मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘शॉप’ या शब्दावरून ‘शॉपी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

फोटो कोणी काढला माहीत नाही . पण  हा सुंदर फोटो खूप काही सांगुन जाणारा आहे. 

— फोटो काळा पांढरा आहे . पण या घरातील सुख समाधान व एकजुटीचे सारे रंग दाखवणारा आहे. 

— यात कोणी तरी प्रतिकात्मक आबा आहे. त्याने डोळे वटारले की घर शांत. 

— कोणी तात्या आहे, जो चार चार बैलांचा औत जुंपायचा. 

— कोणी बापू आहे, जो दोन दोन भाकरी वरण्याच्या आमटीत कुस्करून खायचा. 

— कोणी शांताक्का आहे. .पन्नास पोळ्या पटापटा लाटायची. 

— कोणी बनाकाकू आहे, जी चटणी घरात कांडायची. 

— कोणी कुसुम आहे जी उभ्या आडव्या २१ ठिपक्याची रांगोळी काढायची.  

— एक छोट्या आहे. हरणी गाय आहे. 

— घर साधं आहे. पण नात्याच्या एकोप्याचा पाया भक्कम आहे. 

आपली, आपल्या आजोबा – पणजोबांची घरं अशीच होती . आता पोरांना काका माहित नाही. आत्या माहित नाही. ज्या घरात नणंद नाही, दीर नाही, खोकणारा सासरा नाही , गुडघे दुखतात म्हणून कण्हणारी सासू नाही, – अशा घराला नववधूची पसंती आहे. 

— त्यामुळे अशी  भरलेली घरं आता दिसणारच नाहीत. आणि असा सर्वांचा एकत्र फोटोही शक्य नाही..खरंच गेले ते दिवस — राहिल्या त्या आठवणी.  

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले  

काळानुसार बदलत जातो B F चा अर्थ …

 

एक छोटा मुलगा छोट्या मुलीला म्हणाला ! I am your BF! मी तुझा  BF आहे 

मुलीने विचारलं  — What is BF? 

मुलगा हसतो आणि म्हणतो… – म्हणजे Best Friend. खूप चांगला मित्र !

 

काही काळ जातो , मुलगा तारूण्यात प्रवेश करतो…

आणि ती मुलगी सुंदर युवती होते…

तो त्या युवतीला म्हणतो ; – I am your BF!

– मुलगी लाजत त्याच्या कानाशी हळूवार पणे विचारते… आता – What is BF? 

— मुलगा म्हणाला – म्हणजे पुरूष मित्र – Boy Friend 

 

काही वर्षानी त्यानी लग्न केले , त्यांना छान गोंडस बाळे झाली..

नवरा हसत बायकोला म्हणतो… — I am your BF! 

– बायको हसत नवऱ्याला विचारते — What is BF? -आता  BF म्हणजे काय 

— नवरा पुन्हा हसतो आणि मुलांकडे पहात म्हणतो… – तुझ्या मुलांचा मी बाबा.  Baby’s Father 

 

आणखी काही काळ जातो, दोघे वृद्ध होतात…समुद्रकिनारी बसून मावळता सूर्य ते पहात होते…

वृद्ध तिला पुन्हा म्हणाला.. – सखे   I am your BF!

– वृद्ध महिला हसली , आपल्या वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खूणांसह म्हणाली…

– What is  BF ? — आता सांग BF म्हणजे काय 

– वृद्ध आनंदात परंतु रहस्यमयी आवाजात म्हणाला…

— Be Forever — सदा एक दूजे के लिए !

 

जेव्हां वृद्ध जीवनाचा अखेरचा श्वास घेत होता , तेव्हाही म्हणतो…

 

— I am your BF!

— वृद्धा दु:खित अंतकरणाने विचारते : —- What is BF??? 

— डोळे बंद करत वृद्ध म्हणाला :

— म्हणजे Bye Forever — अलविदा सदा के लिए…

 

काही दिवसानी ती वृद्धा ही पंचतत्वात विलीन झाली….. 

…. भिंती वर दोघांचे फोटो लावले….

…. मुलांनी त्यावर एक सुंदर वाक्य लिहिले…

 

…….. BF…….  Besides Forever ….. कायमस्वरुपी जवळच आहेत…… 

 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पानी तेरा रंग कैसा…?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पानी तेरा रंग कैसा….?

काल एक खूप मस्त आणि विचारात पाडणारी शाँर्टफिल्म बघण्यात आली. त्या शाँर्टफिल्मच नाव “जी ले जरा…..लाईफ तक.

नावाप्रमाणचं ही शाँर्टफिल्म थोडक्यात खूप सारा आशय देऊन जाणारी आहे.

शाँर्टफिल्म मध्ये काम करणारे कलाकार इन मीन तीन. एक तरुण जोडपं आणि त्या जोडप्यातील मुलाची आई ,असे तीघजणं एकत्र घरी राहात असतात.  सून, मुलगा दोघही नोकरीवाले, त्या बाईचा नवरा गेल्यापासून तिची संसारातील विरक्ती, नोकरी सोडून घरी बसणं, बाहेर समाजात वावरणे एकदम बंद, घरातं एक घरातं हा वसा घेऊन चालल्यासारखं त्या बाईचं वागणं खूप खुपतं असतं त्या जोडप्याला.शेवटी आईला दुःख विसरायला लावून समाजात परत पूर्वी सारख आईला वागायला लावायचचं अशी त्या जोडप्याची मनोमन ईच्छा.नेहमीप्रमाणे शाँर्टफिल्म चा शेवट गोड.

ह्या फिल्ममधून खूप गोष्टी कळल्या,शिकाव्या अश्या वाटल्या. कुठलिही व्यक्ती समाजात वावरतांना,संसारात रमतांना अनेक वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या जाते, बांधल्या जाते.आणि मग सर्वांशी ती व्यक्ती नकळत अगदी मनातून, मनापासून असे बंध तयार करते. शक्यतो कुठलिही व्यक्ती अनेक व्यक्तींमध्ये गुंतून जाते. अर्थातच त्यातील काही व्यक्ती ह्या अगदी अतिजवळच्या,काही थोड्या जवळच्या अशी वर्गवारी आपोआपच सगळ्यांचीच पडते.

अनेक बंधनांनी घट्ट बांधल्या गेलेल्या अनेक व्यक्तींपैकी केव्हा तरी कुठलीतरी व्यक्ती ही आपल्याला कायमची दुरावणारच.हे निसर्गचक्र वा जगरहाटीच म्हणावी लागेल. काही वेळेस अगदी जवळची व्यक्ती दुरावली की तो आघात खूप जास्त असतो ,अगदी मान्य ,पण म्हणून ह्याचा अर्थ बाकी नाती संपली,व्यवधान तुटले, असं अजिबात नसतं.पण काय होतं, ह्या अपरिमीत दुःखापुढे कधीकधी आपली कर्तव्य, आपले इतर गुंतलेले भावबंध, इतर नात्यांच्या वाट्याचं प्रेम ह्याचा जणू विसर पडून कुणी कुणी स्वतःभोवती घट्ट कोष विणून घेतात, ह्या कोषात शिरायची ना कुणाला प्राज्ञा असते वा ना कुणात हिंमत. आणि इथेच गणित चुकत जातं.

माझ्या मते आपल्या मनाचे भावनांचे अनेक लाँकर्ससारखे कप्पे करावे,त्या प्रत्येक कप्प्याला स्वतंत्र किल्ली असावी, कुठलीच किल्ली ही दुसऱ्या कप्प्याला लागणारी नसावी. म्हणजे काय होईल समजा एखाद्या कप्प्याची किल्लीच अचानक हरवली तर दुसऱ्या कप्प्यांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. ही भुमिका असते जरा अवघड,परीक्षा बघणारी पण अगदीच अशक्यप्राय अशी नसते. आपण एखाद्या नात्याच्या स्मृतीतच फक्त गुंतुन राहतांना जर आपल्याला बाकी उर्वरित चालत्या बोलत्या नात्यांचा विसर पडला तर बाकीच पुढच सगळंच अवघड होऊन जातं. म्हणून तेव्हा मग “पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलाँए वैसा” ही भुमिका आणि अशी वर्तणूक बाकी उरलेल्या नात्यांना न्याय देऊ शकते आणी महत्त्वाचे म्हणजे आपल्याशी जोडलेली ही नाती जास्त आनंद आणि सुखसमाधान उपभोगू शकतात हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमुटभर_गोडी…… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ चिमुटभर_गोडी…… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

” भाजीत चिमूटभर साखर घाल गं म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते ” 

 स्वयंपाक करताना आजी म्हणायची भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहीत असायचं कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी ,थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ”  म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची . 

चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो असं म्हणायची. 

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल ,चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो, असं आई पण म्हणायची . म्हणूनच  त्यांचे संसार विना कलह झाले.

कामवाल्या बाईबाबतही असंच.  तिने कधी दांडी मारली ,कधी उशीरा आली तरी ती पण एक संसारी बाई 

आहे ,आपल्यापेक्षा  तिला आव्हानं असतात जास्त.  मग अशावेळी “ का गं आज उशीर झाला ? बरी आहेस 

ना ?काळजी घे गं बाई. चल दोन घास खाऊन घे “ म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील. 

थोडी माणुसकी खूप मोठं काम करते . 

थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात. आजी  नेहमी म्हणायची आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण . एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.

आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं .

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू  शकतो .

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

चम्बा रुमालमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंबा रुमाल – चंबा, हिमाचल प्रदेश – लेखिका – सुश्री स्वप्ना कुलकर्णी☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

चंबा रुमाल – चंबा, हिमाचल प्रदेश – लेखिका – सुश्री स्वप्ना कुलकर्णी☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

चंबा रुमालाबद्दल माहिती मिळवताना एक सुरेख वर्णन वाचलं, Paintings In Embroidery– हातांनी भरलेले चंबा रुमाल इतके अप्रतिम रंगसंगतीचे आणि नाजूक कलाकुसरीचे असतात की ते कापडावरील रंगवलेलं एखादं चित्रच वाटावं.

सतराव्या शतकातील चंबा राजघराण्यातील राण्या आणि मानाच्या स्त्रिया रेशमी किंवा मलमली कापडावर वैशिष्टय़पूर्ण भरतकाम करत असत. हे मऊसूत कापडाचे रुमाल हात, नाक किंवा तोंड पुसायला नसून राजघराण्याकडून दिल्या जाणार्‍या नजराण्यावर झाकायला, लग्नाला उभ्या असलेल्या मुलीला कलाकुसर जमते हे समजायला (आपल्याकडील रुखवत), किंवा दुसर्‍या राजघराण्याला भेट देताना अशा अगदी खास प्रसंगीच उपयोगात येत असत. सामान्य लोकांपर्यंत ही कला तेव्हा पोहोचली नव्हती.

रेशमी किंवा अत्यंत तलम कापडावर आधी चित्राची काळ्या रंगात आकृती काढायची आणि मग विशिष्ट टाके(Double Satin Stich) वापरून दोन्ही बाजूंना भरायचे. या रुमालांवर कृष्णलीला, पौराणिक, याशिवाय रोजच्या जीवनातील प्रसंग, तसेच निसर्गसौंदर्य भरलेले असत. लाल, निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी आणि गडद गुलाबी मुख्य रंग. यातील कृष्ण कायम निळा !!

बौद्ध धर्मातील जातक कथांमध्ये (इसवीसन पूर्व चौथे शतक) या रुमालांचा उल्लेख आहे. पठाणकोट आणि चंबा येथे या पद्धतीचे भरतकाम करत असत असा त्याचा सरधोपट अर्थ. राजा उमेद सिंगने (1748-1768) या भरतकामाला खूप प्रोत्साहन दिले. पुढे राजा भुरी सिंग (1911) यांनी नाजूक भरतकाम केलेले कापड ब्रिटिशांना भेट दिले आणि तेव्हापासून ते ‘ चंबा रुमाल ‘ म्हणून प्रसिद्ध झाले. 

पुढे राजघराणी कमी झाली आणि ही कला हळूहळू सामान्य लोकांपर्यंत पोचली. मध्यंतरी लुप्त होऊ घातलेले हे विशिष्ट भरतकाम आता हिमाचली किंवा पहाडी शाली, स्टोल, जाकिट आणि टोप्यांवर दिसू लागले आहे.

गुरदासपुर येथील गुरुद्वारात एक सुंदर, तलम व रेशमी रुमाल जतन करण्यात आला आहे. हा रुमाल पंधराव्या शतकातील असून बीबी नानकी यांनी आपल्या भावाला, सिख गुरु नानक देव यांना स्वतः भरलेला हा रुमाल लग्नात भेट दिलेला आहे.

कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग भरलेला एक रुमाल, द व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम येथे पहावयास मिळतो.

(आपल्या राष्ट्रातील तिथे असलेल्या अशा ढिगभर वस्तू आपण परत मागितल्या तर ते म्युझियम ओस पडेल)

लेखिका — सुश्री स्वप्ना कुलकर्णी 

संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय गंमत आहे बोलण्यात— ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ काय गंमत आहे बोलण्यात— ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण “शब्द” किती पटकन बदलतो,

कशालाही नावं देताना आपण त्यांच्या “स्थाना”वरून निश्चित ठरवतो.

 

नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला “खड्डा” म्हणून हिणवतो…….

तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला “खळी” म्हणून खुलवतो…….

 

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला “डाग” म्हणून डावलतो…….

तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला “तीळ” म्हणून गोंजारतो…….

 

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला “जटा” म्हणून हेटाळतो…….

तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला “बटा” म्हणून सरकवतो…….

 

असंच असतं आयुष्यात आपल्याही “सोबती”नेच आपण तसे घडतो…….

चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो, “योग्य” सोबतीनेच अधिक बहरतो……

 

एकदा प्रवीण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरले आहेत… दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे… मग असे दोन वेगळे शब्द का ..?

शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या…… 

…चुकतोयस तू प्रवीण…

 ,..जे निरभ्र असते ते आकाश..

 आणि  ..जे भरून येते ते आभाळ..!!

…आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या… त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!! 

अशीच आभाळमाया तुम्हा सर्वांमध्ये राहू देत. हीच प्रार्थना 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – जालीम इलाज ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 जालीम इलाज ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार कसा आहेस ?”

“बरा आहे.”

“अरे पण तुझ्या आवाजावरून आणि मरगळलेल्या हालचाली वरून, नुकताच एव्हरेस्ट वगैरे चढून आल्या इतका दमलेला वाटतोयस.”

“हो, दमलोय खरा, कारण सध्या वर्क फॉर होम चालू आहे ना माझ !”

“काय ?”

“वर्क फॉर होम म्हटलं मी, काही चुकलं का ?”

“चुकलं म्हणजे काय चुकलंच, अरे आमचा मुलगा वर्क फ्रॉम होम करतोय आणि…. “

“मी वर्क फॉर होम.”

“म्हणजे चुकलं की नाही तुझं ?”

“पण पंत, मी वर्क फॉर होमच करतोय, म्हणजे घरची सगळी काम, स्वयंपाक सोडून एकट्याने करतोय.”

“अरे पण माझा मुलगा…. ?”

“अहो पंत, तो वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे ऑफिसच काम घरून करतोय आणि मी… “

“वर्क फॉर होम म्हणजे घरची काम, बरोबर ?”

“आता कसं बोललात पंत ! सध्या कामवाल्या मावशी येऊ शकत नाहीत कारण…..”

“मला कारण माहिती आहे, पण तुला तुझ्या या वर्क फॉर होम मधे तुझी बायको काही मदत करीत असेलच ना ?”

“अजिबात नाही, ती म्हणते मी तुम्हाला मदत केली तर स्वयंपाकाचे काय, तुमची उपाशी रहायची तयारी असेल तर करते मदत, आता बोला !”

“म्हणजे कठीणच आहे तुझं आता मावशी कामाला येई पर्यंत.”

“हो ना, म्हणूनच माझा आवाज तुम्हाला जरा दमल्या सारखा वाटला असेल.”

“असेल असेल, पण काय रे तुझे कान….. “

“कान ? कान आहेत जाग्यावर पंत आणि मला ऐकायला सुद्धा नीट…. “

“अरे त्या बद्दल नाही मी बोलत पण तुझे कान नेहमी पेक्षा… “

“पंत माझ्या कानाचे काय ते स्पष्ट बोला, उगाच मला कोड्यात टाकू नका.”

“अरे हो हो, किती घाई करशील. जरा मला नीट जवळून पाहू दे बरं तुझे दोन्ही कान.”

“बघा बघा पंत, नीट जवळून बघा पण सकाळी मी दाढी केली तेव्हा ते आपापल्या जागीच होते.  मला नाही त्यांच्यात काही फरक… “

“फरक पडला आहे, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो.”

“फरक आणि माझ्या कानात? मग मला तो सकाळी कसा… “

“दिसला नाही, असंच ना ?”

“बरोबर.”

“अरे त्याच काय असतं, एखादा माणूस बारीक झाला आहे किंवा जाड झाला आहे, ते दुसऱ्याने त्याला बरेच दिवसांनी बघितलं तर… “

“कळत हे मला माहित आहे.  पण ते सगळे सोडा आणि माझ्या कानाचे काय ते… “

“ते थोडे मोठे झाल्या सारखे वाटतायत मला.”

“काहीतरीच काय पंत, कान कसे मोठे होतील ?”

“का नाही होणार? अरे जिथे माणसाची उंची सुद्धा जसजसे वय वाढते तसतशी कमी होते,  तर तुझ्या कानांचे काय घेऊन बसलास !”

“आता ही तुमची नवी थियरी वाटत ?”

“माझी कसली नवी थियरी? मी काय शास्त्रज्ञ थोडाच आहे माझी स्वतःची अशी थियरी मांडायला.”

“मग कशावरून तुम्ही म्हणताय की…. “

“तुझे कान मोठे झालेत म्हणून ?”

“ते नाही हो पंत, माणसाची उंची वय वाढत चालल की कमी कमी होते म्हणून.”

“अरे तुमचं प्रगत विज्ञानच म्हणतय तस, मी कशाला म्हणायला हवंय.”

“काय सांगताय काय पंत, खरच असं…. “

“होत, तुला खोटं वाटत असेल तर गुगल मारून बघ.”

“ते तर मी बघिनच पण….”

“अरे त्या गुगलवरच मी हे कधीतरी वाचल होत, ते आठवलं आणि म्हणून तस म्हणालो मी.”

“हो, पण पंत वय वाढतांना उंची कमी होण्याची काही कारण दिली असतील ना त्यात ती… “

“अरे उंची कमी होते म्हणजे वय वाढते तसतशी माणसाची हाडं काही प्रमाणात आकुंचन पावतात आणि… “

“त्याचाच परिणाम माणसाच्या उंची कमी होण्यावर होत असणार, बरोबर ?”

“बरोबर, अगदी फ्रॅक्शन ऑफ इंचेस मधे हा उंचीच्या बाबतीत फरक पडतो, पण त्यामुळे तो डोळयाला तसा जाणवत नाही इतकंच.”

“ते सगळे खरच असेल म्हणा, पण माझे कान मोठे होण्याचे कारण काय ?”

“मला वाटत तो तुझ्या वर्क फॉर होमचा परिणाम असावा !”

“काहीतरीच काय पंत, कसं शक्य आहे ते ?”

“हां, इथे मी माझी थियरी सांगतो तुला, बघ तुला पटते का ती.”

“बोला पंत, बोला, मी अगदी उत्सुक आहे तुमची थियरी ऐकायला.”

“आता असं बघ, हल्ली तू चौवीस तास घरीच असतोस वर्क फॉर होम करत, तेव्हा बायको तुला आता हे करा, ते करा, हे आत्ता नका करू असं सारखं कामाच्या बाबतीत सुनावत असेल ना, त्याचाच परिणाम होऊन तुझे कान… “

“खरच मोठे झाले असतील ?”

“अगदी गर्दभा एव्हढे नाही, पण फ्रॅक्शन ऑफ इंचेसने नक्कीच मोठे झाले आहेत.”

“असेल, असेल तसही असेल कदाचित.  पण पंत आता मी निघतो, नाहीतर बायकोचा तोफखाना सुरु व्हायचा माझ्या नावाने.”

“जा, जा आणि कानाची जास्त काळजी करू नकोस, तुझं वर्क फॉर होम संपल की येतील ते जाग्यावर. पण जाण्या आधी माझ एक काम सांगतोय ते जरा करशील का?”

“का नाही पंत, सांगा ना काय काम आहे ते तुमचे.”

“अरे काल माझ्या डोंबिवलीला राहणाऱ्या करव्याचा फोन आला होता.”

“हां, म्हणजे डोंबिवलीला स्टेशनं जवळच ज्यांची सोसायटी आहे तेच कर्वे काका ना ?”

“हो, त्याला सध्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, झोप लागत नाही रात्री.”

“मग डॉक्टरकडे जा म्हणावं त्यांना.”

“अरे तो गेला होता, डॉक्टरने त्याला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला, पण त्या घेऊन सुद्धा त्याची झोप उडालेली ती उडलेलीच, म्हणून त्यानं मला फोन केला, काही उपाय आहे का विचारायला.”

“मग तुम्हाला उपाय सापडला की काय त्यांच्या झोपेवर ? “

“हो अगदी जालीम इलाज सापडला आहे आणि त्या साठीच मला तुझी मदत हवी आहे.”

“बोला पंत काय मदत करू मी तुम्हाला.”

“अरे तुझ्याकडे टेपरेकॉर्डर आहे ना त्यावर मला, एका कॅसेटवर ट्रेन धावल्याचा आवाज रेकॉर्ड करून देशील का ? “

“हो, पण त्यानं कर्वे काकांचा झोपेचा प्रॉब्लेम…. “

“नक्कीच सॉल्व होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे !”

“तो कसा काय पंत ?”

“अरे असं बघ, त्याची सोसायटी ट्रॅकला लागून आहे आणि सध्या सगळ्या ट्रेन बंद म्हटल्यावर या पठ्याला झोप कशी लागणार, रोजचा ट्रेनचा खडखडाट ऐकल्या शिवाय, काय खरं ना ?”

“मानलं तुम्हाला पंत !”

“मानलंस ना, मग आता लाग सांगितलेल्या कामाला आणि मला ती रेकॉर्डेड कॅसेट आणून दे लवकर.  एकदा ती करव्याला कुरिअर केली की मी निवांत झोपायला मोकळा.”

“धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२७-१२-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर  ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

११ सप्टेंबरला शिकागो येथे सर्व धर्म परिषद उद्घाटन जोरदार झालं.स्वामीजींचे स्वागतपर छोटेसे भाषण ही आपण पहिले. परिषदेला आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांची सोय जे. बी. लायन यांच्याकडे केलली होती. लायन यांच्याकडे आधीच परप्रांतातून अनेक प्रतींनिधी राहायला होते. घर जरी प्रशस्त मोठं असलं तरी गर्दी झाली. त्यात विवेकानंद यांना लायन यांच्याकडे ११ सप्टेंबरला रात्री पाठवण्यात आले. लायन यांच्या पत्नी एमिली यांनी आपल्या मुलाला दुसरीकडे पाठवून ती खोली रिकामी करून ठेवली. कोण येणार हे माहिती नसल्याने त्यांच्या मनात शंका आली की आपल्याकडे दक्षिण अमेरिकेतील लोक उतरले आहेत त्यांच्या बरोबर हा कृष्णवर्णीय प्रतिनिधी कसा काय चालेल? कारण दक्षिण अमेरिकेत वर्णभेद खूप होता. मग त्यांनी मिस्टर लायन यांना सुचविले की यांची सोय हवं तर आपण शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये करूया.

मिस्टर लायन गप्पच. ते उठून खाली जाऊन वर्तमान पत्र वाचून आले. तिथे स्वामीजी भेटले आणि तसेच वरती येऊन एमिली यांना म्हणाले, “आपले इतर पाहुणे जरी इथून गेले तरी हरकत नाही, मला काही वाटणार नाही. पण हे भारतीय पाहुणे अतिशय बुद्धीमान असून इतकी मनोवेधक व्यक्ती यापूर्वी आपल्याकडे कधीच आली नव्हती. त्यामुळे त्यांना हवे तेव्हढे दिवस इथे ठेवले तरी चालेल. त्यांची इच्छा असेल तेव्हढे दिवस त्यांना इथे राहुदे”. विवेकानंद लायन यांच्याकडे राहिले आणि त्या घरचेच एक सभासद होऊन गेले, इतके त्यांच्यात मिसळले. यावरून लायन किती उदार विचारांचे होते हे लक्षात येते. वर्णभेदाचा विचार त्यांनाही करावा लागला होता. अमेरिकेत पोहोचल्यापासूनच विवेकानंदांना अशा अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

इथे, नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. २०० वर्षांचा काळ लोटला तरी अमेरिकेत वर्णभेदाची चिंगारी मधूनच पेटते हे आता नुकतच सगळ्यांनी पाहिलं आहे. काळे गोरे या वादात मूळ कैरोलीनाचा असलेला आफ्रिकी अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याला मिनियापोलीस मध्ये नकली नोटेने बिल दिले अशा तक्रारीवरून पोलिसांची कारवाई होताना जीवाला मुकावे लागले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत सगळीकडे त्या विरूद्ध आवाज उठवला गेला. मोर्चे निघाले, हिंसक वळण लागले. वॉशिंग्टन डी.सी,अटलांटा, फिनिक्स,डेनवर, लॉस एंजिल्स, लास वेगास सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. एखादा चुकीचा विचार मनुष्याच्या मनात रूजला की तो बाहेर निघणे फार कठीण जाते. म्हणून चांगले विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असते. वर्तमानात सध्या चांगले कशाला म्हणायचे हेच लोकांना आधी शिकवावे लागेल. असो .             

शिकागो क्लबमध्ये विवेकानंद यांनी लायन यांच्या मित्रांसमोर मत व्यक्त करताना म्हटले होते, “आजपर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींमध्ये लायन हे ख्रिस्तांशी सर्वात अधिक साम्य असलेले आहेत, अशी माझी धारणा आहे”.

लायन यांची नात कॉर्नेलिया कोंगर यावेळी सहा वर्षांची होती. तिची विवेकानंदांची चांगली मैत्री जमली. निरागस आणि अजाण अशा  कॉर्नेलियाला स्वामीजी मोर, पोपट,  वानर यांच्या गोष्टी सांगत. झाडे, फुले यांची मनोरंजक माहिती सांगत. विवेकानंद संध्याकाळी बाहेरून आले की लगेच मांडीवर जाऊन बसत मला गोष्ट सांगा म्हणून ति मागे लागे. यावेळी विवेकानंद वास्तविक तीशीचे होते, पण त्यांचे लहान मुलांशी वागण्याचे कौशल्य मात्र आजी आजोबांच्या वयातले असे. कार्नेलियाचे वडील तरुण वयातच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला होता. अजूनही तो ताजा होता. त्यातून ती बाहेर आली नव्हती. घरात तिच्याशी वागता बोलताना विवेकानंद काळजी घेत. त्यांच्या व्याख्यांनांना ती जात असे. त्यातले नीट कळायला हवे म्हणून तिने पौर्वात्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेतला. आणि पुढे स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ अभ्यासले.

एमिली लायन यांचा स्वभाव वागणं बोलणं यामुळे त्यांना, त्या आपल्या आई भुवनेश्वरी देवी सारख्या वाटत. म्हणून ते त्यांना मदर म्हणत असत.एमिली यांनीही विवेकानंद यांना पुत्रवत प्रेम दिलं, तिथले  उच्चवर्गीय सामाजिक शिष्टाचार शिकविले. त्यांना आपल्या एखाद्या अज्ञाना बद्दल संकोच नाही वाटायचा. घरी आल्यावर ते ती गोष्ट समजून घ्यायचे. ज्ञानात भर घालायचे.

त्यांना बाहेर व्याख्यान दिल्यावर जे मानधन मिळत असे, ते पैसे ते आपल्या रुमालात बांधून आणत असत आणी एमिली लायन यांच्यासमोर ठेवत असत. जवळ जवळ सत्तर ऐंशी डॉलर असत.संन्यासी, त्यात पैसे बाळगायची एकतर सवयच नव्हती. मग एमिली यांना न मोजताच ते पैसे देऊन सांगत, “हे तुम्ही सांभाळा”. एव्हढा विश्वास. विवेकानंद कशासाठी पैसे जमवत आहेत हे लायन यांनाही माहिती होते.त्यांनी मग पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना शिकविले. नाणी ओळखायची शिकविले. पैसे ठेवण्यासाठी त्यांनी तर बँकेत खातेच उघडून दिले.

मिसेस लायन स्त्रियांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या अध्यक्षा होत्या. एकदा त्या विवेकानंदांना तिथे घेऊन गेल्या. विवेकानंद यांनी तिथल्या सर्व गोष्टींची बारीक सारिक माहिती घेतली. तिथल्या अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस सर्वांशी बोलून कामाची पद्धत जाणून घेतली.तिथलं बालमृत्यूचं प्रमाण जाणून घेतलं. भोजन गृहातले आचारी आणि कपडे धुणारे कर्मचारी यांच्याशी ही संवाद साधला. अशाच पद्धतीने त्यांनी उत्सुकतेने शिकागो मधली वस्तु संग्रहालये, दालने, विद्यापीठे पाहिली. छोट्या कोर्नेलियाच्या  बालवाडीत सुद्धा जाऊन आले. आपल्या देशात स्त्रियांसाठी रुग्णालये नाहीत आणि मुलींसाठी शाळा नाहीत याची त्यांना खंत वाटली.

शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कर्नल वेलॅन्ड यांनी त्यांच्या शिकागोत उघडलेल्या शाळेत विवेकानंद यांना भेट द्यायला बोलावले. लहान मुलांवर संस्कार व्हावेत असा त्यांचा उद्देश होता. मुलांसमोर विवेकानंद यांनी केलेले भाषण मुलांना फार आवडले. ते झाल्यावर बाहेर पडत असताना शाळेतल्या एकमेव भारतीय विद्यार्थ्याने, खाली वाकून स्वामीजींच्या अंगावरील वस्त्राला आदराने स्पर्श केला. ते पाहून शेजारील मुलीने विचारले तू हे काय केलेस? कोण आहेत हे पाहुणे?तो भारतीय विद्यार्थी म्हणाला, “हे  स्वामी विवेकानंद आहेत, भारतातून आले आहेत. फार मोठे संत आहेत”. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, “आता तर संत कुठेच नाहीत?”मुलगा म्हणाला, इथं तुमच्या देशात नाहीत. पण आमच्या भारतात आजही आहेत”.

असे अनुभव स्वामीजी घेत होते . एक दिवस ते एमिली लायन यांना म्हणाले, आज मला एका सुंदर गोष्टीचा शोध लागला आहे. लायन यांनी विनोदाने विचारले की, कोण आहे ती? विवेकानंद हसत सुटले आणि म्हणाले, अहो ती कोणी मुलगी नाही.ती गोष्ट म्हणजे संघटना. कोणतेही काम पद्धतशिरपणे व्हावयास हवे असेल तर, अमेरिकेत आहेत तशा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र संस्था हव्यात त्यांचे नियम हवेत, कामात शिस्त हवी. असे केले तर खर्‍या अर्थाने कोणतेही काम होऊ शकते आणि सतत चालू राहू शकते”. हे सर्व सत्य त्यांच्या मनात आल होतं आता पर्यन्त केलेल्या निरीक्षणातून. इथून पुढे त्यांची या विचारांची पकड घट्ट झाली. आता त्यावर चिंतन पण सुरू झाले. त्यातूनच निर्माण झाली ती आपल्या सर्व गुरुबंधूंना एकत्र बांधून ठेवेल अशी संस्था उभी करण्याचे स्वप्न. याचा संबंध आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थितिशी घालून एक संस्था मूर्तरूपात आणावी अशी संकल्पना मनात रूजली. इथे लायन यांच्याकडे स्वामीजी जवळ जवळ दीड ते दोन महीने राहिले, या काळात त्यांनी तिथल्या सुंदर इमारती व वास्तुसौंदर्य, तिथलं संगीत, सुखसोयी,यांच्याकडे अभ्यासपूर्ण बघितले.त्यांनी 1898 मध्ये पत्रात मेरी यांना लिहिलं की,तुमचे घर आणि तुम्ही सर्व जणांनी मला एव्हढे प्रेम दिले आहे की, आपले पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असले पाहिजे. 

याच प्रमाणे परिषदेला आल्यानंतर सर्वप्रथम पत्ता शोधत शोधत कंटाळून स्वामीजी रस्त्यावर बसले असताना मिसेस बेली हेल यांनी त्यांना घरी नेले होते, तेही कुटुंब विवेकानंदांना घरच्यासारखेच मिळाले होते. विवेकानंद यांच्या आयुष्याच्या अखेरीस पर्यन्त त्यांचा हेल कुटुंबीयांशी संपर्क होता. पुढे पुढे कुठूनही ते प्रवास करून आले की सरळ हेल यांच्याकडेच येत. हेल यांच्या मेरी आणि हॅरिएट, जॉर्ज हेल यांच्या बहिणीच्या इजाबेल आणि मॅक किंडले यांन ते बहिणी मानत. तर मिसेस हेल यांना मदर म्हणत. सगळे जण स्वामीजींची चांगली व्यवस्था ठेवत आणि काळजी घेत असत. स्वामीजींना इथे मोकळेपणा वाटत असे. स्वास्थ्य लाभत असे.

परिषद संपल्यानंतर विवेकानंद यांनी प्रा.राईट यांनाही पत्रे लिहिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. राईट यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पत्र लिहायला वेळ पुरेसा नव्हता आणि केवळ औपचारिक पत्र लिहू नये असे वाटल्याचे प्रांजळ पणे सांगितले. तसेच इथल्या परिषदेत केवळ राईट यांच्यामुळे आणि परमेश्वरमुळेच शक्य झाले. हे सर्व श्रेय स्वामीजींनी राईट यांना दिले आहे. हे लिहिताना स्वामीजींनी आता आपण पाश्चात्य जीवनाशी जुळवून घेण्याचे ठरविले आहे. असेही लिहिले आहे. कारण कपडे आणि अन्न पदार्थ यात त्यांना जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. आणि नंतर ते तिथे सन्यासी वेष सोडून पाश्चात्य वेषात दिसतात. हा बदल त्यांनी केला. बहिरंगाला अखेर काहीही महत्व नाही असे ते आधीही वारंवार सांगत असत.

अमेरिकेतली एकूण संस्कृती, आचार-विचार, तिथली परिस्थिति आणि आपला उद्देश याचा ताळमेळ स्वामीजींनी घातला. संन्याशाचा वेष जाऊन कोट पॅंट घातले तरी आपल्या मनात जे विचार आहेत जे उद्देश आहेत ते तसेच कायम असणं महत्वाचं आहे.

भारतात उद्योगधंदे उभे करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतींचे मन वळवावे, म्हणजे भारतातल्या लोकांना तंत्र कळेल आणि गरीब जनतेला दोन वेळच अन्न मिळेल असं त्यांना वाटलं होतं, शिवाय देणग्या गोळा  कराव्यात असाही त्यांनी विचार केला होता पण त्यातली अव्यवहार्यता त्यांच्या लक्षात आल्यावर हे विचार त्यांनी मनातून काढून टाकले. नुसती देणगी मागितल्याने हळूहळू त्यात लाचारीचा भाव येतो आणि आपण भिक्षेकरी आहोत असे वाटू लागते असा विचार त्यांनी केला.पूर्वेकडून अनेक लोक जसे योजना घेऊन अमेरिकेत येतात आणि आवश्यकते पेक्षा जास्त निधि घेऊन जातात तसेच आपणही गणले जाऊ. यात स्वाभिमान राहणार नाही. मग यापेक्षा वेगळा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे आपल्याला व्याख्यानाद्वारे जो पैसा मिळेल तेव्हढाच आपण घ्यायचा असे त्यांनी ठरवले. हाच मार्ग बरा आहे असे त्यांनी राईट आणि मिसेस वुड्स यांनाही पत्रातून कळवला. परिषद होऊन महिनाच होत होता तेंव्हाच हा निश्चय पक्का केला.

परिषद संपल्यावर विवेकानंद अनेक ठिकाणी राहिले. जिथे जिथे राहत आणि ज्यांना भेटत त्यांचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलत असे. या काळातल्या आठवणी त्या त्या व्यक्तींनी लिहून ठेवल्या आहेत. काही आठवणी स्वामीजींनी स्वत: सांगितल्या आहेत. अमेरिका आणि युरोप खंडात अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली रंगभूमीवरची गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे हिची विवेकानंद यांची भेट तीच आयुष्य बदलून टाकणारी ठरली.उद्विग्न अवस्थेत ती विवेकानंद यांना भेटली आणि…

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो. आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या. ”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला ?” मग वहिनींनीही किंचित खोकत, ”हो हो, आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”, बोलत दोघी पुढे निघून गेल्या. मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर,’ म्हणजे काय?’ हा प्रश्न तरी निदान मला आणि माझ्या मित्राला पडला नाही. कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय ? हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते. पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो. त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच पाहिजेत.

सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, येवढं ह्याचं प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी, कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णयमधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार ?

ह्या ऋतूमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार, फरसबी, वांगी, मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा, आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय, हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही, तर अगदी पुण्यातदेखील ठीकठिकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा. शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं. काही दिवस आधी, रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं. तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार, गवार, गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते. माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते. शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं, हिरवं वांगं गोवऱ्यांवर भाजण्यात दुसऱ्या सूनबाई दंग असतात. काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात. मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या, हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच. भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं. घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो. नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात. चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात. घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं. एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत, आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“ सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”, अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”, म्हणत लाजून पसार होते. ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो. त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात. हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून, खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मूगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपऱ्यात उभी असते. सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना. नवीन धाकट्या काकूला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात. “धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”, असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही. असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत. रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते. जे जे लोक, संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं. पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी. कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमिली व्हॅल्यू” आहे. त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी, बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन, वरती प्रत्येकी एक स्कूप आईस्क्रीमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.

शब्दांकन – अंबर कर्वे 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares