मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

(रंगसोहळा या पुस्तकातून साभार घेतलेला लेख)

बालकवी म्हणतात

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘

आपण सर्वसामान्य माणसे. वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?

मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे. इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth.’ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever.’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.

‘ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

परिचय

शालेय शिक्षण कोयनानगर व महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज कराड

  • अनेक वर्षे वास्तव्य नाशिक सध्या वास्तव्य पुणे (बाणेर).
  • स्वरचित तीन मराठी कविता संग्रह प्रसिद्ध
  • ‘संवाद’ या संस्थेच्या चार स्मरणिकांचे प्रकाशन.
  • ‘संवाद’ च्या चार दिवाळी अंकांचा  उपसंपादक
  • ‘महादान’ या अवयवदाना संबंधीच्या विशेषांकाचे संपादन.
  • अवयवदाना विषयी दोन पुस्तिकांचे लेखन व प्रकाशन.
  • पंघरा वर्षे रोटरीच्या विविध बुलेटिन्सचे संपादन व प्रकाशन.
  • विविध नियतकालिकांमध्ये नैमित्तिक स्फुटलेखन.
  • अवयवदाना संबंधी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर.
  • फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या राज्यस्तरीय संस्थेचा  उपाध्यक्ष.
  • ‘अंगदानकी चार लाईना’ – हा हिंदी चारोळ्यांचा ई-बुक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
  • स्वत: शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा सरकारमान्य झाली असून ती सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमात अधिकृत प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते.
  • माजी अवयवदान विभागीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय रोटरी विभाग क्र ३०३०
  • मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक या संस्थेचा संचालक
  •  महाराष्ट्र शासनाच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागीय प्राधिकरण समितीचा (Divisional Authorisation Committee) सदस्य.

? मनमंजुषेतून ?

☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लेखनाचा किती मोठा प्रवास आमच्या पिढीने अनुभवला तसा क्वचितच दुसऱ्या कोणत्या पिढीने अनुभवला असेल.  लहानपणी मला आठवते चौथीपर्यंत आम्हाला पाटी-पेन्सिल होती.  चौथीला पहिल्यांदा वही आणि शिसपेन्सिल आली.  पेन नव्हतंच.  पण पाचवीपासून सुरू झाली टाक-दौत. दौत हातामध्ये घेऊन जायची.  शाळेच्या बाजूला दुकानात जायचं, त्या दुकानातून शाईची पुडी विकत घेऊन यायची.  त्या दौत नामक बाटलीमध्ये नळाचे पाणी भरायचं.  त्या पाण्यामध्ये शाईची पुडी टाकायची.  हे टाकत असताना हात निळेजांभळे व्हायचे.  

बऱ्याच वेळेला कुणाचा तरी पाय लागून कुणाची तरी दौत सांडायची किंवा लाथाडली जायची.  या लाथाडलेल्या दौतीचा प्रसाद अनेकांना मिळायचा. त्या वेळेला बाक नव्हतेच.  तेव्हा बस्करं तरी असायची, नाहीतर पाट तरी असायचे. त्यावर बसून टाक आणि दौत यांचा वापर करुन वहीत लिहिणे हा एक वेगळाच थ्रिलिंग अनुभव. संध्याकाळी घरी आल्यावर सगळे हात निळेजांभळे झालेले. बऱ्याच जणांचे शर्ट-पॅंट वर निळेजांभळे डाग पडलेले.  पायाचे गुडघे निळेजांभळे झालेले. दप्तरं तर सगळ्यांचीच निळ्या जांभळ्या डागांनी भरलेली असायची. आईला अत्यंत त्रासदायक ठरणाऱ्या अशा अवतारात आम्ही घरी पोहोचायचो.  बऱ्याच वेळेला बाबांचा मारही खायचो. त्या वेळेला कपडे धुण्यासाठी आईला जो त्रास व्हायचा त्याची आम्हाला तेंव्हा फारशी कल्पना नसायची.  त्यावेळेला साबण म्हणजे 501 नावाचा बार.  तो सगळ्यात चांगला साबण समजला जायचा.  त्या बाराचा एक तुकडा घेऊन कपडे घासायचे आणि शक्यतो ते निळेजांभळे डाग पुसट पुसट करण्याचा प्रयत्न आई करत असे.  

सहसा निळ्या जांभळ्या डागांचे हे युनिफॉर्म घातलेला बहुदा प्रत्येक जणच असायचा.  शाईच्या डागांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व शर्ट पॅन्टवर वागवत आम्ही पाचवी सहावी सातवी या तीन वर्षांचा प्रवास केला.  त्यानंतर आठवीमध्ये दाखल झाल्यावर पहिल्यांदा आमच्या हातात पेन आलं. अर्थात ते पेन म्हणजे शाईचं पेन.  त्या पेनमध्ये शाई भरणे हा एक प्रचंड मोठा सोहळा असायचा. अर्थात त्यालाही दौत असायचीच.  फक्त टाकाबरोबर सतत बाळगायला लागयची नाही,  त्या ऐवजी दिवसातून एकदा कधीतरी त्या पेनमध्ये शाई भरायला लागायची. आणि आमचे हात पुन्हा निळेजांभळे व्हायचेच. अर्थात एकदा पेनमध्ये शाई भरल्यानंतर पुन्हा सतत निळेजांभळे हात करावे लागायचे नाहीत.  परंतु कुणीतरी खोडी काढायची म्हणून किंवा कुणीतरी गंमत म्हणून किंवा भांडणाचा सूड उगवायचा म्हणून पाठीवर पेन झटकलेले असायचे. ते पाठीवरचे निळेजांभळे डाग हे घरी आल्यावर आईने धपाटा घातल्यावरच आम्हाला दिसायचे.  त्यानंतर अकरावीपर्यंत म्हणजेच एस एस सी पर्यंत शाईची पेनं वापरली. 

कॉलेजला आल्यावर मग बॉलपेनं सुरू झाली. सुरुवातीला बॉलपेनसुद्धा अधूनमधून बंद पडणारी, न उठणारी वगैरे असायचीच. मग पुढचं धातूचं टोक दाताने  काढून नळीला फुंकर मारून पुन्हा चालू करायची. ते चालू करत असताना त्यामागच्या प्लास्टिकच्या नळीतून अचानक जास्त शाई बाहेर यायची आणि पुन्हा हात निळे करणे आलेच. या अशा सर्व प्रवासातून आता बऱ्यापैकी बॉलपेन आलेली आहेत. बॉलपेन रिफिल बदलणे हा प्रकार बंद झाला आहे. आता पेन बिघडले की पेनच फेकून द्यायचे आणि दुसरे घ्यायचे.  

तरीसुद्धा आता मला वाटते पेनचा वापर सुद्धा हळूहळू बंद होत जाणार. आता मी सुद्धा हा लेख लिहिलेला आहे तो पेनच्या मदतीशिवाय लिहिलेला आहे.  येथून पुढे मोबाईल, कॉम्प्युटर यावरील टायपिंग या प्रकाराने पेनचे संपूर्ण उच्चाटन होईल असे वाटते. आता आमची नातवंडेसुद्धा ऑनलाइन शिक्षणाला सरावत आहेत.  बहुतेक काही वर्षातच परीक्षागृहांमध्ये  कॉम्प्युटरच असतील, आणि त्यावर बोलून टायपिंग करून उत्तरे लिहिता येतील. अशा तऱ्हेच्या परीक्षाही सुरू होतील. सध्या मोबाईलवर आपण बोलून टायपिंग करू शकतो. पण नंतर चुका सुधारत बसावे लागते. त्यात बर्‍याच सुधारणा नजीकच्या काळात होतीलच. 

… आपण बोलून बरोबर अक्षरे टाईप होत राहतील.  

याच पद्धतीने नजीकच्या काळात अक्षर लेखनाचे संपूर्ण उच्चाटन होईल हे नक्कीच.  पण तरीसुद्धा अक्षर लेखनाचा आमचा भूतकाळ आठवून खूप खूप मज्जा येते हे सांगायला हवे का ?

 श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चला पंढरीला जाऊ…!!!” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “चला पंढरीला जाऊ…!!!” ☆ सौ राधिका भांडारकर 

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्त दर्शनासाठी पंढरपूरास पायी जातात. पंढरपूरची वारी करणारे ते वारकरी आणि त्यांचा ‘वारकरी’ हा संप्रदाय. या संप्रदायात वर्ण जात धर्म याचा भेद नाही. सर्वसमावेशक असा हा संप्रदाय. आणि पंढरपूरच्या या पदयात्रेत भक्तगणांचा ऊत्स्फूर्त सहभाग असतो. ऊन, पाऊस, वारा, कशाचीही पर्वा न करता या आनंद सोहळ्यात, लहानथोर, रंकराव, सारे एकात्म भावनेने सामील होतात. कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीमाळ, हरिपाठाचे पूजन,सात्विक आहार, ही वारकर्‍यांची ओळख. 

वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडीलांपासून आहे. पुढे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वरांनी समाजसंघटनेचा पाया रचला आणि संत तुकाराम, नामदेव यांनी ती धुरा वाहिली.

पंढरपूर हे वारकर्‍यांचे तीर्थस्थान. भीमा तीरावरचे पावन क्षेत्र. आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका असलेली पालखी, आणि देहूहून संत तुकारामाची पालखी, दिंड्या पताकासहीत पंढरपूरास  पायी चालणार्‍या प्रचंड जनसमुदायासवे येतात. विठोबाच्या दर्शनाचा एक अपूर्व ,लोभसवाणा सोहळा घडतो. दुथडी भरून वाहणार्‍या चंद्रभागेत स्नानाचे महात्म्यही अपार..

पावसाच्या अमृतधारांत ,ग्यानबा तुकारामाच्या गजरात, टाळ मुृदुंगाच्या वाद्यवृंदात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन चाललेली बाया बापड्यांची ,भक्तीरसात नाहून निघालेली वारी एखाद्या पांगळ्या पायात सुद्धा शक्ती निर्माण करते. या वारीत ,रिंगण, झिम्मा ,फुगड्या असे ऊर्जादायी खेळही असतात. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संघटना वारकर्‍यांच्या सुविधासाठी झटतात.

श्रद्धा आणि धार्मिकता म्हणजे परंपरा. पण पंढरीची वारी-परंपरा सांकेतिक आहे. समाजाचं एकत्रीकरण हा ध्यास आहे. विषमता निवारण हा सारांश आहे. पांडुरंग ही अशी सगुण शक्ती आहे की जी भेदाभेदाची मुळे उखडते…..  परब्रह्माला घेउन विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे वारी…पायी वारी..

वारी वारी जन्म मरणाते वारी

हारी पडलो आता संकट निवारी..

     विठ्ठला मायबापा, तुझ्या दर्शनासी आतुरलो

     भेट घडण्या पंढरपुरी आलो,,,,

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ काही दुर्लक्षित चमत्कार… लेखक – श्री रॉबर्ट विल्यम ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ काही दुर्लक्षित चमत्कार… लेखक – श्री रॉबर्ट विल्यम ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री रॉबर्ट विल्यम हे युरोपियन प्रवासी लिहीतात —

१) अंगकोर वाटचे विष्णू मंदिर व्हॅटिकन सिटीच्या ४ पट आहे !! मंदिर पूर्ण बघायला आठवडा लागतो !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

२) एलोराचे कैलाशनाथ मंदिर आणि तिथली इतर मंदिरे शतकानुशतके अवाढव्य दगडात कोरलेली आहेत !!

   ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

३) कुंभकोणम येथील ऐरावतेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या प्रत्येक इंचावर कोरीवकाम आहे !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

४) तंजावरमधील बृहदेश्वर मंदिरामध्ये १२० टन वजनाचे गोपुरम ६० किमीच्या उतारावर आहे !!  मंदिर किचकट कोरीव कामांनी भरलेले आहे !!

    ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

५) कोणार्कचे सूर्यमंदिर क्लिष्ट डिझाइन केलेली २४ चाके, त्यावर १२ फूट व्यासाचे जे घोडे काढलेले दिसतात. हे सात घोडे आठवड्याचे प्रतिनिधित्व करतात, चाके १२ महिने उभी असतात, तर दिवसाचे चक्र चाकांमधील आठ स्पोकद्वारे दर्शवले जाते. आणि हे संपूर्ण चित्रण सांगते की वेळ सूर्याद्वारे कशी नियंत्रित केली जाते !!

— ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक का नाही?

६) राणी का वाव हे त्याच्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठे उदाहरण आहे आणि पाण्याचे पावित्र्य   अधोरेखित करणारे उलटे मंदिर म्हणून डिझाइन केलेले आहे. ही पायरी विहीर शिल्पकलेच्या फलकांसह पायऱ्यांच्या सात स्तरांमध्ये विभागलेली आहे.. भगवान विष्णूची ५०० हून अधिक प्रमुख शिल्पे आणि १००० हून अधिक किरकोळ शिल्पे धार्मिक आणि पौराणिक प्रतिमा एकत्र करतात  !!

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

७) फक्त हंपीच्या अवशेषांमध्ये टेकड्या आणि दऱ्यांमध्ये पसरलेली ५०० हून अधिक स्मारके आहेत.  यामध्ये आकर्षक मंदिरे, राजवाड्यांचे अवशेष, राजेशाही मंडप, बुरुज, ऐतिहासिक खजिना, जलीय संरचनांचे पुरातत्व अवशेष आणि प्राचीन बाजारपेठांचा समावेश आहे.

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

८) मोढेरा सूर्य मंदिर हा एक उत्कृष्ट कोरीवकाम केलेला  मंदिर परिसर आणि तेथील भव्य शिल्प कुंड हे सोलंकी काळातील गवंडी कलेतील दागिने आहेत, ज्याला गुजरातचे सुवर्णयुग म्हणूनही ओळखले जात होते. मंदिराचे डिझाइन घटक वास्तू – शिल्पाच्या तत्त्वांचे पालन करतात. कुंड (जलाशय) आणि प्रवेशद्वार पूर्वेकडे सूर्याच्या किरणांचे स्वागत करत आहे आणि संपूर्ण रचना सूर्यदेवाला अभिषेक म्हणून फुलांच्या कमळासारखी दिसणारी मंडपावर तरंगते. मुख्य संकुल तीन भागात विभागले गेले आहे. प्रवेशद्वार म्हणजे ‘सभा मंडप’, ‘अंतरा’ ला जोडणारा रस्ता आणि ‘ गर्भगृह.’

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

९) पट्टडकल हे केवळ चालुक्यकालीन वास्तुशिल्पीय कार्यांसाठीच लोकप्रिय नव्हते, तर ‘पट्टदाकीसुवोलाल’ या शाही राज्याभिषेकासाठी एक पवित्र स्थान देखील होते. येथील मंदिरे रेखा, नगारा, प्रसाद आणि द्रविड विमान शैलीचे मंदिर वास्तुकलेचे परिपूर्ण मिश्रण आहेत. पट्टाडकल येथील सर्वात जुने मंदिर हे विजयादित्य सत्याश्रयाने बांधलेले संगमेश्वर आहे (इ.स. ६९७-७३३).

ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?

१०) रत्नेश्वर मंदिर, वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाजवळ वसलेले, सुमारे ९ अंशांनी झुकते, तर पिसाचा झुकणारा टॉवर सुमारे ४ अंशांनी झुकतो. काही अहवालांनुसार, मंदिराची उंची ७४ मीटर आहे, जी पिसा टॉवरपेक्षा सुमारे 20 मीटर उंच आहे. ऐतिहासिक रत्नेश्वर मंदिर शतकानुशतके जुने आहे आणि वाराणसीमधील सर्व छायाचित्रित मंदिरांपैकी एक आहे.

मग हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक का नाही?

या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच :— *कारण आपल्याला कळण्याचीही पर्वा नसते !!

इतरांना * त्यांच्या स्थापत्यकलेचा चमत्कार दाखवण्यात विशेष अभिमान वाटतो; तर हे चमत्कार अस्तित्वात आहेत हे देखील आम्हाला माहीत नाही.

सर्व भारतीयांनी भारताचा हा भव्य इतिहास आणि अद्भुत म्हणावीत अशी वारसा स्थळे जाणून घ्यायलाच  हवीत —

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मिताली नुकतीच लग्न होऊन नव्या घरी आली होती. तिच्या सासूबाई फारच प्रेमळ आणि कार्यतत्पर होत्या. कार्यतत्पर याकरता, की त्यांच्या कामाचा उरक वाखाणण्याजोगा होताच शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार घरचं पानही हलत नसे त्यांच्याशिवाय..

हळूहळू मिताली नव्या घरी रुळू लागली होती. त्यादिवशी सगळ्यांचं झाल्यावर सासू-सून जेवायला बसल्या. इतक्यात सासऱ्यांचा आवाज आला, अग tv चा रिमोट मिळत नाहीये. तशा सासूबाई पटकन उठल्या आणि त्यांना tv वरच असलेला रिमोट देऊन आल्या आणि सुनेला म्हणाल्या, “माझ्याशिवाय बाई पानच हलत नाही यांचं.”

सकाळी योगा करतानापण मुलाने म्हणजे मितालीच्या नवऱ्याने अशीच हाक मारली, “अग आई,  माझा डबा भरला का, निघायला उशीर होतोय.” तशा पटकन योगा सोडून सासूबाई डबा भरायला गेल्या.

मिताली हे सगळं पहात होती.

एक दिवस सासूबाईंच्या भिशीचा ग्रुप घरी आला. सगळे एक आठवड्याच्या महाबळेश्वर ट्रिपचे ठरवत होते, पण सासूबाई म्हणाल्या, “मी काही येणार नाही, मी आले तर सगळंच कोलमडेल घरातलं.” तशी मिताली म्हणाली, “आई तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं बघेन. मला माहितीये तुम्ही काय काय करता ते.” सासूबाई म्हणाल्या, ” अग, बरंच काही असतं, तुला नाही जमणार.” तशी मिताली म्हणाली  ” आई जमवून दाखवीन. बघाच तुम्ही.” मितालीने दिलेल्या विश्वासावर सासूबाई दोन दिवसात ट्रिपला गेल्या.

मिताली तिचं ऑफिसचं आवरत होती, तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला, “अग, माझा रुमाल , पाकीट कुठे आहे? आई नेहमी काढून ठेवते.” तसे मितालीने जागेवरूनच उत्तर दिले, “कपाट उघडलं की समोर जो ड्रॉवर आहे ना, त्यात आहे. रोज तिथेच असतं.उद्यापासून घेत जा हाताने.”

नवऱ्याने जराशा नाराजीनेच रुमाल आणि पाकीट ताब्यात घेतले. तेवढ्यात मितालीचा आवाज आला, “डबा मावशींनी धुवून ठेवलाय. कढईमध्ये भाजी आणि बाजूलाच डब्यात पोळ्या आहेत,त्यापण भरून घे. मी निघते ऑफिसला.” हे सगळं करण्याची सवय नसलेल्या नवऱ्याला हे ऐकून थोडा धक्का बसला; पण स्वतःच घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

ती निघत असतानाच सासऱ्यांचा आवाज आला, “अग, पूजेसाठी फुलं नाहीत परडीत.”  तशी मिताली म्हटली, “अहो बाबा, घरचीच बाग आहे की, घ्या तोडून बागेतून. तेवढीच मोकळी हवा मिळेल आणि चालणंही होईल.”

हे ऐकताच सासऱ्यांनी मुलाकडे पाहिले, तसा तो खांदे उडवून निघून गेला.

त्यादिवशी रात्री मिताली जेवायला बसली, आणि नेहमीप्रमाणे सासऱ्यांचा आवाज आलाच रिमोट साठी, मिताली जागेवरून म्हणाली, “समोर tv वरच आहे, बाबा, ” सासऱ्यांनी निमूटपणे उठून रिमोट घेतला.

अशी अनेक छोटी-मोठी कामे मितालीने स्वतः न करता ज्याची त्याला करायला लावली.

आठवडा सरला, सासूबाई आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जरा उठायला उशीरच झाला. लगबगीने उठून त्या स्वयंपाकघरात आल्या , तर त्यांचा मुलगा डबा भरून घेत होता. आईला पाहताच त्याने विचारले, “आई, कॉफी देऊ का?”

सासूबाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या बाहेर आल्या, तर सासरे बाहेर बागेत मस्त कानात हेडफोन लावून फुलं तोडत होते, सासूबाईंना कळेना, हे काय चाललंय आपल्या घरात?

इतक्यात मिताली  कॉफीचे दोन मग घेऊन आली, म्हणाली “आई चला, कॉफी घेऊ.” सासूबाई अजूनही आश्चर्यचकीत होत्या, तशी मिताली म्हणाली, “आई, चिल, expectation setting झालं आहे घराचं आणि घरातल्या लोकांचं, आता आरामात दिवस एन्जॉय करा.”

अचानक सासूबाईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, “थॅंक्यू,मॅनेजर बाई. That’s what I was trying to achieve for so many years.”

मिताली खुदकन हसली.

लेखिका :सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “निर्व्याज…” ☆ सुश्री धनश्री लेले ☆

? विविधा ?

☆ “निर्व्याज…” ☆ सुश्री धनश्री लेले ☆

रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते, पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री ९ चा होता. संध्याकाळी ७ नंतर आवरायला घेतलं, एवढय़ात दार वाजलं. आत्ता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानेच मी दार उघडलं. एक पासष्टीच्या काकू उभ्या होत्या.

‘‘धनश्री लेले तुम्हीच ना?’’

मी म्हटलं, ‘‘हो. या ना आत.’’

त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. दोन हातांत दोन मोठय़ा पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं, ‘आवरायचं आहे, साडेसातपर्यंत थिएटरला पोहोचायचंय, आता किती वेळ जाणार आहे काय माहीत.’  माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तुझा वेळ नाही घेत. खरंतर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले.’’

‘‘छे छे बसा की. माझं होईल वेळेत आवरून..’’ मी असं म्हटलं होतं खरं.. पण या कोण काकू? आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे? हा पुढचा प्रश्न मनात उभा. जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, ‘‘तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले.’’

‘‘इथेच असता का तुम्ही?,’’ मी विचारलं.

‘‘नाही इथे माझी मुलगा-मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू..’’ त्यांनी माहिती पुरवली. ‘‘काकू तुम्ही शिक्षिका होतात का?’’ असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं.

‘‘काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी काही टीव्हीवर वगैरे नसते त्यामुळे इतक्या आत भूपर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं?’’ अगदी सहज ओघात विचारलं.

‘‘अगं, मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता, ते पुस्तक वाचलं होतं.. आम्ही tv नाही गं जास्त बघत. हां पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात.. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली नि आले..’’

‘‘अहो, पण एवढय़ा पावसात?’’

‘‘अगं, पावसाचं काय? आमच्या कोकणाचा जावईच तो.. पडायचाच.. एस.टी. असते ना संध्याकाळची.. मग निघाले. दीड-दोन तास लागतात भू गावातून यायला..’’ काकू म्हणाल्या.

‘‘बसा, चहा सांगते तुम्हाला.’’

‘‘अगो छे, तुझं आवर तू.. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले..’’ असं म्हणून काकूंनी त्या मोठय़ा दोन पिशव्या माझ्या हातात दिल्या..

‘‘काय आहे यात?’’

‘‘काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार? पानाची डावी बाजू आहे..’’, काकू म्हणाल्या.

‘‘म्हणजे?’’ मी चक्रावून विचारलं.

‘‘अगं, त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस.. घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं. सांडगी मिरच्या, मेतकूट, दोन-तीन प्रकारचे मुरंबे, दोन-तीन प्रकारच्या कोरडय़ा चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आलीय..’’

थोडं थोडं? बाप रे.. मला पिशव्या उचलवत नव्हत्या.. आणि या काकू एस.टी.ने पावसात एवढय़ा जड पिशव्या घेऊन आल्या..

‘‘अगं, डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना.. पोळीशी काय? हा प्रश्न राहत नाही.. तूही रात्री यायला उशीरबिशीर झाला तर पोळीबरोबर हे खा हो..’’

भरल्या डोळ्यांनी, नि:शब्द होऊन मी एकदा काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी होते.. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली..

कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वत:ला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढय़ा लांब आल्या त्या? काय बोलू?

शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत.. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही.. ‘धन्यवाद.. थॅंक्यू..’ या शब्दांना इथे काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता. निर्व्याज.. खरंच निर्व्याज.. काय मिळवायचं होतं त्यांना?

‘‘जाऊ  दे, आपल्याला काय करायचंय, बघतील त्याचं ते..’’ अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना .. गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली? खरंच! माझा काय फायदा? मला काय मिळणार आहे? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला.. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी.. त्यात ही ‘श्रवण केलियाने काय प्राप्त’ असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थानीही केला. फायद्याशिवाय जन नाही.

पण इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती. जिचा आपल्याशी दूरान्वयेही संबंध नाही तिचा एवढा विचार करून, तिला आपण थोडं तरी सहकार्य करू या. हा असा विचार म्हणजे रामराज्यच! आपण या गोष्टीला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारेही कोणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढय़ा पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो ..सबसे तेज ..व्हॉट्स अपवर अपलोड करून व्हर्च्युअल अश्रू गाळणारे आपण असं कोणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय.. असं म्हणून मोकळं होतो.

मनात विचार आला हे असं निर्व्याज वागायला कधी तरी जमणार आहे का आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो.. झाडं स्वत:ची फळं स्वत: खात नाही.. नदी स्वत:चं पाणी स्वत: पीत नाही, गाई स्वत:चं दूध स्वत: पीत नाहीत.. आठवीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता.. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता.. कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ‘ऐंशी कळवळ्याची जाति करी लाभाविण प्रीती’ लाभाविण प्रीती.. बाप रे. कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात..

‘‘पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो.. म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन..’’ काकूंच्या बोलण्याने मी भानावर आले.. ‘‘आणि यातलं काही संपलं आवडलं तर नि:संकोच सांग. पाठवून देईन मुंबईस.’’ मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या ओंजळी समर्थ नाहीत हो.. ‘तुझमे कोई कमी नही ..मेरी ही झोली तंग है’..’’

काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजाने सगळा आसमंत उजळून निघावा.. तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या ‘मी, माझा’च्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं.. खूप कठीण..

© सुश्री धनश्री लेले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कधीतरी शाळकरी वयात दुर्गाबाई भागवतांचा ‘महेश्वरची महाश्वेता’ हा अहिल्यादेवी होळकरांवरचा लेख वाचनात आला आणि मी पार भारावून गेले. देवी अहिल्याबाईंचं सोज्वळ, शालीन व्यक्तिमत्व, व्यक्तिगत आयुष्य एकामागोमाग एक अंगावर कोसळणाऱ्या डोंगराएवढ्या दुःखांनी चिणून गेलेलं असतानाही त्यांनी केवळ इंदूर संस्थानच्या रयतेवरच नव्हे, तर पूर्ण भारतातल्या गरीब, पीडित जनतेवर धरलेला आपल्या मायेचा पदर, देवासाठी, हिंदूधर्मासाठी करून ठेवलेली कामे, आणि त्यांची व्रतस्थ राहणी, सगळ्यांनीच माझ्या कोवळ्या मनावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासूनच अहिल्याबाई आणि त्यांचे लाडके महेश्वर मनात घर करून बसले होते. कुणीतरी दिलेलं मोरपीस जपून पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवावं तसं मनात जपून ठेवलेलं. महेश्वरच्या विस्तीर्ण दगडी बांधीव घाटांच्या पायऱ्यानां हळुवार गुदगुल्या करणारी नर्मदा,  महेश्वरमध्येच विणलेल्या महेश्वरी साडीइतका नितळ, झुळझुळीत नर्मदेचा विशाल प्रवाह, शुभ्र साडीतली अहिल्याबाईंची कृश मूर्ती, त्यांच्या हातातलं बेलपत्राने सुशोभित झालेलं शिवलिंग, सारं काही न बघताही माझ्या मनात खोल रुतून बसलेलं होतं. पुढे पाच वर्षांपूर्वी मी महेश्वरला पहिल्यांदा गेले तेव्हा मला खूप वर्षांनी माहेरी गेल्याचा आनंद झाला होता. 

इंदूर. मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं एक इवलंसं संस्थान. मल्हाररावांना एकच मुलगा, अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव   होळकर. कुंभेरीच्या लढाईत खंडेराव तोफेचा गोळा वर्मी लागून मृत्यू पावले. तत्कालीन प्रचलित चालीरीतींप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्यामागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना मागे खेचलं. अहिल्याबाईंचा वकूब त्यांना माहिती होता. पुढे पूर्ण राजकारभार मल्हाररावांनी आपल्या ह्या कर्तबगार सुनेच्या हाती दिला. अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान तर उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण त्यांच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या हिंदू जनतेसाठी अहिल्याबाईंनी जे काम करून ठेवलंय तसं काम क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय राजा किंवा राणीने केलं असेल. 

धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरे उध्वस्त केली होती. त्यांनी घातलेले घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न-विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्यादेवीनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचा घाट घातला तेव्हा त्या नुसती दगड मातीच्या इमारती उभारत नव्हत्या , त्या उभारत होत्या सर्वसामान्य हिंदूंची हिंमत. सततच्या पराभवांनी गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या सामान्य हिंदू समाजमनाला अहिल्याबाई फिरून एकवार सामर्थ्याचा फणा काढायला डिवचत होत्या, शिकवत होत्या.

अगदी आजही भारताचा नकाशा बघितला तर अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यांनी बांधलेल्या नदीवरच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक तीर्थस्नानाला जातात. काशी-सोमनाथ पासून ते गयेमध्ये त्यांनी घडवलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही हिंदू दर्शनासाठी रांगा लावतात. त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आपल्याला हिमालयामध्ये बद्रिकेदार ते दक्षिणेत रामेश्वरम पर्यंत सापडतील. त्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या, गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं ते आपल्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत, स्वतः व्रतस्थ राहून, आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून. आपल्या खासगी मिळकतीतला पैसानपैसा वापरून अहिल्याबाईनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. 

औरंगझेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विणून आणि कुरणाच्या प्रती हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खूपदा ऐकलेत, पण अहिल्याबाई कित्येक वर्षे एकभुक्त राहिल्या, राणी असताना काठ-पदर नसलेल्या साध्या पांढऱ्या माहेश्वरी सुती साडीखेरीज कधी त्यांच्या अंगाला दुसरं वस्त्र लागलं नाही. एका रुद्राक्षांच्या माळेखेरीज त्यांनी कधी दुसरा दागिना अंगावर ल्यायला नाही. त्यांचा महेश्वर मधला वाडा ‘राजवाडा’ म्हणून घेण्यासारखा कधी भव्य-दिव्य आणि दिमाखदार दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळाच्या सगळा देवळांची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादी धर्मकार्यात खर्च केला हा इतिहास किती जणांना माहित आहे?

गेल्या आठवड्यात परत एकदा महेश्वरला जायचा योग आला. माहेश्वरी साड्या कश्या विणतात ते बघायला तामिळनाडूच्या को-ऑप्टेक्स चे एमडी वेंकटेश नरसिंहन ह्यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याचा एक भाग म्हणून आम्ही काही समानधर्मी लोक महेश्वरला गेलो होतो. माझी ह्याआधीची पहिली महेश्वर वारी भर उन्हाळ्यात होती त्यामुळे नर्मदेचा प्रवाह थोडा क्षीण झालेला आणि धापा टाकायला लावणारी निमाडची गरमी. ह्यावेळी मात्र आम्ही महेश्वरचा सुखद हिंवाळा मनसोक्त अनुभवला. ह्यावर्षी पाऊस खूप झाला त्यामुळे नर्मदेचा प्रवाह खूपच विशाल आणि विस्तीर्ण भासत होता. आम्ही घाटावर पोचलो तेव्हा सरती संध्याकाळ होती, उन्हे नुकतीच कलायला लागली होती. नर्मदेपारच्या गावांमधले लोक बाजारहाट करून आपापल्या गांवी परत निघाले होते. नर्मदेचा प्रवाह शांत वहात होता. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी कधीतरी अहिल्यादेवीही उभ्या राहिल्या असतील ह्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. आजही महेश्वर वासियांसाठी अहिल्याबाई ‘रानी माँ’ आहेत. त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला महेश्वरमध्ये जाणवतं. 

बघता बघता सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकायला लागला. प्रवाहात उभा असलेला एक मोठा खडक प्रदीप्त झाल्यासारखा दिसत होता, दूरवर गांवकऱ्यानी भरलेल्या बोटी संथपणे नर्मदेचा प्रवाह कापत पलीकडे चालल्या होत्या. आता सूर्याचा रसरशीत लालभडक गोल अलगद नदीच्या प्रवाहाला टेकला होता, जणू आई नर्मदेच्या कपाळावरचा ठसठशीत कुंकवाचा टिळा. आता घाटावरची गर्दी कमी झाली होती. प्रवाहाच्या अगदी जवळ, घाटाच्या शेवटच्या पायरीवर एक बाई उभ्या राहून मावळत्या सूर्याला अर्घ्यदान करत होत्या. सगळीकडे नीरव शांतता, फक्त नर्मदेच्या मंद वाहत्या लाटांचा आवाज आणि आमचे दीर्घ श्वास. अंगावर शिरशिरीच आली एकदम.

तेवढ्यात पूजेची तयारी असलेले तबक घेऊन एक गुरुजी आले. रोजच्या नित्य नर्मदाआरतीची वेळ झाली होती. ही आरती म्हणजे ऋषिकेशच्या किंवा वाराणसीच्या गंगा आरतीसारखी दिमाखदार नव्हे, अगदी साधी सुधी, घरगुती, अगदी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वासारखी सोज्वळ आणि शांत. आरती करणारे एक गुरुजी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे दुसरे आणि मागे कोरसमध्ये गाणारा एक तिसरा तरुण. बस एवढंच. फक्त तीन माणसं आणि आमचा ग्रुप. आरती झाली आणि त्या गुरुजींनी स्वच्छ स्वरात आदी शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणायला सुरवात केली. 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं

द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।

कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे

त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे… 

मंतरलेली संध्याकाळ होती ती, आदी शंकराचार्यांचे अलौकिक शब्द, नर्मदामैय्याचा चिरंतन प्रवाह, देवी अहिल्याबाईंचा आशीर्वाद, नर्मदेच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले द्रोणांचे दिवे आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकणारे आम्ही. आयुष्यात काही क्षण असे येतात की ते अनुभवताना जिणं सार्थक झाल्यासारखं वाटतं. नर्मदेकाठची ती संध्याकाळ तशी होती. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-2 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-2 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(माझी बुद्धी,तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत.मी आता माझा निर्णय बदलणार नाही.राहिले दैव,तर मी क्षात्रकन्या आहे.मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन! माझ्यावर विश्वास ठेवा .) इथून पुढे —

राजा राणीने कन्येच्या इच्छेचा मान ठेवला.तिच्यावर टाकलेला विश्वास,तिला दिलेला स्वयंनिर्णयाचा अधिकार त्यांनी काढून घेतला नाही. तातडीने वनात जाऊन तिचा विवाह सत्यावानाशी करून दिला.सावित्री वनात राहू लागली.सीतेप्रमाणे सर्व राजवस्त्रे,सुविधा , सवयी यांचा त्याग करून ती आश्रमीय जीवनात समरसून गेली.

अखेर तो दिवस आला.सत्यवान सावित्री वनात गेले होते.झाडावर चढलेला सत्यवान अचानक खाली कोसळला.त्याचे प्राण न्यायला यमदेव आले.

आपला प्राणप्रिय सहचर आपल्याला सोडून जात आहे हे समोर दिसत असूनही सावित्री डगमगली नाही.तिनं यमाशी संवाद केला.त्याला प्रश्न विचारले.मानवाचे प्रयत्न,त्याची अभीप्सा,त्याचं जीवनध्येय याच्याशी काही संबंध नसलेल्या यमाशी आणि आपल्या हातात मृत्यू आहे म्हणजे आपणच सर्वश्रेष्ठ या त्याच्या अहंकाराशी ती लढली.

मृत्यूपूर्वी येऊन माणसाला भ्रमित करणाऱ्या भय,अविश्वास,संभ्रम, अज्ञान, मोह या यमदूतांना तिनं ओळखलं.त्यांच्या आक्रमणामुळे तिनं आपली सकारात्मकता,जीवनेच्छा त्यागली नाही. प्रयत्न सोडले नाहीत.मनुष्याने जीवनाला योग्य रीतीनं समजून घेतलं,मृत्यूचे डावपेच ओळखून वेळीच पावलं उचलली तर मनुष्य दीर्घायुषी होऊ शकतो हे तिनं सिध्द केलं.मन शांत ठेवून विचार केला आणि संवाद सुरु ठेवला तर समस्या सोडवता येतात हे तिनं दाखवलं .

सावित्रीची कथा भाकडकथा नाही.

अश्व म्हणजे इंद्रिये. त्यांना वश केलेला राजाअश्वपती.सूर्य म्हणजे साक्षात, अखंड उर्जा व जीवनाचे प्रतीक.

त्याच्या उपासनेतून झालेली त्याची कन्या सावित्री.दृष्टी असूनही अंध झालेला व त्यामुळे राज्य गमावलेला राजा द्युमत्सेन आणि सत्याचा अविरत ध्यास घेतलेला सामान्य मानव सत्यवान.ही नावेही किती सूचक आहेत!

प्रथम इंद्रिय सुखांवर विजय मिळवा,व्यक्तिगत सुख व स्वार्थापलिकडे जाऊन विशाल अशी विश्वकल्याणाची मनीषा करा,

त्याकरता समाजाचे सहकार्य घेऊन अविरत प्रयत्न करा हे ‘राजा’ अश्वपती सांगतो.’पिता’ अश्वपती त्याच्याही पुढे जाऊन व्यवहारात कसं वागायला हवं हे शिकवतो.पुत्राऐवजी कन्या मिळाली म्हणून निराश न होता तो तिला समर्थ बनवतो.तुझा जन्म केवळ वंशवृद्धी करता नाही तर तुला मानवी जीवनाला काही नवा अर्थ द्यायचा आहे हे तिच्या मनात रुजवतो.

डोळसपणे वाढवलेल्या तरुण,देखण्या लेकीला पूर्ण विश्वासाने प्रवासाला पाठवतो आणि वरसंशोधनात पूर्ण मोकळीक देतो.तिच्या निवडीनंतरही सत्यवान धनिक नाही,राजगृहात रहात नाही या कारणांचा उल्लेखही करत नाही.लेकीचा संसार सुखाचा व्हावा या एकमात्र अपेक्षेलाही तो त्यागतो आणि तिच्या आत्मविश्वासपूर्ण निर्णयाच्या पाठीशी उभा रहातो.

राणीही आपल्या मातृसुलभ मोहाला आवरते.तिची पाठवणी करताना धनधान्य-सेवक-वस्त्रालंकार-राजवाडे-राज्य असं काहीही न देता तिचा व तिच्या कुटुंबाचा स्वाभिमान ते जपतात,तिच्या प्रयत्नवादावर पूर्ण विश्वास ठेवतात.

सावित्रीनं सत्यवानाचे प्राणच नाही तर सासरे द्युमत्सेन यांची गेलेली दृष्टी, गमावलेले राज्य परत मिळवले असे कथा सांगते.या करता सावित्रीने वर्षभर किती प्रयत्न केले असतील!

तिनं स्वतःचं ध्येय निश्चित केलं असेल त्याकरता स्नायुबल, देहबल, मनोबल, बुद्धिबल, आत्मबल एकवटलं असेल ..कदाचित तिने वनातल्या लोकांचे सहाय्य घेतले असेल तिथल्या ऋषी मुनींचे आशीर्वाद,त्यांचे ज्ञान याचे पाठबळ तिला मिळाले असेल..

चिरंजीवित्वाचे प्रतीक असलेल्या ,आपले खोड नाहीसे झाले तरी आपल्या पारंब्या मातीत घट्ट रुजवत राहिलो तर आपण अमर होतो हे तिला सांगणाऱ्या वटवृक्षाला तिनं आपलं प्रेरणास्थान मानलं असेल ..वडाच्या औषधी गुणधर्माचा तिनं वापर केला असेल .. मृत्यूवर मात या कल्पनेकडेही कितीतरी अर्थांनी पाहता येते..

सावित्रीनं जे केलं ते कोणत्याही प्रेमिकेनं केलं नसेल.या कथेद्वारे सावित्री आपल्याला आजच्या काळासाठीही उपयुक्त असं खूप काही सांगते आहे.

तिनं ईश्वर निर्मित जीवसृष्टी,मानवी जीवन व मृत्यूचा खरा अर्थ समजून घेतला असेल, निसर्गाशी साहचर्य हेच जीवन हे ती आपल्याला सांगू पाहत असेल.. 

मुलीला वाढवताना आधी तिच्या मनात तिच्या जीवन ध्येयाची पेरणी करायची आणि मग त्याला अनुकूल असे पुढचे जीवन व जोडीदार तिला निवडू द्यायचा हे ती सांगत असेल..

आईवडिलांनी ज्ञान,सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दिलं तर त्याचा वापर कसा करायचा,आणि  ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी मृत्यूशीही भांडायला कचरायचं नाही,आपल्या स्वप्नाचा पाठलाग सोडायचा नाही हे ती सांगू पहात असेल ..

‘योग’ यमाने दिला आहे असं मानतात.सावित्रीनं माणसाला दीर्घायुषी करणारा योग यमाच्या संवादातून आणला असेल..

द्युम्त्सेनाला तिनं योग्य ‘जीवनदृष्टी’ दिली असेल ..

तीव्र इच्छाशक्ती,शुध्द हेतू,परिपूर्ण प्रयत्न केले आणि त्याला ईश्वरी श्रद्धेची जोड दिली तर चमत्कार वाटावे असे परिवर्तन शक्य आहे, हे ती आपल्याला सांगू पाहत असेल..

पुराणकथांना नाकारणे,त्यांची थट्टा करणे,उपहास करणे सोपे आहे.त्यांना प्रतिकात गुंडाळून त्यातली प्रेरणा घुसमटून टाकणे हेही सोपेच आहे.पण नव्या दृष्टीने त्यांच्याकडे पहिले त्याचे कालसुसंगत अर्थ लावले तर या कथा आताच्या समाजाला कितीतरी बळ पुरवतात .

सावित्री केवळ पतीच्या मागे जाणारी त्याचे अनुसरण करणारी ‘प्रति’गामी नाही .पती ज्या जीवनरेषेशी थांबला,जीवनविन्मुख झाला त्या मर्यादेला ओलांडून पुढे जाणारी व त्याला पुन्हा जीवनसन्मुख करणारी,आपल्या जीवनध्येयाच्या मागे यायला लावणारी,नेतृत्व करणारी ‘पुरो’गामिनी आहे !

सावित्रीचे व्रत म्हणजे केवळ उपवास नाही. उपहास तर मुळीच नाही!

सावित्रीच्या उपवासातून मिळवायचे आत्मबल .शिकायचा संयम.वडाच्या पूजनातून घ्यायची चिवट जिजीविषा.

जपायचं निसर्गाशी असलेलं नातं.

धागा तुटू द्यायचा नाही,पर्यावरण आणि समृद्धी यातल्या संतुलनाचा.

सात जन्म ही सोबत संपूच नये असं वाटावं असं साहचर्य,असं माधुर्य सहजीवानात निर्माण करायचं,अर्थात दोघांनी !

दैववादाच्या क्षीण धाग्यात गुंडाळून ठेवलेली सावित्रीची कथा सोडवायची आणि प्रयत्नवादाच्या भक्कम वटवृक्षाच्या रूपात रुजवून घ्यायची!

– समाप्त –

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉश किचन… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ पाॅश किचन…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे, प्लास्टिकचे डबे,जुन्या वाट्या, पेले, ताटं …सगळं इतकं जुनं झालं होतं.

सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं. आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली..

छान पॉश वाटत होतं आता किचन…

 

आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम.

इतक्यात रिमाची कामवाली सखू आली.

पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली.  “बापरे !!  आज घासायला इतकी भांडीकुंडी काढली का ताई ?”…तिचा चेहरा जरा त्रासिक झाला.

रिमा म्हणाली “अग नाही. भंगारवाल्याला द्यायचीत.”

सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले.

“ताई,तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का?” सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलतं एक पातेलं सारखं येऊ लागलं.

रीमा म्हणाली, “अग एक का?काय आहे ते सगळं घेऊन जा. तेवढाच माझा पसारा कमी होईल.”

“सगळं!”सखूचे डोळे विस्फारले… तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली.

तिने तिचं काम पटापट आटपलं.सगळी पातेली,डबे-डूबे, पेले… सगळं पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली.आज जणू तिला चार पाय फुटले होते.

 

घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुनं तुटकं पातेलं.. वाकडा चमचा… सगळं एका कोपऱ्यात जमा केलं .

आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला. आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता.

इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली आणि ती स्वतःशी पुटपुटली,”आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं, की झालं काम.”

 

इतक्यात दारावर एक भिकारीण पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली.

“माय, पाणी दे.”

सखू तिच्या हातावर पाणी ओतणार, इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिने त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं.पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली.

सखू म्हणाली,”दे टाकून.”

ती भिकारीण म्हणाली “तुले नको?मग मला घेऊ?”

सखू म्हणाली” घे की आणि हे बाकीचं पण ने,”

असं म्हणत तिने तिचा भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामा केला.

 

ती भिकारीण सुखावून गेली.

पाणी प्यायला पातेलं… कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी…आणि वाटलंच चमच्याने खावं तर एक वाकडा चमचा पण होता….

आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. .!

 

“पॉश” या शब्दाची व्याख्या,

सुख कशात मानायचं, हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सहज सुचलं म्हणून…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “सहज सुचल म्हणून…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

सहज सुचलं म्हणून…….

काही दिवसांपूर्वी श्रीरंग खटावकर याची जन्म वारी या नाटका बद्दल ची पोस्ट वाचनात आली. शीर्षक होतं

आपण ठरवायचे आपण चाळ बनायचे की टाळ……

मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली.

चाळ आणि टाळ…… दोन्ही नाद ब्रह्मा ची आविष्कृत रूपं! ताल अधिक लय यांची नाद लहरीं ची निर्मिती! दोघांच ही काम लयीत वाजणं, ठेक्यावर झंकारणं!!! पण चाळ बहुधा इतरांच्या मनोरंजना करीता… तर टाळ स्व रंजना करीता… आत्मानंदा साठी!!

चाळ… प्रपंचा साठी पायी बांधण्याचा केलेला प्रपंच! तर टाळ.. परमार्था साठी केलेला प्रपंच!

प्रश्न आहे तो आपण चाळ बनायचे की टाळ???

तसं पाहिलं तर ही दोन्ही भक्ती ची साधने! एक कलेच्या भक्ती चं…. तर एक परमेश्वराच्या भक्ती चं! भक्ती म्हटली की… येते ती.. तल्लीनता, तद्रूपता!! आणि मग बघा ना..

टाळ बोले चिपळीला  नाच माझ्या संग!! म्हणजे… चाळ न बांधता ही तन्मय होऊन नाचणं  आलंच ना?

मीरा बाई चं कृष्ण भक्ती चं मधुरा भक्ती चं रूप बघा …

पग घुंगरू बांध मीरा नाची रे!!

तिनं तिची भक्ती व्यक्त करण्यासाठी,

कृष्णा प्रती चं समर्पण चाळ बनून च तर सिद्ध केले.

एका गाण्याच्या ओळी आठवल्या,

कांटों से खिंचके ये आंचल

तोड के बंधन बांधी पायल

आता बघा…. एक बंधन तोडलयं… सोडवलंयं  त्यातून… पण… परत दुसरं बंधन चाळ बांधले च की पायी!!

मग प्रश्न पडतो की… बंधनातून  मुक्ती नंतर परत बंधन??  तर हो… चाळ बांधणं हे ब्रह्मानंदी टाळी लागून.. मुक्ती प्राप्त करून देणारी अवस्था आहे. त्या तली  तल्लीनता.,. मोक्षप्राप्ती ची वाट मोकळी च करते जणू! सांसारिक बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या भक्ती त.. नामस्मरणाशी स्वत:ला बांधून घ्यायचं.. दंग होऊन जायचं.. रंगून जायचं.. एकरंग.. एकरूप व्हायचं.

 टाळ हाती घेऊन ही तीच फलप्राप्ती!! कारण टाळ हाती घेऊन

देहभान विसरून नाचणं च तर असतं ना?? नृत्य ही मनातल्या भाव-विभाव-अनुभाव  यांचं प्रकटीकरण!  आत्म्याची परमात्म्याच्या  भेटीला आतुर पावलांनी… पदन्यासातून धरलेली वाटच तर असते ना! आणि टाळ हाती घेऊन झाले ले पदन्यासाचे प्रकटीकरण ही… पंढरीच्या वाटेवरचे रिंगण असो की

किर्तनाचे रंगी नाचे असो….

टाळ बना की चाळ…. …

ही जन्म वारी सुफळ, संपूर्ण व्हावी आणि विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला!!! इतकं सामर्थ्य हवं आपल्या टाळ आणि चाळ दोन्ही च्या नाद लहरीं चं!! यां दोन्ही पैकी कुठलंही रूप हे ईश्वरा शी एकरूपत्व साधणारे नादमय नामस्मरण च आहे!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares