मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… सन 1957चं राजकमल स्टुडिओत गुरूदत्तचं प्यासा चित्रपटातलं… ‘सर तेरा जो चकराये, या दिल डूबा जाये… आजा प्यारे पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए… गाण्याचं शुटींगची तयारी होत असताना त्या गाण्यासाठी एक डोक्याला टक्कल असलेल्या  माणसाची गरज भासली… शुटींगचं सगळं  युनीट त्याचा शोध घेण्यास सरसावलं… अख्खा स्टुडिओ पिंजून काढला पण हवा तसा नैसर्गिक टक्कलाचा माणूस मिळेना… त्या वेळेस एक्स्ट्रा सप्लायर्स टूम नसल्याने शुटींगचं बराच वेळ खोळंबून राहिलं… गुरुदत्त नां तो माणूस त्या गाण्यात हवाच होता… तो मिळे पर्यंत त्यांच्या जिवाला चैन नव्हती… जाॅनी वाॅकर आणि गुरूदत्त  फ्लोवर बसून एक कटिंग चहाचे प्याले  घोट घोटाने घेतं…  पहिला दुसरा, तिसरा रिचवत राहिले.. स्पाॅट बाॅय, चायवाला, गाडीचे ड्रायव्हर यांना सुध्दा  राजकमल स्टुडिओच्या बाहेर पिटाळणयात आलं… ‘और जो ऐसे शख्स से धुंड के लायेगा उसे बडा इनाम मिलेगा’ असही सांगण्यात आलं… सगळेच झटून कामाला लागले… आणि आणि तासाभरातच आत्माराम गावकर नावाचा टक्कल असलेला माणूस कुणा सोबत तिथे आणला गेला… लगेचच एक चाय का प्याला त्यांच्या आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांना स्वता गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर यांनी दिला… चहा पान झालं.. . कायं करायचं याची कल्पना गावकरांना दिली… एकदा दोनदा रिहर्सल्स झाली… शुटींग सुरू झाले, लाईट , कॅमेरा, साऊंड ऑन आता अक्शन म्हटले… एव्हढ्या त्या प्रचंड गोंधळात आत्माराम घाबरून गेले… काय करायचं कसं करायचं हे त्यांना सुचेना… आपलं हे काम नव्हे आपण आताच येथून बाहेर गेलेलं बरं म्हणून पळ काढावा.. असं त्यांच्यात मनात आलं आणि तिथून ते बाहेर पडले.. पुन्हा शुटींग थांबवलं… गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर नी त्यांना धीर दिला..एक कटिंग चहा दिला… घाबरून जाऊ नका काहीही होणार नाही… फक्त मी तुम्हांला बसवून मालिश करणार आहे ते तुम्ही करून घायचं ईतकचं… गाणं संपले कि झालं… फिरून गावकरा़ंची मानसिक तयारी झाली…लाईट कॅमेरा.. ॲक्शन पुन्हा तेच घडलं… मग परत परत तसचं घडत गेलं… दरवेळेला कटिंग चहा दिला जायचा.. तरतरी यायची भीती कमी झाली असं वाटायचं … असे बरेच टेक झाले शेवटी निदान एका कडव्या पुरता का होईना  पण शाॅट घेण्याचा ठरला आणि तोही त्यांच्या नकळत… थोडे लाईट अंधूक लावले गेले… आता गावकरांनी पण मनाचा हिय्या केला… आता हिथं न थांबता ताबडतोब बाहेर निघून जायचं… जाॅनी वाॅकरनीं गाण्यात त्यांच्या हाताला धरलं होतं तो हात सोडून तिथून धावतच ते निघाले… ते आपल्या घराकडे येईपर्यंत मागेसुद्धा जरा वळून न बघता… घरात येताच त्यांची बायकोने विचारले, “खयं गेला व्हतास? चाय कधीची करून वाट बघत रव्हली मी…”

“आनं तो चाय हडे नि ओत तो माज्या टकलावर.. ” गावकर चिडले… आज त्यांना एक कटिंग चाय आपली पाठ सोडत नाही हेच समजले…

… प्यासा थेटरला लागला गावकरांनी बायको सोबत पाहिला… विषेश ते गाणं बघून दोघांना आनंद वाटला…

सिनेमा संपला नि सौ. गावकर  म्हणाल्या “गाणं संपे पर्यंत तरी फुकटची  तेल मालिश तरी करुन घ्यायची व्हती… निदान शेवटाक बिदागी तरी मिळाली असती… हया कामाचे तुमका काय मिळाला?”

“एक कटिंग चाय…” गावकर  कसनुसं तोंड करत म्हणाले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

विचार करा बरं एकदा! का बघतो आपण टी. व्ही. वरच्या सिरियल्स?  टाईम पास, मनोरंजन हे तर आहेच. करोनाच्या काळात तर घराबाहेर पडणंसुद्धा काहीजणांसाठी अवघडच झालेलं होतं, त्यामुळे टी. व्ही. वरच्या मालिका बघणं हा या काहीजणांसाठी, आणि ज्यांना एरवीही घराबाहेर जाणं अशक्य आहे, अशांसाठीही जीवनावश्यक विधी झालेला आहे! अर्थात, काही लोक तर व्यसन लागल्यासारखे टी. व्ही.बघत असतात!

 पूर्वी जेंव्हा फक्त दूरदर्शनच दिसत असे, तेंव्हा आठवड्यातून एकदाच ठराविक वेळेला ठराविक मालिका दिसत असत. तेंव्हा त्या मालिकांना काहीतरी स्टॅन्डर्ड असायचं, पुढच्या भागाबद्दल उत्सुकता असायची. आणि आठवड्यातून एकदाच बघायला मिळत असल्यामुळे, त्यांचं अप्रूपही असायचं. पण आता टी. व्ही. वर चॅनल्सचा इतका सुळसुळाट झालेला आहे, की विचारायची सोय नाही! आणि वेळकाळ याचंही काही बंधन नाही! 24 तास टी. व्ही. सुरूच! आणि मग आलटून पालटून त्याच त्याच मालिकांचे ‘रिपीट एपिसोड’! बघा लेको, केंव्हाही!

या मालिकांची काही वैशिष्ट्यं आहेत बरं का! मालिकेत खलनायिका असलीच पाहिजे, त्या शिवाय, बहुतेक मालिका दाखवायला परवानगी मिळत नसावी! तिचे एकदोन जोडीदार तर हवेतच! आणि हे सगळे नायक-नायिकेच्या घरातले लोकच असतात बरं! आपल्याच घरातल्या लोकांना असा त्रास देताना या लोकांना अगदी आंनदाच्या उकळ्या फुटत असताना पण दाखवतात! आणखी श्रीमंती तर दाखवलीच पाहिजे मालिकांमधे! हिंदी मालिका बघितल्या, तर भारतात कुठे दारिद्र्य आहे, हे खरंच वाटणार नाही! त्या मानाने मराठी मालिकांमधली श्रीमंती मर्यादित प्रमाणात दाखवली जाते! आणखी एक, त्या नायक-नायिकांना सुखानं जगू द्यायचंच नाही, असा विडा खलनायिकेनं आणि मालिकेच्या दिग्दर्शकानंही मिळून उचललेला असतो! याच्या मागे काय कारण असावं, हे काही माझ्यासारख्या पामराला तरी कळत नाही बुवा! खलनायिकेचं एक ठीक आहे, पण दिग्दर्शकाचं काय घोडं मारलेलं असतंय नायक-नायिकेनं देवच जाणे! आणखी एक मज्जा म्हणजे, खलनायक, तिचे जोडीदार अत्यंत हुशार आणि जितके म्हणून चांगले लोक असतील मालिकेत, ते, अगदी नायक-नायिका धरून, ते सगळे बिनडोक! सतत खलनायिका या लोकांवर मात करत रहाणार आणि ह्यांना कळतच नाही, कोण सगळं वाईट घडवतंय आपल्या आयुष्यात ते! अगदी मालिका संपेपर्यंत हा लपंडाव चालूच! शिवाय, हे नायक-नायिका, विशेषतः नायिका तर संत महंतच जणू! आसपासच्या सगळ्या लोकांशी इतकं चांगलं वागणार, की त्या चांगुलपणाचं अजीर्ण व्हावं! सगळ्यांसाठी सतत त्याग करत रहाणार, कशाचा ना कशाचा. असे दोन प्रकार माणसांचे, एक पूर्णतः काळी छटा असलेला, आणि एक पूर्ण, पवित्र शुभ्र रंगाचा! सामान्यतः प्रत्येक माणसात दोन्ही छटा मिसळलेल्या असतात. कोणीच पूर्णतः वाईट किंवा पूर्णतः, म्हणजे, अती चांगला नसतो. खरोखरचे संत-महात्मे सोडून! पण नायिका गुणांची पुतळीच दाखवली पाहिजे असाही नियम असावा, मालिका बनवण्यासाठी.

बरं, एखादी मालिका आधी विनोदी म्हणून जाहिराती करतात, आपल्याला वाटतं, चला, त्या सासवा-सुनांच्या मालिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल, म्हणून आपण ती मालिका बघायला सुरुवात करतो, पण थोड्याच दिवसात आपला भ्रमनिरास करून त्या मालिकेत खलनायिका घुसवली जाते आणि सुरु होतं परत तेच दळण! क्वचित काही मालिका या सगळ्याला अपवाद ठरतात आणि बघायला आवडतात.  उदा. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ सारखी निखळ विनोदी मालिका. आजही त्या मालिकेच्या नुसत्या आठवणीने सुद्धा हसू येतं. ही हिंदी मालिका होती. पण अशा निखळ विनोदी मालिका फार दिवस चालू ठेवणं अवघड असतं. कारण सातत्त्यानं निखळ विनोदी लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पु. लं. सारखे जीनियस या क्षेत्रात कमीच असतात.

मराठीतही सुरुवातीच्या काळात चांगल्या मालिका असायच्या. पूर्वीच्या, फक्त दूरदर्शन होतं, त्या काळातल्या ‘बुनियाद’ आणि ‘हम लोग’ या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला होता. तसेच ‘तमस’ ही देशाच्या फाळणीबद्दलची मालिका, सई परांजपे यांची ‘अडोस-पडोस’ या काही दर्जेदार मालिका आजही लक्षात आहेत.  ‘झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘असंभव’, ‘आनंद भुवन’ इ. मी बघितलेल्या काही मराठी मालिकाही आजही आठवतात. पण हळूहळू रोजच्या मालिकांचा रतीब जसा सुरु झाला, तसतसा मालिकांचा दर्जा घसरत गेला. आणि पूर्वी मालिकांना तेरा भागांचं बंधन असायचं, आता तशी काही मर्यादाच नसल्यामुळे प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत बघत आणि वाट्टेल तशा भरकटत मालिका वर्ष नु वर्षे चालूच रहातात.

या मालिकांमधून न पटणाऱ्या, वर्तमान जगाशी सुसंगत नसलेल्या गोष्टीही इतक्या घुसडलेल्या असतात, की विचारायची सोय नाही! हल्ली कोणत्या तरुण मुली साड्या नेसतात? तरुण जाऊ दे, सासू, आई, आज्जी या स्त्रियाही हल्ली फक्त सणा-समारंभातच साडी नेसतात. ही अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे. पण या मालिकांमधल्या मुली लग्नाआधी ड्रेस वगैरे घालत असल्या तरी लग्न झाल्या क्षणापासून साड्याच नेसायला लागतात. नाहीतर त्या मग वाईट चालीच्या असतात! आता या कर्माला काय म्हणावं? दुष्ट, खलनायिका यांनाच ड्रेस घालायची परवानगी असते मालिकांमधे! आणि सासू, सुना, आत्या, मावशी जी काही स्त्री पात्रं असतील, त्या दिवसरात्र झगमगीत भारी साड्या आणि भरपूर दागदागिने घालून सदैव लग्न समारंभासाठी तयार असल्यासारख्या वावरत असतात मालिकेत! आणि तरीही कुठे बाहेर जायचं असेल तर “मैं तयार हो के आती हूं”, अरे काय! हे हिंदी मालिकांचं जग आहे. हल्ली मराठीमध्ये बहुतेक इतका भडक प्रकार नसतो, पण लग्नानंतर साडी कम्पल्सरी! आणखी एक गम्मत! आपल्यासारख्या सामान्य माणसांचा पोलिसांशी असा कितीकसा संबंध येतो? फार फार तर एखादे वेळी सिग्नल तोडला, किंवा वन वे मधून उलटं जाताना पकडलं गेल्यास दंड भरण्यापुरता! हो की नाही? पण या प्रत्येक मालिकेत या सामान्य घरातला एक तरी माणूस तुरुंगात गेलेला  दाखवलाच पाहिजे, असाही नियम असावा! साध्या-सरळ, सज्जन लोकांचा अतोनात छळ झालेला दाखवला, की या लेखक -दिग्दर्शकांना कसला आसुरी आनंद मिळतो, कोणजाणे!

ऐतिहासिक मालिका बघणं तर मी कधीच सोडून दिलंय. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची एवढी मोडतोड करतात, की जे लोक अगदी थोडंफार जाणतात, वाचतात त्यांनाही ते बघवू नये! काही अपवाद असतीलही, पण सर्वसाधारण अनुभव काही चांगला नाही! पौराणिक मालिकांमधे, किंवा देव देवतांवर काढलेल्या मालिकांमधे तर काहीही दाखवायची प्रचंड मुभाच मिळालेली असते, या लोकांना. कारण, त्यात खरं खोटं कसं आणि कोण सांगणार? पहिल्या ‘महाभारत’ आणि ‘रामायणा’ मधील चमत्कारांनीच त्याची सुरुवात करून दिलेली आहे. पण ते आपले टी. व्ही. बघण्याचेच सुरुवातीचे दिवस होते, म्हणून त्या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते! 

क्रमशः…

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

(… तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक !) — इथून पुढे —

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधड्या उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

– मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बांका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ्  स्टोन डेफ्!

— समाप्त —

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

गीता जयंती निमित्त एका विश्वविक्रमी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग नुकताच आला.

शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने लो.टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम साकारला.

सातशे विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचे सातशे श्लोक सुवाच्य हस्ताक्षरात लिहून काढले.प्रत्येकाने एक श्लोक लिहिला, व नंतर क्रमाने अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचे हे हस्तलिखित एकत्र करून अवघ्या पाच मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचा हस्तलिखित ग्रंथ शिक्षकांना प्रदान करण्यात आला.

हा अत्यल्प वेळेत पूर्ण गीता लिहून काढण्याचा विश्वविक्रम आहे.

हा उपक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणं हा माझ्या जीवनातील एक अत्यंत रोमांचकारक अनुभव होता.

या विद्यार्थ्यांनी गेले दोन महिने यासाठी भरपूर सराव केला होता. त्यांच्या इतकेच कष्ट शाळेच्या शिक्षकांनी, पालकांनी घेतले होते.

‘ इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने या एकमेवाद्वितीय उपक्रमाची नोंद घेतली.

या अभिनव उपक्रमासाठी शिक्षण मंडळ, कराडच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी,शिक्षक/ शिक्षिका,व सर्व कर्मचारी यांनी अपार परिश्रम घेतले, व त्याला विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय साथ दिली, त्यामुळे हा विश्वविक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने साकारला.

— शिक्षण मंडळ कराडच्या सर्व परिवाराचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने सातशे कुटुंबात श्रीमद् भगवत् गीतेचा संस्कार पोहोचला.

— अशा उपक्रमांनी समाजमन संस्कारित होते. सत्य, न्याय, नीति या दैवी गुणसंपदेचा परिचय होऊन समाज सन्मार्गावर वाटचाल करतो.

लेखक : श्री अभय भंडारी, विटा.

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आयुष्य म्हणजे काय..

एक धुंद संध्याकाळ, ४ मैत्रिणी , ४ कप चहा, १ टेबल … 

आयुष्य म्हणजे काय..

१ इनोव्हा कार, ७ मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता ….

आयुष्य म्हणजे काय….

१ मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा …

आयुष्य म्हणजे काय…

शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, १ कचोरी, २ सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद …

आयुष्य म्हणजे काय…

फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची  गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी … 

आयुष्य म्हणजे काय … 

काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रिणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी, आणि डोळ्यातले पाणी …

 

आपण खूप मैत्रिणी  जमवतो…

काही खूप जवळच्या मैत्रिणी बनतात …

काही खास मैत्रीणी  होतात …

काहींच्या आपण प्रेमात पडतो…

काही परदेशात जातात…

काही शहर बदलतात …

काही आपल्याला सोडून जातात…

 

आपण काहींना सोडतो …

काही संपर्कात राहतात …

 

काहींचा संपर्क तुटतो …

 

काही संपर्क करत नाहीत … त्यांच्या अहंकारामुळे …

कधी आपण संपर्क करत नाही … आपल्या अहंकारामुळे  …

त्या कुठेही असोत… कशाही असोत… आपल्याला त्यांची आठवण असतेच … 

आपलं प्रेमही असतं…आपल्याला त्यांची उणीव भासते…आपल्याला त्यांची काळजीही असते ..

— कारण आपल्या आयुष्यात त्यांचं असं एक स्थान असतंच…

तुम्ही किती वेळा भेटता,  बोलता,  किंवा किती जवळचे आहात  ते महत्वाचे नाही …

 

जुन्या मैत्रिणींना कळू दे, की तुम्ही त्यांना विसरला नाहीत …

 

आणि नवीन मैत्रिणींना  सांगा, की तुम्ही त्यांना विसरणार नाही…

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर ,.ह्याची अनंत रुपे,आणि वेगवेगळी नावे.त्याचं सगळ्यांना भावलेलं नाव म्हणजे कान्हा.कान्हा म्हंटला की आठवतो आपल्या जवळचा,आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला,समजायला पुढेपुढे जावं तितका तितका तो मारुतीच्या शेपटीसारखा वाढतच जातो.पण तरीही कान्हाला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून एकवीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक मा.श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळुहळू माझ्यासारख्या वाचकांच्या बुद्धीस झेपेल,पचेल,आकलन होईल असा माझा कान्हा माझ्यासमोर उलगडायला सुरवात केली.तेव्हा प्रकर्षाने जाणवले की आपल्याला आपला हा मधुसूदन कितीतरी कमी कळलायं.हिमनगाच्या टोकाप्रमाणं.जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.खूप सुंदर रितीने कृष्णाची विविध रुपे ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत.मध्ये महाभारतात घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा संदर्भासहित कळतो.

या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला,गुरू दोन,भगिनी तीन,माता पिता दोन,तसेच बहुपत्नी,कन्या,पुत्र होते.सख्या मात्र दोनच.एक राधा आणि दुसरी द्रौपदी. राधा ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळला युगंधर मधून.”रा” म्हणजे लाभो किंवा मिळो आणि धा म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्ती.

आज कृष्ण हा शब्द उच्चारल्याबरोबर आठवतात ते सगळे कृष्णावर अलौकिक प्रेम , भक्ती करणारे समस्त कृष्णप्रेमी. त्यापैकी एक पराकोटीचे कृष्णप्रेमी म्हणून ज्यांची हमखास आठवण येते ते संत सूरदास. ज्यांना आपण  आध्यात्मिक क्षेत्रातील सूर्य पण म्हणतो. त्यांची जयंती नुकतीच झाली. त्यांना विनम्र अभिवादन.

सूरदास हे नाव उच्चारल्या बरोबर “मै नही माँखन खायो”ही रचना आठवते.अशा कित्येक लोकप्रिय रचना सूरदासांच्याच. ह्या कर्तृत्वात त्यांच अंधत्व कुठेही आड आलं नाही.

सूरदासांची एक मला अत्यंत भावलेला गुण म्हणजे त्यांचे “एका देवा केशवा” अशी परमोच्च भक्ती.हिंदीच्या ब्रज 

बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते.हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी  ते प्रसिद्ध आहेत.

सूरदासांचा जन्म दिल्लीजवळील एका लहान गावात ,एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले.  वल्लभाचार्यांनी त्यांना 

श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर ह्या त्यांच्या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून  तानसेनाच्या  मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या आज्ञेनंतर सुद्धा  सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे.  सूरसागरा शिवाय सूरदासांनी  सूरसारावली, साहित्यलहरी नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.

साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ह्यांना दर्शन देऊन त्यांचे अंधत्व दूर केले होते. परंतू त्यांनी भगवंताकडे मागणे मागितले की मला पुन्हा अंध कर.मला फक्त तू दिसायला हवा आहेस आणि तू तर मला अंध असतांनाही दिसतो. किती अपरंपार भक्ती ही.

अशा ह्या अलोट भक्ती असणाऱ्या कृष्णप्रेमी सुरदासांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या अतूट भक्ती ला मनोमन प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘शॉप’ या शब्दावरून ‘शॉपी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

फोटो कोणी काढला माहीत नाही . पण  हा सुंदर फोटो खूप काही सांगुन जाणारा आहे. 

— फोटो काळा पांढरा आहे . पण या घरातील सुख समाधान व एकजुटीचे सारे रंग दाखवणारा आहे. 

— यात कोणी तरी प्रतिकात्मक आबा आहे. त्याने डोळे वटारले की घर शांत. 

— कोणी तात्या आहे, जो चार चार बैलांचा औत जुंपायचा. 

— कोणी बापू आहे, जो दोन दोन भाकरी वरण्याच्या आमटीत कुस्करून खायचा. 

— कोणी शांताक्का आहे. .पन्नास पोळ्या पटापटा लाटायची. 

— कोणी बनाकाकू आहे, जी चटणी घरात कांडायची. 

— कोणी कुसुम आहे जी उभ्या आडव्या २१ ठिपक्याची रांगोळी काढायची.  

— एक छोट्या आहे. हरणी गाय आहे. 

— घर साधं आहे. पण नात्याच्या एकोप्याचा पाया भक्कम आहे. 

आपली, आपल्या आजोबा – पणजोबांची घरं अशीच होती . आता पोरांना काका माहित नाही. आत्या माहित नाही. ज्या घरात नणंद नाही, दीर नाही, खोकणारा सासरा नाही , गुडघे दुखतात म्हणून कण्हणारी सासू नाही, – अशा घराला नववधूची पसंती आहे. 

— त्यामुळे अशी  भरलेली घरं आता दिसणारच नाहीत. आणि असा सर्वांचा एकत्र फोटोही शक्य नाही..खरंच गेले ते दिवस — राहिल्या त्या आठवणी.  

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले  

काळानुसार बदलत जातो B F चा अर्थ …

 

एक छोटा मुलगा छोट्या मुलीला म्हणाला ! I am your BF! मी तुझा  BF आहे 

मुलीने विचारलं  — What is BF? 

मुलगा हसतो आणि म्हणतो… – म्हणजे Best Friend. खूप चांगला मित्र !

 

काही काळ जातो , मुलगा तारूण्यात प्रवेश करतो…

आणि ती मुलगी सुंदर युवती होते…

तो त्या युवतीला म्हणतो ; – I am your BF!

– मुलगी लाजत त्याच्या कानाशी हळूवार पणे विचारते… आता – What is BF? 

— मुलगा म्हणाला – म्हणजे पुरूष मित्र – Boy Friend 

 

काही वर्षानी त्यानी लग्न केले , त्यांना छान गोंडस बाळे झाली..

नवरा हसत बायकोला म्हणतो… — I am your BF! 

– बायको हसत नवऱ्याला विचारते — What is BF? -आता  BF म्हणजे काय 

— नवरा पुन्हा हसतो आणि मुलांकडे पहात म्हणतो… – तुझ्या मुलांचा मी बाबा.  Baby’s Father 

 

आणखी काही काळ जातो, दोघे वृद्ध होतात…समुद्रकिनारी बसून मावळता सूर्य ते पहात होते…

वृद्ध तिला पुन्हा म्हणाला.. – सखे   I am your BF!

– वृद्ध महिला हसली , आपल्या वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खूणांसह म्हणाली…

– What is  BF ? — आता सांग BF म्हणजे काय 

– वृद्ध आनंदात परंतु रहस्यमयी आवाजात म्हणाला…

— Be Forever — सदा एक दूजे के लिए !

 

जेव्हां वृद्ध जीवनाचा अखेरचा श्वास घेत होता , तेव्हाही म्हणतो…

 

— I am your BF!

— वृद्धा दु:खित अंतकरणाने विचारते : —- What is BF??? 

— डोळे बंद करत वृद्ध म्हणाला :

— म्हणजे Bye Forever — अलविदा सदा के लिए…

 

काही दिवसानी ती वृद्धा ही पंचतत्वात विलीन झाली….. 

…. भिंती वर दोघांचे फोटो लावले….

…. मुलांनी त्यावर एक सुंदर वाक्य लिहिले…

 

…….. BF…….  Besides Forever ….. कायमस्वरुपी जवळच आहेत…… 

 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पानी तेरा रंग कैसा….?

काल एक खूप मस्त आणि विचारात पाडणारी शाँर्टफिल्म बघण्यात आली. त्या शाँर्टफिल्मच नाव “जी ले जरा…..लाईफ तक.

नावाप्रमाणचं ही शाँर्टफिल्म थोडक्यात खूप सारा आशय देऊन जाणारी आहे.

शाँर्टफिल्म मध्ये काम करणारे कलाकार इन मीन तीन. एक तरुण जोडपं आणि त्या जोडप्यातील मुलाची आई ,असे तीघजणं एकत्र घरी राहात असतात.  सून, मुलगा दोघही नोकरीवाले, त्या बाईचा नवरा गेल्यापासून तिची संसारातील विरक्ती, नोकरी सोडून घरी बसणं, बाहेर समाजात वावरणे एकदम बंद, घरातं एक घरातं हा वसा घेऊन चालल्यासारखं त्या बाईचं वागणं खूप खुपतं असतं त्या जोडप्याला.शेवटी आईला दुःख विसरायला लावून समाजात परत पूर्वी सारख आईला वागायला लावायचचं अशी त्या जोडप्याची मनोमन ईच्छा.नेहमीप्रमाणे शाँर्टफिल्म चा शेवट गोड.

ह्या फिल्ममधून खूप गोष्टी कळल्या,शिकाव्या अश्या वाटल्या. कुठलिही व्यक्ती समाजात वावरतांना,संसारात रमतांना अनेक वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या जाते, बांधल्या जाते.आणि मग सर्वांशी ती व्यक्ती नकळत अगदी मनातून, मनापासून असे बंध तयार करते. शक्यतो कुठलिही व्यक्ती अनेक व्यक्तींमध्ये गुंतून जाते. अर्थातच त्यातील काही व्यक्ती ह्या अगदी अतिजवळच्या,काही थोड्या जवळच्या अशी वर्गवारी आपोआपच सगळ्यांचीच पडते.

अनेक बंधनांनी घट्ट बांधल्या गेलेल्या अनेक व्यक्तींपैकी केव्हा तरी कुठलीतरी व्यक्ती ही आपल्याला कायमची दुरावणारच.हे निसर्गचक्र वा जगरहाटीच म्हणावी लागेल. काही वेळेस अगदी जवळची व्यक्ती दुरावली की तो आघात खूप जास्त असतो ,अगदी मान्य ,पण म्हणून ह्याचा अर्थ बाकी नाती संपली,व्यवधान तुटले, असं अजिबात नसतं.पण काय होतं, ह्या अपरिमीत दुःखापुढे कधीकधी आपली कर्तव्य, आपले इतर गुंतलेले भावबंध, इतर नात्यांच्या वाट्याचं प्रेम ह्याचा जणू विसर पडून कुणी कुणी स्वतःभोवती घट्ट कोष विणून घेतात, ह्या कोषात शिरायची ना कुणाला प्राज्ञा असते वा ना कुणात हिंमत. आणि इथेच गणित चुकत जातं.

माझ्या मते आपल्या मनाचे भावनांचे अनेक लाँकर्ससारखे कप्पे करावे,त्या प्रत्येक कप्प्याला स्वतंत्र किल्ली असावी, कुठलीच किल्ली ही दुसऱ्या कप्प्याला लागणारी नसावी. म्हणजे काय होईल समजा एखाद्या कप्प्याची किल्लीच अचानक हरवली तर दुसऱ्या कप्प्यांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. ही भुमिका असते जरा अवघड,परीक्षा बघणारी पण अगदीच अशक्यप्राय अशी नसते. आपण एखाद्या नात्याच्या स्मृतीतच फक्त गुंतुन राहतांना जर आपल्याला बाकी उर्वरित चालत्या बोलत्या नात्यांचा विसर पडला तर बाकीच पुढच सगळंच अवघड होऊन जातं. म्हणून तेव्हा मग “पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलाँए वैसा” ही भुमिका आणि अशी वर्तणूक बाकी उरलेल्या नात्यांना न्याय देऊ शकते आणी महत्त्वाचे म्हणजे आपल्याशी जोडलेली ही नाती जास्त आनंद आणि सुखसमाधान उपभोगू शकतात हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares