मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमई महालिंगा नाईक ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अमई महालिंगा नाईक ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

खरे तर पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि ’अमई महालिंगा नाईक’ या नावाची शोधमोहीम सुरू झाली. मुळात हे नाव आतापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जास्त लेखन नाही आणि गूगलवर माहितीसुद्धा उपलब्ध नव्हती, हेच विद्यमान केंद्र सरकारचे वेगळेपण आवडून गेले आणि याबाबत कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे. २०१४ पासून झालेला हा बदल अभिनंदनीय आहे.

कर्नाटकमधील आडनदी काठापासून जवळच एक छोटे खेडेगाव केपू. गावातील एका श्रीमंत शेतकर्‍याकडे एक शेतमजूर काम करायचा. त्यांच्या नारळ आणि सुपारीच्या बागेत हे गृहस्थ मजूर म्हणून इमानदारीने काबाडकष्ट करत होते. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी त्या शेतमजुराला आपल्या डोंगरावरील पडीक पडलेला शेताचा तुकडा बक्षीस म्हणून दिला. पण त्या माळरानावर पाण्याचा मोठा प्रश्न होता. तरीही यांच्यासारख्या अवलियाने तिथे सुपारीची बाग लावण्याचे स्वप्न बघितले आणि तिथूनच संघर्षाचा प्रवास सुरू झाला. बघितलेले स्वप्न सत्यात उतरवणे तसे कठीण आहे. पण अमई महालिंगा नाईक हे नाव आज ‘टनेल मॅन’ म्हणून जगप्रसिद्ध झाले आहे, कारण त्यांनी जे स्वप्न बघितले, ते सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.साधारण 1978 सालातील ही घटना आहे. अमई महालिंगा नाईक यांना शेताचा तुकडा मिळाला होता, पण शेतात आणि त्या माळरानावर पाण्याचा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा होता. आपल्यापैकी एखादा त्यांच्या जागी असता, तर हा शेतीचा नाद कधीच सोडून दिला असता. पण म्हणतात ना.. ’कोशिश करने वालों की कभी हार नही होतीं’ याप्रमाणे त्यांनी हार न मानता काम चालू ठेवले. त्यांनी त्या माळरानावर राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली. तेथील जमीन सपाट करून घेतली. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्यांनी पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. हे सगळे होत असतानाच मालकाच्या शेतातील काम सुरूच होते. दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचे आणि काम संपले की चर खोदण्याचे काम करणे हे त्यांचे रोजच्या परिपाठाप्रमाणे सुरू होते. हे काम रोज रात्री 9 वाजेपर्यंत चालायचे. अमई महालिंगा नाईक माळरानावर जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे. असे करत करत त्यांनी पहिला बोगदा 20 मीटरपर्यंत खोदल्यानंतर तो कोसळला. तब्बल 2 वर्षे खोदण्याचे काम करूनही त्यांच्या हाताला काहीच मिळाले नाही. त्यानंतर सलग सहा वर्षांत असे ४  बोगदे कोसळल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. मग त्यांच्या नंतरच्या बोगद्याने त्यांच्यापुढे हार मानली आणि तब्बल 30 फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परंतु ते पाणी शेतापर्यंत आणण्याचे आव्हान होतेच. मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाइपसारखा वापर करून बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणले आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.सुमारे आठ वर्षांतील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले होते. या आठ वर्षांत त्यांना अनेक लोकांनी नावे ठेवली, पण त्यांनी या बोलण्याकडे लक्ष न देता आपले काम केले आणि यामुळे त्यांच्या ओसाड माळरानावर सोने पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात सुपारीची, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेले पाणी शेतासाठी पुरत होते. हेच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोने पिकवून दाखवणारे शेतकरी म्हणजेच आजचे पद्मश्री अलंकृत अमई महालिंगा नाईक. याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज 300 पेक्षा जास्त सुपारीची,

 ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, 200 केळीची आणि काही मिरचीची झाडे आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय, म्हणून ’टनेल मॅन म्हणून जगभर त्यांची ओळख निर्माण झालीय. अमई महालिंगा नाईक यांनी जिद्दीने शेतकर्‍यांसमोर आपल्या कामातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचे वय ७२ वर्षे इतके आहे. आजही अमई महालिंगा नाईक स्वत: शेतातली सगळी कामे करतात आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात, हे विशेष आहे.

 राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमधील पुरस्कार सोहळ्यात त्यांना नुकताच कृषी क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात, हे त्यांनी साध्य करून दाखवले आहे. आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणार्‍या शेतकर्‍यांसाठी ’अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. कृषिप्रधान असणारा आपला देश अमई महालिंगा नाईक यांच्यासारख्या कष्ट करणार्‍या लोकांमुळे अधिक श्रीमंत होतो आहे. पद्मश्री ’अमई महालिंगा नाईक’ यांच्या कार्याला सलाम आहे. यावेळी कवी बा.भ. बोरकर यांच्या ’लावण्य रेखा’ या कवितेतील ओळी स्मरणात येत आहेत….. 

 देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।

 मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे।।

संग्रहिका : सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पैशाने खरेदी करता येत नाहीत… अशा गोष्टी ज्याच्याकडे जास्त, तो खरा श्रीमंत ! 

ज्याच्या घरात अजूनही वृद्ध आई बाबा राहतात तो खरा श्रीमंत…. ! 

निसर्गाने आणि समाजाने, याचना करणाऱ्या लोकांसाठी काम करण्यासाठी माझी निवड केली…. आणि त्यामुळे या कामात मला किमान दोन-तीनशे आई, दोन तीनशे बाबा, दोन तीनशे आजोबा, दोन तीनशे आज्या मिळाल्या आणि या वयात मला शे दोनशे पोरंही झाली…. !

मग मीही श्रीमंतच की  ! 

उन्हात बसलो असताना आजीने डोक्यावर धरलेला पदर,  घामाच्या धारा निथळत असताना एखाद्या आजीने चार बोटं बुडवून आणलेल्या उसाच्या रसाचा ग्लास, शिळ्या चपातीचा काला करून भरवलेला घास, ८० वर्षाच्या, रस्त्यावर पडलेल्या आजीला गमतीने काहीतरी चिडवल्यानंतर,  ‘मुडद्या तुला हाणू का चपलीनं ?’  म्हणत तिने घेतलेला गालगुच्चा…  माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसणारा तो मळलेला…. तरीही सुगंधी पदर…. मी हातात घेतलेले सुरकुतलेले मायेचे हात…!  

….. पैसे खर्च न करता जमा झालेल्या या मौल्यवान गोष्टी मी रोज माझ्या झोळीत घरी घेवून येतो. 

रात्री झोपण्याआधी दिवसभरातल्या आठवणींची ही झोळी उघडून बघतो आणि जाणीव होते… जगातला सर्वात श्रीमंत मीच असेन ! …. माझ्यावर विश्वास ठेवून श्रीमंत होण्याची ही संधी समाज म्हणून आपणच मला दिली आहे. 

आजवरच्या कामात एक लक्षात आलं, आपण स्वतःसाठी काही केलं की होते ती “प्रगती”…. परंतु स्वतः सोडून जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करायला लागतो, त्यावेळी होतो तो “विकास”… ! 

स्वतःच्या प्रगती बाहेर येऊन ….दुसऱ्यांचा विकास व्हावा ही मनोमन इच्छा धरणाऱ्या… आपल्या सर्वांच्या विचारांना माझा साष्टांग नमस्कार … !!! 

* रस्त्यावर राहणारे एक पती-पत्नी सन्मानाने राहू इच्छितात. परंतु व्यवस्था त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. तीन नोव्हेंबर रोजी या पती-पत्नीला फुल विक्रीचा व्यवसाय आपण टाकून दिला आहे.  पत्नी अपंग आहे, तिला व्हीलचेअर दिली आहे. हार आणि गजरे तयार करून /विकून  दोघेही पती पत्नी सन्मानाने जगत आहेत. 

….. तिकडे ते फुलं विकत आहेत आणि इकडे माझे हात सुगंधी झाले…! 

* “ती” पलीकडे बसलेली ताई दिसते का तुम्हाला ? हां तीच…. ती खरं तर अपंग आहे…. ! या जगात तिला कोणीही नाही…. रस्त्यावर राहते ….अनेक गिधाडं तिच्यावर टपून आहेत…. ! दुर्दैव असं …. की ती उठून उभी राहू शकत नाही….  ती पळणार कशी ? 

आता थोडसं त्या बाजूला जाऊ…. ही पाहा, ही दुसरी ताई….. हिची सुद्धा अवस्था तशीच… ही सरपटत घसरत एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते…

ही तिसरी ताई बघितली ? हिची आई ८० वर्षाची असेल… काम करण्याची तयारी आहे, परंतु कामं मिळत नाहीत… सोपा उपाय म्हणून ती आता भीक मागायला लागली आहे. 

आता थोडं इकडे यावं…. ही चौथी ताई बघितली ?

ही पूर्णतः अंध आहे ! पूर्वी रेल्वेमध्ये चिक्की विकायची….  कोविडनंतर तो व्यवसाय बंद पडला

…… या चौघी सुद्धा तरुण आहेत ! रस्त्यात एखादा घास पडला असेल तर तो उचलण्यासाठी किमान ५० कावळे टपून असतात..,… या चौघींच्या आसपास फिरत असलेले हे कावळे बघताय तुम्ही ? 

यातील  तिघींना व्हीलचेअर आणि कुबड्या देऊन, वजन काटा दिला आहे, चौथ्या ताईला भाजी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. वजन काट्यावर, वजन करून लोक यांना पैसे देतात, भाजी घेतात….

या चौघीही आता परावलंबी नाहीत… स्वावलंबी झाल्या आहेत … साध्या अशा एका चाळीमध्ये का होईना, परंतु रस्त्यावर न राहता घरामध्ये राहत आहेत… ! 

… काठी न वापरता कावळ्यांना हुसकावून लावलं आहे आणि चारही  “चिमण्या” आता घरट्यात सुरक्षित आहेत ! 

* पाचवी एक ताई …. घरात कोणाचा आधार नाही …  तीन मुले आहेत…. शिवणकाम येते, परंतु भांडवल नाही. 

हसबनीस नावाचे माझे ज्येष्ठ स्नेही, यांनी या ताईला स्वतःकडील शिलाई मशीन दिले आहे, आता ही ताई साडीला फॉल पिको वगैरे करून स्वतःच्या संसाराला हातभार लावत आहे. 

…. फाटलेला संसार ती धाग्या धाग्याने पुन्हा विणत आहे. 

– क्रमशः भाग पहिला.

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. ” माझं चुकलं ” बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटतं नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोकं आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटतं नाही. चूक बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते.आधी दुनिया खूप पुढे चाललीये, लोकं फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साइड पट्टीवर निवांत चालत  राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील. हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं..आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं…

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. सगळ्या देशाचं म्हणजेच अर्थतज्ञ मंडळींच ,व्यापा-यांच तसेच आर्थिक बाबीशी निगडित असलेल्या प्रत्येकाचं लक्ष ह्याकडे होतचं. प्रत्येक अर्थसंकल्प हा थोडी खुशी थोडा गम स्टाईलच असतो. ह्यामुळे ह्यात कोणाला जरा दिलासा मिळतो तर कुणाला पुढील सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागते.

लहानपणापासून प्रश्न पडायचा हे अर्थशास्त्र, अंदाजपत्रक म्हणजेच बजेट आणि अर्थसंकल्प ही काय गोष्ट आहे? तेव्हा ह्या बाबींशी फारसा संबंध न आल्याने ह्याचे चटकन आकलन व्हायचे नाही..

मग थोडसं ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं अर्थसंकल्पामध्ये आयव्ययाचे म्हणजेच जमाखर्चाचे अंदाजपत्रक करआकारणी, वस्तुंच्या किमती ह्या सगळ्याची सविस्तर मांडणी म्हणजेच एक प्रकारचं गणित असतं.थोडक्यात अर्थसंकल्पाची व्याख्या म्हणजे विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची ताळमेळ बसवतं तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प ,बजेट ह्या गोष्टी आखाव्याच  लागतात. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.

लहानपणी आईबाबांची,वडीलधाऱ्या मंडळींची बजेट,बचत,तरतूद ह्या बाबींना व्यवस्थित महत्त्व देणं बघतं आलेय.आणि आज जरा युवावर्गाचे आजचा दिवस मस्त जगून घ्यावा, उपभोगून घ्यावा हा फंडा पण बघतेयं. ह्या दोन्ही बाबी अगदी तशा विरोधी त्यामुळे कायम मनात द्वंद्व  उभं राहायचं नक्की कोणाचं बरोबर आधीच्या पिढीचं की नंतरच्या पिढीचं.

पण दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या आकस्मित संकटाने ह्या प्रश्नाचं उत्तरं जवळपास शोधून दिलं.तसं तर कोणतीच टोकाची भुमिका ही बरोबर नसते पण योग्य म्हणून निवडायची झाली तर मला जास्त मागील पिढीची

भूमिका म्हणजेच भूक नसली तरी शिदोरी ही हवीच ही जास्त पटली. लहानपणी आईबाबांची बजेट,नियोजन, पुढील तरतूद ह्या गोष्टी म्हणजे कंजुषपणा वाटायचा. पण आता वाढत्या प्रचंड महागाईने,आर्थिक डोलारा डळमळीत झाल्याने,रोजगार मिळण्याच्या भ्रांत पडण्याच्या परिस्थिती ने परत एकदा आईबाबाचं बरोबर हे मी मनोमन कबूल केलयं.

पुढे बँकींग सेक्टर मध्ये काम करतांना “अंथरुण पाहून पाय पसरावे”, ह्या म्हणीचा प्रत्यय बघण्याचा योग खूपदा आला.बरेच जण आर्थिक नियोजन नीट न करता वारेमाप कर्जामुळे मानसिकरित्या कोलमडलेले पण बघण्यात आले.त्यामुळे मला मुळात आधीच भविष्याचे नीट नियोजन, आखीवरेखीव संकल्पना, आपलं बजेट हे आधीचं आखून कच्चा आराखडा तरी तयार असणं हे आवडायचं पण ह्या बँकींग सेक्टर मध्ये आल्याने त्याची आवश्यकता ही नक्कीच लक्षात आली.व्यापक दृष्टिकोनातून खूप काही शिकायला मिळालं,अनुभव गाठीशी बांधता आले.त्यामुळे दरवर्षी बजेट आखतांना हे मनाशी मी आधीच ठरवायचे आरोग्य,शिक्षण आणि घरचे ताजे सात्विक खाणे ह्यात अजिबात नो काटकसर परंतू चैनीच्या गोष्टी, ज्याचा कधीच अंत नसतो अशा रोज बाजारात नित्यनवीन येणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी कमीपैशात वा स्वस्तात मिळाल्यातरी स्टेटस च्या नावाखाली डोलारा आखणं ह्याला अजिबात मनातच थारा द्यायचाच नाही.

खरचं प्रत्यक्ष संसारातील, घराचं बजेट तयार करतांना यजमान वा गृहीणीची तारांबळ उडते तर प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या देशाचं आर्थिक नियोजन ही काही साधीसोप्पी गोष्ट नव्हे.तरी दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्र्यांना ही कसरत करावीच लागते आणि सामान्य जनता त्यातील लाभ हानी जाणून घ्यायला उत्सुक असते.असा हा पैशांचा खेळ व्यवस्थित मेळ घालून खेळावाच लागतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आईचा खिसा आणि बापाचा पदर….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ आईचा खिसा आणि बापाचा पदर….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

औषध देण्याचे माझे काम करून दुपारी मी निघालो… दिवस थंडीचे असले तरी दिवसा ऊन खूप कडक असतं …. या कडक उन्हात मी घामाघुम….! 

मोटर सायकलच्या डिकीला अडकवलेली गार पाण्याची बाटली मी तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायलो …आणि पुढे निघालो….

हे पाहून भीक मागणारी एक माऊली म्हणाली, ‘ये दोन घास खाऊन घे माज्यासंगट… भुक्याजला आसशील…. !’

मला पुढच्या वेळा गाठायच्या होत्या…. मी म्हणालो, ‘नगो मावशे, फुडं जायाचं हाय…./

म्हातारी तोंड पाडत म्हणाली, ‘व्हय बाबा तु कशाला आमचं शिळं नासकं खाशील ?’

हे ऐकून मात्र आवर्जून तिच्या ताटात जेवायला बसलो….ताटात “इत्तूसं” काहीतरी होतं… जे लहान मुलालाही पुरणार नाही….मी खायला सुरुवात केली… माझ्या लक्षात आलं…. प्लेट मधले घास, मी जास्त खावं म्हणून माझ्या साईडला ती ढकलत होती…. आणि तिने जास्त खावं म्हणून प्लेटमधले तेच घास मी तिच्या साईडला गुपचूप ढकलत होतो…

हे देता – घेता माझं पोट भरलं….! 

मी त्या माऊलीकडे पाहिलं…. जेवणात मला वाटेकरी केल्यामुळे तिचं पोट नक्कीच भरलं नसावं ….

तरीही तिचा तो सुरकुतलेला चेहरा अत्यंत तृप्त आणि समाधानी होता….!

घेण्यातला आनंद मी जरी मिळवला असला…. तरी देण्यातलं समाधान मात्र तिच्याकडे होतं…!

काहीतरी घेऊन मिळतो तो आनंद…. पण देऊन मिळतं ते समाधान….!!!

आईच्या पदराला खिसा कधीच नसतो…  तरी ती आयुष्यभर द्यायचं काही थांबत नाही…!

 बापाच्या शर्टाला कधी पदर नसतो…..परंतु लेकरांना झाकायचं, मरेपर्यंत तो बिचारा काही सोडत नाही…!!

…… या खिसा आणि पदरामधलं जे अंतर आहे…. तितकंच आपलं खरं आयुष्य….!

हा खिसा आणि पदर जर आयुष्यात नसेल…. तर — 

तर…. उरतो केवळ जगण्याचा “भार” आणि वाढत जाणाऱ्या वयाचे “वजन” ! 

आणि “ओझं” म्हणून  उगीचच वाहत नेतो आपणच आपल्याला… वाट फुटेल तिकडे….!!! 

 

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शुक्ला यजुर्वेदातील बाविसाव्या अध्यायातील बाविसावा श्लोक हा वैदिक राष्ट्रगीत म्हणून प्रसिद्ध आहे. 

या मंत्रात राष्ट्राचे मानचित्र साकारण्यात आले आहे.

☆ संस्कृत श्लोक

आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायतामा राष्ट्रे राजन्य: शूरऽइषव्योऽतिव्याधी महारथो जायतां दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशु: सप्ति: पुरन्धिर्योषा जिष्णू रथेष्ठा: सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु फलवत्यो नऽओषधय: पच्यन्तां योगक्षेमो न: कल्पताम्।।

-यजु० २२/२२

अर्थ समजायला सुलभ जावे म्हणून मी या श्लोकाची खालीलप्रमाणे विभक्त मांडणी केली आहे. 

आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌

आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति

व्याधी महारथो जायताम्‌

दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः

पुरंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो

युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां

निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु

फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌

योगक्षेमो नः कल्पताम्

सुलभ अर्थ

हे ब्रह्मात्म्या , आमच्या देशात समस्त वेदादी ग्रंथांनी देदीप्यमान विद्वान निर्माण होवोत. अत्यंत पराक्रमी, शस्त्रास्त्रनिपुण असे शासक  उत्पन्न होवोत. विपुल दुध देणाऱ्या गाई आणि भार वाहणारे बैल, द्रुत गतीने दौडणारे घोडे पैदा होवोत.  

तैलबुद्धीच्या स्त्रिया जन्माला येवोत. प्रत्येक नागरिक श्रेष्ठ वक्ता, यशवंत आणि रथगामी असो.   या यज्ञकर्त्याच्या गृहात विद्या, यौवन आणि पराक्रमी संतती निर्माण होवो. आमच्या देशावर आमच्या इच्छेनुसार वर्षाव करणारे जलद मेघ विहारोत आणि सर्व वनस्पती फलदायी होवोत. 

आमच्या देशातील प्रत्येकाच्या योगक्षेम पूर्तीसाठी त्यांना प्राप्ती होवो. 

भावानुवाद :-

☆ वैदिक राष्ट्रगीत

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

वेदांत ज्ञानी ऐसे शास्त्रज्ञ जन्म घेवो

अतिबुद्धिमान ललना देशाला गर्व देवो

यशवंत ज्ञानी वक्ता रथगामी मान मिळवो

यौवन-ज्ञानपूर्ण संतती शूर निपजो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

भूभार वाही वृषभ, दुभत्या धेनु निपजो

वेगात पवन ऐशी पैदास अश्व होवे

इच्छेनुसार वर्षा अंबरी जलद विहरो

फळभार लगडूनीया द्रुमकल्प येथ बहरो

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

सकलांचे योगक्षेम परिपूर्ण होत जावो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो…… 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५५ – मार्था ब्राऊन फिंके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५५ – मार्था ब्राऊन फिंके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

शिकागो मध्ये मत्सराग्नि भडकलेला होता. मिशनरी तर विरोधात गेले होतेच पण बोस्टनला जेंव्हा स्वामीजी महाविद्यालयात व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळी च्या व्याख्यानाने विद्यार्थी भारावून गेले होते. इतके की,त्या दोन दिवसांच्या भेटीमुळे म्हणा किंवा स्वामींच्या दर्शनाने वा ऐकलेल्या विचाराने म्हणा, भविष्यात काहींचे जीवनच प्रभावित झाले होते. त्यातालीच एक विद्यार्थिनी होती, मार्था ब्राऊन फिंके. त्या दोन दिवसांच्या आठवणीवर मार्था तिचे आयुष्य बदलवू शकली.

मार्था ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ते स्मिथ कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं.स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी १८७५ मध्ये सोफाया स्मिथ यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते. हे कॉलेज एक वैचारिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. न्यू यॉर्क आणि बॉस्टन च्या बरोबर मध्यावर नॉर्थअॅम्प्टन हे मॅसॅच्युसेटस राज्यातले टुमदार गाव होतं. त्या गावात हे कॉलेज होतं. मार्थाचं घर थोडं जुन्या वळणाचं होतं. जुन्या संस्काराच होतं. प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते ते. त्यामुळे कॉलेजला बाहेर पाठवताना तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती.बाहेर पडलेल्या मुली मुक्त विचारांच्या होतात असा सर्वांचा समज होता. कॉलेजला गेलेल्या मुली धर्म वगैरे मानत नाहीत असा अनुभव काहींचा होता.तिथे वसतिगृहात मुली राहत असत. वसतिगृहात जागा शिल्लक नसल्याने मार्था कॉलेज परिसरातच भाड्याने राहत होती.

ज्यांच्या घरात राहत होती ती घरमालकिण स्वभावाने कडक होती. पण चांगली होती. त्या कॉलेजमध्ये अधून मधून विचारवंत भेटी देत असत. असेच एकदा स्वामी विवेकानंद यांची नोहेंबर मध्ये दोन व्याख्याने असल्याचे तिथल्या सूचना फलकावर लिहिले होते. ते एक हिंदू साधू आहेत एव्हढेच त्यांच्या बद्दल आम्हाला माहिती होते असे मार्थाने तिच्या आठवणीत म्हटले आहे.ते एव्हढे मोठे आहेत हे माहिती नव्हते. त्यांची सर्व धर्म परिषदेतील किर्ति यांच्या पर्यन्त पोहोचलेलीही नव्हती.पण कुठून तरी कानावर आल की हे हिंदू साधू, मार्था राहत असलेल्या घरमालकिणी कडेच उतरणार आहेत आणि त्यांच्या बरोबर या मुलींचे जेवण पण असणार आहे. त्यांच्या बरोबर आम्ही मुली चर्चा पण करू शकणार होतो याचे तिला फार अप्रूप वाटले होते.त्यामुळे सर्वजनि घरमालकिणीवर जाम खुश होत्या. त्यांनी आपल्या या मालकिणीला उदार मतवादी म्हटले आहे कारण आपल्याकडे एका काळ्या माणसाची राहण्याची सोय करायची म्हणजे त्याला काळी हिम्मतच असावी लागते असे त्यांना वाटत होते.बहुतेक गावातील हॉटेलांनी त्यांना प्रवेश नाकारला असेल असेही त्यांना वाटलं.

मार्था म्हणते, आम्ही लहानपणापासूनच भारताचे नाव ऐकतं होतो कारण माझी आईसुद्धा हिंदुस्थानात जाणार्‍या मिशनर्‍याशी लग्न करणार होती.आमच्या चर्चमधून दरवर्षी भारतीय स्त्रियांसाठी मदतीची एक भली मोठी पेटी पाठवली जात असे. शिवाय त्यान काळात भारतबद्दल इतर माहिती अशी होती की, भारत हा एक उष्ण देश आहे. तिथे सगळीकडे साप फिरत असतात. तिथले लोक इतके अडाणी आहेत की, दगडा समोर किंवा लाकडासमोर डोके टेकवतात.बापरे . मारथाचे वचन चांगले होते तरी सुद्धा तिला भरता बद्दल फारशी माहिती नव्हती. ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीकोणातून लिहिलेली भारताची माहिती फक्त तिला माहिती होती. एखादा भारतीय भेटून त्याच्याशी बोलायला कधी संधी नव्हती मिळाली.

त्यामुळे मार्था च्या घरमालकिण बाईंकडे विवेकानंद हे हिंदू साधू उतरणार तो दिवस आला. त्या दिवशी पाहिलेले स्वामी विवेकानंद कसे होते याचं तिने वर्णन केलय की, ‘ते उतरणार ती खोली तयार करण्यात आली. भारदस्त व्यक्तिमत्व,एक कला प्रिन्स अल्बर्ट कोट,काली पॅंट ,डोक्यावर डौलदार फेटा घातलेला अलौकिक चेहर्‍याचा, डोळ्यात विलक्षण चमक असलेला,असा हिंदू साधू ! घरी आल्यावर सर्व जानी भारावून गेल्या. मार्था म्हणते, मला तर तोंडून काही शब्दच फुटत नव्हते.इतकी भक्तिभावाने ती हे व्यक्तिमत्व बघत होती. संध्याकाळी व्याख्यान झाले त्यानंतर प्रश्नोत्तरे.

घरी त्यांना भेटायाला तत्वज्ञानाची  प्राध्यापक मंडळी, चर्चचे धर्माधिकारी, प्रसिद्ध लेखक, आले होते. चर्चा सुरू होती. सर्व मुली एका कोपर्‍यात बसून ऐकत होत्या. विषय होता, ख्रिश्चन धर्म – खरा धर्म. हा विषय स्वामीजींनी नव्हता निवडला, आलेल्या विचारवंत मंडळींनी निवडला होता. ते सर्व स्वामीजींना आव्हान देत होते. त्यांच्या त्यांच्या धर्माची माहिती असलेले मर्मज्ञ विषय मांडित. मार्थाला वाटले होते की स्वामीजी तर हिंदू त्यांना काय इकडचे कळणार व त्यावर कसे तोंड देणार? पण उलटेच झाले होते. स्वामी विवेकानंद आपली बाजू मांडताना, प्रती उत्तर देताना बायबल, इंग्रजी तत्वज्ञान, धर्मज्ञान, वर्डस्वर्थ, व थॉमस ग्रे यांचे  काव्य संदर्भ देऊन बोलत होते. ठामपणे बोलत होते. स्वामीजींनी त्यांच्या बोलण्यातून धर्माच्या कक्षा अशा रुंद केल्या की त्यात सर्व मानवजात सामील झाली आणि वातावरण बदलून गेले. मुक्त विचारांनी  दिवाणखान्यातील वातावरण भारावून गेले.या हिंदू साधुनेच बाजी मारली. त्यामुळे मी पण उल्हसित झाले असे मार्था ने लिहून ठेवले आहे. मार्था म्हणते आमच्या कॉलेज मधली मंडळी धर्माच्या बाबतीत फार संकुचित विचारांची होती. स्वतालाच ती शहाणी समजत. या बौद्धिक पातळीवरील चर्चेत स्वामीजींचा झालेला विजय मार्था च्या कायम लक्षात राहिला होता.

मार्थाने आणखी एक विशेष आठवण सांगितली आहे. तिथल्या वास्तव्यात दुसर्‍या दिवशी सकाळी, बाथरूममधून पाण्याचा आवाज व त्याबरोबर अनोळखी भाषेतले स्तोत्रपठण ऐकू येत होते. ते ऐकण्यासाठी सर्व मुली घोळक्याने दाराबाहेर उभ्या राहिल्या. एकत्र ब्रेकफास्ट च्या वेळी मुलींनी या स्तोत्राचा अर्थ स्वामीजींना विचारला.त्यांनी उत्तर दिलं, “प्रथम मी डोक्यावर पाणी ओततो . नंतर अंगाखांद्यावर. प्रत्येक वेळी सर्व प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून मी ते स्तोत्र म्हणतो”. हे ऐकून मार्था आणि मुली भारावून गेल्या. मार्था म्हणते, “मीही प्रार्थना करत असे पण ती स्वतसाठी आणि नंतर कुटुंबासाठी. समस्त मानवजातीसाठी व प्राणिमात्रासाठी आपलेच कुटुंब आहे असे समजून प्रार्थना करावी असे कधीच मनात आले नव्हते आमच्या”. 

ब्रेक फास्ट नंतर स्वामीजी म्हणाले चला बाहेर फिरून येऊन थोडं, म्हणून आम्ही चार मुली त्यांच्या बरोबर गेलो . गप्पा मारत चाललो होतो, माला एव्हढेच आठवते की, ख्रिस्ताचे रक्त हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो. हे शब्द मला कसेचेच वाटतात असे ते म्हणाले होते.यावर मीही विचार करू लागले. मलाही हे उल्लेख आवडत नव्हते. पण चर्चच्या तत्वांच्या विरुद्ध उघडपणे बोलायचे धैर्य हवे. पण इथेच माझ्यातील स्वच्छंद आत्म्याने मुक्त चिंतांनाचा स्त्रोत त्या क्षणी खुला केला आणि मी कायमची मुक्तचिंतक झाले. विषय बदलून मी त्यांना वेदांबद्दल विचारले कारण त्यांनी आपल्या भाषणात वेदांचा उल्लेख केला होता. मी वेद मुळातून वाचावेत असे त्यांनी माला सांगितले. मी त्याच क्षणी संस्कृत शिकण्याचे ठरविले . पण ते शक्य झाले नाही पुढे.

यावरून एक गोष्ट गमतीची आठवली. उन्हाळ्यात आमच्याकडे नवीन गुर्नसी पारडू पाळीव प्राण्यांमध्ये समाविष्ट झाले. माझ्या वडिलांनी तो माझ्याकडे सोपविला. त्याचे नाव मी वेद ठेवले. दुर्दैवाने ते वासरू लवकरच मेले. माझे वडील गमतीने म्हणाले की तू त्याचे नाव वेद ठेवले म्हणूनच ते गेले.

नंतर स्वामीजी परत एकदा अमेरिकेत येऊन गेले, ते कळले नाही. मग काहीच संबंध नाही आला. पण त्या दोन दिवसात स्वामीजींच्या विचाराने मार्था चे जीवनच उजळून गेले असे ती म्हणते. तिने वडिलांना पत्र लिहून हा वृत्तान्त कळवला तर ते घाबरून गेले. आपल्या घराण्याचा धर्म सोडून ही स्वामीजींबरोबर त्यांची शिष्या होऊन निघून जाते की काय अशी त्यांना भीती वाटली.

मार्था ने तिचे हे स्वतंत्र विचार तिच्यापुरतेच मर्यादित ठेवले. तिच्या मते मी लगेच हे अमलात आणले असते तर, जीवनात मला लगेच त्याचा उपयोग झाला असता. खूप वेळ वाया गेला. पण ती निराश नाही झाली. आतापर्यंत जरी चाचपडली असली तरी विचार पेरले गेले आहेत ते उगवणारच असा तिला विश्वास होता.  स्वामीजींनी सांगितलेला वैश्विक धर्म तिच्या अंतकरणात जाऊन बसला होता. ती १९३५ मध्ये जवळ जवळ ४२ वर्षानी, भारतात पहिल्यांदा कलकत्त्यात आली तेंव्हा, प्रथम ती एक प्रवासी म्हणून तिचा प्रवास सुरू झाला तर भारतात पोहोचल्यावर गंगेच्या काठावरील बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीचे, समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण एक विश्वधर्माचे यात्रेकरू आहोत याची मनोमन खात्री झाली. तिथेच आत्मिक आणि मानसिक उन्नतीची ओढ असणार्‍या मार्था ने या आठवणी सगळ्यांच्या आग्रहाखातर सांगितल्या आहेत. मार्था जर दोन दिवसांच्या विचाराने एव्हढी प्रभावित झाली असेल तर आपल्याकडे हे तत्वज्ञान बारा महीने चोवीस तास उपलब्ध आहे विचार करण्याची गोष्ट आहे .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माडगुळ फाईल्स : – एक वावटळ …. ” लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “माडगुळ फाईल्स : – एक वावटळ …. ” लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

“आम्हा गरीबांचा संसार जाळून तुम्हाला काय रे मिळणार?”… ३०-३१ जानेवारी १९४८ च्या आसपासचा दिवस….गांधीहत्येनंतरचे उसळलेले जळीत माडगूळकरांच्या गावातल्या वाड्यापर्यंत पोहोचले होते,गदिमांची आई बनुताई मोठया धीराने त्यांना विरोध करत होती,त्यातलाच एक दांडगट “ह्या म्हातारीलाच उचलून आत टाकारे,म्हणजे तरी हीची वटवट बंद होईल !” असे खवळूनच म्हणाला. तितक्यात उमा रामोश्याने म्हातारीचा हात धरून तिला बाजूला ओढले म्हणून ती वाचली,नंतर बाका प्रसंगच उभा राहिला असता. 

ढोल ताशे वाजवीत ७०-८० दंगलखोर गावात शिरले होते,तात काठ्या,ऱ्हाडी.. जळते पलीते होते. वात शिरल्या शिरल्या त्यांनी गदिमांच्या धाकट्या भावाचीच चौकशी केली, भेदरलेल्या छोट्या पोरांनी त्यांना थेट आमच्याच घरापाशी आणून सोडले होते. गदिमांच्या धाकट्या भावाला दटावून गावातल्या ठराविक जातीच्या सर्व लोकांची घरे त्याला दाखवायला लावली.एका मागून एक घरातल्या माणसांना बाहेर ओढून घरे पेटवून देण्यात आली. सर्वात शेवटी परत माडगूळकरांच्या वाड्याजवळ आल्यावर गदिमांच्या भावाला स्वतःच्या वाड्यात रॉकेल शिंपडायला लावले व ‘गांधी नेहरू की जय!’ असे ओरडत आमचा वाडा पेटवून दिला. सारे संपले होते आमच्या वाड्याची राख रांगोळी झाली होती. गदिमांचे वडील गावातील मारुतीला साकडे लावून बसले होते,धाकटा भाऊ दिवसभर घाबरून रामोश्याच्या कणगीत लपून बसला होता. महाराष्ट्रातल्या अनेक घरात हीच परिस्थिती होती. शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली होती.

याच वेळी ‘वंदे मातरम’ चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण कोल्हापूरला तर काही पुण्यात पूर्ण झाले होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्रिकरण एकत्र असावे म्हणून दिग्दर्शक राम गबाले चित्रपटाच्या प्रिंट्स घेऊन रात्री कोल्हापुरातून रेल्वेत बसले. त्यांना माहित नव्हते की त्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली आहे व सगळीकडे दंगल सुरु आहे. गदिमा-पुल व सुधीर फडके यांनी साधारण तीन चित्रपटांकरिता एकत्र काम केले होते ते म्हणजे वंदे मातरम, ही वाट पंढरीची /संत चोखामेळा व पुढचे पाऊल. यातील वंदे मातरम हा स्वातंत्र लढ्यावर आधारित चित्रपट यात पु.ल व सुनीता बाईंनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते. गदिमांची गीते, कथा-पटकथा, संवाद तर फडक्यांनी संगीत दिले होते.

राम गबाल्यांच्याकडे चित्रपटाची मूळ प्रिंट एका मोठ्या ट्रंकेत भरलेली होती व रेल्वेत बसल्यावर चित्रपटाचे स्क्रिप्ट काढून ते चाळत बसले होते. तितक्यात ८-१० दंगलखोरांची एक टोळी रेल्वेत शिरली. प्रत्येक डब्यातल्या ठराविक जातीच्या लोकांची चौकशी करून त्यांच्या डोळ्यादेखत सामान रेल्वेच्या बाहेर फेकले जात होते. खूप गंभीर परिस्थिती होती,राम गबाले त्यांच्या तावडीत सापडले असते तर चित्रपटाचे अस्तित्व धोक्यात आले असते. चित्रपटाची प्रिंट व स्क्रिप्ट सर्व नष्ट झाले असते. सर्व कष्ट वाया गेले असते. गबाले स्क्रिप्ट व जीव दोन्ही हातात धरून बसले होते.

गदिमांना एक सवय होती कुठलेही साहित्य कविता, लेख पूर्ण झाला की फावल्या वेळेत ते बऱ्याचदा त्यावर चित्र/रेखाटने करून ठेवत असत. ज्याची अनेकदा दिग्दर्शकाला व अभिनेत्यांना मदत होत असे, असेच एक चित्र गदिमांनी त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या मुखपृष्ठावर काढून ठेवले होते. त्यात चित्रपटाची नायिका झेंडा हातात घेऊन त्यांनी रेखाटली होती.

८-१० जणांचा समूह राम गबाले यांच्यापाशी आला त्यातल्या एकाने त्यांच्या हातातले जाडजूड स्क्रिप्ट पाहिले व विचारले हे काय आहे. गबाले यांनी सांगितले की १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर चित्रपट काढत आहोत व त्याचे हे स्क्रिप्ट आहे. त्या माणसाने ते नीट निरखून पहिले.

वर काढलेले गदिमांचे नायिका झेंडा हातात धरलेले छायाचित्र त्यांनी पाहिले व एकदम म्हणाले ” हे बेणं आपल्यातलच दिसतं आहे… चला पुढे… “

गदिमांच्या एका चित्राने तो संपूर्ण चित्रपट गांधीहत्येच्या दंगलीतून वाचविला होता. पुढे हा चित्रपट प्रसिद्ध झाला यातील “वेद मंत्राहून आम्हा वंद्यवंदे मातरम !” सारखी राष्ट्रगीताच्या तोडीची गीते खूप गाजली. एका लेखणीत किती ताकद असते याचे हे उत्कृष्ट उदाहरण!. 

या सर्व घटनांनी माडगूळकर कुटुंबीय खूप व्यथित झाले होते. “या गावात राहण्यात काही अर्थ नाही… ” हाच विचार गदिमांच्या व भावंडांच्या मनात ठाम झाला होता. व्यथित माडगूळकर कुटुंबीय गाव सोडणार अशी बातमी गावात पसरली, गावकऱ्यांना या बातमीने अतीव दुःख झाले.गावातल्या जाणत्या लोकांनी गदिमांची भेट घेतली … “अण्णा,आम्ही तुमचा वाडा वाचवू शकलो नाही पण आम्ही तो तुम्हाला परत बांधून देऊ पण गाव सोडू नका … “,अशी अनेक वावटळे येत असतात पण वर्षानुवर्ष जपलेले ऋणानुबंध इतक्या सहज तुटत नाहीत. गावकऱ्यांनी आपला शब्द पाळला … माडगूळकरांचा वाडा त्यांनी परत उभारून दिला!. 

आज जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांची धडपड पाहून वाईट वाटते,लहान पणापासून सर्व जातींचे मित्र होते आमचे,जात-पात पाहून कधीच मैत्री केली नव्हती…..पण आज सर्वांच्या डोळ्यात या वावटळीची धूळ शिरली आहे, काहीच स्पष्ट दिसत नाही…. अधून मधून अश्या वावटळी येतच राहतील, आपल्याला मात्र हे माणुसकीच्या शत्रूसंगे चाललेले युद्ध असेच चालू ठेवावे लागेल……..

(ही पोस्ट केवळ गदिमा/वंदे मातरम चित्रपटाच्या आठवणी जागवण्यासाठी आहे,अनेक वर्षांपूर्वी घडून गेले ते सत्य होते,पण यातून आपण केवळ गदिमांच्या आठवणी जागवायच्या आहेत,इतर कुठलाही उद्देश नाही व त्याला कृपया इतर रंग देऊ नये ही विनंती )

लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मानिनी… सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री लीला ताम्हणकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मानिनीसुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री लीला ताम्हणकर

बोरे शब्द उच्चारताच – वाकलेली, थकलेली, सुरकुतलेली,श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेली, डोळ्यात प्राण आणून प्रतीक्षा करणारी, विस्फारलेल्या पांढऱ्या केसांची, करुण जख्ख म्हातारी शबरी नजरेसमोर येते. …. पण त्या काळात ती मनस्वी मानिनी होती.

तिचे मूळ नाव श्रमणा. तिचा पिता भिल्लांचा सेनानी. पित्याने कन्येचा विवाह ठरवला. सर्व तयारी जय्यत झाली होती. श्रमणाच्या कानावर आले — त्यांच्या जमातीत कन्या-जीवन सुखी व्हावे म्हणून तिच्या विवाहापूर्वी शेकडो पशूंचा बळी देतात. ही प्रथा होती. अत्यंत चतुर, संवेदनशील शबरीला हे असह्य झाले. इतक्या जीवांचा बळी जाणार असेल, तर नकोच तो विवाह !!! ..असा विचार करून ती हळूच पळून गेली. दंडकारण्यात मातंग ऋषींची सेवा करून अनेक विद्या पारंगत केल्या. बळी/हत्या न करता घनघोर जंगलात पशुधन जतन केले. अनेक वनस्पतींचे संशोधन करून पशूंची भाषा -विद्या प्राप्त केली.

श्रीरामांचे पवित्र पदकमल तिच्या झोपडीला लागताच ती अनन्य भाविका हरखून गेली. 

काटेरी झुडुपात शिरून बोरे काढून आणली. आणि प्रत्येक बोरात शाबरी विद्या भरून ( शबरी मुखातून श्रीराममुखी) रामरायास उष्टी बोरे दिली हे भासविले.—- प्रत्यक्षात शाबर विद्यामार्फत सुग्रीवाची मदत घ्यायला सांगितले. शबरी ही अत्यंत ज्ञानी व तेजस्वी तपश्री होती. वनवासी जीवनात प्रत्यक्ष विद्या-ज्ञान संपादन करायचे नाही, असा कठोर आदेश श्रीरामांना होता. म्हणून शबरीने चतुराईने प्रत्येक बोरातून शाबरी विद्या रामाला दिली.ती ‘ गुरूणां गुरु: ‘ म्हणजे देवता झाली.—- सुग्रीव वानरांचा सेनापती होता.नर नाही तो वा-नर!!! श्रीरामांनी शाबरीविद्याधारे वा-नरांशी संवाद साधून इप्सित साध्य केले.

——या गोष्टीतून मला जाणवले ते असे —–

बोराचे झाड काटेरी असते. संक्रमण काळात अश्या काटेरी झाडांची टपोरी, बाणेरी बोरे काढणे, वेचणे, म्हणजे धीराने, चतुराईने संकटाशी, येणाऱ्या कडक उन्हाळ्याशी दोन हात करणे. जळाविना रहाणे, अभावातील भाव बघणे.  सामना करून यश मिळवणे, अशी धडाडी वृत्ती बाळात येवो या हेतूने बोरन्हाण करतात.

शिक्षणाचा एखादा मार्ग बंद झाला ,तर पर्याय शोधून परिपूर्ण शिक्षण घेणे . शबरी सम स्व -बळ स्थान ओळखणे.एकटीने निर्भिड पणे राहून संशोधक वृत्ती जागृत ठेवून सजग होणे.

अनेक गोष्टी शिकवतात एकेक प्रसंग..

आता विज्ञान युगात परत  बेरी स्नान इव्हेंट असतो. पण त्या बोरनहाणा मागील  तत्व लक्षात घेऊन चंगळवादास आवर घालुया.

साधेसुधे राहून गोड गोड बोलुया।

लेखिका — सुश्री उन्नती गाडगीळ

संग्रहिका : सुश्री लीला ताम्हणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆  सुश्री शोभना आगाशे

☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆

निर्गुणाचे डहाळी।

पाळणा लाविला।

तेथे सुत पहुडला।

मुक्ताईचा॥

निज निज बाळा।

न करी पै आळी।

अनुहात टाळी।

वाजविते॥

तेथे निद्रा ना जागृती।

भोगी पै उन्मनी।

लक्ष तो भेदूनी।

निजवतो॥

निभ्रांत पाळी।

पाळणा विणुनि।

मन हे बांधुनि।

पवन दोरा॥

एकवीस सहस्र।

सहाशे वेळा बाळा।

तोही डोळा।

स्थिर करी॥

बालक चुकले।

सुकुमार तान्हुले।

त्याने पै सांडले।

मायाजाळ॥

जो जो जो जो।

पुत्राते निजवी।

अनुहाते वाव।

निःशब्दांची॥

अविनाश पाळणा।

अव्यक्तेने विणला।

तेथे पहुडला।

योगिराज॥

निद्रा ना जागृती।

निजसी काई।

परियेसी चांगया।

बोले मुक्ताबाई॥

– संत मुक्ताबाई 

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

रसग्रहण/अर्थ

चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला.

मुक्ताबाई म्हणतात,

निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत. ॐ कार नाद हा अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद तू मनाच्या उन्मनी अवस्थेतच ऐकू शकशील. सामान्यपणे मनाच्या चार अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा व  तुर्या म्हणजे आत्मशोध किंवा स्वतःची स्वतःला ओळख पटणे, ब्रम्ह व माया दोन्हींचे पूर्ण ज्ञान होणे. पण या अवस्थेत द्वैत असते. यापुढची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत मन तदाकार होते. विश्वातील दिव्यत्व व आत्म्यातील दिव्यत्व यांच्या एकरूपतेची जाणीव होते. अद्वैताचा अनुभव येतो. म्हणून मुक्ताबाई आपल्या शिष्याला सांगत आहेत की तू या उन्मनी अवस्थेचा अनुभव घे. निभ्रांतीच्या म्हणजे निर्मोहाच्या दोरीने तुझा पाळणा विणला आहे. त्याला झोका देण्यासाठी मनाची दोरी बांधली आहे. म्हणजे तुझं मन या निर्मोही अवस्थेचा आनंद घेऊ दे.

सामान्यपणे आपण १०८०० वेळा दिवसा व १०८०० वेळा रात्री श्वास घेतो. मुक्ताबाई सांगतात, सामान्य माणसांप्रमाणे तू एकवीस सहस्र सहाशे वेळा श्वास न घेता, तू तो स्थिर कर म्हणजेच त्यावर ताबा मिळवून त्याची गती कमी कर. (ही गती १०८ पर्यंत खाली आणली तर  परमेश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.) 

माझं बाळ लहान आहे ते वाट चुकलं होतं.(चांगदेव हे सर्व शास्त्रात पारंगत होते. त्यांना योगीराज म्हटलं जायचं. परंतु त्यांचे ज्ञान सत्संग विरहित होते कारण त्यांना अहंकाराची बाधा झाली होती.) पण आता त्याने माया मोह यांचा त्याग केला आहे. म्हणून अशा आपल्या पुत्राला मुक्ताबाई निःशब्दपणे अनाहत नाद ऐकवून झोपवत आहेत.

हा योगीराज चांगदेव बाळ, गुरूंनी विणलेल्या ज्ञानाच्या अविनाशी पाळण्यामध्ये पहुडला आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या गुरूंनी सांगितलेल्या योगमार्गातील उपदेशपर गोष्टी ऐकत आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली

मो. 9850228658

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares