली बॅग़ भरायला आरंभही केला होता. एखादं लहान मूल जसं कुठं बाहेर जायचं असल्यास आपल्या पिशवीत जमतील तेवढी खेळणी भरून घेतं ना, त्यातीलच हा प्रकार. 

वरिष्ठ साहेब त्यांच्या पाठीमागेच उभे होते… त्यांनी हाक मारताच… अनूजसाहेब म्हणाले….”आया साहब ! बस और थोडे हॅन्डग्रेनेड्स ले लू ! इनकी जरुरत पडेगी !” जणू खेळायला निघालेल्या ह्या पोराचा खेळ प्रत्यक्ष मृत्यूच्या अंगणात ठरलेला होता. 

योगायोगाने जेव्हा अनूजसाहेब आपली युद्धाची तयारी करीत होते त्यावेळी दिल्लीत त्यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांच्या पिशव्या भरत होत्या…. कारगिलमधे लेकाला पाठवण्यासाठी. आणि दुसऱ्या एका घरात आणखी एक व्यक्ती अनूजसाहेबांसाठी चॉकलेट्स पॅक करीत होती… त्यांची जीवाची मैत्रिण… टिम्मी ! 

थोड्याच दिवसांत अनूज आणि टिम्मी विवाहबद्ध होणार होते… दोघांनी एकाच नजरेने स्वप्नं पाहिली होती ! साहेबांच्या बोटांत सोन्याची एंगेजमेंट रिंग शोभत होती. मोहिमेवर निघताना अनूजसाहेबांनी आपली ही अंगठी आपल्या मोठ्या साहेबांच्या हवाली केली…. ” मी परत नाही येऊ शकलो तर ही माझी लाखमोलाची ठेव माझ्या प्रेयसीच्या हाती सोपवा !”

चढाई सूरू झाली ! अनूजसाहेबांचे वरिष्ठ मेजर रामपाल साहेब आघाडीवर होते. लढताना जबर जखमी झाले. त्यांना मागे आणावे लागले. त्यांची जागा अनूजसाहेबांनी घेतली. त्यांना आता कॅप्टन म्हणून बढती मिळाली होती… भर युद्धाच्या दिवसांत ही बढती म्हणजे देशाने खांद्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी. 

निकराचा हल्ला करीत निघाले साहेब आणि त्यांचे बलवान जाट सैनिक. चढाई सोपी नव्हती… सोळा हजार फूट…. कडेकपारी…. पाय निसटला की जीवन निसटून जाईल याची खात्री… वरून प्रचंड गोळीबार होत होता. 

सैनिकांजवळचे अन्न पदार्थ संपले ! पोटात भुकेचा वणवा भडभडून पेटलेला होता. पण लढण्यासाठी दारूगोळा महत्त्वाचा होता. अन्नाचं ओझं होईल….! त्या बहाद्दरांनी अन्नाऐवजी बंदुकीच्या गोळ्या, हातबॉम्बचं ओझं सोबत नेणं पसंत केलं…. ‘सैन्य पोटावर चालतं’ ही म्हण या शूरांनी इथं खोटी ठरवली एका अर्थानं !

उपाशीपोटी लढणं….. कल्पना तरी करवते का सामान्य माणसांना? पण असामान्य माणसांची कथा आहे ही…. आणि खरी आहे ! 

अनूजसाहेब सर्वांत पुढे होते. उंचावरच्या सांदी कोपऱ्यात पाकिस्तानचे चार बंकर्स होते. त्यात बसून ते आरामात फायरिंग करीत होते. साहेबांनी गोळीबाराच्या पावसात पुढे धाव घेतली आणि पहिले तीन बंकर्स उध्वस्त केले… त्यातील नऊ शत्रू थेट वरती पाठवले…. त्यांच्या मशिनगन्स निकामी केल्या…. पण… चौथा बंकर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तिकडून आलेल्या एक आर.पी.जी.गोळ्याने त्यांच्या शरीराचा वेध घेतला…. रॉकेट प्रॉपेलर गन ! हिच्यातून गोळी नाही तर बॉम्बच डागला जातो एक प्रकारचा. त्या अस्त्राने या अभिमन्यूचे प्राण हिरावून नेले ! 

तोवर कामगिरी फत्ते झाली होती…. पहाड ताब्यात आला होता… पाकिस्तानची राक्षसी पकड त्यामुळे ढिली पडणार होती ! पुढे विजय आवाक्यात होता, दृष्टीपथात होता ! पण हे पहायला कॅप्टन अनूज नय्यर आणि त्यांचे काही साथीदार या जगात नव्हते ! 

प्राध्यापक एस.के.नय्यर यांच्या घरातील टेलिफोन खणखणला…. लष्करी अधिकारी होते फोनवर…. “जयहिंद सर….” आणि असंच काही बोलून ते अधिकारी नि:शब्द झाले काही वेळेसाठी….

नय्यर साहेब म्हणाले….. ” माझा लेक लढतानाच मरणाला सामोरं गेला ना?”

” सर, केवळ भारतीय सेनाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या सुपुत्राचा ऋणी राहील कायम !” ते अधिकारी कसेबसे म्हणू शकले ! काय बोलणार अशा वेळी? 

केवळ चोवीस वर्षे वयाचे, केवळ दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर… मरणोपरांत महावीर चक्र ! त्यांनी आपले शब्द खरे केले…. शत्रूचा नि:पात झाल्यावरच आपला श्वास थांबवला ! 

 ७ जुलै….. या पराक्रमाचा स्मरण दिन ! भावपूर्ण आदरांजली हे महावीर योद्धा !

…  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

” हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे .”… नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज 

म्हणाली . आणि सासुबाईंचे डोळे भरून आले .

” मला कशाला ग एवढे लागतात ? “

” अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून . दारावर भाजी , फळवाले येतात . कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते . शिवाय तुमची भिशी असते. राहू द्या तुमच्याजवळ .”

” अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .ते असतांना त्यांच्याकडे मागत असे , आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते .” .. सासू हसून म्हणाली .

” तुम्ही भिशीच्या ग्रुपबरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक, असे कार्यक्रम ठरवत जा . जरा मोकळं व्हा आई . ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते . मोठे दादा तर वेगळे 

झालेत , ताई सासरी खूष आहेत . मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात … आता जगा स्वतःसाठी . “

” इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”

” मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून 

हातावर ठेवले . म्हणाली , ‘ तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला , खेळणी घेऊन द्या ….’ आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती . ‘ एवढे पैसे कधी 

मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘  असे म्हणाली होती … तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ……आई , मला माहितेय , घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ….शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील … तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ……….तुमची पेन्शन राहू द्या आई .मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . ” 

” अग , सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल. “

“मला बोलू द्या आई .हे मी माझ्या समाधानासाठी करतेय  . आई म्हणते , की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर , प्रेमच उगवेल . “

…. सासूने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होईपर्यंत दारात उभी असतांना 

तिच्या मनात आले … 

‘ सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट  कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस ….. ‘ 

…… ज्या घरात लेकी सुना सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतोच मुळी. 

जेथे असेल आपुलकी .. प्रेम .. जिव्हाळ्याचे अस्र … 

….. तेथे फिके पडते वास्तुशास्त्र. 

खरंच ,,,,,,, सासू अन सुनेमधे असा बदल झाला तर …. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अजून ही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “अजूनही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी लिहिलेले आणि नंतर गायब झालेले लिखाण आज अचानक जुनी कागदपत्रे चाळताना सापडले आणि वाचल्यानंतर हे जाणवले की त्यातील बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

लालयेत पंच वर्षाणि  दश वर्षाणि ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

 असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ.

मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.

 मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत, मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाई मध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे. आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात . बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे.

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या, बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराण काळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षा दरम्यान गृहस्थाश्रम व 55 ते 60 वर्षा दरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंट नंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात विचार करता मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल.

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत. 

प्रॅक्टिकली बोला.

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू.

पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी ( म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच )  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेट सुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच.  अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचे कडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्यामते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान. 

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो –

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,

आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला,

भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ?

सामाजिक अराजकतेचे दान ?

ढासळत्या पर्यावरणाचे थैमान.

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,

पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह,

नाही परतवू शकलो या लाटा,

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं, 

जरी जगलो तरी……….

नाही गेलो भोव-याच्या तळाशी. 

प्रवाहातील पत्थरांना चुकवत,

कपाळमोक्ष नाही होऊ दिला.

म्हणूनच अजूनही अशा आहे,

प्रवाह वळवता येईल,

बिघडलेलं सावंरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर

विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल.

खरंच येईल तरुणांनो,

आम्हाला आशा आहे.

आमच्या शापित जीवनाला,

शिव्या घालत बसण्यापेक्षा,

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा.

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं

अनिवार्य असेल तरी कचरू नका,

पण प्रवाहपतित होऊ नका.

इतिहासाची पुनरावृत्ती करू नका.

भविष्यकाळाच्या भल्यासाठी,

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं,

आवश्यकच असेल तर ………..

हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो, 

हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन,

तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे,

अन गर्जना करतोय,

देन सीझर मस्ट डाय.

देन सीझर मस्ट डाय.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बार्बी/ BAR- B ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

बार्बी/ BAR- B ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

काल पोरांना हा सिनेमा दाखवायला थेटर वर सोडायला गेलेलो. सिनेमा बघायला आलेले सगळेचजण ‘गुलाबी’ ड्रेसमधे आलेले (  मुलंही याला अपवाद नव्हती)

मजा वाटली या जनरेशनची. पिक्चरच्या थिमला साजेसा पेहराव.

(काही महिन्यांपूर्वी आलेल्या “बाईपण भारी देवा” या सिनेमालाही बायकांचा ग्रुप साधारणपणे सिनेमातील व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने नटून जाताना बघितला )

नाही तर आम्ही.  अनेक सिनेमे तर शाळेच्या खाकी चड्डी,पांढरा शर्टवर पाहिलेत. 

त्यावेळेला असं काही नव्हतं नशीब नाहीतर ‘शहेनशहा’ बघायला हाताला प्लॅस्टर घालून जावं लागलं असतं अन ‘टारझन’ च्या वेळी पानं लावून. 

बार्बीचं गाणं तसं ऐकिवात आहे. त्यातील एकही इंग्रजी  शब्द कळत नाही. आज सहज गुगल वर त्याचे लिरिक्स वाचले. त्यातील एका कडव्यातील  शेवटचे वाक्य  👇

I’m a Barbie girl, in the Barbie world

…….

………..

Imagination, life is your creation

आता या ओळीत जीवन जगण्याचे सार वगैरे दडलेले असेलही पण

 #माझी_टवाळखोरी # चं मर्म तरी दुसरं काय आहे? 

(माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे– ती जास्त रंगते जेव्हा आम्ही  A पेक्षा B साईडला बसतो.  शाळेत ही ‘ब’ तुकडी भारी देवा असं उगाच नाही म्हणायचो आम्ही 😌)

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक ☆ सौ. गौरी गाडेकर

तुम्ही केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा ‘ बघितला असेलच.

ही कथा  आहे मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहा बहिणींची.

यांच्या मनावर लहानपणी खेळलेल्या मंगळागौरीच्या खेळांच्या आठवणीची जादू आहे. त्यामुळे आणि भरघोस बक्षिसाच्या आशेने आणि कोणी ‘इगो’ सुखावण्यासाठीही  या स्पर्धेत भाग घेतात.

पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पूर्वीच्या सडपातळ, चपळ, लवचिक शरीराने केव्हाच साथ सोडलीय. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या संसारात आपापल्या परीने बाईपणाचं ओझं वाहतेय. तर अशा या बहिणी स्पर्धा जिंकायची तयारी कशी करतात, त्यांचं ते स्वप्न पुरं होतं का, त्या धडपडीत त्यांच्या हाती इतरही काही लागतं का, ते तुम्ही बघितलं असेलच. नसल्यास जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.

आज हा लेख या सिनेमाची जाहिरात करण्यासाठी लिहिलाय की काय अशी शंका येईल कदाचित.. पण तसं अजिबातच नाही. हा लेख लिहिलाय तो – या चित्रपटाची प्रभावी आणि पठडीबाहेरची कथा, पटकथा, आणि त्यातले खुमासदार संवादही जिने लिहिले आहेत –  त्या वैशाली नाईक या जेमतेम ३३-३४ वर्षाच्या तरुणीच्या कौतुकास्पद अशा अफाट कल्पनाशक्तीची आणि लेखन-सामर्थ्याची कल्पना माझ्यासारखीच इतरांनाही यावी म्हणून. . हा चित्रपट म्हणजे वैशालीचं  मराठी सिनेसृष्टीतलं पहिलं दमदार आणि यशस्वी पाऊल.

यापूर्वी तिने ‘दिया और बाती’,  ‘ये उन दिनों की बात है’, ‘बॅरिस्टर बाबू ‘, ‘तू मेरा हिरो’ वगैरे अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं लेखन केलं आहे. सद्या ती ‘ये रिश्ता क्या क्या लाता है’ या हिंदी मालिकेचं लेखन करत आहे.

वैशालीने यापूर्वी ‘सेव्हन स्टार डायनॉसर एन्टरटेनमेंट’ ही शॉर्ट फिल्म बनवली आहे.

‘सेव्हन स्टार डायनॉसर….’ ही फिल्म ‘धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’, ‘पाम (palm) स्प्रिंग्ज इंटरनॅशनल शॉर्ट फेस्ट 2022’, ‘ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘मॅंचेस्टर फिल्म फेस्टिवल 2022’, ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘ऍथेन्स इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडीओ फेस्टिवल 2022’, ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’ वगैरेमध्ये प्रदर्शित केली गेली आणि वाखाणलीही गेली, हे आवर्जून सांगायला हवे. 

‘IFFLA’ ( इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलीस)मध्ये या फिल्मने ‘Audience Choice Award’ पटकावलं आहे. 

याशिवाय वैशालीने काही हिंदी बालकथाही लिहिल्या आहेत. त्या म्हणायला बालकथा असल्या तरी त्या मोठ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत हे विशेष. 

सी. एस.( कंपनी सेक्रेटरी ) आणि एल. एल. बी. अशा पूर्णपणे व्यावसायिक आणि रुक्ष म्हणता येईल अशा विद्याशाखांच्या पदव्या प्राप्त केलेली वैशाली, साहित्याच्या या सुंदर आणि समृद्ध विश्वात अचानक पाऊल टाकते काय आणि बघता बघता इतक्या कमी वयातच इथे पाय घट्ट रोवून दिमाखाने उभी रहाते काय …. .. हा तिचा वेगवान आणि झपाट्याने यशाच्या दिशेने होत असलेला प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. 

वैशाली नाईक या प्रतिभाशाली तरुण लेखिकेची साहित्य- क्षेत्रातली मुशाफिरीच इतकी दमदारपणे सुरु झालेली आहे की, “ आता ही पोरगी काही कधी मागे वळून बघणार नाही “ असं अगदी खात्रीपूर्वक म्हणता येईल. 

वैशालीची ही साहित्यिक घोडदौड अशीच चौफेर चालू राहो, आणि तिला नेहेमीच असे भरघोस यश मिळो, याच तिला मनःपूर्वक शुभेच्छा !

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

पाऊस सगळीकडे सारखाच पडतो.. बालपणात कोसळणाऱ्या पाऊस धारा कागदी होडी करून अंगणातल्या पाण्यात सोडणारा हा पाऊस, कसलीच कोणतीच तमा न बाळगणारा चिंब भिजून आनंदाने उड्या मारणारा हा पाऊस.. नकळत आपलं बालपण डोळ्यासमोर आणतो.. . आपलं लेकरू पावसात भिजून आजारी पडेल म्हणून काळजी करणाऱ्या आई कडे दुर्लक्ष करून हे बालिश बालपण ये आई मला पावसात जाऊदे! एकदाच ग  भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे .. म्हणत पावसाचा आनंद घेत उड्या मारत राहतं.. पावसात चिंब भिजून कुडकुडत आईच्या पदराची  ऊब मिळताच मात्र समाधानाने आईच्या कुशीत शिरतो तो अल्लड बालिश पाऊस.. . आईचा लाडिक ओरडा आणि सोबत मायेने भरलेला उन उन दुधाचा पेला पिवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसात भिजण्याची स्वप्न बघत मायेच्या कुशीत शिरणारा बालिश पाऊस वेगळ्याच दुनियेची सफर घडवतो.. . कॉलेज च्या खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊस धारा पाहून नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली तरुण पोरं पोरी प्यार हुवा इकरार हुआ म्हणत एकच छत्रीत आपल्या प्रियकर/ प्रेयसी सोबत नव जीवनाची स्वप्न पाहणारा हा पाऊस रोमँटिक होऊन जातो.. गुलाबी प्रेमाची बरसात करणाऱ्या ह्या पावसाच्या सरी मोगऱ्याचा गंध घेऊन येतात.. नुकतीच लग्न बंधनात बांधली गेलेली जोडपी त्यांच्यासाठी हा पाऊस वेगळचं गोड स्वप्न घेऊन येतो.. खिडकीतून बरसणाऱ्या जलधारा पाहताना आपल्या सख्याची वाट बघणारा स्वप्नाळू पाऊस, दमून भागून आलेला आपल्या सख्याची एक प्रेम भरली नजर पडताच ह्या प्रेम सरीत चिंब भिजून जाते.. पाऊस किती स्वप्न, किती नव्या आशा घेऊन येतो.. हाच पाऊस म्हातारपणात मात्र जून्या आठवणींना उजाळा देत कानटोपी आणि शाल शोधत बसतो.. पावसाची चाहूल लागताच छत्री, रेनकोट यांची तजवीज करू पाहणारा पाऊस आपलं वय वाढलंय ह्याची जाणीव करून देतो.. शेतकरी राजासाठी तर पाऊस म्हणजे निसर्गाचं वरदान च जणू.. पावसाच्या प्रतिक्षेत काळ्या मातीची मशागत करू लागतो.. पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठी लगबग करवणारा हा पाऊस.. नवीन आशा, नवीन स्वप्नं घेऊन येतो.. कधी ह्याचं रौद्र रूप अनेकांना रडवतं, अनेक संसार उध्वस्त करतं, कधी  किती तरी सप्नांची राखरांगोळी होते.. मृत्यूचा खेळ असा काही रंगतो की अश्रुंच्या सरी वर सरी बरसु लागतात.. पाऊस काय किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती काय? ह्या सगळ्या आपत्तीसाठी कुठे तरी आपण मनुष्य च कारणीभूत आहे हे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो.. पावसाळा आला की अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतात.. एकदा झाडं लावून फोटो काढले आणि स्टेटस ठेवलं की मग वर्षभर मोकळे.. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.. बाकी काहीही असलं तरी पाऊस आणि माणसाचं नातं मात्र अबाधित राहत.. काही वेळा कडू आठवणींसोबत तर बऱ्याच वेळा गोड, गुलाबी आठवणींची बरसात करणारा हा पाऊस आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येतो हे मात्र नक्की..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे..  बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना …. 

काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी…. 

आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “

तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “

तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?”  म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “

“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…”  मी सहज बोलुन गेलो. 

यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही..  ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…

…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?

तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “

म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?” 

‘ Intention is important behind every action ‘ .. 

.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!

“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “

म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “

…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 

“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “  

“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “  आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..”  असं म्हणून आज्जी हसायला लागली… 

…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार ! 

“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “

“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…” 

“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”

“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? “

.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ …. 

…… कारण काहीही असो ..  एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)

हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.

फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’

सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.

बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.

प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.

महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.

हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके  अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.

तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.

फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.

अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति   जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या  मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares