मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.

बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स

शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.

अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.

लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !

तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..

असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.

आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संध्याकाळ… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ संध्याकाळ ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

मी फिरत फिरत समुद्र किना-यावर गेले तांबूस पिवळा मावळता सूर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या जमेल तेवढी पुढे गेली, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छान पैकी उसळून अंगावर येत होते त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. हलकेच पण बोचरा होऊ लागलेला सांजवारा.. पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते पण असं का वाटत होतं मला की आज सूर्य अस्ताला जायला उशिर करतोय… ?

आज संध्याकाळ जरा जास्तच रेंगाळली.. तिलाही कळलं मला तुझी आठवण आली.. ! स्वाभाविकच आहे म्हणा. अश्या रम्य वेळी त्याची आठवण येणारच की.. निसर्गच तो आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्रं खरं.. समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दूरवरून येणारा मातीचा सुगंध येऊ लागला कि आपसूकचं आठवणी जिवंत होऊ लागतात. पावसासोबत आमचं खूप प्रेमळ नातं आहे किंबहुना प्रत्येकाच तसं असतचं नाही का ? मग

ढगांनी केली सरींची पाठवण मग तो आला तर एकटा कसा येईल? त्याला सुद्धा आठवण करून देईल… ! आली असेल का त्याला माझी माझी आठवण ?

पाऊस पडायला लागला की सारं कसं मस्त, प्लेझंट, वेगळच हव हवंस वाटायला लागतं. पावसानं यावं, धुवांधार बरसावं आणि हो अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व त्यानं स्वतःची विसरून यावी.. ! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत मला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं… जसं.. धरणीच्या ओढीनं सरी येतात नी बरसतात.. केव्हा तरी परिस्थिती गडबड करते त्याच नसणं जास्त बोचरं भासतं.. एकटेपणाचं वाटतं मग माझ मन कशातच रमत नाही… उगीचच छातीत धडधडायला लागतं पण चेह-यावर ते न दाखवता काम करत रहायचं.. पण मनाचं काय ? ते तर केव्हाच ट्रांन्समध्ये गेलेलं असतं आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं असतं…. दोन्हीकडे तिचं परीस्थिती कुणी कुणाला समजावयच ? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं… कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं..

चिंब पावसात आठवणींच्यात भिजायचं..

सवय लागते मग एकमेकांसाठी झुरण्याची.. !

पाऊस दरवर्षी येतच राहतो ॠतूचक्रा सोबत जीवनचक्र पण चालत रहातं आता एक छोटी छत्री सोबत आलेली असते मग पावसाची परीभाषा थोडीशी बदलते बोबडी होऊ लागते… पाऊस येतच राहतो… येतच राहतो 

मग येते अशीच एक सांज संध्याकाळ आयुष्याची… पुन्हा नवा भूतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसून आठवणींचे झोके घेत रहातो डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन सुकत जात असतात… आपोआप डुलकी लागते. शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने.. मग सारी मरगळ दूर होते व त्या सोबतच परत एक संध्याकाळ स्मरू लागते आणि ती संध्याकाळ मनात रेंगाळत राहते..

 ©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – २९  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे. ” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ” मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना?” 

पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ” अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय. ”

बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया. ” असं त्या म्हणाल्या.

बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं. ”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, ” इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ” परंतु “अविनाश मुळे” हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब.. ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले.. ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई! म्हणजे प्रश्नच मिटला. ”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का? 

अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ” काय पप्पा?” हा प्रश्न होता.

“ बाबी! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल. ”

त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “ पप्पा तुम्ही हे सांगताय? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ” बाबी! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. ”

संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं? काय अर्थ लावायचा? 

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे( मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही. टी. पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनस) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब! या इकडे, इथे बसा. ” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.

“हं! बोला महाशय काय हुकूम?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.

“ अहो! हुकूम कसला? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात. ”

मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे(बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.

“ काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता. ?”

“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित. ”

“ म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण?”

पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत?

“ ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू. ?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव “या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस, महिने, वर्षं उलटत होती. आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते. पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका णझाला. कारण

श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.

“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ”

अथवा 

“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.

पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले,

 हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल?

जाउदे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं!

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं.. !!!

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात !!!

१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात.

🌹

२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

🌹

३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर ! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार… ? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील.

🌹

 ४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या सिंध्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो. ” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया… , आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

🌹

५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही.. !!!

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची ! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका… !!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते ! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल.

🌹

६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसिल, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो.

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो ? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो.

🌹

७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकियाट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.

ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.

आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे.

🌹

एक अभंग आहे…. ;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”

नीट वाचलं की समजतं;

आम्ही “बी घडलो, “

तुम्ही “बी घडाना….

🌹

माहिती संग्राहक : अज्ञात  

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

शिव्या दिल्यातर समोरचा क्रोधित होतो हे उदाहरण शिक्षित वा अशिक्षित सर्वांना पटण्यासारखे आहे.

मंत्र प्रभावा विषयी हा लेख वाचून एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. 

केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई …..  एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध –  हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.

‘रानगोष्टी’  या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा उत्तम महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री. अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’  ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.

हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवानिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?

एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? हा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठित गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात. हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहीत नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !

भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावं.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.

भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे, हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला’  वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.

विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील ! खरंच मंत्रात शक्ती असते का ?   अलीकडेच  व्हाॅट्सॲपवर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’

प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना)  लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.

दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’  अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.

अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.

लेखिका: श्रीमती  रश्मी साठे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

शब्द☆ सौ शालिनी जोशी

आज काहीतरी लिहिण्याची हुक्की आली. पेन व कागद घेऊन बसले. पण काय लिहावे? विषय कोणता असावा? निसर्गावर लिहावे का अध्यात्मावर लिहावे? मन एकच पण त्याचेही एकमत होत नव्हते. आपण लिहितो ते शब्दात. शब्द तयार होतात अक्षरातून. अक्षरे म्हणजे स्वर आणि व्यंजने. त्यालाच वर्णमाला म्हणतात. प्रत्येक भाषेत त्याची संख्या वेगळी मराठीत 52 तर इंग्रजीत 26. हे वर्ण कशातून तर ओंकारातून असे सांगितले जाते. ओंकार म्हणजे तीन मात्रा (अ, उ, म )आणि अर्ध मात्रा म्हणजे वरचा चंद्राकार. यातून सर्व वर्णमाला. पण ओंकार तरी कुठून आला? तर हा परब्रह्मवाचक शब्द. त्या निर्गुण निराकाराचे व्यक्त रूप. म्हणून त्याला परब्रम्हची सही म्हटले जाते. आपलीही सर्व कामे सहीनेच होतात. म्हणजे शब्दाचे मूळ त्या परब्रम्हाचे ठिकाणी. तोच शब्दाचा अर्थ. आपण मात्र त्याला वेगवेगळ्या अर्थ देतो.

येथे एक गोष्ट आठवली. एक छोटी मुलगी होती, पाच सहा वर्षांची असेल. रोज नित्य नेमाने देवळात जाऊन देवापुढे उभी राहत असे. हात जोडून डोळे मिटून काहीतरी हळू आवाजात तुटपुटत असे. पुजार्याला उत्सुकता होती, ही रोज काय म्हणत असेल? देवाकडे काय मागत असेल? म्हणून त्याने त्या मुलीला सहज प्रश्न विचारला’ बाळ तू देवाकडे रोज काय मागतेस?काय म्हणतेस?’ तिचे उत्तर आपणा सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे.

ती म्हणाली, ‘मला स्तोत्र, मंत्र म्हणजे काय कळत नाही. मला काही येत नाही. म्हणून मला येणारी सर्व अक्षरे अ आ इ ई….. आणि क ख ग…. मी रोज देवापुढे शांतपणे म्हणते. आणि देवाला सांगते यातून तू तुला पाहिजे तो आवडेल तो मंत्र किंवा स्तोत्र तयार करून घे. ‘आणि देव माझ्याकडे पाहून हसतो. मला आनंद होतो. गोष्ट छोटीशीच पण केवढे तत्त्वज्ञान सांगून गेली.

पूजेची तयारी नाही, देवाला आवडती फुले नाहीत, आरती येत नाही म्हणून आपण पूजा करायचे टाळतो. पण देवाला कशाचीच गरज नाही. तोच सर्व निर्माण करणारा, त्याचे त्याला देऊन आपण काय साधतो? तेव्हा त्याची पूजा म्हणजे आपला भाव आपला अहंकार त्याला अर्पण करणे. त्यासाठी शब्दांची गरज नाही. मी पेन खाली ठेवले.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.

तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.

फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.

तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “

त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.

कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.

मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.

पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.

घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.

नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.

पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.

तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.

पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.

त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे

“I Love You” हे तीन शब्द कुणी कुणालाही सहजपणाने म्हणता येऊ नयेत इतके वाईट आहेत का?

आपण आजच्या काळात जाता येता सर्रास शिव्या ऐकतो… त्याही आपल्याला सहजच वाटतात, पण कुणी ‘I love you’ हे सहजपणाने जरी बोलून गेलं तरी येणार्‍याजाणार्‍याच्या भुवया उंचावतात. अशिक्षित आणि सुशिक्षीत सगळीच माणसे याबाबतीत सारखीच.

तुमचं एखाद्यावर/एखादीवर प्रेम आहे, एखादा/एखादी तुम्हाला आवडते… हे त्याला/तिला सांगणं कसं चुकीचं आहे; हेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवल जातं. आणि मग हीच मुलं मोठी झाल्यावर खर्‍या प्रेमातही… ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे साधंसं वाक्यही बोलायला कचरतात… बोलू शकत नाहीत… बहुधा घाबरतातच… कारण काही काही गोष्टी शिकवतांनाही त्या चुकीच्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत, असं मला बर्‍याचदा वाटतं.

अगदी ‘नमस्कार’ म्हणतो ना आपण ओळखणार्‍या प्रत्येकाला तेवढ्या सहजतेने… अगदी तस्सचं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे म्हणता यायला हवं. कारण प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष संबंधातच असतं असं नाही; तर कोणत्याही दोन माणसात (gay and lesbian too) ते होऊ शकतं. असे घडले तरच आपण प्रेमाला सरकारात्मकतेने घेऊ शकू, आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चा चुकीचा अर्थ काढणे बंद करू. मग जसे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आपण निमित्त शोधत असतो तसाच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सुद्धा आपल्याच संस्कृतीतील सण निमित्त म्हणून आहे असे समजता येईल. असे झाले तर प्रेम व्यक्त करायला एका दिवसाची गरज काय, असा उथळ प्रश्न विचारणे बंद होईल.

म्हणून मला वाटतं I love you म्हणणं हे इतकं सहजपणाने असायला हवं की, आपल्याला आवडणार्‍या कुणाही माणसाला ते न घाबरता म्हणता यायला हवं… जितक्या सहजपणे आपण आपला अहम दुखावल्यावर द्वेष करू लागतो. पण आजची परिस्थिती पाहता भारतात द्वेष करणे सोपे आणि प्रेम करणे तेवढेच कठीण! कारण प्रेमासाठी लागते मोकळे मन! ते किती लोकांकडे आहे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्हॅलेंटाईन डे…” – लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर ☆

श्री हेमन्त बावनकर 

? इंद्रधनुष्य ?

 “व्हॅलेंटाईन डे…– लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर

“ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.“

काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा ?

… आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? 

व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून  व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार ! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली. 

रोमच्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६. 

तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात. 

दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे  म्हणता येईल. 

आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही. 

सगळ्या  सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गाकरता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं. 

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार ! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत.  भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा  करतो. 

असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give. 

… कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण —  

True love knows no reason 

आणि  

Love has no boundaries. 

सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे. 

पूर्वी सगळे नोकरदार  एक तारखेला खुश असायचे – 

“खुश है जमाना, आज पहिली तारीख है”.  

… आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला पण खुश असतात – 

“ खुश है जमाना, आज  व्हॅलेंटाईन डे है”. 

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : श्री सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100 इमेल <[email protected]>

प्रस्तुती : श्री हेमन्त बावनकर 

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्रीकृष्णासाठी विष पिणाऱ्या मीराबाई सर्वांना माहीत आहे पण रामरायासाठी विष पिणाऱ्या संत वेण्णाबाई माहित आहे का?

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेण्णाबाईंनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केशसंभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवेसाठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नामस्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगा वेगळी शिष्या 🙏

जय जय रघुवीर समर्थ🙏

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares