मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

माउलींनी पसायदानात ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ असे का म्हटले आहे, वाचा ही गोष्ट !

एक कीर्तनकार महाराज तीर्थाटनाला निघाले. वाटेत एका गावात मुक्कामी थांबले. ईश्वरसेवा म्हणून तेथील मंदिरात कीर्तन करू लागले. गावकऱ्यांना त्यांचे कीर्तन खूप आवडले. महाराजांची कीर्ती पसरू लागली. पंचक्रोशीतून त्यांना कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले. त्यांच्या कीर्तनात पांडुरंगाच्या दर्शनाची  भाविकांना अनुभूती येत असे. 

ही गोष्ट बादशहाच्या कानापर्यंत गेली, तेव्हा त्याने महाराजांना आपल्या राजदरबारात बोलावले आणि विचारले, “ तुम्ही मोठे कीर्तनकार आणि पांडुरंगाचे भक्त अशी तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याशी देव बोलतो, तुमचे ऐकतो असे लोकांकडून  समजले. तुम्हाला मी इथे बोलावले आहे, ते तुमची भक्ती सिद्ध करण्यासाठी. समजा, मी जर एक गाय मारली, तर तुम्ही ती जिवंत केली पाहिजे. नाहीतर ढोंगी बनून तुम्ही माझ्या प्रजेची दिशाभूल केल्याबद्दल मी तुम्हारा ठार मारीन.” 

कीर्तनकार महाराज म्हणाले,  “ माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी गायीने आपला जीव का गमवायचा? तुम्ही खुशाल तिच्या जीवावर उदार झालात. तुम्हाला तिच्या जीवाची किंमत नाही. मी परीक्षा द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही गायीऐवजी तुमच्या जवळच्या कोणा व्यक्तीचा बळी द्यायला तयार असाल तर सांगा.”

बादशहा चक्रावला. महाराजांकडून अशा प्रश्नाची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून महाराज म्हणाले,  “ तुम्ही तुमच्या राजपुत्राचा बळी देता का? मी माझ्या पांडुरंगाला सांगून त्याला पुन्हा जिवंत करून दाखवतो.”

बादशहा स्वत:च्याच बोलण्यात अडकला. गायीच्या जागी आपल्या स्वत:च्या मुलाचा जीव घेण्याच्या कल्पनेनेही त्याचे हात थरथरू लागले. तो महाराजांना म्हणाला, “ तुमच्या भक्तीची परीक्षा घ्यायला मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकत नाही. मात्र, तुम्ही आता तुमची कीर्तन प्रवचन सेवा थांबवा आणि तुमचा मुक्काम इथून हलवा.”

यावर महाराज म्हणाले,  “ बादशहा, तुम्हाला माझ्या भक्तीचा त्रास झाला की तुमच्या विकृत मानसिकतेचा? आपण गायीचा जीव घ्यायला तयार होतात, परंतु मुलाच्या जीवाचा प्रश्न आल्यावर आपण आपला विचार बदललात. याउपर आपण जरी राजपुत्राचा जीव घेण्याची तयारी दर्शवली असती, तरी मी आपल्याला नक्कीच अडवले असते. कारण, कोणाच्याही जीवापेक्षा आमचा पांडुरंग मोठा नाही. नव्हे, तर प्रत्येक जीवात आमचा पांडुरंग आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भक्तीची परीक्षा बघू नका.  तुम्ही म्हणालात तर मी गाव सोडून जाईनही ! पण आपण परत कधी अशी कोणाची परीक्षा घेऊ नका एवढी विनंती करतो.”

महाराजांचे बोल ऐकून बादशला वरमला. त्याने महाराजांची क्षमा मागितली. त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, “ महाराज, तुमच्या पांडुरंगानेच माझ्या मुलाचे प्राण वाचवले, अन्यथा माझ्या अहंकारापोटी मी त्याचे प्राण घ्यायलाही बधलो नसतो. परंतु, तुम्ही मला भगवंताच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीत. आजवर गावकऱ्यांकडून ऐकले होते, की तुमच्या कीर्तनात पांडुरंग भेटतो, तो आज मला तुमच्यात दिसला.”

महाराज म्हणाले, “ बादशहा, याचे श्रेय मला नाही, तर संतांना आहे. त्यांनी आमच्यावर घातलेले हे संस्कार आहेत. माऊली म्हणते, ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ – अर्थात, कोणतीही व्यक्ती वाईट नसते, तिच्यातील व्यंकटी अर्थात वाईट वृत्ती बाजूला केली, तर चांगली व्यक्ती शिल्लक राहते. तुम्हीदेखील तुमचे वाईट विचार दूर सारलेत,म्हणून तुम्हाला ईश्वराचे अस्तित्त्व जाणवले. तुमच्याप्रमाणे प्रत्येकाने वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा त्याग केला, तर हे ईश्वरनिर्मित जग किती सुंदर होईल नाही? “

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? विविधा ?

☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“निश्चयाचा महामेरू।  बहुत जनांसी आधारू ॥

अखंड स्थितीचा निर्धारू।  श्रीमंत योगी ॥”

समर्थ पुढे म्हणतात,

“यशवंत कीर्तिवंत। समर्थ्यवंत वरदवंत॥

नीतिवंत पुण्यवंत। जाणता राजा॥”

पहिल्या कडव्यातील प्रत्येक चरणामध्ये नीट पाहिले तर महाराज एक शासक व व्यवस्थापक म्हणून कसे होते याचे वर्णन आहे. यातील ‘श्रीमंत योगी’ हा शब्द महत्वाचा आहे. महाराज श्रीमंत असून श्रीमंतीपासून अलिप्त होते. ‘ खजिन्यात जमा झालेली संपत्ती रयतेची आहे ’ यावर महाराजांचा ठाम विश्वास होता, ती संपत्ती त्यांनी फक्त आणि फक्त रयतेच्या कल्याणासाठीच वापरली. हे त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे तंत्र होते.

दुसऱ्या कडव्यातील पहिल्या तीन चरणांमध्ये  महाराजांचा गुणगौरव केला आहे. शेवटच्या चरणातील ‘जाणता राजा’ हे शब्द महत्वाचे आहेत. महाराज ‘राजे’ होतेच, पण तो एक ‘जाणता’ राजा होता. जाणता म्हणजे जाणणारा. ज्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असते व जो प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे बनवायचे हे जाणतो, त्याला ‘ जाणता ‘ म्हटले जाते. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. आजदेखील त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास आपला देश निश्चितच ‘विश्वगुरु’ होऊ शकतो.

व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे ‘दूरदृष्टी’.  आपल्या प्रजेचा जर विकास करायचा असेल तर पारतंत्र्याचे जोखड झुगारून स्वतःचे राज्य –  म्हणजे स्वराज्य निर्माण करावे लागेल हे त्यांनी बालपणीच ओळखले. कारण स्वातंत्र्यातच रयतेचा विकास होतो हे जाणण्याची दूरदृष्टी लहान वयातच त्यांचेकडे होती. या त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांना ‘आनंदभुवन’ समान स्वराज्याची निर्मिती करता आली.

रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती करायची तर त्यासाठी ‘कार्याप्रती समर्पित मनुष्यबळ’ हवे. त्यासाठी माणसे ओळखावी लागतात, ओळखलेली माणसे जोडावी लागतात, जोडलेली माणसे संघटित करावी लागतात. एक संघटित शक्ती निर्माण करावी लागते आणि त्यातूनच कोणतेही महान कार्य घडत असते, हे शिवरायांनी ओळखले होते. महाराज रत्नपारखी होते. त्यांचेकडे माणसांतील गुण ओळखण्याचे अलौकिक कौशल्य होते. त्यामुळे त्यांनी येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, तानाजी मालुसरे अशी एक नाही अनेक माणसे हेरून त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले.

त्यानंतर प्रत्येक सुलतानशाहीस कधी दिशाभूल करून, कधी गहाळ पाडून तर कधी नुसते झुलवत ठेऊन महाराजांनी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. आपल्या राजकीय हालचालींचा कोणासही सुगावा लागू न देता अचानक हल्ला करणे, शत्रूस गाफिल ठेऊन त्याचा मुलुख लुटणे इत्यादी कामांत महाराजांची राजनीती दिसून येते. आपल्या शत्रूला आपल्या विरोधात कोणी सहाय्य केले तर, नंतर वेळप्रसंगानुसार त्याचा बदला घेणे हाही महाराजांच्या राजनीतीचा भाग होता. पुरंदरच्या तहाशिवाय इतर कोणताही तह त्यांनी पाळला नाही. त्यांच्या दृष्टीने तह म्हणजे संकटमय परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक तात्पुरता इलाज होता. केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी महाराज तह करीत असत.

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा युद्धनीती म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

जुलूमी परकीय सत्तेला विरोध करत असतानाच महाराजांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवून आर्थिक स्थैर्य निर्माण केले. शेतीला बिनव्याजी कर्ज देणे, पुरोगामी शेतसारा पद्धत राबविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, ठिकठिकाणी बाजारपेठा निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले व त्याची अंमलबजावणी केली.

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते, ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या परकीय सत्तांवर दबाव निर्माण झाला व त्यांच्या बरोबरीने समुद्रात सार्वभौमत्व सिद्ध झाले.

महाराजांनी अगदी सुरुवातीपासूनच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीत दक्षता घेतली होती. स्वराज्यात वृक्षतोडीस सक्त मनाई होती. अगदी जुन्या व जीर्ण झालेल्या साग, आंबा व जांभळीच्या लाकडांचाच उपयोग जहाज बांधणीसाठी होत असे. वृक्षांच्या संरक्षणासाठी खास सेवक असत. तुकाराम महाराजांची  ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’  ही उक्ती शिवाजी महाराजांनी तंतोतंत अमलात आणली होती.

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती. म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती. आज आपण जे ‘रेन हार्वेस्टिंग’ म्हणतो त्याचे जनक शिवरायच होत.

शिवाजी महाराजांना कायमच सर्व धर्मांबाबत आदर होता. महाराजांचे अनेक सेवक मुस्लिम होते व ते महाराजांशी अत्यंत एकनिष्ठ होते. स्वराज्यात धर्मावर नाही तर शौर्य, बुद्धी, स्वामीनिष्ठा आदि गुणांवर बढती दिली जात असे. युद्धकाळात इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ सापडला असताना महाराजांनी त्याचा आदरच केल्याचा उल्लेख आहे.

महाराज प्रत्येक स्त्रीला देवीसमान मानत. कोणत्याही युद्धात महाराज किंवा त्यांचे सैनिक यांचेकडून स्त्रियांना उपद्रव झाला नाही. चोरी व स्त्रीचा अवमान या गोष्टींना कडक शासन केले जात असे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांना बक्षीस म्हणून मौल्यवान वस्तू दिल्या जात.

वरील विवेचनावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जाणतेपणामुळे आपणास दिलेली व्यवस्थापन तंत्रे खालील प्रमाणे सांगता येतील :

  • विविध कर आदि प्रकारे देशाच्या खजिन्यात जमा झालेली संपत्ती जनतेची आहे याची जाणीव ठेऊन तिचा विनियोग जनतेच्या सोयी सुविधांसाठी करणे.
  • देशाच्या विकासासंदर्भातील निर्णय दूरदृष्टीने घेणे.
  • कार्याप्रती समर्पित असे मनुष्यबळ प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे तयार करणे व त्यांच्यात देशप्रेमाचे बीजारोपण करणे.
  • आपल्या देशाच्या सार्वभौमत्वास सर्वोच्च प्राधान्य देणे व ते टिकविण्यासाठी वेळप्रसंगानुसार कोणताही मार्ग अवलंबणे.
  • शत्रूस गाफिल ठेऊन त्याचेवर चढाई करणे.
  • आपल्या शत्रूस आपल्या विरोधात कोणी सहाय्य केल्यास त्याचा बदला योग्य प्रसंगी घेणे.
  • शत्रुवर आवाजवी भूतदया न दाखविणे.
  • देशाच्या हिताचा विचार सर्वोच्च ठेवणे. त्यासाठी केलेले तह पायदळी तुडवायला मागेपुढे न पाहणे.
  • शत्रू बलाढ्य असेल तर गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला नेस्तनाबूद करणे
  • देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कर व इतर मार्गानी मिळालेला पैसा पायाभूत सुविधांमध्ये गुंतविणे जेणेकरून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळेल.
  • शिवाजी महाराजांनी काळाचा विचार करून आरमार उभारले. तसेच आपण काळाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान वापरून भविष्यातील युद्धप्रसंगांसाठी सज्ज असायला हवे. कदाचित भविष्यातील युद्ध अंतराळात लढले जाईल किंवा माहिती-तंत्रज्ञानाधारित असेल.
  • पायाभूत सुविधा निर्माण करतांना पर्यावरणाचे भान ठेवणे.
  • पाण्याचे योग्य नियोजन करणे.
  • सर्व धर्मांचा आदर ठेवणे.
  • स्त्रियांचा आदर करणे. तो न करणाऱ्यास कडक शासन करणे.
  • चोरी व फितूरीस कडक शिक्षा ठोठावणे, व त्याची अंमलबजावणी त्वरित करणे.

महाराजांनी दिलेली वरील व्यवस्थापनाची तंत्रे आजच्या काळातही तितकीच लागू पडतात, त्यांचा वापर केल्यास आणि त्यामागील त्यांचे ‘ जाणतेपण ‘ शिकण्याचा प्रयत्न केल्यास– नव्हे त्याचा ध्यास घेतल्यास , भविष्यात आपला देश महासत्ता होईल यात शंका नाही.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टिप टॉक !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 गजऱ्यातल्या कळयानां तू जरा समजावून सांग बरं… इतकं  दुसऱ्याला  वेडावून दाखवणं हे शोभत नाही खरं… अंबाडयाच्या   कुंतलातील  छचोर बटा सुगंधाने किती  धुंदल्या… वाऱ्याच्या झुळूकेवर  डोल डोल डोलू लागल्या…कळी कळीच्या गजऱ्याच्या भाराने अंबाडाही मानेवर झुकला..हलकासा घामही चमचमता फुटला… तिच्या हाताच्या पाच नाजूक बोटांना लागला तो चाळा… सैल झाला का अंबाडा चाचपून पाहती कैक वेळा…मऊ मुलायम बोटांच्या स्पर्शानीं कळया कळया मोहरुन गेल्या…लाजुनी घेतले आक्रसून सर्वांगाला…शिंपडलेल्या अत्तरागत सुंगध तो  चोहीकडे दरवळला….काळया केसांच्या अंबरी शुभ्र मोगऱ्याचा गजरा तो विसावला… वेढयावर वेढे फिरले चक्राकार कुंतलाच्या वेटोळी.. जसा धुंद होउनी अहि लपे केवड्याच्या बनी…आसमंती घुमला घमघमाट तो मोगऱ्यांचा…उत्फुल्ल झाली मनं, गंधीत नासिक  शोध घेती रमणीचा… फुला फुलावर भ्रभर जसे भिरभिरती,अनुरागाचे पाय रमणी भोवती घोटाळती…उठे एकच कळ प्रत्येक हृदयात…कळी कळीचा शुल असुयेचा उमटे  त्या मनात..अहाहा  अहाहा.. काय भाग्यते मोगऱ्याच्या कळीचे… मलाही त्यातील एक कळी होता आले असते तर…भाग्यवंत मी स्वतःलाच समजले का नसते…मग कधीतरी ती मुलायम बोटं मजवरूनीही फिरली असती…अंगा अंगावर प्रीत  सरसरून गेली असती…आभासाचा  भास मनाचा मनात शमला… तिच्या सैल झालेल्या अंबाडयावरुन गजरा तो अलगद ओघळला… कळी कळी ती सुटू लागली… अन पायतळीची भुमी आता सुगंधी झाली…अन मी जर कळी त्यातली असतो…तर माझंही जीवन धन्य  नसते का पावलो असतो…..क्षणैक मोहाची ती मिठी दुरावली…फुलण्या आधी कळी कळी निमाली… कळी तशीच निमाली… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अंक किंवा आकडा यांचा व माझा प्रत्यक्ष संबंध शाळेपासून आला असला तरीही सुरुवात झाली ती मात्र जन्मापासूनच.  कशी ते शेवटी सांगेनच.

आपल्याकडे जसे काही देवांना अनेक नांवे आहेत ना तसेच अंकांचे देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे वेळ या नावाने फिरत असतात.

कॅलेंडरवर ते तारीख म्हणून विराजमान असतात. तारीख म्हणून ते ठसठशीत असतात. पण या तारखेच्या चौकोनातच बाजूला कुठेतरी बारीक अक्षरात कृ. म्हणजे कृष्ण आणि शु. म्हणजे शुक्ल पक्ष असे एक ते चौदा पर्यंत असतात. तेव्हा ते तिथी या स्थितीत असतात. 

रेल्वे, विमान, बस, नाट्य आणि चित्रपट गृहात, तसेच परिक्षेच्या वर्गात ते सीट नंबर असतात. तर वर्गात रोल नंबर म्हणून परिचित असतात. 

काहीवेळा त्यांचा नंबर असा उल्लेख होतो. मग तो नंबर चष्म्याचा, फोनचा, परिक्षेचा, गाडीचा, अगदी बॅंकेचा अकाउंट नंबर ते आधार कार्ड वरचा असा कशाचाही असू शकतो. थोडक्यात आकडे आपला आधार आहेत.

परिक्षेत मिळालेले गुण असतात. तर पत्रिकेत देखील गुणच असतात. पण परिक्षेत मिळवावे लागतात आणि पत्रिकेत ते जुळावे लागतात.

कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तू बद्दल कागदावर ते मांडले गेले की त्यांचे बिल होते. शींप्याने कागदावर लिहीली तर मापे, आणि  घराच्या संदर्भात देखील मापेच असतात, पण घरांच्या बाबतीत त्यांना कार्पोरेट फिल येतो आणि ते कार्पेट एरिया म्हणून ओळखले जातात.

एकाच माणसाचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळे नाते आणि त्या नात्याची किंमत असते. तसेच यांनी देखील एकक, दशक, शतक असे स्थान बदलले की यांची किंमत बदलते.

हल्ली मोठे आकडे सुध्दा लहान स्वरूपात सांगतात. जसे घराची किंमत १ किंवा १.५ CR. असे. लहानपणी देखील आम्हाला CR. आणि WR. असे ठाऊक होते. पण ते सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असेच होते. नंतर काॅलेजमध्ये CR शी संबंध आला पण पैशातील CR चा संबंध अलीकडच्या काळातील आहे.

हे आकडे सरळ आले असते तर चालले असते. पण त्यात परत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आले. सोबत सरासरी आणि टक्केवारी देखील आणली. इथेच थांबले नाहीत. पूर्णांक, अपूर्णांक असे भाऊबंद घेऊन येतांना सम, विषम, मुळसंख्या अशा लवाजम्यासह आले.

कामाच्या बदल्यात पदरी पडलेले आकडे पगार असतात. यात देखील ते ढोबळ आणि निव्वळ असे वेगवेगळे असतात. 

शुभ, अशुभ असे आपणच यात केले आहे. तेरा अशुभ, तर एकमेकांशी पटत नसले तर छत्तीस चा आकडा हे यांच्या बाबतीत आपणच ठरवले.

हे वजन आणि उंची देखील सांगतात. वजनाने घेतलेल्या गोष्टी ग्रॅम, लिटर मध्ये तर अंतराच्या भाषेत फर्लांग, मैल, किलोमीटर मध्ये, आणि उंची फुटात, इंचात, सेंटिमीटर मध्ये सांगतात.

आकडे हे गणित घालतात. निवडणुकांमध्ये देखील हे आकड्यांचे गणित जमवावे आणि सोडवावे लागते.

नुकत्याच जाहीर झालेल्या परिक्षेच्या निकालाचे पहा. सगळे आकड्यातच होते. एकूण परिक्षेला बसलेले किती? पास झालेले किती? मुले किती? मुली किती? मुले आणि मुली यांचे प्रमाण आणि पास होण्याचे प्रमाण किती?

या शिवाय वाणिज्य, विज्ञान, कला यात किती? आणि विभागवार पुणे, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ….. सगळे एकूण आणि टक्केवारीसह पण आकड्यातच.

सगळे आकडे दिसणारे, समजणारे असतात. पण काही आकडे वेगळे असतात. हे साधारण लटकवायला किंवा विद्युत तारांवर टाकतात. आकड्यात वैध आणि अवैध आकडे आहेत का माहित नाही. पण विद्युत तारांवर टाकलेले आकडे अवैध असतात असे म्हणतात.

माझी आजी अंबाडा घालतांना आकडे वापरायची. पण त्यात मला कोणताही आकडा किंवा आकड्यासारखा आकार दिसलाच नाही.

ग्रामीण भागात काही लोकं आकडी आली असे म्हणतात. पण आकड्यांचे हे स्त्रीलिंगी रूप मला नीट समजलेले नाही.

हत्तीच्या बाबतीत जसे त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी कागदावरचे आणि प्रत्यक्षातले आकडे वेगळे असतात असे ऐकले आहे. पण असतात ते आकडेच.

आकड्यांची सोबत जन्मापासून झाली ते कसे हे सांगतो. माझा जन्म झाल्यावर तारीख, महिना, वर्ष इतकेच काय वेळेसह  ते नोंदले गेले तरी ते सगळे आकडेच, अंकच आहेत. आणि मी गेल्यावरही ते नोंदवले गेले तरीही आकडेच राहणार आहेत.

असे हे आकडे विमा कंपनीच्या जाहिराती सारखे “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी|” सोबत असणार आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

(मागील भागात आपण पाहिले – ‘‘ठीक आहे तर मग आता आपली ही शेवटची भेट. येते मी.’’ असं म्हणून खरंच प्रियम उठली. तिचा हात धरून बिपीननं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठामपणा तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. शेवटी बिपीननं मनातल्या मनात माफी मागून तिला सांगायला तयार झाला नाईलाजास्तव! तोही गुंतला होता प्रियममध्ये. आता इथून पुढे )

‘‘प्रियम् तुला माहितो ना, दोन वर्षापूर्वी पप्पा ट्रेकला गेले होते.’’

‘‘हंऽ’’

‘‘तेव्हा त्यांना एक गुरू भेटले होते.’’

‘‘काय सांगतोस?’’

‘‘हो खरं आहे. पप्पा नेहमी खूप सांगायचे त्याबद्दल भरभरून! आत्मा.. परमात्मा असं बरंच काही सांगितलं होतं गुरूंनी त्यांना. त्या गुरुजींच्या मते आपण स्वर्गवासी झालेल्या आत्म्यांशी संवाद साधू शकतो.’’

‘‘अर्थात् सरांचा त्यावर विश्वास बसेना. तेव्हा त्या गुरूंनी अनेक शास्त्रशुद्ध पुरावे त्यांना दाखवले.’’

‘‘बापरे!’’

‘‘हो, सारंच क्वाईट इंटरेस्टींग आहे.’’ ‘‘तेव्हापासून ही गूढविद्या म्हण.. अध्यात्मशास्त्र म्हण याची भौतिक शास्त्राशी सांगड घालून ते साध्य करण्यासाठी पप्पांनी अनेक प्रयोग केले. मीही त्यांना असिस्ट करतो. मलाही फार इंटरेस्टींग वाटतंय सारं. त्यात नुकतीच तुझी आई गेली तेव्हापासून तर ते हट्टालाच पेटले आहेत. आईच्या आत्म्याशी संवाद साधायला. अक्षरशः रात्रंदिवस त्यांना तोच ध्यास लागला आहे. आताही त्याच संदर्भात ते बंगलोरला गेले आहेत.’’

‘‘वॉव! ग्रेट मग काय अडचण आहे मग?’’

‘‘अगं अशा प्रयोगासाठी माध्यम म्हणून एखादी व्यक्ती आवश्यक असते. ती प्रॉपर व्यक्ती मिळत नाहीये, त्यामुळं हवे तसे रिझल्टस् मिळत नाहीत. सोल कनेक्शन होत नाहीये. सगळ्या टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या तर कदाचित रिझल्टस् मिळतील.’’

‘‘का बरं तुम्ही पैसे पण देता ना? त्या दिवशी चाललं होतं काहीतरी.’’

हो ना पैसे तर भरपूर देतो, पण आम्हाला पाहिजे तशी व्यक्ती मिळत नाहीये.’’

‘‘म्हणजे कशी?’’

त्यासाठी बर्‍याच तपासण्या आम्ही घेतो. त्यात शारीरिक, तशाच मानसिक तपासण्याही असतात. आम्हाला पाहिजे तसे रिझल्टस् मिळाले, तरच ती व्यक्ती पात्र ठरते.

‘‘एवढ्या कठीण असतात का त्या तपासण्या?’’

‘‘कठीण नाही, पण आम्हाला पाहिजे तसे रिझल्टस् मिळाले पाहिजेत.’’

‘‘ए बिपीन, माझ्या घे ना तपासण्या! मी तयार आहे.’’

बिपीन एकदम दचकलाच!

प्रियम असं काही म्हणेल तसं स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं. तो एकदम उठलाच. तिनं हाताला धरून त्याला बसवलं. तो संपूर्ण घामानं डबडबला होता.

‘‘प्रियम काय हे भलतंच?’’

‘‘अरे, एवढं काय झालं घाबरायला? मी पण रिटन देते ना. शिवाय मला पैसे पण नको.’’

‘‘प्रश्न पैश्यांचा नाही प्रियम्-’’ घाम पुसत, बिपीन तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. कोरडी पडलेली जीभ ओठांवरून फिरवत होता. पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. विशीच्या वयातही प्रियमला त्याच्या अवस्थेचं गांभीर्य कळण्याएवढी परिपक्वता नसली तरी तिचा निर्धार आणि जिद्द दोन्हीही पक्के होते. त्यामुळेच बिपीन मनातून हादरला होता. प्रियममध्ये मनाने गुंतल्यामुळे त्याची अवस्था फार बिकट झाली होती. तिला नाही म्हटलं, तर ती पुन्हा भेटणार नाही – हो म्हणावं तर तो नैतिक अपराध ठरेल – तेवढाच राष्ट्रीय गुन्हा!

उद्या सांगतो प्रियम्! पण खरोखर हा फार मोठा गुन्हा ठरेल. ज्यामुळे तुझ्या पपांच्या कारकीर्दीवरही ठपका येईल. प्लीज नीट विचार कर – समजून घे.

‘‘माझं ठरलंय बिपीन. तूच उद्या मला सगळं सांगणार आहेस नक्की. उद्या भेटू.’’

एवढं बोलून प्रियम् चालू लागली. अंधारात एकटीच! ती दृष्टीआड होईपर्यंत तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे ‘आ’ करून पहात जागीच थिजल्यासारखा उभा होता.

पाठीमागून येणार्‍या कारच्या प्रखर प्रकाशाने तो भानावर आला. दिसेनाशा झालेल्या प्रियमचा विचार करत घरी निघाला. न जाणो प्रियम आपल्या आयुष्यातून खरोखर दिसेनाशी झाली तर? नाही – ह्या विचाराने तो भयभीत झाला. नकळत अ‍ॅक्सलेटर जोरात फिरवला गेला. अवघ्या काही मिनिटात तो घरी येऊन पोहोचला. घरात येताच निश्चळ पुतळ्यासारखा बसून राहिला. उठण्याची इच्छाही नव्हती अन् त्राणही. त्याचा कधी डोळा लागला त्याला कळलंच नाही.

अचानक फोनच्या रिंगने त्याला जाग आली. रंगराजन सरांचाच फोन होता. सरांना समजलं की काय मी प्रयोगासंबंधी प्रियमशी बोलल्याचं? त्याचे पाय लटपटू लागले. फोन घ्यायला हातही उचलेना. रिंग बंद झाली. त्याने निश्वास सोडला. तेवढ्यात पुन्हा रिंग. त्याने लटपटत्या हातांनी फोन घेतला. तोंडातून ‘हॅलोऽ’ – काही बाहेर येईना.

‘‘कारे झोपला होतास की काय? जरा अर्जंट आहे म्हणून तुला फोन केला एवढ्या रात्री.’’

‘‘हो सर बोला ना.’’

‘‘अरे, तुला माहीत आहे ना मी इथे बँगलोरला आलो आहे. कालच खउड (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिस्ट) च्या मीटिंगमध्ये मी आपल्या प्रयोगाबद्दल सविस्तर बोललो. सर्वजण फार प्रभावित झाले आहेत. मला यायला दोन दिवस तरी लागतील. पण तू शक्यतो तो प्रयोग पूर्ण करून त्याचे ऑब्सर्वेशन्स आणि रिझल्टस् नोंदवून घे. मी आल्यावर पुढे त्यावर काम करता येईल. कोणी भेटलं की मीडियम म्हणून योग्य व्यक्ती.’’‘‘नाही पण उद्या बघतो मी. एकजण आला होता बाळा.’’

‘‘ओ.के. ट्राय युवर लेव्हल बेस्ट.’’

या फोनवरून बिपीनने सोयीस्कर अर्थ लावला. इमर्जन्सी म्हणून प्रियमचा माध्यम म्हणून वापर करायचं त्यानं ठरवलं. तिला उद्या भेटू म्हणून मेसेज करून ठेवला.

आश्चर्य म्हणजे प्रियमच्या सर्व टेस्ट हव्या तशा आल्या. त्याच दिवशी त्याने प्रयोग सुरू केला.

प्रियमला ‘त्या’ खुर्चीवर बसवलं. सारं समजावून सांगितलं. ‘‘हे बघ प्रियम्, या खुर्चीवर मी बटण दाबलं की अनेक इलेक्ट्रोड्स अन् कनेक्शन्स तुझ्या शरीराशी, मेंदूशी जोडले जातील. काही आवाज आणि वेगळ्या संवेदना तुला जाणवतील. पण तू न घाबरता शांत रहा. घाबरलीस तर प्रयोग यशस्वी होणार नाही.’’

‘‘नाही नाही मला आईच्या आत्म्याला भेटायचं आहे. मी नाही घाबरणार.’’

‘‘शाब्बास! आता ह्या रिमोटच्या बटणांचं समजून घे. मी स्टार्ट म्हटलं की तुझ्या समोरच अडकवलेल्या या रिमोटचं पांढर्‍या रंगाचे 1 नं.चे बटण दाब.

– तुला जर कंटिन्यू करायचं असेल तर 2 नं.चे हिरव्या रंगाचे बटण दाब.

– तुला जर थोडं थांबायचं असेल तर 3 नं.चे पिवळ्या रंगाचे बटण दाब.

– तुला जर छान वाटत असेल तर 4 नं.चे निळ्या रंगाचे बटण दाब.

– आणि सर्वात शेवटचे – तुला जर त्वरीत थांबावे वाटले, तर 5 नं. चे बटण दाब. त्वरीत सर्व कनेक्शन्स बंद होऊन तू मुक्त होशील.’’ आता हे सगळं एकदा पक्कं डोळ्यात नोंद करून ठेव.

10 मिनिटांनी आपण प्रयोग सुरू करू. प्रियमने सारं डोळ्यात पक्कं केलं. कधी प्रयोग सुरू होऊन आईच्या आत्म्याला भेटता येईल म्हणून ती अधीर, उतावीळ झाली होती.

आणि प्रयोग सुरू झाला.

बिपीनने तिला एक लिक्वीड प्यायला दिलं. एक जाकीट घालायला दिलं, अन् खुर्चीवर बसवलं.

‘‘प्रियम् शांतपणे डोळे बंद करून घे. दोन मिनीट दीर्घ श्वास घे. शेवटचं विचारतो, तू तयार आहेस ना प्रयोगासाठी?’’

‘‘होय बिपीन. आपण सगळी कागदपत्रं भरली आहेत ना? मी संमतीदर्शक सही पण दिली आहे.’’

‘‘येस्सं! लेट अस स्टार्ट नाऊ प्रियम् – बी रेडी. ऑल द बेस्ट. म्हणून त्याने बटण चालू केले.’’

प्रियमनेही पांढर्‍या रंगाचे बटण दाबले.

लगेचच पाठोपाठ दोन नं. चे हिरव्या रंगाचे बटण दाबले आणि पिवळ्या रंगाचे बटण न दाबता निळ्या रंगाचे बटण दाबले. याचा अर्थ तिला छान वाटत होतं. तिच्या चेहेर्‍यावर अतिशय आनंदी असे भाव होते.

आता बिपीनही अत्यंत अधीर झाला. तिच्या मेंदूला लावलेल्या इलेक्ट्रोड्समुळे त्याला काही ग्राफिक्स आणि काही सांकेतिक आकड्यांमुळे माहिती मिळत होती.

अचानक प्रियमच्या चेहेर्‍यावर वेदना दिसू लागली ती घाबरल्यासारखीही वाटत होती.

तो ओरडला- ‘‘काय झालं प्रियम्? त्रास होतोय का? बंद करायचं का?’’

प्रियमने तत्क्षणी काळ्या रंगाचे 5 नं.चे बटण दाबले. बिपीननेही सर्व कनेक्शन्स जाकीट काढून तिला मोकळे केले.

तेवढ्या काही क्षणात प्रियमचा चेहेरा वेदनेने पिळवटून गेला होता. खुर्चीवरून उठत तिने धावत बिपीनला मिठी मारली अन् हमसून-हमसून रडू लागली.

बिपीन घाबरला.

‘‘काय झालं प्रियम्? तुला फार त्रास होतोय?’’

‘‘मला एक सांग बिपीन, गेलेल्या मृत व्यक्तींचेच आत्मे आपल्याला दिसतात ना?’’

‘‘हो’’

‘‘पण मग मला पपांचा आत्मा कसा दिसला?’’ अत्यंत व्याकुळपणे प्रश्न विचारून तिने हंबरडा फोडला.

त्याच क्षणी दूरदर्शनवर न्यूज आली. ‘‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. रंगराजन ह्यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या परिषदेसाठी ते बंगलोरला गेले होते. तिथून मुंबईला परत येताना विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची एकुलती एक कन्या आहे.”

 – समाप्त –

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…

तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.

निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला. 

कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं.  पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.

याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!

काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते….. 

… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही 

ओढून घेणार तो टिपकागद…?” 

“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “

न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!

नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind! 

भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.

“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं. 

साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ” 

साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला… 

चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”

यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला ! 

“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं ! 

“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू  माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे. 

युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.

…  क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !

पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान  लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना ! 

अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय. 

१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.

… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते. 

नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत.  त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले…  Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की ! 

सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य ! 

…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार? 

नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच. 

 

        २४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला…..  आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —  

— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं !  पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी ! 

नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…

जयहिंद! 🇮🇳

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात. 

हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !

🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहीत नाही. मी आमोर फाती  असा करतोय.

याचा अर्थ आहे नशिबाचा स्वीकार.

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली, तरीही ती तशी घडणे आवश्यक होते. अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्वीकारणे. ती गोष्ट आवडली नाही, तरीही ती स्वीकारणे. अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्वीकारणे.

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल, असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे, तुझ्या आईला आधी बोलाव. तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली, हे बरं झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाती  म्हणजे काय, याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल – आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरूपात आनंदाने स्वीकारणे.

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाती  कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशीब स्वीकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे, की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारणे हे तुमच्या हातात असते.

  • कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,
  • कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
  • कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,
  • कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणूक दिली असेल,
  • कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल, ज्यातून तुमची सुटका नाही.

तुम्ही हे सगळं हसत स्वीकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला आमोर फाती  म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच, तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगलं वाटावं, हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्वीकारावं हा उद्देश आहे.

जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा, हा उद्देश आहे.

एखादी आपत्ती आली असताना शांत रहाणं, हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नवीन उर्जा देणारं ठरेल.

बस आता, झालं तेवढं खुप झालं, असं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल.

सगळं विपरीत घडत असताना ते शांत रहाणं  थिंक बिग सांगणारं ठरेल.

हताशा आली असताना ते शांत रहाणं, तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल.

 

आमोर फाती  हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे.

कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्पं होतं.

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळेच फुकट? का?”… लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? विविधा ?

☆ “सगळेच फुकट? का?”- लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.

देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हीच अवस्था आहे, हेच प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत, त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते. अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.

यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे अशी की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये. ९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरुण पिढीचा भविष्यकाळ खूप कठीण असणार आहे.

ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते….. आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते….. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.

आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः, बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.

सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार.

कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.

स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला. आपल्याला स्विट्झरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.

आपल्याला जर खरंच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर ‘ सगळेच फुकट ‘ ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेन. सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.

अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्यापेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना! ते जीवन जगलेच ना.

आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर देशात कुठेही नाही.

मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो…

… आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्याप्रमाणे ‘ रिकामे मन, सैतानाचे घर ‘ यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते.

*आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच विचार करा!”

लेखक : श्री अनिल शिंदे 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares