मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

ऐक ना…

परवा बोलता बोलता मी तिला म्हणाले….

तू नक्की भाग घे या स्पर्धेत…

तशी ती म्हणाली….

ती म्हणजे ती मुक्ता ग… आपण तिला allrounder म्हणतो…

ती म्हणाली मला…. म्हणजे बघ विचार करावास असे वाक्य होते म्हणजे आहे तिचे.

माझ्यातल्या उणीवांची जाणीव आहे मला. त्यामुळे नको ग सध्या तुला सांगते मी खरचच पुन्हा नव्याने आकर्षित झाले तिच्याकडे…

उणीवांची जाणीव…. या दोन शब्दांचे एकत्र येणे म्हणजे सुधारणेचा प्रगतीचा श्रीगणेशाच नाही का…

उणीवा जाणवणे हाच एक गुण दुर्मिळ झालाय आजकालच्या जगात…. जो तो स्वतः सिध्द असल्यासारखा वागतोय त्यावेळी ही मात्र… जिला खूप काही येतय ती म्हणते…. उणीवांची जाणीव आहे म्हणून… थांबूया सध्या…. आवडलेच मला तिचे असे म्हणणे…

बघ ना…

उणीवांची जाणीव झालीय तर त्या उणीवा कमी करण्यासाठी वेळ हवाय तिला….

उणीवा नेमक्या कशा दूर करता येतील यावर विचार करण्यासाठी वेळ हवाय….

स्वाभाविक शारीरिक मानसिक अशा कुठल्या पातळीवर जाऊन आपण उणीवा दूर करु शकतो हे शोधण्यासाठी ती कामाला लागलीय…

आणि त्या दृष्टीने आत्मचिंतन ही चालू केलय तिने…

खरच उणीवांची जाणीव आपल्याला किती सामृध्दिक मोकळेपण देतेय हे विचारांती कळलय मला…

म्हणजे बघ ना….

उणीवांची जाणीव मला प्रतिक्रियेवर विचार कर सांगते.

एखाद्याच्या असाधारण व्यक्ततेवर किंवा होणाऱ्या टीकांवर भाष्य करताना खिलाडूवृत्तीने स्विकारल्यास तर माणासांना गमावणार नाहीस तू हे सांगते.

आणि मग आचरणातून आपोआप नम्रता डोकावायला लागते. आणि संवादास आवश्यक असे वातावरण ही तयार होते चुकांची जबाबदारी न टाळता उलट ती स्विकारून आत्म भान येतं ही आत्मजागरुकता आनंद देवून जाते….

आणि उणीवांची जाणीव खऱ्या अर्थाने वर्तुळ पुर्ण करते.

उणीवांची जाणीवेवर विचार मंथन करताना मधेच उलटे झालेल्या शब्दानी मी अंतर्बाह्य ढवळून निघाले….

ते शब्द होते…

“जाणीवेची उणीव“…

जाणीवेच्या उणीवेवर ही ऐक ना म्हणणार आहे तुला…

लेखिका : सौ. साधना डोंगरे 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट काय झाले असेल तर, यशोमती ठाकूर ताईला अपयश आले. ताईला भेटण्यासाठी मी अमरावतीला गेलो होतो. ताईची भेट काही कारणास्तव लांबणीवर गेली. पुढचे दोन दिवस या भागातल्या भेटीगाठी करायच्या, या उद्देशाने मी मेळघाटच्या दिशेने निघालो. मेळघाटमधल्या काही ओळखीतल्या लोकांशी संपर्क केला, तर ते सारे कामात होती. ‘वैभवभाई’ मेळघाटात आहेत, त्यामुळे यावेळी भेटणे शक्य नाही. असे दोन तीन जणांकडून निरोप आले. कोण ‘वैभवभाई’? असे विचारेपर्यंत शेवटच्या व्यक्तीनेही फोन ठेवला. मेळघाटामधल्या घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई अशा अनेक गावांत मी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर माझ्याशी परिचित असणारी व्यक्ती मला हेच सांगत होती. ‘वैभवभाई’ आताच येऊन गेले. कुठे किराणा सामान दिले. कुठे कपडे दिले. कुठे शाळेचे साहित्य, कुठे घरात लागणारे साहित्य, तर कुठे अन्य काही साधनसामुग्री दिली. बापरे, कोण आहे हा माणूस, ? जो या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या भागात एवढे मोठे काम करतो, असा मला प्रश्न पडला होता. माझ्यासोबत याच भागातले किशन जांभोरी होते. मी त्यांना विचारले, ‘मामा हे ‘वैभवभाई’ कोण आहेत, ? त्यांनी मला वैभव यांच्याविषयी सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘लावा बरं फोन त्यांना’. मामाच्या फोनवर मी वैभवजी यांना बोललो. एक माणूस नि:स्वार्थीपणे या भागात काम करतोय, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. एका तासानंतर आमचे भांद्री या गावात भेटायचे ठरले. आम्ही भेटलो. खूप गप्पा झाल्या आणि वैभवचे कधीही कोठे न दाखवलेले खूप मोठे सामाजिक कामही माझ्या पुढे आले. काय काही काही माणसे असतात, जी प्रचंड मोठे काम करतात. त्यात वैभव एक होते.

वैभव वानखडे (९४२३४०१०००) अकोला येथील आदर्श कॉलनीमधला एक युवक. वैभवचे आजोबा आणि वडील हे सेवाभावी वृत्तीने प्रचंड झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘आपला जन्म देण्यासाठी झाला’ हा विचार वैभव यांच्या मनात लहानपणापासून अगदी शिगोशीग भरला होता. वैभव म्हणाले, माझे वडील गेल्यावर अनेक मित्रांच्या मदतीने उभा केलेला खूप मोठा व्यवसाय तसाच बाजूला ठेवून बाबांच्या आठवणीत पूर्णवेळ सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून द्यावं असा विचार करून मी बाहेर पडलो. एका वर्षाने मागे फिरून पाहिले तर ज्या अनेकांची भिस्त माझ्या व्यवसायावर होती, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडायची वेळ आली होती. मी स्वतःला थोडे सावरत, थोडा व्यवसाय आणि अधिकचे सेवाभावी कार्य असे काम सुरू केले. जसे माझे आजोबा आणि वडील यांना ‘आत्मिक वैभवा’ची रुची निर्माण झाली होती, तशी रुची मलाही लागली होती. सर्व जण माझी काळजी करायचे. एकटी माझी आई मीरा वानखडेला सारखे वाटायचे, माझा मुलगा प्रत्येक पाऊल धाडसाने टाकतो. आई जेजे म्हणायची ते ते व्हायचं. एका महिलेकडे आणि युवकांकडे बोट करीत वैभव म्हणाले, ‘ही माझी पत्नी पूनम, आणि हा गौरव काटेकर हे दोघेंजण राज्यातील गरीब मुलांचे शिक्षण, गरिबी निर्मूलन उपक्रम, आणि मराठी शाळा या तिन्ही उपक्रमांचे काम पाहतात. ‘मी वैभव यांना म्हणालो, हे तिन्ही उपक्रम आहेत तरी काय’? वैभव म्हणाले, २०१२ ला मी ‘नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन’ आणि ‘सेवा बहुउद्देशीय संस्था’ अशा दोन संस्था काढल्या. माझे बाबा गेले आणि बाबांच्या आठवणीत २०१९ पासून या दोन्ही संस्थांच्या कामाला प्रचंड गती मिळाली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून नि:स्वार्थ सेवा होत आहेत, हे कळल्यावर राज्यातून शेकडो तरुण या कामासाठी पुढे आले. मेळघाटसारखे राज्यातले २८ गरिबी आणि भीषण संकटे असणारे भाग आम्ही निवडले. तिथे प्राथमिक स्वरूपात जे काही पाहिजे ते पुरवले. गरिबी फार वाईट असते, या काळात जो कुणी साथ देतो, तो देवापेक्षा मोठा वाटायला लागतो. माझ्या बाजूला असलेल्या एका महिलेकडे खुणावत वैभवजी मला म्हणाले, ‘ही अंजना याच मेळघाट भागातली. तिची सात मुले दगावली. कुपोषण, रोगराई, अज्ञान अशी कारणे त्या सात मुलांच्या जाण्यामागे सांगण्यात आली. माझ्या दृष्टीने ही मुले जाण्यामागे खरे कारण होते गरिबी. आता अंजना सोबत जो मुलगा उभा आहे. तो तिचा मुलगा शिवा आहे’. मी अंजनाकडे पाहत म्हणालो, ‘शिवा तर मला एकदम पैलवान वाटतो’. डोळ्यात आलेली आसवं पुसत अंजना म्हणाली, ‘दादा, कुठे तरी देव हाय ना जी’.. ! आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेला मांसाचा गोळा जेव्हा डेडबाॅडी होऊन आपल्याच हातावर असतो ना, तेव्हा त्या आईला धरणीमाय जागा देत नाही. त्या आईचा आक्रोश कुणालाही दिसत नाही, तो आतला आक्रोश फार भयंकर असतो. माझ्या तिसऱ्या बाळापासून वैभवदादांची ओळख झाली. एक तरी बाळ वाचेल असे वाटत होते, पण छे ! आठव्या बाळंतपणाच्या वेळी पूनमवहिनी आणि वैभवदादा मला त्यांच्या घरी अकोल्याला घेऊन गेले. चांगल्या दवाखान्यात माझी प्रसूती झाली. पुढे वैभव भाऊने अनेक फिरते दवाखाने या भागात सुरू केले. ज्यातून माझ्यासारख्या अनेक अंजनाला त्यांचे मातृत्व मिळाले. आम्ही बोलत, बोलत त्या मेळघाटातल्या भागात वैभव यांच्यामुळे झालेल्या अनेक सामाजिक कामांचे दाखले अनुभवत होतो. वैभव यांनी गौरव काटेकर, तृप्ती महाले, पूनम कीर्तने, गिरीश आखरे, वैशाली जोशी, अशा अनेकांची ओळख करून दिली. चर्चेतून आमचा रस्ता ‘अमरावती’च्या दिशेने कटत होता. ३४० जणांची पूर्णवेळ काम करणारी टीम, हे तिन्ही उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवत होती. मेळघाटामध्ये गरिबी निर्मूलन उपक्रम, शाळाबाह्य मुलांसाठी उभे केलेले वैभव यांचे काम पाहून कोणीही थक्क होईल, असे ते काम होते. या स्वरूपाचे काम केवळ मेळघाटामध्ये नव्हते तर, राज्यात छत्तीस जिल्ह्यांत सुरू होते. अगदी कुठलाही गाजावाजा न करता. आमच्या गाडीत वैभव यांनी सुरू केलेल्या त्या तिन्ही उपक्रमांविषयी चर्चा सुरू होती. आता ‘मराठी शाळा वाचली पाहिजे’ या उपक्रमाविषयी समजून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. वैभव म्हणाले, ‘आपण सारे आपल्या मराठी शाळेत शिकलो’. कसे वागायचे, जगायचे हे सारे संस्कार आम्हाला मराठी शाळेने शिकवले. अशा जीव की, प्राण असणाऱ्या शाळा वाचाव्यात यासाठी आम्ही राज्यभरात सर्व्हे करून एक रूपरेषा ठरवली. सर्व राज्यांत २४० शाळा निवडल्या, ज्या शाळेतून बाहेर पडणारी दीड लाखाहून अधिक मुले दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन आभाळाला गवसणी घालायचे काम करतात. कोण किती वाईट आहे, यंत्रणा किती कामचुकार आहे, यात आम्ही कधीही घुसत नाही. आम्ही आमचे ठरवलेले काम करतो. आम्ही अमरावतीजवळच्या घटांग या शाळेत पोहचलो. त्या त्या शाळेतले अनेक प्रयोग वैभव आणि त्यांची टीम मला सांगत होती. तिथे असणाऱ्या श्रीजया, विजया, कान्होपात्रा या तिन्ही बहिणी एका पाठोपाठ नवोदयला लागल्या. त्यांचे वडील साधी पानपट्टी चालवतात. त्या शाळेत कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. कोणी खेळाची. कुणी छान कविता लिहितो. हे याच शाळेत का पाहायला मिळत होते, त्याचे कारण या शाळेत वैभव आणि त्यांच्या टीमने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक उपक्रम विकसित केले होते. या घटांगच्या शाळेसारख्या राज्यात २४० शाळांमध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थांना भेटायचे आहे त्यांच्या ‘वैभवभाई’ यांना. आभार मानणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या पुढे अगदी साधेपणात नतमस्तक झालेले वैभव, त्या शाळेतला सारा प्रसंग मी अगदी डोळे भरून पाहत होतो. वैभव यांच्या सर्व टीमने त्या शाळेतील कामामध्ये स्वतःला गुंतवले होते. बाजूला मी आणि वैभव दोघे बोलत बसलो होतो. वैभव म्हणाले, ‘माझे आजोबा कृष्णराव वानखडे यांनी पदरमोड करून आणि लोक वर्गणीतून बहुजनांच्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. या काळात आपण नव्या शाळा काढू शकत नाही, पण आहे त्या शाळा चांगल्या करू शकतो. वडिलांचेही माझ्याविषयी खूप स्वप्न होते. वडिलांच्या आठवणीतून डोळे पाणावलेल्या वैभव यांचे लक्ष एका उत्साहाने धावत येणाऱ्या मुलीकडे गेले. ती मुलगी ‘बाबा’ म्हणत, वैभव यांच्या गळ्यात येऊन पडली. तिने वैभवच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. ती मुलगी म्हणाली, ‘तुम्हाला कोणाची आठवण येते?, माझ्या आजोबांची की तुमच्या आजोबाची?. वैभव काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडले. त्या दोघांचेही डोळे अश्रूनी भरली होती. एकमेकांच्या स्पर्शातूनच त्यांचे बोलणे सुरू होते. थोडे भानावर येत वैभव मला म्हणाले, ‘ही माझी मुलगी शिवन्या. शिवन्या आणि माझी आई आताच मुंबईवरून आलेत. या दोघींनाही माझ्या सामाजिक कामात प्रचंड रुची आहे’. वैभव यांच्या आईची ओळख झाली. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. वैभव यांच्या आईच्या पायावर मी डोके ठेवत आईला म्हणालो, ‘आई, अनेक जन्म साधना केल्यावर तुम्हाला असा पुत्र मिळाला असेल’. माझे बोलणे ऐकून आईचे डोळेही पाणावले होते. मी निघालो. थोडे पुढे गेल्यावर मलाही अश्रू आवरेनात. माझे अश्रू त्या ‘आत्मिक वैभवा’साठी होते, ज्याला वाटते सगळीकडे ‘चिरंतन टिकणारा’ विकास झाला पाहिजे. ज्यांना वाटते, सगळीकडे चांगले झाले पाहिजे. तुम्हालासुद्धा हे ‘आत्मिक वैभव’ मिळायचे असेल तर, तुम्ही नक्की ‘वैभव’च्या पावलावर पाऊल टाका, बरोबर ना.. !

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॲनिमेशनची कला… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲनिमेशनची कला… ☆ प्रा. भरत खैरकर 

कल्पनाशक्तीला जिवंत करणे म्हणजे ॲनिमेशन! हा एक आकर्षक कला प्रकार आहे. जो सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथन यांचे मिश्रण करून स्थिर प्रतिमांना हलत्या व्हिज्युअलमध्ये बदलते. जगभरातील प्रेक्षकांना मोहित करते. फीचर फिल्म्सपासून व्हिडिओ गेम्सपर्यंत, आपण जे कथा, कल्पना आणि मनोरंजन अनुभवतो यात ॲनिमेशन महत्त्वाची भूमिका बजावते.

ॲनिमेशन म्हणजे काय? ॲनिमेशन ही स्थिर प्रतिमा जिवंत करण्यासाठी डिझाइन, रेखाचित्र, मांडणी आणि कलाकृती तयार करण्याची प्रक्रिया आहे. मुख्य कल्पना म्हणजे हालचालींचा भ्रम निर्माण करणे, ज्यामुळे प्रतिमांना वापरून, कालांतराने कथा सांगणे शक्य होते. हाताने काढलेले कार्टून असो किंवा संगणकाद्वारे तयार केलेले पात्र असो, ॲनिमेशन स्थिर व्हिज्युअल्सना मनोरंजन, माहिती आणि प्रेरणा देणा-या डायनॅमिक कृतींमध्ये बदलते.

ॲनिमेशन तयार करणारी व्यक्ती ‘ॲनिमेटर’ म्हणून ओळखली जाते. ॲनिमेटर्स ही पडद्यामागील सर्जनशील शक्ती आहेत, जी चळवळ, अभिव्यक्ती आणि भावनांना पात्र आणि कथांमध्ये जीवन फुंकण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यांचे कार्य ब्लॉकबस्टर चित्रपटांपासून डिजिटल जाहिरातींपर्यंत विविध माध्यमांमध्ये सगळीकडे पाहिले जाऊ शकते.

ॲनिमेशन अनेक शैलींमध्ये येते, प्रत्येकाची स्वतःची अनन्य तंत्रे आणि सौंदर्यास्थाने आहेत. ॲनिमेशनच्या प्राथमिक प्रकारामध्ये

पारंपारिक ॲनिमेशन, हाताने काढलेले ॲनिमेशन म्हणूनही ओळखले जाते, ते ॲनिमेशनच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक आहे. यात प्रत्येक फ्रेम हाताने तयार करणे, प्रत्येक दृश्याला एक अद्वितीय कलाकृती बनवणे समाविष्ट आहे. डिस्नीचे बरेचसे सुरूवातीचे आणि सिंड्रेला सारखे क्लासिक चित्रपट पारंपारिक ॲनिमेशन वापरून तयार केले गेले आहेत.

टूडी ॲनिमेशन.. ह्यात एक्स, वाय अक्ष वापरून या प्रकारच्या ॲनिमेशनमध्ये हालचाल निर्माण करण्यासाठी द्विमितीय प्रतिमा किंवा रेखाचित्रे वापरतात!हे ॲनिमेशन डिजिटल पद्धतीने किंवा पारंपारिक हाताने काढण्याच्या तंत्राद्वारे तयार केले जाऊ शकते. लोकप्रिय दाहरणांमध्ये ‘ द सिंम्पसन’ आणि ‘स्पाॅज बाॅब’ सारखे ॲनिमेटेड टीव्ही शो समाविष्ट आहेत.

थ्रीडी ॲनिमेशन हे संगणक सॉफ्टवेअर वापरून, थ्रीडी (एक्स, वाय, झेड अक्ष) ॲनिमेशन प्रतिमांना खोली आणि परिमाण जोडते. ॲनिमेशनचा हा प्रकार टॉय स्टोरी आणि फ्रोझन सारख्या प्रमुख ॲनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी मानक बनला आहे. ज्यामुळे वास्तववादी, सजीव हालचाली आणि तपशीलवार पात्रांना ह्या मधे दाखविता येते.

मोशन ग्राफिक्स हे मजकूर, लोगो आणि आकार यासारख्या ग्राफिक डिझाइन घटकांसह तयार केलेले ॲनिमेशन असते. हे सामान्यतः जाहिराती, संगीत व्हिडिओ आणि डिजिटल सामग्रीमध्ये दृश्यात्मक आकर्षक मार्गाने.. पध्दतीने.. माहिती देण्यासाठी वापरले जातात.

स्टॉप-मोशन ॲनिमेशनमध्ये प्रत्येक शॉट दरम्यान किंचित हलविलेल्या भौतिक वस्तू किंवा मॉडेल्सच्या वैयक्तिक फ्रेम्स कॅप्चर करणे समाविष्ट असते. क्रमाक्रमाने खेळल्यास, वस्तू स्वतःहून हलताना दिसतात. द नाईटमेअर बिफोर ख्रिसमस आणि वॉलेस अँड ग्रोमिट सारखे आयकॉनिक स्टॉप-मोशन चित्रपटात हे तंत्र वापरले आहे.

ॲनिमेशन प्रक्रियेमध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश होतो, ह्यात प्रत्येक प्रक्रिया ही पॉलिशिंग आणि अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. कल्पना, प्रक्रिया, विचारमंथन, ॲनिमेशनच्या पध्दती आणि थीमची संकल्पना इथून ॲनिमेशनची तयारी होते. इथेच सर्जनशील दिशा ठरवली जाते.

कथा, पात्रे, संवाद आणि वेळेची रूपरेषा सांगण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली जाते. हे ॲनिमेशनसाठी ब्लूप्रिंट म्हणून काम करते. नंतर ॲनिमेटर्स एक स्टोरीबोर्ड तयार करतात, जो ॲनिमेशनच्या मुख्य दृश्यांचा नकाशा बनवतो, ज्यामुळे टीमला पूर्ण फ्रेम्स तयार करण्यापूर्वी ॲनिमेशनची प्रगती आणि वेळेची कल्पना करता येते.

रफ ॲनिमेशन स्टेजमध्ये मूलभूत पोझेस किंवा कीफ्रेम तयार करणे समाविष्ट असते. हे ॲनिमेटर्सना पात्रांच्या हालचाली आणि दृश्यांच्या प्रवाहाची जाणीव देते. खडबडीत ॲनिमेशननंतर, काम सुबक करण्यासाठी आणि ॲनिमेशनमध्ये प्रवाहीपणा सुनिश्चित करण्यासाठी वर्ण अभिव्यक्ती, पार्श्वभूमी आणि दुय्यम हालचाली यासारखे तपशील जोडले जातात.

एकदा ॲनिमेशन पूर्ण झालं की अंतिम संमिश्रामध्ये सर्व घटकांचा समावेश होतो जसे की पार्श्वभूमी.. वर्ण.. प्रभाव.. एकत्र मिश्रित.. संगीत.. ध्वनी प्रभाव आणि व्हॉइसओव्हर देखील या टप्प्यावर एकत्रित केले जातात.

ॲनिमेशनची अंतिम संपादित आवृत्ती प्रसारणासाठी तयार असते, मग ती टीव्ही, चित्रपट, इंटरनेट किंवा इतर प्लॅटफॉर्मसाठी ती पाठविली जाते.

ॲनिमेशन हा विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण करिअर संधींसह भरभराट करणारा उद्योग आहे. काही रोमांचक क्षेत्रे आहेत जिथे ॲनिमेटर्सना मागणी आहे. ॲनिमेशन स्टुडिओ ब्लॉकबस्टर चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये कथा जिवंत करण्यासाठी ॲनिमेटर्सची नियुक्ती करतात. पिक्सार, डिस्नी वर्ल्ड, ड्रिम वर्क सारख्या कंपन्या ॲनिमेटेड चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जातात.

ॲनिमेटर्स गेम डेव्हलपमेंटमध्ये, कॅरेक्टर मूव्हमेंटपासून.. इंटरएक्टिव्ह स्टोरीटेलिंगमध्ये.. महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच लक्ष वेधून घेण्यासाठी आणि ब्रँड संदेश सर्जनशीलपणे वितरीत करण्यासाठी जाहिरातींमध्ये ॲनिमेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ३० सेकंदांची जाहिरात असो किंवा दीर्घ स्वरूपाची डिजिटल मोहीम असो, ॲनिमेटर्स गर्दीच्या जाहिरातींच्या ठिकाणी ब्रँड्सना उभे राहण्यास मदत करतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सामग्री निर्मितीमध्ये मोशन ग्राफिक्स, स्पष्टीकरण व्हिडिओ आणि ॲनिमेटेड व्हिज्युअल यांचा समावेश असतो. लहान, आकर्षक ॲनिमेशनमध्ये सरस.. कुशल असलेल्या ॲनिमेटर्सना डिझाईन एजन्सी आणि सामग्री निर्मात्यांकडून खूप मागणी आहे.

ॲनिमेशन मोबाइल ॲप्स आणि वेबसाइट्सच्या विकासामध्ये, परस्परसंवादी घटक जोडण्यासाठी आणि वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका अॅनिमेटरची असते.

ॲप डेव्हलपर सुध्दा व्हिज्युअल फीडबॅक आणि आकर्षक इंटरफेस तयार करण्यासाठी ॲनिमेशन वापरतात.

ॲनिमेशन हे फक्त मनोरंजनापेक्षाही अधिक खूप काही आहे. हा एक कला प्रकार आहे. कथाकथन, शिक्षण, विपणन आणि त्यापलीकडे एक शक्तिशाली साधन आहे! ॲनिमेशनचे जग सर्जनशील अभिव्यक्तीसाठी अमर्याद आकाश आहे.. ज्यात आपण आपल्या पंखाने गरुड भरारी घेवून जगाला अचंबित करू शकतो.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोठा… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ गोठा…  ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

गाईगुर, वासरं, म्हशीरेडक, शेळ्या यांनी भरलेला गोठा हे श्रीमंतीचं लक्षण समजले जातं. ती एक संपत्तीच होय. शेतकरी माणसाच्या घरी स्वतःचे बैल असणे हे ही एक श्रीमंतीचे लक्षण होय. आता जरी ट्रँक्टर आले असले तरीही किरकोळ कामाला बैलच उपयोगी पडतात. त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा संसार, घरं उभी राहीलेली असतात. काही वेळा या शेतकऱ्यांच्या घरापेक्षा गोठाच मोठा असतो. मग त्यात पोटमाळाही असतो. खाली जनावरे आणि पोटमाळ्यावर गवत, पेंडीची पोती, तसेच धांन्याच्या कणग्या, एका बाजूला उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या शेणी अस बरच काही ठेवता येते. मग त्यात गाईच्या शेणाच्या वेगळ्या व इतर जनावरांच्या शेणाच्या वेगळ्या करून ठेवल्या जातात. गाईच्या शेणाच्या शेणी देवक्रुत्यासाठी केल्या जाणाऱ्या होम, यज्ञ, याग यासाठी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शेणींचा उपयोग करून त्यात कापूर, हळद, डिंक घालून दात घासायला वापरायची राखुंडीही तयार करण्यात येते. या शेणी सोवळ्याचा स्वयंपाक करतांना चुलीत जाळायला, बाळंतीण, बाळाला शेकशेगडीसाठी ही वापरतात.

आपल्या हिंदू धर्मात तर गाईला खूप महत्त्व आहे. तीला गोमाता म्हणतात. गाईगुरांच्या संगतीने वाढलेला आपला देव श्री क्रुष्ण तर सर्वांनाचाच आवडता देव आहे. त्याच्या मुरलीचे स्वर तर या गाईंना नेहमीच भान हरपायला लावत होते. आणि आपलेही भान या मुरलीच्या स्वरांनी हरपतेच.

लहानपणी लपाछपी खेळताना गोठा हेही एक लपण्याचे ठिकाण असे. गोठ्यात लपलेला खेळगडी लवकर सापडत नसे. तसेच बालपणी एखादा हट्ट मोठ्या माणसांनी पुरवला गेला नाही म्हणून गोठ्यात रुसून बसलेल्याच्याही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच एखादी माहेरवाशीण आपला सासरी झालेला छळ आठवून आईवडिलांच्या नकळत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याच्याही अनेक कथा आपण ऐकत असतो. कधीतरी एखादा महत्त्वाचा निर्णयही या गोठ्यातच ठरवला जातो. तर काही वेळा तिथंच प्रेमाच हितगूज किंवा महत्त्वाची गोष्ट गुपचुप एखाद्याला सांगायला ही ह्याच गोठ्यात बोलावले जाते.

खूप ठिकाणी विशेषतः कोकणात एखादा माणूस मरण पावला की त्याच्या आकऱ्याव्या, बाराव्या, तेराव्या दिवसाचा स्वयंपाकही निशिद्ध मानला जात असल्याने व खूप ठिकाणी ह्यावेळी जेवणारे ब्राह्मण मिळत नाहीत. त्यामुळे तो स्वयंपाक या गोठ्यात करून तिथेच अशी पाने वाढून नंतर ती पाने वाढल्याचे शास्र करून मग ती पाने नदीत सोडून देण्याचीही प्रथा आहे.

हल्लीच्या दिवसात तर गाईगुरं नसलेल्या रिकाम्या गोठ्यात कोरांटिईन केलेल्या माणसांची सोय केली गेल्याच्या बातम्याही ऐकू येतात. तर असा हा गोठा खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

साडी हा माझा जरा वीक पॉईंट आहे. तसा तो प्रत्येक बाईचा असतोच…पण माझा जरा वेगळा म्हणजे..इंग्रजीच्या अर्थाने weak आहे. इतकी वर्ष साड्या नेसूनही साडी या विषयावरच माझं ज्ञान अजूनही कच्चचं आहे.

साडीचा पोत बघून तिची किंमत मला कधीच सांगता येत नाही. मैत्रिणी मात्र अगदी परीक्षा घेतल्यासारखे अवघड प्रश्न विचारत असतात.

“नीता सेलमध्ये अगदी स्वस्तात ही निळी साडी घेतली..काय किंमत असेल?”

स्वस्तात म्हणजे दोनशेला घेतली असावी असं समजून मी दोनशे म्हटलं तर ती रागाने नुसती लाल झाली.

“सेल झाला तरी इतक्या कमी किमतीत मिळणार आहे का ?तू आणून दाखव बघू..तुला विचारलं हेच चुकलं..तुला साडीतलं काही म्हणजे काही कळतं नाही. तीनशेला घेतली. बाहेर हीची किंमत पाचशे आहे. ” रागाने ती बोलत होती.

आता या अनुभवावरून मी शहाणी झाले आहे. नंतर एका मैत्रिणीने साडीची किंमत विचारली.

मी लगेच विचारले,

” सातशेला घेतलीस का ग” 

विचारणारीची कळी खुलली. 

ती म्हणाली,

“अग फक्त चारशेला घेतली. तू ही सातशेला घेशील. तुला कोणीही हातोहात फसवेल. तुला साडीतलं ओ का ठो कळत नाही. “

“हो ग काय करू ग..खरचं मला अजूनही लक्षात येत नाही…” मी म्हणाले..

साडीतले लाल, पिवळा, निळा जांभळा, हिरवा हे ठळक रंग मला कळतात. त्या रंगाचे जे उपरंग असतात ते आले की माझा घोटाळा सुरू होतो….

एके दिवशी काॅटनची पिवळी साडी आवडली म्हणून मी ती दुकानातून घेऊन आले. जरा वेळाने सुधाचा फोन आला म्हणून तिला सहज.. साडी घेतली…असे सांगितले.

तिने विचारले,

“पिवळा म्हणजे कुठला पिवळा रंग?”

मला काही अर्थबोध होईना. म्हणून म्हटले,

“अग पिवळा आहे एवढं खरं”

” अग पण..म्हणजे गोल्डन येलो, हळदी का सनफ्लॉवर यलो ?”

समोर साडी असुनही मला काही सांगता येईना…

तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न तयार होता….

” मग ब्राऊनिश येलो आहे का?”

साडीकडे निरखून पाहिल्यावर लक्षात आले तो तसाही नव्हता….म्हणून तिला म्हटलं,

” तू प्रत्यक्ष येऊन पहा ग..मला काही समजत नाहीये. “

असं म्हणून मी फोन ठेवून दिला. आणि हुश्श केलं…

दोन दिवसांनी सुधा घरी आली होती. तिनी साडी पाहिली आणि म्हणाली,

“अगं एवढं कसं कळत नाही तुला हा ब्राईट यलो आहे..”

झालं म्हणजे तिसराच रंग होता साडीचा….

मला आवडलेली पटोला मी अठराशेला घेऊन आले. किंमत सांगितल्यावर माझी मैत्रीण किंचाळलीच…

” अगं तुला पटोला घ्यायची होती तर मला सांगायचं नाहीस का ? सेल होता तेव्हा घेतली असतीस..ईतकी घाई का केलीस? बघ आता किती महाग पडली…”

बापरे सुमारे दहा मिनिटें ती मला बोलत होती.

बर एकदा बोलून बाईनी गप्प बसावं की नाही ? 

परत एकदा एका कार्यक्रमात मी ती साडी नेसलेली दिसली की तिचं सुरू झालं….तिनी सगळ्यांना मी किती महागात साडी घेतली याच साग्रसंगीत वर्णन करून सांगितलं.

बाकीच्या बायका अगदी आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होत्या. तीला साथ देत होत्या…त्यातील एकीने पटोला चौदाशेला दुसरीनी बाराशेला आणि तिसरीने तर हजारलाच घेतलेली होती…

मला तर वाटतं बायका जास्ती असत्या तर पाचशेलाही पटोला घेणारी कदाचित त्या दिवशी मला भेटली असती….

हिरवी साडी घेऊन आले तेव्हा तर फारच गंमत झाली….

मैत्रिणीला कौतुकांनी ती दाखवली ती म्हणाली,

“अग नीता हा हिरवा रंग नाहीये..हा तर रामा कलर आहे. ” 

खरं सांगते तेव्हा रामा हा रंग आहे हे मला कळले. नंतर तिने मला बराच वेळ समजवून सांगितले तरी हिरवा रंग “रामा ” कधी होतो हे मला कळलेच नाही. शेवटी बिचारीने…हरे रामा…

म्हणून कपाळाला हात लावला.

नंतर घरी आलेल्या मैत्रिणीला कौतुकानी मी सांगितले,

” बघ मी नवीन रामा कलरची साडी घेतली. ” तर तिने विचारलं,

” तू यातला मजिंठा कलर का नाही घेतलास? तो खूप छान दिसतो. “

मला अजिंठ्याची लेणी माहीत होती. हे मजिंठा मी प्रथमच ऐकत होते….तरी अज्ञान ऊघडं पडू नये म्हणून मी म्हटलं,

” अगं त्यांच्याकडे मजिंठा कलरच नव्हता..”

” लाजरीकडून घेतलीस ना ?त्यांनी यातल्या मजिंठा कलरच्या साड्या शोकेस ला लावल्या आहेत “

यावर मात्र मी गप्प बसले.

असे फजितीच प्रसंग माझ्यावर वरचे वर येत असतात…

दुकानातली जी साडी आवडेल ती मी घेऊन येते. देताना दुकानदार त्या साडीचं नाव सांगतो. पण घरी येईपर्यंत मी ते विसरून जाते. मग मैत्रिणींनी विचारले, कुठली साडी आणलीस ?की उत्तर देता येत नाही. त्या दिवशी मात्र मी नांव पक्के लक्षात ठेवले होते. मैत्रिणीला उत्साहाने सांगितले,

” मणिपूर सिल्क घेतली”

तिने साडी हातात घेतली आणि म्हणाली,

“अग ही मणिपूर नाही काही….ही तर ढाका सिल्क आहे. “

” पण दुकानदारांनी ही मणिपूर म्हणून सांगितलं “

” अग त्याला काय कळतंय मी सांगते ना..ही ढाका सिल्कच….”ती ठामपणे म्हणाली.

बघा…म्हणजे दुकानदारांपेक्षा माझ्या मैत्रिणीचं ज्ञान जास्ती आहे.

साड्या बघताक्षणीच फटाफट त्यांची नांवे सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणींच्या अफाट ज्ञानाचे मला फार कौतुक वाटते.

मी बेळगाव सिल्क घेतली तेव्हा फार गंमत झाली. शेजारच्या काकूंकडे त्याच वेळेस त्यांच्या कानडी वहिनी आल्या होत्या. काकूंना बेळगाव सिल्क दाखवायला गेले. त्यांच्या वहिनी जवळच बसल्या होत्या. साडी हातात घेऊन त्या म्हणाल्या,

“अहो हे बेळगाव सिल्क नव्हे हो..आमचं बेळगाव सिल्क कसं घट्ट असतंय..हे कसले हो पातळं..हे बेळगाव नाहीच बघा “

“वहिनी इथे हेच बेळगाव सिल्क म्हणून विकतात. “

यावर काकू म्हणाल्या,

” तुमच्या पुण्यातले लोक लबाडं बघा..कशालाही काहीही म्हणतात..आणि तुमच्या गळी मारतात फसवतात..”

” वहिनी पुण्यात यालाच बेळगाव सिल्क म्हणतात…” काकूंनी बोलायचं प्रयत्न केला… पण वहिनी ऐकून घेईनात…

” लोक काही म्हणत हो..हे बेळगाव सिल्क नव्हे बघा…माझं आणलं नाही..नाहीतर इथेच फरक दाखवला असता…”

काकू त्यांना परत पटवायला लागल्या पण वहिनी पण ठाम होत्या…

आता हा ” बेळगाव “प्रश्न असल्याने हा लवकर सुटायचे चिन्ह दिसेना तेव्हा मी माझी बेळगाव सिल्क घेऊन तिथून हळूच निघून आले.

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते.

एका साडीचे नाव आहे वल्कलम्.

हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी..साडी…वल्कलं असं मी मनात ठेवलेल आहे.

खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे.

मला हलकी भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो. त्या दिवशी ची साडी बघून मैत्रीण म्हणाली,

” नीता साडी दिसायला छान आहे…पण टिकेल असं वाटत नाही. “

इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मग तीच तिला सांगितली म्हटलं….

” अगं संत सज्जनांनी सांगून ठेवलेले आहे हा देह नश्वर आहे…मग तिथे त्यावरच्या साडीची काय कथा? टिकेलं तेवढे दिवसं आनंदानी वापरायची..

हा देह आहे तोपर्यंत आला दिवस मजेत घालवायचा मग पुढचे पुढे बघू….”

काय खरं की नाही?..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सीमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या आणि दहा बिसलरी बाटल्या घेऊन चढत होती.

थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातून छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तिने आवाज दिला “ दादा सरबत, पाणी, ताक घ्या की…” मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं “ बाळा कुठची राहणार. ” पाली गावचं नाव सांगितलं. ‘ शाळेत जातेस का? ‘ २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले.

खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.

गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला…..

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय..

लेखक व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे

माजी सैनिक, खोडद,  ८३९०००८३७०

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

लॅपटॉप आहे तो आई..! एवढ्या जोरात बटनं दाबायची गरज नाहीए त्याला….

ठक काय आई? किती वर्ष झाली माॅलला येतेस! तरी काय त्या एस्कलेटरजवळ घुटमळतेस….?

नेट बॅंकिग करत जा ग. किती सेफ आहे आई…

स्मार्टफोन फक्त फेसबुक आणि व्हॉटस अॅप साठीच बनलाय असं वाटतं का तुला..?

अशी वाक्ये फक्त माझ्याच घरात ऐकू येतात, असं नाही, तर सगळ्यांच्याच घरात ऐकू येतात…कारण हल्लीची मुलं टेक्नोस्मार्ट आहेत आणि आपण टेक्नो ढं.

पण डरने का नहीं. Cool रहनेका.

……आणि यांना तर एवढंच येतं, मला तर काय काय येतं! अख्खं घर चालवते मी !

अशी स्वतःचीच समजूत काढायची……

मुलांची काही काही मतं ऐकली की खूप मज्जा येते…..कधी त्यांचे फोटो काढले की लगेच म्हणणार….cool हां आई..टाकू नको लगेच फेसबूकवर किंवा लावू नको स्टेटसला…का रे…?असा प्रश्न आपण विचारला की उत्तर ठरलेलं असतं..Be cool, आई….आपले फोटो आपल्या साठीच असतात…..दुसर्‍यांसाठी नाही..

परवा एक ओळखीच्यांचं लग्न होतं

भरपूर मंडळी नाचून आनंद घेत होती..म्हणून मुलालाही म्हटलं, नाचला का नाही तू?..नाचायचं थोडं…तर म्हणाला, Be cool आई….लग्न करताना एवढं नाचण्यासारखं काय आहे…त्याचं लग्न होतंय….मी का एवढं नाचू…..?

आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला लहानच वाटतात….

मुलगी परीक्षेला निघाली तेव्हा हे घेतलं का, ते घेतलं का…? असं विचारताना मला आलेलं टेन्शन बघून तीच मला म्हणाली….Coooooool आई….सगळं घेतलंय…….

गाडी चालवताना पण तेच होतं..

मी शक्यतो मुलांच्या मागे बसत नाही..त्यामुळे कुठे जाताना मुलगा मागे असेल तर म्हणतो….आजच पोचायचंय ना आपल्याला…..? नाही, सायकलवाले पण ओव्हरटेक करुन चाललेत म्हणून म्हटलं…..

हाॅटेलमध्ये गेलं की अन्न गरमागरम असावं, असं सगळ्यांना वाटतं..त्यासाठी त्या वेटरची जास्त ये-जा व्हायला लागली की मी म्हणते जाऊ दे रे. नको बोलावूस आता…हे ऐकलं की मुलं नक्की म्हणतात chill, आई. आपण थंड खाण्यासाठी एवढे पैसे भरणार का..?

आणि तो तुला दहा पैसेतरी सोडणार आहे का..?

फेसबुकवर फ्रेंडशिपबद्दलच्या खुप सार्‍या पोस्ट फिरत असतात. ते वाचून अशा फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, असं सांगितलं की मुलं म्हणतात, Cool आई! सगळेच काही आतंकवादी नसतात…

मुलगी तर कुठेही जाणार असेल, तर मी नेहमी सांगते कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको..कुणी काही दिलं तर खाऊ नको….या सगळ्या सूचना तिला आता पाठ झाल्यात. त्यामुळे मी सांगायच्या आधीच ती म्हणते…हो..कळलं…Chill, आई! कुण्ण्णाशी नाही बोलणार….काही नाही खाणार..

एकंदर असं आहे..हल्लीची मुलं खुप clear आणि smart आहेत आणि आपली पिढी खूप मायाळू आणि सर्वांना सामावून घेणारी…

आणि या दोन्हीचा समन्वय साधून अजूनतरी दोन्ही पिढ्या मस्त मजेत चालत आहेत….चालत रहातीलच…

आपण फक्त एकच मंत्र जपायचा…

Be Cool, आई….

लेखिका: श्रीमती योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रागावलेले प्राणी ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ 🐱 रागावलेले प्राणी 🐜 ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज एक मुंगीची इमेज बघितली आपल्या गुगल बाबांची कृपा! आणि ती इमेज बघून एकदम घाबरलेच. आपली साधी घरात वावरणारी वेळेला आपल्या कपड्यांवर,अंगावर फिरणारी हीच ती मुंगी का? असा प्रश्न पडावा आणि भीती वाटावी असा तिचा चेहरा दिसत होता. एक विचार असा आला की देव मुंगी ( आपली गुदगुल्या करणारी काळी मुंगी ) आपल्याला चावत नाही. आपणच बरेचदा तिला त्रास देतो. म्हणूनच या लाल मुंग्यांना राग येत असावा आणि स्वत:ला मिळणारी वागणूक आणि काळ्या मुंगीला मिळणारी वागणूक हे दोन्ही मिळून ती एवढी रागीट चेहेऱ्याने आपल्याला कडकडून चावत असावी. 🐜

असेच सकाळी सकाळी म्हणजे साखर झोपेत असताना कोंबडा इतका कर्कश्श का ओरडत असावा? आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा तर घड्याळाच्या दर तासाला नियमित पडणाऱ्या ठोक्या प्रमाणे दर तासाला आरवतो. बहुतेक दिवसभर त्याला माणसांच्या आवाजाचा जो त्रास होतो त्याचे उट्टे काढत असावा. 🐔

तीच गोष्ट कुत्र्यांची. कितीही लक्ष ठेवा आपला डोळा चुकवून आपण कंबर मोडून स्वच्छ  केलेल्या दरवाजावर व त्या समोरील स्वच्छतेवर घाण करून जाणार. अनेक उपाय केले पण कुत्र्यांना आमच्या घरा समोरची जागा फारच आवडली होती. जणू मला चिडवायचे ठरवूनच टाकले होते. मग मी गुगल साहेबांची मदत घेऊन उपाय शोधले आणि उग्र वासाच्या फिनाईलची मदत घेतली. त्याचा कुत्र्यांना एवढा राग आला की त्यांनी रात्रभर निरनिराळ्या आवाजात ( प्रत्येक कुत्र्याचा आवाज वेगळाच असतो म्हणा ) ओरडून माझ्या झोपेवर घाला घातला. असेही वाचनात आले होते की, लाल व निळ्या रंगाचे पाणी भरून बाटलीत ठेवले तर कुत्री, मांजरे यांचा त्रास होत नाही. मग मी पण तो उपाय केला. पण बाटल्या गायब होऊ लागल्या. शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी त्यातील एक बाटली चक्क कुत्र्याच्याच तोंडात बघितली. आणि या रंगीत पाण्याच्या बाटल्या कोण पळवत आहे याचे उत्तर मिळाले.🐶

आमच्या काकांच्या घरी एक लाडाची मांजर होती. कोणी आणले नव्हते. तीच आपणहून आली होती. आणि बळेच सगळ्यांच्या पायात येऊन लाड करून घ्यायची. आम्ही कॅरम खेळायला बसल्यावर तिला खूप राग यायचा. ती त्या बोर्ड वर बराच वेळ बसायची. सोंगट्यांचे बराच वेळ निरीक्षण करायची आणि रागाने आपण स्वतःच सर्व सोंगट्या बिळात पंजाने ढकलून द्यायची. ती इतकी शहाणी होती की एखादा पदार्थ आवडला नाही तर पळून जायची. आणि जबरदस्तीने दिला तर जीभ बाहेर काढून उलटी आल्या सारखे करायची आणि तो पदार्थ देणाऱ्याला पंजाचा प्रसाद द्यायची. 🐱

अशीच एकदा आपण जिला गरीब समजतो अशा शेळीची गंमत कसली, रागच बघितला होता. एका शेळीला एक व्रात्य मुलगा शेपटीला हात लावून,ओढून सारखा त्रास देत होता. चार पाच वेळा ती पुढे पळाली. नंतर मात्र ती त्या मुलाकडे वळली आणि त्याला आपल्या छोट्या शिंगाने मारले. जणू तिने अन्यायाचा प्रतिकार करा हीच शिकवण दिली. 🦙

अशा काही थोड्या गमती,काही राग सहज ओरडणाऱ्या कोंबड्या मुळे आठवले. तशा प्राण्यांच्या बऱ्याच आठवणी,अनुभव व गमती जमती आहेत. त्या पुन्हा केव्हातरी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…’ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…‘ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

ओरडणारी, किंचाळणारी आई…

(‘घरोघरी मातीच्याच चुली’ की हो !)

बाईपण दे गा देवा. ओ के आहे. पण आईपणाचा बोजा नको रे बाप्पा! ऐसे कैसे चलेगा! मान्य आहे, सोपं नाही आहे ते. पण घेतला वसा तर निभावायलाच हवा ना. आनंदाने, सुख, समाधानाने संसार तर करायलाच हवा.

१. आईचे ताणतणाव

आईचे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. आई जर वारंवार ओरडणारी, किंचाळणारी असेल तर मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२. मुलांमध्ये तणाव आणि चिंता

मुलांना आईकडून हवे असते प्रेम आणि सुरक्षितता. लहान सहान चुकांवर ओरडणारी आई मुलांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकते.

३. आत्म-संयम, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये:

आईच्या ओरडण्यामुळे मुलं घाबरु शकतात. भेदरू शकतात. स्तब्ध, होऊ शकतात. कॉम्प्युटर हँग होतो तशी. वर्तणुकीत समस्या निर्माण होतात. आईच्या ओरडण्याला उत्तर म्हणून मुलं उलट उत्तर, आक्रमकता, विरोध किंवा विद्रोह करू शकतात. हे साद प्रतिसादाचे प्रकरण आहे. त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या सामाजिक कौशल्यांना बाधा पोचवू शकते. आईने संयम बाळगून वर्तणूक केली तर मुलेही संयम बाळगून वर्तणूक करायला शिकतील.

४. भावनिक विकास:

आईच्या ओरडण्यामुळे मुलांच्या भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडू शकतात. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी होऊ शकते. त्यांना आपल्या भावना दडपून ठेवायला शिकायला लागतं. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५. आत्मसन्मान:

वारंवार ओरडण्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. त्यांनी स्वतःबद्दल निगेटिव्ह भावना बाळगायला सुरुवात केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो. “तू तर बॅड बॉयच आहे” हे त्याला वारंवार सांगून पटवून देण्याने काय साधणार? मुलांचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नसेल तर शैक्षणिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

६. आईचे मानसशास्त्र:

आईचे वर्तनही तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. ताण, चिंता, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक समस्यांमुळे आईचा मूड बिघडू शकतो. आईनी स्वतःची मानसिकता सुधारली तर मुलांचे वर्तणूक सुधारते. मन पावन, पवित्र वातावरणात ठेवा. प्रसन्नतेने मिळवा, परम सुखाचा मेवा. बघायला गेलं तर, यादी मोठी समस्यांची. आवाक्याबाहेरची काळजी कशाला उद्याची. आईचे ताणतणाव पोखरती, तिच्या स्वतःच्या, व मुलाच्या मनाला आणि शरीराला. मनात नकोच जागा, त्यांच्यासाठी उरायला. आईने कायम चिंताग्रस्त राहून, काय साधणार. सशक्त मन, कधीच नाही कोलमडणार.

७. संवाद आणि सामंजस्य:

आई-मुलांमधील संवाद आणि सामंजस्य वाढवणे हे महत्वपूर्ण आहे. आईने आपल्या मुलांशी प्रेमळ, आदराने आणि सहनशीलतेने वागायला शिकायला हवं. जर मुलं चुका करतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कणभर चुकीला मणभर रागवायला नको. जुन्या चुका आठवून, आठवून रागवायला नको. केल्या चुकीला लगेच रागवायला तर हवेच. पण ते एक दोन वाक्यात असावे. पानभर रागवायला नको.

८. सकारात्मक पालनपोषण:

पॉजिटिव्ह पॅरेंटिंग हवे. प्रेम, आदर, आणि सहनशीलता हवी. मुलांना शिस्त लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. मुलं आत्मविश्वासाने, स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनू शकतात.

निष्कर्ष:

ओरडणारी, किंचाळणारी आई मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. आईने सकारात्मक पद्धतीने मुलांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. त्यानी मुलं सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर बनतील. आईने आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे तिच्या वर्तनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कंट्रोल मॅडम, कंट्रोल.

लेखक : विद्यावाचस्पती डॉ. अनिल मोकाशी

बाल कल्याण केंद्र, मतीमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा. जामदार रोड, काराभारीनगर, कसबा, बारामती, ४१३१०२,

९८२२३०२१३१ —- dranilmokashi@gmail. com

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares