मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा,पूरिया,सोहोनी मारवा थाटोत्पन्न हे तीन राग! गोत्र एकच परंतु प्रत्येकाची कुंडली भिन्न, साम्य असूनही वेगळी दिसणारी! स्वभाव वेगळा, चाल वेगळी, स्वतंत्र अस्तित्व असणारी अशी ही तीन सख्खी भावंडेच!

मारवा थाट म्हणजे कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम घेऊन येणारा. अर्थातच या तीनही रागांत रे कोमल आणि म तीव्र, पंचम वर्ज्य, बाकीचे स्वर शुद्ध. अर्थातच यांची जाति षाडव~षाडव.

सगळे स्वर तेच असतांना प्रत्येक राग आपले स्वतंत्र अस्तित्व कसे काय टिकवितो हा एक मोठा प्रश्नच आहे नाही का?  याचे ऊत्तर असे की प्रत्येकाचे चलन संपूर्णपणे वेगळे आहे. दुरून येणार्‍या किंवा पाठमोर्‍या एखाद्या माणसाला आपण जसे त्याच्या चालण्यावरून अचूक ओळखतो तसेच ह्या रागांचे आहे.

ह्या लेखांत आपण मारवा या रागाचे विवेचन करूया.

मारव्याचे सर्व सौंदर्य शुद्ध धैवतात एकवटलेले आहे. या स्वराबद्धल जाणकारांत बरीच मतभिन्नता आहे. कोणी शुद्ध धैवत तर कोणी कोमल आणि शुद्ध या दोन धैवतामधील श्रुतींवर लागणारा धैवत मारव्यात असला पाहीजे असे मानतात. असा कलात्मक धैवत मारव्याचे सौंदर्य खुलवितो, अधिक मोहक रूप व्यक्त करतो. याच्या चलनांत पुर्वांगांत कोमल रिषभ व उत्तरांगांत शुद्ध धैवत प्रबळ आहे. राग विस्तार करतांना षड्जाचा कमीत कमी वापर असल्यामुळे कलाकाराची हा राग सादर करतांना कसोटीच असते. नी(रे)—ग(म)ध— (म)ध(म)ग(रे)—सा। ध आणि रे वर न्यास असे याचे स्वरूप आहे. कोमल रिषभांतून आर्त भाव उमटतात. दिवस व रात्र यांची संधि होण्याची, संधिकालीन वेळ मनाला एकप्रकारची हुरहुर लावणारी, उदास! अशावेळी मारव्याचे सूर त्यातील तीव्र मध्यमामुळे अधिकच कातर वाटतात.”पैया परत छांड दे मोरी गगरी।जाने दे पनिया भरनको शामसुंदर।।ह्या पंक्ती ऐकल्या की गोपींची आर्त विनवणी मारव्याच्या सुरांतून नेमकी समजते.

मारव्यात अनेक मराठी/हिंदी गीते संगीतबद्ध करण्यांत आली आहेत. अरूण दाते यांनी गायिलेले व र्‍हुदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला हे भावगीत मारव्याचे स्पष्ट रूप रसिकांस दाखविते. भक्तीतील करूणा आपल्याला धन्य ते गायनी कळा या नाटकांतील हे करूणाकरा ईश्वरा ह्या भजनांतून

अनुभवास येते.शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी हे सुमन कल्याणपूरचे भावगीत मारवा मधलेच!सांझ ढले गगनतले हम कितने है एकाकी ह्या शब्दांतूनच मारव्यातली ऊदासीनता दिसून येते.

अथांग सागराला भरती आली आहे,पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशांत उसळणार्‍या लाटांची गाज कानावर पडते आहे,अशा निसर्गाच्या रूपाचे दर्शन म्हणजे मारवा!

भैरवकालिंगडा,भूपदेसकार,तोडीमुलतानीप्रमाणेच मारवापूरिया ही जोडी प्रसिद्ध आहे.

पुढील लेखांत आपण पूरिया रागाविषयी बोलूया.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांची बदली “कद्रा ” येथे झाली. कारवारच्या पुढे काळी नदीच्या पलीकडे कद्रा हे छोटेसे खेडेगाव. गाव म्हणजे आदिवासी जमात आणि जंगल. तिथले सगळे वर्णन बाबा आम्हाला अगदी रंगवून सांगत असत. बाबांनी सांगितलेल्या त्या आठवणी  बाबांच्या शब्दात मांडल्या आहेत.

“मेडिकल ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग कद्रा येथे झालं. कद्रा म्हणजे जवळजवळ जंगलच. तेथील एक छोटीशी वस्ती असलेलं गाव. मनुष्यवस्ती अतिशय विरळ. लांब लांब वसलेल्या छोट्या छोट्या घरांची वसाहत. मी व सौ दोघे 2-3 गाड्या बदलून कद्र्याला पोचलो. गावातील लोकांना हे आलेले जोडपे डाॅक्टर आहेत, हे सहज लक्षात आले. जाॅन कपौंडरने दवाखाना दाखवला. एका ब्रिटिशकालीन बंगल्यामध्ये आमच्या रहाण्याचा इंतजाम केला होता. तो बंगला पाहिल्यावर मधुमती सिनेमातील महालाची आठवण झाली. भले मोठे दरवाजे, काचेची तावदाने असलेल्या चौकोनी मोठमोठ्या खिडक्या,  त्यावर अर्धगोलाकार रंगीत काचा, उंच छतावरून लोंबणारे दिवे, हंड्या, मोठाली दालने, अशा भव्य बंगल्यात रहाणार आम्ही दोघे.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येई. खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांनी दिवसाची सुरुवात होत असे. सूर्य मावळला की दिवस संपला. घर ते दवाखाना,  दवाखाना ते घर. दुसरे काहीच नाही. इतरही वेळ घालवण्याचे साधन नाही.

आसपास चार घरे सोडली तर इतर सर्व परिसर जंगलच होतं. संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे,  खिडक्या बंद ठेवा अशा सूचना वस्तीवरच्या लोकांनी दिल्याने दिवसाही खिडक्या  उघडण्याची भीती वाटत होती.

एकदा रविवारी सकाळी जाग आली तेव्हा जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ या असा विचार मनात आला.  दरवाजा उघडण्यापूर्वीच घाण वास  यायला लागला.  घरात शोधलं, उंदीर मरून पडलाय की काय? काहीच सापडलं नाही.. तेवढ्यात बाहेर घुर्र घुर्र आवाज आला. हळूच खिडकी  किंचितशी उघडून बघतो तर काय? ? बाप रे!

असा मोठ्ठा पिवळा जर्द पट्टेरी ढाण्या वाघाचं धूड व्हरांड्यात पसरलं होतं.  माझी तर बोबडीच वळली. खिडकी आवाज न करता बंद केली  आत जाऊन बसलो. दर दहा पंधरा मिनिटांनी कानोसा घेत होतो.  सगळा दिवस तो तिथेच होता. संध्याकाळ झाली तसा तो निघून गेला. दुस-या दिवशी जाॅनला सांगितलं तेव्हा तो हसायला लागला.  सायेब, अशेच आसता हंय….

एक दिवस कोवळी उन्हे अंगावर घेत व्हरांड्यात बसलो होतो. अचानक एक. कुत्र्याचं छोटुलं , गुबुगुबु पिल्लू शेपूट हलवत आमच्या जवळ आलं. बराच वेळ ते घोटाळत होतं. त्याला बहुतेक भूक लागली असावी असं समजून सौ ने चतकोर भाकरी दिली त्याला. ती खाऊन पिल्लू तिथेच रेंगाळलं. दुस-या दिवशी दार उघडलं तर पिल्लू हजर! दोनच दिवसात पिल्लू आपलंसं वाटू लागलं. आता रोज दोन्ही वेळी त्याची भाकरीची ताटली तयार असे. सौ ने त्याचं नाव ठेवलं “रघुनाथ”.

आता रोजचा वेळ रघुनाथ बरोबर छान जाऊ लागला. जवळपास फिरायला गेलो तरी रघुनाथ सोबत असेच. आम्हाला एक छान सोबती मिळाला.

एक दिवस अचानक रघुनाथ दिसेनासा झाला. दोन दिवस झाले, याचा पत्ताच नाही. मन अस्वस्थ झाले. जाॅनला विचारले,  तेव्हा तो सहजपणे म्हणाला, कुत्रे दिसत नाही,  तर नक्कीच वाघरानं खाऊन टाकलं असणार.

एवढंसं गोड पिल्लू वाघानं खाल्लं असं ऐकून खूप वाईट वाटलं. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.  मुक्या प्राण्यांची सवय होते. पुढे नित्य व्यवहारात आठवण कमी होत गेली. कालाय तस्मै नमः II

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

खरोखरी ‘जनरेशन गॅप’ अशी काही गोष्ट असते का हो? दोन पिढ्यांच्या मतांतराला हे नाव दिलंय झाले. असो.प्रत्येक पिढीचा कालावधी वेगळा, परिस्थिती वेगळी,अनुभव वेगळे, उपलब्ध साधन सामग्री वेगळी, त्यामुळे गरजा वेगळ्या, राहणीमान वेगळे, विचारसरणी वेगळी, शैक्षणिक पात्रता वेगळी असते. मग नैसर्गिकपणे त्यांच्या वागण्या-बोलण्यात, विचारात फरक असणारच आहे. त्यात वेगळे विशेष ते काय?

काही वर्षांपर्यंत हे बदल तुलनेने खूप सावकाश होत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती जवळपास सारखीच, आहे तशीच, असायची. आपण आपल्या आजोबा,पणजोबांचे विचार कौतुकाने सांगायचो. पण आता आधीच्या सोडा, अगदी मागच्या पिढीचे विचारही मागासलेले, बुरसटलेले वाटतात.

कारण आजचा काळ एकदम वेगळा आहे‌. आज दोन पिढ्यांमध्ये एकदम तीन-चार पिढ्यांएवढे अंतर पडलेले जाणवते आणि त्यातली कळीची मेख आहे आजचे प्रगत तंत्रज्ञान.

संगणकाचे आगमन झाले आणि बदलाला वेगाने सुरुवात झाली. त्यात एकदम मोठी भर पडली ती मोबाईलमुळे. आजचा  ‘स्मार्टफोन’ तर जणू बाटलीतला राक्षसच आहे. नवीन पिढी अगदी लहानपणापासून या तंत्रज्ञानात पारंगत होतेय आणि जुन्या पिढीला या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड जातेय. त्यामुळे तर दोन पिढ्यातले अंतर आणखीनच वाढले आहे.

पण गरज माणसाला शहाणे बनवते. पाण्यात पडले की पोहता येते. तसे आत्ताच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक ज्येष्ठांनी नवीन तंत्रज्ञानाशी छान दोस्ती केली. त्यामुळे आपोआप नव्या पिढीशी पुन्हा जवळीक होऊ लागली आहे. नवी पिढी पण ज्येष्ठांच्या या विद्यार्थीदशेला  स्वत: गुरु बनून कौतुकाने छान प्रतिसाद देत आहे‌. नव्या-जुन्या पिढ्यांची पुन्हा छान गट्टी जमत आहे.

सर्वच आघाड्यांवरील  बदलाने वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक अंतर हे पडणारच आहे. त्यात नवीन सुधारणांनी, तंत्रज्ञानाने जग जास्ती जवळ आले आहे. नोकरी व्यवसायामुळे परदेशी जाऊन राहणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परदेशी राहणीमान, विचारसरणीचे ही आक्रमण झालेले आहे. तेव्हा नव्या-जुन्यांचा, पाश्चात्य व पौर्वात्य अशा बदलांचा, विचारसरणीचा संयमाने, विवेकाने मेळ घातला की आपोआप संघर्ष टाळता येईल.

अशावेळी दोन्ही पिढ्यांतील लोकांनी दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार केला की त्याची बाजू छान समजते आणि जुळवून घेणे सोपे जाते. म्हणतात ना दुसऱ्याच्या चप्पलेत पाय घातला की, ती नक्की कुठे चावते हे लक्षात येते. तसेच इथेही असते. एकदम कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी दुसऱ्याच्या विचारांचा पूर्ण उलट-सुलट विचार करायला हवा. शेवटी विचार वेगळे असले तरी त्यामागे आपलीच जीवाभावाची व्यक्ती आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. मग आपोआप विचार सोपे होतील आणि संघर्ष टळू शकेल.  मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची काळजी घेता येईल.

नव्या-जुन्यांचा मेळ गुंफणे

हे आपल्याच हातात आहे

एकमेकांना समजून घेणे

हेच दोघांच्याही हिताचे आहे !!

“जगात काय चाललेय हे तुम्हाला माहित नाही. आता पूर्वीचे सगळे विसरा. काळ बदलला आहे.तेव्हा तुम्ही पण जरा काळाप्रमाणे बदला. हे जुने विचार सोडा, “असे नव्यांनी जुन्यांना टाकून बोलू नये‌. त्याच बरोबर,” आम्हाला या सर्व गोष्टी नवीन आहेत‌. थोडा वेळ लागेल जुळवून घ्यायला. आम्ही प्रयत्न करू, तुमच्या कडूनच शिकू. तुम्ही थोडे सांभाळून घ्या,” अशी जुन्या पिढीने पण बदलायची तयारी दाखवायला हवी.

शेवटी जुन्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि नव्यांनी एक पाऊल मागे घेतले, तर हे दोघातले अंतर आपोआप कमी होईल. हातात हात घेत आनंदाने वाटचाल होऊ शकेल. म्हणूनच मला वाटते दोन पिढ्यांच्या मतमतांतरांमुळे ‘वाद’ न होता घर्षणमुक्त ‘संवाद’ होण्यासाठी सोडलेली गॅप म्हणजेच “जनरेशन ” गॅप आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

३१ जाने २० २१ रविवार  रोजी सज्जन गड ला जाताना रस्ता चुकला. गडावर जाण्या ऐवजी परळीला गेलो. तिथे पक्का रस्ता संपल्यावर लक्षात आलं आपण चुकलोय . माघारी फिरलो तर एके ठिकाणी माळावर पडझड झालेले पुरातन शिवमंदीर दिसले. अनेक मंदिर होत. चुकून आलोय तर मंदीर बघूनच जाऊ असं म्हणून मंदिराकडे गेलो. एक मंदिर चांगले होते पण त्याला कुलूप होते. बाहेर डोके नसलेला नंदी होता. तिथेच जवळच उंच स्तंभ होता. नेहमीच्या दीपस्तंभा सारखा नव्हता. हे वेगळेपण. अलीकडे बरीच पडझड झालेलं एक शिवमंदीर होते ते मात्र उघडे होते. गाभाऱ्याच्या वरचा छताचा भाग मोकळा झाल्यामुळे पिंडीवर ऊन पडले होते कळस नव्हताच.  दुरवर आणखी मंदिर होते. बाहेर उत्खनन करून काढलेले बरेच शिल्प शिळा उभ्या करून ठेवलेल्या होत्या . वीरगळ , सतीशिळा होत्या. एक हात असले ल्या अनेक सतीशीळा होत्या. पुरातन काळी हा भाग खूपच वैभवशाली होता असे जाणवत होते.

मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारची कोरीव शिल्प अर्थपूर्ण होती. बाहेर बर्याच शिळा पडलेल्या होत्या. तिथेच बोर्ड लावलेला होता त्यावर लिहिले होते, पांडवकालीन केदारेश्वर मंदीर. परळी. जि. सातारा

परळी गावाच्या शेजारी असूनही खूपच दुर्लक्षित राहिलेले हे अतीसुंदर, पुरातन, वैभवशाली इतिहास सांगणारे असे हे मंदीर एवढे कसे दुर्लक्षित राहिले;  तेही जग प्रसिद्ध अशा सज्जन गडच्या शेजारी असून… याचेच आश्चर्य वाटत होते. इथे उत्खनन होऊन या मंदिराचा इतिहास यावर संशोधन व्हायला हवं असं वाटते.

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

 ☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

तेवढ्यात एका बदामाच्या आकाराच्या छोट्या संदुकीतून खुडबुड ऐकू येऊ लागली. सगळे तिकडे बघू लागले तर चार- पाच कर्णफुले, मोत्यांची कुडी, इअररिंग्ज, बुगडी आपापसात भांडताना संदुकीचे झाकण उघडले होते. आत एकत्र बसून त्यांचे अंग आंबले होते. कुडी कर्णफुलाला म्हणाली,“ मी या घरात सात पिढ्यापासून आहे. म्हणून सगळ्यांनी जपून ठेवलंय. तू काल- परवा आलीस आणि मिजास दाखवतेस होय? उर्मिला तर हल्ली तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्यानेच तुला तिच्यासाठी आणले. थोडे दिवस तुला भरपूर मान मिळाला आणि मग या इअररिंगची फॅशन आली. मग तुला माझ्याशेजारीच येऊन बसावे लागले. आता ही रिंग पण बाजूला पडली आणि उर्मिलेने नवीन फॅशनचे कानातले केले आहे. आधीच तू तुझ्या काट्याने मला सारखी टोचत होतीस आणि आता ही रिंग! सतत आपल्या रिंगणात आपल्याला अडकवत राहते. म्हणूनच आज सुटका करुन घेतली. मोकळ्या हवेवर किती बरे वाटतेय.” कुडी, कर्णफुले, इअररिंग्ज इकडे- तिकडे बागडू लागल्या तेवढ्यात उर्मिलेने खोलीत पाऊल टाकले. दागिन्यांच्या पेटीतील दागिने असे पसरलेले पाहून तिच्या लक्षात आले की हे लेकीचेच काम असणार! तिने रागाने लेकीला हाक मारुन विचारले असता लेक म्हणाली, “ अग ठेवतच होते ग आई! कोल्हापुरी साज नक्की असाच असतो का ते नेटवर बघत होते. आई अगदी तस्साच आहे  बरं का तो! आणि तो कंबरपट्टा आणि मोत्यांची नथ पण हवी आहे  मला उद्यासाठी!”  “ बरं बरं तुला काय हवंय ते घे यातले. पण बाळा, हे सगळे दागिने म्हणजे आपली आज्जी- पणजी यांची आठवण आहेत हो! त्यामुळे नीट नाजूकपणे ठेव. ती कानातली बघ कशी इकडे तिकडे विखुरली आहेत. ती नीट ठेव बघू. उद्या हे सर्व दागिने तुला आणि राजूच्या बायकोलाच देणार आहे मी!” त्यावर लेक लगेच म्हणाली,“ शी आई! असले दागिने कोण वापरतय आजकाल? मी आपली उद्याच्या दिवस कार्यक्रमासाठी घालणार. असले सोन्याचे दागिने हल्ली outdated झालेत ग. आजकाल प्लॅटिनमचे तरी वापरतात, नाहीतर फॅब्रिकचे दागिने एकदम बेस्ट! कोणत्याही ड्रेसवर चांगले दिसतात ग. जरा शिकले तर आपल्याला घरी पण करता येतात. मुख्य म्हणजे स्वस्त आणि use & throw ! उगाच सांभाळत बसायचे टेन्शन नाही.”

ते ऐकून उर्मिला काहीच बोलली नाही. पण एकेक दागिना हातात घेऊन ती हळुवार त्यावर हात फिरवू लागली. आपली सासू, आजेसासू, आई यांच्या एकेक आठवणी प्रत्येक दागिन्यातून तिच्या मनात फेर धरु लागल्या. मग हळुवार एकेक दागिना आत ठेवत ती मनातच म्हणाली, “ दागिन्यांची आवड प्रत्येक स्त्रीला जन्मजातच असते. भले ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या  प्रकारची असेल. पण एकही दागिना अंगावर नाही अशी बाई सापडणे विरळाच! अगदी आदिवासी भागात सुद्धा सोन्याचे नाहीत पण फुलांचे-पानांचे तरी दागिने त्या बायका अंगावर मिरवतातच. आणि दागिन्यांच्या फॅशन काय? आज येतात आणि उद्या जुन्या होतात. मी सुद्धा  काळानुसार काही काही दागिने नवीन फॅशनचे बनवून घेतलेच की!पण आता माझ्या लक्षात येतंय की पुन्हा जुन्याच दागिन्यांना नवीन लेबल लावले जाते आणि नवीन फॅशन म्हणून खपवले जाते. म्हणूनच माझा हा ठेवा मला जपून ठेवायला पाहिजे. कसले use& throw ? थोडे दिवसांनी त्याची पण फॅशन ही नवी पिढी throw करणार आणि या जुन्या दागिन्यांचा पुन्हा use करणार  हे नक्की! ” असे म्हणून तिने सर्व दागिने आपापल्या जागेवर पुन्हा नीटनेटके ठेवले. मालकीणीचा हात फिरल्याने खूष होऊन दागिन्यांनी पेटीत पुन्हा ऐटीत आपली जागा पटकावली आणि ते आनंदाने अधिकच झळाळू लागले.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १६) – ‘क्षणसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १६) – ‘क्षणसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात मानवी आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण साजरा करताना माणसानं संगीताची मदत घेऊन ते क्षण आणखी देखणे कसे केले हा विचार केला कि विविध गीतप्रकार आठवून थक्क व्हायला होतं… मुळात एका जिवाच्या जन्माची चाहूल लागल्याचा एखाद्या भावी मातेच्याआयुष्यातील आनंदी क्षण सर्वांसोबत वाटून घेताना गायली जाणारी डोहाळतुलीचं कोडकौतुक करणारी, येत्या जिवाच्या आगमनाचं सहर्ष स्वागत आणि त्याच्यासाठी शुभचिंतन करणारी डोहाळगीतं, मग मूल जन्मल्यावर त्याला जोजवताना वेळोवेळी गायली जाणारी अंगाईगीतं आणि बारशाच्यावेळी त्याच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारी, त्या जिवासाठी परमात्म्याचे आशीष मागणारी, त्या निरागस जिवाचं गुणागान करणारी, त्या जिवानं पुरुषार्थ गाजवावा म्हणून सहजी दोन महत्वाच्या कानगोष्टी सांगणारी पाळणागीतं, पुढं त्या बालजिवाचं छोट्या-छोट्या बडबडगीतांतून केलेलं मनोरंजन आणि कधी अशा गीतांतूनच नकळत त्याला दिलेलं जगण्यासाठी आवश्यक तत्वांचं बाळकडूही संगीतामुळं सहज सोप्या पद्धतीनं मनात रुजायला मदत होते.

पुढं त्या जिवाच्या आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी गायल्या गेलेल्या मंगलाक्षतांचा विचार केला कि लक्षात येतं त्या मंगलगीतांमुळं त्या क्षणांतला आनंद द्विगुणित होतोच, शिवाय आयुष्यात येणारं ते बदलाचं वळण सहज पार करण्यासाठी कोणत्या जबाबदाऱ्यांची जाणीव मनात असावी हेही नकळत सुचवलं जातं.

मुलांच्या मौंजीबंधनाला सध्या एका संस्कारापेक्षा ‘इव्हेंट’चं जास्त रुपडं आलं आहे. पूर्वीसारखे हे बटू आता मातेला सोडून गुरुगृही राहायला जात नाहीत, स्वत:ची कामं स्वत: करून काबाडकष्ट काढून त्यांना शिक्षण घ्यावं लागत नाही हे जरी खरं असलं तरीही आता बाल्यावस्थेतला पहिला टप्पा पार झाला आहे आणि विद्याभ्यासासाठी आपल्याला एका निर्धारानं सज्ज व्हायचं आहे ही जाणीव त्या जिवात रुजणं आवश्यक आहेच. आत्ताच्या काळानुसार विद्याभ्यासासाठीच्या त्यांच्या काबाडकष्टांचं स्वरूप बदललं आहे इतकंच! पण कष्ट हे घ्यावे लागणार असतातच आणि त्यासाठी सातत्यानं मनोबल राखून ठेवण्याची गरज आणि त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं ह्या मंगलगीतांतूनच सूचित केलं जातं.

मातृभोजनावेळच्या गीतांतले संकेत म्हणजे आता आईचं बोट सोडून आपल्याला जास्त वेळ शाळेत राहून शिक्षण घ्यायचं आहे, त्यावेळी आई सोबत नसणार तरीही मन लावून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मंगलाष्टकांमधे बटूच्या विद्याभ्यासासाठी देवदेवतांचे आशीर्वाद मागितले जातात, त्या बटूनं आता खंबीरपणे, दृढनिश्चयानं, नियमांचं पालन करत संयम राखून विद्यार्जनासाठी परिश्रम करणं त्याचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी किती आवश्यक आहे हे सूचित केलं जातं, त्यासाठी मौंजीबंधनाच्या रुपानं त्याच्यावर काय संस्कार केले जात आहेत त्याचा अर्थ सांगितला जातो.

मंगलाष्टकाचे ते सूर जमलेल्या इतरेजनांचं मनोरंजन करतात, त्याच्या आप्तेष्टांचा आनंद द्विगुणित करतात, त्या सोहळ्याची रंगत वाढवतात आणि त्याचवेळी त्या बटूच्या मनात निश्चितच काही अनमोल भावतरंग उमटवतात. संगीताची ही केवढी मोठी किमया आहे. त्या क्षणापर्यंत ‘बाळ’ असणारा तो जीव थोडा का होईना वेगळा भासायला लागतोच. मंगलगीतं आणि मंत्रसंस्कार दोन्हीच्या सुरांमुळं सोहळा देखणा होतोच परंतू आयुष्यात महत्वाचं वळण येतंय आणि त्याला जबाबदारीनं सामोरं जायला हवं, हा विचार त्या बालजिवाच्या मनात त्याच्या त्यावेळच्या जाणिवेच्या कुवतीनुसार, त्याच्या बालबुद्धीनं केलेल्या आकलनानुसार का होईना अधोरेखित व्हायला मदत नक्की होत असणार.

त्यापुढचा मोठा संस्कार म्हणजे लग्नसंस्कार! दोन जिवांचं, दोन घराण्यांचं, दोन विचारप्रवाहांचंही मीलन होताना त्यातून नवीन सुंदरसं काही अंकुरावं, उत्पन्न व्हावं हा विश्वनियमही राखला जावा असा हा संस्कार! ह्या सोहळ्यातील पूर्वसंस्कार, प्रत्यक्ष विवाहसोहळा आणि त्यानंतरचेही सर्व विधी, धार्मिक प्रथा, चालीरिती सगळं अत्यंत संगीतमय आहे. सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवून जात्याची पूजा करताना कर्त्याधर्त्या गणेशाचं केलेलं स्तवन, घाणा भरताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, उत्सवमूर्तींना हळद लावताना गायली जाणारी गीतं, लेकीची पाठवणी करताना विहीणबाईंना तिला सांभाळून घेण्याची विनवणी करणारी गीतं, कारल्याच्या वेलाखालून विहीणबाई जाताना गायली जाणारी मांडवगीतं असे किती प्रकार सांगावे. ह्यावेळी जे उखाणे घेतले जातात ती भले गीतं नसतील, मात्र त्यातही एक लय सांभाळली गेली असेल तरच ते उखाणे रंगतदार होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण सोहळ्यात सुरू असणारं सनई, चौघडे अशा मंगलवाद्यांचं पार्श्वसंगीत जी वातावरणनिर्मिती करतं तिचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही.

प्रत्यक्ष दोन जिवांच्या डोक्यावर अक्षत पडते त्यावेळी गायल्या गेलेल्या मंगलक्षतांतून तर किती वैविध्यपूर्ण संकेत त्या दोन्ही जिवांना दिले जातात. सामोऱ्या येत असलेल्या वळणातली असीम सुंदरता सांगितली जाते, त्याबरोबरच ती सुंदरता राखण्यासाठी आपापला अहंभाव सोडून एकमेकांत विरघळून जाण्याची आवश्यकता, आता आपण एकटे नाही तर आपल्या दोघांचं मिळून एकच आयुष्य आहे हा अत्यावश्यक विचार आणि ह्यासोबत दोघांच्या आजवरच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडली गेलेली नातीगोती, भावसंबंध आदरभावानं जपणं, वृद्धिंगत करणं ह्या नव्या जबाबदारीविषयीही संकेत दिला जातो.

लग्नसमारंभानंतर वरगृही पूजेसोबतच प्रथा म्हणून काही ठिकाणी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. खास गोंधळी लोकांना बोलावून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अर्थातच अठरापगड जाती असलेल्या आपल्या देशात गोंधळाप्रमाणेच इतरही अनेक प्रथा विविध समाजांमधे अस्तित्वात आहेत आणि त्या-त्या गोष्टींत पारंगत असणाऱ्या कलाकारांना मुद्दाम आमंत्रित करून ह्या प्रथा साजऱ्या केल्या जातात.

त्यानंतर वर्षभरातल्या सणसमारंभांपैकी मंगळागौरीसारखे सण म्हणजे तर संगीतानेच सजलेले म्हणायला हवेत. त्यातले विविध खेळ आणि त्यावेळी गायली जाणारी गीतं म्हणजे ‘स्त्रीगीते’ ह्या लोकसंगीतप्रकारातला सुंदर भाग आहे. त्यात गीत आणि नृत्य ह्याचं सुंदर मिश्रण आहे. जगणं जास्तीत जास्त सुंदर करण्यासाठी क्षणांचा उत्सव करण्याची मानवी मनाची उर्मी संगीताच्या मदतीनं कशी नेमकेपणानं भागवली जाते ह्याची ही सगळी उदाहरणं म्हणता येतील. माणसाच्या जगण्यातली, संस्कृतीतली संगीताची प्रचंड व्याप्ती ह्या सगळ्या उदाहरणांतून आपल्याला दिसून येते.

अर्थातच मी जे-जे उल्लेख केले ते एकतर जगण्यातल्या व्यक्तिगत क्षणांमध्ये सामावल्या गेलेल्या संगीताविषयी आणि मला माहिती असलेल्या गोष्टींतून… मात्र ह्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकार निश्चितच अस्तित्वात आहेत. प्रांत व त्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यानुसार जन्मलेली तिथली संस्कृती, भाषा, समाजव्यवस्थेनुसार विशिष्ट जनसमुदाय अशा अनेक गोष्टींनुसार अक्षरश: अनेकविध गीतप्रकार अस्तित्वात आलेले आहेत.

राहाता राहिला मानवी आयुष्यातील सर्वात गंभीर क्षण… अंतिम क्षण… मृत्यू! ह्या क्षणातही मानवानं किती विविध दृष्टीकोनांतून संगीताला सामावून घेतलं आहे… भावनांचा निचरा होण्यासाठी, मनाला अंतिम सत्याची जाणीव करून देण्यासाठी इ. गोष्टींपासून ते अगदी मृत्यूची खात्री करून घेण्यासाठीही, ह्याविषयी माहिती पुढच्या लेखात पाहूया!

क्रमशः….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-1 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

 ☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“अरे ए, सरक ना बाजूला! जरा कुठे अंग पसरायला जागा नाही. शी बाई! या कंबरपट्ट्याने सगळीच जागा व्यापलीये. मोठ्ठा ‛आ’ वासून पसरलाय. आणि आजूबाजूला या मेखलाबाईंचा गोतावळा आहे. कशा नवरोबाना चिकटून बसल्या आहेत बघा. मेली लाज कशी वाटत नाही म्हणते मी! हल्ली या कंबरपट्याचा मान वधारलाय ना? म्हणून ही मिजास! त्याच्याच बाजूला या एकाच पेटीत आम्हाला आपले एका बाजूला अंग चोरुन घेऊन पडून घ्यावे लागतेय. आमचे म्हणजे त्या जीवशास्त्रातील अमिबासारखे आहे. मिळेल त्या जागेत, आहे त्या आकारात स्वतःला सामावून घ्यायचे. त्यामुळे कोणीही उचलावे आणि हवे तिकडे टाकून द्यावे.”

दागिन्यांच्या मोठ्या डब्यामध्ये एका बाजूला बसून या सोन्याच्या साखळीताईंची बडबड चालू होती.

तेवढ्यात पोहेहार तिच्याकडे सरकत म्हणाला, “ताई, कशाला वाईट वाटून घेतेस? अग, माझे तरी काय वेगळे आहे? मलाही आहे त्या जागेत कसेही कोंबतात ग. हे पदर एकमेकात अडकून कसा चिमटा बसतो हे तू अनुभवले नाहीस. माईंच्या लग्नात त्यांच्या सासूबाईंनी मला घडवले. माई होत्या तोपर्यंत किती हौसेने मिरवायच्या मला. पण माईंची सून उर्मिलेने एक दोनदा मला घातले आणि अडगळीतच टाकून दिले.  म्हणे मी outdated झाले आहे म्हणे. म्हणूनच ही अवस्था झाली आहे. अग साखळीताई, किमान वर्षातून लहान- सहान कार्यक्रमाला तरी तुला बाहेरची हवा मिळते. पण चिमटे बसून- बसून माझे अंग दुखू लागलंय बघ!”

त्याचवेळी एका सुंदरशा चौकोनी पेटीत मऊ गादीवर बसलेला कोल्हापुरी साज म्हणाला, “ इतके वाईट वाटून घेऊ नकोस रे दादा!  आता मिळतेय मला ही मऊमऊ गादी. पण मध्यन्तरीच्या काळात मलाही ही उपेक्षा सहन करावीच लागली आहे.  ‛रायाकडून’ हट्ट करुन करुन मला घडवून घेणाऱ्या या बायकांना काही दिवसांनी मी पण outdated वाटू लागलो. मग लागली माझी पण वाट! माझ्यातच गुंतलेल्या माझ्याच  तारेने- या बायकोने सारखे टोचून टोचून हैराण केले बघ मला. शेवटी बायकोच ती! पण एकदा एका पार्टीत उर्मिलेच्या मैत्रिणीने कोल्हापूरी साज ‛new fashion’ म्हणून घातला. तर काय? माझा भाव एकदम वधारला. उर्मिलेने पुन्हा माझी डागडुजी करून घेतली आणि मी झळकू लागलो. माझी बायको पण आता कशी शिस्तीत मला चिकटून बसली आहे बघ. आणि आता म्हणे उर्मिलेच्या लेकीचे कॉलेजमध्ये लावणी फ्यूजन आहे. त्यात मी हवाच आहे. म्हणूनच आपल्याला बाहेर काढले आहे आज आणि ही थोडी थोडी बाहेरची हवा चाखायला मिळते आहे. त्यामुळे थोडे सहन करा. कदाचित थोडे दिवसांनी पुन्हा तुमचे दिवस येतील.”

त्याच्याच शेजारी जोंधळ्यासारख्याच पण त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या सोनेरी दाण्यांच्या नक्षीने सजलेली ठुशी समजूत काढत म्हणाली, “ नका रे एवढे निराश होऊ. शेवटी प्रत्येकाचे दिवस असतात हेच खरे. मला नाही कधी उपेक्षा सहन करावी लागली. अगदी जन्मापासून मी प्रत्येक बाईच्या गळ्यातला ताईत बनले आहे. माईंच्या सासूबाईंच्या आईने मला घडवून घेतले. त्यांच्यानंतर माई आणि आता उर्मिलासुद्धा अधूनमधून मला प्रेमाने मिरवतात. खूप वर्ष सेवा केल्यावर मध्यंतरी जरा आजारी पडले होते. पण माईंनी उर्मिलेच्या लग्नाच्या वेळी पुन्हा मला तंदुरुस्त केले आणि मी नवीन सुनेच्या गळ्यात तितक्याच दिमाखाने मिरवू लागले. त्यामुळे मी खूप पावसाळे पाहिलेत. म्हणूनच ‛एक ना एक दिवस प्रत्येकाचे चांगले दिवस येणार’हे माझे शब्द लक्षात ठेवा.”

तेवढ्यात एका कोपऱ्यात बसलेली पाटलीबाई मुसमुसत म्हणाली,“ तू म्हणतेस ते खरे ग ठुशीआज्जी! पण माझे काय? हल्ली हातात पाटल्या- बांगड्या घालायची फॅशन गेलीये म्हणे. माईंच्या सासूबाईंच्या लग्नात त्यांच्या सासऱ्यांनी चांगली पाच तोळ्याची आमची जोडी बनवून घेतली होती. माईच्या सासूबाईंचे वय अवघे आठ वर्षाचे ग त्यावेळी! बिचारी कशीबशी माझे वजन सांभाळायची. बरोबर बिलवर- तोडे या माझ्या भगिनी पण असायच्या ना ग! माई असेपर्यंत आम्ही सुखाने त्यांच्या हातावर नांदलो. उर्मिलेला मात्र रोज नोकरीवर जाताना सगळे हातात घालणे शक्यच नव्हते. तेव्हापासून आम्हा दोघींची रवानगी या छोट्या कोपऱ्यात झाली आहे. आणि आमच्या भगिनींचा मेकओव्हर करुन कंगन-ब्रेसलेटच्या रुपात अधून- मधून झळकतात उर्मिला आणि तिच्या लेकीच्या हातावर! मला मात्र घराण्याची आठवण म्हणून जपून ठेवले आहे हो! पण कधीतरी माझासुद्धा मेकओव्हर होईल की काय अशी भीती वाटत राहते. परवाच उर्मिलेचा राजू आईला सुनावत होता की ‛कसली घराण्याची परंपरा आणि काय? हे दागिने जपून ठेवून काय करायचे आहेत? त्यापेक्षा मला दे सगळे. त्याचे दुप्पट पैसे करुन देतो.’

पण उर्मिला काही बधली नाही हो त्याला. म्हणून आपण सगळे वाचलो आहोत आज.” “ हे बाकी खरे हो!” छोट्याश्या पेटीत बसलेली टपोऱ्या मोत्यांची नथ म्हणाली.“ मला माईंचा हट्ट म्हणून त्यांच्या यजमानांनी मुलाच्या मुंजीत पुण्यात पेठे सराफांकडून बनवून घेतले. माई सगळ्या कार्यक्रमात अगदी हौसेने मला मिरवत. उर्मिलेने पहिल्यांदा हळदी-कुंकू, मंगळागौरीत मला मिरवले. पण तिच्या नाकाला काही माझा भार सहन होईना. मग तिने तिच्या पहिल्या भिशीच्या पैशातून माझी ही छोटी सवत ‘हिऱ्याची नथनी’ करुन घेतली. आता तिच तोरा मिरवत असते.”

क्रमशः…

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे जन्मदाते….! ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ माझे जन्मदाते….! ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

आम्ही पाच बहिणी.

“सगळ्या  मुलीच? मुलगा नाही? मग वारस कोण? वंश खुंटला.”

अशा दुर्भाष्यांना, माझ्या आई वडीलांना नेहमी सामोरं जावं लागत असे.

पण दोघंही खंबीर. वडील नेहमी म्हणायचे, “माझ्या पाच कन्याच माझे पाच पांडव आहेत! माझ्या वंशाच्या पाच दीपीका आहेत!”

लहानपणी जाणीवा इतक्या प्रगल्भ नव्हत्या पण आज जाणवतय् पित्याची ती ब्रह्मवाक्ये होती! आणि त्यांनीच आम्हाला आत्मसन्मान,आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास दिला.

आई, स्रीजन्माची कर्तव्ये तिच्या स्वत:च्या आचरणातून कळतनकळत बिंबवत होतीच.  त्याचवेळी वडील — पपा विचारांचे, लढण्याचे, सामोरं जाण्याचे, दुबळं.. लेचपेचं. न राहण्याचे धडे गिरवत होते! ते म्हणत, “गगनाला चुंबणारे वृक्ष नाही झालात —— हरकत नाही. पण लव्हाळ्या सारखे व्हा! वादळात मोठी झाडं ऊन्मळुन पडतात पण लव्हाळी तग धरतात!”

आमच्या घरात ऊपासतापास, व्रतवैकल्ये, कर्मठ देवधर्म नव्हते. परंतु पारंपारिक सोहळे आनंदाचे प्रतिक म्हणून जरुर साजरे केले जात.

प्रभात समयी पपा रोज ओव्या अभंग त्यांच्या सुरेल आवाजात गात! ते सारं तत्व अंत:प्रवाहात झिरपत राह्यल.आणि त्यानं आम्हाला घडवलं!

एक दिवस मी पपांना म्हणाले, “पपा सकाळी तुम्ही मला पैसे दिले होते. पण हिशेब विचारायला विसरलात!”

ते लगेच म्हणाले, “बाबी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच ते वेडेवाकडे खर्च केले नसणार”

मुलांवर आईवडीलांचा विश्वास असणे ही त्यांच्या जडणघडणीतील खूप महत्वाची पायरी असते! पपांनी नाती जोडायला शिकवलं अन् आईने ती टिकवायला शिकवलं.

आईनं केसांच्या घट्ट वेण्या घातल्या अन् पपांनी मनाची वीण घट्ट केली.

असं बरंच काही…

लहानपणी माझ्या मुलीने निबंधात लिहीले होते “मला चांगली आई व्हायचे आहे”

माझ्या आईसारखी आई मी होऊ शकले का हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो!

परवा पपांच्या स्मृतीदिनी धाकटी बहीण म्हणाली, “आपण पपांच्या दशांगुळेही नाही. त्यांची विद्वत्ता, वाचन, लेखन, स्मरणशक्ती, जिद्द चिकाटी काही नाही आपल्यात!”

खरय्.. पण त्यांच्याकडुन जगावं कसं ते शिकलो!

वादळ संपेपर्य्ंत टिकणारी लव्हाळी तर झालोच ना?

खूप रुणी आहे मी माझ्या जन्मदात्यांची..!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

रसग्रहण:

आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मागे वळून कवीने आपल्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. तरुणपणी प्रेम यशस्वी झाले नाही, उमेदीच्या वयात अपेक्षित यश मिळाले नाही, ज्या वयात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत, त्यांची फक्त आठवण काढलेली आहे.  आता अशी वेळ आहे की,  यापुढे या इच्छा पूर्णच होऊ शकणार नाहीत.

दोघे एकेकाळचे प्रेमिक. पण प्रेम असफल झालेले. पुन्हा आता त्यांनी भेटून काय होणार? देणे घेणे खूप झाले. पण सर्व व्यर्थ गेले. आता हातात राहिलेल्या श्वासांच्या भरोशावर काहीच करता येणे शक्य नाही. या भेटीतून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण माझा काळ सरला आहे आणि तुझी वेळ ही टळून गेलेली आहे अशी अवस्था आहे.

तीच गोष्ट आयुष्यातील यशापयशाची. तेव्हा तारुण्याचा बहर होता. मनात जिद्द होती. ध्येयपूर्तीचा ध्यास होता. त्याच मुळे हाती असलेल्या गोष्टींच्या मदतीने (सरूप) यशाच्या प्राप्तीचे (अरूप) चित्र मनात रेखाटले जात होते. पण ते जमले नाही. त्यावेळी अपयशाची भीती होती. तिचे पण आता वय झाले म्हणजे यश-अपयश यांचे आता काहीच वाटत नाही. मन त्याच्या पलीकडे गेलेले आहे. त्यामुळे यशाच्या अपेक्षेने एवढा मोठा डोलारा सांभाळण्यात काहीच अर्थ नाही. कारण आता माझा काळ सरत आलाय आणि यशाची ती वेळही टळून गेली आहे.

कवी श्री वैभव जोशी

हे ईश्वरा,  तेव्हा तुझी खुप प्रार्थना केली. पण व्यर्थ गेली. आता माझ्या प्रार्थनेत तेवढी आर्तता, तेवढे बळ राहिलेले नाही आणि तुझ्याकडे माझ्यासाठी कृपेचे दानही नाही. आता मी ऐलतीरी आणि माझी नजर पैलतीरी लागली असताना सर्व देव मला सारखेच वाटायला लागले आहेत.  आता या सरत्या आयुष्यात मनामध्ये फक्त प्रेमाची, कष्टांची, श्रद्धेची आठवण जागी आहे. त्यामुळेच मनात भावनांची ओल टिकून आहे.  पण आता याहून वेगळे काही होणारच नाही कारण या सगळ्यांची वेळ टळून गेली आहे आणि माझा काळही सरला आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्यातील अप्राप्य राहिलेल्या गोष्टींच्या आठवणीने कवी सदगदीत होतो. या गोष्टींना उजाळा देतो आहे. यातून एक जाणवते हव्या असलेल्या गोष्टी त्याचवेळेस मिळाल्या तर त्यांचा आनंद वेगळाच असतो.

(चित्र – साभार फेसबुक वाल) 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विविध गुणदर्शन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ विविध गुणदर्शन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार ?

शाळेत असताना  आमचे काही  सगळ्यात आवडते  दिवस असायचे ते म्हणजे २६ जानेवारी, १५ ऑगष्ट, शेवटची मारुती पूजा आणि  विविध गुणदर्शन/स्नेहसंमेलन (तसं आम्ही आमचे विविध गुण शाळेत दररोजच उधळायचो म्हणा).  आजच्या अनेक यशस्वी ठरलेल्या कलाकारांनी आपली कला सर्वप्रथम कुठे सादर केली असेल तर  माझ्यामते शाळेत.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे कितीही  खरे असले  तरी  ती कला सादर करायला  त्यांना पहिला प्लँटफॉर्म शाळेने  दिला हे अनेक जण मान्य करतील.

शाळेच्या वार्षिक स्पर्धा मग त्या मैदानी असू देत  किंवा बौद्धिक अनेकजण यात भाग घ्यायचे.  गायन, वक्तृत्व (अजूनही हा शब्द मला बरोबर लिहिता आला तर शपथ !), निबंध, धावणे, पोहणे,  खो-खो, बुध्दीबळ, रिले-रेस  आणि अनेक स्पर्धा. यात ज्यांनी सातत्य राखले, ज्यांना आवडीच्या गोष्टीत अजून पुढे जायची इच्छा झाली त्यांनी पुढे ती कला जोपासली. मग  कॉलेज, जिल्हा स्तरीय स्पर्धा, गणेशोत्सव वगैरे निमित्ताने अनेकांचा उदयोन्मुख कलाकार ते प्रसिध्द कलाकार किंवा  खेळाडू  असा  प्रवास झाला. अनेकजणांची किर्ती वटवृक्षाएवढी मोठी झाली पण याचे मूळ मात्र नक्कीच शाळेत रुजले गेले असं म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेकजण ते मान्य ही करतील.

वार्षिक स्पर्धांचे वेळापत्रक लागले की  कुठे कुठे आणि केंव्हा केंव्हा कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेता येईल याची चाचपणी व्हायची.प्रामुख्याने सकाळच्या सत्रात मैदानी स्पर्था आणि दुपारी गाणे/स्तोत्र पठण/चित्रकला/निबंध अशा पध्दतीने स्पर्धांचे आयोजन व्हायचे. ‘कृष्णा नदीत’ पोहण्याची स्पर्धा हे एक आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असायचे. त्यावेळीही मॅक्झीमम् स्पर्धेत भाग कसा घेता येईल हे बघीतले जायचे.

ब -याचदा नंबर यायचा नाही. पण  यामुळे फार काही कधी दुःखे झालो नाही.  ही प्रोसेस मात्र भरपूर एन्जॉय केली जायची, सगळ्यांकडूनच.  स्पर्धा संपल्या की एक दिवस शाळेत जेवणाचा कार्यक्रम असायचा. सगळ्या मित्रांसमवेत ‘स्नेह भोजन’  याची मजा  काही अनोखी असायची. त्यानंतर पारितोषेक वितरण आणि बहुतेक त्याच दिवशी संध्याकाळी विविध – गुण दर्शनाचा कार्यक्रम असायचा. नाटके, मिमिक्री, डान्स, गाणे  आणि बरेच काही  सादर होऊन  हा ‘अनुपम्य सोहळा ‘ संपायचा आणि  सगळेजण  (मी सोडून) वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागायचे.

हेच विविध गुण दर्शन पुढे कॉलेज मध्ये ही  सुरु राहिले. इकडे जरा  तारुण्याची शिंगे फुटली होती. स्तोत्र पठणाच्या जागी  “फिश पॉन्ड” ?  आले होते. ‘रेकॉर्ड फिश पॉन्ड’  नामक  प्रकार कळला, आणी आमच्या टवाळखोरीला चार चाँद लागले.

संबंध वर्षात एखाद्या मित्राच्या (मैत्रीणींच्या च जास्त) स्वभाव/गुण/घटना यावर समर्पक ओळी लिहिणे. किंवा तिला/त्याला उद्देशून गाणं  लावणे या साठी अभ्यास करु लागलो.  यात कॉलेजचे प्रोफेसर/प्राचार्य मंडळीही सुटायची नाहीत.  नवीन आलेल्या मुलीसाठी – “कुण्या गावाचं आलं पाखरू”   हे गाणं लागलं नाही  तर फाॅल व्हायचा.  “पापा कहते हे बडा नाम करेगा/खुद्द को क्या समजती  है/क्या अदा क्या नखरे तेरे पारो” वगैरे गाणी  फिक्स असायची, ती कुणाच्या नावे हे फक्त दरवर्षी बदलायचे.

काही फिश-पाॅन्ड ?

ची यानिमित्याने फक्त उजळणी

जिवलग मैत्रीणींसाठी :-

आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,

हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:-

अजीब दास्तां है ये,

कहां शुरु कहां खतम,

ये लेक्चर है कौनसा,

न वो समझ सके न हम..

खालील ‘फिश- पाॅन्ड’ कुणासाठी ते तुम्हीच ठरवा:-?

करायला गेली रक्त दान

करायला गेली रक्त दान

डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…

कोण म्हणत मी खड्ड्यात पडले,

मी पडले म्हणून खड्डा पडला.

 

म्हणतो मुलींना चल आपण वडापाव खाऊ.

म्हणतो मुलीना चल आपण वडापाव खाऊ.

.

.

कँटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात

किती माझा चांगला भाऊ…….

 

उठे सबके कदम

तर रम पम पम

कभी ऐसे मार्क्स लाया करो

कभी झिरो कभी वन

कभी उससे भी कम

कभी तो पास होके आया करो. ?

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

मंडळी,

काय तुम्हाला काही पडलेले का

“फिश -पॉन्ड “? किंवा तुमच्या खास मित्र- मैत्रिणीना?. लिहा की मग  कमेंट मध्ये खाली

तर मंडळी आजच्या टवाळखोरीचा शेवट आम्हाला ११ वी का १२ वीला आमच्या  “सांगली कॉलेज “मध्ये पडलेल्या (फारच टुकार) फिश-पॉन्डने

“स्वप्नात आली जुही चावला. उठून बघतो तर  ढेकूण चावला”

तेव्हा पासून  खरं म्हणजे आम्ही  कुठलीही गोष्ट चावली की लगेच खाजवायला….. ?

फिशो आपलं असो

(स्तंभ लेखक) अमोल केळकर  ?✌?

(इथे आम्ही उधळलेले विविध  -गुण वाचायला मिळतील) >>poetrymazi.blogspot.com

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print