मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆  

स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट… 

अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात.  खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…

एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते. 

तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम  गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.” 

यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला. 

त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला. 

स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…

हलवाई सांगू लागला, 

” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये  पाहिले.  माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”

स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले. 

तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला. 

बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….

(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)

 

संग्राहक : अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – एक अफलातून सोमवार ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो उठा, पाच वाजून गेले!”

“हो गं, जरा गजर तर होऊ दे “

“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”

“दोनदा ?”

“मग, साडे चारचा गजर  एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “

“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”

“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”

“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”

“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”

“हल्ली म्हणजे?”

“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”

“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”

“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”

“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”

“काय डोंबलाच बरोबर?

अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या  आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”

“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”

“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”

“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”

“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”

“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”

“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”

“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”

“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”

“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”

“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”

“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”

“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”

“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”

“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”

“तुला ना काही कळत नाही”

“काय, काय कळत नाही?”

“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”

“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”

“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”

“ही तुमची पळवाट झाली”

“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”

“अस्स, तो कोणता?”

“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”

“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी

जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”

“अग खरंच कंटाळा आलाय आज.  तू पण दांडी मारतेस का ?”

“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”

“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”

“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”

“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”

“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”

“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”

“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”

“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”

“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”

“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”

“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”

“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”

“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

“It’s OK, थँक्स! मग काय  आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”

“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”

“काय सांगतेस काय, खरंच?”

“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”

“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”

“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-०१-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध  लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा  मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.

“ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.

प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या  मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.

चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.

आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय, खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!    

डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत  होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची  मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होतं. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .

भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.

इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.

भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.

मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.

विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.

तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्‍या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”

व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी  शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला  ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते…

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्म… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्म… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

स्त्री असो वा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.

महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालात निजली होती..

तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले…. त्याला पाहून तिला रहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली..

ती म्हणाली, ” सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं? ”

कृष्ण म्हणाले, “ पांचाली नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही, तर सर्वच कौरव संपले…. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..?”

द्रौपदी म्हणाली, “ कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?”

यावर योगेश्वर म्हणतात—  “ नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.”

मग द्रौपदी विचारते, “ कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का?”

कृष्ण म्हणतात, “ नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता !”

द्रौपदी विचारते, “ कृष्णा, मी काय करू शकत होते?”

कृष्ण म्हणतो, “ तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास….  त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते…… 

आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोलली नसतीसकी …”अंधे का पुत्र अंधा ” व खिदळून हसत त्याचा ” सार्वजनिक अपमान ” केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं….. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती…… “ 

— आपले शब्दच आपले कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.

जगात फक्त मानव हाच एक असा प्राणी आहे की त्याच्या दातात नाही, तर जिभेत विष आहे….. 

… म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं… बेलगाम बोलण्याने, आणि लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं..!

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

रंगात रंग तो गुलाबी रंग ।

मला बाई आवडतो श्रीरंग ॥

…. छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत … ” ता ना पि हि अ नि जा “.. असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात, कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात.

केशरी रंग  त्यागाचा…. 

पांढरा रंग शांतीचा…. 

हिरवा भरभराटीचा…. 

गुलाबी रंग प्रेमाचा…. 

लाल रंग रक्ताचा…. 

काळा म्हणजे निषेध !…. 

अशा सर्व संमत कल्पना आहेत.

…. माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात….. 

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो, डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा “…  मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज !

विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय . मनात अभिमान उत्पन्न करणारा ! पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो. 

हिरवा रंग तर सृष्टीचा …. ” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” …. 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड – लहान असो की मोठे पाने मात्र हिरवीच ! मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्धभूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान. 

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे, पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांतीचा संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ??

अर्थात गुलाबी….. 

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी…. 

प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी…. 

लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी…. 

मधुर, औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी…. 

आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी ….. 

…. हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच.  पण मुख्य म्हणजे – लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल….. 

कमलपुष्प अधिक गुलाबी,…. की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . पण म्हणूनच माझा आवडता रंग….. 

श्रीरंग ! भक्ति प्रेमाचा रंग श्री रंग…. 

आठवा रंग….  श्री रंग…. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्थळं बघणे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळं बघणे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल “स्थळ” ह्या संकल्पनेबद्दल तसे लिहीले होतेच. तेव्हा “स्थळं बघणे”हा कार्यक्रम अरेंज्ड मँरेज करणा-या उपवर मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अपरिहार्य मार्ग बनला आहे. पूर्वी नातेवाईक भरपूर असायचे, लोकं एकमेकांशी जुळलेली असायची परंतु हल्ली लोकसंपर्क कमी कमी होत जाण्याच्या प्रक्रीयेमुळे “लग्न जमविणे” हे मुलं व पालक ह्यांच्या साठी एक अवघड परीक्षाच होऊन बसलीयं.

विशेषतः उपवर मुलींचे प्रमाण हे उपवर मुलांच्या तुलनेत कमी असल्याकारणाने  उपवर मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक जटील समस्याच होऊन बसलीयं. अरेंज्ड मँरेजमध्ये एकतर परिचीत वा नातलग ,नाही तर विवाहमंडळं मध्यस्थांची भूमिका पार पाडतात. आणि ब-याच लोकांच्या अनुभवातून असं निदर्शनास आलं की चांगलं स्थळं पदरी पाडण्याच्या नादात हे उपवर,त्यांचे पाल्य किंवा मध्यस्थी वा विवाहनुरुप मंडळं ही बोहल्यावर चढणा-याची बरेचसे गुणं चढत्या भाजणीतील माहिती सारखी जाहीर करतातं. मुलगा असो वा मुलगी, संसाराची सुरवातच मुळी खोटी, वाढीव माहिती, देऊन केल्या गेली तर तो संसारातील विश्वासाचा पायाच मुळी डळमळीत राहील. उलट मी तर म्हणेन आपले विचार, आपली मतं ही जशीच्या तशी जाहीर करावीत. त्या देवाला काळजी असते, आपल्या विचारांचा, मतांचा आदर करणारा पार्टनर आपल्याला कुठूनही मिळेल. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं अजिबातच नसतं, त्यामुळे आपलं शिक्षणं, आपली कमाई ,आपले विचारं,मतं,आपल्या अपेक्षा ,आपल्या लेखी प्राधान्य ह्या गोष्टींचे अतिशय स्पष्टपणे तसेच मनमोकळ्या पद्धतीने आदानप्रदान व्हायला हे हवचं.

उदाहरण द्यायचंच झालं तर मुलीला फारशी घरकामाची आवड वगैरे नसली तर अजिबात बायोडाटा मध्ये गृहकर्तव्यदक्ष असले जडजूड शब्द वापरून भुलावण करु नये, तसचं मुलामुलीला माणस़ांची ,गोतावळ्याची फारशी आवड नसतांना प्रेमळ,मनमिळाऊ असली बिरुदं चिकटवू नयेत. तसचं मुलामुलीची कमाई सांगतांना कृत्रिम चलन फुगवट्यासारखी वाढवून सांगू नये, हे जर पाळले नाही तर अपेक्षांचा चक्काचूर केल्याचा ठपका अंगाला चिकटलाच म्हणून समजा. ह्या उलट एकदम खरीखुरी माहिती सगळ्यांनीच पुरवायचे ठरविले तर पुढील आयुष्य हे ब-याच प्रमाणात सुकर,सुरळीत होईल हे नक्की.

सध्या लग्न झाल्याबरोबर बेबनाव,घटस्फोट हे सर्रास काॅमन झालायं. पूर्वी मागील पिढी पर्यंत सहनशीलतेच प्रमाण ह्या पिढीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पटो वा न पटो जगासाठी तरी लग्न टिकविण्याकडे कल होता. परंतु आता काळ बदलललाय,कोणीही झुकायला, माघार घ्यायला तयार नसतं.ह्या परिस्थीतीत जर सांगितलेल्या गोष्टी खोट्या वा चूक निघाल्या तर ह्या पिढीतील तरुणाई सहन निश्चितच करतं नाही. आणि लग्न हे फक्त दोघांच नसतचं मुळी. ह्यामध्ये दोन्हीही कुटुंब इनव्हाॅल्व झालेली असतात. ह्या परिस्थितीचा विपरीत परिणाम दोन्ही कुटुंबां वर होऊ नये ही ईच्छा असल्यास आरोग्य, कमाई, आवडी,अपेक्षा,सवयी ह्या पंचसूत्री ची खरीखुरी माहिती ही एकमेकांना द्यावी तर आणि तरच ही कुटूंबसंस्था डळमळीत न होता सुखी आनंदी संसार बहरेल.शेवटी काय हो सगळ्यांना” नांदा सौख्य भरे” हेच हवं असतं.

नात्यांचही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं अस आपण म्हणू शकतो.

दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो,संयम नसतो,त्याग हा शब्द डिक्शनरी मधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे नवीन रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं.आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.

नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की. कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं.कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती,दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्या सोबतच बाकी इतर नाती सद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाममतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली,थोडासा स्वार्थ बाजूला सारला तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तमप्रकारे संसार करु शकतील. त्या मुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या ची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की खरोखरच सहजीवन  जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.

एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये.नाही तर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल तरीही एक नक्की तडजोडी ने कदाचित आपल्याला सुख नाही लाभंत पण आपण न केलेल्या तडजोडी मुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं तरी साध्यासरळ संसारासाठी “तडजोड”हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो.आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडी नंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने  घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की.  असो हा विषयच न संपणारा विषय आहे.तेव्हा तुर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्त्री… आज व उद्या… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

स्त्री… आज व उद्या… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सावित्री ज्योतिबाने स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली .जिथं माणूस म्हणून जगण्यास देखील ती लायक नव्हती, ती आता शिक्षण घेऊन साक्षर झाली ,अक्षर ओळख पाप नसून अक्षरे जीवनाची दशा आणि दिशा बदलतात हेच जणू ज्योतिबाना सिद्ध करायचे होते ! अन फल निश्चिती स्वरूपात अनेक स्त्रिया शिकल्या ,सुशिक्षित झाल्या ,कुणी उंबऱ्याबाहेर पडल्या ,कुणी हक्कासाठी ,न्यायासाठी लढू  झगडू लागल्या ,उच्च पदावर गेल्या ,जग भ्रमंती करू लागल्या ,मनातल्या भावना कागदावर उतरू लागल्या ,आज विविध क्षेत्रातली त्यांची कामगिरी पहाता त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध होते ,घर नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत दमछाक झाली पण त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली .हा झाला एक भाग.

शिक्षण सर्वदूर पसरले ,स्त्रिया जागरूक झाल्या समान संधी ,समान अधिकार मिळाले,आर्थिक स्वावलंबी झाली आर्थिक परावलंबित्व सम्पले, स्वतःची प्रगती झाली आणि आज ही गोष्ट सर्व सामान्य झालीय पण अपवाद वगळता असे दिसते की स्त्रियांची आत्मिक, वैचारिक प्रगती झालीय का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच दिसून येते. आमचे शिक्षण  फक्त साक्षरता अन करिअर नोकरी याभोवती फिरतेय,अजूनही आम्ही जुन्या ,बुरसटलेल्या रुढींचे, परंपरांचे,अन वैचारिक गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. आमच्याकडे सारासार विवेक बुद्धीचा अभावच दिसून येतो. अजूनही आमच्याकडे निर्णयक्षमता नाहीये ,आमची तेजस्विता ,तपस्विता संपून आम्हाला चमकण्यात धन्यता वाटू लागलीय. मनावर ,आत्म्यावर उत्कृष्ट संस्काराचा अभाव दिसून येतोय. भौतिक सुखांचा हव्यास अन अट्टाहास धरत आम्ही आत्मोन्नतीस हद्दपार केलेय. अन म्हणूनच कर्तृत्वाच्या पायऱ्या चढताना आम्ही त्याग ,संयम ,आत्मिक सुख ,समाधान ,शालीनता ,नात्यातले समर्पण ही अदृश्य पण सदृश्य चिरंतर परिणामकारक मूल्य विसरतोय.  कुणी तरी सुंदर म्हणावे , कुणाला तरी खूश करण्यासाठी धडपडत असतो ,  बाह्य सौंदर्यावर  मग मिळवलेले पैसे खर्च करतो .अजूनही आम्हाला शोभेची बाहुलीच होणे मान्य आहे. क्षणिक सुखासाठी आम्ही रात्रदिन झटतो पण आत्मिक सुखासाठी कमी झटताना दिसतो . अपवाद आढळतात पण अपवाद नियम होत नाही . आम्ही मग शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून दूर चाललो आहोत भरकटतोय असे वाटते कारण वैचारिक प्रगतीचा अभावच दिसतोय ही झाली दुसरी बाजू !

आता तिसरी बाजू…   स्त्री कितीही शिकली तरी तिच्या आत्मसन्मानाला कुटुंबात किंवा समाजात खरेच प्रतिष्ठा आहे ? तर ‘नाहीच !’ असेच म्हणावे लागेल , अजूनही कुटुंबातील तिचे स्थान दागिने ,साडी एवढेच मर्यादित आहे आणि आम्हालाही अजून यातच धन्यता वाटते ,आम्ही आमच्यासारख्या प्रगतीपासून दूर असलेल्या स्त्रियांसाठी काही करू इच्छित नाही , समाजात अजूनही आम्हाला एकटे रहाता येत नाही , एकट्याने जीवनाची मौज अनुभवता येत नाही कारण जिथे तिथे उरी भयच बाळगावे लागते एकविसाव्या शतकात आमच्या प्रति पुरुषांची ,समाजाची दृष्टी निकोप ,स्वच्छ नाही अन आम्हा स्त्रियांची देखील नाही आम्ही अजूनही पूर्ण भयमुक्त नाहीत ही खरेच शोकांतिका आहे ! 

कधी कधी वाटते की स्त्रियांचे मूळ प्रश्न थोड्याफार फरकाने तसेच आहेत. जेव्हा माणूस म्हणून ती स्वतःचा  विचार करेल व समाजही तिचा  विचार करेल, तेव्हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला असे म्हणता येईल अन उद्याची स्त्री आनंदाने आकाशात स्वैर भरारी घेईल  आकाश स्पर्शून माणूस म्हणून स्वतःकडे पाहील…..  

…  ” तू स्वयं दीप हो ,अक्षदीप हो …”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ स्मृती… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ स्मृती… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…! 

… काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!! 

आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागेमागे फिरून बाजार करत असे….. सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेली ही सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. !  भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. ! 

… एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!! 

तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. 

या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं ! 

आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!

वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही…

असो….. 

फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…

आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता ” धंदा ” करतो….!

मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….

घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!

घरासमोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….

पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…

गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! …. 

माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे…!… 

…. चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… आन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी आजी…! 

आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!! 

या महिन्यात दिवाळी होती….! 

मोठ्या हौसेने आम्ही सुद्धा पणत्या घेतल्या पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! 

… विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…! 

आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते… या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे ! 

आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती…  घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची….. जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत… आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू….  त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….! 

सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे…. 

ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान 30 हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…

… गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला….… लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या … .. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…. ! 

वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या,  मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत. 

वृद्ध लोक, ज्यांना कानाने बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिली आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण  रस्त्यावरच केल्या आहेत. 

शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत. 

या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…

आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….

या अल्लाह…. दर्गाहमे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्तेपे जो बुजुर्ग थंडमे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है …. 

Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people…! 

वाहे गुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…

इस बार हम ने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…

पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? … 

देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर  होते…..

हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..

हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद  “प्रसाद” म्हणून  आम्ही मिळवला आहे… ! 

आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. ! 

कारण…

…. हे सर्व माझ्या हातांनी करणारे…

…. करवणारे…

…. करवून घेणारे…

… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात…!!!

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उत्तरायण… प्रीतीश नंदी ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ उत्तरायण… ब्रिटिश नंदी ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

शरशय्येवर पडल्या पडल्या भोवतालच्या काळोखातील हालचालींचा मागोवा घेत पितामह भीष्माने सोडला एक सुस्कारा…  आता आणखी थोडाच अवधी राहिला….

आसमंतातील मलमूत्राचा दुर्गंध अजूनही पुरता गेला नव्हता, तरीही तो त्रासदायक राहिला नाही.

कुरुक्षेत्राच्या दिशेने येणाऱ्या  थंडगार वाऱ्यांसमवेत येणारी सडक्या मांसाची दुर्गंधीही आताशा नासिकेला जाणवत नाही.

काळोखात दडून गेलेली सारी घटिते आणि अघटिते रात्री-अपरात्री दचकवत नाहीत….

 तो शस्त्रांचा खणखणाट, रथांचा घरघराट, सैन्याचा थरथराट, वायवास्त्रांचा भरभराट, भयकारी विस्फोटांची मालिका, धराशायी होणाऱ्या सैनिकांच्या किंकाळ्या, अश्वांचे असहाय खिंकाळणे, आकांत……. सारे काही अठरा दिवसात संपले ,फक्त अठरा दिवसात….

…. आपण अजूनही येथे उत्तरायणाच्या प्रतीक्षेत तिष्ठत आहोत ! …..

इतक्यात ….

दूरवर थांबला एक रथ, पाठोपाठ वाजली पावले, आणि ऐकू आली रेशमी वस्त्रांची राजस सळसळ.

 मिटल्या डोळ्यांनीच भीष्मांनी ओळखले…….  “युगंधरा,ये ! तुझीच प्रतिक्षा होती…..”

मध्यरात्री उठून आलेल्या वासुदेवाने वाकून स्पर्शली ती क्षताक्षत वृद्ध पावले.

युगंधराचा युगस्वर काळोखात घुमला……

” गांगेया, सूर्याच्या उत्तरायणासोबतच तुझीही पावले मोक्षाच्या दिशेने पडतील. मला अंतिम समयी बोलून घेऊ दे !

मला स्मरते आहे तुझे लखलखीत चरित्र …… पिता शंतनुचा लंपट हट्ट, तुझी उग्र प्रतिज्ञा, सावत्र बंधू चित्रांगद- विचित्रवीर्याचा निर्ममपणे केलेला प्रतिपाळ, अंबा-अंबालिकेवर तू लादलेला अनन्वित नियोग प्रयोग, आणि तुझे शतवीर्यवान पौरुष, तुझ्या उग्र मंगल व्यक्तिमत्त्वाचे प्राखर्य ! परंतु, असे असूनही देवव्रता, ऐनवेळी तू सत्याची कास सोडलीस !…. हे युद्ध तुला टाळता आले असते, शांतनवा !”

युगंधराचे बोल ऐकून भीष्म हसले……

” विधीलिखित कोणाला टळत नाही, हे तूच सांगितलेस ना रे पार्थाला? देवकीनंदना, तुझा चातुर्यचंपक फुलू दे तुझ्या द्वारकेत किंवा आता बदललेल्या हस्तिनापुरात. मरणाच्या दारातल्या म्हाताऱ्याला निदान बोलण्यात तरी गुंडाळू नकोस ! जे युद्ध टाळणे तुला जमले नाही, ते मला कसे जमावे, विश्वंभरा? “

निरुत्तर होऊन वासुदेव कृष्ण निरोप घेऊन निघाला, तेव्हा पूर्वेकडे आरक्त नभामध्ये कोवळे सूर्यबिंब प्रकट झाले होते…. उत्तरायण सुरू झालेले पाहून पितामह भीष्मांनी दोन्ही हात जोडले……

….  भारतीय युद्ध अठरा दिवसात संपले नाही, ते अजूनही सुरूच आहे, असे म्हणतात.

रचना: प्रीतीश नंदी 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपली आवड,आपला कल हे आपले कुटुंबीय,आपली जवळची माणसं आणि आपल्याला पुरेपुर जाणून असणारी आपली मित्रमंडळी हे अगदी नस पकडल्या सारखं जाणतात. ही सगळी आपली माणसं अगदी मनकवडीच असतात असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळेच माझी एक आवड म्हणजे भिन्न भिन्न भाषेतील,निरनिराळ्या कलाकारांनी कामं केलेल्या दर्जेदार शाँर्टफिल्म्स बघणे हे जाणून माझी मैत्रीण मधुर कुळकर्णी हीने मला एका शाँर्टफिल्म चे नाव सुचविले. त्या  मराठी शाँर्टफिल्म चे नाव  “शंभरावं स्थळ”.

त्या नावामधील “स्थळ” हा शब्द आमच्या पिढीपर्यंत तरी अगदी परिचीत आणि नवीन पिढीमध्ये “ठरवून लग्नं” यानेकी “अरेंज्ड मँरेज” करणाऱ्या लग्नाळू उपवर मुलामुलींना थोडाफार फँमिलीअर म्हणजे ओळखीचा.

आमच्या पिढीपर्यंत सरसकट अरेंज्ड मँरेज आणि स्पेशल केस म्हणून तुरळक लव्हमँरेज असा रेशो होता. आता रेशो तोच कायम आहे फक्त बाजूंची अदलाबदल झालीयं. आता लव्हमँरेज सरसकट आणि ठरवून लग्न तुरळक असं बघायला मिळतं, कालाय तस्मै नमः, असो.

आमच्या वेळी होत असलेले ते टिपीकल दाखवण्याचे कार्यक्रम, संपूर्ण माहिती असतांना पण त्याबद्दलच ती अगदी ठराविक प्रकारची प्रश्नोत्तरे हे सगळं बघून, अनुभवून प्रकर्षाने जाणवायचं, खरचं इतक्या जुजबी ओळखीवर दोघही हा भलामोठा संसाराचा डाव मांडतोयं खरा,पण खरचं होतील का हे संसार यशस्वी ? 

मग मनात यायचं खरंच ओळखीतून किंवा परिचयातून, एकमेकांना जाणून घेऊन तसेच आचारविचार ह्यांची देवाणघेवाण करुन मग मात्र नक्कीच  संसार यशस्वी होत असतील. पण ज्यांना अरेंज्ड मँरेज करायचेयं त्यांच्या साठी ह्या “कांदेपोहे”कार्यक्रमाशिवाय पर्यायही नव्हता,वा नाही.

जसाजसा काळ बदलला,पिढी खूप जागरुक, स्वतंत्र विचारांची घडायला लागली,तेव्हा मग ठरवून लग्न करतांना काही जास्तीच्या पाय-या जोडल्या गेल्या. त्यात मग मुलामुलींना एकमेकांशी बोलतांना स्पेस,प्रायव्हसी देणं हे प्रकार सुरू झालेत. हे बघितल्यावर असं वाटलं आता नक्कीच असे विचारविनमयांची चर्चा, देवाणघेवाण झाल्यावर परस्परांना नक्कीच एकमेकांचा पूरेपूर अंदाज येऊन मग हा संसाराचा पाया भक्कम उभा राहून सगळीकडे “आनंदी आनंद घडे” हे वातावरण राहील. पण हा अंदाज ही सपशेल चुकला असे काहीसे अनुभव आलेत कारण कितीही स्पेस, प्रायव्हसी मिळाल्यानंतरही चर्चा, विचारविनिमय ह्यांत फक्त स्वतःकडील व्हाईट साईड वा उजवी बाजू ही फक्त प्रत्यक्षात समोरच्याला दाखविली जाते. नंतर प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर मात्र ह्या दोघांमधील डार्क साईड सामोरी येते,जी त्यांना आता नव्याने कळते. आणि मग संसार हा बहरु लागण्याऐवजी ईगोपाँईंटजवळ येऊन हळूहळू कोमेजायला लागतो.

शेवटी मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली लग्न हे ठरवून करा की लव्हमँरेज ,हे यशस्वी करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तडजोड. कदाचित तडजोडीचे दुसरे नावं संसार असं म्हंटले तरी चालेल. आता फक्त ही जुजबी तडजोड करतांना फक्त दोघांनीही मनात आणायचं, हे आपणं आपल्या जीवाभावाच्या, प्रेमाच्या माणसासाठी करतोय, बस मग पुढे सगळं सुरळीत होतंच. फक्त ह्या तडजोडी जुजबी बाबतीत हव्यात, कारण एकदम पराकोटीच्या तडजोडी दोघांपैकी कुणी करु शकत नाही, आणि खरतरं स्वत्व गमावून तडजोड करुन जगण्यात मजाही नसते.

आता पुढे ह्या शाँर्टफिल्म विषयी पण नक्की लिहेनच. पण नुसतं शाँर्टफिल्म चे नाव वाचले आणि हे विचार भराभर डोक्यातून, मनातून उतरले आणि शब्द बनून बसले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares