मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टपैलू आचार्य… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टपैलू आचार्य ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ आॅगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!

पाचवीत असतानाच, माझ्या वडिलांनी ‘मी कसा झालो’ हे अत्र्यांचं पुस्तक वाचायला हातात दिलं.. त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत कसे घडत गेले, ते लिहिलेलं आहे. शाळेत असतानाच ‘श्यामची आई’ हा चित्रपट पाहिला.. तो हृदयस्पर्शी चित्रपट पाहून, मन हेलावून गेलं. दहावीच्या दरम्यान मी वाचनालयातून ‘कऱ्हेचे पाणी’चे पाचही खंड आणून, वाचून काढले.. 

नाटक-चित्रपटांच्या जाहिराती करताना, आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी, मोरुची मावशी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, प्रितीसंगम, ब्रह्मचारी या नाटकांच्या जाहिराती केल्या. थोडक्यात, आचार्य अत्रेंना जरी प्रत्यक्ष मी पाहिलेलं नसलं तरी त्याचं साहित्य वाचून, नाटक व चित्रपट पाहून त्यांना गुरुस्थानी मानलं..

आचार्य अत्रे इतके भाग्यवान की, राम गणेश गडकरींच्या ते संपर्कात होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे शिष्य, राम गणेश गडकरी.. राम गणेश गडकरींचे शिष्य.. आचार्य अत्रे! संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा, आचार्य अत्रे यांच्याच शुभहस्ते बसविलेला आहे.. 

आचार्य अत्रे यांनी शालेय शिक्षणानंतर फर्ग्युसन काॅलेज  व पुणे विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९२८ साली लंडनमध्ये जाऊन टी.डी. ही पदवी घेतली. 

अत्रे यांची साहित्यिक व पत्रकारिता म्हणून कारकीर्द १९२३ च्या ‘अध्यापन’ या मासिकापासून सुरु झाली. २६ साली ‘रत्नाकर’, २९ साली ‘मनोरमा’, ३५ साली ‘नवे अध्यापन’, ३९ साली ‘इलाखा शिक्षक’, ४० साली साप्ताहिक ‘नवयुग’, ४७ साली सायंदैनिक ‘जयहिंद’, ५६ साली दैनिक ‘मराठा’ अशी आहे..

चित्रपटाच्या बाबतीत अत्रे यांनी सुरुवातीला कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. १९३४ साली ‘नारद नारदी’ चित्रपटापासून या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. ३८ साली ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा लिहिली. त्यांच्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटानेही अफाट लोकप्रियता मिळवली. १९५४ सालातील ‘श्यामची आई’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळविले. 

आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.

आचार्य अत्रे यांची भाषणे त्याकाळी फार गाजलेली होती. सदानंद जोशी यांनी ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री प्रयोगातून त्यांच्या भाषणकलेचा आस्वाद अनेक वर्षे प्रेक्षकांना दिला. 

१३ जून हा दिवस, पाश्चिमात्त्य देशांत अशुभ मानला जातो.. १९६९ साली त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात देखील आला.. याच दिवशी आचार्य अत्रे, अनंतात विलीन झाले.. त्यांचा जन्मही १३ तारखेचा व मृत्यूही १३ तारखेलाच.. विलक्षण योगायोग! त्यांना जाऊन ५३ वर्षे झालेली आहेत.. मात्र अजूनही ते आपल्याला पुस्तकातून, भाषणांतून, नाटकांतून, चित्रपटांतून आसपासच आहेत असं वाटतं.. खरंच अशी मोठी माणसं जरी शरीराने गेलेली असली तरी त्यांच्या कर्तुत्वाने शतकानुशतके, अमरच असतात..

आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!!

© सुरेश नावडकर

१३-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने— श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुति – सुश्री गीता पटवर्धन ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने— श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुति – सुश्री गीता पटवर्धन ☆

(पुरोगाम्यांना कारल्याचा रस.)  

सावित्री सत्यवान , करवा चौथ या सारख्या प्रथांच्या मध्ये पुरुष प्रधान आणि स्त्री शोषण संस्कृती शोधणाऱ्या निर्बुद्ध आत्म्याच्या साठी… 

सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर, अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.

अशा सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अशा सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्यानंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.

इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या.. 

त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. 

जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे– तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याच प्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे पण तो अल्पायु आहे हे समजते. 

परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे. 

नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत– एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). 

ती पहिल्या वरदानात सासऱ्यांच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. 

ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्या क्षणी सुद्धा जागा असतो. 

सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.

आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्री कडे पाहू शकतो. 

राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्यासारखा आहे. 

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे. 

जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्यासाठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.

ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने, आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.  

यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत. या कथेत पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष शोधणाऱ्या लोकांना माझा प्रश्न :— ज्या प्रमाणे सावित्री स्वतःला हवा तो वर निवडते आणि त्या पुढील घडणाऱ्या घटनाक्रमाची जबाबदारी घेते, इतके स्वतंत्र आणि परिपक्व तुम्ही तुमच्या मुलीला वाढवले आहे का? तिने तसे वागले तर तुम्हाला चालेल पटेल का ? तुम्ही तुमच्या मुलीला तितके स्वातंत्र्य दिले आहे का ?—-

लेखक : श्री सुजीत भोगले

संग्राहिका : सुश्री गीता पटवर्धन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वक्ता दशसहस्रेषु ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ वक्ता दशसहस्रेषु ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यापैकी ‘वक्ता’ हा एक झळाळणारा पैलू. तो त्यांनी कष्टपूर्वक साध्य केला होता.

त्यांचं पहिलं भाषण म्हणजे चौथीत असताना वर्गात सांगितलेली गोष्ट. पाठ केलेलं आठवेना. मग प्रत्येक वाक्यानंतर ‘झालं’-‘झालं’ करत पुढचं वाक्य

आठवायचे. मग ‘झालं’ म्हटलं, की वर्गात हशा पिकू लागला. अभावितपणे का होईना, त्यांच्या विनोदी भाषणाची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली.

पुढे इंग्रजी चौथीत गेल्यावर त्यांनी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला. भाषण तोंडपाठ केलं. खणखणीत आवाजात त्यांनी केलेल्या या भाषणाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. ‘हशा आणि टाळ्या’मधल्या टाळ्यांची ही सुरुवात.

यामुळे त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला, की पुढची लागोपाठ तीन वर्षे ते वक्तृत्वस्पर्धेत पहिले येत राहिले.

काही विद्यार्थी सासवडला दरवर्षी नाटक करीत. तेव्हा पडद्याबाहेर येऊन, प्रेक्षकांना “आणखी एक अंक झाल्यावर नाटक संपेल,” हे प्रेक्षकांना सांगण्याचे काम अत्रे करत. त्यामुळे पूर्वतयारी न करता बोलायची सवय झाली व श्रोत्यांचे भय वाटेनासे झाले.

कॉलेजच्या चार वर्षांत त्यांनी मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने काळजीपूर्वक ऐकून त्यांचा अभ्यास केला.

लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, केशवराव छापखाने, श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर, दादासाहेब खापर्डे, अच्युतराव कोल्हटकर वगैरे वक्त्यांच्या वक्तृत्वशैलीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी खापर्डे व कोल्हटकरांच्या वक्तृत्वाचा अत्रेंच्या मनावर अतिशय परिणाम झाला.

दादासाहेब खापर्डे हे त्या काळातील एकुलते एक विनोदी वक्ते होते. घरगुती पद्धतीने गोष्टी सांगत ते श्रोत्यांना हसवत, तल्लीन करून टाकत.पण त्यांच्या  व्याख्यानात विनोदाखेरीज इतर रसांचा परिपोष कमीच असे.

अच्युतराव कोल्हटकर मात्र कोणत्याही रसाचा परिपोष लीलया करत. प्रभावी व्यक्तिमत्त्व, ऐट,वजनदार आवाज, वाङ्मयीन संदर्भ देत केलेले मार्मिक, परिणामकारक बोलणे यांची श्रोत्यांवर छाप पडे. पहिल्या दोन-चार वाक्यांतच ते टाळ्या घेत किंवा हशा पिकवत. पुढे भाषणातील रस आणि गती ते अशी काय वाढवत नेत, की मुख्य मुद्दा आला की टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होई. त्या काळात ते अग्रगण्य राजकीय वक्ते होते. अत्रे त्यांना गुरुस्थानी मानत.

पुढची काही वर्षे अत्रेंची भाषणे फारशी ‘जमली’ नाहीत.

बी.टी. चा पद्धतशीर व जीवन तोडून अभ्यास केल्यामुळे ते पहिल्या वर्गात पहिले आले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.

‘गडकरी स्मृतिदिना’निमित्त दिलेल्या व्याख्यानात, कोणतीही तयारी न करता, गडकऱ्यांची व आपली पहिल्याने ओळख कशी झाली, ते घरगुती भाषेत सांगून (दादासाहेब खापर्डे शैलीत) श्रोत्यांचे ‘हशे’ मिळवले.उत्तरार्धात  अच्युतराव कोल्हटकरांप्रमाणे नाटकी स्वर वाढवून कडकडून टाळ्या घेतल्या. या व्याख्यानापासून, त्यांच्या विशिष्ट शैलीची सुरुवात झाली.

पुढे इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. पी. बी. बॅलार्ड यांची व्याख्याने अत्रेंनी ऐकली व अभ्यासली. मानसशास्त्रासारखा अवघड विषय ते गोष्टी सांगून मनोरंजक करीत.

इंग्लंडहून परत आले, तेव्हा त्यांचे शरीर भारदस्त झाले होते.ही वक्त्यासाठी जमेची बाजू.

गडकरी स्मृतिदिनाचे अध्यक्ष म्हणून अत्रेंनी ठणठणीत आवाजात व स्पष्ट भाषेत बोलायला सुरुवात करून तिसऱ्याच वाक्यात कोटी केली, तेव्हा हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नंतरही दोन-तीन वाक्यांनंतर ‘हशे’ घेत राहून श्रोत्यांना कह्यात घेतलं. मधेच काही कारणाने सभा बिनसते की काय, अशी भीती वाटल्यावर विनोद सोडून देऊन ‘अच्युतरावी’  पद्धतीचा अवलंब केला. एकूण, वक्ता म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.

गर्दीचे मानसशास्त्र अत्रेंना पक्कं ठाऊक होतं. ठणठणीत आवाजात पहिलं वाक्य बोललं, की वक्ता घाबरलेला नाही, याची खात्री पटून श्रोते शांत होतात. पहिल्या दोन-चार वाक्यांत त्यांना हसवलं, की पुढचा मार्ग मोकळा.

काही श्रोत्यांना मध्येच काहीतरी बोलण्याची सवय असते. त्याचा अगोदरच अंदाज बांधून त्यांची उत्तरे अत्रे आधीपासूनच ठरवून ठेवत. श्रोत्यांवर मात्र त्या प्रसंगावधानाचा प्रभाव पडे.

श्रोत्यांनुसार ते आपली वक्तृत्वशैली ठरवत असत. लहान मुलांसमोर सोपे, बुद्धिमान कॉलेजयुवकांसमोर विनोदी, तर गंभीर चेहऱ्याच्या प्रौढ व वृद्ध लब्धप्रतिष्ठितांसमोर प्रारंभीच ते वीररसाचा अवलंब करत असत.

सुरुवातीला अत्रे व्याख्यानाचे सर्व मुद्दे, संदर्भ, कोट्या यांची नोंद करून, टिपणे नीट तोंडपाठ करून, टिपणे हातात न घेताच ते तसंच्या तसं बोलत. नंतरनंतर मात्र व्याख्यानाला जाण्यापूर्वी पाच- दहा मिनिटे मनातल्या मनात मुद्द्यांची उजळणी करत.

राजकीय विषयांवर, पन्नास हजारांपासून एक लाखपर्यंत श्रोत्यांसमोर बोलताना विनोदी पद्धती, बेडर वृत्ती व ठणठणीत प्रकृती यांचा अत्रेंना खूपच फायदा झाला.

अत्रेंच्या मते व्याख्यान रंगणे हे वक्त्यापेक्षा जास्त श्रोत्यांवर अवलंबून असतं.

दहा हजार माणसांत एखादाच वक्ता सापडतो, या अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. पण अत्रेंच्याच शब्दांत सांगायचं, तर अत्रेंसारखा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आचार्य अत्रेंची काव्य सृष्टी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “आचार्य अत्रेंची काव्य सृष्टी ” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठीतील एक बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे. ते नामवंत लेखक,  नाटककार, कवी,  संपादक,  चित्रपट निर्माते,  शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्कृष्ट वक्ता होते.

त्यांनी तो मी नव्हेच,  घराबाहेर,  बुवा तेथे बाया,  मी मंत्री झालो,  मोरूची मावशी,  लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार यासारखी अनेक गाजलेली नाटके लिहिली. कथासंग्रह, क-हेचे पाणी हे आत्मचरित्र, कादंबरी, इतर असंख्य पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकाच्या निमित्ताने विपुल लेखन केले. चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले.त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले ‘सुवर्ण कमळ’ मिळाले.

त्यांनी ‘केशव कुमार’ या नावाने कविता लेखन केले. केशवकुमार म्हटले की आठवतात ती  ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. झेंडूची फुले हा विडंबनात्मक कविता संग्रह जगद्विख्यात आहे. या काव्य लेखनाला त्यांनी स्वतंत्र स्थान मिळवून दिले. झेंडूची फुलेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा याबाबत मान्यवरांचे सविस्तर विचार या पुस्तकात दिलेले आहेत. कविवर्य केशवसुतांची “आम्ही कोण ?” ही प्रसिद्ध कविता. या कवितेचे आचार्य अत्र्यांनी केलेले विडंबनही लोकप्रिय झाले.

केशवसुत —

आम्ही आम्ही कोण म्हणूनी काय पुससी ? आम्ही असू लाडके |

देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळायला |

———-

आम्हाला वगळा – गतप्रभ जणी होतील तारांगणे

आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे|

आचार्य अत्रे —

आम्ही कोण ? म्हणून काय पुसता?दाताड वेंगाडुनी ?

फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला ? ||

————

आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील साप्ताहिके 

आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके ||

यावरून या पुस्तकाची झलक लक्षात येते.

अत्र्यांनी इतर काही चित्रपट गीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. ती आजही लोकप्रिय आहेत. १.छडी लागे छम छम, २.भरजरी ग पितांबर (दोन्ही चित्रपट श्यामची आई), यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया (चित्रपट ब्रह्मचारी), १.प्रेम हे वंचिता| मोह ना मज जीवनाचा ||२. प्रिती सुरी दुधारी ( दोन्ही नाटक पाणिग्रहण), किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार (नाटक प्रितिसंगम) त्यांच्या काही  प्रसिद्ध कविता बालभारती या पुस्तकात समाविष्ट आहेत उदा.आजीचे घड्याळ, माझी शाळा. त्यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ ही एक मस्त वेगळीच मजा प्रेमकविता आहे. दिवस रात्रीच्या वेळा, सूर्याची स्थिती, कोंबड्याचे आरवणे, रात्री वाजणारा चौघडा यावरून आजी वेळ अचूक सांगत असे. पण कुठेही न दिसणारे, न वाजणारे हे आजीचे घड्याळ म्हणूनच मुलांना कुतूहलाचे वाटते.

शाळेची प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी त्यांची प्रसिद्ध कविता म्हणजे ‘माझी शाळा’.

ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही, जसा माऊली बाळा ||

इथे हसत खेळत गोष्टी सांगत गुरुजन शिक्षण देतात. बंधुप्रेमाचे धडे मिळतात, देशकार्याची प्रेरणा मिळते, जी मुलांना देशासाठी तयार करते त्या शाळेचे नाव आपल्या कार्यातून उज्वल करा अशी शिकवण अतिशय सोप्या शब्दात ही कविता देते.

असेच त्यांचे खूप गाजलेले गीत म्हणजे ‘भरजरी गं पितांबर’. ‘श्यामची आई’ या चित्रपटातले हे गीत आजही लोकप्रिय आहे. बहीण भावाचे नाते, त्यातली प्रीती, श्रीमंतीचा बडेजाव, परमेश्वर स्वरूप भावासाठी सर्वस्व देण्याची समर्पण वृत्ती अशा वेगवेगळ्या मानवी स्वभाव छटांवर हे गीत अप्रतिम भाष्य करते. “चिंधीसाठी शालू किंवा पैठणी फाडून देऊ काय ?” असे विचारत सख्ख्या बहिणीने चिंधी दिली नाही. तर मानलेल्या बहिणीला वसने देऊन तिची लाज राखत पाठीराखा झालेल्या भावासाठी मानलेल्या बहिणीने त्रैलोक्य मोलाचे वसन भक्तीभावाने फाडून दिले. यासाठी अंत:करणापासून ओढ वाटली पाहिजे तरच लाभाविण प्रीती करता येते. नात्यांचे महत्त्व, त्यांची जपणूक अतिशय सोप्या, सुंदर शब्दात सांगितलेली आहे. आजच्या काळातील बदलत्या मानसिकतेला तर हे गीत छान मार्गदर्शन करते. अशा प्रकारे कविता, विडंबन काव्य, चित्रपट गीते, नाट्यगीते अशा विविध प्रकारात आपला ठसा उमटविणारी आचार्य अत्रे यांची अतिशय विलोभनीय, समृद्ध आणि लोकप्रिय काव्यसृष्टी आहे.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.🙏

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) ☆ सौ राधिका भांडारकर ☆

१३ जुन हा प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने…

वास्तविक आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ही काही शब्दांत किंवा काही वाक्यात करणे अत्यंत अवघड आहे. अनेक विविधांगी क्षेत्रांमध्ये त्यांचा अफाट वावर होता. ते  मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार ,संपादक ,पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकारणी आणि वक्ते होते.  कुठलेही क्षेत्र त्यांच्यापासून सुटले नाही.  आणि प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं स्थान हे नामांकित होतं.

काव्य लेखनापासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. १३ ऑगस्ट१८९८  साली पुरंदर तालुक्यात ,कोडीत खुर्द या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला.

बीए ,बीटी,टीडी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या चळवळीचे ते प्रमुख नेते होते . असं म्हणतात की त्यांच्या नेतृत्वामुळेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण यशस्वी झाला.

महाराष्ट्राचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. अध्यापन हे त्यांचं पहिलं मासिक. त्यानंतर रत्नाकर ,मनोरमा, नवे अध्यापन ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जय हिंद, मराठा अशी दैनिके ही त्यांनी सुरू केली.  आणि या माध्यमातून त्यांच्या जबरदस्त लेखणीचे फटकारे लोकांनी अनुभवले.

कधी पत्रकार कधी शिक्षक कधी राजकारणी तर कधी एक साहित्यिक म्हणून त्यांनी आपली परखड आणि सुदृढ मते समाजापुढे मांडली.

साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा अशी त्यांची एकाहून एक अनेक नाटके रंगभूमीवर गाजली.  विनोदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगतीला  सहज चिमटे काढले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्य संग्रह अतिशय लोकप्रिय ठरला.

आचार्य अत्रे व कवी गिरीश या दोघांनी मिळून संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठी क्रमिक पुस्तके पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमात होती. यानंतर निघालेल्या पुस्तकांची या अरुण वाचनमालेशी तुलना होऊच शकत नाही, हे शिक्षण वर्तुळातील लोकांचे आणि पालकांचेही मत आहे.

श्यामची आई या सानेगुरुजी लिखित कादंबरीवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. आणि त्यास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून पहिलं सुवर्णकमळ मिळालं.

अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघंकधीही विस्मरणात जाउ न शकणारे, महाराष्ट्रातील अफाट  विनोदवीर. ज्यांनी खरोखरच लोकांना सहजपणे खळखळून हसवलं.

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ खूप मोठे होते. एकदा एका ग्रामीण भागात दौरा करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना म्हटले,

” तुम्ही सरकारला विधानसभेत कोंडीत पकडता पण त्यांच्या

एवढ्या मोठ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे  कसे काय पुरणार?

 तेव्हा अत्रे त्याला म्हणाले,

” तुझं शेत आहे ना?”

” हो साहेब”

” कोंबड्या पाळतोस ना?”

” व्हय तर!”

” किती कोंबड्या आहेत?”

त्याने छाती फुगवून म्हटले ,

” चांगल्या शंभरेक हायत की..”

” आणि कोंबडे किती?”

” कोंबडा फकस्त एकच हाय.”

“मग एकटा पडतो का तिथे?”

जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला. अत्र्यांच्या या हजरजबाबीपणा मुळे अनेकांना त्यांनी जागीच गप्प केले होते.

अत्र्यांच्या साहित्यावर सावरकरांचा प्रभाव होता.  त्यांची आणि सावरकर यांची पहिली भेट रत्नागिरी येथे झाली होती. त्याविषयी ते म्हणाले होते,

” सावरकरांचा सतेज गौरवर्ण, आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर अविस्मरणीय प्रभाव झाला. माझा अंतरात्मा तृप्त झाल्यासारखा वाटला.”

 सावरकर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर १४ लेख लिहिले होते. आणि ते अत्यंत प्रभावी आणि वाचनीय ठरले. सावरकराना प्रथम स्वातंत्र्यवीर म्हणणारे आचार्य अत्रेच होते.

” जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही. आणि तृप्ती कधी होत नाही.” असे आचार्य अत्रे म्हणत. इतकी त्यांची जीवनावर निष्ठा होती.

बाबासाहेब आंबेडकर आणि अत्रे यांची  विशेष मैत्री होती. आणि त्या दोघांनी एकमेकांच्या मतांचा नेहमी आदर राखला.

अशा या बहुगुणी. समृद्ध व्यक्ती विषयी बोलताना,राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, राईटर अंड फायटर ऑफ महाराष्ट्र! असा त्यांचा उल्लेख केला होता.

साहित्यिक वर्तुळात ते केशवकुमार म्हणून प्रसिद्ध होते. आजीचे घड्याळ ही आजही आठवणीत असलेली त्यांची कविता केशवकुमार या नावाने प्रसिद्ध झाली होती. आचार्य अत्रे हे खरोखरच एक अद्भुत रसायन होते! त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती.  तशी त्यांच्या कटू जिव्हारी लागणाऱ्या वाक्बाणांनी  दुखावली गेलेली माणसं ही खूप होती..

कर्हेचे पाणी ..हे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगणारे पाच खंडात असलेले २४९३ पानी आत्मनिवेदन.  .”महाराष्ट्राच्या उद्धारासाठी नि संरक्षणासाठी तत्कारणि देह पडो ही असे स्पृहा….” असे म्हणून त्यांनी या पुस्तकाचा पाचवा खंड प्रकाशित केला. शेवटच्या परिच्छेदात ते म्हणतात, “हर्षाच्या आणि संतोषाच्या या मधुर धुंदीत, महाराष्ट्र मातेच्या चरणावर मस्तक ठेवून, अर्धोन्मिलीत नेत्रांनी काही काळ मला आता निश्चल पडू द्या…”

 यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. तो दिवस होता १३ जून १९६९.

असं हे अत्रे तत्रे सर्वत्रे व्यक्तिमत्व अनंतात लोप पावले.

पण आजही ते लोकांच्या मनामनात अमर आहे.

 त्यांच्या स्मृतीस अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली🙏

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 21 – पाथेय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 21 –पाथेय डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर, त्यांच्या कडून मिळालेले परमपावन असे संचित नरेंद्र नाथांच्या जीवनाचे अक्षय असे पाथेयच होऊन गेले होते. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधी नंतर लवकरच काशीपूरचे उद्यानगृह सोडणे भाग होते. नाहीतर फाटाफूट होऊन हे बालसंन्यासी जर चहूकडे विखुरले तर, त्या देवमानवाच्या आदर्शांचा प्रचार करणे तेव्हाढ्यावरच थांबेल. त्यांच्या पैकी प्रत्येकाला गुरुदेवांकडून ज्या साधनेचा आणि आदर्शांचा  लाभ झाला आहे, त्या सर्व साधना आणि आदर्श एकत्र केंद्रीभूत करायला हवेत.

सर्वजण संघबद्ध होण्याची गरज आहे . आता सेवेच्या निमित्त का असेना सर्वजण एकत्र राहिल्यामुळे एकमेकात  स्नेह व प्रेम निर्माण झाले होते. हे सगळे वैराग्यशील तरुण संन्यासी निराश्रितांसारखे वणवण भटकत फिरतील ही कल्पना नरेंद्रनाथांना कशीशीच वाटली. इतर गृहस्थ भक्तांनाही ते पटले. त्यामुळे नरेन्द्रनाथ सर्वांना त्या दिशेने प्रोत्साहन देऊ लागले.

सुरेन्द्र्नाथ मित्रांनी वराहनगर भागात त्याना एक घर भाड्याने घेऊन दिले. गुरूंचा रक्षाकलश आम्हीच नेणार यावरून भक्तांमध्ये वाद सुरू झाला. “महापुरुषांच्या देहावशेषांवरून शिष्यांमधे वाद होणं नेहमीचच आहे, पण आपण संन्यासी आहोत. आपणही तसंच वागणं योग्य नाही. श्रीरामकृष्णांच्या  जीवनातला आपल्या समोरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आपले जीवन घडविणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे. रक्षा कलशावर ताबा ठेवण्यापेक्षा त्यांची शिकवणूक आचरणात आणणं आणि त्यांचा संदेश दूरवर पोहोचवणं खर महत्वाचं आहे”. नरेन्द्रनाथांच्या या सांगण्यावरून हा वाद मि टला.

कृष्णजयंतीच्या दिवशी रक्षाकलश नेऊन त्याचे काकुडगाछी  इथल्या रामचंद्रांच्या उद्यानात विधिवत स्थापना केली. रामचंद्र हे श्री  श्रीरामकृष्णांच्या सहवासात सर्वात आधी आलेले. इथे पुढे समाधी व छोटे मंदिर उभे राहिले. रामकृष्ण संघाने १९४३ साली ते ताब्यात घेतले आणि तिथे आज रामकृष्णमठ उभा आहे.

हा प्रश्न सुटला. आता काशीपूरचे उद्यानगृह सोडावे लागणार होते. श्रीरामकृष्णांना उपचार चालू असताना कलकत्त्या जवळच एक शांत, एकांत आणि गर्दीपासून दूर अशा गोपालचंद्र घोष यांच्या हवेशीर उद्यानगृहात हलवले होते. महिना ऐंशी रुपये भाडे होते. ते सुरेन्द्रनाथ भरत होते. श्रीरामकृष्णांचे  अखेरचे पर्व इथेच संपले होते. इथेच अनेक महत्वाच्या घटना घडामोडी घडल्या होत्या. काशीपूरचे हे उद्यानगृह खाली केल्यावर सर्व शिष्य इकडे तिकडे पांगले, शिष्यांच्या समोर आता बिकट परिस्थिति निर्माण झाली होती.

गुरूंच्या महासमाधी नंतर महिन्याभारतच सुरेन्द्रनाथांना गुरूंचा दृष्टान्त झाला की, रामकृष्ण म्हणतात, “ माझी मुलं तिकडं रस्त्यावर वणवण करताहेत आधी त्यांची काहीतरी व्यवस्था कर”. ते तत्काळ  उठून नरेंद्र नाथांना भेटायला आले आणि हे त्यांना सांगितले. आणि त्यावरील उपाय म्हणून तुम्ही एक भाड्याची जागा बघा आणि तिथे सारे शिष्य एकत्र राहू शकाल. आम्ही गृहस्थाश्रमीशिष्य इथे अधूनमधून येत राहू. काशीपूरला मी काही रक्कम मदत म्हणून देत होतो ती इथे देईन. जेवणाचा प्रश्न नव्हता भिक्षा च मागणार होते सर्व.

वराहनगर मधली भुवन दत्त यांची एक जुनी पुराणी मोडकळीस आलेली वास्तु अकरा रुपये भाड्याने मिळाली. नरेंद्र नाथांबरोबर इतर शिष्य तिथे राहू लागले. तळमजला खचलेला, गवत वाढलेले, उंदीर, घुशी, साप आजूबाजूला. डासांचे साम्राज्य, भिंतीचे खपले निघालेल्या अवस्थेत, झोपण्यासाठी चटया आणि उश्या, भिंतीवर देवदेवतांची चित्रं, येशुचे ही चित्रं, एका भिंतीवर तानपुरा, झांजा आणि मृदंग अशी वाद्ये. त्याच खोलीत धर्म, तत्वज्ञान, व इतिहास यावरील शंभर ग्रंथ पलंगावर ठेवलेले,

अशी सर्व दुर्दशा असूनही नरेंद्रनाथांना त्यांच्या गुरुबंधुना ही जागा पसंत होती. कोणाचाही त्रास न होता आपली साधना निर्वेधपणे करता येईल याचाच त्यांना आनंद होता. पुढे पुढे मठातील संख्या वाढली तसे सुरेन्द्र नाथ ३० रुपये ते चाळीस, पन्नास, शंभर अशी वाढवून रक्कम देत होते, ते अगदी हयात असे पर्यन्त. त्यामुळे नरेंद्रनाथांना व्यवस्था करणे सोपे गेले. हाच तो वराहनगर मठ. नरेंद्र आणि गुरुबंधु यांनी कठीण प्रसंगातून जिद्दीने, कठोर तपश्चर्या  केली आणि सुरेन्द्रनाथांनी रोजच्या गरजाही भागविल्या म्हणून हा मठ उभा राहिला. विवेकानंदांनी याची आठवण सांगतांना म्हटलंय, “परिस्थिति जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते”.

वराहनगर मठात पुजागृहात श्रीरामकृष्ण यांची प्रतिमा ठेवली होती, रोज यथासांग पुजा होत होती. आरती,भजन, नामसंकीर्तन रोज होई. एक दिवस नरेंद्रच्या मनात आलं, ‘आपण सर्वांनी विधिपूर्वक संन्यास घ्यावा. तशी श्रीरामकृष्ण यांनी दीक्षा दिलीच होती. पण परंपरागत धार्मिक विधींची जोड दिली तर एक अधिष्ठान लाभेल असं त्यांना वाटत होतं. येथवरचं आयुष्य पुसलं जाईल आणि सर्वांच्या मनावर संन्यासव्रताचा संस्कार होईल’. 

दिवस ठरवला. सर्व गुरुबंधू एक दिवस गंगेवर स्नान करून आले, श्रीरामकृष्णांच्या प्रतिमेची    नेहमीप्रमाणे पुजा करून, आवारातील बेलाच्या झाडाखाली विधिपूर्वक विरजाहोम करण्यात आला.  होमकुंडातील पवित्र अग्नीची आहुती संपली. विधी पूर्ण झाल्यावर, नरेन्द्रनाथांनी राखालला ब्रम्हानंद , बाबूरामला प्रेमानंद, शशिला रामकृष्णानंद, शरदला सारदानंद, निरंजनला निरंजनानंद, कालीला अभेदानंद, सारदाप्रसन्नला त्रिगुणतीतानंद, अशी नावे दिली. तारक आणि थोरला गोपाल यांना काही दिवसांनंतर शिवानंद आणि अद्वैतानंद अशी नावं दिली.

लाटू आणि योगेन्द्र यांना नंतर अद्भुतानंद, आणि योगानंद तर, हरी यांना तुरीयानंद अशी नावे देण्यात आली. हिमालयतून परत आल्यावर गंगाधरला अखंडांनंद हे नाव दिलं. सुबोध यांना सुबोधानंद ,हरिप्रसन्न यांना विज्ञानानंद शशीला रामकृष्णानंद आणि स्वताला विविदिशानंद हे नाव घेतले. पण अज्ञात संन्यासी म्हणून भ्रमण करत असताना नरेन्द्रने विवेकानंद आणि सच्चिदानंद अशी नावे घेतली होती त्यातले अमेरिकेला जाण्यासाठी भारताचा किनारा सोडताना त्यांनी १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले आणि हेच नाव पुढे विख्यात झालं. एखादी संस्था, संघटना किंवा संघ उभा करायचा, त्याचा प्रचार करायचा, तेही अनेकांना सोबत घेऊन. हे काम किती कठीण असतं ते या वरून लक्षात येईल.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यवहारचातुर्य… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

??

☆  व्यवहारचातुर्य… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

 आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं…

“माझं चुकलं..” असं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो… 

कुणाशी वाद घालत बसण्यात आता काही मजाच उरली नाही …

पहिल्यासारखं, भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा कराविशी वाटतं नाही आता …

आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो…

लोक आपल्याला चुकीचे समजतील याचंही काहीच वाटतं नाही आता …

“चूक की बरोबर” या पलिकडे पण एक जग असतं. तिथे फक्त मौनी शांतता असते…

आधीच दुनिया खूप पुढे चाललीय, लोक फार वेगाने धावतायत्, या सगळ्यात आपण मागे राहू याची भीती वाटायची पूर्वी – टेन्शन यायचं …पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं …

कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते…

आता पुढे जाणार्‍याला वाट करून द्यायची आणि आपण आपले कडेच्या साइड पट्टीवरून निवांत चालत राहायचं …

वाटेत सुखं मिळतील… 

तशी दु:खंही मिळतील …

हसायचं, रडायचं … 

ते आतल्या आत …

पण चालत राहायचं … !

पण चालत राहायचं … !!

लेखक : अनामिक

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!! आता, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये, आम्हाला आमचा ‘खरा’ इतिहास शिकवला जाईल ..!!

वाचा …

समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!

अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, 

दुष्ट होता ..!!

.. त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!!

ती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

तैमुरच्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखाने, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!

राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!

उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश, धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!

आमने सामने लढून आपला निभाव, तैमुरसमोर लागणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले ..!!

जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले ..!! गावोगावचे तरुण लढण्यासाठी

 आले ..!!

पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्याने, त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते ..!!

तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग ह्यांनी, त्या सर्व ‘सेनेला’ प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली ..!!

इसवी सन 1305 मध्ये, हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते ..!! इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते ..!!

यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या ‘हिरव्या’ संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते ..!!

यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती ..!!

सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनिमयास बसली .. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता .. गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या .. सर्वानी एकमताने ठराव मंजूर केला की, स्त्री सेना तयार करून, त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे ..!! अशाप्रकारे, तब्बल ४५,००० युवतींची ‘स्त्री सेना’ तयार 

झाली ..!! त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ..??

उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात, रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला ..!!

लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारीचे मन पेटून उठत होते ..!!

अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे ..!! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे .. त्यासाठी रामप्यारी रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे .. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते ..!! 

गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्यामागे ठामपणे उभे राहिले होते .. एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले ..!! 

इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर, आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे .. तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता, आणि सर्वाना पटला होता ..!!

*मग काय .. गावोगावी अशी व्यायाम शिबिरे होऊ लागली ..!!

सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!!

क्रमशः…

 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साने गुरुजींचे पुस्तक – शामची आई ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? विविधा ?

☆ साने गुरुजींचे पुस्तक – शामची आई ☆ सौ अंजली दिलीप गोखले

“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”

संपूर्ण मानवतेला एका ओळीत मार्गदर्शन करून काव्य समजावून देणाऱ्या साने गुरुजींना वंदन !

मराठी साहित्या मध्ये साने गुरुजींचे”श्यामची आई” हे पुस्तक म्हणजे मातृ प्रेमाचा मुकुटमणी आहे.

सध्याच्या मतलबी जगामध्ये,निर्मळ मनाची, प्रेमळ , अतिशय संवेदनशील मन असणारी व्यक्ती होऊन गेली असे सांगितले तर पटणे कठीण.पण खरेच मऊ मेणाहुनी द्ददय असणारे होते गुरुजी आणि ते तसे घडले त्यांच्या परमप्रिय मातेमुळे .

कोकणामध्ये गरिबीमध्ये राहून, स्वाभिमानाने , इतरांना मदत करत, कसे जगावे, सर्वांवर प्रेम कसे करावे हे आपल्या आईने कसे शिकवले , कसे घडवले , हे,  गुरुजींनी स्वातंत्र्यासाठी कारावासात असताना सांगितलेल्या कथा म्हणजे पुढे तयार झालेले पुस्तक श्यामची आई .नाशिकच्या तुरुंगात जन्माला आलेले ऋदयस्पर्शी भावनिक बाळ म्हणजे श्यामची आई .तुरुंगातील 42 पैकी 36 रात्री गुरुजींनी आपल्या आईचे सर्वांग सुंदर संस्कार क्षम अंतरंग उलगडून दाखवत सर्वांना अश्रूंनी ओले चिंब भिजवून टाकले .

गुरूजी सांगतात,”आपल्यामध्ये फक्त , प्रेम, दया असून भागत नाही , तर, प्रेम ज्ञान आणि शक्ती हे महत्त्वाचे तीन गुण सुद्धा हवेतच.प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. आपला स्वतःचा हा विकास आईच्या रोजच्या जीवनाच्या अनुभवातून कसा घडत गेला त्या आठवणींचा मधुर ठेवा आपल्याला श्यामची आई मध्ये वाचायला मिळतो.

माणसानी माणसाशी माणसा सम कसे वागावे हे आईनेच त्यांना शिकवले .जात, पात न  मानता, गरीब भुकेल्यालाआपल्याकडे जे अन्न आहे त्यातलाच घास देऊन त्याची भूक कशी भागवावी हे आईने त्यांना कृतीतून शिकवले.

पाय घाण होऊ नयेत म्हणून आईच्या पदराला वरून चालत येणाऱ्या श्यामला आई समजावते,”श्याम,शरीराला घाण लागू नये म्हणून जेवढं जपतोस, तेवढंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.”धन्य ती माऊली आणि धन्य ती चा सुपुत्र जो हे ऐकतो मानतो आणि मित्रांना ही आवर्जून सांगतो.

आईने श्यामला देवभक्ती देशभक्ति शिकवलीच .  त्याच बरोबर मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला, त्यांच्यावर माया करायलाही .  कष्ट  करायला, काम  करायला, मदत करायला लाजायचे नाही हे श्याम आईकडूनच शिकला .प्रत्येक प्रसंगातून आईने आपल्या मातृ गाथेतून मार्ग दाखवला आणि ते सगळे प्रसंग लक्षात ठेवून आठवणीने तुरुंगामध्ये सोबती ना सांगून मातृ ऋणही श्यामने फेडले .

श्यामची आई हे पुस्तक हृदयाचा ठाव घेणारे आहे .हे पुस्तक वाचून आपोआप डोळे भरून वाहू लागले नाहीत तर ती व्यक्ती खरोखरच पथ्य राहून कठोर मनाची म्हंटली पाहिजे .

आईची शिकवण श्यामच्या श्वासामध्ये मनामध्ये इतकी खोलवर रुजली होती की त्या आठवणींचा वृक्ष पुस्तकाच्या रुपाने झाला .

जीवनातील संस्कारक्षम अंतरंग, प्रेमान, भावपूर्ण स्पर्शानं ओथंबलेले काव्य म्हणजे श्यामची आई.

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

श्री गौतम रामराव कांबळे

परिचय

शिक्षण: एम्.ए.(इतिहास), एम्.ए.(समाजशास्त्र), एम् एड्.;बी.जे.,डी.एस.एम्.

साहित्यिक वाटचाल:

  • कोकण मराठी साहित्य संमेलन,चिपळूण,नवोदित कविसंमेलन,वसई;अ.भा.मराठी साहित्य संमेलन,यवतमाळ यात सहभाग.
  • आकाशवाणी रत्नागिरीवरून स्वरचित लोकगीतांचे सादरीकरण
  • दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रम निर्मिती सहकार्य आणि भारत निर्माण माहितीपटात भूमिका.
  • विविध दैनिके,साप्ताहिके,दिवाळी अंक यातून सातत्याने लेखन.

पुरस्कार:

  • काव्यशिल्प पुरस्कार,जनसेवा ग्रंथालय,रत्नागिरी.
  • राज्यस्तरीय विशेष सन्मान,फ्रेंड सर्कल,पुणे
  • मिरज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, 2000 व 2002साठी.
  • जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.म.रा.मा. शिक्षक संघटना.
  • नेशन बिल्डर ॲवाॅर्ड,इंनरव्हिल  क्लब ऑफ सांगली, 2017.
  • जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,रोटरी क्लब,सांगली 2018.
  • कवीभूषण पुरस्कार,नांदेड.
  • ‘गंध सोनचाफी’  कवितासंग्रह प्रकाशित. तीन पुरस्कार प्राप्त.

?विविधा ?

☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

साने गुरुजी हे नाव जरी उच्चारलं तरी आठवते ती आईची ममता. गाईचं वात्सल्य. आपल्या साध्या सोप्या ओघवत्या वाणीतून संस्काराचा झरा आजही साने गुरुजींच्या साहित्यातून अलगद झुळझुळत राहिला आहे.

ज्याने ज्याने साने गुरुजींचे साहित्य वाचले आणि तो हळवा झाला नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.

खरा धर्म असतो तरी काय? हे साने गुरुजी आपल्या गीतात सांगतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ धर्माच्या नावाखाली चाललेल्या ओंगळपणाला किती सुंदर उत्तर दिलंय गुरुजीनी! जे रंजले गांजलेले, दीन दुबळे आहेत अशांना मदतीचा हात द्यावा. हे गांधीवादी तत्त्वज्ञान गुरुजी अलगदपणे सांगतात.

शिक्षक म्हणून काम करताना केवळ विद्यार्थीच नाही तर समाजशिक्षण देण्याचं कार्य साने गुरुजीनी केलं आहे.

‘शामची आई’ हे गुरुजींचं पुस्तक तर संस्काराचा अनमोल ठेवा आहे.

केवळ उक्ती करून बसायचे नाही. तर ते कृतीतही आणावे लागते. याचे उदाहरण म्हणजे गुरुजींचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह. सर्व परमेश्वराचीच लेकरे असतील तर त्या परमेश्वराचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला अस्पृश्यतेच्या नावाखाली का नकार असावा? हा प्रश्न त्या सत्याग्रहात होता. अतिशय शांतपणे, अहिंसक मार्गाने गुरुजीनी हा लढा दिला होता. मेणाहून मऊ हृदय असणारी माणसं सत्यासाठी वज्राहून कठीण होऊ शकतात. व तेही समाजास्वास्थ्य बिघडू न देता. हे गुरुजीनी दाखवून दिले.

गुरुजीनी माणसावर प्रेम तर केलंच; पण झाडे, वेली, निसर्ग, पशु पक्षी यांच्या मनाचा ठाव घेताना त्यांच्याही मातेचं स्थान त्यांनी प्राप्त केलं.

साने गुरुजींची शिकवण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरते.

मुलांच्या बाबतीत साने गुरुजी खूप हळवे होते. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ आहेत. असं त्यांचं मत होत होतं. ती फुलं सतत हसती खेळती, टवटवीत असावीत यासाठी ते धडपडत. त्यासाठी  त्यांच्याकरिता गाणी गोष्टी ते लिहायचे. आनंदाबरोबरच त्यांच्यावर संस्कार व्हावेत हाही हेतू असायचा.

या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो.

      आपली शाळा सुंदर असावी. झाडा फुलांनी बहरलेली असावी. त्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट असावा. असं वाटायचं.

योगायोगाने शाळेत झाडा फुलांवर अतिशय प्रेम करणाऱ्या एक बाई, विजयादेवी पाटील बदलीने आल्या. त्या मलाच पहिलीला शिकवायला होत्या.  आम्ही खूप वेगवेगळ्या  फूलझाडे लावली. सुंदर फुले डोलू लागली. नंतर त्या गावातील लोक बाईना फुलांची आई म्हणू लागले. पण, शाळेला कसलेच कुंपण नव्हते. लहान मुलांना तर फुलांचे आकर्षण असते. फुले तोडल्याने ती झाडे निस्तेज वाटायची.

त्या वेळी सानेगुरुजींच्या एका संस्कार कथेनं आधार दिला.

पाठ्यपुस्तकातच ती कथा होती. शामची आई या संग्रहातली.

त्याचा सारांश होता, शाम एकदा फुलझाडावरच्या कळ्या तोडून आणतो. त्यावेळी आई त्याला सांगते, ‘बाळ, कळ्या म्हणजे वेलीची बाळे असतात. आणि ती बाळे आईच्या मांडीवरच सुरक्षीत असतात. त्या बाळाला आईच्या मांडीवरुन तोडून दूर नेले तर ती रडतील. कोमेजतील.’

याचा संदर्भ घेऊन  आपल्या बाबतीत असे घडले तर चालेल का? असे वारंवार विचारून मुलांच्यात बदल घडवला. आजही त्या शाळेतील मुलेच काय, पालकही फुलांना हात लावत नाहीत. ही जादू आहे साने गुरुजींच्या संस्काराची.

साने गुरुजींचे विचार, संस्कार माणसाला मानवतेकडे नेण्यासाठी एखाद्या दीप स्तंभासारखे चीरकाल मार्गदर्शन करत राहणार आहेत.

© श्री गौतम रामराव कांबळे

शामरावनगर,सांगली.

9421222834

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares