मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

◆ कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही,

◆ कोणाला निमंत्रण नाही,

◆ कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही,

◆ कुठलीच भंपकबाजी नाही,

◆ कोणालाही कसलंही प्रलोभन नाही,

◆ कोणाचा कोणावर राग रूसवा नाही,

◆ कोण खायला घालेल,  की नाहीच , ते पण माहीत नाही, आज मिळालंय, उद्या मिळेल की नाही याची चिंताच     नाही,

◆ खिशात एक रूपयाची पण गरज नाही ,

◆ तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो ,

◆ कुठलंही गालबोट लागत नाही ,

◆ इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही,

◆ म्हणून कोठेच गर्वाचा /अहंकाराचा लवलेशही नाही….

◆ दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा,

◆ डोळ्याचं पारणं फेडणारा….

◆  ऊर भरून आणणारा सोहळा,

◆ श्रीमंतच नाही, गर्भश्रीमंत सोहळा…

◆ अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती …

आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी…

—–तर फक्त…..

मुख दर्शन व्हावे आता…

तु सकळ जनांचा दाता….

घे कुशीत या माऊली…

तुझ्या पायरी ठेवतो माथा …..

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

हाथरस इथं स्वामीजी एकटे आले होते. मात्र आता तिथून निघताना बरोबर शरदचंद्र होते. हृषीकेशला जाताना सहारनपूरला उतरून साडेतीनशे किलोमीटर पायी अंतर कापायचे होते. स्वामीजींना सवय होती पण शरदचंद्र यांना हे सर्व परिवर्तन नवीन होते. सवय नव्हती. अंगावर सामान घेऊन पायी चालणे, जागा मिळेल की नाही विश्रांतीसाठी, याची खात्री नाही, मुक्काम कुठे असेल माहिती नाही, अशा अनिश्चित परिस्थितीत मध्ये प्रवास सुरू होता. तो त्यांना झेपत नव्हता. ओझं घेऊन चालू शकत नव्हते, स्वामीजींच्या हे लक्षात आलं आणि ते सामान त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलं. शरदचंद्रांच्या लक्षात आलं की, हिमालयातील भ्रमणासाठी आपण घेतलेले बूट त्या सामानात आहेत. खूप शरमल्यासारखं झालं त्यांना. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याच खांद्यावर आपले बूट? पण स्वामीजींना त्याचं काहीही वाटलं नव्हतं.

नदी ओलांडताना तर बरं नसलेल्या शरदचंद्रांना घोड्यावर बसवून स्वत: घोड्याबरोबर पायी चालत गेले. काही वेळा पायी चालताना स्वामीजींनी शरदचंद्रांना खांद्यावर घेऊन प्रवास केला. अशी स्वामीजींनी आपली सेवा केली यामुळे त्यांचा स्वामीजींबद्दलचा आदरभाव आणखीन वाढला. त्या विचाराने मन भरून आलं. माणुसकीच्या दृष्टीकोणातून आपल्या शिष्याची जबाबदारी आणि काळजी घेणं हे स्वामीजींनी आपलं कर्तव्य मानलेलं दिसतं. एकूणच स्वामी सदांनंदांचे मठातले आगमन म्हणजे रामकृष्ण संघाच्या पुढच्या विस्ताराची नांदी ठरली होती.  

स्वामी विवेकानंदांना हे कार्य उभं करतांना सुरुवातीपासूनच अनेक खाचखळग्यातून व प्रसंगातून जावं लागलं. मठांमध्ये वेद वाड:ग्मयाचा अभ्यास झाला पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. वेदांच्या अभ्यासाकडे बंगाल मध्ये फार दुर्लक्ष झालं होतं. असं त्यांच्या लक्षात आल होतं. वेदांच्या अभ्यासासाठी एक उत्तम सोय असलेली संस्था उभी करावी असं त्यांना वाटत होतं. ते स्वत: भारतभ्रमण करतांना कोणी संस्कृत व्याकरणाचा पंडित भेटला की त्यांच्याकडून पाणीनीच्या व्याकरणाचे धडे घेत असत. भारतीय संस्कृतीचा वारसा स्पष्ट करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच वेदातील ज्ञानकांडाचा भाग आणि उपनिषदे असत. कर्मकांडांचा अतिरेक झाल्यामुळेच समाजरचनेत दोष निर्माण झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा र्‍हास झाला असे त्यांचे निरीक्षण होते.

स्वामी विवेकानंद असेच बिहार आणि उत्तरेतील भागात खेड्यापाड्यातून पायी फिरले. खूप तीर्थाटन झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आचार-विचार, रिती-नीती, यांचा जवळून परिचय झाला. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यामुळे पुढे काय योजना करायची याचा विचार सतत त्यांच्या मनात चालू असे. मध्ये मध्ये वराहनगरला मठात पण फेरी व्हायची. सर्व गुरु बंधु एकमेकांना भेटल्यामुळे सर्वजणच आनंदी व्हायचे. पुन्हा आपापल्या ठरलेल्या भ्रमणास निघायचे.

कलकत्याहून ते पुढे गाझीपूरला जाताना मधेच अलाहाबादला महिनाभर थांबले. इथेही बंगाली समाज स्वामीजींचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे भारावून गेला होता. समाजव्यवस्थेतील दोष आणि विषमता यावर स्वामीजींनी इथेही टीका केली होती.

स्वामीजी गाझीपूरला गेले आणि त्यांचा कलकत्त्यातलाच मित्र बाबू सतीशचंद्र मुखर्जी यांच्याकडे राहिले. इथेही अलाहाबादसारखाच बंगाली समाज गोळा झाला. इथे त्यांना वेगळाच अनुभव आला. इथल्या बंगाली समाजावर पाश्चिमात्य सुखवादी संस्कृतीचा मोठाच पगडा आहे असे त्यांनी पहिले. भारतीय संस्कृतीतला त्याग, सेवा, संयम अशा उदात्त असलेल्या जीवन मूल्यांचा पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपल्या देशबांधवांना साफ विसर पडला आहे. याचे स्वामीजींना दु:ख झाले.

हे सगळे पाहता आजही पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्या समाजावर दिसतोच आहे. मुख्य म्हणजे संस्कृती वर प्रभाव पडून काही बदल होत आहेत. आज परिस्थिति तर खूप वेगळी आहे. त्याकाळात इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे हा प्रभाव होता. आता तर सारं जगच एक खेडं झालं आहे. अंतर खूप असलं तरी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. पण आज कोरोंना सारख्या साथी नं सर्व जगालाच एका पातळीवर आणून ठेवलं आहे. पण त्याग, सेवा व संयम ही आपली भारतीय मूल्येच आज यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करताहेत असं दिसतंय.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 1 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग -1… अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, ” कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, ” तुला साडेसाती सुरू झालीय का? ” असे विचारले. 

त्यावर ती म्हणाली, ” नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे.”

मी म्हंटले ,” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल.”

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, ” झाला तुझा वाह्यातपणा सुरू? “

विनोदाचा भाग सोडला, तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली, 

कोणाची संपली? कोणाची सुरू झाली? काय म्हणून काय विचारता महाराजा, ” साडेसाती ” !     

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला

“साडेसाती “असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असले तरी ती कोणालाही टाळता येत नाही.

`ज्योतिष मानत नाही,` असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडा तरी घाबरतो. 

एक गोष्ट आहे—-

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले, ” लक्ष्मी येताना छान दिसते, आणि शनी महाराज जातांना चांगले दिसतात.”

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही. 

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते. 

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की… ” मी सरांशी गप्पा मारून आलोच ,” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का? “

देशपांडे म्हणाला, “ओरडतात.”

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का? “

देशपांडे: ” वाटतं…, मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते. 

पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे.”

मी : ” काय? “

देशपांडे : ” एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, ” देशपांडे चला, चहा पिऊ.”

चहा पितांना ते म्हणाले, ” देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, आणि साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही .”

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही. 

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो. 

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो, कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. 

कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही , तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला.

अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. 

क्रमशः…

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णवड…. श्री हर्षद तुळपुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णवड…. श्री हर्षद तुळपुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

परवाच वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाबद्दल कुठेकुठे कायकाय वाचायला मिळत होतं. त्यात वडाचा हा एक अद्भुतरम्य प्रकार ज्ञात झाला – “ कृष्णवड “.

पहिल्यांदा वाचल्यावर असं वाटलं की, काळ्या तुळशीला ‘कृष्णतुळस’ म्हणतात, त्याचप्रमाणे या वडाची पानंबिनं काळीबिळी असावीत म्हणून याला ‘कृष्णवड’  म्हणत असतील; परंतु नंतर कळलं की या वडाची पानं देठाकडच्या बाजूने आत वळलेली, द्रोणासारखी असतात आणि त्यामागे एक कृष्णाची पौराणिक कथा आहे, म्हणून याला ‘कृष्णवड’ नाव पडलं.    

भारतीय संस्कृतीकोशात ही कथा वाचनात आली. एकदा गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेला असता, काही गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व त्यांनी ते लोणी कृष्णाला दिलं. कृष्णाने ते लोणी सर्व गोपगोपींना वाटलं. त्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका वडाची पानं तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पानं द्रोणासारखी बनली आणि त्याच्या बीजापासून उत्पन्न झालेल्या वडाला तशीच पानं येऊ लागली. म्हणून या वडाला ‘कृष्णवड’ म्हणतात.

कोकणात कुठे हा वृक्ष मी अद्याप बघितलेला नाही, पण याच्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.  म्हणून काही वनस्पतीअभ्यासकांना याबद्दल विचारलं आणि थोडंसं ‘नेटलं’. तेव्हा अशी माहिती कळली की मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणि पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये हा वृक्ष आहे. बंगाल प्रांतात हा वृक्ष खास करून आढळतो. देवराई अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी पानांचा सुंदर फोटो पाठवला. या वृक्षाचे शास्त्रीय नाव Ficus krishnae. पूर्वी ही साध्या वडाचीच (Ficus benghalensis) एक उपप्रजाती मानली जात होती. मात्र केवळ याची पानंच नव्हे, तर या वृक्षाची वाढ, त्याच्या मुळांची रचना, पारंब्या या सगळ्यांमध्ये कमीअधिक फरक असल्याने अलीकडे ही स्वतंत्र प्रजाती गणली जाऊ लागली आहे. याला “ माखनकटोरा “ असंही एक गोड नाव आहे.  

२०१५ साली मनेका गांधी यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून कृष्णवडाचं रोप दिलं होतं.                                          

या वडाच्या उत्पत्तीमागे असलेली कृष्णाची कथा हा एक सांस्कृतिक भाग झाला . पण उत्क्रांतीमध्ये या वडाची पानं अशी का झाली असतील याचं उत्तर  शोधणं मनोरंजक ठरेल ! पानांची अशी विशिष्ट रचना तयार होण्यामागे पाणी धरून ठेवणं, असा उद्देश असावा बहुधा.

या वृक्षाबद्दल आणखी कोणाला काही वेगळी माहिती असेल तर नक्की जाणून घ्यायला आवडेल.

छायाचित्र: डॉ. उमेश मुंडल्ये

— हर्षद तुळपुळे

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

सकाळपासून मन थोडं अस्वस्थ आहे  त्याचं कारण असं की सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ..

कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्याची मुलगी वेटलिफ्टींग मध्ये मेक्सिको त देशाचं नेतृत्व करणार…

आता तुम्ही म्हणाल ..

ही इतक्या अभिमानाची गोष्ट आहे ..

आनंदाची गोष्ट आहे..

मग मला अस्वस्थ का वाटलं??तर त्याचं कारण असं की.. निश्चितच…..

इतक्या छोट्या गावातून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व एक मुलगी करते आणि तेही वेट लिफ्टिंग सारख्या प्रकारांमध्ये..

 ही गोष्ट अभिमानाची आहे कौतुकाची आहे..

पण त्या बातमीचा मथळा होता ना..

तो मला अस्वस्थ करून गेला..  कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्या ची मुलगी…

ही अशी करूण किनार या बातमीला  लावणे गरजेचे आहे का??

 जे घडले ते अभिमानास्पद आहे .कौतुकास्पद आहे..

त्यामागे त्या मुलीचे कष्ट आहेत मेहनत आहे ..

त्याच बरोबर अपंग असून चहा विकत असून आपल्या अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून मुलीला अशा प्रकारामध्ये तयार केलं गेलं… त्या वडिलांचं ही खूप कौतुक आहे त्यांच्या घरी  आई मोलमजुरी करते आजीआजोबा भाजीपाला विकतात.

आर्थिक बळ कमीच ..

अशा परिस्थितीत देखील त्या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी लागेल ते सर्व काही केल..

आणि समाजाला सार्थ अभिमान वाटावा असं त्या मुलींना काही करून दाखवलं..

 हे खरोखरच आनंद… अभिमाना  उत्साहाचं असताना अपंग चहा वाल्या ची मुलगी…

असा मथळा  का???

 

जे चांगले आहे त्याचं कौतुक करा ना …त्या चांगल्या मधला कमी पणा दाखवण्यात कसला आलाय मोठेपणा…

ती व्यक्ती अपंग आहे.. चहा विकते..  गरीब आहे. यांत तिचा काय दोष???

तिच्या मनाचा मोठेपणा बघा ना…

आपल्या मुलीसाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी बघा ना..  हातीपायी नीटअसलेली.. श्रीमंत माणसं मुलांसाठी मोठी मोठी स्वप्न बघतात.. सर्व काही मुलांना पुरवत असतात..

पण सगळ्यांचीच मुलं काही अभिमानाची कामं करतात च असं नाही ना..

उलट आपण अपंग असताना देखील मान वर करून स्वाभिमानानं ते लोक जीवन जगत आहेत आणि काहीतरी वेगळं  करूनही दाखवले आहे आयुष्यात..

हे कौतुकास्पद आहे .. त्याकडे लक्ष द्या ना…

 

मला काय वाटतं माहितीए का……

शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंग असलेल्या अशा व्यक्ती समाजासाठी घातक आहेत..

 ज्याना कोणत्या गोष्टीतून कसा आणि कोणता संदेश या समाजाला द्यावा हे समजत नाही…

कोणी हाता  पायानं अधू… कोणी डोळ्यांनं कमी..

मूक बधिर ..कर्ण बधिर..  असतात हो समाजात..

त् त्यांना आपला कमीपणा माहीत असतो..पण  तो स्विकारून त्याच्या बरोबर च अशी माणसं ही चांगलं जीवन जगतात… कधी कधी काही वेगळे .. अभिमानास्पद करून दाखवतात…

पण ..

अशा प्रकारच्या बातम्या देताना..मुख्य गोष्ट महत्त्वाची न मानता आशा प्रकारे त्यांची करूण कहाणी च समाजासमोर आणणं..

अशा बातम्या आपल्या चॅनेलवर दाखवून टीआरपी वाढवणे..

खरं तर…

हे असे लोक मानसिक अपंग आहेत.. आणि १००% हे  अयोग्य आहे..

 

वाजपेयी एका कवितेत म्हणतात

तन से हारा तो कुछ नही हारा…

पर..

मन से हारा वो सब कुछ हारा..

अगदी खरे आहे  हे..

आपण सगळीच परमेश्वराची लेकरे..

कुणाला काही जास्त..

कोणाला काही कमी.

देतो परमेश्वर ..

कमी आहे ते स्वीकारून आपण चारचौघांसारखं नाही हे मान्य करून… जर खरोखरच काही आदर्श अशा लोकांनी घालून दिले असतील तर त्याचं कौतुक झालं पाहिजे ना..

तसे करत असताना देखील त्यांची दयनीयता.. त्यांची लाचारी  जास्त ठळकपणे दाखवण्यात खरं मानसिक अपंगत्व  आहे..

 

तर मुद्दा असा की..

जे चांगलं आहे..

कौतुकास्पद आहे ..

त्यापासून समाजाला प्रेरणा मिळू शकते..

काहीतरी नवं करून दाखवायची आवड निर्माण होऊ शकते अशा गोष्टींना प्राधान्य देऊया…

अशा गोष्टी सर्वांसमोर येऊ द्या.. चुकून एखादा छोटा मोठा दोष.. कमीपणा असेल ..

तर  विशेष करून त्याच गोष्टीचं जास्त प्रदर्शन नको..

स्वच्छ मनाने जग बघू या..!!

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारी-काही ठळक वैशिष्ट्ये… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वारी-काही ठळक वैशिष्ट्ये… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

1) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.

2) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.

3) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.

4) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.

5) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.

6) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.

वारी संतांची

संग्राहक – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुय्यम स्थान… ☆ सुश्री अर्चना अनंत ☆

? विविधा ?

दुय्यम स्थान… ☆ सुश्री अर्चना अनंत ☆

रेवती माझी मैत्रीण घरी नागपूरला आली असं कळलं म्हणून तिला भेटायला निघाले…

दोन वर्षांपासून भेट नव्हती…. दोन वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक येऊन गेला होता.. त्यामुळे दगदग नको, आणि वेळप्रसंगी कुणी जवळ असो म्हणून नवरा बायको बॅगलोरला मुलाकडे शिफ्ट झाले होते.. कुण्यातरी नातेवाईकांकडे लग्न म्हणून ती आठ दिवसासाठी नागपूरला आली होती…. विचारतच तिचं घर आलं.. मी बेल दाबताच तिने दार उघडलं..

इथल्यापेक्षा छान दिसत होती.मी म्हटलं” रेवती, बॅगलोर मानवलं तुला..एकदम छान दिसतेस”

“हॊ ना.. मस्त वातावरण आहे तिथलं…. बस हं मी चहा ठेवते..”

“चहा बिहा नको.. बस आपण गप्पा मारू…”

आम्ही गप्पा करीत बसलो.. ती मुलाचं, सुनेचं, नातवाचं फार कौतुक करीत होती…

मी म्हटलं,” नशीबवान आहेस तु.. इतकी छान सून मिळाली”

ती हसली आणि थोडं थांबून म्हणाली, “हे बघ, नशीबवान वगैरे काही नसतं..जेव्हा मी तीथे शिफ्ट व्हायचं ठरवलं तेव्हाच आपल्या मनाला बजावलं , “त्या घरात आपलं स्थान दुय्यम.. ते तिचं घर.. त्यामुळे सगळे निर्णय तिचे. अजिबात लुडबुड करायची नाही.लागली ती मदत करायची आणि आनंदी राहायचं “

तीथे सगळ्या कामाला बाई आहे.. स्वयंपाक माझी सून घरी करते.. मी तिला सरळ सांगतिले, “तु सगळा स्वयंपाक कर. पोळ्या मी करणार..तिचं आटोपलं की मी पोळ्या करते आणि ओटा आवरते. तेवढीच तिला मदत आणि स्वयंपाकात लुडबुडही नाही.

तशा तर अनेक गोष्टी मला नाही पटत.. जसं मुलांच्या बाबतीत.. पण त्यांची मुलं. त्यांना ज्या पद्धतीने वागवायची हा त्यांचा प्रश्न…

अगं,तीन वर्षांच्या मुलीला वेगळ्या खोलीत झोपवते.सी सी टी व्ही लावलाय.. मधे मधे उठून तिच्यावर लक्ष ठेवत असते…. मी म्हटलं अगं, तिलाही भीती वाटते आणि तुझी पण नीट झोप होत नाही.. त्यापेक्षा आमच्यासोबत झोपावं तिला…तर नाही म्हणतात.तिला एकटं झोपायची सवय लावयाला हवी म्हणते .

अगं, फक्त रविवारी ती आमच्यासोबत झोपते… इतकी गळ्यात पडते ना.. म्हणते आजी, मला रोजच तुझ्यासोबत झोपायचं.. इतकं वाईट वाटतं ना..पण मनात विचार करते त्यांची मुलगी.. कसे संस्कार करायचे हा त्यांचा प्रश्न…मग मी नातीलाच समजावते.. तुला ब्रेव्ह गर्ल व्हायचं आहे ना? मग आई बाबांचं ऐकायचं…

हे एक उदाहरण झालं..अशा अनेक गोष्टी खटकतात…पण आता मी अजिबात लक्ष देत नाही…

आमच्याशी दोघेही छानच वागतात.सून अगदी आपलेपणाने, प्रेमाने वागते.मग आपल्याला आणखी काय हवं?

खरंय गं.. त्यांचा संसार.. आपल्याला काय करायचं.. असं मी म्हटलं आणि मला रेवतीचे तिचं लग्न झाले तेव्हाचे बोलणे आठवले. ती सासुसासऱ्यांसोबत राहत असे .. तेव्हा असच बोलतांना म्हणाली होती, “या घरात माझं दुय्यम स्थान.. प्रथम स्थान सासूबाईचं..त्यांच्या संसारात मी प्रवेश केला.. त्यांच्या घरात राहते तेव्हा त्यांच्या कलाने घ्यावं लागतं”

माझं लक्ष नाही पाहून रेवती म्हणाली, काय गं, काय झालं?

“काही नाही… हे असं दुय्यम स्थान असणारी आपली शेवटची पिढी असणार….आधी सासू अग्रस्थानी आता सून “

ती हसत म्हणाली, घरातल्या स्थानाचं काय घेऊन बसलीस हृदयातील स्थान अग्रस्थानी असावं. मी सासूबाईच्या हृदयात अग्रस्थानी होते आणि  आता सुनेच्याही हृदयात अग्रस्थानी आहे…. आणखी काय हवे!

खरंच.. रेवती दुय्यम स्थान पण किती आनंदाने एन्जॉय करीत होती.. असं वागणं सगळ्यांच जमलं तर?

© सुश्री अर्चना अनंत 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चकवा…. लेखक -अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  चकवा…. लेखक -अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

माझे वडील त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतः च जात होते. रात्रीची वेळ.त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता.वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते.तिथल्या तिथच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेंव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले.

‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून.

आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्या पलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. 

पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…

खरेदीचा चकवा आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी,त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं.माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले, मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले.सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान  बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला.बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.

मोबाईल हा दुसरा चकवा

एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा

तर सगळ्यांत वाईट.ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंड, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्या ठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.

झोप हा तिसरा चकवा

पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही.इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच म्हणून चकव्यात समजा.

टीव्ही… चा चकवा 

इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल, इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास! 

चकवाय स्वाहा!

Sale हा तर सगळ्यात फसवा चकवा.

अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्या शिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे. 

क्रेडिट कार्ड हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार.

केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाही ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.

हॉटेलिंगचा चकवा

नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं, स्टाटर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं, उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? 

चढाओढ, ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे. 

हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे.

किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा, कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.

विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ? 

ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?

फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही. 

इथे चकव्यात अडकणारे पण आपण आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे किंवा किती गोष्टी गमवायच्या हे आपल्यालाच ठरवावे लागेल.

— लेखक: अज्ञात.—- त्याला मनोमन नमन!

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक जुलै – डाक्टर्स डे ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी ☆

? विविधा ?

एक जुलै – डाक्टर्स डे ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी  ☆

वैद्यकीय व्यवसायातील योगदानातील कामगिरीमुळे आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (भारतात) 1991 पासून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय यांनी वैद्यकीय व्यवसायात केलेल्या अद्वितीय व संस्मरणीय कामगिरीमुळे हा दिवस निवडण्यात आला.

त्यांचा जन्म 1 जुलै व देवाज्ञाही 1 जुलै रोजीच झाली हा मोठा विचित्र योगायोग.

सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वीचे दिवस आठवले तर अस लक्षात येते की…..

“पडू आजारी मौज वाटे ही भारी”…..वाटत असे किंवा विषमज्वर झालेल्या मुलांच्या  घरातील सारी मंडळी, रात्रीच्या रात्री जागून काढत असत.ताप उतरला की सर्वजण सुटकेचा निश्वास सोडत असत.

त्या साठी नवस, देवऋषी, मंत्र तंत्र, उतारा टाकणं सर्व कांही होत असे.

ही वस्तुस्थिती सर्व खेड्यांमधून असे.

काळ थोडा पुढे गेला.

खेड्यांमधून अधुन मधून डाॅक्टर येत असत पण सर्वांना डाक्टरांनी सुई टोचलीकी बरे वाटलच पाहिजे असा दृढ विश्वास असे.

तर सर्वसाधारणपणे डाक्टर त्यांचे साठी  देव होते.

शहरात परिस्थिती थोडी निराळी होती.हंss चल जीभ दाखव ,पोट तपासून पाहतो व कांही नाही पळ; बरोबरच आतूनच कंपांउंडरला कांहीतरी सांगत.तत्परतेने औषधी पुड्या व बाटलीतून (डोसचे कागदी लेबल डकवलेल्या) गोड गुलाबी पातळ औषध दिवसातून अमूक वेळा घे म्हणून सांगत असत.पैसे लिहून ठेवले जात.

अर्थातच दुखणे कोठल्या कोठे पळून जाई. इथपर्यंत फॕमिली डाक्टरच सर्व आजारांवर औषध तर देत असतच पण घरगुती अडचणींवर सल्लाही देत असत.

नंतर नंतर नवीन स्पेशालीटी निर्माण होत गेल्या .निदानासाठी नवनव्या सोयी उपलब्ध होत गेल्या. औषध देण्याची पध्दत बदलली.वेळेवर झालेल्या निदान व औषधे या मुळे मानवी जीवन अधिक चांगले सुखकर होऊन आयुर्मान वाढले. परंतु उपचारही महाग होत गेले .त्या बरोबर फॕमिली डाक्टर्स  ऐतिहासिक झाले.

रूग्ण व डाक्टर यांचा सुसंवाद होत राहीला पाहीजे.

एक जुलै डाक्टर दिना निमीत्त सर्व *डाकदर बाबूंना * हार्दिक शुभेच्छा

© डाॅ.ए.पी.कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पर्शाचं महाभारत !…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ स्पर्शाचं महाभारत !…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?…आठवते का.??

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका..! अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं त्यात.. नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. 

शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा `आपलं माणूस ` हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!

नाना आणि सुमीत राघवन.. त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमीतला बोलता-बोलता विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतास.? कधी आऊटिंगला ? बाहेर जेवायला.?”—- सुमीत गप्प…इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमीतला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?” — आणि अंगावर सरसरून काटा आला.. नाना पुढे म्हणतात —“ एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे “स्पर्श” करत नाही ही साधी गोष्ट नाही, हा तर पुढचा कहर..”

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो,  पण खरंच स्पर्श टाळतो का?— आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो ? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण ?

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

लहानशी गोष्ट—स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय ?–आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो? 

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात..!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळी… आधी पाडव्याला आईने.., भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श—-तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला. 

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित —–

ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श.,

लग्नात लज्जाहोमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात.. मायने ओथंबलेले असतात.  कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात —  पण ते बोलतात—

पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

स्पर्श रेशमी असतात—जाडेभरडे असतात— पण आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

आज माझी आई सत्तरीच्या  पुढे आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते–“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत

कितीतरी देवाण-घेवाण करते..

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बात  दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही परिचयाची, भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा..

का असेल स्पर्श महत्त्वाचा?— 

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात.. आणि हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..? 

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “ शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला? ”

लक्षातच येत नाही आपल्या —हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत.. ती आपली गोष्ट सांगत राहतात . कुठे तरी, कोणाचे तरी, हात ताटकळतात.. 

डोक्यावरून फिरण्यासाठी. कुणाचेतरी तळवे कोमेजून जातात – तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून—-

पण वेळ नसतो ना आपल्याकडे. पैसा असतो. टीव्ही असतो. गाड्या, घोडे सगळ काही आहे. पण — 

पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “ जेवलीस का गं ? ” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण..

“वेळ हरवला तरी चालेल, पण स्पर्श जपले पाहिजेत हो”

स्पर्श भावनेचा झरा सतत वाहू द्या.., त्याला अडवू नका आणि आटवू तर नकाच —-

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares