मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – जालीम इलाज ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 जालीम इलाज ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार कसा आहेस ?”

“बरा आहे.”

“अरे पण तुझ्या आवाजावरून आणि मरगळलेल्या हालचाली वरून, नुकताच एव्हरेस्ट वगैरे चढून आल्या इतका दमलेला वाटतोयस.”

“हो, दमलोय खरा, कारण सध्या वर्क फॉर होम चालू आहे ना माझ !”

“काय ?”

“वर्क फॉर होम म्हटलं मी, काही चुकलं का ?”

“चुकलं म्हणजे काय चुकलंच, अरे आमचा मुलगा वर्क फ्रॉम होम करतोय आणि…. “

“मी वर्क फॉर होम.”

“म्हणजे चुकलं की नाही तुझं ?”

“पण पंत, मी वर्क फॉर होमच करतोय, म्हणजे घरची सगळी काम, स्वयंपाक सोडून एकट्याने करतोय.”

“अरे पण माझा मुलगा…. ?”

“अहो पंत, तो वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे ऑफिसच काम घरून करतोय आणि मी… “

“वर्क फॉर होम म्हणजे घरची काम, बरोबर ?”

“आता कसं बोललात पंत ! सध्या कामवाल्या मावशी येऊ शकत नाहीत कारण…..”

“मला कारण माहिती आहे, पण तुला तुझ्या या वर्क फॉर होम मधे तुझी बायको काही मदत करीत असेलच ना ?”

“अजिबात नाही, ती म्हणते मी तुम्हाला मदत केली तर स्वयंपाकाचे काय, तुमची उपाशी रहायची तयारी असेल तर करते मदत, आता बोला !”

“म्हणजे कठीणच आहे तुझं आता मावशी कामाला येई पर्यंत.”

“हो ना, म्हणूनच माझा आवाज तुम्हाला जरा दमल्या सारखा वाटला असेल.”

“असेल असेल, पण काय रे तुझे कान….. “

“कान ? कान आहेत जाग्यावर पंत आणि मला ऐकायला सुद्धा नीट…. “

“अरे त्या बद्दल नाही मी बोलत पण तुझे कान नेहमी पेक्षा… “

“पंत माझ्या कानाचे काय ते स्पष्ट बोला, उगाच मला कोड्यात टाकू नका.”

“अरे हो हो, किती घाई करशील. जरा मला नीट जवळून पाहू दे बरं तुझे दोन्ही कान.”

“बघा बघा पंत, नीट जवळून बघा पण सकाळी मी दाढी केली तेव्हा ते आपापल्या जागीच होते.  मला नाही त्यांच्यात काही फरक… “

“फरक पडला आहे, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो.”

“फरक आणि माझ्या कानात? मग मला तो सकाळी कसा… “

“दिसला नाही, असंच ना ?”

“बरोबर.”

“अरे त्याच काय असतं, एखादा माणूस बारीक झाला आहे किंवा जाड झाला आहे, ते दुसऱ्याने त्याला बरेच दिवसांनी बघितलं तर… “

“कळत हे मला माहित आहे.  पण ते सगळे सोडा आणि माझ्या कानाचे काय ते… “

“ते थोडे मोठे झाल्या सारखे वाटतायत मला.”

“काहीतरीच काय पंत, कान कसे मोठे होतील ?”

“का नाही होणार? अरे जिथे माणसाची उंची सुद्धा जसजसे वय वाढते तसतशी कमी होते,  तर तुझ्या कानांचे काय घेऊन बसलास !”

“आता ही तुमची नवी थियरी वाटत ?”

“माझी कसली नवी थियरी? मी काय शास्त्रज्ञ थोडाच आहे माझी स्वतःची अशी थियरी मांडायला.”

“मग कशावरून तुम्ही म्हणताय की…. “

“तुझे कान मोठे झालेत म्हणून ?”

“ते नाही हो पंत, माणसाची उंची वय वाढत चालल की कमी कमी होते म्हणून.”

“अरे तुमचं प्रगत विज्ञानच म्हणतय तस, मी कशाला म्हणायला हवंय.”

“काय सांगताय काय पंत, खरच असं…. “

“होत, तुला खोटं वाटत असेल तर गुगल मारून बघ.”

“ते तर मी बघिनच पण….”

“अरे त्या गुगलवरच मी हे कधीतरी वाचल होत, ते आठवलं आणि म्हणून तस म्हणालो मी.”

“हो, पण पंत वय वाढतांना उंची कमी होण्याची काही कारण दिली असतील ना त्यात ती… “

“अरे उंची कमी होते म्हणजे वय वाढते तसतशी माणसाची हाडं काही प्रमाणात आकुंचन पावतात आणि… “

“त्याचाच परिणाम माणसाच्या उंची कमी होण्यावर होत असणार, बरोबर ?”

“बरोबर, अगदी फ्रॅक्शन ऑफ इंचेस मधे हा उंचीच्या बाबतीत फरक पडतो, पण त्यामुळे तो डोळयाला तसा जाणवत नाही इतकंच.”

“ते सगळे खरच असेल म्हणा, पण माझे कान मोठे होण्याचे कारण काय ?”

“मला वाटत तो तुझ्या वर्क फॉर होमचा परिणाम असावा !”

“काहीतरीच काय पंत, कसं शक्य आहे ते ?”

“हां, इथे मी माझी थियरी सांगतो तुला, बघ तुला पटते का ती.”

“बोला पंत, बोला, मी अगदी उत्सुक आहे तुमची थियरी ऐकायला.”

“आता असं बघ, हल्ली तू चौवीस तास घरीच असतोस वर्क फॉर होम करत, तेव्हा बायको तुला आता हे करा, ते करा, हे आत्ता नका करू असं सारखं कामाच्या बाबतीत सुनावत असेल ना, त्याचाच परिणाम होऊन तुझे कान… “

“खरच मोठे झाले असतील ?”

“अगदी गर्दभा एव्हढे नाही, पण फ्रॅक्शन ऑफ इंचेसने नक्कीच मोठे झाले आहेत.”

“असेल, असेल तसही असेल कदाचित.  पण पंत आता मी निघतो, नाहीतर बायकोचा तोफखाना सुरु व्हायचा माझ्या नावाने.”

“जा, जा आणि कानाची जास्त काळजी करू नकोस, तुझं वर्क फॉर होम संपल की येतील ते जाग्यावर. पण जाण्या आधी माझ एक काम सांगतोय ते जरा करशील का?”

“का नाही पंत, सांगा ना काय काम आहे ते तुमचे.”

“अरे काल माझ्या डोंबिवलीला राहणाऱ्या करव्याचा फोन आला होता.”

“हां, म्हणजे डोंबिवलीला स्टेशनं जवळच ज्यांची सोसायटी आहे तेच कर्वे काका ना ?”

“हो, त्याला सध्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, झोप लागत नाही रात्री.”

“मग डॉक्टरकडे जा म्हणावं त्यांना.”

“अरे तो गेला होता, डॉक्टरने त्याला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला, पण त्या घेऊन सुद्धा त्याची झोप उडालेली ती उडलेलीच, म्हणून त्यानं मला फोन केला, काही उपाय आहे का विचारायला.”

“मग तुम्हाला उपाय सापडला की काय त्यांच्या झोपेवर ? “

“हो अगदी जालीम इलाज सापडला आहे आणि त्या साठीच मला तुझी मदत हवी आहे.”

“बोला पंत काय मदत करू मी तुम्हाला.”

“अरे तुझ्याकडे टेपरेकॉर्डर आहे ना त्यावर मला, एका कॅसेटवर ट्रेन धावल्याचा आवाज रेकॉर्ड करून देशील का ? “

“हो, पण त्यानं कर्वे काकांचा झोपेचा प्रॉब्लेम…. “

“नक्कीच सॉल्व होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे !”

“तो कसा काय पंत ?”

“अरे असं बघ, त्याची सोसायटी ट्रॅकला लागून आहे आणि सध्या सगळ्या ट्रेन बंद म्हटल्यावर या पठ्याला झोप कशी लागणार, रोजचा ट्रेनचा खडखडाट ऐकल्या शिवाय, काय खरं ना ?”

“मानलं तुम्हाला पंत !”

“मानलंस ना, मग आता लाग सांगितलेल्या कामाला आणि मला ती रेकॉर्डेड कॅसेट आणून दे लवकर.  एकदा ती करव्याला कुरिअर केली की मी निवांत झोपायला मोकळा.”

“धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२७-१२-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर  ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग –४९ – सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

११ सप्टेंबरला शिकागो येथे सर्व धर्म परिषद उद्घाटन जोरदार झालं.स्वामीजींचे स्वागतपर छोटेसे भाषण ही आपण पहिले. परिषदेला आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांची सोय जे. बी. लायन यांच्याकडे केलली होती. लायन यांच्याकडे आधीच परप्रांतातून अनेक प्रतींनिधी राहायला होते. घर जरी प्रशस्त मोठं असलं तरी गर्दी झाली. त्यात विवेकानंद यांना लायन यांच्याकडे ११ सप्टेंबरला रात्री पाठवण्यात आले. लायन यांच्या पत्नी एमिली यांनी आपल्या मुलाला दुसरीकडे पाठवून ती खोली रिकामी करून ठेवली. कोण येणार हे माहिती नसल्याने त्यांच्या मनात शंका आली की आपल्याकडे दक्षिण अमेरिकेतील लोक उतरले आहेत त्यांच्या बरोबर हा कृष्णवर्णीय प्रतिनिधी कसा काय चालेल? कारण दक्षिण अमेरिकेत वर्णभेद खूप होता. मग त्यांनी मिस्टर लायन यांना सुचविले की यांची सोय हवं तर आपण शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये करूया.

मिस्टर लायन गप्पच. ते उठून खाली जाऊन वर्तमान पत्र वाचून आले. तिथे स्वामीजी भेटले आणि तसेच वरती येऊन एमिली यांना म्हणाले, “आपले इतर पाहुणे जरी इथून गेले तरी हरकत नाही, मला काही वाटणार नाही. पण हे भारतीय पाहुणे अतिशय बुद्धीमान असून इतकी मनोवेधक व्यक्ती यापूर्वी आपल्याकडे कधीच आली नव्हती. त्यामुळे त्यांना हवे तेव्हढे दिवस इथे ठेवले तरी चालेल. त्यांची इच्छा असेल तेव्हढे दिवस त्यांना इथे राहुदे”. विवेकानंद लायन यांच्याकडे राहिले आणि त्या घरचेच एक सभासद होऊन गेले, इतके त्यांच्यात मिसळले. यावरून लायन किती उदार विचारांचे होते हे लक्षात येते. वर्णभेदाचा विचार त्यांनाही करावा लागला होता. अमेरिकेत पोहोचल्यापासूनच विवेकानंदांना अशा अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

इथे, नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. २०० वर्षांचा काळ लोटला तरी अमेरिकेत वर्णभेदाची चिंगारी मधूनच पेटते हे आता नुकतच सगळ्यांनी पाहिलं आहे. काळे गोरे या वादात मूळ कैरोलीनाचा असलेला आफ्रिकी अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याला मिनियापोलीस मध्ये नकली नोटेने बिल दिले अशा तक्रारीवरून पोलिसांची कारवाई होताना जीवाला मुकावे लागले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत सगळीकडे त्या विरूद्ध आवाज उठवला गेला. मोर्चे निघाले, हिंसक वळण लागले. वॉशिंग्टन डी.सी,अटलांटा, फिनिक्स,डेनवर, लॉस एंजिल्स, लास वेगास सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. एखादा चुकीचा विचार मनुष्याच्या मनात रूजला की तो बाहेर निघणे फार कठीण जाते. म्हणून चांगले विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असते. वर्तमानात सध्या चांगले कशाला म्हणायचे हेच लोकांना आधी शिकवावे लागेल. असो .             

शिकागो क्लबमध्ये विवेकानंद यांनी लायन यांच्या मित्रांसमोर मत व्यक्त करताना म्हटले होते, “आजपर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींमध्ये लायन हे ख्रिस्तांशी सर्वात अधिक साम्य असलेले आहेत, अशी माझी धारणा आहे”.

लायन यांची नात कॉर्नेलिया कोंगर यावेळी सहा वर्षांची होती. तिची विवेकानंदांची चांगली मैत्री जमली. निरागस आणि अजाण अशा  कॉर्नेलियाला स्वामीजी मोर, पोपट,  वानर यांच्या गोष्टी सांगत. झाडे, फुले यांची मनोरंजक माहिती सांगत. विवेकानंद संध्याकाळी बाहेरून आले की लगेच मांडीवर जाऊन बसत मला गोष्ट सांगा म्हणून ति मागे लागे. यावेळी विवेकानंद वास्तविक तीशीचे होते, पण त्यांचे लहान मुलांशी वागण्याचे कौशल्य मात्र आजी आजोबांच्या वयातले असे. कार्नेलियाचे वडील तरुण वयातच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला होता. अजूनही तो ताजा होता. त्यातून ती बाहेर आली नव्हती. घरात तिच्याशी वागता बोलताना विवेकानंद काळजी घेत. त्यांच्या व्याख्यांनांना ती जात असे. त्यातले नीट कळायला हवे म्हणून तिने पौर्वात्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेतला. आणि पुढे स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ अभ्यासले.

एमिली लायन यांचा स्वभाव वागणं बोलणं यामुळे त्यांना, त्या आपल्या आई भुवनेश्वरी देवी सारख्या वाटत. म्हणून ते त्यांना मदर म्हणत असत.एमिली यांनीही विवेकानंद यांना पुत्रवत प्रेम दिलं, तिथले  उच्चवर्गीय सामाजिक शिष्टाचार शिकविले. त्यांना आपल्या एखाद्या अज्ञाना बद्दल संकोच नाही वाटायचा. घरी आल्यावर ते ती गोष्ट समजून घ्यायचे. ज्ञानात भर घालायचे.

त्यांना बाहेर व्याख्यान दिल्यावर जे मानधन मिळत असे, ते पैसे ते आपल्या रुमालात बांधून आणत असत आणी एमिली लायन यांच्यासमोर ठेवत असत. जवळ जवळ सत्तर ऐंशी डॉलर असत.संन्यासी, त्यात पैसे बाळगायची एकतर सवयच नव्हती. मग एमिली यांना न मोजताच ते पैसे देऊन सांगत, “हे तुम्ही सांभाळा”. एव्हढा विश्वास. विवेकानंद कशासाठी पैसे जमवत आहेत हे लायन यांनाही माहिती होते.त्यांनी मग पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना शिकविले. नाणी ओळखायची शिकविले. पैसे ठेवण्यासाठी त्यांनी तर बँकेत खातेच उघडून दिले.

मिसेस लायन स्त्रियांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या अध्यक्षा होत्या. एकदा त्या विवेकानंदांना तिथे घेऊन गेल्या. विवेकानंद यांनी तिथल्या सर्व गोष्टींची बारीक सारिक माहिती घेतली. तिथल्या अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस सर्वांशी बोलून कामाची पद्धत जाणून घेतली.तिथलं बालमृत्यूचं प्रमाण जाणून घेतलं. भोजन गृहातले आचारी आणि कपडे धुणारे कर्मचारी यांच्याशी ही संवाद साधला. अशाच पद्धतीने त्यांनी उत्सुकतेने शिकागो मधली वस्तु संग्रहालये, दालने, विद्यापीठे पाहिली. छोट्या कोर्नेलियाच्या  बालवाडीत सुद्धा जाऊन आले. आपल्या देशात स्त्रियांसाठी रुग्णालये नाहीत आणि मुलींसाठी शाळा नाहीत याची त्यांना खंत वाटली.

शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कर्नल वेलॅन्ड यांनी त्यांच्या शिकागोत उघडलेल्या शाळेत विवेकानंद यांना भेट द्यायला बोलावले. लहान मुलांवर संस्कार व्हावेत असा त्यांचा उद्देश होता. मुलांसमोर विवेकानंद यांनी केलेले भाषण मुलांना फार आवडले. ते झाल्यावर बाहेर पडत असताना शाळेतल्या एकमेव भारतीय विद्यार्थ्याने, खाली वाकून स्वामीजींच्या अंगावरील वस्त्राला आदराने स्पर्श केला. ते पाहून शेजारील मुलीने विचारले तू हे काय केलेस? कोण आहेत हे पाहुणे?तो भारतीय विद्यार्थी म्हणाला, “हे  स्वामी विवेकानंद आहेत, भारतातून आले आहेत. फार मोठे संत आहेत”. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, “आता तर संत कुठेच नाहीत?”मुलगा म्हणाला, इथं तुमच्या देशात नाहीत. पण आमच्या भारतात आजही आहेत”.

असे अनुभव स्वामीजी घेत होते . एक दिवस ते एमिली लायन यांना म्हणाले, आज मला एका सुंदर गोष्टीचा शोध लागला आहे. लायन यांनी विनोदाने विचारले की, कोण आहे ती? विवेकानंद हसत सुटले आणि म्हणाले, अहो ती कोणी मुलगी नाही.ती गोष्ट म्हणजे संघटना. कोणतेही काम पद्धतशिरपणे व्हावयास हवे असेल तर, अमेरिकेत आहेत तशा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र संस्था हव्यात त्यांचे नियम हवेत, कामात शिस्त हवी. असे केले तर खर्‍या अर्थाने कोणतेही काम होऊ शकते आणि सतत चालू राहू शकते”. हे सर्व सत्य त्यांच्या मनात आल होतं आता पर्यन्त केलेल्या निरीक्षणातून. इथून पुढे त्यांची या विचारांची पकड घट्ट झाली. आता त्यावर चिंतन पण सुरू झाले. त्यातूनच निर्माण झाली ती आपल्या सर्व गुरुबंधूंना एकत्र बांधून ठेवेल अशी संस्था उभी करण्याचे स्वप्न. याचा संबंध आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थितिशी घालून एक संस्था मूर्तरूपात आणावी अशी संकल्पना मनात रूजली. इथे लायन यांच्याकडे स्वामीजी जवळ जवळ दीड ते दोन महीने राहिले, या काळात त्यांनी तिथल्या सुंदर इमारती व वास्तुसौंदर्य, तिथलं संगीत, सुखसोयी,यांच्याकडे अभ्यासपूर्ण बघितले.त्यांनी 1898 मध्ये पत्रात मेरी यांना लिहिलं की,तुमचे घर आणि तुम्ही सर्व जणांनी मला एव्हढे प्रेम दिले आहे की, आपले पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असले पाहिजे. 

याच प्रमाणे परिषदेला आल्यानंतर सर्वप्रथम पत्ता शोधत शोधत कंटाळून स्वामीजी रस्त्यावर बसले असताना मिसेस बेली हेल यांनी त्यांना घरी नेले होते, तेही कुटुंब विवेकानंदांना घरच्यासारखेच मिळाले होते. विवेकानंद यांच्या आयुष्याच्या अखेरीस पर्यन्त त्यांचा हेल कुटुंबीयांशी संपर्क होता. पुढे पुढे कुठूनही ते प्रवास करून आले की सरळ हेल यांच्याकडेच येत. हेल यांच्या मेरी आणि हॅरिएट, जॉर्ज हेल यांच्या बहिणीच्या इजाबेल आणि मॅक किंडले यांन ते बहिणी मानत. तर मिसेस हेल यांना मदर म्हणत. सगळे जण स्वामीजींची चांगली व्यवस्था ठेवत आणि काळजी घेत असत. स्वामीजींना इथे मोकळेपणा वाटत असे. स्वास्थ्य लाभत असे.

परिषद संपल्यानंतर विवेकानंद यांनी प्रा.राईट यांनाही पत्रे लिहिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. राईट यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पत्र लिहायला वेळ पुरेसा नव्हता आणि केवळ औपचारिक पत्र लिहू नये असे वाटल्याचे प्रांजळ पणे सांगितले. तसेच इथल्या परिषदेत केवळ राईट यांच्यामुळे आणि परमेश्वरमुळेच शक्य झाले. हे सर्व श्रेय स्वामीजींनी राईट यांना दिले आहे. हे लिहिताना स्वामीजींनी आता आपण पाश्चात्य जीवनाशी जुळवून घेण्याचे ठरविले आहे. असेही लिहिले आहे. कारण कपडे आणि अन्न पदार्थ यात त्यांना जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. आणि नंतर ते तिथे सन्यासी वेष सोडून पाश्चात्य वेषात दिसतात. हा बदल त्यांनी केला. बहिरंगाला अखेर काहीही महत्व नाही असे ते आधीही वारंवार सांगत असत.

अमेरिकेतली एकूण संस्कृती, आचार-विचार, तिथली परिस्थिति आणि आपला उद्देश याचा ताळमेळ स्वामीजींनी घातला. संन्याशाचा वेष जाऊन कोट पॅंट घातले तरी आपल्या मनात जे विचार आहेत जे उद्देश आहेत ते तसेच कायम असणं महत्वाचं आहे.

भारतात उद्योगधंदे उभे करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतींचे मन वळवावे, म्हणजे भारतातल्या लोकांना तंत्र कळेल आणि गरीब जनतेला दोन वेळच अन्न मिळेल असं त्यांना वाटलं होतं, शिवाय देणग्या गोळा  कराव्यात असाही त्यांनी विचार केला होता पण त्यातली अव्यवहार्यता त्यांच्या लक्षात आल्यावर हे विचार त्यांनी मनातून काढून टाकले. नुसती देणगी मागितल्याने हळूहळू त्यात लाचारीचा भाव येतो आणि आपण भिक्षेकरी आहोत असे वाटू लागते असा विचार त्यांनी केला.पूर्वेकडून अनेक लोक जसे योजना घेऊन अमेरिकेत येतात आणि आवश्यकते पेक्षा जास्त निधि घेऊन जातात तसेच आपणही गणले जाऊ. यात स्वाभिमान राहणार नाही. मग यापेक्षा वेगळा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे आपल्याला व्याख्यानाद्वारे जो पैसा मिळेल तेव्हढाच आपण घ्यायचा असे त्यांनी ठरवले. हाच मार्ग बरा आहे असे त्यांनी राईट आणि मिसेस वुड्स यांनाही पत्रातून कळवला. परिषद होऊन महिनाच होत होता तेंव्हाच हा निश्चय पक्का केला.

परिषद संपल्यावर विवेकानंद अनेक ठिकाणी राहिले. जिथे जिथे राहत आणि ज्यांना भेटत त्यांचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलत असे. या काळातल्या आठवणी त्या त्या व्यक्तींनी लिहून ठेवल्या आहेत. काही आठवणी स्वामीजींनी स्वत: सांगितल्या आहेत. अमेरिका आणि युरोप खंडात अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली रंगभूमीवरची गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे हिची विवेकानंद यांची भेट तीच आयुष्य बदलून टाकणारी ठरली.उद्विग्न अवस्थेत ती विवेकानंद यांना भेटली आणि…

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो. आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या. ”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला ?” मग वहिनींनीही किंचित खोकत, ”हो हो, आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”, बोलत दोघी पुढे निघून गेल्या. मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर,’ म्हणजे काय?’ हा प्रश्न तरी निदान मला आणि माझ्या मित्राला पडला नाही. कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय ? हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते. पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो. त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच पाहिजेत.

सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, येवढं ह्याचं प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी, कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णयमधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार ?

ह्या ऋतूमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार, फरसबी, वांगी, मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा, आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय, हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही, तर अगदी पुण्यातदेखील ठीकठिकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा. शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं. काही दिवस आधी, रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं. तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार, गवार, गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते. माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते. शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं, हिरवं वांगं गोवऱ्यांवर भाजण्यात दुसऱ्या सूनबाई दंग असतात. काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात. मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या, हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच. भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं. घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो. नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात. चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात. घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं. एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत, आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“ सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”, अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”, म्हणत लाजून पसार होते. ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो. त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात. हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून, खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मूगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपऱ्यात उभी असते. सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना. नवीन धाकट्या काकूला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात. “धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”, असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही. असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत. रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते. जे जे लोक, संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं. पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी. कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमिली व्हॅल्यू” आहे. त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी, बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन, वरती प्रत्येकी एक स्कूप आईस्क्रीमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.

शब्दांकन – अंबर कर्वे 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केलं गेलं. आज जेव्हा त्याच कुटुंबांची पुढची पिढी तो इतिहास न वाचता बेताल वक्तव्य करते तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. ब्रिटिश काळात काळ्या पाण्याची शिक्षा काय असते हे माहित नसलेले अनेक जण त्याबद्दल आपल्या अकलेचे तारे तोडत असतात. त्याच अंदमान च्या काळोखी भिंतीत इतिहासाचं एक पान लुप्त केलं गेलं ज्याबद्दल आजही भारतीयांना काहीच माहित नाही. ही गोष्ट आहे एका निरा ची. जिने अपरिमित यातना भोगताना पण देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने देशासाठी आपल्या पतीचे प्राण घ्यायला पण मागेपुढे बघितलं नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही पण स्वातंत्र्य भारतात तिच्यावर अक्षरशः झोपडीत राहण्याची वेळ आणली गेली. कारण इतिहासाची अशीच कित्येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणून बुजून लुप्त करण्यात आली. 

गोष्ट सुरु होते ५ मार्च १९०२ साली जेव्हा उत्तर प्रदेशातील भागपत जिल्ह्यात निरा आर्या यांचा जन्म झाला. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या निरा यांच शिक्षण कोलकत्ता इकडे झालं. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती भिनलेली होती. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही त्या तयार होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर देशप्रेमाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच ओढीतून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील झाशीच्या राणी  रेजिमेंट मधे प्रवेश केला. नेताजींनी त्यांच्यावर सरस्वती राजामणी यांच्या सोबत हेरगिरी करण्याची जबाबदारी दिली. त्या देशाच्या पहिल्या गुप्तहेर सैनिक बनल्या. मुलगी बनून तर कधी पुरुष बनून ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश मिलिट्री कॅम्प मधील गोष्टी त्या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्या. घरच्यांना कळू न देता त्यांच देशकार्य सुरु होतं. 

त्यांच्या या गुप्तहेर कार्याची माहिती नसलेल्या घरच्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठित अश्या एका ब्रिटिश सेनेतील ऑफिसरशी त्यांचं लग्न जमवलं. त्या ऑफिसरचं नावं  होतं श्रीकांत जय राजन दास. लग्नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना निराच्या वेगळ्या रूपाबद्दल कल्पना आली. निरा ब्रिटिश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेची मदत करत आहे हे समजल्यावर त्यांनी तिला नेताजींबद्दल विचारण्यास सुरुवात केली. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी तिच्यावर प्रत्येक प्रकारे जबरदस्ती केली पण निरा कशाला दबली नाही. उलट तिने अजून वेगाने स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. एके दिवशी महत्वाची माहिती नेताजींना कळवण्यासाठी एका गुप्त भेटीसाठी निरा निघाली असताना याची माहिती ब्रिटिश अधिकारी श्रीकांत यांना लागली. त्यांनी गुपचूप तिचा पाठलाग केला. नेताजींसोबत भेट होत असताना श्रीकांत यांनी नेताजींच्या दिशेने गोळी झाडली. पण ती गोळी नेताजींच्या ड्रायव्हरला लागली. पुढे काय होणार याचा अंदाज निराला आला. एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळ असलेल्या चाकूने तिने आपल्या जोडीदाराचा म्हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला. श्रीकांतचा जीव घेऊन तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला. 

एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने निरा आर्याला काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेसाठी सेल्युलर जेल,अंदमान इकडे पाठवलं. इकडे सुरु झाला एक अत्याचाराचा न संपणारा प्रवास. हाड गोठवणाऱ्या थंडीत छोट्याश्या कारागृहात त्यांच्यावर रोज अत्याचार करण्यात येत होते. साखळदंडात अडकवलेल्या हातापायांच्या बेड्यांनी चामडी सोलून हाड घासत होती. पण ब्रिटिशांचे अत्याचार संपत नव्हते. एक दिवस जेलरने त्यांच्याकडे ऑफर दिली की जर तुम्ही नेताजींचा ठावठिकाणा सांगितला तर तुला आम्ही या जाचातून मुक्त करू. पण यावर निराने एकही शब्द बोलण्यास नकार दिला. नेताजी कुठे असतील तर ते माझ्या हृदयात आहेत. या उत्तराने चवताळलेल्या त्या जेलरने तिचे कपडे फाडले. तिथल्या लोहाराला बोलावून चिमटीने निराचा उजवा स्तन कापायचा आदेश दिला. त्या लोहाराने क्षणाचा विलंब न करता निरा आर्या यांचा उजवा स्तन कापला. पुन्हा मला उलट बोललीस तर तुझा डावा स्तन ही धडावेगळा करेन.  पण त्यावरही निरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलण्यास नकार दिला. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात आली. चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांनी पद्धतशीरपणे निरा आर्या यांचं बलिदान इतिहासाच्या पानात लुप्त केलं. देशासाठी स्वतःच्या जोडीदाराचा खून करणारी आणि वेळप्रसंगी स्वतःच्या स्तनाचं बलिदान करणारी रणरागिणी भारतीयांच्या नजरेत पुन्हा कधीच आली नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत सरकारी जमिनीवर उभ्या केलेल्या एका अनधिकृत झोपडीत त्यांनी हैद्राबादच्या रस्त्यांवर फुलं विकत आपलं आयुष्य काढलं. देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणारी निरा आर्या  २६ जुलै १९९८ रोजी अनंतात विलीन झाली. सरकारने त्यांची ती झोपडी पण बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. त्यांचा साधा सन्मान करण्याची मानसिकता गेल्या ७५ वर्षात भारत सरकार दाखवू शकलेलं नाही हा एक भारतीय म्हणून आपला पराजय आहे. इकडे टुकार चित्रपटात काम करणारे हिरो आणि तळवे चाटणारी लोकं जेव्हा पद्म पुरस्काराचे मानकरी ठरतात, तेव्हा इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्या अनेक अनाम वीरांचा सन्मान करायला आपण आजही विसरतो आहोत याची जाणीव होते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही वाचाळवीर राजकारणी जेव्हा अंदमानमधल्या सेल्युलर जेल, तिथल्या शिक्षेबद्दल बेताल वक्तव्य करतात, तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं, ज्या स्तनातून दूध पिऊन तुम्ही या जगात आलात त्या स्तनाला स्त्रीच्या शरीरापासून वेगळं करताना काय यातना झाल्या असतील याचा थोडा विचार करा. 

धन्य तो भारत ज्यात निरा आर्यासारख्या स्त्रिया जन्माला आल्या. धन्य ते नेताजी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणापलीकडे जीव देणारी अशी लोकं आणि आझाद हिंद सेना उभी केली. धन्य ती आझाद हिंद सेना ज्या सेनेत निरा आर्यासारख्या सैनिकांनी आपलं योगदान दिलं. फक्त करंटे आम्ही ज्यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला. करंटे आम्ही, ज्यांनी ७५ वर्षात अश्या लोकांची कदर केली नाही. करंटे आम्ही ज्यांना भारताचा स्वातंत्र्य लढा कधी समजलाच नाही… 

निरा आर्या यांचा जीवनपट उलगडणारा एक चित्रपट येतो आहे. अर्थात त्यात कितपत खऱ्या गोष्टी दाखवल्या जातील याबद्दल शंका आहे. पण भारताच्या या पहिल्या गुप्तहेर निरा आर्या यांना माझा साष्टांग दंडवत. एक कडक सॅल्यूट…. 

जय हिंद!!!

शब्दांकन श्री विनीत वर्तक   

(फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही  दिवसांपूर्वी यवतमाळला मन सुन्न करणारी घटना घडली. यवतमाळातील सुप्रसिद्ध गायनिक डॉक्टर सुरेखा बरलोटा ह्यांच अतिशय दुर्दैवी अपघाती दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. सुरेखा ह्यांच्या निधनानं यवतमाळातील एक सुविद्य, निष्णात डॉ. तर आपण गमावलाच पण त्याचबरोबर निष्णात मऩोविकारतज्ञ डॉ. पियुष बरलोटा ह्यांना त्यांच्या सेवाभावी कार्यात भक्कम साथ देणारी सहधर्मचारिणी आणि दोन उमलत्या वयांतील मुलांची आई गमावल्या गेली.

सगळं गेलेलं परत पुन्हा मिळू शकतं परंतु आपली गमावलेली व्यक्ती मात्र परत कधीच हाती येत नाही.

आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे घडलेले अपघात हे आपल्याला हादरवून तर सोडतातच परंतु खूप विचारात देखील पाडतात.

सगळ्यात पहिला मुद्दा स्वरक्षण,स्वतःची काळजी घेण्याचा. ह्या अपघाती घटनांवरुन एक लक्षात येतं सुविद्य, समजदार व्यक्ती सुद्धा प्रवास करतांना घ्याव्या लागणा-या आवश्यक खबरदा-यांमध्येही बेफिकीरी,लापरवाही करतात आणि हीच गोष्ट कदाचित आपल्या स्वतःच्या जीवावर बेतते. बरेचवेळा आपल्या कामाच्या घाईने म्हणा वा एक प्रकारच्या वेगाच्या धुंदीत वाहन बेसुमार वेगात चालवितात

कुठलही वाहन अपघात झाला असता जितक्या कमी वेगात असतं तितकी हानी कमी होते. त्यामुळे सिटबेल्ट न बांधण, वाहन अतिस्पीड मध्ये पळवणं ह्या गोष्टी सुद्धा “आ बैल मुझे मार”

सारखं अपघातांना आणि वेगवेगळ्या होणाऱ्या नुकसानींना आमंत्रण देत असतात हे विसरून चालणार नाही.

बरेचसे अपघात हे सहलीला जातांना, सहलीहून परततांना वा देवदर्शनासाठी जातांना वा येतांना घडतात. ह्या बाबीकडे लक्ष पुरविलं असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. आजचं आपल जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. त्यात आपल्याला कमी कालावधीत, झटपट सगळ्याचं गोष्टी हव्या असतात,जणू कमी कालावधीत “कर लो दुनिया मुठ्ठीमे”सारखं. जरा काही दिवस गेले की आपल्याला “चेंज” हवा असतो.आणि हा चेंज बहुतेकांना त्यांच्या अल्प सुट्टीतच कसाबसा कोंबून भरल्यासारखा हवा असतो.

सहल ,पर्यटन तसं आवश्यकच. पण कुठलिही गोष्ट निवांतपणे आणि जरा वाटबघून अल्प प्रमाणात मिळाली की ती तब्येतीला मानवते,आनंद देते बघा. पण आजकाल अगदी दोन दिवसाच्या सुट्टी मध्येही स्वतःच्या घरात पाय टिकंत नाही, सतत कुठेतरी घाईबडीत का होईना बाहेर जायचंच ही प्रघात असल्यासारखी पद्धतच जणू पडतेयं.कदाचित आता नातेवाईक आणि पाहुणे जाणं ही संकल्पना हळूहळू -हास पावतेयं म्हणूनही असावं.असो

त्यामुळे शांतपणे, निवांतपणे भरपूर वेळेची स्पेस ठेवूनच पर्यटनाला जावं,वाहनं हळू आणि कमी वेगात हाकावी, सीटबेल्ट सारख्या सोयींचा वापर करावा  ह्या निदान आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी माणसांनी पाळाव्यात असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

वडिलांबरोबर पहिल्यांदा मी या महोत्सवाचा आनंद लुटला. त्यातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही.दोन्ही हातात दोन व्यक्तींचा हात धरुन पंडित भीमसेन जोशी रंगमंचावर अवतरले. मला गद्यात बोलता येत नाही मी गाण्यात बोलतो त्यामुळे आता काही बोलत नाही असं काहीतरी म्हणून ते आत गेले.आणि मग वसंतराव आणि पु. ल.या दोन देशपांडे कलावंतानी मैफिल ताब्यात घेतली. पेटीवर पु. ल. यांचा सफाईदार हात फिरत होता.तबल्याचा ‘ठेका नाना मुळे यांच्याकडे होता. स्वरांची आरास बांधत हजारो रसिकांना त्या हिंदोळ्यावर झुलवत वसंतराव आनंदाच्या क्षणाचे मुक्त हस्ते वाटप करत होते. कसे विसरु हे ? 

शास्त्रीय संगीत आणि पुणे यांचे नाते तसे खूप जुने.सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्या कसब्यातल्या वाड्यात गणपतीत देशभरातील मोठे कलावंत येवून आपली कला पेश करत.केसरी वाड्याच्या गणपती उत्सवातही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली,अजूनही लावतात.लक्ष्मी क्रिडा मंदिर या छोटेखानी व्यासपीठावर. नुमवि शाळेच्या पटांगणावर अनेक स्वर्गीय मैफिली रंगल्या. बी जे मेडिकल आर्ट सर्कलने ही अनेकवेळा कानसेनांना तृप्त केले.

पण या सर्वांमध्ये सवाई गंधर्व महोत्सव वेगळा ठरतो.याचे मुख्य कारण म्हणजे इथे उल्लेख केलेले संगीत महोत्सव;काही खासगी,काही सार्वजनिक, पण फार मोठ्या संख्येने रसिकांना सामावून घेणारे नव्हते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही मोजक्याच रसिकांची, अभिजनांचीच मिरासदारी राहिली. दिवाणखान्यात,खाजगी मैफिलीत  रमलेल्या शास्त्रीय संगीताला पंडित भीमसेनजीनी भल्या मोठ्या  मोकळ्या मैदानात आणलं.अभिजानांएवढेच सर्वसामान्य श्रोतेही रसिक आहेत,किंवा काकणभर जास्तच रसिक आहेत हे गुपित सवाईने उघड केले .शास्त्रीय संगीताचे केलेले हे लोकशाहीकरण  हे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. 

वर्षातून किमान तीन वेळातरी महाराष्ट्रातून ,देशातून आणि परदेशातूनसुद्धा अनेक भाविकांचे पाय पुण्याकडे वळतात.जून महिन्यात आळंदी आणि देहूहून सुरु होणाऱ्या पंढरीच्या वारीसाठी,दुसऱ्यांदा आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी गणपती उत्सवात.आणि तिसऱ्यांदा  ’सवाई गंधर्व महोत्सवात स्वराभिषेकात न्हाऊन  निघण्यासाठी. मिळेल ती एसटी ,रेल्वे पकडून या  गान पंढरीचा वारकरी आपल्या आयुष्यातल्या काही i रात्री स्वरांच्या संगतीत व्यतीत करतो. 

कॉलेज जीवनात; पुण्यात माझी राहण्याची दोन ठिकाणे झाली. एक ५७१ ,शनिवार पेठ ,होय प्रभा विश्रांती गृह ज्या जागेत आहे आणि जिथे सई परांजपे यांनी आपल्या ‘कथा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले तो साळुंखे यांचा वाडा.दुसरी जागा ३५८ ,शनिवार पेठ. वीराची तालीम चौकात . दोन्ही जागा रमणबाग शाळेच्या परिघात .सवाई मधली ओळ न ओळ ,प्रत्येक तान,वाद्यांचा झंकार, पदन्यासाची    छमछम आपसुक  कानावर पडायची त्या दोन्ही जागेत.  

१९५२ साली पंडित भीमसेन जोशी यांनी आपली गुरुभगिनी गंगुबाई हनगळ,पंडित फिरोझ दस्तूर यांच्या सहकार्याने सुरु केलेली ही गानयात्रा,आपले गुरु सवाई गंधर्व यांना दिलेली एक अक्षय्य अशी गुरुदक्षिणाच आहे. इथे किती दिग्गज ऐकायला मिळाले, किती वादकांनी हृदयाच्या तारा छेडल्या,आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.  मुंबई दूरदर्शनच्या माझ्या ५ वर्षांच्या काळात अनेक नावाजलेले, बुजुर्ग कलावंत जवळून ऐकले.त्यांच्या ध्वनीचित्रमुद्रणाचाही अनुभव घेतला. पण सवाईची  मजा औरच.   

गुलाबी थंडीला अधिक देखणे करणाऱ्या शाली पांघरुन  हजारो प्रेक्षक तल्लीनतेने श्रवणानंद लुटताना पाहणे हाच मुळात एक सुंदर दृश्यानुभव ठरतो.या महोत्सवाने आणखी एक गोष्ट दिली ती म्हणजे युवा कलाकारांना व्यासपीठ .या महोत्सवात   सामील करून त्यांना कला प्रवासाच्या हमरस्त्यावर आणून सोडले. हवसे ,नवसे ,गवसे साऱ्याच उत्सवात असतात.याला सवाई सुद्धा अपवाद नाही . सवाई ला चाललो आहे असे म्हणून अनेक तरुण तरुणींनी या उत्सवाच्या पेंडॉलला आपले संकेतस्थळही केले. पण हे गोड अपवाद सोडले तर या मंतरलेल्या रात्री म्हणजे गायन ,वादन ,नृत्य यांची लयलूटच असते.

मल्लिकार्जून मन्सूर, गिरिजादेवी ,माणिक वर्मा, हरिप्रसाद चौरासिया ,किशोरी आमोणकर,जितेंद्र अभिषेकी, राजन साजन मिश्र,वीणा सहस्रबुद्धे ,उल्हास कशाळकर ,राशीद खान  या श्रेष्ठ कलावंतानी  सवाईचा मंडप आपल्या स्वराविष्कारानी अनेकवेळा उजळून टाकला  आहे.  आप्पासाहेब जळगावकर या ज्येष्ठ संवादिनी वादकांनी तर ५७ वर्षे या उत्सवात आपल्या बोटांची जादू पेश केली आहे . 

कुमार गंधर्व यांनी सादर केलेला राग भटियार,पंडित रवी शंकर यांनी झंकारलेला  ललत, प्रभाताई अत्रे यांची  ‘तन मन धन तोपे वारू’ ही कलावती रागातील बंदिश , जसराज जी यांचा दरबारी , आलापी आणि तानांनी नटलेली;अनेक नयनरम्य वळणे घेत परवीन सुलतानानी सादर केलेली  ‘गुजरी तोडी या रमलखुणा मनावर गोंदल्या गेल्या आहेत.

मालिनी राजूरकर यांचा बहारदार टप्पा,आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी अभिसारिका साकार करणारा अश्विनी भिडे यांचा बागेश्री,कौशिकी चक्रवर्ती हिने सादर केलेली ‘याद पियाकी आये’ ही आर्त ठुमरी काय काय म्हणून आठवावे? 

शिवकुमार शर्मा यांनी  संतूरच्या सुरावटींनी काढलेली रागेश्रीची रांगोळी,’ ही सगळी मनात चिरंतन जाऊन बसलेली स्वरशिल्पं आहेत . कंठ संगीताचा अनुभव देणारे गाणारे व्हायोलीन वाजवणाऱ्या एन.राजम या विदुषीच्या बोटातली जादू याच सवाईनी आम्हाला दाखवली. वैजयंतीमाला या भरतनाट्यम नृत्यांगनेचे ‘संत सखू’  हे नृत्यनाट्य पाहणे म्हणजेच एक मनोहारी उत्सव..सवाई नसते तर कुठं पाहिलं असते हे आम्ही ?

गाणे हे आनंदाचे कारंजे असते, इंद्रधनुष्य असते हे भान माझ्या वडिलांच्या संगीत प्रेमाने मला दिलेली फार मोठी इस्टेट आहे .रेणुका स्वरुप शाळा आणि रमणबाग शाळा या दोन्ही ठिकाणी हा नेत्रदीपक सोहोळा, गानयज्ञ याची देही याची डोळा आणि श्रवण इंद्रीयांने अनुभवण्याचे भाग्य माझ्या भाळी लिहिणाऱ्या त्या अज्ञात शक्तीचे आभार मानावेत तितके कमी आहेत. 

डिसेंबर मधल्या त्या रविवारी पुण्यात येणाऱ्या सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांना ‘जो भजे हरी को सदा’ या पंडितजी यांच्या भैरवीच्या आर्त स्वरांनी अनेकवेळा कृतकृत्य केले आहे. ‘जमुना के तीर’ या स्वतः सवाई गंधर्व यांनी गायलेल्या ठुमरीचे स्वर ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून कानात आणि मनात साठवत रसिक या गान पंढरीला  निरोप देतात. माथी बुक्का ,गळ्यात तुळशी माळ नसलेले, पण विठ्ठलाचे स्पष्ट दर्शन झालेले हे हजारो  वारकरी; हीच आपल्या  शास्त्रीय संगीत विश्वाची खरी दौलत आहे…. कधीही न संपणारी . 

लेखक : डॉ केशव साठये 

keshavsathaye@gmail.com

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

‘शहादत ही इबादत है’ किंवा ‘हौतात्म्य हीच पूजा’ असं अत्यंत भावस्पर्शी घोषवाक्य असलेलं, श्रीनगर आणि लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या,   श्रीनगरमधील, लष्कराच्या १५ कॉर्प्स रेजिमेंटने उभं केलेलं म्युझियम बघणं हा एकाच वेळी अभिमानाचा आणि कारुण्याचा विषय होता… आणि त्याचबरोबर तो अनोख्या ज्ञानाचा आणि संतापाचाही विषय होता. कारण तो एक कवडसा होता काश्मीरच्या जन्मापासून आजपर्यंत झालेल्या प्रवासाचा आणि त्याचबरोबर काश्मीरसाठी आणि काश्मीरच्या भूमीवर लढल्या गेलेल्या युद्धांचा… पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांचा आणि त्याचबरोबर भव्योदात्त हौताम्याचाही…

२००४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पण आजही ते फारसं कुणाला माहीत नाही! 

श्रीनगरमध्ये जाणारे पर्यटक हे म्युझियम बघत नाहीत किंवा कोणत्याही पर्यटन एजन्सीच्या पर्यटन स्थळांच्या कार्यक्रम पत्रिकेत ते नसतं कारण ते लष्कराच्या बदामी बाग कँटोन्मेंट एरियात आहे. पण आम्ही व्यवस्थित परवानग्या काढून तिथे गेलो आणि वर लिहीलेल्या  सगळ्याच भावनांचा अनुभव आम्ही त्या भव्य म्युझियममध्ये दोन-तीन तास फिरताना घेतला.

या म्युझियममध्ये काश्मीर अस्तित्वात कसं आलं, ‘काश्मीर’ या नावामागची कथा, तिथे आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या राजवटी झाल्या, तिथे कसे कसे संघर्ष झाले, तिथले शूरवीर किंवा वीरांगना कोण, ज्याला ‘काश्मिरीयत’ म्हटलं जातं ती कशी अस्तित्वात आली, तिथली लोक संस्कृती, तिथले कपडे, तिथली भांडी, तिथली वाद्यं हे सगळं तर आहेच पण तिथे बघण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काश्मीरचा रक्तरंजित इतिहास…. फार प्राचीन काळात जायचं नसलं…. अगदी स्वतंत्र भारताचा विचार केला तरीही १९४७-१९४८ पासून आजतागायत तिथे झालेली युद्धं, त्यात वापरली गेलेली शस्त्रं, रणगाडे, त्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची माहिती, या रेजिमेंटमधील अशोक चक्र, परमवीर चक्र वगैरे सन्मान मिळवलेल्या योद्ध्यांची गाथा, त्यांचे अर्धाकृती पुतळे, त्या युद्धानंतर बदलत गेलेल्या सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ‘युद्धात कमावलं आणि तहात गमावलं’ असं ज्याबाबत म्हणता येतं अशा ‘हाजी पीर’ सारख्या किंवा पाकव्याप्त काश्मीरासारख्या कधीच न मिटणाऱ्या, कायम सलत राहणाऱ्या जखमांची  सर्वांगीण माहिती, हे  सगळं काही बघायला मिळतं.  

काश्मीरमध्ये दहशतवादाचा काळा कालखंड सुरू झाल्यानंतर आजतागायत त्या दहशतवादाची बदलत गेलेली रूपं, दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या एके ४७, एके ५६ रायफली, पिस्तुलं, ग्रेनेड्स, बॉम्ब्स सकट असंख्य शस्त्रांची माहिती, नकाशे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली बोगस ‘करन्सी’, खंडणी  उकळण्यासाठी त्यांनी छापलेली व आपल्या सशस्त्र दलांनी जप्त केलेली पावती पुस्तकं असंही सगळं बघायला मिळतं. 

आजवर काश्मीरमध्ये चाळीस हजाराच्या वर ‘एके फोर्टी ४७’ आणि पंचवीस हजाराच्या वर ‘एके ५६’ जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटना तिथे मृत्यूचे थैमान कसे माजवत होत्या त्यांची ही हादरवून टाकणारी माहिती अक्षरशः हलवून टाकते. 

हे म्युझियम आम्हाला ज्याने  फिरून दाखवलं तो हवालदार दिनेश याने तर आम्हाला ‘एके ४७’, ‘एके ५६ ‘वगैरे उघडूनही दाखवल्या आणि ‘एके ४७ ‘ दहशतवाद्यांमध्ये एवढी का लोकप्रिय आहे त्याचीही माहिती दिली.

 त्याने दिलेल्या माहितीनुसार एके ४७ गंजत नाही, बिघडत नाही, अगदी चिखलात किंवा पाण्यात पडली तरी तिची भेदक क्षमता कमी होत नाही. त्यामुळे ती दहशतवाद्यांची लाडकी आहे. 

मात्र या बंदुका नुसत्या प्रदर्शनात का मांडल्या आहेत, आपल्या सैनिकांना त्या दिल्या का जात नाहीत असा प्रश्न आमच्या मनात होता. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या अर्थातच पाकिस्तानात बनतात आणि त्याच गोळ्या या रायफल्ससाठी लागतात. आपल्या देशात बनलेल्या गोळ्या त्यात चालत नाहीत. त्यामुळे त्या नुसत्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.    

या व्यतिरिक्त ग्रेनेडस, क्षेपणास्त्र, बॉम्ब्स यांचे अर्धाकृती छेद तिथे ठेवण्यात आलेले आहेत.

 तिथे मांडण्यात आलेला एक देखावा तर असा आहे की तो बघून भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या सैन्याचा खूप अभिमान वाटतो.

तो देखावा म्हणजे, ते स्मारक आहे एका पाकिस्तानी सैनिकाचं ! कारगिलच्या युद्धात लढता लढता त्याने एकट्याने ज्या धैर्याने आणि शौर्याने भारतीय सैन्याचा मुकाबला केला ते बघून भारतीय सैन्यालाही त्याचं खूप कौतुक वाटलं. त्याच्या शरीराची भारतीय सैन्याच्या गोळ्यांनी चाळण झाली होती आणि तरीही तो एकटा लढत होता. शेवटी आपली एक गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि तो मरून पडला. तो जी मशीनगन वापरत होता त्याच मशीनगनवर तो जसा पडला तसंच त्याचं स्मारक या म्युझियममध्ये आहे. त्याच्या बाजुलाच, त्याला कदाचित रसद वगैरे पोहोचवायला आलेल्या एका गावकऱ्याचंही शव दाखवण्यात आलेलं आहे. ही सगळी माहितीही तिथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

या सैनिकाचं शौर्य पाहून भारतीय सेना एवढी खुश झाली की भारताने पाकिस्तानला असं पत्र लिहिलं की त्यांच्या या सैनिकाला त्यांनी ‘निशान ए पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब दिला पाहिजे. 

‘कारगिलमधले सैनिक आपले नाहीत’, ‘पाकिस्तानचा त्यांच्याशी काही संबंध नाही’ अशीच भूमिका पाकिस्तानने सातत्याने घेतली असल्याने पाकिस्तानने हे मानायला नकार दिला. शेवटी भारताने लष्करी इतमामात व इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार त्याचे अंतिम संस्कार तर केले. पण भारताने सातत्याने त्याला ‘निशान ए पाकिस्तान’ दिला जावा म्हणून पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा केला आणि अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं.  ‘तो आपला सैनिक आहे’ हे अखेर पाकिस्तानने कबूल केलं आणि त्याला मरणोत्तर ‘निशान ए पाकिस्तान’ हा सर्वोच्च किताबही दिला!

‘मरणांतराणी वैराणी’ ही भारतीय संस्कृतीची उदात्त परंपरा आणि शत्रू असला तरी त्याच्या शौर्याचं कौतुक करण्याची भारतीय सैन्याची दिलदारी, उदारता या दोन्हींचं दर्शन या देखाव्यातून घडतं. 

काश्मीरचे शेवटचे महाराजा, राजा हरिसिंग यांनी १९२४-१९२५  मध्ये बांधलेल्या दगडी इमारतीत हे म्युझियम आहे. हवालदार दिनेश कुमार म्हणून तेथे तैनात असलेल्या १५ कॉर्प्सच्या  एका सैनिकाने आम्हाला इथली पूर्ण माहिती अत्यंत आत्मीयतेने दिली. ते सगळं बघत असताना एकाच वेळी अभिमान आणि सैन्याविषयीची कृतज्ञता मनात दाटून येत होती. 

आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याची ती गाथा लतादीदींनी अमर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यातल्या

जब घायल हुआ हिमालय,

खतरे में पडी अजादी

सरहद पर मरने वाला 

हर वीर था भारतवासी ….

या ओळींची आठवण करून देत होती आणि हात आपोआपच कृतज्ञतेने जोडले जात होते!

हे म्युझियम बघायचे असेल तर ncmediacell@gmail.com या मेल आयडीवर मेल टाकून प्रयत्न करू शकता. मात्र उत्तर लवकर मिळत नाही. कर्मचारी कमी आणि काम अफाट अशी तिथली स्थिती आहे!

लेखिका : सुश्री जयश्री देसाई 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

— मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती…१२ची

— फूट म्हणजे १२ इंच

— एक डझन म्हणजे १२ नग.

— वर्षाचे महिने १२,

— नवग्रहांच्या राशी १२

— गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

— तप….१२ वर्षाचे,

— गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

— घड्याळात आकडे…..१२,

— दिवसाचे तास …..१२,

— रात्रीचे तास …..१२ ,

— मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

— मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

— एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

— सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

— पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

— इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

— बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

— मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

— बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

— बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला

— तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

— ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

— कृष्ण जन्म….रात्री १२

— राम जन्म दुपारी…१२ ,

— मराठी भाषेत स्वर…१२ —- त्याला म्हणतात…बाराखडी

— १२ गावचा मुखीया,

— जमिनीचा उतारा ७/१२चा

— इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश 

— खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

— बारडोलीचा सत्याग्रह 

— पळून गेला ——पो’बारा’

—- पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

— एक गाव, भानगडी १२ 

— लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

— काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण १२. 

आणि

— सर्वात महत्त्वाचे…

— MH12 अर्थात ……पुणे

———- अशी आहे ही १२ चीं किमया….

— असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकर लावू शकतात–

— कोणालाच दोष देऊन उपयोग नाही….. 

कारण — महिनाच  “बाराचा” आहे… 

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

एकदा काही कारणाने माझ्यावर एका ३० वर्षाच्या हुषार, शिकलेल्या, स्मार्ट आणि चुणचुणीत बाईला स्वयंपाक शिकवायची वेळ आली. मीही हो म्हटलं पटकन. तिचं वय बघता तिला थोडं तरी काहीतरी येत असेल, थोडी काही समज असेल, असा एक सहज गैरसमज मी करून घेतला आणि धक्क्यावर धक्के बसायला लागले. 

स्वयंपाक = कागदावर लिहिलेली एक रेसिपी असा तिचा आणि (मी कितीतरी वर्षं स्वयंपाक करत असून) माझा पण समज होता. 

मग झाली मजा सुरू—- 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव,   का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा— आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत, बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे)– हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी — याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही, तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकवायला लागणार आहे.  आणि ते काही दिवसांमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि त्याला लागणारी बुद्धिमत्ता बहुतेक या हुशार आणि चुणचुणीत मुलीकडे नाहीच आहे. 

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे—’ involvement’ . उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

तिला काही रेसिपी लिहून दिल्या, काही व्हिडिओ पाठवले, काही पुस्तकं सुचवली आणि विषय संपवला.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, पण प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायका पुरुषांच्या हुषारीला दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी एकदा रोज—  निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

लेखिका :  सुश्री केतकी

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

‘लुईस हे ‘ या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. 

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. 

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्यांनी सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या  झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘ यू कॅन हील युवर लाईफ ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ ब्रँडन बेज ’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता.  बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, ” मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा.”

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘ The Journey ‘ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? 

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? तर आपलंच शरीर.—- जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. —- पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही, तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली, तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते. पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ ये रे माझ्या मागल्या ’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. 

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा !

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares