मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

इथून पुन्हा जगदीश्वरच्या मंदीराकडे येताना एका महत्वाच्या पायरीकडे लक्ष जाते, ते म्हणजे ‘हिरोजी इंदूळकर’ ह्यांच्या. हिरोजींनी मोठ्या हिकमतीने, निष्ठेने रायरीच्या डोंगराचा ‘रायगड’ असा कायापालट केला आणि महाराजांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ केला. महाराज जेव्हा हा दुर्ग बघायला आले तेव्हा हिरोजींनी सोन्यासारखा घडवलेला बेलाग ‘रायगड’ पाहून प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारले “तुम्हाला काय इनाम हवे?” त्यावर हिरोजी म्हणाले “मला सोने नाणे इनाम काही नको. फक्त मंदिराकडे येणार्‍या भक्तांस माझ्या नावाची पायरी दिसेल अशी ठिकाणी ती बांधण्याची परवानगी द्यावी!”

स्वामीनिष्ठ हिरोजींना मानाचा मुजरा करून पुढे आम्ही गाठले ते टकमक टोक! स्वराज्यातील गुन्हेगारांना, विश्वासघातक्यांना इथून कडेलोटाची कठोर शिक्षा दिली जात असे. पण इथेही काही पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा कडेलोट करून कड्याच्या टोकावरच कचरा केला आहे. असो.

इथेच घडलेली एक ऐकायला मजेशीर पण प्रत्यक्षात थरारक कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, महाराज ‘टकमक’ टोकावर आले असताना त्यांच्यावर छत्री धरणारा एक सेवक वार्‍याच्या झंझावातबरोबर हवेत उडाला. सुदैवाने त्याने छत्री घट्ट पकडून ठेवल्याने तो हवेवर तरंगत, भरकटत, अलगदपणे शेजारील निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाचे नाव निजामपूर छत्रीवाले असे ठेवण्यात आले. बसने पुण्यास परतीच्या मार्गावर असताना मला ह्या गावाचे नावंही एका फाट्यावर वाचायला मिळाले.

टकमक टोकावरून आमची वरात पुन्हा होळीच्या माळावर आली आणि तिथून महाराजांच्या पुतळ्यामागे असलेल्या राजदरबार, सदर पाहायला निघाली. हा परिसर मात्र चांगलाच भव्य आहे. दरबारात सिंहासनावर बसलेल्या महाराजांचा मेघडंबरी पुतळाही आहे. पण इथे काही फुटांवरून दर्शन घ्यावे लागते, अगदी जवळ जायला आता मनाई आहे. ह्याला कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणा समाजकंटकांनी तलवारीचा तुकडा तोडून पळविला होता.

त्यामागे आले असता दिसतात ते म्हणजे महाराजांचा राजवाडा, राण्यांचे महाल, शयनगृह इ. इथे मात्र सर्व भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. नुसतीच जोती पाहून महालांची ऊंची कशी कळणार? आपण नुसत्या कल्पनेचे महाल उभारायचे. राजवाड्याची एकंदर भव्यता मात्र जाणवल्यावचून राहत नाही. येथील एका बाजूच्या मेणा दरवाजाने तुम्हाला गंगासागर तलाव आणि मनोर्‍यांकडे जाता येते तर दुसर्‍या बाजूने धान्य कोठार व तसेच पुढे उतरून ‘रोप वे’च्या वरच्या स्थानका कडे जाता येते.

एव्हाना दोन वाजल्यामुळे जनतेला भूक लागली होती. सर्वजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते जे थोड्याच वेळात ‘रोप वे’ ने दोघे जण घेऊन आले. मेणा दरवाज्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत अंगतपंगत मांडून पोळी, फ्लॉवर-मटार-बटाटा अशी तिखट रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, पापड आणि ‘गिरीदर्शन’ क्लबतर्फे ‘चितळे’ श्रीखंड अशा चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर गंगासागर तलावाचे मधुर पाणी पिऊन आम्ही ‘दुर्गदुर्गेश्वर रायगडा’चा निरोप घेतला.

आता उर्वरीत दोन-तृतीयांश ‘रायगडा’चे दर्शन कधी मिळते आहे ह्याची मी रांगेत उभा राहून वाट पाहतो आहे. जगदीश्वर मजवर कृपा करो आणि हा योगही लवकर जुळून येवो, हीच प्रार्थना!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – तीन ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि – लघुकथा – तीन ☆

तीनों मित्र थे। तीनों की अपने-अपने क्षेत्र में अलग पहचान थी। तीनों को अपने पूर्वजों से ‘बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न कहो’ का मंत्र घुट्टी में मिला था। तीनों एक तिराहे पर मिले। तीनों उम्र के जोश में थे। तीनों ने तीन बार अपने पूर्वजों की खिल्ली उड़ाई। तीनों तीन अलग-अलग दिशाओं में निकले।

पहले ने बुरा देखा। देखा हुआ धीरे-धीरे आँखों के भीतर से होता हुआ कानों तक पहुँचा। दृश्य शब्द बना, आँखों देखा बुरा कानों में लगातार गूँजने लगा। आखिर कब तक रुकता! एक दिन क्रोध में कलुष मुँह से झरने ही लगा।

दूसरे ने भी मंत्र को दरकिनार किया, बुरा सुना। सुने गये शब्दों की अपनी सत्ता थी। सत्ता विस्तार की भूखी होती है। इस भूख ने शब्द को दृश्य में बदला। जो विद्रूप सुना, वह वीभत्स होकर दिखने लगा। देखा-सुना कब तक भीतर टिकता? सारा विद्रूप जिह्वा पर आकर बरसने लगा।

तीसरे ने बुरा कहा। अगली बार फिर कहा। बुरा कहने का वह आदी हो चला। संगत भी ऐसी ही बनी कि लगातार बुरा ही सुना। ज़बान और कान ने मिलकर आँखों पर से लाज का परदा ही खींच लिया। वह बुरा देखने भी लगा।

तीनों राहें एक अंधे मोड़ पर मिलीं। तीनों राही अंधे मोड़ पर मिले। यह मोड़ खाई पर जाकर ख़त्म हो जाता था। अपनी-अपनी पहचान खो चुके तीनों खाई की ओर साथ चल पड़े।

©  संजय भारद्वाज

(18.7.18, रात्रि 9.06)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

ह्यापुढे आम्ही पोहोचलो ते एका अतिशय ऐतिहासिक महत्वाच्या जागी तो म्हणजे होळीचा माळ. इथे गडावरील होळीचा सण साजरा व्हायचा आणि इथेच महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. तिथल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्यापुढे नतमस्तक झाल्यावर जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी स्वत:चे अवघे आयुष्य ओवाळून टाकणार्‍या, जिवाची बाजी लावून परक्या शत्रूचा तसेच घरभेद्यांचाही नि:पात करणार्‍या, प्रसंगी महाघोर संकटांना शौर्याने तोंड देऊन स्वत:ची, अवघ्या रयतेची, स्वदेशाची आणि स्वधर्माची अस्मिता जपणारे आणि उजळवून टाकणारे श्रीमान योगी जिथे राजसिंहासनावर बसले त्याच भूमीवर आपण उभे आहोत ही जाणीव मनाला गहिवर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणते.

होळीच्या माळावरून चालत पुढे आम्ही बाजारपेठ मध्ये आलो. आता ह्या ठिकाणी घरांची फक्त जोती शिल्लक आहेत. इथे घोड्यांवरून मालाची खरेदी-विक्री चालायची असे म्हणतात. काही इतिहासतज्ञ असेही म्हणतात की ही बाजारपेठ नसून गडावर मुक्कामास असलेल्या सरदारांची / भेटीस आलेल्या खाशांच्या राहण्याची सोय म्हणून बांधलेली घरे आहेत.

बाजारपेठेतून पुढे आल्यावर एका मावशींकडे कोकम सरबत पिण्याचा मोह आवरला नाही. मावशींकडे “तुमचे गाव कोणते? आता धंदा’पाणी’ कसे सुरू आहे?” अशी विचारणा केल्यावर “पायथ्याचं हिरकणवली आमचं गाव. अजून पूर्वीइतके पर्यटक येत नाहीत.” म्हणाल्या. “इथून भवानीकडा किती लांब आहे?” असे विचारण्याचाच अवकाश त्यांनी गडाची सगळी कुंडलीच माझ्यासमोर मांडली.  ? “गड पूर्ण बघायला किमान तीन दीस लागतील, गडावर इतकी तळी आहेत, तितकी टाकं आहेत”,

त्याचजोडीला “दारूगोळ्याच्या कोठारावर इंग्रजांचा तोफगोळा पडून मोठा स्फोट झाला आणि पुढे बारा दिवस गड जळत होता”, अशी काही दारुण ऐतिहासिक माहिती बाईंकडून ऐकायला मिळाली. त्यांचा नवरा किंवा घरातील कुणीतरी गाईडचे काम करणारे असावे अशी मला शंका येते न येतेस्तोवरच एक कुरळ्या केसांचा पुरुष तिच्याकडे आला आणि म्हणाला “चल, लवकर पाणी पाज”. हयालाच मी थोड्या वेळापूर्वी पर्यटकांच्या एका चमूला माहिती देताना पहिले होते. सुशिक्षित काय किंवा अशिक्षित काय बायकोच शेवटी नवर्‍यास पाणी पाजणार!!  ?? असो.

इथून पुढे थोडे चालत आम्ही जगदीश्वर मंदिरापाशी आलो. महाराज रोज पूजेसाठी इथे येत असत. त्यामुळे मंदीराच्या बाहेर पादत्राणे उतरवूनच आत जावे. थोड्या भग्नावस्थेतील नंदीचे दर्शन घेऊन गाभार्‍यात प्रवेश करावा. शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यावे आणि आजूबाजूची गर्दी विसरून दोन मिनिटे डोळे मिटून शांत बसावे.

चिरेबंदी मंदिराची रचना भव्य असून एका चिर्‍यावर संस्कृत श्लोक कोरलेला आहे. हा चिरा भिंतीमधील इतर चिर्‍यांपेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे असेही म्हणतात की हा चिरा मूळ घडणीतील नसून नंतरच्या काळात बसवण्यात आला असावा.

मंदिराच्या मागील बाजूसच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ह्या पवित्र जागी माथा टेकवून सर्व भक्तमंडळी धन्यधन्य होतात. रणजीत देसाईंच्या पुस्तकातील ‘श्रीमान योगी’ इथे समाधीस्थ असले तरी सर्व हिंदूंच्या हृदयसिंहासनावर अजून जागृत राज्य करीत आहेत ह्याची जाणीव होते. महाराजांच्या समाधीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. इथूनच थोड्या दूर अंतरावर लिंगाण्याचा सुळका आव्हान देत उभा दिसतो. त्याच्या मागेच राजगड-तोरणा ही दुर्गजोडी अस्पष्ट का होईना पण दिसते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मात्र स्पष्टपणे दिसते. समाधीच्या डाव्या बाजूस पहिले तर ‘कोकणदिवा’ दृष्टीस पडतो.

“मरावे परी कीर्तीरूपी उरावे”

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१९ च्या दिवाळीत पंढरपूर क्षेत्री जाऊन जवळजवळ दीड तास दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो असताना मी विचार करीत होतो की ‘इतका वेळ रांगेत घालवणे उचित आहे का? देवालयाला बाहेरूनच नमस्कार करायला काय हरकत आहे?’ पण मग विचार केला की देवाचे दर्शन हे सहजपणे न होता हे असेच कष्टसाध्य असले पाहिजे. नुसते पैसे भरून काही मिनिटांत होणारे सुलभ दर्शन “देखल्या देवा दंडवत!” सारखे झटपट समाधान देईलही कदाचित पण त्याने देवदर्शनाची आस फिटेल का? सरतेशेवटी एकदा पांडुरंगाच्या सगुण मूर्तीसमोर उभा राहिलो आणि मात्र डोळ्याचे पारणे फिटून धन्यधन्य झालो! कदाचित मंदिरातील, गाभार्‍यातील वातावरणाचा, आवाजाचा कुठेतरी मनावर खोलवर परिणाम होत असावा. “स्थानं खलु प्रधानं” असे म्हटले आहे ते काय उगीच नव्हे. थोडाफार असाच परिणाम नुकताच पुन्हा एकदा अनुभवास आला जेव्हा मी रायगडावरील ‘महाराजां’च्या स्फूर्तिदायक मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा.

१६ जानेवारी २०२१ रोजी मी रात्री 10:30 वाजता ‘गिरीदर्शन’च्या ‘रायगड’ ट्रेकच्या बसमध्ये उत्साहाच्या भरात चढलो आणि लक्षात आले की मी मास्क आणि उन्हाळी टोपी ह्या दोन्ही आवश्यक गोष्टी घरीच विसरलो आहे. JJ असो. बस हलली असल्याने आता काही करणेही शक्य नव्हते. बसमध्ये मात्र सर्वत्र तरुणाई भरली होती त्यामुळे उत्साहाचे वारे संचारले होते. मग माझ्या शेजारी बसलेल्या मेकॅनिकल इंजींनीयरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या चिंचवडच्या सर्वेश बरोबर ओळख काढून गप्पा सुरू केल्या. “कोविद मुळे लेक्चर्स ऑफलाइन झाली नाहीत आणि ऑनलाइनही नियमितपणे होत नाहीत” असे गार्‍हाणे गात बिचारा जेरीस आलेला होता. कुठेतरी आयुष्यात बदल हवा म्हणून तो ट्रेकला आला होता. असो.

रात्री साधारण साडेतीन वाजता पाचाड गावातील एकांच्या मुक्कामस्थळी पोहोचलो. लगेचच घरच्या सारवलेल्या ओसरीवर पसरून सर्व पुरुषांनी ताणून दिली आणि मुली घरातील एका खोलीमध्ये विसावल्या. पुढील तीन-चार तासच जेमतेम झोपायला मिळणार होते. पण तासभर झाला असेल नसेल, आमच्या शेजारीच कांबळी टाकून झाकलेल्या एका दुरडीखाली ठेवलेल्या कोंबड्याने बांग द्यायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूच्या त्याच्या साथीदारांनी सुरात सूर मिसळून साथ द्यायला सुरुवात केली. त्याच जोडीला दुरडीमध्येच असलेल्या कोंबड्याच्या पिल्लांनीही चिवचिवायला सुरुवात केली. एखाद्याच्या “झोपेचे खोबरे होणे” ह्याऐवजी झोपेचे कुकुच्च्कू होणे असा वाक्प्रचार प्रचलित करून ‘अखिल कोंबडे पक्ष्या’चा निषेध करावा असे ठरवून मी झोपेची आराधना करायला लागलो.

सकाळी साडेसहाला उठून पहिले तर ‘रोप वे’च्या पाळण्याच्या ट्रिप सुरू झालेल्या दिसल्या. लगेच आवरून आम्ही हॉटेल ‘मातोश्री’ मध्ये पोहे-चहाचा भरपूर नाश्ता करून पायथ्याशी पोहोचलो आणि आमच्या दुहेरी ‘लेग वे’ ने चढाईस प्रारंभ केला.

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी लोटली होती. त्यामुळे गडाची संपूर्ण माहिती देणार्‍या गाईडनाही काम मिळत होते. पायथ्याची सर्व दुकाने एव्हाना सजली असल्याने मला उन्हाळी टोपी लगेच विकत घेता आली. मास्क मात्र कोणीच घातलेला नव्हता, त्यामुळे मीही तो घेण्याच्या फंदात पडलो नाही. काही पायर्‍या चढून पहिल्या बुरूजापाशी थांबलो. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या भावना अनावर होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा उत्स्फूर्त घोषणा सतत उठत होत्या. तिथल्या दुकानातच महाराजांची प्रतिमा असलेला ‘जाणता राजा’ लिहिलेला भगवा झेंडा मिळत होता. त्यासोबत फोटो काढून घेण्याची सर्वजण धडपड करीत होते. काहीजण तो झेंडा हातात घेऊन धावत गड चढून जात होते.

आपल्या आवडत्या राजाला मानाचा मर्दानी मुजरा देण्याची व भेटण्याची केवढी विलक्षण आतुरता!!

मजल दरमजल करीत चढत असताना आमच्या मध्येच पाठीवर पायरीचे तासीव अवजड दगड लादलेली गाढवे ही गड चढत होती. एका पाथरवटाला विचारले तर कळले की एका दिवसात एक गाढव तीन फेर्‍या मारते. हे ऐकून मात्र ह्या कष्टाळु प्राण्याचे भारीच कवतिक वाटले. इथे आम्ही कसाबसा एकदा हा गड चढउतार करून मोठा पराक्रम गाजवणार होतो! अर्थात रायगडच्या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी चढाईच्या वेळेत उन्ह अजिबात लागत नव्हते व त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. एक पर्यटक मोबाईलवर मोठयाने गाणी ऐकत गड उतरत होता त्याला आमच्या चमूतील एकाने ताबडतोब बंद करायला लावला. सुमारे दोन-सव्वादोन तासांत आम्ही वर पोहोचलो.

प्रथम दर्शन झाले ते महादरवाज्याचे. काही वर्षांपूर्वीच बसवलेला हा 16 फूटी भव्य दरवाजा खरोखर बघण्यासारखा आहे. त्यानंतर स्वागत करतो ते ‘हत्ती तलाव’. “हत्ती तलावात शिरला तर कसं बाहेर येईल?” तर ह्याचे उत्तर “ओला होऊन!” हा विनोद मला आठवला. पण रायगडावरील ह्या तलावात जर हत्ती शिरला तर तो खात्रीने पायाचे तळवेही न ओलावता कोरडा ठणठणीत बाहेर येईल इतका हा शुष्क पडला आहे. पावसाचे पाणीही गळतीमुळे ह्यात टिकत नाही. पूर्वी केलेल्या गळती-प्रतिबंधक योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. इथून थोडे वर आल्यावर ‘शिरकाई’ देवीचे मंदिर लागते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

‘गीतम्‌ वाद्यम्‌ नृत्यम्‌ च त्रयम्‌ संगीतमुच्यते’ अशी संगीताची व्याख्या आपल्या प्राचीन संगीतज्ञांनी केली आहे. गेल्या काही लेखांमधे आपण मुळात संगीत कसे अस्तित्वात आले असावे आणि माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे आणि का झाले असावे, ह्याविषयी विचार केला. परंतू त्यावेळी फक्त गीत किंवा गायन ह्या प्रकाराला अनुसरूनच लेखन झालं. आता वाद्यं का आणि कशी अस्तित्वात आली ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. असं म्हटलं जातं कि सृष्टीच्या कणाकणात लय आहे. त्यामुळे वाद्यप्रकारांमधे तालवाद्ये ही सर्वात आधी अस्तित्वात आली. असं मानलं जातं कि, भगवान शंकरांकडून ‘डमरू’ ह्या पहिल्या तालवाद्याची निर्मिती झाली. दुसरी एक अशी कथा वाचायला मिळते कि, स्वाती नावाच्या एक ऋषींनी एकदा पावसाचे मोठाले थेंब कमळाच्या पानांवर पडताना त्याचा आवाज ऐकला. एका लयीत कानांवर पडत राहिलेला तो सुंदर आवाज ऐकून त्यांच्या मनात ‘अशी सातत्यानं लय राखण्यासाठी तालवाद्यं हवीत’ ही कल्पना आली. म्हणजे शेवटी निसर्गाच्या प्रेरणेतूनच ही कल्पना जन्मली.

जुन्या ग्रंथांमधे असा उल्लेख आढळतो कि भरतमुनींच्या काळात शंभरभर तरी तालवाद्यं अस्तित्वात होती. ‘ताल’ ही संकल्पना नंतरची! मात्र कोणत्याही गोष्टीला अंगभूत ‘लय’ असते आणि ती साधली गेली तरच ती गोष्ट जास्त प्रभावी ठरते हे निश्चित! ह्यावरून असं म्हणता येईल कि, गायन, नृत्य कलेतील अंगभूत लयसौंदर्य आणखी खुललून ते जास्त प्रभावी करण्याच्या प्रयत्नातून तालवाद्ये अस्तित्वात आली. गायनाला, नृत्याला अर्थपूर्ण जोड/साथ देण्यासाठी तालवादन अस्तित्वात आले आणि प्रगतशील मानवाच्या प्रयत्नांतून पुढे तर तालवाद्ये आणि तालसंकल्पना इतकी विकसीत झाली कि त्यांचंच ‘एकलवादन’ (सोलो) शक्य होऊ लागलं ज्यावेळी लयसौंदर्याचं प्रामुख्य आणि सूर फक्त साथ देण्यापुरते मर्यादित असतात.

तालाचा विचार करताना एका आवर्तनामधे ठराविक अंतराने ठराविक मात्रा राखणं हा महत्वाचा भाग येतो. मात्र अगदी सहजी गुणगुणतानाही लय साधली गेली तरच त्यातून आनंद मिळतो. बोली भाषेचाच वापर करून माणसाच्याच जगण्यातील महत्वाच्या क्षणांचा उत्सव करणारे छोटेछोटे गीतप्रकार अस्तित्वात येत असतानाच शेवटपर्यंत त्यातली लय पकडून ठेवण्यासाठी मानवाकडून सहजस्फूर्तीने त्या लयीच्या हिशोबाने ठराविक अंतराने टाळी वाजवली गेली असेल, कधी हाताने मांडीवर आघात करून लय राखली गेली असेल, पायाने ठेका धरला गेला असेल. ह्या क्रिया आपल्या प्रत्येकाकडूनही अगदी सहजी घडत असतातच. एरवीही घरी आरतीच्या वेळी एका लयीत टाळ्या वाजवणे, कोणतेतरी गीत ऐकत असताना आपल्याही नकळत पायाने ठेका धरला जाणे, एखाद्या गायकाच्या जोशपूर्ण गायनाला साथ देताना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे त्या गाण्याच्या लयीसोबत टाळ्या वाजवणे हे किती सहजी घडते! अशाप्रकारे लय साधताना मानवाने केलेला शारीरिक अवयवांचा उपयोग हा वाद्य कल्पनेचा प्रारंभकाल मानला जातो.

पूर्वीच्या जीवनमानाचा विचार केला तर लक्षात येईल कि स्वत:च्या शरीराच्या आधारे ठेका धरणे ह्याशिवाय भवताली उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा ह्या गोष्टीसाठी वापर करताना हुशार मानवाने दोन दगड एकमेकांवर आपटून, दोन लाकडाचे तुकडे एकमेकांवर आपटून पाहिले असतील. आजचे ‘टिपरी’ हे वाद्य म्हणजे दोन लाकडी काठ्यांचा एकमेकांवर आघात करणे हेच तर आहे! मात्र त्याचा उगम हा आदिमानवाच्या संगीतातील लय टिकवून ठेवण्याच्या गरजेतून झाला. आपल्याकडच्या चिपळ्या म्हणजेही एकसारख्या आकाराचे दोन लाकडी तुकडेच तर आहेत. पुढं धातूचा शोध लागला त्यानंतर चिपळीच्या तसेच करताल ह्यासारख्या वाद्याच्या लाकडी तुकड्यांमधे धातूच्या चकत्या बसवण्याचे प्रयोग झाले, टाळ, मंजिरी, झांज हे प्रकार अस्तित्वात आले. मात्र ह्या सगळ्याचं मूलतत्व एकच कि, दोन घन पदार्थांचा एकमेकांवर आघात केला तर नादनिर्मिती होते आणि त्याची लय पकडून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते हा आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेला शोध!

आपल्या देवघरातील छोट्या घंटा किंवा देवळातल्या मोठ्या घंटा म्हणजेही एका घन पदार्थाच्या तुकड्याने दुसऱ्या घन पदार्थावर होणाऱ्या आघातातून केली जाणारी नादनिर्मिती! घुंगरूं हेसुद्धा एक प्रकारचं वाद्यच ज्यामधे धातूच्या पोकळ गोलाच्या आत असलेल्या एका धातूच्याच तुकड्याचा आघात झाला कि नादनिर्मिती होते. पायांत बांधल्यावर आपल्या पायाच्या हालचालींमुळं किंवा हातात घेऊन वाजवताना हाताने घुंगरू हालवल्यामुळं हा आघात आपोआप होतो.

प्राचीन काळी अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरली जात असत. त्यावर बोटांनी आघात केला तरी सुंदर नाद निघतो हाही शोध त्यांना लागला. आज दक्षिणेतील घटम, कर्नाटक किनारपट्टींतल्या प्रांतातील घुमट, उत्तरेतील मटका ही वाद्यं हे त्याचंच उदाहरण!

प्राचीन काळी जंगलात राहाणाऱ्या मानवाचं मुख्य अन्न म्हणजे प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस शिजवून खाणं हे होतं. शिकार केलेल्या प्राण्याचा खाण्यालायक भाग म्हणजे त्याचं मांस! हळूहळू त्या प्राण्याचं कातडं, हाडं, शिंगं हा सगळा उर्वरित भागही कसा वापरता येईल ह्याचा विचार मानवाच्या मनात सुरू झाला असेल किंवा कधी तो आपसूक मानवाच्या समोर आला असेल. प्राण्यांचं कातडं बसायला वापरणं, त्याचा अंगरखा शिवून थंडीत आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून वापरणं ही त्याची काही उदाहरणं! वाद्यांच्याबाबत विचार करता एका बाबीचा उल्लेख जुन्या पुस्तकांत आढळतो कि, शिकार केलेल्या प्राण्यांचं कातडं वाळण्यासाठी झाडाला टांगून ठेवलं असताना ते वाळल्यानंतर सहज त्यावर माणसाच्या हाताचा आघात झाला आणि त्यावेळी ‘वाळलेल्या कातड्यावर आघात केला असता नादनिर्मिती होते’ हा शोध लागला. हळूहळू पोकळ भांड्यावर हे चामडं बांधून त्यावर आघात केला तर आणखी सुंदर नादनिर्मिती होते (कारण पोकळ भाग हा त्या नादाचा ‘रेझोनेटर’ आणि ‘अम्प्लिफायर’ म्हणून काम करतो) हे लक्षात आलं आणि त्यातून चर्मवाद्यांची निर्मिती झाली.

ह्या चर्मवाद्यांना ‘अवनद्ध वाद्यं’ असं म्हटलं जातं. ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच मुळी ‘कातड्याने मढवलेले’ असा होतो. आता डोळ्यांसमोर अशी अनंत वाद्यं उभी राहातील. लोकसंगीतात वापरली जाणारी अनेक तालवाद्यं ढोल, ताशा, हलगी, संबळ, टिमकी, नगारा इ. सगळीच ह्या प्रकारात येतात. ह्यापैकी काही वाद्यं हाताने आघात करून वाजवली जातात तर काही काठीने आघात करून! आज शास्त्रीय संगीतातील समाजमान्यता पावून सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तबला, पखवाज, मृदंग इ. वाद्येही ह्याच प्रकारातली! ह्या सर्वच वाद्यांमधे सध्या जो भाग लाकडी असतो तो पूर्वी मातीचा असायचा. पुढं मग कालमानानुसार लाकूड, धातू इ. गोष्टी वापरून विविध प्रयोग होत राहिले. ह्याचा अर्थ एकच कि अगदी प्राचीन काळापासून माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना निसर्गाकडून विविध गोष्टी शिकत आपला विकास साधला. संगीतही त्याला अपवाद नाही. ह्याच प्रक्रियेमधे उपलब्ध साधनांच्या वापरातून वाद्यांची उत्पत्ती होत राहिली. तालवाद्यांप्रमाणे तंतुवाद्ये आणि सुषीर वाद्ये कशी अस्तित्वात आली ह्याची रंजक कहाणी आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

 ☆ विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

“भाषा” म्हणजे काय? त्याची उत्पत्ती, व्याख्या,ई ,क्लिष्ट चर्चेत न शिरता व्यावहारिक वापराचा विचार करुया.

भाषेची नाळ जोडली जाते ती “बोलणे” शी. बोलणे म्हणजे तरी काय? तर अभिव्यक्ती विचारांची आणि भावनांची मौखिक अभिव्यक्ती.

“देहबोली” हे पण अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण भाषाविरहित. मौखिक अभिव्यक्ती माणुस सोडुन ईतर प्राणिमात्रांमध्येही असते, कुत्र्यांचे भुंकणे, गाईम्हशींचे हंबरणे, वाघांची डरकाळी, भुंग्यांचा गुंजारव,पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डराव डराव, पालीचे चुकचुकणे, थी त्यांची भाषा असते असे म्हणतात.

माणसाने भाषेचा वापर केंव्हा, कसा सुरू केला यासाठी यासाठी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास तर नक्कीच करावा लागेल. पण तूर्तास भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे, सर्वश्रेष्ठ वरदान आहे असे अनुभवाने सिध्द केले आहे.

आपला भारत बहुभाषिक देश,.तरीही भाषा म्हटले की आवर्जुन प्राधान्य दिले जाते ते मातृभाषेलाच, मायबोलीलाच.

आपली मायमराठी, महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, समृध्द आणि संपन्न भाषा असे गर्वाने म्हणावेसे वाटते, तिच्या विविध रंगांचा, प्रत्येक रंगातील विभिन्न छटांवर  धावता दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न. उदाहरणे अनेक देता येतील पण शब्दसंख्येवरील मर्यादेमुळे तो मोह टाळावा आहे.

महाराष्ट्रातील मराठी म्हटले तरी वर्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी, खानदेशी, कोकणी, पुणेरी, मुंबईची, मराठवाड्याची असे अनेक रंग, आणि ढंग आढळतात. हिंदीची घुसखोरी, दुहेरी क्रियापदांमधे वापर अशी नागपुरी. फेटा घातलेली, थोडीशी रांगडी, कानडी शिडकावा म्हणजे कोल्हापुरी, वरुन काहीशी कडक वाटली तरी आतुन प्रेमळ, तिथल्या नारळासारखीच कोकणी, त्यातही मालवणी वेगळीच, वाक्यात किमान २, ४ शब्द ईंग्रजी किंवा हिंदी अगदी मस्त अशी मुंबईची, सोलापुरी तर न्यायची धाटणी, अन् सांस्कृतिक पगडी घातलेली पुणेरी, अनेक रंगातील अनेक छटा असल्या तरी प्रत्येकाचा बाज तेवढाच आकर्षक, तेवढाच रुबाबदार.

काळाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की बदलत्या काळाबरोबर शिक्षण,सांस्कृतिक जडणघडण, रीती रिवाज जसे बदलत गेले तसे भाषेचा पेहरावाही बदलणे स्वाभाविक होते, फार मागे जाऊया नको, २०व्या शतकात वापरले जाणारे अनेक शब्द आज कालबाह्य झाले आहेत. जसे, सदरा, पोलके, शेगडी, आणि ईतर अनेक, आजच्या आधुनिक मराठीत अनेक शब्द ईतर भाषेतून येऊन इतके रुळले आहेत कीअमराठी आहेत हे नविन पिढीला पटत नाही.

प्रत्येक व्यवसायाची पेशाची  भाषेची खासियत वेगवेगळी असते, वकील, डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, कारखानदार,व्यापारी,.प्रत्येक पेशात परत बारीकसारीक फेरफार असतातच,व्यापारी म्हटला तरी_कपडे,सोनेचांदी, भांडी,किराणा,धान्य,ई प्रमाणे,भाषा बदल होतोच,

राजकारण,समाजकारण,यातील भाषा वेगळी,तर संरक्षणदल,पोलिस दल इथली वेगळीच.

नैसर्गिक भेद किंवा इतरही काही कारण असेल पण स्त्री पुरूष यांच्या भाषेचा पोतही खुप वेगळा असतो, भाषा ही केवळ मौखिक अभिव्यक्ती ची मक्तेदारी नाही, लिखीत अभिव्यक्ती साहित्य क्षेत्रात लेखनाच्या रणांगणावर भाषेची भूमिका सरसेनापती असते, लेखकाच्या लेखनाचे यशापयश भाषेवरच अवलंबून असते,

साहित्य मग ते कोणतेही, कोणाचेही, कशाशीही संबंधित असो, त्याप्रमाणे लेखकाला शब्दरूपी शस्त्र वापरावे लागते, संत साहित्यात टाळचिपळी, तर बालसाहित्यातील चेंडुफळी असते.

कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, अतिलघु, लघुत्तम,लघु,दीर्घ,रहस्य,ई कथा,ललित,सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, ई लेख, प्रवासवर्णन, विविध काव्यप्रकार,अशा बहुविध साहित्य प्रकाराप्रमाणे, भाषेचा रंगढंग बदलत जातो,आणि आमची मराठी मायेच्या ममतेने  सर्वांना आकंठ दुग्धपान देते.

कुठेतरी वाचलेले आठवते, “भाषा सरस्वती त्यांच्यापुढे शब्द घेऊन ऊभी रहाते, आणि शब्दही माझा वापर केंव्हा करणार याची चातकासारखी वाट पहातात” धन्य ते साहित्यिक आणि त्यांच्या अजरामर कलाकृती, अशांपैकीच एक मान्यवर  कवि कुसुमाग्रज त्यांना कोटी कोटी प्रणाम,  शब्दरूप फुलांची ही माला सविनय,सादर अर्पण.

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

पुणे,

मो 9403862565,  9209301430

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार श्री भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

(27 फेब्रुवारी माघ पौर्णिमा निमित्ताने)

आपला भारत देश हा अनेक ऋषी, मुनिंच्या परंपरेने आणि ज्ञानाने समृद्ध झाला आहे. बहुतेक सर्व मुनिनी वेद, अध्यात्म, यज्ञ, याग, कर्मकांड, विज्ञान इ.अनेक विषयांवर विस्तृत विवेचन केले आहे.पण “नाट्यशास्त्र” या विषयावर सुबद्धविवेचन करणारे मुनि म्हणजे भरतमुनि होय.

भरतमुनि – कलर पेन्सिल पेंटींग – श्री मिलिंद महाबळ (साभार) 

भरतमुनिंचा कालखंड निश्र्चित नाही. साधारणपणे इ.स.पू. ४०० ते १०० असा मानला जातो. “दशरूपक विधान”  या ग्रंथाच्या १८ व १९ व्या अध्यायात नाट्यशास्त्र हा विषय आला आहे.संगीत हा विषय २८ व्या अध्यायात आहे. ६ व ७ या अध्यायात रससिद्धांत सांगितला आहे .शृंगार,वीर,करुणा,भय,हास्य,बिभत्स, अद्भुत, शांत आणि रौद्र हे ९ रस सांगितले आहेत.

त्यांच्या नाट्यशास्त्रातील ठळक मुद्दे :-

१)  नाटकाचा विषय प्रख्यात कथेवर असावा.(उदा.रामायण, महाभारत, कृष्णलीला इ.)

२) ५ ते १० अंक असावेत.

३)  दोन अंकाच्या मध्ये “विष्कंभक” (निवेदक)असावा

४)  आवश्यक तेवढीच पात्रे असावीत.कथेला पूरक तेवढीच.

५)  अभिनय ४ प्रकारचा सांगितला आहे-१)अंगिक(Body language) 2) वाचिक (oral) 3)  सात्त्विक (expressions) 4) आहार्य म्हणजे ( with essential property)

६) कथानक रंजक हवे, क्रौर्य नको, प्रवाही असावे, सुखान्त

७) पात्रांचे चित्रण व्यवस्थित समजेल असे असावे.

८) रंगमंच किती,कसा असावा हे सविस्तर सांगितले आहे.

९) सर्व ९ रस शक्यतो यावेत.

१०) नाटकाचा उद्देश- मनोरंजन,कलादर्शन, लोकांना आनंदी करणे, संदेश/ बोध देणे.

याशिवाय प्रेक्षागृह कसे असावे ? कोणी कोठे बसावे ?

अभिनेता, दिग्दर्शक, कपडेपटवाला इ.लोकानी कसे कष्ट घ्यावेत ?

या सर्वांचा सविस्तर विचार मांडला आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु  त्या काळात मांडलेल्या सूचना आजही मानल्या जातात. भरतमुनिंची जयंती संस्कार भारती दरवर्षी  माघ पौर्णिमेस साजरी करते. त्यांना वंदन करून मी इथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  विविधा ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

“उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले

अजूनही……….”

 

अशी चिऊताई ला साद घालत जागे करणारी कविता,  जीवनाचे सगळे टप्पे अनुभवत,  नवरसांचे प्याले  रसिकांना बहाल करत,  विविध छंदांच्या आणि विविध वृत्तांच्या अलंकारानी कवितेला सालंकृत पेश करणारे कुसुमाग्रज..

त्याच वेळी …

“ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण!

बेताल नाचवी,  सूत्रधार हा कोण?

मातीतच अंती त्याचेही निर्वाण?

स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती

मातीवर चढणे एक नवा थर अंती……”

 

असे सांगत माती हेच शाश्वत सत्य आहे, हे पटवून देणारी कविता लिहिणारे कुसुमाग्रज

अलौकिक प्रज्ञा, ईश्वरदत्त प्रतिभा, आणि चराचरातल्या प्रत्येक भौतिक आणि अभौतिकतेला स्पर्श करणारं तत्वज्ञान यांचं दैवी रसायन म्हणजे कुसुमाग्रज

नटसम्राट,  ययाति देवयानी, कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, यासारखी शतकानुशतके अजरामर रहाणारे नाट्यरेखन,  सतारीचे बोल, फुलवाली, काही वृद्ध-काही तरूण, छोटे आणि मोठे असे असंख्य कथासंग्रह,  रसयात्रा, विशाखा,  किनारा,  मराठी माती, स्वगत, हिमरेषा 100कविता असे हजारो कवितांनी भरगच्च असे कविता संग्रह.  अशा विपुल लेखन संभाराने लगडलेला वृक्ष म्हणजे कुसुमाग्रज

कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अमृतस्पर्श झालेल्या काही जगन्मान्य  अजरामर ओळी मनात कधी गुंजन करतात, तर कधी धीर देतात,

कणा –

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा”

अनामवीरा

“काळोखातुन विजयाचा ये पहाटचा वारा

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा”

नवलाखतळपती दीप

“नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणु नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ तेव्हा

त्या माजघरातिल मंद दिव्याची वात”

प्रेम कर भिल्लासारखं

“प्रेम कर भिल्लासारखं

बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये उगवून सुद्धा

मेघापर्यंत पोचलेलं”

नदी

“माय सांगे थांबू नका

पुढे पुढे चला

थांबत्याला पराजय चालत्याला जय”

समिधाच सख्या या

“समिधाच सख्या या

त्यात कसा ओलावा

कोठुनि फुलापरि वा मकरंद मिळावा

जात्याच रुक्ष त्या एकच त्यां आकांक्षा

तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा”

कोलंबसाचे गीत

“अनंत अमुची ध्येयासक्ती

अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

पृथ्वीचे प्रेमगीत

“परी भव्य ते तेज पाहून पुजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे ?

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे”

भाव- भावनांच्या अशा अलौकिक,  परतत्वस्पर्शी शब्दांची गुंफण करून दिव्य भव्य दर्शन घडवणारे आणि रसिकांच्या अंतर्मनात चेतनाशक्ती जागवणारे स्फुल्लिंग म्हणजे कुसुमाग्रज

जीर्ण देवळापुढे*   ही इतर कवितांच्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेली कविता.

“तशीच तडफड करीत राही

तेवत ती ज्योती

उजळ पाय-या करी,

जरी ना मंदिर वा मूर्ती”

अंधःकार दूर करणे आणि उजळत रहाणे हाच ज्योतीचा व तेवणा-या वातीचा धर्म. कुसुमाग्रजांनी हाच धर्म आयुष्य भर जपला. अनासक्त कर्मयोग्याचे कार्य त्यांनी आपल्या मनस्वी लेखनाने केले.

लीनता, वात्सल्य,  करूणा यांचं बोलकं रूप म्हणजे कुसुमाग्रज,  त्याचबरोबर करारी,  ध्येयवेडे, विजिगीषू,  क्रांतीचा जयजयकार करणारं दमदार आणि रांगडं रूप म्हणजे ही कुसुमाग्रज.

“शब्द बोलताना शब्दाला धार नको आधार हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.”असे नकळत संस्कार घडवणारे कुसुमाग्रज.

नटसम्राट मध्ये”सरकार, आपली मुलं वाईट नाहीत,  वाईट आहे ते म्हातारपण”असं जीवनावर जळजळीत सत्य भाष्य करणारे कुसुमाग्रज.

कवी आणि लेखक म्हणून त्यांची थोरवी शब्दातीत आहे. ते माणसाच्या रूपातले महायात्री होते. ईश्वरदत्त मानवी जन्म घन्य झाला. अशा दिव्य कर्तृत्वापुढे सर्व सन्मान, सर्व गौरव नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहिले. म्हणूनच मराठी साहित्यातील या चालत्या बोलत्या ज्ञानपीठाकडे “ज्ञानपीठ पुरस्कार”अदबीने शाल श्रीफळ घेऊन आला आणि माय मराठी धन्य धन्य झाली, आणि म्हणाली,

“मराठी मी धन्य धन्य,

धन्य जन्म सारा

अढळपदी अंबरात

कुसुमाग्रज चमकता तारा”

कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून अभिमानाचा ठरला आहे.

कुसुमाग्रज आणि माय मराठी  ला मराठी मनाचा मानाचा मुजरा ll

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दोन क्षण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ दोन क्षण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

  (कवी कुसुमाग्रजांच्या दोन चारोळयांवर आधारित ललितबंध)

गतकाळाच्या काही कटू काही गोड आठवणींचं स्मरण वारंवार होणं हे स्वाभाविकच आहे. गेला क्षण पुन्हा येत नाही ही गोष्ट शाश्वत असली तरी गोड क्षणांच्या स्मरणाने मन मोहरून जातं हे नक्की !

कटू क्षणांच्या आठवणी पुन्हा एकवार काळीज हेलावून सोडतात, पण त्या क्षणांसोबतच आपण आपल्या अनुभवाची शिदोरी बांधलेली असते, हे आपण विसरत नाही.

प्रत्येकाचं आयुष्य कधी इंद्रधनुष्यासारखं अनेकविध रंगांनी रंगून जातं तर कधी त्याच आयुष्यावर काळया मेघांचं सावट येतं.सुखाला दुःखाची झालर असते आणि दुःखाला सुखाची आस !

‘प्रेझेंट इज प्रेझेंट’ हे स्वीकारत चाललेलं आयुष्य एकाएकी ढवळून निघतं.एखादा दिवस असा उभा ठाकतो की आपण भूतकाळाचा चलत चित्रपटच पाहतो आहोत की काय अशी शंका यायला लागते. स्वतःच स्वतःला चिमटा काढून जागं करावं लागतं. हे खरंच घडतंय का? अशी शंका येत असतानाच….

वास्तव एखाद्या प्रेझेंट सारखं प्रेझेंट मध्ये आलेलं असतं.त्या स्वप्नवत घटनेला स्वीकारायला लागतं. प्रियजनांच्या याच भावनेतून कुसुमाग्रजांना हया दोन चारोळ्या सुचल्या असाव्यात….

सहज जाता जाता मला गवसलेल्या त्यांच्या या दोन चारोळ्या म्हणजे दोन क्षण आहेत असं मला जाणवलं.

पहिली चारोळी….

भेट जाहली पहिली तेव्हा

सांज पेटली होती

रिमझिम वर्षेतून लालसा

लाल दाटली होती.

पहिला क्षण पहिल्या भेटीचा! निरव, सुंदर, शांत अशी सांज ! या सांजवेळी झालेली ही पहिली भेट. ‘दोनो तरफ आग बराबर लगी है!’ असं वर्णन व्हावं असा तो क्षण…त्या क्षणाची आठवण तितकीच धगधगीत!

रिमझिम बरसणाऱ्या वर्षेच्या आगमनानंतर तर त्या दोघांमधील एका अनामिक ओढीने ही भावना अधिकच दाटून आली. कुसुमाग्रजांनी ‘लाल लालसा’ या शब्दद्वयीतून ती व्यक्त केली आहे.केवळ अप्रतिम!!

स्वप्नात रंगलेला क्षण होता तो!

दुसरा क्षण दुसऱ्या चारोळीतला…

काळ लोटला आज भेटता

नदी आटली होती

ओठावर उपचाराची

सभा दाटली होती

हा क्षण होता….पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतरचा, वर्तमानातला, आजचा, आत्ताचा…..

अकस्मात दोघेही एकमेकांसमोर आले पण….

आंतरिक सुखाच्या अपूर्णतेची अस्पष्टशी एकही हाक त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आल्याचा गंध या वातावरणात नव्हता. तेव्हाचा तो भावनांचा आवेग दोघांनाही जाणवला नाही. ‘नदी आटली होती’ या ओळीतून तो उद्धृत झाला आहे.

त्यांची स्मरण भेट त्यांना वास्तवाचं भान देत होती. ‘काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही अशी दोघांचीही अवस्था ! नीरव शांततेत दोघेही निशब्द!!

ओळख असूनही अनोळखी असल्याचा भास होत होता त्यांना !उपचार म्हणून बोलणं इतकंच उरलं होतं. औपचारिक शब्दच दोघांच्या तोंडून येत होते.

वास्तवाचं भान असणारा क्षण होता तो!

माझ्या वाचन प्रवासाच्या सुरम्य वाटेवर स्वप्न आणि वास्तवाचं भान देणाऱ्या या चारोळ्या सांडल्या होत्या.

प्राजक्ता सारख्या त्या मी वेचल्या आणि माझी रिती ओंजळ मी भरुन घेतली. फुलं सांडून रितं होणाऱ्या त्या प्राजक्ताचे मी आभार मानले. तो प्राजक्त म्हणजे अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ पुन्हा फुलांनी डवरुन पुन्हा माझी ओंजळ भरायला तयार असणारा असा तो प्राजक्त!….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

संक्षिप्त परिचय

शिक्षा – एम. ए(शिक्षण शास्त्र), एम. ए. (इतिहास), बी. एड.

प्रकाशन – विविध वर्तमानपत्र वा मासिके यात कविता. ले, सामाजिक विषयावरील पत्रे प्रसिद्ध, काव्यलेखन, काव्यवाचन, निबंध लेखन, यात 100 हुन अधिक बक्षिसे

विविध सामाजिक संस्थामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत.

जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख

 ☆ विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆ 

महाराष्ट्रातील  बीड जिल्हात   शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो या आंध्रप्रदेश चितूर येथील  उच्चविद्याविभूषित  आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलीना  ठार  मारल्याची  घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना  जेव्हा आपण वाचतो  या पाहतो तेव्हा मनाला  अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी  कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी  ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला  काहीच कसं वाटतं नाही?

अशावेळी आपली प्रगती, सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं  वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा.नरबळी, करनी, भोंदूगिरी, पुंर्जन्म, नवस, भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक  प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी  एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना  विज्ञानजागृतीच फार  मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,

डॉ नरेंद्र दाभोळकर  म्हणतात आपण विज्ञानाची  सृष्टी घेतली पण  दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला  पण आपली मानसिकता, विचार करण्याची पद्धत बदलली नाही. आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो, विविध  उपकरणे आणतो  आणि कुणाची दृष्ट  लागू नये म्हणून दाराला  लिबू मिरची टांगतो  म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे  आहे. भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने  वैज्ञानिक दृष्टीकोन  जोपासणे  हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे. लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता  येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे  नम्र आहे. त्याला  व्यक्ती, स्थळ,काळ  याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा  मार्ग हा उपयुक्त व लाभदायक  आहे.कोणत्याही अतार्किक, बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे. ज्याचा पुरावा आहे ज्याचा  अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या बुद्धीला पटत असेलतरच विश्वास ठेवला पाहिजे. विनाकारण बुवाबाबाच्या नादी  लागून कर्मवादी बनन्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी  बनूया.

श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पूसटशी  रेष असते  त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ, अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत. चला तर आपण स्वतः  पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.

© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

नवी मुंबई

7738436449

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print