मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…. ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

Strategic Planning

तुम्हाला ठाऊक आहे का ??जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना ‘ Strategic Planning ‘ चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते..???

जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…

२५ फेब्रुवारी

तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता.  त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट, वर कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त २५,००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.

नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना. 

अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरुण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले. 

अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तोही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

२५ फेब्रुवारी १७२८ – पालखेडची लढाई

तो बलाढ्य शत्रू  :- निजाम उल मुल्क 

वय : ५७,

ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे 

वय : २८ फक्त….

आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा असा जाज्वल्य इतिहास माहीत असायलाच हवा…

पण आपले दुर्दैव की पेशवे म्हणजे  बाहेरख्याली. पेशवे म्हणजे मौजमजा करणारे, असं काहीस समोर आणलं जातं. पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांचा  तेजस्वी इतिहास जाणून बुजून झाकून ठेवून विकृतपणा समोर आणला जातो. हे आपल्या गौरवशाली इतिहास असलेल्या देशासाठी घातक आहे…

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भूमिका हा शब्द आणि विविध कलाकारांनी साकार केलेल्या,जिवंत केलेल्या असंख्य नाटके आणि चित्रपटांमधील  सकस भूमिका यांचं अतूट असं नातं आहे. या वाक्यात आलेले ‘साकार’, ‘विविध’ आणि ‘जिवंत’ या शब्दांचे अर्थरंग पूर्णतः समजून घेतल्याशिवाय ‘भूमिका’ या शब्दाचा सखोल वेध घेताच येणार नाही.

‘भूमिका’ या संदर्भात विचार करायचा तर भूमिका ‘साकार’ करण्यात त्या व्यक्तिरेखेला योग्य ‘आकार’ देणेच अपेक्षित आहे.’विविध’ हा शब्द इथे एखाद्या कलाकाराने भूमिकांद्वारे साकार केलेल्या व्यक्तिरेखांना उद्देशून आलेला असला तरी या ‘विविध’ शब्दात अंगभूत असणारे एखाद्या भूमिकेच्या संदर्भातले ‘वैविध्य’ही  कलाकाराने त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून समजून घेणे आवश्यक असते. विशिष्ट भूमिका साकारत असताना त्या व्यक्तिरेखेची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे तिचे स्वरूप, स्वभावरंग, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याचे वय, आर्थिक स्थिती, त्याची विचार करण्याची पद्धत आणि असं बरंच कांही असा त्या व्यक्तिरेखेचा सर्वांगाने केलेला अभ्यास ही त्या भूमिकेची अत्यावश्यक अशी पूर्वतयारी!नाटककाराने नाट्यसंहितेत केलेली व्यक्तिरेखेची बांधणी ही विशिष्ट ठिपक्यांच्या रांगोळीतील रेखाकृतीसारखी असते. दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या सहाय्याने त्या व्यक्तिरेखेच्या रेखाकृती रांगोळीत रंग भरण्याचे काम नटाला करायचे असते. हे रंगभरण म्हणजेच अभिनयाद्वारे भूमिका ‘जिवंत’ करणे! नाट्यसंहितेत त्या भूमिकेचा आलेख विविध घटना, प्रसंग,संवादातून सूचित केलेला असतोच. ते सूचन आणि स्वतःचा अभ्यास याद्वारे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाची अथपासून इतीपर्यंतची एक सलगरेषा नटाने आपल्या मनात ठळकपणे आखून ठेवायची असते. त्या सलगरेषेनुरुप रंगभूमीवर होणारी त्या भूमिकेची वाटचालच ती ‘भूमिका’ जिवंत करीत असते!

हे सगळं रंगभूमी किंवा चित्रपटातील भूमिकांबद्दलचे विवेचन आहे असेच वाटले ना?पण ते ‘फक्त’ तेवढेच नाहीय. कारण नाटक काय किंवा चित्रपट काय वास्तवाचा आभासच. त्यामुळेच त्या ‘आभासा’इतकंच हे विवेचन ज्या वास्तवाचा तो आभास त्या वास्तवालाही पूर्णतः लागू पडणारे आहेच!

रंगभूमीवरील वास्तवाचा आभास हा खरंतर जगण्याचाच आभास! तो आभास जितका परिपूर्ण तितक्या त्यातील भूमिका म्हणजेच संपूर्ण सादरीकरण जिवंत! भूमिका अशा जिवंत म्हणजेच वास्तव भासण्यासाठी जशी कलाकारांना आपापली भूमिका तिच्यातले बारकावे, खाचाखोचा, कंगोरे समजून घेऊन वठवावी लागते तसेच प्रत्यक्षात वेगवेगळ्या भूमिकांतून वावरताना आपल्यालासुध्दा त्या त्या वेळच्या भूमिकांच्या बाबतीत हे करावे लागतेच.

रंगभूमीवर क्वचित कांही अपवाद वगळता एका कलाकाराला एकच भूमिका पार पाडायची असते. पण ते करतानाही त्याच्या भूमिकेचे इतर भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध,देणेघेणे,कर्तव्ये, जबाबदाऱ्या हे सगळं समजून घेऊनच त्याला आपली भूमिका साकार करायची असते. आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला एकाच वेळी अनेक भूमिका वठवाव्या लागतात आणि त्या त्या वेळी इतरांच्या आपल्या भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध, देणेघेणे, कर्तव्ये,जबाबदाऱ्या हे सगळं आपल्यालाही विचारात घ्यावे लागतेच.आपल्या या सगळ्याच भूमिका चांगल्या वठल्या तरच आपले जगणे कृतार्थ म्हणजेच खऱ्या अर्थाने जिवंत आणि त्या योग्य पद्धतीने नाही पार पाडता आल्या तर मात्र जगणं कंटाळवाणं, निरस आणि असमाधानी!

वास्तव जगण्यात आपल्या भूमिकांचे संवाद लिहायला कुणी लेखक नसतो. हालचाली बसवायलाही कुणी दिग्दर्शक नसतोच. नाटकातील घटना प्रसंग नाटककाराने नियत केलेले असतात आणि आपल्या आयुष्यातले घटना-प्रसंग नियतीने! तिथे नाटककाराने आपले संवाद चोख लिहिलेले असतात. आपल्या आयुष्यात मात्र काय बोलायचे हे आणि कसे बोलायचे हेही आपणच आपल्या बुद्धी आणि कुवतीनुसार ठरवायचे असते. तिथे दिग्दर्शक मार्गदर्शन करत असतो आणि इथे आपलेच अनुभव,आपण जोडलेली माणसे आणि त्या त्या वेळची परिस्थिती हे सगळे दिग्दर्शकासारखेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. तिथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या रुपातल्या प्रतिक्रिया नटाच्या भूमिकेला दात देत असतात आणि इथे आपल्याला मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधानच आपल्याला पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती उमेद,उत्साह देत रहाते.

वास्तव आणि आभासातलं हे साम्य वरवरचं नाहीय. खरंतर भूमिका वास्तव जगण्यातल्या असोत वा आभासी जगातल्या त्या ‘भूमिका’ या शब्दाच्या मूळ अर्थांची प्रतिबिंबेच असतात.हे कसे हे ‘भूमिका’ या शब्दाचे मूळ अर्थच सांगतील.  

‘भूमिका’  म्हणजे जसा अभिनय, तसंच भूमिका म्हणजे पीठिका,पवित्रा,आणि अवस्थाही.  भूमिका म्हणजे पृथ्वी.भूमिका म्हणजे जमीन,भूमीही.आपल्या वास्तव आयुष्यातल्या भूमिका या जमिनीवर,भूमीवर  घट्ट पाय रोवूनच वठवत गेलो तरच त्या जिवंत वाटतात नाहीतर मग निर्जीव. आभासी जगातल्या भूमिका वठवताना ‘रंग’ही गरजेचे आणि भूमीसुध्दा!म्हणूनच त्या जिथे साकार करायच्या त्या भूमीला ‘रंगभूमी’ म्हणत असावेत!

भूमिका कोणतीही,कुठेही वठवायची असो ती मनापासून वठवायला हवी हे मात्र खरे!कारण ‘भूमिका’ म्हणजे असे एक जगणेच जर, तर ते अगदी मनापासूनच जगायला हवे ना?

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी साडेतीन चारची वेळ होती. ओपीडी  संपवून नुकताच जेवणासाठी वर निघालो होतो. कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर एक पंच्याहत्तरीच्या आसपासच्या आजी बसल्या होत्या. त्यांची  रक्त लघवी चेक केली होती व रिपोर्टची वाट बघत त्या बसल्या होत्या. आजी नेहमी दवाखान्यात यायच्या. शांत स्वभाव, चेहऱ्यावर सात्विक भाव, स्वभाव इतका गोड की त्यांच्या सुनादेखील त्यांचं कौतुक करायच्या. आजीदेखील  सुनांचं कौतुक करायच्या. सून आणि सासू एकमेकींचे कौतुक करतात ही बहुतेक क्वचितच आढळणारी गोष्ट, पण या आजींच्या बाबतीत ते खरं होतं,,,

जिना चढताना मी एक क्षण थबकलो. वाटलं आजी बराच वेळ बसून कंटाळून गेल्या असतील, त्यांना चहाला वर घेऊन जावं. पण  नंतर विचार केला आता वेळ खूप जाईल, जेवण उरकून मावडीच्या ओपीडीला जायचं होतं , चहासाठी आजीना वर  घेऊन गेलं तर पुन्हा दहा-पंधरा मिनिट वेळ जाईल आणि सगळे शेड्युल बिघडून जाईल.  म्हटलं बघू उद्या किंवा पुन्हा कधीतरी ,,, जेवण करून  मग खाली आलो त्यावेळी आजी निघून गेल्या होत्या.  कम्पाउंडरला रिपोर्ट दाखवला होता व तो नॉर्मल असल्याने त्या थांबल्या नव्हत्या. उशीर झालाय, उद्या येईन पुन्हा दाखवायला असे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं ,,

दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्ता करून खाली साडेनऊ वाजता ओपीडीत गेलो तर खुर्चीवर बसल्याबसल्या कंपाउंडरने सांगितलं की काल लॅबसाठी आलेल्या आजी रात्री हार्ट अटॅकने गेल्या…. मी निस्तब्ध !! क्षणभर काहीच सुचेना ! चालता-फिरता माणूस गेला की धक्का  बसतो. मृत्यू अटळ आहे. तो असा शांतपणे योग्य वेळी आला तर कधीही चांगलीच गोष्ट. परंतु मला खंत या गोष्टीची वाटत होती की काल आजीना चहासाठी घेऊन गेलो असतो तर किती बरं झालं असतं ! मी खूप व्यथित झालो. या घटनेला इतकी वर्ष झाली पण अजूनही ही गोष्ट कायम मला खटकते !         

आपल्याला नेहमी वाटत असतं की आपलं आयुष्य खूप मोठं आहे. एखादी  गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो बघू भविष्यात करू,उद्या करू. पण बरेचदा ती वेळ व संधी हातातून निसटून जाते व उरतो तो केवळ पश्चाताप, एक गिल्टी फिलिंग !! देऊ नंतर , करू नंतर , बघू नंतर , जाऊ नंतर, याला काही अर्थ नसतो. कारण तुम्ही आत्ता जो क्षण उपभोगीत असता तोच खरा असतो, दुसऱ्या क्षणावर देखील तुमचा अधिकार नसतो !!

मध्यंतरी ऑगस्टमध्ये माझा थोरला भाऊ covid- ने गेला. उमदा, निरोगी,चालता-फिरता,थोरला असूनही आमच्यापेक्षा ॲक्टिव्ह. हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाही एकदम उत्साही. त्याला सगळं टापटीप लागायचं. गाडीत बसण्यापूर्वी मला म्हणाला, “ दाढी वाढली आहे  दाढी करून घेतो “.  मी म्हटलं “ कशाला आता वेळ दवडतोस– हॉस्पिटलमध्ये तर जायचंय !!”   पण शेवटी हॉस्पिटलमधून तो घरी परत आलाच नाही. दोन मिनिटात त्याची दाढी झाली  असती, मी त्याला उगाच अडवलं असं अजूनही मला वाटतं ,, आम्ही चौघं भाऊ– मी धाकटा आमच्यामध्ये.  अजून कधीही वादविवाद भांडणतंटा झाला नाही , इतकंच काय पण आम्ही एकमेकांशी मोठ्या आवाजात देखील कधी बोललो नाही. परंतु तो गेल्यानंतर अजूनही मला सतत वाटत राहते की अजूनही आपण त्याच्याशी चांगलं वागलं बोललं पाहिजे  होतं, जास्त संवाद साधला पाहिजे होता. तो दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा काही फंक्शन असेल तर मूर्टीला  यायचा. स्वभावाने अबोल , कधी कधी भरपूर वेळ असायचा पण मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा त्याच्याशी अजून जास्त गप्पा मारल्या असत्या तर खूप बरं झालं असतं असं आता वाटतं. पण आता वाटून काही उपयोग नसतो. गेलेला क्षण, गेलेली वेळ ही कधीही परत येत नसते !! कटू प्रसंग तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. परंतु त्याला बगल देऊन पुढे गेलं पाहिजे. नाहीतर नंतर वाटत राहतं की आपण आपल्या आयुष्यातील बरेच क्षण , वर्ष , दिवस हे विनाकारण वाया घालवले आहेत !!! कारण जर-तर ला आयुष्यात काहीही महत्त्व नसते !

बऱ्याच वर्षापासून आम्हाला आमच्या दहावीच्या बॅचचं गेट-टुगेदर घ्यायचं होतं. अनेक वेळा चर्चा व्हायच्या, तारखा ठरायच्या , कॅन्सल व्हायचं. आम्हाला ज्या सरांनी घडवलं, मार्गदर्शन केलं, कुटुंबातील एक सदस्य असल्यासारख सांभाळलं ,आई वडिलांनंतर त्यांचे स्थान होतं- अशा त्या जे बी  गाडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली है  गेट-टुगेदर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. मी वैयक्तिक या विषयावर त्यांच्याशी अनेकदा  बोललो होतो , पण  आमचं निश्चित होत नव्हतं …  आणि  एक दिवस सर अचानक अकाली मोठा धक्का देऊन आमच्यातून निघून गेले.  खरेतर या गेट-टुगेदर चे उत्सव मूर्ती हे आमचे सरच  होते. परंतु बघू, नंतर करू, असं म्हणत आम्ही ती संधी गमावली ,, नंतर 1 वर्षापूर्वी आम्ही हे गेट-टुगेदर घेतलं.  सर्व शिक्षकांना बोलवलं , सगळे विद्यार्थी आले होते.  पण गाडेकर सरांची अनुपस्थिती म्हणजे आमच्यासाठी देव नसलेल्या देव्हाऱ्यासारखी स्थिती होती !!!

आपण साधुसंत बनू शकत नाही कारण आपण सामान्य संसारी माणस आहोत , म्हणून माणसासारखंच वागलं पाहिजे. जास्त मित्र नाही जमवता आले तरी चालेल, पण किमान शत्रूंची संख्या तरी कमी करू शकतो– ते आपल्या हातात असतं ,,, आपण बरेचदा एखाद्याला विनाकारण अपशब्द बोलतो, त्याचा अपमान करतो किंवा त्याच्याशी तुटकपणे वागतो. खरंतर या गोष्टींची काही गरज नसते. आपल्या असल्या वागण्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो, पण त्यावेळी त्याचा काही उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते. आणि शब्दांनी झालेल्या जखमा या भरून येणार्‍या नसतात व त्याचा परिणाम म्हणजे आपण अनेक मित्र , स्नेही , नातेवाईक गमावतो.  इतकंच काय पण आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आपण बरेचदा विनाकारण बोलत असतो , कळत नकळत अपमान करीत असतो. या गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य तर कमी करत असतोच पण त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील खराब करीत असतो. प्रत्येक वाईट कृतीमागे, रागावून चिडून बोललेल्या प्रत्येक वाक्यामागे आपण आपलं आयुष्य  काही क्षणांनी , मिनिटांनी  कमी करीत असतो.  

म्हणून मित्रांनो, मिनिमाईज दि एनिमी , मिनिमाईज बॅड वर्ड्स , मिनिमाईज अँगर , डिपॉझिट फ्रेंड्स अँड डिपॉझिट रिलेटिव्हस !! कारण गेलेला क्षण व वेळ परत येत नाही !!!! 

लेखक : डॉ संजय मंगेश सावंत, मुर्टी , बारामती

प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 ‘वाटेवर काटे वेचित चाललो

वाटले जसा फुलाफुलात चाललो’

रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.

हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.

जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.

आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली.  पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.

आता तिला वाटेत येणार्‍या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.

पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.

एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.

प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.

म्हणूनच दुसर्‍या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.

आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.

ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••

“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि  आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्‍या प्रकाशवाटा असतात.”

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया…  ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत आणि स्त्री म्हटले की बऱ्याच जणांना ‛ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति|’ हे वचन आठवते. अर्थात ते वेगळ्या संदर्भात म्हटले आहे. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी या नवरात्रात संस्कृत साहित्यातील नऊ सशक्त स्त्रियांवर लिहायचा मी प्रयत्न करणार आहे.

वास्तविक कोणतेही साहित्य हा त्या त्या काळातील समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे अगदी वैदिक काळापासून विचार केला तर अनेक संदर्भ असे आढळतात की त्या काळी स्त्रिया स्वतंत्र विचारसरणीच्या होत्याच, शिवाय अनेक क्षेत्रातही सक्रिय होत्या. खेल राजाची पत्नी विश्पला हिने युद्धात आपले पाय गमावले होते. पण अश्विनीकुमारांनी शस्त्रक्रिया करून तिला वाचवले होते. असा उल्लेख ऋग्वेदात आहे. मुद्गलानी उत्तम धनुर्धारी होती. असाही उल्लेख आढळतो.

अनेक विद्वान स्त्रियाही त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने चिंतन करत असत. त्यातीलच दोन स्त्रियांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. स्त्रीशक्तीला माझ्याकडून हा अक्षरप्रणाम!

मैत्रेयी

मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी! त्यांना कात्यायनी व मैत्रेयी अशा दोन पत्नी होत्या. त्यातील कात्यायनी ही त्यांचा संसार अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळत होती. तर मैत्रेयीला तत्वज्ञानाची आवड होती. त्यामुळे तिला ब्रह्मवादिनी असे म्हटले जात असे.

एकदा ऋषींनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घ्यायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही पत्नीना जवळ बोलावून त्यांनी आपली इच्छा सांगितली व आपली जी काही मालमत्ता आहे ती दोघीत वाटून द्यायचे ठरवले. ते ऐकून मैत्रेयीने लगेच प्रश्न विचारला,“ या जीवनातील सर्वोच्च सुख म्हणजे संपत्ती का?” तिचा हा प्रश्न महर्षीना लगेच कळला आणि त्यांनी खरे सुख म्हणजे काय आणि आत्मतत्वाचा शोध कसा घ्यायचा याचे ज्ञान मैत्रेयीला दिले.

हा याज्ञवल्क्य- मैत्रेयी संवाद प्रसिद्ध आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा आहे त्यांना तो नेटवर सहज उपलब्ध होईल. पण यातील विदुषी असणारी मैत्रेयी हे त्या काळातील स्त्रीशक्तीचे, तिच्या प्रगल्भ विचारांचे आणि स्त्रीस्वातंत्र्याचे उत्तम उदाहरण होते असे मला वाटते.

गार्गी

मैत्रेयीलाच समकालीन असणारी दुसरी विदुषी म्हणजे ‛गार्गी’!

एकदा जनक राजाच्या दरबारात याज्ञवल्क्य व गार्गी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी गार्गीने ऋषींना अनेक प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता,“ मुनिवर, असे म्हणतात की पाण्यात सर्व पदार्थ एकजीव होऊन जातात. मग हे पाणी कशात मिसळते?” ऋषींनी लगेच उत्तर दिले,“ वायूमध्ये” मग तिने पुन्हा विचारले,“वायू कशात मिसळतो?” ,“ वायू?”- “ आकाश…” – “आकाश?” – गंधर्वलोक—- अशा पद्धतीने प्रश्न विचारत ते ब्रह्मलोकपर्यंत जातात. त्यानंतर मात्र ऋषी तिला म्हणतात, “आता इथेच थांब, कारण ब्रह्मज्ञान हाच सृष्टीचा शेवट आहे.” गार्गीला हेच हवे असते. कारण तिला सृष्टीची उत्पत्ती जाणून घ्यायची असते. त्यानंतर ती दोनच प्रश्न ऋषींना विचारते,“ या अंतरीक्षाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली काय आहे? आणि जे घडून गेले आहे आणि जे होणार आहे ते काय आहे?” अर्थात तिचे हे दोन्ही प्रश्न म्हणजे सध्याच्या भौतिकशास्त्राच्या भाषेत म्हणायचे तर अवकाश( space) आणि काळ (time) यासंदर्भात होते त्यावर याज्ञवल्क्य ऋषींनी तिला अक्षर म्हणजेच कधीही नष्ट न होणारे म्हणजेच अविनाशी तत्वाचे ज्ञान दिले. तेव्हा त्यांच्या त्या विद्वत्तेला प्रणाम करून तिने त्यांना गुरुस्थानी मानले.

इथे विद्वान असणाऱ्या गार्गीची निगर्वी वृत्ती दिसून येते. ज्ञान मिळवण्याची लालसा आहे. त्यासाठी चर्चा करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे.  पण त्याचबरोबर ज्ञानवृद्ध व्यक्तीबद्दल असणारा आदर आणि आपल्या ज्ञानातील त्रुटीही ती लगेच मान्य करते.

वेदकाळातील या दोन स्त्रिया हे त्या काळातील समाजाचा आरसा आहे असे मला वाटते.आजही जिथे अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असताना हजारो वर्षांपूर्वीची आपली संस्कृती मात्र स्त्रियांना बरोबरीचे स्थान देत होती ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच माझ्या नवरात्रीतील पहिल्या दोन माळा संस्कृत साहित्यातील या दोन सशक्त स्त्रियांच्या चरणी अर्पण!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस … लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच

थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.

दिवसभर खेळून हात-पाय थंडीने उकलायचे.

किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर

पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’ राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे-रुपयाची नाणी.फटाके आणायला खारीचा वाटा.

फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.

एकदम ‘श्रीमंत’ झाल्यासारखं वाटायचं.

घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात

गळालेल्या फटाक्यांचीसुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे’ – आजी सांगायची. पण इथे झोप

कोणाला असायची! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.

न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात ऊब

आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.

तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान

वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.

मला तो आवडायचा. ‘मोती’ साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये, असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.

मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा. बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून…त्यातच मज्जा असते.

दिवस हळूहळू

उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा.

आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं?

लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये की

आता आपण खूप पुढे आलोय..?

 

गेले ते दिवस!

उरल्या त्या आठवणी!

 

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दिवाळी हा सगळीकडे साजरा होणारा महत्त्वाचा सण. सणसमारंभ असतातच मुळी उत्साहवर्धक वातावरण निर्मितीसाठी. नुकतचं  नवरात्र होऊन गेलेलं असतं त्यामुळे नवरात्रा पासूनच बाजारपेठा सजायला सुरवात झाली असते. खरचं हे सणसमारंभ असतातच मुळी आपल्यातील मरगळ झटकण्यासाठी. हे सणसमारंभच आपल्या संस्कृतीला घट्ट जखडून ठेवतात त्यामुळेच नात्यानात्यातील एकोपा वाढीस लागतो.

अर्थात पूर्वी आणि आता सण साजरे करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र फरक पडलायं. पूर्वी एकतर संयुक्त मोठे कुटुंब, वेळेची भरपूर उपलब्धी,हौस आणि त्यामानाने महागाई चा भस्मासुर जरा कमी होता.

आताच्या दिवाळीत आणि आम्ही लहान असायच्या दिवाळीत बराच फरक पडलायं. काही गोष्टी ह्या कमावल्या आणि काही गोष्टी ह्या गमावल्यात. सगळ्यातं पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रतीक्षेनंतर, थोड्याश्या हट्टानंतर मिळणाऱ्या छोट्याशा गोष्टी पूर्वी खूप मोठ्ठा आनंद देऊन जायच्या,तेच आता सहज  साध्य झालेल्या मोठ्ठ्या खरेद्या पण अल्प आनंद देऊन जातात. पूर्वी घरगुती फराळ करायचे, तो फराळ बनवितांनाचे आईचे कष्ट, तिने घेतलेली अपार मेहनत आतून खूप जाणवून आणि समजावून जायची हेच आता रेडीमेड पदार्थ आणतांना ती कष्टांच्या भावनेची जाणीवच लुप्त झालीय. पण एक म्हणजे आताच्या सणांमध्ये सुबत्ता आलीय आणि पुर्वीच्या सणांना एक काटकसरीची झालर ही होतीच.

दिवाळीचा उत्साह हा महिलावर्ग आणि बच्चेकंपनी ह्यामध्ये काकणभरं जास्तच असतो जसं पक्वान्नामध्ये पदार्थांचा राजा म्हंटले की पुरणपोळीच,बाकी सगळे पक्वान्न ह्यानंतरच त्याप्रमाणे सणांचा राजा म्हंटले की दिवाळीच बाकी सगळे सणवार ह्याच्याखालीच. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दिवाळी हा सण अगदी उत्साहवर्धक काळात येतो.नुकताच पावसाळा संपून आँक्टोबर हीट कमी होऊन हव्याहव्याशा वाटणा-या गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असते.ह्या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मनमुराद घेऊ शकतो कारण हा काळ पचनास सर्वोत्तम काळ असतो.भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ह्या दिवसात शेतकऱ्यांच्या हातात पहिले पीक येऊन जरा ब-यापैकी पैसा हातात खुळखुळतं असतो. ह्या दिवसात ह्यामुळे व्यापारातील मंदी कमी होऊन व्यापारउदीमासाठीसुद्धा हा काळ उत्साहवर्धक व तेजीचा ठरतो.

दिवाळीचं प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांना खरेदी आणि धावती का होईना ह्या निमीत्त्याने माहेरी धावती का होईना टाकायला मिळणारी एक चक्कर हे असतं.आपल्या वाटेकडे आईबाबा अगदी डोळेलावून बसलेले असतात. आपण यायच्या वेळेस बरोबर बाबांचे व-ह्यांड्यात खुर्ची टाकून पेपर चाळतं बसणे म्हणजे नजर पेपरमध्ये पण कान मात्र आपल्या आगमनाची चाहूल घेणारे. आईची सारखी आतबाहेर चकरा करीत वाट बघणे सुरुच असते.खरचं हे अविस्मरणीय क्षणं टिपण्यासाठी आणि आठवणींच्या कुपीत कायमचे जपण्यासाठी तरी माहेरी जायला यनं ओढ हे घेतच.

बहिणीबहीणींनी कितीही ठरविले तरी एकमेकींकडे जाणं होतचं असं नाही. पण ह्या माहेरच्या दुव्याने आम्ही बहिणीपण मनमोकळ्या राहू शकतो.आम्ही भावंड एकत्र आलोत की गप्पा संपत नाही, हास्याचे फवारे थांबत नाही आणि जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन देऊन मनं ही भरत नाही. त्यात आता भरीसभर आमची मुलं ही आमच्या टीम मध्ये सामील.हे प्रेमाचे एकत्रीकरण बघून आईबाबांच्या डोळ्यात जे समाधान दिसतं नं त्यापुढे सगळी सुखं फिकीच.

एक मजा वाटते एरवी आपल्याला कोणी लहानशी गोष्ट जरी देऊ केली तरी आपल्याला संकोचाच्या ओझ्याखाली दबायला होतं पण आईबाबांनी दिलेल्या मोठ्याही गोष्टीवर आपला हक्क आहे असा मोकळेपणा माहेरी वाटतो.आईबाबांनी खूप कष्ट करून, प्रसंगी स्वतःचे मन मारून जमविलेली पुंजी हे किती ह्या सणासुदीच्या निमीत्त्याने आपल्याला घसघशीत सहजतेने निर्मोहीपणे देऊन टाकतात हे फक्त आणि फक्त आईवडीलच करू शकतात.

.दिवाळी करून घरी परततांना एका बँगेच्या दोन तीन मोठ्या बँग्ज् झालेल्या असतातच.त्या बँग फक्त सामानानेच नव्हे तर आनंदाने आणि सुखाने सुद्धा गच्च भरलेल्या असतात. त्या सामानात आईच्या हातचा गरम मसाला, वर्षाचे साठवणूक करता येणारे पदार्थ हमखास असतातच ज्यापूढे जगाच्या बाजारात कितीही पैसे ओतून घेतलेल्या ह्या वस्तू आईच्या हातच्या मायेच्या उबेपुढे फिक्क्याच असतात.

अशा त-हेने दिवाळीहुन परततांना जी मायेची,प्रेमाची शिदोरी मिळते त्या आठवणींवर आपण उन्ह्याळ्यापर्यंत सहज मन.रमवितो.मग परत आहेच आमरसाला माहेरी चक्कर.

प्रत्येक श्वासागणिक मनात आठवण असणारे आईबाबा,जीव ओतून प्रेम करणारी बहीण आणि माहेरपणची ओढ टिकवून ठेवणारा भाऊ असल्याने मी खूप नशीबवान आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचा माझाच मल साक्षात्कार होतो.

परतीची वेळ थोडी अवघड असते.परत तेच पेपर हातात धरून बसलेले बाबा न बोलता जणू नुसते नजरेनेच सांगतात लौकर परत या गं, आई फाटकापर्यंत येऊन परत परत स्वतःची काळजी घ्यायला बजावत असते.अशा वेळी गाण्याच्या ओळी आठवतात,

 “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं।”

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!

आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.

काय आहे हे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.

अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!

परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.

“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”

हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!

हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.

शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –

“Work in Progress!”

अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.

हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.

(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)

अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.

तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.

लेखक – स्वामी संजयानंद

संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

एकदाची सुट्टी लागली. सत्र १ चे पेपर संपले. दीपावलीच्या सुट्टीला सुरूवात झाली.

आणि मग किल्ला करायची लगबग सुरू झाली असणार. दगडे गोळा करणे, माती आणणे, ती चाळणे, दगडे कल्पकतेनं रचणे, त्यावर चिखलाचा काला लावणे, चिखल ओला असतानाच त्यावर हळीव टाकणे आणि मग काही दिवसांनी किल्ल्यावर त्या हळिवाचं छान घनदाट जंगल तयार होतं. मस्तच.

नंतर जुने आणि नवीन आणलेले छ.शिवाजी महाराज व सैनिक त्यावर ठेवणं… नवनिर्मितीचा आनंद. आनंदीआनंद. सृजनशिलतेचा  सोहळाच जणु.

त्यापूर्वीच घरातल्या फराळात मदत करणं, “अरे करंज्यात एवढच सारण घालायचं, अशा व्यवस्थित चिटकवून कोरणीनं व्यवस्थित कोरायचं.” ” कसलं डिझाईन केलयस हे चकलीचं.” “लाडू दोन्ही हातांनी वळायचे, म्हणजे छान गोलाकार होतात.” “शंकरपाळ्या व्यवस्थित कट करायच्या.” (मदत करताकरता फराळाचा आस्वाद घेणं हे तर ओघानच आलं.😄) हे संवाद घरोघरी ऐकायला येत असतील.  हाही एक आनंददायी सोहळाच असतो.😄

पाहुण्यांना भेटणं, विविध माध्यमांतून दीपावली च्या शुभेच्छा सदिच्छा देणं-घेणं. हे सगळं काही मनाला आनंद देणारं असतं. त्यानंतर हळुहळू दिवाळी संपते. सुट्टी संपण्याच्या दिशेनं काळाचा प्रवास सुरू होतो. मग,  कुठे फँमिली ट्रीपचे नियोजन होते. तर, कुठे वनडे ट्रेकचे नियोजन. घरातून बाहेर निसर्गात भटकंती केली की, एकदम फ्रेश होतो आपण.

दिवाळीत जसे दिव्यांनी- फुलांनी घर सजवतो, प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आपल्या अंतरीचे दीप ही प्रज्वलित करायला हवेत.

म्हणजेच आपलं स्वत्व हे जपता यायला हवं आपणाला. आपल्या मध्ये असणा-या बेस्ट क्वालिटीज ओळखायला, जपायला आणि वाढवता यायला हव्यात. आपल्यामधील नको असणारा भाग (वाईट गोष्टी) हळूहळू काढून टाकता यायला हव्यात. मग, ती एखादी वाईट सवय असेल.

एखादा छान छंद जोपासता येईल. अवांतर पुस्तक वाचन, छानसं चित्र काढणे, चित्र काढायला शिकणे, डिझाईन काढणे, सुंदर रांगोळी- मेहंदी काढायला शिकणे, एखादी कला आत्मसात करणे, कथा-कविता लेखन करणे. यातलं जे जमेल ते आणि जे अंगभूत(In built) असेल ते करणं-करायला शिकणं. आपल्यातील वेगळेपणामुळे आपल्याला समाजात आदराचं स्थान निश्चितच मिळते.

यातून सृजनशिलतेची, नवनिर्मितीची एक अलौकिक आनंदानुभुती प्राप्त होते. ज्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. जो आनंद दीर्घकाळ टिकतो.

हा अलौकिक आनंद मिळवणं म्हणजेच आपल्या अंतरिचा दीप प्रज्वलित करणं होय. नाही का?

मग करूयात ना प्रज्वलीत आपण आपल्या अंतरीचे दीप या दीपावली निमित्त?

🍁 दीपावलीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🍁

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares