मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्राहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

वारकर्‍याची काळजी पांडुरंग घेतो असे म्हणतात. खरोखर हे खरे असेल का ? नेमकी  वारकर्‍याची श्रीमंती कोणती ? तर ती असते त्याची पांडुरंगावरची श्रद्धा.

नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्रात  फिरण्याचा योग यायचा.

असाच एकदा सोलापूर -जत मार्गे  कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून ५-६ दिवस झालेले  होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती. सकाळी  सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल. ९.३० चा सुमार. मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो, पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. २०-२५  मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.

तेव्हढ्यात एक  60 – 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत  आमच्याच टपरीपर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत  जमिनीवरच बसले.

मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का  ? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं- बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं, चला तेव्हढच पुण्य . मी बाबांना विचारलं,” वाटेत चालता चालता काय करता ?” ते म्हणाले,

“ कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. “

मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का  ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.

नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून ४-५ दिवस. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे  आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.

सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून ४-५ दिवस आहेत. त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. न राहवून मी विचारले, “ का ?”

बाबांनी उत्तर दिलं –

“वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे दादा तुमची ही १०० रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची. “

मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.

सुमारे 30 वर्षांनंतर………

आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउन डोळ्यासमोर फिरू लागले.

त्या वारकरी बाबा आणि बाईंच त्यावेळचं वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍यापैकी सुखात पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले १०० रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो, आणि प्रचंड आत्मविश्वासानी सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी  करून ठेवावं असं नाही वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहिली आणि  नजर स्वतः कडे वळली. त्यांनी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.

— हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासूचा हॅपी बर्थडे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासूचा हॅपी बर्थडे ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”

“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”

“नाही नां, मग ?”

“आई, आज तुमचा एक्सष्टावा  वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”

“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”

“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”

“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”

“अजिबात नाही आई, पण डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं तुम्ही ?”

“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”

“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”

“ते जाऊदे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?

तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”

” ए sss क  दो sss न चमचे साखर  मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा ?”

“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या  चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”

“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे, मी का तुम्हांला सांगायला हवं ?”

“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”

“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”

“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”

“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”

“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”

“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं.”

“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”

“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”

“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”

“म्हणजे काय आई, आवडलं नाही का  सरप्राईज ?”

“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”

“कोणती ?”

“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”

“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”

“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी तुला करा !”

“हां ही आयडिया पण छान आहे, मी सुचवते विलासला तसं. पण कशानं करायची तुला तुमची ?”

“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”

“अहो पण आई, तुला म्हणजे वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”

“हॊ बरोबर !”

“पण मग ते कसं जमणार आई ?”

“का, न जमायला काय झालं?”

“अहो आई तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळत नाही ! शिवाय एवढा मोठा वजन काटा आपल्याला फक्त लाकडाच्या वाखारीतच मिळेल आणि अशी लाकडाची वखार आता मुंबईत शोधायची म्हणजे…… “

“सुनबाई कळली बरं तुझी अक्कल आणि तुझं गणित पक्क आहे ते !”

“आहेच मुळी! मग आई आता कसं करायच म्हणता तुमच्या वाढदिवसाचं ?”

“काही नाही, माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग  या वेळचा केक पण शुगरलेसच आण हॊ आणि त्यावर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”

© प्रमोद वामन वर्तक

२२-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

भाग – ५

वालीचे अन्यायाचे वागणे पाहुन, तारा वालीला म्हणाली, “स्वामी! मतंगऋषींचा शाप आधीच डोक्यावर आहे, त्यात पतिव्रता रुमाचा शाप कां घेता? या मोठ्या पापातून सुटका होऊ शकणारा नाही. हा अविचार सोडून द्या.” पण वालीला ऐकायचे नव्हते, ऐकलेच नाही त्याने. विनाश काले विपरीत बुध्दी..

तारा ही अत्यंत सुंदर, गुणी स्त्री होती. वालीमधील शौर्य, पराक्रम, धाडस अशा त्याच्या अनेक चांगल्या गुणांवर लुब्ध होती. त्याच्यातील गुणांची तिला पारख होती. त्याबद्दल तिला अत्यंत सार्थ अभिमानसुध्दा वाटत असे. परंतु वालीचा आत्यंतिक संतापी, हेकट, अन्यायी, दुर्गुणाकडे कल असणार्याद स्वभावाने तिच्या मनाला सतत काळजी वाटे.  हे सर्व पाहुन तिच्या मनांत विचार आला, ‘सुग्रीवाला अधीक दुःख कशाचं झालं? राज्य गमावल्याचं की, पत्नी गमावल्याचं? रुमाच्या बाबतीत ते घडल! शेवटी दुर्दशा भोगावी लागते स्त्रीजातीलाच ना?

राक्षसांचा सम्राट लंकाधीश रावणाने सर्व  राजांना जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने प्रत्यक्ष देवराज इंद्रावर स्वारी केली. त्याच्या मुलाने, मेघनादने इंद्राला जिंकले. सर्व राजांना जिंकण्याच्या अभिलाषेने वालीवर देखील आक्रमण केले. पण वालीचा पराक्रम व अतुल ताकद, युध्दकौशल्य एवढे जबरदस्त होते की, रावणाला शस्त्र खाली ठेवुन त्याला शरण जाऊन शस्त्र खाली ठेवावे लागले.

रावणासारख्या बलाढ्य व प्रबळ शत्रुला देखील नमवून आपला पती वालीने त्याला शरण येण्यास भाग पाडले याबद्दल ताराच्या मनांत नितांत, आदर व कौतुक होते आणि म्हणूनच त्याच्या गुणांचे चीज व्हावे, तो सन्मार्गावर यावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची पण यश तिच्यापासुन नेहमीच दूर पळत असे. वाली तिचे कांहीच ऐकत नसे आणि आपल्या हेकट, दुराग्रही स्वभावात बादल करत नसे.

एकदा तारा आपल्या महालांत निवांत बसली असता तिचा पुत्र अंगद येऊन सांगू लागला की, “तो मित्रांसोबत मतंगवनाच्या आजुबाजुला हिंडत असतांना त्रृषमूक पर्वतावर सुग्रीव काका दिसलेत. त्यांच्या मागे वीर हनुमान उभे असुन दोन सुंदर तेजस्वी राजकुमार त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतांना दिसले. गुप्तहेरांकरवी चौकशी केली असतां दोन राजकुमार म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश दशरथ यांचे दोन सुपुत्र असल्याचे कळले.       

श्रीरामाची पत्नी सीताचे हरण करुन लंकाधीशपती सम्राट रावणाने तिला लंकेत नेऊन ठेवले आहे.  तिच्या शोधार्थ हे दोन वीर हिंडत हिंडत तिथे आलेत. त्यांची सुग्रीव काकांशी मैत्री होऊन दोघांनी परस्परांना मदत करण्यासाठी अग्निसमोर आणाभाका, शपथ घेऊन वचनबध्द झालेत.

भाग – ६

श्रीराम-सुग्रीवाची युती झाल्याचे वृत्त ताराने ऐकले मात्र ती अतिशय संचित झाली. अंगदला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडलांना अनेक वेळा परोपरीने विनवून सांगीतले की, रुमादेवीला सुग्रीवाकडे पाठवुन द्यावे, परस्त्रीचे अपहरण करणे, तिची अभिलाषा धरणे फार मोठे पाप आहे. अशा पापाचे घोर प्रायश्चित्त भोगावेच लागेल. पण हटवादी स्वभावामुळे माझ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.”

अंगद म्हणाला, “आई! श्रीराम देवासमान सुंदर, दयाळू, करुणामयी वाटतात.” ती म्हणाली, “श्रीरामाबद्दल सर्व माहित आहे मला.  श्रीराम हे आर्त, दुःखी जणांचे आश्रयदाते आहेत. ते यशस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, पित्याच्या आज्ञेत राहणारे आहेत.  हिमालय ज्याप्रमाणे अनेक रत्नांची खाण आहे, त्याप्रमाणे श्रीराम अनेक गुणांची खाण आहेत. असे श्रीराम सुग्रीवाचे झाले तर…. तुझ्या पित्याचा भविष्यकाळ फार गंभीर  आहे. भविष्यातील संकटाची चाहुल लागत आहे.”

तारा अतिशय विकल मनःस्थीतीत अंगदाला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडिलांमधे अनेक सद्गुण असून ते फार पराक्रमी, शूर, धाडसी आहेत. ते वानराचे राज्य उत्तम रितीने चालवत आहेत म्हणूनच आज ते सर्व वानरांचे सम्राट आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी कांही नीतिनियम पाळले असते, कांही धर्म मर्यादा मानल्या असत्या, तर त्यांच्यासारखा पुरुषोत्तम दुसरा कुणी नसता आणि माझ्या सारखी भाग्यवान स्त्री  त्रिभुवनात दुसरी कुणी नसती! परंतु  विधिलिखीत कुणाला टळले आहे? मातंग ऋषींचा अपमान व शाप, रुमासारख्या पतिव्रतेचा छळ, तिचा तळतळाट, माझ्या संसारसुखा भोवती एखाद्या काळसर्पाप्रमाणे वेटोळे घालुन बसला आहेसे वाटत आहे…..

सुग्रीवाने आपली अत्यंत करूणामय कर्मकहाणी श्रीरामांना सांगून म्हणाला, “हे प्रभु! तुझी पत्नी रावणाने पळवली आणि माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने! शिवाय राज्यातुन निष्कसित केले. माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे.” श्रीरामाने सुग्रीवाला आश्वस्त केले. दोघांनी एकमेकांना मदत, सहाय्य करण्याच्या आणाभाका घेऊन आपापल्या समस्या सोडविण्याचे ठरविले.

सुग्रीव रामाला म्हणाला, “वाली भयंकर कोपिष्ट, शिघ्रकोपी, हट्टी व बलाढ्य आहे. त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कंटक होऊ शकणार नाही. तो सुखाने जगू देणार नाही.”

ताराला मिळत असलेल्या भविष्यातील घटनेच्या भाकिताप्रमाणे ती काळरात्र आलीच. रामाने द्वंद्व युध्दासाठी वालीला आव्हान द्यायला सुग्रीवाला सांगीतले. रामाच्या आज्ञेनुसार एका रात्री सुग्रीव किष्किंधेच्या परिसरांत येऊन दंड थोपटून मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत, सिंहनाद करत वालीला आव्हान देऊ लागला. यावेळी वाली ताराबरोबर अंतःपुरात होता. सुग्रीवाचा आव्हानात्मक आवाज ऐकुन प्रथम तर त्याला अतिशय आश्चर्य वाटले. सुग्रीव सारखी साधी, सालस, व्यक्ती युध्दाचे आव्हान देते, हेच मुळी त्याला खरे वाटत नव्हते. नंतर तो अत्यंत संतप्त होऊन, धडा शिकवण्याच्या निश्चयाने सुग्रीवाचे आव्हान स्विकारण्यासाठी अंतःपुरांतुन बाहेर येऊ लागला.

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!) इथून पुढे —-

थंडीच्या दिवसात बासुंदी…. उन्हाळ्यात श्रीखंड.. आम्ररस… असे. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत… मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक “वळवटाच्या खिरीची” वाटी.. त्याच्याबरोबरच हाटून एकजीव केलेली “वरणाची” वाटी असायची.! त्याशेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या “करंज्या”… मुरडीचे पुरणाचे “कानवले”…. अन राहिलेल्या मोकळ्या जागेत… लाल तिखट- मीठ- ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी “भजी”.. अन त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची “आळूवडी” …! या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेऊन “शुद्ध” केलेला … “महानैवेद्य”.. !

या महाप्रसादानंतर हिरव्यागार पाच पानांचा, चुना- कात- सुपारी- बडीशेप- साखर- वेलदोडा- खोबऱ्याचा खिस- ज्येष्ठमध घालून, त्या पानांची विशिष्टप्रकारे घडी घालून लांबसडक लवंगेने बंद केलेला त्रयोदशगुणी “विडा” मुखशुद्धीसाठी असायचा…! असा पंचपक्वान्नाचा.. “साग्रसंगीत”… गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू ..या “आयुर्वेद शास्त्रावर” परिपूर्ण अवलंबून असणारा “षडरस”युक्त.. “महानैवेद्य” खाण्याचं परमभाग्य अनेकवेळा वाट्याला आलं…!

हा “महानैवेद्य” खाण्याचा योग पंढरपूरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला… काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ- लिंबाने घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा “भाव” एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता.

पूर्वी “महानैवेद्य” बडवे- उत्पातांच्या घरी एखादी “माऊली” करायची… आता मंदिराच्या मुदपाकखान्यात हा “नैवेद्य” केला जातो..!

या “महानैवेद्या”च्या प्रसादाबरोबर.. सकाळच्या न्याहरीसाठी ..आंबूस-गोड तसेच लवंग-दालचिनीच्या चवीची हिंग- जिरे- कढीपाल्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम “कढी” अन… मऊसूत मूगडाळ- तांदळाची…. वरून भरपूर कोथिंबीर- खोबरं… मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या “खिचडी”ची चव… अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येकवेळा लाभ झाला. कधी कधी मधूनच सकाळी ‘रामभाऊ बडवे’ सारख्या एखाद्या “सेवाधारी” मित्राचा फोन यायचा… “मन्द्या… आज “पांडुरंगाचा” दिवस घेतलाय … किटली घेऊन ये… महापूजेचं “पंचामृत” देतो..”… ते अस्सल दूध, दही, तूप, पिठीसाखर, मध, अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक ‘पंचामृत’ तांब्याभर प्यायल्यावर २ -४  तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे “धपाटे” पुढे दोन दिवस टिकायचे… असा “प्रसाद”.. पोटभर पुरायचा. नुसत्या “महानैवेद्या”च्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी… पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासासारखा “सुवास” घरभर पसरायचा…! “पंचामृताच्या” किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं “गाभाऱ्यात” असल्याचा भास व्हायचा..!

एखाद्यावेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून … “देवाला” दाखवलेला “सुंठ- लवंग- तुळशी”बरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक “काढा” घेऊन जायचा आग्रह एखादा मित्र करायचा…! उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच “देवाच्या” अंगाची ‘तलखी’ होऊ नये म्हणून भल्या मोठ्या “सहाणेवर” उगाळलेला “रुक्मिणी- पांडुरंगाच्या” मूर्तीला लेप दिलेला “चंदन उटीचा” चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा “थंडावा” बरेच वेळा अनुभवलाय. काही काळ मूर्तीच्या अंगावर थापलेला लेप औषधाइतकाच गुणकारी आहे. बऱ्याच जणांच्या देवघराच्या एखाद्या कोनाड्यात हा पांडुरंग-रुक्मिणीच्या मूर्तीवरील “थंडावा” कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळून जपून ठेवलेला असेलही…! या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी “महानैवेद्या” इतक्याच “प्रासादिक” मानल्या…!

एवढं वाचल्यावर … एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला…? असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून “किती… अन काय काय खावं..?”… असा प्रश्न न पडता… “काय खावं अन कसं खावं..”… याचं  उत्तर मिळालं.

ते भरलेलं “नैवैद्या”चं ताट बघून “डाव्या” बाजूचे आंबट- तुरट- खारट- तिखट- कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे… अन “उजव्या” बाजूकडील गोड पदार्थ “डाव्या”पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे, हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं…!

समाजामध्ये वावरताना “डावं-उजवं” समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान…! सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा “नैवेद्य” दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करायची गरज नाही. नुसत्या “शर्कराखंडखाद्यानी…” एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर… भक्तवत्सल “विदुराच्या” हुलग्यावर… “चोखोबारायांच्या” शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दह्याच्या दही- भाकरीच्या “काल्यावर” ही प्रसन्न होणारा आमचा “वासुदेव” आहे..! फक्त “नामदेव- चोखोबां”च्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत …. ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या “भगवंताने” हिसकावून नेली तरी … नुसत्या कोरड्या पोळीने पोट दुखेल म्हणून.. त्याच्यामागं तुपाचं तामलं (एक भांड्याचा प्रकार) घेऊन पळत सुटणाऱ्या “संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या” इतकी भाबडी सजगता अंगी आली की… एकमेकांच्या “भुकेशी” तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल…!

बाकी आपण दाखवलेला “नैवेद्य” प्रत्यक्ष “भगवंतानं” जेवण्याइतकी आपली “हाक” मोठी नसली तरी… आर्त भावनेने… कधीतरी सणावारी केलेलं साग्रसंगीत “नैवेद्याचं” ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना … वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा…  किंवा धक्क्यानं म्हणा…  देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं  एखादं फुल असू दे..  किंवा.. एखादी ढासळणारी भाताची मूद…  अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं  “तुळशीचं पान”… जरी पडलं तरी…  “खाल्ला बाबा देवानं नैवेद्य…!” —  अशी “देऊळ सताड उघडं” असतानाही…  अन “देऊळ बंद” असतानाही आपली भाबडी समजूत करून घेणारा … आधुनिक काळातील पाडगावकरांच्या भाषेत… “भावभोळ्या भक्तीची ही एकतारी…. भावनांचा तू भुकेला रे मुरारी…”.. म्हणणारा… भगवंतापुढं त्याच्या इतकीच गेली “अठ्ठावीस युगं” त्याच्या पायाशी बसणारा….. साधा-भोळा…”पंढरीचा वारकरी” आहे…  असा विचार मनात चमकून जातो … अन अंगावर शहारे येतात…!

— समाप्त —

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 3–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 3 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

(आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. ) – इथून पुढे —-

देव भक्ताची पूजा करतो हे ज्ञात होतं. देव भक्तासोबत नाचतो, गातो, खेळतो हेही ज्ञात होतं. कारण कृष्णावतारात वृंदावनी गोपगोपिकांबरोबर त्याने महा रासगरबा केला होता. गोपांसवे यमुनातटी अन् विष्णुपदी शिदोऱ्या एक करून काला करून खाल्ला. एकमेकांना खावू घातला होता, हे सगळ्यांनाच माहीत होतं. सारे लोक नवविधभक्तीतून भगवंत पूजन करतात. पण भगवान भक्तीचा भुकेला, भक्तांचा भुकेला आहे.  तो भक्तांचे पूजन करतो.. त्याचे गुणवर्णन ऐकतो. नव्हे स्वतः त्याचे नाव घेऊन भावविभोर होऊन नाचतो, हे त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण काय पाहतो ते समजेना. पण ते सारं डोळ्यासमोर घडत होतं .नारदांनी केवळ बसून भक्ताची पूजा करताना पाहिलं होतं. आपण भक्ताचा नामघोष करत नर्तन करताना पाहतो आहोत  याचा आनंद झाला.  देव नाचतो याची गंमत वाटली. आणि तेही भक्तनावाचा जप करीत नाचतो याचं आश्चर्य वाटलं. 

मगापर्यंत आजचे देवदर्शन चुकले याची चुटपुट होती, पण आता सगळे बदलले. आनंद, परमानंद झाला. सुखाच्या अत्युच्च शिखरावर स्वार झाल्यासारखं वाटू लागलं. आपण काही आगळेवेगळे पाहिल्याची ऐकल्याची भावना हृदयात प्रज्वलित झाली. जीव तृप्तला. समाधान पावला. अमृतपानाहूनही हे भक्त-नामामृत रसपान अद्भुत होतं. ते पाहिल्याचं समाधान होतं. ते अनुभवल्याचा आनंद होता. परमानंद होता..

आज देवदर्शन मुकले नाही तर खरं देवदर्शन घडलं. खरं देवदर्शन झाल्याचा आनंद झाला. 

किती वेळा ते दृष्य पाहिलं माहित नाही, कळलं नाही. त्या तंद्रीतच ती व्यक्ती नाचू लागली. तीही व्यक्ती तोंडाने म्हणू लागली —

“ज्ञानोबा – तुकाराम”, 

“ज्ञानोबा  – तुकाराम”. 

खरंच संतांच्या नामस्मरणाचा काय आनंद होतो ते ती व्यक्ती अनुभवत होती.  

आता तिचं भान हरपून गेलं होतं. पहाट झाली. काकडआरतीसाठी मंडळी मंदिराकडे आली आणि त्यांनी तिला हलविले अन् ती व्यक्ती भानावर आली. शरीराने ऐहिक जगातील नित्यक्रम करू लागली. पण मन मात्र सुखाच्या कारंजाप्रमाणे नाचत होतं. ‘भक्तभजन’ रंगात दिवसभर मन तिकडेच होतं. दुसरीकडे चिंतन सुरु झालं- हे काय अद्भुत? ज्या भगवंताच्या नामस्मरणाने काय साध्य होते ते आपण वाचतो, ऐकतो, त्याचे महात्म्य सांगतो, तो स्वत:च संतनामात एवढा दंग होतो? ‘ याचा अर्थ त्याला स्वतःच्या नावापेक्षा भक्तनामघोष अधिक आवडतो . म्हणून आपणही तोच नामजप करावा. तोच आपल्यासाठी भक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी शक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी तारकमंत्र आहे. त्याचाच प्रसार झाला पाहिजे, नव्हे तो केला पाहिजे आणि तो मी केला पाहिजे. मला ते दर्शन घडले. मला ते ऐकायला मिळाले. तोच वारकऱ्यांचा तारक मंत्र आहे.’ 

आणि मग साऱ्या भक्तमंडळींना जमवून त्याबद्दल सविस्तर कथन केलं. 

काहींनी मानलं, काहींनी विरोध केला. आम्हाला अनुभुती आल्याशिवाय आम्ही का ऐकावे म्हणून काहींनी विरोध केला. त्यांच्या भजनावेळी टाळ पखवाज वाजवले तरी आवाज बाहेर येईना. कितीही प्रयत्न करून, अक्षरश: बडवूनही स्वर येईना. मग भजनरंगी भक्तरसात येऊन संत स्तवन झालं, ” ज्ञानोबा – तुकाराम ” बोल तोंडातून बाहेर पडले अन् मगच टाळ आणि पखवाज पुन्हा घुमु लागले. ” ज्ञानोबा – तुकाराम.” 

—हाच मंत्र आज साऱ्या वारकरी संप्रदायाला शक्ती प्रदान करणारा, भक्तिरसात चिंब करणारा, शक्ती- भक्ती- मंत्र म्हणून प्रचलित आहे. तोच नामजप केल्याशिवाय कुठलीही दिंडी निघत नाही. कुठलेही भजन सुरू होत नाही.  कुठलेही कीर्तन संपत नाही. 

कोणाही थकल्या मरगळलेल्या व्यक्तीलाच नव्हे, तर मृत्युशय्येवरच्या व्यक्तीलाही “ज्ञानोबा” ऐकलं की “तुकाराम” शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतात “ज्ञानोबा तुकाराम” हीच महाराष्ट्राची खरी भक्तीधारा आहे. हीच खरी शक्तीधारा आहे. हीच खरी विचारधारा आहे. भगवंतापासून प्रवाहित होवून ती समस्त वारकरी बांधवांपर्यंत आणून त्यांना त्यात सुस्नात करणारी ती महान व्यक्ती म्हणजे ‘ श्री संत प्रल्हाद महाराज बडवे ‘ होत. भक्तनाम गात नर्तन करणाऱ्या भगवंताचे दर्शन त्यांना घडले. ” ज्ञानोबा-तुकाराम ” हे भगवंतोद्गार पहिल्यांदा त्यांनी ऐकले. पाहिले. ते त्यांनीच पुढे प्रचारित केले. त्यामुळे सकल वारकरी भक्तांच्या मनात त्यांचे विषयी ममत्व आहे. वारकरी त्यांचे चरणी लीन होतात. त्यांना सन्मानित करतात. 

शके १५४२ मधे विठूरायाच्या परंपरागत पूजा-अर्चन करणाऱ्या बडवे कुळात जन्म घेतलेल्या प्रल्हाद महाराजांचा शके  १६४० (सन १७१८) हा समाधी काळ आहे. म्हणजे सुमारे ३५० वर्षे या घटनेला झाली.  तरी आजही नामदास महाराज फडावर, वासकर फडावर, आजरेकर फडावर, शिरवळकर फडावर, धोंडोपतदादांचे फडावर, बाबा महाराज सातारकरांचे फडावर तसेच दस्तापुरकरपासून ते कान्हेगांवकरांपर्यंतच्या साऱ्या महाराज मंडळात अन् विदर्भ, खानदेश, मराठवाड्यापासून ते कोकणापावेतोच्या सकल वारकरी सप्ताहात ही सत्यकथा, मंत्रकथा, दिव्यकथा, देवानुभुती कथा, देवलीला म्हणून सांगितली जाते. अन् लोक प्रल्हाद महाराजांचे चरणी नतमस्तक होतात.

— समाप्त —

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

‘माई मी निघते, पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील, त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा, रात्रीचं मी बघेन आल्यावर…’

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजाच्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं.

काय झालं माई ? नाराज आहात का ? कसला राग आलाय का ?माझं काही चुकलंय का ?”

‘तुझं काही चुकलं नाहीये ग बाई, माझंच चुकलंय. मीच एक अडगळ होऊन राहिले आहे  तुमच्या घरात…” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा, त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजाने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं,

‘काय झालं माई ? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल’.

माईंनी एकदा अनुजाकडे बघितले, तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या, मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी, व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा…

“कंटाळा येतो गं दिवसभर, काही काम न धाम, टिव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात…. दिवस खायला उठतो बघ… पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये…. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता… ‘सुख दुखतं’ म्हणतात ना तसं झालंय माझं…

अनुजा जरा विचारात पडली. मग म्हणाली, “तुम्हाला वाती करायला जमतील का ?

“हो… बोटं दुखतात त्याने सुद्धा… पण थांबून थांबून करीन.”

“ठीक आहे, मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा.”

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती. माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली,

“निघू मग मी आता ? रात्री लवकर येते….”

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या….इतक्यात बेल वाजली….

त्यांनी दार उघडलं…. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता.

अनुजाच्या तत्परतेचं त्यांना कौतुक वाटलं… त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला… तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं… एवढ्या कापसाच्या हजार-दीड हजार वाती होतील… आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं… काय उपयोग इतक्या वाती करून ?

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली.    ‘आजी मी पण करू ? नको तुला नाही जमणार.

“तू शिकवं ना मला.”

त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या….पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा… पण वेळही चांगला जात होता… वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या…

एवढी कशी अश्रद्ध माणसं ? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना ?

अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते…. आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता… शेवटी ७.३० ला आली… खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती…आल्या आल्या तिने माईंना हाक मारली…

माई आल्या… अनुजाने गुंडाळी उलगडली… आणि…. माईंच्या अंगावर काटा उभा राहिला… ते विठ्ठलाचे चित्र होते… मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती… अगदी तसाच विठोबा रेखाटला होता… वत्सल, आश्वासक… माईंचे हात जोडले गेले.  स्वतःच्याही नकळत….

कोणी काढलं हे चित्र ? भानावर येत माईंनी विचारलं….

माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नांवाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय… तिला दोन्ही हात नाहीयेत… पायाने काढलंय तिने हे चित्रं… तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस…

“अगं किती सुरेख चित्र काढलंय… आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची… अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे.”

“अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलंय… मीच नेली होती तिला दाखवायला…  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं…

“आता ह्या चित्राचं काय करणार ?”

“काही नाही… खास तुम्हाला दाखवायला आणलंय.”

‘मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबी मध्ये लावूया, बाजूला चित्र कोणी काढलं त्याची माहितीही लिहू… नाहीतरी उद्या एकादशी आहे…’

“अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली…..फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं.”

झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…

क्रमश:…

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 2–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

( आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.) इथून पुढे —-

देवळात अंधारच होता. कुठेतरी बारीक ठाणवई, एखादी पणती मिणमिणत होती. सारं काही सुमसाम झालं होतं . मंडपात माणसं घोरत पडली होती. त्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहता मंडप पार करत अंधारातून ठेचकाळत एक एक अडथळे पार करून ती व्यक्ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत गेली. दाराशी आली. पळत आली. तर दाराला भलं मोठं कुलूप घातलं होतं.

आता हुरहूर जीव घेणारी ठरली. हुरहूर होती आज देवदर्शन मुकले याची. तसंच तगमगत दारासमोर साष्टांग दंडवत घातला. तिथेच नामस्मरण करत मांडी ठोकली. 

सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात काही अस्पष्ट अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. त्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिलं तर कुणीच नाही. मग आवाज कसला येतोय. बारीक बारीक किण किण करणारा पैंजणांचा आवाज. त्याचबरोबर चिपळ्यांचा स्वर. काही पुटपुटल्याचा आवाज. पैंजण वाजताहेत म्हणून बाई म्हणावं तर सोबत चिपळ्या वाजताहेत? स्वर ही पुरूषी येतोय?

कुठून स्वर येतोय? 

पैंजण कसले वाजताहेत? 

चिपळ्या कोठून वाजताहेत? 

आवाज कसला येतोय? 

याचा शोध सुरू झाला तर आवाजाची दिशा गाभाऱ्याकडे चालली. 

त्या व्यक्तीला वाटलं गाभाऱ्यात कोणी भक्त, भाविक, वारकरी अडकला असावा. चुकून कोंडला गेला असावा. रात्रीच्या गडबडीत राहिला असेल. आता रात्रभर बिचारा अडकेल. आणखी जरा पहावं म्हणून गाभाऱ्याचे दाराला असलेल्या छिद्रातून त्या व्यक्तीने आत दृष्टी टाकली, इकडे तिकडे शोधक नजरेने ठाव घेतला. कोणी दिसेना. येणारा आवाज मात्र गडद झाला. तेवढ्यात लक्ष सिंहासनाकडे गेलं तर आसनावर देव नाहीत. केवळ सिंहासन होते. समोर मात्र सर्वत्र प्रभा फाकणारा हिरेजडित सोन्याचा देवकिरिट सिंहासनावर ठेवलेला होता. मगाचची भक्त अडकल्याची चिंता कुठल्या कुठे पळाली. आता देव कुठे आहे? याची चिंता सुरू झाली. कोणते विघ्न तर आले नाही ना?  कोणीही मोगली यवन सरदार अवचित आला नाही, तरीही देव कसे जागा सोडून गेले? आतून आवाज येतोय? काय करावे? कसे शोधावे? कोणाला चौकशी करावी? रात्र पडली,  काहीच कळेना. 

तेवढ्यात एका खांबाआडून एक दिव्य देहधारी मानवाकृती बाहेर पडल्यासारखी दिसली. निरखून पाहतो तो खांद्यावर जरतारी रेशमी शेला, गळ्यात वैजयंती माळा, नर्तनाच्या पदलालित्यावर डोलत होत्या, डोईचे कुळकुळीत केस खांद्यावर रूळत आहेत. कमरेचा पितांबर हालतोय. दोन्ही हाती वाजत चिपळ्या होत्या. पायातले रत्नजडित तोडर बारिक बारिक वाजत होते. नेत्रकमल मिटलेले होते. नर्तन करीत करीत तोंडातून स्वर बाहेर येत होते —-

” ज्ञानोबा – तुकाराम “. 

” ज्ञानोबा – तुकाराम ” 

ती कोणी वारकरी व्यक्ती नव्हती.  ती व्यक्ती कोणी सामान्य दिसत नव्हती. तर प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग बेभान होऊन गाभाऱ्यात नाचत होता आणि तोंडाने म्हणत होता ” ज्ञानोबा – तुकाराम ”  ” ज्ञानोबा – तुकाराम “.

 मघापर्यंत चिंतातूर असणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चिंता बदलली. क्षणात आश्चर्य, क्षणात आनंद , क्षणात गंमत आलटून पालटून बदलत होती. आश्चर्य होते आपण काही अद्भूत पाहत आहोत याचे. दिसतेय ते काही विलक्षण आहे याचे. आनंद होता तो परमात्म्याचे आगळ्यावेगळ्या दर्शनाचा. दिव्य दर्शनाचा. आतापर्यंत परमात्मा असा भक्त-नाम गात नाचल्याचे वाचले वा ऐकले नव्हते. जो यति, योगी, तपी, ताडसी, यांना जपतपादी साधने वापरूनही सहज साध्य होत नाही, तो आपल्या दिठीसमोर नाचत असल्याचे पाहून गंमत वाटत होती. आनंद होत होता. तो परमात्मा केवळ दिव्यदृष्टी धारण करूनच दिसू शकतो असे ज्ञात होते. कारण महाभारतात त्याचं तेज दृष्टीला सहन न झाल्याने तो प्रत्यक्ष समोर असून अनेकांनी डोळे मिटले होते. तेज सहन न झाल्याने ते मिटावे लागले होते. डोळे मिटून घेवूनही त्याचे तेज डोळ्यांना सोसत नव्हते. तो दिव्य प्रकाशधारी, नव्हे शतसूर्य– नव्हे नव्हे कोटी भास्कराचे तेज ज्याचेपासून उगम पावते असा परमात्मा आपल्यासमोर नर्तन करतोय याची गंमत वाटत होती. आनंद वाटत होता. आश्चर्य वाटत होते. अनेकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा हा परमात्मा, हे परब्रह्म, त्या व्यक्तीच्या दृष्टीसमोर स्वतः एका वेगळ्या तालावर नाचत होते. अगदी देहभान हरपून. अन् तोंडाने बोलत होते–”ज्ञानोबा-तुकाराम”

आजपर्यंत पुराणात वाचलं होतं, ऐकलं होतं की, एकदा भगवंताचे गृही नारद आले. सेवक बोलले देव देवपूजा करत आहेत. देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले.. ते म्हणाले देव कोणाची पूजा करतात पाहू या. म्हणून ते देवघरात हलकेच प्रवेशले. तो देवपाटावर एक एक देव मांडले होते. आणि देव पूजनात दंग होते. ते देव म्हणजे आपल्यासारख्या  देवप्रतिमा नव्हत्या. होत्या भक्त प्रतिमा. भक्त उद्धव, भक्त अक्रूर, भक्त नारद, भक्त हनुमान. आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. 

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..

“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”

तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…

“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…

शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”

—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!

“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… .. 

“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर…   मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून …… 

” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!

रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.

सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे. 

त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.

ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.

दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम्‌ समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.

त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!

त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…

कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!

– क्रमशः…

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

युध्दाचे आव्हान वालीने स्विकारले ती  अपवित्र व अशुभ रात्रीची वेळ! वाली युध्दासाठी निघालेला पाहून तारा समोर येऊन म्हणाली, “स्वामी! ही वेळ युध्दासाठी योग्य व चांगली नाही. ही रात्र मायावी आहे. अशा अशुभवेळी न जाता उद्या सकाळी  युध्दासाठी निघणे योग्य होईल.”

परंतु वालीने  तिचे म्हणणे धुडकावून लावले. संघर्षासाठी तो पेटला असल्यामुळे आता तो थांबू शकत नव्हता. हट्टी वालीला ताराने हरतर्‍हेने खंप समजावले, पण व्यर्थ!

अखेर धाकटा भाऊ सुग्रीवला युध्दासाठी सोबत घेऊन वाली युध्दभूमीकडे निघाला. वाली व राक्षस मायावी यांच्यामध्ये घनघोर तुंबळ युध्द झाले. वालीचे पारडे जड होताहेसे पाहुन तो भिऊन पळुन गेला. वाली व सुग्रीवने त्याचा पाठलाग केला. मायावी राक्षस दूर जंगलांतील एका गुहेत शिरुन नाहीसा झाला

वाली आणि सुग्रीव गुहेजवळ  येऊन गुहेचे निरिक्षण केले. सुग्रीवाला दारावर थांबण्यास सांगुन वाली गुहेत शिरला. सुग्रीव बाहेर अनेक महिने वाट पाहात थांबला. एके दिवशी गुहेतुन मोठमोठे आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहत असतांना त्याला दिसले. आपला भाऊ वालीचा वध झाला असावा असे समजुन गुहेचे तोंड बंद करण्यासाठी  गुहेच्या तोंडाशी भली मोठी शिळा ठेवुन गुहेचे दार बंद केले आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने सुग्रीव राजधानीत परतला.

सुग्रीवाने तिथे घडलेले सारे वृत्तांत ताराला कथन केल्यावर तिच्यावर तर वज्राघातच झाला. डोक्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला अतोनात दुःख झाले.

एके दिवशी अचानक एक घटना घडली. वाली परत आला… वालीने मायावी राक्षसाचा वध करुन गुहेबाहेर येण्यासाठी गुहेजवळ आला असतां, गुहेचे तोंड बंद असल्याचे त्याला आढळले. त्याला वाटले सुग्रीवाने मुद्दाम कपट करुन गुहेचे दार बंद करुन वालीला मरण्यासाठी गुहेत कोंडले. वालीला अतिशय संताप आला. मन उद्गिन्न झाले. खुप प्रयत्न करुन गुहेचे दार  मोकळे केले व तो बाहेर आला. राज्यात आल्यावर पाहतो तो काय…. सुग्रीव राजा झालेला!

जेव्हा सुग्रीवाने येऊन वालीचा वध झाल्याचे सांगीतले, त्यावेळी तर ती दुःखाने वेडी झाली होती, पण ! लवकरच सावध होऊन आपले दुःख बाजुला सारुन, शेवटी ती राज्याची महाराणी होती ना!  राज्याचे हित लक्षात घेऊन व गादी जास्त दिवस रिकामी राहु नये, या उद्देशाने , तारा व सर्व प्रमुख वानर मंत्रीगणांनी मिळुन सुग्रीवास राज्यावर बसविले होते. सुग्रीव वानरांचा राजा व त्याची पत्नि रुमा राणी झाली होती. यांत सुग्रीवाचा कांहीही दोष नव्हता.

परंतु कोपिष्ट व क्रोधी वालीला वाटले, आपले राज्य हडप करण्यासाठीच सुग्रीवाने मुद्दामच  मरण्यासाठी गुहेत बंद करण्याचे कपट केले. अशा आततायी समजुतीने, सुग्रीवाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे लागला. भयभीत होऊन सुग्रीवाने तिथून पळ काढून, वालीच्या शापाचे मतंगवनच सुग्रीवाने आपले आश्रयस्थान बनवले. वाली शापग्रस्त असल्यामुळे तिथे तो जाऊ शकत नव्हता. शेवटी परत येऊन वालीने राज्याचा ताबा घेतला. आणि सुग्रीव पत्नी रुमाला आपल्या अंतःपुरांत ठेवुन घेतले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

“ कसे आहात..?”

एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..

तो म्हणाला.. ” भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीसुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही..”

त्यानंतर त्याने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

त्याने काय सांगितलं..??—-

तो शांतपणे म्हणाला की, “ आपण हा जो मनुष्यजन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाही, किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!

माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी…

जसं तुमचा आयुष्यातला जोडीदार अचानक हे जग सोडून गेला, तुम्ही त्याचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्याचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले– ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही… तेव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून ” तू मला का जगवलंस..?” हा प्रश्न विचारू नका…. जे झाले ते चांगले झाले, जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.

कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं.. तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  ‘Account Closed..’ असा शिक्का मारतात ना…,  त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती ‘Account Closed’ झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका…

कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..

तेव्हा मनाला सांगा.. ” बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!”

हा प्रयोग करा…  आणि किती खाती पटापट बंद होताहेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. ” परतफेड आणि परतफेड ” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल…..”

आणि “ मी येतो… “ असं म्हणत तो निघून गेला..

—– आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे…. तुम्ही ‘ सहन करतो, सहन करतो.. ‘ हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता…. 

जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!

—— चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी 

–फक्त ” परतफेडीचं ” आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य मजेत घालवू या…… 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares