मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डॉ. भाऊ बोत्रेची गोष्ट — (एक सत्यकथा) — डाॅ.शंकर बो-हाडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ डॉ. भाऊ बोत्रेची गोष्ट — (एक सत्यकथा)  — डाॅ.शंकर बो-हाडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

काल परवाची गोष्ट.  शिपाई तास संपता संपता वर्गात आला. म्हणाला, “ सर त्या मुलाला पाय-या चढता येत नाही. तरी त्याला पहिल्या तासाला वर्गात बसायचं आहे.  तुम्हीच त्याला समजावून सांगा.”  मी त्याला भेटलो. तो म्हणाला, “ मला पहिल्या तासाला बसायचं आहे.” 

“अरे पण तुला दुस-या मजल्यावर यायला वेळ लागेल.  तुला त्यासाठी लवकर यावे लागेल.” – मी

“ सर , मी घरातून तासभर लवकर निघेल. तासाला वेळेवर येईन .” – तो 

मी त्याच्या जिद्दीला सलाम केला.  मला आमच्या सैय्यद प्रिप्रीच्या शाळेतील संतोष आठवला. तो न चुकता शाळेत यायचा. त्यासाठी एका लाकडाच्या फळीला त्याने चाकं बसवून त्याची गाडी केलेली होती. एका हाताने तो ती पुढे ढकलत होता. ऊन ,वारा, पाऊस, गारा–  त्याच्या शाळेत खंड पडत नसे. पाय पोलिओने गेलेल्या संतोषने मनात घर केले होते.  पुढे नाशिकमधील समाजसेवेच्या वेडाने झपाटलेल्या रमेश जाधव यांनी गणेश उत्सवाच्या काळात दानपेटी ठेऊन दान जमा केले. त्यातून संतोषसाठी सायकल घेतली.  संतोष तीनचाकी सायकलवर शाळेत येऊ लागला. संतोष फार गोड मुलगा होता.

मी पुणे विद्यापीठात होस्टेलला राहत होतो. संशोधन चालू होते.  तिथे भाऊ बोत्रे नावाचा मित्र भेटला. भाऊकडे तीनचाकी सायकल होती आणि स्कूटरही. गणेशोत्सवात त्याच्या स्कुटरवर त्याने मला पुण्यातले गणपती दाखवले. त्याला पुण्याचे गल्लीबोळ माहित होते.  

भाऊची गोष्ट मजेशीर  होती. मित्र त्याला पाठकुळीवर बसवून शाळेत घेऊन जात. भाऊला शाळा आवडायची. घरात बसून तो अभ्यासही करायचा. घरच्या मंडळींची  मोठा झाल्यावर त्याने दिव्यांगासारखा एखादा टेलीफोन बुथ चालवावा एवढीच अपेक्षा होती. घडले ते उलटे. तो एस.एस.सी. झाला. चांगले गुण मिळाले. असा मुलगा कला, वाणिज्य शाखेत शिकेल अशी आपली सामान्य अपेक्षा. तो वाडीया काॅलेजला गेला. म्हणाला, ‘ मला विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. ‘  प्राध्यापकांनी त्याला समजावले.  विज्ञानशाखेत प्रयोगशाळेत उभे राहून प्रात्यक्षिके करावी लागतात. ते तुला जमणार नाही , वगैरे .’  भाऊ म्हणाला, ‘ सर , मी स्टुलावर बसून प्रात्यक्षिके करीन.’  प्राध्यापकांचा नाईलाज झाला. भाऊ काॅलेजमध्ये नियमित येत होता. अभ्यास करीत होता. तो बारावीची परीक्षा पास झाला. असा मुलगा बी. एस्सी झाला नसता तर नवल. भाऊ बोत्रे बी.एस्सी झाला आणि एम.एस्सीच्या तयारीला लागला. त्याला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. वडील रिक्षा चालवायचे. कसे जमणार ? पुण्यात काही माणसं शिक्षणासाठी मदत करीत असतात, हे भाऊला माहीत होते. त्याचे हात आता पाय झाले होते. भाऊ हाताचा वापर करुन चालत असे. एकदा एका कार्यालयात गेल्यावर जनावर आले असल्यासारखं आधिका-याला जाणवलं. आधिकाऱ्याची घाबरगुंडी उडाली होती. रस्त्याने हाताने चालताना त्याला जनावराची भीती असते. कुत्रे त्याच्यावर हल्ला करण्याची भीती असते.  भाऊ संबंधित दानशूराकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘ किती मदत हवी ? ‘ भाऊने त्यांच्या टेबलवर विद्यापीठाचे प्रवेशाचे चलन ठेवले. त्यावरची रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर भरण्याची विनंती केली. भाऊचा एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश झाला. आता भाऊला शिष्यवृत्ती मिळू लागली. विद्यापीठाचे वसतिगृह मिळाले. भाऊची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल झाली. भाऊ कपडे धुणं, इस्त्री करणं आणि विभागात जाऊन लेक्चर, प्रॅक्टीकल करू लागला. दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीपणे पूर्ण केला. 

भाऊ बोत्रेची गोष्ट इथेच संपत नाही.  आता भाऊला Ph.D. करायचे वेध लागले. त्याने त्यासाठी मार्गदर्शकाची निवड केली.  संशोधनाच्या वाटा धुंडाळल्या. भाऊ दिवसभर प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिके करुन पाहू लागला.  विज्ञानात प्रयोगाला, त्यातून येणाऱ्या निष्कर्षाला महत्व असते. त्यासाठी तो तज्ञांना भेटू लागला. एकदा त्याच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर येऊन काम पाहून गेले होते. एखादा पदार्थ किती जुना आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, या विषयावर भाऊचे काम चालू होते. संशोधकाला संशोधन चालू असताना आपले शोधनिबंध सादर व प्रकाशित करावे लागतात. भाऊने असाच एक शोधनिबंध अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाला पाठवला आणि चमत्कार झाला.  बोस्टन विद्यापीठाने तो स्वीकारला आणि सादर करण्यासाठी थेट बोस्टनला बोलावले. परदेश प्रवासाची तयारी सुरू झाली. भाऊने पासपोर्ट काढला. व्हिसा मिळवला. त्यासाठी नो एजंट. भाऊ प्रत्येक ठिकाणी स्वतः गेला. अगदी विमान प्रवासाची तिकीटे स्वतः काढली. मार्गदर्शक म्हणाल्या, ‘ चाललाच आहेस तर तुझ्या विषयाच्या अनुषंगाने काही नवीन स्वरूपाचे संशोधन चालू आहे का ? याचा शोध घे . ‘  सगळी नाटकं करता येतात पण पैश्याचे? भाऊ बोत्रे तीन दिवस तिथे राहणार होता.  त्यासाठी त्याला ट्रॅव्हल ग्रॅंट मिळाली होती. भाऊने घरी त्याच्या परदेश प्रवासाची आजिबात कल्पना दिली नव्हती. दिली असती तर ह्या लंगड्या पांगळयाची काळजी वाटून आई वडीलांनी खोडा घातला असता ना ! भाऊने कुलगुरू नरेंद्र जाधवांना भेटायचा प्रयत्न केला.  पण कुलगुरू मिटींगमध्ये असल्याने त्याच्या चार चकरा फुकट गेल्या. टेक ऑफचा दिवस जवळ आला. आवराआवर सुरू झाली. मी भाऊला नाशिकला बोलावले. शुभेच्छांचा घरगुती समारंभ होता. पत्रकार विश्वास देवकर आले. ” हातावर चालणारा भाऊ निघाला बोस्टनला ” , अशी मुखपृष्ठ कथा सकाळ पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आणि भाऊला काॅल,  मेल सुरू झाले. अमेरिकेतली मराठी माणसं म्हणाली, ‘ हाॅटेलात राहू नको . इथली हाॅटेल्स तुला परवडणार नाहीत . आमच्याकडे रहायला ये.’  कुलगुरू नरेंद्र जाधवांनी डाॅ. विद्यासागर यांचेवर त्याला काय हवे ते पहायची जबाबदारी सोपविली. कुलगुरू ऑफिसातून भाऊचा शोध सुरू झाला. आईवडिलांना पेपरमधून पोराची किर्ती ऐकायला मिळाली. बाबा कल्याणी यांनी भाऊच्या हातात खर्चासाठी पैसे दिले. भाऊला विमानतळावर पोहचवायला काही नातेवाईक हजर होते.  मी टेक ऑफच्या दिवशी विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी गेलो होतो. 

भाऊची गोष्ट इथे अधिक मजेदार वळण घेते.  भाऊ बोस्टन विद्यापीठात संशोधन मांडतोच,  पण अमेरिकेतल्या विविध विद्यापीठात जातो . संशोधकांना भेटतो. यासाठी अमेरिकतली मराठी माणसं त्याच्या पाठीशी उभी रहातात.  तीन दिवसासाठी गेलेला भाऊ एकवीस दिवस अमेरिकेत फिरतो आणि भारतात परततो. असा माणूस Ph.D पदवी मिळवतो हे आता फार नवलाचे राहत नाही. 

शिक्षण कधी थांबते का ? थांबला तो संपला . भाऊला एकदा पुणे विद्यापिठाने संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी जपानला पाठवले होते.  त्याचदरम्यान त्याची दिल्लीत आय.आय. टी. साठी मुलाखत होती. मुलाखतीची तयारी चालू होती. तरी भाऊ जपानच्या टीममध्ये दाखल झाला.  तिथून मुंबई गाठली. दिल्लीचे तिकीट काढलेले होते. तसाच दिल्लीत पोहोचला. फ्रेश होऊन मुलाखतीसाठी हजर झाला. तज्ञांना जेव्हा भाऊची पुणे – जपान – मुंबई – दिल्ली प्रवासाची हकीगत कळली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि  ते भाऊला म्हणाले, ‘ बोल कधीपासून नोकरीत रुजू होतो. हे घे तुझे नियुक्ती आणि निवडीचे पत्र. ‘ 

भाऊ म्हणाला,  ‘ मला वेळ द्या.  घरी जातो. आईवडिलांना भेटतो. चार दिवस आराम करतो आणि नोकरीला सुरुवात करतो .’ 

हाताचा वापर पाय म्हणून करणारा  डॉ.भाऊ बोत्रे आज राजस्थानच्या बिट्स पिलानी मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहे. त्याला तेथून भारतभर फिरावे लागते. जगभरच्या संशोधनावर लक्ष ठेवावे लागते आणि दिव्यांगांसाठी काहीबाही करावे लागते.  म्हणून भाऊची ही कथा सफळ संपूर्ण नाही. तो आणखी काही करण्याची तयारी करतो आहे. त्याचा संसारही फुलला आहे. त्यावरची कळी खुलू लागली आहे आणि भाऊ प्रयोगशाळेत व्यस्त आहे. 

लेखक : डॉ.शंकर बो-हाडे 

९२२६५७३७९१

[email protected]

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……   

” माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही “, असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या निऱ्या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, ” तू काय हमालाची बायको आहेस का ?”

– आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा साऱ्या  स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ” यापुढे पान बंद “, असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, ” जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा. ” !

एक दिवस मालक, खालूनच “माई, माई”, अश्या मोठ्याने हाका मारीत आले. “अहो काय झालं?” मी विचारलं.  पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं. म्हणाले, ” तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय “! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला ” घाटी ” म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, “अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?” इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुसऱ्याला हसवायचे !

मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभऱ्याची भाजी फार आवडायची. मटण, मासे, कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत. कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, ” काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास का नाही ? नाही तर ये आणि जेवून जा.”

काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, ” खाली पडलेल्या नोटा भिकाऱ्यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये.”

प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्याबरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

मालकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मीही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे, ” माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन.”

मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते, तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं, तर भगवं धोतर !

मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, “मुलीच का झाल्या ?” असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलींना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

– (क्रमशः भाग पहिला ) 

— माई मंगेशकर 

शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे

ईमेल – [email protected] 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

बहिणी…..​​

दुःख  वाटून घेणाऱ्या…. सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या …. सल्ला घेणाऱ्या 

खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या 

आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या 

स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणाऱ्या 

शाबासकीची पहिली थाप पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

 

​​बहिणी ….. 

आयुष्याला मिळालेलं एक वरदान.

जागेपणीचं स्वप्न छान …. पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान

मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर

हळुवार हात पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर

 

​​बहिणी ….. 

गातात नाचतात, खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम.

त्या सुगरण असोत  नसोत…. प्रत्येक  घास वाटतो अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती… लहान थोर… शहर गाव.

बहीण असते एक सरिता ….. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी……. 

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदल… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ बदल…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

एका प्रसिद्ध टीव्ही  मालिकेतील नायिका सोज्वळ आहे. जुन्या काळातील नायिकांसारखी ती दोन वेण्या घालते. अलीकडं कोणी वेण्या घालत नाहीत. आंबाडा, एक वेणी या हेअरस्टाईल्स तर कालबाह्य झाल्या आहेत. पॉनिटेल फक्त मध्यमवयीन महिलांनी घातलेला दिसतो. तरूणी, नवयौवना यांच्या हेअरस्टाईलनं क्रांतिकारक बदल केलेला दिसतो. खरं तर या नवयुवती हेअरस्टाईल करतच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या सगळ्या आजकाल केस बांधतच नाहीत. केस मोकळे सोडणं हीच सध्याची फॅशन आहे.

एक काळ असा होता की केस मोकळे सोडणं असभ्य मानलं जाई. आंबाडा, एक वेणी, दोन वेण्या एवढेच पर्याय उपलब्ध असत. पोनीटेल ची फॅशन ही लहान केस असणाऱ्यांसाठी वरदान ठरली. ज्या मुलींचे केस खरोखरच टेल सारखे, शेपटी सारखे लहान होते त्या मुली एक आडवी क्लिप लावून पोनी बांधू लागल्या. मानेच्या नाजूक झटक्यानं ही पोनी डौलदार झोका घेऊ लागली. आकर्षक दिसणं कोणाला नको असतं बरं? ही स्टाईल वेगानं समस्त महिला वर्गानं उचलून धरली. लांब केसांचा आता कंटाळा येऊ लागला. वेळ वाचतो या नावाखाली लहानथोर सगळ्याच महिला पोनी बांधण्यासाठी केसांची लांबी मर्यादित ठेवू लागल्या. वेणी घालणं ही जुनाट फॅशन झाली. काकूबाई स्टाईल म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि काकूबाई म्हणवून घेणं कोणाला चालेल, हो ना?

मधल्या काळात साधना कट, बॉबकट, बॉयकट अशा काही कटस्टाईल्स लोकप्रिय झाल्या. पण त्यांची लोकप्रियता फारशी मोठी नव्हती. बघता बघता हिंदी सिनेमा, टीव्ही मालिकांतील नायिका केस मोकळे सोडून फिरू लागल्या. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी आमच्या मुली, सुना देखील मुक्त केस आणि मुक्त मनानं मोकळ्या ढाकळ्या बिनधास्त जगू लागल्या. स्वच्छता, हायजिन साठी घातलेली बंधनं या मुलींनी झुगारून दिली. घरभर केस पडू नयेत म्हणून एका जागी बसून केस विंचरणं, स्वयंपाक करताना, घरकाम करताना ते बांधून ठेवणं हे नियम जाचक वाटू लागले. मोकळे केस हे मुक्त जगण्याचं, मुक्त विचारांच प्रतीक ठरलं. इथंपर्यंत थोडं ठीक आहे असं वाटतंय तोच कुरळे केस नकोसे वाटू लागले. स्ट्रेट, स्मूथ, सिल्कि केस पसंतीची पावती मिळवू लागले.त्यासाठी महागड्या ट्रिटमेंटस् केल्या जाऊ लागल्या. पण केसांची नवी मुक्त स्टाईल वाऱ्याच्या वेगानं पसरली.

मुक्तांगण कितीही प्रिय असलं तरी वैविध्यपूर्ण केशरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं दिसतं. फ्रेंच रोल, हाय बन, लो बन आणि अगणित हेअरस्टाईल्स सण समारंभ, लग्न मुंजीत मानाचा मुजरा घेतात.

चांगलं दिसणं, आधुनिक राहणं, काळाबरोबर चालणं जमायल हवंच. तो आपला हक्कच आहे. फॅशन करताना स्थळकाळाचं भान मात्र असायला हवं. आपण कुठं आहोत, कोणत्या समारंभाला जाणार आहोत, आजूबाजूला कोणत्या वयोगटातील लोक आहेत, अशा काही गोष्टींचा विचार करावा इतकंच. स्वयंपाक करताना बांधलेले केस कामात अडथळा आणत नाहीत . शिवाय ते हायजेनिक आहे.

पूजा असेल, धार्मिक विधी असतील तर बांधलेले केस बरे. आजूबाजूला पणत्या,दिवे,समया असतील तर मोकळे केस धोकादायक ठरू शकतात. वयस्कर किंवा आदरणीय मोठी माणसं आजूबाजूला असतील तर केस मोकळे सोडू नयेत. ते छानसे बांधावेत.अशा वागण्यातून आदर, नम्रता व्यक्त होते. आधुनिकपणाचा स्वीकार करताना तारतम्य ठेवायला हवंच.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं !! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि ‘पुरेसाची’ व्याख्या पुन्हा बदलते ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं ! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो ! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? की खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको, असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे . पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!

लेखक : – प्रसाद शिरगांवकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित. 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ !! पन्नाशी पार करतांना !! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

!! पन्नाशी पार करतांना !!  … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, 

” मित्रा, पन्नाशी ओलांडल्यावर आणि साठीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय? ” 

— यावर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे……… 

— आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय

— मला याची जाणीव झालीय की, आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही, की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

— आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! 

— आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

— आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

— आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

— आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

— ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहिती नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

— आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

— आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

— आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

—  आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

— मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!

— आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

 — आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जाऊन रडतो. त्याच्या तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असल्याची भावनाही मनात येते.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

— आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा पन्नाशी ओलांडताना !! —

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पिकलेपण… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

अल्प परिचय 

शिक्षण – B.A. (Hons.) Mum. Uni.  अर्थशास्त्रातील पदविका

जन्म – 02/06/1958 – निपाणी

दी सांगली बँकेत1979 पासून- कारकून पदाने सुरू झालेली कारकीर्द. 2011 रोजी सीनियर मॅनेजर पदावरून आय.सी.आय.सी.आय बँकेतून (विलींनकरणा नंतर) निवृत्त. सध्याचे वास्तव्य विश्रामबाग सांगली.

निवृत्ती नंतर लेखन सुरु केले. कथा, ललित लेखन,पहिला चहा (स्फुट लेखन), चित्र कथा सारखे लेखन.विविध लेखन स्पर्धेत सहभाग आणि यशस्वी मानाकांने प्राप्त. दिवाळी अंकातून कथांना प्रसिध्दी. ‘कथारंग’ पहिले पुस्तक प्रसिध्द.

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ पिकलेपण… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

(एक नवीन सदर  – ‘प्रतिमेच्या पलिकडले’, चित्रकाव्य प्रमाणेच परंतू गद्य लेखन)

… जे जे पेरतो  ते तेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे ,हे तर तुम्हा आम्हा सर्वांना विदीत आहेच…प्रत्येक भागातली अशी सुफलाम भूमी हि सोन्याची खाण असणारी भूमी वाटतं असते…निसर्गाचे वरदान लाभलेली , नदी, नाले, ओढे ,तळी, बावी ,विहिरी जलाने तुडुंब भर भरून वाहू लागल्या की कृषीवलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवते. जे पिकतं ते सोनच असतं…उन्हाळातल्या मशागतीपासून रोहिणीची वाट पाहात मृगाची सरीने भूमी भिजली कि पहिला उगवणारा आशेच्या हिरव्या हिरव्या कोवळ्या कोंबाकडे पाहून कृषिवल त्याची निगराणी करत जातो..श्रावणातल्या हिरवाईने  वसुंधरा शालूने सलज्ज नवथर नवयौवना दिसते…आश्विनला ती परिपक्व होते.. हिरवे पणा च्या जागी पिवळेपणाची परिपक्वता येते… जीवन परिपूर्ण झाले या कृतार्थतेने समाधान तिथे विलसत असते.पश्चिमेचा वारा वाहू लागतो आणि त्यावेळी उभ्या असलेल्या शेतातील पिकाचे तुरे डोलू लागतात. जणू काही सृष्टीचे गुणगान गात असताना मग्न झालेले दिसतात… आता लवकरच आपलं या भुमीशी असलेलं नातं संपणार आहे.. ही मोहमाया  सोडून जायचे दिवस आले आहेत.. आसक्ती पासून मुक्ती मिळवायची हीच वेळ आलेली असते…

… अन् आपली सर्वांची जिवनानुभवता याहून काही वेगळी असते का? पिकलेपण म्हणजे अगणित कडू गोड अनुभवांची संपन्नता नसते काय? हा अनमोल सोनेरी विचारांचा ठेवा पुढील पिढीला  द्यायचा हेच सुचवत नसते काय? पिकलेपणात सोनेपण दडलेलं नसते काय?

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षकी पेशा… अनामिक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ शिक्षकी पेशा… अनामिक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मूळ इंग्रजीतील पोस्टचा प्रकाश भागवत कृत मराठी अनुवाद- वाचनिय आणि चिंतनशील सुद्धा.)

दीक्षांत समारोहात भाषण करतांना प्रमुख वक्ते जे स्वतः एका शिक्षण संस्थेत प्राचार्य पदावर होते, ते म्हणाले,  डॉक्टर असणाऱ्या बापाला आपल्या मुलांनाही डॉक्टर व्हावं असं वाटतं, इंजिनीयर बापाला आपल्या मुलांनाही आपल्यासारखंच इंजिनियर व्हावं असं वाटतं, उद्योग धंदा करणाऱ्या बापाला आपल्या मुलांना एखाद्या कंपनीचा सीईओ व्हावं असं वाटतं. तसं शिक्षकी पेशा असणाऱ्या बापालाही आपल्या मुलानं यांच्यापैकीच कांहीतरी एक व्हावं असं वाटत असतं पण शिक्षक व्हावं असं कुणालाही स्वतःहून वाटत नाही.

ही परिस्थिती दुर्दैवी आहे परंतु हीच वास्तविकता देखील आहे.

रात्रीभोजच्या प्रसंगी जेवायला आलेले पाहुणे जेवणाच्या टेबल भोवती बसून आपापसात चर्चा करीत होते. त्यापैकी एक व्यक्ती जो एका कंपनीमध्ये सीईओ होता, त्याला शिक्षण क्षेत्राबद्दल फारशी आस्था नव्हती. हे क्षेत्र समाजोपपोगी नसल्याचं त्याचं मत होतं. तो म्हणाला, “ज्यानं केवळ शिक्षक होणं हाच आपल्या जीवनातला सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवलं तो मुलांसमोर काय आदर्श ठेवणार बोडख्याचा?*”

आपला मुद्दा पुढे रेटत तो बाजूलाच बसलेल्या एका शिक्षिकेला बोलला, ” दातार ताई, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, अगदी प्रामाणिकपणे सांगा तुम्ही काय असं महत्वाचं कार्य करता तुम्हाला वाटतं?”

दातार ताई आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि फटकळपणाबद्दल प्रसिद्ध होत्या. त्या म्हणाल्या, मी काय काम करते हे तुम्हाला ऐकायचय ना ऐका तर मग?

त्या एक क्षणभर थांबल्या आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.

आपण जितके परिश्रम करू शकतो असं मुलांना वाटतं त्यापेक्षा अधिक परिश्रम मी मुलांकडून करवून घेते.

शिक्षिका होऊन मला अतिशय मोलाचा पुरस्कार मिळाला आहे असं मला वाटतं.

मुलांचे आई-बाप स्वतःच्याच मुलांना आय पाॅड, गेम क्यूब किंवा टीव्हीवर सिनेमा दाखविल्याशिवाय पाच मिनिटं देखील एका ठिकाणी बसवून ठेवू शकत नाहीत आणि मी या सर्वच मुलांना वर्गामध्ये ४० मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसवून ठेवू शकते.

मी काय करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? एक दीर्घ श्वास घेत त्या टेबलभोवती जमलेल्या सर्व पाहुण्यांकडे बघत म्हणाल्या –

मी मुलांचं शैक्षणिक मनोरंजन करते.

मी त्यांना प्रश्न विचारायला लावते.

मी त्यांना माफी मागायला शिकवते आणि माफी का मागायची त्याचं कारणही त्यांना सांगते. संस्कार, संस्कृती, सदाचार आणि नैतिकता शिकवून त्याप्रमाणे वागायला सांगते.

मी त्यांना इतरांबद्दल आदर बाळगायला शिकवते आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जबाबदारी घ्यायलाही शिकवते.

मी त्यांना सुंदर हस्ताक्षरात लिहायचं कसं हे शिकवते आणि त्यांच्याकडून लिहूनही घेते.

केवळ अभ्यास करवून घेणं हेच काही सर्वस्व नाही, मी त्यांना सतत (पुस्तकं) वाचायला लावते.

मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष आकडेमोड करवून घेते. मुलांनी, देवानं दिलेल्या त्यांच्या बुद्धिचा वापर करायला हवा माणसानं बनविलेल्या कॅल्क्युलेटरचा नव्हे.

इतर देशातल्या माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख अबाधित राखील, भारताबद्दल त्यांना जे काही जाणून घ्यावयाचे आहे त्याचा अभ्यास त्यांना करायला लावते.

माझ्या सर्व विद्यार्थ्यांना  सुरक्षित वाटेल असा माझा वर्ग असावा हा माझा प्रयत्न असतो.

आणि शेवटचं हे की मी त्यांना हे समजावून सांगते की तुम्हाला देवाकडून जी कांही देणगी मिळाली आहे तिचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात, खूप परिश्रम केलेत, आणि आपल्या मनाचं ऐकून वागलात तर जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

श्रीमती दातार पुन्हा काही क्षण थांबून म्हणाल्या, पैसा हेच काही सर्वस्व नाही असं मानणार्‍या मला, जेव्हा लोक मी काय काम करते यावरून माझी समाजातली पत ठरवतात तेव्हा मी माझं डोकं वर करून जगात वावरते आणि अशा लोकांकडे मी ढुंकूनही पाहात नाही कारण ते निर्बुद्ध, अशिक्षित, अज्ञानी, तर्कशुन्य आणि तत्वहीन असतात. मी काय करत असते ते तुम्हाला जाणून घ्यायचंय?

मुलांना शिक्षण देऊन मी त्यांना त्यांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा सीईओ होण्यासाठी तयार करते. तुम्ही काय करता मिस्टर सीईओ फक्त पैसा मिळवता?

तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, सीईओ किंवा यशस्वी उद्योजक होतात पण भावी पिढीला तेच बनण्यासाठी त्यांचा प्राथमिक स्तर किंवा पाया उभारु शकत नाहीत.

आता त्या सीईओ चं ‘थोबाड’ पाहण्यासारखं झालं होतं. तो गप्प बसला. क्षणभरच तिथे शांतता पसरली आणि त्यानंतर प्रत्येक जण आदरानं उभा राहून टाळ्या वाजवू लागला.

अनुवादक: प्रकाश भागवत

प्रस्तुती: सौ.उज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झंडू बाम… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

? इंद्रधनुष्य ? 

झंडू बाम… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला…..!!!!

१५० वर्षांपूर्वीची गोष्ट…… 

तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.

त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे. हे झंडू भटजीदेखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बापसे बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.

जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्जी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भटजींना बहाल केली. येथेच १८६४ साली झंडू भट्जींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली—- आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला. झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दूरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.

या भट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.

झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोटमधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येतील हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं. पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला —- झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी. 

हे प्रभाशंकर पट्टानी भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचंदेखील आडनाव भट्ट होतं. सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले, पण ते जमलं नाही. राजकोटला परत आल्यावर त्यांनी मास्तरकी सुरू केली. झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं, पण सासरकडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.

प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली. हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता. त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.

ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली.—– तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्यावरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला त्यांनी पंतप्रधान बनवलं. प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते. महात्मा गांधीजींचेही ते खास मित्र होते.

अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं, तेव्हा पट्टानी यांनी ‘ तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे ‘ असं सांगून गांधीजींचे कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धचं असहकार आंदोलन मागे घेतले.

ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला, त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.

अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखीपासून अंगदुखीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.

पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रसशाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली. या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिली नाही. पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.

‘दबंग ‘  मधली मलायका अरोरा देखील ‘  झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए ‘ जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा सबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.

डॉक्टरच्याआधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा ‘ झंडू बाम ‘  १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

संग्राहिका : आनंदी केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात.  त्यांचं इमोशनल होणं कालांतराने बंद होत जातं.

आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत. त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागलं असेल काहीतरी.

२+२=५ कुणी म्हणालं तरी ते “it’s okay” म्हणून निघून जातात.

ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.

काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.

थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interference  नको असतो.  कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते, म्हणून मग ते  सेल्फ dependent होतात.

आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते, संकटांची काळजी नसते.  कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे इमोशनल होण्यापासून ते mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात आतून तुटण्यापासून होते….!

म्हणून……

” कभी कभी दर्द भी अच्छा होता है । “

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares