मराठी साहित्य – विविधा ☆ “गंगूताई हनगल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गंगूताई हनगल…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(पाच मार्च- जन्म दिनानिमित्त)

श्रीमंती म्हणजे नेमकं कायं ह्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या त-हेने देऊ शकतील.मला विचारलं तर मी म्हणेन आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्यक्ती म्हणजे आपली श्रीमंती.आणि म्हणूनच आपला भारत देश हा मला वाटतं ह्या अर्थाने एक खूप जास्त श्रीमंत राष्ट्र असावं. 

ह्या अनुभवी,जेष्ठ मंडळींबद्दल तर आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर हा असतोच. म्हातारं वयानं असणं आणि म्हातारपणं येणं ह्या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत हे ह्या निमीत्ताने मला नव्यानेच उमगलं.म्हातारपण येण्यात खरतरं वयाचा संबंध नसून त्या मनोवृत्तीचाच खरा संबंध असतो हे अगदी मनोमन पटलं.कित्येक वयानं वयस्कं झालेल्या लोकांमधील तरुणाईला सुद्धा लाजवेल अशी कामाची आवड,चपळता,हौस, सकात्मकता, एनर्जी बघायला मिळते तर कित्येक तरुण व्यक्तींमध्येही कित्येकदा कमालीची विरक्ती,आळस,कामाची नावड,नकारात्मकता, औदासिन्य बघायला मिळतं.अशावेळी खरचं कळतच नाही म्हातारपणं हे कोणत्या मापदंडाने मोजावं.ही म्हातारपणातील तरुणाई आणि तरुणाईतील म्हातारपणं बघितले की चटकनं ती चवनप्राश वाली जाहिरात आठवते, “सोला साल के बुढ्ढे ओर सौ सालके जवान”वाली जाहिरात.

5 मार्च.आज अशाच एका अगदी कापसासारख्या म्हाता-या होऊन गेलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाई टिकवून ठेवणा-या व्यक्तीची जयंती. ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील असून हे क्षेत्र प्रिय असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ह्या दैवतच.ह्या व्यक्ती म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका गंगूताई हनगळ.

ह्यांचा जन्म 5 मार्च 1913 ला धारवाड येथे झाला. संगीताचे प्राथमिक धडे ह्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच्या आईकडून घेण्यास सुरवात केली आणि वयाच्या अकराव्या वर्षी 1924 साली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी,नेहरुजी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनीदेवी नायडू ह्यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गाऊन वाहवा मिळविली. काही काळ त्या कथ्थक नृत्य शिकल्या.मग 1938 पासून सवाई गंधर्व म्हणजेच रामचंद्र कुंदगोळकरांकडे किराणा घराण्याची गायकी पंधरा वर्षे साधना करून प्राप्त केली. त्यांना भिमसेनजी जोशी ह्यांचीही संगत लाभली.

सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह हुबळी येथील वकील व्यावसायिक गुरुराज कौलगी ह्यांच्याशी झाला. कौलगींना संगीताची जात्याचं खूप आवड असल्याने ग़गूताईंची संगीतसाधना ही शेवटपर्यंत टिकली,जोपासल्या गेली. त्यांचे संगीतसाधनेतील कारकीर्द आणि लोकप्रियतेचे टप्पे बघितले की खरचं अचंबीत व्हायला होतं. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात 1931मध्ये

त्यांची एच.एम.व्ही.कडून गाण्याची पहिली तबकडी 1932 मध्ये तर आकाशवाणी वर पहिला कार्यक्रम 1933 मध्ये झाला.

कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती कितीही आणि कोणतेही अडथळे पार करु शकते.फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा गंगूताई आपल्या संगीतसाधनेच्या जोरावर धारवाड विद्यापीठाच्या मानद संगीत प्राध्यापक झाल्यात.त्यांनी परदेशात अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत.संगीताच्या कार्यक्रमांमुळे त्या अमेरिका, इंग्लंड, कँनडा, नेपाळ,नेदरलँड, पाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स व बांगलादेश इ.ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी गेल्या.

भारतसरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले.त्यांना पन्नास पेक्षाही जास्त मानाचे पुरस्कार मिळालेत.त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी शाळा,महाविद्यालयातून सुमारे 200 जाहीर कार्यक्रम केलेत.त्यांना गानरत्न, गानसरस्वती,रागरागेश्वरी ह्या सारख्या उपाध्या मिळाल्यात.हुबळीमधील त्यांचे “गंगालहरी” नावाचे घर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.हुबळीला सुमारे पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल उभारण्यात आले.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगूताईंनी त्यांचा तब्बल दीड तास चाललेला शेवटचा जाहीर गाण्याचा कार्यक्रम वयाच्या अवघ्या 89 व्या वर्षी दणदणीत पार पाडला. वयाच्या 96 व्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचे गायन केले.त्या दिवशी त्या दहा मिनीटे सलग गायल्या.खरचं आहे नं हा तरुणाईला लाजवणारा उत्साह, मेहनत, साधना अशा ह्या थोर,अख्ख आयुष्य संगीतसाधनेला वाहून घेणाऱ्या गंगूताई हनगळांनी 21 जुलै 2009 रोजी अखेरचा श्वास घेतला.खरचं अशा थोर विभुती बघितल्या की नतमस्तक व्हायला होतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर 

माणसाचे नाव आणि माणसाचा पोशाख ही त्या व्यक्तीची पहिली ओळख असते.  केवळ पोशाखावरूनच त्याची जात, भाषा, प्रांत राष्ट्रीयत्व तसेच जीवन पद्धतीचाही अंदाज बांधता येतो.

 भारतामध्ये विविध पोशाख  परिधान केले जातात. पुरुषांचे वेगळे, स्त्रियांचे वेगळे. सदरा लेंगा किंवा धोतर आणि नऊवारी साडी म्हटलं की लगेच पारंपारिक महाराष्ट्रीयन स्त्री— पुरुष नजरेसमोर येतात. सलवार-खमीस, घागरा—ओढणी,  उलट्या पद्धतीची गुजराती साडी, दाक्षिणात्य पद्धतीचे विशिष्ट पोशाख, काठीयावाडी, राजस्थानी कितीतरी प्रकार!  अनेक रंगी, कलाकुसरींचे.   वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख.पोशाख हा नुसता कपड्यांपुरताच मर्यादित नसतो, तर त्या त्या पोशाखावर साजेसे असे अलंकारही त्यानिमित्ताने घातले जातात.  आणि त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांची शोभा, लज्जत ही वाढते.  अशा परिपूर्ण पोशाखातील व्यक्ती ही आकर्षक, प्रसन्न भासते.  नीटनेटक्या पोशाखातल्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव हा लक्षवेधी असतो. 

कुणी कुठला पोशाख घालावा याबद्दलही आपले अगदी पूर्वापार संकेत आहेत. नेत्यांचा वेश, समाजसेवकांचे कपडे, कलाकारांचे कपडे, संगीतकाराचा पोशाख, कचेरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेश, क्वचित  कधीतरी ड्रेस कोड,(शर्ट,पँट,टाय किंवा पारंपारिक पोशाख),शेतकरी,गुराखी,  सणासमारंभाचे पोशाख, शाळेत जाणाऱ्या मुलांचे गणवेष हे सारे ढोबळ मनाने ठरलेलेच असतात.  आणि सर्वसाधारणपणे याच प्रकारची वेशभूषा सामाजिक स्तरावर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, परिधान केली जाते. 

पोशाख आणि वय याचाही संबंध आहेच.कुमारवय, तरुण, वृद्ध अशी विभागणी पोशाखाच्या बाबतीतही होतेच. आणि व्हायलाही हवी.  जे कपडे तरुणपणी शोभतात ते म्हातारपणी अशोभनीय वाटू शकतात.  सहजच आपण बोलतोच की “असे कपडे वापरताना जरा वयाचा तरी विचार करायचा ना? 

काहीजण मात्र बिनधास्त, बेलाशक पणे भडक, चित्रविचित्र कपडे घालण्यास मागेपुढे पहात नाहीत. वयाचा विचार करत नाहीत.  पण कधी कधी या लोकांना अशाच वेशात बघण्याची, बघणाऱ्यांना ही सवय होऊन जाते.

खरोखरच विशिष्ट पोशाखावरून माणसाची एक विशिष्ट प्रतिमाही निर्माण होत  असते. जागतिकीकरणामुळे मात्र आता “ड्रेसेस” या विषयात प्रचंड उलथापालथ झालेली आहे.        

पाश्चिमात्य कपड्यांचा दिमाख, सुटसुटीतपणाच्या नावाखाली सर्रास दिसू लागला आहे.  बदलत्या काळा नुसार, जीवनपद्धतीनुसार पोशाखातला बदलही तसा स्वीकृतच आहे.  पण त्यात केवळ अनुकरण नको.  जो वेश आपण घालू, तो तितकाच सहजपणे आपल्याला निभवताही  आला पाहिजे याचेही भान ठेवायला हवे. 

स्त्रियांमध्ये   पारंपारिक नऊवारी साडी हा आता कधीतरी हौसेने, खास प्रसंगी नेसण्याचाच प्रकार उरला आहे.  फार कशाला?.. साडीची जागा सलवार-कमीसने अगदी सहजपणे बळकावली आहे. टाॅप आणि जीन्स वरचढ झालेत.

आजकाल विनोदी ,हसवणुकीचे कार्यक्रम म्हटले की पुरुषांनी स्त्रियांच्या वेशातच पेश होणे. हे विडंबनही नकोसेच वाटते.विकृत,अतिरंजीत ,अश्लील वाटते.

पोशाखातले विविध बदल आता समाजाच्या अंगवळणी पडूच लागलेत.  त्याविषयी हरकत घेण्याचे ही काही कारण संभवत नाही.  पण गैर एका गोष्टीचं वाटतं— ज्यात केवळ परदेशी अनुकरण आहे, ते म्हणजे उद्युक्त करणारे, लांडेबांडे, तोकडे, शरीर प्रदर्शन करणारे अपुरे पोशाख!  कितीही डोळे झाक करायची म्हटली तरीही यामुळे आपल्या संस्कृतीतले काहीतरी घसरत चालल्यासारखे वाटते या पोशाखांमुळे.  “शेवटी ज्याची त्याची निवड”,” ज्याची त्याची मर्जी” किंवा “उगीच काकू बाईचा शिक्का नको बसायला”  म्हणून हट्टाने केलेला उपद्व्याप असेही असेल.  दृष्टीचा ही दोष असेल. ज्या पोशाखात, आपण एखाद्या युरोपियन स्त्रीला बघू शकतो तर भारतीय नारीला का नाही?   असा प्रश्न येऊच शकतो. कशासाठी या संस्कृतीच्या भिंती?—-

 —— पण तसं नाही. या नुसत्याच संस्कृतीच्या भिंती नाहीत, तर ती सभ्यतेची कवच कुंडले ही आहेत. 

नेहमीच दूरचे डोंगर साजरे दिसतात का?

मी अमेरिकेत असताना तिथली एक तरुणी मला म्हणाली होती,

” आंटी ! मला तुझ्यासारखी साडी नेसायला शिकवशील का? मला तुझा हा ड्रेस (साडी) फार आवडतो.  तू यात किती सुंदर दिसतेस !”

 —- नेमकं मला हेच म्हणायचे आहे. कपडे घाला कोणतेही ! पण समोरच्या व्यक्तीने अगदी सहज, मनापासून म्हटलं पाहिजे,

——–” तू किती सुंदर दिसतेस!”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उरलेलं अन्न… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उरलेलं अन्न…  ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधूनमधून भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव…. 

..

— शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सूचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजूबाजूला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहिलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळूहळू निघून गेला. मलाही हातून एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातून बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजूंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो की निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो– “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली ही शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हा माझा मार्ग एकला.. आता  तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढच्या प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला. आपुलाच संवाद आपुल्याशी,आत्मसंवाद. करेन सारीच उजळणी गत आयुष्याची, काय मिळविण्यासाठी किती दयावे लागले याच्या जमाखर्चाची. हाती उरले ते काय आणि सोबत नेतोय काय याच्या खातरजमेची. मागे आता माझे उरले आहे इतिहासातले फक्त पिकलेले पान..तुमच्या नव्या पिढीच्या शिलेदारांना दिलाय मी जीवनाचा मंत्र  खरा.. ज्यात मिळेल फक्त सात्त्विक समाधान तोच राजमार्ग धरा..तेच  मला गवसले  म्हणून तर या एकलेपणाच्या पथावर मन:शांतीचे दिप उजळले.. या निर्जन एकांतात देखिल मनास भीतीचा लवलेशही स्पर्शून जात नाही… आणि मनही कशातही गुंतून राहिले नाही.. सगळे काही आलबेल नव्हते जीवनात, संघर्षाविना सहजी नव्हते नशिबात.षडरिंपूच्या मातीचच देह होता माझा,  भोवतालच्या माया , ममता, माणूसकिच्या  संस्काराने प्रोक्षळला गेला तो.. मग मी ही त्यात वाटत चालत होतो. खारीचा माझा  वाटा मी पण माणूसच होतो तर मी कसा राहावा एकटा.. परंपरेची भोयी खांद्यावर घेऊन संसाराची पालखी  मिरविली. कष्टाचे उद धूप जाळले  संसारा बरोबर समाजाचे मंदिरही उजाळले. नैवैधयाची भाजी भाकरी महाप्रसाद म्हणूनी वाटली..जो जो आला भेटला तोषविले त्याला त्याला..तृप्तात्मयाच्या आर्शिवादाने भरून गेली झोळी.. सुख शांतीचा बुक्का लागला कपाळी.. तोच विठूरायाने दिली वारीची हाळी.. हा मग मी निघलो सर्व संग परित्याग करुनी.हा वेड्यानो अश्रू नका आणू नयनी…हा माझा मार्ग एकला.. आता  तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढचा प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला.. .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

?  विविधा ?

☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

(आजची स्त्री कशी असावी ? याबद्दल सावरकरांच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थान पोस्टला लिहिलेला लेख !)

….विनायकाची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली, आईनंतर आईच्याच मायेने येसूवाहिनीने त्यांच्यावर प्रेम केलं, सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढलं, आणि देशासाठी लढलं सुद्धा ! विनायकराव परदेशात असतांना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन्ही स्त्रिया उघड्यावर पडल्या…अशा अवस्थेत आपल्या परमप्रिय वहिनीला लिहिलेल्या पत्रात विनायकराव म्हणतात,

तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती

रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच

“सांत्वन” नावाचं हे सावरकरी काव्य ! इतकी उलथापालथ घडूनही, आभालाहून मोठं संकट येऊनही आपली वहिनी, आपली बायको, खंबीरपणे सगळ्यावर मात करेल हा त्या स्त्रीवर दाखवलेला विश्वास, विनायकरावांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असला तर स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: जबाबदारीने संकटाशी सामना करावा असेच तात्या सुचवतात, होय ना !

विनायक जिथे वाढला तो भाग आणि तो काळ एका संकुचित, रूढीग्रस्त मानसिकतेत जगणारा. रांधण्यात आणि वाढण्यात जन्म घालवावा बायकांनी, बाकी रमूच नये कशात अशीच तेंव्हाची रीत. पण चूल आणि मुल वाट्याला येण्याआधीच ज्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण दुर्दैवाने ओढून नेले अशांचे अभाग्यांचे काय ? अशांच्या भाळी लिहिल्या होत्या अबोल यातना फक्त ! या निष्पाप स्त्रियांच्या वेदनांना शब्दरूप दिलय विनायकाने. बालविधवांचे दु;खस्थिती कथन हे विनयकाचे काव्य अशा अनेक मूक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. “ही विवाहव्यवस्था आहे ही वैधव्यव्यवस्था” असा करडा सवाल विनायकराव करतात तो उगाच नाही, स्त्रीने सती जाणे हे धर्माला मान्य नाहीच शिवाय ते माणुसकीलाही लाज आणणारे आहे असं विनायकराव सप्रमाण पटवून देतात हे विशेष !

गुलामगिरी मान्यच नव्हती तात्यांना ! माझी भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये, तिची गुलामगिरी संपावी तशीच आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी, मुक्तपणे तिने करावा संचार या मताचे होते तात्या ! “राज्याची सूत्र हातीघे तो तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जीच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे !’’ असं म्हणत सहजीवनाचा केवढा आदर्श सांगितलाय तात्यांनी !

“स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नितीमत्ता पक्षपाती नि टाकाऊ आहे” हे तात्यांचे वाक्य वाचले की वाटते हा माणूस वैचारिक दृष्ट्‍या सगळ्या समकालीन नेत्यांच्या किती पुढे गेला असेल, किती प्रगल्भ असेल.

हा माणूस सौंदर्याचा उपासक होता. जे जे उत्तम उदात्त उन्नत्त महन्मधुर त्याचा ध्यास घेतलेला होता. जीवनात कुठल्याही बाबतीत कुरूपता याला नकोच होती. आपल्या दूरस्थ वहिनी आणि पत्नीला “नवकुसुमयुता” असं लोभसपणाने म्हणणारे विनायकराव समस्त स्त्रीवर्गाला  सांगतात…“…लावण्यवती कुमारीनो, जननिंनो, तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीला, तुमच्या सौंदर्याला आपल्या पूर्वपुण्याईचं वरदान माना आणि ते सौंदर्य जपा ! हल्लीच्या आधुनिक काळात, सौंदर्य प्रसाधने वापरा, खुलून दिसा !” …विनायकराव हा विचार अशा काळात सांगत होते जिथे त्यांचे हे शब्द ऐकून बायका गालातल्या गालात, खुदकन् हसून लाजेने चूर होण्याचीच शक्यताच जास्त होती, पण आजच्या बायका तात्यांचा हा सल्ला खुबीने राखताहेत खऱ्या…!

एके ठिकाणी मॅझिनीच्या विचाराचा संदर्भ देतांना विनायकराव म्हणालेत, “पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाहीत.” हा विचार देऊन आताशा पन्नास वर्ष उलटूनही गेली असावीत. तात्यांच्या कल्पनेतली शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होतांना फार वर्ष लागलेले नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरलेत. आज घराघरात, आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई मोठ्या अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, वादळ पेलते आहे, आणि लढते आहे.

तिच्या प्रत्येक भरारीसोबत एक नवं आव्हान तिच्यासमोर उभ आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अश्या कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुधा नाहीत. या मुक्या वेदना समोर येतील तेंव्हा काय होईल ? कोणते नवे प्रश्न उभे रहातील ? यापैकी अगदी सगळ्याच नाही पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या “सावरकरी” विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे !

© श्री पार्थ बावसकर

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

‘रघुवंश’ काव्यात कालिदासानं शरद ऋतूच्या आगमनाची खूण सांगितली आहे. शरद ऋतू सुरू झाला. त्याने पुंडरीकरूपी छत्र आणि काशतृणरूपी चामरे धारण केली.. पुंडरीक हे कमळ पावसाळा संपला की फुलू लागते. काश नावाच्या तृणास फुले येतात.

कवी अनिलांच्या तोंडून ‘शरदागम’ ही कविता मी अनेकदा ऐकली आहे. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा, या शरदागमाच्या खुणा आहेत. साचून राहिलेल्या गढूळ पाण्याचे हळूहळू निर्मळ जळात रूपांतर होतंय आणि त्या आरशात डोकावून बाभळी आपलं सावळं रूप पाहतात. ज्वारी टवटवली आहे. काळी आता काळजी करते, की अजून कापूस का फुलत नाही? त्यासंबंधी अधिक चौकशी करायला निळे तास पक्षी खाली उतरतात. कुणीतरी शेवंतीच्या कानात सांगतं, अजून तुझी वेळ आलेली नाही. गवत अजून हिरवे आहे. त्याचे पिकून सोने होण्याआधी पिवळ्या फुलांची घाई करू नकोस. अनिलांच्या कवितेतली ही चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली की समजायचे, ऋतुराज शरदाचे आगमन झाले. 

मोगरा आणि कुंद यांनी बरोबर सहा-सहा महिने वाटून घेतले आहेत. जानेवारी ते जून हे मोगर्‍याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू आहे. काश या गवताची ओळख करून घ्यायला मी उत्सुक आहे. उसासारखे सुंदर तुरे येणारे ते गवत असले पाहिजे.                                                                              

शरद ऋतूचे वर्णन असलेल्या वसंत बापटांच्या ‘निचिंत’ या कवितेत काश फुलांचा उल्लेख आहे. बापट असतानाच त्यांना विचारायला हवे होते. बापटांची ‘सेतू’ ही प्रसिद्ध कविता शरद ऋतूची आहे. तिच्यातल्या प्रतिमा एकावेळी निसर्ग आणि प्रेयसी दोहोंनाही लागू पडणार्‍या आहेत. किंबहुना शरद ऋतूतील पहाटच सेतू होऊन कवीला ‘तिच्या’कडे घेऊन जात आहे. ….. 

‘ही शरदातील पहाट…. की….  तेव्हाची तू?

तुझीया माझीया मध्ये पहाटच झाली सेतू’ 

….‘सेतू’ ही माझ्या वाचनातील शरद ऋतूवरील सर्वांत सुंदर मराठी कविता आहे.                                                    

जिला मी दुसरा क्रमांक देईन ती इंदिरा संतांची कविता शरदातली दुपार चित्रांकित करते. ही निळी पांढरी शरदातली दुपार कशी आहे? तर तिचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळूवार आहे. सव्वीस ओळींच्या मोठय़ा कवितेत शरदातील निसर्गाचे सुंदर तपशील आहेत. आणि हा शेवट….. 

‘का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी?

का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी?

का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती?

रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती?

दिस भरलेली ही काय तरी गर्भार

टाकीत पावले चाले रम्य दुपार!’      

मराठी कवींप्रमाणे संस्कृत कवींनाही शरद ऋतू तितकाच प्रिय आहे. महाकवी कालिदासाला तो ‘रूपरम्या नववधु’सारखा सुंदर, टवटवीत वाटतो. ‘किरातार्जुनीय’ या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, ‘हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात. असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो !’

पूर्णता आणि परिपक्वता यांची प्रतिमा होऊन शरदातले मेघांनी धुतलेले आकाश रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांतून येते.  पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘मुक्काम शांतिनिकेतन’ मध्ये आश्रमातल्या शरद ऋतूचे वर्णन केले आहे, तेही रवींद्रनाथांच्या पत्राद्वारा. भानूसिंहेर पत्रावलीच्या अकरा क्रमांकाच्या पत्रात गुरुदेव लिहितात, ‘आज बागेत हिंडताना मालती फुलांचे हे ‘अनुप्रास’ पाहायला मिळाले.’ 

शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. आकाशातली निळाई हळूहळू स्पष्ट आणि गडद होते. तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. या रात्रीही मोठय़ा असतात. इतर कोणत्याही ऋतूंना रात्रीच्या सौंदर्याचं हे वरदान नाही, म्हणून तर कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ‘ज्योतिष्मती रात्र’ म्हटलं आहे. शरदात येणारे सणदेखील रात्रींशी निगडित आहेत. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी हे रात्रीचेच उत्सव आहेत.

चकोर पक्ष्याचं मला भारी आकर्षण वाटायचं; पण तो म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू किंवा परीस यांसारखी कवीकल्पनाच असावी, असा समज. शरद ऋतूच्या चंद्रकलेचे कोवळे अमृतकण चकोर खातो. याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायात येते.                                                                    

मारुती चितमपल्लींनी चकोर नाकारला तर नाहीच; पण त्याचे विज्ञान सांगून कवीकल्पनेला शास्त्रीय पुस्ती जोडली आहे. शरद ऋतूत चकोरीची पिल्ले तिच्याबरोबर जंगलात फिरत असतात. वाळवीच्या किड्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून वारुळातून वाळवी रात्री बाहेर पडते. आपल्या पिलांची जलद वाढ व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. शरद ऋतूतल्या चंद्राच्या प्रकाशात चकोराला वाळवी सहज दिसते. हे दृश्य पाहून कवींना वाटते, की चकोर चांदणेच टिपत आहेत ! मी ग्रंथप्रेमी असल्याने वाळवी खाणार्‍या चकोरांबद्दल आता कृतज्ञता वाटते.

शरदातल्या चंदेरी रात्री जेवढय़ा सुंदर, तेवढाच शारद रात्रींतला अंधारही प्रियतम आणि मोहमयी असतो. अंधार ही प्रेम करण्यासारखीच गोष्ट आहे हे शरदातल्या रात्रीच   पटते, हे अरुणा ढेरे यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी खरे आहे…. 

‘पर्वतों के पेडों पर शाम का बसेरा है. 

चंपई उजाला है, सुरमई अंधेरा है !’

 …. हे साहिरचं वर्णन एखाद्या शारद सुंदर रात्रीलाच उद्देशून असलं पाहिजे. सुरम्यासारखा अंधार ! व्वा ! कोजागिरीची रात्र म्हणजे चंपई उजाला आणि दिवाळीची रात्र म्हणजे सुरमई अंधेरा !

शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्‍याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हींव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत विश्‍वामित्राचा उन्हाळाही होऊन जातो, त्यालाच अलीकडे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू. 

लेखक :  -प्रा. विश्‍वास वसेकर 

लेखक साहित्यिक आहेत.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

हैदराबाद येथील  सालारजंग वस्तू संग्रहालयाचे पहिले  व्यवस्थापक, तसेच  निर्मितीस नबाबास सहकार्य करणारे मागील शतकातील जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा  जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी अहमदनगर येथे झाला. गोपाळराव हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. त्यांचा व त्यांची मोठी बहिण शांता यांचा नातेवाइकांनी सांभाळ केला. नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देऊसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. मूळचे देवास, मध्यप्रदेश येथील देऊसकर कुटुंब  अहमदनगर येथे आले. देऊसकर यांच्या  घरात तीन पिढ्यांपासून कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन देऊसकर आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते.

त्यांनी वर्ष १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. १९२७ साली मुंबईला आल्यावर खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटक मंडळीच्या बिऱ्हाडात ते राहिले. त्यांनी १९३१ मध्ये जे.जे.मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. जे.जे.स्कूलचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते. तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. त्यांची कला पाहून निजामाने पाच वर्षांकरिता खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले व लंडनमधील ‘रॉयल अकादमी’त त्यांनी शिक्षण घेतले. 

त्या संस्थेच्या लंडनमधील जागतिक कला प्रदर्शनांत त्यांनी सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळवला होता. वर्ष १९३६ व १९३८ च्या रॉयल ॲकडमीच्या प्रदर्शनात देऊसकरांची ‘शकुंतला’ व ‘अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे  लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही चित्रे बडोदा येथील संग्रहालयात आहेत. त्यांनी ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ या चित्रांमध्ये निसर्गघटकांच्या  पार्श्वभूमीचा उत्कृष्ट वापर केला आहे. बडोदा-नरेश प्रतापसिंह गायकवाड यांची ‘घोड्यावरून सलामी’  आणि ‘राजगृहात संस्थानिक’ या दोन्ही चित्रांमधून त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येतो. त्या वेळी ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली. 

हैदराबाद येथील सालारजंग  उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्याची खूपच प्रसिद्धी झाली. सालारजंग म्युझियमची मांडणी  ही मराठी माणसाच्या कल्पकतेचे द्योतक आहे. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. ‘व्यक्तिचित्रकार’ म्हणून देऊस्कर यांनी स्वतःची ‘व्यावसायिक कारकीर्द घडविली. त्यांच्या चित्रशैलीला बॉंबे आर्ट सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवले होते. आजही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, तसेच टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात. व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर ह्यांनी ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ या पुस्तकातून देऊसकरांमधला कलावंत आणि माणूस याची सुंदर ओळख दिली आहे. त्याच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार आणि सोबतची चित्रे, छायाचित्रे येथे पाहण्यास मिळतात. 

जे.जे.तून पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर देऊसकरांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पारितोषिके व पदके संपादन केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक ही त्यांपैकी काही महत्त्वाची पारितोषिके होत. भारतात पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांच्या परंपरेतील श्रेष्ठ कलाकार म्हणून  गोपाळराव देऊसकर यांचे स्थान अव्वल आहे. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. 

लेखक – अज्ञात

संग्राहक : विनय मोहन गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वा. वि. दा. सावरकरांचे निर्वाण झाले. लोककवी मनमोहन यांनी या दुःखद प्रसंगी आपल्या भावना पुढील काव्यातून व्यक्त केल्या… 

ते आता दिसणार नाहीत 

की जे निशाणातच नव्हे, प्राणातही भगवे होते !

 

ते आता स्पंदणार नाहीत 

की जे वेरुळचे शिल्प अंदमानात घडवीत होते !

 

ते आता बोलणार नाहीत 

की जे सत्तावन्न नंतरचे खरे ‘अठ्ठावन्न’ होते !

 

ते आता हसणार नाहीत 

की जे अमावस्येची प्रसन्न पुनव करीत होते !

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वांच्या आवडीचा, खमंग,चटकदार आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी मानाने विराजमान झालेला  पदार्थ म्हणजे ‘थालीपीठ’. इतकचं काय तर हाँटेल,टपरी,अगदी पंचतारांकित हाँटेल मध्ये सुध्दा हे थालीपीठ स्पेशल डिश म्हणून आपल्यासमोर येते.नुसत नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ.थालीपीठ कुणाला आवडत नाही असा माणूसच विरळा.अगदी राजेशाही थाटापासून ते झोपडीपर्यंत आणि आयत्या वेळी पटकन करुन खाण्याजोगा हा पदार्थ. संध्याकाळच्या वेळी संपुर्ण स्वैपाकाचा कंटाळा आला तर ” चला,चार थालीपीठ लावते ” असे म्हणून वेळ मारुन नेणारा ग्रुहिणींचा पक्का दोस्त.

पण तरीसुध्दा ही इतकीच महती नाही बरं का या थालीपिठाची कारण साग्रसंगीत, व्यवस्थित डावं,उजवं सोबत घेऊन पानात येणारा हा खमंग, चविष्ट पदार्थ आहे.त्यामुळेच तो सर्वांच्या आवडीचा आहे.

मंडळी,अहो पुराणातही या थालीपीठाचा उल्लेख आढळतो बरं का.यमुनेच्या तीरावर क्रुष्णाच्या सवंगड्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करुन केलेल्या काल्यामध्ये या थालीपीठाचाही समावेश होता.क्रुष्णासह सारे सवंगडी याचा आस्वाद घेत होते तेव्हा क्रुष्णाच्या पानात आलेला पेंद्याच्या घरचा थालीपीठाचा तुकडा अगदी आवडीने,चवीने क्रुष्णाने खाल्ला होता म्हणे.

पु. ल. देशपांडे यांच्या ‘ असा मी असामी ‘ या पुस्तकात पु. ल.म्हणतात  ” संसारातील रोजच्या कटकटींना कंटाळून कधी कधी संसार सोडून जावेसे वाटते पण त्याच दिवशी सौ. ने कांद्याचे थालीपीठ केलेले असते. “पहा मंडळी, एका मोडणाऱ्या संसाराला वाचवायचं काम हे थालीपीठ करतं अस म्हणता येईल. तर, ‘जाऊबाई जोरात’ या नाटकामध्ये महिलांच्या बसमध्ये दरोडेखोर येतात आणि सामानाची झडती घेताना त्याच्या हाती एक डबा लागतो तेव्हा त्यातील पदार्थाच्या वासाने तो मोहून जातो आणि यात काय आहे असे एका महिलेला विचारतो. तेव्हा त्यात थालीपीठ आहे असे सांगितल्यावर म्हणजे काय असे तो विचारतो त्यावेळी त्या थालीपीठाच्या रेसिपीचे वर्णन त्या नायिकेने (निर्मिती सावंत) इतके अफलातून केले आहे कि बस्.

म्हणजे पुराणापासून चालत आलेल हा पदार्थ आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवून आहे.

आता हे थालीपीठ बनते कसे? तर ज्वारी,बाजरी,गहू,चणाडाळ, तांदूळ या धान्याच्या एकत्रीकरण केलेल्या पीठापासून.अगदी खास पध्दतीने करायचे असेल तर ही धान्ये भाजून घेऊन त्याचे पीठ करुन त्यात कांदा,मिरची,कोथिंबीर, हळद,हिंग,तीळ,जीरे,मीठ असे सर्व साहित्य घालून मळून पोळपाटावर पातळ फडक्यावर भाकरीसारखे थापून तव्यावर तेल सोडून खमंगपणे दोन्ही बाजू भाजून घेतल्या जातात.अशा पध्दतीने थालीपीठ बनवताना आपल्या आवडीनुसार यात काही भाज्यासुध्दा घातल्या जातात.

घरी, प्रवासात, डबापार्टी, भिशीपार्टी, डोहाळजेवण असा कुठेही चालणारा आणि चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पंजाबी,चायनीज,गुजराती,बंगाली, इटालियन अशा विविध पदार्थांची कितीही रेलचेल असली तरी लोणी,दही,लसणाची चटणी,लोणचं असं सार सोबत घेऊन ताटात येणारे हे थालीपीठ म्हणजे सर्वांची आवडती महाराष्ट्रीयन परिपुर्ण थाळीच. महाराष्ट्रात  श्रावणात,नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.ग्रामीण भागात याला ‘ धपाटे ‘असेही म्हणतात.म्हणजे तसं तर  धपाटे हा थालीपीठाचा जुळा भाऊ म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे सणावारीसुध्दा थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.अगदी नवरात्रीच्या नवू दिवसांच्या उपवासातही बदल म्हणून शाबूदाणा,वरी,बटाटा यापासून थालीपीठ बनविले जाते.

मंडळी,भारतीय खाद्यसंस्कृती अनेकविध पदार्थांनी परिपुर्ण तर आहेच पण या थालीपीठाचीसुध्दा चांगलीच महती आहे म्हणूनच अलिकडे गावागावातील प्रत्येक खाऊगल्लीमध्ये भेळ,आईस्क्रीम, पिझ्झा,बर्गरच्या जोडीला दही,खर्डा थालीपीठाच्याडिशने मानाचे स्थान मिळवले आहे.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मराठी मातृभाषादिनाच्या निमित्ताने….. 

फेसबुक, व्हाॕटस् अॕपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी, तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.

स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे. 

आतपुढ (आले तसे पुढे ढकलले) ही व्हाॕटस् अॕप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात. 

आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हेही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे. 

आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल, त्यांना याविषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.

त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे  ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते ! 

याला काय करायचे ! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो, इंग्रजी असो, वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा. 

लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते !

समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘काॕपी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे. 

लेख लिहिताना, ‘घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते’ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे’ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे, हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजीकाट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर’, ‘उसमे क्या है’, ‘उससे क्या फरक पडता है’,  ‘चलता है याsर’, ‘टेक इट ईझी’ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचूकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य  आहे. 

अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.

मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही  किती परकीय शब्द, किती ऊर्दू , किती इंग्रजी शब्द! 

इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’ , please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?

आपली दैनंदिन विचारविनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी, येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?

एका हिंदी लेखातील अवतरण…

… ‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोगमें लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजीके शब्द बोलते है। हर हिंदीप्रेमी इस लेखको पढ़नेके बाद अपने मित्रोंके साथ साझा अवश्य करे। ‘

अवतरण समाप्त

आपण मराठीतही अनेक उर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का, की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा, ह्या सूचनेचा.

अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, अभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग?

समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेवून आता इथेच थांबणे उचित समजतो. 

व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर ! तो पर्यंत नमस्कार !!

लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे

व्हाॕटस् अॕपः  ९२८४३००१२५

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares