मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला.

आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या.

  • नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते.
  • सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात.
  • सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • सायकलिंग शरीराची लवचिकता आणि स्नायू तसेच सांधे यांची संयुक्त गतिशीलता सुधारते. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा अत्युत्तम प्रकार आहे.
  • सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, आपले मानसिक आरोग्य सुधारण्यात सायकल चालवण्याचा हातभार लागतो. व्यायामामुळे एंडोर्फिन (Endorphin) नामक संप्रेरक (hormone) शरीरात निर्माण होतात, यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. यासोबत निसर्गाचा आनंद लुटतांना, रोजच्या कंटाळवाण्या कामातून ब्रेक घेतांना आपला मूड छान असतो आणि चिंता अन नैराश्य हे दूर जातात. मंडळी, असे निरोगी शरीर अन निरोगी मन असेल तर सायकल एकटयाने काय किंवा ग्रुप मध्ये काय चालवण्याची मजा न्यारीच!
  • सायकलिंगमुळे आपले जीवाश्म ईंधनावर, अर्थात fossil fuel (उदा. पेट्रोल) खर्च होणारे पैसे वाचतात. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर करणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होते. यात विजेचीही बचत होऊ शकते. आजकाल विजेवर चालणारी वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

सायकल चालवा अभियान

कांही देश तर आपल्या नागरिकांनी सायकल चालवावी म्हणून विशेष अभियान राबवत आहेत. नेदरलँड या देशाने खूप आधीपासून ‘सायकलिंग हॉटबेड’ म्हणून ख्याती मिळवली आहे, बघा ना, सध्या बाईक (सायकल) ची संख्या २३ दशलक्ष) आणि रहिवासी १७ दशलक्ष! अर्थातच सायकल चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा देश नंबर एक आहे. इथे सायकल चालवणाऱ्या नागरिकांना चक्क पैसे दिल्या जातात. २००६ पासून इथल्या कांही व्यावसायिकांनी बाइक चालवणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर (किमी) कांही युरो देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघेही आनंदी आहेत. या योजनेप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस दररोज १० किमी सायकल चालवली, तर तुम्ही योजनेतून वर्षाला सुमारे ४५० युरो कमवू शकता (आता हे आकडे नक्कीच वाढले असतील). या व्यतिरिक्त जर अजून जास्त प्रमाणात सायकल चालवली तर पुरस्कार देण्यात येतात. 

येथील डच सरकारने २०१८ ते २०२१ पर्यंत लोकांना सायकल चालवण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात सायकलिंगच्या पायाभूत सुविधांवर सुमारे ४०० दशलक्ष युरो खर्च करण्याचे ठरवले होते. मैत्रांनो, यासाठी १५ मार्ग केवळ सायकलस्वारांसाठी ‘सायकलस्वार फ्रीवे’ बनवणे आणि सायकलसाठी २५००० आणखी पार्किंगसाठी स्थानके निर्माण करणे या सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. वरील सर्व आकडे कोरोना काळाच्या आधीचे (२०१८) आहेत) हे वर्णन यासाठी केले की कुठल्याही योजनेत सरकार, खाजगी व्यावसायिक कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरते. 

या बाबतीत नेदरलँड सर्वात पुढे असले तरी इटली, फ्रांस आणि बेल्जियम या इतर युरोपियन देशांमध्ये हे कार्य सुरु झाले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्या जात आहे. जपानमध्ये देखील सायकल अतिशय प्रचलित वाहन आहे. मैत्रांनो आपल्या देशात सुद्धा सायकलिंगला उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. यात अग्रगण्य नांव आहे Cyclop. तसेच या संबंधी कांही ऍप्स देखील प्रचलित आहेत. या संस्था आणि ऍप विषयी संबंधितांनी अधिक माहिती नेटवरून जाणून घेणे आणि त्यांत सहभागी होणे हिताचे ठरेल. आपल्या माहितीनुसार आपल्या शहरात मोफत सायकल स्टॅन्ड असतील, सरकारतर्फे सायकली पुरवल्या जात असतील किंवा सायकल ट्रॅक असतील तर त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकल्यास लोक त्या सोयीचा वापर करतील.

रुणवाल गार्डन सिटीचा ‘साइक्लोफन-अर्थ डे २०२३

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्व कर्तव्ये आणि कार्ये या शरीराद्वारेच पार पाडावी लागतात. त्यामुळे या मौल्यवान देहाचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हाच विचार करून रुणवाल गार्डन सिटी मध्ये मागील वर्षी प्रथमच सायक्लोफन-२०२२ हा उपक्रम कार्यान्वित केला होता. मागील वर्षी आमच्या पहिल्या सायक्लोफनच्या सांगतेच्या दिवशी, ठाण्याचे प्रसिद्ध बायसिकल मेयर, .श्री चिराग शहा यांनी प्रमुख अतिथि या नात्याने उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच खूप प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेचे फलित म्हणजे या वर्षी देखील हा उपक्रम राबवल्या गेला.

या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या २२ ते ३० एप्रिलच्या अवधीत (कुठल्याही ७ दिवसात) सायकलिंग करणाऱ्यांना दररोज ५ किमी प्रमाणे किमान ३५ किमी असे अंतर, किंवा याच अवधी मध्ये दररोज ३ किमी पायी चालत, किमान २१ किमी असे अंतर पूर्ण करायचे होते. हा माफक चॅलेंज होता. परंतू चालणे, सायकल चालवणे किंवा तत्सम कुठलाही व्यायाम न करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज तसा भारीच होता. मुलांच्या नुकत्याच सुट्ट्या होऊ घातलेल्या आणि बहुतेकांचे मे महिन्यात बाहेरगावी जाणे असल्याने ‘विश्व वसुंधरा दिवसाचे’   (World Earth Day) निमित्य साधत २२ एप्रिल पासून हा इव्हेंट सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे मुलांचा सायकल चालवण्यात सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. दिलेल्या अवधीत जास्तीतजास्त किमी पार करणाऱ्या सायकलस्वाराला आणि पायी चालणाऱ्याला बक्षीस होते. संपूर्ण कुटुंबाने भाग घेतल्यास वेगळे बक्षीस होते.

आमचे कुटुंब यात दर वर्षीप्रमाणे सहभागी होतेच. माझे कुटुंबीय सायकल चालवीत होते. मी मात्र चालण्यात समाधान मानले. रामप्रहरी चालल्यास ऊन आणि घामापासून सुटका असायची. यात कांही लोकांना (मी यात होते) सकाळी उठोनि चालायची खंडित झालेली सवय मात्र परत लागली. यात सहभाग घेणाऱ्यास STRAVA किंवा इतर कुठलेही ऍप वापरून सायकल चालवण्याचे किंवा पायी चालण्याचे किमी रेकॉर्ड करून त्यांचा “पुरावा” आयोजकांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच निसर्गरम्य स्थानांचे आणि सेल्फी, या सर्व फोटोंचे ‘CycloFUN-2023’ या व्हॅट्सऍप ग्रुप मध्ये स्वागतच असायचे. यात गंमत म्हणजे तुम्ही नोंदणी करतांना तुमचा किंवा तुमची जोडीदार असणे आवश्यक होते. शक्य असल्यास जोडीदाराबरोबर सायकल चालवणे किंवा पायी चालणे, सोबत सेल्फी काढणे वगैरे कार्यक्रम आपसूकच झाले.

या विषयाच्या उत्तरार्धात ‘सायक्लोफन-२०२३’ चे आमचे अनुभव आणि ३० एप्रिल २०२३ ला झालेल्या या उपक्रमाच्या सांगतेचा वृत्तांत सादर करीन. अगदी लवकरच भेटू या. 

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप :

  • या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.
  • या लेखासोबत दिलेल्या भित्तिचित्रांचे (wall painting) किंवा अन्य फोटो वैयक्तिक आहेत. ही सुंदर भित्तिचित्रे आमच्या संकुलाच्या जवळपासच्या परिसरातील आहेत.
  • हा लेख माझे नाव आणि फोन नंबर यासकट अग्रेषित करावा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कूर्मजयंती निमित्त — ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व —

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाचे गुण

१) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात.

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर 

कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते.  त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे 

२) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे. 

३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते.  त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते ‘, असा आहे.

आपणास माहिती आहे का की कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दूध पाजत नसते.  तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते

— त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्या, या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते.

– इदं न मम

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? विविधा ?

☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की

पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही

तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की

त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही

खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो…

खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही मनात आलाच नाही. फक्त चालत राहिले… खिन्न मनाने एकटीच. . . बहुतेक निवांतपणा, एकटेपणा शोधत होते माझे मन. कोणत्याच भावना, कल्पना मनाला शिवतच नव्हत्या.

थोडा थंड वारा अंगाला स्पर्श करून गेला, पालापाचोळा वाऱ्याने सळसळला तेव्हा मी भानावर आले. संध्याकाळची वेळ होती. चंद्राचा मंद प्रकाश चोहोबाजूंनी पसरलेला होता. झाडांची सळसळ, पक्षांचा दुरुन येणारा आवाज आणि आल्हाददायक असे वातावरण एरवी मनाला मोहवून टाकणारेच होते. पण आता मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते त्यामुळे मनाला चैन नव्हती. मी तशीच जड पावलांनी चालत राहिले. थोड्या अंतरावर एक शांत डोह नजरेस पडला. बहुतेक मघाशी आलेली थंड वाऱ्याची झुळूक डोहाला भेटूनच आली असावी. ती झुळुक अंगावरून मोरपीस फिरवून गेल्याचा भास झाला.

पायात वाळलेली पाने घिरट्या घालत होती. एकदम हसू आले मला. . . घरी पायात सगळी सारखी (बंधने ) घुटमळत असतातच, इथे पण या पानांनी त्यांची जागा घेतली की काय असे वाटले. . . .

जरा निरखून पाहिले असता जाणवले की खट्याळ वारा त्या सुकलेल्या पानांशी छान खेळत होता. माझे तिथे असण्याने त्याच्या खेळात काहीच फरक पडत नव्हता. मी थोडी पुढे चालत आले. एक मोठे झाड दिसत होते. तिथे जरा जवळ गेल्यावर झाडाच्या जवळ थोडे हिरवेगार गवत दिसायला लागले. पायातली चप्पल नकळतच मी काढली आणि अनवाणीच झाडाच्या दिशेने चालू लागले. त्या झाडाखाली थोड़ी विसावले. पायातून हिरवाई डोळ्यात उतरावी तसे डोळे एकदम थंड झालेले. डोळे मिटून घ्यावे या विचारात असतानाच समोर निळाशार डोह एकदम शांत असल्याचे जाणवले, जसे की एखादा सन्यस्त. काहीही हालचाल नाही. कोणतीही वलय नाही. एकदम संथ आणि इतका स्वच्छ की तळ दिसावा. मी जरा पुढे येवून डोकावले तर खरंच तळ दिसत होता.

संध्याकाळची वेळ. चंद्राची एक छान लकेर सरळ पाण्याच्या आरपार अगदी तळाशी गेलेली मला दिसली. त्या किरणांच्या प्रकाशात काही दगड व वनस्पती एकदम चमकून गेले. थोडा मंद प्रकाश होता. त्यामुळे फारसे काही दिसले नाही, पण जे काही थोडेफार दिसले ते विलक्षण होते. खूप वेळ अशीच बघत राहीले त्या डोहाकडे आणि त्या तळातल्या अद्भुत वाटणाऱ्या निसर्गाच्या चमत्काराकडे. विलक्षण ओढ जाणवली मनाला. डोह आणि मन यांच्यांत काहीतरी साम्य असावे का हा विचार एक क्षणभरच मनात आला आणि गेला पण. मन आणि तेही डोहासारखे ? कसे शक्य आहे. इतके स्वच्छ नितळ मन असते का ?

तळ दिसावा एवढे. . . . .

आपल्या मनात किती चांगल्या वाईट घटना, गोष्टी, क्षण घर करून असतात. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या सगळ्यांनी मनाचा डोह ढवळून निघालेला असतो. मन अगदी गढूळ झालेले असते. त्यात आपल्याला तरी आपल्या मनाचा तळ दिसेल का ? तळ दिसला तरी तो असेल का या डोहासारखा नितळ. मनाच्या तळाशी धगधगत असतात काही सल, काही आठवणी, अपमान. आणि आपण त्यांनाच जोपासत बसतो. चंद्राची एक लकेरसुद्धा आपण त्यावर पडू देत नाही. त्या शांत स्वच्छ डोहाची तुलना मनाशी केली खरी पण ते बुद्धीला रुचेना.

माझ्या मनात असंख्य वादळे घेऊनच तर मी इथे पोहोचले होते. त्यातील साठलेला गाळ असह्य होत होता. पण याचा निचरा करण्याचा प्रयत्न आपल्यलाच करायला हवा …. चला आपल्याच मनात डोकावून बघूया. दिसतो का मनाचा तळ ते तरी बघूया. दिसत नाही ? हरकत नाही आपणच आपल्या मनातील साठलेला गाळ काढायला हवा. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या गाळरूपी भावनांना बांध घालू या. श्रध्दा, भक्ती, विश्वास, प्रेम या आनंदरूपी तुरटीने मनाचा डोह स्वच्छ नितळ करण्यास सुरुवात करू. सोपे नाही आणि इतके सोपे नसतेच काही…. पण अशक्यही नाही.

पक्षी हळूहळू घरट्यात परतू लागलेले. त्यांच्या दमलेल्या पण सार्थ चिवचिवाटाने मी भानावर आले. माझे मन एकदम शांत निर्मळ भासू लागले. . अगदी त्या डोहासारखे.

मी डोहाकडे पाहिले. तो माझ्याकडेच पहात होता. त्याने एक आश्वासक स्मितहास्य केले. माझ्या चेहर्‍यावर पण खूप दिवसांनी समाधानाचे हास्य उमटले. ते पण मी त्या डोहाच्या पाण्यातच पहात होते. त्याचे आणि माझे मन एकमेकांचे झालेले अगदी एकरूप …

आता खूप समाधानाने मी माझ्या घरच्या दिशेने भरभर पाऊले टाकत चालू लागले. घरच्या मुलाबाळांच्या ओढीने. पण ही ओढ आता खूप सुखावणारी होती. मी माझे मन जणू डोहाजवळ मोकळे करून निघालेले. दूर जातानाही तो डोह माझ्या मनात स्मरणात तसाच राहिला. अगदी सखा व्हावा असा ….

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

मानवी जीवनाच्या डोईवर मृत्यू नावाचं आभाळ कायमच कोसळण्याच्या बेतात असतं. जन्माच्या सोहळ्याची सांगता मृत्यूच्या अभ्रछायेखाली होताना दशदिशा काळवंडून गेलेल्या असतात. हे आभाळ कोसळतं तेव्हा मनाच्या पृष्ठभागावरचं सर्वच जमीनदोस्त होतं… आणि मनाच्या खोल समुद्राचा तळ भूकंपाच्या धक्क्यानं शतविक्षत होतो… आणि वेदनेच्या लाटा उसळी मारून वर येऊ पाहतात. हा अनुभव मरणा-याला येऊच शकत नाही, मात्र मरणा-याच्या रक्त-नात्यांना हा अनुभव विस्कटून टाकतो. अशा वेळी खांद्यावर ठेवला गेलेला हलका हात, पाठीवरून अलगद फिरणारी मायेची बोटं, कपाळावरून डोक्यावर हळूहळू स्पर्शत जाणारा एखाद्या थरथरत्या हाताचा तळवा. . वेदनांकित तळहाताच्या उपड्या पृष्ठभागावर एखाद्या हाताची सहज थपथप आणि कुणीतरी अतीव सहवेदनेने मारलेली मिठी… किती मोठा दिलासा असतो ! शब्द तर नंतर आणि तेही बिचारे गलितगात्र झालेले ! संवेदनेच्या फुलांतून सहवेदनेचा सुगंध अवतरतो तेव्हा आभाळ सुखावून जात असावं ! आपली स्वत:ची दु:खं एकवेळ सुसह्य असतीलही, पण दुस-याच्या दु:खाला सामोरं जाणं म्हणजे जणू श्वास रोखून पाण्याखालून चालत जाऊन पैलतीर गाठण्याएवढं गुदमरून टाकणारं. आणि एरव्ही हाताच्या अंतरावर दिसणारे हे पैलतीर अशावेळी क्षितीजाच्याही पल्याडची वाटतात… आणि असतातही ! 

जगण्यासारखीच मरणाचीही अनंत रूपे असतात. त्यातलं सर्वाधिक पवित्र मरण म्हणजे देशासाठी… परोपकारासाठी, दुस-याच्या प्राणांचे रक्षण करताना आलेलं ! ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं… ’. या भगवंताच्या चिरंजीव आशीर्वादाचे फळ म्हणून असे मरण पावणारे स्वर्गास प्राप्त होतात. पण त्यांच्या मागे राहणा-यांना वेदनांच्या, विरहाच्या नरकास सामोरे जावे लागते… हेही खरेच ! आणि कोणी होऊ म्हटला तरी त्यांच्या या दु:खाचा वाटेकरी होऊ शकत नाही. शेवटी दु:ख हे अगदीच स्वतंत्र असते… स्वाभिमानी असते ! परंतू कुणी फुंकर घातल्यास हा दाह क्षणिक का होईना, गारवा अनुभवू शकतो… हे ही नसे 

थोडके !‍ कितीतरी वेळा दुखण्यापेक्षा कुणी फुंकर घालायला आलं नाही, याच्या वेदना अधिक असतात. बालकं त्यांच्या जखमेवर आई, आजी फुंकर घालते तेव्हा रडायची थांबतात ! कदाचित पुन्हा रडू लागतील, पण फुंकरीची आठवण मनाच्या कोप-यात जपून ठेवतील ! अंधाराला घाबरणारी मुलं, “आई, तु आहेस ना?” असं विचारत विचारत अंधाराला भिडतात तेव्हा ती कमाल आईच्या ‘असण्याची’ असते… लांबून का होईना !

रणभूमी मोठी चोखंदळ असते… निवडक देहांनाच आपल्या अंकावर विसावू देते. इथं प्राणांचं भय मुठीत घेऊन पावलं मागं खेचणारे तिचे नावडते ! तळहातावर शीर घेऊन मृत्यूला मरणमिठी मारण्यास धजावणारे देह जेव्हा नश्वरतेच्या काळोखात दिसेनासे होतात तेव्हा त्या देहांनी जीवनप्रवासात जोडलेले आप्तसंबंध सर्वाधिक क्षतिग्रस्त होतात. आई, बाप, पत्नी, अपत्यं, बहिण, भाऊ, मित्र… दु:खाची ही किती परिमाणं ! पण आई आणि पत्नी ही नाती सर्वांत हुळहुळी… मुळापासून हादरून जाणारी… काहीवेळा उन्मळूनही पडणारी ! 

अशी नाती वेदनेची न संपणारी वाट चालत असतात, तेव्हा त्यांना चार पावलं सोबत चालून सोबत करणं हे प्रत्येक सहृदय माणसाचं आद्य कर्तव्यच ठरावे ! आपण त्यांच्या त्यागाबद्दल त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञ असावे ! जगाच्या व्यवहारात हा मृत्यूचा बाजार सदोदित गजबजत राहणार आहेच… पण या मृत्यूला संवेदनशीलतेचं कोंदण आपण सर्वजण मिळून देऊ शकलो तर मृत्यू ‘ अर्थपूर्ण ‘ होईल, नाही का? 

भारताच्या राष्ट्रपती महामहिम आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या प्रथम नागरीक आणि देशाच्या कुटुंबप्रमुख. हुतात्म्यांच्या आप्तांप्रती त्यांनी कृतीतून दर्शवलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि सहवेदना आदर्शवत ठरावी. सर्वोच्च पदाचे शिष्टाचार, संकेत बाजूला सारून त्यांनी आपल्या गमावलेल्या माणसांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्यांच्या खांद्यावर ठेवलेला हात, त्यांना दिलेलं आलिंगन, राष्ट्राच्या वतीने आभारार्थ जोडलेले हात ही दृश्ये खूप बोलकी आहेत… हे पाहून दिवंगत आत्मेही शहारून गेले असतील !

(हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारी खूप माणसं, संघटना आपल्या देशात आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे, जनतेनेही यांना साथ द्यायला पाहिजे. किमान बलिदानाची दखल तरी घेतली पाहिजे. वेदना जाणावया जागवू संवेदना ! जय हिंद ! )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ♻️ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… 🌻 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या नेतृत्वाखाली १९७३ पासून दर वर्षी ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ आयोजित केला जातो. २०२३ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे ‘Beat Plastic Pollution’ अर्थात ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा’, कारण वाढते प्लास्टिक प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषणाचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते, त्यातील निम्मे प्लास्टिक एकदाच वापरण्यासाठी (एकल वापर प्लास्टिक अर्थात सिंगल यूज प्लास्टिक) डिझाइन केलेले आहे. म्हणूनच आजच्या काळाची नितांत गरज बनलेल्या २०२३ च्या थीमच्या अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याविषयी सार्वजनिक व निजी क्षेत्र तसेच नागरिकांचा सहभाग असलेले जागतिक उपक्रम राबवल्या जातील.

प्लास्टिक प्रदूषणाची कारणे

प्लॅस्टिकचे उत्पादन करतांना जीवाश्म इंधन वापरतात, जे ग्रीन हाऊस गॅस (कार्बन डाय ऑक्साईड) बाहेर टाकते आणि जागतिक तापमान वाढवते. एकल वापर प्लास्टिक, मुख्यत्वे करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि पाण्याच्या बाटल्या यांचा अतिरेकी वापर हे वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. प्लास्टिक कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन (मुख्यत्वे कचऱ्याचे वर्गीकरण न करणे), कचराकुंडीच्या बाहेर किंवा इतरत्र प्लास्टिक फेकल्यास प्लास्टिक जलमार्ग आणि महासागरांमध्ये प्रवेश करून सागरी जीवन आणि पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. या प्लास्टिकचे विघटन होण्यास १००० हून जास्त वर्षे लागतात, शिवाय हे विषारी रसायनाच्या रूपात विघटित झालेले प्लास्टिक पर्यावरण कलुषित करीत राहते. सागरी जीवनावर प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम होतो. महासागरांतील कासव, मासे आणि इतर जलचरांच्या जीवांची हानी होते. तसेच जलमार्ग प्रभावित होतात. नद्या आणि नाले प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबू शकतात, ज्यामुळे पूर आणि प्रदूषण होते. यात आपल्या पिण्याचे पाणी देखील प्रदूषित होते. यामुळे जैवविविधता (biodiversity) कमी होत आहे. प्लास्टिकच्या विषारी रसायनांनी मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याचे मार्ग

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याकरता रिड्यूस, रीयूज और रीसायकल, हे तीन आवश्यक R अर्थात उपाय आहेत. एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी शाश्वत पर्याय अर्थात नैसर्गिक साहित्य वापरावे. या लढ्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. सामाजिक जागरूकता अभियान, तसेच समाज प्रबोधन यासाठी समाज माध्यमे खूप परिणामकारक ठरतात. एकल-वापरणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर मर्यादित करणारी सरकारी धोरणे आणि नियम यांचे पूर्ण कसोशीने पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी समुद्रकिनारे, बगीचे, इतर सार्वजनिक ठिकाणे आणि संकुलात स्वच्छता अभियान आयोजित करून आपण प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करू शकतो.

‘स्वच्छ रुणवाल’ अभियान 

मैत्रांनो, आपण प्लास्टिकचा वापर करतोच, पण ते आपल्या घराबाहेर, संकुलाच्या परिसरात, रस्त्यांवर तसेच कचराकुंडीच्या असतानाही तिच्या बाहेर हा कचरा टाकतो. हे कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. या दृष्टीने रुणवाल गार्डन सिटी, ठाणे पश्चिम या आमच्या संकुलात जानेवारी २०१७ पासून ‘स्वच्छ रुणवाल’ हा उपक्रम कार्यान्वित आहे. बिस्लेरी-बॉटल फॉर चेंज, अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट, परिसर भगिनी विकास संघ, उर्जा फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ‘स्वच्छ रुणवाल’ हा प्रकल्प राबवल्या जात आहे. आजपावेतो आम्ही २७००० किलो पेक्षाही अधिक प्लास्टिक पुनर्वापर करण्याकरता दिलेले आहे, याचा रहिवासी आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांना (मी यात स्वयंसेवक आहे) रास्त अभिमान आहे. याच उपक्रमात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि थर्माकोलचाही पुनर्वापर केल्या जातो. वृक्षारोपण मोहिमेद्वारे हिरवळ आणि स्वच्छतेला प्रोत्साहन दिल्या जाते. ठाणे लगतच्या समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी स्वच्छता मोहीमेत आमच्या कांही स्वयंसेवकांनी योगदान दिलेले आहे.

जानेवारी २०१७ मध्ये आम्ही प्लॅस्टिक संकलनाची सुरुवात केली. यात गोळा केलेला प्लास्टिक कचरा स्वयंसेवक त्यांच्या स्वतःच्या वाहनातून पुनर्वापरासाठी ऊर्जा फाउंडेशन केंद्रांमध्ये नेत असत. संकुलाचे योगदान वाढत गेले, म्हणून आम्ही ‘बॉटल फॉर चेंज’ आणि ‘अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट’ शी करार केला. ऑगस्ट २०१९ पासून याला चांगलीच गती मिळाली. आता एका आठवड्याआडच्या शनिवारी रुणवाल गार्डन सिटीच्या रहिवाशांनी प्लॅस्टिक कचरा इमारतींच्या ठराविक ठिकाणी जमा करून प्लास्टिक पुनर्वापराची मोहीम सुरू ठेवली आहे. आमचे संकुल ‘बॉटल फॉर चेंज’ च्या प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत आहे. यात ही संस्था तुमच्या सोसायटीमधून प्लास्टिक गोळा करण्यासाठी त्यांचे वाहन तुमच्या दारात पाठवते आणि त्यांच्या ऍपद्वारे हे काम करणे खूप सोपे असते. हे ऍप आमच्या सोसायटीने त्यांच्याकडे जमा केलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे नेमके वजन सांगते.

प्लॉगिंग

मंडळी, आमच्या संकुलात ‘प्लॉगिंग’ (म्हणजेच जॉगिंग किंवा इतर व्यायाम करता करता प्लास्टिकचा कचरा गोळा करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे) देखील करण्यात येते. दर रविवारी आमच्या या प्रकल्पातील सदस्य आणि मुले हे विखुरलेले प्लास्टिक वेचून, तर कधी खोदून काढत सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे ते जमा करीत असतात. या व्यतिरिक्त कांही खास दिवशी (उदा. धुळवडीचा दुसरा दिवस- ८ मार्च २०२३ आणि जागतिक वसुंधरा दिन-२२ एप्रिल २०२३) हे काम जोमात सुरु असते.

जनजागरण

हे स्वयंसेवक जनजागरण करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीत. या संकुलातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात यांचे आवाहन असतेच! कधी समाजमाध्यमातीळ संदेश, व्हिडीओ (मुख्यतः व्हाट्स ऍप आणि फेस बुक) कधी भाषण तर कधी सुंदर पथनाट्य, कधी पोस्टर, पेन्टिंग स्पर्धा! या सर्व माध्यमातून हे काम अव्याहत सुरूच असते. अत्यंत आशाजनक आणि आनंददायी गोष्ट ही की, या उपक्रमात लहान मोठी मुले खूप उत्साहात आणि हिरीरीने सहभागी होतात.

पुरस्कार

या अभियानाला कित्येक पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळाली आहेत. २०२३ विषयी सांगायचे तर, ८ मार्च रोजी झालेल्या ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधत, संजय भोईर प्रतिष्ठान तर्फे ‘उषा सखी सन्मान’ या कार्यक्रमात माननीय श्री संजय भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रुणवालच्या या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्यात आला. ११ एप्रिल २०२३ ला गोदरेज आणि बॉयस यांच्या सहकार्याने ‘द बेटर इंडिया’ ने सादर केलेला ‘सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था पुरस्कार’ (स्वच्छ पुढाकार श्रेणीतील विजेते) रुणवाल गार्डन सिटी, ठाणेला मिळाला आहे. शहरांना राहण्यायोग्य अशी चांगली ठिकाणे बनवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करणे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये त्याची अंमलबजावणी आणि जागरूकता निर्माण केल्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

मंडळी सामाजिक उपक्रम सरकारी असो वा खाजगी, तो नागरिकांच्या सहभागाशिवाय सिद्धीस जात नसतो. कुठल्याही उपक्रमाची सुरुवात स्वतः पासूनच होते. आपण सर्वांनी एकल वापर प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, प्लेट, डबे, भांडी, चमचे, स्ट्रॉ, कप इत्यादींचा वापर थांबवला पाहिजे. पर्यायी वस्तूंपासून बनलेले साहित्य (उदा. कापडी पिशव्या, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, केळ्याच्या सालीपासून तयार केलेल्या प्लेट, वाट्या इत्यादी) वापरात आणल्यास कित्येक टन प्लास्टिकचा वापर थांबवता येईल. सरकारी पातळीवर प्रत्येक संकुलात कचऱ्याचे नियोजन करणे आणि प्लास्टिक वेगळे जमा करणे या योजना आधीच सुरु झाल्या आहेत, त्या यशस्वी करणे हे त्या रहिवाश्यांचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘माझा प्लास्टिक कचरा, माझी जबाबदारी’ हा मंत्र ध्यानात ठेवत आपण या प्रकल्पात खारीचा वाटा उचलावा, असे मला वाटते. लक्षात असू द्या मंडळी, आपण पुनर्वापरासाठी दिलेले प्रत्येक प्लास्टिक हे हरित वसुंधरेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे !

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप-

वरील उपक्रमासंबंधी विडिओच्या लिंक लेखाच्या शेवटी दिलेल्या आहेत. या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.

कृपया प्रतिक्रिया अग्रेषित करायची असल्यास माझे नाव आणि फोन नंबर त्यात असू द्यावे!

https://m. facebook. com/story. php?story_fbid=6801541356538935&id=100000494153962&mibextid=Nif5oz

https://photos. app. goo. gl/Gtgj1jNfVn139nTJ6

https://fb. watch/kM4CvBc5Jo/?mibextid=RUbZ1f

Instagram: https://www. instagram. com/reel/Cq7Uvs1rT98/?igshid=YmMyMTA2M2Y=

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

” गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

” विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल. ” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.

मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “

सखी: “उदाहरण दे. “

हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले, ” भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”

सखी: “कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. “

मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.

भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सद्सद्विवेकबुद्धीवर आहे.

ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.

गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.

आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतः च्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.

कमळ म्हणजे बुद्धी,

भ्रमर म्हणजे मन,

पाकळ्या म्हणजे चक्षु,

रात्र म्हणजे अज्ञान,

सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच.

प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.

पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.

ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धारणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतः च्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.

पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.

कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.

गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचतांना येते.

गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.

गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.

“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

….

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर

आधुनिक म्हणजे नेमके काय?

जुन्या चालीरीतींना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध  दर्शविणे…काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का?

खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका, कारणं, आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी, वातावरणाशी, जीवनपद्धतीशी  त्याची सांगड घालून

प्रथेचं उचित नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण…. हा अर्थ मला अधिक पटतो…आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे– तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला…

पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष्य मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत !! मग उपास, वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा…

वास्तविक हिंदू संस्कृतीत कुठल्याही सणाशी , व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच…मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता..

आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षित आहे. विचारक्षम आहे. परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते…आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही ,पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे…

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे , उपयुक्ततेचं या सणाशी , व्रताशी घनिष्ठ नातं आहे.पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे…हा वड सावली देतो, भरपूर प्राणवायू पुरवतो, पक्षी पांखरं पांथस्थ यांचा आधारवड आहे. याची मुळं मातीची धूप होऊ देत नाहीत .आणि हे झाड दीर्घायुषी असतं..त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते..त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं..आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे…आजची स्त्री हे जाणते…वृक्षसंवर्धन ही हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं … मग बाकीच्या बाबी या केवळ मौज, हौस, गंमत  करमणुक — ‘साजरीकरण’ या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात…

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो, “..खरंच सावित्री आहे ती..म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”

… इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते. ती शक्ती असते. सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला.,” गेले दहा दिवस सीमा आजारी आहे. तिला विश्रांतीची गरज आहे. .मी घर सांभाळू शकलो नसेल तिच्याइतकं..पण मनापासून केलं. आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णिमेचा उपास म्हणून बनवलीही… आणि काकू आज मीही उपास केला..का विचारा..

तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली…स्त्रीमधे नैसर्गिक त्याग, सहनशक्ती ,संयम हे गुण असतात. म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी..पण आज मी तिच्या वतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचित अनुभव घेतला…”

— अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं,हे आधुनिकत्व.. नव्या विचारधारेची  अर्थपूर्ण रुजवण ..

हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण… एक  सुसंस्कार…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आला सण  वटपौर्णिमेचा..! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

आला सण  वटपौर्णिमेचा..! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेल्या दहा वर्षात वटपौर्णिमेला वडाला जाऊन पूजा करणे बंद झाले माझे ! लग्नाची चाळीशी उलटून गेली आणि या पूजेबाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदलही होत गेला. लग्न झाल्यावर नवीन सून म्हणून सासूबाई बरोबर नटून-थटून पूजेला गेले होते ते आठवलं ! जरीची साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर सगळा नव्या नवतीचा साज घेऊन नदीकाठी असलेल्या वडावर पूजेला गेले होते. थोडा पाऊस पडल्यावरचे रम्य, प्रसन्न वातावरण, समोर कृष्णेचा घाट आणि वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळत फिरणाऱ्या उत्साही, नटलेल्या बायका असं ते वातावरण होतं ! धार्मिकतेची गोष्ट सोडली तरी त्या निसर्गातील आल्हाददायक वातावरणात चैतन्य भरून राहिलेले होते, त्यामुळे मन खरोखरच प्रसन्न झाले !

अशी काही वर्षे गेली आणि लहान मुलांच्या व्यापात वडावर जाणे जमेना. घराची जागा बदलली, त्यामुळे नदीकाठ आता दूर गेला होता. वडाची फांदी आणून त्याची पूजा करणे आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणे एवढाच वटपौर्णिमेचा कार्यक्रम होऊ लागला !

हळूहळू या सर्वातून मन बाहेर येऊ लागले. पतीचे आयुष्य वाढावे आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करणे ही गोष्ट अंधश्रद्धेचा भाग वाटू लागली. हिंदू धर्मात त्या त्या काळाचा विचार करून सणावाराच्या रूढी समाजात रुजलेल्या ! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला लहानपणी पिता, मोठेपणी पती आणि वृद्धापकाळी पुत्र अशा व्यक्तीचाच आधार आहे ही गोष्ट मनावर ठसलेली ! स्त्रीचा बराचसा काळ संसारात पतीबरोबर व्यतीत होत असल्याने पतीवरील निष्ठा सतत मनात राहणे हेही अशा पूजेला पूरक होते. पूर्वीच्या काळी स्त्रीला घराबाहेर पडणे फारसे मिळत नव्हते. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाच्या सहवासात मैत्रिणी, नातलगांसह अशा सणाचा आनंद घेता येत असे.

यानंतरच्या काळात पावसाला जोरात सुरुवात होते. आषाढ, श्रावण महिन्यापर्यंत पावसाचा जोर असतो. हवामान प्रकृतीसाठी पोषक असतेच असे नाही, त्यामुळे उपवासाची सुरुवातही ज्येष्ठी पौर्णिमेपासूनच केली जाते आणि चातुर्मासात विविध नेम, उपास केले जातात.

‘वड’ हे चिरंजीवीत्त्वाचे प्रतीक आहे. या झाडाचे आयुष्य खूप ! तसेच वडाचे झाड छाया देणारे, जमिनीत मुळे घट्ट धरणारे आणि पर्यावरण पूरक असल्याने ते जंगलाची शोभा असते. वडाच्या पारंब्या त्याचे वंशसातत्यही दाखवतात. पारंबी रुजून वृक्ष तयार होतो. वडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. या सर्वांमुळे आपल्याकडे वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा यासारख्या मोठ्या झाडांचे संवर्धन केले गेले. या सर्वाला धार्मिकतेचे पाठबळ दिले की या प्रथा समाजात जास्त चांगल्या रुजतात. जसे हिंदू धर्मात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा, बैलपोळा,तुलसी विवाह यासारखे सण निसर्गातील प्राणी, वनस्पती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो.तशीच ही वडपौर्णिमा आपण पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाबरोबर साजरी करतो. 

वटपौर्णिमेच्या पूजेमागे सत्यवान- सावित्रीची पौराणिक कथा सांगितली जाते. सत्यवान अल्पायुषी  आहे हे सत्य सावित्रीला समजल्यावर सत्यवानाचे आयुष्य मिळवण्यासाठी सावित्रीने तप केले. हे तप तिने वडाच्या झाडाखाली बसून केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने एका वराने सासू-सासऱ्यांचे आयुष्य मागितले, तर दुसऱ्या वराने त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिसऱ्या वराने मी अखंड सौभाग्यवती राहावे हा वर मागितला. या वरामुळे सत्यवानाचे आयुष्य तिने परत मागून घेतले. सावित्रीचे हे बुद्धीचातुर्य आपल्यात यावे ही इच्छा प्रत्येक स्त्रीने या दिवशी व्यक्त केली पाहिजे !

अरविंद घोष यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य एम्. ए. ला असताना अभ्यासले. तेव्हा या सावित्रीची अधिक ओढ लागली. ‘सावित्री’ ही आपल्या जीवनाचे प्रतीकात्मक रूप आहे. एका शाश्वत ध्येयाकडे जात असताना कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा ढळता कामा नये हेच ‘सावित्री’ सांगते. प्रत्येकाचे एक आत्मिक आणि वैश्विक वलय असते. जीवन जगताना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत साधत ‘ हे जगच परमात्मा स्वरूप असून आपण त्याचा एक अंशात्मक भाग आहोत ‘ हे चिरंतन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या ‘सावित्री’ त आहे.

कधीकधी मनात येतं की, स्त्रियांनीच का अशी व्रते करावी? उपास का करावे? पण अधिक विचार केला की वाटते, निसर्गाने स्त्रीला अधिक संयमी, सोशिक आणि बुद्धीरूप मानले आहे. स्त्री जननी आहे, त्यामुळे वंशसातत्याची जबाबदारी तिच्यावर आहे. सात जन्म हाच पती मिळावा ही भावना मनात ठेवली तरी स्त्री-पुरुष किंवा नवरा बायकोचे साहचर्य ह्या जन्मी तरी चांगल्या तऱ्हेने राहण्यास मदतच होते. पुनर्जन्म आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी आत्ताच्या जन्मात संसार सुखाचा होवो यासाठी तरी हे व्रत पाळायला किंवा एक सुसंस्कार मनात ठेवायला हरकत नाही ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे 

३१ मे – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श वाटते’? 

मार्मिक प्रश्न होता, अगदी ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयीपासून ते झाशीच्या राणीपर्यंत भारतीय इतिहासात आदर्शवत वाटू शकणाऱ्या खूप स्त्रिया आहेत पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आली ती एक शुभ्रवस्त्रावृता, विलक्षण बोलक्या डोळ्यांची एक कृश स्त्री जी आयुष्यभर केवळ इतरांसाठीच जगली. नगर जिल्ह्यातल्या जामखेड च्या चौंडी गावच्या एका साध्या धनगराची ही मुलगी, मल्हारराव होळकरांच्या दृष्टीला काय पडते, तिची कुवत त्यांच्या पारखी नजरेला काय समजते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून ती आजच्या मध्य प्रदेशाच्या इंदौर संस्थानात काय येते आणि पूर्ण देशाच्या इतिहासात स्वतःचं नाव काय कोरते, सारंच अद्भुत. 

अहिल्याबाईना त्यांच्या खासगी आयुष्यात फार कमी सुखाचे दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. त्या काळच्या रीतीप्रमाणे सती जायला निघालेल्या अहिल्याबाईंना मल्हारबांनी मागे खेचलं, तिच्या राज्याप्रती असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन. मल्हारबांच्या शब्दाखातर अहिल्याबाईनी सतीचे वाण खाली ठेवले आणि त्याबदलात अनेक लोकापवाद झेलले पण त्यानंतर जे आयुष्य त्या जगल्या ते निव्वळ व्रतस्थ होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले. थोरले बाजीराव पेशवे ते नारायणराव ही पेशवाईतली स्थित्यंतरे त्यांनी जवळून बघितली, पानिपतचा दारुण पराभव बघितला, राघोबादादाची कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर इतकी राजकीय स्थित्यंतरं घडत असताना त्यानी होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात न्याय आणि सुबत्ता तर राखलीच, पण देशभर धर्माचे काम म्हणून मुसलमानांनी उध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोर गरीबांसाठी जागोजाग धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले, आणि हे सर्व केले ते स्वतःच्या खासगी मिळकतीतून. 

त्यांच्या दुर्दैवाने ज्या ज्या व्यक्तिवर त्यांनी जीव लावला त्या त्या व्यक्तीकडून त्यांच्या पदरी निराशाच आली. मुलगा व्यसनी, बदफैली निघाला. त्यांच्या डोळ्यासमोर मुलाचा करुण मृत्यू अहिल्याबाईंना बघावा लागला. अत्यंत लाडकी अशी त्यांची मुलगी मुक्ता, नवऱ्यामागे सती गेली. स्वतः सती जाण्यापासून मागे हटलेल्या अहिल्याबाई काही तिला थांबवू शकल्या नाहीत. तिचा मुलगा, त्यांचा नातू, तोही त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावला. हे सर्व आघात त्यांनी झेलले आणि जगल्या त्या निव्वळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या, व्रतस्थ प्रशासक असलेल्या ह्या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक असेच आहे. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ||

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य! 

माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही. 

या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले….दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही. 

काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.

भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.

थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते. 

सुजनहो!

मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही. 

पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय. 

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात…

भारुड शब्दाची व्युत्पत्ती:

भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं. 

भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:

गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो….

मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार….अशा असंख्य…! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली…यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.

भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड…

‘अग ग ग ग ग विंचू चावला…

विंचू चावला हो…

काम क्रोध विंचू चावला..

तेणे माझा प्राण चालला..’

माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ. 

पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच,  पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो. 

एकनाथ महाराज पुढे म्हणतात,   ‘…या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’

विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!

भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला. 

‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’

सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय…अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!

‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’

समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला….

‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला 

भवानीआई रोडगा वाहीन तुला….’

एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय…खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…

हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा… तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं…अधिक रमलं…

किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी! 

पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!

लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares