मराठी साहित्य – विविधा ☆ वेध लागले श्रावणाचे… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ वेध लागले श्रावणाचे… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

श्रावणातले दिवसच हिरवे हसरे सुखद!! या श्रावण महिन्याला एक सुगंध आहे.. जाई जुई मोगर्‍याचा दरवळ आहे. सभोवताली दाट हिरवळ आहे. शिवारात पीकांचा डौल आहे.फुटणार्‍या कणसांचा परिमळ आहे. सृष्टी कशी तृप्त तजेलदार आहे. पावसांच्या सरींची शीतल, आनंददायी बरसात आहे. सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि एक प्रकारची प्रसन्न व्यस्तता आहे.. नेमाने येणार्‍या या श्रावणाची इंद्रधनु रुपे मनांत कशी साठलेली आहेत.

श्रावण महिना म्हणजे सणांचा सोहळाच. घराघरात हे पारंपारिक साजरेपण सजते.पारंपारिक पदार्थांचांही  सुगंध वातावरणात भरुन असतो..

खरोखरच श्रावणमासी सुगंधाच्या राशी…

नवविवाहीतांसाठी श्रावणी सोमवारची शिवामूठ, मंगळवारची मंगळागौर .. त्यानिमीत्ताने नटणे मुरडणे.. ठेवणीतल्या पैठण्या आणि अलंकारांचा साज…

श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे सौंदर्याचा, पावित्र्य, मांगल्याचाच वर्षाव..

श्रावणातले सणही किती अर्थपूर्ण!! नागपंचमीच्या नागपूजेतून  सृष्टीच्या चराचराला एक आदराचे स्थान देण्याचीच भावना असते. बहिणभावांच्या प्रेमाचे रक्षाबंधन… कोळी आणि समुद्राचे अतूट नाते सांगणारी नारळी पौर्णीमा. उधाणलेल्या दर्यात नारळ टाकून त्याला पूजण्याचा संकेत किती भावपूर्ण आहे…

सण आणि निसर्ग यांचा भावपूर्ण मेळ साधणारा.. गोकुळअष्टमीच्या गोविंदाइतकं गोजीरवाणं

तर अद्वितीयच!! तो डाळींबाचे दाणे घालून नारळ पोह्यांचा प्रसादकाला … त्याची चवच न्यारी.खरं म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणजे मातृदिनच. सुरेख आकाराचे पीठाचे दिवे पेटवून माता मुलांना दीपदान देते. त्यांच्या उजळ भविष्यासाठी प्रार्थना करते…

श्रावणातला अत्यंत कृतज्ञतेचा दिवस म्हणजे बैलपोळा..

घराघरात खीर पुरणाचा बेत घडतो. ढवळे पवळे नटतात. सजतात, रंगतात.

बळीराजाची अर्धांगिनी त्यांच्या मुखी औक्षण करुन प्रेमाचा घास भरवते….

खरोखरच श्रावण महिना म्हणजे प्रेम कृतज्ञता..

श्रावण महिना म्हणजे मांगल्य ‘पावित्र्य…

आनदाचे डोही आनंदाचेच तरंग… सौंदर्याचा अजोड अविष्कार…

आषाढ सरतो आणि श्रावण येतो..

सृष्टी नटते. अवखळ झर्‍यांचा नाद घुमतो.

डोंगर माथे ढगांशी गुजगोष्टी करतात.

भिजल्या घरट्यात पक्षी कुचकुचतात..

रानफुले आनंदे डुलतात…

सप्तरंगांची उधळणच होते….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावण…. ले . – कविता ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  श्रावण…. ले . – कविता ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर .. ‘ दिव्याची आवस ‘ म्हणून जाड कणिक आणि केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप… म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल !!

डबाभर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पूड, उपासाची भाजणी, राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!

जिवतीचा फोटो, कहाण्यांचे पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा- आघाडा- फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन !!

श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!

श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण, म्हणून आई वहिनीकडे झालेलं सवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!

श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं, धूप- अगरबत्ती- दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण- जाई- जुई- तगर- जास्वंद- बेल- दुर्वा- पत्री- तुळस- यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!

श्रावण म्हणजे हिरवा ऋतू  .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसात जुईचा गजरा, पायीच्या जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा  श्रावण !!

श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध..  तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल… श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण..  तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खाऊ घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यात समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप….  

श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

ले . – कविता

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कीर्तनाचा महिमा….अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कीर्तनाचा महिमा…. अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

साधारणपणे   ८२- ८३ च्या सुमारास, भिंद्रानवाले पंजाबात आक्रमक होत असताना देशभरात खळबळ माजली होती. त्यावेळी पुण्यात  श्रीमती मंजुश्री खाडिलकर या कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध होत्या. सुप्रसिद्ध गायक श्री त्यागराज यांच्या त्या मातोश्री. पंजाबात जाऊन भिंद्रानवालेला भेटून कीर्तनाच्या माध्यमातून त्याला देशद्रोहापासून परावृत्त करायचे असा एक कार्यक्रम पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने करायचा ठरवला. त्याकरता मंजुश्रीताईंना विचारण्यात आले. साथीला ज्ञान प्रबोधिनीतीलच काही मुलींना तयार केले होते. मुळात असा विचार करणे, ह्या सर्व स्त्रियांनी तिथे जाणे, हे त्यावेळी अत्यंत धाडसाचे होते, म्हणूनच इतकी चर्चा. 

आता पंजाबमध्ये जायचे म्हणजे किमान हिंदीतून कीर्तन करावे लागणार होते, त्यामुळे त्याची आधी तयारी करावी लागली. श्री गुरूवाणीमध्ये संत श्री नामदेव महाराज यांची अनेक भजने समाविष्ट आहेत त्यातील निवडक शब्द प्रॅक्टिससाठी घेऊन कीर्तने पुण्यात बसविली व तयार केली.

सगळ्या जणी पंजाबात गेल्या. भिंद्रानवालेला शोधण्यात व भेटण्यात खूप दिवस लागले.कारण सरकार त्याच्या मागावर असल्याने तो सतत मुक्काम बदलायचा. तरी नेटाने प्रयत्न करून त्याला गाठून निरोप दिला की आम्ही पुण्याहून आलोय. श्री नामदेवांचे शब्दकीर्तन तुमच्या समोर करायचे आहे.

तो पर्यंत पंजाबात जिथे शक्य होते तिथे त्यांनी आपले कीर्तन सादर केले. 

अखेर भिंद्रनवालेने कीर्तन सादर करायची परवानगी दिली. कडेकोट बंदोबस्तात हत्यारधाऱ्यांच्या समक्ष हा कार्यक्रम सुरु झाला. आईच्याच शब्दात सांगायचे तर हाडे थिजवणारे वातावरण होते.  

श्रीमती मंजुश्री खाडिलकर ह्यांनी कीर्तन सुरु केले व ज्या क्षणी नामदेवांचा अभंग म्हटला, त्याक्षणी त्याने त्याचे उच्चासन सोडले व श्रीमती खाडिलकरांच्या चरणी नतमस्तक झाला. अक्षरशः त्यांचे चरण पकडले त्याने ! 

त्या याच क्षणाची वाट पहात होत्या. त्यांनी भारतात शांती, एकत्व व सार्वभौमत्व राखण्याचे आणि  सलोखा राखण्याचे आवाहन त्याला केले. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता. मान खाली घालून गुडघे टेकून जमिनीवर बसलेल्या त्याने परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असल्याचे हतबलतेने सांगितले.

पण काम फत्ते झाले ! कारण त्याचे देशद्रोहाचे अवसान त्याच्या अंतर्मनातून गळून पडले ते कायमचेच. नंतर चकमकी झाल्या पण त्याचे अंतर्मन साथ देत नसल्याने त्याचा शेवटी पराजयच झाला. 

गायन कीर्तन कलेवर असामान्य प्रभुत्व असलेल्या, परप्रांतात जाऊन कलेचा प्रभाव पाडून भिंद्रानवालेचे  अवसान घालवणाऱ्या , शूर, धडाडीच्या व देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असणाऱ्या  कीर्तनकार आदरणीय श्रीमती मंजुश्री खाडिलकर व हा कार्यक्रम आखणारा ज्ञानप्रबोधिनीचा स्टाफ व विद्यार्थिनी व इतर  सर्व  यांना शतश: प्रणाम…

(ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने मुळात हा लेख लिहिला त्यांचेही आभार. )

(नटराज खाडीलकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)  

 – अज्ञात 

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अण्णाभाऊ साठे….साहित्यरत्न.! ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

? विविधा ?

☆ अण्णाभाऊ साठे….साहित्यरत्न.! ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाटेगावी जन्मले.त्यांचा जन्म १ /८/ १९२० साली झाला.

त्यांचे खरे नाव तुकाराम होते. पण टोपण नावाने त्यांना गावातील लोक अण्णा म्हणून हाक मारत.  शाळेत फक्त दिड दिवस गेले तरी ते साहित्यिक सम्राट ठरले. त्यांनी अनेक पोवाडे रचले.ते मजूरवर्गावरील अन्याय सहन करू शकले नाहीत.

   कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केले. वडिलांसोबत मुंबई ला येऊन छोटी मोठी काम केली. त्यांना गिरणीत झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तेव्हा मजुरांचे कष्टप्रद जीवन जवळून अनुभवले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेते काॅम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. तमाशा फडात सुध्दा चुलत भावा बरोबर काम केले.

  लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची निरिक्षण शक्ति जबरदस्त होती.

नेत्यांची भाषणे ऐकून त्यांनी अनेक कथा कांदबऱ्यां लिहिल्या आहेत. आत्मियतेने ते त्यांचे विचार लेखणीतून उतरवत होते.  ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे त्यांना वाटे.

त्यांच्या कथा-कादंबऱ्याचे भारतातच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. जेव्हा ते रशियाला गेली तेव्हा

त्यांनी लिहिलेला १९६१ साली प्रवासवर्णन रशियाचा प्रवास अनुभवावर आधारित होता. नंतर मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले.

विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.*

असे साहित्य रत्न अण्णाभाऊ यांनी १८ /७/१९६९ मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

साहित्यरत्न, साहित्य शिरोमणी अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा…… !!

© सौ. रोहिणी अमोल पराडकर

कोल्हापूर  

भ्रमणध्वनी – 8208890678

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ सिलोन…भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ सिलोन…भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)  

Source: Radio Ceylon – Wikiwand

या रेडिओचा इतिहासही मोठा गमतीदार आहे. सिलोन म्हणजे आजचे श्रीलंका.  भारताच्या दक्षिणेला असलेल्या या  देशातही इंग्रजांची सत्ता होती. द्वितीय महायुद्धा्त हिंदमहासागरात नौदलाला संदेशवहनात  मदत व्हावी म्हणून ब्रिटिश शासनाने दि. १६ डिसेंबर १९२५ ला कोलंबो येथे सिलोन रेडिओची स्थापना केली . पुढे संन १९४९ ला सिलोनला स्वातंत्र्य मिळाले व सिलोन सरकारला या  रेडिओचे हस्तांतरण झाले. पुढचा १९७५ पर्यंतचा काळ या रेडिओने अक्षरशः गाजवला. एकूण बारा भाषेत या रेडिओचे प्रसारण व्हायचे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगला देश ,नेपाल, व जवळपास सर्व दक्षिण आशियाई देशात सिलोन रेडिओची फ्रिक्वेंसी पोहोचत होती. मनोहर महाजन, अमीन सयानी, गोपाळ शर्मा,  के .एस. राजा, माई लोईलगम्म ही रेडिओ उदघोषकांची नावे लोकांना परिचित झाली होती. सन १९७२ ला सिलोन रेडिओचे नाव बदलून श्रीलंका झाले व   ‘ये श्रीलंका ब्राडकास्टींग कारपोरेशन का विदेश विभाग है” हे वाक्य प्रसारित होऊ लागले. या रेडिओच्या लोकप्रियतेचा कळस म्हणजे, “बिनाका गीतमाला” हा कार्यक्रम होय. बिनाका ही टूथपेस्ट निर्माण करणारी कंपनी होती. नवीन चित्रपटाच्या गीतांच्या रेकॉर्ड (तबकड्या) एच. एम . व्ही. सारख्या कंपन्या निर्माण करायच्या. कोणत्या नवीन चित्रपटांच्या किती रेकॉर्ड विकल्या गेल्या यावरून त्या गीतांची लोकप्रियता ठरविली जायची. व अश्या १३ गीतांची निवड करून हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा.सर्वात लोकप्रिय गीत सर्वात शेवटी लावले जायचे. दर बुधवारला रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण व्हायचे. उदघोषक अमिन सयानी हे या कार्यक्रमाचे आत्मा होते. त्यांची बोलण्याची व सादरीकरणाची पद्धती एवढी लोकप्रिय की पुढे अनेक ऑर्केस्ट्रा उदघोषक त्यांचीच पद्धत वापरायचे. या कार्यक्रमामुळे हिंदी सिनेमाला आपल्या गीतांची लोकप्रियता वाढविण्यात व सोबत प्रेक्षकही वाढविण्यास खूप मदत झाली. पुढे या कार्यक्रमाचे नाव बदलून सिबाका गीतमाला झाले, पण  हा कार्यक्रम पुढे बंद झाला. अनेक चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या रेडिओचा उपयोग करीत असत. चित्रपटाचे पंधरा मिनिटांचे रेडिओ प्रोग्राम प्रसारित व्हायचे.  त्यात गीतांचे अंश, चित्रपटाचे संवाद आणि कथानकाचा काही भाग यांचा उपयोग करून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित केले जात असे.

असा हा सिलोन रेडिओ सन १९७५ नंतर लोकप्रियतेच्या ओहोटीस लागला. विविध भारतीची स्थापना, त्याची स्पष्ट प्रसारण सेवा, श्रीलंका रेडिओची  ढासळलेली आर्थिक स्थिती, टेप रेकॉर्डरची उपलब्धता, दूरचित्रवाणी या सर्व कारणांमुळे  रेडिओ श्रीलंका मागे पडली. आज ती केवळ यू ट्यूब पुरती मर्यादित झाली आहे. पण आज साठी सत्तरीच्या वयात असलेली मंडळी रेडिओ सिलोनला कधीही विसरू शकत नाहीत हे तेवढेच सत्य आहे.

समाप्त — 

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती फुलराणी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ती फुलराणी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

काही माणसं जगावेगळी असतात. त्यांना भेटलं की मन एकदम उल्हसित होतं. कामाप्रती असलेला त्यांचा ध्यास थक्क करतो. ठाण्यातल्या ८० वर्षांच्या मालती मेहेंदळे अर्थात मेहेंदळेआजी हेही असंच एक व्यक्तिमत्व.

लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला. त्यामुळे सर्वसामान्य मुलीसारखं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंच नाही. अपघाताच्या खुणांमुळे त्या आत्मविश्वास हरवून बसल्या आणि त्यातच त्यांचं बालपणही हरवलं. त्यांनी आपल्या आयुष्याच्या सीमा आखून घेतल्या. इतरांमध्ये मिसळणं त्या जणू विसरूनच गेल्या. कशीतरी शाळा पार पडली. अर्थात शाळेत असताना त्यांनी धावणे, गोळाफेक, दोरीच्या उड्या अशा ज्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यात पहिला नंबरच मिळवला. कॉलेजजीवनही त्यांना फारसं मानवलं नाही. त्यामुळे शिक्षणाची गाडी तिथेच थांबली.

एकदा भावाने त्यांच्यासाठी कागदी फुलं कशी बनवावीत हे दाखवणारं एक पुस्तक आणि काही कागद आणले. पुस्तक इंग्रजीत होतं आणि त्या भाषेशी त्यांची केवळ तोंडओळखच होती. माळ्यावरच्या एका रिकाम्या खोलीत त्यांनी कागदी फुलं बनवायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्य बहरून गेलं.

कालांतराने त्यांचं लग्न झालं आणि त्या रोह्यावरून मुंबईतल्या पार्ल्यात आल्या. दोन मुली झाल्या आणि काही वर्षांनी पती अचानक वारले. त्या पुन्हा माहेरी आल्या. नंतर त्यांचा पुनर्विवाह होऊन मेहेंदळे बनून त्या ठाण्यात आल्या. चांगले दिवस सुरू झाले. त्यांचे यजमान स्वभावाने खूप चांगले होते. मधल्या काळात त्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्या. ‘जीवनज्योती’ या पतपेढीच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. आजींनी या संस्थेसाठी बरीच वर्षं काम केलं.

मेहेंदळेकाका अचानक गेल्यावर आजी परत फुलं बनवू लागल्या. अचानक कोणीतरी त्यांना सांगितलं की या फुलांचं आपण प्रदर्शन भरवू या. प्रदर्शन भरवण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे फुलं बनवायला येणाऱ्या मुलींनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि प्रदर्शन पार पडलं. एवढी सुंदर आणि जिवंत फुलं पाहून ती कागदी आहेत यावर कोणाचा विश्वासच बसेना. प्रदर्शन अत्यंत यशस्वी झालं. आजी मनातून खूप आनंदी झाल्या. जवळ जवळ पन्नास वर्षं जोपासलेल्या छंदाचं सार्थक झालं. मग मात्र आजींनी मागे वळून बघितलं नाही. नंतर एल अॅण्ड टी या कंपनीसाठीही त्यांनी प्रदर्शन भरवलं. तुर्भेच्या टी.आय.एफ.आर. या प्रतिष्ठित संस्थेने आजींच्या फुलांचं प्रदर्शन आयोजित केलं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजींचं खूप कौतुक केलं. मधल्या काळात फुलं बनवायला शिकण्यासाठी मेहेंदळेआजींकडे तरुण मुलींचा ओघ सुरू झाला. त्यांचा क्लास खूप लोकप्रिय झाला.

आजी नंतर अमेरिकेला गेल्या , भारतभर फिरल्या. सगळीकडची फुलं बघितली आणि घरी येऊन त्यांनी ती साकारली. आजी फक्त क्रेप पेपरचीच फुलं बनवतात. वेगवेगळ्या रंगाचे, छटांचे क्रेप पेपर शोधत असतात. क्वचितप्रसंगी त्या रंग वापरतात. कृष्णकमळ आणि बकुळ ही दोन फुलं बनवणं आव्हानात्मक आहे, असं त्या सांगतात. आज आजींना त्यांच्या या छंदामुळे अजिबात वेळ नाही. त्या एकट्या राहत असल्या तरी त्या एकट्या कधीच नसतात. परिस्थिती टोकाची प्रतिकूल असतानाही सुंदर जगावं कसं हे मेहेंदळेआजींकडे बघून सहज कळतं.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ स्वार्थ आणि परमार्थ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 स्वार्थ आणि परमार्थ ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“आई, हे घ्या गरमा गरम कांदा पोहे !”

“दिसतायत तरी बरे, पण चव कशी असेल कुणास ठाऊक !”

“आता ते खाल्ल्यावरच कळेल नां ?”

“ते बरीक खरं हॊ सुनबाई, पण हे गं काय ?”

“काय आई ?”

“तू आज दुपारी जेवणार नाहीस वाटतं ?”

“जेवणार तर ! आता घरातली सगळी कामं मी एकटीने एकहाती करायची म्हणजे अंगात ताकद नको का माझ्या ?”

“झालं तुझं पालूपद पुन्हा सुरु !”

“यात कसलं आलंय पालूपद ? मी घरातली सगळी कामं एकटीने करत्ये हे खरं की नाही ?”

“खरं आहे !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण नंतर तू लगेच, ‘आपण आता कामाला बाई ठेवूया का? हेच विचारणार नां ?”

“अ sss य्या ! तुम्हीं खरंच मनकवड्या आहात अगदी आई !”

“उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस !”

“ते मला या जन्मी तरी शक्य होईल असं वाटत नाही बाई !”

“म्हणजे ?”

“अहो आई, आता तुम्हांला त्या हरभऱ्याच्या झाडावर चढवायच म्हणजे, तुमचं नव्वद किलोच्या आसपास असलेलं वजन मला आधी उचलता तरी यायला हवं नां ?”

“कर्म माझं !”

“नाही आई, मी तुमच्या वजना बद्दल बोलत्ये नां ? म्हणून तुम्ही ‘वजन माझं’ असं म्हणा, ‘कर्म माझं’ असं नका म्हणू बाई !”

“कळली तुझी अक्कल ! कुठल्या शाळेत होतीस गं शिकायला लहानपणी ?”

“अतिचिकित्सक विद्यालय, ठोंबे बुद्रुक, बोंबे वाडी, जिल्हा रत्नागिरी.”

“तरीच सगळी बोंबा बोंब आहे !”

“मला नाही कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे ते ?”

“ते मरू दे गं ! मला आधी सांग मगाशी मी तुला विचारलं, तू आज दुपारी जेवणार आहेस का नाहीस, त्याच उत्तर दे मला आधी !”

“बघा म्हणजे कमलाच झाली तुमची !”

“आता यात कसली आल्ये माझी कमाल सुनबाई ?”

“अहो त्या प्रश्नाला मी मगाशीच उत्तर नाही का दिलं, हॊ जेवणार आहे म्हणून. पण असं का विचारताय तुम्ही आई ?”

“अगं म्हणजे असं बघ, मला नाष्ट्याला ताटलीत फक्त कांदापोहे दिलेस आणि स्वतः ताटात कांदा पोह्या बरोबर चार पोळ्या, भाजी, आमटी, वाटीभर भात आणि स्वीट डिश म्हणून दोन बेसन लाडू घेवून आल्येस नां, म्हणून म्हटलं दुपारी जेवणार आहेस का नाही म्हणून !”

“अहो आई त्याच काय आहे नां, माझं डाएट चालू झालं आहे नां आजपासून. त्यामुळे मला वजन कमी करण्यासाठी आता रोज सकाळी, सकाळी असा हेवी ब्रेकफास्ट करणं अगदी अनिवार्य आहे बघा !”

“हे कुणी सांगितलं तुला ?”

“माझ्या डाएटीशन देखणे मॅडमनी !”

“अगं पण त्यांच नांव तर दिवेकर मॅडम नां ?”

“नाही हॊ, त्या वेगळ्या आणि त्यांची फी कुठे आपल्याला परवडायला ! त्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या !”

“सुनबाई तुला एक सुचवू का ?”

“बोला नां आई !”

“तुझ्या त्या देखणे मॅडमकडे तुझ्या बरोबर माझं पण नांव नोंदव नां गं !”

“कशाला आई ?”

“अगं मगाशी बोलता बोलता तूच नाही का म्हणालीस, माझं वजन नव्वद किलो आहे म्हणून ?”

“हॊ, म्हणजे मी तसं अंदाजे म्हणाले खरं, पण तुम्ही वजन काट्यावर चढलात तर एखादं वेळेस ते एकोणनव्वद सुद्धा भरेल ! काही सांगता येतं नाही.”

“आता माझी खात्रीच पटली बघ सुनबाई !”

“कसली खात्री आई ?”

“तुझ्या त्या अति चिकित्सक शाळेचं नांव चांगलंच रोशन करत्येस तू याची !”

“मग, होतीच आमची शाळा तशी फेमस त्या वेळेस !”

” क ss ळ ss लं ! आता तुझ्या बरोबर माझं पण नांव त्या देखणेबाईकडे रजिस्टर कर. मला पण माझं वजन कमी करायच आहे, तुझ्या सारखा असा हेवी ब्रेकफास्ट करून !”

“कशाला आई ?”

“अगं मला पण वाटत नां की आपलं वजन कमी करावं म्हणून, म्हणजे तुला, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताना उगाच त्रास नको व्हायला !”

“जाऊ दे आई, तुम्ही आता गरमा गरम कांदे पोहे खा आणि मला सांगा कसे झालेत ते !”

“एका अटीवर कांदे पोहे खाईन सुनबाई.”

“कोणत्या अटीवर आई ?”

“तुझं हे डाएट बीएटच खुळं डोक्यातून काढून टाक !”

“मग माझं वजन कमी कसं होणार  आई ?”

“माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे सुनबाई !”

“कोणता उपाय आई ?”

“आज विलास ऑफिस मधून आला की त्याला म्हणावं पन्नास किलो बासमती तांदुळाची ऑर्डर दे वाण्याला !”

“पन्नास किलो बासमती तांदूळ ? अहो पण आई ह्या एवढ्या तांदुळाच करायच काय ?”

“तुला आणि मला वजन कमी करायच आहे नां ?”

“अहो हॊ आई, पण त्याचा आणि पन्नास किलो बासमती तांदुळाचा संबंध काय ?”

“सांगते आणि तुझ्या बाबुला सांग तांदुळाची ऑर्डर देवून झाली, की ते माळ्यावर टाकलेलं जुनं दगडी जात सुद्धा खाली काढून ठेवं म्हणाव !”

“कशाला आई ?”

“अगं आता थोडयाच दिवसात बाप्पा येणार, घरोघरी मोदकांचे बेत आखलेले असणार, हॊ की नाही ?”

“बरोबर !”

“तर आपण दोघींनी काय करायच, त्या सगळ्या बासमतीच्या तांदुळाची मोदकाची मस्तपैकी पिठी करायची आणि….”

“विकायची, हॊ नां ?”

“अजिबात नाही !”

“मग काय करायच काय त्या एवढ्या सगळ्या तांदूळ पिठाचं ?”

“अगं आपल्या सोसायटीच्या पंचवीस घरात प्रत्येकी अर्धा अर्धा किलो घरोघरी गणपतीत बनणाऱ्या  मोदकांच्यासाठी घरगुती पीठ आपल्या जात्यावर फुकट दळून द्यायचं ! काय कशी वाटली माझी आयडिया ?”

“कमाल केलीत तुम्ही आई ! मानलं तुम्हांला !”

© प्रमोद वामन वर्तक

०५-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ || जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? विविधा ?

☆|| जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(1) ‘गोरख’शिखर, ‘गुरु’शिखर  आणि ‘अंबा माता’ शिखर (घंटा) (उजवीकडून डावीकडे) (2) सोमनाथ मंदिर (समोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसत आहे)

गुजरातमधील ‘सोमनाथ’ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आणि ‘गिरनार’ हे दत्तात्रेयांचा वास असलेले जागृत गिरीस्थान हयापलीकडे मला दोन्हीबद्दल कणमात्रही माहिती नव्हती.  बरेच लोक तिकडे जाऊन आल्यावर त्यांच्याकडून काही माहिती कानी पडायची “खूप भारी आहे…” वगैरे.  पण ती तितक्याच त्वरेने एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने विसरून जायची. काही वर्षांपूर्वी माझी आई व आत्या ‘सोमनाथ’ला जाऊन आल्यामुळे तिकडील काही फोटो पहायला मिळाले होते. परंतु मी स्वत: कधी उठून तिकडे जाईन असे कधी वाटले नव्हते… तेही एप्रिलच्या रणरणत्या उन्हाळ्यात आणि तेही सुट्टीच्या सीजनला, रेल्वेची टिकीटे सर्व फुल्ल असताना आयत्या वेळेला बुकिंग करून…

पण म्हणतात ना, योग जर असेल तर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आमचेही थोडेफार असेच झाले. रेल्वेची प्रतीक्षा यादीत खोलवर असलेली तिकिटे अगदी आदल्या दिवशी RAC / CNF होत गेली आणि पाहतापाहता मित्र गणेश दाबक, धनंजय जोशी हयांसोबत मी बुधवार १३एप्रिल रोजी रात्रौ ८:३० च्या पुणे-अहमदाबाद रेल्वे मधून निघालो सुध्दा…

सकाळी ७:३० ला अहमदाबाद स्टेशन आल्यावर फलाटावरील स्टॉल वर ताजा ढोकळा, त्यावर गोडसर कढी, सामोसे आणि चहा असा चविष्ट नाष्टा झाला. तासाभराने जबलपूरहून आलेल्या ‘सोमनाथ’ च्या ट्रेन मध्ये बसलो. जूनागढ स्टेशन जवळ येत असतानाच आम्हाला गिरनार शिखरांचे “दुरून डोंगर साजरे” असे छान दर्शन झाले. आकाशात उंचचउंच घुसलेली शिखरे बघून खरे तर छाती दडपून गेली होती.

संध्याकाळी ६ वाजता सोमनाथला पोहोचलो.  छोट्या टुमदार रेल्वे स्टेशनातून रिक्षाने बाहेर पडल्यावर एक म्हातारा रिक्षावाला सामोरा आला. तो जरा नियम पळून सावकाश रिक्षा चालवेल ह्या विचाराने त्याच्याबरोबर बाहेर आलो. त्याची रिक्षाही जवळपास त्याच्याच वयाची होती. पण गियर टाकून सुरुवातीलाच बुवांनी मेन रोड वर ट्राफिकच्या उलट दिशेने रिक्षा वळवल्यावर आमच्या भुवया वर गेल्या. दहा मिनिटातच सोमनाथ मंदिराच्या मागील ‘कृष्णा’ हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो.

(1) सोमनाथचा समुद्रकिनारा व डाईक्स (2) १०,००० किमी समुद्र असल्याचे दर्शवणारा बाणस्तंभ

चहा-आंघोळ आवरून मंदिरात पोहोचेपर्यंत ‘सोमनाथा’ची आरती सुरू झाली होती. मोठ्या आवाजात ढोल लयबद्ध वाजत होते, त्यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.  शेवटीशेवटी द्रुत लयीत गजर होऊन आरती संपली.  संध्याकाळाचा छान समुद्री वारा खात आम्ही त्या विस्तीर्ण मंदिराभोवती एक फेरफटका मारला.  तिथेच आम्हाला ‘दिशादर्शक बाण’ पहायला मिळाला जो हिन्दी महासागरात १०००० किलोमीटर जमीन नसल्याचे दर्शवितो. गर्दी असूनही सगळीकडे निखालस स्वच्छता आणि चोख व्यवस्था होती.

आरतीनंतर मंदिरामागेच ‘लेजर शो’ झाला ज्याला दमदार commentary दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ह्यांची होती. पुराणकाळापासून ते सोन्याचांदी-हिरेमाणकाने मढवलेले सर्वात वैभवशाली मंदीर बनेपर्यंत पासून ते गझनीचा मुहम्मद व इतर मुघल आक्रमकांनी अनेकवेळा लुटलेले, ते आधुनिक काळापर्यंत पुनर्बांधणी करून सरदार पटेलांनी उभारलेले, असा सर्व चित्र-इतिहास जवळजवळ सहा-सात मजले उंच अशा त्या भव्य मंदिरावरच लेझर ने प्रोजेक्ट केलेला पाहणे आणि ऐकणे हा खूपच छान अद्भुत अनुभव होता…कुणीही चुकवू नये असा!

‘लेजर शो’ संपल्यावर आम्ही शंखांच्या दुकानात फिरायला गेलो. चांगल्या शंखांच्या किमती रु. १३००-१५०० च्या पुढेच होत्या. आत्ताच खरेदी केला आणि नंतर घरी रोजच्यारोज वाजवला नाही तर बायको शंख करेल, अशी एक भीतीही मनाला चाटून गेली. कधीकाळी दक्षिणेत ‘रामेश्वर’ला जाऊ तेव्हा सस्त्यात खरेदी करू, असे मनाशी ठरवून विचार रद्द केला. 

दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो आणि आवरून होटेलच्या मागेच असलेले अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मूळ दगडी शिवमंदीर पहायला गेलो. दर्शन घेऊन परत येताना छोट्या गल्लीमधील एका नाश्त्याच्या गाडीवर थांबून जिलेबी, ढोकळा, फाफडा असा फक्कड गुजराती नाश्ता केला.

हॉटेल मालकास एव्हाना सुपरिचित असलेल्या धनंजय जोशींनी (त्यांची ही २८ वी गिरनार भेट होती!) आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ठीक ११ वाजता ‘बाबू’ रिक्षावाला हॉटेलात हजर झाला.  आम्हा तिघांना घेऊन मग त्याने जवळपासच्या मंदिरांचा फेरफटका मारून आणला. त्यामध्ये ‘त्रिवेणी संगम’, ‘गोलकधाम मंदीर’, ‘सूर्य मंदीर, ‘हनुमान मंदीर, ‘श्रीराम मंदीर, ‘शशीमोचन महादेव’, ‘पाटण प्रभास’, ‘भालका तीर्थ’ ह्यांचा समावेश होता.

(1) ‘अंबा माता’ मंदिर (2) श्रीकृष्ण चरण पादुका (3) भालका तीर्थ (क्षमायाचक भिल्लास अभय देताना श्रीकृष्ण)

कपिला, हिरण आणि सरस्वती (लुप्त) ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घाट आहे आणि काही sea gull पक्षी उडत होते. ते सूर मारून तुमच्या हातातील खाऊ उचलून नेतात. त्यांना भरवण्यासाठी आम्ही बिस्किटेही घेतली पण उन्हे वाढली असल्याने पक्ष्यांनी आमच्याकडे चोचही न फिरवून सपशेल दुर्लक्ष केले. मग तिथल्याच एका धष्टपुष्ट गीर गाईला आम्ही बिस्किटे खिलवून टाकली.  

‘गोलकधाम मंदीर’ इथून हिरण नदीचे छान दर्शन घडते. इथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय कोरलेले आहेत. ह्यास्थानी भगवान श्रीकृष्णांनी मृगयेस आलेल्या भिल्लाच्या हातून स्वत:च्या पावलास तीर मारवून घेऊन आपला अवतार समाप्त केला, अशी आख्यायिका आहे. इथे त्यांच्या चरण पादुका आहेत. तसेच बंधू बलरामांनीही इथे आपला अवतार समाप्त केला असे मानतात. मागल्या बाजूस श्रीकृष्ण आणि बलराम यांचे पाळणाघरही बघायला मिळते.

इथून पुढे सूर्यमंदीर पाहून आलो. बर्‍यापैकी मोडकळीस आलेले दिसले. एकंदरीत सर्व जी मंदिरे होती ती पुराणकाळातील आख्यायिकांशी निगडीत आणि जुनी  होती. श्रीराम मंदीर आणि ‘भालका तीर्थ’ फक्त आधुनिक काळातील बांधलेले वाटले.  असो.

‘भालका तीर्थ’ इथून रिक्षा पळवली ती थेट सोमनाथ रेल्वे स्टेशन कडे. १२:३० च्या रेल्वे ने निघून अडीच तासांत आम्ही पोहोचलो ते जुनागढला. हॉटेल ‘मंगलम’ इथे छान गुजराती थाळी जेवून थोडा वेळ हॉटेल रूममध्ये विश्रांति घेतली. आमच्या हॉटेल रूममधून ‘उडनखटोला’ (मराठीत ‘रोप वे’) वर-खाली करताना दिसत होते. आम्हाला आता पुढील वेध लागले होते ते म्हणजे ‘गिरनार’चे चढाईचे…

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आम्ही हॉटेल लॉबीमध्ये जमलो. बाहेरच ट्रेकिंगसाठी काठ्या भाड्याने मिळाल्या. त्या घेऊन जवळच असलेल्या सुसज्ज अशा उडनखटोलाच्या तळस्थानकाला चालत पोहोचलो. मात्र तिथे सिक्युरिटीने आमच्या ब्यागांमधील पाण्याच्या सर्व बाटल्या काढून फेकून द्यायला लावल्या.  अर्थात आतमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत मिळत होत्या.J लवकरच उडनखटोलाच्या पाळण्यात बसून आम्ही झर्रकन निघालो. चांगल्यापैकी वेगाने खेचत वरवर जात होतो.  खालून पायर्‍यांचा मार्ग दिसत होता अर्थात ह्या वेळेस फारसे कुणी दिसले नाहीत.

साधारण दहा-बारा मिनीटातच आम्ही ‘अंबा माता’ मंदिरापाशी पोहोचलो. फारशी गर्दी नसल्याने छान दर्शन झाले. खाली जाणार्‍यांसाठी सहा वाजता पाळण्याची शेवटची फेरी असल्याचे स्पीकरवर ओरडून सांगत होते.

प्रथम पंक्ति (1) उडनखटोलेवाले राही (2) गोरख शिखरावरून दिसलेले गुरुशिखर, मागे लक्ष्मी शिखर, तळाशी धुनी आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र

द्वितीय पंक्ति (1) गुरुशिखर (2) चंद्र आहे साक्षीला (3) पुणेकर ‘गिरनारी’ कुटुंबीय

वीसपंचवीस मिनीटानी आम्ही पुढील म्हणजे ‘गोरख’ शिखराकडे निघालो. इथे वारा एकदम भन्नाट होता, त्यामुळे उकाडा अजिबात जाणवत नव्हता. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही तिथे पोहोचलो. गोरखनाथांचे वास्तव्य असल्याने ह्या स्थानाला विशेष महत्व आहे. इथे एक धुनी कायम प्रज्वलित असते. इथेच आम्हाला घोलप नावाचे चिंचवडला राहणारे एक भक्त भेटले. ते आले की तीन-तीन महीने इथे यात्रिकांच्या सेवेसाठी म्हणून शिखरावर वास्तव्याला असतात. बोलताबोलता त्यांनी ‘गुरुशिखरा’चा उल्लेख ‘हेडक्वार्टर’ असा केला ते विशेष वाटले.

पुढे गुरुशिखराकडे प्रयाण केले. ह्या पायर्‍या प्रथम खाली उतरून नेतात आणि मग गुरुशिखराकडे चढत नेतात. अर्थात इथेही एखाद्या गडावर बघायला मिळतो त्याप्रमाणे पायर्‍यांच्या कडेला भक्तमंडळींनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकून कचरा केलेला दिसत होताच. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली आणि पायर्‍यांच्या बाजूचे दिवे उजळल्याने पुढची मार्गक्रमणा सोपी झाली. शिवाय थोड्या वेळात पौर्णिमेचा चंद्र उगवल्याने शिखरे प्रकाशमान दिसू लागली.

 ‘गुरुशिखरा’पाशी पोहोचायला साधारण एक तास लागतो. सुदैवाने इथेही फारशी गर्दी नसल्याने ‘चरण पादुकां’चे पाच-एक मिनिटे शांत आणि पवित्र वातावरणात छान दर्शन घडले.  हा आमच्या यात्रेचा मिटल्या डोळ्यांनी आपले अस्तित्व विसरायला लावणारा, एक विलक्षण आनंदाची अनुभूती देणारा क्षण होता. मंदिरातील साधूने कपाळाला गंध लावल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो व पायर्‍या उतरायला लागलो.  तिथेच जगन्नाथपुरी वरून आलेले एक जटाधारी ‘चिलीम’ साधू भेटले. त्यांच्याशी आध्यात्मिक, राजकीय, रशिया-युक्रेन युध्द, पुरीचे मंदीर, भविष्य अशा विविध विषयांवर काही विलक्षण गप्पा झाल्या.

तिथून मग परतीच्या प्रवासास सुरुवात केली. तत्पूर्वी एक टप्पा पार करायचा होता तो म्हणजे ‘धुनी’.  ह्यासाठी मधूनच दुसरीकडे पायर्‍या उतरून जावे लागते. 

उतरायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या मागून कुणीतरी धडपडल्याचा आणि पाठोपाठ बायका ओरडल्याचा आवाज आला. वर जाऊन पहिले तर आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाई आणि त्यांची आठ-नऊ वर्षांची मुलगी अशा दोघी पाय सटकून चांगल्या दहा-बारा पायर्‍या गडगडत खाली आल्या होत्या. मुका मार चांगलाच लागला होता पण सुदैवाने कुणाला हाड फ्राक्चर वगैरे काही झाले नव्हते. त्यांना मग ‘धुनी’पर्यन्त उतरवले आणि तिथे थोडा प्रथमोपचार मिळाला.  धुनीचे दर्शन घेऊन मग तिथेच जेवण-वजा प्रसाद घेतला.  आता अंधारात परंतु दिव्यांच्या प्रकाशात परतीचा प्रवास करायचा होता तो ‘गोरख शिखर’ आणि नंतर ‘अंबा माता’ मंदिरांकडे.

गणेश आणि मी त्या मायलेकींना काठीचा आधार देत सर्वांच्या पुढे निघालो.  आणि बोलण्यामध्ये गुंतवत असे उतरवले की त्यांना वेदनेचा विसर पडावा. शक्यतो न थांबता उतरत राहिलो. गोरख शिखरापाशी पोहोचल्यावर एक चहावाला सर्वांना सेवा म्हणून चहा देत होता. आता उतरणार्यान्पेक्षा चढणार्‍यांची संख्या वाढू लागली होती. परंतु कुठेही गर्दी होत नव्हती की ढकलाढकलीही होत नव्हती. एकमेकांना “जय गिरनारी” असे प्रोत्साहन देत सर्वजण उत्साहात पायर्‍या चढत किंवा उतरत होते. वाटेत पाण्याचे बाटल्या, लिम्बू सरबत,चहा-कॉफी वगैरेंची दुकाने लागतात त्यामुळे थकावट दूर होत होती. वृद्ध, वयस्कर  मंडळींना पायर्‍या चढणे सोपे नव्हते पण तरीही निर्धाराने सर्वजण चालत होते. यात्रिक मंडळी बरीच मुंबई –पुण्याकडची असल्याने कानावर मराठीच जास्त पडत होते. मुंबईमधील एक दाम्पत्य त्यांच्या तरूण पण आंधळ्या मुलीला घेऊन आले होते. वडिलांच्या पाठीमागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती पायर्‍या उतरत होती.  मात्र उन्हामुळे व अतिश्रमामुळे कदाचित तिला पित्ताचा त्रास व्हायला लागला. दुकानासमोरच्या एका बाजेवर निजवल्यावर तिला बरे वाटले.

आम्हाला ‘अंबा माता’ मंदीरापासूनच्या  ५००० पायर्‍या उतरायला जवळपास चार तास (रात्रीचे १०:४० ते पहाटे २:४०) लागले.  पायाचे आणि पावलांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. संध्याकाळी हेच अंतर पाळण्यात बसून अगदी आरामात दहा मिनिटात चढून गेलो होतो.  होटेलात पोहोचलो तेव्हा कपडे घामाने चिंब ओले झाले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन असे काही गुडुप्प झोपलो की बस्स! J

दुसर्‍या दिवशी १२:३० वाजताची वेरावळ-पुणे गाडी पकडायची होती. तत्पूर्वी जुनागढ मध्ये गुजरातची प्रसिद्ध अशी बांधणीची कापडे घेण्यासाठी गावात खरेदीला जायचे ठरवले. अस्खलित गुजराती बोलू शकणारा गणेश बरोबर असल्यामुळेच आम्ही हा बेत ठरवला. ‘कापड खरेदी’ म्हटल्यावर जावा-नणंदांची जोडीही आमच्याबरोबर यायला तयार झाली. गणेशने मग एका रिक्षावाल्याला गाठले आणि त्यासोबत काहीतरी ‘गुज्जु-गोष्टी’ करून त्याला पटवले. जुनागढ गावच्या बाजारातील एका गल्लीत तो आम्हाला घेऊन गेला. तिथे अर्ध्या-पाऊण तासात मनासारखी कापड खरेदी झाली. इथेही गणेशच्या ‘गुज्जु-भाषा’ ज्ञानाचा आम्हाला किमतीत घासाघीस करण्याकामी भरपूर फायदा झाला. मग रिक्षा रेल्वे स्थानकाकडे भरधाव पळवली. रेल्वे गाडी थोडी उशिरानेच आली.  पुढील ‘पुणे’ प्रवासात आम्हाला काही ‘उणे’ पडले नाही. J

आयुष्यात “जय गिरनारी” म्हणून एकदा का ह्या पवित्र, निसर्गसुंदर गिरीस्थळी जाऊन आलात की तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावत राहते असा अनेकांचा अनुभव आहे. पुढील बोलावणे कधी येतेय ह्याची आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय!

©  विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)  

Source: Radio Ceylon – Wikiwand

आमच्या बालपणीचे दिवस म्हणजे १९६५ ते १९७५ चा कालखंड, आजच्या पेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळा. मनोरंजन ही त्याकाळी चैनीची बाब समजली जायची. चित्रपट, नाटके ही साधने उपलब्ध असली तरी त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सर्वांचीच नसायची. मग मनोरंजनाचे सहज उपलब्ध साधन म्हणजे काय तर रेडिओ. परिसरात बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या घरात रेडिओ असायचे आणि शेजारच्या चार घरापर्यंत आवाज जाईल येवढ्या मोठ्या आवाजात त्यावरिल कार्यक्रम ऐकले जायचे. आमच्या सारख्यांना त्यातूनच रेडिओचा परिचय झाला. रेडिओ  म्हणजे “रेडिओ सिलोन” अशी आमची धारणा होती कारण या व्यतिरिक्त कुणीही रेडिओ वर दुसरे स्टेशन लावत नसे. उपहारगृहात ही रेडीओवर सिलोन हेच स्टेशन सुरू असायचे. “ये सिलोन ब्राडकास्टींग कारपोरेशन का व्यापार विभाग हैं”. हे वाक्य आम्हाला पाठ झाले होते.

अनेकांची सकाळच रेडिओ च्या संगीताने व्हायची. समाचार, भक्तिगीते ऐकत आपआपली कामे लोक करायचे, रेडिओ ऐकण्यामुळे कुणाच्या कामात अडचण येत नसे, सकाळचा ज्येष्ट नागरिकां चा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ” पुराने फिल्मो का संगीत”. आम्हाला सहगल, तलत मेहमूद, हेमंत कुमार, प्रदीप, सुरैया, शमशाद बेगम,  नूरजहाँ. या गायकांचा परिचय याच कार्यक्रमामुळे झाला. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस “खुश है जमाना आज पहली तारीख है” हे गीत हमखास लावले जायचे.  रेडिओ सिलोन च्या लोकप्रियतेचे गमक होते चित्रपट गीते, कारण आल इंडिया रेडिओ वर चित्रपट गीतांचे प्रसारण होत नव्हते, चित्रपट गीतांना विरोध करणारी याचिका सन १९५२ ला कलकत्ता येथील प्रो. चक्रवर्ती यांनी न्यायालयात केली  होती त्यामुळे आल इंडिया रेडीओवर सिनेगितांचे प्रसारण होत नव्हते. त्यामुळे रेडिओ सिलोन ची लोकप्रियता वाढली.

त्यावेळी सकाळच्या प्रसारणात सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असायचा “आप ही के गीत” नवीन चित्रपटांच्या गीतांचा हा कार्यक्रम असायचा, महत्वाचे म्हणजे श्रोत्यांच्या फर्माइश वर गीतांची निवड केली जायची आणि गाण्याच्या प्रसारणा आधी पसंती कळविणाऱ्यांची नावे घेतली जायची. आपले नाव रेडीओवर यावे म्हणून लोक पोस्टकार्ड पाठवायचे. अनेकांना ही सवयच लागली होती. अनेक गावात तर त्यासाठी श्रोता संघ स्थापन झाले होते. भाटापारा, झुमारितलय्या या गावांची नावे त्यावेळी खूप प्रसिद्ध होती या गावातील लोकांची नावे अनेकदा यायची. नवीन चित्रपट येण्यापूर्वीच या कार्यक्रमामुळे गीते लोकप्रिय व्हायची व गीतांमुळे चित्रपट पाहिले जायचे. सिलोन रेडिओ  हे व्यापारी तत्त्वावरआधारलेले स्टेशन असल्यामुळे त्यावर अनेकवस्तुंच्या जाहिरातींचे प्रसारणही व्हायचे, काही जाहिराती आजही आठवतात. सॉरीडॉन, बोर्नव्हीटा, एसप्रो, व्हिक्स, टिनोपाल, यातही ‘तन्दुरूस्ती की रक्षा करता है लाइफबॉय… लाइफबॉय है जहां तन्दुरूस्ती है वहां… लाइफबॉय… ही जाहिरात मला आजही पाठ आहे.

क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ज्यांना वयोमानामुळे किंवा इतर कोणत्या परिस्थितीमुळे अजिबात ऐकू येत नाही, अशा लोकांचं रस्त्यावर जगणं मुश्कील झालंय….

ऐकू न आल्यामुळे, कोणतंही काम करण्यास त्यांना अडथळा येतोच…. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, रस्ता ओलांडताना किंवा चालताना गाडीचे आवाज न ऐकू आल्यामुळे एक्सीडेंट होऊन मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे प्रमाण वाढत आहे…

आणि याचमुळे मागील तीन महिन्यांपासून माझ्या भीक मागणाऱ्या वृद्ध माता पित्यांच्या कानाची तपासणी सुरू करून, त्यांना श्रवण यंत्रे देण्यास सुरुवात केली आहे.  

मशीन मिळाल्यानंतर, कानात मशीन घालून ही मंडळी कानावर आडोशासारखा हात धरून…. अगदी मन लावून…. नजर एका जागी स्थिर करून…..रस्त्यावरील गाड्यांचा आवाज ऐकतात….हॉर्न ऐकतात… रस्त्यावर चाललेला गोंगाट ऐकतात….! 

एरव्ही खरंतर अशा गोष्टी आपण ऐकायचं टाळतो….. पण “ते” मात्र जीव लावून या गोष्टी ऐकत असतात…. ! 

मी गंमतीने त्यांना या बद्दल विचारतो, तेव्हा ते म्हणतात,  “ काय करणार डॉक्टर?  पूर्वी  जेव्हा ऐकायला येत होतं तेव्हा जवळची माणसं सोबत असून सुद्धा बोलत नव्हती…. आज पुन्हा ऐकायला यायला लागलंय…. पण आज ती जवळची माणसं सुद्धा नाहीत आणि त्यांचा आवाज सुद्धा ….. मग काय करणार ? आम्ही बसतो गाड्यांचे आवाज ऐकत, आपल्याला ऐकू येतं याचा आनंद घेत….! “ 

हे ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कारुण्य रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत…..! 

आपल्या माणसांचा आवाज शोधणारी…. निर्जीव गाड्यांच्या हॉर्नशी संवाद साधू पाहणारी…. ही पिढी हळूहळू डोळ्यादेखत नष्ट होईल…. ! 

आपल्या वृद्ध आई-वडील, आजी आजोबा यांना न सांभाळणारी ही मंडळी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत माहित नाही…! 

मी लहानपणी पुस्तकात वाचलं होतं– “आपण आज जी माणसं पाहतो, ती फार फार पूर्वी माकडं होती…” 

मला भीती वाटते …. इथून पुढच्या काही वर्षानंतर लहान मुलांच्या पुस्तकात धडा असेल— “आपण आज जी “माकडं” पाहतो आहोत… ती फार फार पूर्वी “माणसं” होती ! “

अशी वेळ येण्याअगोदर आपल्या जुन्या खोडांना आपणच जपलं पाहिजे…. ! 

कानाची मशीन ही एक अत्यंत “महाग” गोष्ट आहे… 

परंतु ऐकू यायला लागल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान हे त्याहीपेक्षा जास्त “मौल्यवान” वाटतं मला ….!

“महाग” आणि “मौल्यवान” यातला फरक एकदा समजला की खर्च झाल्याचं दुःख होत नाही…. !!!

कळत-नकळतपणे आपणही सर्व जण त्यांच्या या चेहऱ्यावरील ” आनंदाचे भागीदार ” आहात, म्हणून आपणास कळविण्याचा हा खटाटोप !!!

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares