मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

यामधे अगदी थोडीच मुले शिक्षणाकरिता हातभार म्हणून मजूरी करतात.पण बऱ्याचवेळेला शिक्षणाची आवड नसणारे, शाळेत न जाता चैनी करण्यासाठी मजूरी करुन पैसे मिळवतात.फँक्टरी मालक,हाँटेलमालक सुध्दा अशा मुलांना कामावर ठेऊन घेतात. कारण या मुलांना मजूरी कमी दिली तरी चालते.म्हणून कमी पैशात अशा बालकांकडून काम करुन घेण्याचा त्यांचा मनोदय असतो.एकदा का मजूरी करुन का होईना पैसे मिळतात म्हटल्यावर ही मुले शिक्षणाला रामराम ठोकतात आणि अशा तुटपुंज्या मजूरीवर  राबत रहातात.

फैक्ट्री एक्ट १९६९ मधे अशा बालमजूरांना कामावर ठेऊन घेतल्यास फँक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे.यामधे मालकाला दंड व कारावासाची शिक्षा सुनावली जाते.भारतात  १९८६ ला बालकामगार विरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६  रोजी या कायद्यात दुरुस्ती करुन १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली.मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शाळेत माध्यान्ह भोजनाची तरतूद करण्यात आली.तरीसुध्दा म्हणावा तितका बालमजुरीचा प्रश्न संपुष्टात आलेला नाही.मात्र काही राज्यातून यासाठीच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.याबाबतीत एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ओरीसा राज्यातील मयुरभंज या गावात बालमजूरी पुर्णपणे बंद आहे. इथे मुलांकडून काम करुन घेतले जात नाही.आंध्रप्रदेश मधे पण अशी पावले उचलली जात आहेत.

पं. नेहरुंना लहान मुले खूप आवडायची. आपणही या मुलांच बालपण जपण्यासाठी प्रयत्नशील राहुया.तरचं बालमजूरी आणि बालकामगार याविषयीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.आणि त्यांच्यासाठी म्हणूया.

‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा ‘

समाप्त

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“कमवता झालास, की कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!,” असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो! “हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!” असा इशारा द्यायचो; पण काही उपयोग व्हायचा नाही. “नको वापरूस साबण. बरंच आहे!” असा बचाव पक्षाचा बचाव असायचा.

पंडित भीमसेन जोशी यांचं कन्नडमधलं ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ कुठंही आणि कधीही ऐकलं, तरी मला बेळगाव-धारवाड रस्त्यावरचा पहाटेचा एक ढाबा आठवतो! एका जवळच्या मित्राबरोबर बेळगावहून मोटारसायकलवर आम्ही भल्या पहाटे धारवाडला निघालो होतो.

 रस्त्यात एका ठिकाणी चहासाठी थांबलो. झुंजूमुंजू झालेली होती. सगळं वातावरणच रम्य. त्या रसिक ढाबेवाल्यानं मोठ्या आवाजात कॅसेटवर “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ लावलं. ते तसलं सुंदर वातावरण, हवेतला सुखकर गारवा, गरम चहाचा घोट आणि पहाटे-पहाटे पंडितजींचा मस्त लागलेला आवाज! कानडी येत नाही, त्यामुळे शब्द समजले नाहीत. अर्थ तर फारच दूर; पण हे काहीतरी पवित्र आहे, सुंदर आहे एवढं मात्र जाणवलं. मनाच्या पार आतवर खोल कोरलं गेलं. अधाशासारखं तीनदा परतपरत ऐकलं, तरी मन भरेना. शेवटी, कानात अतृप्तता घेऊन तिथून निघालो. इतकी वर्षं झाली, आजही हे “भजन’ ऐकलं, की दरवेळी मला माझा मित्र सुधीर आठवतो, तो प्रवास आठवतो, त्याची गाडी आठवते, तो “ढाबेवाला’ शिवा आठवतो. एवढंच काय, हे ऐकताना प्यायलेल्या आलेमिश्रित चहाची चवही आठवते! मेंदू कुठंतरी या सगळ्या गोष्टींची एकत्रित सांगड घालतो!

आजही किशोरकुमारचं, “वो शाम, कुछ अजीब थी’ ऐकलं, की कॉलेज आठवतं, “ती’ आठवते, कॉलेजचं कॅंटीन आठवतं, “ती’चं हॉस्टेल आठवतं. दिवाळीच्या सुट्टीमुळे घरी जावंच लागेल, ही तिची असहायता आठवते—- एवढं सुंदर गीत; पण आजही त्रास देऊन जातं!

आठवणींचं घटनांशी, वस्तूंशी, गंधाशी, सुरांशी अतूट असं नातं असतं. आठवणी कधी सुरांना चिकटून येतात, तर कधी वासाला. कधी एखादा विशिष्ट रंगसुद्धा तुम्हाला पुर्वायुष्यातल्या एखाद्या घटनेची “याद’ देऊन जातो. आठवणी या सगळ्यांशी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं निगडित असतात. तोडू म्हटलं, तरी ते बंध तोडता येत नाहीत.

मुंबईत बांद्रयाला हिलरोडवर उभा होतो. अचानक सिग्नलवर गर्दी झाली. टाचा उंचावून बघितलं. सिग्नलवर फेरारी! फेरारी पाहायला, एवढी गर्दी कशाला? “काय कळत नाही का या मुंबईकरांना,’ असं म्हणणार होतो. म्हणणारच होतो, की ड्रायव्हर साईडच्या काचा खाली झाल्या, आणि समोर साक्षात गॉगलधारी “सचिन’!

नेहमीसारखा हसतमुख! “अबे, जाने दो ना..’ सगळ्यांना अशी हसतहसत विनंती करणारा! शेवटी, चार वेळा हिरवे होऊन परत लालटलेले सिग्नल, मागच्या शंभर गाड्यांचे हॉर्न, भलामोठा ट्रॅफिक जॅम आणि सहस्त्र फोटो यानंतरच तो जाऊ शकला! “फेरारी’ आणि आपला “सचिन’, हे समीकरण तेव्हापासून डोक्‍यात घट्ट झालं, नंतर त्यानं ती फेरारी विकली, हे माहिती असूनही! देशी-परदेशी फिरत असतो, हजारो प्रकारच्या गाड्या दिसतात. त्यात कधीकधी “फेरारी’ही दिसते; पण “फेरारी’ पाहिली, की आठवतो, तो आपला “तेंडल्या’च! फेरारी चालवणारा कोणी दिसलाच, तर तो चोरीची फेरारी वापरतोय, असंच जणू मनात येतं! फेरारीवर पहिला हक्क आपल्या “तेंडल्या’चाच!

दिवेआगारला गेलो होतो. सकाळी लवकर उठलो. पायीपायी हॉटेलपासून एखादा किलोमीटर आलो असेन, एका चिरपरिचित पण तत्क्षणी ओळखू न आलेल्या वासानं आसमंत व्यापून टाकला होता. ओळखताच येत नव्हता. रस्त्यातल्या चाफ्याचा, पारिजातकाचा, नारळाचा इतकंच काय, झाडांवरच्या पिकलेल्या आंब्यांचा वास, या सगळ्यांवर मात करत, हा वास नाकातून मनात शिरला. काहीतरी सुखद संवेदना होत होती. छान असं वाटत होतं; पण कशामुळे हे उमजत नव्हतं!—–

रस्त्याजवळच्या एका “वाडी’त, बाहेरच पाणी गरम करायचा एक तांब्याचा “बंब’ धडाडून पेटला होता. धूर सगळीकडे पसरवत होता. एक तर अक्षरशः इसवीसनापूर्वीचा तो बंब बघूनच मी व्याकुळ झालो! मधल्या काळ्या लोखंडी पाईपमधून टाकलेल्या शेणाच्या गोवरीच्या, लाकडाच्या ढलप्यांचा जळण्याचा वास मला भूतकाळात घेऊन गेला! शाळेत असताना सुट्टीत मोठ्या काकांकडे जायचो. त्यांच्याकडे, असाच एक “बंब’ होता. त्या धुराच्या वासानं क्षणात, कित्येक वर्षं ओलांडून, वर्तमानकाळाला फोडून भूतकाळात गेलो! त्या सुट्ट्या आठवल्या, काकांचं घर आठवलं, काकू आठवली, तिच्या पुरणपोळ्या आठवल्या. तिचं आम्हा बालबच्च्यांवर असलेलं निरपेक्ष प्रेम आठवलं. दिवेआगारच्या रम्य सकाळी धुराच्या वासानं नाशिकची प्रेमळ शालनकाकू आठवून दिली!

असंच, पिझ्झा पाहिला, की मला पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरचा एक भिकारी आठवतो! रात्रीचे दहा वाजले असतील. हा माणूस छानपैकी पिझ्झा खात होता! कोणी उरलेला दिला असावा, वा कोणी दानशुरानं अख्खा न खाता दिला असावा. काहीही असो. तो माणूस “उदरम भरणमं’ या भावनेनं मन लावून तो पिझ्झा खात होता. चव वगैरे त्याच्या दृष्टीनं गौण होतं. त्याचं मन लावून ते पिझ्झा खाणं मनात त्या दोन विजोड गोष्टींची सांगड घालून गेलं! अगदी खुद्द इटलीतल्या मिलानला बावीसशे रुपयांचा पिझ्झा खातानाही, मला तो काळा-पांढरा पट्टेरी ठिगळाचा शर्ट घातलेला, तृप्ततेनं पिझ्झा खाणारा पुण्यातला गरीब माणूसच आठवला!

परवा दिल्लीला मित्राकडे मुक्कामाला होतो. त्याच्या बाथरूममध्ये नारंगी रंगाच्या साबणावर पोपटी रंगाचा साबणाचा छोटा तुकडा चिकटवलेला दिसला. हा असला विजोड साबण बघितला, अन्‌ टचकन डोळ्यात पाणी आलं. एकदम्‌ आई आठवली! साबण विरत आला, हातात येईनासा झाला, की आई नवा साबण काढायची, हा जुना तुकडा त्याला चिटकवायची. मला नाही आवडायचे.””हा काय किडेखाऊपणा?” मी चिडायचो. आमची आर्थिक परिस्थिती छानच होती. गरीबी लांबच; उच्च मध्यमवर्गीयांपेक्षाही उच्चच होतो आम्ही. हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची; पण आई ऐकायची नाही.

बादली गळायला लागली, की तिच्या बुडाला डांबर लाव. गळली बादली, की लाव डांबर, असं तिचं चालायचं. काही दिवसांनी बादलीपेक्षा डांबराचंच वजन जास्त व्हायचं! मग ती बादली बाजूनंही चिरली, की त्यात माती भरून तिची कुंडी बनव, आमच्या चपला झिजल्या, की त्या दुरुस्त करणाऱ्यांकडून त्याला ट्रकच्या टायरची टाच लाव, जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिव, त्यांचाही जीव गेला, की त्याचं पायपुसणं बनव, असे माझ्या भाषेतले “उपद्‌व्याप’ आई सदैव करायची. त्याकाळी किराणा सामान कागदी पुड्यांमध्ये यायचं. त्या पुड्यांचा कागद रद्दीच्या गठ्ठ्यात आणि धागा रिळाला! मी दहावीला आलो, तेव्हा तर वाण्याच्या दुकानातल्यापेक्षा मोठा दोराचा रिळ आमच्या घरी बनला होता!

काही वर्षांपूर्वी आई गेली. जेव्हा होती, तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!

बाथरूममधून बाहेर आलो. डोळे लाल झाले होते. 

मित्रानं विचारलं: “”काय रे, डोळ्यात साबण गेला का?”

मी म्हणालो: “नाही रे, साबणामागची आई!”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे…

महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. इतर सर्व पंचांगे एका माळेतील आहेत. ती पंचांगे त्या त्या व्यक्तीने व्यक्तिगत साहस वा उपक्रम म्हणून त्यांची प्रसिद्धी वेगवेगळ्या काळी सुरू केली. ती सर्व चित्रा पक्षीय पंचांगे आहेत. टिळक पंचांग हे एकमेव रेवती पक्षाचे पंचांग आहे. चित्रा पंचांग व रेवती पंचांग या संज्ञांची फोड लेखामध्ये पुढे येते. दाते हे प्रमुख पंचांग म्हणून चित्रा पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पंचांग येथे नमुना म्हणून घेऊ आणि दाते व टिळक या पंचांगांत नेमका फरक काय व कशामुळे ते पाहू.

दाते आणि इतर चित्रा पक्षीय पंचांगे महाराष्ट्रात बहुतांश भागांत वापरली जातात, तर टिळक पंचांग हे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, आंजर्ले, कोळथरे, पंचनदी, दाभोळ या भागांत वापरले जाते. त्या गावांतील उत्सव टिळक पंचांगांप्रमाणे तिथीवार धरून साजरे केले जातात आणि तेथील ग्रामस्थ त्याचे कसोशीने पालन करतात. केळशी येथील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव असो किंवा कोळथरे येथील कोळेश्वरचा उत्सव असो, ते प्रसंग टिळक पंचांगातील तिथीनुसारच होत असतात.

दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व पंचांगे किंबहुना संपूर्ण भारतातील पंचांगे ही सोळाव्या शतकात रचलेल्या ‘ग्रहलाघव’ या ग्रंथानुसार तयार केली जात. तो ग्रंथ गणेश दैवज्ञ या मराठी माणसाने रचला होता ! त्यानुसार ग्रहगणित करणे तुलनेने सोपे असल्याने तो ग्रंथ पंचांग गणितकर्त्यांमध्ये लोकप्रिय होता. गणित आणि खगोलगणित यांत अनेक क्रांतिकारक शोध सोळाव्या शतकापासून युरोपात लागले. तसेच, आकाशाचे वेध घेण्यासाठी नवनवीन दुर्बिणी उपलब्ध झाल्या. त्यामुळे युरोपातील तज्ज्ञांचे आकाशाचे गणितीय वेध अचूक नोंदले जाऊ लागले; तसेच, अनेक खगोलीय घटनांची गणितीय सिद्धता देणे शक्‍य झाले. ते ज्ञान भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी अंमलाबरोबर आले. तोपर्यंत भारतात पंचांग गणित हे प्रामुख्याने गुरु-शिष्य परंपरेने शिकवले जात असे.

सिद्धांत हा एक ग्रंथ प्रकार आहे. त्यात खगोल शास्त्र, आकाश निरीक्षणे यासाठीचे गणित, सिद्धांत लिहिणाऱ्यांचे स्वत:चे निरीक्षण या गोष्टी असतात. हा खगोलशास्त्राचा सिद्धांत प्रस्थापित करणारा ग्रंथ म्हणता येईल. या ग्रंथावरून थेट पंचांग करणे कठीण असते. त्यासाठी अशा ग्रंथातील प्रस्थापित सिद्धांतावर आधारित करण ग्रंथ करण्यात येतो. करण ग्रंथ हा केवळ पंचांग करण्यासाठी उपयुक्त गणित, खगोल यावर आधारित कोष्टके असा असतो. त्यामुळे पंचांग करणे सोपे असते. ग्रहलाघव हा एक करण ग्रंथ आहे. तो सूर्य सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ग्रहलाघव वापरुन केलेली पंचांगे एका अर्थी सूर्य सिद्धांतावर आधारलेली होती असे म्हणता येते. असेच आर्यभटचा आर्यसिद्धांत, ब्रम्हगुप्तचा ब्रम्ह स्फुटसिद्धांत, वराह मिहीर याने उल्लेख केलेले प्राचीन पाच सिद्धांत असे अनेक सिद्धांत भारतात प्रसिद्ध होते.

प्रथमच, त्या पारंपरिक ज्ञानाची तुलना आधुनिक गणिताचा अभ्यास करून आलेल्या आणि नवीन साधने वापरून प्राप्त केलेल्या निरीक्षणांशी केली जाऊ लागली. पंचांग गणित पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धतींनी शिकलेले लोक तशी तुलना करू शकत होते. त्यात प्रामुख्याने दोन व्यक्ती होत्या त्या म्हणजे प्रा.केरोपंत छत्रे आणि पं. बापू देव शास्त्री. त्या दोघांनी स्वतंत्रपणे पारंपरिक पंचांग गणित पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आरंभले. सुरुवातीस, त्या दोघांना विरोध बराच सहन करावा लागला. पण तरुण उच्च शिक्षित जसजसे होऊ लागले तसतशा त्या सुधारणा स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्या सुधारणा नेमक्‍या काय होत्या? 1. सौर वर्ष सूर्य सिद्धांतानुसार न घेता आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे घेणे (यात वास्तविक फार थोडा फरक आहे, याबद्दल सूर्य सिद्धांतकारांचे कौतुकच करण्यास हवे), 2. वसंत संपातास वार्षिक गती आहे, ती आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे 50.2 सेकंद अशी घेणे (ती सामान्यत: साठ सेकंद घेण्यात येत होती), 3. निरयन राशी चक्र आरंभ रेवती नक्षत्रातील झीटा या ग्रीक अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या तारखेपासून करावा. या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता !

क्रमशः…  

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ कृष्ण…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

कृष्ण अंधारात जन्मला. त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. 

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो,” जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…” 

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण ” न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था—

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणूत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकॄष्ण।।

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटल जात,कारण या वयात कशाची चिंता,काळजी नसते.खाणे,पिणे,खेळणे आणि शाळेत जाणेएवढच काम लहान मुलांच असत.मोठ्यांना असणाऱ्या काळज्या,समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.पैसे मिळवण,घर चालवण हा त्रास मुलांना नसतो.त्यामुळेच की काय ‘ रम्य ते बालपण’ अस म्हटल जात.पण काही मुलांच्या बाबतीत हे बालपण रम्य नसते.ज्या वयात या मुलांच्या हाती वह्या,पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलांना मजूरीवर जाव लागत.

 घरातील पैशाची कमी, उपासमार, गरजेच्या वस्तू न मिळण शाळेच्या फी, पुस्तकासाठी पैसे नसणे अशा परिस्थिती मुळे मुलांना मजूरी करावी लागते. आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना पालकांची मदत मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच शाळेला  पूर्णविराम देऊन ही मुल, हाँटेलमधे टेबल पुसणे, भांडी घासणे, बांधकामावरच्या विटा उचलणे अशी काम करत रहातात.यालाच बालमजुरी किंवा बालकामगार असे म्हणतात, वयाची ९ वर्षे ते १६ वर्षे वयातील मुलांना बालकामगार म्हणतात.

काही वेळा पालकांना कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.तसेच पालक शिक्षीत नसतील तर मुलंही शिक्षणापासून वंचित रहातात. त्यामुळे ही मुले मजूरीकडे वळतात.

बालमजूरी किंवा बालकामगार ही जागतिक समस्या आहे. पण अजूनही हा प्रश्न म्हणावा तितका सुटला नाही. भारतासारख्या संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांमधे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच गावात विशेषतः खेड्यामध्ये लहान मुलांना कामावर जावे लागते. उसतोड कामगारांची मुलं, बांधकामावर कामाला जाणाऱ्यांची मुलं बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर कामाला जातात. बरीच मुलं हाँटेल, कार्यालय, बार, वीटभट्टी, फँक्टरी अशा ठिकाणी मजूरी करताना दिसतात. फटाक्यांच्या फँक्टरीत तर असंख्य मुले काम करतात. अशा फँक्टरीमधे दुर्दैवाने काही अपघात झाला तर या मुलांना कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता असते.

आईवडिलांचे कमी उत्पन्न,दारु पिणारे वडील, अनाथ मुले,घरातील कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार अशा कारणांमुळे ही मुलं बालमजूर म्हणून काम करताना दिसतात.काही मुलं टि.व्ही.,सिनेमाच्या वेडापायी घरातून पळून जातात आणि त्यांना कुठेच आधार नाही मिळाला तर ते आपोआपचं मजूरीकडे वळतात.

क्रमशः…

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा — ’फुगेवाला’ ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा —फुगेवाला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी नेहमीच असं गंमतीत म्हणते, ‘पुणेकर सगळं टाळू शकतील पण एक गोष्ट मात्र ते कधीच टाळू शकत नाहीत आणि ते म्हणजे ट्रॅफिक… ते जर कुणी टाळू शकत असेल किंवा आत्तापर्यंत एखाद्याला ते लागलं नसेल तर त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच  करायला हवी’, इतकं ते आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे कुठंतरी आपण थांबणं आवश्यक असल्यामुळे, कुठंतरी जाम झाल्यामुळे… काहीतरी चुकतंय याची जी जाणीव आपल्याला होते ती सुधारण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो फार  महत्त्वाचा असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी सुरळीत होण्यापेक्षा कधी कधी अडथळे येणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं, फक्त ते आपल्याला जाणता आलं पाहिजे.  

मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा मी आजूबाजूला बघते तर जाणवतं, अरे हे नवीन ठिकाण आहे.  हे पूर्वी कधी आपण या निवांतपणे पाहिलं नव्हतं. आपण स्वतःहून कधी इकडे पाहिलंच नसतं. धावत्या गाडीतून एखादी गोष्ट बघणं आणि तिथे रेंगाळून ती गोष्ट बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गाडीच्या वेगाबरोबर आपल्या मनाचा वेग इतका जबरदस्त असतो की आपण त्या क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखलसुद्धा घेत नाही.  पण ज्यावेळी आपल्याला तिथं थांबण्याची वेळ येते तेव्हा जे आपल्याला दिसतं…  जे अनुभवतो… ते एरवी आपण कधीच मुद्दाम पाहिलं, अनुभवलं नसतं. 

त्यादिवशी असंच ट्रॅफिक लागलं. सिग्नल काही केल्या लवकर सुटेना. बहुदा काहीतरी घोळ झाला होता. आणि सगळेजण वैतागले होते. जो तो आपापलं मन रिझवण्याचा पयत्न करत होता… कुणी मध्येच रस्त्यात उतरून हातवारे करत वाहनांना मार्गदर्शन करत होतं. कुणी फोनवर मोठ्याने बोलत होतं, कुणी हॉर्न वाजवत होतं, कुणी गाडी साईडला घ्यायला सांगतंय, कुणी फूटपाथवरून गाडी घुसवण्याचा प्रयत्न करत होतं, असे सगळेच आपापल्यापरीनं प्रयत्न करत होते. सरतेशेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता मूळ  कोंडी सुटल्याशिवाय जाता येणार नाही. आणि मग सगळेच एकदम शांत झाले. मला जाणवलं की ही वेळ माझ्यासाठीचा खास निवांतपणा घेऊन येणारी आहे. डोक्यात चाललेल्या विचारांना पण या सिग्नलमुळे ब्रेक लागला होता. आणि आता काहीतरी नवीन बघायला मिळेल असं वाटत असतानाच अचानक तो दिसला…  इतक्या शांतपणे आकाशाकडे नजर लावून उभा होता की जणू काही घडलंच नाहीये. फक्त त्या त्याच्या दणकट सायकलच्या हॅन्डलवर मागेपुढे दोऱ्याने घट्ट बांधेलेले रंगीबेरंगी आणि निरनिराळ्या आकाराचे फुगे तेवढे वाऱ्यावर उडत होते.

सगळ्यांनाच सक्तीनं स्थिर व्हायला लावलेलं असताना वाऱ्यावर उडणारे ते फुगे मला फारच लक्षवेधक वाटले. मला या परिस्थितीत काहीतरी विरोधाभास… विसंगती दिसली. सुदैवाने माझी रिक्षा त्याच्या बऱ्यापैकी जवळ आली होती. त्याच्या कॅरिअरला बांधलेले फुगे माझ्या रिक्षेत डोकावून त्या वातावरणात एक हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटलं. आणि मी नकळतच त्याच्याकडे निरखून पाहू लागले. तसा तो पाठमोरा होता. मध्यम उंचीचा, रापलेला रंग, काटकुळा… विचार आला, आजपर्यंत आपण कधी जाडजूड फुगेवाला पाहिलाय का? मी आठवू लागले पण आठवेना… पांढराच पण मळलेला शर्ट, खाली मळकी पोटरीपर्यंत दुमडलेली पँट… राकट हात, त्यांनी पकडलेल्या हॅन्डलला लटकवलेल्या पिशव्या, त्यातून बाहेर येऊ पाहणारे फुगे. एका साध्याशा पिशवीत पाण्याची बाटली दिसली आणि अजूनही त्यात काहीबाही होतं पण त्याचा मला अंदाज लावता येईना…. आणि माझं मन फुगेवालाच्या आयुष्याचं अनॅलिसिस करू लागलं.   

किती उत्पन्न असेल, त्यात सगळ्यांचं  कसं भागवत असतील… याची स्वप्नं काय असतील… तो समाधानी असेल का… रोजच्या कामात तो कसा मन रमवत असेल… इतक्यात कसलातरी आवाज आला म्हणून त्यानं मागे फुग्यांकडे वळून पाहिलं, त्यावेळी मला त्याच्या डोळ्यात फुग्यांविषयी ममत्व दिसलं. एक मन म्हणालं, छ्या! असं काही नाही. तुला तसं वाटतंय… दुसरं मन म्हणालं का नाही तसं ? अरे माणूस आहे तो… माणसं चांगली असतात. या द्वंद्वात मी सापडले असताना  पटकन काहीतरी हालचाल झाली मी दचकले. बघते तो इतक्या गोंधळात, गोंगाटात त्या फुगेवाल्याला एका लहान मुलाचा आवाज आला आणि त्यानं पटकन फुगा काढून त्याला दाखवला . मी बघू लागले याला कुठे दिसतोय मुलगा… मला काही दिसेना. आता रिक्षेवालाही बघू लागला. त्यालाही तो दिसेना. हा इकडून खाणाखुणा करून काहीतरी सांगत होता… त्याच्या चेहऱ्यावरून तरी तो फुगा विकला जाणार आहे असं वाटत होतं.  या धामधुमीत सिग्नल सुटला… सगळेजण आता पुढे सरकू लागले. आणि आम्ही पुढे निघून आलो.   

पूर्ण प्रवासभर माझ्या मनात प्रश्नच प्रश्न…

जाड फुगेवाला कुणी पाहिलाय का? 

यांची स्वप्नं काय असतात? 

फक्त फुगे विकणाऱ्याचं एखादं शानदार दुकान असू शकतं का ?….

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘ ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ अन्न हे पूर्णब्रह्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

एका लग्नाला गेलो होतो . जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या  सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या . 

पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला …. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो ….. 

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .

सौ. ने हात खेचत म्हटले ” अहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल ” 

मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ….. अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता …..

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला—-

“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??”

अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले . 

” ही तुमची डिश आहे ना ?? “

” होय,” मी परत उत्तरलो .

” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ” 

मी चकित झालो . थोडा रागही आला . त्याच रागात बोललो, ” अहो थोडे राहिले अन्न ? काय हरकत आहे .

नाही अंदाज आला .म्हणून काय घरी न्यायचं ?? “ 

” रागावू नका ” तो गोड हसत म्हणाला .“ हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे .  पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ??  राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले. आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तम प्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत…. होय ,त्यासाठी आम्ही  मागू तेवढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..म्हणून आम्ही ही शक्कल लढवली , हॉटेलमध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता…….. का ???  कारण तुम्ही पैसे मोजलेले असता.  मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्याने दिले म्हणून का ?? “

” आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा, नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .” 

मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाजही वाटली आणि पटतही होते —-

खरेच भारतातच काय, आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताहेत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय …. 

इतक्यात सौ .म्हणाली  “बरोबर बोलताय भाऊ , यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे , तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल .

 थोड्या वेळाने आम्ही  वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….

(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता…. 

एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच…. 

पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )  

 

—अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय … 

अन्न हे पूर्णब्रम्ह  ते वाया घालवू नका.  🙏

 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘माया’ या शब्दाचे शब्दकोशातले अनेक अर्थ आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगू शकतील फक्त. पण ‘माया’ या शब्दाची व्याप्ती त्या अर्थापुरती मर्यादित नाहीय याची ओझरती कां होईना जाणीव करून देईल ते फक्त संत-साहित्यच !

अनेक संत-महात्म्यांनी त्यांच्या विविध साहित्य रचनांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सामान्य माणसालाही समजेल, पटेल, रुचेल अशा सोप्या शब्दात सांगितलेले आहे. श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान रामदासस्वामींनी त्यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथात अतिशय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांनी अतिशय सोप्या,सुलभ पद्धतीने, क्लिष्ट न वाटता बोध घेता येईल असे त्याचे सविस्तर  विवरण केलेले आहे. दासबोध हा अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय आहे हे खरेच पण ‘माया’ या संकल्पनेची व्याप्ती सोप्यापद्धतीने जाणून घेण्यासाठी तो एक सहजपणे उपलब्ध असणारा मार्ग आहे हेही तितकेच खरे. रामदासस्वामींनी दासबोधात ‘माया’ या शब्दाचा वापर विवेचनाच्या ओघात अनेकदा आणि तोही मूळमाया, महामाया, अविद्यामाया अशा अनेक वेगवेगळ्या रुपात केलेला आहे.आजच्या लेखनसूत्रासाठी यातील ‘वैष्णवीमाया’ या संकल्पनेचे प्रातिनिधिक उदाहरण घेऊया.’वैष्णवीमाया’ म्हणजे विष्णूची म्हणजेच परमात्म्याची माया! ही माया मोहात पाडणारी आहे. विधात्याने निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच हे विश्वाचे अवडंबर!मायेने निर्माण केलेले एक दृश्यरुप! या विश्वात जे जे चंचल,जड,अशाश्वत ते ते सर्व या मायेचाच पसारा! या मायेने संपूर्ण ब्रह्म आच्छादलेले आहे. या मायेला अलगद बाजूला सारून ‘ब्रम्ह’ जाणून घेणे म्हणजे ज्ञान! अर्थात ते प्राप्त करून घेणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय गूढ,अशक्यप्राय वाटावे असेच  आणि म्हणूनच संतसाहित्य त्यांना ते अधिक सोपे,सुकर करुन समजावून सांगते.अतिशय सोप्या शब्दात हे संतसाहित्य माणसाला जगावे कां, कसे आणि कशासाठी हे शिकवते.

गंमत म्हणजे माणसाचे हे जगणे सहजसुंदर करण्यासाठी वेगळ्या अर्थाने त्याच्या मदतीला येते ती मायाच.माया चंचल, अशाश्वत जशी तशीच वात्सल्य, प्रेम आणि मार्दवही! मायेला जेव्हा माणुसकीचा स्पर्श होतो तेव्हा ममता,जिव्हाळा,आपुलकी, आत्मीयता,ओलावा,प्रेम,स्नेह अशा विविध रंगछटा मायेला अर्थपूर्ण बनवतात.या लोभस रंगांनी रंगलेली माया माणसाचं अशाश्वत जगातलं जगणं सुसह्य तर करतेच आणि सुंदरही.ही माया  माणसाच्या जगण्याला अहम् पासून अलिप्त करीत दुसऱ्यांसाठी जगायला प्रवृत्त करते. दुसऱ्याला स्नेह,प्रेम,आनंद  देणाऱ्यालाही ती आनंदी करते. या मायेला विसरून माणूस जेव्हा ‘अहं’शी लिप्त होऊन जातो तेव्हा तो मायेच्या पैसा-अडका, धनदौलत या मायाजालात गुरफटून भरकटत जाऊ लागतो. जगण्यातला आनंदच हरवून बसतो. मायेच्या ‘मायाळू’ आणि ‘मायावी’ अशा दोन्ही परस्परविरोधी रुपांमधला फरक संतसाहित्यच आपापल्या पध्दतीने सामान्य माणसालाही समजेल असे सांगत असते. आणि मग त्याला सारासार विचार, आणि नित्यविवेक अंगी बाणवून स्वार्थाचा लोप करीत सावली देणारा परमार्थ समजून घेणे सोपे जाते. यातील ‘सारासार विचार’ म्हणजे तरी नेमके काय?

पंचमहाभूतांनी बनलेला,जड, म्हणजेच अनित्य या अर्थाने ‘देह’ हा ‘असार’,अशाश्वत आणि नित्य ते शाश्वत या अर्थाने ‘आत्मा’ हा ‘सार’! हा ‘सारासार’ विचार हीच आपल्या ठायी वसणाऱ्या अंतरात्म्यातील परमात्म्याला जाणून घेण्याची पहिली पायरी!या पायरीवरच्या आपल्या पहिल्या पाऊलातच मायेला चिकटलेला स्वार्थ अलगद गळून पडलेला असेल.

‘माया’ या शब्दाच्या वर उल्लेखित अर्थांपेक्षा वरवर अतिशय वेगळा वाटणारा आणखी एक अर्थ आहे.या अर्थाचा वरील सर्व अर्थछटांशी दुरान्वयानेही कांही सबंध नाहीय असे वाटेल कदाचित,पण हा वेगळा भासणारा अर्थही माणसाच्याच जगण्याशी नकळत आपला धागा जोडू पहातोय असे मला वाटते.

शिवताना दोरा निसटू नये म्हणून वस्त्राचा थोडा भाग बाहेर सोडला जातो त्याला ‘माया’ असेच म्हणतात. लाकडावर एका सरळ रेषेत खिळे ठोकताना लाकडाच्या फळीवरचा मोकळा ठेवला  जाणारा थोडा भाग त्यालाही ‘माया’ म्हणतात. कापड कापतानाही अशी थोडी माया सोडूनच कापले जाते.लेखन करताना कागदाच्या डाव्या बाजूला थोडी माया सोडूनच केले जाते.अशा अनेक ठिकाणी जाणिवपूर्वक सोडाव्या लागणाऱ्या जागांचा निर्देश करणारी माया! या मायेला जगताना माणसानेही ‘अहं’ पासून थोडी माया सोडून जगणंच अपेक्षित आहे याचे भान आपण कधीच विसरुन चालणार नाही !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ या माहेरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ या माहेरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कवितेच घर हेच शब्दांचे माहेर. …किती भावस्पर्शी जाणिवा नेणिवेच्या या कवितालयात पहायला मिळतात …… कल्पना  आणि वास्तवता यांच्या नाजूक संवेदनशील पण जागृत  अनुभुतींनी साकारलेल्या या शब्द रचना जेव्हा मनाशी संवाद साधतात ना तेव्हा मनाचा एकटे पणा कुठल्या कुठे पळून जातो.   डोळे आणि मन भरून येत. . .  आठवणींची पासोडी खांद्यावर टाकून  आपण या माहेरात  विसावतो आणि . . .

……अनेक जीवनातील सुख दुःख पचवलेली, जीवनसंघर्ष करीत  कवितेचा शब्दसुतेचा दर्जा देणारी संवेदनशील व्यक्ती मत्वे  ,  मनात रेंगाळत रहातात.  मनातील ताणतणाव  दूर करण्याचा प्रयत्न ही शब्द पालवी करते आणि म्हणावस वाटत  वसंत फुलला मनोमनी

खरंच . . .  ही फुलं फुलतात कशासाठी? माणस माणसांना भेटतात कशासाठी? थोड तुझ थोड माझं परस्परांना समजण्यासाठी . . तसच या माहेरी घडत. या कवितेच्या घरात कवितेचे विविध प्रकार मांडवशोभेसारखे नटून थटून येतात. त्यांच नुसते दर्शन देखील मनाची मरगळ दूर करते.  आजची कविता काय आहे, कशी  आहे  ,  तिच रूप, स्वरूप, तिचा प्रवास याच्या खोलात न जाता मी फक्त  इतकेच म्हणेन  आजची कविता प्रवाही आहे.  सोशल नेटवर्किंग साईट वरून ती लोकाभिमुख होते  आहे.  प्रत्येक कविता  आपला स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करते आहे. हा साहित्य प्रवाह नसला तरी हा जीवनप्रवास आहे माणसातल्या सृजनशील मनोवृत्तींचा . ही निर्मिती माणसाला धरून ठेवते. माणसाशी संवाद साधते. त्याचं एकटेपण दूर करू पहाते. म्हणून कविता महत्वाची आहे. 

कवितेने किती पुरस्कार मिळवले, * आपल्या लेकिच्या अंगावर किती दागिने  आहेत* यापेक्षा  आपली लेक  किती लोकाभिमुख  आहे हे पहाणं मनाला जास्त भावत. मनान मनाशी जोडलेले भावबंध हाच उत्तम कवितेचा पाया असतो. नाते जपताना शब्दांना उकळी  आणून उसन्या गोडव्याने पाजलेला चहा भावाच्या मनात बहिणीची माया उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे कविता लोकांपर्यत किती पोचली तिचा समाजाभिमुख प्रवास कविला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देतो.

माहेर. . . माहेर ..  म्हणजे नेमक काय. ? मनातली दुःख, चिंता, काळजी, ताणतणाव, बाहेर जाताना रांगत्या पावलांनी किंवा  अनुभवी वृद्ध व्यक्तीच्या आश्वासक खोकल्याने घरात कुणीतरी  असल्याची दिलेली चाहूल, शब्दांना भावनांनी दिलेला आहेर म्हणजे माहेर.  हे माहेर ममत्वाचा,मायेचा, माझ्या तला कलागुणांचा सर्वांगीण  अविष्कार करत, माझ माझ म्हणून ज्याला जोजवावं त्या विचारप्रवाहांचा जे स्वीकार करत ते माहेर माणसाला माणूसपण कवितेला घरपण प्राप्त करून देत.

कविता श्लोकातून जाणवायला हवी. अभंगातून निनादत ओवीतून उदरभरण करणा-या , गहू, ज्वारी, बाजरीच्या पिठात  एकजीव व्हायला हवी. कवितेने जुन्याची कास आणि नाविन्याची आस सोडू नये यासाठी हे माहेर प्रत्येक साहित्यिकासाठी फार महत्वाचे आहे.  या माहेरात कुणाला  एकटे सोडायचे अन कुणाला बांधून ठेवायचे हे काम आपले लेखन,  आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग बिनबोभाट करतो. तुलना नावाची मावशी किंवा मंथरा या माहेरात आपल्याला पदोपदी भेटते. ही तुलना मावशी कविच्या कवित्वाचा देखील घात करू शकते.  या माहेरात आपल्या कार्यकरतृत्वाचं गुणांकन करायला दामाजी नाही तर आत्माराम कामी येतो हे ध्यानात ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वतःला  एकट समजाल तेव्हा तेव्हा या माहेरी निःशंकपणे या. पायवाट  आणि हमरस्ता दोन्ही ही आपलीच वाट पाहत  असतात. सुख, समाधान, हाकेच्या अंतरावरच असत त्याचा शुभारंभ या माहेरी होऊ शकतो.

हा प्रवास  ह्दयापासून ह्रदयापर्यतचा असतो. यात शब्द जितका महत्वाचा तितकाच एकेका शब्दासाठी  आपल सारं जीवन वेचणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा. या शब्दालयात ,  माहेरपणात कविता नांदायला हवी.कविनं कविता  अन माणसान कटुता या माहेरी निवांत सोडून द्यावी. कविता तिचा प्रवास करीत रहाते  आणि मनातली कटूता एकटी होती. .  एकटी  आहे. .  एकटी राहिल . .  असा विश्वास देत पुढच्या जीवनप्रवासाला लागते.

धन्यवाद.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं की मला एक निवांतपणा मिळाल्यासारखा वाटतो. जणू काही एखाद्या वेगाच्या घट्ट पकडीतून काही क्षणांनी निसटून जावं आणि हव्या त्या ठिकाणी रेंगाळावं तसं. या क्षणांचं आणि माझं एक वेगळ नातं तयार होतं. जे मला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतं. 

सगळ्यात प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे रस्ता विलक्षण ताकदवान आणि सहनशील होतो, कारण वाहनं थांबलेली असतात. पळणाऱ्या वाहनांचं ओझं रस्त्याला कमी जाणवत असावं असं मला कायम वाटतं. शिवाय अशा अडचणीच्या प्रसंगी थांबलेल्या वाहनांना जास्त वेगाची ओढ असते. त्यांचा वेग सहन करत त्यांना थोपवणं हे काही सोपं काम नाही. वाहनांच्या कचाट्यात सापडलेला हा रस्ता मला धीरोदात्त वाटतो. 

त्याची एक विलक्षण संयत, स्थिर आणि तटस्थ नजर सगळ्यांवर फिरताना दिसते. आणि तोच एक धागा माझ्याही आत तटस्थता निर्माण करायला पुरेसा ठरतो. त्याच्या नजरेतून मग मीही तो रस्ता न्याहाळायला लागते. मी बसलेल्या रिक्षेकडे माझं आधी लक्ष जातं. रिक्षाचालकाचा वैताग त्याच्या वेड्यावाकड्या हातावाऱ्यांतून, आक्रसलेल्या पाठीतून  व्यक्त होत असतो. रागाने नाकावरचा मास्क खाली काढत, विनाकारण स्पीड वाढवत तो उगाच रिक्षा जागच्या जागीच पण मागेपुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतो. इकडे इतका वेळ वेगाने पळणारं मीटर मात्र त्याचा धपापलेला श्वास सोडत बसलेलं दिसतं. आजूबाजूच्या इतर वाहनांचे हॉर्न तर कमालीचे उत्तेजित झालेले दिसतात. वाहनांचे दिवे देखील शेवटचा श्वास लागल्यागत उघडझाप करत राहतात. मधेच एखादा दुचाकीस्वार चिंचोळ्या जागेत स्वतःला माववण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात तो आणि त्याची दुचाकी यांची युती पारच फसलेली दिसते. थकलेल्या शरीराने उसन्या तरुणाईचा जोश आणावा तशी दुचाकीची स्थिती असते. इकडे ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्ट्या वातावरणात कृत्रिम ऑक्सिजन भरण्याचा प्रयत्न करतात. गोंधळेलेल्या सिग्नलचे दिवेही भरकटलेले वाटतात. मध्येच एखादं कुत्र किंवा मांजर सगळ्यांना वाकुल्या दाखवत मिळेल त्या जागेतून निसटत जातं, तेव्हा समस्त वाहनचालकांच्या चेहऱ्यावरचा हेवा त्या मुक्या प्राण्यालासुद्धा जाणवण्यासारखा असतो. रस्त्याकडेची झाडं या कृत्रिम प्रकाशानं जास्त काळवंडल्यासारखी वाटतात.  आकाश मात्र संथपणे मार्गक्रमण करत असतं.   

गुंता सुटण्याची वाट पहात असतानाच गुंता वाढत जातो. तसंतसं माणसांचे चेहरे विलक्षण बोलके होतात. आता स्वतःचा आवेग सहन करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. मग ते आपसांत धुमसू लागतात. दिवसभराचा सगळा ताण बाहेर येतो. प्रत्येकाची ठेवण वेगळी पण भाव एकसारखेच वाटतात. तणावाची एकलय साधली जाते. ही लय माझ्यातल्या ‘ मी ‘ ला जाणवते. कुठेतरी वातावरणातला ताण माझ्या मनातल्या ताणाशी सम पावतो. आत ताण… बाहेर ताण… आता ताणाशिवाय दुसरं काहीच नाही… ना लपवण्यासारखं ना दाखवण्यासारखं. ताणातून बाहेर पडायलाही पुन्हा ताणच. 

माझ्यातला तटस्थ हे सारं निरखत असतो. पण तो या कशालाच प्रतिसाद देत नाही. ना तो हे नाकारतो  ना स्वीकारतो.  हा ताण मला मग हळूहळू स्थिरता देतो.  मी त्याच्या सहवासात  मोकळी होते. माझं मोकळेपण तो स्वीकारतो. आणि हळूहळू सगळ्या वातावरणात तो मोकळेपणा फैलावतो.  मग ताणाचं रूप बदलतं. आणि माझं मन शांत, समंजस होत जातं.  ट्रॅफीक सुटतं. 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares